Chaar tapassya chaar mukti

 

चार तपस्या आणि चार मुक्ती

 

श्रीमाताजी

१९८३

 

 

पान क्र. ()

 

प्रकाशक : संजीवन कार्यालय

श्रीअरविंद आश्रम पाँडिचेरी - २

अनुवादक : कु.विमल भिडे

 

तृतीय आवृत्ती १९८३

किंमत २ रुपये

 

© श्रीअरविंद आश्रम ट्रस्ट

मुद्रक : ऑल इंडिया प्रेस

श्रीअरविंद आश्रम, पाँडिचेरी - २

पान क्र. ()

 

चार तपस्या व चार मुक्ती

अतिमानसाची प्राप्ती करून देण्यास साह्य करणारें सर्वांगीण शिक्षण पूर्णतेस न्यावयाचें असेल, तर चार प्रकारची तपस्या आणि चार प्रकारची मुक्तीही आवश्यक आहे.

तपस्या म्हणजे आत्मपीडन असे सामान्यत: चुकून समजलें जातें. शारीरिक, प्राणमय आणि मानसिक जीवनाला आध्यात्मिक वळण देण्याचें महाकठीण काम टाळण्यासाठीं, असें रूपांतर करणें अशक्यच आहे असें प्रतिपादन करून व हें जीवन म्हणजे निरर्थक ओझें, एक बंधन किंवा आध्यात्मिक प्रगतीस पायबंद घालणारें आहे अशा भावनेनें तपस्वी निर्दयपणें त्याचा त्याग करतात; निदानपक्षीं, जीवन म्हणजे सुधारतां येणार नाहीं अशी एक वस्तु आहे, प्रकृतिधर्मानुसार अथवा

पान क्र. ०१

 

भगवत्कृपेनें मृत्युद्वारां त्यांच्यातून आपली सुटका होईपर्यंत कसेंतरी वाहून नेण्याचें तें एक ओझें आहे असें ते मानतात. किंवा फारतर, उन्नति करून घेण्याकरतां ऐहिक जीवन हें एक क्षेत्र आहे म्हणून त्याच्यांतून व्यक्तीनें जास्तींत जास्त फायदा करून घेतला पाहिजे, व पूर्णतेच्या ज्या अवस्थेमध्यें ही जीवनपरीक्षा अनावश्यक ठरून तिचा अंत होईल अशा अवस्थेपर्यंत शक्य तितक्या लवकर जाऊन पोहोंचलें पाहिजे असें ते मानतात.

पण आमच्या दृष्टीनें हा प्रश्न अगदीं वेगळाच आहे. पृथ्वीवरील जीवन म्हणजे केवळ एक मार्ग किंवा केवळ एक साधन नाहीं, तर रूपांतरित स्वरूपांतील पार्थिव जीवन हें आपलें अंतिम उद्दिष्ट किंवा साध्य असलें पाहिजे असें आम्ही मानतो. जेव्हां आम्ही तपस्या केली पाहिजे असें म्हणतो, तेव्हां शरीराचा तिरस्कार करून, त्याच्याशीं असलेला संबंध तोडून टाकण्यासाठीं नव्हे तर आत्मसंयम आणि आत्मप्रभुत्व मिळविण्याची जरुरी आहे म्हणून तसें म्हणतो. कारण तपस्व्यांच्या सर्व तप -

पान क्र. ०२

 

स्यांपेक्षां कितीतरी महान्, अधिक पूर्ण आणि अधिक कठीण अशी एक तपस्या आहे. ती तपस्या म्हणजे सर्वांगीण रूपांतरकार्यास आवश्यक असलेली, अतिमानसिक सत्याचा आविष्कार करण्यास व्यक्तीस पात्र बनविणारी चतुर्विध तपस्या. उदाहरणादाखल असें म्हणतां येईल कीं शरीराच्या पूर्णत्व-प्राप्तीसाठीं ज्या शारीरिक तपस्येची अतीव आवश्यकता असते, त्या तपस्येइतक्या दुसऱ्या कडक तपस्या फारच थोड्या असतात. पण त्यासंबंधीं आपण पुढें योग्य वेळीं बोलूंच.

आपणांस आवश्यक असलेल्या चार तपस्यांचें विवरण करण्यापूर्वीं, बहुतेक लोकांच्या मनामध्यें बराच गैरसमज आणि गोंधळ उत्पन्न करण्यास कारणीभूत झालेल्या एका गोष्टीविषयीं स्पष्टीकरण करणें आवश्यक आहे. ती गोष्ट म्हणजे तपस्व्यांच्या तपश्चर्येंला लोक आध्यात्मिक साधना मानतात ही होय. शरीराच्या बंधनांतून आत्म्याची सुटका करून घेण्यासाठीं म्हणून शरीराला पीडा देण्याचे नाना प्रकार या तपश्चर्येंत अंतर्भूत केलेले असतात. पण वास्तविक अशा तपश्चर्या

पान क्र. ०३

 

 

म्हणजे आध्यात्मिक साधनेला जड इंद्रियांच्या पातळीवर आणून विकृत करणें आहे. तपस्वी आत्मपीडनास प्रवृत्त होतो यास कारण त्याच्या ठिकाणीं आत्मक्लेशाविषयीं उत्पन्न झालेली विकृत गरज होय. स्पष्टपणें कबूल केलेले नसले किंवा तसें करणें शक्य नसले तरी साधूची शरशय्या, किंवा स्वतःला चाबकाचे फटके मारून घेणें आणि गोणपाटाचा वस्त्राप्रमाणें वापर करणें या ख्रिश्चन तपस्व्यांच्या पद्धती म्हणजे थोड्या फार प्रछन्न स्वरूपांतील आत्मपीडनासक्तीचाच परिणाम आहेत; तीव्र उग्र संवेदनांसाठीं ती विकृतिदर्शक हांव किंवा त्यांसाठीं ती एक सुप्त गरज असते. वास्तविक या गोष्टी खऱ्या आध्यात्मिक जीवनापासून फार फार दूर आहेत; त्या हिडीस आणि हीन, अज्ञानाधिष्ठित आणि विकृत आहेत; तर उलट आध्यात्मिक जीवन हें प्रकाशमय आणि समतोल, सौंदर्यपूर्ण आणि आंनदमय जीवन असतें. शरीराला पीडा देणाऱ्या एक प्रकारच्या मानसिक आणि भावनाधिष्ठित क्रूरतेनें या गोष्टी शोधून काढल्या आहेत आणि प्रशंसनीय मानल्या आहेत. पण स्वतःच्या शरी-

पान क्र. ०४

 

रासंबंधीं असली तरी क्रूरता ती क्रूरताच. कोणत्याही प्रकारची क्रूरता ही गाढ अचेतनाचीच एक खूण आहे. तमोमय प्रकृतीच्या लोकांनाच तीव्र संवेदनांची गरज भासते; कारण त्याशिवाय त्यांना संवेदनाच कळूं शकत नाहींत. आणि क्रूरता हा एक पीडनाचाच प्रकार असल्यानें अतिशय प्रबळ संवेदना निर्माण करतो. भगवंताप्रत करावयाच्या उड्‌डाणामध्यें शरीराचा अडथळा येऊं नये म्हणून शरीराच्या सर्व संवेदना मारूनच टाकावयाच्या असा या तपस्यांमागील उघड उघड उद्‌देश असतो. पण याचा कितपत उपयोग होत असेल याविषयीं शंकाच आहे. ही गोष्ट सर्वमान्यच आहे कीं मनुष्याला शीघ्र गतीनें प्रगती करून घ्यावयाची असली तर त्यानें अडचणींना घाबरतां कामा नये. उलट, प्रत्येक प्रसंगीं अधिक कठीण गोष्ट निवडून तीच करावयास घेतल्यानें मनुष्याची इच्छाशक्ति वाढते, त्याच्या मज्जातंतूंचेंही सामर्थ्य वाढतें. खरोखर, या विकृत तपस्या व त्यांच्या विघटनकारी परिणामामुळें उत्पन्न होणारीं विकृत सुखें व तमोमयता यांच्याशीं संघर्ष करणें यापेक्षां

पान क्र. ०५

 

परिमितता व समतोलपणा, समचित्तता व प्रसन्नता यांनीं युक्त असें जीवन व्यतीत करणेंच कितीतरी अधिक कठीण आहे. शरीराची अवहेलना करून तें अगदीं नाममात्र उरेपर्यंत नि:सत्त्व करण्यापेक्षां संयमानें आणि शारीर व्यवस्थेंत गुंतागुंत उत्पन्न न करतां सुसंवाद राखून अधिकाधिक प्रगत होणारा विकास घडवून आणणें कितीतरी अधिक कठीण आहे. आपल्या कडक तपस्येचें अहंकारानें प्रदर्शन करण्यासाठीं, शरीराला अत्यंत आवश्यक असलेला आहार वर्ज्य करणें व स्वच्छपणाच्या आरोग्यकारक संवयी सोडून देणें, यापेक्षां समंजसपणानें आणि वासनारहित जीवन जगणें अधिक कठीण आहे. तसेंच कोणत्याही आजारावर उपचार न करतां केवळ दुर्लक्ष करून त्याच्या विनाशकार्यास सरळ वाट करून देणें यापेक्षां निर्मलता व समतोलपणा आणि आंतरिक व बाह्य सुसंवाद राखून रोग होऊं न देणें, त्यांतून पार पडणें किंवा त्याला जिंकणें हें अतिशय अवघड आहे, आणि या सर्वांहूनहि, आपल्या जाणिवेची पातळी शक्य तितक्या अत्युच्च शिखरावर सतत

पान क्र. ०६

 

ठेवणें आणि शरीराला हीन उर्मींच्या प्रभावाच्या आहारीं कधींहि जाऊं न देणें ही गोष्ट अधिक कठीण आहे.

वर उल्लेखिलेला हेतु डोळ्यासमोर ठेवून आपण चार तपस्यांचा अंगीकार केला पाहिजे, म्हणजे परिणामीं आपणांस चतुर्विध मुक्ती प्राप्त होईल.

त्यांचें आचरण करावयाचें तर खालील चार 'तपस्यांचा' किंवा 'साधनांचा' त्यांत अंतर्भाव करावा लागेल. त्या अशा -

(१) प्रेमविषयक तपस्या किंवा साधना

(२) ज्ञानविषयक तपस्या किंवा साधना

(३) शक्तिविषयक तपस्या किंवा साधना

(४) सौंदर्यविषयक तपस्या किंवा साधना

त्यांचा क्रम, तसें म्हटलें तर, वरून खालीं असा आहे. पण श्रेष्ठ व कनिष्ठपणा किंवा साधनेमधील कमी अधिक कठीणपणा किंवा साधना करतांना अनुसरतां येणारा अथवा अनुसरावयास पाहिजे असा अनुक्रम त्यायोगें दर्शविला आहे असें समजूं नये. त्यांचा

पान क्र. ०७

 

क्रम, महत्त्व आणि कठीणपणा व्यक्तिगणिक बदलतो. म्हणूनच त्या बाबतींत कोणताच निरपवाद नियम ठरवितां येणार नाहीं. प्रत्येकानें आपल्या क्षमतेनुसार व जरुरीप्रमाणें आपल्या स्वतःला योग्य अशी पद्धती शोधून काढून तिचें अनुसरण करावें.

शक्य तितक्या सर्वांगपूर्ण आदर्श पद्धतीचें प्रतिपादन करणारा सर्वसमावेशक दृष्टिकोण फक्त येथें मांडला आहे. त्याचें आचरण मात्र प्रत्येकानें स्वतःच जास्तींत जास्त प्रमाणांत व अधिकाधिक चांगल्या पद्धतीनें करावें लागेल.

सौंदर्याची तपस्या किंवा साधना आपणांस भौतिक जीवनाच्या तपस्येच्या द्वारां कर्मस्वातंत्र्याप्रत घेऊन जाईल. त्यासाठीं पायाभूत कार्यक्रम म्हणून प्रथम सुंदर बांध्याचें, सुसंवादी ठेवणीचें, हालचालीमध्यें चपल व लवचीक, कार्य करतांना सामर्थ्यसंपन्न व ज्याची प्रकृति व अंतर्गत कार्यें प्रतिकारशक्तिपूर्ण आहेत असें शरीर तयार करणें हा असेल.

हें सर्व साध्य करून घेण्यासाठीं कांहीं विशिष्ट

पान क्र. ०८

 

सवयी लावून घेऊन, भौतिक जीवन सुसंघटित करण्यासाठीं त्यांचा सहाय्यक म्हणून उपयोग करून घेणें सामान्यत: योग्य होईल. कारण नियमित आंखीव कार्यक्रमाच्या चौकटींत आपलें शरीर अधिक सुगमतेनें कार्य करूं शकतें. पण हें लक्षांत ठेवलें पाहिजे कीं, संवयी कितीही चांगल्या असल्या तरी त्यांचे गुलाम होतां कामा नये. आपल्या संवयी जेव्हां आवश्यक तेव्हां प्रत्येक वेळीं बदलतां याव्यात म्हणून आपण अतिशय लवचीकपणा अवश्य राखला पाहिजें.

