Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics, expounding a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth.
Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.
श्रीअरविंद
दिव्य जीवन
('खंड पहिला')
1
श्रीअरविंद आश्रम
पाँडिचेरी
खंड पहिला
सर्वगत ब्रह्म आणि ब्रह्मांड
प्रकरण पहिलें *
मानवी आकांक्षा
ही उषा पहा. ही एकटी नाहीं. हिच्यापुढें अनेक उषा वाटचाल करीत आहेत. एका निश्चित ध्येयाकडे जात आहेत. त्याच ध्येयाकडे त्यांच्यामागून ही उषा चालत आहे. हिच्यामागें अनंत उषांची रांग लागलेली आहे. या रांगेच्या अग्रभागीं ही आमच्या समोरची उषा आहे. ही उषा वाढत आहे. जीवांचें जग ही आमच्यासमोर उभें करीत आहे. मृत्युवश झालेल्या कोणाकोणाला ही जागें करून जीवन देत आहे. ......पूर्वीं प्रकाश देऊन गेलेल्या उषा आणि हिच्यानंतर निश्चितपणें प्रकाश देतील त्या अनंत उषा, या सर्वांशीं सुमेळ राखून सहकार करणारी ही आमची उषा आहे. तेव्हां हिचा, हिच्या प्रभावाचा व्याप केवढा थोर असेल बरें ! प्राचीन उषांकडे हिचा जीव ओढ घेतो, त्यांच्या प्रकाशांत आपला प्रकाश मिळवून त्यांना ही कृतार्थ करिते; तसेंच हिच्यानंतर येणाऱ्या उषांच्या दिशेनें आपला प्रकाश फेंकून त्यांच्याशींहि ही अद्भुत प्रेमाचें नातें जोडतें.
- कुत्स आंगिरस (ऋग्वेद) १. ११३. ८, १०.
विश्वामध्यें कार्य करीत असलेल्या या देवात्मशक्तीला जे श्रेष्ठ जन्म असतात, ते तीन आहेत. ते जन्म सत्य आहेत, ते स्पृहणीय आहेत. हा देवात्मा विश्वांत दूर दूरपर्यंत आणि अगदीं उघडपणें भ्रमण करितो. अनंताच्या पोटांत याचें भ्रमण चालते. त्याचा प्रकाश शुद्ध, तेजस्वी आणि अपूर्णाला पूर्ण करणारा आहे....मर्त्यामध्यें अमर्त्य असें कांहीं आहे. जें सत्य आहे, तें या अमर्त्यापाशीं आहे. हें अमर्त्य म्हणजे देवात्मा होय, देव होय. हा देव मर्त्यांच्या अंतरात कायम राहणारा
-------------------------
*हें प्रकरण महत्त्वाचें असल्यामुळें याचा अनुवाद जरा अधिक मोकळा व विस्तृत केला आहे.
पान क्र. १
आहे. याचें अंतरांतील स्वरूप दैवी कार्यशक्ति होय. आपणांत जीं दिव्य सामर्थ्यें उदयास येतात तीं या शक्तीच्या कार्यकुशलतेनें उदयास येतात. .....हे शक्तिदेवते ! उंच उडी घे, उच्चपदस्थ हो. सर्व पडदे फाड आणि आमच्या ठिकाणीं दैवी प्रकृतीचे गुण उदयास आण.
- वामदेव (ऋग्वेद) ४.१.७; ४.२.१; ४.४.५.
मानवी मनांत विचारशक्ति जागृत झाली, विचार खेळूं लागले, तेव्हां या मनाला सर्वथा व्यापून टाकणारी अशी जी एक आकांक्षा पूर्वकाळीं, सर्वप्रथम या मनांत उदयास आली, तीच या विचारी मनाची सर्वश्रेष्ठ आकांक्षा होय. ही मानवी मनाची मूलभूत अनिवार्य आकांक्षा आहे, असें उघड दिसतें; कारण हिला मनांतून कितीहि वेळां काढून लावली तरी, प्रत्येक वेळीं ती परत येऊन मनाची पकड घेते. संशयवादानें मनाला मधून मधून अतिदीर्घ काळपर्यंत व्यापून टाकलें तरी पुन: पुन: त्या संशयवादावर मात करून ही आकांक्षा मनाचा ताबा घेते. देवाचा व दैवी गुणांचा अंतप्रत्यय, पूर्णतेकडे ओढ, शुद्ध सत्याचा व निर्भेळ सुखाचा शोध, अप्रकट अमरतेचा प्रत्यय -- या गोष्टी, वर वर्णिलेल्या आकांक्षेचें स्वरूप व कार्य होत. ही आकांक्षा प्राचीन काळीं मानवी मनांत सतत तळपत होती, याचा पुरावा मानवी ज्ञानाच्या प्राचीन उषांच्या वर्णनांत सांपडतो. आजहि मानवता त्या आद्ययुगीन आकांक्षांना परत आपल्या अंतरांत स्थान देण्याच्या तयारींत असलेली दिसते; निसर्गाच्या बाह्यवस्तुजाताच्या यशस्वी विश्लेषणानें तिची तृप्ति न होतां, त्या विश्लेषणाचा वीट मात्र तिला आलेला आहे; व म्हणून ती आद्ययुगीन आकांक्षांकडे ओढ घेत आहे. देवदेव, ज्ञानविज्ञान, मुक्ति व अमरता या चतु:सूत्रींत अनुभवी ज्ञानसंपन्न चतुरता, आद्ययुगांत आपली आकांक्षा व्यक्त करीत होती, तीच चतु:सूत्री आजहि ज्ञानाची अंतिम चतु:सूत्री राहणार, असा रंग दिसत आहे.
प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊन टिकलेलीं मानव वंशाचीं ध्येयें, या चतु:सूत्रींत व्यक्त झालीं आहेत. मानवाचा सर्वसामान्य अनुभव या ध्येयांना विरोध करणारा आहे. या ध्येयांत ज्या अनुभवांचा सत्यत्वानें उल्लेख आहे ते अनुभव मानवाला अपवादभूत असून, उच्च आणि खोल भूमिकेवरचे आहेत. त्यांचा समग्रतेनें सुव्यवस्थितपणें लाभ व्हावयाचा तर व्यक्तीला क्रांतिकारी प्रयत्न करावा लागतो किंवा मानवी समाजाचा
पान क्र. २
क्रमविकास एका विशिष्ट टप्प्यापर्यंत प्रगत व्हावा लागतो. चतुरतेची चिरंतन चतु:सूत्री आम्हापुढें कोणत्या गोष्टी ठेवीत आहे ? संक्षेपानें सांगावयाचें तर, पार्थिव निसर्गाचा क्रमविकास होत आहे आणि या क्रमविकासाचे अंतिम ध्येय पार्थिवांत, जडांत देवदेवाचें प्रकटीकरण हें आहे, असें ही चतु:सूत्री सांगत आहे. या संक्षेपाचा अधिक विस्तार करावयाचा तर चतु:सूत्री आम्हांपुढें पुढील कार्यक्रम ठेवीत आहे -
आमच्या जाणिवेंत पशुता आणि अहंता भरलेली आहे; अशा जाणिवेचा विकास करून आम्हाला देव जाणावयाचा आहे, त्याला आपलासा करावयाचा आहे व अंतीं मानवाचा, आमचा, देव व्हावयाचा आहे.
देहाशीं बांधलेलें आमचें मन अर्धवट अंधुक प्रकाशाचें स्थान आहे, त्याचें परिवर्तन करून त्याचें ठिकाणी उन्मनाचा, अतिमानसाचा, विज्ञानाचा पूर्ण प्रकाश आम्हीं आणावयाचा आहे.
आमचीं वासनापूर्तीचीं सुखें क्षणिक, त्यांना देहाच्या आणि भावनांच्या दुःखांचा सदा वेढा पडलेला; या सुखदुःखाच्या खेंचाखेंचींत जबर ताण आमच्या वांट्याला येतो; ही अशांतीची व परवश क्षणिक सुखाची परिस्थिति बदलून तिच्या ठिकाणीं शाश्वत शांतीची व स्वयंभू सुखाची उभारणी आम्हाला करावयाची आहे.
आमचें जग यांत्रिक अनिवार्य निसर्गनियत घटनांचा संघ असल्यासारखें दिसते; त्या जगांत अमर्याद आत्म-स्वातंत्र्य स्थापावयाचें आहे.
आमच्या शरीरांत सारखा बदल होत असतो व तें मृत्यूला वश होतें; अशा शरीरांत मृत्यूला वश न होणारें जीवतत्त्व, आत्मतत्त्व आहे, त्याचा शोध लावून तें आम्हाला आमचें स्वरूप म्हणून अनुभवावयाचें आहे.
परंतु मानवी जाणिवेच्या आजच्या रचनेंत जी तिची शक्ति प्रकट झालेली आहे, त्या शक्तीपलीकडे अधिक शक्ति जाणिवेंत नसून आजची शक्ति हीच जाणिवेच्या व्यापाची शेवटली मर्यादा आहे, असें सामान्य जडवादी बुद्धीचें आग्रही मत आहे. आज अनुभवाला येणारी जाणिवेचीं कार्यें, वरील ध्येयभूत कार्यक्रमांतील कार्यांशीं सर्वथा विरोधी असल्यानें, तो ध्येयभूत कार्यक्रम अशक्य कोटीतला आहे, असा जडवादी बुद्धिवाद्यांचा शेवटला बुद्धिवाद आहे. हा बुद्धिवाद त्यांच्या जडवादी मताला साजेसा आहे; परंतु तो वस्तुतः खोल अनुभवाच्या कसोटीस उतरणारा नाही. जगांतील घटनांचा खोल विचारपूर्वक अनुभव घेतला तर 'प्रत्यक्ष विरोध' (म्हणजेच घडलेल्या घटनांस विरोधी अशा घटना घडवून आणणें) हा निसर्गाच्या
पान क्र. ३
गहन कार्यपद्धतीचा एक भाग आहे असें दिसून येईल. ''योजलेल्या घटनेचा, अमुक एका घडलेल्या घटनेला सर्वथा विरोध आहे ना? तर मग योजलेली घटना घडावी, यांस माझी पूर्ण संमति आहे,'' असेंच जणुं योजलेल्या विरोधी घटनेवर निसर्ग शिक्कामोर्तब करीत असतो.
कारण, जीवनाचे सर्व प्रश्न तत्त्वत: संवाद-विसंवादाचे प्रश्न असतात. दोन गोष्टींमध्यें विसंवाद, विरोध आहे, तो मिटलेला नाहीं, असें नजरेस येतांच, तोच विरोध मिटण्यासारखा आहे, त्या दोन गोष्टींत मुळांत मेळ आहे, ऐक्य आहे, अशी आंतून अंतर्मन ग्वाही देते; जीवनाचे एकूण एक प्रश्न अशाच स्वरूपाचे असतात; मानवांत अधिक पशुतेकडे झुकणारा असा जो एक केवळ व्यवहारी भाग आहे त्याला, अनुभवास आलेला विसंवाद मिटविण्याची तितकी आवश्यकता वाटत नाहीं; विसंवादानें त्याचें ठिकाणीं विशेष असंतोष उत्पन्न होत नाहीं. परंतु पूर्णपणें जागृत झालेलें मन, विसंवाद अनुभवून संतुष्ट राहणें अशक्य असतें. व्यवहारी मनाला देखील, विसंवादाची अडचण मुळींच भासत नाहीं असें नाहीं. परंतु अशा अडचणींतून मार्ग काढण्याची व्यवहारी मनाची तऱ्हा, पूर्ण जागृत मनाहून वेगळी असते. एकतर, तें अडचणीला बगल देऊन जीवन चालवितें अथवा अडचणीवर मूलगामी उपाय न योजतां कांहीं अर्धवट कामचलाऊ, अज्ञानसुलभ तडजोड काढून, काम भागवून नेतें. निसर्ग हा स्वभावत: त्याच्या सर्व प्रांतांत सुमेळ, सुसंवाद घडवून आणण्याच्या खटपटींत असतो. मन आपले अनुभव एकत्रित करतांना कांहीं सुव्यवस्थेचें, मेळाचें तत्त्व उपयोगांत आणते, तशीच गोष्ट जडाच्या व प्राणाच्या प्रांतांतहि निसर्ग घडवीत असतो. रचनेसाठीं पुढें केलेला माल जितका अधिक अस्ताव्यस्त स्थितींत दिसत असेल, त्या मालांतील वस्तु एकमेकींशी जितक्या अधिक जुळत्या नव्हेत तर जितक्या अधिक कट्टर व अनिवार्य अन्योन्यविरोधी दिसत असतील, तितकी रचना सुव्यवस्थित करण्याची निसर्गाची स्फूर्ति अधिक जोरदार होते, आणि त्या स्फूर्तीमुळें अधिक सूक्ष्म आणि सामर्थ्यवान् सुव्यवस्था निर्माण होते. सोपी कामगिरी असतांना तशी कुशल रचना निर्माण होणें सामान्यत: शक्य नसतें. विरोधी गोष्टींचा मेळ घालून सुव्यवस्थित रचना निसर्गानें केली आहे, अशा एक दोन बाबी पहा. प्राण हा स्वयं गतिमान्, क्रियाशील आणि शरीर मात्र स्वयं गतिशून्य, निष्क्रिय, जड, भौतिक तत्वांचें. जडतत्त्व, हालविल्याशिवाय हालायचें नाहीं आणि सारखी हालचाल करीत राहणें हा तर प्राणाचा धर्म;
पान क्र. ४
म्हणजे दोन निखालस विधर्मी, विरोधी वस्तूंची सुंदर सुसंवादी रचना निसर्गानें निर्माण केली आहे. खनिजांतील रचनेपेक्षां वनस्पतींतील रचना, वनस्पतींतील रचनेपेक्षां प्राणिवर्गांतील रचना अधिक गुंतागुंतीची; व तिजपेक्षां आम्हां मानवांतील रचना अधिकच गुंतागुंतीची. गुंतागुंत जितकी अधिक तितकी रचनेची कार्यक्षमता अधिक, अशी निसर्गाची कार्यप्रणाली आहे. प्राण आणि शरीर यांची आमच्यांतील परस्पर सहकारिता, खनिज, वनस्पति व प्राणिवर्ग यांच्यातील सहकारितेपेक्षां श्रेष्ठ दर्जाची असली तरी, ती आहे त्याहून अधिक चांगली होऊं शकते; आमच्या मनाला आधारभूत असलेलें आमचें पशुसदृश प्राणि-शरीर आज अंशत: सुसंघटित आहे, तें समग्र सुसंघटित होऊन त्यांतील जड घटक देखील मृत्यूला दाद देणार नाहींत असें झालें म्हणजे निसर्गानें या बाबतींत 'अन्योन्य विरोधकांचा प्रश्न' पूर्णतया सोडविलासें होईल. ही झाली एक बाब. 'अन्योन्य विरोधकांचा प्रश्न' असलेली दुसरी बाबहि पाहाण्यासारखी आहे. मनाला स्वत:ची जाणीव आहे. मनाच्या इच्छेला स्वत:ची जाणीव आहे; पण शरीराला, प्राणाला तशी जाणीव नाहीं, त्यांच्यांत 'इच्छा' म्हणून जी कांहीं दिसते, ती यांत्रिक, जाणीवहीन इच्छा असतें. असें जाणीवयुक्त मन, जाणीवहीन प्राण व शरीर यांच्याशीं जोडून, निसर्गानें मानवांच्या व मानवेतरांच्या जीवनांत आश्चर्यकारक घटना, घडविल्या आहेत. या आश्चर्यांहून अधिक मोठी आश्चर्यें घडविण्याच्या खटपटींत निसर्ग आहे. आज आमच्या जाणिवेंत पशुता खेळत आहे; व आम्ही, म्हणजे आमची जाणीव, सत्य आणि प्रकाश यांच्या शोधांत आहे. ज्याच्या शोधांत आमची जाणीव आहे, त्या सत्याचें प्रत्यक्ष आणि समग्र ज्ञान तिला लाभलें आणि या लाभामुळें ती आपल्या कार्यक्षेत्रांत सर्वशक्तिमान् झाली, म्हणजे मन-प्राण-शरीर-संघटनाच्या बाबतींत निसर्गानें शेवटलें आश्चर्य घडविलें असें होईल. याप्रमाणें 'अन्योन्य विरोधकांचा प्रश्न' असलेली दुसरी बाब निसर्गानें कशी हाताळली आहे तें आपण पाहिलें. तेव्हां मानवांत जी उंच जाण्याची स्फूर्ति आहे, उच्च उच्चतर स्तरावरील अन्योन्य-विरोधी वस्तूंचा विरोध मोडून त्यांतून उच्चतम पातळीवर सुसंवादी जीवन निर्माण करण्याची मानवांत जी उमेद आहे ती बुद्धीला धरून आहे, हें आपणांस मान्य होण्यास हरकत नसावी. निसर्गाची जी मूलभूत कार्यपद्धति, त्याच्या सार्वत्रिक धडपडीचें जें धोरण आमच्या अनुभवास आलें आहे, त्या धोरणांत व त्या कार्यपद्धतींत निसर्गाचा जो नियम व जो
पान क्र. ५
यत्न आमच्या प्रत्ययास येत आहे, त्या नियमाची व यत्नाची तर्कशुद्ध अखेर, तर्कशुद्ध पूर्णता, एकच असूं शकते आणि ती म्हणजे वर सांगितलेली मानवामध्यें जागृत झालेली उंच उंच जाण्याची स्फूर्ति होय.
जडाच्या भूमींत प्राणाचा व मनाचा विकास होतो असें आपण बोलतों. परंतु 'विकास' या शब्दानें केवळ काय होतें तें सूचित केलें जातें, जें काय होतें तें कां होतें, हें त्या शब्दानें सांगितलें जात नाहीं. जडवस्तूंतून प्राण उदयास यावा, प्राणमय जडाच्या आकृतींत मनाचा संचार व्हावा, या गोष्टींना बुद्धीला पटण्यासारखें असें एकच कारण दिसतें आणि तें वेदांतांत सांगितलेलें आहे. जडाच्या पोटांत प्राण आणि प्राणाच्या पोटांत मन भरलेलें असतें; जडाच्या पडद्याआड प्राण असतो, प्राणाच्या पडद्याआड जाणीव, मनाची जाणीव किंवा मन असतें, असें वेदांतांत सांगितलेलें आहे. अर्थात् जडाच्या पोटांत जें प्राणाचें बीज असतें त्याला योग्य परिस्थितींत जडाच्या भूमींतून अंकुररूपानें वर येतां येतें व पुढें त्याची क्रमानें वाढ होतें, हें सर्व समजण्यासारखें आहे. हीच गोष्ट प्राणमय जड भूमींतील (किंवा जडमय प्राणभूमींतील म्हणा) मनाच्या बीजाची असते. याच रीतीनें विचार केल्यास असें म्हणावयास हरकत नाहीं कीं, मन किंवा मनाची जाणीव ही देखील या जाणिवेपेक्षां श्रेष्ठ अशा जाणिवेची भूमि असूं शकेल आणि ती जाणीव मनाच्या किंवा मनोमय जाणिवेच्या भूमींतून वर येऊन विकास पावूं शकेल. ही शक्यता मान्य केली कीं, ईश्वर, पूर्णज्ञान, शाश्वत आनंद, मुक्ति, अमरता या गोष्टी प्राप्त करून घेण्याची मानवाचें मनांतील अनावर आकांक्षा विकासविषयक तर्कशास्त्राच्या दृष्टीनें योग्यच आहे असें म्हणावें लागतें. निसर्गानें जडाच्या कांहीं रचनांत प्राण व प्राणविषयक ओढ पेरली आहे, प्राणाच्या कांहीं रचनांत मन व मनोविषयक ओढ पेरली आहे. त्याप्रमाणें मनाच्या कांहीं रचनांत त्यानें -- ''मनाहून मोठें कांहींतरी'' -- (उन्मन, अधिमन, अतिमन कांहीं म्हणा) -- आणि तद्विषयक ओढ पेरली आहे; ही सर्व पेरणी सारखीच स्वाभाविक, सारखीच सत्य, सारखीच न्याय्य, सारखीच अनिवार्य आहे. आजच्या मनाहून श्रेष्ठ असें कांहींतरी विकासक्रमानें उदयास आणण्याच्या खटपटींत निसर्ग आहे; ही विचारसरणि अगदीं निर्दोष दिसते. जडाच्या आणि प्राणाच्या भिन्न रचनांत नवतत्त्वाच्या (अनुक्रमें प्राणाच्या व मनाच्या) विकासाची ओढ भिन्न प्रमाणांत, कोठें कमी स्पष्ट, कोठें अधिक स्पष्ट दिसते; तिच्या कार्यकारी इच्छेचें सामर्थ्य चोहोंकडे सारखें
पान क्र. ६
असत नाहीं -- त्याचा सारखा चढता क्रम अनुभवास येतो; त्याप्रमाणें मनापलीकडील नवतत्त्वाच्या बाबतींतहि, विकासाचा पायरीपायरीचा चढतावाढता क्रम आहे, आणि या क्रमानें हें मनापलीकडील नवतत्त्व अवश्य ते अवयव, आणि अवश्य त्या शक्ती पूर्णपणें विकसित करणार हें निश्चित आहे; कारण तसें करण्यास तें निसर्गनियमानें बांधलेलें आहे. मनाचा विकासक्रम अवलोकन केल्यास, आरंभीं धातूंत व वनस्पतींत प्राणतत्त्वाच्या विशेष नाजूक प्रतिक्रियांच्या रूपानें व मानवामध्यें पूर्णपणें सावयव होऊन तें व्यक्त होतें; तीच गोष्ट मानवामध्यें व्यक्त होऊं घातलेल्या मनापलीकडील नवतत्त्वाची आहे; त्याच्याहि विकासाचा चढतावाढता क्रम आहे. मानवी जीवनापेक्षां उच्चतर, दैवी, दिव्य जीवनाच्या, त्याच्या तयारीच्या म्हणा, अनेक पायऱ्या एकावर एक अशा मानवांत व्यक्त होत आहेत. मानवेतर प्राण्याची सजीव प्रयोगशाळा करून निसर्गानें मानव बनविण्याची योजना यशस्वी केली असें म्हटलें जातें. त्याप्रमाणें मानव हा स्वत: सजीव आणि विचारयुक्त अशी निसर्गाची प्रयोगशाळा असून, त्या मानवामध्यें त्याच्या जाणीवयुक्त सहकारानें, निसर्ग, अतिमानव किंवा देव बनविण्याची आपली योजना यशस्वी करूं इच्छित आहे असें म्हटल्यास वावगें होणार नाहीं. त्यापेक्षां निसर्ग, मानवामध्यें देवदेव व्यक्तरूपांत आणण्याच्या खटपटींत आहे, असें देखील म्हणतां येईल. कारण, निसर्गाच्या पोटांत जें अगोदरच अव्यक्त रूपांत आहे, जें त्याच्या अंतरांत झोंपलेलें किंवा गुप्तपणें क्रियाशील आहे, त्याचें निसर्गानें क्रमश: व्यक्तीकरण करणें म्हणजे विकास होय. तसेंच निसर्ग स्वत: गुप्तरूपानें जो कांहीं आहे, तेंच त्यानें उघडपणे होणें, आपल्या खऱ्या स्वरूपावरील आवरण फाडून त्या रूपाचा खुला आविष्कार करणें, हाहि विकासाचाच प्रकार होय -- हेंहि तितकेंच खरें आहे. तेव्हां विकासाच्या अमुक पायरीपलीकडे निसर्गानें पाऊल टाकूं नये, असें आम्ही मानव निसर्गाला सांगूं शकत नाहीं. विकासावस्थेच्या पुढें पाऊल टाकण्याचा हेतु, निसर्ग कोणा मनुष्याच्या द्वारां दर्शवील अथवा कोणा व्यक्तीच्या द्वारां तसा प्रयत्न करील तर, एक पक्षीं बुद्धिवादी, 'रोग रोग' म्हणून किंवा 'आभास आभास' असा ओरडा करून निसर्गाच्या नव्या हेतूची व यत्नाची थट्टा करतो, किंवा दुसऱ्या पक्षीं, धर्मपंथी 'हा बेताल भ्रष्टाकार, हें घमेंडखोर पाखंड' अशीं नांवें ठेवून त्याची निर्भर्त्सना करतो असें करणें आपल्याला योग्य नाहीं; आपल्याला तसा अधिकार पोंचत
पान क्र. ७
नाहीं. कारण, जडांत चिन्मय आत्मा लपलेला आहे; दिसायला जो निसर्ग म्हणून दिसतो तो दडलेला ईश्वर आहे, निसर्गाचा मुखवटा घातलेला ईश्वर आहे. या गोष्टी जर सत्य आहेत तर, मानवानें पृथ्वीवर जीवन जगतांना आपल्या अंतरांत दिव्य आत्मतत्त्वाचें प्रकटीकरण करणें, आपल्या आंत व बाहेरहि सर्वत्र ईश्वराचा अनुभव घेणें, हें आपलें जीवितकार्य ठरविलें तर त्यांत वावगें काय आहे ? खरें पाहतां, असें त्यानें ठरविलें म्हणजे अत्यंत उच्च असूनहि अत्यंत स्वाभाविक व योग्य असा शक्य कोटीतला ध्येयवाद त्यानें आपल्या जीवनाचें लक्ष्य केलें आहे, असें म्हणतां येईल.
तेव्हां एकंदर निष्कर्ष असा कीं, मनुष्याची विचारनिष्ठ चिकित्सक बुद्धि आणि त्याची स्वाभाविक, सर्व परिस्थितींत टिकणारी सहज भावना किंवा अंतःस्फूर्ति या दोन्हीं निरीक्षक परीक्षकांचा निवाडा कित्येक मानवी विकासविषयक बाबतींत अगदीं सारखा मिळतो. मानवाच्या रचनेंत उच्च-नीच घटक असून खालच्या दर्जाच्या घटकाचे ठिकाणीं उच्चतर सत्य आत्मसात् करण्याची, अनुभवण्याची व जीवनांत व्यक्त करण्याची शक्ति आहे, ही गोष्ट दोन्ही परीक्षकांना मान्य आहे. मानवाच्या सामान्य प्राणिशरीरांत दिव्य जीवन, अनुस्यूत आहे, अप्रकटपणें आहे व तें प्रकट होऊं शकतें, ही गोष्ट नेहमींच अंतर्विरोधानें भरलेली आणि म्हणून अशक्य वाटणारी असली तरी, ती शाश्वत सत्याच्या वर्गांतील आहे, ही गोष्टहि दोन्ही परीक्षकांना मान्य आहे. मानवाचें शरीर मर्त्य आहे, पण या नष्ट होणाऱ्या निवासस्थानांत अनश्वर, अमर सत्याकांक्षा व सत्य वास करीत आहेत व त्यांची केव्हां ना केव्हां प्रकट होण्याची निश्चिति आहे; मानवी मनें मर्यादित, मानवी अहंकारी जीव परस्परांपासून विभक्त, असें दिसत असतां या मनांत, या जीवांत एकच विश्वव्यापी जाणीव, प्रज्ञा, चैतन्य, चेतना त्यांना आपले प्रतिनिधी बनवून त्यांच्या द्वारां काम करीत आहे, हें सत्य आहे व तें योग्य समयीं योग्य मनांत व जीवांत संपूर्णतया प्रकट होणार आहे; काल, स्थल, विश्व या मानवाच्या अनुभवास येणाऱ्या वस्तू स्वयंभू, स्वतंत्र नाहींत; त्यांना कालातीत, स्थलातीत, विश्वातीत-सर्वातीत अशा अनिर्वचनीय एकमेव स्वतंत्र स्वयंभू चैतन्यमय पुरुषोत्तमाचा आधार आहे. या पुरुषोत्तमाशिवाय त्या अस्तित्वांत येऊं शकत नाहींत व टिकूं शकत नाहींत, हें सत्य असून तें मानवाला विकासमार्गानें नियतसमयीं निश्चितपणें प्रत्ययाला येणार आहे.
पान क्र. ८
मानवी शरीर व अतिमानवी दिव्य जीवन यांच्या अवश्य भावी साहचर्याला ज्याप्रमाणें मानवी चिकित्सक बुद्धि व त्याची अचिकित्सक अंत:स्फूर्ति या दोघांची पूर्ण मान्यता आहे, त्याप्रमाणें वर सांगितलेल्या दुसऱ्या सर्व जोड्यांच्या भावी अटळ साहचर्याला त्यांची मान्यता आहे. सामान्य तर्कशास्त्राच्या विचारसरणीनें जे प्रश्न कित्येक वेळां असाध्य म्हणून ठरविले आहेत ते प्रश्न कायमचे बाजूला ठेवून मनुष्यांनीं पृथ्वीवरील आपल्या भौतिक जीवनाचे तांतडीचे व्यवहारांतले प्रश्न घेऊन, त्या प्रश्नांवर आपल्या मानसिक शक्तींना कामास लावावें व यापलीकडे त्यांनीं कोणत्याहि उठाठेवींत पडूं नये, असे बौद्धिक प्रचाराचे प्रयत्न मधून मधून होत असतात. परंतु ही 'असाध्य' प्रश्नांची टाळाटाळी नेहमींच प्रभावी होत नाहीं. 'असाध्य' प्रश्नांना बगल देण्याच्या कांहीं खटपटीनंतर, मानवतेला पूर्वींहून अधिक जोराची शोध करण्याची स्फूर्ति येते; किंवा पूर्वींहून अधिक आदळआपट करणारी व प्रश्नाचें ताबडतोब उत्तर मागणारी असह्य भूक लागते. या भुकेनें अंत:साक्षात्कारवादाला तेज चढतें आणि नवे धर्मपंथ उदयास येतात. जुने पंथ संशयवादाच्या आघातानें नष्ट किंवा अर्थशून्य झालेले असतात आणि संशयवाद स्वत: मानवी मनाला समाधान देत नाहीं; संशयवादाकडून त्याचें संशोधनाचें काम हवे तसें आणि तितकें होत नाहीं म्हणून मानवी मनाला तो समाधान देऊ शकत नाहीं; आणि म्हणूनच अंत:साक्षात्कारवादाच्या आश्रयानें, मानवी मनाची भूक भागविण्यासाठीं जुन्या पंथांच्या जागीं नवनवें पंथ उदयास येतात. एखादें सत्य त्याच्या बाह्य क्रियांत स्पष्टपणें प्रत्ययास येत नाहीं, प्रकाशविमुख प्रतिगामी निर्बुद्ध लोकभ्रम किंवा खुळा भोळा भाव या प्रतीकांनीच बहुधा तें प्रत्ययास येतें; म्हणून त्याचें सत्यत्वच नाकारणें किंवा तें दडपून टाकण्याचा प्रयत्न करणें हें देखील एक प्रकारचें निर्बुद्ध प्रकाशविमुख प्रतिगामित्वच आहे. एखादें विश्वव्यवस्थाविषयक अनिवार्य नैसर्गिक सत्य तत्काल स्पष्ट परिणाम करणारें नसतें व म्हणून साहजिकच तें सिद्ध करावयास अतिशय अवघड असतें. त्या सत्याचे परिणाम घडत राहतात, परंतु त्यांची व्यवस्था लावण्याचें काम त्या सत्याकडून झटपट न होतां सावकाशीनें, मंद गतीनें होत असतें, व म्हणून त्याची सत्यता पटणें व पटविणें अवघड होतें. तथापि त्याच्या सिद्धतेचा अवघडपणा बघून त्याला टाळण्याचा, त्याचें अस्तित्व नाकारण्याचा यत्न करणें हें, निसर्गमातेच्या मनांतील महाप्रभावी संकल्पाविरुद्ध बंड करण्यासारखें आहे. हें बंड
पान क्र. ९
अंततः यशस्वी होऊं शकणार नाहीं. असें बंड करण्यापेक्षां त्या दुर्गम सत्याला मान्यता देणें हें विचारशील चांगुलपणाला अधिक शोभून दिसेल. अंध पण स्वभावसिद्ध प्रेरणा, प्रकाशहीन अस्पष्ट अंतःस्फूर्ति, अनिर्बंध स्वैर आकांक्षा यांच्या प्रांतांत जोपर्यंत तें दुर्गम सत्य वावरत राहील, तोपर्यंत तें दुर्गमच राहील; व तें अमान्य करून बंड करण्याचा आम्हाला मोह होईल. याकरितां त्या प्रांतांतून त्या सत्याला वर उचलून घेऊन, डोळस, स्पष्ट, नियमबद्ध विचाराचा प्रकाश जेथें आहे, जाणीवपूर्वक आपला मार्ग आपण ठरविणारी विचारपूर्ण इच्छाशक्ति जेथें आहे, त्या प्रांतांत आणून त्याचें सत्यत्व पारखणें बरें. प्रकाशहीन अंतःस्फूर्तीचा प्रांत विचार-विवेकाच्या प्रांताच्या खालीं आहे, त्याप्रमाणें प्रकाशमय अंतःस्फूर्तीचा प्रांत विचार-विवेकाच्या प्रांताच्या वर आहे. निसर्गाची श्रेष्ठ सत्यें आपला स्वतःचा साक्षात्कार स्वतः घडवितांना प्रकाशमय अंतःस्फूर्तीच्या द्वारां मानवाला अंतरंगांत प्रतीत होत असतात. विचाराच्या प्रकाशाहून हा साक्षात्काराचा प्रकाश अर्थातच श्रेष्ठ असतो. मानवामध्यें या श्रेष्ठ प्रकाशाच्या कार्याचा कोठें अभाव आहे, कोठें या कार्याला अडविणारे अनेक मनोभाव आहेत, कोठें हें कार्य घडत आहे खरें, पण एकसारखें घडत नसून थांबून थांबून अंतरा अंतरानें घडत आहे, बुरख्याच्या आडून मधून मधून कोणी नजर बाहेर फेंकावी त्याप्रमाणें हा प्रकाश कोठें कोठें आपलें कार्य करीत आहे. भौतिक आकाशांत उत्तर ध्रुवाकडे मधून मधून बहुरंगी सुंदर प्रकाशप्रदर्शनें आपल्याला पहावयास मिळतात, त्याप्रमाणें या प्रकाशाचें प्रदर्शन कोठें कोठें प्रत्ययास येतें. असा हा श्रेष्ठ प्रकाश आम्ही आपला नित्य सहचर करूं अशी आशा आम्ही निर्भयपणें व निःसंकोचपणें बाळगावी. कारण, अंतर्बाह्य निसर्गाचें सूक्ष्म निरीक्षण करतां, आमच्या जाणिवेची आजच्या नंतरची लगतची उच्चतर अवस्था वर वर्णिलेल्या श्रेष्ठ अंतःस्फूर्तीच्या प्रकाशाची असण्याचा फार संभव दिसतो. आजची आमची जाणीव अर्थात् आमचें मन प्राणाच्या पडद्यांतून प्रकट झालें आहे, त्याप्रमाणें आमच्या मनाच्या पडद्यांतून त्यापेक्षां श्रेष्ठ अशी जाणीव प्रकट होणार आहे. या श्रेष्ठ जाणिवेच्या तेजोमय प्रकाशांतून आमच्या वाढत्या आत्मविस्ताराचा मार्ग असून, मानवतेचें अंतिम विश्रामस्थान म्हणून जी कोणती जाणिवेची श्रेष्ठतम अवस्था असेल तेथें, या मार्गानें आम्ही पोंचण्याची बरीच शक्यता आहे.
पान क्र. १०
प्रकरण दुसरें
दोन नकार
जडवादी नकार
त्यानें जाणीवशक्तीकडून श्रम घेतलें ( त्यानें विचाराचे तप केलें,) आणि या तपानें त्याला असें ज्ञान झालें कीं, जडतत्त्व हेंच ब्रह्म आहे. कारण सर्व भूतें जडांतून जन्म घेतात, जडानें वाढतात व येथून जातात तेव्हां तीं जडांत प्रवेश करतात. हें ज्ञान घेऊन तो, आपला पिता वरुण याजकडे गेला आणि म्हणाला, 'हे भगवन् ! मला ब्रह्म काय तें शिकवा'. वरुणानें त्याला उत्तर दिलें, 'तुझ्यांतील जाणीवशक्ति पुन: कामास लाव, तिच्याकडून (विचाराचें) तप करव; कारण तप हेंच ब्रह्म होय.'
- तैत्तिरीय भृगुवल्ली ३, १, २.
पृथ्वीवर दिव्य जीवन असूं शकतें, मर्त्य अशा जीवनांत अमरत्वाचा अनुभव येऊं शकतो असें आम्हीं म्हटलें; या म्हणण्याला आधार काय ? यास आपल्या एका विशिष्ट मतप्रणालीचा-ज्ञानाचा आधार असतो. ही मतप्रणाली, हें ज्ञान येणें प्रमाणें : -- आपलें शरीर हें एक मंदिर आहे, त्या मंदिरांत राहणारा आत्मा अनश्वर आहे, हें मंदिर किंवा वस्त्र बदललें जातें, पण याचा वापरणारा बदलत नाहीं; तसेंच ज्या जडतत्त्वाचें हें निवासस्थान किंवा वस्त्र बनविलें जातें तें जडतत्त्व, मोठ्या किंमतीचा पण योग्य असा कच्चा माल आहे; या मौल्यवान् मालाचे पोषाख तो आत्मा सारखे एकामागून एक, स्वत:साठीं बनवीत असतो अथवा या मालाची कधीं न संपणारी मंदिरांची मालिकाच जणुं रहाण्यासाठी पुन: पुन: बांधत असतो. हें ज्ञान नसेल तर पृथ्वीवर दिव्य जीवन, मर्त्य जीवनांत अमर्त्य जीव, ही भाषा आपल्याला करतां येणार नाहीं.
पान क्र. ११
हें ज्ञान असून देखील शरीर धारण करून जीवन जगण्याचा वीट येण्याचा संभव आहे. हा संभव नाहींसा होण्यास उपनिषदांतील ज्ञान आत्मसात करून ''जडतत्त्व हें देखील ब्रह्मच आहे'' असें ब्रह्मवाद्यांच्याच भाषेंत आपल्याला म्हणतां आलें पाहिजे. अस्तित्वाच्या एका टोंकाला ब्रह्म (चैतन्य) वस्तु आणि दुसऱ्या टोंकाला जडवस्तु, या दर्शनीं कितीहि भिन्न दिसल्या तरी तत्त्वत: त्या अभिन्न आहेत, असें उपनिषदांत म्हटलें आहे. उपनिषदांत, जड विश्वाला ईश्वराचें स्थूल शरीर म्हटलेलें आहे. या जोरदार अलंकारिक वर्णनाचा पूर्ण अर्थ पूर्णपणें आम्हीं ध्यानांत घ्यावयास हवा व त्याचें पूर्ण मोल ओळखून पुढील मांडणी करावयास हवी. जडवस्तुहि ब्रह्म आहे हें उपनिषदीय ज्ञान आत्मसात् केलें तरी या दोन टोंकांना असलेंल्या दोन वस्तूंचें अभिन्नत्व, तादात्म्य तर्कनिष्ठ बुद्धीला पटावयास अवघड जातें; तीं दोन टोकें एकमेकांपासून फार दूर दिसत असल्यानें त्या दोहोंच्या मध्यभागीं त्यांना जोडणारी अनेक वस्तूंची चढती शिडी मानावी लागते. (ती प्राण, मन, अतिमन, तसेंच मन व अतिमन यांना जोडणाऱ्या दुव्यांची बनली आहे) ही शिडी मान्य केली म्हणजेच तर्कनिष्ठ बुद्धीला त्या दोहोंचें, म्हणजे ब्रह्माचें किंवा चैतन्याचें आणि जडाचें अभिन्नत्त्व पटूं शकतें; एरवीं तें पटूं शकत नाहीं. ही मधली शिडी मानली नाहीं तर एकमेकांचे कट्टर वैरी असलेंल्या दोन स्त्रीपुरुषांच्या विवाह संबंधाप्रमाणें चैतन्य व जड यांचा ऐक्यसंबंध, दुःखमय असला पाहिजें असें मानावें लागतें; आणि ज्याप्रमाणें त्या दोघा वैऱ्यांचा विवाहसंबंध त्या दोघांच्या सुखासाठींच तोडून टाकणें हें त्या प्रश्नाचें तर्कबुद्धीला पटणारें एकमेव समाधान असतें, त्याप्रमाणें चैतन्य व जड यांचा ऐक्यसंबंध तोडून टाकणें हेंच दोघांच्याहि हिताचें आहे असें तार्किक बुद्धीला सहजच वाटतें. जड व चैतन्य या दोहोंमध्यें प्राणादि कोणतेच दुवे नसतां त्यांचें अभिन्नत्त्व प्रतिपादणें, त्यांच्यापैकीं कोणतीही एक वस्तु दुसरीचें प्रतिनिधित्व करूं शकतें असें म्हणणें, ही कल्पना-प्रिय विचारशील मनाची कृत्रिम सृष्टि आहे व ती अनुभवप्रतिष्ठित तर्काला विरुद्ध असून केवळ तर्कशून्य, अंत:साक्षात्कारवादालाच मान्य होण्यासारखी व निर्माण करतां येण्यासारखी आहे.
विशुद्ध ज्ञानस्वरूप चैतन्य हें एक तत्त्व, आणि ज्ञानशून्य जड यंत्र-सदृश वस्तु किंवा शक्ति हें दुसरें तत्त्व; दुसऱ्याचें नांव निसर्ग व पहिल्याचें नांव ईश्वर किंवा आत्मा, या प्रकारची विश्वव्यवस्थेची मांडणी
पान क्र. १२
आम्हीं केली तर, त्या मांडणीचा अनिवार्य परिणाम ईश्वराला नकार देणें हा एक होईल, किंवा निसर्गाला अमान्य करून तिकडून तोंड फिरवणें, निसर्गनिवृत्त होणें हा होईल. वरील मांडणी मान्य केली असतां प्राण आणि मन, प्राणमय जीव आणि विचारशील मन या दोहोंनाहि, ईश्वर किंवा निसर्ग या दोहोंपैकीं कांहींतरी एक मानून दुसऱ्या तत्त्वाला नकार द्यावा लागेल; या प्रकारची निवड करणें हें त्याला अटळ होईल. मग ईश्वर हा कल्पनाजनित भ्रमरूप आहे असेंच विचारशील मन मानूं लागेल अथवा उलटपक्षीं निसर्ग हा इंद्रियांनीं निर्माण केलेंला भ्रम आहे असें तें मानील; त्याचप्रमाणें प्राण किंवा प्राणमय जीव जडेतर चैतन्यावर, दृष्टि स्थिर करून स्वतःचें जीवन जगणें तिरस्करणीय समजून सोडून देईल किंवा ईश्वराच्या चिंतनांत आत्मविस्मृति घडून आनंदातिशयाचा अनुभव मिळाल्यानें त्या आनंदासाठीं स्वतःचें स्वाभाविक जीवन टाकून देईल. दुसऱ्या पक्षीं तो आपलें अमृतत्व नाकारून ईश्वरापासून दूर, विरुद्ध दिशेला जाऊन आपलें जीवन पशुजीवनाप्रमाणें जगूं लागेल. सांख्यांची पुरुष आणि प्रकृति ही जोडी घ्या. यांत पुरुष हा ज्ञानमय निष्क्रिय असा आत्मा आहे, आणि प्रकृति ही ज्ञानशून्य क्रिया करणारी शक्ति आहे; या दोहोमध्यें दोघांना सारखी अशी एकहि गोष्ट नाहीं. दोघांची स्वयंप्रवृत्तिशून्यतादेखील दोन विरुद्ध प्रकारची; स्वयंप्रवृत्तिशून्य आत्मा निष्क्रिय तर निष्क्रियच राहणार, स्वयंप्रवृत्तिशून्य प्रकृति सक्रिय तर सक्रियच राहणार. अशा उभय तत्त्वांचा अन्योन्य विरोध दूर व्हावयाचा कसा ? प्रकृति थकून थांबली म्हणजेच हा विरोध दूर होतो. ज्ञानमय शांतीचा, निष्क्रिय शांतीचा अखंड उपभोग घेतांना आत्मा थकत नाहीं. आत्म्याला अनेक सोंगेंढोंगें एकामागून एक अखंडपणें दाखवीत प्रकृति यंत्राप्रमाणें सारखी भिरभिरत असतां, आत्म्यावर या प्रदर्शनाचा कांहींहि परिणाम न घडल्यानें, प्रकृति शेवटीं थकून थांबतें. याप्रमाणें प्रकृतिपुरुषांचा विरोध संपून पुरुष विजयी होतो. शंकराचार्यांचा 'आत्मा' हा एकच एक, अवाक् आणि अकर्ता आहे व त्यांची 'माया' ही बहुत्वाचा पसारा घातलेंली नामरूपमय आहे. येथेंहि पुरुष व प्रकृतिप्रमाणें दोन विसंवादी, अनिवार्यपणें विरोधी वस्तूंची ब्रह्म व माया ही जोडी विश्वव्यवस्थेचा पाया म्हणून घेतलेंली आहे. प्रकृति-पुरुष-विरोधाप्रमाणें या जोडीचा कट्टर अन्योन्य विरोध, मायेचा निरास होऊन (तिचा नामरूपाचा पसारा मिथ्या आहे, भ्रमरूप आहे असा निर्णय केल्यानें
पान क्र. १३
तिचा निरास होऊन) केवळ आत्म्याचा एकमेव शाश्वत, शांत, सत्य असा अनुभव येऊन थांबतो. मायेचा निरास करून शंकराचार्यांचा आत्मा विजयी होतो तर प्रकृतीची निराशा करून सांख्यांचा पुरुष विजयी होतो.
चैतन्यवाद्यांपेक्षां जडवाद्यांचें काम सोपें असतें. 'चैतन्यवस्तु नाहीं' असा चैतन्याला नकार देऊन, मनाला सहज पटणारा व पटविणारा सोपा युक्तिवाद करून जडवाद्यांना जडद्रव्याचें किंवा जडशक्तीचें खरेंखुरें अद्वैत पटवून घेतां येतें; तसेंच पटवून देतां येतें. चैतन्यवाद्यांना चैतन्य-अद्वैत इतक्या सुलभतेनें स्वत:ला व इतरांना पटवितां येत नाहीं. तथापि 'चैतन्य नाहींच,' केवळ जडच आहे, असें आपलें आग्रही प्रतिपादन कायमचें टिकवून धरणें जडवाद्यांना अशक्य होऊन जातें, विश्वापलीकडे दूर निष्क्रिय असें अज्ञेय कांहींतरी आहे अशा निर्णयावरच शेवटीं ते येतात. जसा शंकराचार्यांचा शांत आत्मा, सांख्यांचा निष्क्रिय पुरुष, तद्वतच जडवाद्यांचें हें 'अज्ञेय' तत्त्व. जडच सर्व कांहीं आहे ही कल्पना विचारशील बुद्धीला पटत नाहीं; बुद्धीच्या स्वाभाविक मागण्या जडवाद्याला सतावून सोडतात. अशा परिस्थितींत बुद्धीची समजूत काढून तिला तात्पुरती स्वस्थ बसविण्यासाठीं अज्ञेयाची स्पष्टार्थहीन कल्पना जडवाद्यांना उपयोगी पडते. जडाच्या पलीकडे संशोधनाचें क्षेत्र वाढवणें जडवाद्यांना टाळावयाचें असतें; व ही टाळाटाळी साधण्यासाठीं जडापाठीमागें कांहीं आहे, पण तें अज्ञेय आहे, अशी सबब ते काढतात.
विश्वाची व्यवस्था सांगतांना अन्योन्य विरोधक वस्तूंची एकत्र मोट बांधली जाते व त्यांतून कांहींच फलनिष्पत्ति होत नाहीं. म्हणून मानवी बुद्धीला या खटाटोपांत समाधान लाभत नाहीं. अंतर्बाह्य विश्वांत ज्या वस्तू आहेत, त्या सर्व सत्य आहेत, असें म्हणणाऱ्या पूर्ण अस्तिकवादांत मानवी बुद्धीला खरें समाधान लाभतें व म्हणून ती अशा पूर्ण अस्तिकवादाकडे झुकत असते. विश्वांतील सर्व वस्तूंचा भासमान विरोध व विसंवाद मिटवून, त्यांमध्यें सुस्पष्ट सुसंवाद निर्माण करण्यानेंच बुद्धीला अवश्य असणारा पूर्ण अस्तिकवाद शक्य होतो. हा सुसंवाद किंवा समन्वय सिद्ध करण्यासाठीं मानवी बुद्धीला मानवाच्या आंतरिक जाणिवेनें ठरविलेंल्या ज्ञानविकासाच्या पायऱ्या क्रमाक्रमानें चढाव्या लागतात; जड द्रव्याला जी बाह्य पृथक्करण पद्धति लावली जाते, ती प्राण व मन यांना लावून अथवा आंतर, आत्मगत संयोगीकरण व अंत:प्रकाशमंथन करून बुद्धीला आपलें इष्ट साधावें लागतें. हें इष्ट म्हणजे अगदीं अंतिम एकमेवाद्वितीयाची अचल शांति आणि त्या एकाच्या अंत-
पान क्र. १४
रंगाचे दर्शन घडविणारी त्याची अनेकता-निर्मायक व अनेकता-व्यापक शक्ति, या दोन गोष्टींची सारख्याच प्रमाणांत सत्यत्व सिद्धि. ही सत्यत्वसिद्धि साधली म्हणजे सर्व सुसंवाद सुगम होतो आणि त्यायोगें बुद्धीला अचल समाधान देणारा पूर्ण आस्तिकवाद शक्य होतो. असा समग्र सार्वत्रिक अस्तित्ववाद किंवा सर्वसत्यत्ववाद सिद्ध झाला म्हणजे अस्तित्वांतील दर्शनीं अन्योन्यविरोधी नानाकारधारी निसर्गदत्त गोष्टी एकमेकींशीं सुसंवादी करतां येतात, आणि आमच्या विचार व जीवन यांच्या प्रवाहाचें, नियमन करणाऱ्या नानाविध परस्परविरोधी शक्तींचा उगम कोणत्या मध्यवर्ति सत्यांत आहे व कोणत्या मध्यवर्ति सत्याचे हेतू नानाप्रकारें पूर्ण करण्याची कामगिरी करण्याकरितां त्यांचा येथें, त्या सत्याचे प्रतिनिधि म्हणून, अवतार झालेंला आहे या गोष्टीचा शोध त्यांच्या सहाय्यानें आपणांस लागतो. हें घडून आलें म्हणजे आमच्या विचाराला खरा मध्यवर्ति केंद्रबिंदु सांपडल्यानें त्याचें फेऱ्यामागें फेरें घेत घेत वृथा भ्रमन्ति करीत रहाणें थांबतें आणि तो उपनिषदीय ब्रह्माप्रमाणें काम करतो; अर्थात् ब्रह्माप्रमाणें सगळया विश्वांत दौरा करण्याचा खेळ खेळत असतां तो आपल्या मध्यवर्ति नितांत निश्चल उगमस्थानाला धरून निश्चल स्थिर असतो; तसेंच आपला प्राण किंवा प्राणमय जीवन, आपलें ध्येय ओळखून त्या ध्येयाची, केंद्रवर्ति सत्याची सेवा शांत आणि स्थिर आनंदानें व जाणिवेनें करीत राहतें आणि केव्हां कमी, केव्हां अधिक जोमानें व तालबद्धतेनें काम करणाऱ्या आपल्या शक्तीचाही ध्येयाच्या सेवेंत उपयोग करतें.
परंतु कोणत्याहि कारणानें विचाराचा आणि जीवनाचा, केंद्रसत्याच्या आश्रयानें चाललेंला सुसंवादी संसार, विसंवादमय होऊं लागला म्हणजे दर्शनीं विरोधी वस्तूंची वेगवेगळी परीक्षा घेऊन पाहणें मानवी बुद्धीला अवश्य असतें व उपकारकहि असतें. अशी परीक्षा केल्यानें मानवी बुद्धि पूर्वींपेक्षा अधिक दृढपणें त्या दोन वस्तूंच्या वास्तविक सुसंवादित्वाचा निर्णय पुन्हा आपलासा करतें. जडापासून परीक्षेला सुरुवात करतां येईल. जडच केवळ (जडद्रव्य किंवा जडशक्ति) सत्य आहे, ही मनाची बैठक कायम राहूं शकत नाहीं. त्याचे पाठीमागें कांहीं अज्ञेय आहे अशी मनाची समजूत काढावीच लागते, हें प्रत्ययास आलें म्हणजे पुढें जाऊन प्राणशक्ति, संवेदनाशक्ति, कल्पनाशक्ति यांची परीक्षा करितां येईल. जडापासून दुसऱ्या टोंकाला, चैतन्याला, जातांना मध्यें जाणिवेच्या विकासाचे प्राणादि टप्पे लागतात. त्यांचीहि जडाप्रमाणें परीक्षा करणें
पान क्र. १५
योग्य आहे. सर्व अंतर्बाह्य वस्तू, जडाची रूपें आहेत, या सिद्धान्ताची परीक्षा झाल्यावर सर्व अंतर्बाह्य वस्तू मूळ प्राणशक्तीची, मूळ संवेदनांची, मूळ कल्पनांची रूपें आहेत या सिद्धान्ताचा परामर्श घ्यावा. या एकांगी सिद्धांतांवर अवास्तवतेची छाया नेहमीच दिसते व ते सिद्धांत अवास्तव आहेत हें पटावयास फार वेळ लागत नाहीं. तर्कनिष्ठ बुद्धीला थोडा काळ ते बरे वाटतील, कारण तिचा व्यवसाय प्रत्यक्षातीत शुद्ध कल्पनांचा विचार करण्याचा असतो. पण प्रत्यक्षाचें, वास्तवाचें ज्ञान व ओढ असलेंल्या मनाला ते सिद्धांत समाधान देऊं शकत नाहींत. मनाला ही अनुभूति असतें कीं, त्याच्या पाठीमागें कांहीं आहे व तें कल्पनेच्या स्वरूपाचें नाहीं; तसेंच त्याला हेंहि कळतें कीं, त्याच्या आंत जें कांहीं आहे तें प्राणवायूहून वेगळें आहे, त्याच्याहून अधिक आहे. चैतन्य किंवा जड या वस्तु मनाला अंतिम सत्यासारख्या कांहीं काळ तरी वाटतात, परंतु या दोन टोंकामधील तत्त्वांचे तसें नाहीं. म्हणून बुद्धि अगोदर चैतन्य किंवा जड या टोंकाकडील वस्तूंची चिकित्सा करून नंतर मधील तत्त्वांचा परामर्श घेते. तिला असें करणें तिच्या स्वभावानुसार अपरिहार्य असते आणि असें करण्यानेंच तिची चिकित्सा लाभदायक होते. दोन सहकाऱ्यांच्या आधारानें बुद्धि आपलें काम करते. बाह्याचें किंवा आंतलें ज्ञान करून देणारा इंद्रियगण, हा एक सहकारी, व दुसरी सहकारी शक्ति म्हणजे वाणी. इंद्रियांना सगळें अस्तित्व ज्ञात होत नाहीं; अस्तित्वाचे वेगळे अंश तीं स्पष्टपणें जाणूं शकतात. तसेंच वाणी किंवा शब्दशक्ति इंद्रियगोचर वस्तूंचें काळजीपूर्वक वर्गीकरण करून त्यांच्या मर्यादा ठरविते, तेव्हांच तिचें त्या वस्तूंचें नामकरण स्पष्टतेनें युक्त होतें. या अशा दोन अंशदर्शी सहकाऱ्यांच्या सहाय्यानें काम करणाऱ्या बुद्धीला महान् तत्त्वभूत वस्तूंचा पसारा समोर दिसला आणि त्या अनेकतेंतून तिला एकता साधावयाची असली म्हणजे स्वभावतःच ती त्या समोर असणाऱ्या वस्तूंपैकींच एक वस्तु मूलभूत ठरवून बाकी वस्तू कशातरी दडपादडपीनें तिच्या पोटांत घालून मोकळी होते; किंवा एक सत्य ठरवून बाकी जबरदस्तीनें भ्रमरूप ठरवून टाकते. ही अशी ''प्रवेशबंदी''ची पद्धति उपयोगांत न आणतां अनेक तत्त्वांच्या एकतेचे, एकात्मतेचें खरें मूळ बुद्धीला तेव्हांच दिसूं शकेल, जेव्हां ती स्वत:च्या वर चढून जाईल (अर्थात् स्वत:पेक्षां श्रेष्ठ असलेंल्या जाणिवेच्या दृष्टीनें पाहील) किंवा सर्व चिकित्साचक्र फिरून संपवील. असें केलें म्हणजे तिच्या असें अनुभवास येईल कीं,
पान क्र. १६
जडापासून चैतन्यापर्यंतचीं, निसर्गापासून ईश्वरापर्यंतचीं विश्वसंसारांतील सर्व तत्त्वें, एका अनिर्वचनीय अव्याख्येय अर्थात्, तिला अज्ञेय परंतु मानवाला प्राप्त होण्यासारख्या, एका परम सत्याचीं वास्तव रूपें आहेत. कोणत्याहि मार्गानें आपण विचारप्रवास केला तर शेवटीं या अनिवर्चनीय, अज्ञेय परंतु अप्राप्य नसलेंल्या सत्याला आपण पोंचतो. आपण प्रवास मध्येंच थांबविला तर मात्र या सत्याची आपली भेट होत नाहीं.
तेव्हां ही चांगली शुभसूचक गोष्ट आहे कीं, अनेक प्रयोग व शाब्दिक निर्णयानंतर आमच्या पुढें दोनच कोटि उभ्या राहतात; जड ही एक कोटि, चैतन्य ही दुसरी कोटि; अनुभवाच्या कठीण परीक्षेंत प्राण, मन इत्यादि इतर कोटींपेक्षां या दोन टोंकांच्या दोन कोटि, उत्तम प्रकारें निभावून बराच काळ टिकून राहिल्या आहेत; आणि अनुभवाचा मार्ग क्रमतां क्रमतां शेवटीं या दोन कोटींचा परिणाम म्हणून जो मानवाच्या अनुभवाला आला आहे, तो त्याच्या स्वाभाविक, सार्वत्रिक, जन्मजात भावनेला समाधानकारक किंवा योग्य वाटत नाहीं. मानवजातीची जन्मजात सार्वत्रिक भावना किंवा भाव हाच विश्वव्यापक सारभूत सत्याचें प्रतिनिधित्व करणारा आणि गुप्त राहून पारख करणारा, संभाळणारा, मानवजातीचा खरा मित्र असल्यानें, त्यानें दिलेंला निर्णय हा आम्ही शुभसूचक मानतो. युरोपांत जडवाद्यांचा नकार आणि हिंदुस्थानांत संन्यासवाद्यांचा नकार प्रभावी आहे. आमचेच काय तें खरें असें ते दोघे आपापल्या क्षेत्रांत म्हणत आलें आहेत, आणि त्या त्या क्षेत्रांतील जीवनविषयक कल्पनेवर व जीवनसरणीवर तेथील प्रभावी तत्त्वज्ञानाचा रंग प्रामुख्यानें चढलेंला आहे. हिंदुस्थानांत संन्यासवादी तत्त्वज्ञानाच्या प्रभावामुळें आध्यात्मिक संपत्ति - सर्व प्रकारची नाहीं तरी निदान कांहीं प्रकारची - खूप सांठली आहे, पण भौतिक जीवन पहावें तर त्याचें मोठ्या प्रमाणावर दिवाळें निघालें आहे. युरोपांत भौतिक संपत्ति भरपूर आहे. या जगांतील मुलुख आणि सत्ता यूरोपनें झगडून यशस्वितेनें आत्मसात् केली आहे, पण युरोपांत आध्यात्मिक गोष्टींचें दिवाळें - हिंदुस्तानाप्रमाणेंच मोठें दिवाळें - निघण्यास याच संपत्तीचा व सत्तेचा वाढता प्रपंच, कारणीभूत झाला आहे; आणि ज्या तत्त्वज्ञानानें हें घडून आलें आहे तें जडवादी तत्त्वज्ञानहि आतां यूरोपीय बुद्धीला समाधानकारक वाटेनासें झालें आहे.
या घटनांचा परिणाम म्हणून आतां अशी वेळ आलेंली आहे कीं, जगाचा कल प्रस्तुत जडवादी किंवा चैतन्यवादी एकांगी सिद्धान्ताला
पान क्र. १७
प्रतिकूल व प्राणमन आदि मधील टप्प्यांसुद्धां जड आणि चैतन्य दोघांनाहि सामावून घेणारा सर्वांगीण नवा सिद्धांत पटवून घेण्याला अनुकूल होत आहे. मानवाचे विचार व आंतरिक आणि बाह्य अनुभव या सर्वांना हा नवा सर्वसमावेशक सिद्धांत, स्थान देतो आणि या सिद्धान्ताचा उपसिद्धांत असा होतो कीं, मानवाचें वैयक्तिक व वांशिक जीवन सर्वांगपूर्ण, पूर्वीं कधीं नव्हतें इतकें संपन्न, कृतार्थ व आत्मतृप्तिसाधक बनविणें, हेंच मानवाला योग्य आहे.
चैतन्य आणि जड दोन्ही वस्तू एका 'अज्ञेयाच्या' प्रतिनिधिरूप आहेत, हें अज्ञेय तत्त्व, दोघांचेंही मूळ आहे, पण अज्ञेयाशीं या दोघांचें नातें सारखें नाहीं, भिन्न आहे. या नात्याच्या किंवा संबंधाच्या भिन्नतेमुळें, जडवादी नकार आणि संन्यासवादी किंवा चैतन्यवादी नकार, यांच्या परिणामकारकतेंत फरक पडतो. चैतन्यवादी नकाराहून जडवादी नकार, अधिक आग्रही असतो व तात्पुरतें यशहि त्याला अधिक लाभतें ; तसेंच सामान्य मानवतेला हा नकार पटविणें अधिक सोपें असतें -- तथापि हा नकार टिकाऊपणांत कमी पडतो, त्याचा अंतिम परिणाम कमी दिसून येतो. संन्यासवाद्यांचा चैतन्यवादी नकार, अधिक टिकाऊ, अधिक परिणामकारी, मनाला व्यापून टाकणारा आणि भयकारक धोक्याचा असतो. जडवादी नकार, कमी टिकाऊ व कमी परिणामकारक असण्याचें कारण असें कीं, या नकारावरचा उतारा देखील त्याच्या अंतरांतच असतो. या नकाराचा अत्यंत प्रभावी व मोठा भाग म्हणजे अज्ञेयवाद. जें कांहीं दिसत आहे त्याच्या पाठीमागें अज्ञेय असें कांहीं आहे, असें प्रतिपादन करून या अज्ञेयाच्या मर्यादा वाढवीत वाढवीत, आज जें अज्ञात आहे तें सर्व नित्य अज्ञेय रहाणार, असें हा वाद म्हणावयास लागतो. त्याचा या सिद्धान्ताला आधारभूत पक्ष असा आहे कीं, भौतिक इंद्रियें एवढीच काय तीं आपलीं ज्ञानसाधनें आहेत; म्हणून तर्कबुद्धि कितीहि जोरदार आणि दूरवर भराऱ्या मारूं इच्छीत असली, तरी या भौतिक इंद्रियांच्या क्षेत्राबाहेर तिला जातां येणार नाहीं; या इंद्रियांनीं पुरविलेंल्या किंवा सूचित केलेंल्या गोष्टींवरच बुद्धीनें आपली कसरत नेहमीं करावयास हवी; इंद्रियसूचित गोष्टीहि इंद्रियांशीं, इंद्रियप्रत्यक्षांशीं नेहमीं बांधून टाकलेंल्या असल्या पाहिजेत; इंद्रियसूचित गोष्टींच्या आधारानें इंद्रियप्रत्यक्षाचा मुलुख आम्ही मागें टाकता कामा नये; इंद्रियप्रत्यक्षसूचित गोष्टींचा सेतु बांधून, आम्हीं इंद्रियातीत क्षेत्रांत पाऊल टाकण्याचें धाडस करूं नये;
पान क्र. १८
या इंद्रियातीत क्षेत्रांत ज्ञानसाधनें अधिक समर्थ आणि कमी मर्यादाबद्ध असतात आणि तपासणीचा प्रकारहि तेथें वेगळा असून त्याचा त्या क्षेत्रांत उपयोग करावा लागतो म्हणून अशा क्षेत्रांत प्रत्यक्षाश्रित अज्ञेयवादानें जातां कामा नये.
भौतिक इंद्रियांशिवाय वेगळी ज्ञानसाधनें नाकबूल करणारा हा पक्ष अगदींच लहरी असून त्याची व्याप्ति अपुरी आहे, त्याचें विधान वस्तुस्थितीला पुरतेपणीं लक्षांत घेणारें नाहीं, म्हणून तो त्याज्य आहे, असें साहजिकपणेंच म्हणावें लागतें. या पक्षाला चिकटून रहावयाचें तर त्याला एकच मार्ग आहे आणि तो असा कीं, या विधानाला विरोधी असणारा पुरावा आणि अनुभव विस्तृत क्षेत्र व्यापणारा असतांहि, त्याची कशीतरी वासलात लावावयाची किंवा त्याकडे पाठ फिरवावयाची; इंद्रियप्रत्यक्ष नसलेंल्या अनेक उदात्त आणि उपयुक्त शक्ती आमच्यामध्यें आहेत, या शक्ती जाणीवपूर्वक काम करीत आहेत, किंवा कमी अधिक नेणिवेनें काम करीत आहेत, अथवा निदान सुप्तस्थितींत तरी आम्हां सर्वांमध्यें आहेत. इंद्रियप्रत्यक्षपक्षाला चिकटून राहिलें तर या सर्व शक्ती आम्हाला अमान्य तरी कराव्या लागतील किंवा त्यांचें महत्त्व कमी मानावें लागेल; त्याचप्रमाणें भौतिकाच्या पलीकडील घटनांचें संशोधन, परीक्षण करणें बहुतांशानें आम्हाला सोडून द्यावें लागेल; फक्त अशा अतिभौतिक घटनांचें परीक्षण आम्हाला करतां येईल कीं, ज्या घटनांचा जडाशीं संबंध आला आहे, जडाच्या संसर्गानें वा जडाच्या हालचालीच्या संसर्गानें, ज्या अनुभवास आल्या आहेत आणि जड शक्तींचें एक गौण कार्य, अशी ज्या घटनांच्या संबंधानें आमची निश्चित कल्पना झाली आहे. मनाचे आणि अतिमनाचे व्यवहार हें जडाचे गौण आनुषंगिक कार्य आहेत हा पूर्वग्रह टाकून देऊन, त्या व्यवहारांचें निरीक्षण-परीक्षण स्वतंत्रपणें आपण करूं लागलों म्हणजे अशा घटनांचा मोठा पसारा आपल्यासमोर उभा राहतो कीं, जो जडवाद्यांच्या आग्रही संकुचित सूत्राच्या घट्ट पकडींतून सर्वथा पार निसटून जातो. इंद्रियांच्या क्षेत्रापलीकडे ज्ञान होण्यासारख्या सत्यांचीं अनेक जगतें आहेत, ज्या शक्तींवर भौतिक इंद्रियांची निर्णायक सत्ता नसून, भौतिक इंद्रियांवरच ज्यांची सत्ता आहे, अशा शक्ती मानवामध्यें आहेत; आणि मानवाच्या खऱ्या पूर्ण अस्तित्वाचें बाह्य कवच असलेंल्या इंद्रियप्रत्यक्ष जगाशीं संबंध ठेवण्यासाठींच फक्त त्या शक्ति भौतिक इंद्रियांचा उपयोग करतात. या गोष्टी आमच्या वाढत्या अनुभवामुळें आम्हांला मान्य कराव्या लागतात.
पान क्र. १९
हा अनुभव आम्हाला आला कीं भौतिक अज्ञेयवादाचा सिद्धांत सत्यसृष्टींतून तत्काल नाहींसा होतो; त्यापेक्षां व्यापक सिद्धांत मांडावयास, व सारखी वाढती शक्ति-चिकित्सा करावयास आम्ही मोकळे होतो.
याप्रमाणें बुद्धिनिष्ठ भौतिकवादाच्या (जडवादाच्या) चक्रांत मानवता मधूनमधून थोडा थोडा काळ फेरे घालीत आली आहे. तरीपण या कालखंडांचा मानवाला अतिशय उपयोग झालेंला असून या अल्पकालीन भौतिकवादाची मानवाला फार आवश्यकता होती, हें मान्य करणें आपलें पहिलें कर्तव्य आहे. कारण, नव्या अनुभवांचे व पुराव्यांचें जें अफाट क्षेत्र, आपलें कांहीं काळ बंद राहिलेले दरवाजे आमच्यासाठीं, अलीकडे पुन: उघडीत आहे, त्या क्षेत्रांत सुरक्षितपणें पाऊल टाकावयाचें तर मानवाच्या बुद्धीला कडक शिस्त लागून ती अतिशय सरळ, स्वच्छ, व कुशाग्र व्हावयास हवी. या क्षेत्रांत अपरिपक्व मनाच्या लोकांनीं प्रवेश केला तर, तेथील अनुभवांनीं, फार अनिष्ट अशा, दिशाभूल करणाऱ्या कल्पना या लोकांच्या डोक्यांत निर्माण होण्याचा संभव असतो. पूर्वकाळीं असें खरोखर घडलेलें आहे. या क्षेत्रांत अनुभवलेलें वास्तव सत्य पोटांत आणि त्यावरील कवच सत्याचा विपर्यास करणाऱ्या वेडगळ भ्रमांचें, निर्बुद्ध श्रद्धांचे, असें पूर्वीं अनेकदां घडलेलें आहे, व त्यामुळें सत्यज्ञानाची वाढ अशक्य होऊन ती थबकलेली आहे. असें घडल्यानेंच, तें खरोखरीचें सत्य आणि त्यावर चढलेला भ्रमांचा मुखवटा, दोन्ही थोडा काळ तरी उचलून दूर फेंकून द्यावींत आणि सत्यशोधनाला पुन: आरंभ करून सत्यज्ञानाची वाढ खात्रीनें होईल असा प्रयत्न करण्याला, संशोधनाचा मार्ग मोकळा करावा, हें अवश्य होऊन बसलें. जडवादांत जी बुद्धिनिष्ठा आहे, तिनें वरीलप्रमाणें सत्यशोधनाचा मार्ग मोकळा करून मानवजातीची फार मोठी सेवा केली आहे.
इंद्रियांच्या क्षेत्राबाहेर असणाऱ्या गोष्टींचें ज्ञान देणाऱ्या ज्या इंद्रियापलीकडील शक्ती मानवांत आहेत, त्यांना जड देहाच्या जड द्रव्यांत बसवून, त्या देहांत त्या जड देहाच्या द्वारां काम करावयाचें व्रत दिलें असल्यानें आणि भावनामय वासना, नाडीगत प्रेरणा यांजबरोबर त्यांना एकच संसारगाडा ओढावयास जुंपलें असल्यानें, त्यांचें कार्य अलगपणें, स्वतंत्रपणें होऊं शकत नाहीं, दुसऱ्या शक्तींचें कार्य व त्यांचें कार्य मिसळलें जातें आणि त्यायोगें त्यांच्याकडून एखाद्या सत्याचें सुस्पष्ट ज्ञान होण्याऐवजीं, सत्य आणि मिथ्या याचा अनाकलनीय गोंधळ मात्र संवर्धित होण्याचा
पान क्र. २०
धोका उत्पन्न होतो. ज्यांच्या मनाला कसलीच शिस्त लागलेली नाहीं, ज्यांच्या वासनांतील, विकारांतील मलिनता मुळींच दूर झालेली नाहीं, अशा लोकांनीं आध्यात्मिक अनुभवाच्या उच्च क्षेत्रांत चढून जाण्याचा यत्न केला तर वरील भिन्न शक्तींच्या कार्यांची भेसळ, विशेष धोक्याची होण्याचा संभव असतो. अशा लोकांनीं हे अविचारी अकालीं साहस केलें, आपली पूर्वतयारी नसतां उच्च आध्यात्मिक क्षेत्रांत प्रवेश करण्याचें धाडस केलें, म्हणजे त्यांचा जो गोंधळ उडतो त्याला सीमा नाहीं; दिखाऊ ढग, धूसर अर्धवट तेजाचें धुकें, अथवा गडद अंधार भरलेल्या प्रदेशांत जणुं ते जाऊन पडतात. त्या प्रदेशांत मधून मधून वीज चमकून जावी, तसें प्रकाशाचे-सत्याचे, क्षणिक अनुभव त्यांना येतात, त्यांच्यामुळें त्यांना खरें ज्ञान होण्याऐवजीं त्यांच्या अंधपणांत, अज्ञानांत अधिक भर पडते ! असें हें साहस करणें टाळण्यासारखें मात्र नसतें. निसर्गरूप प्रकृति, आपला विकास करून घेण्याचा जो मार्ग स्वेच्छेनें पसंत करते, त्या मार्गांत वरील प्रकारचें साहस हा एक अटळ भाग आहे. कारण विकासाचें गंभीर कार्य करीत असतां, तिला स्वत:ची करमणूक करून घेण्याचीहि लहर येते व वरील साहसांत तिची करमणूक होते. तें कसेंहि असलें तरी, मानवी बुद्धीच्या दृष्टीनें असल्या साहसाला अवेळीं केलेलें अविचारी साहस असेंच नांव द्यावें लागतें.
अविचारी साहसाच्या वरील कहाणीवरून हें लक्षांत येईल कीं, वाढतीं नवीन नवीन अतिभौतिक क्षेत्रें पायाखालीं घालीत जाणाऱ्या ज्ञानाचा पाया, स्वच्छ, शुद्ध व शिस्तीच्या बुद्धीचा असणें आवश्यक आहे. त्याचप्रमाणें हेंहि आवश्यक आहे कीं, या बुद्धीनें वेळोवेळीं इंद्रियप्रत्यक्ष घटना, भौतिक विश्वांतील दृश्य स्पर्श्य सत्य वस्तु यांजकडे वळून, त्यांच्या सत्यनिर्णायक नियंत्रणेच्या आधारानें, आपल्याकडून घडलेल्या किंवा घडूं पाहणाऱ्या प्रमादांचें संशोधन व शोधन करावें. मानव हा पृथ्वीचें अपत्य आहे. त्याला पृथ्वीचा स्पर्श, नेहमींच नवीन जोम, नवीन उत्साह देऊं शकतो. अतिपार्थिव ज्ञान मिळविण्याच्या मागें तो लागला असला तरी, पार्थिवाचा पाठिंबा त्याच्या उत्साहांत भर घालून त्याला ती ज्ञानप्राप्ति सुलभ करून देईल. असें देखील म्हणतां येतें कीं, अतिभौतिक क्षेत्र, वास्तवतेनें पूर्णपणें आपलेंसें करण्यासाठीं, (या क्षेत्राची उंच उंच ठिकाणेंहि मानवाच्या केव्हांहि आवांक्यांत येण्यासारखीं आहेत) भौतिकावर आपण आपलें पाय घट्ट रोंवलेले असावेत. उपनिषदांत असें म्हटलें आहे कीं,
पान क्र. २१
पृथ्वी त्याच्या - विराट् पुरुषाच्या - पायांचे ठिकाणीं आहे. विश्वांत व्यक्त होणाऱ्या चैतन्याचें स्वरूप वर्णन करतांना, उपनिषदांत वरील प्रकारचें विधान येतें (पहा. मुंडकोपनिषद् २ - १ - ४ ''पद्भ्याम् पृथिवी,'' बृहदारण्यक उपनिषद् १ - १ - १ ''पृथिवी पाजस्यम्'') आणि ही गोष्ट खरी आहे कीं, भौतिक विश्वाचें आपलें ज्ञान आपण जितकें अधिक विस्तृत व अधिक संशयातीत करूं, तितका श्रेष्ठतर अतिभौतिक ज्ञानासाठीं आपला पाया अधिक विस्तृत, अधिक मजबूत होतो; इतकेंच नव्हे तर श्रेष्ठतम ज्ञानाचा, ब्रह्मविद्येचा पाया म्हणून देखील, हा भौतिकाचा सुदृढ पाया उपयोगी पडतो.
तेव्हां, मानवी ज्ञानाच्या जडवादप्रधान विचारसरणीचा व तत्प्रधान कालखंडाचा निरोप घेतांना आपण फार काळजीपूर्वक एक गोष्ट केली पाहिजे. ती ही कीं, त्याचा अविचारानें सर्वस्वीं धिक्कार न करतां त्यांत उपलब्ध झालेल्या उपयुक्त गोष्टींपैकीं एकहि गोष्ट आपण हलगर्जीपणानें टाकून देतां कामा नये. असें आपण वागलों तरच नव्या अतिभौतिक क्षेत्रांत असें अनुभव आणि अशा शक्ती आपण मिळवूं शकूं कीं, ज्यांचें स्वरूप आम्हाला नीटपणें आकलन होईल, आणि ज्यांचा उपयोग आम्हाला निश्चितपणें करतां येऊन, ज्यांना जुन्या भौतिक अनुभवांच्या आणि शक्तींच्याप्रमाणें कामाला लावतां येईल. जडवादी युगांतील नास्तिक्यानें दिव्य शक्तीला उपयुक्त असें जें काम केलें आहे त्याला नांवें ठेवण्याऐवजीं त्याचा आपण कौतुकपूर्वक गौरव करावयास हवा. तसेंच त्या युगांतील अज्ञेयवादानें ज्ञानाच्याच अमर्याद वाढीसाठीं पूर्वतयारी करण्याचें जें विविध प्रकारचें काम केलें आहे त्याबद्दल आश्चर्य व आनंद वाटून त्याला धन्यवाद द्यावयास हवेत. सत्यसंशोधनांत घडलेला प्रमाद किंवा दोष हा सत्याचा मार्ग शोधून काढणारा सहाय्यक या नात्यानें आमच्या जगांत सारखें काम करीत आलेला आहे; कारण अर्धसत्य हेंच खरोखरीं प्रमादाचें खरें स्वरूप असतें; या अर्धसत्यरूप प्रमादाला अर्थातच फार मर्यादित कार्यक्षमता असल्यानें, कार्य करतांना अडखळल्यासारखें होतें; पुष्कळ वेळां प्रमाद हा पूर्ण सत्यानें घेतलेलें सोंग असतें -- त्या सत्याचें जें ध्येय असतें त्या ध्येयाप्रत कोणाच्या नकळत त्याला पोंचतां यावें असा या सोंगाचा हेतु असतो ! आपण जो महत्त्वाचा कालखंड मागें टाकीत आहों, त्या कालखंडात सत्यसंशोधनकार्यांत घडलेला प्रमाद हा अतिरेकी आत्मविश्वासानें धरलेल्या आडमार्गाच्या स्वरूपाचा नसून,
पान क्र. २२
अर्धसत्याच्या स्वरूपाचा होता; आपलें काम शिस्तीनें, सदसद्विवेकाला मान देऊन, सरळपणें करणारा आणि आपल्या मर्यादित कार्यक्षेत्रांत अवश्य त्या ज्ञानानें संपन्न असणारा, सत्याचा विश्वासू सहाय्यक असें त्याचें स्वरूप होतें. प्रमादाचें स्वरूप असेंच यापुढेंहि नेहमीं चालू राहील तर तें सत्यसंशोधनाला फार हिताचें होईल यांत संशय नाहीं.
सर्व ज्ञानाचें, सर्व ज्ञानशाखांतील ज्ञानाचें, ज्ञानाला सांपडणारें अंतिम सत्य एक प्रकारचा अज्ञेयवाद असतो. विश्वविषयक संशोधन करणाऱ्या कोणत्याहि ज्ञानशाखेच्या मार्गाचा शेवट आपण गांठला, म्हणजे विश्व हें एका अज्ञेय सत्याचें प्रतीकरूप आहे, त्या सत्याचें भासमान रूप आहे, असें आपल्या नजरेस येतें; त्या त्या ज्ञानशाखेनुसार या अज्ञेय सत्याला निरनिराळया मूल्यसंघाचें स्वरूप येतें; भौतिक, प्राणिक, संवेदनात्मक, बौद्धिक, ध्येयात्मक, आध्यात्मिक अशा अनेक प्रकारच्या मूल्यांचे संघ, अनेक प्रकारच्या ज्ञानशाखा, एका अज्ञेय सत्याचीं प्रतीकें, भासमान् रूपें म्हणून मानवापुढें ठेवतात. तें अज्ञेय सत्य आपल्याला जितक्या अधिक प्रमाणांत सत्य म्हणून प्रत्ययास येतें, तितक्याच अधिक प्रमाणांत तें, व्याख्येचें बंधन घालूं पाहणाऱ्या विचारापलीकडे व स्पष्ट सूत्रांचें बंधन घालूं पाहणाऱ्या शब्दापलीकडे असल्याचें, नेहमींच आपल्या अनुभवास येतें. ''मन तेथें पोंचत नाहीं, वाणीहि तेथें पोंचत नाहीं'' (केन १ - ३) असें आप्तवाक्य आहे. तथापि मायावादी जसें दृश्य पसाऱ्याच्या मिथ्यत्वाचें अतिरेकी प्रतिपादन करतात, त्याप्रमाणें अज्ञेयवादी अज्ञेय वस्तूच्या अज्ञेयत्वाचें अतिरेकी प्रतिपादन करण्याचा संभव आहे. म्हणून हें स्पष्ट करणें बरें कीं, आम्हीं 'अज्ञेय' हा शब्द जेव्हां सत्याला लावतो, तेव्हां त्याचा अर्थ खरोखर एवढाच असतो कीं, तें सत्य आमच्या बुद्धीच्या आणि वाणीच्या आवांक्यापलीकडचें आहे; कारण बुद्धि आणि वाणी हीं साधनें नेहमींच भेदप्रत्ययाला व भेददर्शक शब्दाला, व्याख्येला आपला वाटाड्या करून मार्गक्रमण करीत असतात; तथापि बुद्धीच्या, विचाराच्या आटोक्यांत न येणारें हें अज्ञेय सत्य, विशाल जाणिवेच्या महत्तम प्रयत्नानें प्राप्त होणाऱ्या अवस्थेंत, मानवाला लाभणारें आहे. ज्ञानाची एक प्रक्रिया तादात्म्याच्या रूपाची असते आणि या तादात्म्याच्या ज्ञानावस्थेंत, त्या अज्ञेयाचें उत्तरोत्तर ज्ञान होऊं शकतें, असें एका उच्च दृष्टीनें म्हणतां येतें. हें जें अज्ञेयाशीं तादात्म्य साधून मिळविलेलें अज्ञेयाचें ज्ञान, तें विचाराच्या आणि वाणीच्या द्वारां यशस्वी रीतीनें
पान क्र. २३
दुसऱ्यापुढें मांडतां येणार नाहीं, नव्हे तीं तादात्म्यस्थिति संपल्यावर स्वत:पुढें देखील विचार-वाणीद्वारां पुन्हां उभें करतां येत नाहीं हें खरें आहे; तथापि एकदां तें ज्ञान आपलें झालें म्हणजे, त्याचा परिणाम म्हणून, त्या परम सत्याचें स्वरूप व मूल्य, तें अज्ञेय असतां भासत होते त्यापेक्षां अगदीं वेगळें आमच्या प्रत्ययास येतें. त्याचीं जुनीं प्रतीकें, सर्व क्षेत्रांतील सर्व प्रतीकें, नव्या विश्वव्यापक जाणिवेनें भारलीं आणि भरलीं जाऊन वेगळींच बनतात, आमच्या आंतरिक अस्मितेंत क्रांति घडून येते आणि त्या क्रांतीच्या द्वारां आमचें बाह्य जीवनहि समूळ वेगळें बनतें. वर सांगितलेल्या तादात्म्याच्या या ज्ञानाखेरीज आणखी एक प्रकारचें ज्ञान आहे. या दुसऱ्या प्रकारच्या ज्ञानाच्या द्वारां, तें परम सत्य, आम्हाला असा अनुभव देतें कीं, दृश्य सृष्टींतील नामरूपें - नामरूपमय दृश्य-गोचर वस्तुजात हीं त्या सत्याचा खरोखरी बाह्य आविष्कार आहेत. सामान्य बुद्धीला हा सत्याचा आविष्कार, आविष्कार न भासतां, त्याला झांकून टाकणारा पडदा किंवा आवरण म्हणून प्रत्ययास येत असतो. दृश्याला सत्याचा आविष्कार म्हणून पाहणारी ही ज्ञानप्रक्रिया, सामान्य ज्ञानप्रक्रियेहून श्रेष्ठ आहे (अर्थात् ती श्रेष्ठतम ज्ञानप्रक्रिया नव्हे.) आणि ही श्रेष्ठ ज्ञानसरणि आपलीशी व्हावयास, जडवादी ज्ञानसूत्रांचा बांध उल्लंघून, प्राण, मन आणि अतिमन यांचीं वैशिष्ट्यपूर्ण - त्यांचे स्वभावधर्म विशिष्टतेनें दाखविणारीं - कार्यें आम्हीं तपासलीं पाहिजेत; जडाशीं त्यांचा सबंध घडविणाऱ्या, व जडाशीं जोडले जाण्याच्या हेतूनेंच होणाऱ्या, त्यांच्या दुय्यम हालचाली तपासून, दृश्याला सत्याचा आविष्कार म्हणून पाहणारी श्रेष्ठ ज्ञानावस्था आम्हाला लाभणार नाहीं.
तेव्हां, आज जें अज्ञात आहे, तें सदैव अज्ञेय आहे, हें म्हणणें चुकीचें आहे. (''तें ज्ञानाहून वेगळें आहे, तें अज्ञानाच्या वरतीं आहे.'' - केन उपनिषद् १. ३) जें सांप्रत आम्हास अज्ञात आहे, तें नेहमीं आम्हास अज्ञात राहणार, असें कांहीं नियतीचें सूत्र नाहीं; आम्हींच अज्ञानांत रहावयाचें पसंत केलें, आमचीं पहिलीवहिलीं मर्यादित ज्ञानसाधनें कवटाळून बसलों, तेथेंच कायमचा मुक्काम ठोकण्याचा हट्ट धरला, तर मात्र गोष्ट वेगळी. विश्वांत आहेत त्या सर्व गोष्टी ज्ञेय आहेत; आणि या ज्ञेय गोष्टींचा परामर्श घेऊं शकतील अशी अनुरूप ज्ञानसाधनें - ज्ञानशक्ती विश्वांत आहेत; मनुष्य हा विश्वाचीच लहानशी प्रतिमा आहे, आणि या प्रतिमारूप लहान विश्वांत, महान् विश्वांतील सर्व ज्ञानशक्ती नित्य उप-
पान क्र. २४
स्थित असून, एका विशिष्ट विकासावस्थेंत त्यांचें संवर्धन होणें क्रमप्राप्त असतें. अर्थात् हें क्रमप्राप्त संवर्धन मुळींच होऊं द्यावयाचें नाहीं, असें आम्ही मोठ्या यशस्वितेनें खुशाल ठरवूं शकतो; तसेंच, कांहीं ज्ञानशक्ती थोड्याफार वाढल्या असल्या तर, त्यांची ती वाढ अधिक होऊं न देणें, नव्हे, झालेंली वाढ अनुपयोगानें निरुपयोगी करून नाहींशी करणें, ही गोष्ट देखील आमच्या ताब्यांतील आहे व ती आम्ही करूं शकतो. तें कसेंहि असो, मुख्य मुद्दा हा कीं, जें जें ज्ञान म्हणून विश्वांत आहे, विश्वांत जें जें ज्ञान संभवनीय आहे, तें सर्व ज्ञान मानवाच्या आवाक्यांत आहे; आणि दुसरा मुद्दा हा कीं, मानवात आत्मज्ञानाची, आत्मानुभवाची निसर्गदत्त प्रेरणा आहे व ती अटळ, अनिवार्य असल्यानें, मानवी बुद्धीनें त्याच्या ज्ञानशक्ती एका निश्चित क्षेत्राच्या आंत डांबून ठेवण्याचा कितीहि अट्टाहास केला तरी, तो शेवटीं विफल होणार आहे, तो नेहमींच यशस्वी होऊं शकणारा नाहीं. आम्हीं जडद्रव्याची तपासणी करून त्यांतील गुप्त शक्तींचें ज्ञान प्राप्त करून घेतलें कीं, त्या जडाच्या चतुःसीमेंत वावरण्यांत ज्या ज्ञानाला आतांपावेतों सोईचें वाटत होतें तें ज्ञानच स्वत: ओरडून आम्हाला आदेश देईल, वेदांतील नियन्त्याप्रमाणें उद्घोष करून हांक देईल कीं, ''आतां मारा धांव, आणि दुसऱ्या क्षेत्रांतहि पुढें पुढें जाण्याचा विक्रम करा.'' (ऋग्वेद १ - ४ - ५)
भौतिक जीवनांत निर्बुद्धपणें संतोष मानण्यापलीकडे आधुनिक जडवादांत अधिक कांहीं नसतें तर, ज्ञानाची प्रगति किती काळपर्यंत दुरावली असती तें सांगता येत नाहीं. परंतु या जडवादाचा गाभाच मुळीं, ज्ञानाचा शोध करीत राहणें हा आहे आणि असें असल्यानें हा जडवाद अमुक ठिकाणीं ''थांबा पुरें आतां'' असें म्हणूं शकणार नाहीं. इंद्रियप्राप्त ज्ञान आणि त्यावर उभारलेली अनुमानांची इमारत, यांची मर्यादा या जडवादानें गांठली कीं, त्याची ज्ञानाची तृष्णा त्याला त्या मर्यादेच्या पलीकडे ओढून नेईल. दृश्य जगांतील ज्ञेयाला त्यानें किती त्वरित व किती निःसंदेहपणें आत्मसात् केलें आहे, हें आपण पाहत आहों. दृश्य जगाच्या पलीकडील जगांत पाऊल टाकल्यावर, जें कांहीं त्याच्या मार्गांत येईल, तें जिंकून आत्मसात् करण्याच्या कार्यांत, आजपर्यंत दृश्य जगांत दाखविलेली उत्साही शीघ्रकारिता आणि यशस्विता, तो आमच्या प्रत्ययास आणून देईल, असें त्याच्या आजवरच्या पराक्रमावरून म्हणतां येतें. दृश्यातीत क्षेत्रांत जडवादानें ज्ञानतृष्णेनें टाकलेलीं पहिलीं पावलें अस्पष्टपणें कां होईना
पान क्र. २५
आजच आपणांस दिसत आहेत.
ज्ञानाचें जुने-नवे मार्ग अनेक आहेत. या मार्गांपैकीं कोणत्याहि मार्गानें ज्ञानाच्या मागोमाग आम्ही गेलो, तर असें दिसून येईल कीं, केवळ अंतिम कल्पनेच्या बाबतींतच नव्हे, तर सर्वसाधारण फलनिष्पत्तींच्या बाबतींतहि, सर्व मार्गांतील ज्ञानाचा कल एकरूप, सारख्या स्वरुपाचें होण्याकडे आहे. आधुनिक भौतिक शास्त्र आणि वेदांत - मूळ वेदांत, अतिभौतिक तत्त्वज्ञानशाखांतील अनेक आचार्यांचा वेदांत नव्हे, तर उपनिषदांतील वेदांत - यांचे ज्ञानप्राप्तीचे मार्ग निरनिराळे आहेत; तरी वेदांतानें ज्या कल्पना सिद्ध केल्या व त्या ज्या सूत्रांत गोंवल्या, त्या कल्पना, जवळजवळ त्याच सूत्रांत आधुनिक भौतिक शास्त्रानें सिद्ध केल्या आहेत. भौतिक शास्त्राचा ज्ञानविषयक खटाटोप जडाच्या क्षेत्रांत, व वेदांताचा खटाटोप जडातीत क्षेत्रांत, असें असून दोघांच्या सिद्धान्तात व सूत्रांत जें एकरूपत्व आहे, भौतिक शास्त्रानें वेदांत-शास्त्राचें जें समर्थन केलें आहे, त्याचें स्वरूप व क्षेत्र इतकें लक्षांत भरण्यासारखें व इतकें सूचक आहे कीं, अशीं दुसरी गोष्ट सांपडणें विरळाच. आधुनिक भौतिक शास्त्रानें अनेक प्रकारचे शोध लावून जो नव्या ज्ञानाचा प्रकाश उपलब्ध करून दिला आहे, त्या प्रकाशांत जुन्या वेदांतप्रणीत सिद्धांतांकडे व सूत्रांकडे पाहिलें असतां, त्यांचा सारभूत संपन्न अर्थ, जितक्या पूर्णतेनें नजरेस भरतो, तितक्या पूर्णतेनें त्या प्रकाशाच्या अभावीं तो नजरेंत भरत नाहीं, भरूंच शकत नाहीं. उदाहरणादाखल वेदांतांतील एक सूत्रवाक्य देतां येईल. विश्वांतील वस्तूंचें वर्णन करतांना त्या सूत्रांत असें म्हटलें आहे कीं, विश्वनिर्मायक शक्तीनें, एक बीज, अनेक रूपें देऊन विश्वांत टाकलेलें आहे. (श्वेताश्वतर उपनिषद् ६-१२) मूळ सारभूत वस्तु एकच असून तिच्या अनेक वस्तू बनलेल्या आहेत. ती एकच वस्तु अनेक वस्तू झालेली आहे ही वेदांतील कल्पना आहे, आणि भौतिक शास्त्राची वाटचालहि याच कल्पनेच्या दिशेनें होत आहे. अनेकतेशीं सुसंवादी अशीं मूळ एकता, हीच विश्वविषयक कल्पना, भौतिक शास्त्राला अंतत: मान्य होत आहे; किंवा होणार आहे, ही गोष्ट विशेष उद्बोधक आहे. जडद्रव्य आणि जडशक्ति अशी द्वैती मांडणी भौतिक शास्त्र करीत आहे; ही मांडणी आग्रहानें करण्यांत येत असली तरी ती वस्तुत: वरील प्रकारच्या अद्वैताच्या आड येऊं शकत नाहीं. कारण मूलभूत जडद्रव्य इंद्रियांना ज्ञात होत नाहीं. इंद्रियांच्या दृष्टीनें तें वास्तव द्रव्य नव्हे, तर सांख्याच्या 'प्रधान' या तत्त्वा-
पान क्र. २६
प्रमाणें द्रव्याचें विचारदृष्ट रूप किंवा विचारदृष्ट द्रव्य आहे; आणि भौतिक शास्त्र हळूहळू अशा मुक्कामाला पोंचत आहे कीं, जेथें द्रव्य आणि शक्ति यांच्या स्वरूपांत मानलेला विचारदृष्ट भेद देखील तर्कशुद्ध नसून, केवळ आग्रही तर्कदुष्ट आहे असें स्पष्ट दिसतें.
संशोधनाचा मार्ग चोखाळीत असतां शेवटी संशोधकाला जडद्रव्य हें एका अज्ञात शक्तीचें साकार रूप आहे असें स्पष्ट होतें. प्राण किंवा जीव हा, जडवाद्यांना अद्यापि न उलगडलेल्या रहस्यांच्या वर्गांत आहे. तथापि तीहि एक शक्ति आहे, जडाच्या बनलेल्या आकारांत कोंडलेली अस्पष्ट संवेदनाशक्ति म्हणजे प्राण किंवा जीव, असें हळूहळू प्रत्ययास येत आहे; आणि जडद्रव्य व प्राण किंवा जीव यांच्यामध्यें यांना अलग करणारी मोठी दरी आहे असा भास उत्पन्न करणारें, आमचें भेददर्शी अज्ञान दूर होईल तेव्हां मन, प्राण आणि जड या तीनहि वस्तू एकाच शक्तीचीं रूपें आहेत, (वेदकालीन ऋषींचें त्रैलोक्य म्हणजे जड लोक, प्राणलोक, मनोलोक हे तीन लोक होत,) ही गोष्ट आमच्या निदर्शनास येईल अशी निश्चिति वाटते. याहून वेगळी वस्तुस्थिति नजरेस येईल अशी कल्पना करणें देखील अवघड आहे. इतकी प्रगति ज्ञानांत झाली म्हणजे जाणीवशून्य जडशक्ति ही मनाची माता आहे, ही जडवादी कल्पना तग धरूं शकणार नाहीं, आणि जग निर्माण करणारी शक्ति ही एक इच्छाशक्ति, संकल्पशक्ति असली पाहिजे, आणि संकल्पशक्ति ही, स्वभावत: केवळ जाणीवशक्ति आहे, कांहींतरी कार्य, कांहींतरी परिणाम घडवून आणण्याकडे लक्ष देणारी जाणीवशक्ति म्हणजेच संकल्पशक्ति किंवा इच्छाशक्ति होय, या गोष्टी संशोधकाला स्पष्ट होतील.
जाणीव-शक्तीनें योजिलेलें हें कार्य, त्याचें फल वा परिणाम यांचें स्वरूप काय असावें, याचा विचार करतां असें दिसतें कीं, आकारमय विश्व निर्माण करणें, आकारांच्या पोटांत स्वत: क्रमश: प्रवेश करून बसणें आणि नंतर या आकारांच्या पोटांतून क्रमश: स्वत: बाहेर पडणें आणि ही उठाठेव करून आकारमय विश्वांत स्वत:ची कांहीं एक प्रचंड रचनाशक्ति, कांहीं एका प्रचंड रचनेद्वारां, साकार करून पाहणें हीच जाणीव-शक्तीची योजना असावी. मानवाचें ठिकाणीं या शक्तीची जी विभूति आहे, तिची, अनंत जीवन, असीम ज्ञान, अनिर्बंध सत्ता मिळविण्याची व भोगण्याची इच्छा आहे. भौतिक शास्त्रालाहि मरणावर भौतिक विजय मिळविण्याचीं स्वप्नें पडत आहेत, त्याची ज्ञानतृष्णा कधींहि न शमणारी
पान क्र. २७
अशी आहे, असें त्याच्या धडपडीवरून दिसत आहे; मानवाला पृथ्वीवर जवळ जवळ सर्वशक्तिमान् कर्तुमकर्तुमन्यथाकर्तुम् सत्ताधीश बनविण्याचा त्याचा खटाटोप चाललेला आहे. भौतिक शास्त्राच्या कामगिरींत स्थलाचें अंतर व कालाचें अंतर कमीकमी होत जवळ जवळ संपुष्टांत येत आहे, आलेलें आहे. मानवाला परिस्थितीचा दास न ठेवतां, कमीअधिक प्रमाणांत तिचा पूर्ण मालक बनविणें आणि या रीतीनें त्याला अडचणीचें असणारें, भौतिक कार्यकारणभावाच्या नियमांचें बंधन सैल करून शक्य तितका स्वतंत्र, खरा स्वतंत्र करणें या दिशेनें शेंकडों मार्गांनीं या शास्त्राचा प्रयत्न चालला आहे. मानवाच्या शक्तीला मर्यादा आहेत, मानवाला कांहीं गोष्टी अशक्य आहेत; या मर्यादेच्या व अशक्यतेच्या कल्पना थोड्याबहुत मिथ्या ठरूं लागल्या आहेत, मिथ्या वाटूं लागल्या आहेत आणि त्याऐवजीं असें दृष्टोत्पत्तीस येत आहे कीं, मनुष्य जें करण्याची इच्छा सतत बाळगील तें करण्याची शक्ति त्याला अखेर प्राप्त होणारच होणार; कारण मानवजातीची ज्ञानशक्ति धडपड करतां करतां शेवटीं मानवाला संकल्पित गोष्ट घडवून आणण्याचें साधन उपलब्ध करून देते. सर्वशक्तिमत्ता ही अर्थात् कोणाहि व्यक्तींत असल्याचें दिसत नाहीं, तर मानवजातीची जी सामूहिक इच्छाशक्ति, तिच्या ठिकाणीं ही सर्व शक्ति असते आणि ही सामूहिक सर्वसमर्थ इच्छाशक्ति, मानवी व्यक्तीचा साधन म्हणून उपयोग करून, तिच्या द्वारां आपलें काम करते. या घटनेचा आणखी खोल विचार केला तर असें दिसून येईल कीं, मानवी व्यक्तीचा, अधिष्ठान आणि साधन म्हणून जो उपयोग केला जातो आणि मानवी समष्टीचा, परिस्थिति व क्षेत्र अशा स्वरूपानें जो उपयोग करण्यांत येतो, तो उपयोग करून घेण्याचें काम, मानवी समष्टीच्या जाणीवयुक्त इच्छाशक्तीचें किंवा कार्यकारी जाणिवेचें नसून, तें मानवी जाणिवेच्या पलीकडे, वर उंच व खालीं खोल असलेल्या अतिमानवी, अतिमानसी जाणिवेचें, त्या जाणिवेच्या खऱ्या सर्वसमर्थ शक्तीचें, इच्छाशक्तीचें असतें. हें सर्व प्रकरण काय आहे आणि अतिमानसी शक्ति खरोखरी काय वस्तु आहे ? ही अतिमानसी शक्ति म्हणजे मानवांतील ईश्वर होय. अनंत एकरस एकतत्त्व, अनेकाकारधारी एकतत्त्व, सर्वज्ञ सर्वसमर्थ एकतत्त्व, हेंच मानवांतील ईश्वराचें स्वरूप होय. या ईश्वरानें मानवरूपानें आपली स्वत:ची प्रतिमा निर्माण केली. या प्रतिमारूप मानवांत समष्टिमानव आणि व्यष्टिमानव, मानववंश आणि मानवव्यक्ति हीं रूपें अविभाज्य असून 'मी मी' करणारी व्यक्ति, आपल्या
पान क्र. २८
कार्याचें केंद्र म्हणून ईश्वरानें योजिली आहे, व मानववंश, समष्टि-नारायण, विश्वमानव हा आपल्या कार्याचा सांचा आणि आंखाडा म्हणून योजिला आहे. (- 'नारायण' हें विष्णूचें एक नांव आहे; हा मानवांतील ईश्वर असून नराशीं म्हणजे मानवाशीं अभेदाचें आणि भेदाचें असें दोन्ही प्रकारचें नातें नित्य ठेवीत असतो. मानवाशीं अभेदाचें नातें असलेल्या ईश्वराचें नांव 'विश्व-मानव'-) याप्रमाणें योजना करून आपल्या प्रतिमारूप व्यष्टि-समष्टि-मानवांत प्रतिमारूप नर-नारायणांत आपल्या मूळ ईश्वरीय एकत्वाची, सर्वज्ञत्वाची, सर्वसमर्थत्वाची म्हणजे आपल्या स्वयंकल्पित ईश्वरत्वाची छाया प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न ईश्वर करीत आहे. ''मर्त्यामध्यें अमर्त्य असें कांहीं आहे. हें अमर्त्य म्हणजे देवात्मा होय, देव होय. हा देव मर्त्यांच्या अंतरांत कायम राहणारा आहे. याचें अंतरांतील स्वरूप दैवी कार्यशक्ति होय. आपणांत दिव्य सामर्थ्यें उदयास येतात ती या शक्तीच्या कार्यकुशलतेनें उदयास येतात'' (वामदेव ऋग्वेद ४ - २ - १.) मर्त्यांमधील अमर्त्य देवाची वर वर्णिलेली विश्वव्यापी महान् प्रेरणा आधुनिक जग अजाणतां शिरोधार्य करून वागत आहे; आपण कोठें जात आहोंत याचें त्याला भान नाहीं, पण तें नेणतेपणें कां होईना आपल्या सर्व खटाटोपांत वरील महान् प्रेरणेनुसार कार्य करीत आहे, तिची सेवा करीत आहे, तिच्या योजनांची परिपूर्ति करीत आहे.
तथापि आधुनिक शास्त्रानें जें ज्ञान उपलब्ध होतें, त्या ज्ञानाला नेहमींच एक मर्यादा असते; म्हणजे त्याचा व्याप भौतिक क्षेत्रापुरताच असतो. तसेंच त्यामुळें जी सत्ता उपलब्ध होते, त्या सत्तेच्या व्यवहाराला नेहमींच एका गोष्टीचें ओझें, अडचण करणारें ओझें वागवावें लागतें. हें ओझें म्हणजे भौतिक साधनांचे ओझें होय. अशी आजची स्थिति असली तरी, आधुनिक शास्त्राची अगदीं अलीकडील प्रवृत्ति पाहिली तर, भावी काळांत आजच्या पेक्षां पुष्कळच अधिक अनिर्बंधपणें मानवाचे व्यवहार चालतील असा त्या प्रवृत्तींतून स्पष्ट अर्थ काढतां येतो. भौतिक शास्त्रीय ज्ञानाच्या क्षेत्रांतील दूरचीं ठाणीं अलीकडे अलीकडे भौतिक आणि अतिभौतिक यांना विभागणाऱ्या सीमारेषांवर अधिकाधिक बांधली जात आहेत, त्याप्रमाणें व्यवहारविषयक भौतिक शास्त्रानेंहि अलीकडे अलीकडे मोठे मोठे विक्रम केले आहेत. ज्या साधनांनीं हें शास्त्र पूर्वीं सर्वांत मोठे परिणाम घडवून आणीत होतें तीं साधनें संख्येनें कमी आणि कमी संकीर्ण करीत करीत जवळ जवळ शून्य करून ते पूर्वींचे परिणाम
पान क्र. २९
तसेंच आणि तशाच प्रमाणावर तें अलीकडे घडवून आणीत आहे. बिनतारी संदेशवाहन हें त्याचें एक उदाहरण आहे. निसर्गानें आपल्या कार्याची दिशा बदलण्यास आरंभ केला आहे या गोष्टीची सूचना आणि निशाणी या उदाहरणांत आहे. येथें भौतिक शक्ति एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे पाठवतांना जे प्रत्यक्ष भौतिक साधन पूर्वीं वापरीत, तें दूर केलें आहे; शक्ति हस्तगत करून तिला गति देणारें, संदेश देणारें स्थान आणि तिच्या मार्गक्रमणानंतर तिला थांबवून घेणारें तेथें संदेश घेणारें स्थान, असा फक्त दोन टोंकांनाच दृश्य भौतिक साधनांचा वापर केला जातो. शुद्ध व व्यावहारिक भौतिक शास्त्राची प्रगति होत होत, अतिभौतिकाचे नियम व शक्ति यांचा अभ्यास व्हावा, असें वाटूं लागेल आणि हा अभ्यास झाला म्हणजे वर सांगितलेलीं दोन टोंकांना वापरलीं जाणारीं दृश्य भौतिक साधनेंही नाहींशी होतील, होणारच; कारण योग्य रीतीनें योग्य ठिकाणापासून या नव्या अभ्यासाला आरंभ करून त्यांत चिकाटी धरली तर मनाला असें अतिभौतिक अदृश्य साधन नि:संशय सांपडेल कीं, ज्याच्या आधारें त्याला संदेशवाहक भौतिक शक्ति प्रत्यक्षपणें हस्तगत करतां येईल, आणि तिच्या हातीं संदेश देऊन, तो संदेश ज्या मार्गानें जावयाचा त्या मार्गानें व त्या ठिकाणीं तिला न चुकतां नेतां येईल अशी गति तिला देण्याची व्यवस्था करतां येईल. अतिभौतिक क्षेत्राची एकदां आपल्याला ओळख झाली व भौतिकाप्रमाणें त्याची सत्यता आपणांस पटली, आपण अभ्यासानें पटवून घेतली, म्हणजे आपल्याला कळेल कीं, अतिभौतिक क्षेत्रांत असे दरवाजे आहेत, जे उघडलें असतां आपणांसमोर भावी घटनांच्या अफाट व अद्भुत मालिकाच मालिका उभ्या राहतील.
तथापि हें लक्षांत ठेवलें पाहिजे कीं, जड इहलोकाला लागून असलेल्या लगतच्या जगाचें पूर्ण ज्ञान आपण करून घेतलें व तेथें पूर्ण सत्ता गाजवूं शकलों तरी, या लगतच्या जगापलीकडे आणखीहि जग वा जगें असल्यानें, आपल्या कार्यशक्तीच्या व ज्ञानशक्तीच्या व्यापाला असलेल्या मर्यादा संपल्या, असें आपण या लगतच्या श्रेष्ठ जगांत वावरतांनाहि समजतां कामा नये. मग आमच्या मर्यादांचें बंधन संपतें कोठें ? आम्हाला बांधून गुलामगिरींत राबविणाऱ्या मर्यादांच्या दोरखंडाची शेवटली गांठ आहे कोठें व ती कशी सुटणार ? आमच्या बाहेर अमुक आहे, आमच्या आंत तमुक आहे असा आंत-बाहेरचा भेद आम्हीं करतो. हा भेद खोटा
पान क्र. ३०
आहे असें आम्हाला पटून सर्व आमच्या आंतच आहे, ही प्रतीति आम्हाला येईल, बाहेरचें आंतल्याशीं एकरूप होईल; आमचा 'मी' हें साधन, विशिष्ट कार्यप्रणालीचें साधन आहे, तें साधन सूक्ष्म होत होत शेवटीं शून्य होईल; आमच्या व्यवहाराचा नियम आज 'मी'ला अग्रस्थान देतो आणि अनेक 'मीं'च्या संघर्षांतून एक प्रकारची एकता साधणें हें त्याचें उद्दिष्ट आहे; ही स्थिति बदलून आमच्या व्यवहाराचा नियम मानवांच्या नव्हे, सर्व भूतांच्या एकतेला अग्रस्थान देईल, या सर्वव्यापी एकतेच्या पोटांत सर्व भिन्न भासणारे 'मी' घेतले जातील, आणि तेथें ते अभेदानें एका सर्वव्यापी 'मी'चे अवयव होतील, अंश होतील. याप्रमाणें आमचा 'मी' व्यापक होऊन, आजचें सर्व बाह्य आमच्या पोटांत आलें व आमचा वैयक्तिक मी नष्ट झाला म्हणजे आमची गुलामगिरी संपेल, आमच्या भौतिक, अतिभौतिक सर्व मर्यादा नाहींशा होतील व सर्व विश्व आमचें व्यवहारक्षेत्र होईल. आमच्यांत उपरिनिर्दिष्ट बदल झाला म्हणजे विश्वव्यापक ज्ञानाचें, जाणिवेचें, विश्वेश्वराचें मध्यवर्ति सिंहासन आम्हाला आमच्या अगदीं जवळ असलेलें दिसेल. या सिंहासनावरून ईश्वरी ज्ञानशक्ति आपल्या अति विस्तृत साम्राज्यावर आपली सर्वसमर्थ दृष्टि टाकीत असलेली दिसेल. या ईश्वरी ज्ञानशक्तीशीं एकरूप होण्यानें स्वाराज्याचा१ आणि साम्राज्याचा२ लाभ घडेल.
प्रकरण तिसरें
संन्यासी नकार
हें सर्व ब्रह्म आहे. हा आत्मा ब्रह्म आहे. आणि तो चार अवस्थांत चार रूपें धारण करून आहे. संबंधातीत, लक्षणहीन, अचिंत्य असा चौथा, चौथ्या अवस्थेंतील, मूळ अवस्थेंतील आत्मा आहे, तेथें सर्व शांत शांत आहे.
माण्डूक्योपनिषद् श्लोक २ . ७
मागच्या प्रकरणांत आपण विश्वव्यापक जाणिवेपर्यंत आलों. पण विश्वव्यापक जाणीव कांहीं जाणिवेचीं शेवटली अवस्था नाहीं. तिच्या पलीकडेहि एक जाणीव आहे आणि तीहि आपण मिळवूं शकतों. वैयक्तिक जाणिवेहून विश्वव्यापक जाणीव जशीं फार श्रेष्ठ आहे, तशीच व्यक्ति आणि विश्व या दोघांच्याहि क्षेत्रांना सूक्ष्म अणुसमान लेखणारी विश्वातीत जाणीव, विश्वजाणिवेहून फार श्रेष्ठ आहे. अगदीं मोजतां येत नाहीं, मोजतां येणें अशक्य आहे एवढ्या अफाट पार्श्वभूमीवर अगदीं बारीकसें चित्र काढल्यास तें जसें त्या पार्श्वभूमीवर दिसेल तसें हें अफाट समजलें जाणारें आपलें विश्व त्या विश्वातीत जाणिवेच्या पार्श्वभूमीवर दिसतें. ती विश्वातीत जाणीव विश्वाच्या व्यवहाराला आधार देते, अथवा सहिष्णुतेनें तो चालूं देते, अशीहि वस्तुस्थिति असते. ती विश्वातीत जाणीव अफाट विश्वजीवन व्यापून टाकते, त्याला जवळ घेऊन पोटाशीं धरते, अथवा आपल्या अनंत क्षेत्रांतून त्याचीं हकालपट्टीहि करतें.
जडद्रव्य हेंच सत्य आहे असें जडवादी आपल्या दृष्टीनें म्हणतो, हें
पान क्र. ३२
संबंध-सापेक्ष जग ही एकच वस्तु, जिचें थोडेंबहुत निश्चित निःसंदेह ज्ञान होते अशीं सत्य वस्तु आहे, असें प्रतिपादितो. या जगाच्या पलीकडे खरोखरी कांहीं नाहींच, पण कांहीं आहे असें मानलें तरी तें सर्वथा अज्ञेय आहे, तें मनाचें एक स्वप्न आहे, विचारप्रिय बुद्धीचीं, सत्याला सोडचिठ्ठी दिलेली ती एक अवास्तव कल्पना आहे, असा युक्तिवाद करतो. हें जडवाद्याचें करणें जर न्यायसंगत असेल तर उलटपक्षीं संन्यासी जो पक्ष मांडतो तोहि न्यायसंगत मानला पाहिजे. संन्यासी हा विश्वातीत जाणिवेनें भारलेला, तिच्या मोहांत सांपडलेला असतो. तो आपल्या दृष्टीनें असें आग्रहानें प्रतिपादतो कीं, शुद्ध आत्मा हीच एक सत्य वस्तु आहे. कारण हीच एक अशीं वस्तु आहे कीं, जिच्यांत कमीअधिक होत नाहीं, जिला जन्म नाहीं, मरण नाहीं; त्याच्या दृष्टीनें संबंधसापेक्ष जग हें मनानें व इंद्रियांनीं निर्मिलेलें एक स्वप्न आहे. शुद्ध शाश्वत जाणीवरूप सत्यवस्तूपासून माघार घेऊन असत्यांत वावरणाऱ्या बुद्धीचीं ती एक अवास्तव कल्पना आहे.
जडवाद्याचें प्रतिपादन एका टोंकाला व संन्यासी प्रतिपादन दुसऱ्या टोंकाला, असें असतां एका प्रतिपादनाच्या बाजूनें जो अनुभवाचा पुरावा व युक्तिवाद दिला जातो त्याच्या इतकाच जोरदार व निर्दोष भासणारा अनुभवाचा पुरावा व युक्तिवाद दुसऱ्या प्रतिपादनाच्या बाजूनेंहि देतां येतो ही गोष्ट आपण लक्षांत ठेवली पाहिजे. आतां, जडद्रव्याचें जग हेंच फक्त सत्य आहे असें स्थूल भौतिक इंद्रियांचा अनुभव सांगतो; पण या इंद्रियांना अशीं शक्तीच नाहीं कीं, जिच्या उपयोगानें, त्यांना अभौतिकाचा, स्थूल जडद्रव्याचें रूप नसलेल्या कोणत्याहि वस्तूचा अनुभव घेतां येईल. असें असल्यानें या स्थूल इंद्रियांचा अनुभव विश्वसनीय मानल्यास, इंद्रियातीत तें तें सर्व असत्य असें आपणांस मानलें पाहिजे; पण असें आपण मानू शकत नाहीं. जें इंद्रियातीत तें असत्य, असें भासविणारीं आपलीं स्थूल शरीराचीं इंद्रियें अगदींच प्राकृत, निर्बुद्ध अडाणीपणाचीं चूक करतात; या चुकीला तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रांतील युक्तिवादाच्या मांडणीचें रूप दिल्यानें, त्या चुकींतील दोष कमी होत नाहीं. स्थूल इंद्रियांचा दावा निराधार आहे हें उघड आहे. जडाच्या जगांत देखील अशा पुष्कळ गोष्टी आहेत कीं, ज्यांचें ज्ञान स्थूल इंद्रियांना होणें अशक्य असतें. स्थूल इंद्रियांना ज्ञात होणारी वस्तु तेवढी सत्यवस्तु असें इंद्रियें मानतात. इंद्रियांच्या दृष्टीनें या दोन वस्तूंचें नित्य साहचर्य दिसत असलें तरी तो भास
पान क्र. ३३
आहे, भ्रम आहे आणि 'इंद्रियातीत असें कांहीं नाहीं, इंद्रियातीताचा अनुभव हा निश्चितपणें भ्रमरूप आहे, भासरूप आहे' हें जडवाद्यांचें विधान या भ्रमावर आधारलेलें आहे. याप्रमाणें जडवादी जीं गोष्ट सत्य म्हणून सिद्ध करूं इच्छितात ती गोष्ट, (इंद्रिय प्रत्यक्षच केवळ सत्य ही गोष्ट) त्यांनीं प्रथमपासून गृहीत धरलेली आहे, आणि म्हणून त्यांच्या युक्तिवादांत चक्रापत्तीचा दोष आहे. असा युक्तिवाद निःपक्षपाती तर्कापुढें टिकूं शकत नाहीं.
आपल्या स्थूल इंद्रियांना ज्ञात होऊं शकत नाहींत अशा सत्य भौतिक वस्तु आहेत, इतकेंच नव्हे तर पुरावा व अनुभव यांनीं सत्यत्व परीक्षावयांचें तर आम्हाला स्थूल भौतिकातीत इंद्रियें सुद्धां आहेत. (या इंद्रियांना सूक्ष्म इंद्रियें म्हणतात. हीं इंद्रियें सूक्ष्म देहांत असतात, त्यांच्या साधनानें सूक्ष्म दर्शन घडते, सूक्ष्म अनुभव येतो, त्यांच्या दृष्टीला सूक्ष्म दृष्टि म्हणतात.) स्थूल शारीर इंद्रियांच्या सहाय्यावांचून जड जगाच्या सत्य वस्तूंचें ज्ञान या इंद्रियांना होऊं शकतें इतकेंच नव्हे, तर इतर दुसऱ्या अतिभौतिक जगांतील सत्य वस्तूशींहि हीं इंद्रियें आमचा संबंध आणतात. अर्थात् ज्या स्थूल जडद्रव्याचें साहित्य घेऊन आपला सूर्य आणि आपलीं पृथ्वी बनविलेली दिसतात, त्या द्रव्याहून कोणत्यातरी वेगळ्या द्रव्यावर अवलंबून असलेल्या अनुभवांची व जाणिवेची व्यवस्थित रचना अधिभौतिक जगांत आहे. आमचीं सूक्ष्म इंद्रियें त्या जगांतील सत्य वस्तूंशीं आमचा संबंध आणतात.
मनुष्य विचार करूं लागला तेव्हांपासून सतत हे अतिभौतिक विषयक व सूक्ष्मेंद्रियविषयक सत्य, त्याच्या अनुभवास आलेलें आहे व त्याच्या विश्वासाचा विषय झालेलें आहे; आणि आतां, जेव्हां भौतिक जगाचीं रहस्यें समजून घेण्याकडे सारें लक्ष देण्याचीं गरज राहिलेली नाहीं, तेव्हां या सत्याला नव्या शास्त्रीय संशोधन पद्धती पाठिंबा देऊं लागल्या आहेत. मनोमार्गीय विचार-वाहन आणि तत्सम घटना यांचें संशोधन होऊन त्यांची सत्यता संशोधकांना पटली आहे. भौतिक विश्वाप्रमाणें अतिभौतिक विश्व व सूक्ष्म इंद्रियें असल्याचा हा अगदीं सर्वांत उघड प्रत्यक्ष पुरावा आहे. अशा तऱ्हेचा पुरावा सारखा वाढत आहे. या पुराव्यानें अतिभौतिक विश्वाच्या व सूक्ष्म इंद्रियांच्या सत्यतेबद्दल बहुतेकांचीं खात्री लवकरच पटेल. अर्थात् कांहीं लोक या पुराव्याला दाद देणार नाहींत. ज्यांचीं मनें प्रतापी जडवादाच्या भूतकालीन विजयांनीं भरलेलीं व भारलेलीं आणि त्या विजयाच्या स्तुतीच्या कवचांत अडकून पडलेलीं आहेत,
पान क्र. ३४
आतां हें मात्र खरें आहे कीं, पद्धतशीर संशोधनानें अतिभौतिक सत्याचें जें ओझरतें दर्शन घडवलेलें आहे तें थोडेबहुत अपूर्ण व सदोष असल्यानें त्या सत्याचें सत्यत्व तितकें जोरदारपणें प्रतिपादतां येत नाहीं, आलेलें नाहीं. याचें कारण हें कीं, संशोधनाच्या चालू पद्धतींत अद्यापि बराच भोंगळपणा व सदोषता आहे. ज्या सूक्ष्म इद्रियांचा या नव्या युगांत पुन्हां शोध लागला आहे त्यांनीं कमीत कमी इतकें तरी दाखवून दिलें आहे कीं, स्थूल इंद्रियांना ज्या भौतिक घटना दिसत नाहींत, त्या भौतिक घटना सूक्ष्म इंद्रियांना निःसंशयपणें दिसतात. असें जर आहे तर जाणिवेच्या भौतिक रचनेच्या, म्हणजे आमच्या शारीर स्थूल इंद्रियांच्या क्षेत्रांत ज्या घटना येत नाहींत त्या अतिभौतिक घटना आम्हाला दिसतात असें त्यांनीं म्हटलें असतां, खोटे साक्षीदार म्हणून त्यांना तिरस्कारानें अविश्वासार्ह ठरविणें न्यायसंगत नाहीं हें उघड आहे. ही गोष्ट मान्य आहे कीं, स्थूल इंद्रियांचा किंवा कोणाचाहि कोणताहि पुरावा बुद्धीच्या नेतृत्वाखालीं जमवावा लागतो, बुद्धीनें तपासावा लागतो, बुद्धीनें त्याची व्यवस्थित मांडणी करावी लागते; त्याचा अर्थ लावतांना व संबंध ठरवतांना योग्य अशी पद्धति वापरून योग्य काळजी घ्यावी लागते, आणि नंतर या पुराव्यावरून त्या स्थूल इंद्रियांचे वा इतर कोणाचें कार्यक्षेत्र, कार्याचे नियम आणि प्रक्रिया निश्चित कराव्या लागतात. सूक्ष्म इंद्रियांच्या बाबतींतहि हें सर्व असेच तपशीलवार केलें जावें या गोष्टीला आमचीं पूर्ण मान्यता आहे. पण आमचें म्हणणें एवढेंच आहे कीं, स्थूल भौतिक द्रव्याच्या बनविलेल्या साधनांपेक्षां अधिक सूक्ष्म साधनांनीं दिसणारीं अधिक सूक्ष्म द्रव्याचे पदार्थ असलेलीं, सूक्ष्म अनुभवांचीं विस्तृत क्षेत्रें, या स्थूल भौतिक विश्वाबरोबर ब्रह्मांडांत आहेत आणि त्यांचीं सत्यता या
पान क्र. ३५
पण सर्व जगें, सर्व विश्वें हीं केवळ आम्हांला अनुभव मिळवून देणारीं मर्यादाबद्ध क्षेत्रें आहेत, आणि इंद्रियें हीं केवळ अनुभव घेण्याचीं सोईचीं साधनें आहेत. सर्वांच्या मुळाशीं जीं महान् वस्तु आहे ती म्हणजे आम्हांमधील जाणीव, अनुभव घेणारी जाणीव होय. ही जाणीव सर्वसाक्षी द्रष्टा आहे. या द्रष्ट्यासाठीं विश्व हें अनुभवाचें क्षेत्र व इंद्रियें हीं अनुभवाचीं साधनें आहेत. सर्व विश्वें आणि त्यांतील सर्व वस्तु आपण सत्य आहोंत किंवा कसे, याचा निर्णय करुन घेण्यासाठीं आम्हांमधील सर्वमूळ, सर्वाधार, सर्वसाक्षी दृष्ट्याकडे अंतिम अर्ज घेऊन येतात. विश्व एक आहे कीं अनेक विश्वें आहेत, भौतिक विश्व आहे कीं नाहीं, अतिभौतिक विश्व आहे कीं नाहीं, हें सर्व, या द्रष्ट्याचा अनुभव काय असेल त्यावरून ठरतें. आमच्यांतील या द्रष्ट्याच्या अनुभवाखेरीज दुसरा कोणताहि अस्तित्व-निर्णायक पुरावा, आम्हाला उपलब्ध नाहीं. असा युक्तिवाद करतात कीं, 'मानवाचीं प्राकृतिक रचना आणि त्याची त्याच्या भोंवतालच्या जगाकडे पाहण्याचीं दृष्टि, ही विशिष्ट प्रकारची असल्यानें, जगाचें व त्याचें वरील प्रकारचें विशिष्ट नातें उत्पन्न झालें आहे, असें नसून खरी वस्तुस्थिति अशीं आहे कीं, दृश्य अस्तित्वाचा हा स्वभावच आहे. अनुभव घेणारी जाणीव आणि क्रियाशील वस्तु किंवा अनुभवविषय, हे दोन घटक मिळूनच सर्व दृश्य अस्तित्व बनतें. वस्तुगत क्रिया ही द्रष्ट्याशिवाय घडूंच शकत नाहीं. कारण वस्तुरूप वस्तुमय विश्व हें द्रष्ट्या जाणिवेच्यासाठीं व जाणिवेच्या पोटीं असते, स्वतंत्र असूं शकत नाहीं, त्याला स्वतंत्र खरें अस्तित्व नाहीं.' या युक्तिवादाच्या उलट असाहि युक्तिवाद करतात कीं, 'भौतिक विश्व स्वयंभू आहे, शाश्वत आहे; प्राण आणि मन यांचा उदय होण्यापूर्वींपासून तें आहे; या दोघांचा
पान क्र. ३६
यांपैकी जडवादी युक्तिवाद प्रथम घेऊं व त्याचा व्यावहारिक अर्थ पाहूं. या युक्तिवादाचीं कसून तपासणी केलीं तर अशा निर्णयाला आपण येतो कीं, मानवी व्यक्तीचें जीवन काय किंवा मानवी जातीचें जीवन काय, अर्थशून्य आहे, मिथ्या आहे; आणि या निर्णयांतून न्यायतः जीवनाचे दोन पर्याय आमच्यापुढें उभे राहतात. माणूस आज आहे उद्यां नाहीं, तेव्हां त्यानें ''जीवन जगून घ्यावे.'' अर्थात् जो काय भोग जीवनांत येनकेन प्रकारेण त्याला मिळण्यासारखा असेल त्यासाठीं त्यानें उसंत न घेतां धडपड तडफड करीत रहावे, हा एक पर्याय आणि दुसरा पर्याय असा कीं, त्यानें मानव जातीची किंवा मानवी व्यक्तीची विरक्तपणें निष्काम सेवा करावी. ही धडपड किंवा सेवा करतांना त्यानें ही जाणीव ठेवावी कीं, मानवी व्यक्ति ही सत्य नसून तो एक त्याच्या मज्जातंतूमय मनानें अर्थात् जड मज्जातंतूंच्या तालबद्ध गतीनें निर्माण केलेला अल्पकाळ टिकणारा भ्रम आहे आणि मानवजात वरील भ्रमाचे जरा अधिक काळ टिकणारें सामुदायिक रूप आहे. आम्ही काम करतो किंवा करमणूक करतो ती जड शक्तीच्या प्रेरणेनें करतो. ''शक्य तेवढी करमणूक करून जीवन जगून घ्यावें, आहे चार दिवस तोंवर'' ही प्रेरणा तिची; ''नैतिक ध्येय समोर ठेवून, बौद्धिक पूर्णतेचें ध्येय पुढें ठेवून माणसानें काम करीत रहावें'' ही प्रेरणाहि तिचीच, असें जडवाद सांगतो. अर्थात् दोन्ही प्रेरणा आमचीं फसवणूक करीत असतात. भ्रमांच्या भोंवतीं आम्हाला भिरभिरावयास
पान क्र. ३७
वा नसो आमच्याकडून, आपल्या प्रभावानें करमणूक किंवा काम करवून घेते म्हणून, भोगी जीवनाची किंवा नैतिक, बौद्धिक जीवनाची ओढ, ही माया आहे असें म्हणावयाचे; या मायेचें कार्य वरवर दिसण्यापुरतें होणारे आणि अल्पकाळ टिकणारें असलें तरी ही माया नाहीं असें म्हणावयाचें. जीवन म्हणजे काय तर, प्राण आणि मन याचा व्यवहार. पण प्राण आणि मन, हीच मुळीं जडवादांत मायेच्या सदरात येतात. एक जड द्रव्य, जडशक्ति काय तें शाश्वत सत्य, आणि प्राण आणि मन ही त्यांतून उदय पावून कांहीं काळानें विलयास जाणारी माया आहे असें जडवादाचें ठाम मत आहे. आतां, जडवादाच्या उलट दुसऱ्या टोंकाला जो चैतन्यवाद (आत्मवाद-जाणीववाद) आहे त्यांत स्वतंत्र वस्तुरूप जगाची, अर्थात् जड विश्वाची मायारूपता किंवा असत्यता प्रतिपादिली आहे. या असत्यतेवर जर आपण भलताच जोर दिला तर दुसऱ्या मार्गानें वरच्याच प्रकारचें पण जास्ती कठोर सिद्धांत आपल्याला मानावे लागतात. व्यक्तीचा मी हा सर्वथैव भ्रमरूप आहे, मानवी जीवन निरर्थक आहे आणि मिथ्या आहे, सर्व अस्तित्वाच्या पलीकडे जें ''असत्'' किंवा संबंधनिरपेक्ष केवल चैतन्य आहे, जें आपलें मूलस्थान आहे, तेथें परत जाणें, त्यांत विलीन होणें हाच एक बुद्धीला पटण्यासारखा मार्ग आहे, भौतिक जीवन हा एक अर्थशून्य गोंधळ असून त्यांतून सुटण्याचा दुसरा मार्ग नाहीं हे सिद्धांत आपल्याला त्यामुळें मानावे लागतात.
पण तर्कशास्त्र ज्या आधारावर हें सिद्धांत बसवितें तो आधार कच्चा आहे. सामान्य भौतिक जीवन पाहून तर्कशास्त्र युक्तिवाद करतें, पण या भौतिक जीवनांत जडवादाला काय किंवा चैतन्यवादाला काय, आपलें सिद्धांत पक्केपणीं रचावयाला अनुभवाचा पुरता भरीव पाया मिळत नाहीं. त्यांत जागजागीं खड्डे किंवा अपुरे अनुभव असतात; आणि म्हणून दोन्हीहि युक्तिवाद निर्णायक होऊं शकत नाहींत. सामान्यतः पहातां, व्यक्तीच्या देहाशीं, व्यक्तीच्या शारीरिक जीवनाशीं निगडित नसलेला विश्वमानसाचा किंवा अतिमानसाचा अनुभव, निश्चित, नि:संदेह अनुभव, आमच्या अनुभव-भांडारांत नाहीं; उलटपक्षीं, आमच्या देहांत असणारा आत्मा, देहावर सर्वथा अवलंबून आहे, देहाच्या मरणानंतर तो जगणार नाहीं,
पान क्र. ३८
आमच्या जाणिवेचें क्षेत्र समाधानकारकपणें वाढावयाचें तर तें अनिवार्यपणें देहाच्या आंत, प्राणाच्या आंत, मनाच्या आंत वाढणार आणि वाढत वाढत वैयक्तिक देहासुद्धां, प्राणासुद्धां, मनासुद्धां सर्व विश्व आपल्या पोटांत येणार; अर्थात् आमची जाणीव आज व्यक्ति-जीवन जगत आहे, व्यक्तीचें अस्तित्व व्यापून आहे. ती पूर्ण वाढीअंतीं विश्वजीवन जगूं लागणार, विश्वाचें अस्तित्व व्यापून रहाणार. विश्वाचें अस्तित्व द्रष्ट्या जाणिवेच्यासाठीं, त्या द्रष्ट्या जाणिवेच्या पोटीं असतें, स्वतंत्र असूं शकत नाहीं, असें पूर्वीं म्हटलें आहे -- हा द्रष्टा म्हणजे विश्वाच्या पोटीं जन्म घेणारें देहधारी वैयक्तिक मन असूं शकत नाहीं, तर विश्वव्यापी जाणीवच द्रष्टा असूं शकतें. ही जाणीव तिनें निर्माण केलेल्या सर्व वस्तूंच्या व घटनांच्या पोटीं, अन्तर्यामीं प्रज्ञा म्हणून असते. विश्वाचा आणि या विश्व-चैतन्याचा संबंध दोन प्रकारचा असूं शकतो. विश्व हें, या चैतन्याचा नित्य आणि सत्य असा क्रियात्मक आविष्कार असूं शकतें किंवा तें या चैतन्यांत त्याच्या ज्ञानक्रियेनें किंवा ज्ञानयुक्त शक्तीनें उदय पावतें व विलीन होतें, असाहि दोघांचा संबंध असूं शकतों. तेव्हां विश्वाचें द्रष्टेपण विश्वाच्या पोटीं असलेल्या मनाकडे येऊं शकत नाहीं, तर जें चैतन्य नित्य आहे, शांत शांत आहे, जीवमान पृथ्वी आणि जीवमान मानवी शरीर या दोन्हीं ठिकाणीं दोहोंच्याहि अंतर्यामीं सारखेंच चिंतन करीत, चिंता करीत जें बसलें आहे, मन आणि इंद्रियें हीं ज्याचीं अवश्य नसणारीं अशीं साधनें आहेत -- तें चैतन्यच विश्वाचा द्रष्टा, धनी व स्वामी आहे, होऊं शकतें.
मानवांत विश्वव्यापी जाणीव उदय पावूं शकतें ही गोष्ट आधुनिक मानसशास्त्र हळू हळू मान्य करूं लागलें आहे; एकापेक्षां एक सोईचीं, कमी अधिक कामाचा बोजा व धक्का सहन करून सारखीच कार्यक्षम राहणारीं, ज्ञानप्राप्तीचीं साधनें जशीं निघूं शकतात, त्याप्रमाणें मानवाला विश्व-
पान क्र. ३९
या विश्वचैतन्यांत आपण प्रवेश केला व त्याच्याशीं एकरूप झालों म्हणजे विश्वाचें अस्तित्व मूलत: एकवस्तुरूप आहे, विश्व मूलत: एकच जाणीवपूर्ण वस्तु आहे या सत्याचें स्वरूप, आपली इच्छा असल्यास, आपण कांहीं काळ पारखीत बसूं शकतो; असें केल्यास आपणांस कळूं लागतें कीं, विश्वाच्या एकतेचा अनुभव आल्यानें आपल्या जाणिवेच्या धारणा, इंद्रियांच्या संवेदना या सर्वांत बदल होऊं लागतो. आपल्याला असें स्पष्ट दिसतें कीं, एकचएक मूळ वस्तु, जड तत्त्व (अन्नतत्त्व), प्राणतत्त्व, मानसतत्त्व वगैरे प्रकारांनीं व्यक्त झाली आहे. जडतत्त्व होऊन त्या अद्वितीय वस्तूनें आपल्या एका जडरूपाचीं अनेक रूपें (शरीरें) करून तीं एकमेकांपासून भौतिक दृष्ट्या विभक्त केलीं आहेत आणि या विभक्त शरीरांना अर्थात् अंतरीं स्वत:ला धारण करणाऱ्या या अगण्य, अलग अलग, आकारांना परस्पर संबंध ठेवतां यावा म्हणून भौतिक साधनेंहि निर्माण केलीं आहेत. प्राणतत्त्वाची आणि मानसतत्त्वाची व्यवस्था याच प्रकारचीं दिसते. अनेक प्राणमय रूपांत प्राणतत्त्व विभागलें गेलें आहे; आणि अनेक मानसरूपांत मानसतत्त्व विभागलें गेलें आहे. सर्वत्र अंतर्यामांत चैतन्यवस्तूचें ठाण आहे आणि प्राणाच्या क्षेत्रांत प्राणमय व मानसक्षेत्रांत मनोमय साधनांनीं विभक्त प्राणरूपें व मनोरूपें एकमेकांशीं संबंध ठेवूं शकतील अशी व्यवस्था आहे. मानसतत्त्वाच्या वरतीं कांहीं पायऱ्यानंतर अतिमानसतत्त्व-विज्ञानतत्त्व आपल्या नजरेस येतें. या तत्त्वाचा संचार, व्यवहार, सर्व विश्वांत आहे आणि त्याच्याहून खालच्या पायरीवरील मन प्राण आदि तत्त्वांची हालचाल या तत्त्वाच्या इच्छेनुसार चाललेली आहे हें
पान क्र. ४०
तेव्हां, विश्वचैतन्याशीं, विश्वात्म्याशीं ज्या कोणाचा थोडा बहुत संबंध आला असेल किंवा जो कोणी या विश्वात्म्यांत प्रतिष्ठित होऊन जीवन जगत असेल, त्याला भौतिक वस्तु जितकी खरी वाटते त्यापेक्षां हा विश्वात्मा, विश्व चैतन्य अधिक खरें वाटतें; तें स्वत: व त्याचे परिणाम, त्याचीं कार्यें या गोष्टी अनुभवी माणसाला भौतिक वस्तूइतक्या, नव्हे, अधिक खऱ्या वाटतात, असतात. भौतिक जगाच्या दृष्टीनें विश्वचैतन्य हें जसें भौतिक जगापेक्षां अधिक सत्य आहे; तसें विश्वचैतन्याच्या दृष्टीनें भौतिक जग सत्य आहे कीं नाहीं? या प्रश्नाचें उत्तर - 'भौतिक जग सत्य आहे,' - असें आहे. चैतन्याचा पूर्ण आविष्कार या रूपानें तें विश्व, अस्तित्वांत आहे; मात्र त्याचें अस्तित्व विश्वचैतन्याच्या अस्तित्वासारखें स्वतंत्र नसून विश्वचैतन्याच्या अस्तित्वावर व आविष्कृत होण्याच्या संकल्पावर अवलंबून आहे. विश्वचैतन्याशीं तादात्म्य पावल्यानें किंवा त्याच्याशीं घनिष्ठ संबंध आल्यानें आपल्याला जो अनुभव
पान क्र. ४१
वर जें पुरुषोत्तमनामक स्वयंभू जाणीवपूर्ण अस्तित्व जगाचें मूळ म्हणून सांगितलें, तें मनाच्या पलीकडे, पुष्कळ पलीकडे असलेल्या आपल्या अतिमानस तत्त्वाचें, अनंत असीम विज्ञानतत्त्वाचें, साह्य घेऊन जग आकारास आणतें. तें जगाच्या तालबद्ध घटनांत सर्वत्र आहे. तथापि तें जगाहून फार मोठें आहे, स्वतंत्र आहे. त्याची अनंतता शब्दशक्तीच्या पलीकडे आहे. जग त्याच्या आधारानें असतें, जगाचा आधार त्याला लागत नाहीं, जगावांचून तें असूं शकतें. ज्याप्रमाणें आम्हाला विश्वचैतन्यांत प्रवेश करून सर्व विश्वाच्या अस्तित्वाशीं एकरूप होतां येतें, त्याप्रमाणें विश्वातीत चैतन्यांत आम्हाला प्रवेश करतां येतो आणि असा प्रवेश करून विश्वाच्या अस्तित्वावांचून आम्हाला राहतां येतें. याप्रमाणें विश्वातीत विश्वनिरपेक्ष अस्तित्व, जीवन आम्हाला लाभलें म्हणजे आम्हीं विश्वाला, विश्वांतील अस्तित्वाला, जीवनाला रजा द्यावी काय - दिलीच पाहिजे काय? विश्व व विश्वांतील जीवन खोटें असें मानावें काय, मानलेंच पाहिजे काय ? या विश्वाचा आणि विश्वातीताचा संबंध कसा आहे ? हे प्रश्न उभे राहतात.
पान क्र. ४२
दोन हजार वर्षांपूर्वी जेव्हां जुन्या आर्य जगांतील समतोलपणा बुद्धमतानें बिघडविला तेव्हांपासून जडाविरुद्ध आत्म्याचें हें बंड भारतीय मनावर अधिकाधिक प्रभाव गाजवीत आलें आहे. भारतीय विचारांत विश्वाच्या असत्यतेची, भ्रमरूपत्वाची भावना सर्वत्र भरलेली आहे असें नाहीं; जगन्मिथ्यावादाप्रमाणें दुसरेहि वाद भारतीय तत्त्वज्ञानांत आहेत; भारतीय धार्मिक ध्येयांत संन्यासी ध्येयापेक्षां वेगळीं ध्येयेंहि आहेत. अगदीं अतिवादी तत्त्वज्ञानांच्या वादांतहि जडतत्त्व आणि आत्मतत्त्व यांचा विरोध कमी
पान क्र. ४३
करून, दोहोंत समन्वय साधण्याचा प्रयत्नहि थोडाबहुत केलेला आढळतो, तथापि वरील महान् नकाराचीं छाया सर्वांच्या जीवनावर पडलेली आहे, सर्वांचें जीवनाचें अंतिम ध्येय संन्याशाची कफनी, हें आहे असें दिसेल. जीवनाचीं जीं सर्वसाधारण कल्पना आहे तींत कर्माच्या शृंखलेसंबंधाची बौद्ध उपपत्ति भरलेली असल्यामुळें बंध आणि मोक्ष - जन्मानें बंध आणि जन्म येण्याचें संपण्यानें मोक्ष - ही अन्योन्य विरोधी जोडी त्या कल्पनेंत आहे. या कारणानें या सर्व आवाजांतून असा एकच महान् सूर निघतो कीं, आम्हाला हवें असलेलें स्वर्गीय राज्य या द्वंद्वांच्या जगांत असूं शकणार नाहीं, तें या जगाच्या पलीकडे कोठेंतरी आहे; शाश्वत १वृंदावनांतील आनंद-भोग, २ब्रह्मलोकांतील श्रेष्ठ सुख, सर्व व्यक्ताच्या पलीकडे असलेलें अवर्णनीय निर्वाण,३ जेथें भेदाचा अनुभव समूळ संपतो असें निर्गुण अनिर्वाच्य एकरस शांत अद्वैत - या अवस्थांत कोठेंतरी स्वर्गीय राज्य आहे, या जगांत तें नाहीं व असूं शकणार नाहीं.
या स्वर्गांपैकीं कोठल्यातरी स्वर्गाकडे साधकांचें लक्ष लागलेलें आढळतें. या प्रवृत्तीनुसार शतकानुशतकें भारतांत शेंकडों महापुरुष हाच एक कळकळीचा, उच्च आणि दूरगामी संदेश देत आले आहेत कीं, ''भौतिक जीवनाचा संन्यास हा एकच ज्ञानप्राप्तीचा मार्ग आहे; भौतिक जीवनाचा अंगीकार ही अज्ञानाची प्रवृत्ति आहे, मानवाच्या जन्माचा खरा उपयोग जन्मापासून सुटका करून घेणें हा आहे. आत्म्याची हांक ऐका, जडापासून निवृत्त व्हा, जडाचा संबंध तोडून टाका.'' हा संदेश देणारे महापुरुष, संत आणि सद्गुरु यांची जणुं एक मोठी मालिकाच गेलीं कित्येक शतकें वरील संदेशांतील उपदेश स्वत: आचरून व त्याच्या
१ शाश्वत वृंदावन म्हणजे गोलोक. हा वैष्णवांचा स्वर्ग, येथें शाश्वत सौंदर्य व शाश्वत सुख आहे.
२ ब्रह्मलोक म्हणजे शुद्ध अस्तित्व, जाणीव आणि सुख असलेली परमोच्च स्थिति. अनिर्वाच्य अद्वैतात पूर्णपणें विलीन न होतां, लाभूं शकणारी ही स्थिति आहे.
३ निर्वाण म्हणजे लय, विलय : सर्वच अस्तित्वाचा विलय असा याचा अर्थ घेतला पाहिजे असें नाहीं. आपल्याला ज्याचा अनुभव येतो त्या अस्तित्वाचा लय - अहम्, वासना, अहंमूलक वृत्ति व कृति यांचा नाश, यांचा लय - एवढाच निर्वाण याचा अर्थ होतो.
पान क्र. ४४
सत्यतेचा स्वत: अनुभव घेऊन मग लोकांना तो कळकळीनें देत आलेली आहे; या थोर अनुभवी तेजस्वी संतांना आणि सद्गुरुंना भारत थोर मान देत आला आहे, त्यांची स्मृति तो पवित्र मानीत आला आहे. भारतीयांच्या कल्पनेमध्यें त्यांना फार प्रभावी स्थान आहे.