लवचीक पण शक्तिसंपन्न स्नायुव्यूहामधील आपली मज्जासंस्था आपण पोलादाप्रमाणें बळकट केली पाहिजे, म्हणजे जेव्हां कांहीं ताण सहन करण्याचा प्रसंग येईल तेव्हां आपण तो सर्व सहन करण्यास पूर्ण समर्थ राहूं. पण त्याचवेळी अशीही काळजी घेतली पाहिजे कीं जेवढे श्रम अगदीं अत्यंत आवश्यक आहेत तेवढेच शरीराला श्रम द्यावयाचे; शरीराची वाढ व प्रगती याकरितां जेवढी शक्ती लागेल तेवढीच उपयोगांत आणून, तितक्याच कटाक्षानें ज्या गोष्टींमुळें शरीरामध्यें शीणकारी

पान क्र. ०९

 

थकवा उत्पन्न होऊन शेवटीं त्याचा परिणाम शरीरांतील भौतिक तत्त्वांचा क्षय किंवा विघटन होण्यामध्यें होईल अशा सर्व गोष्टींपासून शरीराला दूर ठेवावयाचें.

उच्चतर चेतनेचें योग्य साधन बनण्यास शरीराला समर्थ करावयाचें हें शारीरिक संवर्धनकार्याचे ध्येय असल्यानें त्याकरितां अत्यंत कडकपणे संवयी लावून घेतल्या पाहिजेत. झोंप, आहार, शारीरिक व्यायाम व इतर सर्वच हालचाली यांमध्यें अतिशय नियमितपणा पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक गरजा भिन्न असल्यानें प्रत्येकानें आपल्या शरीराला खरोखरीच कशाची गरज आहे हें विशेष बारकाईनें व सावधानतेनें अभ्यासून नंतर स्वतःसाठीं एक सर्वसाधारण कार्यक्रम आंखला पाहिजे. एकदां कार्यक्रम निश्चित केला म्हणजे तो बदलण्यासाठीं कोणतीही लहर किंवा ढिलेपणा येऊं न देतां अगदी कडकरीतीनें तो अनुसरला पाहिजे. 'फक्त एकदांच' अशा सबबीखालींसुद्धां नियमाला अपवाद करतां कामां नये. -- कारण बहुधा त्याची पुनरावृत्ती होतेच. 'केवळ एकदांच' म्हणून जरी तुम्ही

पान क्र. १०

 

एकाद्या विलोभनास बळी पडलांत, तरी त्यामुळें तुमच्या संकल्पाची प्रतिकारशक्ती कमी होते व सर्व प्रकारच्या अपयशांना तुम्ही द्वार मोकळें करता. तुम्हीं सर्व प्रकारची दुर्बलता नाहींशीं केली पाहिजे. ज्यामुळें तुम्ही संपूर्ण नि:शक्त बनून परत येतां असे कोणतेही रात्रींचे उशीरापर्यंतचे कार्यक्रम, पोटाचें नेंहमीचें कार्य बिघडविणाऱ्या मेजवान्या किंवा अधाशीपणा, ज्यामुळें शक्तीचा केवळ व्यय होतो व दैनंदिन कर्म करण्यासही उत्साह रहात नाही, असे मजेखातर केलेले कोणतेही मनोरंजनाचें कार्यक्रम, किंवा कालापव्यय करणाऱ्या गोष्टी यांना तुम्हीं आळा घातला पाहिजे. ज्यामुळें शरीरावर सर्व लक्ष केंद्रित करून त्याला शक्य तितकें पूर्णत्व आणतां येईल असें ज्ञानयुक्त व नियमित जीवन जगण्याची तुम्ही तपस्या केली पाहिजे.

या आदर्श ध्येयाप्रत पोहोंचण्यासाठीं कोणत्याही प्रकारचा अतिरेक, लहान अथवा मोठीं सर्व व्यसनें कटाक्षानें वर्ज्य केलीं पाहिजेत; तंबाखू किंवा मद्य वगैरे सारखी सौम्य विषेंही घेणें वर्ज्य केलें पाहिजे. ह्या

पान क्र. ११

 

गोष्टींना मनुष्य आपल्या अनिवार्य गरजा करून बसतो आणि त्यामुळें त्याची इच्छाशक्ति व स्मरणशक्ति हळुंहळुं नष्ट होऊन जाते. खाद्य पदार्थ, ते बनविण्याची पद्धति आणि त्यांचें सेवन यामध्यें रममाण होण्याइतकी विशेष गोडी बहुतेक सर्वजण, बौद्धिक पातळीवर जगणाऱ्या व्यक्तीसुद्धां, घेतांना दिसतात; त्याऐवजीं त्यांनीं शरीराच्या गरजांचें रसायन-शास्त्राच्या दृष्टीनें ज्ञान करून घेतलें पाहिजे आणि संपूर्ण शास्त्रीय दृष्टी स्वीकारून, तपस्यापूर्वक त्या भागविल्या पाहिजेत.

या आहारविषयक तपस्येला आपण दुसऱ्या एका म्हणजे निद्राविषयक तपस्येची जोड दिली पाहिजे. निद्रा-तपस्येचा अर्थ निद्रेचा त्याग करणें असा नव्हे तर निद्रा कशी घ्यावी याचें ज्ञान करून घेणें हा आहे. निद्रेचा अर्थ अवचेतनेच्या गर्तेंत जाऊन पडणें असा होतां कामां नये, कीं ज्यामुळें शरीर ताजेंतवानें न होतां उलट अधिक जड, सुस्त बनतें. मित आहार घेतल्यानें आणि सर्व तऱ्हेचा अतिरेक टाळल्यानें झोंपेमध्यें अनेक तास घालविण्याची आवश्यकता कितीतरी

पान क्र. १२

 

कमी होते. शिवाय किती तास झोंप घेतली यापेक्षां किती गाढ झोंप लागली ही गोष्ट महत्त्वाची आहे. झोंपेमुळें खरीखुरी विश्रांती आणि आराम मिळवावयाचा असेल तर झोंपण्यापूर्वीं साधारणत: एक कपभर दूध किंवा फळाचा रस अथवा कढण (सूप) घेणें चांगलें; हलकें अन्न घेतल्यानें शांत झोंप लागते. कांहीं असलें तरी फार जेवण टाळलें पाहिजे. कारण त्यामुळें एकतर सारखीं दु:स्वप्नें पडून झोंप चाळवते किंवा फार झोंप येऊन जडता, सुस्ती आणि नीरसता येते. पण मन निर्मळ ठेवणें, भावना स्थिर करणें, वासनांचे उद्रेक आणि त्यांच्याबरोबर उत्पन होणाऱ्या उर्मी यांना शांत करणें ही गोष्ट सर्वांत महत्त्वाची आहे. झोंपावयास जाण्यापूर्वीं आपण खूप बोललों असलों किंवा तावातावानें वादविवाद घातला असला किंवा अत्यंत उत्तेजक, रसभरित आणि मनांत खळबळ उडवून देणारे पुस्तक वाचलें असलें तर एकदम झोंपीं न जातां थोडा वेळ विश्रांती घेणें चांगलें होईल. म्हणजे त्यायोगें मनाच्या हालचाली, काहूर, शांत होईल आणि केवळ

पान क्र. १३

 

शरीर झोंपीं गेलें आहे व डोक्यामध्यें मात्र हलकल्लोळ चाललाच आहे असें होणार नाहीं. ज्यांना ध्यान करण्याची संवय असेल त्यांनीं झोंपण्यापूर्वीं कांहीं क्षण, उच्चतर व विशाल जाणीव प्राप्त व्हावी अशी तीव्र आकांक्षा धरून एखाद्या उच्च आणि शांतिदायक भावदर्शक कल्पनेवर आपलें चित्त एकाग्र करणें चांगलें; त्यामुळें त्यांची झोंप चांगली होईल आणि गाढ झोंपी गेले असतांना अवचेतनेच्या गर्तेंत जाऊन पडण्याची भीती बरीचशी कमी होईल.

शांत, विश्रांतियुक्त झोंप घेण्यासंबंधींची ही रात्रीची तपस्या झाल्यानंतर आतां दिवसभर करण्याची तपस्या पाहूं. सबंध दिवसाची आंखणी सुबुद्धपणें करून दिवसांतील सर्व क्रियांची वांटणी दोन प्रकारच्या क्रियांमध्यें केली पाहिजे. एक म्हणजे शरीरसंवर्धनासाठीं आवश्यक असलेला, बुद्धिपूर्वक आंखीव व क्रमबद्ध व्यायाम आणि दुसरें तुम्ही करीत असलेलें काम, मग तें कोणतेंही असो. कारण या दोन्हींही गोष्टी शारीरिक तपस्येची अंगें होऊं शकतात व झाली

पान क्र. १४

 

पाहिजेत. व्यायामाच्या बाबतींत प्रत्येकानें आपल्या शरीरास जास्तींत जास्त जुळणारा व्यायाम निवडावा. व्यायामापासून अधिकांत अधिक उपयोग करून घेण्याच्या दृष्टीनें व्यायाम-प्रकारांची जुळणी कशी करावी व क्रम कसा लावावा, कोणत्या व्यायामाला कोणत्या व्यायामाची जोड द्यावी हें जाणणाऱ्या तज्ज्ञाचें, शक्य असेल तर मार्गदर्शन घ्यावें. व्यायामाची निवड करतांना किंवा प्रत्यक्ष व्यायाम करतांना कोणत्याही प्रकारचा लहरीपणा चालूं देऊं नये. एकादा व्यायाम केवळ सोपा किंवा अधिक मनोरंजक म्हणून तुम्ही तो करतां कामां नये. फक्त मार्गदर्शक शिक्षकाला आवश्यक वाटून त्यानें तुम्हाला सांगितलें तरच तुमच्या व्यायामाच्या बाबतींत तुम्हीं बदल करावा. शरीराच्या पूर्णत्वाच्या बाबतींत किंवा त्याच्या नुसत्या आरोग्यसंपन्नतेच्या बाबतींत किंवा त्याच्या नुसत्या आरोग्यसंपन्नतेच्या बाबतींत सुद्धा प्रत्येकाचें शरीर म्हणजे एक समस्याच सोडवावयाची असते. पण त्याकरतां धीर, चिकाटी आणि नियमितता यांची अत्यंत आवश्यकता आहे. लोकांची समजूत कांहीं कां असेना, खेळाडूचें

पान क्र. १५

 

जीवन केवळ मौजेचें व स्वच्छंदीपणाचें जीवन नसतें. उलट पद्धतशीर प्रयत्न व कडक संवयी यांनी युक्त असतें. त्यामध्यें अपेक्षित परिणामांना घातक असलेल्या निरर्थक आवडीनिवडींना स्थान नसतें.

कामाच्या बाबतींतही एक प्रकारची तपस्या आहेच. कोणतेंही काम असो, त्यांत गोडी घेऊन तें मनापासून करणें व कोणतीही पसंति नापसंति न राखणें हीच कर्मांतील तपस्या. कारण पूर्णत्वप्राप्ती करून घेण्याची ज्याची इच्छा आहे, त्याच्या दृष्टीनें कोणतेंच काम हलकें किंवा मोठें नाहीं; कोणतेंच काम महत्त्वाचें व दुसरें विना महत्त्वाचें असें नाहीं. आत्म-प्रभुत्व आणि प्रगती यांची आकांक्षा असणाऱ्याला सर्वच कामें सारखींच उपयुक्त आहेत. एखाद्याला ज्या कामांत गोडी असेल तेंच काम फक्त तो उत्तम रीतीनें करतो असें म्हणतात, हें खरें आहे. पण त्याहीपेक्षां सर्व कामांत, अगदी क्षुल्लक भासणाऱ्या कामांतही, गोडी घ्यायला शिकतां येणें शक्य असतें ही गोष्ट अधिक खरी आहे. पूर्णत्व-प्राप्तीबद्‌दल किती तीव्र तळमळ आहे यावर या

पान क्र. १६

 

बाबतींतील यश अवलंबून आहे. कोणताही उद्योग किंवा काम तुमच्या वांट्याला आलेलें असो, प्रगती करण्याच्या इच्छेनें तें तुम्ही पार पाडलें पाहिजे. तुम्ही करीत असलेलें कोणतेंही काम 'शक्य तितके चांगलें' नव्हे, तर पूर्णत्वासाठीं सतत प्रयत्न करीत तें अधिकाधिक चांगलें करण्यासाठीं तुम्ही झटलें पाहिजे. अशा रीतीनें, अगदीं शारीरिक कष्टापासून तो थेट कलात्मक किंवा बौद्धिक कामापर्यंत निरपवादपणें कोणतेंही काम आनंददायक वाटूं लागतें. प्रगतीचें क्षेत्र अमर्याद आहे आणि म्हणूनच अगदीं सामान्य गोष्टींतही आपण यत्नशील होऊं शकतो.