संन्यासी मनोवृत्तीशीं सहानुभूति बाळगणारें हें युग नाहीं. भारत सोडून सर्व जगांत, संसार सोडणाऱ्या विरक्तांना मान देण्याचा काळ संपला आहे किंवा संपत आला आहे. अशा काळी, अशा युगांत संन्यासाच्या थोर प्रवृत्तीचें कारण, भारतांतील प्राचीन आर्यजातीची जीवनशक्तीच कमी झाली होती हें आहे, असें प्रतिपादन करणें सोपें आहे. 'प्राचीन भारतीयांनीं मानवजातीच्या सर्वसामान्य प्रगतीच्या कार्यांत फार मोठा भाग घेतला, मानवी ज्ञानसंवर्धनांत आणि मानवी कर्तबगारींत त्यांनीं अनेक दिशांनीं भरपूर कार्य करून भर घातली आणि हें जें ओझें पुष्कळ काळ त्यांनीं शिरावर वागविलें त्यामुळें ते थकून गेले, त्यांची जीवनशक्ति आटून गेली आणि या कारणानें त्यांच्यामध्यें संन्यासाची प्रवृत्ति उदय पावून वाढत गेली,' अशीं कारणमीमांसा थोर पराक्रमी संन्यास-प्रवृत्तीच्या गळ्यांत आजच्या युगांत बांधली जाणें स्वाभाविक आहे, सोपें आहे. तथापि आपण ही गोष्ट नजरेआड करतां कामा नये कीं, मानवाच्या ज्ञानशक्तींत जी शक्यता आहे, त्या शक्यतेचें शिखर, ज्ञानाचें उंचांत उंच शिखर गांठून तेथें अस्तित्वाच्या श्रेष्ठतम सत्याचा पूर्ण साक्षात्कार त्यांनीं संपादन केला, आणि या साक्षात्काराच्या प्रभावामुळें त्यांनीं त्याला अनुरूप असा संन्यासमार्ग स्वीकारला व तो स्वीकारण्याचा साधकांना संदेश दिला. व्यवहार दृष्टीनें विचार करतां, मानवाच्या पूर्णतेला संन्यासी मनोवृत्ति आजहि एक आवश्यक गोष्ट आहे असें दिसेल; आणि मानवाच्या पूर्ण विकासाला साहाय्यक म्हणून नव्हे तर, स्वतंत्रपणें देखील संन्यासाची इष्टता व श्रेष्ठता प्रतिपादणें तोपर्यंत अटळ आहे, जोपर्यंत मानव आपली बुद्धि, आपली वासना-विकारांची रूढ जीवनसरणि, भोगैकपरायण, निर्बुद्ध, नित्य जुलुम करणाऱ्या पशुत्वाच्या दास्यांतून मुक्त करीत नाहीं.
आम्ही संन्यासाचा मार्ग थोर पराक्रमी मानीत असलों तरी आम्हाला संन्यासाचें ध्येय एकांगी वाटतें. संन्यासी किंवा जडवादी एकांगी जीवन आम्हाला इष्ट वाटत नाहीं. आम्हांला त्याहून महान् व पूर्णतर जीवन साधावयाचें आहे, म्हणून संन्यासी व जडवादी सिद्धांतांहून महान् व पूर्णतर सिद्धांत आम्ही प्रतिपादन करूं इच्छितों. आम्हांला हें मान्य आहे
पान क्र. ४५
कीं, ''एकमेवाद्वितीयं ब्रह्म'' या महान् वेदांती सूत्राला भारतीय संन्यासधर्म शिरोधार्य मानतो. परंतु ''सर्वं खलु इदम् ब्रह्म'' हें ''एकमेवाद्वितीयम् ब्रह्म'' या सूत्राइतकेंच वेदांती सूत्र आहे; व हीं दोन्ही सूत्रें सारखींच शिरोधार्य आहेत ही गोष्ट या संन्यासधर्मानें दृष्टिआड केली आहे. दुसऱ्या सूत्राच्या प्रकाशाच्या साह्यानें पहिल्या सूत्राचें वाचन व मनन शांतपणें व सावकाशीनें जितकें करावयास हवें तितकें संन्यासधर्मीयांनी केलें नाहीं असें म्हणणें प्राप्त आहे. उंच उंच ठिकाणीं देवाधिदेव, परमात्मा, पुरुषोत्तम (एकमेवाद्वितीयम् ब्रह्म) आहे, त्याला भेटण्यासाठीं उंच उडी घेण्याची तीव्र भावनोत्कट आकांक्षा मानवाचें हृदयांत वागणें अवश्य आहे हें संन्यासधर्मानें ओळखलें. परंतु हा परमात्मा, हें ब्रह्म आपल्या उंच ठिकाणावरून खालीं वांकून, स्वतःचें दर्शन ज्यांत आहे त्या विश्वाला, त्या आपल्या साकार आत्म्याला, विश्वरूपाला नित्य पोटाशीं धरून असतें या गोष्टीकडे त्या धर्माचें दुर्लक्ष झालें. विश्वातीत ब्रह्म विश्वरूप ब्रह्माशीं नित्य जोडलेलें आहे. विश्व, जडाच्या पोटीं आहे, आणि जड, ब्रह्माच्या पोटीं आहे. विश्वातीत ब्रह्म (आत्मा), विशुद्ध आत्मा म्हणून प्रत्ययास येतें हें ब्रह्माचें आत्मविषयक सत्य संन्यासधर्मानें ओळखलें, अनुभविलें. परंतु जडांतला ब्रह्माचा भाव त्याला नीट आकलन झाला नाहीं. प्राचीन वेदांती महापुरुषांनीं ब्रह्माची समग्र उंची पूर्णतेनें ओळखली होती व त्याबरोबर त्याचा समग्र विस्तार, त्याचा समग्र समावेशक धर्म देखील पूर्णतेनें ओळखला होता. परंतु संन्यास धर्मीयांना ब्रह्माच्या समग्र उंचीचें पूर्ण आकलन झालें तरी त्याच्या समग्र विस्ताराचें आकलन झालें नाहीं. असो. आजवरच्या सिद्धांतांहून जो पूर्णतर सिद्धांत आम्हाला मांडावयाचा आहे, तो मांडतांना मानवी जीवन ऊर्ध्वगतीच्या दृष्टीनें शुद्ध आध्यात्मिक प्रेरणेनें जें कार्य केलें आहे त्याला कमी लेखण्याचा प्रमाद आमच्या हांतून घडतां कामां नये. भौतिक जडवादानें परमात्म्याचें हेतू कमी अधिक पूर्ण करण्याची जी मोठी कामगिरी नकळत केली आहे, ती आपण पाहिलीच आहे. संन्यास धर्मानें मानवी जीवनाची जडवादाहून कितीतरी अधिक व अधिक श्रेष्ठ अशी सेवा केली आहे. तेव्हां जडवादाप्रमाणें संन्यासवादालाहि आपण धन्यवाद दिले पाहिजेत. अंतिम सुसंवादी जीवनाचा म्हणून जो सिद्धांत आम्ही मांडणार आहोंत त्यांत भौतिक शास्त्रांतील सत्य गोष्टी आणि खरोखरी उपयुक्त अशा गोष्टी काळजीनें अंतर्भूत करणार आहों. या शास्त्राचीं आजचीं रूपें व सूत्रें
पान क्र. ४६
बरीचशीं किंवा सर्वच्या सर्व बाजूला ठेवावीं लागलीं किंवा मोडतोड करून वापरावी लागलीं तरी त्यांतील उपयुक्त व सत्य गोष्टी आम्ही अवश्य जपून ठेवूं. आर्यांच्या भूतकालीन आध्यात्मिक संपत्तीचा जो वारसा आमच्यापर्यंत आला आहे त्या वारशाची वहिवाट करतांना, सत्याची व उपयुक्त गोष्टींची जपणूक करण्याचें तत्त्व ज्या काळजीनें आम्हीं भौतिक शास्त्राला लावणार आहों, त्याहिपेक्षां अधिक काळजीनें तें तत्त्व या आमच्या आध्यात्मिक संपत्तीला लावणें आमचें कर्तव्य आहे.
पान क्र. ४७
प्रकरण चौथें
सर्वव्यापी सत्तत्व
तो परमात्मा असत्-ब्रह्म आहे असें ज्ञान ज्याला झालें तो केवल 'असत्' - अस्तित्व नसलेला - असा होतो. ब्रह्म आहे असें ज्ञान ज्याला झालें तो सत्य अस्तित्व, सत्य आत्मा, अस्तित्वांतील सत्य म्हणून ओळखला जातो.
- तैत्तिरीयोपनिषद् २.६
विशुद्ध आत्मा आणि विश्वमृत्तिका, विश्वाचें जड द्रव्य, या दोघांचेंहि हक्काचें मागणें आम्हीं मान्य केलें आहे; आम्हांमध्यें विशुद्ध आत्मा, त्याचें स्वभावगत पूर्ण अनंत स्वातंत्र्य व्यक्त करूं मागत आहे आणि जड विश्वद्रव्य या व्यक्ततेचा, आविष्काराचा सांचा होऊं मागत आहे, पाया होऊं मागत आहे. शुद्ध चैतन्य (आत्मा) आणि शुद्ध जड (विश्वद्रव्य) या दोन वस्तू दोन टोंकांच्या व सर्वथा अन्योन्य विरोधी भासतात आणि या दोन वस्तूंनीं दोन बाजूंनीं केलेल्या मागण्या आम्ही मान्य करीत असल्यामुळें आम्हाला असें एक सत्य गांठावयास हवें कीं, जें या दोन्ही वस्तूंचा समन्वय पूर्णपणें साधील, आमच्या जीवनामध्यें या दोन्ही वस्तूंना योग्य भाग पुरवील आणि आमच्या विचारामध्यें दोन्ही वस्तूंचे योग्य समर्थन करील. दोहोंपैकीं कोणाचाहि कोणताहि हक्क या सत्यानें बुडवितां कामा नये. दोहोंतहि परम सत्य वास करीत आहे ही गोष्ट या आमच्या समन्वयी सत्यानें नाकारतां कामा नये. चैतन्यवाद किंवा जडवाद आपापल्या परीनें चुकत असेल, अतिरेक करून कोणाला अन्यायानें बहिष्कृत करीत असेल, परंतु या चुका व हे अतिरेक त्या परमात्म्याच्या आश्रयानेंच होत असतात; त्या परमात्म्यांतूनच त्यांना सारखें बळ मिळत जातें, ही गोष्ट विसरून चालणार नाहीं. एखादा अतिरेकी सिद्धांत मांडला गेला आणि त्या सिद्धांतानें मानवी मनाला प्रबळ मोहिनी घातली कीं आपण निश्चितपणें असें समजावे कीं, तो अतिरेकी सिद्धांत सर्वथा चूक, सर्वथा
पान क्र. ४८
भ्रम किंवा आभास नसून त्या सिद्धांतांत कांहींतरी महान् श्रेष्ठ वस्तु किंवा शक्ति झांकलेली आहे आणि त्या वस्तूपुढें नतमस्तक होऊन तिचे ठिकाणीं निष्ठा ठेवणें हें आपलें कर्तव्य आहे. हें कर्तव्य आपण न केलें तर, त्या वस्तूला नकार दिला किंवा बहिष्कार घातला तर, या अपराधाचें शासन त्या वस्तूकडून आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाहीं; नकाराचा किंवा बहिष्काराचा बदला ती वस्तु घेईलच. जड आणि चैतन्य या दोन टोंकांच्या वस्तूंमध्यें दिसणारा विरोध मिटविण्यासाठीं कांहीं केवळ तडजोडीची व्यवस्था केली तर त्या व्यवस्थेनें विरोधाचा प्रश्न पूर्णपणें मिटत नाहीं, तडजोड ही समाधानकारक अंतिम व्यवस्था होऊं शकत नाहीं. तडजोड म्हणजे करार; दोन विरोधी शक्तींमध्यें झालेला, विरोधी हितसंबंधांचें एकमेकींनीं कमी अधिक संरक्षण करण्याचा व्यवहारी करारनामा. या करारनाम्यानें त्या दोन शक्तींचा खरा समेट, खरा मेळ घडून येत नाहीं. खरा मेळ व्हावयाचा तर दोन्ही शक्तींनीं एकमेकींचें अंतरंग सहानुभूतीनें समजावून घ्यावयास हवें, एकमेकींनीं एकमेकीस स्वत:मध्यें शक्य तेवढें सामावून घ्यावयास हवें, आणि या रीतीनें कमी अधिक प्रमाणांत दोघींची हृदयाची एकता, जिव्हाळ्याची एकता निर्माण व्हावयास हवी. तेव्हां जड आणि चैतन्य यांना आपण शक्य तितकें अधिकांत अधिक एकत्र आणूं शकलों, त्यांचा अधिकांत अधिक संयोग साधूं शकलों तरच त्या दोघांना खऱ्या समेटानें जोडणारें, दोघांचा खरा समन्वय साधणारें सत्य आम्हाला लाभेल आणि त्यायोगें व्यक्तीचें आंतरिक जीवन आणि बाह्य जीवन व्यवहारतः अन्योन्य सुसंवादी होण्यासाठीं लागणारा भरभक्कम पाया, सुदृढतम आधार आपणांस मिळेल.
विश्वचैतन्य (Cosmic Consciousness) हें चैतन्य आणि जड यांच्या संयोगाचें स्थान आहे हें आपण पाहिलें आहे. या ठिकाणीं चैतन्य आणि जड परस्परांना सत्यत्वानें सत्यवस्तु म्हणून ओळखतात. या दोन तत्त्वामध्यें मध्यस्थीचें काम प्राण आणि मन हीं दोन तत्त्वें करतात. पण ही व्यवस्था विश्वचैतन्यांत असते. सर्व साधारण मनाच्या अहंकारी अवस्थेंत चैतन्य असतांना, मन आणि प्राण वेगळ्या तऱ्हेनें वागतात. शुद्ध चैतन्य आणि जड यांना विभक्त करण्याचें, दोहोंमध्यें नसतें भांडण लावण्याचें काम त्यांजकडून होत असतें. मनाचीं अहंयुक्त सामान्य अवस्था संपून त्याला विश्वव्यापी जाणीव, अर्थात विश्वचैतन्याची अवस्था प्राप्त झाली म्हणजे त्याला नवा प्रकाश मिळतो, नवें ज्ञान मिळतें; एकता आणि
पान क्र. ४९
अनेकता दोन्ही गोष्टी सत्य आहेत, एकाच वेळीं सत्य आहेत, ही गोष्ट त्याला स्पष्ट दिसते. मग तें, या दोन सत्य वस्तूंच्या मध्यें असणारीं अन्योन्य व्यवहाराचीं सूत्रें आत्मसात् करतें; स्वत:मध्यें त्याला पूर्वीं अनुभवास येणारे सर्व विसंवाद या नव्या प्रकाशांत, त्यांचें कारण लक्षांत येऊन दूर होतात, त्यांचें ठिकाणीं दिव्य मेळ अनुभवास येतो, पूर्वींच्या विसंवादी गोष्टी सुसंवादी होतात; यामुळें त्याला संतोष वाटतो आणि ईश्वर व प्राणाधिष्ठित संसारी जीवन यांच्या पूर्ण अविभक्ततेची सिद्धि हें मानवाच्या विकासाचें अंतिम ध्येय आहे ही गोष्ट त्याला कळल्यानें आणि पटल्यानें, तें या सिद्धीचें साधन होण्यास स्वखुषीनें मान्यता देतें. विश्वचैतन्याच्या अवस्थेंतील प्रकाश मनाला उपलब्ध झाला म्हणजे त्याची विचारशक्ति सूक्ष्मदर्शी होते, प्राणाला उपलब्ध झाला म्हणजे इंद्रियें सूक्ष्मस्पर्शी होतात. या सूक्ष्म मनाला व प्राणाला जड द्रव्य हें, साकार होऊन सुविस्तृत संसार करूं पाहणाऱ्या चैतन्याच्या आकाराचें ठिकाणीं, शरीराचें ठिकाणीं आहे, असा साक्षात्कार होतो; आणि जड द्रव्याचें सारतत्त्व, सत्व, आत्मा आहे असे त्यांना स्पष्ट ज्ञान होतें; आणि या मध्यस्थ मन-प्राणरूपी दूतांच्या द्वारां एकमेकांची पुरी ओळख पटल्यानें आत्मचैतन्य जडाला आणि जड आत्मचैतन्याला दिव्य सत्यवस्तु म्हणून आणि स्वत:शीं तत्त्वत: एकरूप म्हणून मान्यता देतें. विश्वचैतन्याच्या प्रकाशांत हेंहि स्पष्ट होतें कीं, मन आणि प्राण हीं परात्पर चैतन्य-पुरुषाचीं साकार प्रतीकें व साधनें असून यांच्याद्वारां तो पुरुष संसार-विस्तार करून जड आकाराच्या घरांत, देहांत आत्मा म्हणून प्रवेश करतो, आणि या घरांत राहत असतां यांच्याच द्वारां दुसऱ्या अनंत जड देहांत असणाऱ्या आपल्या जाणीवकेंद्रांना, आत्म्यांना आपलीं ओळख पटवितो. परात्पर चैतन्यपुरुष विश्वाच्या प्रतीकांत आपलें जें सत्य व्यक्त करीत आहे, तें मनानें स्वतःमध्यें निर्मळ आरशाप्रमाणें प्रतिबिंबित करावें, यांतच त्याची कृतार्थता आहे आणि प्राणाची कृतार्थता यांत आहे कीं, त्यानें आपल्या शक्ती जाणीवपूर्वक त्या दिव्य परम पुरुषाच्या हवालीं कराव्या, अशाकरितां कीं, त्याला, त्या परम पुरुषाला आपलें पूर्ण अंतरंग पूर्णपणें व्यक्त करण्यासाठीं विश्वसंसारांत नित्य नवे आकार, नित्य नवे क्रियाप्रकार उभे करतां यावे.
मनाची आणि प्राणाची कृतार्थतेची जी कल्पना आतांच सांगितली तिजवरून, मनुष्याला विश्वांत दिव्य जीवन जगणें शक्य आहे, असें दिसून
पान क्र. ५०
येतें. भौतिक शास्त्र, विश्वाच्या आणि पृथ्वीच्या क्रमविकासाविषयीं प्रतिपादन करीत असतें. मनुष्याला दिव्य जीवन शक्य असेल तर वरील क्रमविकासाचें तें एक बुद्धिगम्य ध्येय मानतां येईल, त्या क्रमविकासाला कांहीं जिवंत अर्थ आहे असें स्पष्ट होईल आणि दिव्य मानवी जीवन, व त्याची शक्यता यामुळें विकाससिद्धांतवादी भौतिक शास्त्राचा खटाटोप समर्थनीय ठरेल. त्याचप्रमाणें, दिव्य जीवनाच्या प्रयत्नानें, मनुष्याचा सामान्य आत्मा पार बदलून त्याचें ईश्वरी स्वरूप प्रकट होईल; अर्थात् सर्व महान् धर्मपंथाचें महान् ध्येय सिद्ध होऊन त्या धर्मांचेंहि भौतिकशास्त्राबरोबर समर्थन होईल.
कर्त्या ब्रह्माची ही गोष्ट झाली. पण ज्या अकर्त्या ब्रह्माची ओढ संन्याशाला असतें, विशुद्ध, स्वयंभू, स्वानंदी, असें ज्या अकर्त्या शांत ब्रह्माचें वर्णन केलें जातें व ज्याचा साक्षात्कार हा संन्याशाच्या संन्यासी पंथाचें कायमचें थोर समर्थन म्हणून आपण मान्य केला आहे त्या अकर्त्या ब्रह्माचें कर्त्या ब्रह्माशीं अनिवार्य विरोधाचें नातें आहे कीं काय? नाहीं. असें नातें मुळींच नाहीं. उलटपक्षीं दोहोंमध्यें सुसंवादाचें नातें आहे, हेंच प्रकाशमय सत्य आहे. एका ब्रह्मानें विश्वाची- 'भ्रमरूप विश्वाची' -उभारणी करावी, दुसऱ्या ब्रह्मानें त्याचें अस्तित्व नाकारावें, अशीं कांहीं खरी स्थिति नाहीं. कर्ते ब्रह्म आणि शांत अकर्ते ब्रह्म या वेगवेगळ्या वस्तू नसून एकाच अभेद्य ब्रह्माचीं हीं दोन रूपें, एक विधायक व दुसरें अ-विधायक, पण एकाचें दुसऱ्यावांचून चालत नाहीं अशीं हीं दोन रूपें आहेत. अ-विधायक शांत ब्रह्मांतूनच तो शब्द नित्य निघत असतो, जो शब्द विधात्याचें विधायक काम करून विश्वांची निर्मिति करीत असतो, आणि ही निर्मिति करणारा शब्द म्हणजे दुसरें तिसरें कांहीं नसून शांत ब्रह्माच्या पोटीं जें स्वत: लपून बसलेलें असतें, त्याचें स्वयमाविष्करण होय. अनंत अगण्य विश्वमाला निर्माण करणारी आणि त्या विश्वमालांमध्यें अखंडपणें नित्य क्रियाशील असणारी ब्रह्माची पूर्ण स्वतंत्र सर्वसमर्थता ही त्याच्या पूर्ण, सर्वसहिष्णु नित्य, साक्षीभूत अकर्तेपणामुळेंच संभवते. कारण ब्रह्माची क्रियाशीलता म्हणजे काय ? ब्रह्म मुळांत स्वयंभू ज्ञानशक्तिमय अस्तित्व आहे. तें आहे तसेंच नित्यशांत, अक्षर, अव्यय एकरस राहून आपल्या अनंतप्रसवा प्रवृत्तिशील प्रकृतीला कार्यप्रवृत्त होण्यास संमति देते. तिच्या प्रवृत्तींतून ज्या घटना घडणार त्यांना लागणारी विविध प्रकारची शक्ति, तसेंच त्या घटनांची अमर्याद
पान क्र. ५१
विविधता व्यक्त होण्यास आणि या विविध घटनांमध्यें सुमेळ, सुसंवाद घडून येण्यास लागणारें असीम सामर्थ्य, तें ब्रह्म आपल्या अनंत शक्तिभांडारांतून प्रकृतीला आत्मीयतेनें पुरवते - हीच ब्रह्माची क्रियाशीलता होय.
मनुष्य पूर्ण व्हावयाचा तर त्यानेंहि ब्रह्माची परम शांति आणि अनासक्ति आपल्या हृदयांत सुप्रतिष्ठित करावयास हवी आणि आपल्या अविश्रांत स्वयंस्फूर्त श्रमांना या शांतीचा आणि अनासक्तीचा आधार द्यावयास हवा. त्याचप्रमाणें ब्रह्माची दिव्य सहिष्णुता आणि त्याचा दिव्य संतोष मनुष्याच्या अनासक्त परिश्रमांत व्यक्त व्हावयास हवा. या प्रकारची पूर्णता ज्यांनीं मिळविली आहे, ज्यांच्या हृदयांत ब्रह्माची (ब्रह्मासारखी) शांति सुप्रतिष्ठित झाली आहे, त्यांना या शांतीतून विश्वांत काम करणाऱ्या शक्तींचा कधींहि न संपणारा पुरवठा, जिवंत झऱ्यांतून पाणी मिळावें त्याप्रमाणें, सारखा मिळत आहे असें दिसेल. तेव्हां शांत ब्रह्म, शांत आत्मा स्वभावत: विश्वगत विश्वविषयक उद्योगांत पडत नाहीं, तो सर्वकर्मसंन्यास, सर्व कर्मापासून अलिप्तता स्वभावतःच पसंत करतो, हें प्रतिपादन सत्याला धरून नाहीं. क्रियामय विश्वसंसार आणि निष्क्रिय शांति या दोन अवस्था अन्योन्य विसंवादी, अन्योन्य विरोधी आहेत, हें जें आपल्या मनाला भासतें, तें चूक आहे आणि मनाच्या मर्यादा ही चूक त्याजकडून घडवितात. अमुक जाणिवेंत एक गोष्ट आहे तर तिच्या विरुद्ध स्वरूपाची भासणारी दुसरी गोष्ट त्या जाणिवेंत नसली पाहिजे, नाहीं, अशा प्रकारच्या 'आहे-नाहीं'मय अन्योन्यविरोधी अनुभवांची व सिद्धांतांची सवय मर्यादाबद्ध मनाला झाल्यानें त्याला अशी कल्पनाच येऊं शकत नाहीं कीं, अशी एक सर्वसमावेशक, व्यापक व समर्थ जाणीव असूं शकते, जिच्यांत त्याला स्वत:ला विरोधी भासणाऱ्या गोष्टी, एकाच वेळीं एकत्र असतात. तेव्हां ही वस्तुस्थिति आहे कीं, शांत ब्रह्म, शांत आत्मा विश्वसंसार टाकीत नाहीं, तर त्याला आधार होऊन त्याचा योगक्षेम चालवितो; किंवा असेंहि म्हणतां येईल कीं, प्रवृत्ति आणि निवृत्ति या दोन्ही वृत्तींना शांत आत्मा, सारखाच निःपक्षपाती आधार देतो, आणि आत्म्यानें सर्व प्रकारचे कार्य करीत रहावें आणि त्याबरोबर शांत आणि मुक्त, अनासक्त असावें, या समन्वयाचा तो पक्षपाती आहे, या समन्वयाला तो मोकळेपणें मान्यता देतो.
(शुद्ध शांत अस्तित्व आणि साक्षेपी संसारी अस्तित्व हीं अविरोधी आहेत, सत् ब्रह्म निष्क्रिय असून सक्रिय आहे व म्हणून आत्मा शांत आणि
पान क्र. ५२
साक्षेपी एकाच वेळीं असूं शकतों, ही गोष्ट आपण पाहिली.) आतां असत् ब्रह्म व त्यांत विलीन होणें अर्थात् निर्वाण, ''अस्तित्वांतून कायमची निवृत्ति,'' या गोष्टींची चर्चा राहिली. ''आरंभी हें सर्व असत्'' होतें, या ''असत्'' मधून ''सत्'' उदयास आलें, असें प्राचीन शास्त्रग्रंथांत (तैत्तिरीय उपनिषद् २-७) म्हटलें आहे. अर्थात् शेवटीं असत् मध्यें सत् बुडून जावयास हवें, असा सिद्धांत निघतो. अनंत, अभिन्न, एकमेव सत् (अस्तित्व) अनेक, अनंत, भिन्न वस्तूंच्या द्वारां व्यक्त होतें, भेदाच्या सर्व शक्यतांना अस्तित्वांत येण्यास मान्यता देतें असें सिद्ध झालें असलें, तरी निदान असत् ब्रह्म म्हणून जी सर्वप्रथम अवस्था, जी एकमेव नित्यसत्यता आहे ती तरी सत्य विश्वाच्या शक्यतेला नकार देते कीं नाहीं? असा नकार असत् देत असेल तर, कांहीं बौद्धपंथ विश्वाचें आद्यंत आणि वर्तमान स्वरूप म्हणून ज्या शून्याचा पुरस्कार करतात, तें शून्यच खरें मानावें लागेल व संन्यासपंथाला विश्वाचें कोडे उलगडलें आहे असें म्हणावें लागेल आणि जशी व्यक्तीमधील अहंवृत्ति ही खोट्या बाह्य जाणिवेनें निर्मिलेली एक कल्पना मूर्ति आहे, तशीं आत्मा ही देखील तिनेंच तशीच निर्मिलेली दुसरी कल्पनामूर्ति आहे, असें मानावें लागेल.
परंतु असा शून्यवाद मानण्याचा प्रसंग येत नाहीं. असत्, अनास्तित्व हा केवळ शब्द आहे. आपलें मर्यादाबद्ध मन शाब्दिक भेदावर फार भिस्त ठेवतें. शब्दभेद पूर्णतया सत्य, अंतिम वस्तुभेद दाखवितात असा त्याचा समज होतो; आम्हाला अतिमानसक्षेत्रांत जें अनुभव येतात तें अनुभव आमचे मर्यादाबद्ध मन आपल्या संवयीच्या भेदनिष्ठ पद्धतीनें पाहते आणि त्यासंबंधानें अवास्तव भेदात्मक विरोधात्मक शब्दांत सिद्धांत बांधतें. सत् आणि असत् यांचा अनुभव हा अतिमानसिक अनुभव आहे. मनाला 'सत् च्या उलट तें असत्' असा अर्थ प्रतीत होतो, पण हा अर्थ खोटा आहे. असत् नें जी वस्तु दाखविली जाते तिचें परीक्षण केलें असतां असें कळून येतें कीं, खरोखरीचा अस्तित्वाचा सर्वस्वीं अभाव अशक्य आहे, ती एक मनाची कल्पना आहे, ज्याप्रमाणें सत् म्हणजे अस्तित्व, केवळ शांत विश्वहीन अनंत अस्तित्व अथवा आत्मा ही एक मनाची कल्पना आहे. सत् च्या पोटीं विश्व येतें ही जशी वस्तुस्थिति आहे त्याप्रमाणें या विश्वांत आपण असतां, जें वास्तव अस्तित्व आपल्या अनुभवाला येतें, किंवा ज्याची आपण कल्पना करूं शकतो त्या अनुभवांतील किंवा कल्पनेंतील जें सूक्ष्मांत सूक्ष्म, शुद्धांत शुद्ध वास्तव अस्तित्व असेल, त्याच्या पलीकडील
पान क्र. ५३
कांहींतरी अस्तित्व असा असत् चा अर्थ आहे. अमुक अशी स्पष्ट कल्पना देखील ज्याच्या संबंधानें आपण बांधूं शकत नाहीं तें असत्, अनास्तित्व; ही जी अनास्तित्वाची, अभावाची अवास्तव कल्पना आम्ही उभी करतो ती एवढ्याकरितां कीं, आम्हाला जे माहीत आहे किंवा होऊं शकतें, आम्ही जे कांहीं जाणीवपूर्वक आहोंत किंवा असतों, त्या सर्व गोष्टींच्या पलीकडील कांहीं गोष्ट आम्हाला सुचवावयाची आहे हें स्पष्ट व्हावें. सर्व ज्ञात, ज्ञेय गोष्टींना 'नाहीं नाहीं,' 'नेति नेति' म्हणून वगळण्याची पद्धति वरील अनस्तित्वाच्या कल्पनेच्या बाबतींत आम्हीं वापरली आहे. ही 'नेति नेति' पद्धति, अज्ञेय अननुभूत असें कांहीं व्यक्त करण्यासाठीं उपयोगात आणावी लागते. कांहीं दर्शनात ज्या शून्याचें मंडन सांपडतें, त्या शून्याचा बारकाईनें विचार केला तर आम्हाला दिसून येतें कीं, हें शून्य वस्तुत: ''सर्व,'' ''अनिर्वचनीय अनंत'' आहे. मनाला तें शून्य भासतें, याचें कारण मनाला सीमाबद्ध रचनाच फक्त समजतात. तेव्हां शून्य हें शून्य नसून त्याच्या उलट, एकच एक खरी सद्वस्तु आहे.*
सत्, असत् यांच्या संबंधानें विचार करण्यासारखी आणखी एक गोष्ट आहे. ''असत् पासून
सत् जन्मास आलें'' अशीं भाषा आपण वापरतो याचा अर्थ, ज्या वस्तू कालातीत कालनिरपेक्ष आहेत त्यांच्याविषयीं कालाची भाषा आपण वापरतों. 'असत्' नित्य शाश्वत स्वयंभू असतां त्याच्या इतिहासांत असा महान् दिवस येतो कीं, सत् (तसेंच शाश्वत् स्वयंभू) त्यापासून जन्म
*छांदोग्य उपनिषदांत म्हटलें आहे कीं, असत् पासून सत् चा जन्म होऊं शकत नाहीं. सत् चा जन्म सत् पासूनच होऊं शकतो. अर्थात् हें तैत्तिरीयांतील विधानाच्या बरोबर उलट विधान आहे. तथापि, असत् याचा अर्थ अभाव-सर्वाचा सर्वथा अभाव-असा न घेतां आपल्या अनुभवाच्या, आपल्या कल्पनेच्या पलीकडे असलेलें कांहींतरी 'क्ष' असा आपण घेऊं शकतो आणि हा अर्थ घेतला म्हणजे छांदोग्याच्या विधानांत जी अशक्यता प्रतिपादिली आहे ती प्रतिपादिण्याचा प्रसंग येत नाहीं. कारण हें 'क्ष' म्हणजे अद्वैताचें 'केवल ब्रह्म' असूं शकेल, त्याला बौद्धांचें 'शून्यहि' म्हणतां येईल, आणि हें 'क्ष' किंवा असत्, सत् चें जन्मस्थान होऊं शकेल; मग हें सत् तें स्वतःतून सृजनक्रियेनें किंवा आविष्करण क्रियेनें उभें करो, अथवा हें सत् कल्पनात्मक किंवा रूपात्मक मायेचा त्या असत् च्या आधारानें त्या आधारावर झालेला भ्रमोत्पादक व्यापार असो.
पान क्र. ५४
घेते ! आणि दुसरा असाच महान् भव्य दिवस येणार कीं, ज्या दिवशीं सर्व, मिथ्याभूत सर्व सत् (शाश्वत सत्) त्या शाश्वत शून्यांत विलीन होणार ! ही सर्व भाषा अर्थशून्य आहे. तेव्हां दोन्ही वस्तु आहेत असें म्हणावयाचें तर एकाच वेळीं दोन्ही आहेत असा अर्थ घेतला पाहिजे. या दोन वस्तु एकमेकींत मिसळत नाहींत पण एकमेकीला आधार देतात, एकमेकीला मान्यता देतात. कालाच्या भाषेंत बोलावयाचें तर दोन्ही शाश्वतकालीन आहेत; आणि यापैकीं एक शाश्वत सत् खरोखर नाहींच, आणि दुसरें शाश्वत असत् मात्र आहे, एकटें एक आहे, हें विधान शाश्वत सत् नें कसें मान्य करावें ! सर्वच्या सर्व अनुभव ''नाहीं'' या सदरांत घातला तर, सर्व अनुभवाचें समाधानकारक स्पष्टीकरण करणारें सत्य आम्हाला कसें सांपडणार?
तेव्हां सत् असत् यांसंबंधानें खोल विचार करतां पुढील निर्णय निघतो. शुद्ध सत् हें अज्ञेय परात्पराचें एक नांव आहे. असत् हें त्याचेंच दुसरें नांव आहे. विश्वाच्या सर्वच्या सर्व अस्तित्वाचा स्वयंभू पाया, आधार, अधिष्ठान या नात्यानें सत् हें नांव त्या परात्परानें घेतलें आहे. विश्वाच्या अस्तित्वाचा, विश्वाच्या कसल्याहि अस्तित्वाचा आधार म्हणा, बंधन म्हणा त्या परात्पराला नाहीं; तें तत्त्व सर्वथैव स्वतंत्र आहे. या दृष्टीनें त्याला असत् हें नांव दिलें जातें. वास्तव अस्तित्व व्यक्त करणारें कोणतेंहि भावात्मक नांव - जें विश्वांत व्यवहार करणाऱ्या जाणिवेला सुचूं शकेल तें - त्या परात्पराला देतां येत नाहीं, असा असत् या नांवाचा अर्थ आहे. विश्वांतील जाणिवेचा विषय होणारें अस्तित्व कितीहि तात्त्विक, कितीहि भेदातीत केवल स्वरूपाचें असो - तें अस्तित्व जेथें नाहीं तें, असा असत् या नावांतील भाव आहे. त्या अज्ञेय परात्पराला ''विश्वगत अस्तित्वापासून सर्वथैव स्वतंत्र'' म्हटलें आहे; त्यांत हा एवढा अर्थ भरलेला आहे. मात्र हें लक्षांत ठेवावें कीं, असत् या नांवानें असें सुचविलें जात नाहीं कीं, विश्वगत स्थूल, सूक्ष्म तात्त्विक केवल अस्तित्व, त्या परात्पराचें खरें आविष्करण नाहीं; तें नांव एवढेंच स्पष्ट करतें कीं, कोणतेंहि आविष्करण किंवा समुच्चयानें सर्व आविष्करण, त्या परात्पराला मर्यादित करीत नाहीं. तेव्हां हा निर्णय लागला कीं, असत् हें सत् ला तशीच अनुमति, मोकळीक देतें, जशी शांत सत् आपल्या प्रवृत्तिशील प्रकृतीला अनुमति, मोकळीक देतें. विरोधात्मक भासणारीं विधानें खरोखरी एकमेकांचीं पूरक विधानें असतात. सत् आणि असत् हीं पदें अशींच एकमेकांना
पान क्र. ५५
काट देणारीं नसून, एकमेकांचीं पूरक पदें आहेत. जो मानवात्मा जागृत झाला आहे त्याला एकाच वस्तूला एकाच वेळीं दिलेलीं (सत् आणि असत्) हीं दोन नांवें उपयोगी पडतात. आपला विज्ञानमय अंतरात्मा आणि त्याचे पलीकडे असणारें अज्ञेय तत्त्व, या दोन भिन्न गोष्टी नसून एकच सद्वस्तु - एकाच सद्वस्तूच्या दोन अवस्था - आहेत हा साक्षात्कार त्याला एकदम घडविण्यास हीं दोन नांवें कारणीभूत होतात. बुद्धानें निर्वाण प्राप्त करून घेऊन त्यानंतर विश्वांत अत्यंत प्रभावी कार्य केलें, याचें कारण त्याला वर सांगितलेला एकाच क्षणीं घडलेला दुहेरी साक्षात्कार होय. बुद्ध हा अंतर्यामी अत्यंत शांत त्रयस्थ वृत्तीचा असे, पण त्याच्या कार्यांत जगाला अत्यंत प्रभावी व्यक्तित्वाचा साक्षात्कार झाला. जगांत प्रभावी वैयक्तिक जीवन जगलेला व तितकेंच प्रभावी जागतिक कार्य करून गेलेला दुसरा महापुरुष विरळा.
ब्रह्मविषयक सत् असत् इत्यादि शब्दांचा जो ऊहापोह आतांपर्यंत केला आहे त्यावर विचार केला, तर हें लक्षांत येईल कीं, आपण जे शब्द वापरतों त्या शब्दांत स्वत:च्या योग्यतेबद्दल, खरेपणाबद्दल कितीहि अतिरेकी अहंभाव दिसला तरी त्यांत दुबळेपणाच पुष्कळ असतो, त्यांचा अहंभाव पुष्कळच मिथ्या असतो. त्याचप्रमाणें या शब्दांनीं कांहीं वस्तुभेद व्यक्त होत असला तरी तो वस्तुभेद पुष्कळसा भ्रामक व गोंधळ उत्पन्न करणाराच ठरतो. आम्ही विशिष्ट शब्दांच्या आहारीं जाऊन ब्रह्मावर ज्या मर्यादा घालीत असतों, त्याचें कारण वैयक्तिक मन, आपल्या अतिसंकुचित अनुभवाच्या आधारावर, अज्ञेय ब्रह्माच्या एखाद्या बाजूला आपल्या सर्व शक्तीनें उचलून धरतें आणि त्याच्या दुसऱ्या बाजू तुच्छ आहेत किंवा त्याला दुसऱ्या बाजू मुळीं नाहींतच असा आग्रह धरतें. त्या परात्पर केवल ब्रह्माविषयीं जें निश्चित किंवा अनुमानिक ज्ञान आपल्याला होतें त्याचा आपल्या विशिष्ट मर्यादित परिसराच्या भाषेंत अति कांटेकोरपणें अर्थ लावण्याकडे आपली प्रवृत्ति असते. याप्रमाणें, एकमेव अद्वितीय ब्रह्म एकच आहे, दुसरे म्हणून कांहीं नाहीं, त्यांत एकरसता आहे, त्याच्या पोटांत अनेकतेला वाव नाहीं, असें प्रतिपादन आम्हीं करतो तेव्हां, यांत आमचे वैयक्तिक एकांगी अनुभव आणि या अनुभवांवर आधारलेलीं आमचीं मतें, अहंभावानें आम्ही इतरांच्या तसल्याच एकांगी अनुभवापेक्षां आणि मतांपेक्षां वेगळी आहेत आणि निर्णायक आहेत, असें आवेशानें प्रतिपादीत असतो. अशी घाई करून मर्यादित अनुभवांवर भिस्त
पान क्र. ५६
ठेवून अहंतेनें सावेश एकांगी प्रतिपादन करण्यापेक्षां आपलें ज्ञान वाढावें, अनुभव वाढावा, बुद्धि वाढावी व सूक्ष्म व्हावी, यासाठीं वेळ देणें आणि अधिक ज्ञान व अनुभव मिळवून बुद्धि व्यापक व सूक्ष्म करणें अधिक शहाणपणाचें होईल. ब्रह्मासारख्या वस्तूचें मानवाच्या भाषेला यथार्थ वर्णन करतां येणें अशक्य आहे हें जाणून व आपल्याला पूर्णता मिळवावयाची तर या अवर्ण्य वस्तूंविषयी कांहीं भाषा करणें अवश्यच आहे, हें ओळखून आम्हीं प्रतिपादनाची भाषा शक्य तितकी व्यापक, लवचिक, सर्वसंग्रही ठेवावी आणि या व्यापक पायावर व्यापक व सर्वस्पर्शी सुसंवादाची उभारणी करावी, ही गोष्ट वर सांगितल्याप्रमाणें घाईघाईनें केलेल्या एकांगी प्रतिपादनापेक्षां अधिक समंजसपणाची होईल.
व्यक्तीच्या जाणिवेला खूप उंच चढतां येतें हें आम्ही वर मान्य केलें आहे. या जाणिवेला अशी अवस्था प्राप्त करून घेतां येतें कीं, जींत मर्यादित, सापेक्ष अस्तित्व समूळ विरून गेल्यासारखें भासतें, मुळींहि अनुभवास येत नाहीं; इतकेंच नव्हे तर शुद्ध अस्तित्व, ज्याला विशुद्ध आत्मा म्हणून आम्ही ओळखतो तो देखील असमाधानकारक कल्पना म्हणून विरून जातो. विशुद्ध आत्म्यालाच शांत आत्मा, ''सत्'' म्हणतात. या शांत आत्म्याच्या पलीकडे आणखी शांत अस्तित्व आहे, त्या शांत अस्तित्वाच्या - असत् च्या - अनुभवाची अवस्था वैयक्तिक जाणिवेला प्राप्त करून घेतां येते, ही गोष्ट आम्ही मान्य केली आहे. तथापि हा ''असत्'' चा अनुभव म्हणजे आमचा अंतिम सर्वच्या सर्व अनुभव किंवा हे शांत शांत ब्रह्म म्हणजे एकच एक सत्य वस्तु, बाकी सर्व वस्तु असत्य, या प्रतिपादनाला आम्ही मान्यता देतो असा याचा अर्थ नाहीं. कारण वस्तुस्थिति निराळी आहे. निर्वाण किंवा ''असत्'' मध्यें, शांत शांत ब्रह्मामध्यें आत्मा विलीन करणें, या क्रियेनें आत्म्याला अंतरींच्या अंतरीं निरतिशय शांति व स्वतंत्रता अनुभवास येते, हें जसें खरें आहे तसें हेंहि खरें आहे कीं, त्या आत्म्याला बाह्य संसारांत प्रभावी, परिणामकारक कार्य निर्हेतुकतेनें व निस्पृहतेनें करावयास ही अंतरींची गाढ शांति उपकारक होते. हा स्थूल, भौतिक जन्म दुख:मय - क्लेशमय आहे, त्यांतून कायमची सुटका करून घ्यावी अशी बुद्धाची निर्वाणाची शिकवण आहे असें जें मानण्यांत येतें, तें बरोबर नाहीं; इतकें क्षुद्र ध्येय त्याच्या शिकवणीनें आमच्या समोर ठेवलेलें नाहीं असें आम्ही मानतों. त्याच्या शिकवणीचें सार आम्हाला असें दिसतें कीं, आत्म्यानें प्राकृतिक अहंच्या पाशांतून स्वतःस मोकळें करावें; या अहं-
पान क्र. ५७
करितां, आत्मा जी कर्मांची शृंखला निर्माण करतो ती त्यानें निर्माण करूं नये; बदलणाऱ्या, रूपांतर पावणाऱ्या देह, मन इत्यादि नश्वर वस्तूंशीं तादात्म्य पावून, एकरूप होऊन वागणें त्यानें (आत्म्यानें) सोडून द्यावें; अंतरींच्या शांत शांत ब्रह्माशीं एकरूप व्हावें, तेथील आत्यंतिक निश्चलपूर्ण व्यक्तिशून्यता व पूर्ण शांति आपलीशी करावी आणि या भक्कम पायावर उभे राहून बाह्य संसारांत निरपेक्ष प्रेम, निरुपाधिक सत्य, निर्दोष साधुभाव या सनातन सत्प्रेरणांनीं आदेशिलेलीं कार्यें, आपलें सर्व सामर्थ्य ओतून करावीं. बुद्धाच्या शिकवणीसबंधींची आमची कल्पना खरी असो किंवा नसो, ही गोष्ट निश्चित आहे कीं, पूर्णतासंपन्न मनुष्य क्रियाशीलता आणि शांति, ''सत्,'' आपल्या ठिकाणीं एकत्र नांदवतो, त्याप्रमाणें पूर्ण जागृत जाणिवेचा आत्मा ''असत्'' चे निरतिशय स्वातंत्र्य मिळवूनहि ''सत्'' आणि विश्व यांजवरची आपली पक्कड सोडत नाहीं. ब्रह्म विश्वांत आहे, विश्वाच्या अनेकतेपलीकडे त्याचा पाया म्हणून आहे, आणि त्या पायापलीकडे विश्वनिरपेक्ष विश्वाधारनिरपेक्ष असेंहि त्याचें स्वरूप आहे. (अनुक्रमें सर्वगत ब्रह्म, सद्ब्रह्म, असद्ब्रह्म अशीं या तीन स्वरूपांचीं नावें आहेत). हा ब्रह्माचा, ब्रह्मजीवनाचा सनातन चमत्कार पूर्ण जागृत जाणिवेच्या आत्म्याच्या जीवनामध्येंहि नित्यशः प्रतिबिंबित होईल. अशा आत्म्याचें वैयक्तिक मन, सामान्य जाणिवेच्या अवस्थेंत, सर्व लक्ष लावून ''असत्'' चें ध्यान करूं लागलें म्हणजे त्याला पूर्ण जागृत मनाच्या उलट अनुभव येतो. त्या ध्यानानें ती व्यक्ति आत्मविस्मृतींत बुडून जाते, आणि विश्वकार्यांतून निवृत्त होते; पण हें विश्वकार्य शाश्वत ब्रह्माच्या जाणिवेंत सदैव चालूच असतें, ती व्यक्ति निवृत्त झाली असतांहि चालूंच असतें.
याप्रमाणें विश्वचैतन्यांत शुद्ध चैतन्य आणि जडतत्त्व यांचा समन्वय आपण साधला. नंतर विश्वातीत चैतन्यांत ''सर्व आहे'' आणि ''सर्व नाहीं'' या विधानांचा समन्वय कसा होतो हें आपण पाहिलें. तें अज्ञेय विश्वातीत ब्रह्मचैतन्य अमुक अवस्थेंत आहे, अमुक क्रिया करीत आहे, अशा अर्थाची ब्रह्मविषयक सर्व भावात्मक विधानें असतात, आणि ब्रह्माविषयींच्या त्याच गोष्टीसंबंधाच्या अभावात्मक विधानांचा अर्थ असा असतो कीं, त्या अमुक अवस्थेंत असतांना, ती अमुक क्रिया करतांना ब्रह्म पूर्णपणें स्वतंत्र व अलिप्त आहे; ती अमुक अवस्था, ती अमुक क्रिया, ब्रह्माला आवश्यक आहे असेहि मुळींच नाहीं. थोडक्यांत, तें ब्रह्म ''सर्व आहे'' आणि ''सर्व नाहीं'' हें आपण समजून घेतलें. तें आम्हाला सर्वथा
पान क्र. ५८
अज्ञेय, परात्पर, आश्चर्यमय, अवर्णनीय असें तत्त्व असून आमच्या जाणिवेला अविश्रांतपणें सारखे धक्के देत राहतें. आमच्या जाणिवेसमोर तें ब्रह्म एकामागून एक अनंत रूपें घेतें आणि टाकतें. त्याची ओळख करून घेण्यासाठीं आमची जाणीव सारखी धडपडत राहते. ब्रह्म तिला ही धडपड करावयास लावतें. अर्थात् एखाद्या लहरी जादुगाराची किंवा मत्सरी हीन देवतेची भूमिका कांहीं ब्रह्म घेत नाहीं. एक मिथ्या गोष्ट आम्हापुढें उभी करावी, ती नाहींशी करून तिजपेक्षां अधिक मिथ्या असणारी गोष्ट तिच्या जागीं आम्हासमोर ठेवावी, आणि असें करीत करीत सर्व कांहीं मिथ्या आहे, असें आम्हाला पटवून, आम्हाला संसाराचा वीट आणावा, हा कांहीं ब्रह्माचा उद्योग चाललेला नाहीं. हळू हळू अधिकाधिक ज्ञान देण्याचा कार्यक्रम ज्ञानी आंखतो त्याप्रमाणें ब्रह्मानें आमच्यासाठीं कार्यक्रम आंखलेला आहे. आम्हाला तें आपलीं सत्य रूपें, एकाहून एक अधिक सत्य अशीं रूपें क्रमानें दाखवीत जातें व अखेरीस आम्हाला आकलन होणें अशक्य नाहीं अशी सर्वांत मोठी व सर्वांत गंभीर मूर्ति, सत्याची मूर्ति, आपल्या स्वत:ची मूर्ति तें आम्हाला दाखवितें. ब्रह्म हें सर्वत्र सर्वदा वावरणारें सत्य आहे, सद्वस्तु आहे, तें सतत होणाऱ्या आभासाचें सर्वव्यापी अधिष्ठान किंवा सर्वगामी कारण नव्हे.
विश्वव्यापारांत आणि मनोव्यापारांत सुसंवाद, सुमेळ नांदावा यासाठीं ब्रह्मासंबंधाची वर सांगितल्याप्रमाणें फोड करून सुसंवादाला अवश्य असा भावात्मक आधार व पाया निर्माण केला गेला आहे. अशा भावात्मक आधारावांचून, पायावांचून आम्हाला इष्ट असलेला सुसंवाद लाभणें शक्य नाहीं हा आधार आम्ही मान्य केला म्हणजे अज्ञेय ब्रह्मासंबंधानें आमच्या मनानें जे सिद्धांत बसविले आहेत त्यांपैकीं प्रत्येक सिद्धांत मनाला, अग्राह्य अशा सत्यासंबंधानें कांहीं सांगत आहे, हें लक्षांत वागवून आम्हीं त्या सिद्धांतांची व्यवस्था लावली पाहिजे; या सिद्धांताचा अर्थ लावतांना शक्यतों त्यांचा अन्योन्यसंबंध नेहमीं लक्षांत ठेवला पाहिजे, शक्यतों त्यांचा जीवनावर होणारा संभाव्य परिणाम लक्षांत घेतला पाहिजे, केवळ एकेकटा सिद्धांत घेऊन त्याचा स्वतंत्रपणें, लागेल तो अर्थ लावतां कामा नये. कोणताहि सिद्धांत दुसऱ्या कोणत्याहि सिद्धांताला खोटें ठरवील, बहिष्कृत करील किंवा अगदींच गौण स्थान देईल, असा कोणत्याहि सिद्धांताचा अर्थ लावता कामा नये. खरें अद्वैत तें, जें सर्व वस्तू एक ब्रह्मच आहे (झालें आहे) हें मान्य करतें; त्या ब्रह्माचे दोन सारखे तुकडे करून
पान क्र. ५९
त्याच्या अस्तित्वांत बरोबर मध्यभागीं एक विभागणारी रेषा काढून, एका वस्तूंतून दोन अन्योन्य विसंवादी वस्तू निर्माण करूं पाहणें हें खऱ्या अद्वैताचें काम नव्हे : या दोन विसंवादी वस्तू शाश्वत सत्य व शाश्वत भ्रम, ब्रह्म आणि अब्रह्म, आत्मा आणि अनात्मा, खरा आत्मा आणि खोटी पण शाश्वत माया, अशा नांवानें ओळखल्या जातात. या वस्तू खरे अद्वैत ओळखीत नाहींत. ब्रह्म एकच जर आहे, आत्मा एकच जर आहे, तर सर्व जें कांहीं आहे तें आत्मा आहे, ब्रह्म आहे हें ओघानेंच येतें, आणि आत्मा म्हणा, ईश्वर म्हणा, ब्रह्म म्हणा, जर असहाय अवस्था, मर्यादित शक्ति किंवा सीमाबद्ध व्यक्ति अशापैकीं कांहीं नसून स्वत:ची पूर्ण जाणीव असलेलें सर्व (सर्वात्मक एक) आहे, तर त्या अव्यक्तानें हें व्यक्त विश्वाचें जें रूप धारण केलें आहे, तें धारण करण्यांत त्याचा कांहींतरी अंतरींचा चांगला हेतु असला पाहिजे, असें मानावें लागतें. हा हेतु काय असावा याचा बरोबर शोध लागण्यासाठीं, आम्हाला ही गोष्ट तात्पुरती तरी गृहीत धरून चालावयास हवी कीं, जें जें व्यक्त झालेलें आहे त्यांत सर्वत्र कांहींतरी गुप्त सामर्थ्य, कांहींतरी गूढ समंजसपणा, कांहींतरी खरे अस्तित्व, ब्रह्माचें अस्तित्व नांदत आहे. जगांत उघड दिसणारा जो बेबनाव, उघड दिसणारें जें अमंगल आहे, तें त्या त्या क्षेत्रांत आहे हें मान्य करूनहि आम्हाला हें तत्त्वत: मान्य करतां येणार नाहीं कीं, आम्हाला आमच्यातील बेबनाव व अमंगलता नेहमींच सतावीत राहतील, आमच्यावर त्यांची सत्ता नेहमींच अबाधित राहील. मानवाच्या मनांत अगदीं खोल अशी सहजभावना आहे कीं, विश्वाची उभारणी ही शाश्वत भ्रमाची, शाश्वत विडंबनाची उभारणी नव्हे; सर्वसृष्टिसमर्थ, अजिंक्य अशा अमंगलानें ही उभारणी केलेली नाहीं, तर या उभारणीच्या मुळाशीं पूर्ण प्रज्ञा आहे, गूढ व अंतत: विजयी होणारें मंगल आहे; आणि ही विश्वाची उभारणी करून त्यांत भ्रमंती करणारा महान् साहसी आत्मा, आपले महान् साहस चुकीचें झालें असे म्हणून निराश होऊन त्यापासून निवृत्त होणारा नाहीं, तर येथील सर्व आभासमय अमंगलावर, बेबनावावर शेवटीं विजय मिळवून कृतार्थ होणारा आहे - या भावनेनें प्रेरित होऊन विश्वव्यवस्थेमागें असलेली पूर्णप्रज्ञा पाहून नेहमीं मंगलाचा अंतिम विजय साधण्याचा यत्न करणें हेंच खरें शहाणपण आहे.
विश्वाचें मूळ कारण एकमेव सत्ता, एकच एक आत्मा आहे असें मान्य केल्यानंतर आम्हां मानवांना ही कल्पनाच करतां येत नाहीं कीं, या अद्वितीय आत्म्याला दुसऱ्या कोणाकडून, दुसऱ्या कशाकडून, ''बाहेरून''
पान क्र. ६०
कसलीहि सक्ती होत असेल; कारण या आत्म्याला ''बाहेर'' असें कांहीं नाहींच, कोणी नाहींच. या आत्म्याच्या बाहेर कांहीं नाहीं, हें मान्य करून कोणी असें म्हणेल कीं त्याचा जो एक अंश त्याच्या सगळ्या अस्तित्वाचा विरोधी आहे, त्या अंशाचें हा आत्मा नाखुषीनें ऐकतो; याचें सगळें अस्तित्व त्या अंशाला बहिष्कारीत असतें. परंतु तो अंश हा बहिष्कार पचवून सगळ्या अस्तित्वावर कुरघोडी करण्याइतका समर्थ असतो. पण ही अंशाची कल्पना, वेगळ्या शब्दांत वरचीच ''बाहेरून'' सक्ती होत असल्याची कल्पना आहे. ''सर्व'' आणि त्यावर सक्ती करणारें ''सर्वाच्या बाहेरचें कांहीं तरी'', असा हा अर्थशून्य विरोध आहे. विश्वाच्या अस्तित्वाचें कारण, आत्म्यावर झालेली किंवा होणारी ''बाहेरच्या'' किंवा ''आंतल्या'' कोणाची तरी, कशाची तरी सक्ती, ही कल्पना अर्थशून्य म्हणून टाकून दिल्यानंतर, आणखी एका कल्पनेचा विचार करणें प्राप्त आहे. आत्मा अगदीं तटस्थ आहे, कोणत्याहि गोष्टी घडोत, त्या घडूं देण्याची त्याची वृत्ति आहे, घडणाऱ्या व घडूं शकणाऱ्या घटना सारख्याच तटस्थ दृष्टीनें तो बघत असतो. आत्मा असा तटस्थ आहे म्हणूनच केवळ विश्व अस्तित्वांत येतें, अस्तित्वांत राहतें, अशी ही दुसरी कल्पना आहे. पण येथें असा प्रश्न उत्पन्न होतो कीं, विश्व अस्तित्वांत येण्यास व अस्तित्वांत राहण्यास कोणाची तरी इच्छाशक्ति मूळ कारण म्हणून व आधार म्हणून आवश्यक आहे. मग ही इच्छाशक्ति कोणाची ? ''सर्व'' म्हणून जें एक तत्त्व, सर्वात्मक एकतत्त्व, आत्मा आहे त्यावांचून दुसऱ्या कोणाची ही इच्छाशक्ति असूं शकेल ? कोणाचीहि असूं शकणार नाहीं. तेव्हां आत्मा तटस्थ असो, नसो; त्याच्या इच्छेनें विश्व होतें आणि राहतें, ही गोष्ट मानल्यावांचून गत्यंतर नाहीं. हा आत्मा, ब्रह्म, अविभाज्य आहे. विभक्त भासणाऱ्या सर्व वस्तूंत तें ब्रह्म अविभक्तपणें राहतें. कोणाच्याहि इच्छेनें या विश्वांत कांहींहि घडो, त्या घटनेच्या मुळाशीं अंतिम इच्छा ब्रह्माचीच असते. आमच्या मर्यादित, सीमासापेक्ष, अंशदर्शी जाणिवेला या विश्वांत अमंगल, अज्ञान, असुख अशा घटना प्रतीत होतात आणि या गोष्टींनीं घाबरून व हतबुद्ध होऊन, या उद्वेगजनक गोष्टी निर्माण करणारें तत्त्व ब्रह्माहून वेगळें कांहींतरी आहे अशी कल्पना, ही जाणीव करते, व 'माया', 'मार', 'सैतान', 'स्वयंभू अमंगल तत्त्व' अशीं नांवे त्या तत्त्वाला देते; आमच्या मर्यादित जाणिवेकडून हा सर्व खटाटोप ब्रह्माला या जबाबदारींतून मोकळें करण्यासाठीं होत असतो. वस्तुत: ब्रह्म हेंच एक विश्वाचा आत्मा
पान क्र. ६१
आहे. ज्यांनीं विश्व बनते त्या सर्व वस्तू व घटना ब्रह्माची स्वयंकृत प्रतीकें आहेत; ब्रह्माचे ते विकार आहेत. (घट हा मातीचा विकार असतो त्याप्रमाणें) मात्र हे स्वयंनिर्मित विकार आहेत.
विश्व हें स्वप्न आहे, आभास आहे, भ्रम आहे, प्रमाद आहे असें म्हणण्यांत येतें. विश्व हें स्वप्न म्हटलें तर तें सर्वच्या सर्व स्वप्न आत्म्यानें, ब्रह्मानें आपल्या इच्छाशक्तीनें निर्मिलें आहे, त्याच्या आधारानें तें चाललें आहे आणि शाश्वत चालणार आहे; तें सत्याच्या, सद्रूपाच्या पोटांत चाललेलें आहे. ब्रह्म एकच एक असल्यानें विश्वाचा पायाहि तेंच आणि त्याला सामावून घेणारें ''आकाशहि'' तेंच. भांडें सोन्याचें हें मान्य केल्यावर, सोनें तेवढें खरें आणि भांडें खोटें आभासात्मक, मृगजलासारखें, ही कल्पना कशी करावी ! तेव्हां स्वप्न, आभास हे शब्द म्हणजे, आमच्या मर्यादित जाणिवेला संवयीच्या झालेल्या शाब्दिक कोट्या आहेत; या शब्दांत कांहीं थोर सत्यहि व्यक्त झालेलें आहे. तथापि तें विकृत, अवास्तव स्वरूपांत व्यक्त झालेलें आहे. आपण पाहिलें आहे कीं, असत् हें खरोखरी अस्तित्वाचा अभाव नसून त्या अभावावेगळा कांहीं भाव, भावात्मक वस्तु आहे; त्याप्रमाणें विश्वस्वप्नाची गोष्ट आहे. विश्वस्वप्न हें मनानें निर्माण केलेला आभास नव्हे, भ्रम नव्हे. विश्व ज्या घटनांचें बनतें, त्या घटना आभासात्मक नाहींत, त्या घटना, सत्याचीं सत्य-द्रव्यघटित रूपें आहेत.
सत्य, सद्वस्तु ब्रह्म सर्वव्यापी आहे ही आपली पायाभूत अनुभवाधिष्ठित कल्पना आहे. असत् एका टोंकाला, विश्व दुसऱ्या टोंकाला, या ब्रह्माच्या दोन अवस्था आहेत, नाण्याच्या जणुं दोन बाजू आहेत. असत् किंवा विश्व दोन्ही वस्तू अभावात्मक, आभासात्मक नाहींत, ब्रह्माच्या, सत्याच्या त्या दोन सत्य अवस्था आहेत. विश्वांत ब्रह्माचा जो सर्वांत श्रेष्ठ अनुभव येतो, त्यांत ब्रह्म हें केवळ, पूर्ण जाणीवयुक्त अस्तित्वच नव्हे, तर सर्वोत्तम बोधशक्ति आणि क्रियाशक्ति, तसेंच स्वयंभू आनंद पण आहे अशी प्रतीति येते. विश्वाच्या पलीकडे ब्रह्माचें जें असत् रूप आहे तें अज्ञेय असें विश्वावेगळें अस्तित्व असून तेंहि सर्वोच्च सर्वशब्दातीत आनंदानें भरलेलें आहे. अशी वस्तुस्थिति असल्यानें, आम्ही असें तर्कशुद्ध अनुमान काढू शकतो कीं, विश्वांत जीं सुख-दुःख, मंगल-अमंगल, ज्ञान-अज्ञान आदि द्वंद्वें दिसतात, तीं आमच्या मर्यादित इंद्रियांच्या व मर्यादित मनाच्या संवेदनांनीं व कल्पनांनीं प्रतीत होतात; आमची बोधशक्ति,
पान क्र. ६२
आमची अनुभवशक्ति सध्यांच्या मर्यादा ओलांडून पूर्णपणें बंधनांच्या बाहेर पडली म्हणजे हीं द्वंद्वें आम्हाला दिसणार नाहींत, तर त्यांच्या जागीं पूर्ण ज्ञान, पूर्ण सुख आदि ब्रह्माचे अनुभवच आमच्या वांट्यास येतील. आज आम्ही द्वंद्वांच्या माऱ्यांत, त्यांच्या दडपणाखाली आहोंत, पण आजच्या द्वद्वांचें मुक्त स्थितींत होणारें स्वरूपांतर आमच्या अनुभवास येईल, ही आजची आमची कल्पना श्रद्धेच्या जोरावरच आम्हीं टिकवूं शकतों. ही श्रद्धा अयुक्त आहे असें आमची सूक्ष्मतम उच्चतम बुद्धि, आमचा अतिशांत आणि अतिव्यापक विचार सांगत नाहीं; उलट या श्रद्धेला त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. पूर्णतेच्या दिशेनें चाललेला प्रवास करतांना भक्कम आधार असावा म्हणून ही सुविवेक-संमत श्रद्धा मानवतेला दिलेली आहे. मानवता विकासक्रमानें अशा अवस्थेला येणारच आहे कीं, जेव्हां ही श्रद्धा ज्ञानाचें आणि पूर्ण स्वानुभूतीचें रूप घेईल, आणि पूर्ण प्रज्ञा (ब्रह्म) जें विश्वकार्य चालवीत आहे, तें उत्कृष्ट रीतीनें चालवीत आहे असा निर्णय मानवता स्वयंस्फूर्तीनें देईल.
पान क्र. ६३
प्रकरण पाचवें
व्यक्तीची नियति
अविद्येच्या आश्रयानें तें मृत्यु तरून पलीकडे जातात आणि विदयेच्या आश्रयानें ते अमृतत्वाचा आनंद भोगतात. जन्माच्या नाशाच्या आश्रयानें तें मृत्यु तरून पलीकडे जातात आणि जन्माच्या आश्रयानें ते अमृतत्वाचा उपभोग घेतात.
- ईशोपनिषद्, श्लोक ११ व १४
अस्तित्व आणि जीवन अमर्याद असो, स-मर्याद असो, शारीर असो, अ-शारीर असो, जड असो, अ-जड असो, बुद्धियुक्त असो, निर्बुद्ध असो या सर्व प्रकारच्या अस्तित्वाचें व जीवनाचें सारतत्त्व, निःसंदेह सत्य, सर्वव्यापी सद्वस्तु, ब्रह्म हें आहे. ही सद्वस्तु एक आहे; या एकाची एकता अनेकांची बेरीज नव्हे, अनेकांचें संमेलन नव्हे. या सद्वस्तूनें स्वत: घेतलेली रूपें अनंत प्रकारें भिन्न भिन्न आहेत, कांहीं तर नेहमींच एकमेकांचा विरोध करणारीं आहेत; या अन्योन्यविरोधी रूपांपैकीं कांहीं आमच्या सामान्य अनुभवाच्या कक्षेंतली, अगदीं आमच्या जवळच आहेत; कांहीं आमच्या अनुभवाच्या कक्षेपासून फार दूर, व जवळ जवळ अवर्णनीय, शब्दातीत अशा प्रकारचीं आहेत. पण या सर्व रूपांत सद्वस्तु शुद्ध निर्भेळ एकतेनें नांदत आहे. ही जी शुद्ध एकतेची एक सद्वस्तु ब्रह्म, ती सर्व भेदांचें मूळ आहे, त्यांचा आधार आहे, त्यांचें पुन: परत एक होण्याचें स्थान आहे. या ब्रह्माविषयीं एक विधान अस्ति-अर्थी व दुसरे नास्ति-अर्थी, अशी एकमेकांना कांट देणारीं विधानें करण्यांत येतात. या अन्योन्य-निषेधक विधानांनीं क्रमश: अस्तिपक्षाचा विस्तार करण्यांत येत असतो. सर्व अन्योन्य विरोधी विधानांच्या जोड्या ब्रह्माची खरी ओळख करून देण्यासाठीं असतात. त्यांचा विरोध आभासात्मक असून ब्रह्मांत त्यांचें एकत्व स्वयंसिद्ध असतें. ब्रह्माविषयीं अतिव्यापक अस्तिपक्षी विधान
पान क्र. ६४
मांडण्याच्या हेतूनें अस्ति-नास्ति करणाऱ्या विधानांची सर्व मांडामांड करण्यांत येत असते. ब्रह्मन् हेंच 'अ,' ब्रह्मन् हेंच ' ज्ञ,' ' अ' ते 'ज्ञ' पर्यंत सर्व ब्रह्मांड ब्रह्मच आहे. ब्रह्म ही एकच एक वस्तु अस्तिपक्षी आहे. ब्रह्माखेरीज ब्रह्माच्या जोडीला दुसरें अस्तित्व कांहींहि नाहीं.
ब्रह्माची एकता अमुक प्रकारची म्हणून कोणत्याहि भाषेनें सांगण्यासारखी नाहीं. या एकतेचें स्वाभाविक स्वरूप व्याख्यातीत आहे. मनानें या एकाचें स्वरूप पाहण्याचा, दर्शन घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो तेव्हां अनंत कल्पना, अनंत अनुभव यांची मालिका आम्हाला उभी करावी लागते. ही मालिकाहि त्याची साक्षात् कल्पना आम्हाला देऊं शकत नाहीं. आमच्या ज्या कल्पना, ज्या अनुभूती, मोठ्यांत मोठ्या, व्यापकांत व्यापक, असतील त्यांना नकार देऊनच शेवटीं आम्ही या सद्वस्तूचें स्वरूप ''अलक्षणम्'' - लक्षण करतां येत नाहीं, व्याख्या करतां येत नाहीं असें - आहे असें म्हणतो, ''नेति नेति'' - ''हें नव्हे, तें नव्हे'' हेंच सूत्र भारतीय ऋषींनीं त्या एकमेव ब्रह्माचें ''वर्णन'' म्हणून अखेर निश्चित केलें. कोणतीहि अनुभूति त्या ब्रह्माला आपल्या कक्षेंत आणूं शकत नाहीं, कोणतीहि कल्पना त्याची व्याख्या करूं शकत नाहीं.
तें ब्रह्म आम्ही स्वत: आहों. आमच्या इंद्रियांना जें कांहीं गोचर आहे, आमच्या विचारशील मनापुढें जें कांहीं येऊं शकतें त्या सर्व वस्तूंत जें एकमेव अस्तित्व (ब्रह्म) आम्हाला दिसत असतें, त्याविषयीं आमचें मन अधिकांत अधिक एवढेंच सांगूं शकतें कीं, तें अज्ञेय आहे. अस्तित्वाच्या अनेक अवस्था, अस्तित्वाचे अनेक धर्म, जाणिवेचे अनेक आकारप्रकार, कार्यशक्तीचे अनेक क्रियाकलाप यांच्या द्वारां तें आम्हाला अप्रत्यक्ष दर्शन देतें. त्या अज्ञेयाचें ज्ञान करून घ्यावयाचें, त्याच्या जवळ जावयाचें, तर त्याच्या अस्तित्वाचे, जाणिवेचे, शक्तीचे, आमच्या अनुभवास येणारे नाना आकार-प्रकार न्याहाळून, त्या आकारप्रकारांतील जीवन अनुभवून आणि त्यांच्या द्वारां हळू हळू पुढें प्रवास करीत राहून, आम्हाला त्याचें ज्ञान व त्याचें स्थान जवळ करणें शक्य आहे. परंतु ती सद्वस्तु आमच्या मनाला समजण्यासारखी, ग्रहण करण्यासारखी आणि जवळ नेहमीं टिकवून धरण्यासारखी आहे अशी कल्पना करून ती लवकर सांपडावी म्हणून जर आम्ही घाई केली, जी अनंत आहे, अमर्याद आहे ती सद्वस्तु आमच्या मनाच्या कवेंत धरण्याचा आग्रह जर आम्ही धरला आणि यासाठीं अस्तित्वाच्या कोणत्याहि विशिष्ट, स्पष्ट, मर्यादांच्या,
पान क्र. ६५
लक्षणांच्या अवस्थेशीं - मग ही अवस्था किती कां शुद्ध आणि शाश्वत असेना - त्या सद्वस्तूचें तादात्म्य कल्पून ती अवस्था म्हणजे एकच एक सद्वस्तु असें मानलें तर तें बरोबर होणार नाहीं; त्याचप्रमाणें अगदीं सर्वसमावेशक व व्यापक असलेला असा एखादा अस्तित्वाचा धर्म अथवा गुण, अगदीं अफाट क्षेत्र व्यापणारें असें जाणिवेचें एखादें निश्चित साकार रूप, अगदीं अमर्याद व्याप असलेला असा शक्तीचा किंवा क्रियेचा एखादा प्रकार, -- या वस्तूंपैकीं कोणत्याहि वस्तूला सद्वस्तु मानणें बरोबर होणार नाहीं -- या सगळ्या वस्तू एकत्र केल्या तरी ती सद्वस्तु होत नाहीं. कारण अस्तित्वाची एखादी विशिष्ट अवस्था व वरील तीन वस्तू मिळूनहि सद्वस्तूचा केवळ अंश आहेत - सगळी सद्वस्तु नव्हे. ती ''अज्ञेय'' आहे. मन आपल्या सोयीसाठीं अंशाशीं पूर्णाचें तादात्म्य कल्पितें. एक अंश घेऊन बाकीच्या अंशांवर बहिष्कार घालतें आणि सद्वस्तु सांपडली असें मानते. पण हें मनाचें करणें म्हणजे, सद्वस्तूच्या ''अज्ञेयत्व'' या स्वभावाविरुद्ध जाऊन तिला ''ज्ञेयांत'' जमा करण्यासारखें आहे, अशानें खरी सद्वस्तु मनाला सांपडत नाहीं; जी वस्तु अविभाज्य आहे, तिचें विभजन मात्र मनाकडून घडतें.