यामुळें स्वाभाविकपणेंच कर्मामध्येंही मुक्तता कशी मिळवावयाची या विषयाकडे आपण येतो. कारण कर्म करीत असतांना सर्व सामाजिक रूढी आणि सर्व नैतिक पूर्वग्रह यांच्या बंधनांपासून आपण मुक्त असलें पाहिजे. अर्थात स्वैराचारी आणि अनिर्बंध जीवन व्यतीत करावें असा मात्र याचा अर्थ नव्हे. उलट येथें सर्व सामाजिक नियमापेक्षां कितीतरी कडक असा नियम आपण शिरसा-

पान क्र. १७

 

वंद्य केलेला असतो; कोणत्याही प्रकारच्या ढोंगाची त्यांत मुळीच गय केली जात नाहीं आणि संपूर्ण, सर्वांगीण खरेंपणा त्यांत अपेक्षित असतो. ज्यामुळें शरीरांत समतोलपणा, सामर्थ्य आणि सौंदर्य यांची वाढ होण्यास मदत होईल अशाच रीतीनें सर्व शारीरिक क्रियांची आंखणी केली पाहिजे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवल्यानंतर, कामवासनेच्या उपभोगासकट सर्व प्रकारच्या सुखतृष्णेपासून दूर राहिलें पाहिजे. कारण कामोपभोगाची प्रत्येक क्रिया म्हणजे मृत्यूकडे नेणारें एक पाऊल आहे आणि म्हणूनच फार फार प्राचीन काळापासून सर्व पवित्र आणि गुप्त संप्रदायांत, अमरत्वाच्या प्राप्तीसाठीं झटणाऱ्या प्रत्येक साधकाला कामवासनातृप्तीस पूर्ण बंदी असे. कारण अशा कामतृप्तीच्या मागोमाग कमी किंवा अधिक असा अचेतनेचा काळ येतो, या स्थितींत सर्व प्रकारच्या अनिष्ट प्रभावांना द्वार खुलें होतें आणि मनुष्याची जाणीव खालीं उतरतें. तर, ज्या मनुष्याला अतिमानसिक जीवन जगण्याच्या इच्छेनें स्वतःची तयारी करावयाची असेल,

पान क्र. १८

 

त्यानें तर सुखोपभागासाठीं एवढेंच नव्हे, तर विसांवा म्हणून किंवा ताण कमी करण्याच्या निमित्तानें सुद्धां आपली जाणीव निश्चेतनेपर्यंत कधींच खालीं घसरूं देतां कामां नये. विश्रांति ही शक्ती आणि प्रकाश यांमध्यें मिळविली पाहिजे, अंधकार किंवा दुर्बलता यांत नव्हे. म्हणूनच प्रगतीची इच्छा धरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या जीवनांत संयमाचें नियमन असलें पाहिजे; पण विशेषत: ज्यांना स्वतःला अतिमानसिक शक्तीच्या आविष्कारासाठीं तयार करावयाचें असेल, त्यांचे नुसत्या संयमानें भागणार नाहीं. त्यांनीं ही गोष्ट सर्वस्वी वर्ज्य केली पाहिजे. जोर-जबरदस्ती करून किंवा दडपण आणून नव्हे तर सामान्यत: प्रजोत्पत्तिसाठीं वापरल्या जाणाऱ्या शक्तींचें रूपांतर होऊन ज्यामुळें त्याचा उपयोग विकास आणि अंतर्बाह्य परिवर्तन घडवून आणण्याकडे होईल अशी एकप्रकारची आंतरिक किमया साधल्यामुळें कामविकार नष्ट झाला पाहिजे. हें तर उघडच आहे कीं या बाबतींत संपूर्ण आणि खरोखरी हितकारक परिणाम व्हावा यासाठीं

पान क्र. १९

 

सर्व प्रकारच्या कामुक वासना, विकार किंवा उर्मी ह्यांना मन आणि भावना यांच्या क्षेत्रांतूनच फक्त नव्हे तर शारीर भानामधूनहि काढून टाकलें पाहिजे. कोणत्याहि प्रकारचे आमूलाग्र आणि टिकाऊ परिवर्तन अथवा रूपांतर प्रथम आंतरिक व नंतर बाह्य अशा क्रमानेंच नेहमीं घडते. म्हणून बाह्य परिवर्तन अथवा रूपांतर हा आंतरिक रूपांतराचा स्वाभाविक आणि अनिवार्य असा परिणाम असतो.

आजची मानवजात जशी आहे तशा मानवासारख्याच मानवाची निर्मिती चालू ठेवण्यासाठीं प्रकृतीच्या मागणीस अनुसरून स्वतःचें शरीर प्रकृतीच्या स्वाधीन करावयाचें, कीं हेंच शरीर नव मानवजातीच्या निर्मितीसाठीं, एक पुढचें पाऊल टाकण्यासाठीं साधन बनवावयाचें या दोन गोष्टींमधून एकदांच निर्णायक स्वरूपाची निश्चित निवड करणे आवश्यक आहे. कारण या दोन्हीं गोष्टी एकत्र चालू शकणार नाहींत, गतकालीन मानवजातीमध्येंच राहण्याची तुमची इच्छा आहे, कीं उद्याच्या नव मानवजातीचे एक घटक

पान क्र. २०

 

तुम्हांला व्हावयाचें आहे यासंबंधीं दरक्षणीं तुम्हांला निर्णय घेतला पाहिजे.

जर तुम्हांला आगामी जीवनासाठीं स्वतःला तयार करावयाचें असेल आणि त्याचे सक्रिय आणि कार्यक्षम घटक व्हावयाचें असेल तर आजचें जीवन देईल तो आकार स्वीकारून त्यामध्यें यशस्वी होणें हें तुम्हीं नाकारलें पाहिजे.

संपूर्ण सौंदर्यमय आणि सर्वांगीण सुसंवादी जीवनांतील आनंद तुमच्या जीवनांत भरून रहावा असें वाटत असेल, तर तुम्ही सुखाचा आस्वाद घेणें सोडलें पाहिजे.

यानंतर सहाजिकच ओघानें शक्तिविषयक तपस्येकडे आपण वळतो; शक्तिविषयक तपस्या म्हणजे प्राणाधिष्ठित संवेदनांची तपस्या. कारण, खरोखरी शक्तीचें आणि कार्य घडवून आणणाऱ्या उत्साहाचें अधिष्ठान प्राणच आहे. प्राणतत्त्वामध्येंच विचाराला संकल्पाचें स्वरूप येऊन, त्यामुळें कार्याला प्रेरणा मिळते. हेंही खरें आहे कीं, वासना आणि विकार, प्रबळ उर्मी आणि त्यांच्या तितक्याच जोरदार प्रतिक्रिया,

पान क्र. २१

 

बंडखोर वृत्ति आणि निराशा यांनाही आधार प्राणतत्त्वाचाच असतो. यावर साधारणत: नेहमीं केला जाणारा उपाय म्हणजे त्यांचा कोंडमारा करावयाचा, सर्व संवेदना काढून घेऊन त्याची उपासमार करावयाची. वास्तविक मुख्यत: या संवेदनांवरच 'प्राण' पोसला जातो आणि सर्व संवेदनाच काढून घेतल्या तर तो झोपीं जातो, सुस्त आणि निश्चेष्ट होऊन, शेवटीं नि:सत्व बनून जातो.

खरें पाहतां, प्राणाचें पोषण होण्यास तीन स्त्रोत उपलब्ध असतात. त्याला सर्वांत सुलभ असलेला स्त्रोत खालच्या बाजूनें असतो. संवेदनांद्वारां येणाऱ्या भौतिक शक्तींपासून त्याचें पोषण होतें.

दुसरा स्त्रोत त्याच्या स्वतःच्याच पातळीवर, प्राणाच्याच पातळीवर असतो. प्राणतत्त्व हें जर पुरेसें व्यापक आणि ग्रहणशील असेल, तर विश्वांतील विविध प्राणशक्तींशीं त्याचा संबंध येतो व त्याला शक्ति प्राप्त होते.

शक्तीचा तिसरा स्त्रोत उच्च पातळीवरून

पान क्र. २२

 

येतो. साधारणत: ज्यावेळीं प्रगतीसाठीं प्राणतत्त्वाच्या ठिकाणीं तीव्र उत्कंठा असते, त्यावेळीं प्राणतत्त्व त्या स्त्रोतास उन्मुख असतें. आध्यात्मिक शक्ती आणि अंत:प्रेरणा त्याच्यामध्यें ओतप्रोत भरल्यानें आणि त्यानें त्या आत्मसात् केल्यानें त्यास तो स्त्रोत प्राप्त होतो.

यापेक्षां आणखी एका वेगळ्या शक्तिस्त्रोताची भर घालण्याचा लोक नेहमींच थोडा फार प्रयत्न करतात. पण त्यांचे बहुतेक सर्व कष्ट आणि दुर्भाग्य यांनाही तो स्त्रोतच कारणीभूत होत असतो. आपल्या बरोबरीच्या व्यक्तींमध्यें -- सामान्यत: दोन व्यक्तींमध्यें -- प्राणशक्तीची जी देवाण-घेवाण होते त्यालाच लोक चुकून प्रेम असें समजून त्याद्वारां पोषण घेतात. पण वास्तविक तें प्रेम परस्परांच्या देवाणी-घेवाणीमध्यें सुख घेणाऱ्या दोन शक्तींमधील केवळ आकर्षण असते.

आपल्यामधील प्राणतत्त्वाची उपासमार होऊं नये अशी आपली इच्छा असेल, तर संवेदनांचा त्यागही करतां कामां नये किंवा त्यांची संख्या अथवा त्यांची तीव्रताहि कमी करतां कामां नये; संवेदना टाळणेंही

पान क्र. २३

 

योग्य नाहीं, तर विचारपूर्वक व योग्यायोग्य पाहून त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे. संवेदना हें ज्ञानप्राप्तीचें व शिक्षणाचें उत्तम साधन आहे. पण हें कार्य त्यांकरवीं करून घ्यावयाचें असेल, तर आपण आत्मसंतोष आणि सुख याकरतां चाललेल्या अज्ञानपूर्ण व अंध प्रयत्नांत, सुखोपभोगाचें एक साधन म्हणून अहंकारीपणानें त्यांचा उपयोग करतां कामां नये.

काहींहीं तिरस्कार किंवा नाखुषी न दर्शवितां सर्वकांहीं सहन करावयास आपलीं इंद्रियें समर्थ असलीं पाहिजेत. पण त्याचबरोबर प्राणाच्या निरनिराळ्या उर्मींचे प्रकार, त्यांचा उगम आणि त्यांचे परिणाम यांच्या संबंधींचा सारासार विवेक करण्याची इंद्रियांना शक्ती येऊन ती अधिकाधिक वाढली पाहिजे. यासाठीं कीं, त्या उर्मी सुसंवाद, सौंदर्य आणि आरोग्य यांना अनुकूल आहेत कीं नाहीं किंवा शरीर आणि प्राण यांच्या समतोलास व विकासास या उर्मी विघातक आहेत कीं नाहीत हेंही त्यांना कळावें. शिवाय भौतिक जगांतील आणि प्राणशक्तीवर आधारलेल्या जगतांतील

पान क्र. २४

 

सर्व गुंतागुंत समजावून घेऊन त्यांचा अभ्यास करण्याच्या दृष्टीनें, साधनें म्हणून या इंद्रियांचा उपयोग केला पाहिजे. असें केलें म्हणजेच परिवर्तनासाठीं करावयाच्या महान् प्रयत्नांत त्याचें योग्य स्थान त्यांना प्राप्त होईल. ही प्राणशक्ति दुर्बल करून नव्हे तर ती ज्ञानयुक्त, सामर्थ्यसंपन्न आणि शुद्ध करूनच व्यक्ती आपल्या व्यक्तित्वाच्या खऱ्या विकासास मदत करूं शकते. संवेदनाच वर्ज्य करणें हें, जेवण न घेतां स्वतःची उपासमार करण्याइतकेंच विघातक आहे. पण त्याचबरोबर, ज्याप्रमाणें शरीराची वाढ व्हावी व त्याचें कार्य सुरळीत चालावें याच दृष्टीनें केवळ मोठ्या शहाणपणानें अन्नामध्यें निवड करावी लागते, त्याचप्रमाणें व्यक्तित्वाच्या सर्व पैलूंचा विकास करण्यासाठीं प्राणशक्ती ही अत्यंत आवश्यक असून एक महान् कार्यक्षम साधन आहे, म्हणून तिचा विकास आणि पूर्णत्व साधण्याची केवळ दृष्टि ठेवून शास्त्रशुद्ध पद्धतीनें व तपस्यापूर्वक संवेदनांमध्यें निवड केली पाहिजे व त्यांच्यावर संयम मिळविला पाहिजे.

पान क्र. २५

 

प्राणशक्तीला शिक्षण देऊन, वळण लावून, ती अधिक सुसंस्कृत, अधिक संवेदनाक्षम व अधिक सूक्ष्म आणि भारदस्त करून आपण तिच्या हिंसात्मक व पाशवी वृत्तींवर विजय मिळवूं शकूं. या गोष्टी म्हणजे वास्तविक अपरिपक्वता, अज्ञान आणि सद्‌भिरूचीचा अभाव यांच्या केवळ दर्शक आहेत.

वास्तविक प्राणशक्तीला वळण न लावतां किंवा तिला मोकळी सोडली असतां स्वभावतःच ती जितकी असंस्कृत, अहंकारी आणि विकृत असते तितकीच, संवर्धित करून ज्ञानपूर्ण केल्यानंतर ती सुसंस्कृत, धैर्यशील आणि निःस्वार्थी होऊं शकते.

स्वत:मधील सुखाची तहान रूपांतरित करून तिला अतिमानसिक पूर्णतेसाठीं धरलेल्या आकांक्षेचें रूप कसें द्यावयाचें एवढें जरी प्रत्येकाला कळलें तरी ते पुरेसें आहे. त्यासाठीं प्राणशक्तीला शिक्षण देण्याचें काम सतत प्रयत्नानें व निष्ठेनें, प्रामाणिकपणानें करीत राहिले तर अशी एक वेळ येते कीं जेव्हां आपल्या ध्येयाची महानता आणि उज्ज्वलता, यांची तिला खात्री पटते;

पान क्र. २६

 

आणि दिव्य आनंदाची प्राप्ति करून घेण्यासाठीं आपल्या इंद्रियांच्या क्षुद्र आणि भ्रामक सुखांचा ती सहजच त्याग करते.

 

मानसिक तपस्या म्हटली कीं दीर्घकालीन ध्यानाच्या अभ्यासानें प्रथम विचारांवर ताबा मिळवावयाचा आणि नंतर अंतिम साध्य म्हणजे आंतरिक शांति प्राप्त करून घ्यावयाची, अशी ताबडतोब कल्पना होते. योगसाधनेमधील ध्यानाभ्यास इतका प्रसिद्‌ध आहे कीं, त्याविषयीं अधिक लिहिण्याची जरूरी नाहीं. पण साधारणत: लोकांचें लक्ष जात नाहीं असें योगाभ्यासांत अंतर्भूत असलेलें दुसरेंही एक अंग आहे. तें अंग म्हणजे वाक्‌संयम. कांहीं अगदी थोडे अपवाद सोडले, तर बहुधा बोलण्यांतील स्वैरपणास आळा घालण्यासाठीं संपूर्ण मौनाचा मार्ग स्वीकारावा असे सांगितले जाते. पण तरीही बोलणें अजिबातच बंद करण्यापेक्षां त्यावर

पान क्र. २७

 

संयम मिळविणें ही अधिक मोठी आणि अधिक लाभदायक अशी तपस्या आहे.

शब्दोच्चाराचा उपयोग करूं शकणारा पृथ्वीवरील पहिला प्राणी मनुष्य हाच आहे. पण त्याचबरोबर या वाक्‌शक्तीचा त्याला विशेष अभिमान असून, सारासार विचार न करतां व प्रमाणाबाहेर तो त्याचा उपयोग करतो. त्याच्या शब्दांच्या गोंगाटानें जगाचे कान बधीर झाले आहेत; आणि कधीं कधीं तर वनस्पतिसृष्टींत आढळून येणाऱ्या सुसंवादयुक्त शांतीस मनुष्य पारखा झाल्यासारखे दिसतें.

शिवाय, मानसिक शक्ति जितकी कमी, तितका वाणीचा जास्त उपयोग करावा लागतो ही गोष्टही सर्वांना चांगली माहीत आहेच. उदाहरणार्थ, अगदीं रानटी माणसें किंवा अशिक्षित माणसें घेऊं. त्यांना बोलल्याशिवाय मुळीं विचारच करतां येत नाहीं आणि हळूं हळूं किंवा मोठ्यानेंही स्वत:शीं कांहींतरी शब्द पुटपुटतांना ते आपल्याला दिसतात. कारण, विचारप्रवाहाचें अनुसरण करण्याचें त्यांच्याजवळ तेंच एक

पान क्र. २८

 

साधन असतें. उच्चारित शब्दाशिवाय त्यांच्या ठिकाणी विचाराला मूर्त रूपच येऊं शकत नाहीं.

प्रत्यक्ष बोलूं लागल्याशिवाय आपल्याला काय म्हणावयाचें आहे हें ज्यांना कळत नाहीं असेही कितीतरी लोक सुशिक्षितांतही असतात. कारण, ते सुशिक्षित असले, तरी त्यांची मानसिक शक्ती दुर्बळ असते. त्या मुळेंच त्यांचे बोलणें संपता संपत नाहीं आणि कंटाळवाणें होतें. कारण, ते बोलूं लागले म्हणजेच त्यांचे विचार अधिकाधिक स्पष्ट आणि सुसंबद्ध होऊं लागतात. त्यामुळें जें कांहीं सांगावयाचें, तें तंतोतत बरोबर सांगतां येईपर्यंत तीच गोष्ट पुन:पुन: सांगणें त्यांना भाग पडतें.

असेंही कांहीं लोक असतात कीं, ज्यांना जें कांहीं बोलावयाचें असतें त्यासाठीं पूर्वतयारी करावी लागते. आयत्या वेळी कांहीं बोलण्याची पाळी आली, तर ते अडखळतात, चाचरतात. कारण, त्यांना नेमकें जें काय म्हणावयाचें असतें त्याकरितां योग्य शब्दांची क्रमवार सुसंगत जुळणी करण्यास त्यांना आधीं वेळच मिळालेला नसतो.

पान क्र. २९

 

शेवटी, वाणीवर संपूर्ण प्रमुख असलेले असेही कांहीं जन्मजात वक्ते असतात. जें कांहीं त्यांना व्यक्त करावयाचें असतें, त्यासाठीं त्यांना अगदीं सहज योग्य शब्द सुचतात आणि त्यामुळें त्यांच्या मनांतील आशय ते चांगल्या रीतीनें व्यक्तही करतात.

तरीपण, मानसिक तपस्येच्या दृष्टीनें या सर्वच गोष्टी 'वायफळ बोलणें' या सदरांत पडतात. कारण, अगदीं अटळ, अनिवार्य शब्दांखेरीज कोणताही शब्द उच्चारणें याला मी 'वायफळ बोलणेंच' म्हणेन. पण हें ओळखावयाचें कसें असें कोणी विचारील. त्यासाठीं उच्चारित शब्दांचें आपणांस सर्वसामान्य रीतीनें वर्गीकरण केलें पाहिजे.

प्रथमत: भौतिक जगांत व्यवहारासाठीं आपण वापरतो ते शब्द. अशा शब्दांची संख्या फार मोठी असून सामान्य जीवनांत त्याचाच उपयोग बहुश: सर्वांत अधिक असतो.

दररोजचीं कामें करण्यासाठीं त्याबरोबरच शब्दांचा एकसारखा गोंगाटही जणूं अनिवार्यच होऊन बसलेला

पान क्र. ३०

 

दिसतो. तरीही हा गोंगाट कमींत कमी करण्याचा जर तुम्हीं प्रयत्न केलात, तर शांततेंतच कितीतरी गोष्टी अधिक चांगल्या आणि जलद करतां येतात असें तुम्हांस दिसून येईल. त्याचप्रमाणें आंतरिक शांती आणि एकाग्रता टिकविण्यासाठींही त्याचें फार सहाय्य होतें हेंही तुमच्या ध्यानीं येईल.

तुम्ही एकटे नसाल, दुसऱ्यांच्या बरोबर राहत असाल, तर अशी संवय लावून घ्या कीं, एकसारखें मोठ्यानें बोलून स्वतःस तुम्ही बहिर्मुख करणार नाहीं. तुम्हां परस्परांत एक प्रकारची आंतरिक समजशक्ती हळूंहळूं निर्माण झाली आहे असें तुम्हांस दिसून येईल. त्यानंतर अगदीं थोड्या शब्दांत किंवा कांहींही न बोलतांही तुम्ही परस्परांत व्यवहार करूं शकाल. अशी ही बाह्य शांतता, आंतरिक शांतीसाठीं अत्यंत अनुकूल असते; आणि त्याच्या जोडीस तुमच्या ठिकाणीं सदिच्छा व सतत तळमळ, अखंड अभीप्सा असेल, तर तुमच्या प्रगतीस अत्यंत सहाय्यक असें वातावरणहि तुमच्या भोवतीं तुम्ही निर्माण करूं शकाल.

पान क्र. ३१

 

नित्याच्या परस्परांच्या जीवनविषयक व्यवहारासाठीं किंवा कामकाजासाठीं सामान्य व्यवहारांत जसे शब्द वापरले जातात, त्याचप्रमाणें स्वतःच्या संवेदना, भावना, मनोवृत्ती याही व्यक्त करण्याकरतां व्यवहारांत शब्द वापरावे लागतात. याच ठिकाणीं बाह्य मौनाची संवय बहुमोल मदत देणारी ठरते. कारण, जेव्हां एकाद्या भावनेचें किंवा संवेदनांचें तुमच्यावर आक्रमण होतें, त्यावेळीं तुम्हांला गप्प बसण्याची संवय असल्यानें, सारासार विचार करावयास सवड मिळते, आणि आपल्या भावना किंवा उर्मी शब्दांत एकदम व्यक्त करण्यापूर्वीं जरूर तर तुम्ही स्वतःला सांवरूं शकतां. असें केलें, तर कितीतरी भांडणें टळतील. केवळ वाणीवर संयम नसल्यानेंच निर्माण होणाऱ्या कितीतरी मानसिक अनर्थांपासून तुम्ही बचावले जाल.

अशा रीतीनें अखेरच्या मर्यादेपर्यंत तुम्ही न जातां, आपल्या बोलण्यावर तुम्हीं नेहमीं संयम ठेवला पाहिजे. क्रोध, क्रूरता आणि संताप यांच्या आवेगांच्या आहारीं आपल्या जिभेला कधींही जाऊं देतां कामां नये आणि

पान क्र. ३२

 

भांडणाचे परिणाम वाईट असतात म्हणूनच केवळ नव्हे, तर त्या निमित्तानें वातावरणांत अनिष्ट स्पंदनें फेंकण्यास आपल्या जिभेला तुम्ही वाव देतां ही गोष्ट वाईट आहे. कारण, ध्वनींच्या स्पंदनांइतकी दुसरी कोणतीच गोष्ट इतकी सांसर्गिक नसते. तुमच्या स्वतःमधून वरील भावावेगांना व्यक्त होण्याची संधी देऊन तुमच्यांत आणि दुसऱ्यांतही तुम्ही त्या गोष्टी कायम राहूं द्यायला मदत करता.

दुसऱ्यांबद्दल आपण जें काय बोलतो तें सर्व अनिष्ट, अयोग्य प्रकारच्या 'वायफळ' बोलण्यांतच अंतर्भूत केलें पाहिजे.

पालक, शिक्षक किंवा विभागप्रमुख या नात्यानें दुसऱ्यांची जबाबदारी तुमच्यावर नसेल, तर तें काय करतात वा काय करीत नाहींत याच्याशीं तुम्हांला कांहीं कर्तव्य नाहीं. दुसऱ्यांबद्दल बोलणें, त्यांच्याविषयीं किंवा त्यांच्या कृतीविषयीं तुमचें मत व्यक्त करणें, किंवा इतर लोक त्यांच्याबद्‌दल काय समजणें किंवा बोलणें शक्य आहे त्याचा पुनरुच्चार करणें हें तुम्हीं टाळलें पाहिजे.

पान क्र. ३३

 

तुमच्या कामाचें स्वरूपच असें असूं शकेल कीं, त्यामुळें एकाद्या विशिष्ट खात्यांत, अंगावर घेतलेल्या कामांत किंवा सामुदायिक कामांत काय काय घडत आहे याची माहिती सांगणें हें तुमचें तेथें कर्तव्यच असतें. पण, अशा वेळींही तुम्ही जें कांहीं सांगाल तें त्या कार्याविषयींच फक्त असावें. त्यांत व्यक्तिगत गोष्टींचा संबंध येतां कामां नये. तुमचें बोलणें सर्वस्वी, पूर्णत: केवळ वस्तुस्थितिदर्शकच असलें पाहिजे. त्यांत तुमच्या वैयक्तिक प्रतिक्रिया, पसंतिनापंसति, सहानुभूति किंवा विरोध या गोष्टी तुम्हीं कधींही शिरूं देऊं नयेत. विशेषत: तुम्हांला नेमून दिलेल्या कामांत क्षुद्र वैयक्तिक वैरभाव तर कधींहीं मिसळूं देऊं नका.

एकंदरीत, कोणत्याही प्रसंगीं, सर्वसामान्य नियम म्हणून, दुसऱ्यांबद्‌दल, स्तुती करण्याकरतां असलें तरी, तुम्ही जितकें कमी बोलाल तितकें अधिक चांगलें. स्वत:मध्यें काय काय घडत आहे हें बरोबर जाणून घेणेंही आधींच कितीतरी कठीण आहे, तर मग दुसऱ्यांत काय काय घडत आहे हें तुम्हांला निश्चित कसें कळूं

पान क्र. ३४

 

शकणार ? म्हणून कोणाही व्यक्तीबद्‌दल कसलेंही ठाम मत व्यक्त करूं नका. कारण, तसें करण्यांत दोष नसला, तरी तो एक मूर्खपणाच ठरेल.