ही सद्वस्तूच्या अज्ञेयत्वाची, मनाच्या ग्रहणशक्तीच्या पलीकडे असण्याची वस्तुस्थिति, प्राचीनकाळीं, विचारवंतांना इतकी स्पष्टपणें व पक्केपणें पटली होती कीं, वेदांती ऋषींना जेव्हां ''सच्चिदानंद'' ही सर्वश्रेष्ठ कल्पना आली, त्या सच्चिदानंदाचा निःसंदेह साक्षात्कार झाला, मानवाच्या जाणिवेला घडणारें सद्वस्तूचें सर्वश्रेष्ठ दर्शन, त्या जाणिवेला प्रतीत होणारें सद्वस्तूचें सर्वश्रेष्ठ भावात्मक आविष्करण म्हणजे सच्चिदानंद, ही गोष्ट जेव्हां त्यांना अनुभवास आली, तेव्हां त्या ठिकाणीं तें थांबले नाहींत; त्यांनीं आपली चिकित्सा पुढें चालवली, त्यांनीं आपल्या अनुभवांत आणखी भर घालण्याचा क्रम चालू ठेवला आणि या रीतीनें शुद्ध अस्तित्वापलीकडे असणारें ''असत्,'' त्यांनीं आपल्या कल्पनेच्या आणि अनुभवाच्या कक्षेंत आणून सोडलें. आमचे मानवी अनुभव सर्वच्या सर्व निरपवादपणें ज्या एका अंतिम शुद्ध अस्तित्वाचे, जाणिवेचे, अनंत आनंदाचे आविष्कार - ''विकृत'' विकार म्हणा - आहेत त्या शुद्ध वस्तूहून हें ''असत्'' अगदीं वेगळें आणि तिच्याहून वरच्या दर्जाचें आहे, असा अनुभव त्या ऋषींना आला. तें अस्तित्व जाणीवरूप, आनंदरूप आहे असें मानावयाचें असेल तर आम्हाला या विश्वांत जे श्रेष्ठांत श्रेष्ठ, शुद्धांत शुद्ध अस्तित्व, जाणीव व आनंद अनुभवावयास मिळतो त्याच्यापेक्षां श्रेष्ठ आणि शुद्ध अशा
पान क्र. ६६
आनंदादि तीन वस्तू त्या असत् मध्यें समाविष्ट आहेत आणि म्हणून या विश्वांत या तीन नावांनीं ज्या वस्तू ओळखल्या जातात त्याहून अगदीं वेगळ्या, ''असत्'' मध्यें समाविष्ट असलेल्या त्या वस्तु आहेत, असें मानणें प्राप्त आहे. ही असत् ची कल्पना तत्त्वत: वेदांतांतील असून बुद्धप्रणीत धर्मानें ती घेतलेली आहे. या धर्माला अवैदिक धर्म असें धर्मशास्त्रकार म्हणतात हे थोडेंसें न्यायविसंगत आहे. कारण वेदांचें प्रामाण्य बुद्धप्रणीत धर्मानें अमान्य केलें असलें तरी, आतांच सांगितल्याप्रमाणें वेदांती ''असत्'' त्यानें मान्य केलें आहे. मात्र वेदांतांत, उपनिषदांत, जी शिकवण आहे ती अस्तिप्रधान व समन्वयात्मक शिकवण आहे; आणि म्ह्णून, सत् आणि असत् यांना वेदांत वस्तुत: अन्योन्य विरोधी, अन्योन्य निषेधक मानीत नसून, अज्ञेयाची ओळख नीट पटण्यासाठीं उभी केलेली, विरोधी भासणाऱ्या कल्पनांची, परंतु वस्तुत: एकमेकींना पूरक असणाऱ्या कल्पनांची शेवटली जोडी, या दृष्टीनें तो सत् आणि असत् यांचा उपयोग करतो. याप्रमाणें सत् आणि असत् एकाच अज्ञेयाची, एकाच क्षणींच्या दोन अवस्था दाखविणारीं नावें आहेत. सत्-असत् यांच्या समन्वयाप्रमाणें एक आणि अनेक यांचाहि समन्वय स्वयंसिद्ध आहे. ब्रह्म एक आहे आणि ब्रह्म सर्व (अनेक) आहे. म्हणून आमच्या भावात्मक जाणिवेच्या विधायक व्यवहारांत एक आणि अनेक यांचे चांगलें पटावें लागतें. एकाला अनेकाची व अनेकाला एकाची दखल घेणें, मानवाच्या पूर्णतेच्या दृष्टीनें आवश्यक असतें. एकाचें एकतेचें ज्ञान म्हणजे विद्या. विद्येनें ईश्वराची ओळख होते. 'विद्या' नाहीं, आणि नुसती 'अविद्या', म्हणजे मर्यादित अनेकदर्शी जाणीव आहे, असे असेल तर ही 'अविद्या' अंधारानें भरलेली रात्र, अज्ञानाचा व्यवस्थाशून्य पसारा असल्याचें प्रत्ययास येईल. परंतु उलटपक्षीं 'अविद्येचें,' अज्ञानाचें क्षेत्र आपण धिक्कारलें, 'अविद्या' ही वस्तु नाहींच, असली तर केवळ भ्रमरूप आहे असें म्हणून तिला बाजूला ढकलून दिले, आणि 'विद्या' मात्र जवळ केली तर, ती 'विद्या' एक प्रकारचा अंधारच होऊन बसेल, तिच्यामुळें मानव अपूर्ण होईल, मानवाची अपूर्णता दृढ होईल. 'विद्या' हा प्रकाश खरा, पण प्रकाशातिशयानें माणसें आंधळी - आंधळ्यासारखी - होतात, त्याप्रमाणें नुसत्या विद्येनें आपण आंधळे होऊं. ज्या क्षेत्रावर आम्हाला रहावयाचें आहे, काम करावयाचें आहे, तें क्षेत्र विद्येनें प्रकाशित केलेलें असून विद्येच्या प्रकाशातिशयांत आम्हाला दिसूं शकणार नाहीं.
पान क्र. ६७
आमच्या अतिप्राचीन ऋषींची शिकवण याप्रमाणें शांत हृदयानें दिलेली, शहाणपणानें भरलेली व नि:संदिग्ध अशी आहे. त्यांच्यामध्यें सत्य शोधून काढण्यासाठीं, ज्ञान मिळविण्यासाठीं लागणारी चिकाटी होती, शक्ति होती; आमच्या मानवी ज्ञानाला, ज्ञानशक्तीला मर्यादा आहेत हे मान्य करण्यासाठीं लागणारी बुद्धीची स्वच्छता व हृदयाची नम्रताहि त्यांच्याजवळ होती. ज्ञानाला ज्या मर्यादा आहेत त्या गांठल्यावर त्याच्यापलीकडे असलेल्या ज्ञानातीत वस्तूंत ज्ञानाला प्रविष्ट व्हावें लागतें हें त्यांना अवगत होतें. अतिप्राचीन ऋषींचा कालखंड संपल्यावर पुढें अशी मंडळी निघाली कीं, ज्यांच्या हृदयाला आणि बुद्धीला त्यांच्या पूर्वजांचा चिवटपणा आणि स्थैर्य लाभलें नाहीं. या जिज्ञासूंना घाई झाली, अंतिम आनंद लवकर मिळावा अशी अतिशय ओढ त्यांना लागली, शुद्ध अनुभूतीचा हव्यास त्यांच्या हृदयावर थोर सत्ता गाजवूं लागला, कठोर व सूक्ष्म बुद्धीचा असामान्य जुलूम त्यांना मान्य होऊं लागला, आणि म्हणून त्यांनीं 'एक' (ब्रह्म) आपलें करून 'अनेक' (ब्रह्म) नव्हेच असा पुकारा केला; उंच ठिकाणची हवा त्यांना पोटांत घ्यावयास मिळाल्यानें व ती फार प्रिय वाटल्यानें, खालीं खोल ठिकाणीं जें लपलेलें आहे त्याला त्यांनीं तुच्छ लेखलें, त्याच्यापासून घृणेनें ते परत फिरले. परंतु ईश्वराचें खरें ज्ञान होण्यासाठीं, तो सर्वत्र सारखा अभेदानें भरलेला आहे हा अनुभव घेणें, ज्या अन्योन्य विरोधी घटनांच्या द्वारां तो प्रकाशतो त्या घटनांना योग्य मान देऊन त्यांचा योग्य विचार करणें, परंतु त्यांचें आपल्या बुद्धीवर प्रभुत्व चालूं न देणें, या गोष्टींची आवश्यकता आहे हें ज्ञान त्या प्राचीन ऋषींनीं, त्या प्राचीन विद्येनें करून घेतलें होतें.
तेव्हां अपूर्ण तर्कशास्त्रानें केलेला कठोर भेद आपण दूर ठेवूं. 'एकत्व ही मूळ सद्वस्तु आहे, म्हणून अनेकत्व हा आभास आहे; केवलत्व हें सत् अस्तित्व आहे, म्हणून अ-केवलत्व, सापेक्षत्व हें असत् अनस्तित्व आहे;' हें एकांगी तर्कानें केलेले भेद आपण बाजूला ठेवूं आणि आम्ही अनेकत्वांत चिकाटीनें, धिमेपणानें फिरत राहून तेथें एकतत्त्व अनुभवण्याचा यत्न करूं. असें केल्यास आम्हाला त्या एकतत्त्वाचा आशीर्वाद मिळेल, अनेकांत मी आहे, मीच अनेक आहे असा आमच्या श्रद्धेवर सत्यतेचा शिक्का मारणारा एकतत्त्वाचा बोल, आम्हाला प्रत्यक्ष ऐकावयास मिळेल आणि याप्रमाणें आमची अनेकतेंतील सफर यशस्वी करून आम्हीं महानंद मिळवून परत फिरू.
पान क्र. ६८
आमचें मन आपल्या भ्रमंतीत कांहीं ठिकाणीं फार सामर्थ्यशील व्यापकता धारण करतें, अत्यंत सामर्थ्यशील अवस्थांतर अनुभवितें; अशा ठिकाणीं त्याला जी दृष्टि लाभते त्या विशिष्ट दृष्टीला ते प्रमाणाबाहेर अतिरेकी महत्त्व देतें. आमच्या मनाच्या या विशिष्ट दृष्टीला, आम्ही महत्त्व देतां कामा नये. मन आध्यात्मिक मार्ग क्रमून अध्यात्ममय झालें म्हणजे विश्व हें त्या मनाला स्वप्न वाटतें, मिथ्या वस्तु वाटते आणि भौतिकांत सारखी वाटचाल करणारें मन, भौतिकनिष्ठ बनून ईश्वर ही आभासात्मक कल्पना आहे, भौतिकाच्या पलीकडे सत्य वस्तु कांहीं आहे ही कल्पना भ्रमात्मक आहे, असें मानतें व म्हणतें. या दोन्ही मानसिक दर्शनांची व दृष्टींची त्यांच्या एकांगीपणामुळें सारखीच योग्यता आहे; व ती योग्यता आमच्या दृष्टीनें मर्यादित आहे. भौतिकनिष्ठ मनाला फक्त इंद्रियांचाच पुरावा घेण्याची व मानण्याची संवय झालेली असते; सद्वस्तु, सत्यता आणि साकारता, सशरीरता यांचा नित्यसंबंध त्याच्या परिचयाचा असतो; इंद्रियांखेरीज दुसऱ्या ज्ञानसाधनांचा उपयोग त्याला माहीत नसतो, त्याच्या संवयीचा नसतो. अतिभौतिक अनुभव त्याला आला तरी त्या अनुभवाला सत्याचा अनुभव मानण्याइतकी, आपली रूढ सत्यतेची कल्पना, तें व्यापक करूं शकत नाहीं आणि म्हणून ईश्वर वगैरे सर्व मिथ्या आहे असा पक्ष तें घेतें. अध्यात्मनिष्ठ एकांगी मनाची अशीच गोष्ट आहे. अशरीर सद्वस्तूचा, ईश्वराचा, ब्रह्माचा साक्षात्कार, त्याला भयंकर मोहिनी घालून महदाश्चर्यांत बुडवून, त्याचें स्वत्व निकालांत काढणारा झाल्यानें, हें अशरीर अतिभौतिक दर्शन तेवढेंच सत्य, इंद्रियांनीं घडविलेलें दर्शन हें आभासांचें, स्वप्नांचें दर्शन आहे अशी एकांगी भूमिका तें घेतें. इंद्रियांना ज्ञानसाधनें मानण्याची पात्रता अध्यात्मनिष्ठ मन गमावून बसते; अतिभौतिक साधनांना ज्ञानसाधनें म्हणून ओळखण्याची, ती वापरण्याची पात्रता भौतिकनिष्ठ मन कमावीत नाहीं. इत्यर्थ, दोन्हीकडे आवश्यक पात्रतेचा अभाव असल्यामुळें पूर्ण सत्यदर्शनाचाहि अभाव असतो. अध्यात्मनिष्ठ मनाची आग्रही मांडणी व भौतिकनिष्ठ मनाची तितकीच आग्रही मांडणी, या दोन्ही मांडणींत सत्य मुळींच नाहीं असें नाहीं - सत्य आहे पण तें विकृत रूपांत मांडलें गेलें आहे. आम्ही स्थूल विश्वांत राहत आहों; आकारमय विश्वांत आम्हाला आत्मसाक्षात्कारासाठीं आणून ठेवलेलें आहे; या विश्वांत फक्त त्याच गोष्टीला पूर्ण सत्याच्या वर्गांत घातलें जाईल, जी गोष्ट आमच्या भौतिक जाणिवेची
पान क्र. ६९
पकड घेऊं शकेल, आमच्या भौतिक जाणिवेचा विषय होऊं शकेल - ती गोष्ट जाणिवेच्या उंचांत उंच भूमिकेवर व्यक्त स्वरूपांत आहे, एवढ्यावरून तिला आमच्या स्थूल विश्वांत सत्यतेचा दाखला मिळणार नाहीं, तर त्या उंचांत उंच भूमीवरील आविष्काराशीं सुसंवादी असा तिचा आविष्कार या आमच्या अगदीं तळच्या स्थूल भूमीवर झाला पाहिजे, आमच्या स्थूल जाणिवेचा विषय ती झाली पाहिजे, तरच ती सत्य आहे असें म्हणतां येईल. भौतिकवादी मांडणींत हा सत्याचा अंश आहे, तसाच, पण वेगळा सत्यांश अध्यात्मवादी मांडणींत आहे : आकार आणि आकारद्रव्य स्वयंभू सत्यत्वाचा हक्क सांगूं लागल्यास तो हक्क खोटा आहे, अज्ञानानें उत्पन्न केलेला भ्रम आहे; अशरीर अतिभौतिक सद्वस्तूला, सत्य वस्तूला, स्थूल विश्वांत व्यक्त होण्यासाठीं कसल्यातरी स्थूल द्रव्याची, स्थूल रचनेची आवश्यकता असते; या आवश्यकतेमुळें आकार आणि आकारद्रव्य यांना सत्यत्वाचा मान दिला जातो; त्यांची उत्पत्ति ब्रह्माच्या, ईश्वराच्या जाणिवेंत, ईश्वरी जाणिवेच्या एका व्यापारांत आहे; त्यांच्या उत्पत्तीचा हेतु चैतन्याची एक विशिष्ट अवस्था व्यक्त व्हावी एवढाच आहे : हा सत्याचा अंश अध्यात्मवादी मांडणींत आहे.
ब्रह्मानें आकार धारण केला, आपलें अस्तित्व भौतिक द्रव्याच्या द्वारां व्यक्त केलें, हें कशांकरतां? या प्रश्नाचें उत्तर एवढेंच संभवतें कीं, मर्यादित स्थूल जाणिवेच्या मूर्तींत आपलें अस्तित्व, स्वत्व घालून या आत्मप्रगटनाचा जो काय आनंद असेल तो भोगावा; ब्रह्म या जगांत आहे तें जीवनाच्या मूल्यांच्याद्वारां आपलें स्वत्व व्यक्त करण्याकरता आहे. ब्रह्माच्या पोटांत जीवन उदयास येतें तें, स्वतःच्या पोटीं ब्रह्माचा शोध लावून अनुभव घेण्यासाठीं उदयास येतें. या जगांत मनुष्याचें विशेष महत्त्व आहे तें अशाकरतां कीं, तो जगाला असाधारण महत्त्वाची एक गोष्ट मिळवून देतो; तो जाणिवेचा इतका विकास जगाला मिळवून देतो कीं, पूर्ण आत्मदर्शनाच्या साह्यानें या जगाचें आमूलाग्र रूपांतर होऊं शकतें - (जगाला त्याच्या जाणिवेच्या विकासाच्या द्वारां मनुष्य पूर्ण आत्मसाक्षात्कार मिळवून देतो आणि या साक्षात्काराच्या प्रभावानें जगाला स्वतःचें स्वरूप आमूलाग्र बदलणे शक्य होतें.) - मनुष्याचें मनुष्यत्व, मानवाची मानवता खरी याच गोष्टींत आहे कीं, त्यानें जीवनांत ईश्वराला कृतार्थ करावे. ईश्वरी जीवन, दिव्य जीवन हें मानवाचें अंतिम
पान क्र. ७०
ध्येय आहे. पशु जीवन, पाशवी प्रवृत्ति-पसारा हा मानवी जीवनाचा केवळ आरंभ आहे.
परंतु विचार-क्षेत्राप्रमाणेंच जीवनक्षेत्रांतहि, आत्म्याचें आविष्करण करावयाचें तर त्याला एक नियम आहे. तो नियम म्हणजे जीवनानें वा विचारानें क्रमाक्रमानें नवें नवें क्षेत्र घ्यावयाचें, पण जुनें क्षेत्र सोडाववयाचें नाहीं. ब्रह्मानें रूप घेतांना जाणिवेच्या अनेक क्रमवार अवस्था, भूमिका निश्चित केल्या आहेत. या भूमिका सर्व एकाचवेळीं अस्तित्वांत आहेत, असतात; कालाच्या दृष्टीनें त्यांच्यांत क्रमवारी नाहीं, एककालिकता आहे; एक भूमिका विशिष्ट मर्यादेची, दुसरी शेजारची तिच्याहून व्यापक, तिसरी तिच्याहून अधिक व्यापक, अशा प्रकारची व्यापकतेची क्रमवारी आहे. ही क्रमवारी लक्षांत घेऊन जीवनानें आत्मविकासाचें कार्य केलें पाहिजे, त्यानें नित्य नवीं क्षेत्रें क्रमाक्रमानें चढत जाऊन आत्मसात् केलीं पाहिजेत; व हीं नवी क्षेत्रें आत्मसात् करतांना जुनीं क्षेत्रें सांभाळलीं पाहिजेत. आम्हीं आमच्या विचारशील मनाचें व क्रियाशील जीवनाचें उदात्तीकरण व अध्यात्मीकरण करतांना जुनें सांभाळून क्रमानें नवें मिळवणें हा नियम विसरतां कामा नये. स्थूल भौतिक जीवन हा आमचा पाया आहे. या जीवनाला आम्ही केव्हांहि टाकता कामा नये, क्षुद्र लेखतां कामा नये. स्थूल भौतिकाच्या वरची मानसिक जीवनाची पायरी आम्हीं चढलों कीं या नव्या पायरीवरून खालच्या पायरीवरील जीवन कोणाकोणाला क्षुद्र वाटूं लागतें, त्याज्य वाटूं लागतें; त्याचप्रमाणें मानसिक जीवनाच्या वरची आध्यात्मिक जीवनाची पायरी चढल्यावर खालचीं दोन्हीं जीवनें कोणाकोणाला त्याज्य वाटूं लागतात. वरच्या जीवनाच्या आकर्षणानें, हा त्यागाचा विचार येतो. पण आमच्या जीवनांत ईश्वर पूर्णतया व्यक्त व्हावा, यासाठीं त्याच्या आत्मप्रकटनाच्या अटी आम्हीं पाळल्याच पाहिजेत. त्या अटी, वर सांगितलेल्या नियमांत अंतर्भूत आहेत. म्हणून वर चढतांना किंवा चढल्यावर खालच्या क्षेत्राचा त्याग करण्याचा विचार त्याज्य आहे. आम्हीं हा विचार मनांत आणला तर आम्ही पूर्ण होऊं शकत नाहीं, अपूर्णतेला चिकटून राहतो - एवढेंच कीं आमचें अपूर्णतेचें क्षेत्र बदलतें; फारतर एक विशिष्ट मर्यादित उंची आम्ही गाठूं शकतो. समजा, आम्ही अगदीं असत् पर्यंत चढून गेलो, चढावयाचें बाकी कांहीं उरलें नाहीं, पण आम्ही आमचा स्थूल भौतिक जीवनाचा पाया विसरून गेलो, तर आमचें चढणें विफल होईल.
पान क्र. ७१
कोणत्याहि खालच्या पायरीवरील जीवन, वरच्या पायरीवरील जीवनानें - त्याच्या श्रेष्ठ प्रकाशानें - बदलून घेणें, यांत ईश्वरी प्रकृतीचें खरें कार्य आहे; यांत स्वाभाविक ईश्वरी जीवन, दिव्य जीवन साधण्याचा साधनमार्ग आहे - (कोणत्याहि खालच्या पायरीवरील जीवन टाकून देण्यांत, त्याच्यावर चढूनहि पूर्वीं तें होतें तसेंच राहूं देण्यांत, कांहींच दिव्यता नाहीं, दिव्य ईश्वरी स्वभावधर्माचा मुळींच आविष्कार नाहीं.) त्यांत ब्रह्म हें पूर्ण आहे, एकाच वेळीं अनेक ज्ञानभूमिका (जाणिवेच्या अवस्था) त्यांत एकीभूत असतात, एकतेनें अविरोधानें असतात. हा ब्रह्माचा स्वभाव आम्हाला आमच्या जीवनांत प्रकट करावयाचा तर, आम्हींहि त्याच्याप्रमाणें पूर्ण सर्वसमावेशक व्हावयास हवें.
संन्यासाची अतिरेकी ऊर्मि, स्थूल भौतिक जीवनांतून अंग काढून घ्यावयास साधकाला प्रवृत्त करते, त्याप्रमाणें या ऊर्मीच्या अतिरेकानें साधक दुसरी एक चूक करण्यास प्रवृत्त होऊं शकतो. आत्म्याच्या आविष्काराच्या समग्रतेचें, पूर्णतेचें ध्येय समोर ठेवल्यानें दुसरी चूकहि घडण्याचा संभव नाहींसा होतो. जाणिवेचे सर्वसाधारण तीन प्रकार आहेत; व्यक्तिजाणीव, विश्वजाणीव व विश्वातीत जाणीव. या तीन जाणिवांचें व्यक्तीच्या ठिकाणीं जें अन्योन्यविषयक नातें असेल, त्या नात्यावरून वैयक्तिक जीवनाची गांठ व गुंतागुंत आणि तिचें स्वरूप निश्चित होतें. जीवनाच्या धडपडींची सर्वसामान्य वांटणी पाहिली तर, व्यक्ति आपल्या स्वत:ला इतर सर्व व्यक्तींहून वेगळी चीज समजत असल्याचें दिसतें. आपला समावेश इतर भिन्न व्यक्तींबरोबर विश्वांत होतो आणि विश्व व स्वत: आपण, असे दोघेहि, दोघांहून पलीकडे असणारें जें तत्त्व, त्यावर अवलंबून आहोंत असें मानते. हें जें विश्वातीत तत्त्व, त्याला सामान्यत: ईश्वर हें नांव देतात. या व्यक्तीच्या कल्पनेला, हा ईश्वर विश्वाच्या वरचा पण विश्वाला जोडलेला वाटण्यापेक्षां, विश्वाहून अगदीं वेगळा, विश्वाशीं संबंध नसलेला वाटतो. याप्रमाणें व्यक्ति व विश्व दोघांनाहि या व्यक्तीच्या कल्पनेंत क्षुद्र स्थान मिळतें, त्यांची कांहीं किंमत तिला वाटत नाहीं आणि याप्रकारें विश्वातीत ईश्वर, विश्व व व्यक्ति यांचा नसता भेद मनांत भरला म्हणजे ईश्वराची प्राप्ति म्हणजे व्यक्ति व विश्व यांचा संबंध तोडणें - व्यक्ति व विश्व स्वतःपुरते नाहींसें करणें - अशीं या सर्वसामान्य व्यक्तीची तर्कशुद्ध दृष्टि बनते.
ब्रह्माच्या एकत्वाची पूर्ण दृष्टि लाभल्यास हे अपूर्ण दृष्टीचे परिणाम
पान क्र. ७२
अर्थातच टळतात. मानसिक आणि आध्यात्मिक जीवनाच्या सिद्धीसाठीं ज्याप्रमाणें स्थूल भौतिक शारीरजीवन टाकावें लागत नाहीं; त्याप्रमाणें विश्व जाणीव आपली करण्यासाठीं किंवा केल्यावर, तसेंच विश्वातीत जाणीव मिळविण्यासाठीं किंवा मिळविल्यावर वैयक्तिक क्रियाकर्में आम्हीं टाकलीं पाहिजेत असें समजण्याचें कारण नाहीं. आमचे वैयक्तिक व्यवहार आणि वरील दोन ज्ञानभूमिका यांजमध्यें विरोध किंवा विसंवाद जेथें नाहीं अशी दृष्टि, म्हणजे ब्रह्माच्या एकत्वाची पूर्ण दृष्टि आम्हाला लाभूं शकते. विश्वातीत विश्वाधिशायी ब्रह्म, विश्वाला सर्वांगानें सर्वांगी समालिंगन देऊन आहे, विश्वाशीं एकरूप आहे, विश्वाला त्यानें अंगाबाहेर टाकलेलें नाहीं; तसेंच विश्व, व्यक्तीशीं एकरूप आहे, व्यक्तीला सर्वथा अविभाज्य निजांग म्हणून बाळगून आहे, व्यक्तीला तें अंगाबाहेर टाकीत नाहीं. व्यक्ति ही पूर्ण विश्वजाणिवेचें केंद्र आहे आणि विश्व हें अशरीर, अलक्षण अशा ब्रह्मानें, स्वत:साठीं निर्मिलेलें आणि स्वत: अंतर्बाह्य पूर्णतया व्यापलेलें, असें त्याचें सलक्षण शरीर आहे.
ब्रह्माचें, विश्वाचें आणि व्यक्तीचें परस्पर नातें नेहमीं हेंच असतें. आमच्या अज्ञानानें किंवा वस्तूंच्या संबंधाची आमची जाणीव चुकीच्या मार्गावर गेल्यानें हें खरें नातें आमच्यापासून लपलेलें राहतें. आम्हाला ज्ञान झालें, वस्तुविषयक योग्य जाणीव आम्हाला लाभली, म्हणजे वर निर्दिष्ट केलेलें ब्रह्म-विश्व-व्यक्तीचें शाश्वत नातें तत्त्वत: अणुभरहि बदलत नाहीं; एवढेंच होतें कीं, वैयक्तिक केंद्रांतून जें पूर्वीं घडत होतें तें, आंतलें आणि बाहेरचें दर्शन, तत्त्वांत व तपशीलांत पार बदलून जातें आणि त्याचा परिणाम म्हणून व्यक्तीच्या व्यवहाराचा आत्मा, आशय व त्याचा परिपाक देखील पार बदलून जातो. विश्वांत आपलें कार्य करण्याचें साधन म्हणून, विश्वातीत ब्रह्माला, ज्ञान झालेल्या व्यक्तीची पूर्वींइतकीच आवश्यकता असते; आणि व्यक्तीला ज्ञान झालें म्हणजे तिला ब्रह्माचें कार्य करतां येणें अशक्य होतें, असेंहि नाहीं. उलटपक्षीं व्यक्तीमध्यें नेहमींच असलेल्या विश्वातीत ब्रह्माचा तिला साक्षात्कार होणें, तिला तिच्या अंतर्यामीं, जाणीवपूर्वक ब्रह्माचा सहयोग लाभणें, हेंच एक विश्वपुरुष, समष्टिपुरुष, आत्मसाक्षात्कारी होण्याचें साधन असल्यानें, विश्वाच्या खेळांत ही एक अनिवार्य आवश्यकता आहे कीं, आत्मज्ञान लाभलेल्या व्यक्तीनें विश्वाच्या कार्यांत पूर्वींप्रमाणें अखंडपणें भाग घेत रहावें. आत्मज्ञान झालें कीं त्या आत्मज्ञानी व्यक्तीला संसारांतून बाहेर गेले पाहिजे, विश्वकार्यांत तिला स्थान
पान क्र. ७३
नाहीं, असा कठोर निरपवाद नियम असेल तर, विश्व हें, अज्ञान, मृत्यु, दुःख यांनीं गांजलेल्या व यांतून सुटकेची आशा नसलेल्या अनंत जीवांचें शाश्वत प्रदर्शन म्हणून रहावें असा त्याला शाप मिळाला आहे असें मानावें लागेल; आणि असें विश्व एक तर क्रूरपणें सत्त्वपरीक्षा करणारें दिव्य तरी असलें पाहिजे किंवा केवळ गतिमान असणारें अचेतन भ्रमचित्र असलें पाहिजे.
संन्यासपर तत्त्वज्ञान विश्वाविषयीं अशीच कांहीं कल्पना करण्याकडे झुकतें. पण विश्व स्वत: भ्रम असेल, विश्वांतील अस्तित्व मिथ्या असेल, तर 'व्यक्तीचा मोक्ष' या भावनेला कांहींच खरा अर्थ राहणार नाहीं. अद्वैत दर्शनांत, व्यक्तीचा आत्मा ब्रह्माशीं एकरूप असतो, ब्रह्मापासून आपण वेगळे आहोंत ही त्याची भावना अज्ञानजन्य असते, या भेदभावनेपासून मुक्त होणें आणि ब्रह्माशीं स्वतःचा अभेद ओळखणे हाच व्यक्तीचा मोक्ष असतो. पण भेदभावनेपासून मुक्त होण्याच्या या व्यवहारांत, लाभ कोणाला होतो ? अर्थात् ब्रह्माला कांहीं लाभ होत नाहीं, कारण ब्रह्म हें सदा सर्वदा मुक्त, स्थिर, शांत, शुद्ध असतें. हेंच त्याचें ब्रह्मत्व असून तें त्याला टाकतां येण्यासारखें नाहीं. विश्वाला कांहीं लाभ होत नाहीं, कारण कोणतीहि व्यक्ति विश्वभ्रमापासून मुक्त झाल्यानें, विश्व - भ्रमरूप विश्व - कांहीं मुक्त होत नाहीं; तें बंधनांत असतें तसेंच नेहमीं बंधनांत राहतें. व्यक्तीला मात्र लाभ होतो. व्यक्तीचा आत्मा भेदांतून आणि भेदाच्या दु:खांतून सुटून शांति आणि समाधान मिळवतो आणि याप्रमाणें तो आपलें सर्वांत श्रेष्ठ असें हित करून घेतो. तेव्हां हें हित जर खरें मानावयाचें तर आत्मज्ञान आणि मोक्ष मिळाल्यावरहि व्यक्तीला विश्व आणि ब्रह्म या दोहोंपेक्षां भिन्न असें कांहीं खरें अस्तित्व असतें असें मानणें भाग आहे. पण मायावादाच्या दृष्टीनें व्यक्ति व व्यक्तीचा आत्मा हा भ्रमरूप आहे, हा आत्मा मुळीं अस्तित्वांतच नाहीं; मायेच्या अगम्य गूढ पसाऱ्यांत मात्र व्यक्तीच्या आत्म्याला अस्तित्व आहे. तेव्हां यांतून निष्पन्न काय होतें ? मुक्त होतो तो जीवात्मा - व्यक्तीचा आत्मा - खरा नसतोच मुळीं, भ्रमरूप असतो; त्याचा बंध हाहि भ्रमरूप, खरें अस्तित्व नसणारा; हा खोटा बंध ज्या विश्वांत त्याला बद्ध करीत असतो तें विश्वहि भ्रमरूप, अस्तित्वशून्य; आणि खोट्या आत्म्यानें खोट्या बंधनांतून मुक्ति मिळविणे, हें त्या खोट्या आत्म्याचें परम श्रेय, परम श्रेष्ठ हित, आणि या श्रेयासाठीं त्या खोट्या आत्म्यानें धडपड करावी हें त्याचें
पान क्र. ७४
आध्यात्मिक कर्तव्य ! ज्ञानाचा शेवटला सिद्धांत असा आहे. ''कोणी बद्ध नाहीं, कोणी मुक्त होत नाहीं, कोणी मुमुक्षु नाहीं.'' याप्रमाणें विद्या ही अविद्येसारखीच मायाघटित घटनांत अंतर्भूत होते. आम्ही मुक्ति म्हणून जी मिळवतो त्या मुक्तींतहि माया आम्हाला गांठते आणि हंसून आमच्या ''जितं मया'' म्हणणाऱ्या तर्कशास्त्राकडे बोट दाखविते. मायेची, तिच्या गूढाची गांठ तोडून टाकण्याचा 'पण' या तर्कशास्त्रानें केला होता ! आणि त्याला वाटत होतें कीं त्यानें विजय मिळविला ! पण तें विजयी तर्कशास्त्रहि मायेच्याच पोटांत आहे ! ही गोष्ट त्याच्या नजरेस आणून माया त्याला हास्यास्पद करतें.
या वरील गोष्टी अशा कां आहेत याचें स्पष्टीकरण मिळणें शक्य नाहीं असें सांगण्यांत येतें. प्रथमपासून अस्तित्वांत असलेला अनाकलनीय असा अद्भुत चमत्कार म्हणून, या गोष्टींकडे पहावें असें सांगण्यांत येतें. व्यवहारांत या गोष्टी वास्तविकपणें आहेत आणि आम्हाला त्या मान्य केल्याशिवाय गत्यंतर नाहीं. आम्हाला संसाराच्या गोंधळांतून बाहेर पडावयाचें तें गोंधळाच्याच मार्गांनें बाहेर पडणें भाग असतें. व्यक्तीला आपल्या 'मी'ची गांठ तोडावयाची ती मीपणाचें - स्वार्थाचें - एक सर्वांत वरचें (सर्वांत खालचें) कृत्य करून तोडावयाची असते, त्याला दुसरा मार्गच नसतो ! त्याला आपल्या एकट्याच्या मुक्तीकडे सर्व लक्ष द्यावयाचें असतें. अर्थात् मायेच्या संसारांत आपण इतर सर्व व्यक्तींपासून अगदीं अलग आहों, आपल्या अस्तिस्वाचा, जीवनाचा, इतर व्यक्तींच्या अस्तित्वाशीं, जीवनाशीं कसलाच संबंध नाहीं असें व्यक्तीनें निःसंदेहपणें मानावयाचें असतें. या इतर व्यक्ती आपल्या मनानें निर्मिलेल्या अवास्तव मिथ्या प्रतिमा आहेत, त्यांची मुक्ति मुळींच महत्त्वाची नाहीं. केवळ आपला आत्मा मात्र सर्वथा सत्यरूप आहे आणि त्याची मुक्ति ही महत्त्वाची गोष्ट आहे असें व्यक्तीनें मानावयाचें असतें ! फलतः मायावादानुसार, माझ्याखेरीज इतर जीवात्मे (माझ्याशीं वस्तुत: एकरूप असलेले जीवात्मे) बंधनांत सोडून माझें बंधनांतून मुक्त होणें मी खरें मानतों !
विश्व आणि ब्रह्म किंवा आत्मा या दोहोंमध्यें अनिवार्य विरोध आहे ही कल्पना बाजूस ठेवली म्हणजे विश्वांतील व्यवहाराची व्यवस्था सरळ तर्कशास्त्रानें अगदीं समाधानकारक लागूं शकतें. जें व्यक्त झालें आहे त्या ब्रह्माची एकता मान्य करून त्याच्या व्यक्तीकरणांत अनेकता, अनेकमुखता त्यानें अंगीकारली आहे ही गोष्ट आम्हीं ओळखली पाहिजे. पहावें
पान क्र. ७५
तिकडे ही गोष्ट आमच्या नजरेस येईल, मात्र आम्ही पाहून न पाहिल्यासारखें वागणार नसलो तर. जें ज्ञानमय सत्, मूळ गूढ वस्तु आहे, त्या वस्तूची स्वाभाविक साधी गूढता यांतच आहे कीं, तें बंधनातीत आहे - स्वत:च्या एकतेचें बंधन त्याला नाहीं, स्वत:च्या अनेकतेचें बंधन त्याला नाहीं. तें याच अर्थानें पूर्ण स्वतंत्र आहे कीं, तें आपलें आविष्करण करीत असतां त्या आविष्करणाचीं रूपें शक्य त्या सर्व रूपांतून आपल्या इच्छेप्रमाणें पसंत करण्यास, व पसंत केलेल्या रूपांची मांडणी इच्छेप्रमाणें करण्यास सर्वस्वीं मोकळें आहे. ''कोणी बद्ध नाहीं, कोणी मुक्त होत नाहीं, कोणी मुमुक्षु नाहीं'' - कारण तें केवल पूर्ण स्वतंत्र ब्रह्म सदासर्वदा पूर्ण स्वतंत्र असतें, पूर्ण मुक्त असतें. तें इतकें स्वतंत्र आहे कीं, तें आपल्या स्वतंत्रतेनेंहि बांधलेलें नाहीं. तें बंधनांत असल्याचा खेळ, खऱ्या बंधनांत पडल्यावांचूनहि खेळूं शकतें. तें जें बंधन, जी शृंखला पत्करतें, ती स्वत: होऊन व स्वत:च्या सोयीसाठीं, स्वत:च्या अंगाला त्यानें बांधलेली असते. अहं किंवा मी हें एक बंधन या ब्रह्मानें कांहीं कालाकरितां, अवस्थांतराचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीं एक युक्ति म्हणून, निर्माण केलें आहे व पत्करलें आहे. आपल्या खेळासाठीं निर्माण केलेल्या वैयक्तिक ब्रह्माचे ठिकाणीं विश्वब्रह्म आणि विश्वातीत ब्रह्म (खेळाच्या सोयीसाठीं अलग केलेलें) पुनरपि भरण्यासाठीं अहम् ची योजना आहे. ब्रह्म हें विश्वातीत विश्वरूप असून व्यक्तीचें रूप घेतें. या व्यक्तीच्या अहंपूर्ण रूपांत आपलें विश्वातीतत्व व विश्वरूपत्व घालून, आपलें व्यक्तिरूपी व्यक्तरूप पूर्ण करणें हा, अहम् चें बंधन पत्करण्यांतील बंधनातीत ब्रह्माचा उद्देश आहे.
विश्वातीत, विश्वाधिशायी ब्रह्म, हें स्वत: पूर्ण स्वतंत्र, सर्वसंबंधनिरपेक्ष, कालातीत, स्थलातीत, आणि सांत-अनंत या मनोनिर्मित विरोधी कल्पनेच्या अतीत असें आहे. परंतु विश्वामध्यें तें साकार होण्यासाठीं आपली स्वतंत्रता, अर्थात् आपली माया, उपयोगांत आणून आपली अशी एक आविष्कार योजना तयार करतें कीं तिच्यांत एकता आणि अनेकता एकमेकींच्या पूरक म्हणून काम करतात; आणि ही अनेकतानिष्ठ एकता तीन क्षेत्रांत - अधोमानसिक जाणीव, मानसिक जाणीव, अतिमानसिक जाणीव या तीन क्षेत्रांत किंवा अवस्थांत - ब्रह्मानें प्रतिष्ठित केलेली आहे. अधोमानसिक जाणिवेचें क्षेत्र म्हणजे जडाचें, भौतिकाचें क्षेत्र. हें क्षेत्र ब्रह्म आपल्या जाणिवेनेंच सर्वस्वीं चालवीत असतें. आमच्या भौतिक जगांत अनेक वस्तूंचा आकार घेतलेल्या अनेकतेच्या पोटीं एकता आहे. विश्व-
पान क्र. ७६
व्यापक क्रिया, विश्वव्यापक द्रव्य यांच्या रूपानें ही एकता व्यक्त होते; तथापि या द्रव्याला, या क्रियेला त्या एकतेचें वा अनेकतेचें ज्ञान, त्याच्या पृष्ठभागावर मुळींच होत नाहीं. मानसिक जाणिवेचें क्षेत्र म्हणजे आमचें क्षेत्र; येथें अहम् जागृत असतो. ही अहम् ची पृष्ठभागीय पातळी जाणीवमय असते; जडद्रव्याच्या पृष्ठभागाप्रमाणें जाणीवशून्य नसते. या अहमच्या जाणिवेला एकतेचें दर्शन घडूं शकतें, घडतें. पण हें एकतादर्शन दृश्य रूपापुरतें, दृश्य क्रियेपुरतेंच घडतें. या दृश्य रूपामागें, या दृश्य क्रियेमागें त्यांच्या अंतरंगात, त्यांच्या पोटीं जें घडत असतें त्या कशाचाच या अहम् ला पत्ता लागत नाहीं; आणि म्हणून त्याला ही गोष्ट अनुभवास येत नाहीं कीं, तो स्वत: एक वस्तु असला तरी त्याची स्वत:ची एकता स्वतंत्र नाहीं, बाकी सगळ्या वस्तू आणि तो स्वत: मिळून एक वस्तु आहे. वस्तुत: ''विश्व मी'' हा एकच खरा ''मी'' असतां या विश्व-मीचें, व्यक्तिगत अहंकारानें विभाग पडल्यानें आमची अपूर्ण व्यक्तिता निर्माण झाली आहे. पण अहम् कांहीं नेहमी व्यक्तीच्या व्यक्तित्वाच्या चौकटींत बंदिस्त राहत नाहीं. 'व्यक्ति-मी' या जाणिवेच्या पलीकडे तो जाऊं शकतो, अतिमानसिक जाणिवेची अवस्था त्याला लाभूं शकते. ही अवस्था त्याला लाभली म्हणजे पूर्वीं त्याच्या बाहेर म्हणून दिसणाऱ्या गोष्टी, त्याला त्याच्या आंत दिसूं लागतात. त्याचा क्षुद्र अभिमान गळून जातो. सर्व विश्व एक आहे ही जाणीव त्याला होते, विश्वातीत ब्रह्मांत तो प्रविष्ट होतो आणि हें अनेकरूपी एकता भरलेलें विश्व, त्या विश्वातीताचें व्यक्त स्वरूप आहे हें त्याला कळतें.
व्यक्तीच्या आत्म्याची मुक्ति कशी होईल या विचारालाच, ईश्वराच्या विशिष्ट निश्चित व्यवहारांत प्राधान्य असतें. ईश्वराला वैयक्तिक आत्म्याच्या मुक्तीची सर्वप्रथम आवश्यकता असते. या मुक्तीवर ईश्वराचे बाकीचे व्यवहार अवलंबून असतात. अनेक रूपांत स्वत:ची पूर्णतया अभिव्यक्ति करण्याची ईश्वराची इच्छा आहे. या अभिव्यक्तीचा आरंभ व्यक्तीच्या मुक्तीपासून होतो. ही मुक्ति, हा एक प्रकाशबिंदु आहे, जेथून ईश्वराच्या मनांतील स्वरूप-प्रकाशनाला - विश्वगत अनेकांच्याद्वारां करावयाच्या नियोजित पूर्णस्वरूप-प्रकाशनाला - आरंभ होतो. मुक्त आत्मा ज्याप्रमाणें आपल्या पातळींत एकतेचा अनुभव घेतो त्याप्रमाणें आपल्या पातळीच्या वर आणि खालीं ज्या भूमिका आहेत, त्या सर्वांची एकता अनुभवतो. विश्वातीताशीं तो एकरूप झाला कीं, विश्वाच्या अनेकतेशीं
पान क्र. ७७
तो एकरूप होतोच होतो. या दुसऱ्या एकरूपतेशिवाय पहिली एकरूपता अपूर्णच असते; आणि ही मुक्त आत्म्याची विश्वांतील अनेक आत्म्यांशीं जी एकरूपता होते, ती फलत: या अनेकांच्या मुक्तीला कारणीभूत होते. प्राणमय आत्मा, पाशवी आत्मा देहनिष्ठ असतो व आपल्यासारखे दुसरे देह निर्माण करतो, त्याप्रमाणें ब्रह्ममय, ब्रह्मनिष्ठ आत्मा आपल्यासारखे दुसरे ब्रह्ममय मुक्त आत्मे निर्माण करतो. तेव्हां केवळ एकच आत्मा मुक्त झाला तरी, लागलींच त्या मुक्त आत्म्याला लाभलेली जाणीव, आपलें क्षेत्र वाढवूं लागते. क्षेत्र-विस्तार करण्याची स्वाभाविकच प्रवृत्ति या जाणिवेमध्यें असते. केव्हां केव्हां पृथ्वीवरील अ-मुक्त आत्म्याच्या अंतरंगांत मुक्त आत्म्याच्या दिव्य जाणिवेच्या प्रभावानें तत्सम दिव्य जाणीव केवळ उदय पावते एवढेंच नव्हे तर, जोरानें उफाळून वर येऊं लागते. मुक्त आत्म्याच्या दिव्य जाणिवेचा प्रभाव पृथ्वीपुरताच असतो असें मानण्याचेंहि कारण नाहीं - पृथ्वीखेरीज इतर विश्वविभागांतहि तिचा परिणाम होत नसेल कशावरून ? मुक्त आत्म्याच्या दिव्य जाणिवेच्या क्षेत्र-विस्ताराला मर्यादा तरी कोठें घालतां येणार ? बुद्धासंबंधींची जी कथा प्रसिद्ध आहे, ती केवळ कथाच असेल काय ? असें म्हणतात कीं, निर्वाणाच्या उंबरठ्यावर बुद्ध उभा होता; असत् मध्यें प्रवेश करावयाच्या द्वाराचा उंबरठा त्यानें गांठला होता. पण त्यानें आंत प्रवेश करण्याचें नाकारलें. त्याचा मुक्त आत्मा परत फिरला. त्यानें असा निश्चय केला कीं, दुःखाच्या कोंडींतून, मीच्या बंधनांतून मुक्त न झालेला असा एकादा जीव जरी जोंपावेतों पृथ्वीवर आपला दुःखी जन्म कंठीत असेल तोंपावेतों, जेथून परत येतां येणार नाहीं अशा असत् च्या प्रांतांत, निर्वाणाचा उंबरठा ओलांडून मी केव्हांहि प्रवेश करणार नाहीं.
ही बुद्धासंबंधींची कथा खरी असो वा नसो; पण वस्तुस्थिति अशी आहे कीं, विश्वांतील विस्तृत क्षेत्रांतून स्वत:ला पुसून न टाकतांहि 'असत् ची' सर्वश्रेष्ठ निर्वाणावस्था आत्मसात् करतां येतें. ब्रह्म हें अंतरांत एकटेंएक पूर्ण स्वतंत्र व बाहेर साकार अनेकरूप असें एकाच वेळीं असतें. व्यक्ततेपासून वेगळें राहणे आणि व्यक्ततेचा आश्रय करणें या दोन्ही गोष्टी ब्रह्म एकाच वेळीं करतें. अंतर्यामीं निराकार एकता, बाहेर साकार अनेकता या दोन बाजू ब्रह्म नेहमींच संभाळतें. आपणहि ब्रह्म आहों, म्हणून ब्रह्माची ही दिव्य आत्मसत्ता आम्हांला लाभूं शकते. जें जीवन खरोखरी दिव्य होऊं
पान क्र. ७८
बघत आहे, त्या जीवनामध्यें अंतरांत आणि बाह्य व्यवहारांत ब्रह्माच्या उपरिनिर्दिष्ट दोन वृत्ति-प्रवृत्ती सुसंवादीपणें राहतील अशी व्यवस्था असली पाहिजे. मुक्तीसाठीं खालच्या पायरीवरून वरच्या पायरीवर असें चढत चढत जावें लागते. असें करतांना केवळ मुक्तीच्या मागें लागून, चढून आलेल्या खालच्या पायऱ्यांचा संबंध तोडून टाकीत गेलें तर या नकार पंथानें जीव शेवटीं ईश्वरानें आपलें म्हटलेल्या या विश्वाचा त्याग करतो. उलटपक्षीं, विश्वांतील कोणतेंहि कार्य करीत असतां त्या कार्यांत बुडून जाणें, क्रियाशक्तींत तल्लीन होऊन बाकी गोष्टी विसरून जाणें, या मार्गानें आपण ईश्वराचें सर्वश्रेष्ठ स्वरूप ओळखीनासे होतो; आणि जडद्रव्य, जडशक्तीच सर्व कांहीं आहे, असा एखादा क्षुद्र सिद्धांत धरून बसतो. ईश्वरानें ज्या गोष्टींचा समन्वय केला आहे, ज्या गोष्टी एकत्र ठेवण्याची व्यवस्था केली आहे, त्या गोष्टी आम्ही एकमेकींपासून अलग कां कराव्या ? ईश्वर पूर्णपणें आपलासा करून घेणें असेल, तर ईश्वराप्रमाणें आपण पूर्ण व्हावयास हवें; असें पूर्ण होणें ही ईश्वराच्या पूर्ण प्राप्तीची अटच आहे.
आम्हीं अहम् च्या आश्रयानें जें आत्मप्रकटन करतो, त्यांत मुत्यु आणि दुःख यांचें साम्राज्य आहे; अहम् ची योजना तात्पुरती आहे. जडाकडून ब्रह्माकडे अहम् मधून जावयाचें असतें. अहम् चा अहंकारी आत्माविष्कार सुटून त्याची आध्यात्मिक प्रगति व्हावयाची ती अनेकतेच्या, अविद्यादृष्ट अनेकांच्या जीवनाशीं क्रमश: संबंध येत राहण्यानें होत असते. अविद्यादृष्ट अनेकांमध्यें विद्येच्या दृष्टीनें पूर्ण एकता अनुभवास येते आणि याप्रमाणें अविद्या व विद्या यांचें आमच्या ठिकाणीं साहचर्य असेल तर, विश्वांत कार्यमग्न राहून आम्ही अमृतत्व आणि आनंद यांचा पूर्ण उपभोग घेतो. सर्व साकार, सजन्म वस्तू सोडून पलीकडे असलेला सर्वातीत अजन्मा, निराकार, ब्रह्मपुरूष आम्हीं आपलासा केला म्हणजे, खालच्या पातळीवरील जन्यमृत्यूपासून आम्ही मुक्ति मिळवितो; आणि ब्रह्माप्रमाणें स्वेच्छेनें जन्म किंवा साकारता धारण केल्यानें मृत्यूच्या प्रांतांत आम्ही अमृत आनंद आणतो व मानवतेंत, मानवाच्या विश्वांत या अमर आनंदाचा जाणीवपूर्वक आविष्कार करणारीं प्रकाशमय केंद्रस्थानें होण्याचें भाग्य आम्हाला लाभतें.
पान क्र. ७९
प्रकरण सहावें
विश्वांत मानवाचें स्थान
मानवाचा आत्मा हा एक प्रवासी आहे, तो ब्रह्मचक्रांत फिरत आहे, हें ब्रह्मचक्र अफाट आहे, येथें सर्व जीवांचा मेळा आहे, सर्व अवस्थांचा संसार आहे; प्रवासाला धाडणाऱ्यापासून स्वत:ला वेगळा समजतो म्हणून मानवाचा आत्मा या ब्रह्मचक्रांत फिरत राहतो. ब्रह्मानें (प्रवासाला धाडणाऱ्यानें) त्या आत्म्याला अंगीकारलें म्हणजे अमृतत्वाचें ध्येय त्या आत्म्याला हस्तगत होतें.
- श्वेताश्वतर उपनिषद् १. ६
विश्वाला कांहींतरी अर्थ आहे, विश्वाला कांहींतरी ध्येय आहे, विश्व ही कांहीं निर्हेतुक आभासमय वस्तु नव्हे, किंवा कशीतरी घडलेली 'आकस्मिक' घटना नव्हे. मग या विश्वाचा अर्थ काय ? एका महान् परात्पर, सर्वातीत, प्रकाशमय सद्वस्तूचें क्रमश: आविष्करण, हा विश्वाचा आमच्या मतें अर्थ आहे. या आविष्करणासाठीं जशा या दृश्य विश्वांतील अनंत मर्यादित सापेक्ष वस्तू व घटना आहेत, तशाच आम्हाला न दिसणाऱ्या दुसऱ्या विश्वांतीलहि मर्यादित सापेक्ष वस्तू व घटना या सद्वस्तूच्या आविष्करणासाठींच आहेत. या आविष्कारासाठीं साधनसामग्री म्हणून, कच्चा मसाला म्हणून, पूर्व तयारी म्हणून, आवश्यक क्षेत्र म्हणून, या व दुसऱ्या अदृश्य विश्वांतील सर्व वस्तूंचा व घटनांचा वापर केला जातो. विश्वाचें अस्तित्व ही मनाची फसवी कल्पना नाहीं, हा सिद्धांत ज्या न्यायसंगत विचारसरणीनें आम्ही बसवितो, त्याच विचारसरणीनें हें निश्चितपणें ठरतें कीं, विश्वाच्या पोटीं लपलेली एक ज्ञानशक्ति आहे; या ज्ञानशक्तीला विश्वाचा आरंभ आणि अंतिम ध्येय ठाऊक आहे, आणि ही ज्ञानशक्ति मार्गदर्शक या नात्यानें, विश्वाची गति व प्रक्रिया निश्चित करीत असते. 'विश्व म्हणजे, एकमेकांपासून भिन्न
पान क्र. ८०
अशा असार साकार वस्तूंचा स्वयंभू आंधळा असहाय मेळावा होय, या वस्तू अनंत काल आपापल्या कक्षांतून फिरत असतात, व फिरतांना एकमेकींशीं कधीं चिकटतात, कधीं झगडतात; विश्व हें एका अज्ञानमय शक्तीनें स्वत: निर्मिलेलें व स्वत: गतिमान् केलेलें प्रचंड शक्तिचक्र आहे' - विश्वासंबंधींच्या अशा कल्पना न्यायसंगत विचारसरणि मान्य करूं शकत नाहीं. न्यायसंगत विचारसरणीनुसार, विश्वातीत विश्वनिरपेक्ष अशी एक सत्ता आहे; अर्थात् ती पूर्णपणें स्वायत्त आहे, स्वत:ची पूर्ण मालक आहे; ही सत्ता सर्व दृश्य अस्तित्वाच्या (विश्वाच्या) आंत लपलेली आहे, हें दृश्य विश्व सर्वस्वीं तिच्या ताब्यांत आहे; ही स्वायत सत्ता आकार धारण करून व्यक्त होते. मानवी व्यक्तीमध्यें ही सत्ता आपलें स्वरूप उघडें करून दाखवितें.
व्यक्तीमध्यें त्या विश्वातीत सत्तेचा उदय होणें, प्रकाशमय उत्थान होणें, याला आमचे प्राचीन आर्यपुरुष अरुणोदय म्हणत, उषेचें आगमन म्हणत व या उषेची ते पूजा करीत. विश्वव्यापक विष्णु देवतेचें उंचांत उंच ठेवलेलें पाऊल म्हणजे या उषेचें - व्यक्तीमध्यें उदय पावलेल्या प्रकाशमय सद्वस्तूचें - पूर्णता पावल्यानंतरचें स्वरूप होय. मनाच्या अति शुद्ध स्वर्गांत सर्वत्र नजर फेंकणारा दिव्यदर्शनसमर्थ नेत्र, असेंहि या अत्त्युच्च स्थानाच्या विष्णूचें वर्णन प्राचीन आर्य करीत. अत्युच्च स्थानीं विष्णु (सद्वस्तु) आहे, विष्णूचा नेत्रहि आहे, विष्णूचें पाऊलहि आहे. आम्हाला कोठें पोंचावयाचें आहे तें स्पष्ट करण्यासाठीं हें विष्णूचें उच्च स्थानचें पाऊल आहे. विष्णूचा नेत्र आम्हाकडे पहात राहून आम्हाला मार्ग दाखवीत, त्याचें पाऊल ज्या सर्वोच्च स्थानीं आहे, तेथें आम्हाला पोंचविणार आहे. वस्तुत: सर्व कांहीं व्यक्त करणारें वस्तुजातांतील सर्वव्यापी सत्यतत्त्व या नात्यानें विष्णुतत्त्व, सद्वस्तु, सर्वप्रथम सर्वोच्च स्थानीं अस्तित्वांत असतेंच. हें विष्णुतत्त्व विश्वावर नजर ठेवतें. मर्त्य मनुष्याला आपला वेध लावतें; प्रथम मनुष्याच्या मनाला, त्याच्या जाणिवेला हा वेध, हें आकर्षण, ठाऊकहि होत नाहीं; निसर्गाची, निसर्ग निर्मात्याची सर्वसामान्य वाटचाल चालू असते, त्या वाटचालींत निसर्ग जसजसा निसर्गनिर्मात्याकडे आकर्षिला जातो तसतसा निसर्गाबरोबर त्याच्या पोटांतील मानवहि अजाणतां आकर्षिला जातो. पण शेवटीं मानवाच्या जाणिवेला दिव्य विष्णूच्या, सद्वस्तूच्या आकर्षणाचा स्पर्श होतो, मानव हळूहळू क्रमाक्रमानें अधिकाधिक जागृत होऊन आपल्या आत्म्याचें क्षेत्र व उंची
पान क्र. ८१
वाढवून सद्वस्तूच्या दिव्य, उच्च स्थानाकडे नेणारा मार्ग जाणीवपूर्वक, विचारपूर्वक चढत राहतो. दिव्य जीवनाच्या उच्च पायरीवर चढून जाणें हाच खरा मानवाचा मानवोचित प्रवास होय; त्याच्या सर्व कार्यांत हें कार्य श्रेष्ठ आहे, ईश्वराला आवडणारा, स्वीकार्य होणारा असा यज्ञ, असा त्याग, मानवाकडून या कार्यांत, या प्रवासांत घडतो. हा दिव्य प्रवास, हेंच एक मानवाचें या विश्वांतील खरें काम आहे, त्याच्या मानवी जीवनाला या दिव्य प्रवासानेंच केवळ सार्थता येते. हा दिव्य प्रवास जर तो न करील तर त्याचें जीवन केवळ सरपटत जाणाऱ्या किड्याप्रमाणें होईल; अनंत क्षणजीवी किड्यांत हा एक मानवरूपी किडा ठरेल; स्थूल भौतिक विश्वांत अद्भुत, अतिप्रचंड वस्तूंच्या बरोबर पृथ्वी म्हणून जें एक चिखल-पाण्याचें क्षुद्र ठिकाण तयार झालें आहे, त्या ठिकाणीं सरपटत जाणाऱ्या किड्यांत मानवाची गणना करावी लागेल.
दृश्य जगाच्या विरोधात्मक घटनांमधून जें सत्य, जी वस्तुजाताच्या अंतरांतील सद्वस्तु वर यावयाची आहे, व्यक्त व्हावयाची आहे ती सद्वस्तु कोणती ? ज्ञानी लोकांनीं असें सांगून टाकलें आहे कीं, ती सद्वस्तु म्हणजे अनंत, आनंदमय, आत्मज्ञानपूर्ण अस्तित्व किंवा सत्ता होय. ही सत्ता सर्वत्र, सर्व वस्तूंत, सर्वकाळीं, आणि कालापलीकडेहि एकाच स्वरूपांत सारखी असते. दृश्य वस्तूंच्या पोटीं, त्यांच्या पाठीमागें, ती जाणीवपूर्वक राहते. या दृश्य वस्तूंच्या अत्यंत जोरदार क्रियात्मक हालचाली, त्यांचे अति प्रचंड समूह या अदृश्य सत्तेचा पूर्ण आविष्कार करूं शकत नाहींत, त्या सत्तेला मर्यादित करूं शकत नाहींत. ही सत्ता स्वयंभू आहे, तिचा आविष्कार होवो न होवो, त्यावर कांहीं तिचें अस्तित्व अवलंबून नाहीं. तिचें अनेक आविष्कार तिचें प्रतिनिधित्व करतात, तिला लोकांच्या नजरेस आणतात. पण त्या आविष्कारांनीं ती सर्वच्या सर्व व्यक्त झाली असें कधींहि होत नाहीं, होऊं शकत नाहीं. हे आविष्कार तिच्याकडे बोट दाखवितात, दुरून तिची अंधुक कल्पना देतात, पण तिला आमच्या पुढें प्रत्यक्ष उभी करूं शकत नाहींत. त्या आविष्कारांना जे आकार, जीं रूपें लाभतात त्या रूपांच्या, त्या त्या आकारांच्या अंतरीं ती सत्ता, ती सद्वस्तु स्वत: स्वत:लाच केवळ प्रत्यक्ष होते. ती ज्ञानमय सत्ता स्थूल आकारांत, आपल्या स्वयंभू पूर्णत्वाचा क्रमश: पूर्ण विकास करण्यासाठीं स्थूल, साकार होते. विकासक्रमानें मानवाकार झालेली ज्ञानमय सत्ता आत्मविकासानें अंत:प्रकाश, आत्मसाक्षात्कार, आत्मानुभूति ही विकासाची
पान क्र. ८२
पायरी गांठते. मानवाच्या आकारांत ती अंतःप्रकाशादिकांच्या साह्यानेंच स्वत: स्वत:ला ओळखते. विश्वामध्यें ती आपलें स्वरूप जेव्हां धारण करते तेव्हां तिला स्वतःचें ज्ञान होतें. स्वरूपाच्या ज्ञानाच्या पूर्वीं स्वरूप घेणें हें श्रद्धेच्या बळावर शक्य होतें. विश्वामध्यें तिचें स्वरूप-धारण आणि स्वरूप-ज्ञान यांचा अन्योन्यसंबंध आहे. तिच्या स्वरूपांत सत्ता आणि ज्ञान एकत्र अविभाज्य आहेत व सत्ता आणि ज्ञान यांजबरोबर आनंदहि शाश्वतचा आहे. सच्चिदानंद हेंच या सत्तेचें स्वरूप. आकारांच्या, अवस्थांच्या आंत ही सत्ता सर्वस्वी स्वतंत्र, व स्वायत्त असते. ती आपल्या आकारांना व अवस्थांना आपला सच्चिदानंद स्वरूपाचा ज्ञानमय आनंद देऊं शकते, देते. मन-प्राण-शरीर यांत अनंत, आनंदमय, ज्ञानमय सत्तेनें याप्रमाणें साकार व्हावें, (या त्रयीचा आकार अर्थात् या सत्तेला आवश्यक नाहीं -- तिचें आकारनिरपेक्ष अस्तित्व स्वयंभू शाश्वत आहेच.) आणि वैयक्तिक अस्तित्वाचें अशा प्रकारें रूपांतर व अवस्थांतर व्हावें, अशी या स्वयंभू सत्तेची योजना आहे. वैयक्तिक अस्तित्वाचा हाच उपयोग आहे. व्यक्तता नसतांना ही अव्यक्त सत्ता नेहमींच स्वत:शीं एकरूप, सच्चिदानंदरूप असते. हें सच्चिदानंदत्व व्यक्ततेनंतर, व्यक्तीव्यक्तींच्या संबंधांत, व्यक्ति व समुदाय यांच्या संबंधांत व दुसऱ्या अनेक संबंधांतहि तिला दाखवतां येतें.
मानवी बुद्धीला शक्य असणाऱ्या सर्व ज्ञानाच्या पलीकडे ती मूळ सद्वस्तु आहे आणि ती स्वत:ला सच्चिदानंद म्हणून ओळखते, हा वेदांताचा सर्वश्रेष्ठ सिद्धांत आहे. दुसरे सर्व सिद्धांत याच्या पोटांत येतात, किंवा यावर अवलंबून असतात. मानवी बुद्धीला अज्ञेय असणाऱ्या सच्चिदानंदाचा मानवी आत्म्याला अनुभव घेतां येतो. आत्म्यापुढचीं सर्व दृश्यें असार-परित्याग पद्धतीनें तपासलीं - त्यांचीं आवरणें, त्यांचे आकार दूर केले - म्हणजे काय शिल्लक राहते? तीं दृश्यें नाहींशीं होतात व एक सच्चिदानंद ब्रह्म शिल्लक राहतें. हीच एक वस्तु, हाच एक अनुभव शिल्लक राहतो. दृश्यांच्या नाशवंत नामांत व रूपांत त्यांचें तत्त्वभूत असें अविनाशी सत्य काय आहे ? अशा प्रकारें सार-परिग्रह पद्धतीनें आत्म्यापुढील सर्व दृश्यांची तपासणी केली तरी सच्चिदानंद ब्रह्म ही एकच वस्तु, हा एकच अनुभव शेवटीं शिल्लक राहतो. आपलें ध्येय जीवनाची परिपूर्ति हें असो, किंवा जीवनातीत स्थिति हें असो; आपलें ध्येय आत्म्याची शुद्धता, शांति व मुक्ति हें असो, किंवा आत्म्याचें सामर्थ्य, आनंद, समग्रता
पान क्र. ८३
(पूर्णता) हें असो -- या ध्येयांच्या मागें लागणारी आमची मानवी जाणीव, वस्तुत: सदासर्वदा सच्चिदानंदाच्याच शोधांत असते; अज्ञात, सर्वव्यापी, जिच्यावांचून कोणाचेंच चालत नाहीं अशी सच्चिदानंद ब्रह्म ही वस्तु आहे; आणि ज्ञानांत व भावनांत किंवा संवेदनांत व कृतींत, सच्चिदानंदाचा शोध करून अनुभव घेण्याकडे आमच्या जाणिवेचें सर्व लक्ष लागलेलें असतें.
विश्वातीत, अज्ञेय असें सच्चिदानंद हें, विश्व आणि व्यक्ति या दोन दृश्यांत उतरतें. हीं दोन दृश्यें सारभूत आहेत. या दोन वस्तूंच्यामध्यें अनेक समष्टी, समुदाय आहेत. पण ते सर्व या दोहोंच्या अन्योन्यावर होणाऱ्या क्रिया-प्रतिक्रियांतून निर्माण होतात. त्या अज्ञेयाकडे जावयाचें तर विश्व व व्यक्ति या दोहोंच्या द्वारांच जावयास पाहिजे. सर्वोत्तम सद्वस्तूचें हें खालीं येणें, स्वभावत: तिचें स्वत:ला लपविणें आहे. हें अवतरण किंवा लपणें क्रमाक्रमानें घडतें. एकाखालीं एक, अशा अनेक भूमी किंवा भूमिका, पायऱ्या किंवा पातळी या अवतरणाच्या क्रमांत तयार होतात. अवतरणाच्या क्रमांत ही सर्वोच्च सद्वस्तु लपण्याच्या उद्देशानें एकावर एक अशीं अनेक आवरणें घेत असते. ती अगदीं खालीं स्थूलाच्या भूमिकेवर, स्थूलाच्या आवरणांत एकदां येऊन पोंचली म्हणजे तिचा उलट क्रम - वर चढण्याचा, आवरण दूर सारून आत्मदर्शन देण्या-घेण्याचा क्रम - सुरूं होतो. अर्थात् ब्रह्माच्या अवतरणामध्यें ज्या क्रमवार अवतरण-भूमिका असतात त्याच उलटक्रमानें मनुष्याच्या क्रमवार आरोहण-भूमिका होतात. तें अज्ञात ब्रह्म जें जें आवरण क्रमानें घेत घेत लपतछपत खालीं येतें, तें प्रत्येक आवरण ब्रह्मभक्ताला, ब्रह्मशोधकाला क्रमश: उलट क्रमवारीनें ब्रह्मसाक्षात्काराचें साधन बनतें. जड, भौतिक, स्थूल निसर्ग ही सर्वांत खालची भूमिका, सर्वांत बाहेरचें आवरण. हा स्थूल, भौतिक निसर्ग म्हणजे जणुं झोंपलेलें ब्रह्मशरीर असतें. या झोंपेंत निसर्गाच्या हालचाली अगदीं तालबद्ध सुसंगत चाललेल्या असतात. निसर्गाच्या शक्तीच्या या सुव्यवस्थित हालचाली ज्या आत्म्याच्या किंवा तत्त्वाच्या योजनेमुळें होतात, त्या आत्म्याची किंवा तत्त्वाची जाणीव निसर्गाला नसते. निसर्गाला जणुं भौतिक समाधि, महासमाधि लागलेली असते. या समाधींत निसर्ग मौन धारण करीत असतो. ही ब्रह्माची सर्वांत खालच्या भूमिकेवरील अवस्था झाली. या अवस्थेंतून निसर्ग किंवा विश्व - किंवा विश्वरूप ब्रह्म म्हणा - धडपड करीत वरच्या प्राणमय जडाच्या अवस्थेंत चढून जातें. या अवस्थेंत
पान क्र. ८४
जड भौतिक अवस्थेंतील स्थिर एकमुखी तालबद्धता असत नाहीं. कमी अधिक अस्थिर, अव्यवस्थित परंतु विविध प्रकारची व द्रुतगतीची तालबद्धता, निसर्गाच्या जीवमान वर्गांत आढळून येते. या जीवाच्या, प्राणमय जडाच्या, तालबद्ध गतीला लागूनच, गतिमान् आत्मजाणिवेची हद्द असतें. विश्वरूप ब्रह्म, जडता अनुभवून, जीवता-प्राणमयता-अनुभवण्यासाठीं धडपडत वर चढतें त्याप्रमाणें प्राणमयता, जीवता अनुभवून वरतीं मनाच्या क्षेत्रांत तें चढतें. या मनाच्या क्षेत्रांत मनोमय जीव, स्वत:ला व विश्वाला ओळखूं लागतो. एवढी जागृति विश्वाच्या सर्वोच्च घटकांत आली, इतरांपासून वेगळेपणें स्वत:ला ओळखणारें व्यक्तित्व त्याच्या सर्वोच्च घटकांत आलें म्हणजे, त्याला (विश्वाला) आपल्या सर्वश्रेष्ठ कार्यासाठीं (विश्वातीताची प्राप्ति करून घेण्याच्या कार्यासाठीं) अवश्य असणारें आत्मोद्धाराचें साधन मिळाल्यासारखें होतें. परंतु विश्वाचें इष्ट कार्य, मन कांहीं शेवटपर्यंत करूं शकत नाहीं, पूर्ण करूं शकत नाहीं. विश्वानें आरंभिलेलें विकासकार्य केवळ कांहीं मर्यादेपर्यंत तें पुढें नेतें. मन हा एक श्रमिक आहे. त्याला तीव्र बुद्धि लाभलेली आहे, पण ही बुद्धि मर्यादित शक्तीची असून त्या क्षेत्रांतच फक्त ती काम करूं शकते. प्राणमय जीवनानें जो कमीअधिक अव्यवस्थित माल मनापुढें मांडलेला असतो तो घेऊन त्यांत, त्याच्या मर्यादित शक्तीनुसार कांहीं सुधारणा करणें, इष्ट कार्यासाठीं तो योग्य करून घेणें, त्याच्यांत विविधता येईल असें करणें, त्याचें वर्गीकरण करणें - हे इतके संस्कार, प्राणमय जीवनानें दिलेल्या मालमसाल्यावर करून, हा मसाला मन त्या कारागिराच्या हातीं देतें, जो कारागीर आमचें जीवन दिव्यतामय करण्याच्या कामांत सर्वश्रेष्ठ कर्तबगारीचा कलावंत आहे. हा कलावंत अतिमानसांत राहतो. अतिमानस म्हणजे अतिमानव. [अतिमानस (विज्ञान) ज्याला लाभलें तो अतिमानव] तेव्हां आमचें विश्व मनापर्यंत चढून आलें आहे, तें आणखी वर चढावयाचें आहे; मनापेक्षां श्रेष्ठ अशा जाणिवेच्या शक्तीनें, अतिमानसिक शक्तीनें युक्त व्हावयाचें आहे. ही श्रेष्ठ शक्ति किंवा तत्त्व, ही श्रेष्ठ अवस्था व क्रियासामर्थ्य विश्वाला लाभलें म्हणजे विश्व आणि व्यक्ति या दोघांना त्या विश्वातीताची, विश्वातीत परतत्त्वाची ओळख होते व प्राप्ति होते. हें परतत्वच वस्तुत: विश्व आणि व्यक्ति या रूपांनीं व्यक्त झालें आहे. ही अतिमानसिक किमया पूर्ण झाली कीं विश्व आणि व्यक्ति यांना एकमेकांचा संबंध स्पष्ट होतो, एक-
पान क्र. ८५
मेकांचें कार्य एकमेकांना पूरक आहे हें स्पष्ट होतें, आणि म्हणून या दोनहि परतत्त्वाच्या प्रतिमा अन्योन्यसंबंधांतील विसंवाद दूर करून पूर्ण सलोख्यानें वागतात, ऐक्यभावानें बांधल्या जातात.