शब्दांत ज्यावेळीं एकादा विचार व्यक्त केला जातो, त्यावेळीं त्या शब्दाच्या ध्वनिलहरींत इतकी शक्ति भरलेली असते कीं, त्यामुळें अगदीं स्थूल द्रव्याशींही त्या विचाराचा संबंध जोडला जाऊन, त्याला प्रभावी, स्पष्ट व मूर्त स्वरूप प्राप्त होतें. म्हणून कोणत्याही गोष्टीबद्‌दल किंवा व्यक्तीबद्‌दल अमंगल असें तुम्हीं कधींही बोलतां कामां नये; किंवा या जगांत होणाऱ्या ईश्वरी आविष्काराच्या कार्याच्या प्रगतीस विरोधी अशा कोणत्याही गोष्टी उघडपणें बोलूं नयेत. हा एक सर्वसामान्य सिद्धान्तरूप नियम आहे. पण त्यालाही एक अपवाद आहे. तुम्ही ज्या कृतीबद्‌दल किंवा गोष्टीबद्‌दल टीका करतां, त्या गोष्टी नाहींशा करणारी किंवा पूर्णत: परिवर्तन करून टाकणारी जागृत शक्ति आणि प्रेरक इच्छाशक्ति तुमच्या ठिकाणी नसेल, तर कोणा व्यक्तीची किंवा कोणत्याच गोष्टीची

पान क्र. ३५

 

निंदा तुम्हीं करतां कामां नये. वास्तविक या जागृत शक्तीच्या आणि प्रेरणाशील इच्छाशक्तीच्या ठिकाणीं असें सामर्थ्य असतें कीं, त्यामुळें वस्तूच्या ठिकाणीं प्रतिकार करण्याची कुवत निर्माण होते; अमंगल, वाईट विचारलहरींना प्रतिकार केला जातो, त्या दूर लोटल्या जातात व शेवटीं त्या विचारलहरी इतक्या सुधारल्या जातात कीं, या पार्थिव पातळीवर त्या प्रकट होत राहणें अशक्य होऊन जातें.

पण जो कोणी अतिमानस, विज्ञानमय क्षेत्रांत जगत असेल आणि त्याच्या मानसिक शक्तींना आत्म्याचा प्रकाश आणि सत्याचें सामर्थ्य लाभलें असेल, तोच मनुष्य केवळ हें कार्य संकट किंवा धोका न येतां करूं शकेल. अशा या ईश्वरी कार्यकर्त्याच्या ठिकाणीं कोणत्याही प्रकारची पसंति-नापसंति किंवा आसक्ती नसते. त्यानें स्वत:मधील अहंकाराचे सारे बंध तोडलेले असतात आणि या पृथ्वीवर घडून येणाऱ्या अतिमानसिक शक्तीच्या कार्याचें पूर्णपणें पवित्र आणि व्यक्तिनिरपेक्ष असें साधन केवळ तो झालेला असतो.

पान क्र. ३६

 

याशिवाय आपल्या कल्पना, आपलीं मतें, आपण केलेल्या चिंतनाचा आणि अभ्यासाचा परिपाक म्हणून कांहीं शब्द बोललेले असतात. या गोष्टी बौद्धिक क्षेत्रांतील आहेत आणि त्यामुळें असें वाटण्याचा संभव आहे कीं, या क्षेत्रांत मनुष्य अधिक तर्कशुद्ध आणि समतोल विचार करणारा असल्याकारणानें या ठिकाणीं वाक्‌संयमाच्या कडक तपस्येची तितकीशी जरुरी नाहीं. तरीपण तसें मुळींच नाहीं. कारण तसें पाहिलें तर या वैचारिक आणि ज्ञानाच्या क्षेत्रांतही मनुष्यानें आपल्या ठाम मतांचा आक्रमक आग्रह, सांप्रदायिक असहिष्णुता आणि पसंति-नापसंति, आवेश या गोष्टी घुसविल्या आहेत. त्यामुळें या ठिकाणींही तितक्याच कडक मानसिक तपस्येची अतीव आवश्यकता आहे. ज्याचा शेवट सामान्यत: नेहमीं कटु आणि बहुधा निरर्थक वादविवादांत होतो अशा विचारांची देवाणघेवाण टाळण्याची काळजी घेतली पाहिजे. त्याचप्रमाणें संकुचित मनोवृत्तींतूनच नेहमीं निर्माण होणाऱ्या तीव्र मतविरोधांचा शेवट खडाजंगी वादविवादांत होतो; हा

पान क्र. ३७

 

तीव्र मतविरोध तुम्हीं टाळला पाहिजे. मानसिक क्षेत्रांत चांगलें पुरेसें उच्च गेल्यावरच मतविरोधास कारणीभूत असलेली ही संकुचित मनोवृत्ति सुलभ रीतीनें सुधारतां येणें शक्य असतें.

कोणताही शब्दबद्ध विचार म्हणजे अनिर्वचनीय तत्त्व व्यक्त करण्याची केवळ एक रीत आहे, असें ज्याला समजेल, तो कधींच सांप्रदायिक होणार नाहीं. प्रत्येक कल्पनेंत सत्याचा कांहीं अंश असतो किंवा ती सत्याची एक बाजू असते. पण संपूर्णत: स्वयंपूर्ण सत्य अशी मात्र कोणतीच कल्पना नसते.

आपल्या बोलण्यांत प्रसन्नतायुक्त समतोल राखण्यास आणि समचित्त राहण्यास या 'सापेक्षतेची' जाणीव अत्यंत उपयोगी पडते. एका वयोवृद्ध गूढविद्यातज्ज्ञ ज्ञानी माणसानें काढलेले उद्‌गार मीं एकदां ऐकले. तो म्हणाला, ''जगांत वास्तविक तत्त्वत: वाईट अशी कोणतीच वस्तू नाहीं. फक्त त्या त्यांच्या योग्य जागीं नाहींत एवढेंच. प्रत्येक वस्तू यथायोग्य ठिकाणीं ठेवा, म्हणजे जग सुसंवादी झालेलें तुम्हांला आढळेल.''

पान क्र. ३८

 

तरीही कार्याच्या दृष्टीनें पाहिलें असतां, एकाद्या कल्पनेच्या ठिकाणीं असलेल्या कार्यकारी शक्तीच्या प्रमाणांत तिचें मूल्य अधिक असतें. ज्या व्यक्तीच्या ठिकाणीं कार्य करावयाचें त्या व्यक्तीच्या मानानें ही शक्ति वेगवेगळी असते हें खरें आहे. एकादी विशिष्ट कल्पना एकाद्या व्यक्तींत महान प्रेरणा ठरली, तरी दुसऱ्या एकाद्या व्यक्तींत ती अगदी निष्फळही होऊं शकते. परंतु स्वतः ही शक्ति मात्र संक्रमणशील असते. कांहीं कल्पनाच्या ठिकाणीं जगाचें रूपांतर करूं शकेल अशी शक्ती असते. अशाच कल्पना विचाररूपानें प्रकट केल्या पाहिजेत. अध्यात्मरूपीं आकाशांत एकाद्या मार्गदर्शक ताऱ्याप्रमाणें त्या असतात; पृथ्वीस परम सिद्धी प्राप्त करून देण्याच्या कार्यांत त्याच सहाय्यक होऊं शकतात.

शेवटीं, शिक्षण देण्याच्या उद्देशानें जे शब्द आपण वापरतों त्यांचा एक वर्ग. यामध्यें बालोद्यान वर्गापासून तों थेट विश्वविद्यालयीन शिक्षणापर्यंतचा अंतर्भाव होतो. त्याचप्रमाणें यांमध्यें मनुष्यानें निर्माण केलेल्या

पान क्र. ३९

 

 

मनोरंजक किंवा बोधपर अशा कलात्मक व वाङमयीन निर्मितींचाही अंतर्भाव होतो. या क्षेत्रामध्यें निर्मितीच्या दर्जावर सर्वकांहीं अवलंबून आहे; हा विषय इतका व्यापक आहे कीं, त्याची चर्चा येथें करणें शक्य नाहीं. तरीही ही वस्तुस्थिती आहे कीं, आजकाल शिक्षणाकडे विशेष लक्ष दिलें जात आहे आणि अगदीं नव्या शास्त्रीय शोधांचा उपयोग करून शिक्षणामध्यें स्तुत्य असे प्रयत्न केले जात आहेत. परंतु येथेंही, सत्यान्वेषी साधकाकडून तपस्येची अपेक्षा आहे.

शिक्षणाच्या प्रक्रियेमध्यें शिकण्याच्या प्रयत्नांचा ताण कमी व्हावा व लहान मुलांनाच नव्हे, तर प्रौढ लोकांनाही जरा सुलभ जावें म्हणून कांहीं सोप्या, मनोरंजक व उथळसुद्धां साहित्याची आवश्यकता असते असें सर्वसामान्यपणें मान्य केलें गेलें आहे. एका विशिष्ट दृष्टीनें पाहिलें तर हें खरें आहे. पण दुर्दैवानें या मान्यतेच्या नांवाखालीं, मानवी प्रकृतीमध्यें जें जें कांहीं अश्लील, असंस्कृत व हीन आहे त्याचा फुलोरा फुलविणाऱ्या गोष्टींचा शिक्षणांत भरणा केला जात आहे.

पान क्र. ४०

 

या मान्यतेमुळें मानवी स्वभावाच्या अति हीन सहजप्रवृत्ती आणि असभ्य अभिरुची यांना स्वत:चें प्रदर्शन करण्यास चांगलीच संधी मिळते; आणि 'अनिवार्य आवश्यकता' या स्वरूपांत त्यांना स्थान प्राप्त होतें. पण वास्तविक त्या तशा 'अनिवार्य आवश्यक' नाहींत. कारण दुराचारी न होतां मनुष्य स्वतःला आराम देऊं शकेल, असभ्यपणा न करतां तो विश्रांती घेऊं शकेल; आपल्या स्वभावांतील हीन वृत्ती वर उसळूं न देतां तो मनमोकळा राहूं शकेल. परंतु, तपस्येच्या दृष्टीनें याही गोष्टींमध्यें बदल होणें आवश्यक आहे : आरामाचें रूपांतर आंतरिक शांतीमध्यें, विश्रांतीचें रूपांतर चिंतनामध्यें आणि मोकळ्या वृतीचें परिवर्तन आनंदामध्यें झालें पाहिजे.

मनोरंजनाची, कामामध्यें ढिलेपणा करण्याची अथवा थोडा किंवा अधिक वेळ जीवन-ध्येयाचा आणि आपल्या जीवनाच्या मूळ हेतूचा संपूर्ण विसर पाडण्याची गरज सामान्यत: सर्वत्र मान्य झाली असली, तरी ती अगदीं स्वाभाविक आणि अनिवार्य आहे असें

पान क्र. ४१

 

समजतां कामां नये; उलट, अभीप्सेची तीव्रता कमी असल्याकारणानें, निश्चय डळमळीत असल्यानें, त्याचप्रमाणें अज्ञानामुळें किंवा जागृती नसल्यामुळें आणि जडतेमुळें माणसाच्या ठिकाणीं निर्माण होणारी ती एक दुर्बलता आहे असें आपण मानलें पाहिजे. या गोष्टींचें तुम्ही समर्थन करूं नका, म्हणजे लवकरच तुम्हांला असें दिसून येईल कीं, त्या गोष्टी आवश्यक नाहींत; एवढेंच नव्हे, तर कांहीं काळानंतर त्याच गोष्टी तुम्हांला तिटकारा आणणाऱ्या आणि अग्राह्य वाटूं लागतील आणि त्यामुळें मानवानें निर्माण केलेल्या, मनोरंजक समजल्या जाणाऱ्या, पण वास्तविक त्याला अधोगतीस नेणाऱ्या कितीतरी गोष्टींचा आधार निघून जाईल व त्यांना प्रोत्साहन मिळणार नाहीं.

तरीही संभाषणाच्या विषयाच्या स्वरूपावर, बोललेल्या शब्दांची किंमत अवलंबून असते असें मात्र आपण समजतां कामां नये. कारण इतर विषयांवर मनुष्य जितक्या गप्पा मारतो तितक्याच आध्यात्मिक विषयावरही तो मारूं शकेल. पण या गप्पा तर सर्वांत

पान क्र. ४२

 

अधिक धोक्याच्या प्रकारापैकीं असूं शकतील. उदाहरणार्थ, नुकतीच साधना करूं लागलेला साधक जें कांहीं थोडेंफार शिकला असेल, तें दुसऱ्यांना सांगण्याविषयीं नेहमीं अतिशय उत्सुक असतो. परंतु प्रगतिपथावर तो जसजसा पुढें जाऊं लागतों तसतसें आपल्याला विशेष कांहींच कळत नाहीं अशी त्याला अधिकाधिक जाणीव होऊं लागते आणि दुसऱ्यांना उपदेश करण्यापूर्वीं आपलें स्वतःचें ज्ञान कितपत मोलाचें आहे याची खात्री करून घ्यायला पाहिजे असें त्यास वाटतें. असें करतां करतां शेवटीं त्याला शहाणपण येतें आणि त्याच्या लक्षात येतें कीं, कांहीं क्षण परिणामकारक बोलण्यास पात्र होण्यासाठीं कित्येक तास शांत, नि:शब्द एकाग्रतेमध्यें घालविण्याची आवश्यकता असते. शिवाय, आंतरिक जीवनाच्या आणि आध्यात्मिक साधनेच्या बाबतींत तर, बोलण्यासंबंधीं अधिक कठोर नियमाचें पालन केलें पाहिजे; आणि अगदीं अनिवार्यतया आवश्यक असल्याखेरीज कांहीं बोलतां कामा नयें.