प्राण आणि मन यांच्या व्यवहारांत जी अव्यवस्था असते ती अतिमानसिक दृष्टि लाभल्यानें दूर होते, कारण या दृष्टीला भौतिक व्यवस्थेपेक्षां अधिक पूर्ण अशा व्यवस्थेचें रहस्य दिसतें. प्राण आणि मन यांच्या खालच्या पातळीवर जें भौतिक द्रव्य असतें, त्यांत पूर्ण शांत अवस्था आणि अमर्याद शक्तीची प्रचंड क्रिया यांचा समतोल असतो. परंतु या गोष्टी त्या द्रव्याच्या स्वतःच्या नसतात, त्या स्वत:च्या आहेत हा अनुभव त्याला नसतो. त्याची शांतता त्याची नसते, ती शांतता म्हणजे जाणिवेवरील एक निस्तेज पडदा, ज्ञानशून्य जडतेचा पडदा असतो; ती एक जाणिवेच्या झोंपेची, संवेदनाहीन अवस्था असते; किंवा असें म्हणतां येईल कीं, जींत जाणीव आंत कोंडून टाकलेली, प्रतिबंधक औषधानें रुद्ध केलेली आहे, अशी ती जड भौतिक द्रव्याची वरची शांतता असते. हें जडद्रव्य एका शक्तीमुळें गतिमान् होतें; ही शक्ति त्या द्रव्याचा खरा आत्मा म्हणून असते, परंतु त्या द्रव्याला त्याच्या जड भौतिक स्थितींत या आत्म्याची जाणीव नसते; त्या आत्म्याच्या अनुभवांत त्याला भाग घेतां येत नाहीं; त्याच्या पोटीं काम करणाऱ्या तालबद्ध शक्तीच्या आनंदाचा, त्याच्या आत्म्याच्या आनंदाचा लाभ घेण्याइतकी जागृति त्याच्यांत असत नाहीं.
प्राण आणि मन यांच्यांत एवढी जागृति आलेली असते कीं, त्यांना 'आपला आत्मा' म्हणून कांहीं असावें असें वाटतें, त्याचा शोध घ्यावा असें वाटतें, त्याची तृप्ति व्हावी असें वाटतें; या गरजा त्यांना भासूं लागतात आणि म्हणून त्यांची धडपड सुरू होते. मनाच्या अज्ञानाची ज्ञानासाठीं व प्राणाच्या वासनेची भोगासाठीं धडपड सुरू होते. कितीहि धडपड केली तरी प्राणाची वासना, मनाची जिज्ञासा अतृप्तच राहते. तरीपण ही धडपड, आत्मज्ञान व आत्मतृप्ति प्राप्त होण्याची शक्यता निर्माण करते. आत्मतृप्तीचें, आत्मपरिपूर्तीचें क्षेत्र, प्राण आणि मन यांच्या क्षेत्राच्या पलीकडे आहे. प्राण आणि मन आपल्या प्रकृतींतून आपला उद्धार करून जेव्हां एक प्रकारची अतिप्राकृतिक अवस्था प्राप्त करून घेतात तेव्हां त्यांना आत्मज्ञानाचा व आत्मतृप्तीचा लाभ घडतो. जड भौतिक निसर्गांत दिसणारी, पूर्ण शांतता आणि प्रचंड क्रिया यांची समतोलता ही ज्याचें स्थूल प्रतिबिंब आहे ती खरी दिव्य समतोलता (स्थितप्रज्ञता), प्राण व मन
पान क्र. ८६
यांच्या पलीकडे आमच्या जाणिवेच्या अनुभवास येते. या अतिमानसिक क्षेत्रांत जीं शांतता असते ती जडता किंवा जाणिवेची रुद्ध अवस्था नसते, तर अमर्याद शक्तिसंपन्न असीम आत्मजाणिवेची केंद्रित अवस्था असते; तसेंच या क्षेत्रांतील अमर्याद शक्तीची प्रचंड क्रिया, ही अनिर्वचनीय आनंदाच्या अखंड लहरींनीं संपन्न असते; कारण या क्षेत्रांत शक्तीची हालचाल होते ती तडफडणाऱ्या वासनेची किंवा धडपडणाऱ्या अज्ञानाची हालचाल नसते, तर तिची प्रत्येक हालचाल अखंड असीम आत्मशांति आणि आत्मसामर्थ्य यांचा आविष्कार म्हणून होत असते. प्राण आणि मन यांनीं अतिमानसिक क्षेत्रांत पदार्पण केलें म्हणजे मनाच्या अज्ञानाला तो ज्ञानाचा प्रकाश प्राप्त होतो, ज्या प्रकाशाची अंधुक एकदेशी छाया तें स्वत:च्या क्षेत्रांत असतें; त्याचप्रमाणें या क्षेत्रांत प्राणाच्या वासना पूर्णतया शांत होऊन लयास जातात, कारण येथें जी इष्टसंपन्नता व कृतार्थता त्यांना लाभते, तिच्यासाठींच वस्तुत: त्यांच्या पूर्वींच्या क्षेत्रांत असतां त्यांची धडपड चाललेली असते; अगदीं अतिपाशवी भौतिक भोगाची इच्छा जेव्हां या वासना करीत होत्या तेव्हां देखील, वस्तुत: या अतिमानसिक क्षेत्रांतील ''भोगासाठीं'' त्या आतुर होत्या; त्यांना डोळे नव्हते, त्यांचें स्थान खालीं अंधारांत होतें, त्या पतित स्थितींत काळ कंठीत होत्या म्हणून केवळ त्यांच्या आकांक्षा त्या वेळेला पतित, क्षुद्र, अधम असें बाह्य स्वरूप धारण करून होत्या. त्या आकांक्षांचें हृदय अतिमानसिक क्षेत्रांतील 'भोगांचीच' इच्छा करीत होतें म्हणून त्या क्षेत्रांतील उत्तम विशुद्ध भोग भोगून त्या पूर्णपणें तृप्त व शांत होतात.
विश्व आणि व्यक्ति या दोघांनाहि विश्वातीत परतत्त्वाकडे, ब्रह्माकडे चढण्याच्या कार्यांत एकमेकांची जरूर असते. नेहमींच विश्व आणि व्यक्ति एकमेकांकरितां जगत असतात आणि एकमेकांना लाभदायक होतात. विश्व हें अनंत काल व आकाश किंवा अवकाश यांत पसरलेलें सर्वरूप ब्रह्म, व व्यक्ति हें काल आणि आकाश किंवा अवकाश यांच्या मर्यादांत केंद्रित झालेलें तेंच सर्वरूप ब्रह्म होय. सर्वरूप ब्रह्माची एकरूप सर्वता, बाह्यतः अनंत विस्ताराच्या द्वारां व्यक्त करण्याचा प्रयत्न विश्व करीत असतें; परंतु हा प्रयत्न पूर्णतया यशस्वी होत नाहीं, कारण बाह्य विस्ताराच्या संसारांत एकच एक सद्वस्तु किंवा अस्तित्व हें अनेक अस्तित्वांच्या किंवा वस्तूंच्या बेरजेचें स्वरूप धारण करतें - अर्थात् ही बेरीज कांहीं ''मूळ एक'' किंवा ''अंतिमएक'' होऊं शकत नाहीं. आरंभ-शून्य
पान क्र. ८७
व अखेर-शून्य असा आवर्त दशांश, (recurring decimal) हेंच एक रूप बेरजेच्या अस्तित्वाला येऊं शकतें. विश्व हें अशा अडचणीत खऱ्या एकतेच्या ध्यासानें आपल्यामध्यें, सर्वरूप ब्रह्म जींत आत्मजाणिवेसह केंद्रित झालें आहे अशी व्यक्ति, निर्माण करतें. या व्यक्तीच्या द्वारां विश्वाला विश्वातीतापर्यंत पोंचण्याची आकांक्षा धरतां येते. प्रकृतीनें अगदीं खालच्या पातळीवरून परत फिरून पुरुषाकडे त्याच्या दर्शनासाठीं जाण्याचें ठिकाण म्हणजे आत्मजाणीवपूर्ण व्यक्ति हें आहे. व्यक्तीच्या द्वारां विश्व आपला आत्मा शोधून काढण्याच्या मार्गास लागतें; ब्रह्म पूर्णपणें निसर्गाचें रूप घेऊन ''कृतार्थ'' झाल्यावर, तो निसर्ग क्रमश: ब्रह्म होण्याच्या मार्गाला लागतो.
वर चढून विश्वातीत ब्रह्माची गांठ घेण्यासाठीं, विश्वाला व्यक्तीची आवश्यकता असते, त्याप्रमाणें व्यक्तीलाहि त्या कार्यासाठीं, विश्वाची आवश्यकता असते. व्यक्तीला आत्मज्ञानप्राप्ति, आत्माविष्कार करण्याची प्रेरणा व साधनसामग्री विश्वाकडून मिळते. व्यक्तीचें अधिष्ठान, उदयस्थान विश्व आहे; तिची साधनसंपत्ति, तिचें कार्यक्षेत्र, तिला जें दिव्य कर्म करावयाचें असतें त्या कर्माचा कच्चा मसाला, सर्व कांहीं विश्वांत आहे, विश्वच पुरवतें. व्यक्तींत विश्वगत ब्रह्मजीवन केंद्रित होऊन राहतें; अर्थात् या केंद्रीभूत ब्रह्माला मर्यादित जागेंत मर्यादित शक्तीनें व्यवहार करावा लागतो. मूळ ब्रह्म एक, अद्वितीय, अंतर्भेदशून्य, एकरस, एकतत्त्व असल्यानें त्याला मर्यादा, सीमा, बंधन कसलेंहि नसतें; पण तशी कांहीं 'व्यक्ति-ब्रह्माची' अवस्था नसते. म्हणून स्वतांत समाविष्ट असलेली 'मूळ-ब्रह्माची' सर्वता व्यक्तीनें व्यक्त करावयाची तर तिला अनिवार्यपणें जाणिवेची विश्वव्यापकता व अ-व्यक्तिता धारण करणें भाग असतें. व्यक्तीनें आपली जाणीव कितीहि विश्वव्यापक केलीं, आपली सामान्य व्यक्तिता कितीहि सूक्ष्म, शून्यवत् करून टाकली, तरी तिला विश्वामध्यें ईश्वरी कार्य करण्यासाठीं एक प्रकारचें गूढ व्यवहार साधन - सामान्य व्यक्तित्वांतील व्यक्तित्व - संभाळून ठेवावें लागतें. व्यक्तीची सामान्य व्यक्तिभावना ही या असामान्य विश्वावेगळ्या गूढ ''व्यक्तित्वाचें'' तमोमय अहंकारी प्रतीक असते. हें गूढ व्यक्तित्व जर व्यक्तीनें संभाळून ठेवलें नाहीं तर तिनें आपलें ध्येय साधलें नाहीं असें होईल, तिला घातलेला प्रश्न तिनें सोडून दिला, सोडवला नाहीं असें होईल; ज्या ईश्वरी कार्याकरितां तिनें जन्म अंगीकारला तें ईश्वरी कार्य तिजकडून होणार नाहीं.
पान क्र. ८८
क्रियामय, अतिव्यापक जीवन म्हणून व्यक्तीपुढें विश्व उभें राहतें. या महा-जीवनाचें महान् गतिचक्र कसें चालतें त्याचें पूर्ण रहस्य व्यक्तीनें हस्तगत करावयाचें असतें. विश्व म्हणून एकमेकांशीं संघर्ष करणारे, कार्यप्रवृत्त शक्तींचे अनंत परिणाम, व्यक्तीसमोर मोठा गोंधळाचा जमाव करून असतात, त्याचप्रमाणें भविष्य घडविणाऱ्या, कार्यरूप न घेतलेल्या प्रचंड कार्यकारी शक्तींचें, भोंवऱ्यासारखें भोंवळ आणणारें भ्रमण व्यक्तीच्या समोर चाललेलें असतें. या गोंधळांतून व्यक्तीला कांहीं श्रेष्ठ प्रकारची व्यवस्था, अननुभूत सुसंवादित्व निर्माण करावयाचें असतें. मानवाचें सुसंवाद निर्माण करण्याचें हें व्यवस्थाकार्य ''मानवाची प्रगति'' या शब्दांनीं दाखविलें जातें. भौतिक निसर्गानें एक प्रकारची सुव्यवस्था व सुसंवादित्व आपल्या व्यवहारांत निर्माण करून ठेवलेलेंच आहे. मानवी व्यक्तीनें थोड्याशा भिन्न स्वरूपांत भौतिक निसर्गानें केलेलेंच कार्य करावयाचें आहे, असा मानवी प्रगतीचा अर्थ नाहीं. त्याचप्रमाणे मनाच्या पातळीवर तेथील श्रेष्ठ साधनांचा उपयोग करून पाशवी जीवन जगणें हेंहि मानवी जीवनाचें ध्येय नाहीं. तसें असतें तर, ज्या समाजव्यवस्थेंत बराचसा सुखभोग आणि बरेंचसे भावनिक व बौद्धिक समाधान मानवाला मिळण्याची खात्री आहे अशा समाजव्यवस्थेनें मानव संतुष्ट झाला असता व त्याची प्रगति थांबली असती. आवश्यक वस्तू बऱ्याशा प्रमाणांत पशूला लाभल्या कीं तो तृप्त व संतुष्ट असतो. देवकोटींतले जीव झगझगाटाच्या वैभवांत असतात व त्या वैभवांत ते संतुष्ट असतात. पशूंना व देवांना ज्या श्रेयाची, श्रेष्ठ आत्महिताची कल्पना येत नाहीं त्या श्रेयाचा लाभ करून घेतल्याशिवाय कोणत्याहि स्थितींत मानव मात्र कायम विसांवा घेत बसत नाहीं. जीवमान प्राण्यांत मानव सर्वांत श्रेष्ठ आहे. कारण तो सर्वांत अधिक असंतुष्ट आहे. त्याला मर्यादांचें बंधन व दडपण सर्वांपेक्षां अधिक टोंचतें, बोंचतें, असह्य होतें. दिव्य हव्यासानें झपाटल्याप्रमाणें वेड लागल्याप्रमाणें दूरच्या ध्येयामागें लागणारा असा, मानव हा बहुधा एकच जीववर्ग आहे. अशा दिव्य वेडाची पात्रता इतर जीवांत, देवांत कोठेंहि नाहीं.
अशारीतीनें जीवनाचा, विश्वजीवनाचा जो आत्मा आहे, त्या विश्वात्म्याच्या इष्टसाधक सुप्तशक्ती मानवी व्यक्तींत सांठविल्या आहेत, केंद्रित झाल्या आहेत. सर्व जीवांत मानवी व्यक्ति हेंच प्रामुख्यानें विश्वात्म्याच्या इष्टसाधक सुप्तशक्तींचे केंद्रस्थान आहे. विश्वात्म्याला
पान क्र. ८९
इष्ट असें ईश्वराचें अवतरण स्वतांत घडवून आणण्यास लागणारी पात्रता 'मानव-पुत्र' पूर्णपणें मिळवूं शकतो. मानवाला मनु, मनन करणारा, मनोमय पुरुष, मनोमय आत्मा असें प्राचीन ऋषीनीं म्हटलें आहे. मानव हा केवळ उच्च प्रकारचा सस्तन प्राणी नव्हे, तो मननशील आत्मा आहे. जड द्रव्यानें बनलेल्या पशुदेहांत वास्तव्य करणारा मननशील आत्मा म्हणजे मानव होय. मानव हा ''नाम'' किंवा अज्ञेय तत्त्व आहे, त्यानें कांहीं कार्यासाठीं आकार किंवा देह स्वीकारला आहे. मानव या आपल्या देहाचा उपयोग एक माध्यम म्हणून करतो, आत्म्याला द्रव्याशीं व्यवहार करण्याचें मधलें साधन म्हणून करतो. जड द्रव्याच्या आश्रयानें, या द्रव्याच्या अंतरंगांतून जें पशुजीवन वर आलें आहे, तें पशुजीवन मानवाच्या जीवनाची एक खालची पायरी, पातळी किंवा भूमिका आहे. याच्या वरची भूमिका, मनाची किंवा मानसिक जीवनाची. या भूमिकेवर मानव पक्कें ठाण मांडून बसला आहे. विचार करणें, भावना करणें, इच्छा करणें जाणीवपूर्वक बुद्धिपुरःसर हालचाल करणें, हीं मानसिक जीवनाचीं किंवा मनाचीं अंगें आहेत. भौतिक जड द्रव्य व त्यांत व्यक्त होणाऱ्या प्राणशक्ती यांचा ताबा मिळविण्याचा मन प्रयत्न करीत असतें; त्याचप्रमाणे या द्रव्याला व या शक्तींना, क्रमवार प्रगमनशील रूपांतराचा आपला जीवननियम लावण्याचा प्रयत्नहि मन करीत असतें. मनाची किंवा मानसिक जीवनाची भूमिका ही मानवी जीवनाची शेवटली भूमिका नव्हे, तर ती मधली भूमिका आहे. या भूमिकेच्या वर मानवी जीवनाची शेवटची तिसरी भूमिका आहे. मानवी मन या सर्वोच्च भूमिकेच्या शोधांत असतें. ही सर्वोत्तम भूमिका लाभली म्हणजे मानवाला आपल्या देहाच्या व मनाच्या जीवनांत ही भूमिका व्यक्त करावयाची असते. आज मानवाचा आत्मा ज्या कांहीं गुणांनीं संपन्न आहे, त्यापेक्षां स्वभावत: श्रेष्ठ अशा गुणांनीं व शक्तींनीं संपन्न असें कांहीं तत्त्व, या सर्वोच्च भूमिकेवर आहे. या तत्त्वाला मानवी देहाच्या व मनाच्या व्यवहारांत कार्यान्वित करणें हा मानवाच्या दिव्य जीवनाचा पाया होय.
मानव हा मनाच्या भूमिकेवर आल्यावर त्याला स्वत:च्या आत्म्यासंबंधानें कांहीं कल्पना येते. ही कल्पना आत्म्याचें खरें स्वरूप दाखविते असें तो मानतो. आत्मविषयक अधिक खोल ज्ञान झाल्यानंतर ही त्याची प्राथमिक कल्पना त्याला समर्पक वाटेनाशी होते. त्याला भासमान होणाऱ्या नव्या आत्म्याला म्हणायचें काय, कोणतें सूत्र त्याचें यथार्थ वाचक होईल, याचा तो विचार
पान क्र. ९०
करतो; त्याचप्रमाणें या नव्या आत्म्याचें खोल ज्ञान झाल्यावर व्यक्त स्वरूप पाहण्याचाहि तो प्रयत्न करतो. याप्रमाणें आत्मवर्णनाच्या व आत्मदर्शनाच्या प्रयत्नांत तो असतां त्याला असें आढळून येतें कीं, हा नवा आत्मा, त्याचें अस्तित्व, दोन बाजूंनीं - त्याच्या वरच्या बाजूनें व त्याच्या खालच्या बाजूनें- शून्यानें मर्यादित झालेलें आहे; शून्यानें म्हणजे, या नव्या आत्म्याच्या शून्य भावानें, अभावानें. या आत्म्याच्या अभावाच्या ठिकाणीं दुसरें कांहीं अज्ञेय किंवा ज्ञेय असूं शकेल. मानवाची प्रगति सध्यां जेथवर झाली आहे, ज्या मनोमय आत्म्यापर्यंत तो सध्यां पोंचला आहे, त्याच्या पलीकडे आत्मज्ञानमय अनंत अस्तित्वाचा आत्मा आहे. या आत्म्याचें सामर्थ्य, त्याचा प्रकाश, त्याचा आनंद, मनोमय आत्म्याच्या मानवाला प्रतीत होतो, त्याच्यावर या अनंत आत्म्याचा प्रभाव पडतो. आपला या आत्म्यासंबंधींचा विचार वा अनुभव, मनाला सुलभ अशा शब्दांत मांडण्याचा तो प्रयत्न करतो. हा आत्मा अनंत, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान्, अमर, मुक्त, प्रेमरूप व आनंदरूप परमेश्वर आहे असें या आत्म्याचें तो वर्णन करतो. परंतु त्याला असें दिसतें कीं, हा आत्मसूर्य जेथें प्रकाशतो त्या क्षेत्राला दोन बाजूंनीं रात्रीनें मर्यादित केलेलें आहे; या सूर्याच्या वरतीं खालच्याहून व्यापक व गाढ अंधकार आहे; या आनंदरूप उपरिनिर्दिष्ट आत्म्याची, म्हणजे परमेश्वराची, पूर्ण ओळख करून घेण्याचा साधकानें प्रयत्न केला म्हणजे या आत्म्याचें स्वरूप बदलत बदलत अशा कोटीला जातें कीं, तो स्वरूपतः समूळ नाहींसा होतो. दुसरें असें कांहीं अज्ञेय तत्त्व त्याच्या जागीं येतें कीं, मनानें निर्मिलेलें कोणतेच वर्णनात्मक शब्द त्याला लागूं पडत नाहींत - मनाच्या कोणत्याहि एका शब्दानें किंवा सर्व शब्दांनीं मिळून या अज्ञेय तत्त्वाचें वर्णन होऊं शकत नाहीं. तेव्हां हा आत्मा, हा परमेश्वर बाजूला टाकून परमेश्वर नाहीं असें म्हणून त्याच्या पलीकडे असलेल्या अज्ञेय तत्त्वाला तो मानूं लागतो. निदान त्याच्या मनाला असें दिसतें कीं, परमेश्वर आपला स्वभाव टाकून दुसरेंच कांहीं तत्त्व बनतो; 'परमेश्वर' या कल्पनेला किंवा वर्णनाला योग्य असें त्याचें स्वरूप रहात नाहीं. ही वर पाहणाऱ्या मनाची गोष्ट झाली. येथेंहि विश्वामध्यें, त्याच्या स्वत:मध्यें, त्याच्या आजूबाजूला सर्वत्र, या नव्या आत्म्याच्या म्हणजे, परमेश्वराच्या विरुद्ध असलेल्या गोष्टी त्याला दिसतात - परमेश्वर दिसत नाहीं. येथें मरण नेहमीं त्याच्या मागें लागलेलें असतें, त्याचें अस्तित्व आणि अनुभव मर्यादांनीं जखडलेलीं असतात; प्रमाद, ज्ञानशून्यता, दुर्बलता,
पान क्र. ९१
जडता, दुःख, व्याधि, दुष्टपणा यांचा नेहमीं त्याला जांच होतो, या गोष्टी त्याच्या धडपडीला अयशस्वी करतात. या कारणामुळें परमेश्वर नाहीं, असें त्याला वाटणें अटळ होतें. निदान त्याला असें दिसतें कीं, परमेश्वर स्वतःच स्वत:ला नष्टवत् करतो, आपलें खरें शाश्वत रूप टाकून कोणत्या तरी रूपाच्या किंवा घटनेच्या आंत दडतो.
ईश्वराच्या वरतीं, पलीकडे, जें अज्ञेय तत्त्व ईश्वराला स्वतांत विलीन करून घेतें, ईश्वर नाहीं असें करून टाकतें, तें तत्त्व अकल्पनीय म्हणून गूढ व मनाला न कळण्यासारखें असतें. परंतु येथें जें कांहीं ईश्वराला खऱ्या अस्तित्वांतून नाहींसें करतें तें कळण्यासारखें असतें, कळतें, निश्चित स्वरूपाचें असतें; तरीपण त्यालाहि गूढत्वाच्या वर्गांत घालणें भाग असतें. कारण ईश्वर नाहीं म्हणावयास लावणाऱ्या वस्तू किंवा घटना खरोखरी आहेत काय, कां आहेत, अस्तित्वांत आल्या कशा, हें प्रश्न त्याला येथें सुटत नाहींत. या वस्तूंच्या, घटनांच्या प्रक्रिया त्याला दिसतात, या प्रक्रियांचा त्याजवर परिणाम होतो, त्याला त्यांचा अनुभव येतो; परंतु त्यांचें रहस्य, त्यांचें सत्य, त्यांच्यांतील तत्त्व काय आहे तें त्याला शोधूनहि सांपडत नाहीं.
कदाचित् या वस्तू व घटना अनाकलनीयच आहेत, ज्याप्रमाणें ईश्वराच्या वरतीं, पलीकडे, त्याला नष्टवत् करणारें अनाकलनीय असें कांहीं आहे तसें, या वस्तूंचें व घटनांचें सत्य-स्वरूप खरोखरीच अनाकलनीय आहे असें कबूल करणें कदाचित् योग्य होईल. किंवा असाहि पक्ष घेतां येईल कीं, या वस्तूंत व घटनांत सत्य असें तत्त्व मुळीं नाहींच, त्या भ्रमरूप आहेत, 'असत्' आहेत. ईश्वराच्या पलीकडील, त्याला नष्टवत् करणारें तत्त्व, शून्य आहे असें केव्हां केव्हां म्हटलें जातें, तसें हें ईश्वराच्या खालीं असणारें तत्त्वहि वस्तुत: शून्य, अभावरूप, असूं शकेल; तें तसें आहे असें म्हणणारे निघतील, आहेतहि तथापि ज्याप्रमाणें ईश्वराच्याहून वरच्या पातळीवरील असत् - म्हणजे शून्य - ही अडचणींतून बाहेर पडण्याची पळवाट आम्हीं धरीत नाहीं, त्याप्रमाणें ईश्वराच्याहून खालच्या पातळीवरील, त्याला नष्टवत् करणारें असत् - म्हणजे शून्य - आहे ही गोष्ट आम्ही मानीत नाहीं. हें येथील 'असत्', पूर्णतया सत्यताशून्य आहे असें म्हणणें किंवा अनर्थकारक भ्रम हेंच त्याचें खरें रूप आहे असें कल्पून त्याच्या पासून पळून जाण्यासाठीं मार्ग शोधणें, या गोष्टींचा अर्थ असा होतो कीं, आमच्यापुढे असलेला प्रश्न आम्ही टाळतों, आमचें कर्तव्य आम्ही
पान क्र. ९२
टाळतों. ईश्वर नष्टवत् करणाऱ्या व सच्चिदानंदन-स्वरूपाच्या विरुद्ध असलेल्या वस्तूंना व घटनांना जीवन हें असत्य मानीत नाहीं, सत्य मानतें. या वस्तूंचें व घटनांचें अस्तित्व नित्य नसतें, परिमित कालाचें असतें एवढेंच. या वस्तू व घटना आणि साधुत्व, ज्ञान, आनंद, सुख, जीवित, मरणोत्तर अस्तित्व, सामर्थ्य, सत्ता, संवर्धन - या तद्विरोधी वस्तू व घटना विश्वात्म्याच्या व्यवहाराची, नियोजित कार्याची, आवश्यक साधनसामग्रीच आहेत.
अशी पुष्कळ शक्यता आहे कीं, वर सांगितलेल्या अन्योन्यविरोधी गोष्टी भ्रमाचा परिणाम नसून, व्यक्तीनें कल्पिलेल्या चुकीच्या संबंधांचा परिणाम असतील किंवा या संबंधांमुळें त्यांच्याबरोबर अनिवार्यपणें येणाऱ्या त्याच्या सहचारी गोष्टी असतील. या संबंधाला चुकीचा संबंध म्हणावयाचें तें अशाकरितां कीं, विश्वांत व्यक्तीचें जें स्थान आहे त्या संबंधीची खोटी कल्पना करून त्या खोट्या कल्पनेवर व्यक्तीनें हा संबंध आधारलेला असतो. व्यक्तीनें विश्वांतील आपल्या स्थानासंबंधीं खोटी कल्पना केली म्हणजे त्याबरोबर ईश्वर व निसर्ग यांजकडे, तसेंच स्वत: व परिस्थिति यांजकडे पाहण्याची व्यक्तीची दृष्टि व वृत्ति अवास्तव होते, वस्तुस्थितीला धरून असत नाहीं; आणि हा चुकीचा संबंध सर्व अनर्थाला कारण होतो. व्यक्ति ज्या विश्वांत राहते त्या विश्वाशीं, आणि स्वत:च्या ध्येयरूप अंतिम स्वरूपाशीं व स्वभावाशीं, विसंगत, विसंवादी असें तिचें वर्तन आणि वृत्ति, तिनें कल्पिलेल्या या चुकीच्या संबंधामुळें होत असल्यानें, म्हणजेच ती असावी तशी नसून वेगळीच बनली असल्यानें, तिला वस्तुजातांतील महान् गूढ सत्याचीं अन्योन्यविरोधी व्यक्त रूपें करतील तो जांचकांच सहन करणें भाग पडतें. अर्थात् हा जांचकांच मानव पतित झाल्याचें प्रायश्चित्त म्हणून केला जात नाहीं, तर मानवाची प्रगति व्हावी म्हणून केला जातो. हा जांचकांच मानवी प्रगतीला केवळ उपकारक नव्हे तर आवश्यक असतो; मानवाला जें कार्य करावयाचें आहे, व पूर्णतेनें पार पाडावयाचें आहे त्या कार्याच्या प्राथमिक अंगाप्रमाणें ह्या जांच करणाऱ्या गोष्टी आहेत, त्या कार्याच्या जणुं पहिल्या पायऱ्याच आहेत; मानवाला जो मुकुट मिळावयाचा आहे, मिळविण्याची त्याला आशा आहे, त्यासाठीं द्यावी लागणारी किंमत म्हणजे वरील गोष्टींचा जांच सहन करणें होय. निसर्ग जडद्रव्याच्या रूपांतून वर चढून, पूर्ण जाणिवेंतील आपलें स्थान प्राप्त करूं इच्छितो, त्या निसर्गाला वर चढावयास
पान क्र. ९३
व जाणिवेंत शिरावयास जो अरुंद रस्ता मिळतो, तो या गोष्टींच्या अन्योन्य विरोधाचा रस्ता होय. या गोष्टी म्हणजे निसर्गाचा मौलवान् वस्तूंचा सांठा आहे; आणि हा सांठा व्यक्तीच्या उद्धारासाठीं देऊन टाकूनच निसर्ग स्वत: बंदींतून मोकळा होऊं शकतो.
या खोट्या संबंधातून व त्यांच्या साह्यानेंच निसर्गाला व मानवाला खरे संबंध शोधून काढावयाचे असतात. अविद्येच्या आश्रयानें आम्हाला मुत्यु तरून पलीकडे जावयाचें असतें. (अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययाऽमृतमश्नुते - ईशावास्योपनिषद् ) निसर्गांतील शक्तींच्या संबंधानें वेदहि गूढ भाषेंत असें सांगतात कीं, दुष्ट स्त्रियांप्रमाणें, या शक्ती दुष्टपणाची प्रेरणा घेऊन काम करतात, योग्य मार्गापासून दूर जातात, आपल्या स्वामीला उपद्रव देतात, स्वत: खोट्या आणि दुःखी असतात - पण आपल्या करणीनें शेवटीं ''हें बृहत् महान् सत्य'', आनंदरूप असणारें सत्य प्रस्थापित करतात. तेव्हां, मानवानें नैतिक शस्त्रक्रिया करून आपल्या अंतरंगांतून निसर्गांतील दुष्टपणा कापून काढून दूर केला किंवा जीवनाला रामराम ठोकला, तें अमंगल आहे म्हणून त्यापासून पळ काढला म्हणजे त्यानें स्वर्ग मिळविला असें होत नाहीं; तर मरणावर मात करून त्यानें आजच्या जीवनापेक्षां अधिक पूर्ण जीवन हस्तगत केलें पाहिजे; मानवी मर्यादेच्या आंत लहान लहान गोष्टी करण्यांत चूर न होतां त्या गोष्टींना ईश्वरी व्यापकतेचें व उदात्ततेचें रूप त्यानें द्यावयास हवें; आज ज्या दुःखाला आम्ही त्रासतो त्या दुःखाचें परिवर्तन आनंदांत करण्याची किमया त्यानें केली पाहिजे; जें अमंगल आहे त्याचें मांगल्यांत रूपांतर होईल अशी व्यवस्था त्यानें करावयास हवी; आज प्रमाद आणि असत्य म्हणून ज्या गोष्टी त्रास देतात त्या गोष्टींच्या पोटीं दडलेलें सत्य प्रकट करून त्या प्रमादाच्या व असत्याच्या जागीं या सत्याची स्थापना त्यानें केली पाहिजे - हें सर्व त्यानें यशस्वी रीतीनें घडवून आणलें तरच त्याचा जीवनयज्ञ सिद्धीस गेला असें होईल; त्याचा जीवनप्रवास योग्य रीतीनें शेवटास गेला असें म्हणतां येईल; तरच, त्याच्यामधील आणि त्याच्या बाहेरील स्वर्ग आणि पृथ्वी आपणहून सम पातळीवर येऊन परात्पर ब्रह्माचा आनंद भोगीत एकमेकांच्या हातांत हात घालून पूर्ण ऐक्यभावानें नांदतील.
पण अन्योन्यविरोधी गोष्टी आपापलें रूप टाकून सुसंवादी गोष्टींचें रूप घेतील कशा ? आमच्या मृत्युवश, पार्थिव जीवनाच्या शिशांतून अमर दिव्यजीवनरूपीं सोनें निर्माण करणारी किमया कोठें आहे? प्रश्न
पान क्र. ९४
ठीक आहेत. परंतु या गोष्टी तत्त्वत: विरोधी नसतील तर ? या गोष्टी एका सद्वस्तूंचीं व्यक्त रूपें असून त्यांचा गाभा एकाच सद्वस्तूचा असेल तर ? अशी वस्तुस्थिति असेल तर मात्र, आमच्या अदिव्य गोष्टींचें दिव्य गोष्टींत रूपांतर होणें संभवनीय आहे असें म्हणतां येईल.
आपण ही गोष्ट पाहिली आहे कीं, असत् म्हणून जी अवस्था आहे ती, शुद्ध अभावात्मक नसून अस्तित्वाची एक अकल्पनीय अवस्था असणें शक्य आहे; शब्दांनीं न सांगतां येण्यासारखा निरतिशय आनंद ''असत्'' च्या कल्पनेनें व्यक्त होत असेल, हेंहि शक्य आहे. निदान बौद्धमतांतील निर्वाणाचा प्रयत्न हा, या सर्वोच्च असत् अवस्थेची प्राप्ति करून घेण्याचा व त्या अवस्थेंत कायम विसांवा घेण्याचा एक महान् तेजस्वी प्रयत्न होता हें आपणांस ठाऊक आहे; आणि हेंहि आपण जाणतो कीं, जे मुक्त मुक्तीनंतर पृथ्वीवर राहतात त्यांच्या अंतर्यामांत नांदणारी निर्वाण-अवस्था किंवा असत्-अवस्था अवर्णनीय शांति व आनंद या स्वरूपाची असते. तिचा व्यावहारिक परिणाम सर्वदुःखविनाश हा असतो; कारण सर्व दुःखाचें मूळ जी अहंवृत्ति, अहंवेदना तिचा समूळ नाश निर्वाण घडवून आणतें. निर्वाणाचें हें विनाशक कार्य जसें उघड दिसतें, तसें त्याचें विधायक कार्यहि दिसतें; तें म्हणजे निर्वाणमय अंतरंगांत अनिर्वचनीय आनंद राहतो, अनिर्वचनीय शांति राहते; या शांतींत, या आनंदात, 'मी आहे' ही अस्तित्वाची कल्पना देखील विलीन होते, नाहींशी होते. निर्वाणाच्या एकरस सर्वशून्यमय शांतीहून, आमच्या मनाला कल्पितां येणारी शांति, फार निकृष्ट दर्जाची असल्यानें तिला शांति हें नांव देणें, कोणतेंहि नांव तिला देणें समर्थनीय वाटत नाहीं. सच्चिदानंद हें नांव निर्वाण स्थितीला देता येईल; परंतु आम्ही कल्पना करतों तें सत्, चित् व आनंद तेथें नसून, तेथील सत्-चित्-आनंद कल्पनेच्या आवांक्यापलीकडील आहेत हें आपण लक्षांत ठेवलें पाहिजे. सर्व शब्द तेथें गैरलागू होतात, आपल्या जाणिवेला येणारा सर्वोच्च अनुभव, निर्वाणाच्या अनुभवाच्या फार अलीकडचा आहे.
सच्चिदानंदाच्या अस्तित्वाला एका दृष्टीनें काट देणारी, तिच्याहून श्रेष्ठ अशी सत्-चित्-आनंदाची ही जी असत् अवस्था, तिची गोष्ट झाली. या श्रेष्ठ असत् प्रमाणें सच्चिदानंदाला काट देणारें एक कनिष्ठ असत् आहे. हें कनिष्ठ असत् देखील सच्चिदानंदच आहे; विरोधी वाटलें तरी, तें सच्चिदानंदाहून वेगळें कांहींहि नाहीं; कारण एकच एक सद्वस्तु,
पान क्र. ९५
ब्रह्म, सर्व कांहीं झालें आहे. हें कनिष्ठ असत्, सच्चिदानंद असल्याची कल्पना बुद्धीला करतां येते, अंतदृष्टीला हें असत् सच्चिदानंद असल्याचें दिसूं शकते, इंद्रियांना देखील हें असत्, सच्चिदानंदाप्रमाणें संवेदना देऊं शकतें, आमच्या जाणिवेला असत् चा असाच सच्चिदानंद-अनुभव नेहमीं होऊं शकेल; पण कांहीं महान् मूलभूत प्रमाद घडलेला आहे, माया किंवा अविद्या किंवा मूलभूत अज्ञान यांनीं आमच्या जाणिवेवर मात करून आमची दृष्टि दूषित केलेली आहे; म्हणून सच्चिदानंदाचा अनुभव आम्हाला 'सच्चिदानंद' या स्वरूपांत न येतां, त्याच्या उलट स्वरूपांत येतो. सच्चिदानंदाचें विपरीत रूपानें दर्शन होणें, हें अज्ञानाचें कार्य असेल तर या आपत्तींतून सुटका होणें शक्य आहे. तर्ककठोर मनाला पटेल असें तत्त्वज्ञानात्मक प्रतिपादन करून, असत् म्हणजे सच्चिदानंदच, हें कदाचित् सिद्ध करतां येणार नाहीं; तथापि दिव्य जीवन केवळ आपल्या कल्पनेंत न ठेवतां आपल्याला व्यवहारांत आणावयाचें आहे; त्यासाठीं असत् म्हणजे सच्चिदानंदच असा आवश्यक तेवढा अनुभव आपल्याला मिळवतां येईल. सच्चिदानंदाच्या प्रांतांत दृष्टि टाकणें म्हणजे अज्ञेयाच्या अनिर्वचनीयाच्या प्रांतांत दृष्टि टाकणें आहे. आमच्या दृष्टीला खूप ताण देऊनहि, तर्ककठोर मनाला समाधानकारक होईल अशा तात्त्विक प्रतिपादनाला पुरेसा पुरावा मिळणें अवघड आहे असें आम्हीं वर सूचित केलेंच आहे. अशा प्रतिपादनाच्या भरीस आम्हीं पडणार नाहीं.
आतां, दिव्य जीवन जगूं लागण्यासाठीं जो अनुभव आम्हाला पायाभूत, आधारभूत म्हणून हवा आहे, तो अनुभव मिळण्यासाठीं आम्हाला काय करावयास हवें तें पाहूं. आमचें मन वस्तुजाताचा पृष्ठभाग पाहतें; हा पृष्ठभाग पहाण्याला सोपा असतो, तो स्वच्छ समग्र दिसतो. आमच्या मनाला या पृष्ठभागावरच लक्ष लावण्याची संवय झाली आहे. या पृष्ठभागाच्या खालीं जाण्याचे धाडस आम्ही करावयास हवें. या पृष्ठभागाखालीं आम्ही उतरलों म्हणजे, अति अफाट व अंधुक प्रकाशाचा प्रांत आमच्यासमोर येतो; त्या प्रांतांत आम्ही बारीक नजर लावली पाहिजे; जाणिवेच्या पृष्ठभागाखालीं खोल खोल, अगदीं तळ सांपडणार नाहीं अशा खोल जागा आहेत, तेथें प्रवेश करावयाचें धाडस आम्हीं करावयास हवे. जाणिवेच्या या खोल भागांत अस्तित्वाच्या अनेक अवस्था आहेत. या अवस्था आज आमच्या नसल्या तरी या अवस्थांशीं तादात्म्य पावण्याचें धाडस आम्हीं केलें पाहिजे. जाणिवेच्या खोल प्रांतांत हा जो
पान क्र. ९६
शोध आम्ही चालविणार, त्या शोधाला चांगली मदत होईल असा, आमच्या मानवी भाषेचा आवांका नाहीं. तथापि अल्पशी मदत आमची भाषा आम्हाला करूं शकेल. कांहीं प्रतीके, कांहीं उपमा आम्हाला ही भाषा पुरवील. आम्ही आमच्या शोधाच्या प्रवासांतून कांहीं उपयुक्त अनुभव घेऊन परत येऊं. हें अनुभव आमच्या मनासमोर मांडण्यास आमच्या भाषेनें पुरविलेलीं प्रतीकें व उपमा आम्हाला उपयोगी पडतील. हे अनुभव सत्याची थोडीबहुत कल्पना देण्यापुरतेच असणार. तरीपण, या अनुभवांनीं आमच्या आत्म्याच्या प्रकाशांत, ज्ञानांत, भर पडेल आणि या विश्वाची जी अवर्णनीय योजना सर्व घटनांच्या मुळाशीं आहे, त्या योजनेचें, त्या आराखड्याचें, थोडेंबहुत स्पष्ट असें प्रतिबिंब आमच्या मनावर पाडण्याचें कार्य हें आमचे अनुभव अवश्य करतील.
पान क्र. ९७
प्रकरण सातवें
अहम् आणि द्वंद्वें
निसर्ग-वृक्षावर आत्मा बसलेला आहे, तो निसर्गांत निमग्न झाला आहे, भ्रांत झाला आहे, आपण अनीश आहों या भावनेनें त्याला दुःख होत आहे; त्याच वृक्षावर ईश्वर आहे. दुःखी आत्म्यानें हा ईश्वर पाहिला आणि या ईश्वराला आपला आत्मा म्हणून ओळखून त्याच्याशीं, त्याच्या महिम्याशीं त्यानें ऐक्यभाव धारण केला म्हणजे त्याचें दुःख दूर होतें.
- श्वेताश्वतरोपनिषद् ४.७
वस्तुत: सगळेंच जर सच्चिदानंद आहे, तर मृत्यु, दुःख, दुष्टपणा, बंधन या गोष्टी कोठून आल्या? अर्थात् या गोष्टी वस्तुस्थितीचें विपरीत दर्शन घडविणाऱ्या जाणिवेनें निर्माण केल्या आहेत हें उघड आहे. या गोष्टी व्यवहारांत परिणामकारक आहेत यांत संशय नाहीं, परंतु त्यांना तात्त्विक अस्तित्व नाहीं. त्या आंतून पोकळ आहेत, वस्तुतत्त्व त्यांच्यांत नाहीं; त्यांच्यांत वस्तुतत्त्व नसतांना त्यांना व्यवहारांत वस्तुत्व देणारी विपरीत जाणीव तरी कशी अस्तित्वांत आली ? 'मुळांत जाणीव ही सर्वरूप, समग्र आणि एकच एक असून त्या जाणिवेचें हें समग्रतेचें, एकतेचें आत्मविषयक ज्ञान कसें तरी हरपलें, ती जाणीव पतित झाली, भेदाच्या भ्रमांत पडली, तिच्या ज्ञानाला एकांगित्व आलें आणि म्हणून ती विपरीत दर्शन घडवूं लागली व विपरीत जाणीव बनली.' हिब्रू लोकांच्या धर्मग्रंथांत जी विश्वनिर्मितीची काव्यमय बोधकथा आहे त्या कथेंत ''मानवाचें पतन'' म्हणून मूळ एकरूप जाणिवेचें हें पतन वर्णिलेलें आहे. प्रथम, मानव ईश्वरास पूर्णपणें मानीत होता. स्वत:च्या अंतरांतील ईश्वर, आपला निरंतरचा स्वामी म्हणून तो शुद्ध भावनेनें मानीत होता, ईश्वरच सर्व कांहीं आहे असें मानीत होता. ही त्याची शुद्ध आणि पूर्ण श्रद्धा जेव्हां ढांसळली तेव्हां त्याचें पतन झालें, त्याच्या ज्ञानाला फांटे फुटले, भेद-
पान क्र. ९८
ज्ञानामुळें व भेदज्ञानाचें सेवन केल्यामुळें द्वंद्वांची मालिका त्याच्यासमोर उभी राहिली; जीवन-मरण, साधुत्व-दुष्टत्व, सुख-दुःख, पूर्णता-अपूर्णता, हीं द्वंद्वें भेदज्ञानाची, तुकडे झालेल्या अस्तित्वाची प्रजा होय. भेद-ज्ञानाचें फळ ॲडॅम-ईव्ह, पुरुष-प्रकृति यांनीं - निसर्गानें मोहित केलेल्या आत्म्यानें - सेवन केलें. आजहि निसर्गानें मोहित केलेला आत्मा हें भेद-ज्ञानाचें फळ सेवन करीत आहे आणि द्वंदवांचें दुःख भोगीत आहे. निसर्गाच्या मोहांतून मानव कसा पार पडणार ? त्याचा उद्धार कसा होणार ? व्यक्तीमध्यें विश्वव्यापक जाणीव पुनरपि निर्माण झाली पाहिजे, भौतिक जाणिवेंत दिव्य आत्मवस्तूची प्रतिष्ठा पुनरपि झाली पाहिजे; हें घडून आलें म्हणजे मानवाचा उद्धार होईल. हें घडून आल्यावर निसर्गांत वावरणाऱ्या आत्म्यानें जीवनवृक्षाचें फळ सेवन करण्यास हरकत राहणार नाहीं. कारण मग हा आत्मा दिव्य आत्म्यासारखा, ईश्वरासारखा होऊन अमर होईल. साधुत्व आणि दुष्टत्व, सुख आणि दुःख, जीवन आणि मरण या द्वंद्वांसंबंधींचें खरें ज्ञान व्यक्तीला होईल; हें खरें ज्ञान, दिव्य आत्म्याच्या आणि विश्वात्म्याच्या श्रेष्ठ जाणिवेच्या साह्यानें होईल व या श्रेष्ठ ज्ञानामुळें द्वंद्वांचा विरोध हा आभास आहे असें कळेल. विश्वात्म्याच्या व्यवहारांत जीवन आणि मरण इत्यादि अन्योन्यविरोधी भासणाऱ्या वस्तू एकमेकांच्या पूरक आहेत असें ज्ञान होईल; सर्व विरोधी जोड्या एकाच वस्तूच्या दोन बाजू आहेत असें कळेल, एकच एक ब्रह्मवस्तु अनेक प्रकारें द्वंद्वरूप झाली आहे व त्या द्वंद्वांच्या क्षेत्रांत ब्रह्मवस्तु अभेदानें आहे अशी जाणीव होईल. द्वंद्वांची द्वंद्वता खोटी करून त्यांची अन्योन्य-पूरकता व दिव्य एकता सिद्ध करणें हें, ब्रह्मवस्तूचें भौतिक जाणिवेंत अवतरण होण्याचें किंवा अवतरण घडविण्याचें प्रयोजन आहे.
सच्चिदानंद सर्व वस्तूंत पसरलेलें आहे. क्षुद्रांत क्षुद्र वस्तु देखील सच्चिदानंदाचें वसतिस्थान आहे. कोणत्याहि भेदांना न मानता अगदीं नि:पक्षपातीपणें सर्वत्र सच्चिदानंद भरलेलें आहे. अशा व्यापक सच्चिदानंदाला मरण, दुःख, दुष्टत्व, बंधन या गोष्टी, तद्विरोधी जीवन, सुख इत्यादि प्रकाशमय गोष्टींच्या छायेप्रमाणें, नाण्याच्या दुसऱ्या बाजूप्रमाणें फारतर असणार. आम्हाला या गोष्टी संगतीची विसंगति करणाऱ्या, सुराचा बेसूर करणाऱ्या अशा भासतात. जेथें ऐक्य असावें, तेथें या गोष्टी बेकी उत्पन्न करतात; योग्य समज असावा, तेथें गैरसमज फैलावतात. एकाच वृंदवादनाचे सुरेल घटक म्हणून जेथें भिन्न घटकांनीं आपला सूर
पान क्र. ९९
इतर घटकांत मिळवून न्यावयास हवा, तेथें हीं द्वंद्वें अनेक, भिन्न, स्वतंत्र स्वरमेळ उभे करूं पाहतात. जाणिवेची समग्रता, पूर्णता हाच एक या द्वंद्वांच्या आपत्तीवर उपाय आहे. पूर्णता, समग्रता ही सुरेल व तालबद्ध असतेच असते; असमग्रतेमुळें ज्या गोष्टी इतर कांहीं गोष्टींशीं विरोध करून कर्कशपणा, बेसुरेलपणा माजवीत असतील त्या विरोधी गोष्टींना समग्रता आपला विरोध सोडावयास लावते, त्यांचे मेळ घालून देते. विश्वांत भौतिक आणि भौतिकेतर अनेक पातळ्या आहेत, तेथें सारख्या हालचाली चालू आहेत. यांपैकीं केवळ एक - कोणतीहि स्थूल भौतिक जाणिवेची कां होईना - पातळी घेतली तरी तेथेंहि समग्र दृष्टीनें व्यवहार पाहिला तर बेसुरेलपणा त्या पातळीपुरता दिसणार नाहीं. भौतिक जाणिवेच्या पातळीच्या पलीकडे वर, खालीं, मागें, पुढें अनेक पातळ्या आहेत - भौतिक पातळीसह त्या सर्वांचा समग्रतेनें व्यवहार पाहिला तरीहि बेसुरेलपणा मुळींच दिसणार नाहीं हें वेगळें सांगावयास नको. तेव्हां जाणिवेची समग्रता गेल्यामुळें जी द्वंद्वांची बेसूर बेताल दुःखद हालचाल विश्वांत निर्माण झाली आहे ती, जाणिवेच्या समग्रतेनें पुन: सुरेल होणारी आहे, पुन: तालबद्ध व सुखद होणारी आहे. विश्वांत सच्चिदानंद साकारत्वानें आहे. सच्चिदानंदाला साकार विश्वांत जीं द्वंद्वांचीं नांवें आपण लावतो तीं या साकारत्वाच्या पलीकडे गेलें कीं, तेथें लावतां येत नाहींत. विश्वातीत निराकार सच्चिदानंद ब्रह्म हें द्वैत कायम ठेवून, द्वंद्वांचा मेळ घालीत बसत नाहीं, तर त्यांच्यापेक्षां श्रेष्ठ असणारें कांहीं तत्त्व निर्माण करतें आणि या रीतीनें द्वंद्वांचें अस्तित्व बदलून टाकून त्यांचा विरोध पार लयास नेतें. असो.
समग्रतेची सुसंवादिता, सुरेल गोडी द्वंद्वांच्या आपत्तींतहि व्यक्तीला कशी लाभेल हें प्रथम पाहूं. या संबंधांत एक गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे ती ही कीं, (आणि ही गोष्ट लक्षांत घेतली नाहीं तर आपला प्रश्न सुटणार नाहीं) विश्वांत अनुभवास येणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींना आमच्या सध्यांच्या जाणिवेनें जीं नांवें दिलीं आहेत तीं जरी आमच्या मानवी अनुभवाच्या व प्रगतीच्या दृष्टीनें जवळ जवळ योग्य असलीं तरी इतर कोणतींहि नांवें त्यांना योग्य होणार नाहींत असें नाहीं; एवढेंच नव्हे तर असेंहि असणें शक्य आहे कीं, त्या गोष्टींचें पूर्ण, अगदीं बरोबर वर्णन आमच्या नांवानीं होत नाहीं, त्या गोष्टींची अगदीं योग्य, पूर्ण, वर्णनात्मक आणि अखेरचीं निर्दोष नांवें वेगळीं असलीं पाहिजेत.
पान क्र. १००
आमचे भौतिक जग आमच्या इंद्रियांनीं, इंद्रियशक्तीनें आम्ही अनुभवतों, हेंच जग अनुभवणारीं आमच्या इंद्रियांहून वेगळ्या प्रकारचीं इंद्रियें व आमच्या इंद्रियशक्तीहून वेगळ्या प्रकारची इंद्रियशक्ति असूं शकते; त्यांना या जगाचा अनुभव आम्हापेक्षां अधिक पूर्णतेनें म्हणून अधिक चांगला घेतां येत असेल आणि तो अनुभव आमच्या अनुभवाहून वेगळा असूं शकेल, ही गोष्ट संभवनीय आहे. त्याचप्रमाणें हेंहि संभवनीय आहे कीं, आमचें आजचें मन विश्वाचें जें चित्र आपल्यासमोर उभें करतें त्यापेक्षां श्रेष्ठ असें विश्वाचें चित्र आमच्या मानसिक आणि अतिमानसिक दृष्टीनें दिसूं शकेल. जाणिवेच्या अशा अवस्था आहेत कीं, त्या अवस्थांत, मरण हें, अमर जीवनांतील एक बदल अथवा चालू जीवनाहून वेगळें जीवन म्हणून अनुभवास येतें; दुःख हें, विश्वव्यापी आनंदसागरांतील धक्का देणारा, त्या सागराचाच एक उलटा प्रवाह म्हणून भासतें; सीमेचें बंधन हें, असीम बंधनातीत अनंताचें एका दिशेनें मार्गक्रमण चालूं असतां मध्येंच तोंड फिरवून उलट दिशेनें किंवा दुसऱ्या दिशेनें चालू लागणें आहे असें दिसतें; दुष्टत्व हें, साधुत्वाचेंच त्याच्या स्वत:च्या पूर्णतेला प्रदक्षिणा घालणें आहे, असा अनुभव येतो; सारांश मरण, दुःख, दुष्टत्व व सीमाबद्धता हें सर्व केवळ आभास असून जीवन, आनंद, अनंतता, साधुत्व यांनाच केवळ खरें अस्तित्व आहे हें प्रतीत होतें. हे अनुभव केवळ वैचारिक चित्रें नसतात, तर इंद्रियप्रत्यक्षाप्रमाणें खरोखरीचे, नित्याचे, वास्तविक अनुभव असतात. व्यक्तीचा आत्मविकास होत होत शेवटीं तिला पूर्णता मिळावयाची आहे. या पूर्णतेकडे व्यक्ति प्रवास करीत असतां जीं महत्त्वाचीं, न टाळतां येणारीं पावलें तिला टाकावीं लागतात त्यांपैकीं सर्वांत अधिक महत्त्वाचें एक पाऊल या वर सांगितलेल्या ज्ञानभूमिकांचें (जाणिवेच्या अवस्थांचें) असतें असें म्हणतां येईल. पूर्णतेच्या सिद्धीसाठीं या ज्ञानभूमिका आपल्या ठिकाणीं सिद्ध करण्याचा प्रयत्न, प्रत्येक साधकानें अवश्य करावयास हवा.
तथापि, अशी श्रेष्ठ ज्ञानभूमिका जोंपर्यंत सिद्ध झाली नाहीं तोंपर्यंत, आमचीं इंद्रियें आणि आमचें इंद्रियाधिष्ठित द्वंद्वदर्शी मन आम्हाला जीं व्यवहारोपयोगीं मूल्यें देतील तीं मूल्ये त्या त्या क्षेत्रांत आम्हीं मानलीं पाहिजेत; आमच्या सर्वसाधारण जीवन-व्यवहारांत त्या मूल्यांना प्रमाण मानून आम्हीं वागलें पाहिजे. सामान्य ज्ञानभूमिकेहून श्रेष्ठ अशी उपरिनिर्दिष्ट ज्ञानभूमिका सिद्ध झाली म्हणजे आमचीं द्वंद्वात्मक मूल्यें, आपलें पहिलें विरोधात्मक स्वरूप बदलून एकमेकांशीं सुसंवादित्व धारण करतील
पान क्र. १०१
व हें सुसंवादित्व धारण करतांना व केल्यावरहि, ज्या सत्य वास्तव घटना त्या मूल्यांचें मूळ होत्या त्या घटनांवरची आपली पकड तीं मूल्यें सोडणार नाहींत. इंद्रियशक्ति वाढविणें आणि ज्ञानभूमिका मात्र सामान्य, जुनीच ठेवणें यामुळें व्यक्तीच्या अंतर्बाह्य व्यवहारांत अनेक तऱ्हेची गंभीर अव्यवस्था व अपात्रता निर्माण होण्याचा संभव आहे; व्यक्ति व्यवहाराला निरुपयोगी होण्याचा, आपली बुद्धि व्यवस्थेनें व शिस्तीनें वापरण्यास असमर्थ होण्याचा संभव आहे. इंद्रियशक्तीच्या वाढीबरोबर इंद्रियांकडून जीं जुन्या तऱ्हेचीं मूल्यें वाढत्या प्रमाणावर मिळणार, त्यांचा योग्य अर्थ लावून त्यांना सुसंवादित्व देणारी श्रेष्ठ ज्ञानभूमिका सिद्ध असेल तरच, वाढत्या इंद्रियशक्तीनें येणारी वर सांगितलेली आपत्ति टळेल. अशाच प्रकारची आपत्ति मानसिक जाणिवेच्या वाढीनेंहि एका विशिष्ट परिस्थितींत येऊं शकते. मानसिक जाणीव वाढली, अहम् नें निर्माण केलेल्या द्वंद्वांचा या वाढलेल्या जाणिवेनें परामर्श घेण्याचें सोडून दिलें, कुठल्यातरी प्रकारच्या समग्र जाणिवेशीं या वाढलेल्या मानसिक जाणिवेनें कशीतरी शिस्तशून्य एकता साधली आणि अर्धवट समग्रतेच्या अभिमानानें द्वंद्वांचें द्वंद्वत्व दृष्टिआड केलें, द्वंद्वांच्या कोंडींतून आपण बाहेर पडलो असा आंव आणून त्यांचा योग्य परामर्श घेण्याचें सोडून दिलें, तर त्यायोगें व्यक्तीच्या व्यवहारांत गोंधळ माजण्याचा फार संभव आहे. जगांत अन्योन्य सापेक्ष द्वंद्वमय घटनांचें जें सुप्रतिष्ठित राज्य आहे त्या राज्यांत व्यवहारी क्रियाशील मानवी जीवन योग्य रीतीनें जगण्याची पात्रता त्या व्यक्तींत फार कमी होण्याचा संभव आहे. गीतेमध्यें ज्ञानी माणसाला असा आदेश दिला आहे कीं, अज्ञानी माणसाच्या जीवनाची आणि विचाराची बैठक ज्यानें बिघडून जाईल, व त्याचा ''बुद्धिभेद'' होईल असें ज्ञानी माणसानें कांही करूं नये. हा आदेश देण्याचें कारण, बुद्धिभेदामुळें जीवन योग्य रीतीनें जगण्याची पात्रता अज्ञानी माणसाचें ठिकाणीं राहणार नाहीं हे आहे; ज्ञानी माणूस कसें आचरण करतों तें अज्ञानी माणूस पाहूं शकेल परंतु त्या आचरणाचें तत्त्व त्याला उमगणार नाहीं. ज्ञानी माणसाच्या आचरणाची नक्कल तो करूं लागेल तर त्यामुळें त्याची स्वत:ची मूल्य-संस्था तो गमावून बसेल, आणि तिजहून श्रेष्ठ जी तात्त्विक बैठक ती त्याला अप्राप्त असल्यामुळें त्याच्या जीवनांत गोंधळ निर्माण होणें अपरिहार्य होईल.
तात्पुरती गोंधळाची किंवा अपात्रतेची, अक्षमतेची अवस्था मान्य करून साधक आपली वाटचाल, जीवनाच्या क्षेत्रविस्तारासाठीं करीत
पान क्र. १०२
राहील हें संभवनीय आहे; नव्हे, अशी वृत्ति व कृति पुष्कळ महात्म्यांनीं आपल्या साधकावस्थेंत दाखविली आहे. जीवनाच्या क्षेत्राचा विस्तार करावयास संधि मिळण्यासाठीं तात्पुरता गोंधळ मान्य करणें, ही जणुं किंमत म्हणून ते देतात. तथापि अस्तित्वाच्या आणि जीवनाच्या मर्यादा लांबरुंद करावयाच्या आणि वाढत्या जीवनांत व अस्तित्वांत गोंधळ अव्यवस्था, अपात्रता व अक्षमता यांचें राज्य मान्य करावयाचें, हा कांहीं मानवी प्रगतीचा योग्य आदर्श नव्हे. योग्य प्रगति व्हावयाची तर हें अवश्य आहे कीं, इंद्रियशक्ति किंवा मनाची शक्ति वाढून साधकाचें अस्तित्व व जीवन रुंदावलें कीं जुन्या मूल्यांचें पुन: निरीक्षण-परीक्षण करून, नव्या रुंदावलेल्या जीवनाला योग्य अशी त्यांची परिणामकारक समन्वयी पुनर्रचना केली पाहिजे; कारण नव्या जीवनाचा कायदा वेगळा असतो, जुन्या मर्यादांतील जीवनाचा कायदा येथें चालत नाहीं; याप्रमाणें जुनीं मूल्यें नव्या कायद्यानें सुधारून किंवा बदलून घेतलीं म्हणजे नव्या सत्यांची मालिका साधकाला प्राप्त होईल, आणि विश्वांत जें जीवनाचें साहित्य त्याच्यासमोर असेल त्यावर त्याच्या कर्तबगारीचा प्रयोग पूर्वींपेक्षां अधिक रसरशीत व अधिक समुचित होऊन साधकाचें जीवन पूर्वींपेक्षां अधिक सामर्थ्यवान् आणि सुसंगत होईल. पृथ्वीभोंवतीं सूर्य फिरतो अशी आपल्या इंद्रियांची साक्ष आहे. तेव्हां इंद्रियांच्या दृष्टीनें सूर्य-पृथ्वीचें हें नातें जीवनाचा केंद्र, जीवनव्यवस्थेचें केंद्रतत्त्व म्हणून एका काळीं मानलें गेलें; एक चुकीची कल्पना पायाभूत धरून जीवनाचा व्यवहार तिच्या तंत्रानें मानवांकडून आंखला गेला. सूर्याभोंवतीं पृथ्वी फिरते हें सत्य नंतर सांपडलें; पण जर नवीन भौतिक शास्त्र सिद्ध नसतें, तर हें सत्य सांपडूनहि कदाचित् त्याचा कांहीं उपयोग झाला नसता. नव्या सत्यकल्पनेला केंद्रस्थानीं बसवून तिच्या समर्थनार्थ तर्कसिद्ध सुव्यवस्थित ज्ञानाचा संग्रह करून इंद्रियांना घडणाऱ्या दर्शनाचा योग्य अर्थ सांगण्यास नवें शास्त्र सिद्ध होतें, म्हणून तर सूर्याभोंवतीं पृथ्वी फिरते या कल्पनेचा मानवाला उपयोग करतां येऊन जीवन पूर्वींपेक्षां अधिक यशस्वी करतां आलें. असाच प्रकार मानवाच्या आंत घडणाऱ्या घटनांच्या संबंधांत होतो. मानवाच्या मनाला, सामान्य मानसिक जाणिवेला, अहम्-वैयक्तिक मी - हाच पृथ्वीच्या ठिकाणीं मध्यवर्ति असून ईश्वर-सूर्य या 'मी' भोंवतीं फिरत असतो, ईश्वर जें कांहीं करतो तें व ज्या मार्गानें तो तें करतो तो मार्ग किंबहुना त्याच्या सर्व कृती व त्याचे सर्व मार्ग 'मी'च्या न्यायासनापुढें
पान क्र. १०३
हजर केले जातात; ईश्वराच्या कृती व रीती या सर्वांची तपासणी करून न्यायनिवाडा देण्यासाठीं 'मी'च्या संवेदना, भावना, कल्पना बसलेल्या असतात; या कृति-रीतींचा अर्थ त्या लावतात, त्या अर्थानुसार त्यांचें कमी-अधिक महत्त्व ठरवितात आणि या महत्त्वानुसार त्यांचा क्रम, श्रेष्ठ-कनिष्ठता ठरवितात. 'मी'नें दिलेला हा निकाल वस्तुजातांतील सत्याला धरून नसतो, या सत्याला त्या निकालांत विकृत किंवा निखालस उलटें स्वरूप आलेलें असतें. तथापि मानवी जीवनाच्या आणि प्रगतीच्या एका विशिष्ट विकासावस्थेंत 'मी'च्या निकालांत समाविष्ट झालेले ईश्वरी कृति-रीतींचे अर्थ आणि त्यांचें महत्त्वमापन, मूल्यमापन व्यक्तीला उपयुक्त असतें, तिच्या व्यवहाराला कांहीं कमी पडूं न देणारें असतें. आम्हाला विश्वांत जो अनुभव येतो त्या अनुभवाचें व्यवहारासाठीं व्यवस्थित स्थूल सूत्रीकरण 'मी' करीत असतो; आणि आम्ही जोपर्यंत एका विशिष्ट वैचारिक आणि आचारविषयक भूमिकेवर असतो तोंपर्यंत हीं व्यवहारसूत्रें आम्हाला शिरोधार्य होतात. मात्र मानवी जीवनाची आणि ज्ञानाची परमोच्च अंतिम अवस्था ही या व्यवहारसूत्रांनीं चाललेल्या जीवनापासून व या व्यवहारसूत्रांत प्रतिबिंबित झालेल्या ज्ञानापासून फार दूर आहे. ''सत्य हाच (जीवनाच्या कृतार्थतेचा) मार्ग आहे, असत्य नव्हे'', आणि हें सत्य आहे कीं, ईश्वर हा जीवनाचा केंद्रबिंदु आहे, 'मी' नव्हे. 'मी'च्या भोंवतीं ईश्वर फिरत नाहीं, 'मी'च्या द्वंद्वदर्शी दृष्टीला ईश्वरावर टीका करून बरें-वाईट म्हणण्याचा न्यायाधीशाचा अधिकार नाहीं, तर उलट 'मी' चा जो अनुभव असेल त्या अनुभवांतील खरें सत्य, खरा अर्थ 'मी'च्या संवेदना-भावना-कल्पनांनीं ठरवावयाचा नसून विश्वपुरुष आणि विश्वातीत पुरुष यांच्या दृष्टीनें ठरवावयाचा असतो. तथापि, विश्वात्मता आणि विश्वातीतता याविषयींचें ज्ञान अपूर्ण असतां, वैयक्तिक 'मी'च्या अनुभवासंबंधानें त्या 'मी'च्या कल्पना आपल्या व्यवहाराचा पाया म्हणून जर व्यक्तीनें वापरावयाचें ठरविलें, तर जुन्या अयुक्त कल्पनांऐवजीं नव्या, पण जुन्या इतक्याच खोट्या व निराधार कल्पना मान्य केल्यासारखें होईल आणि याचा परिणाम असा होईल कीं, वैयक्तिक 'मी'चा अधिकार असतांना जी गोंधळाची स्थिति होती तिच्यांत आणखी गोंधळ माजेल. नव्या तत्त्वज्ञानांचा व नव्या धर्मांचा उदय होतांना अशा प्रकारचा, रास्त मूल्यांसंबंधींचा विसंवाद, मानवसमाजांत बहुधा आढळून येतो; पण पुष्कळ वेळां त्यांतून उपयुक्त क्रांतीचा जन्म होतो. परंतु आम्हाला
पान क्र. १०४
खरें ध्येय गांठावयाचें तर आमची मध्यवर्ति कल्पना बरोबर पाहिजे आणि या कल्पनेच्या भोंवतीं तर्कप्रतिष्ठित परिणामकारक श्रेष्ठ ज्ञानाचें कडें आम्हाला उभें करतां आलें पाहिजे; व्यक्तीचें अहंकेंद्रित जीवन वापरीत असलेलीं सर्व मूल्यें ज्या ज्ञानानें शुद्धीकृत व रूपांतरित होऊन व्यक्तीला परत मिळतील असें तें श्रेष्ठ ज्ञान असेल. आम्हीं याप्रमाणें खरें ध्येय गांठलें म्हणजे आम्हाला सत्यांची नवी श्रेणी लाभेल व आज आम्ही जें जीवन जगत आहों त्याला रजा देऊन त्यापेक्षां अधिक दिव्य असें जीवन आम्हाला जगतां येईल; जीवनासाठीं आम्हाला जें साहित्य विश्व पुरवीत आहे त्यावर आमच्या शक्तींचा पूर्वींहून अधिक दिव्य आणि सामर्थ्यवान् प्रयोग, या नूतन सत्यांच्या बळावर आम्हाला करतां येईल.
आमच्या मानवी विचारपद्धतीला धरून दिव्य जीवनाचें लक्षण व्यक्त करणारीं जीं महान् सत्ये आहेत त्यांचा परिचय करून घेणें व तीं आत्मसात् करणें या गोष्टीवरच मानवी व्यक्तीचें नवें जीवन आणि नवें सामर्थ्य अवलंबून राहील. या नव्या जीवनासाठीं व्यक्तीच्या 'अहम्'नें प्रथम आपला चुकीचा दृष्टिकोन टाकून दिला पाहिजे, त्याला अगदीं खऱ्या वाटणाऱ्या पण खोट्या असणाऱ्या सर्व कल्पना त्यानें सोडून दिल्या पाहिजेत; हा अहम् म्हणजे पूर्ण वस्तु नाहीं; अनेक समष्टींचा तो घटक आहे. एक घटक या नात्यानें या अहम् नें त्या त्या समष्टीशीं योग्य नातें जोडून पूर्ण मेळानें वागलें पाहिजे. तो जसा अनेक समष्टीचा घटक आहे त्याप्रमाणेंच त्याच्याहून उच्च पातळींवरील अनेक वस्तूंच्या व विश्वातीत सत्यांच्या मेळाव्यांतून तो खालीं उतरलेला आहे. या उच्चस्थानीय वस्तूंशींहि योग्य नातें जोडून त्यानें पूर्ण गोडीनें वागलें पाहिजे; तसेंच या अहम् चे जे सत्याचे संकेत आहेत, जे व्यवहारनियम आहेत, त्यांच्याहून श्रेष्ठ असणारें सत्य आणि व्यवहारनियम त्यानें मोकळेपणानें आत्मसात् करण्याची तयारी ठेवली पाहिजे; हें श्रेष्ठ सत्य अहम् चें जीवन कृतार्थ करील आणि हा श्रेष्ठ व्यवहार-नियम अहम् ची सर्व बंधनांतून मुक्तता करील. या वरील क्रमानें जें नवें दिव्य जीवन घडावयाचें असतें त्याचा अंतिम हेतु, वैयक्तिक अहम् नें निर्माण केलेल्या मूल्यांचा त्याग करणें हा असतो; आणि सीमा, अज्ञान, मरण, दुःख, दोष आणि दुष्टत्व यांच्या पार जाणें, यांपासून सर्वथा मुक्त असें जीवन जगणें हा अशा जीवनाचा कळस असतो.
पान क्र. १०५
हा त्याग, ही मुक्तता या पृथ्वीवर, या आमच्या मानवी जीवनांत शक्य आहे काय ? अर्थात् दिव्य जीवन शक्य आहे काय ? जर आमची आजचीं अहम्-निर्मित मूल्यें आमच्या जीवनाशीं अटळपणें बांधलेलीं असलीं तर तें शक्य नाहीं. जीवन म्हणजे वैयक्तिक अहम् चा व्यवहार, अशीच जर जीवनाची निसर्ग-निर्मित घडण असेल, तें जर विश्वव्यापक अस्तित्वाचें, सद्वस्तूचें व्यक्त स्वरूप नसेल, तें जर महान् चैतन्यमय आत्म्याचें निश्वसन नसेल, तर या पृथ्वीवर मानवाला वर उल्लेखिलेली मुक्तता अथवा दिव्य जीवन शक्य नाहीं असेंच म्हणावें लागेल. व्यक्तीचा आणि वस्तूंचा संबंध आल्यानंतर, व्यक्तीच्या होणाऱ्या केवळ बाह्य प्रतिक्रिया या स्वरूपाचीं हीं द्वंद्वें नसून, सर्व जीवनाचें सार आणि पाया जर हीं द्वंद्वें असतील, सीमाबंधन हा जर, मन आणि शरीर यांच्या द्रव्याचा अपरिहार्य स्वभावधर्म असेल, मरणानें विघटन हीच जर सर्व जीवनाची प्राथमिक व अंतिम शर्त असेल, त्याचा प्रारंभ नि अखेर असेल, सुखदुःख हें जर संवेदनांचें अविभाज्य दुहेरी द्रव्य असेल, हर्ष आणि विषाद हा जर अन्य सर्व भावनांचा छाया-प्रकाशाप्रमाणें दुहेरी व अटळ सहयोगी असेल, सत्यता आणि भ्रम किंवा प्रमाद या दोन ध्रुवांभोंवतीं जर सर्व ज्ञान सदैव फेरे घालण्यास बांधलेलें असेल तर वर उल्लेखिलेली मुक्ति एकाच मार्गानें मनुष्याला प्राप्त होण्यासारखी आहे; आणि तो मार्ग म्हणजे सर्व अस्तित्वाच्या पलीकडे असलेल्या निर्वाणांत मनुष्यानें आपल्या जीवनाचा लय करावा किंवा या भौतिक दुनियेहून, इहलोकाहून अत्यंत वेगळ्या घडणीच्या जगांत म्हणा, किंवा स्वर्गांत म्हणा, त्यानें जाऊन रहावें.