कोणत्याही व्यक्तीनें आपले आध्यात्मिक अनुभव

पान क्र. ४३

 

कधींही कोणाला सांगूं नयेंत ही गोष्ट तर सर्वांना माहीतच आहे; कारण, तसें केलें तर आध्यात्मिक अनुभवांमध्यें जी शक्ती सांठविलेली असते आणि वास्तविक जिचा उपयोग व्यक्तीची प्रगती शीघ्र गतीनें होण्यासाठीं करावयाचा असतो ती क्षणार्धांत लुप्त होऊन जाते. मात्र या नियमाला एक अपवाद आहे. आपल्या अनुभवासंबंधीं किंवा त्याच्या अर्थासंबंधीं ज्यावेळीं एकाद्याला आपल्या गुरुकडून स्पष्टीकरण किंवा मार्गदर्शन पाहिजे असेल, त्यावेळीं आध्यात्मिक अनुभव गुरुजवळ बोलण्यास हरकत नाहीं. वास्तविक, केवळ गुरूजवळच या गोष्टी आपण नि:शंकपणें बोलूं शकतो, कारण आपल्या अनुभवांचा उपयोग वरच्या पायरीवर चढण्यासाठीं, आपल्या कल्याणासाठीं करणें हें फक्त गुरुच त्याच्या ज्ञानद्वारां करूं शकतो.

अर्थात् हेंही खरें आहे कीं, गुरूनें सुद्धां स्वतःच्या वैयक्तिक बाबतींत हाच मौनाचा नियम पाळला पाहिजे. निसर्गामध्यें प्रत्येक गोष्ट गतिशील आहे; आणि जी गोष्ट प्रगत होत नाहीं तिची परागती होणें

पान क्र. ४४

 

अपरिहार्य असतें. शिष्याप्रमाणेंच गुरूचीही प्रगती होत राहिली पाहिजे. अर्थातच गुरूच्या प्रगतीची पातळी तीच असेल असें नाहीं. गुरूच्या दृष्टीनेंही त्यानें स्वतःचे अनुभव सांगणें हितकर नाहीं. कारण, अनुभव शब्दांमध्यें व्यक्त केला असतां, त्यामध्यें प्रगतीला उपयोगी पडणारें जें क्रियासामर्थ्य असतें तें बऱ्याचशा प्रमाणांत त्याबरोबर निघून जातें. पण उलट, दुसऱ्या दृष्टीनें गुरूनें स्वतःचे अनुभव शिष्यांना स्पष्ट करून सांगितले असतां, शिष्यांची आकलनशक्ती वाढण्यास आणि अशा रीतीनें त्यांच्या प्रगतीसही बरेंच सहाय्य होतें. परंतु शिष्यांच्यासाठीं, आपलें स्वतःचें अनुभव प्रकट करणें किती मर्यादेपर्यंत शक्य व आवश्यक आहे, हें गुरूनेंच सूज्ञपणानें ठरविलें पाहिजे. अर्थात् हें तर उघडच आहे कीं, कोणत्याही प्रकारची प्रौढी किंवा पोकळ गर्व त्याच्या विवेचनामध्यें शिरतां कामा नये. कारण, यत्किंचित् जरी दांभिकता त्यांत शिरली, तरी तो भोंदू ठरेल; गुरू नव्हे.

शिष्याच्या दृष्टीनें मात्र मी त्याला असें म्हणेन :

पान क्र. ४५

 

''गुरू कसा का असेना, कोणत्याही परिस्थितींत त्याच्याशीं एकनिष्ठ राहा; तूं जितका पुढें जाऊं शकशील तितकें तो तुला पुढें घेऊन जाईल. पण सुदैवानें प्रत्यक्ष भगवंतच तुला गुरू म्हणून लाभला, तर मात्र तुझ्या साक्षात्काराला मर्यादाच राहणार नाहीं.''

तसें पाहिलें तर प्रत्यक्ष भगवान् ज्यावेळीं पृथ्वीवर अवतार घेतो, तेव्हां त्यालाही हा प्रगतीचा नियम लागूं असतो. जो जड देह धारण करून तो व्यक्त होतो, त्या जडदेहरूप साधनाचाही सतत विकास होत राहिला पाहिजे; आणि शिवाय त्याच्या स्वतःच्या आत्माभिव्यक्तीचा नियम एकप्रकारें पृथ्वीच्या विकासाच्या सर्वसामान्य नियमाशीं जोडलेला असतो. या दृष्टीनें जोपर्यंत पूर्णत्व म्हणजे काय हें समजण्याची व त्याचा स्वीकार करण्याची मनुष्याची तयारी झालेली नसेल, तोपर्यंत प्रत्यक्ष देहधारी भगवान् सुद्धां या पृथ्वीवर परिपूर्ण होऊं शकणार नाहीं. असा एक दिवस येईल कीं, ज्यावेळीं मनुष्य सर्व गोष्टी, आज करतो त्याप्रमाणें भगवंतासाठीं केवळ नुसत्या कर्तव्यबुद्धीनें न

पान क्र. ४६

 

करतां त्याच्यावरील प्रेमामुळें करूं लागेल. आज प्रगती म्हणजे प्रयास किंवा कित्येकदां संघर्षही असतो. त्याऐवजीं त्यावेळीं प्रगती म्हणजे एक आनंद होईल; किंवा अगदीं बरोबर सांगावयाचें तर, प्रगती ही सर्वांगाचा सहयोग मिळून आनंदानें होईल; आज प्रगती करतांना अहंकाराचा विरोध दाबण्यासाठीं जे महान् सायास करावे लागतात आणि कांहींवेळां तर मोठें दु:खहीं भोगावें लागतें त्याप्रमाणें नव्हे.

शेवटीं, मी तुम्हांला असें सांगेन कीं, ''आपल्या वाणींतून सत्यच व्यक्त व्हावें आणि तींमध्यें 'दिव्य शब्दाचें' सामर्थ्य यावें असें जर तुम्हांला वाटत असेल, तर बोलण्यापूर्वीं आपण काय बोलणार आहोंत याचा विचार तुम्ही करूं नका. काय बोलणें चांगलें होईल किंवा काय वाईट होईल असें आधींच ठरवूं नका. आपण जें बोलणार आहोंत त्याचा परिणाम काय होईल याचा हिशेब करूं नका. मनामध्यें शांत राहा आणि 'सर्व-प्रज्ञा', 'सर्व-ज्ञान', आणि 'सर्व-चेतना', यांच्यासाठीं सतत अभीप्सा करत राहण्याच्या योग्य

पान क्र. ४७

 

वृत्तींत स्थिर राहा. त्यावेळीं तुमची अभीप्सा जर खरीखुरी असेल, कोणतीही गोष्ट चांगली करावी आणि यशस्वी व्हावें अशी महत्त्वाकांक्षा त्यामागें दडलेली नसेल, ती शुद्ध, उत्स्फूर्त आणि सर्वांगीण असेल, तर तुम्ही नुसते बोलाल, जे शब्द उच्चारावयास पाहिजेत तेच शब्द उच्चारले जातील, कमी नाहींत किंवा जास्ती नाहींत; आणि तुमचें शब्द निर्माणकारी शक्तीनें युक्त झालेले असतील.

 

भाव किवा भावना याविषयींची, म्हणजेच प्रेमविषयक तपस्या ही सर्व तपस्यांमध्यें अतिशय कठीण आहे.

खरोखर दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रापेक्षां कदाचित् या भावनेच्या क्षेत्रामध्यें मनुष्याला अटळ आणि अदम्य असें कांहींतरी अनुभवास येत असतें; ज्याच्या हातून सुटतांच येणार नाहीं अशा कोणा नियताचें त्याच्या

पान क्र. ४८

 

जीवनावर स्वामित्व असल्याचा त्यास अनुभव येतो. असें मानलें जातें कीं, विशेषत: प्रेम (निदान मनुष्य ज्याला प्रेम हें नांव देतो तें.) म्हणजे असा एक मोठा करडा मालक आहे कीं ज्याच्या लहरी आज्ञा चुकवितां येऊं शकत नाहींत, जो स्वतःच्या मर्जीनुसार तुम्हांला ताबडतो आणि तुमची इच्छा असो किंवा नसो आपल्या आज्ञेनुसार तुम्हांला वागावयास तो भाग पाडतो. प्रेमाच्या नांवाखालीं वाईटांत वाईट गुन्हे केले गेले आहेत आणि अगदीं कमालीच्या मूर्खपणाच्या कृती घडून आलेल्या आहेत.

अशा या प्रेमाच्या शक्तीवर नियंत्रण घालतां येईल, तिला विवेकी व सौम्य करतां येईल अशी आशा बाळगून मनुष्यानें निरनिराळ्या प्रकारचे नैतिक आणि सामाजिक नियम शोधून काढले आहेत. पण, हे नियम जणूं मोडण्याकरितांच बनविले गेले असावेत असें दिसतें. त्यांनीं प्रेमाच्या स्वच्छंद कार्यावर लादलेलीं बंधनेंही या प्रेमाची शक्ती जणूं अधिक स्फोटक बनविण्यास कारणीभूत झालेलीं दिसतात. कारण, केवळ

पान क्र. ४९

 

नियमांच्या योगानें प्रेमशक्तीच्या कार्याला योग्य वळण लावतां येणार नाहीं, तर प्रेमाच्या अदम्य आवेगांवर अधिक महान्, उच्च व खरें प्रेमसामर्थ्यच ताबा मिळवूं शकेल. एकटें प्रेमच प्रेमाला उज्ज्वल करून, त्याला योग्य रूप देऊन, तें अधिक व्यापक करून त्याच्यावर आपलें स्वामित्व मिळवूं शकेल. संयमन म्हणजे दाबून टाकणें किंवा नाहींसें करून टाकणें नव्हे, तर उदात्त किमयेच्या द्वारां रूपांतर घडवून आणणें होय; संयमाचा हा अर्थ इतर क्षेत्रांपेक्षांही येथे अधिक खरा आहे आणि याचें कारण म्हणजे, विश्वामध्यें कार्य करणाऱ्या सर्व शक्तींमध्यें प्रेम ही सर्वांत प्रबळ, दुर्दम्य अशी शक्ती आहे. प्रेम नसेल, तर जग पुन: अचेतनाच्या अस्ताव्यस्ततेमध्यें जाऊन पडेल.

चित्-शक्ती ही वास्तविक विश्वाची निर्माणकर्ती आहे. पण प्रेम हें विश्वाचे तारक आहे. प्रेम म्हणजे काय, तें कां व कसें उत्पन्न झालें याचें ओझरतें दर्शन केवळ जाणीवपूर्वक अनुभूतिद्वारांच मिळूं शकेल. त्याचें शब्दांमध्यें वर्णन करणें म्हणजे अर्थातच अनिर्वचनीय

पान क्र. ५०

 

गोष्टीला मानसिक स्वरूपाचा वेष देण्यासारखें आहे. तत्त्वज्ञानी, साक्षात्कारी आणि गूढवेत्ते या सर्वांनीं तसा प्रयत्न केलेला आहे, पण व्यर्थ. त्यांना जें करण्यांत यश आलें नाहीं तें करण्यांत मला यश येईल असें कांहीं मला दाखवावयाचें नाहीं. पण त्यांच्या लिखाणांत त्यांनीं जें अति दुर्बोध किंवा जटिल स्वरूपांत मांडलेलें आहे, तेंच शक्य तितक्या सरळ, सोप्या शब्दांत सांगण्याचा माझा उद्देश आहे. त्याचा प्रत्यक्ष जिवंत अनुभव घेतां यावा म्हणून त्याकडे सर्वांना, अगदीं लहान मुलालाही, घेऊन जाणें हाच एक माझ्या बोलण्याचा उद्‌देश आहे.

एकात्म भावांतील आनंद हेंच प्रेमाचें सारभूत स्वरूप आहे आणि सायुज्यतेच्या परमानंदामध्यें त्याची परमोच्च अभिव्यक्ती होत असते. या दोन अवस्थांच्या मध्यंतरांत त्याच्या विश्वामधील आविष्काराचे सर्व प्रकार येऊन जातात.