माणसाचें रूढिप्रिय व रूढिबद्ध मन जुन्या संबंधांचा आणि चालू संबंधांचा नेहमीं रवंथ करीत असतें, या संबंधांचा त्याला फार ओढा असतो; त्या संबंधांना सोडून पलीकडचा, रूढ संवयीच्या गोष्टींपलीकडचा विचार किंवा कल्पना करणें त्याला जड जातें. मानवाच्या प्रस्तुतच्या कायम वाटणाऱ्या परिस्थितींत, त्याच्या सभोंवारच्या गोष्टींत, व त्याच्या स्वतांत आमूलाग्र बदल घडूनहि त्याचें मानवत्वहि राहूं शकतें अशी कल्पना करणें हें आमच्या पुराणप्रिय, व प्रस्तुतप्रिय संवयींचा गुलाम असलेल्या मनाला तितकेसें सोपें नाहीं. आमचा जो थोर विकास यापुढें होणार आहे, होणें संभवनीय आहे, त्याच्या तुलनेनें आमची आजची अवस्था डार्विनच्या विकास-विषयक सिद्धांतांतील मूळ वानराच्या अवस्थेप्रमाणें आहे. डार्विनचा वानर जुनाट अरण्यांत झाडाझुडपांच्या आश्रयानें आपलें जीवन आपल्या
पान क्र. १०६
जन्मजात सहजप्रेरणांनुसार जगत होता. त्याला अशी कल्पना करणें अशक्य झालें असतें कीं, पुढें एक दिवस त्याच्याहून एक वेगळा प्राणी या पृथ्वीवर जन्माला येईल, त्याला एक नवीन बुद्धि नांवाची शक्ति मिळालेली असेल, ही बुद्धि तो प्राणी आपल्या बाहेरील आणि आंतील अस्तित्वाच्या सामग्रीवर खर्च करून, आपल्या उपजत प्रेरणांवर आणि संवयींवर हुकुमत चालवील, आपल्या स्थूल भौतिक जीवनाची परिस्थिति या बुद्धीच्या प्रभावानें तो बदलून टाकील, तो स्वत:साठीं दगडाची घरें बांधील, निसर्गाच्या शक्ती तो आपल्या तंत्रांत आणील, समुद्रावर तो जहाजानें प्रवास करील, आकाशांत तो विमानानें भराऱ्या मारील, तो आचारांचे नियम बांधील, बौद्धिक व आध्यात्मिक विकासासाठीं तो ज्ञानपूर्वक, संकल्पपूर्वक चालावयाचे मार्ग हळूहळू, क्रमाक्रमानें तयार करील - पुढें जन्मास येणाऱ्या अशा प्राण्याची कल्पना करणें डार्विनच्या वानराला अशक्य झालें असतें. तथापि असें समजूं कीं, ही कल्पना त्याला करतां आली असती; तरीपण याच्यापुढें जाऊन त्याला अशी कल्पना करतां आली असती काय कीं, निसर्गांत प्रगति होत होत किंवा दीर्घकाळ पावेतों केलेल्या स्वत:च्या इच्छाशक्तीच्या व मनोवृत्तीच्या खटाटोपानें आपण स्वतःच क्रमविकासानें वर वर्णिलेला बुद्धिमान् प्राणी होऊं शकू ? त्या वानराला ही दुसरी कल्पना करणें निश्चितच फार फार अवघड होतें. पण मानवाला बुद्धि लाभली आहे, त्याला कल्पनाशक्ति आहे, त्याला अंत:स्फूर्तीची शक्ति आहे; या शक्तींचा तो भरपूर उपयोग करीत असतो, म्हणून त्याला स्वत:च्या जीवनापेक्षा श्रेष्ठ तऱ्हेचें जीवन कल्पनेनें आपल्या समोर उभें करतां येतें. एवढेंच नव्हे तर, स्वत:ची प्रस्तुत जीवनसरणी मागें टाकून, कल्पनेनें रंगवलेलें तें श्रेष्ठ श्रेणीचें जीवन आपण जगूं शकूं, अशीहि कल्पना त्याला करतां येते. परंतु श्रेष्ठांत श्रेष्ठ, सर्वोच्च, सर्वोत्तम जीवनाचें जें चित्र तो रंगवतो त्या चित्रांत तो स्वत:ला तें जीवन जगणारा म्हणून बसवावयास धजत नाहीं. त्याच्या स्वाभाविक आकांक्षेला ज्या गोष्टी स्पृहणीय वाटतात, त्याच्या विचारांना ज्या गोष्टी संग्राह्य वाटतात, त्या गोष्टींचें निरतिशय श्रेष्ठ स्वरूप त्याच्या सर्वोत्तम जीवनाच्या कल्पनेंत सामावलेलें असतें. सर्वोत्तम जीवनांत त्याला ज्ञान दिसतें; त्या ज्ञानाची पडछाया, भ्रम किंवा प्रमाद अर्थात् अ-ज्ञान दिसत नाहीं. सामान्य जीवनांत ज्ञान आणि अ-ज्ञान अविभाज्य असतात, तर सर्वोत्तम जीवनांत त्याला आनंद दिसतो. सामान्य जीवनांत अटळपणें अनुभवास येणारा, विरुद्ध प्रकृतीचा
पान क्र. १०७
त्याचा जोडीदार विषाद, उद्वेग, संताप, त्याला त्यांत दिसत नाहीं. सर्वोत्तम जीवनांत त्याला सामर्थ्य दिसतें; त्याला नेहमीं नष्टवत् करणारें अ-सामर्थ्य, अक्षमता, अपात्रता तेथें त्याला दिसत नाहींत. सर्वोत्तम जीवनांत त्याला अस्तित्वाची असीम शुद्धता, समृद्धता दिसते; त्यांच्या विरोधी गोष्टी - अशुद्धता किंवा दोष, असमृद्धता किंवा सीमाबद्धता - दिसत नाहींत. वानर जेव्हां देवांची कल्पना करतो, तेव्हां त्यांना हें सर्वोत्तम जीवन तो बहाल करतो; तो स्वर्गाची कल्पना करतो, तेव्हां त्या स्वर्गांत सर्वोत्तम जीवन सार्वत्रिक असल्याचें तो समजतो. परंतु पृथ्वीचें किंवा पृथ्वीवरील मानवतेचें कितीहि दूरचें, भावी चित्र काढलें तरी त्यांत त्याची बुद्धि सर्वोत्तम जीवन पाहूं शकत नाहीं. पृथ्वीचा केव्हांतरी स्वर्ग होईल व मानवाचा इथेंच देव बनेल हें त्या बुद्धीला संभवनीय वाटत नाहीं. परंतु मानवाचें जें स्वर्गाचें व त्यामधील देवांचें स्वप्न आहे, तें वस्तुत:, स्वत: तो पूर्णतेला पोंचल्यानंतर कसा असेल त्या स्थितीचेंच स्वप्न आहे. परंतु मानवाचा ''मूळ पुरुष'' जो वानर, त्याला 'तूं पुढें मनुष्य होणार' असें कुणी सांगितलें असतें तर त्यावर विश्वास ठेवणें जसें त्याला जड गेलें असतें, तसेंच मानवाला स्वत:च्या पूर्णतेचें स्वप्न येथें वास्तवांत आणणें व तें स्वतःचें अंतिम साध्य म्हणून निश्चित करणें जड जात आहे. त्याची कल्पनाशक्ति, त्याची धार्मिक आकांक्षा पूर्णतेचें साध्य त्याच्यासमोर ठेवील परंतु त्याची बुद्धि काम करूं लागली व तिनें 'आपलें तेंच खरें' असा हट्ट धरून एकदां का बुद्धीपलीकडील अंतःस्फूर्तीनें व कल्पनेनें रंगवलेलें चित्र स्वत:ला नापसंत म्हणून बाजूला टाकलें, म्हणजे मानवहि बुद्धीलाच प्रमाण मानतो आणि अंत:स्फूर्तीचें चित्र म्हणजे एक भव्य पण बिनबुडाची निराधार कल्पना असून भौतिक विश्वांतील रोखठोक वस्तूंच्या व घटनांच्या अगदीं उलट स्वरूपाचें व वास्तवांत बिलकुल न येण्याजोगें टाकाऊ चित्र आहे, असा निकाल तो देतो. अशक्य, असंभाव्य अशा ध्येयभूत अवस्थेचें तें दर्शन आहे असें तो फारतर मानतो; आणि आपलें सामान्य जीवन उंचावण्यासाठीं त्यापासून थोडीबहुत प्रेरणा, थोडीबहुत स्फूर्ति, तो घेत राहतो. आपल्या बुद्धीला प्रमाण मानून तो असें ठरवितो कीं, जें जीवन येथें शक्य आहे त्या जीवनांत ज्ञान, सुख, सामर्थ्य, सौजन्य या सर्व गोष्टी सापेक्ष, मर्यादित व अनिश्चित स्वरूपाच्या असणार.
तथापि बुद्धीच्या अतीत कांहीं श्रेष्ठ वस्तु आहे हें बुद्धितत्त्वांतच गृहीत धरल्यासारखें दिसतें. कारण बुद्धीचें सारसर्वस्व व एकमेव ध्येय म्हणजे
पान क्र. १०८
ज्ञानाच्या अर्थात् सत्याच्या शोधांत अविरत राहणें हें होय. सर्व असत्य व विपरीत ज्ञान नाहींसें करीत करीत सत्य व खरें ज्ञान आत्मसात् करणें हा बुद्धीचा उपजत गुण. फार चुकत असतें तेथें कमी चूक व्हावी, असत्याच्या, भ्रमाच्या कक्षा निमूळत्या करून त्यांचे प्रांत कमी कमी करावे हाच केवळ बुद्धीचा हेतु अथवा दृष्टि नसते. बुद्धीच्या दृष्टीपुढें सत्य म्हणून कांहीं स्वतंत्र व तिच्या उदयाच्या पूर्वींपासून अस्तित्वांत असणारी वस्तु असते; आणि खरें ज्ञान, खोटें ज्ञान या द्वंद्वाच्या मार्गानें हळूहळू क्रमाक्रमानें त्या वस्तूच्या जवळजवळ जात रहावें असा तिचा हेतु असतो. तें सत्य आहे याबद्दल बुद्धीला संशय नसतो. सत्यवस्तूच्या अस्तित्वाबद्दल जशी बुद्धीला खात्री असते तशी खात्री तिला मनुष्याच्या दुसऱ्या आकांक्षित गोष्टींबद्दल असत नाहीं. याचें कारण, तिच्या विशिष्ट प्रांतांत, सत्याच्या प्रांतांत, तिला ज्या स्वयंभू अंतःप्रकाशाचें साह्य मिळतें त्या प्रकाशाचें साह्य तिला इतर प्रांतांत मिळत नाहीं हें होय. सुखाची निरतिशय स्थिति आम्हाला प्राप्त होऊं शकेल अशी आम्ही कल्पना करूं शकतो याचें कारण, बुद्धीहून वेगळें हृदय म्हणून जें आमचें अंग आहे, ज्याला स्वभावत: सुखाचा ओढा असतो, त्या हृदयाला निश्चित-ज्ञानाचा एक प्रकार उपलब्ध असतो; अर्थात् त्याला श्रद्धा ठेवण्याची शक्ति असते आणि दुःखाचें मूळ जी अतृप्त इच्छा ती समूळ उपटून टाकतां येईल अशी भविष्यासंबंधानें आमच्या मनाला कल्पना करतां येते. हृदयाला निर्भेळ सुखाच्या अंतिम प्राप्तीची ज्याप्रमाणें खात्री असते, त्याप्रमाणें शारीर ज्ञानतंतूना दुःखसंवेदनांपासून व शारीरिक जीवनाला मरणापासून मुक्तता मिळण्याची खात्री आहे काय ? शारीर संवेदनांतील दुःखाचा अभाव, शारीर जीवनाच्या अंताचा अभाव आम्हाला कसा काय कल्पितां येणार ? मात्र वस्तुस्थिति अशी आहे कीं, संवेदनांत अशी उपजत प्रभावी भावना असते कीं, दुःख म्हणून नसावेंच, दुःख ही कांहींतरी आगंतुक गोष्ट आहे व ती नाहींशी होऊं शकेल. शरीरांत काम करणाऱ्या प्राणाला, स्वभावत: स्वतःचा अंत अस्वाभाविक वाटतो; हा अंत होतां कामा नये अशी त्याच्या अंतरांत सारखी मागणी चालू असते आणि ही 'हक्काची मागणी' आहे अशी त्याची प्रभावी प्रबल भावना असते. आमच्या बुद्धीला संवेदनांच्या व प्राणाच्या या गोष्टी म्हणजे नैसर्गिक, जन्मजात भावना, कल्पना व आकांक्षा आहेत असें वाटतें परंतु त्या केव्हांतरी पूर्ण होऊं शकतील अशी कल्पना तिला होत नाहीं.
पान क्र. १०९
परंतु यांत बुद्धीची अप्रबुद्धता दिसते. वस्तुत: एकच नियम सर्वत्र लावणें हें बुद्धीचें काम आहे. परंतु व्यवहारवादी बुद्धि अशी चूक करते कीं, जी गोष्ट स्पष्टपणें तिच्या प्रत्ययास येते तिच्या ती अतिरिक्तपणें अंकित होऊन राहते; आणि ज्या गोष्टी आज स्पष्ट प्रत्ययास येत नाहींत पण ज्या महत्त्वाच्या गोष्टींची शक्यता स्पष्ट प्रत्ययास येते त्या गोष्टींसंबंधानें ती तर्कशुद्ध रीतीनें विचार करून तर्कशुद्ध निर्णय घेत नाहीं, तसें धैर्य ती दाखवीत नाहीं. खरी गोष्ट अशी आहे कीं, आज जें जें अस्तित्वांत आहे, तें पूर्वीं एका काळीं 'शक्यतेच्या,' शक्य अस्तित्वाच्या वर्गांत होतें. तेव्हां आज जें शक्यतेच्या वर्गांत असेल, तें भावी कालांत 'वास्तव अस्तित्वाच्या' वर्गांत जाईल असा तर्क करणें युक्तिसंगत आहे. बुद्धि, हृदय, शारीर संवेदना, शारीरजीवन यांना ज्या गोष्टी हव्याशा वाटतात त्या गोष्टींची शक्यता आज स्पष्ट प्रत्ययास येत आहे. कारण, वस्तूंचें व घटनांचें अस्तित्व कशावर अवलंबून आहे, त्यांचीं कारणें कोणतीं, त्यांच्या प्रक्रिया कोणत्या या गोष्टींच्या ज्ञानानें वस्तूंवर व घटनांवर सत्ता प्राप्त होत असते आणि पूर्ण सत्याच्या आड येणाऱ्या प्रमादाचीं, भ्रमाचीं कारणें, नित्य सुखाच्या विरोधी असलेल्या मानसिक दुःखाचे हेतू, नित्य सुखाला दूर ठेवणाऱ्या शारीर दुःखाचें मूळ, नित्य जीवनविरोधी असलेल्या मरणाचें मूळ, या गोष्टींचें स्वच्छ ज्ञान जर आम्हाला शक्य झालें, तर हीं कारणें नाहींशीं करण्यासाठीं आम्ही प्रयत्न करूं शकूं आणि या प्रयत्नांत यशस्वी होण्याची आशा-अपेक्षा देखील थोडीबहुत बाळगूं शकूं. कारण ज्ञान ही सत्ता आहे, ज्ञान हेंच प्रभुत्व आहे.
वास्तविक गोष्ट अशी आहे कीं, प्रमाद, मानसिक दुःख आदि विरोधी, अनिष्ट गोष्टी शक्य तेवढ्या दूर करणें, नाहींशा करणें हें आम्ही आमचें ध्येय मानतो. प्रमादाचीं आणि मानसिक व शारीरिक दु:खांचीं कारणें शक्य तेवढीं कमी करण्यासाठीं आम्ही सारखा प्रयत्न करीत असतो. भौतिक विज्ञान वाढत आहे. वाढतें भौतिक शास्त्रीय ज्ञान जन्माचें नियमन करण्याचें, व आयुर्मर्यादा शक्य तितकी अधिक वाढविण्याचें स्वप्न पहात आहे; मरणावर पूर्ण विजय मिळविण्याची गोष्ट हें नवें शास्त्र अद्यापि काढीत नसलें तरी मरण खूप खूप दूर लोटण्याचें स्वप्न त्याला दिसत आहे, अनिष्ट गोष्टींचीं जीं कारणें दूर करण्याचा आम्ही यत्न करतों तीं, अगदीं मुळांतलीं कारणें नसून दुय्यम, बाह्य कारणें असतात; अर्थात् ही बाह्य, दुय्यम कारणें शक्य तितकी दूर हटविण्याचाच
पान क्र. ११०
विचार आम्ही करूं शकतो. आम्हाला जें नको आहे, ज्याच्या विरुद्ध आम्ही झगडतो त्या अनिष्टाचीं खरीं मुळें उखडून फेंकून देण्याचा विचार आम्ही करूं शकत नाहीं. कारण तीं खरीं मुळें हुडकून काढण्याचा यत्न आम्ही करीत नाहीं. मूळ सत्याचा शोध करण्याचा आमचा यत्न नसतो, तर दुय्यम अनुभव घेण्याकडे आमचें सर्व लक्ष असतें; वस्तूंच्या क्रिया-प्रक्रिया आम्ही जाणून घेतो, परंतु वस्तूंचें सारतत्त्व, वस्तूंचा गाभा आम्ही जाणून घेत नाहीं. अर्थात् परिस्थिति बदलण्याचें काम आम्ही प्रभावीपणें करूं शकतो, पण मुळावर सत्ता चालवणें, नियंत्रण ठेवणें आम्हास शक्य होत नाहीं. परंतु प्रमाद किंवा भ्रम, दुःख व मरण या गोष्टींचें तात्त्विक कारण काय आहे हें ज्ञान जर आम्हीं आत्मसात् केलें तर या अनिष्टावर मर्यादित नव्हे, तर पूर्ण हुकमत चालविण्याचें सामर्थ्य आम्हाला लाभेल, लाभणें शक्य होईल; इतकेंच नव्हे तर, अशी देखील शक्यता आहे कीं, या अनिष्ट गोष्टी आम्हाला अजिबात नाहींशा करतां येतील, आणि निर्भेळ, निरतिशय सौजन्य, सुख, ज्ञान आणि अमर जीवन आम्हाला मिळवितां येईल. आमच्या निसर्गजात अंतर्दृष्टीला मानवी अस्तित्वाची जी अंतिम, वास्तव अवस्था स्पष्टपणें दिसते ती याप्रमाणें आम्हाला लाभून, आमची जन्मजात बलिष्ठ भविष्यविषयक भावना बरोबर आहे असें आमच्या यशस्वी प्रगतीनें व अंतिम ध्येयप्राप्तीनें सिद्ध होईल, अशी आशा करण्याला भरपूर जागा आहे.
अनिष्ट गोष्टी नष्ट करून, इष्ट असलेल्या निरतिशय निर्भेळ सुखादि गोष्टी कशा मिळवितां येतील, या प्रश्नाचा आमच्या प्राचीन वेदांतानें विचार करून, आमच्यापुढें ब्रह्मविचार मांडला आहे. ब्रह्माचा स्वभाव सच्चिदानंद हा आहे. ब्रह्म ही एकच एक सर्वव्यापी मूळ सद्वस्तु सर्व विश्वघटनांच्या मुळाशीं आहे, हा विचार आणि अनुभव, आमचें अनिष्ट दूर करील आणि आमचें इष्ट आम्हाला देईल असें वेदांताचें आपल्यापुढील प्रश्नाला उत्तर आहे.
या वेदांती दृष्टीनुसार एका सर्वव्यापी अनश्वर सद्वस्तूची गतिशीलता, हें सर्व जीवांच्या जीवनाचें सारभूत स्वरूप आहे; सर्व संवेदना आणि भावना यांचें मूळस्वरूप, सर्वव्यापी स्वयंभू आनंदाचा -- अस्तित्वाच्या आनंदाचा -- खेळ, हें आहे, सर्वव्यापी सर्वांतर्यामी सत्यापासून स्वभावत: बाहेर पडणारे किरण, हें सर्व विचार आणि सर्व प्रत्यय यांचें सारभूत तत्त्व आहे; सर्वव्यापी स्वयंप्रकटनसमर्थ साधुत्वाचें, मांगल्याचें सदैव पुढें पुढें जाणें हें सर्व क्रियांचें हृदयभूत सर्वस्व आहे.
पान क्र. १११
पण हा खेळ, ही एकतत्त्वाची गतिशीलता अनेक आकारांत, अनेक वृत्तींत, अनेक शक्तींच्या परस्परांवरील अनेक प्रयोगांत व्यक्त होते. या अनेकत्वामध्यें वैयक्तिक 'मी'च्या अस्तित्वाला, त्याच्या हस्तक्षेपाला जागा असते, हा 'मी', सर्वव्यापी एकतत्त्वाच्या आविष्काराला कांहीं नियमित रूप देतो, आणि कांहीं काळपर्यंत या आविष्कारांत वैगुण्यहि आणतो. सर्वव्यापी जाणिवेनें स्वत:ला मर्यादित करणें, हा या 'मी' चा स्वभाव व स्वरूप आहे. सर्वव्यापी खेळाचा थोडासा भाग जाणिवेच्या क्षेत्रांत ठेवून, बाकी सर्व भाग बुद्धिपुरःसर जाणिवेंतून काढून टाकणें, हें 'मी'चें स्वरूप आहे. एका विशिष्ट रूपांत, आकारांत (बाकी सर्व विसरून) जाणिवेनें निमग्न होऊन राहणें, हें 'मी'चें स्वरूप आहे; एका विशिष्ट रूपांत, वृत्तींच्या एका विशिष्ट संघांत, शक्तींच्या एका विशिष्ट कार्यक्षेत्रांत सर्वव्यापी जाणिवेनें स्वत:ला कोंडून घेणें हें 'मी'चें स्वरूप आहे. प्रमाद किंवा भ्रम, मानसिक तथा शारीरिक दुःख, दुष्टत्व आणि मरण या गोष्टी, 'मी' उत्पन्न करतो; या गोष्टी 'मी'च्या प्रतिक्रियेनें जन्मास येतात. वस्तुत: एकच एक तत्त्व, आनंद-सत्य-शिवरूप अस्तित्व, आपल्या गतिशीलतेनें ज्या हालचालींना जन्म देतें त्या हालचालींचा, त्या जन्मदात्या एकतत्त्वाशीं योग्य तो संबंध असतो. पण हा संबंध आपला 'मी' ओळखीत नाहीं. तो आपल्या संकुचित दृष्टीनें या हालचाली बघतो आणि त्यांतील कोणाला प्रमाद किंवा भ्रम, कोणाला मानसिक दुःख इत्यादि नांवें, त्याच्या अनुभवानुसार देतो. 'मी' नें अनुभवलेल्या दु:खादि प्रतिक्रियारूप गोष्टी आम्हाला नाहींशा करतां येतील, जर आम्ही वरील हालचालींचा एका सद्वस्तूशीं असलेला संबंध अनुभवण्यास समर्थ होऊं. हा मूळ संबंध आम्हाला अनुभवतां आला तर दु:खादि रूपानें भासणाऱ्या गोष्टींचें खरें मूल्य, खरा अर्थ, आम्हाला कळेल. विश्वसमष्टीच्या जाणिवेशीं व्यक्तीनें योग्य संबंध ठेवला, ती जाणीव आपलीशी केली, तिच्यांतील योग्य तो वांटा आत्मसात् केला, त्याचप्रमाणें, ही समष्टि ज्या विश्वातीत जाणिवेचें व्यक्त रूप आहे त्या जाणिवेचाहि योग्य वांटा व्यक्तीनें आपलासा केला, म्हणजे विश्वातीत एकतत्त्वाच्या, विश्वांतील हालचालींचा योग्य संबंध व्यक्तीच्या पुन: अनुभवास येईल व संकुचित प्रतिक्रियेनें उदय पावणारे भ्रमादि अनुभवाचें प्रकार नाहींसे होतील.
उत्तर वेदांतामध्यें अशी कल्पना आली आणि रूढ होऊन बसली कीं,
पान क्र. ११२
मर्यादित 'मी' हा केवळ द्वंद्वांचें कारण नव्हे, तर विश्वाच्या अस्तित्वाचा मूळ पाया आहे. 'मी'चें अज्ञान दूर केल्यानें आणि त्याच्या अज्ञानजन्य मर्यादा नाहींशा केल्यानें आपण द्वंद्वें नाहींशीं करतों हें तर खरेंच, पण या द्वंद्वांच्या निकालाबरोबर आम्ही विश्वांतील आमच्या अस्तित्वाचाहि लय करतो. या कल्पनेनुसार मानवाचें अस्तित्व मुळांतच दुःखमय आणि भ्रमरूप आहे, आणि विश्वांत राहून पूर्णता मिळविण्याचा प्रयत्न करणें निरर्थक आहे. या विश्वांत सर्व कांहीं सापेक्षच लाभेल, चांगल्या बरोबर वाईटहि बांधलेलें आहे, अन्योन्यविरोधी गोष्टींचें भांडार म्हणजे विश्व, येथें इष्ट गोष्ट मिळविण्याचा प्रयत्न आम्हीं करावा, पण तिची विरोधी, अनिष्ट गोष्ट तिला जोडलेली असल्यानें ती पत्करण्याची तयारी ठेवावी - अशी विश्वासंबंधींची व त्या विश्वांतील आमच्या जीवनासंबंधींची उत्तरवेदांताची कल्पना आहे. या कल्पनेहून अधिक विशाल आणि सत्यस्पर्शी कल्पना ही आहे कीं, 'मी' हा त्याच्या पलीकडे असलेल्या परम तत्त्वाचा मध्यस्थ प्रतिनिधिरूप आहे, परमतत्त्वाचें अल्पकालिक प्रतीक आहे. ही विशाल कल्पना आम्हीं आत्मसात् केली, तर पूर्णतेच्या प्रयत्नाची निरर्थकता ही खोटी कल्पना आहे, असें आमच्या प्रत्ययास येईल आणि आमचें जीवन पूर्णतासंपन्न करण्यासाठीं आम्ही वेदान्त उपयोगांत आणूं, जीवनांतून पळून जाण्यासाठीं त्याचा उपयोग करणार नाहीं. विश्वाचें अस्तित्व हें ईश्वर किंवा पुरुष या तत्त्वावर आधारलेलें आहे. विश्वाचा मूळ पाया, मूळ कारण ईश्वर आहे; व्यक्तीचीं रूपें, समष्टीचीं रूपें ईश्वर व्यक्त करतो व या रूपांत तो प्रवेश करून जीवन जगतो, हें विश्वाच्या अस्तित्वाचें स्वरूप आहे. वैयक्तिक 'मी', मर्यादित 'मी' हें जाणिवेचें एक मधल्या अवस्थेंतील रूप आहे; जाणिवेचा विकास एका विशिष्ट मार्गानें करण्यासाठीं या वैयक्तिक 'मी'ची आवश्यकता असते. या मार्गानें गेले असतां, व्यक्ति तिच्या पलीकडील ज्या सद्वस्तूची प्रतीक आहे त्या सद्वस्तूशीं एकरूप होऊन, शिवाय त्या सद्वस्तूचें ती प्रतिनिधित्व करूं शकते. अर्थात् हें प्रतिनिधित्व अंधारांत चांचपडणारा व मर्यादांच्या कोंडींत वावरणारा 'मी' होऊन किंवा राहून व्यक्ति करीत नाहीं, तर त्या दिव्य सद्वस्तूचें आणि विश्वपुरुषाचें ती एक केंद्रस्थान बनते; आणि वैयक्तिक म्हणून जे कांहीं नियतसंबंध असतील त्या सर्वांना हें दिव्य केंद्र व्यापून टाकते, त्यांचा दिव्य उपयोग करतें आणि दिव्य सद्वस्तूशीं त्या सर्व संबंधांचा व संबंधित गोष्टींचा सुंदर मेळ बसवितें.
पान क्र. ११३
ज्ञानमय पुरुषोत्तम हा भौतिक निसर्गाची समष्टि या रूपानें व्यक्त झाला आहे. ही समष्टि, भौतिक विश्वांतील मानवी अस्तित्वाचा पाया आहे. प्राण, मन व विज्ञान (अतिमानस) हीं आवरणें घेऊन हा पुरुषोत्तम, जड निसर्गांत दडला आहे. तो या निसर्गांत प्राणमय, मनोमय, व विज्ञानमय अशा रूपांनीं क्रमश: एकाहून एक श्रेष्ठ रूपांत व्यक्त होणें - हें आमच्या सर्व हालचालींचे मूळ कारण आहे. या अनिवार्य विकासक्रमामुळें मानव जडांत अवतरला. आपल्या शरीरांत ईश्वर क्रमश: व्यक्त करण्याचें सामर्थ्य हा विकासक्रम त्याला देईल - तो शेवटीं देहधारी विश्वपुरुष होईल, तो ईश्वराचा मानवदेहधारी विश्वव्यापी असा अवतार होईल. वरील विकास घडवून आणण्यासाठीं वैयक्तिक 'मी' ची रचना केलेली आहे. जड निसर्ग हा ईश्वराचें अगदीं खालचें समष्टिरूप. हें तळांतलें रूप आणि मानवाच्या पातळीवरील ईश्वराचें रूप, या दोहोंमध्यें 'हृद्य समुद्र' या शब्दांनीं ऋग्वेदांत वर्णिलेलें समष्टिरूप आहे. या समष्टिरूपांत स्पष्ट प्रकाश नाहीं, रचना नाहीं - रचनाहीन, वैशिष्ट्यशून्य, अमर्याद पसारा, असें या समष्टीचें रूप आहे. निश्चेतन समष्टीच्या वरील ही अर्धजड - अर्धचेतन समष्टि होय. मानवी पातळीवरील समष्टि ही चेतन समष्टि. हिच्यामध्यें वैयक्तिक 'मी' द्वंद्वें निर्माण करतो. जीवन-मरण, मानसिक सुखदु:ख, शारीरिक सुखदु:ख, सत्य-असत्य, साधुत्व-असाधुत्व या रचना मींच्या कर्तृत्वानें निर्माण होतात. निर्भेळ नित्य असें सत्य, साधुत्व, जीवन व सुख यांची मूर्ति म्हणजे विश्वसमष्टि. या समष्टीला, समष्टीच्या एकत्वाला बहिष्कृत करून आपली रचना ही विकासकार्यापुरती आहे हें न जाणून, आपलें स्वतंत्रत्व, स्वतंत्र एकत्व अनुभवण्याचा प्रयत्न करून, व्यक्ति -- वैयक्तिक मी -- स्वाभाविकपणें व अगतिकपणें द्वंद्वें उभीं करतो. विश्वाला व ईश्वराला ओळखून त्यांना सामावून घेण्यासाठीं विकासक्रमांत व्यक्ति, आपला ''आत्मा'', सुटा मोकळा करते; आणि असें झालें म्हणजे ''मी'' या रचनेचा उपयोग संपून ती नाहींशीं होण्याच्या मार्गास लागते. विश्व आणि विश्वेश्वर यांना आत्म्यांत सांठविण्याचा उद्योग व्यक्तीनें आरंभिला म्हणजे, जें श्रेष्ठांत श्रेष्ठ कृतार्थपण व्यक्तीला मिळावयाचें, वा मिळवावयाचें असतें त्याची साधना तिनें सुरू केली असें समजावें. ''मी'' चें जीवन हें, या कृतार्थतेच्या सिद्धीसाठीं अवश्य असणारी पूर्वभूमिका आहे, ज्याप्रमाणें मानवी जीवनाच्या सिद्धीसाठीं पशु जीवन ही एक आवश्यक पूर्वभूमिका आहे. मर्यादित 'मी' चें, संपूर्ण रूपांतर घडून व्यक्तीमध्यें
पान क्र. ११४
सर्वात्मक पुरुष अभिव्यक्त होतो, व्यक्ति सर्वरूप होते. हा मर्यादित 'मी', विश्वात्मा व विश्वातीत ईश्वर यांच्या दर्शनामुळें, आपलें संकुचित स्वरूप टाकून, ईश्वरी एकत्वाचें जाणीवयुक्त केंद्र बनतो, ईश्वरी स्वतंत्रतेचें ज्ञानपूर्ण केंद्र बनतो. याप्रमाणें मानव कृतार्थ होतो, व्यक्ति कृतार्थ होते, आणि विश्वांत ज्या अनेक व्यक्ती असतात त्या व्यक्तींच्या जीवनावर व जीवनक्षेत्रावर अशा कृतार्थ व्यक्तीच्या द्वारां, अनंत असीम अस्तित्व-सत्य-शिव-आनंद यांची पावन गंगा वाहूं लागते. या कृतार्थ व्यक्तीला निरतिशय पुष्टि-तुष्टि देणारा हा पवित्र प्रवाह, ती व्यक्ती स्वयंस्फूर्तीनें सभोवारच्या सहचर आत्म्यांच्या तुष्टि-पुष्टीसाठीं, त्यांच्या जीवनक्षेत्रांत नेऊन सोडते - आमच्या विकासाच्या फेऱ्या याच दिव्य फलाच्या सिद्धीसाठीं चालल्या आहेत. निसर्गमाता आपल्या उदरांत हें सर्वोत्तम फलरूपीं बाळ वागवीत आहे; या बाळाला विश्वाच्या कृतार्थतेसाठीं जन्म देऊन, आपण कृतार्थ व्हावें या उद्देशानें ती सर्व प्रकारचे प्रयत्न करीत आहे.
पान क्र. ११५
प्रकरण आठवें
वेदान्ती ज्ञानाचे मार्ग
सर्व भूतांमध्यें असणारा हा गूढ आत्मा सामान्य दृष्टीला दिसत नाहीं; श्रेष्ठ, सूक्ष्म बुद्धीला, ज्यांना सूक्ष्मदृष्टि आहे अशा साधकांना श्रेष्ठ सूक्ष्म बुद्धीच्या साह्यानें तो दिसतो.
- कठोपनिषद् ३.१२
मानवी व्यक्तीच्या विकासाचा शेवट, त्या व्यक्तीचा जीवनप्रवाह सच्चिदानंदमय होणें हा आहे, असें मागील प्रकरणाच्या शेवटीं सांगितलें. तेव्हां, विश्वांत सच्चिदानंदाचें कार्य काय आहे, तें कसें चालतें, तें स्वत: आणि त्याचें प्रतीक जो 'अहम्' या दोघांचे संबंध आरंभी काय असतात, ते कोणत्या प्रक्रियेनें निर्माण होतात, त्या संबंधांतून शेवटीं व्यक्तीचें सच्चिदानंदत्व स्थापित होतें तें कोणत्या मार्गानें - इत्यादि प्रश्न आतां विचारांत घेणें अवश्य आहे. कारण हे जे व्यक्ति आणि सच्चिदानंद यांचे संबंध आणि या संबंधांची जी आरंभींची व पुढची वाटचालीची प्रक्रिया, ती प्रक्रिया व ते संबंध यांजवरच दिव्य मानवी जीवनाचें तत्त्वज्ञान आणि आचरण सर्वथा अवलंबून आहे.
दिव्य अस्तित्वाची व ईश्वराच्या अस्तित्वाची कल्पना आम्हांला येते, या अस्तित्वाचें ज्ञान आम्हांला होतें, तें इंद्रियांचा पुरावा आणि स्थूल भौतिक मनाच्या भिंती ओलांडून पलीकडे गेल्यावर होतें. इंद्रियांचा पुरावा आणि स्थूल जाणीव यांच्या क्षेत्रांत जोंपावेतों आम्ही आपणांस कोंडून घेतों, तोंपावेतों भौतिक विश्व आणि त्या विश्वांतील घटना यांच्या पलीकडे कशाचीहि कल्पना आम्हांला करतां येत नाहीं, कशाचेंहि ज्ञान आम्हांला होत नाही. परंतु आमच्यांत कांहीं शक्ती अशा आहेत कीं, आमच्या मनाला केवळ भौतिक वस्तूंच्या, भौतिक अनुभवांच्या आधारावर करतां येत नाहींत अशा कल्पना, त्या शक्तींच्या
पान क्र. ११६
सहाय्यानें आम्हांला करतां येतात. आम्हांला दिसणाऱ्या भौतिक विश्वांतील गोष्टींना तर्कशास्त्रीय अनुमानपद्धतीची जोड देऊन किंवा कल्पनाशक्तीच्या विविधता-निर्मितीच्या सामर्थ्याची जोड देऊन या कल्पना आम्हांला उभ्या करतां येतात हें खरें. पण मुख्य मुद्दा हा कीं, या उभ्या केलेल्या कल्पनांना दृश्य भौतिक गोष्टींचा प्रत्यक्ष आधार असत नाहीं. आमची शुद्ध तर्कबुद्धि ही आम्हांला दृश्यातीत गोष्टींची कल्पना करून देणारी, एक प्रथम श्रेणीची शक्ति आहे.
मानवी बुद्धि दोन प्रकारचें कार्य करते. एक मिश्र व पराधीन, दुसरें शुद्ध किंवा स्वाधीन. बुद्धि मिश्र कार्य करते, तेव्हां इंद्रियांच्या अनुभवाचें क्षेत्र, एवढेंच तिच्या कार्याचें क्षेत्र असतें; इंद्रियांच्या अनुभवाचा, त्या अनुभवाच्या क्षेत्राचा नियम, हाच शेवटला सत्याचा नियम, शेवटलें सत्य ती मानते. अशी बुद्धि दृश्याचाच फक्त अभ्यास व शोध करते; अर्थात् दृश्यांचे अन्योन्यसंबंध, त्यांच्या प्रक्रिया, त्यांचें उपयोग यांच्याच अध्ययनाच्या, निरीक्षण-परीक्षणाच्या पाठीमागें ती असते. बुद्धीच्या या क्रियेंतून वस्तूच्या मूळ तत्त्वाचें ज्ञान मिळणें शक्य नसतें; वस्तूचा दृश्य व्यापार मात्र तिला समजूं शकतो. अस्तित्वाची गभीरता व गहनता मापण्याचें साधन मिश्रक्रियेच्या बुद्धीजवळ नाहीं. त्या अस्तित्वांतून उदय पावलेल्या दुय्यम वस्तूंचें क्षेत्र तपासणें, एवढीच तिची शक्ति असते. सर्वथा स्वाधीन व शुद्ध कार्य करणारी बुद्धि ही इंद्रियांनीं दिलेले अनुभव मान्य करते; पण त्यांनीं आंखलेली मर्यादा अमान्य करते; त्या अनुभवांच्या निरीक्षणापासून ती आरंभ करते, पुढें त्या अनुभवांच्या मागें काय आहे हें ती पाहते, त्याचा शोध घेते, खऱ्या-खोट्याचा निर्णय करते, आपलें स्वतंत्र कार्य हें हक्काचें कार्य आहे असें ओळखून, त्या स्वतंत्र कार्याच्या साह्यानें सर्वसामान्य व बदलतां न येणारे असे सिद्धांत व कल्पना बसविते, बसविण्याचा प्रयत्न करते. या स्वतंत्र सिद्धांतांचा व कल्पनांचा संबंध वस्तूंच्या दृश्य रूपांशीं, व्यापारांशीं असत नाहीं, तर त्या दृश्य रूपांच्या, व्यापारांच्या मागें जें सत्य असतें त्याच्याशीं असतो. केव्हां केव्हां दृश्य वस्तु वा व्यापार पाहून, त्या दृश्याच्या पाठीमागें काय सत्य आहे तें स्वतंत्र बुद्धि एकदम ठरवून सांगतें. दृश्याच्या पाठीमागील वस्तूची, एकदम म्हणजे युक्तिवाद न करतां ठरविलेली कल्पना, ही इंद्रियांनीं दिलेल्या, दृश्याच्या अनुभवावर आधारलेली, त्या अनुभवाचा परिणाम आहे असें प्रथमदर्शनीं वाटण्याचा
पान क्र. ११७
संभव असतो, पण खरोखरी ती तशी नसते. ती बुद्धीच्या स्वतंत्र व शुद्ध कार्यानेंच जन्मलेली असते, ती स्वतंत्र बुद्धीचाच प्रत्यय, केवळ स्वतंत्र बुद्धीला प्रत्यक्ष होणारी गोष्ट असते. स्वतंत्र बुद्धीचें वरील कार्याहून वेगळें व तिचा स्वभावविशेष व्यक्त करणारें कार्य पुढीलप्रमाणें असतें : इंद्रियांनीं दिलेले अनुभव ती केवळ वरकरणी आपल्या कार्याकरतां घेते; या अनुभवांवर तिची भिस्त असत नाहीं; तिचा युक्तिवाद तिच्या स्वतंत्र प्रत्ययावर आधारलेला असतो; या अनुभवांना पार मागें टाकून त्या अनुभवांच्या अगदीं उलट विधान करणारा सिद्धांत तो निश्चित करतो. बुद्धीचें हें कार्य आवश्यक आहे आणि न्यायसंगत आहे. कारण आपल्या सामान्य अनुभवाचें क्षेत्र फार लहान असतें. या क्षेत्राच्या पलीकडे विश्वांतील अनेक सत्य घटना भरलेल्या आहेत; शिवाय हें जें लहानसें क्षेत्र सामान्य अनुभवाचें म्हणून असतें, त्या क्षेत्रांतहि या अनुभवांसाठीं जीं साधनें वापरण्यांत येतात तीं साधनें सदोष असतात; आणि म्हणून आपले हे सामान्य अनुभव बहुधा खोटीं 'वजनें-मापेंच' आपल्या पदरांत टाकतात. विश्वांतील वस्तूंच्या, घटनांच्या पोटीं जें सत्य आहे, त्याला आम्हांला भेटावयाचें, गांठावयाचें असेल, त्याच्या संबंधानें योग्य कल्पना हवी असेल, तर हा सामान्य खोट्याचा अनुभव -- खोट्याला खरें म्हणून पदरांत टाकणारा अनुभव -- मागें टाकलाच पाहिजे, स्वत:ला प्रमाणभूत मानावें ही त्याची आग्रहाची मागणी अमान्य केलीच पाहिजे. मनुष्यांत ज्या अत्यंत महत्त्वाच्या शक्ती विकास पावल्या आहेत, त्यांत, स्वतंत्र बुद्धीच्या उपयोगानें इंद्रियसंलग्न मनाकडून होणाऱ्या चुकांची दुरुस्ती करण्याची शक्ति विशेष महत्त्वाची आहे. पृथ्वीवरील प्राणिवर्गांत मनुष्य श्रेष्ठ ठरण्याचें मुख्य कारण ही बुद्धीची शक्ति होय.
असंमिश्र, स्वतंत्र बुद्धीचा पूर्ण उपयोग केल्यानें आम्ही भौतिक ज्ञानाच्या पलीकडील अतिभौतिक ज्ञानाच्या, तत्त्वज्ञानाच्या प्रांतांत प्रवेश करतो; परंतु तत्त्वज्ञानाच्या ज्या तात्त्विक कल्पना असतात, त्या कल्पनांनीं आमच्या संपूर्ण प्रकृतीचें समाधान होत नाहीं. शुद्ध, स्वतंत्र बुद्धीचें समाधान या कल्पनांनीं होतें. कारण तिची प्रकृति अशा कल्पनांचीच बनलेली असते. परंतु आपला स्वभाव असा आहे कीं, आपण नेहमीं दोन डोळे वापरतो; एका डोळ्यानें तात्त्विक कल्पना आणि दुसऱ्या डोळ्यानें वास्तव घटना पाहतो. प्रत्येक वस्तूसंबंधानें या दोन गोष्टी पाहिल्याशिवाय आपलें समाधान होत नाहीं. केवळ तात्त्विक कल्पना ही आम्हांला पूर्णशी भासत
पान क्र. ११८
नाहीं, आमच्या प्रकृतीच्या एका अंगाच्या दृष्टीनें ती जणुं असत्य वाटते, मिथ्या वाटते; ही कल्पना अनुभव म्हणून प्रत्ययास आली म्हणजे ती पूर्णशी वाटते व आमचें समाधान होतें. परंतु या तत्त्वज्ञान-विषयक कल्पनांच्या बाबतींत इंद्रियाधिष्ठित अनुभव शक्य नसतो. या तत्त्वज्ञान-विषयक सत्यांचा स्वभावच असा आहे कीं, हीं सत्यें इंद्रियांना दिसत नाहींत, बुद्धीलाच दिसतात. मग यांचा अनुभव आम्हांला कसा यावयाचा ? अनुभवाची ऐंद्रिय शक्ति येथें कामाची नसल्यानें, अनुभव घेणारी दुसरी शक्ति आम्हांला असली तरच आमचें तात्त्विक कल्पनांसंबंधाचें ज्ञान आम्हांला पूर्ण वाटेल. आम्ही आतां अतिभौतिक प्रांतांतील गोष्टींचा विचार करीत आहों, तेव्हां या गोष्टींचा अनुभव घ्यावयास, मानसिक प्रत्ययशक्तीचा क्षेत्रविस्तार करणें आवश्यक आहे.
एका अर्थानें आपला सगळाच अनुभव मानसिक (Psychological) अनुभव असतो. कारण आपण इंद्रियांच्या द्वारां जें ग्रहण करतों, त्याला कांहीं अर्थ किंवा मूल्य येण्यासाठीं इंद्रियस्थ, इंद्रियसंलग्न म्हणून जें मन आहे त्या मनाच्या भाषेंत त्याला कांहीं नांव मिळावें लागतें. या मनाला सहावें इंद्रिय असें आपल्या तत्त्वज्ञानांत म्हणतात. पण असें म्हणतां येईल कीं, मन हेंच एक अनुभव घेण्याचें इंद्रिय असून दृष्टि, श्रवण, स्पर्श, घ्राण, रसना ही मनाचीं विशेष कार्य करणारीं रूपें आहेत. सामान्य अनुभवासाठीं हें इंद्रिय-मन (Sense mind) जरी डोळे, कान इत्यादि इंद्रियांचा उपयोग करतें, तरी तें या इंद्रियांच्या मर्यादा ओलांडून स्वतंत्रपणें आपल्या स्वतःच्या शक्तीनें प्रत्यक्ष अनुभव घेऊं शकतें. कल्पना करणाऱ्या बुद्धीचे जसे शुद्ध व मिश्र असे दोन क्रियाप्रकार आहेत, तसेच अनुभव घेणाऱ्या मनाचेहि दोन क्रियाप्रकार आहेत. बाहेरच्या जगाचा, विषयांचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करणें हा मिश्र प्रकार; स्वत:च्या विषयींचा अनुभव घेण्याचा प्रयत्न हा शुद्ध प्रकार. मिश्र क्रियेंत मन ज्ञानेंद्रियावर अवलंबून असतें, आणि तीं इंद्रियें पुरवतील त्या पुराव्यानुसार आपला अनुभव अमुक असें ठरविते. शुद्ध क्रियेंत तें स्वत: स्वतःचें ठिकाणीं काम करतें आणि एकप्रकारें त्या वस्तूंशीं एकरूप होऊन, वस्तूंचा अनुभव प्रत्यक्षपणें घेतें. आमच्या भावनांचा अनुभव आम्ही तादात्म्यानें घेतो; आम्ही क्रोधरूप होऊन क्रोधाचा अनुभव घेतो. आमच्या अस्तित्वाचा अनुभव आम्हांला तादात्म्यतेंतच घडतो; या ठिकाणी तादात्म्यानें घडणारें ज्ञान म्हणजेच अनुभव, ही गोष्ट स्पष्ट होते. वस्तुत: तादात्म्यानें घडणारें
पान क्र. ११९
ज्ञान हें सर्वच अनुभवाचें खरें, स्वाभाविक व आंतलें स्वरूप आहे. हें खरें स्वरूप आम्हांला स्पष्ट न होण्याचें कारण, जगामध्यें मी केवळ अनुभवणारा आणि बाकी सर्व माझ्या अनुभवाचा विषय, असा भेद करून, 'मी' खेरीज बाकी जगाला आम्हीं बहिष्कार घालून 'मी' च्या बाहेर ठेवलें आहे, आणि मग या बाहेर ठेवलेल्या जगाशीं पुन: एकरूप होण्यासाठीं कांहीं इंद्रियें, कांहीं प्रक्रिया आम्ही अगतिकपणें निर्मून बांधून राहिलों आहों. या बहिष्काराच्या स्थितींत जाणीवपूर्वक तादात्म्यानें प्रत्यक्ष ज्ञान आम्हांला होऊं शकत नाहीं. त्या ऐवजीं अप्रत्यक्ष ज्ञान आम्ही उपयोगांत आणतों. स्थूल भौतिक संसर्ग आणि मानसिक सहभावना -- सहानुभूति (Mental Sympathy) -- यांच्या द्वारा आम्हांला हें अप्रत्यक्ष ज्ञान घडल्यासारखें दिसतें. 'मी'नें ही ज्ञानाची कोंडी निर्माण केलेली आहे. शरीर आणि मन यांच्या मर्यादा घालून ज्ञानाची कोंडी करणें हें 'मी'चें प्राथमिक, पायाभूत कार्य आहे. हा वरील प्रकार 'मी'च्या एकंदर प्रवृत्तीचा एक नमुना आहे. प्रथम एक असत्य पाया म्हणून घ्यावयाचें आणि त्या अव्वल असत्याच्या आधारानें दुय्यम असत्यें निर्माण करून वस्तुजातांतील सत्य झांकून टाकावयाचें असा, 'मी'चा उद्योग चालतो. 'मी'च्या इतरांशी होणाऱ्या संबंधांतून निर्माण झालेलीं 'मी'ची ही दुय्यम असत्येंच आम्हांला व्यावहारिक सत्यें म्हणून कामाला येतात; कामाला आणावी लागतात.
मानसिक आणि इंद्रियमूलक ज्ञान सध्यां कोणत्या प्रकारें आपल्याला मिळतें, त्याचा स्वभाव काय हें आपण पाहिलें. त्यावरून आपणांस हें कळेल कीं, आज आपल्या ज्ञानप्राप्तीला ज्या मर्यादा आहेत, त्या मर्यादा अनिवार्य आहेत असें मुळींच नाहीं. या मर्यादा विकासक्रमांत उत्पन्न झाल्या आहेत. या विकासक्रमांत मनाला अशी संवय झाली आहे कीं, भौतिक जगाशीं संबंध आणावयाचा, तर विशिष्ट शारीर क्रिया-प्रतिक्रिया यांचें सामान्यतः साह्य घेत जावें. परंतु असें असलें, तरी जगाचा अनुभव घेण्यासंबंधींचा आपला जो सामान्य नियम आहे, तो निसर्गाचा अटळ नियम नसून तो केवळ आम्हांवर सत्ता चालविणाऱ्या, पण आम्हांस दूर करतां येण्यासारख्या संवयींचा आम्हांवरील नियमित जुलूम आहे, हें आम्हीं विसरतां कामां नये. बाह्य जगाचें ज्ञान व्हावें असें जेव्हां आम्हांला वाटतें, तेव्हां तें ज्ञान आम्ही अप्रत्यक्षपणें ज्ञानेंद्रियांचे द्वारां मिळवितो, तसेंच तें आम्हांस मिळवावें लागतें; आणि यामुळें वस्तूंविषयीं व मनुष्यांविषयीं ज्ञानेंद्रियें कळवितील तितकेंच
पान क्र. १२०
सत्य आम्हांला कळूं शकतें. स्थूल भौतिक इंद्रियांच्या जुलमामधून स्वत:ची सुटका करून घेण्याची मनाची तयारी असेल, किंवा त्याची समजूत घालून तशी त्याची तयारी करतां येण्यासारखी असेल, तर स्थूल इंद्रियांच्या साह्याशिवाय इंद्रियांच्या विषयांचे ज्ञान प्रत्यक्षपणें मनाला करून घेतां येईल, नव्हे हा त्याचा स्वाभाविक धर्म आहे. संमोहनविद्येच्या प्रयोगानें घडलेलें संमोहन (Hypnosis) आणि त्यासारखे दुसरे मानसिक अवस्थाविशेष हे मनाच्या या स्वभावधर्माचा प्रत्यय आणून देतात. आमच्या जागृत अवस्थेंतील जाणिवेच्या व्यवहाराला बंधन असतें, मर्यादा असते; एकंदर जीवनाच्या विकासांत मन आणि जड-शरीर यांचें जें नातें उत्पन्न झालेलें आहे, त्या नात्याच्या मर्यादा जागृत मनाला पाळाव्या लागतात; त्या नात्यानेंच जागृत मनाची अनुभवशक्ति निर्मिलेली आहे व नियमित केलेली आहे. म्हणून जागृत मनाला जगांतील वस्तूंचे व घटनांचे प्रत्यक्ष ज्ञान करून घेणें सामान्यत: असंभव असतें. जागृत मनाची जागृति दूर करून त्याला सुप्त अवस्थेंत नेतां आलें, तर खरें मन -- जागृत मनाच्या तळाशीं असलेलें मन (Subliminal mind) -- काम करण्यास मोकळें होतें व त्याला जगाचें प्रत्यक्ष ज्ञान करून घेतां येतें. जागृत अवस्थेंत काम करीत असतां देखील, मनाला जगाचें ज्ञान प्रत्यक्षपणें घेतां येणें ही गोष्ट अवघड आहे, पण अशक्य मात्र नाहीं. कांहीं विशिष्ट मार्गांनीं ज्यांनीं मनावर बरेच प्रयोग केले आहेत त्यांना ही गोष्ट ठाऊक आहे. सामान्यत: मात्र, जागृत मन सुप्तावस्थेंत नेले म्हणजे 'खरें मन' आपला नैसर्गिक विशेष दाखवितें; त्याचा विशेष हाच कीं, तेंच एकमेव अनुभव घेणारें परिपूर्ण शक्तीचें इंद्रिय आहे आणि इंद्रियांचे जे विषय आहेत त्यांच्या बाबतींत आपली मिश्र आणि परतंत्र क्रिया उपयोगांत न आणतां, शुद्ध आणि स्वतंत्र क्रिया तें उपयोगांत आणूं शकतें, व आणतें आणि इंद्रियांच्या विषयाचें ज्ञान इंद्रियांच्या उपयोगावांचून प्रत्यक्षपणें करून घेतें.
इंद्रियसंलग्न मन (Sense mind) जी शुद्ध, स्वतंत्र क्रिया करतें, त्या क्रियेचा उपयोग करून आपल्याला उपलब्ध असलेल्या पांच इंद्रियांवेगळें इंद्रिय किंवा इंद्रियें तें निर्माण करूं शकते. उदाहरणार्थ, आपण हातांत धरलेल्या कोणत्याहि पदार्थाचें वजन कोणतेंहि स्थूल साधन उपयोगांत न आणतां अगदीं बरोबर ओळखण्याची शक्ति असलेलें इंद्रिय आपल्याला आपल्या अंतरांत अस्तित्वांत आणतां येतें. शुद्ध स्वतंत्र बुद्धि ज्याप्रमाणें कार्यारंभापुरतां इंद्रियांचा अनुभव स्वीकारते, त्याप्रमाणें या
पान क्र. १२१
वजन ओळखण्याच्या कार्यांत स्पर्श आणि दाब अनुभवणारें इंद्रिय केवळ कार्यारंभापुरतें उपयोगांत आणलें जातें. वजनाचा हिशोब स्पर्शेंद्रिय कांहीं मनाला सांगू शकत नाहीं; मन आपल्या स्वतंत्र क्रियेनेंच हा हिशोब बरोबर करतें, स्पशेंद्रियाचा उपयोग केवळ वस्तूशीं संबंध येण्यापुरता तें करतें. शुद्ध स्वतंत्र बुद्धि आणि शुद्ध स्वतंत्र मन या दोघांचें या बाबतींत साम्य हें आहे कीं, इंद्रियांचा अनुभव आरंभासाठीं घेऊन पुढें बुद्धि आपला सिद्धांत आणि मन (इंद्रियसंलग्न मन) आपला अनुभव, इंद्रियांच्या अनुभवापासून अगदीं वेगळाच नव्हे तर, त्या अनुभवाच्या अगदीं उलट स्वरूपाचा असा निश्चित करतें. ही ज्ञानाची व अनुभवाची शक्ति, सामान्य शक्तीच्या पुष्कळ पुढें आहे; आणि ही पुढारलेली, वाढलेली शक्ति वस्तूंच्या केवळ बाह्य अंगालाच स्पर्श करीत नसून वस्तूच्या पोटांतील गोष्टीहि जाणूं शकते. उदाहरणार्थ, दुसऱ्यांच्या मनांत काय विचार, काय भावना आहेत त्या जाणणें, आत्मसात् करणें हें देखील स्वतंत्र मनाला शक्य असतें. मनुष्य काय बोलतो, काय हावभाव करतो, काय कृति करतो, चेहेऱ्यावर काय भाव दाखवितो इकडे न पाहतां, या गोष्टींची बिलकुल दखल न घेतां, नव्हे या गोष्टी अंशत: भावदर्शन घडवीत असतील किंवा मिथ्या भावदर्शन घडवीत असतील तरीहि, स्वतंत्र मन समोरच्या मनुष्याच्या मनांतील खऱ्या हालचाली जाणूं शकतें. या कार्यांत आरंभाला इंद्रियांच्या द्वारां बाह्य वस्तूंचा, मनुष्याचा संपर्क होण्याची मात्र आवश्यकता असते. मनाची ज्ञानशक्ति या पलीकडेहि वाढू शकते. ज्याप्रमाणें स्थूल इंद्रियांचा आरंभीं उपयोग करून समोरील वस्तूंचें बाह्य अंग व अंतरंग मन पाहूं शकतें, त्याप्रमाणें मनुष्यांतील सूक्ष्म इंद्रियें, व सूक्ष्म इंद्रियशक्ति यांचा स्वतंत्रपणेंहि तें उपयोग करूं शकतें. इंद्रियशक्तींची स्थूल व सूक्ष्म किंवा शारीर व मानस अशी दोन प्रकारची कामगिरी असते. बाह्य जगांतील जीवनाकरितां स्थूल इंद्रियशक्तीचा आम्ही उपयोग करतो. आमची जी बाह्य भौतिक परिस्थिति आहे, तिचें ज्ञान आम्हांला बाह्य इंद्रियांनीं होतें. परंतु वस्तूंना जसें बाह्य अंग आहे, तसें अंतरंगहि आहे. या अंतरंगाचें ज्ञान सूक्ष्म इंद्रियांनी आम्हांला करून घेतां येतें. भौतिक स्थूल मनाला या पुढारलेल्या इंद्रियशक्ती अविश्वसनीय वाटतात, या शक्तींच्या कार्याबद्दल त्याला शंका वाटते; कारण आमच्या नेहमींच्या संवयीची जी अनुभवाची व जीवनाची पद्धति आहे, तिच्या दृष्टीनें या शक्ती असामान्य, अपवादात्मक आहेत. या शक्ती कामाला लावावयास कठीण जातें,
पान क्र. १२२
त्यांची व्यवस्था लावणें त्यापेक्षां कठीण आहे व म्हणून अनुभवाचें एक व्यवस्थित, निश्चित, उपयुक्त साधन या शक्ती होऊं शकत नाहींत. असें असलें तरी त्या आहेत हें मान्य करावें लागतें, कारण आमची जी सामान्य कार्यकारी वरवरची जाणीव आहे, ती लहानशा क्षेत्रांत कामास येते -- हें क्षेत्र वाढविण्याचा जो स्वयंस्फूर्त अव्यवस्थित लहरी प्रयत्न किंवा सशास्त्र नियमबद्ध व्यवस्थित शिस्तीचा खटाटोप करण्यांत येतो, त्या प्रयत्नाचा परिणाम म्हणून वर उल्लेखिलेल्या विस्तृत कार्यकारी मानसिक अनुभवशक्ती निश्चितपणें अस्तित्वांत येतात.
परंतु केवळ 'बुद्धि ग्राह्य' अशीं जीं 'अतीन्द्रिय' सत्यें आहेत, त्यांचा मानसिक अनुभव या वरील पुढारलेल्या शक्तीनींहि आम्हांला मिळत नाहीं; आणि तें तर आमचें उद्दिष्ट आहे. या पुढारलेल्या शक्ती आम्हांला आमचें ऐंद्रिय अनुभवाचें क्षेत्र मोठें करून देतात, आणि इंद्रियग्राह्य वस्तूंचा व घटनांचा अनुभव घेण्याची, त्यांचें निरीक्षण करण्याची सामान्य साधनांपेक्षां अधिक परिणामकारक साधनें आमच्या तैनातीस देतात; एवढेंच त्या आमच्याकरितां करूं शकतात. पण सत्य किंवा वस्तूंचें सत्यस्वरूप नेहमींच इंद्रियांच्या कक्षेच्या पलीकडे असतें. तथापि, विश्वाच्या घटनेचा असा एक अंगभूत नियम आहे कीं, बुद्धीला ग्राह्य होण्यासारखीं सत्यें ज्या ठिकाणीं आहेत, त्याच बुद्धिसंपन्न शरीरसंस्थेंत तीं बुद्धीनें शोधून काढलेलीं सत्यें अनुभवावयाचें कांहींतरी साधन असलेंच पाहिजे. आमच्या मनयुक्त शरीराच्या ठिकाणीं असलेल्या, अनुभव घेण्याच्या अनेक शक्ती आपण पाहिल्या. आतां बुद्धीच्या सत्यांचा अनुभव देणारी जी एक शक्ति त्याचे ठिकाणीं आहे, तिचा आपण विचार करूं. आपल्या अस्तित्वाचें ज्ञान आपल्याला कसें होतें ? मन अस्तित्वाशीं एकरूप होतें, तादात्म्य पावतें आणि मग 'मी आहे' असें ज्ञान होतें. एकरूपता किंवा तादात्म्य हें जें ज्ञानाचें साधन आहे, त्याचा विकास किंवा विस्तार करून बुद्धिसंस्थापित सत्यांचा अनुभव आपल्याला घेतां येईल. आपल्या आंत काय काय आहे त्यांचें ज्ञान आपल्याला होतें, याचें कारण 'आपण आहोंत' ही अनुभूति आपल्या मनासमोर कमी अधिक स्पष्टपणें जागृत असते, उपस्थित असतें हें आहे. या गोष्टी सामान्य सूत्रानें सांगावयाच्या, तर असें म्हणतां येईल कीं, पात्राच्या ज्ञानांत, पात्रगत वस्तूचें ज्ञान अंतर्भूत असतें. तेव्हां आपल्या स्वत: संबंधींच्या जाणिवेची जी शक्ति आपल्या मनाला उपलब्ध आहे, ती वाढवून आमच्या
पान क्र. १२३
बाहेर आमच्या पलीकडे असलेल्या, उपनिषदांत वर्णिलेल्या आत्म्याच्या, ब्रह्माच्या अनुभवाचें साधन जर तिला आम्ही नित्य करूं शकलों, तर ब्रह्माच्या पोटीं जी विश्वांतील सत्यें आहेत, त्यांचा अनुभव आम्हांला येईल. त्यांचें केवळ बुद्धिगत ज्ञान आम्हांपाशीं आहे, असें न होतां त्यांच्या अनुभूतीचा आम्हांला लाभ होऊन त्या सत्यांचे दुहेरी धनि आम्ही होऊं. या अनुभवाच्या शक्यतेच्या पायावरच भारतांतील वेदान्त उभारलेला आहे. ब्रह्माच्या ज्ञानाच्या द्वारां विश्वाचें ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न भारतीय वेदान्तानें केला आहे.
परंतु मनाचा अनुभव आणि बुद्धीचा सिद्धांत कितीहि श्रेष्ठ श्रेणीचा असला, तरी सर्वोच्च स्वयंभू तादात्म्य किंवा एकात्मता, एकरसता, एकता त्या अनुभवांत किंवा सिद्धांतांत अंतर्भूत होत नाहीं, या सर्वोच्च एकरसतेचें प्रतिबिंबच केवळ त्या मानसिक तादात्म्यांत असतें किंवा दिसतें इतकेंच, असा वेदांताचा सिद्धांत आहे. सर्वोच्च एकरसतेसाठीं आम्हांला मनाच्या आणि बुद्धीच्या पलीकडे जावें लागतें. जागृतींत काम करणाऱ्या आमच्या जाणिवेंत जी बुद्धि क्रियाशील असते ती बुद्धि मध्यस्थासारखी आहे. आम्ही आमच्या उर्ध्वगति-विकासक्रमाला ज्या 'अर्धजागृत अर्धमनस्क सर्वांतून' (Subconscient All) सुरुवात केली आहे आणि या विकासाची गति ज्या 'अतिमानसिक सर्वाकडे' (Superconscient All) आम्हांला घेऊन जात आहे, त्या दोन सर्वात्मक वस्तूंमध्यें मध्यस्थाचें काम आमची जागृत अवस्थेंतील बुद्धि करीत आहे. एकाच सर्वात्मक महावस्तूच्या दोन अवस्था, दोन साकार मूर्ती 'अर्धमनस्क सर्व' आणि 'अतिमानसिक सर्व' या वस्तू आहेत. 'अर्धमनस्क सर्वांत' प्राणमयता-जीवता (Life) ही प्रधान गोष्ट आहे, 'अतिमानसिक सर्वाची' प्रधान गोष्ट प्रकाश किंवा ज्ञान (Light) ही आहे. 'अर्धमनस्क सर्वांत' ज्ञान किंवा जाणीव क्रियेच्या आंत सुप्त किंवा गुप्त असते. ती क्रियेचा पडदा वापरते. क्रिया हें 'जीवते'चें सार-तत्त्व आहे; 'अतिमानसिक सर्वांत' क्रिया प्रकाशाच्या पोटांत सुप्त किंवा गुप्त किंवा पडद्याआड होते. ती प्रकाशांत किंवा ज्ञानांत लपून जाते. तेथूनच ती निघालेली असते, व तेथेंच ती विकासक्रमानें परत जाते. त्या क्रियेंत कांहीं ज्ञान गुप्त वा सुप्त असत नाहीं. ती क्रियाच परमोच्च जाणिवेंत गुप्त होते, अंतर्हित होते. 'अर्धमनस्क आणि अतिमनस्क सर्व किंवा विश्व', या दोहोंना 'अंत:स्फूर्त ज्ञान (Intuitional Knowledge) कार्यकारी म्हणून सारखेच
पान क्र. १२४
उपलब्ध असतें. अंतःस्फूर्त ज्ञानाचा पाया ज्ञानपुरस्सर तादात्म्य किंवा एकात्मता -- ज्ञेय आणि ज्ञाता यांजमधील ज्ञानपुरस्सर संपूर्ण कार्यक्षम प्रभावी एकात्मता -- हा असतो; ज्ञेयाचें अस्तित्व व ज्ञात्याचें अस्तित्व एकरूप, अभिन्न असतें अशी ही अवस्था असते. या अवस्थेंत ज्ञाता ज्ञानानें ज्ञेयाशीं एकरूप झालेला असतो. 'अर्धमनस्क विश्वात', क्रियेच्या द्वारां कार्यक्षमतेच्या द्वारां, अंतःस्फूर्त ज्ञान व्यक्त होतें, आणि ज्ञान किंवा ज्ञान-पुरस्सर एकात्मता पूर्णतया किंवा कमी अधिक प्रमाणांत क्रियेच्या पोटांत लपलेली असते. उलट पक्षीं, 'अतिमानसिक विश्वांत', प्रकाश किंवा ज्ञान हें प्रधान तत्त्व आणि प्रधान व्यवहारनियम असल्यानें अंत:स्फूर्त ज्ञान आपल्या नैसर्गिक, खऱ्या स्वरूपांत प्रकट होतें; अर्थात् 'ज्ञानपुरस्सर तादात्म्यानें उदय पावलेलें ज्ञान', या स्वरूपांत तें प्रकट होतें. येथें फलद्रूप क्रिया, ही या ज्ञानाचा स्वाभाविक सहचर म्हणून किंवा स्वाभाविक परिणाम म्हणून आपल्या अनुभवास येते; अर्धमनस्क विश्वांत प्रधान वस्तु म्हणून क्रिया जो मुखवटा वापरीत असते, तो मुखवटा 'अतिमानसिक विश्वांत' तिला वापरता येत नाहीं. येथें प्रधान वस्तु ज्ञान हीच असते. या दोन अवस्थांच्या मध्यें मन आणि बुद्धि (mind and reason) मधल्या कारभाऱ्यांचें काम करतात. व्यक्तीनें क्रियेच्या कोंडवाड्यांतून ज्ञानाला मुक्त करावे आणि त्या ज्ञानाचा अग्रेसरत्वाचा, पहिल्या मानाचा जो हक्क आहे, तो त्याला परत वापरतां येईल अशी त्याची तयारी करावी, यासाठीं मन आणि बुद्धि हे मधले कारभारी, व्यक्तीला यशस्वितेनें मदत करतात. मनाचे ठिकाणीं जी आत्म-जाणीव, 'मी आहे' ही जाणीव असते, ती कोणत्याहि वस्तूला किंवा व्यक्तीला, स्वत:च्या आत्म्याला आणि दुसऱ्या आत्म्याला, वस्तूच्या किंवा व्यक्तीच्या अंतरांतील गोष्टींना जाणून घेण्यासाठीं उपयोगांत आणली जाते व या सर्व बाबतींत तादात्म्यानें ज्ञान मिळवितां येतें. पण हें मनाचें तादात्म्य सर्वोच्च स्वयंभू तादात्म्य नसून, प्रतिबिंबरूप असतें असें वर सांगितलें आहे. हें मनाचें तादात्म्य आपला दर्जा ज्ञानानें वाढवीत वाढवीत, प्रकाशमय स्वयंभू तादात्म्य झालें, म्हणजे बुद्धि देखील आपला दर्जा वाढवून स्वयंप्रकाशी अंतःस्फूर्त ज्ञानाचें रूप घेते. आमच्या ज्ञानाची ही सर्वश्रेष्ठ अवस्था आहे. येथें मन विकास पावून अतिमन, अतिमानस (विज्ञान) होऊन पूर्णतेला पोहोंचलेलें असतें.
अगदीं जुन्या वेदान्ताचे सिद्धान्त मानवी जाणिवेच्या ज्या रचनेवर आधारलेले आहेत, ती रचना वरील प्रकारची आहे. या रचनेचा पायावर
पान क्र. १२५
प्राचीन ऋषींनीं उभ्या केलेल्या सिद्धांतांची चर्चा करून, त्यांचें युक्तिसंगतत्व स्थापित करण्याचा उद्देश मजपुढें नाहीं. तथापि त्यांच्या मुख्य सिद्धान्तांपैकीं कांहीं सिद्धांतांचें संक्षिप्त समालोचन मला करावयास हवें. आपण सध्यां दिव्य जीवनाचा प्रश्न आपल्यासमोर ठेवला आहे, त्या प्रश्नाशीं या वेदांती सिद्धांतांचा जेवढा संबंध येतो, तेवढ्यापुरतेच हे सिद्धान्त मी तपासणार आहे. जी दिव्य जीवनाची इमारत नव्यानें पुन: उभी करावयाची आहे, तिच्या पहिल्या पायाच्या ठिकाणीं आम्हांला या सिद्धांतांत मांडलेल्या कल्पना उत्तम प्रकारें उपयोगी पडतील. आतां ही गोष्ट खरी आहे कीं, सर्वत्र ज्ञानाचे बाबतींत जें करावें लागतें, तें या बाबतींतहि करावें लागेल. अर्थात् जुन्या सिद्धान्ताची जुनी भाषा बदलून त्या ठिकाणीं आजच्या मानसिक अवस्थेला जुळणारी नवी भाषा वापरावी लागेल; तसेंच जो नवा प्रकाश उपलब्ध झालेला आहे, त्या प्रकाशांत जुना प्रकाश अंतर्भूत करून आपलें काम करावें लागेल. केवळ कालच्या उषःकालीं उपलब्ध असलेल्या ज्ञानावर विसंबून काम करणें चुकीचें, प्रतिगामीपणाचें असतें. तथापि जुनें ज्ञान धि:कारणें हेंहि चुकीचें असतें. जुनें ज्ञान किंवा त्यापैकीं जेवढें आज हस्तगत करतां येईल तेवढें ज्ञान, आमचें आरंभीचें भांडवल म्हणून आम्हीं उपयोगांत आणणें, जुन्या ज्ञानाचा आमच्या वांट्याला आलेला खजिना जेवढा हातीं येईल तेवढा, प्रारंभीच्या भांडवलासारखा वापरणें, हेंच आमच्या हिताचें होईल. हें भांडवल आम्हीं कामास लावलें, तर नित्य नव्या होणाऱ्या, बदलणाऱ्या, व नित्य जुन्या कायम स्वरूपाच्या राहणाऱ्या अनंताशीं आम्ही जो व्यवहार करणार, त्या व्यवहारांत आम्हांला अधिकांत अधिक लाभ निश्चितपणें होईल.