विश्वामध्यें आविष्कार होण्याच्या प्राथमिक अवस्थेमध्यें त्याच्या मूळ शुद्ध स्वरूपांत प्रेम हें दोन

पान क्र. ५१

 

प्रकारच्या प्रवृत्तींनीं युक्त असतें. या दोन प्रवृत्ती म्हणजे, संपूर्ण एकत्वाकडे नेणाऱ्या शक्तीचीं दोन परस्परपूरक टोंकें असतात. यांतील एका बाजूला परम आकर्षणाची शक्ती आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण आत्मदानाची अनिवार्य ओढ असते. व्यक्तीची जाणीव ज्यावेळीं तिच्या मूळ उगमापासून भिन्न झाली आणि अवचेतनेचें रूप तिला प्राप्त झालें, त्यावेळीं तिच्यामध्यें आणि मूळ उगमामध्यें एक प्रकारची दरी निर्माण झाली. त्या दरीवर सेतु बांधण्याचें काम या प्रेमाशिवाय कोणतीच अन्य शक्ती करूं शकत नाहीं.

अशा रीतीनें अवकाशामध्यें जें बाहेर प्रक्षेपित केलें गेलें होतें, तें पुन: त्याच्या मूळ उगमाकडे परत आणावयाचें होतें. परंतु निर्माण केलेलें विश्व मात्र नामशेष होता कामा नये, म्हणून दिव्य प्रेम, एकत्वाची, संयोगाची अदम्य शक्ती उफाळून पुढें आली.

अंधकार आणि अचेतनता यांच्यावर त्या प्रेमशक्तीनें आपली पांखर घातली, अगाध निशेच्या वक्ष:स्थळीं तिनें स्वतःला विखरून टाकलें, स्वतःस चूर्ण विचूर्ण

पान क्र. ५२

 

करून टाकलें. त्यावेळेपासून जागृति येण्यास, आरोहणास, जडतत्त्व सावकाशपणें घटित होण्यास व त्याच्या अनंत विकासास सुरुवात झाली. शारीरिक आणि भावनात्मक प्रकृतीच्या आवेगांच्या मागें राहून प्रत्येक क्रियेला आणि समूहीकरणालाही प्रेरणा देणारें हें प्रेमच नसतें कां ? तें फक्त प्रमादशील आणि प्रच्छन्न स्वरूपांत व्यक्त होतें एवढेंच. वनस्पति-जगतामध्यें या प्रेमाचा स्पष्टपणें प्रादुर्भाव झालेला असतो; आपल्या वाढीसाठीं अधिक प्रकाश, अधिक हवा आणि अधिक मोकळी जागा मिळविण्याची वनस्पती व वृक्ष यांच्यामध्यें जी गरज दिसते, तें प्रेमाचेंच स्वरूप आहे. फुलांमध्यें दिसणारें त्याचें स्वरूप म्हणजे त्यांच्या प्रेमळ बहरण्यामध्यें सौंदर्य आणि सुगंध यांची उधळण. प्राण्यांच्या ठिकाणीं सुद्धां त्यांची भूक व तहान याच्यामागें, आपलेसें करण्याच्या, व्यापक होण्याच्या किंवा प्रजोत्पादनाच्या, थोडक्यांत म्हणजे सर्वच वासनांच्या मागें कळत अथवा न कळत तेंच प्रेम वसत नसतें का ? आणि उच्च कोटींतील प्राण्यांच्या मध्यें आईच्या

पान क्र. ५३

 

ठिकाणीं पिलांसाठीं जें आत्मत्यागपूर्ण वात्सल्य दिसतें त्यामागें तरी काय असतें ? यानंतर ओघानेंच मनुष्यप्राण्याचा विचार येतो. त्याच्या ठिकाणीं मानसिक क्रियेच्या विजयी आगमनाबरोबरच या प्रेमाची परमावधि होते; कारण खरोखरी तें तेथें जागृत, जाणीवयुक्त व हेतुपुरस्सर असतें. पृथ्वीच्या विकासक्रमांत, योग्य संधी येतांच प्रकृतीनें ही प्रेमाची उदात्त शक्ती हातीं घेतली आणि प्रजोत्पादनाच्या क्रियेशीं तिचा संबंध जोडून, त्यांत ती मिसळून टाकून आपल्या निर्मिताच्या कार्यामध्यें या प्रेमशक्तीचा तिनें उपयोग करून घेतला. प्रजोत्पादन आणि प्रेम यांचें साहचर्य इतकें निकट आणि घनिष्ट होऊन बसलें आहे कीं, या दोन क्रिया अलग करून, त्यांचा वेगवेगळा अनुभव घेण्याइतकी प्रगल्भ जाणीव खरोखरी फारच थोड्या व्यक्तींच्या ठिकाणीं आढळून येते. यामुळेंच प्रेमामध्यें अनेक विकृती आणि भ्रष्टता निर्माण झालेली आहे आणि पशूंच्या पातळीपर्यंत त्याला खालीं आणलें गेलें आहे.

पान क्र. ५४

 

परंतु याच क्षणापासून, अधिक गुंतागुंतीचे आणि अधिक संख्यायुक्त असे गट, असे समूह निर्माण करून, त्यांच्या द्वारां पायरीपायरीनें, थोड्या प्रमाणांत पुन: आद्य एकता निर्माण करण्याचा संकल्प प्रकृतीच्या कार्यामध्यें स्पष्टपणें दिसूं लागला. दोन मानवी व्यक्तींना एकत्र आणून कुटुंबाला आवश्यक असलेला दोन व्यक्तींचा समूह, साहचर्य, निर्माण करण्यासाठीं प्रकृतीनें प्रेमाची शक्ती वापरली. व्यक्तिगत अहंकाराचें रूपांतर दोन व्यक्तींमधील जुळ्या अहंकारांत करून त्याच्या संकुचित मर्यादा तोडल्या. नंतर बालकाच्या जन्माबरोबर अधिक गुंतागुंतीची व्यवस्था म्हणजेच कुटुंबाची निर्मिती प्रकृतीनें केली. कालांतरानें कुटुंबाकुटुंबामध्यें नाना तऱ्हेचे संबंध प्रस्थापित होऊन, व्यक्तीव्यक्तींमध्यें परस्पर देवाण-घेवाण व रक्ताचें मिश्रण होऊन मोठे समूह निर्माण झाले. कुल, टोळी, जात, वर्ग असें होत होत त्याची परिणती राष्ट्रे निर्माण होण्यांत झाली. समूहीकरणाचें हें काम जगांतील निरनिराळ्या भागात एकाच वेळीं चालूं राहिलें आणि

पान क्र. ५५

 

त्यांतून निश्चित घटीव स्वरूपाच्या निरनिराळ्या मानववंशांची निर्मिती झाली. आतां, मानवी एकतेला खरा भौतिक आधार निर्माण करण्याच्या प्रकृतीच्या प्रयत्नांत ती हळूंहळूं हे मानव वंशही एकमेकांत विलीन करून टाकील.

बहुतेक सर्व लोकांच्या मनाला असें वाटतें कीं, जीवनांतील हें सर्व केवळ योगायोगानें घडून येतें. सबंध विश्वाकरितां म्हणून कांहीं योजना आहे हें त्यांच्या लक्षांत येत नाहीं. परिस्थिती जशी येईल तशी त्यांच्या स्वभावाप्रमाणें ती चांगली किंवा वाईट मानून ते स्वीकारतात; कांहींना समाधान वाटतें, कांहीं असंतुष्ट राहतात.

समाधानी राहणारामध्यें लोकांचा असा एक वर्ग असतो कीं, प्रकृतीच्या नियमांशीं संपूर्णत्वानें ते जुळतें घेत असतात. तेच आशावादी लोक. त्यांच्या दृष्टीनें रात्र असते म्हणून दिवस अधिक प्रकाशपूर्ण, व छायेच्या अस्तित्वामुळेंच रंग अधिक तजेलदार दिसतात; कष्टभोग असतात म्हणून आनंद अधिक उत्कट वाटतो, दुःख सुखाला अधिक मोहकता देतें, रोगामुळेंच निरोगी-

पान क्र. ५६

 

पणाला मूल्य प्राप्त होतें. एवढेंच काय, पण कांहीं लोक असेंही म्हणतांना मीं ऐकलें आहे कीं, शत्रू असण्यामध्यें त्या लोकांना आनंद वाटतो, कारण त्यामुळें तें आपल्या मित्रांचे अधिक गुणग्रहण करूं शकतात. एकंदरींत पाहतां, अशा तऱ्हेच्या सर्वच लोकांना कामोपभोग हा अत्यंत आस्वाद देणारा विषय वाटतो आणि जिभेला होणारा रसास्वादाचा आनंद हा, ज्याच्याशिवाय चालणारच नाहीं अशा जीवनांतील आनंदापैकीं एक असतो. त्यांच्या दृष्टीनें जन्माला आलेली व्यक्ती मरणारच हें अगदी स्वाभाविक आहे. कारण जीवनाचा प्रवास फार लांबला तर तो कंटाळवाणा होईल; अशा प्रवासाला मृत्यूमुळें पूर्णविराम मिळतो.

थोडक्यांत म्हणजे जीवन आज जसें आहे तें ठीकच आहे, असें त्यांना वाटतें; त्यामुळें त्यापाठीमागें कांहीं हेतु किंवा उद्‌दिष्ट आहे कीं नाहीं हें जाणून घेण्याची ते पर्वा करीत नाहींत. दुसऱ्यांच्या दु:खाविषयीं ते कांहीं कदर बाळगीत नाहींत; प्रगती करून घेण्याची कांहीं आवश्यकताही त्यांना भासत नाहीं.

पान क्र. ५७

 

अशा लोकांमध्यें परिवर्तन घडवून आणण्याचा तुम्हीं मुळींच प्रयत्न करूं नका; ती फार मोठी चूक होईल. समजा, दुर्दैवानें तुमचें म्हणणें त्यांनीं ऐकलें, तर त्यामुळें त्यांच्या जीवनाचा पहिला तोल तर जाईलच आणि त्याला दुसरा नवीन आधारही मिळणार नाहीं. कारण आंतरिक जीवन जगण्याची त्यांची तयारी झालेली नसते, पण प्रकृतीचे मात्र ते लाडके असतात; तिच्याशीं त्यांचें चांगलें सूत्र जमलेलें असतें; म्हणून त्यांनीं प्राप्त करून घेतलेली ही भूमिका आपण विनाकारण बिघडवितां कामां नयें.

जगामध्यें दुसरेही समाधानी लोक असतात, ज्यांचें समाधान कमी आणि कमी काळ टिकणारें असतें. प्रेमाच्या क्रियेमध्यें जी जादू अंतर्भूत असते, त्यामुळें ते समाधानी असतात. अहंकारामुळें संकुचित मर्यादांनीं बद्ध झालेली व्यक्ती ज्यावेळी या मर्यादा तोडते आणि दुसऱ्या व्यक्तींसाठीं, कुटुंबासाठीं, देशासाठीं किंवा ध्येयासाठीं, श्रद्धा-विषयासाठीं आत्मदानद्वारां उच्च, मुक्त वातावरणांत विहरूं लागते त्या प्रत्येक वेळीं या

पान क्र. ५८

 

आत्मविस्मृतीमध्यें प्रेमाच्या अद्‌भुत आनंदाची गोडी तिला चाखावयास मिळते आणि भगवंताचा संस्पर्श आपण अनुभवत आहोंत असें तिच्या लक्षांत येतें. पण बहुधा हा संस्पर्श तात्पुरता असतो. कारण मनुष्यप्राण्याच्या प्रेमांत लगेच अहंकारयुक्त कनिष्ठ प्रवृत्ती मिसळतात आणि त्यास मलिन करतात व त्याच्या पावित्र्याचें सर्व सामर्थ्य नष्ट करून टाकतात. समजा, हें प्रेम शुद्ध, निर्भेळ राहिलें, तरीही दिव्य अस्तित्वाशीं घडून आलेला संयोग कायमचा कधींच टिकून राहणें शक्य नसतें; कारण, प्रेम हें भगवंताच्या अनेक रूपांपैकीं एक रूप आहे आणि त्याच्या अन्य रूपांप्रमाणेंच या पृथ्वीवर त्याचें हें रूपही विद्रूप केलें गेलेलें आहे.

शिवाय, भविष्यकालीन एकतेप्रत जाण्यासाठीं, नेहमींच्या सामान्य मार्गानें थबकत थबकत चाललेल्या प्रकृतीच्या प्रवासांत सामील होणाऱ्या सामान्य लोकांच्या दृष्टीनें हे सर्व अनुभव चांगले आणि उपयुक्तच असतात. परंतु प्रकृतीची गती अधिक शीघ्र व्हावी

पान क्र. ५९

 

असें ज्यांना वाटतें त्या लोकांना हे अनुभव समाधान देऊं शकत नाहींत; किंवा दुसऱ्या शब्दांत सांगावयाचें, तर सामान्य मानवी प्रकृती आणि तिची अनंत भ्रमंती यांच्यांतून मुक्त करणाऱ्या निराळ्या, अधिक शीघ्र आणि अगदीं सरळ ध्येयाप्रत नेणाऱ्या, अभूतपूर्व अशा गतीसाठीं त्यांना आकांक्षा असते. आध्यात्मिक विकासामध्यें, प्रगतीमध्यें ज्यामुळें त्यांना भाग घेतां येईल आणि जी प्रगती या पृथ्वीवर अतिमानस सत्याचा आविष्कार करणाऱ्या नव-मानववंशाच्या निर्मिताकडे त्यांना नेईल, असे सर्वांत जलद मार्ग त्यांना पाहिजे असतात. अशा अपवादात्मक थोर व्यक्तींनीं मानवी जीवांत परस्परांविषयीं व्यक्त होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या प्रेमाचा त्याग केला पाहिजे. कारण, असें प्रेम कितीही सुंदर आणि शुद्ध असलें, तरी त्यामुळें एक प्रकारचे प्रेमशक्तिप्रवाहाचें लघुवलय (Short circuit) निर्माण होऊन त्यामुळें ईश्वराशीं असलेला प्रत्यक्ष संबंध तुटतो.