वेदांतानें विश्वाचें जें विश्लेषण केलें, त्यांत जी शेवटली गोष्ट त्याला आढळली, ती सद्ब्रह्म ही होय. सद्ब्रह्म म्हणजे शुद्ध, अलक्षण, अनंत, असीम अस्तित्व. विश्वांतील ज्या आकारांनी आणि गतींनीं दृश्य सत्याचा पसारा बनलेला आहे, त्यांच्या पाठीमागें, त्यांच्या पलीकडे, त्यांच्या पोटांत जी मूळ पायाभूत आदिम सत्य-वस्तु वेदान्ती अनुभवाला उपलब्ध झाली, ती म्हणजे हें वर उल्लेखिलेलें सद्ब्रह्म होय. हें उघड आहे कीं, सद्ब्रह्म या वस्तूची कल्पना विश्वाच्या मुळाशी ठेवणें, ही गोष्ट कांहीं आमची सर्वसाधारण जाणीव करूं शकत नाहीं. आमचा सर्वसाधारण अनुभव, आमची सर्वसाधारण जाणीव ज्या गोष्टी जाणते, किंवा जाणूं शकते, त्यांच्या पलीकडील, सर्वथा त्यांच्या
पान क्र. १२६
कक्षेबाहेरील अशी सद्ब्रह्म ही वस्तु किंवा कल्पना आहे. आमचीं ज्ञानेंद्रियें, आमचें मनाचें इंद्रिय कसल्याहि शुद्ध असीम अस्तित्वाविषयीं कांहीं देखील जाणत नाहीं. रूप आणि गति या विषयींचा इंद्रियांचा अनुभव आम्हांस कांहीं सांगूं शकतो, सांगतोहि. रूपांना अस्तित्व आहे पण हें अस्तित्व शुद्ध अस्तित्व नव्हे, नेहमींच तें मिश्र असतें; संयुक्त, सांघिक, संबंधमय असतें. आम्ही आमच्या अंतरांत शिरलों, तर विशिष्ट निश्चित रूप आम्ही दूर करूं शकतो परंतु गति कांहीं आम्ही दूर करूं शकत नाहीं; बदलण्याची क्रिया कांहीं आम्ही दूर करूं शकत नाहीं. अवकाशांत जडद्रव्यानें गतियुक्त राहणें व कालाच्या ओघांत रूपांतरावर रूपांतर होत राहणें, अर्थात् रूपांतराचें चक्र फिरत राहणें, या दोन अनिवार्य गतींवर आमच्या अस्तित्वाचा पाया रचलेला दिसतो. वाटल्यास आम्ही असें म्हणूं शकतों कीं, ही दोन प्रकारची गति हेंच अस्तित्व आहे आणि 'शुद्ध अस्तित्व' ही कल्पना, शोधून सांपडण्यासारख्या सत्याची कल्पना नाहीं. एवढेंच कीं, आमच्या स्वत:च्या जाणिवेची - आत्मभानाची (Self-consciousness) जी घटना आहे, तिच्यांत किंवा तिच्या पाठीमागें केव्हांहि न हलणारें, न बदलणारें, जन्ममृत्यूच्या पलीकडे असलेलें, क्रिया, रूप, रूपांतर (बदल) यांच्या कक्षेबाहेरचें असें कांहींतरी तत्त्व आम्हांला क्षणभर केव्हां केव्हां ओझरतें दिसतें, व तें 'कांहींतरी' वस्तुत: आम्हीच आहोंत अशी अंधुक अनुभूति किंवा कल्पना आम्हांला होते. हा एक आत्मभानाचा दरवाजा आमच्या अंतरंगात असून, तो केव्हां केव्हां एकदम उघडतो आणि त्याच्या पलीकडे असलेल्या तेजस्वी सत्याचें दर्शन आम्हांला घडवितो; तो एकदम बंद होण्यापूर्वीं त्या तेजस्वी सत्याचा एखादा प्रकाशमय किरण, स्वयंप्रकाश-किरण आम्हांला स्पर्श करूं शकेल इतका वेळ उघडाहि राहतो. हा किरण आम्हांला स्वच्छ सत्यज्ञान देतो; स्वयंप्रकाश सत्यज्ञान आंतून मिळेल अशी जणुं अगत्याची सूचना देतो. आमची श्रद्धा बलवान् असेल, तर आम्ही हें क्षणभर लाभलेलें सत्याचें ज्ञान, अंतर्ज्ञान, आमच्या पकडींत घट्ट धरून ठेवूं शकतो आणि या अंतर्ज्ञानाच्या (Intuition) किरणाच्या आधारावर, या अंत:स्फूर्त ज्ञानानुसार जीवन जगण्याचा उपक्रम करून, सामान्य इंद्रियनिष्ठ मानसज्ञानाचें आमच्या जीवनांतील प्राबल्य कमी करण्याच्या मागें लागूं शकतो.
आम्हीं बारकाईनें आमच्या अंतरंगाची तपासणी केली, तर असें दिसून येतें कीं, आमचा पहिला गुरु अंतर्ज्ञान (Intuition) आहे. आमच्या
पान क्र. १२७
मनाच्या क्रिया चालूं असतात, तेव्हां या क्रियांच्या पाठीमागें अंतर्ज्ञान दडलेलें असतें. अज्ञात सत्याच्या अंतर्गृहांतून त्या सत्याचे जे तेजस्वी संदेश हें अंतर्ज्ञान आणून देते, त्या संदेशापासून मनुष्याला होणाऱ्या उच्च श्रेणीच्या ज्ञानप्राप्तीस आरंभ होतो. हा संदेशांचा संपर्क मनुष्याच्या मनाला झाल्यानंतरच बुद्धि या सोनेरी पिकांतलें आपल्याला काय मिळेल हें पहाण्याकरतां त्याच्या सान्निध्यांत येते. आम्ही आज काय आहोंत, आम्ही काय असल्यासारखे दिसतो, या संबंधींचें ज्ञान आम्हांला आहे. हें जें कांहीं आम्ही आहोंत किंवा असल्यासारखे दिसतो, त्याच्या पाठीमागें, पलीकडे असलेल्या थोर सत्याची अस्पष्ट कल्पना आम्हांला अंतर्ज्ञान करून देतें. आमची खालच्या पातळीवर काम करणारी बुद्धि आणि आमचा सामान्य अनुभव ह्यांनीं, ही अंतर्ज्ञानानें दिलेली कल्पना खोटी आहे, असें अट्टाहासानें सांगतलें, तरी ती कल्पना आमची पाठ सोडीत नाहीं; आम्हांला अस्पष्ट असणारी ती कल्पना आम्हीं स्पष्ट करून घ्यावी म्हणून अंतर्ज्ञान आम्हांला आंतून पुन: पुन: प्रेरणा देतें आणि या प्रेरणेनुसार आम्ही आमच्या मनाच्या समजुतीसाठीं ईश्वर, अमर जीवन, स्वर्ग, या आणि अशासारख्या भावात्मक स्पष्ट कल्पनांच्या द्वारां तें सत्य व्यक्त करतों. अंतर्ज्ञान हें निसर्गाइतकेंच बलवान् आहे. निसर्गाच्या आत्म्यांतून त्याचा उदय होतो; आमची बुद्धि किंवा आमचा अनुभव यांनी त्याच्या विरुद्ध कितीहि सांगितलें, तरी अंतर्ज्ञान त्याची पर्वा करीत नाहीं. वस्तुत: काय आहे, काय सत्य आहे, त्याचें पूर्ण ज्ञान अंतर्ज्ञानाला असतें. कारण तें स्वत: त्या सत्याचा अविभाज्य भाग असतें, त्या सत्यापासूनच तें आलेलें असतें. अर्थात् जें मूळ सत्य नसून केवळ त्याची एक दुय्यम रचना आहे, एक दुय्यम दृश्य आहे अशा मनाची, बुद्धीची त्या सत्यासंबंधींची वाटेल ती कल्पना असली, तरी त्या कल्पनेला मान तुकवून अंतर्ज्ञान आपली सत्याची दृष्टि सोडीत नाहीं. बाह्य अस्तित्वासंबंधीं नव्हे, तर अस्तित्वांत असणाऱ्या महान् सत्य-वस्तूसंबंधानें अंतर्ज्ञान आम्हांला कांहीं सांगतें. आमच्या आत्मभानाच्या प्रसंगीं केव्हां केव्हां जो श्रेष्ठ दरवाजा उघडतो व आम्हांला श्रेष्ठ प्रकाशाचा किरण वा कण क्षणभर कां होईना दाखवितो, तो त्या महान् सत्यवस्तूचाच किरण वा कण असतो. मूळ सत्याचें तें अविभाज्य अंगच असतें. या अंतर्ज्ञानाच्या संदेशाला प्राचीन वेदान्तानें आत्मसात् केलें आणि तीन महावाक्यांत त्यांनीं हा संदेश सूत्रबद्ध केला : ''सोऽहमस्मि'' (मी तो पुरुष आहे - ईशावास्य), ''तत् त्वमसि श्वेतकेतो''
पान क्र. १२८
(हे श्वेतकेतू, तें सत्य, तो आत्मा तूंच आहेस - छांदोग्य), ''सर्वं हि एतद् ब्रह्म'' ''अयमात्मा ब्रह्म'' (हें सर्वच ब्रह्म आहे, हा आत्मा ब्रह्म आहे - मांडूक्य).
परंतु आमच्या स्वभावाला ज्या व्यवस्थित स्पष्ट स्वरूपांत सत्याची मांडणी हवी असते, तशा स्वरूपांत अंतर्ज्ञान आम्हांला सत्य पुरवीत नाहीं, पुरवूं शकत नाहीं. कारण तें आम्हांमध्यें पडद्याआडून कार्य करतें, आमच्या अस्तित्वाचा जो भाग प्रकाशहीन, अस्पष्ट रचनेचा आहे, त्याठिकाणींच प्रधानत्वानें अंतर्ज्ञान काम करीत असतें. पडद्याच्या दुसऱ्या बाजूला उजेड आहे, पण तो आमच्या जागृतीचा उजेड, थोड्या क्षेत्रांतच आहे व थोड्या तेजाचा आहे, आणि या ठिकाणीं अंतर्ज्ञानाला जीं साधनें आपलें काम करण्यासाठीं मिळतात, तीं साधनें त्या ज्ञानाचें सांगणें नीट व पुरतें समजण्याच्या योग्यतेचीं नाहींत. अंतर्ज्ञानाकडून आम्हांला प्रत्यक्ष ज्ञान पुरतेपणीं मिळावयास, त्यानें पडद्याआडून काम करणें सोडून, आमच्या अंतरांतून वर येऊन, वरच्या पृष्ठभागाच्या अस्तित्वांत आपली संघटना करावयास हवी आणि आमच्या अस्तित्वाच्या या वरच्या थरांत अग्रभागीं राहून नेतेपण करावयास हवें. सध्यां या थरांत बुद्धीची संघटना आहे आणि ती आम्हांला आमच्या अनुभवांची, विचारांची, कृतींची व्यवस्था लावण्यास मदत करते. अगदीं प्राचीन उपनिषदांतील वेदान्ती विचार अंतःस्फूर्त ज्ञानाच्या युगांतील आहेत. हें अंतर्ज्ञानाचें युग कांहीं कालानें संपलें व त्याच्यानंतर बुद्धिनिष्ठ ज्ञानाचें युग आलें. अंतर्ज्ञानावर, अंत:श्रवणावर आधारलेली श्रुति मागें पडून अतिभौतिक आध्यात्मिक तत्त्वज्ञानाला प्राधान्य आलें. नंतर तेंहि आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचें युग संपून प्रायोगिक भौतिक शास्त्राचें युग आलें. अंतःस्फूर्त ज्ञान, अंतर्दृष्टीनें दिसलेला विचार, हा अतिमानस क्षेत्रांतून आलेला दूत असतो. अर्थात् आमची सर्वश्रेष्ठ ज्ञानशक्ति ही अंतर्दृष्टीचीच शक्ति आहे. तथापि तिचें युग संपून शुद्ध बुद्धीनें तिची जागा घेतली; ही बुद्धि एक प्रकारें अंतर्ज्ञानाच्या अनुपस्थितींत त्याचें काम करणारी दुय्यम दर्जाची कारभारी आहे; तिचें स्थान आपल्या अस्तित्वाच्या सर्वोच्च पातळीवर नसून, मधल्या पातळीवर आहे. या दुय्यम कारभाऱ्याचें युगहि मागें पडून कांहीं काळ मिश्र बुद्धीचे दिवस आले. ही मिश्रबुद्धि आमच्या नेहमींच्या परिचयाच्या मैदानांत (फार उंच ठिकाणीं नव्हे) किंवा थोड्याशा उंचीवर काम करते; भौतिक स्थूल मन, स्थूल इंद्रियें आणि त्यांना मदत करणारीं जीं
पान क्र. १२९
यंत्रें-तंत्रें आम्हांला आमच्या शोधक शक्तीनें सांपडतात, बनवितां येतात, त्या यंत्रतंत्रांच्या अनुभवाच्या क्षेत्रापलीकडे आमची मिश्रबुद्धि काम करूं शकत नाहीं. प्रथम दर्शनीं असें वाटतें कीं, ही गति 'अधोगति' आहे, उंच ठिकाण सुटून खालीं खालीं घसरणें आहे. परंतु वस्तुत: ही गति अधोगति नसून चक्रगति आहे; प्रगमनाची चक्रगति आहे, प्रगतीचें चक्र आहे. अंतर्ज्ञान, शुद्धबुद्धि, मिश्रबुद्धि या ज्ञानशक्ती आमच्या ज्ञानाच्या क्षेत्रांत सर्वाधिकार किंवा मुख्याधिकार चालवीत असल्या, तरी जेव्हां प्रत्येक कनिष्ठ शक्ति तिच्या वरच्या श्रेष्ठ शक्तीच्या जागीं येते, तेव्हां त्या श्रेष्ठ शक्तीनें मिळविलेलें ज्ञान जेवढें आत्मसात् करितां येईल तेवढें करून, तें ज्ञान आपल्या विशिष्ट पद्धतीनें सिद्ध करण्याचा यत्न करीत असते. स्वभावत:च हें तिला करावें लागतें. तिजवर पडलेल्या या कार्यभारानें शेवटीं श्रेष्ठ शक्तींशीं सलोख्यानें वागण्याची तिची विनम्र बुद्धि व क्षेत्र वाढतें. या प्रकारें एकीमागून एक ज्ञानशक्ति कार्यकारी झाली नाहीं, आणि एका शक्तीला स्वभावत: लाभणारें ज्ञान दुसऱ्या कनिष्ठ शक्तीने आत्मसात् करण्याचा प्रयत्न केला नाहीं, तर आमच्या प्रकृतीच्या एका अंगाला आम्हांवर पूर्ण स्वामित्व करूं देणें आम्हांला अटळ होईल. आमच्या प्रकृतीचीं दुसरीं अंगें अविकसित राहतील, दडपलेलीं राहतील, दुसऱ्या श्रेष्ठ शक्तीच्या अयोग्य, अन्याय्य हुकमतींत राहतील; तीं आपापल्या क्षेत्रापुरतीच कार्यकारी राहिल्यानें विकास-दृष्टीनें मागासलेलीं रहातील. पण ह्या ज्ञानशक्ती एकीमागून एक क्रमवारीनें प्रधानत्वानें कार्यकारी झाल्यानें आणि प्रत्येकीला स्वतंत्र विकासयत्न करण्याची सवड मिळाल्यानें त्या सर्व शक्तींमध्यें समतोल अवस्था उत्पन्न होते, आमच्या ज्ञानांगांमध्यें अधिक पूर्ण मेळ राहण्यास मदत होते.
उपनिषदें कांहीं काल भारतांत सर्वाधिकारी राहिलीं. नंतर दर्शनांचा (भाष्यांतील तत्त्वज्ञानाचा) भारतांत उदय झाला, अर्थात् श्रेष्ठ ज्ञानशक्तीनंतर तिच्याहून कनिष्ठ ज्ञानशक्तीला ज्ञानक्षेत्रांत मुख्य अधिकार प्राप्त झाला. याप्रमाणें ज्ञानांगांत समतोलता व सुसंवाद सुप्रतिष्ठित, होण्यास साहाय्यक होणारें वर उल्लेखिलेलें क्रमवार सत्ता-संक्रमण भारतांत घडलेलें आहे. वेद आणि वेदांत ज्या ऋषींनीं आम्हांला दिला, ते ऋषि अंत:स्फूर्त ज्ञान आणि आध्यात्मिक अनुभव यांजवरच सर्वथा विश्वासून असत. उपनिषदांत मोठाले वाद व चर्चा असें जें केव्हां केव्हां अभ्यासक सांगतात, तें त्यांचें सांगणें चुकीचें आहे. वादाचा-संभाषणाचा प्रसंग कांहीं
पान क्र. १३०
उपनिषदांत दिसून येतो -- पण हा देखावाच असतो, खरोखरीचा वाद-विवाद नसतो. त्यांत सामान्य वादासारखी चर्चा नसते, एक पक्ष व त्यास विरोधी दुसरा पक्ष, असा कांहीं भाग नसतो व तर्कशास्त्रीय अनुमानपद्धतीहि तेथें नसते. त्या वादाचा देखावा असलेल्या संवादांत, संवाद करणारे सभ्य विचारक तत्त्वज्ञ, परस्परांच्या अंतर्दर्शनांचा, अंतरनुभवांचा पाढा वाचीत; त्यांची तुलना करीत; त्या तुलनेंत कमी प्रकाशमय दर्शन वा अनुभव, अधिक प्रकाशमय दर्शनाला वा अनुभवाला मान्यता व मान देत असे. दोन दर्शनांत वा अनुभवांत एक संकुचित वा कमी व्यापक, दुसरा अधिक व्यापक वा कमी संकुचित, एक सदोष वा अपूर्ण, दुसरा निर्दोष किंवा कमी सदोष वा अधिक पूर्ण, एक कमी सारस्पर्शी दुसरा अधिक सारस्पर्शी, असें तुलनेंत आढळून आलें म्हणजे अर्थात् दुसऱ्या दर्शनाला किंवा अनुभवाला पहिला अनुभव किंवा दर्शन मान देऊन दूर होत असे. या वेदवेदांतांतील संवादांत एक विचारक दुसऱ्याला, ''तुम्हांला काय अनुभव आहे ?'' असा प्रश्न विचारी; ''तुमचें मत काय आहे ? तुमच्या युक्तिवादानें तुम्ही कोणत्या निर्णयाला आलां आहांत ?'' असे प्रश्न विचारले जात नसत. वेदांतमान्य सत्याला किंवा सत्यांना आधार म्हणून तर्कशास्त्रीय युक्तिवाद केला आहे असें एकहि स्थळ उपनिषदांत नाहीं. वेद-वेदांतकालीन ऋषींचे असें ठाम मत दिसतें कीं, तर्कशास्त्रीय युक्तिवाद, अंत:स्फूर्त ज्ञानासंबंधानें न्यायाधीशपण करण्यास समर्थ असूं शकत नाहीं; अंतर्ज्ञान कमी किंवा अधिक निर्दोष किंवा पूर्ण असूं शकतें - अधिक पूर्ण अंतर्ज्ञानानें कमी पूर्ण अंतर्ज्ञानांतींल चूक दाखवावी, दुरुस्त करावी पण तर्कशास्त्राला या बाबतींत कसलाच अधिकार असूं शकत नाहीं.
तथापि अंतर्ज्ञानानें दाखविलेल्या सत्यासंबंधीं देखील मानवाची बुद्धि स्वतःचें समाधान करणारी बौद्धिक तर्कपद्धति उपयोगांत आणूं शकते व आणते आणि अशी सत्यासत्यनिर्णयपद्धति वापरून सत्य-असत्याची पारख करण्याचा अधिकार तिला नि:संशय आहे. भारतांतील अंतर्ज्ञानाचें युग संपून बुद्धीचें व बुद्धीनें अनुमान बांधण्याचें युग आलें, तेव्हां बुद्धीचा वर सांगितलेला अधिकार लक्षांत घेऊन भारतीय दर्शनकारांनीं, ते ज्या सत्याचा शोध करीत होते त्या सत्यासंबंधानें, अंतर्ज्ञान आणि बुद्धि या दोघांनाहि यथोचित मान व मान्यता देणारी द्विमुखी मनोवृत्ति धारण केली; कारण प्राचीनांनीं त्यांच्या हवालीं केलेल्या वारशाविषयीं, ज्ञान-धनाविषयीं त्यांना
पान क्र. १३१
परिपूर्ण आदर होता व बुद्धीलाहि ते योग्य मान देत होते. श्रुति ही अधिकारानें बुद्धीच्या वरची आहे, बुद्धिप्रामाण्याहून श्रुतिप्रामाण्य श्रेष्ठ आहे असें ते मानीत. प्राचीनकाळी अंतर्ज्ञानानें प्राप्त झालेलीं सत्यें श्रुतींत आहेत, किंवा श्रुतिग्रंथ हे अपौरुषेय, ईश्वरोपदिष्ट आहेत असें ते मानीत. तथापि श्रुतींत आढळणाऱ्या गोष्टीसंबंधानें ते बुद्धीलाहि आवाहन करीत. बुद्धि आपल्या तर्कपद्धतीनें जे सिद्धांत स्थापन करी, त्यांतील श्रुतिमान्य सिद्धांत तेवढे प्रमाण मानावयाचे, असा त्यांचा रिवाज असे; कारण सर्वश्रेष्ठ अधिकार श्रुतीचा, असा त्यांचा विश्वास होता. तेव्हां त्यांचें कांहीं सिद्धांत असे असत कीं, जे श्रुति आणि बुद्धि या दोहोंनाहि मान्य असत. तत्त्वज्ञानाकडून (metaphysics) एक पातक नेहमीं घडत असतें तें हें कीं, तें ढगावर बसून लढत असतें, बिनबुडाचा वाद घालण्याकडे त्याचा कल असतो; शब्द हे शब्द आहेत हे विसरून, जणुं कांहीं ते वास्तव आहेत, संशयरहित घटना आहेत असें धरून तें चालतें; शब्द म्हणजे वास्तव नसून केवळ प्रतीकरूप आहेत हें लक्षांत घेऊन, त्यांची काळजीपूर्वक तपासणी करणें आणि ज्या वास्तव गोष्टी आणि घटना ते दाखवतात असें समजलें जातें, त्या वास्तव आहेत कां, व असल्या तर कशा स्वरूपाच्या आहेत, हें नेहमीं तपासून पाहणें अवश्य आहे; अंतर्ज्ञाननिष्ठ श्रुतीला स्वतःप्रमाण मानून, श्रुतींतील सिद्धांतांना पोषक असा युक्तिवाद करण्याचें तर्कनिष्ठ बुद्धीला उत्तेजन देणाऱ्या भारतीय तत्त्वज्ञानानें, तत्त्वज्ञानाकडून (metaphysics) बिनबुडाचा वाद घालण्यानें घडणारें पातक बऱ्याच प्रमाणांत टाळलें. भारतीय तत्त्वज्ञ प्रथम प्रथम आपलीं अनुमानें बांधतांना, त्या अनुभवांचा मध्यवर्ति सारभूत भाग, श्रेष्ठतम व खोलांत खोल अनुभवाशीं जुळता ठेवण्याची काळजी घेत. बुद्धि आणि अंतर्ज्ञान-अंतःस्फूर्ति -- हीं दोन महान् प्रमाणस्थानें त्यांना मान्य असल्यामुळें, या दोन्हींकडून ज्या सिद्धांतांना मान्यता मिळे ते सिद्धांत, 'निश्चित सिद्धांत' समजून ते आपली शोधक बुद्धि चालवीत असत. परंतु तत्त्वज्ञांचा हा क्रम कांहीं काळानें बदलला; अंतर्ज्ञानाला आपणाहून श्रेष्ठ समजण्याचें व त्याचा दुय्यम कारभारी म्हणून काम करण्याचें तत्त्वत: मान्य असलेलें एका काळचें व्रत या बुद्धीनें सोडून दिलें आणि आपण स्वत:प्रमाण आहों, आपल्यापेक्षां श्रेष्ठ प्रमाण-स्थान नाहीं, अशा भावनेनें तिचा कार्यक्रम चालूं झाला. अर्थात् याचा परिणाम म्हणून भारतांत अनेक अन्योन्यविरोधी दर्शनें - तत्त्वज्ञानें उदयास आलीं. प्रत्येक दर्शन आपला
पान क्र. १३२
आधार श्रुति आहे असें तत्त्वत: मान्य करी आणि श्रुतींतील वचनें घेऊन आपल्या विरोधकांवर त्यांचा शस्त्रांसारखा उपयोग करी. एकमेकांवर शस्त्रासारखीं वापरण्याजोगीं वचनें श्रुतींत सापडतात; याचें एक कारण असें आहे कीं, ज्या श्रेष्ठ अंतर्ज्ञानावर श्रुति आधारलेली आहे, तें अंतर्ज्ञान वस्तूंच्या मेळाव्याकडे बुद्धीच्या विश्लेषणात्मक बारीक दृष्टीनें न पाहतां समग्रतेच्या विशाल दृष्टीनें पाहतें. अविभाज्य महान् वस्तु हा अंतर्ज्ञानाचा मुख्य विषय असतो; या अविभाज्य वस्तूच्या निरनिराळ्या बाजू या दृष्टीनें, तिच्यांतील तपशिलांचा विचार तें करतें. अंतर्ज्ञानाचा ओढा नित्य आंतरिक समन्वयाकडे असतो, ज्ञानाच्या एकतेकडे असतो. बुद्धीची गोष्ट त्याच्या उलट आहे; विश्लेषण, विभाजन हा बुद्धीचा मार्ग; या मार्गानें मिळविलेल्या वस्तूंच्या तुकड्यांना एकत्र करून बुद्धि आपली ''समग्र'' वस्तु तयार करते. या कृत्रिम 'समग्र' वस्तूंत विरोधी गोष्टी, अपवादात्मक गोष्टी, तर्कशास्त्राला न खपणारे विसंवाद, एकत्र भरले जातात; आणि बुद्धीच्या हें नजरेस आलें, कीं ती स्वभावत: त्यांतील कांहीं गोष्टी योग्य म्हणून पसंत करून, त्यांच्याशीं विसंवादी अशा बाकीच्या गोष्टी बाजूला सारते आणि निर्दोष अशी तर्कशास्त्रसंमत व्यवस्था किंवा रचना उभी करते. असें असल्यानें आरंभीं अंतर्ज्ञानाचें राज्य असतां ज्ञानाची जी एकता होती व जी बुद्धीचें राज्य अंशत: सुरू झाल्यानंतरहि कांहीं काळ टिकली, ती एकता बुद्धीचें संपूर्ण साम्राज्य सुरू झाल्यावर नाहींशी झाली. अनेक युक्ती, अनेक अर्थ लावण्याच्या पद्धती, अनेक भिन्न मूल्यावर आधारलेले मूल्य-मापनप्रकार तार्किक तत्त्वज्ञांची कुशाग्रता वेळोवेळीं शोधून काढीत असे आणि या शोधांचा फायदा घेऊन त्यांना गैरसोयीच्या असणाऱ्या श्रुतिवचनांचा विरोध दूर करण्यांत तत्त्वज्ञ यशस्वी होऊं शकत, त्या वचनांना व्यवहारतः हरताळ लावूं शकत आणि त्यांचें स्वतःचें जें अनुमानरचित तत्त्वज्ञान असेल, त्याचा मोकळेपणें ते प्रचार करूं शकत.
याप्रमाणें जीं निरनिराळी दर्शनें या बुद्धीच्या पराक्रमानें तयार झालीं, त्यांत प्राचीन वेदांतांतील प्रमुख सिद्धांत, एका दर्शनांत कांहीं अंशीं, दुसऱ्यांत तसेच कांहीं अंशीं असे सर्व दर्शनांत थोड्या थोड्या अंशानें मान्यता पावून राहिले; आणि हे विखुरलेले सिद्धांत एकत्र करण्याचा व प्राचीन अंतर्ज्ञानाची एकता व सर्वसमावेशकता जींत प्रतिबिंबित झाली आहे अशी तत्त्वज्ञानाची इमारत या एकत्रीकरणानें उभी करण्याचा प्रयत्नहि मधून मधून केला गेला. त्याचप्रमाणें हीं दर्शनें वेगवेगळ्या विचारपद्धती वापरीत होतीं,
पान क्र. १३३
तरी सर्व दर्शनांत, त्यांतील सिद्धांताच्या पाठीमागें, मूळ पायाभूत असणारा वेदांती सिद्धांत टिकून राहिला. पुरुष, आत्मा, सद्ब्रह्म, शुद्ध अस्तित्व असणारी वस्तु (सद्वस्तु) या प्रकारें उपनिषदांनीं विश्वाचें मूळ वर्णिलें आहे. सर्व दार्शनिकांनीं या सिद्धांताला मान्यता दिली. कोठें कोठें बुद्धिनिष्ठ तत्त्वज्ञांनीं पुरुषाऐवजीं विशिष्ट विचार, भावना, मानसिक अवस्था हें विश्वाचें मूळ म्हणून कल्पिलें आहे. तथापि ज्याप्रमाणें वेदांताचा पुरुष, आत्मा हा अनिर्वाच्य, वाणीनें वर्णन करतां न येण्यासारखा, असा वर्णिलेला असतो, त्याप्रमाणें विश्वाचें मूळ म्हणून सांगितला जाणारा विचार, कल्पना वा मनोवस्था ही अनिर्वाच्य म्हणून प्राय: वर्णिली जाते. आमच्या अंतर्ज्ञानाला व बुद्धीला गोचर असें अद्वितीय एक कांहींतरी आहे, आणि आमच्या समोर विश्वहि आहे. विश्व म्हणजे सारखी गति, भ्रमन्ती आणि घडणें, रूप घेणें; सारखे फिरत राहणारें रूप-रूपांतर-चक्र, घटना-विघटना-चक्र. आतां या विश्वाचें आणि त्या एकाचें नातें काय आहे ? काय असावें ? काय असेल ? आमच्यांत मी आहे, अहम् आहे; आमच्या समोर जी रूप-रूपांतर-भ्रमंती चालली आहे, तिचें, हा 'मी' हें अपत्य असो वा तिचा जनक असो, तो वेदांतानें घोषिलेल्या खऱ्या आत्म्याकडे, ईश्वराकडे या ब्रह्माकडे परत जाणार आहे काय ? परत जाऊं शकतो काय ? हे प्रश्न भारतीयांच्या मनांत सदैव जागृत होते व आहेत; आणि भारतांतील बुद्धिनिष्ठ तत्त्वज्ञ व व्यवहारनिष्ठ साधक या दोन्ही वर्गांचें अंतःकरण वरील प्रश्नांनीं सदैव व्यापलेलें आहे.
पान क्र. १३४
प्रकरण नववें
शुद्ध सद्वस्तु
एक अद्वितीय, अविभाज्य असें शुद्ध सत् अस्तित्व हेंच केवळ आरंभीं होतें.
- छांदोग्य उपनिषद् ६.२.१
आम्ही सामान्यत: मर्यादित क्षणिक लाभाच्या गोष्टीकडे आमची अहंकेंद्रित दृष्टि सारखी लावून असतो. आमच्या दृष्टीचा हा अहंकेंद्रित व्यापार थांबवून आम्हीं जर जगाकडे तिऱ्हाईत जिज्ञासूपणानें बघितलें, केवळ सत्य काय आहे तें शोधण्याच्या बुद्धीनें बघितलें, तर आमच्या दृष्टीला प्रथम जी गोष्ट प्रतीत होते ती म्हणजे अनंत अस्तित्वाची, अनंत भ्रमन्तीची, अनंत क्रिया करणारी, अनंत अवकाशांत अनंत काल कार्य करीत अविश्रांतपणें वाटचाल करणारी, अखंड ओघाची अनंत सद्वस्तूची अनंत शक्ति. या शक्तिमय गतिशील सद्वस्तूची अनंतता पहावी तर आमचा मी, कोणताहि मी, कोणताहि थोरांत थोर असा 'मीं'चा मेळा तिच्या अनंत विस्तारांत अगदीं क्षुद्रसा भासतो. आमच्या अनेक युगांचा आमच्या नजरेला दिपविणारा पदार्थसंभार या अनंत सद्वस्तूच्या हिशोबानें एक क्षणाचा धूलिकण दिसतो, असंख्य कोटि जीव या सद्वस्तूच्या अगणित अगणनीय जीवराशींत अगदीं तुच्छ संख्येनें असल्याचें वाटतात. असें हें जगाचें भ्रमण अफाटपणें चाललेलें आहे. आम्हांला सहजप्रेरणेनें असें वाटतें कीं, हें भ्रमण आम्हांभोंवतीं चाललेलें आहें; आमचें वागणें, आमचे विचार, आमचें जीवन या भावनेनें चाललेलें असतें. आमचा मी हा जगाचा केंद्र आहे, जग हें या 'मी' साठींच आहे, आम्हांला मदत करण्यासाठीं, वेळीं त्रास देखील देण्यासाठींच हें जग भ्रमण करीत आहे, अशी आमची कल्पना होते. आमच्या 'मी'च्या वासना, भावना, कल्पना तसेंच ध्येयभूत गोष्टी या जशा आम्हांला जिव्हाळ्याच्या वाटतात, त्याप्रमाणें जगालाहि त्या जिव्हाळ्याच्या
पान क्र. १३५
वाटतात, त्यांची तृप्ति, परिपूर्ति करणें, त्यांचें समर्थन करणें हें जगाच्या नियत कार्यांतील एक कार्य आहे, असें आम्ही धरून चालतो; पण ही आमची भ्रांति असते. आम्हांला खरी दृष्टि आली म्हणजे असें दिसतें कीं, विश्व हें आमच्याकरितां अस्तित्वात नसून, स्वत:करितांच आहे. त्याला महान् ध्येयें आहेत, त्याला संकीर्ण सीमाहीन कल्पना आहेत, त्याला महान् वासना आहेत, महान् आनंद आहे व त्या वासनांची, आनंदाची, परिपूर्ति त्याला करावयाची आहे. आमचे क्षुद्र आदर्श पाहून व ते फार थोर आहेत अशी त्यांजबद्दलची आमची कल्पना पाहून, विशाल आदर्शाचे विश्व आम्हांला उपरोधिकपणें हंसतें व कनवाळुपणानें आम्हांला संभाळून घेतें. तरीपण आम्हीं दुसऱ्या टोंकाला जाऊन, आमची जगाला किंवा जगांत कांहींच किंमत नाहीं, अशी ठाम कल्पना करून घेणें हेंहि योग्य नाहीं. असें करणें हें अज्ञानाचेंच काम होईल, असें करण्यांत विश्वांतील कित्येक महान् गोष्टी आम्हीं दृष्टीआड केल्यासारखें होईल.
कारण विश्वाची अनंत भ्रमन्ती, मानवाला बिनमहत्वाचा समजते असें नाहीं. विश्वचक्राला त्याच्या भ्रमणकार्यांत मानवाचें महत्त्व आहे. भौतिक शास्त्रानें हें दाखवून दिलें आहे कीं, अखंड गतिशील विश्वशक्ति आपल्या लहानांत लहान व मोठ्यांत मोठ्या कार्यावर सारख्याच काळजीनें मेहनत घेते; बारीक सारीक तपशिलाच्या बाबतींत देखील खूप दक्षता दाखविणें, युक्तिप्रयुक्ति रचतांना खूप कुशलता कामास लावणें, खूप एकाग्रतेनें जीव लावून श्रम करणें, हें विश्वशक्तीचें तंत्र तिच्या सर्व लहानमोठ्या कार्यांत अगदीं सारखेंच प्रत्ययास येतें. श्रीमद्भगवद्गीतेंत 'समम् ब्रह्म' हें जें महान् वर्णनात्मक पद आहे, तें विश्वशक्तीचें वर्णन करणारें आहे. ती विश्वमाता समबुद्धि आणि निःपक्षपातीपणा या गुणांची खाण आहे. सूर्यमाला निर्माण करणें आणि चालविणें हें काम असो किंवा मुंग्यांचें वारूळ व त्यांतील जीवांची निर्मिति व जीवनाची संघटना हें काम असो, दोन्ही कामांत विश्वमाता सारखेंच शक्तिकौशल्य सारख्याच तीव्रतेनें खर्च करते. आम्ही एका कामाला मोठें म्हणतो, दुसऱ्याला क्षुद्र म्हणतो, यांत दोघांचा आकार आणि द्रव्यभार किंवा द्रव्यसंभार, द्रव्यसामग्री यांची तुलना आम्हांला भ्रान्त करण्यास कारणीभूत होते. यांत आकाराची, द्रव्यसामग्रीची फसवेगिरी आहे. उलटपक्षीं आम्ही द्रव्य सामग्रीच्या भाराकडे न पाहतां, असल्या दोन कामांतील गुणांची, गुणभारांची तुलना केली, तर सूर्यमालेपेक्षां त्या मालेच्या पोटांत राहणारी
पान क्र. १३६
मुंगी मोठी आहे; आणि सर्वच्या सर्व जड निसर्ग एकदम घेतला, तरी तो मनुष्यापेक्षां लहान आहे असें आपणाला म्हणावे लागेल. पण त्यांतहि आपण फसतो. द्रव्यभार फसवितो त्याचप्रमाणें गुणभार देखील फसवितो. विश्वशक्ति किंवा ब्रह्मशक्ति दोन बाजूंनीं आपण बघतो; गुणभार व द्रव्यभार या त्या दोन बाजू आहेत. कोठें गुणभार अधिक दिसतो, कोठें द्रव्यभार अधिक दिसतो. पण शक्तिभार लहानांत लहान व मोठ्यांत मोठ्या दोन्हीं कामांत, अगदीं सारखा असतो, असें बारीक निरीक्षणानें आपल्या लक्षांत येतें. अस्तित्वांत असणाऱ्या सर्व वस्तू, ब्रह्मवस्तूचें अस्तित्व सारख्या सारख्या वांट्यानें भोगतात, कार्य करणाऱ्या सर्व वस्तू, ब्रह्मवस्तूची शक्ति सारख्या सारख्या वांट्यानें आपल्या कार्यांत योजतात, असें आपल्याला म्हणतां येईल, म्हणावेंसें वाटतें. पण यांतहि एक प्रकारचा द्रव्यभाराचाच फसवा प्रकार आहे. खरी गोष्ट अशी आहे कीं, ब्रह्माचे असे विभाग व वांटणी होऊं शकत नाहीं. लहान मोठा वांटा, सारखा सारखा वांटा ही भाषा ब्रह्माच्या बाबतींत अगदीं खोटी भाषा आहे. ब्रह्म अविभाज्य आहे. सर्व ठिकाणीं, सर्व वस्तूंत, सर्व कामांत तें सर्वच्या सर्व असतें. वस्तू व कामें विभक्त दिसतात, त्यामुळें तें विभागलें गेलें आहे असा देखावा दिसतो. बुद्धीनें बनविलेल्या कल्पना बाजूस ठेवून आपण बारकाईनें निरीक्षण केलें, अंतःस्फूर्त ज्ञान आणि तादात्म्यानें होणारें ज्ञान यांच्या साह्यानें आपण या असीम ब्रह्मशक्तीकडे पाहूं लागलों, तर असें दिसतें कीं, मनाला व मनाच्या ज्ञानशक्तीला जें दिसतें, त्याहून अगदीं वेगळें दर्शन ब्रह्माच्या ज्ञानशक्तीला होतें -- तें असें कीं, सूर्यमाला व वारूळ यांच्या उभारणींत एकाच वेळीं सर्वच्या सर्व अविभक्त ब्रह्मशक्ति सारख्याच तीव्रतेनें काम करते -- ती आपले भाग करून सारखे सारखे कोणाला वांटीत बसत नाहीं -- सगळें ब्रह्म आणि वांटे पाडलेलें ब्रह्म अशी कांहीं गोष्ट नाहीं, असू शकत नाहीं. कोणतीहि वस्तु घ्या, सर्वच्या सर्व अविभक्त अविभाज्य ब्रह्म ती वस्तु आहे. सर्वच्या सर्व ब्रह्म तिच्यासाठीं राबत आहे. महत्त्वानें व प्रकारानें गुण वेगळे वेगळे असतील, द्रव्य हें वजनानें, बलानें वेगळें वेगळें असेल, परंतु सर्वत्र सर्वकाळ आत्मा किंवा ब्रह्म सम, अगदीं सारखें असतें. आत्मशक्ति आणि ब्रह्मशक्ति, शाश्वत आदींचा आदि असणारी आणि अंत नसणारी अशी ब्रह्मशक्ति, सर्व ठिकाणीं अगदीं समतेनें आहे, अभेदानें आहे. जे भेद असतात, ते ब्रह्माच्या क्रियाशक्तीचा प्रकार, कार्यपद्धति व परिणाम यांच्या बाबतींत असतात. बलवान् मनुष्य
पान क्र. १३७
आणि दुर्बल मनुष्य घ्या. बलवान् बलसंपादक-शक्तीनें बलवान् होतो, दुर्बल मनुष्य दुर्बलता-संपादक-शक्तीनें दुर्बल होतो. पण या दोन शक्ती अगदीं सारख्या असतात. दुर्बलता-संपादक शक्ति बलसंपादक-शक्तीहून एक कणभरहि कमी असत नाहीं. मनांतील भाव दाखविणें किंवा दाबून ठेवणें, एखाद्या सिद्धान्ताला पाठिंबा देणें किंवा तो खोडून काढणें, आवाज काढणें किंवा शांतता राखणें, या क्रियांच्या सर्वच जोड्यांत शक्ति खर्च करावी लागते, व ती सर्वत्र सारखीच खर्च होत असते.
तेव्हां, आम्हांला पहिली गोष्ट ही करावयास हवी कीं, विश्वाच्या अस्तित्वाची महाशक्ति, विश्वरूप अनंत आंदोलन, यांचा आणि आमचा जो संबंध आम्ही मानीत आलों आहों, त्या संबंधांत आम्हीं दुरुस्ती केली पाहिजे. सध्यां आम्ही या संबंधींचा जो हिशोब ठेवीत आहों, तो हिशोब खोटा आहे. विश्वाला आमचें महत्त्व अतिशय आहे, त्याला कांहीं मर्यादाच नाहीं असें आम्ही मानतो. त्याबरोबर आम्ही असें मानतो कीं, विश्वाचें महत्त्व आम्हांला कांहींहि नाहीं, असलें तरी अगदींच थोडे आहे, दुर्लक्ष करण्यासारखें आहे. आम्हीच आम्हांला महत्वाचे आहोंत. आमच्या खेरीज आम्हांला कोणीहि, कांहींहि महत्त्वाचें नाहीं. ज्याला मूळ अज्ञान म्हणतात, तें 'मी'चें मूळ असतें. त्याची खूणच ही आहे कीं, स्वतःला सर्व कांहीं महत्त्व दिल्याशिवाय, स्वतःला विश्व किंवा विश्वाचें केंद्र कल्पिल्याशिवाय, त्याला विचारच करतां येत नाहीं. स्वतः खेरीज बाकी जें आहे, त्यांतील त्याच्या मनाला पटेल तेवढें आणि परिस्थितीचे तडाखे त्याला जें मान्य करावयास लावतील तेंच तें मान्य करतें. हें 'मी' रूप, मूळ अज्ञान, तत्त्वविचार करूं लागलें म्हणजे, 'विश्व जें आहे तें स्वतःच्या जाणिवेत आहे; जाणिवेच्या बाहेर स्वतंत्र अस्तित्व विश्वाला नाहीं; जाणिवेंतच त्याला अस्तित्व येतें व आलें आहे,' असे सिद्धांत तें करीत नाहीं कां ? स्वतःच्या जाणिवेची अवस्था, स्वतःच्या मनानें ठरविलेली मूल्यें हीच सत्याची कसोटी तें मानतें. त्याच्या कक्षेच्या वा क्षितिजाच्या बाहेर जें असेल, तें खोटें किवा अविद्यमान आहे, असें मानण्याकडे त्याचा कल असतो. जोपर्यंत आमच्यामध्यें ही मनाची आत्मसंतुष्टता आहे तोपर्यंत जीवनाची खरी किंमत आम्हांला कळत नाहीं, त्याच्यापासून योग्य तो लाभ पूर्णपणें आम्हांला घेता येत नाहीं. कारण मनाची ही आत्मसंतुष्टता खोट्या हिशोबाची पद्धति सुरू करून आम्हांला खोटे जीवन जगाययास लावते. पण या त्याच्या आत्मप्रौढीच्या
पान क्र. १३८
गोष्टींत एका अर्थानें कांहीं तथ्य आहे -- एका सत्यावर त्याची प्रौढी वस्तुत: आधारलेली आहे. पण हें सत्य, तेव्हांच व्यवहारांत दृग्गोचर होतें, जेव्हां आमच्या मनाला आपलें अज्ञान लक्षांत येतें आणि आमचा मी खऱ्या विश्वपुरुषाचा अंकित होतो आणि आपलें वेगळें स्वत्व त्या विश्वपुरुषांत विलीन करतो. ज्याला आम्ही 'मी' म्हणतो, किंवा ज्या परिणामांना व रूपांना आम्ही 'मी' म्हणतो, तो 'मी' म्हणजे या विश्वरूपीं अनंत आंदोलनाचा एक लहानसा हिस्सा आहे हें आम्हीं ओळखलें पाहिजे. जें अनंत विश्व आम्हांला जाणावयाचें आहे, तें आम्हीं स्वत: जाणीवपूर्वक व्हावयाचें आहे, त्याची प्रामाणिकपणें आम्हांला परिपूर्ति करावयाची आहे, अर्थात् त्याचें जें इष्ट आहे तें साधावयाचें आहे हें आम्हीं ओळखलें पाहिजे. हें आम्हीं, आमच्या 'मी'नें ओळखलें म्हणजे खरें जीवन जगावयास आरंभ होतो. हें खरें किंवा दिव्य जीवन पूर्ण होण्यास दुसरी एक जाणीव आम्हांला व्हावयास हवी. ती जाणीव ही कीं, आम्हांला जसा 'मी' आहे, तसा आम्हांला खरा 'आत्मा'हि आहे; आणि हा खरा आत्मा अनंत आंदोलनाशीं किंवा विश्वाशीं, विश्वपुरुषाशीं एकरूप आहे, आमच्या 'मी'प्रमाणें त्याचा दुय्यम नाहीं - त्याचा सेवक नाहीं. आपला स्वभाव, विचार, भावना व कृती यांच्या द्वारां ही खऱ्या आत्म्याची जाणीव आणि तिचें आविष्करण आपल्या ठिकाणीं रूढ झालें म्हणजे, खरें किंवा दिव्य जीवन आपल्याला पूर्णपणें जगतां आलें असें होतें.
पण आपला जीवनाचा हिशोब पुरा होण्यासाठीं आणखी कांहीं ज्ञान आपल्याला आवश्यक आहे. हें जें अनंत, सर्वशक्तिमान् क्रियासामर्थ्य -- हें जें विश्व -- सारखें क्रियामग्न आहे, तें वस्तुत: काय आहे, याचें ज्ञान करून घेणें आवश्यक आहे. पण येथेंच नव्या अडचणी उत्पन्न होतात. शुद्ध स्वयं-तंत्र बुद्धि सांगते कीं, जसे आम्हीं विश्वरूप आंदोलनाचे अंशरूप आहोंत, त्या आंदोलनाचे अंकित आहोंत, त्याप्रमाणें गतिशील विश्व हें त्याहून वेगळ्या एका वस्तूचा एक अंश, एक अंकित अंश किंवा पैलू, या स्वरूपाचें आहे. ही वस्तु एक महान् अस्तित्व आहे, कालातीत स्थलातीत गतिशून्य सदा-स्थिर ''स्थाणू'' अशी वस्तु आहे; तिच्यांत बदल होत नाहीं, तिच्यांतील द्रव्य जसेच्या तसें राहणारें, कधींहि न संपणारें असें आहे, तिच्यांतील द्रव्य मुळींच खर्च होत नाहीं, ती कांहींहि क्रिया करीत नाहीं, मात्र सर्व क्रिया तिच्या पोटांत होतात; ती वस्तु क्रियाशक्ति नाहीं, केवळ शुद्ध गतिशून्य अस्तित्व, हें त्या वस्तूचें स्वरूप आहे. वेदान्तहि
पान क्र. १३९
असेंच विधान करीत असल्यासारखें दिसतें. पण ज्यांना केवळ विश्वशक्तीच दिसते, ते असें म्हणूं शकतात कीं, स्थिर वस्तु, शुद्ध अस्तित्व या शक्तीच्या मुळाशीं आहे हें म्हणणें सत्य नाहीं; अशी कांहीं वस्तु मुळींच अस्तित्वांत नाहीं. शाश्वत स्थिरता, अक्षर शुद्ध अस्तित्व या ज्या कल्पना आमच्या भांडारांत आहेत, त्या बुद्धीनें कल्पिलेल्या अवास्तव कल्पना आहेत, स्थिरतेसंबंधींच्या खोट्या कल्पनेवर या कल्पना आधारलेल्या आहेत; वस्तुत: स्थिर असें कांहींहि नाहीं; सर्व कांहीं अस्थिर, चंचल, गतियुक्त आहे, गतिमान् विश्वाशीं व्यवहार करायला कांहीं एक स्थिर बिंदु हवा म्हणून आमच्या मनाने स्थिरतेची कृत्रिम कल्पना उभी केली आहे. केवळ गतिमान् विश्वाकडेच पाहिलें, तर हा सिद्धान्त खरा असल्याचें दाखवितां येतें. गतिमान् विश्वांत स्थिर कांहींच नाहीं. जें कांहीं स्थिर दिसतें, तें खरोखरी स्थिर नसून तो हालचाल करणाऱ्या वस्तूंचा एक संच असतो. शक्ति सारखें कार्य करीत असते आणि क्रियामग्न शक्तीचें स्वरूप आम्हांला, आमच्या जाणिवेला अगदीं स्थिर असल्यासारखें दिसतें -- पृथ्वी फिरत असतां स्थिर भासते, आपण ज्या आगगाडींत बसलों असूं, ती गाडी धांवत असतां, आजूबाजूचा भाग धांवत आहे व आपली गाडी एका जागीं उभी आहे असें भासते. त्याप्रमाणें विश्वांतील सर्व वस्तूंची गोष्ट आहे. पण विश्वाच्या पोटांतील वस्तूंसंबंधानें जी गोष्ट खरी आहे, ती एकंदर विश्वासंबंधानेंहि खरी आहे. त्याला गतिहीन स्थिर वस्तूचा आधार नाहीं -- असें मानतां येत नाहीं. सदा गतिमान् विश्वाचें 'मूळ', सदा स्थिर असें शुद्ध अस्तित्व आहे असा निर्णय शुद्ध व स्वतंत्र बुद्धीनें दिला आहे. 'क्रियाशील शक्ति हेंच अस्तित्व' ही गोष्ट तिला मान्य नाहीं; शुद्ध अस्तित्व, शुद्ध सद्वस्तु, शक्तीचें उगमस्थान आहे असाहि शुद्ध बुद्धीचा सिद्धान्त आहे.
शुद्ध बुद्धीनें सांगितल्याप्रमाणें शुद्ध अस्तित्व, शुद्ध सद्वस्तु जर विश्वशक्तीचा उगम असेल तर त्या शक्तीप्रमाणें तें अस्तित्वहि अनंत असलें पाहिजे, हें समजणें अवघड नाहीं. शुद्ध अस्तित्वाच्या बाबतींत खरा शेवट, खरा अंत संभवनीय आहे असें बुद्धि, अनुभव, अंतर्ज्ञान, किंवा कल्पनाशक्ति यांपैकीं कोणीहि सांगत नाहीं. शेवट वा आरंभ मानला कीं त्या मानलेल्या शेवटापलीकडे, त्या मानलेल्या आरंभापलीकडे कशाचें तरी अस्तित्व आपण गृहीत धरतो. केवळ निःसंबंध शुद्ध अस्तित्वाचा शुद्ध अंत किंवा आदि या शब्दप्रयोगांत दोन अन्योन्यविरुद्ध कल्पना एकत्र
पान क्र. १४०
केल्या जातात; कारण आदि किंवा अन्त, हा निःसंबंध, शुद्ध असूंच शकत नाहीं. या दोन्ही गोष्टी सापेक्ष आहेत. तेव्हां शुद्ध अस्तित्वाचा शुद्ध आरंभ किंवा शुद्ध शेवट हा शब्दप्रयोग विरोधमय असल्यानें अर्थशून्य आहे, वस्तुस्थितीच्याहि विरुद्ध आहे; वस्तुजाताचें अंतरंग, सारतत्त्व हें या कल्पनेला सर्वथा विरोध करणारें आहे; या सारतत्त्वाच्या बाबतींत आदि-अन्ताची कल्पना करणें हें सत्याचा अधिक्षेप करणें आहे, ती कल्पना केवळ मिथ्या आहे. सांताचा पसारा अनन्त अस्तित्वावांचून निराधार होतो. स्वयंभू अनन्त सद्वस्तु, सान्त दृश्याचा पसारा उभा राहण्यासाठीं अगदीं अवश्य आहे, अपरिहार्य आहे.
ज्या अनंत अस्तित्वाचा आधार सान्त पसाऱ्याला अनिवार्य असल्याचें आतां आपण पाहिलें, तें अनन्त अस्तित्व, काळदृष्टीनें व अवकाशदृष्टीनें अनंत, असें आपण समजावयाचें आहे. कालाचा अनंत प्रवाह, अवकाशाचा किंवा आकाशाचा अनंत विस्तार, शुद्ध सद्वस्तूनें व्यापलेला आहे असें दर्शन, शुद्ध बुद्धीला घडल्यानंतरहि तिचें संशोधन पुढें चालूं राहतें. काल व अवकाश या वस्तू काय आहेत याचा शोध ती करीत राहते. हा शोध ती आपल्या कठोर निःपक्षपाती स्वभावानुसार बारकाईनें करीत असतां, तिला असें दिसते कीं, काल व अवकाश (किंवा स्थल) या जाणिवेच्या बाहेरच्या वस्तू नसून, तिच्या विषयग्रहणाच्या कार्यांत तिला आवश्यक असणाऱ्या तिच्याच दोन अवस्था, दोन बाजू आहेत; दोन मूलभूत कल्पना आहेत. शुद्ध अस्तित्वावर बुद्धीनें आपली नजर स्थिरावली कीं काल व स्थल या वस्तु वस्तुदृष्ट्या नाहींशा होतात. शुद्ध अस्तित्वाचा विस्तार या संशोधनांत दिसला, तर तो विस्तार स्थलविस्तार म्हणून दिसत नाहीं, मन:कल्पित मनोविस्तार म्हणून प्रत्ययास येतो; शुद्ध अस्तित्वाची चिरंतनता या संशोधनांत दिसली, तर ती चिरंतनता कालाची दिसत नसून, मनाची व मनःकल्पित म्हणून प्रत्ययास येते. तेव्हां हें उघड आहे कीं, शुद्ध अस्तित्वाच्या बाबतींत अनंत स्थलविस्तार व अनंत कालविस्तार या गोष्टी, या कल्पना केवळ प्रतीकरूप आहेत. या प्रतीकद्वारां, जी वस्तु व्यक्त होते, ती बुद्धीच्या शब्दांत सांगतां येण्यासारखी नसते. तिचें ज्ञान करून घेण्याचा यत्न या प्रतीकद्वारां मन करीत असतें. भूत-वर्तमान-भविष्य सर्व घटना सामावून घेणारा, सदैव नवा असणारा एकच एक क्षण, ही अनंत कालप्रवाहाची बुद्धीला होणारी प्रतीति, तसेंच भूत-वर्तमान-भविष्य सर्व वस्तू सामावून घेणारा, सर्व वस्तू व्यापून राहणारा,
पान क्र. १४१
कोणतेंहि माप -- लांबी रुंदी उंची -- नसलेला एकच एक बिंदु, ही अनंत स्थलविस्ताराची बुद्धीला होणारी प्रतीति -- या दोन प्रतीती, असामान्य आहेत. त्यांच्या वर्णनांत अन्योन्यविरोधी शब्द एकत्र बसवावे लागतात; याचाच अर्थ मन आणि वाणी यांच्या स्वाभाविक मर्यादांतील हे प्रत्यय वा अनुभव नाहींत. शुद्ध सद्वस्तूची अनुभूति, शुद्ध बुद्धीला होते; पण जेव्हां त्या अनुभूतीचा ती शब्दांनीं उच्चार करूं पाहते, तेव्हां वाणीचे, मनाचे रूढ शब्दसंकेत अपुरे पडतात. विरुद्ध अर्थाचे शब्द एकत्र ठेवून वर्ण्य वस्तूचें वर्णन करावे लागते; आणि ती सद्वस्तु आहे, एकच एक आहे व अवर्ण्य, अनिर्वाच्य आहे, एवढाच निष्कर्ष या खटाटोपापासून निघतो.
शुद्ध बुद्धीच्या शुद्ध अस्तित्वासंबंधींच्या या संशोधनांत काल आणि स्थल (अवकाश व आकाश) नाहींसे होतात असें वर सांगितलें. पण असेहि कशावरून नसेल कीं, शुद्ध अस्तित्व ही खरी वस्तु नसून बुद्धीची कृत्रिम निर्मिति आहे ? केवळ शब्दजालानें उभी केलेली 'नसती' वस्तु आहे आणि अशा खोट्या, काल्पनिक, 'नसलेल्या', वस्तूला आम्ही आपल्या कल्पनाशक्तीच्या आग्रहास्तव, अस्तित्वांत असलेली खरी मूळ वस्तु म्हणून प्रतिष्ठा देऊं इच्छितों ? --आणि या आमच्या खटाटोपाचें फळ म्हणून काल आणि स्थळ यांना आम्ही निकालांत काढतों ? या शक्यतेचा विचार आम्हीं करावयास हवा. त्यासाठीं शुद्ध अस्तित्व या वस्तूकडे आम्हीं शुद्ध बुद्धीच्या साह्यानें बारकाईनें ध्यान द्यावयास हवें. असें ध्यान दिलें असतां ही गोष्ट लक्षांत येते कीं, जें कांहीं दृश्य आहे त्याच्या पाठीमागें कांहींतरी अनंत अनिर्वाच्य वस्तु आहे. कोणतेंहि दृश्य, कोणताहि दृश्यसंभार स्वयंभू आहे असें आपणाला म्हणतां येत नाहीं. सगळें दृश्य विचारानें एकत्रित करून शक्ति -- पायाभूत विश्वव्यापक अविभाज्य अशी क्रियामग्न क्रियाशक्ति एकच एक सदैव चंचल क्रियाशक्ति -- हें सर्व दृश्याचें स्वरूप आहे अशी कल्पना केली, तरी एवढेंच होतें कीं, आम्हांला एक अनिर्वाच्य असें दृश्य, दृश्यवस्तु लाभते. पण हें दृश्य चलायमान, चंचल, अस्थिर असल्यानें, अचंचल, स्थिर अशी कांहीं वस्तु त्याच्या मुळांत असावी असें तें सुचवितें; क्रिया करणारी सद्वस्तु क्रियेचें मूळ आहे असें प्रत्येक क्रिया सुचविते; शक्ति क्रियामग्न दिसलीं कीं ती शक्ति क्रिया थांबवून स्थिर होणारीहि असली पाहिजे, ही कल्पना अपरिहार्यपणें उभी राहते. केवळ निःसंबंध, स्वयंभू क्रियाविहीन शक्ति म्हणजेच स्वयंभू अस्तित्व होय. शुद्ध बुद्धीपुढें शेवटी मूळ सत्य म्हणून दोन पर्याय उभे राहतात. अनिर्वाच्य
पान क्र. १४२
शुद्ध अस्तित्व, आणि अनिर्वाच्य क्रियामग्न शक्ति या पर्यायांपैकीं दुसरा पर्याय खरा धरला, अर्थात् स्थिर असा कांहींहि अस्तित्वाचा पाया नसून, केवळ शक्ति मात्र आहे असें धरले, तर शक्ति ही क्रियेचा, नित्य गतीचा परिणाम म्हणून गृहीत धरणें प्राप्त होईल आणि नित्य गति हें मूळ समजावें लागेल. या पक्षांत अस्तित्व मूळ नाहीं. असत्, बुद्धपंथीयांचें निर्वाण हें मूळ सत्य, आणि कर्म किंवा गतिचक्र शाश्वत असून अस्तित्व हा त्याचा धर्म आहे, अशी मांडणी करावी लागेल. पण या मांडणींत शुद्ध बुद्धीचें समाधान होऊं शकत नाहीं. शुद्ध बुद्धीची अनुभूति वेगळी आहे, शुद्ध बुद्धीला जें मूलभूत दर्शन घडतें, त्याच्या विरुद्ध दुसरा पर्याय असल्यानें, तो ती 'मूळ सत्य' म्हणून मान्य करूं शकत नाहीं. शुद्ध बुद्धीला तिच्या सूक्ष्म संशोधनाअंतीं अनिर्वाच्य शुद्ध अस्तित्वाचेंच मूलभूत दर्शन घडतें आणि म्हणून अनिर्वाच्य क्रियामग्न शक्ति हें 'मूळ अस्तित्व' आहे असा निर्णय ती देऊं शकत नाहीं. असा निर्णय मान्य करणें म्हणजे दोन्ही बाजूला आधार नसलेल्या, आकाशांत जणुं लोंबकळणाऱ्या शिडीच्या अगदीं शेवटच्या पायरीवर एकदम जाऊन उभें राहण्यासारखें आहे. अशा रीतीनें अस्तित्व ही बुद्धीची कृत्रिम निर्मिति नव्हे किंवा शब्दजालानें उभी केलेली 'नसती' वस्तु नव्हे. अस्तित्व ही खरी वस्तु आहे, एकच एक अशी मूळ वस्तु आहे.
हें मूळ अस्तित्व अनिर्वाच्य, अनंत, काल-स्थलविहीन आणि स्वभावत: शुद्ध, केवळ, स्वयंपूर्ण, स्वयंभू आहे. कसल्याहि मापानें किंवा मापांनीं तें मोजतां येत नाहीं. कसलाहि गुण किंवा गुण-समूह त्याच्या रचनेंत नाहीं. रूप किंवा आकार यांचा समुदाय हें त्याचें स्वरूप नाहीं, कोणत्याहि रूपाचें किंवा आकाराचें मूळ आकार-बीजहि तें नाहीं. सर्व रूपें किंवा आकार, सर्व राशि, मापें, किंवा सर्व गुण नाहींसे झाले, तरी तें मूळ अस्तित्व, मूळ सद्वस्तु कांहीं नाहींशी होणार नाहीं; ती राहीलच. अशा तऱ्हेचें रूप- गुण-मानहीन अस्तित्व, आमच्या शुद्ध बुद्धीला कल्पितां येतें; एवढेंच नव्हें, तर जें सर्व दिसत आहे त्याच्या मुळाशीं असेंच अस्तित्व आमच्या बुद्धीला मानावें लागतें. हें अस्तित्व रूपादिहीन आहे याचा अर्थ, अर्थातच या रूपादिकांपेक्षां तें फार मोठें आहे; त्यांच्या पलीकडे आहे, त्याच्यांत रूप-गुण-मान विलीन झाले कीं त्यांचें रूपत्व, गुणत्व, मानत्व नाहींसें होतें -- त्यांतून चंचलाचा, गतिशील आंदोलनाचा कारभार सुरू झाला म्हणजे हीं विलीन रूपें, गुण आणि मापें पुनरपि उदयास येतात. हीं रूपें वगैरे
पान क्र. १४३
विलीन होतात याचा अर्थ, अनेक रूपांचें एक मूळ रूप, अनेक गुणांचा एक मूळ गुण, अनेक राशींचा एक मूळ राशि होऊन, मूळ अस्तित्वांत, सद्वस्तूंत राहतो असा नव्हे. कसलेंहि मूळरूपादि नांव देण्यासारखें त्या सद्वस्तूंत कांहीं राहत नाहीं. याप्रमाणें विश्वाचें गतिचक्र चालूं असतां ज्या गोष्टी या गतिशीलतेच्या कारणभूत अथवा अभिव्यक्तिरूप असतात, त्या सर्व, विश्वमूळ अस्तित्वांत विलीन होतात आणि या विलीन स्थितींत, त्यांना गतिमानतेंत असलेलें नांव देता येत नाहीं -- अशी त्यांची व्यवस्था होते. म्हणूनच या मूळ शुद्ध अस्तित्वाला, स्वयंपूर्ण सर्वसंबंधातीत निरपेक्ष एकरस कैवल्य म्हणतात. या कैवल्याचें ज्ञान विचारशक्तीला होत नाहीं. तथापि या कैवल्याशीं आम्ही एकरूप होऊं शकतो. ही एकरूपता, सर्वश्रेष्ठ एकरूपता होय. ज्ञान ज्या शब्दांत सांगितलें जातें असा कोणताहि शब्द या अज्ञेयाचें, या अज्ञेय केवलाचें यथार्थ वर्णन करूं शकत नाहीं. गतिशील विश्वसंसार, हा या केवलतेच्या उलट स्वभावाचा असतो. सर्व संबंधांचें हा क्षेत्र असतो. जें नि:संबंध स्वयंपूर्ण कैवल्य, गतिमय संसारांतील सर्व वस्तू आपल्यांत समाविष्ट करून असतें, तें प्रत्येक वस्तूंतहि अंतर्भूत असतें -- तेंच या सर्व वस्तू असतें. तें पूर्ण आणि या वस्तू अपूर्ण. पूर्णच अपूर्ण रूपांनीं व्यक्त होतें. निसर्गाच्या घटना आणि मूळ आकाशतत्त्व यांचा संबंध पूर्ण-अपूर्णाच्या संबंधासारखा आहे. नैसर्गिक घटनांत, वस्तूंत आकाशतत्त्व असतें, आकाशतत्त्वाच्याच त्या घटना व वस्तू बनलेल्या असतात, त्या आकाशतत्त्वांत त्या सर्व समाविष्ट असतात -- आणि आकाशतत्त्व नैसर्गिक घटनांहून, वस्तूंहून अगदीं वेगळें असतें. इतकें वेगळें कीं, या वस्तू त्या आकाशतत्त्वांत विलीन झाल्या कीं त्यांचें निसर्गांतील स्वरूप पार नाहींसें होतें. पूर्ण अस्तित्व व अपूर्ण गतिशील विश्वसंसारगत वस्तू यांचा संबंध स्पष्ट करण्यासाठीं वेदान्त हा आकाशतत्त्व आणि निसर्गवस्तू यांचा दाखला देत असतो. पूर्ण आणि अपूर्ण एक आहेत, अभिन्न आहेत आणि भिन्नहि आहेत. त्यांचा भेदांत अभेद कसा आहे हें दाखविण्यास, आकाश आणि निसर्गांतील वस्तुजात यांचा हा दृष्टान्त पुष्कळच समर्पक आहे.
तथापि या अपूर्ण वस्तू मूळच्या पूर्ण वस्तूंत परत जातात अशी भाषा आम्ही जेव्हां वापरतो, तेव्हां ती आमच्या कालनिष्ठ जाणिवेची भाषा आहे हें आम्ही विसरतां कामा नये. ही भाषा वापरतांना या जाणिवेचे भ्रम आम्हीं आमच्यापासून दूर ठेवले पाहिजेत. अक्षर अशा मूळ वस्तूं-
पान क्र. १४४
तून गतिमय संसार उदय पावतो, तो अमुक क्षणीं उदय पावतो अशी स्थिति नाहीं; तो नित्यनिरंतर उदय पावत असतो. ही कल्पना मनानें करणें अवघड असल्यानें मूळ स्थिर पूर्णापासून गतिमय संसाराचा आविष्कार सांगतांना, आपण मनाच्या कल्पनांना व अनुभवांना सोईची अशी कालनिष्ठ नित्यतेची भाषा वापरतो. या भाषेंत एका क्षणापासून दुसरा क्षण, त्यामागून तिसरा अशी कधीं न संपणारी क्रमवार कालगति म्हणजे नित्यता आणि या नित्यतेंत पुन: पुन: आरंभ आहे, मध्य आहे, अंत आहे, असें आम्ही म्हणतो व मानतो.
मूळ शुद्ध अस्तित्वासंबंधानें आमची शुद्ध बुद्धि काय सांगते तें आपण येथवर पाहिलें. पण शुद्ध बुद्धीच्या कल्पनांवर आम्हीं सर्व भार टाकावा कां ? या कल्पना कितीहि तर्कशुद्ध असल्या, तरी केवळ तर्कशुद्धतेमुळें त्या आम्हीं मान्य केल्याच पाहिजेत असें होत नाहीं. जी गोष्ट आम्हांला 'आहे' म्हणून अनुभवाला येते, त्या अनुभवसिद्ध गोष्टीलाच बुद्धीच्या कल्पनांहून अधिक ग्राह्य मानणें अवश्य आहे -- त्या अनुभवसिद्ध गोष्टींच्या आधारानेंच अस्तित्वासंबंधानें आमचा निर्णय आम्हीं घ्यावयास हवा. हा निर्णय बुद्धीच्या कल्पनांवर विसंबून ठेवणें न्यायसंगत नाहीं. जें अस्तित्व आमच्या नजरेसमोर आहे त्या अस्तित्वाकडे, अगदीं शुद्ध स्वतंत्र अंतःप्रज्ञेनें, अंतर्दृष्टीनें पाहिलें, तर आकाश किंवा अवकाश आणि काल या दोनहि ठिकाणीं सर्वत्र हालचाल दिसते, दुसरें कांहीं दिसत नाहीं. स्थल किंवा स्थलाधिष्ठित भ्रमण आमच्या बाहेर व कालाधिष्ठित भ्रमण आमच्या आंत सारखें चालूं असतें. स्थलांत दृश्य हिंडत असतें, कालांत द्रष्टा हिंडत असतो. कमीअधिक विस्तार, कमीअधिक चिरंतनता या सत्य गोष्टी आहेत; स्थल, काल या सत्य वस्तु आहेत. स्थलविस्तार ही बाह्य गोष्ट नसून मानसिक घटना आहे, एकच एक आणि अविभाज्य असें शुद्ध अस्तित्व मनाला ग्रहण करणें अवघड असल्यानें, विस्तारलक्षण स्थलाची कल्पना करून, त्यांत अनंत विस्ताराचे अस्तित्व आहे अशी मांडणी मन आपल्या समजुतीसाठीं करते, असें आपण म्हणूं शकतो. म्हणजे बाह्य स्थलाच्या पाठीमागें जाऊन त्याची बाह्य सत्यता काढून घेतां येते. पण कालासंबंधानें असें त्याच्या पाठीमागें जातां येत नाहीं. आमच्या आंत कल्पनांचा, विचारांचा क्रम असतो. हा क्रम म्हणजे कालक्रम. आमच्या विचारशक्तीचें, जाणिवेचें शरीरच जणुं कालाचें बनलेलें आहे, क्रमवार गतीचें बनलेलें आहे. आम्ही व आमचें जग, सारखी न थांबता भूतकालांतून
पान क्र. १४५
भविष्यांत वाटचाल करीत आहों. आमची आणि आमच्या जगाची वाढ होते, प्रगति होते म्हणजे काय होते ? आम्ही आणि आमचें जग ही एकसारखी अविरत चालणारी हालचाल आहे. भूतकालांतील, जुन्या एकामागून एक घडलेल्या गोष्टी वर्तमान क्षणांत आपण समाविष्ट करतो -- आणि भविष्य कालांतील एकामागून एक घडणाऱ्या गोष्टींचा आरंभ या वर्तमान क्षणांतून होतो, असें आम्ही समजतो; भूतकालीन क्रमवार घटनांचा वर्तमान क्षणांत समावेश करणें व वर्तमान क्षणाला भविष्यकालीन क्रमवार घटनांचा आरंभ समजणें, हाच आमच्या व आमच्या जगाच्या प्रगतीचा अर्थ आहे. या गतींत आम्हांला वर्तमान काल स्पष्टपणें प्रतीत होत नाहीं. कारण भूतकाल आणि भविष्यकाल यांच्या संधिस्थानीं 'वर्तमान' क्षणभर असतो, नसतो. तेव्हां कालाचा क्रम, भ्रमणक्रम *अविभाज्य अनंत असल्याचा आम्हांस प्रत्यय येतो. त्या कालाच्या प्रवाहाबरोबरच, आमच्या अविभाज्य जाणिवेचा सदा पुढें धांवणारा भ्रमन्तीचा कार्यक्रमहि आमच्या प्रत्ययास येतो. अर्थात् कालाच्या पोटांत शाश्वतपणें क्रमबद्ध हालचाल होणें, कालाच्या पोटांत बदलावर बदल होत राहणें, संक्षेपत: कालप्रवाह, किंवा घटनाप्रवाह, हेंच एक अंतिम सत्य आहे; घटना (घडणें, होणें) हेंच एक अंतिम अस्तित्व, सद्वस्तु आहे;
*अविभाज्य म्हणजे एकंदर भ्रमन्तीच्या दृष्टीनें अविभाज्य. अखंड कालाचा, जाणिवेचा प्रत्येक क्षण त्याच्या पूर्वींच्या व नंतरच्या क्षणाहून वेगळा समजतां येईल, शक्तीचें अनुक्रमानें घडणारें प्रत्येक कार्य नवीन म्हणून मानतां येईल -- तथापि असें असतांहि क्षणाक्षणामध्यें, कार्याकार्यामध्यें खंड पडतो असें मानण्याचें कारण नाहीं. क्षणामागून क्षण, कार्यामागून कार्य अखंडपणें अविभाज्य, अविभक्त रीतीनें चालूं असतें असेंच दिसून येतें. कालप्रवाह, जाणिवेचा प्रवाह किंवा ज्ञानप्रवाह या अखंडपणाशिवाय सिद्ध होत नाहीं. मनुष्य चालतो, धांवतो, उड्या मारतो, तेव्हां त्यांचीं पावलें वेगळीं वेगळीं पडतात, तथापि त्या सर्व पावलांना घेऊन त्याचें चालणें, थांबणे, उड्या मारणें या क्रिया अखंड करणारे असें कांहीं त्या क्रियांत अंतर्भूत असतें. हीच गोष्ट कालाच्या जाणिवेच्या क्षणांची, शक्तीच्या क्रमवार कार्यांची आहे. त्या सर्व क्षणांना, कार्यांना एकत्र जोडणारा अखंड धागा असतो -- व या धाग्यामुळेंच कालप्रवाह, ज्ञानप्रवाह अखंड असलेला आमच्या अनुभवास येतो.