भगवत्प्रेम ज्याला माहीत आहे त्याला प्रेमाचे

पान क्र. ६०

 

अन्य कोणतेही प्रकार हें संकुचितपणा, अहंकार, अज्ञान यांचें फार मिश्रण झालेले व मलिन असे दिसतात. परस्परांमधील सौदा किंवा वर्चस्व व अधिकार मिळविण्यासाठीं चाललेली धडपड, असें त्या प्रेमाचें स्वरूप त्याला दिसतें. अगदीं उत्कृष्ट प्रकारचें प्रेमही गैरसमज, हळवेपणा, संघर्ष, विरोध आणि अनाकलन यांनीं युक्त असलेलें दिसून येतें.

शिवाय, ही गोष्ट सर्वपरिचित आहे कीं, तुम्हांला ज्याबद्‌दल प्रेम वाटतें त्याच्यासारखें तुम्ही होत जातां. तेव्हां तुम्हांला भगवंतासारखें व्हावयाचें असेल, तर केवळ त्याच्यावरच प्रेम करा. भगवंताशीं घडलेल्या प्रेममय संयोगाच्या अत्यानंदाचा आस्वाद ज्यानें अनुभवला असेल, त्यालाच फक्त त्याच्या तुलनेनें अन्य कोणतेंही प्रेम किती नीरस, मंद आणि निर्बल असतें हें कळूं शकेल; आणि असें भगवंताशीं तादात्म्य अनुभवण्यास फारच कष्टदायक कठोर तपस्या करावी लागत असली, तरी त्या तादात्म्याकरितां खरोखर कोणतीच गोष्ट अति कठीण, अति दीर्घकाल लागणारी

पान क्र. ६१

 

किंवा अति कडक नाहीं. कारण अनिर्वचनीय अशा स्थितीची ही प्राप्ती असते.

अशी ही अत्यद्‌भुत स्थिती या जगांत साध्य करून घेण्याची आपली इच्छा आहे; भगवंताच्या वास्तव्याला पृथ्वी हे योग्य स्थान बनविण्यासाठीं तीच या जगाचें स्वरूप संपूर्णपणें बदलूं शकेल. त्याचवेळी खरें आणि शुद्ध प्रेम मानवदेहामध्यें अभिव्यक्त होऊं शकेल. आतांप्रमाणें तो देह, प्रेमावरील आवरण किंवा त्याचें सोंग राहणार नाहीं. असें म्हणण्याचें कारण, तपस्या सुकर करण्यासाठीं आणि मानवाशीं अकिध निकट आणि प्रकट स्वरूपांतील सलोखा निर्मिण्यासाठीं भगवंत अनेक वेळां सर्वोच्च प्रेमाच्या स्वरूपांत प्रकट झालेला आहे. त्यासाठीं त्यानें बाह्यत: मानवासारखा दिसणारा देह धारण केला पण प्रत्येकवेळीं या जड पार्थिव तत्त्वाच्या स्थूल स्वरूपांत बंदिस्त राहिल्यामुळें तो स्वतःचें केवळ विकृतच रूप व्यक्त करूं शकला. आपलें संपूर्ण, समृद्ध पूर्णत्व व्यक्त करतां यावें म्हणून मनुष्यप्राण्यानें स्वतःच्या जाणिवेमध्यें आणि शरीरामध्यें कांहीं अत्यावश्यक

पान क्र. ६२

 

अशी प्रगती करून घ्यावी म्हणून भगवंत अपेक्षा करीत थांबला आहे. कारण, ज्यावेळीं परमोच्च दिव्य प्रेम मानवी रूपामध्यें प्रकट होतें, त्यावेळीं मनुष्याच्या क्षुद्र दिमाखामुळें आणि मूढ अहंमन्यतेंमुळें असें प्रेम म्हणजे दौर्बल्याची, परावलंबित्वाची आणि कांहींतरी गरज असल्याची खूण आहे असें तो समजतो.

तरीही, मनुष्याला हें आधींच अंधुकपणें माहीत असतें आणि तो जसजसा पूर्णतेप्रत प्रगत होत जातो तसतसें त्याला हें अधिक कळून येतें कीं, जगतांतील दुःख नाहींसें करण्यास केवळ प्रेमच एक समर्थ आहे; प्रेमाचा गाभा जो अनिर्वचनीय आनंद त्यानेंच फक्त विश्वामधील, विरहाचें चटके देणारें दुःख दूर करतां येईल. कारण, परम ऐक्याच्या अत्यानंदामध्येंच केवळ सृष्टीला आपल्या अस्तित्वाचा हेतु आणि कृतार्थता लाभेल.

म्हणून, ज्यावेळीं भगवंत बाह्य, जड रूपांत व्यक्त होईल, त्यावेळीं त्याचें खरें स्वरूप झांकलें जाऊं नये यासाठीं जड पार्थिव तत्त्वांत प्रकाश आणण्याकरितां,

पान क्र. ६३

 

त्याच्या शुद्धीकरणाकरितां तें परिपूर्ण करून, त्याचें संपूर्ण परिवर्तन करण्याकरतां केलेलें वास्तविक कोणतेच प्रयत्न अति कष्टप्रद किंवा कोणतीही तपस्या फार कठोर म्हणतां येणार नाहीं. कारण, त्यामुळें जीवनाचें मधुर आनंदमय स्वर्गामध्यें रूपांतर करण्याचें सामर्थ्य असलेलें अद्‌भुत दिव्य प्रेम या जगामध्यें मुक्तपणें प्रकट होऊं शकेल.

हें अंतिम ध्येय आहे, प्रयत्नांचा कळस किंवा अंतिम विजय आहे असें तुम्ही कदाचित म्हणाल. पण त्या अंतिम उद्दिष्टास पोंचण्यासाठीं काय केलें पाहिजे ? तिकडे नेणारा मार्ग कोणता ? आणि त्या मार्गावरील पहिलीं पावलें कोणतीं ?

भगवंताशीं वैयक्तिक नाते जोडण्यासाठीं आपण आपलें प्रेम त्याच्या संपूर्ण ऐश्वर्यासह राखून ठेवण्याचें ठरविलें असल्यामुळें, दुसऱ्यांशीं वागतांना प्रेमाची जागा संपूर्ण, अविचल, निरंतर आणि निरंहकारी दयालुता व सदिच्छा या गोष्टी घेतील. पण त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचें प्रतिफल, कृतज्ञतादर्शन किंवा त्याची

पान क्र. ६४

 

त्यांनी जाणीव दाखवावी एवढीसुद्धां अपेक्षा बाळगली जाणार नाहीं. दुसऱ्यांनीं तुम्हांला कशाही रीतीनें वागविलें तरी तुम्हीं संतापाच्या आहारीं जाणार नाहीं आणि भगवंताच्या ठिकाणीं विशुद्ध प्रेम असल्यानें, तुमचें त्यानें कसें रक्षण करावें आणि दुसऱ्यांचें गैरसमज आणि अनिष्ट इच्छा यांच्यापासून तुम्हांला कसें वाचवावें याचा निर्णय तुम्ही त्याच्यावरच सोंपवून द्याल.

तुमचा आनंद किंवा तुमचीं सुखें केवळ भगवंताकडूनच मिळावीत अशी तुम्ही अपेक्षा कराल. केवळ त्याच्याच ठिकाणीं तुम्ही आसरा आणि सहाय्य शोधाल, आणि तेथेंच तें तुम्हांस मिळेल. तुमच्या सर्व दुःखांत तो तुमचें सांत्वन करील, तुम्हांला मार्गदर्शन करील, तुम्ही अडखळून पडलांत तर तुम्हांला वर उचलून येईल, तुम्हांला भोंवळ आलीं किंवा तुम्हीं थकलांत तर तोंच तुम्हांला त्याच्या शक्तिमान प्रेमळ बाहूमध्यें घेईल आणि त्याच्या मधुर, निवांत उबेचें पांघरुण घालील.

या ठिकाणीं एक गैरसमज टाळण्यासाठीं मला हें

पान क्र. ६५

 

स्पष्ट केलें पाहिजे कीं, मी ज्या भाषेंत हें सर्व बोलत आहे तिच्या तोकडेपणामुळें भगवंताचा उल्लेख पुल्लिंगी स्वरूपांत मला करावा लागत आहे. पण जें एकमेव सत्य, म्हणजेच प्रेम, याविषयीं मी बोलत आहे तें पुल्लिंग वा स्त्रीलिंग याच्या अतीत, त्यांच्याहून फार उंच आहे; आणि ज्यावेळीं तें मानवी देहांत प्रकट होतें, त्यावेळीं कांहीं फरक न करतां, कार्याच्या आवश्यकतेप्रमाणें पुरुषाचा किंवा स्त्रीचा कोणताही देह तें निवडतें.

सारांश, भावनाविषयक तपस्या म्हणजे, केवळ दिव्य सत्यतत्त्वावर, भगवंतावर आपले सर्व भाव अनन्य रीतीनें केंद्रित करतां यावेत म्हणून, व्यक्ती, कुटुंब, राष्ट्र किंवा कोणत्याही इतर विषयांसंबंधीं वाटणाऱ्या भावनाविवश आसक्तीचा त्याग करणें. अशा रीतीनें एकाग्रता केली म्हणजे त्याची परिणती भगवंताशीं सर्वांगीण तादात्म्यामध्यें होईल आणि पृथ्वीवर अतिमानसाची प्राप्ती होण्यासाठीं त्याचा साधन म्हणून उपयोग होईल.

यानंतर साहजिकच आपण चार मुक्तींकडे वळतो.

पान क्र. ६६

 

या चार मुक्ती म्हणजे भगवत्प्राप्ती झाल्याचीं प्रत्यक्ष व्यक्त रूपें ठरतील. भावनाविषयक मुक्ती म्हणजे अतिमानसिक एकत्वाच्या सर्वांगीण अनुभूतीचा परिणाम असल्यामुळें दुःखापासूनही विमुक्ती. मानसिक मुक्ती किंवा अज्ञानापासून मुक्तता झाली म्हणजे ज्योतिर्मन (Mind of Light) किंवा विज्ञानमय चेतनेची आपल्या अस्तित्वामध्यें प्रस्थापना होईल आणि ती चेतना शब्दाच्या सृजनशील शक्तिरूपांत प्रकट होईल.

प्राणविषयक मुक्ती किंवा वासनामुक्ती प्राप्त झाल्यानें, व्यक्तीला स्वतःची इच्छा भगवंताच्या इच्छेमध्यें संपूर्णत: आणि जाणीवपूर्वक एकरूप करण्याची क्षमता येईल आणि त्यामुळें सतत शांती, प्रसन्नता आणि त्यांच्यापासून निर्माण होणारी शक्ती यांची प्राप्ती होईल.

अखेरचें शिखर म्हणजे शारीरिक मुक्ती; म्हणजेंच भौतिक जगामध्यें असणाऱ्या कार्यकारणभावाच्या नियमापासूनही विमुक्ती. सामान्यत: प्रकृती ही नेहमीं तुम्हांला अवचेतनेच्या आणि अर्धजागृत प्रेरणांच्या द्वारां कार्य करायला लावीत असते; आणि तुम्हांला

पान क्र. ६७

 

सामान्य जीवनाच्या चाकोरींत जणूं बांधून ठेवीत असते. पण तुम्ही स्वत:वर संपूर्ण प्रभुत्व मिळविल्याकारणानें त्यानंतर तुम्ही प्रकृतीच्या नियमांचे बंदे गुलाम राहत नाहीं. ही मुक्ती मिळाल्याकारणानें तुम्हांला पाहिजे असलेला मार्ग तुम्ही संपूर्ण ज्ञानपूर्ण दृष्टीनें ठरवूं शकतां; कोणते कार्य साध्य करावयाचें ते निवडूं शकतां; आणि अंध नियतीपासून स्वत:स संपूर्णपणें मुक्त करून घेऊं शकतां. त्यामुळें तुमच्या जीवनप्रवाहांत उच्चतम दिव्य संकल्पशक्ती, सत्यतम ज्ञान आणि अतिमानस चेतना या गोष्टी भरून जातील आणि तुमच्या जीवनप्रवाहांत त्यांच्याखेरीज दुसरें काहींहीं येऊं दिलें जाणार नाहीं.

**

पान क्र. ६८









Let us co-create the website.

Share your feedback. Help us improve. Or ask a question.

Image Description
Connect for updates