पान क्र. १४६
शुद्ध अस्तित्व म्हणून कांहीं नाहीं, असें अस्तित्वाकडे पाहणारी शुद्ध अंतर्दृष्टि आम्हांला सांगते, अर्थात् शुद्ध बुद्धीचा निर्णय व शुद्ध अंतर्दृष्टीचा अनुभव यांत विसंगति दिसते.
पण ही विसंगति आभासात्मक आहे. खरोखरीच जर अंतर्दृष्टि आणि बुद्धि यांचा या बाबतींत एकमेकींना विरुद्ध असा निर्णय असेल, तर बुद्धीचा निर्णय आम्हांला मान्य करतां येणार नाहीं. परंतु गोष्ट अशी आहे कीं, अंतर्दृष्टीपुढें, अंतर्दृष्टीला घडणाऱ्या दर्शनापुढें, जेव्हां आम्हीं बुद्धीच्या निर्णयाविरुद्ध आमची बाजू मांडतो, तेव्हां अंतर्दृष्टीला घडणारें अर्धें दर्शन आम्ही पूर्ण दर्शन समजून चालतों. अंतर्दृष्टि जोपर्यंत घटनाप्रवाहावर खिळलेली आहे, तोपर्यंत तिला जें दिसते तें बुद्धीच्या निर्णयाला प्रतिकूल असलें तरी तें खरें असतें. आमचा जीवनप्रवाह नदीच्या प्रवाहासारखा असतो. बौद्ध तत्त्वज्ञानांत या प्रवाहाला ज्वालेचा दृष्टांत देतात. आम्ही काय होत आहों, यावरच अंतर्दृष्टि लक्ष देत आहे, तोंपावेतों आम्हीं अखंड हालचाल आहोंत, या गतीचें पाऊल सारखें पुढें पुढें पडत आहे, आमच्या जाणिवेंत सारखा बदल होत आहे, कालाच्या शाश्वत प्रवाहांत आमचा हा जीवन-प्रवाह सारखा चालू आहे, हेंच दर्शन आमच्या अंतर्दृष्टिला घडतें व घडणार आणि तें तेवढ्यापुरतें खरेंहि आहे. पण अंतर्दृष्टि एवढेंच पाहते व पाहूं शकते असें नव्हे. तिला या दर्शनाहून श्रेष्ठ असें दर्शनहि घडतें. आमचा पृष्ठभागावरचा आत्मा सोडून आम्हीं त्याच्या पाठीमागें अंतर्दृष्टीनें पाहूं शकतो आणि असें आंतरात्म्यांत पाहिलें म्हणजे आमच्या अंतर्दृष्टीला सर्वश्रेष्ठ दर्शन घडतें, सर्वश्रेष्ठ अनुभव येतो. आम्हांला तेथें असें स्पष्ट दिसतें कीं, आम्ही जें कांहीं होत असतो, आम्हांत जे कांहीं बदल होत असतात, आम्हांत क्रमवारीनें ज्या घटना घडत असतात -- हें सर्व होणें, फेरबदल घडून येणें, म्हणजेच क्रमवार घटनानिष्पत्ति ही एक आमच्या अस्तित्वाची प्रवृत्ति आहे. या प्रवृत्तिखेरीज आमच्यांत आणखी कांहीं आहे, तें या घटनाक्रमाच्या पलीकडे आहे, तें या घटनाक्रमांत बिलकुल सांपडत नाहीं. हें जें घटनातीत शुद्ध अचल नित्य अस्तित्व (सद्वस्तु) आहे, तें अंतर्दृष्टीला स्पष्ट दिसतें, या अस्तित्वाच्या क्षणिक, सारख्या घडत राहणाऱ्या घटनांच्या पडद्यामागें त्या अस्तित्वाचा आम्हांला ओझरता आंतरिक अनुभव येतो इतकेंच नव्हे, तर आम्ही बाह्य घटनाचक्रांतून निवृत्त होऊन या शुद्ध सद्वस्तूंत प्रवेश करूं शकतो, व तेथें जीवन जगूं शकतो, सगळें जीवन त्या ठिकाणीं राहून आम्हीं
पान क्र. १४७
जगूं शकतो; या आमच्या सद्वस्तूंमध्यें राहण्यानें आमच्या बाह्य जीवनांत आमूलाग्र बदल होऊन जातो. आमच्या वृत्तींतहि असाच बदल होतो. जगाच्या फिरत्या घटनांवर आमच्या कार्यप्रवृत्तीनें जो परिणाम होतो त्यांतहि, आमच्या सद्वस्तूंतील वसतीमुळें, सर्वांगीण बदल होतो; आणि ही जी सुस्थिर, अचल सद्वस्तु आमच्या निवासाचें ठिकाण होतें, ती सद्वस्तु, या नित्य चलायमान् विश्वसंसाराच्या पाठीमागें आहे, असें शुद्ध बुद्धि आपल्या शुद्ध स्वतंत्र तर्कपद्धतीनें स्थापित करते. तेव्हां अंत:स्फूर्त ज्ञान (अंतर्ज्ञान, अंतर्दृष्टि) आणि शुद्ध बुद्धीचा निर्णय यांच्यामध्यें अंतिम मूळ अस्तित्वाच्या विषयीं कांहीं विसंगति, विरोध नाहीं हें स्पष्ट आहे. जी विसंगति, व विरोध दिसतो तो अर्धवट अंतर्ज्ञानाला पूर्ण अंतर्ज्ञान समजल्यानें दिसतो. शुद्ध बुद्धीच्या तर्कपद्धतीचा उपयोग न करतांहि, हें शुद्ध अस्तित्व काय आहे याची अगोदर स्पष्ट जाणीव, स्पष्ट ज्ञान न मिळतांहि, त्या अस्तित्वाचा लाभ घेतां येतो हेंहि लक्षांत ठेवण्यासारखें आहे. तेव्हां निष्कर्ष हा कीं, हें सुस्थिर, निश्चल, अस्तित्व हें शुद्ध, नित्य, अनंत, अलक्षण असें आहे. कालाच्या क्रमवारीचा त्याला उपसर्ग पोंचत नाहीं; सर्व आकार किंवा रूप, राशी, गुण यांच्या पलीकडे तें आहे -- तें एकमेव स्वयंपूर्ण, स्वयंभू आत्मतत्त्व होय.
तेव्हां शुद्ध सद्वस्तु ही केवळ कल्पना नाहीं, ती अस्तित्वांत असलेली खरी वस्तु आहे; ती मूळ पायाभूत सत्य आहे हें उघड झालें. पण या मूळ सत्याबरोबर हेंहि ध्यानांत ठेवावयास हवें कीं, क्रियामग्न शक्ति, सारखें गतिशील विश्व, घटनाप्रवाह हेंहि सत्यच आहे. सर्वश्रेष्ठ अंतर्ज्ञान आणि तदनुरूप अनुभव हा, सारखे फिरणारें घटनाचक्र दाखविणाऱ्या अनुभवास व अंतर्ज्ञानास ओलांडून पुढें जातो, त्यांतील उणीव दाखवतो, त्यांना क्षणभर स्थगित करतो, पण त्यांना नाहींसें करीत नाहीं; सत्याच्या प्रांतांत त्यांना स्थान नाहीं असें सांगत नाहीं. अंतर्ज्ञान सत्यदर्शी आहे, आंतरनुभव सत्यस्पर्शी आहे. सत्य द्विविध असल्यानें अंतर्ज्ञान, आंतरनुभव द्विविध आहे इतकेंच. शुद्ध सद्वस्तु व विश्ववस्तु आणि सुस्थिर अस्तित्व व सारखी बदलती घटना, हीं दोन्हीं मूलभूत सत्यें आहेत. यापैकीं एक नाहीं असें म्हणणें सोपें आहे. दोन्हीहि जाणिवेंतील सत्य गोष्टी आहेत, हें सत्य मान्य करून त्या दोहोंचे नातें काय तें शोधून काढणें यांत जीवनसाफल्य साधणारी खरी सूज्ञता आहे.
पान क्र. १४८
स्वयंपूर्ण, स्वयंभू, मूळ सद्वस्तूच्या स्वरूपग्रहणासाठीं मनानें कल्पिलेल्या दोन समकालीन अवस्था म्हणजे सुस्थिरता आणि चंचलता, एकता आणि अनेकता या आहेत. वस्तुत: या अवस्थांत सद्वस्तु सामावत नाहीं; एकता आणि अनेकता, सुस्थिरता आणि चंचलता यांच्या ती पलीकडे आहे. चंचल अनेकताच्या रूपानें ती सद्वस्तु सुस्थिर एकता ही नित्य अवस्था घेऊन, स्वत:भोंवतीं अकल्पनीय रीतीनें, आत्मसंतोषानें अनंत फेऱ्या घालीत आहे. विश्वाचें अस्तित्व हें शिवाचें तांडव आहे. आत्मानंदातिशयांत शिवानें चालविलेलें नृत्य आहे, या नृत्यामुळें आमच्या नजरेसमोर शिवाचा देह अनंतरूपें घेतो -- वस्तुत: शुद्ध प्रकाशमय शिव आपल्या मूळ स्थानीं, आपल्या मूळ स्वरूपांत नित्यकाळ असतो, होता, असणार -- त्याचें नृत्य हें केवळ नृत्याच्या आनंदासाठींच चाललेलें आहे.
तें स्वयंपूर्ण केवल सद्वस्तुतत्त्व, खऱ्या स्वरूपानें कसें आहे याचें वर्णन करणें, याचा विचार करणें आम्हांला शक्य नाहीं -- तेथें सुस्थिरता आणि चंचलता, एकता आणि अनेकता एकसमयावच्छेदेंकरून आहेत. या पलीकडे त्या केवलाविषयीं आम्हांला कांहीं कल्पनाहि करतां येत नाहीं, मग भाषा करणें दूरच राहिलें. शिवाय एक गोष्ट ही आहे कीं, आमचा हेतु त्या केवलाचें वर्णन करण्याचा नाहीं. आहे त्या स्थितींत आम्हीं हेंच करणें योग्य आहे कीं, जीं दोन सत्यें, शिवतत्त्व आणि कालीतत्त्व (शक्तितत्त्व) आमच्या अनुभवाला येतात, तीं तशींच आम्हीं मान्य करावीं; स्थलकालातीत, निश्चल, अद्वितीय, शुद्ध अस्तित्व, ज्याला मेय वा अमेय दोन्ही शब्द लागूं शकत नाहींत, त्या केवल शिवतत्त्वाशीं, स्थलकालाच्या अनंत विस्तारांत जी अमेय अशी विश्वभ्रमन्ती चालली आहे, तिचा (काली तत्त्वाचा) संबंध काय आहे, हें शोधून काढण्याचा आम्ही यत्न करावा. शुद्ध बुद्धि, अंतर्ज्ञान आणि आंतरनुभव यांचें शुद्ध अस्तित्वाविषयीं, 'सत्' विषयीं काय म्हणणें आहे तें आम्हीं पाहिलें. आतां शक्तीविषयीं -- गतिमय विश्वपसाऱ्याविषयीं -- त्यांचें काय म्हणणें आहे हें आम्हांला पहावयाचें आहे.
या संबंधांत पहिली विचारणा करावयाची ती ही कीं, जी शक्ति आमच्यासमोर दिसत आहे, ती ज्ञानशून्य शक्ति आहे, केवळ जडाच्या हालचालीनें निष्पन्न झालेली शक्ति आहे, आणि या शक्तींतून जी जाणीव भौतिक सृष्टींत वर येतांना दिसते, ती जाणीव या शक्तीचा एक निव्वळ गतिमूलक परिणाम आहे, का उलटपक्षीं ती जाणीवच या शक्तीचा गूढ व
पान क्र. १४९
खरोखरींचा स्वभाव आहे ? वेदान्ताच्या भाषेंत बोलावयाचें तर, ही शक्ति केवळ प्रकृति अथवा क्रिया-प्रक्रिया-स्वरूप हालचाल आहे, कीं ती चित् ची म्हणजे सृजनशील आत्मजाणिवेची शक्ति अथवा क्रियासमर्थता आहे ? प्रकृति ही स्वतंत्र जडशक्ति आहे कीं चित् ची शक्ति आहे ? प्रकृतीचें वा विश्वशक्तीचें मूळ स्वरूप काय आहे ? हा मूलग्राही तात्त्विक प्रश्न आहे; व यावर इतर सर्व तात्त्विक व्यावहारिक गोष्टी अवलंबून आहेत.
पान क्र. १५०
प्रकरण दहावें
चिन्मय शक्ति
ध्यानयोगाच्या आश्रयानें त्यांनीं देवाची आत्मशक्ति पाहिली. ही शक्ति तिच्या गुणांनीं -- तिच्या ज्ञानयुक्त क्रिया-प्रक्रियांनीं खोल ठिकाणीं झांकून टाकलेली, अतिगूढ केलेली अशी त्यांना दिसली.
- श्वेताश्वतर १.३
जे झोंप घेतात, जे झोंपेंत असतात, त्यांच्यामध्यें त्यावेळीं जागा असणारा, जागा राहणारा जो हा पुरुष तोच ब्रह्म.
- कठोपनिषद ५.८
जें कांहीं साकार रूपात्मक अस्तित्व आहे, त्याचें मूळ, शक्ति हें आहे. जेव्हां या शक्तीची क्रिया सुरूं होते, तेव्हां ही क्रियाशील शक्ति कमी अधिक भौतिक, कमी अधिक स्थूल किंवा सूक्ष्म रूपें व आकार धारण करते आणि हें आकार व हीं रूपें ती शक्ति आपल्या अनुभवाचा विषय करते. स्वत: निराकार शक्ति साकार होऊन आपला आपण अनुभव घेते. साकार अस्तित्वाचा हा कायदा आणि हें मूळ, प्राचीन विचारवन्तांनीं आपल्या मनाला नीट समजावें म्हणून अशी कल्पना केली आहे कीं, शक्तीचा जणुं अनंत सागर मुळांत सर्वत्र पसरलेला आहे. तो अगदीं शांत आहे आणि म्हणून त्यावर कसलेहि आकार दिसत नाहींत. ही आरंभींची शांत आकारहीन स्थिति कांहीं कारणानें संपते; सागरांत कशानें तरी कशीतरी हालचाल सुरू होते, आणि अशी हालचाल सुरू झाली कीं, अनिवार्यपणें आकार उदयास येतात. ही आकारनिर्मिति करणारी पहिली हालचाल हेंच सृष्टीचें बीज असतें; सृष्टीची उत्पत्ति शक्ति-सागरांतील या पहिल्या क्षोभानें होते.
जड भौतिक द्रव्य हें आपल्या बुद्धीला लवकर उमजणारे एक शक्ति-
पान क्र. १५१
रूप आहे. भौतिक मेंदूनें आमच्या मनाला वेष्टिलेलें आहे; हें मेंदुतंत्र-मन बाह्य भौतिक पदार्थांच्या विविध संसर्गांच्या प्रसंगीं विविध प्रकारें हालचाल करतें आणि या हालचालींनीं आमची बुद्धि जागृत होऊन विशिष्ट वळण घेते. आमची बुद्धि याप्रमाणें भौतिकाच्या आश्रयानें काम करायला शिकली असल्यानें, भौतिक द्रव्य हें जें शक्तीचें रूप, तें तिला समजायला सर्वांत अधिक सोपें जातें. भारतीय पदार्थविज्ञान-शास्त्रज्ञांच्या दृष्टीनें भौतिक शक्तीची मूळ अवस्था, स्थलगत (आकाशगत) शुद्ध भौतिक विस्ताराची अवस्था होय. या अवस्थेंत या शक्तीचा विशेष धर्म स्पंदन हा असतो. हें स्पंदन शब्दरूपानें आमच्या अनुभवास येतें. परंतु आकाशाच्या या अवस्थेंतील स्पंदन, रूपें व आकार घडविण्यास पुरेसें नसतें. शक्तिसागराच्या अखंड प्रवाहांत कांहीं अडथळा उत्पन्न व्हावा, कांहीं संकोच-विस्तार-रूप घटना व्हावी, स्पंदनाच्या विविध प्रकारांचा अन्योन्य संघर्ष घडून यावा, शक्तीच्या एका प्रकाराचा दुसऱ्या प्रकारावर आघात होऊं लागावा, तेव्हां कोठें थोडेबहुत, टिकाऊ अन्योन्यसंबंध स्पंदनप्रकारांमध्यें निर्माण होतात, यांच्यामध्यें अन्योन्यांवर थोडेबहुत परिणाम होऊं लागतात. कोणत्याहि रूपनिर्मितीच्या पूर्वीं हें सगळें घडून यावें लागतें. ही आरंभिक 'आकाशाची' अवस्था बदलून भौतिक शक्ति 'वायु' ही दुसरी अवस्था धारण करते. शक्ति-प्रकारांचा एकमेकांशीं संसर्ग हा या अवस्थेचा विशेष गुण होय. हा अन्योन्यस्पर्श सर्व भौतिक संबंधांचा पाया असतो. तथापि ज्यांना रूपें वा आकार म्हणतां येईल असें या स्थितींत कांहीं घडून येऊं शकत नाहीं. शक्तीचे विविध प्रकार मात्र या वायुस्थितींत घडून येतात. आकार होण्यासाठीं आकारधारक असें कांहीं तत्त्व लागतें. हें तत्त्व मूळ शक्तीच्या तिसऱ्या रूपांतरांतून मिळतें. या तिसऱ्या रूपांतरांत विशेषत: प्रकाश, वीज, अग्नि, उष्णता यांचा समावेश होतो. या रूपांतरानंतर त्यांच्या आश्रयानें आपापलीं विशिष्ट कार्यें करणारीं व आपापला स्वभावधर्म टिकवून धरणारीं अशीं शक्तीचीं विशिष्ट रूपें उपलब्ध होतात. परंतु सुस्थिर टिकाऊ अशीं जड द्रव्याचीं रूपें अद्यापिहि घडूं शकत नाहींत. भौतिक मूळ शक्तीच्या चौथ्या रूपांतरांत 'प्रसरण' हा विशेष धर्म असतो, आकर्षण-विकर्षण (दूर लोटणे) या क्रिया या चौथ्या रूपांत कायम होऊं लागतात. या चौथ्या रूपाला अलंकारिक रीतीनें 'आप' अथवा द्रव असें नांव दिलें गेलें आहे. मूळ भौतिक शक्ति आणखी एक पांचवें रूप धारण करते. या रूपांत द्रव्यकण एकमेकांना
पान क्र. १५२
चिकटून राहतात व संघात बनतो; या रूपाला पृथ्वी किंवा घनस्थिति म्हणतात. हीं पांच शक्तिरूपें म्हणजेच पंचतत्त्वें, पंचमहाभूतें होत. खऱ्या आकारासाठीं हीं पांच तत्त्वें अस्तित्वांत यावीं लागतात.
जडद्रव्याचीं जीं रूपें आमच्या परिचयाचीं आहेत, तीं सर्व आणि अगदीं सूक्ष्मांत सूक्ष्महि सर्व भौतिक वस्तू, वर सांगितलेल्या पांच तत्त्वांच्या संयोगानें बनलेल्या असतात. आमच्या इंद्रियांच्या द्वारां जो अनुभव आम्हांला येतो, तो सर्व अनुभव या पांच तत्त्वांवर अवलंबून असतो. स्पंदनांचें ग्रहण इंद्रियांनीं केलें म्हणजे शब्दाची संवेदना होते, शक्तिस्पंदनांच्या विश्वांत वस्तूंच्या संसर्गानें स्पर्शसंवेदना होते; प्रकाश, अग्नि, उष्णता यांच्या शक्तीनें उत्पन्न होणाऱ्या, रेखांकित केल्या जाणाऱ्या, टिकवल्या जाणाऱ्या आकारांमध्यें प्रकाशाचा व्यापार घडल्यानें दर्शनाची संवेदना होते, चौथ्या तत्त्वाच्या व्यापारानें रससंवेदना, पांचव्याच्या क्रियेनें गंधाची संवेदना होते. या सर्व संवेदनांचें स्वरूप, स्वभावत: शक्तीशक्तीमधील स्पंदनात्मक संसर्गांची प्रतिक्रिया हें असतें. शुद्ध निरुपाधिक शक्ति आणि तिचीं शेवटलीं रूपांतरें यांत जें महान् दरीसारखें अंतर आहे, तें भरून काढणारा सेतु, प्राचीन विचारवन्तांनीं वर सांगितलेल्या पांच तत्त्वांच्या बांधणीनें तयार केला. इंद्रियांना सर्व प्रकारें खरेखुरे, भरीव व टिकाऊ असे भासणारे आकार, वस्तुत: अल्पकाल टिकणारे आभास आहेत, आणि शुद्ध शक्तीसारखी वस्तु इंद्रियांच्या दृष्टीनें अभावात्मक, ग्रहण न होणारी, जवळजवळ अविश्वासार्ह वस्तु हीच एक सर्वकाळ टिकणारी विश्वव्यापी सत्य वस्तु आहे, ही गोष्ट सामान्य मानवी बुद्धीला मान्य करणें जड जातें. तिची ही अडचण प्राचीन विचारवंतांनीं उपरिनिर्दिष्ट पांच तत्त्वांच्या सेतूच्या उभारणीनें दूर केली.
जाणिवेचा, ज्ञानाचा प्रश्न या वर वर्णिलेल्या उपपत्तीनें सुटत नाहीं. शक्तीच्या स्पंदनांचा संसर्ग हा जडाचा कारभार. या कारभारानें ज्ञानमय संवेदना कां उत्पन्न व्हावी ? सांख्य-तत्त्व-प्रतिपादक विश्लेषणवादी विचारकांनीं या प्रश्नाचें उत्तर म्हणून, वर सांगितलेल्या पांच तत्त्वांत आणखी दोन तत्त्वांची भर घातली; महत् आणि अहंकार ही, पांच तत्त्वापूर्वींचीं तत्त्वें होत. हीं तत्त्वें भौतिक नाहींत, अतिभौतिक आहेत. विश्वव्यापी शक्तितत्त्व म्हणजेच महत्, 'मी'च्या निर्मितीला मूळ असणारें भेदतत्त्व म्हणजे अहंकारतत्त्व. हीं दोन तत्त्वें आणि बुद्धितत्त्व जाणिवेनें (ज्ञान पुरस्सर) क्रियाशील होतात, केवळ शक्तीच्या जोरावर होत नाहींत.
पान क्र. १५३
या ज्ञानमय क्रियाशीलतेसाठीं निष्क्रिय, साक्षीभूत अशा ज्ञानमय पुरुषाची या पुरुषांची, आत्म्याची वा आत्म्यांची नित्य उपस्थिति लागते; महत्, अहंकार व बुद्धि या तत्त्वांच्या द्वारां घडणाऱ्या शक्तीच्या क्रिया नित्य उपस्थित असणाऱ्या पुरुषांच्या जाणिवेंत प्रतिबिंबित होतात आणि या प्रतिबिंबांच्या द्वारां त्या जाणिवेचा रंग घेतात, ज्ञानयुक्त म्हणून प्रत्ययास येतात.
आधुनिक भौतिक जडवादी तत्त्वज्ञानाला जवळ असणाऱ्या भारतीय तत्त्वज्ञानाच्या सांख्य संप्रदायानें दृष्टीचें स्पष्टीकरण वरीलप्रमाणें केलेलें आहे. निसर्गांत यांत्रिक किंवा जड, ज्ञानहीन शक्ति कार्य करीत आहे ही कल्पना, दृष्टीच्या घडामोडींचें स्पष्टीकरण शक्य तितक्या व्यापक रीतीनें करण्यासाठीं; सांख्यांच्या भारतीय विचारशील गंभीर वृत्तीच्या बुद्धीनें मांडली आहे. सांख्य तत्त्वज्ञानांतील दोष कांहींहि असोत, यांतील मुख्य कल्पना इतकी वादातीत आहे कीं, सर्वसाधारणपणें सर्व प्राचीनांनी ती मान्य केली आहे. ती कल्पना ही कीं, निसर्ग हा शक्तिरूप आहे - निसर्गांत जाणीव दिसते ती कोठून व कशी आली याचें स्पष्टीकरण कांहींहि दिले जावो, निसर्ग जड स्फुरण असो किंवा ज्ञानमय तत्त्व असो, तो शक्तिरूप आहे यांत संशय नाहीं; सृष्टीचें मूळ, शक्तींच्या हालचालींत आहे, आकार किंवा रूपें शक्तीच्या हालचालींनीं निर्माण होतात, कोणताहि विशिष्ट आकार नसलेल्या शक्तीं-शक्तींमध्यें संसर्ग, सहकार, देवाणघेवाण घडूनच सर्व आकार उदयास येतात; सर्व संवेदना आणि कर्में यांचें तात्त्विक स्वरूप प्रतिक्रियात्मक आहे; शक्तींचे विविध प्रकार क्रियाशील असतांना, एका विशिष्ट प्रकारच्या शक्तीशीं त्यांचा संबंध येतो आणि या संबंधाचा, संसर्गाचा परिणाम म्हणून, ही विशिष्ट प्रकारची शक्ति, किंवा शक्तीचे हें विशिष्ट रूप कांहीं प्रतिक्रिया करते - ही प्रतिक्रिया म्हणजेच संवेदना किंवा कर्म. आमच्या अनुभवाला येणारें जग या प्रकारचें आहे आणि आम्हांला संशोधनाचा आरंभ करावयाचा, तर या अनुभवापासूनच करावयास हवा.
आधुनिक विज्ञान, जडाचें भौतिक पृथ:करण करून या वरील सिद्धान्ताचाच पुरस्कार करीत आहे. सामान्यत: हा सिद्धान्त नवीन भौतिक विज्ञानाला मान्य आहे. कांहीं थोडे संशय उरले असल्यामुळें कांहीं बाबतींत त्याला अद्यापि अखेरचा निर्णय घेतां येत नाहीं इतकेंच.
पान क्र. १५४
याप्रमाणें भौतिक विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांचें या बाबतींत एकमत असून अंतर्ज्ञान आणि अनुभव यांचाहि त्यांना पाठिंबा आहे. या सिद्धान्तांत शुद्ध स्वतंत्र बुद्धीला तिच्या सारभूत कल्पनांचें समाधान झालेलें दिसतें. कारण 'जग हें सारदृष्टीनें जाणिवेचें कार्य आहे' या पक्षांतहि कार्य, क्रिया ही गोष्ट गृहित आहे, आणि क्रिया म्हटलें कीं शक्तीची हालचाल, सामर्थ्याची लीला तिच्या पाठीमागें आलीच.
आपल्या अंतरांत जाऊन आपण आपला अनुभव पाहिला, तरी विश्वाचा मूलभूत स्वभाव शक्तिकार्य हाच दिसतो. आपल्या सर्व क्रिया नजरेखालून घातल्या असतां, प्राचीन तत्त्वज्ञानानें सांगितलेल्या तीन शक्तींचा त्या क्रिया खेळ आहेत असें दिसेल. ज्ञानशक्ति, वासनाशक्ति व क्रियाशक्ति या त्या तीन शक्ती होत. या तीन शक्तींकडे बारकाईनें पाहिलें, तर एका आद्यशक्तीचे, मूलभूत अद्वितीय, सर्वथा एकरस शक्तीचे त्या तीन प्रवाह आहेत, असें दिसून येतें. आपल्या विश्रामक्षणांचा, क्रियाशून्य अवस्थांचा विचार केला, तर त्याहि अवस्था, त्या आद्य शक्तीच्या विविध भ्रमणाचा समतोल झाल्यानें अनुभवास येतात, असें दिसेल.
शक्तीची भ्रमन्ती, हालचाल हें विश्वाचें स्वरूप आहे हें मान्य केल्यावर दोन प्रश्न उभे राहतात. पहिला हा कीं, अस्तित्वाच्या पोटांत, स्थितिशील मूळ सद्वस्तूच्या पोटांत, ही गति निर्माण कशी झाली? अस्तित्वाचें सारच गति आहे; गति केवळ शाश्वतच आहे एवढेंच नव्हे तर अस्तित्वच सारतः गतिरूप आहे, असें मानले तर हा पहिला प्रश्न उभा रहात नाहीं. पण ही उपपत्ति आपण अमान्य केली आहे; कारण ज्याच्यावर गतीची सत्ता चालत नाहीं अशा ज्या अस्तित्वाचा अनुभव आम्हांला येतो, त्या अस्तित्वाच्या शाश्वत स्थितिशील स्वभावाला विरुद्ध अशी गति अशा अस्तित्वांत आली कशी व कोठून? या गतीचें मूळ कारण काय आहे ? या गतीची शक्यता त्या स्थितिशील अस्तित्वांत उत्पन्न कशी झाली ? कोणतें गूढ प्रेरक तत्त्व या गतीला कारण झालें ?
प्राचीन भारतीयांच्या बुद्धीनें बहुतांशीं मान्य केलेलें, या प्रश्नाचें उत्तर असें आहे कीं, स्थितिशील अस्तित्वाच्या पोटांत गतिशील शक्ति स्वभावतःच असते. शिव आणि काली, ब्रह्म आणि शक्ति एकच एक वस्तु आहेत. त्या एकमेकांपासून अलग करतां येत नाहींत. अस्तित्वाच्या स्वभावांत असलेली शक्ति स्थिर असेल किंवा गतिमान्
पान क्र. १५५
असेल; स्थिर असली तर ती नाहींशीं होते असें नाहीं, ती कमी होते किंवा बदलते असेंहि नाहीं; स्थिर असेल तेव्हां ती अस्थिर नाहीं एवढेंच म्हणतां येईल, तिचे अस्तित्व नाकारतां येणार नाहीं. तिचे अस्तित्व नाकारणें म्हणजे शुद्ध सद्वस्तूचें अस्तित्व नाकारण्यासारखें होईल. कारण या दोन वस्तू अविभाज्यपणें एक आहेत. हें उत्तर सृष्टिधर्माशीं जुळणारें व बुद्धीला सर्वथा पटणारें असें आहे. आपणाला हें उत्तर मान्य करावयास कांहींच हरकत नाहीं; कारण दुसरें जें उत्तर शक्य आहे, तें बुद्धीला कदापि पटणारें नाहीं, तिच्या स्वभावाला विरोधी असें आहे -- तें उत्तर असें कीं, एक आणि अनंत असें अस्तित्व हें वेगळें आणि शक्ति वेगळी. अस्तित्वांत शक्ति बाहेरून प्रवेश करती झाली किंवा असें म्हणा कीं, अस्तित्वांत ती आरंभीं नव्हती पण पुढें कोणत्यातरी क्षणीं ती त्यांत उदयास आली. हें बुद्धिविरोधी उत्तर मान्य करणें अशक्य असल्यानें, पहिलें उत्तर मान्य करावयास आपण सहजच तयार होतो. मायावादी उपपत्ति असें सांगते कीं, स्वत:लाच भ्रमामध्यें ढकलण्याची व राहण्याची शक्ति ब्रह्मामध्यें आहे. हें प्रतिपादन करणाऱ्या मायावादाला हेंहि मान्य करावें लागेल कीं, ही जी भ्रान्तिशक्ति ब्रह्मामध्यें आहे ती, ब्रह्माप्रमाणेंच शाश्वत असली पाहिजे. मग प्रश्न येवढाच उरतो कीं, ही भ्रांतीची शक्यता वास्तवांत केव्हां उतरावयाची ? मायेचा संसार व्यक्त केव्हां व्हावयाचा ? कां तो अव्यक्तच रहावयाचा ? सांख्यांनींहि असें प्रतिपादन केलें आहे कीं, प्रकृति किंवा निसर्ग आणि पुरुष किंवा ज्ञानमय आत्मा दोघेहि शाश्वत आहेत. दोघेहि एकाच वेळीं अस्तित्वांत असतात. प्रकृति एकतर समतोलांत किंवा शांत निश्चल स्थितींत असते अथवा तसें नसेल तेव्हां चंचल स्थितींत, विषम तोलाच्या स्थितींत असते, आलटून पालटून या दोन अवस्था प्रकृति घेत असते.
शक्ति ही अस्तित्वांत स्वभावत: अंतर्भूत असल्यानें आणि शक्तीचा स्वभावधर्म आलटून पालटून निश्चलता किंवा चंचलता स्वीकारण्याचा असल्यानें -- म्हणजेच स्वत:मध्यें एकवटून राहणे (आत्मकेंद्रितता) किंवा सर्वत्र पसरणें (आत्मविस्तार) -- या शक्तीच्या दोन अवस्था स्वभावतःच आलटून पालटून व्यक्त होत असल्यानें, शक्ति गतिमान् कशी होते, शक्तिप्रेरणा कोठून येते, इत्यादि प्रश्न उभे रहात नाहींत. कारण आम्हांला हें सहज कळूं शकतें कीं, शक्तीला जे दोन पर्याय शक्य आहेत, ते म्हणजे कालदृष्ट्या एकीपाठीमागून दुसरी अशी आलटून पालटून चंचलता व
पान क्र. १५६
निश्चलता येत असेल किंवा अंतर्यामी सतत निश्चलता व त्याबरोबरच पृष्ठभागीं लाटांचा खेळ चालूं असलेल्या सागराप्रमाणें अक्षर अस्तित्वाच्या अंतर्यामीं शाश्वत, आत्मकेंद्रित, निश्चल शक्ति आणि त्या अस्तित्वाच्या पृष्ठभागीं शाश्वत चंचलता किंवा सतत बदलणारी, आकारांची घडामोड करणारी शक्ति, असा प्रकार होत असेल. हा पृष्ठभागावरचा खेळ आत्मकेंद्रित निश्चल शक्तीइतकाच कालदृष्टीनें जुना, अनादि व अखंड आणि शाश्वतचा असेल किंवा तो कालदृष्टीनें आरंभ आणि शेवट यांनी युक्त असून आरंभ-शेवट-आरंभ-शेवट-आरंभ..... असा तालबद्ध शाश्वततेचा असेल, अर्थात् शाश्वत अखंडता किंवा शाश्वत पौनःपुन्य हें त्या पृष्ठभागीय खेळाचें स्वरूप असेल.
शक्तीचा क्रियात्मक खेळ कसा सुरु होतो हा प्रश्न याप्रमाणें निकालांत निघतो. हा खेळ सुरूं होतोच कां या प्रश्नाचा आतां विचार करणें प्राप्त आहे. शक्ति गतिमान् होण्याची शक्यता शक्तींत आहे हें ठरलें, तरी ही शक्यता वास्तवांत कां यावी ? शक्ति गतिमान् कां व्हावी ? शाश्वतपणें आत्मकेंद्रित अवस्थेंत अस्तित्वाची शक्ति कां राहूं नये ? रूप-रूपांतर-विविधता यांपासून ती नित्य मुक्त अशी कां राहू नये ? अस्तित्व जाणीवशून्य आहे आणि जाणीव ही भौतिक शक्तीच्या विकासांतून निर्माण होते व ती अतिभौतिक आहे असें म्हणणें हा आपला गैरसमज आहे, असा पक्ष जर आपण खरा म्हणून स्वीकारला तर वरील 'कां' चा प्रश्न उभा राहत नाहीं. कारण आम्हीं असें म्हणूं शकतों कीं, गति-विश्रांति, गति-विश्रांति ही तालबद्धता अस्तित्वातील शक्तीचा स्वभाव-धर्म आहे आणि जी गोष्ट स्वभावत: स्वयंभू आणि नित्य असणारी अशी आहे, तिच्या संबंधांत कां, कारण काय, प्रारंभींचा प्रेरक हेतु काय, अंतिम प्रयोजन काय, -- असले प्रश्न अस्थानीं ठरतात; बुद्धीला सर्वथा अमान्य ठरतात. शाश्वत अशा स्वयंभू अस्तित्वाला तूं कशाकरिता अस्तित्वात आहेस ? अस्तित्वात आलेंस कसें ? हें प्रश्न विचारणें बुद्धि मान्य करणार नाहीं; तसेंच अस्तित्वाची जी आत्मशक्ति आहे आणि तिचा जो गतिविषयक स्वयंप्रेरणेचा स्वभाव आहे, त्यांनाहि वरील प्रश्न विचारणें बुद्धि अमान्य करील. अशा परिस्थितींत आपण फक्त पुढील प्रश्नापुरतेंच संशोधन करूं शकतो; शक्तीचे आत्माविष्करण कोणत्या प्रकारे होतें ? गतीचे आणि आकारधारणाचे तिचे मूळ नियम कोणते आहेत ? तिची विकासाची प्रक्रिया कोणती ? अस्तित्व आणि शक्ति दोन्ही जड गोष्टी असल्यास, एक जड स्थिति व दुसरी जड
पान क्र. १५७
प्रेरणा अशी वस्तुस्थिति असल्यास, दोन्ही जाणीवशून्य, बुद्धिशून्य असल्यास, विकासक्रमांत कांहीं प्रयोजन किंवा अंतिम हेतु असणार नाहीं, त्याचप्रमाणें विकासाचा कांहीं मूळ हेतु किंवा कारण असणार नाहीं.
परंतु मूळ अस्तित्व हें जाणीवयुक्त आहे; अर्थात् मूळ अस्तित्व म्हणजे ज्ञानमय पुरुष आहे अशी आपण कल्पना केली किंवा असा आपणाला अनुभव आला तर वरील 'कां' 'कशाकरिता' हे प्रश्न अवश्य उभे राहतात. आपल्याला अशी कल्पना करतां येईल कीं, हा ज्ञानमय पुरुष त्याच्या शक्तीचा, त्याच्या प्रकृतीचा अंकित आहे; ती त्याजकडून तिला लागेल तें काम करून घेऊं शकते, तिनें किंवा त्यानें विश्वात व्यक्त व्हावयाचें वा न व्हावयाचें या संबंधानें कांहीं ठरविण्याचा कसलाहि अधिकार त्याला नाहीं. तांत्रिक आणि मायावादी यांचा ईश्वर, शक्तीच्या किंवा मायेच्या अधीन आहे; मायावाद्यांचा ईश्वर मायावृत पुरुष आहे; तांत्रिकांचा ईश्वर शक्ति-तंत्र पुरुष आहे. पण आपण सर्वोत्तम, सर्वोच्च, अनंत अस्तित्व किंवा सद्वस्तु ही विश्वाचें मूळ म्हणून मान्य केली आहे. ती सद्वस्तु म्हणजे तांत्रिकांचा किंवा मायावाद्यांचा ईश्वर खास नव्हे. त्या सद्वस्तूनें किंवा ब्रह्मानें विश्वापुरतें धारण केलेलें रूप म्हणजे हा ईश्वर आहे. हें ब्रह्म तर्कत:, शक्ति किंवा माया यांच्या अगोदरचें आहे आणि या शक्तीचें किंवा मायेचें कार्य संपतांच तिला आपल्या सर्वातीत स्वरूपांत परत विलीन करून घेणारें आहे. जें ज्ञानमय अस्तित्व, जो ज्ञानमय पुरुष सर्वातीत, सर्वनिरपेक्ष असा आहे, आपल्या रूपांच्या अधीन जो नाहीं, आपल्या क्रियांनीं जो बद्ध होत नाहीं, कमी-अधिक होत नाहीं, त्या पूर्ण स्वतंत्र आदि पुरुषाला (ब्रह्माला) त्याची गतिशील होण्याची शक्यता, वास्तवांत आणण्याची किंवा न आणण्याची पूर्ण मोकळीक आहे हें आम्हांला मान्य करावें लागेल. प्रकृतीच्या हुकुमानें चालणारें ब्रह्म हें वस्तुत: ब्रह्म नव्हेच. असलें प्रकृति-तंत्र ब्रह्म हें जड असें अनंत अस्तित्व मानलें पाहिजे; कारण या अस्तित्वाच्या पोटांत असणारें क्रियाशील तत्त्व, त्याला धारण करणाऱ्या अस्तित्वावर मात करतें; किंवा असें म्हणतां येईल कीं, हें प्रकृति-तंत्र ब्रह्म म्हणजे शक्ति धारण करणारा ज्ञानमय पुरुष आहे. परंतु हा पुरुष आपल्या अंकिताचा (शक्तीचा) अंकित झाला आहे. ब्रह्म ही मूळ सद्वस्तु आहे आणि मूळ शक्तिहि आहे आणि शक्तीचें अंकित ब्रह्म आहे म्हणजे ब्रह्म स्वतःचें अंकित आहे अशी कोटि केली, तर मूळ सद्वस्तूसंबंधाचा आपला सर्वोच्च सिद्धान्त आपण
पान क्र. १५८
अमान्य केल्यासारखें होणार आहे; कारण या शेवटल्या विवेचनाप्रमाणें मूळ सद्वस्तु ही वस्तुत: शक्तिस्वरूप आहे, असें म्हटल्यासारखें होतें. ही शक्ति स्थितिशील असेल किंवा गतिशील होईल -- ही शक्ति सर्वातीत स्वयंभू असेल, परंतु ती स्वयंभू सर्वातीत पुरुष असूं शकत नाहीं; मूळ सद्वस्तू ही सर्वातीत स्वयंभू ज्ञानमय पुरुष आहे असा तर आपला सर्वोच्च सिद्धान्त आहे.
आतां ज्ञानमय पुरुष आणि शक्ति अर्थात् ज्ञान आणि शक्ति, जाणीव आणि शक्ति यांच्या अन्योन्य संबंधाची चर्चा करणें अवश्य आहे. कारण जोपर्यंत यांचें परस्परांचें नातें स्पष्ट झालें नाहीं, तोंपर्यंत एकाचें स्थान दुसऱ्याला देण्याची चूक होणें अपरिहार्य आहे. या चर्चेंत आरंभींच ज्ञान (जाणीव) या कल्पनेचा अर्थ स्पष्ट करून घेणें अवश्य आहे. सामान्यत: या कल्पनेचा अर्थ, आपली जागृतींतील मानसिक जाणीव असा आपण घेतों. मनुष्य झोंपेंत नसतांना, त्याला मूर्छा आली नसतांना, झोंप किंवा मूर्छा यांखेरीज इतर कारणांनींहि संवेदना निर्माण करणाऱ्या स्थूल भौतिक बाह्य शारीर साधनांचा त्याला वियोग झाला नसतांना, शारीर अस्तित्वाच्या बव्हंश भागांत जागृतींतील जी मानसिक जाणीव त्याला असते, तिला आपण ज्ञान (जाणीव) हें नांव सामान्यत: देत असतो. या दृष्टीनें पाहतां, जाणीव ही भौतिक जगाचा नियम नसून ती अपवादभूत असते हें उघड आहे. असली जाणीव आम्हांलाहि नेहमी उपलब्ध नसते. परंतु जाणीव या कल्पनेचा हा अर्थ सामान्य विचारक्रमांत आणि सामान्य संदर्भांत जरी अद्यापि मान्य असला, तरी तत्त्वज्ञानविषयक मीमांसेंत जाणीवेच्या स्वभावाची ही प्राकृत उथळ कल्पना सर्वथा निश्चितपणें बहिष्कृत होणें अगदीं आवश्यक आहे. कारण, आपणाला हें ठाऊक आहे कीं, आम्ही गाढ झोंपेंत असतां, कांहीं औषधानें किंवा इतर कारणानें आम्ही मूर्च्छेंत किंवा बेशुद्धींत असतां, आमच्या स्थूल शारीर पुरुषाच्या दर्शनी जाणीव शून्य अशा सर्व अवस्थांत, आमच्यांतील कांहीं एक वस्तु जाणीवयुक्त असते. इतकेंच नव्हे तर आम्हांला प्राचीन विचारवंतांनीं सांगून ठेवलेली जाणिवेसंबंधाची एक गोष्ट आम्ही नि:शंकपणें खरी मानावी अशी आहे. ती गोष्ट ही कीं, आमच्या जागृत अवस्थेंत जी जाणीव म्हणून आम्ही ओळखतो, ती जाणीव म्हणजे आमच्या एकंदर ज्ञानमय अस्तित्वाचा फार थोडा भाग असतो. ही आमची जागृतीची जाणीव केवळ शारीर, पृष्ठभागावरची असते;
पान क्र. १५९
आमची मानसिक जाणीव देखील तिच्यांत सर्वच्या सर्व अंतर्भूत होऊं शकत नाहीं. जागृतीच्या या जाणिवेपाठीमागें अंतर्मन असतें, अर्धजागृत मन असतें. या मनांत आमची पुष्कळशी, अर्ध्याहून अधिक जाणीव राहते. येथें खोल भाग असतात, उंच भाग असतांत -- ज्यांची खोली, ज्यांची उंची अद्यापि कोणाहि मानवास मोजतां आलेली नाहीं. शक्तीचें व तिच्या कार्याचें खरें शास्त्र सिद्ध करण्यास आरंभींची पायरी म्हणून हें ज्ञान आपणांस उपयुक्त ठरतें. भौतिकाची चौकट व दर्शनी देखाव्यानें निर्माण होणारा भ्रम यांच्या कचाट्यांतून या ज्ञानामुळें आपण पार होऊन, आद्यशक्तीच्या स्वरूपाचा व कार्याचा विचार मोकळेपणानें करूं शकतों.
जडवाद आग्रहानें असें प्रतिपादन करतो कीं, जाणीव कितीहि विस्तृत क्षेत्र व्यापणारी असो, ती भौतिक घटना आहे; आमच्या स्थूल शारीर इंद्रियांपासून ती अलग कल्पितां येत नाहीं; इंद्रियांचा उपयोग करून घेणारी ती एक स्वतंत्र वस्तु नसून त्यांचा ती परिणाम आहे. हें भौतिकवादाचें परंपरागत मत आतां संशयानें व्याप्त झालेलें आहे; जसजसें ज्ञान वाढत आहे, तसतशी या मताची पक्कड ढिली होत आहे. या उपपत्तीनें वास्तव गोष्टींचें स्पष्टीकरण पुरतेपणीं होईनासें झालें आहे. हें स्पष्टीकरण करण्यांत बुद्धीला अधिक ताण द्यावा लागत असल्यामुळेंच या उपपत्तीची सदोषता उघड होत आहे. ही गोष्ट दिवसानुदिवस अधिकाधिक स्पष्ट होत आहे कीं, आमच्या एकंदर जाणिवेची समर्थता आमच्या अवयवांच्या, इंद्रियांच्या, नाड्यांच्या व मेंदूच्या सामर्थ्याहून पुष्कळच अधिक असतें; इतकेंच नव्हे, तर आमचा सर्वसामान्य विचारक्रम आणि जाणीव यांना आमच्या अवयवांनीं निर्माण केलें नसून, आमचे अवयव हे त्यांच्या सवयींचीं झालेलीं त्यांच्या कार्यसिद्धीचीं साधनें आहेत. मेंदू हा, जाणीवेनें आपल्या ऊर्ध्वगामी धडपडीनें निर्माण केलेली वस्तु आहे आणि ती आपल्या कार्यासाठीं या वस्तुचा उपयोग करून घेत असते. जाणीव कांहीं मेंदूनें निर्मिलेली नाहीं. हा मेंदू जाणीवेचा साधन म्हणून उपयोग करीत नाहीं. आमचे अवयव अवश्य व अपरिहार्य अशीं साधनें आहेत हा सिद्धान्त ज्यामुळें टिकूं शकणार नाहीं, अशींहि कांहीं असाधारण उदाहरणें सांपडतात -- हृदयाचें स्पंदन किंवा श्वास-उच्छ्वास हे जगण्यास अगदीं आवश्यकच आहेत असें नाहीं. तसेंच विचारासाठीं मेंदुगत संघटित पेशीहि आवश्यक नाहींत. एंजिन चालविणारी वाफ किंवा वीज एंजिनमुळें उत्पन्न झालेली नसते. एंजिनची रचना कांहीं वाफेच्या
पान क्र. १६०
किंवा विजेच्या -- चालकशक्तीच्या -- अस्तित्वाचें स्पष्टीकरण करूं शकत नाहीं. हीच गोष्ट, आमचें शरीरयंत्र आणि विचारशक्ति व जाणिवशक्ति यांना लागूं आहे. शक्ति अगोदरच आहे. आमचें शरीरयन्त्र आधींचें व शक्ति त्या यन्त्राची निर्मिति अशी वस्तुस्थिति नाहीं.
शरीर निश्चेष्ट, जड होऊन पडलेलें असलें, तरीहि त्यांत मानसिक जाणीव असतें असें आपण पाहतो. त्यावरून आपण असें म्हणूं शकतो कीं, भौतिक पदार्थांत सर्वगामी अर्धजागृत मन असूं शकेल; या मनाला योग्य तें अवयवरूप साधन उपलब्ध नसल्यानें तें आपलें अस्तित्व पृष्ठभागीं व्यक्त करूं शकत नाहीं, इतकेंच. भौतिक जड अवस्था ही कांहीं जाणीवशून्य अवस्था नव्हे -- जाणीव सुप्त असलेली अवस्था होय. विकासक्रमाच्या सिद्धान्ताच्या दृष्टीनें ही सुप्तावस्था मूळ आदिम सुप्तावस्था समजावयाची; मनुष्याच्या सुप्तावस्थेप्रमाणें विकासाच्या कोठल्या तरी मधल्या पायरीवरील अवस्था समजावयाची नाहीं एवढेंच. मनुष्याची सुप्तावस्था म्हणजे जाणीव नाहींशी होणें नव्हे, तर ती, अंतर्यामीं एकीभूत होणें. जागृतावस्थेंत बाह्य वस्तूंच्या संसर्गाच्या प्रसंगीं जाणीवयुक्त शारीर-प्रतिक्रिया होत असते. त्या प्रतिक्रियेचा त्याग करून दूर आंत एकवटून निष्क्रिय होणारी जाणीव म्हणजे मनुष्याची सुषुप्ति, हें आपण जाणतोंच. ज्या निसर्गांत, ज्या अस्तित्वांत बाह्य भौतिक जगाशीं संबंध ठेवण्यासाठीं लागणारीं साधनें विकसित झालेलीं नाहींत, त्या निसर्गाची, त्या अस्तित्वाची अवस्था मनुष्याच्या सुषुप्तीसारखीच आहे, असें समजावयास कांहीं हरकत दिसत नाहीं. जें कांहीं सुप्त अवस्थेंत आहे, त्यांत नेहमीं जागा राहणारा ज्ञानमय पुरुष, ज्ञानमय आत्मा आहे असें मानावयास काय प्रत्यवाय आहे?
आपण यापेक्षांहि पुढें जाऊं शकतों. ज्याविषयीं वर सांगितले तें अर्धजागृत मन बाह्य मनाहून निराळया प्रकारचें असत नाहीं, तर तें पृष्ठभागाखालीं काम करतें इतकेंच. त्याचें काम जागृत माणसाला ठाऊक होत नाहीं; तरी त्याचें काम वरच्या मनासारखेंच, पण अधिक विस्तृत क्षेत्रांत व अधिक खोल भागांत होत असतेंच. अर्धजागृत मनाबरोबर अंतर्मनाचा (Subliminal) उल्लेख वरतीं आला आहे. या अंतर्मनाचा व्याप मात्र अर्धजागृत किंवा जागृत मनाच्या व्यापाहून फार मोठा असतो. त्याचें कार्य या दोन मनांहून सामर्थ्यामध्यें फारच मोठें असतें आणि त्याच्या कार्याचा प्रकारहि जागृत मनाच्या कार्याहून वेगळा असतो.
पान क्र. १६१
अंतर्मनाच्या कार्यामुळें आम्हांला उन्मनाच्या, अतिमनाच्या किंवा अतिमानसाच्या अस्तित्वाचा (मनाहून श्रेष्ठ अशा ज्ञानावस्थेचा) पुरावा मिळतो. या ज्ञानावस्थेंत, मनाच्या क्षेत्राहून फार मोठ्या क्षेत्रांत, ज्ञान ग्रहण करणाऱ्या आपल्या सामान्य मनापेक्षां श्रेष्ठ शक्ती सुसंघटितपणें काम करतात. ही अतिमनाची ज्ञानावस्था आपल्यामध्यें आपणाला उपलब्ध होण्यासारखी आहे. ह्या श्रेष्ठ अवस्थेपर्यंत अंतर्मन जर जाऊं शकतें, तर मन, अर्धजागृत मन यांच्या खालीं असलेल्या कनिष्ठ ज्ञानावस्थेंत तेंच अंतर्मन प्रवेश करूं शकणार नाहीं काय ? प्राणमय कोश व अन्नमय कोश यांजमध्यें जी जाणीव आहे, ती मन व अर्धजागृत मन यांच्या खालच्या पायरीवरची जाणीव होय. अशा प्रकारची जाणीव वनस्पतीमध्यें व धातूमध्येंहि दिसून येते. जाणीव किंवा ज्ञान हा शब्द मनुष्याच्या मानसिक जाणिवेला किंवा ज्ञानाला लावण्याचा जुना प्रघात आहे. मानसिक जाणिवेचें विशिष्ट स्वरूप मनाच्या वरहि नाहीं, किंवा खालींहि नाहीं. तेव्हां जाणीव हा शब्द, खालच्या किंवा वरच्या ज्ञानावस्थांना लावला कीं त्याचा अर्थ, मानसिक जाणिवेहून वेगळा आहे, एवढे लक्षांत ठेवावयास हवें. असो.
मनाहून खालच्या पातळीवर जाणीव असते कीं नाहीं अशी शंका घेतली जाते. आपल्या शरीराच्या पेशींमध्यें आणि स्वयंचालित प्राणक्रियांमध्यें प्राणीय जाणीव असल्याचें आम्हांला दिसून येते, कारण आपल्या पेशीकडून व प्राणक्रियांकडून कांहींतरी विशिष्ट उद्देशानें व तो उद्देश साधण्यासाठीं कांहीं हालचाल होत असल्याचे आम्हांला ठाऊक आहे, त्याचप्रमाणें कांहीं गोष्टींचें आम्हांला आकर्षण वाटतें, आणि कांहीं गोष्टींची घृणा वाटते.
पण या घृणेचा किंवा आकर्षणाचा आमच्या मनाशीं कांहीं संबंध नसतो -- शारीर पेशींच्या क्रियांनीं व प्राणक्रियांनीं आमचे जे उद्देश साधतात, त्यांचाहि मनाशीं संबंध नसतो. याप्रमाणें आमच्यांत प्राणीय जाणीव (Vital consciousness) असल्याचें सिद्ध होतें. मानवेतर प्राण्यांत ही प्राणीय जाणीव विशेषच महत्त्वाचें जीवनकार्य करीत असते. वनस्पतीमध्यें ही जाणीव अंत:स्फुरित ज्ञानाच्या स्वरूपाची असते. कांहींतरी मिळविण्याची धडपड व कांहीं वस्तूंपासून दूर होण्याची क्रिया वनस्पतींमध्यें दिसतें, त्यांच्यांत सुखाची, असुखाची उर्मि आढळून येते; त्यांच्यांत झोंप, जागृति याहि अवस्था आढळतात. भौतिक शास्त्रीय पद्धतीचा
पान क्र. १६२
कांटेकोर उपयोग करून एका महान् भारतीय वैज्ञानिकानें या सर्व गोष्टी सिद्ध केलेल्या आहेत; या सर्व जाणिवेच्या क्रिया आहेत -- पण अर्थात् च आम्ही ज्याला मन म्हणून ओळखतों, त्याच्या ह्या क्रिया नाहींत. या प्राणीय जाणिवेच्या आरंभींच्या प्रतिक्रिया मनासारख्या असतात; पण, ज्याप्रमाणें उच्च पातळीवरील अतिमानसी जाणिवेचें संघटन किंवा घडण मनाहून वेगळी असते, त्याचप्रमाणें मनाहून खालच्या पातळीवरील या प्राणीय जाणिवेचा स्वानुभव, तिच्या स्वानुभवाची घडण मनाहून वेगळ्या प्रकारची असते.
जाणिवेचा प्रांत वनस्पतीपर्यंत पोंचतो हें आपण पाहिलें; वनस्पतींचें जीवन प्राणिजीवनाच्या खालच्या प्रतीचें असतें व हें जीवन एका जाणिवेनें -- विशिष्ट प्राणीय जाणिवेनें -- चालतें याबद्दलची आपली शंका दूर झाली. पण जाणिवेचा प्रांत वनस्पतीच्या खालीं नाहीं असें आपण मानावयाचें काय? तसें आपण मानलें, तर असें म्हणावें लागेल कीं, जड द्रव्याशीं कांहीं नातें नसलेली एक जीवनाची व जाणिवेची शक्ति, कदाचित् दुसऱ्या जगांतून येऊन जड द्रव्यांत शिरते व स्थायी होतें* -- येथील जड-द्रव्यांत जर प्राण सुप्त नसेल, तर अर्थात् दुसऱ्या जगांतून तो येथें आला असें मानणें सयुक्तिक आहे. प्राचीन विचारवंत अशीं अनेक जगें मानीत. आमच्या जगांतील जीवन आणि जागृत असलेली जाणीव हीं जगें आपल्या प्रभावानें टिकवून धरतात, किंवा जागृत नसलेली जाणीव आपल्या दडपणानें जागृतींत आणतात, असें ते मानीत -- पण आपल्या प्रवेशानें आमच्या जगांत हीं दुसरीं जगें नसलेली जाणीव उत्पन्न करतात असें ते मानीत नव्हते. जडद्रव्यांत अगोदरच जें अंतर्भूत, अंतर्हित नाहीं, तें त्यांतून विकसित होऊं शकत नाहीं, असें तें मानीत.
आम्हांला हें त्यांचें मत पटावयास हरकत नाहीं. जीवन (प्राण) आणि जाणीव जड व ज्ञानशून्य दिसणाऱ्या भौतिक द्रव्यांत सुप्त अवस्थेंतहि असत नाहीं, जडद्रव्यापर्यंत ती खालीं उतरलेली आहे पण पुढें
*अशी एक विचित्र कल्पना प्रसृत झाली आहे कीं, येथें पृथ्वीवर जीवन आले ते दुसऱ्या जगतांतून नव्हे तर दुसऱ्या ग्रहावरून आलें. पण विचारवंताला हें स्पष्टीकरण पुरेसें वाटणार नाहीं. कोणत्याहि किंवा कोठल्याहि जडद्रव्यांत प्राण-तत्त्व (जीवन) आलें कसें, हा मूळ प्रश्न आहे, विशिष्ट ग्रहाच्या जड द्रव्यांत तें कोठून शिरलें हा मूळ प्रश्न नव्हे.
पान क्र. १६३
ती जडद्रव्यांत शिरलेली नाहीं असें मानावयास कांहीं कारण दिसत नाहीं. संशोधन जसें वाढत आहे, तसें हें स्पष्ट होत आहे कीं, धातूंमध्यें, जमिनीमध्यें आणि इतर जीवनरहित आकारांमध्यें अस्फुट असें जीवन, दडपलेली गतिशून्य अशी जाणीव -- निदान पुढें ज्या गोष्टीला जाणिवेचें स्वरूप येतें अशी कांहीं गोष्ट -- वसति करून आहे. एवढेंच कीं ज्याला आम्ही प्राणीय जाणीव म्हणतो, ती अस्पष्टपणें कां होईना वनस्पतीमध्यें जशी प्रतीत होते, ओळखतां येते, तशी गतिशून्य रूपांतील जाणीव, जड-लीन जाणीव आम्हांला सुलभपणें प्रतीत होत नाहीं, सुलभपणें कल्पितां येत नाहीं; आणि आम्हांला कळायला किंवा कल्पना करायला जें अवघड तें अस्तित्वांतच नाहीं, असा सिद्धान्त करण्याचा आम्हांला अधिकार आहे असें आम्ही समजतों. तथापि वनस्पतीपर्यंत जाणिवेचा प्रत्यय आम्हांला आल्यानंतर त्या वनस्पतिवर्गाच्या खालीं, जाणीव नसलेली ओसाड दरी निसर्गांत आहे, अशी कल्पना करणें आम्हांला कठीण जातें. असल्या जाणीवशून्य निसर्ग-विभागावर आमचा विश्वास बसत नाहीं. निसर्गांत एकरसता असावी, निसर्गाच्या सर्व विभागांत जाणिवेच्या बाबतींत एकरूपता असावी असा विचार, विचारशक्ति आम्हांस सुचविते व असा विचार सुचविण्याचा तिला अधिकार पोंचतो; कारण, निसर्गांतील जडद्रव्याचा भाग सोडतां, बाकी सर्व भागांतील वस्तू व घटना जाणिवेच्या बाबतींत एकरूपता दाखवितात, आणि जडविभागांतहि ही एकरूपता नाकारली जात नाहीं, केवळ इतर विभागांपेक्षां ती तेथें अधिक झांकलेली दिसते इतकेंच. तेव्हां निसर्गांत वरपासून खालपर्यंत सर्वत्र, जाणिवेच्या बाबतींत अखंड एकता आहे, असें आपण मानलें म्हणजे, शक्तीचे जितके प्रकार जगांत काम करीत आहेत त्या सर्वांचें पोटीं जाणीवशक्ति आहे असा सिद्धांत आपण करूं शकतो. सर्व रूपांत मनोमय पुरुष किंवा अतिमानसी पुरुष नसला, तरी त्या सर्वांत एक प्रकारची जाणीवशक्ति असून, त्या रूपांचा अगदीं बाहेरचा, अगदीं वरचा भाग देखील स्पष्टपणें किंवा गुप्तपणें जाणिवेनें युक्त असतो एवढें तरी आपण मानूं शकतो.
या निसर्गविषयक दर्शनांत, विवेचनांत, जाणीव या शब्दाचा पूर्वींचा परंपरागत अर्थ मात्र राहत नाहीं. जाणीव म्हणजे मन, असा परंपरागत सर्वसामान्य अर्थ बदलून जाणीव म्हणजे स्वत: स्वतःला ओळखणारी, जाणणारी अस्तित्वाची क्रियाशक्ती असा अर्थ घ्यावा लागतो. मन ही एक
पान क्र. १६४
अशी मधल्या ठिकाणची शक्ति आहे. मनाच्या पातळीखालीं ही अस्तित्वशक्ति प्राणमय आणि जड भौतिक हालचालींत व्यक्त होते. या हालचाली आपण अर्धजागृत मनाच्या सदरांत घालतों; मनाच्या वरच्या प्रदेशांत ही अस्तित्वशक्ति अतिमानस-शक्ति म्हणून काम करते. तेथें तिला अतिमानसी जाणीव म्हणतात. पण खालपासून वरपर्यंत ती एकच एक वस्तु आहे -- भिन्न ठिकाणीं तिनें आपली संघटना भिन्न करून घेतली आहे इतकेंच. भारतीय तत्त्वज्ञानांत 'चित्' म्हणून जी शक्ति कल्पिलेली आहे, तिचें स्वरूप वर वर्णन केल्याप्रमाणेंच आहे. एकच चित्-शक्ति अनेक रूपें धारण करून अनेक जगें निर्माण करते, अशी भारतीय तत्त्वज्ञानाची शिकवण आहे. मन हें जडाहून वेगळी शक्ति असूं शकत नाहीं, जडशक्तीचाच विकास होऊन मन बनलें आहे, असें एकतेचें प्रतिपादन भौतिक शास्त्रहि आपल्या बाजूनें करतें. भारतीय तत्त्वज्ञान खोलांत खोल विचार करून, भौतिक शास्त्राच्या उलट असें प्रतिपादन करतें कीं, मन आणि जडद्रव्य एकाच शक्तीचीं भिन्न अवस्थेंतील रूपें आहेत, अस्तित्वाची एकच जाणीवशक्ति भिन्न संघटित रूपें धारण करून मन बनते, जडद्रव्य बनते.
पण जाणीव-शक्ति, चित्-शक्ति हें नांव आद्यशक्तीला देणें योग्य आहे कीं नाहीं, हा एक प्रश्न उद्भवतो. जाणीव किंवा ज्ञान या कल्पनेंत बुद्धि, हेतुपुरस्सरता किंवा आत्मभान यांचा अंतर्भाव होतो. आमच्या मनाला परिचित अशा प्रकारची बुद्धि, हेतुपूर्वकता, आत्मभान आद्यशक्तीच्या जाणिवेंत, ज्ञानांत अनुभवास येत नसली, तरी थोड्या वेगळ्या प्रकारची कां होईना, ही त्रयी आद्य शक्तींत अनुभवास येत असेल तरच तिला, त्या शक्तीला, जाणीव किंवा ज्ञान हें नांव देतां येईल. ही कसोटी आद्यशक्तीला लावल्यास असें दिसून येईल कीं, विश्वांत जाणीवयुक्त शक्ति काम करीत आहे या विधानाला त्यामुळें बळकटीच येते. मानवेतर प्राण्यांची गोष्ट घ्या. या प्राण्यांची मनाची शक्ति अगदींच अल्प असते. या अल्पशक्तीच्या मानानें फारच पलीकडे असलेलें भौतिकशास्त्रीय सूक्ष्म ज्ञान, आणि ज्यांत पूर्ण हेतुपूर्वकता स्पष्टपणें प्रत्ययास येते अशीं कामें हें मनुष्येतर प्राणी करतांना दिसतात. मनुष्येतर प्राण्यांत हें जें सूक्ष्म शास्त्रीयज्ञान व योजनेचें पूर्णत्व प्रत्ययास येतें, तें ज्ञान व पूर्ण नियोजन मनुष्याला पुष्कळ काळपर्यंत शिक्षण घेऊन व अभ्यास करूनच बऱ्याच प्रमाणांत कमावता येत असलें, तरीहि मनुष्येतर प्राणी या सूक्ष्म ज्ञानाचा व नियोजनाचा प्रयोग जितक्या त्वरेनें व यशस्वीपणें करूं शकतात, तितक्या
पान क्र. १६५
त्वरेनें व यशस्वितेनें मनुष्याला आपलें ज्ञान व नियोजनकौशल्य उपयोगांत आणतां येत नाहीं. तेव्हां मनुष्येतर प्राण्यासंबंधानें व मनुष्यासंबंधानें जी सर्वसाधारण ज्ञानविषयक वस्तुस्थिति अनुभवास येते, तिच्यावरून असें म्हणतां येतें कीं, पृथ्वीवर कोणत्याहि व्यक्तीमध्यें जी सर्वांत उच्च अशी मानसिक शक्ति व्यक्त झालेली आहे, त्या शक्तीपेक्षां श्रेष्ठ अशी जाणीवशक्ति, कीटकवर्गांत व पशुवर्गांत काम करीत आहे. या जाणिवेंत उच्चतम मानवी मनापेक्षां अधिक बुद्धि आहे, अधिक हेतुपुरस्सरता किंवा नियोजनकौशल्य आहे, आपल्या हेतूंचें, आपल्या प्रयोजनांचें साधनांचें, परिस्थितीचें अधिक सूक्ष्म व नि:संशय असें ज्ञान आहे. जी गोष्ट सजीव निसर्गाची तीच अजीव मानल्या जाणाऱ्या निसर्गाचीहि आहे. तेथेंहि पशुवर्गाप्रमाणें, कीटकवर्गाप्रमाणें सर्वश्रेष्ठ गुप्त बुद्धि सर्वत्र काम करतांना आढळते. श्वेताश्वतरांत सांगितल्याप्रमाणें आपल्या गुणांनी अर्थात् क्रिया-प्रक्रियांनीं झांकून टाकलेली 'देवात्मशक्ति', सर्वश्रेष्ठ बुद्धि किंवा ज्ञानशक्ति, सर्वत्र काम करीत आहे.
या ज्ञानशक्तीच्या सार्वत्रिकतेविरुद्ध जो एक मुद्दा उपस्थित केला जातो, तो निसर्गांत आढळून येणाऱ्या निरर्थक क्रियांचा. निवडीचें, परिस्थितीशीं जुळवून घेण्याचें, विशिष्ट आकांक्षेनें हालचाल करण्याचें, हें सर्व बुद्धीचें हेतुपुरस्सर कार्य निसर्गांत चाललें आहे; या सर्व हेतुपुरस्सर कार्याच्या मुळाशीं, जाणीवयुक्त, बुद्धियुक्त कोणीतरी असलें पाहिजे या कल्पनेला विरोध करणारी निसर्गांतलीच एक गोष्ट म्हणजे, त्याच्या कार्यांत जो अर्थशून्य निरुपयोगी गोष्टींचा भरणा असतो किंवा दिसतो ती होय. आद्यशक्ति ही ज्ञानशक्ति आहे या सिद्धान्ताला बलवान् विरोध करणारा वस्तुत: हा एकच मुद्दा आहे. पण त्याला कारण आमची अगदीं मर्यादित अशी मानवी बुद्धि आहे. सर्वस्थळीं, सर्वकाळीं चालणाऱ्या विश्वशक्तीच्या क्रियांना मर्यादित मानवी बुद्धि आपलें युक्तायुक्ततेचें, निरर्थक-सार्थकतेचें मोजमाप लावूं पाहते. हें मोजमाप मानवी मर्यादित उद्दिष्टाच्या दृष्टीनें बरोबर असलें, तरी विश्वशक्तीच्या महाव्यापक संसाराला हें एकदेशीय बुद्धिवादी मोजमाप जाणूनबुजून लावणें चुकीचें ठरतें. कारण निसर्गाच्या हेतूचा, प्रयोजनाचा एखादा अंश आपण पाहूं शकतो, जाणूं शकतो. त्या अल्प प्रयोजनाला जें उपयुक्त नाहीं, तें सारें निरुपयोगी व निरर्थक, असें आम्हीं म्हणत असतो. आमचें मानवी कार्य पाहिलें, तर त्यांतहि विशिष्ट व्यक्तीच्या दृष्टीनें पुष्कळशी निरर्थकता नजरेस येते,
पान क्र. १६६
तथापि या निरर्थक वाटणाऱ्या गोष्टी विश्वाच्या व्यापक हेतूंच्या दृष्टीनें उपयुक्त असतात, हेंहि आपण पाहूं शकतो. किंवा असेंहि म्हणतां येईल कीं, या निरर्थक भासणाऱ्या गोष्टींच्या मदतीनेंच निसर्ग आपला हेतु सफल करतो. आपल्याला निसर्गाचे जे हेतू कळतात, त्यासंबंधांनें ही गोष्ट लक्षांत घेतां, त्याचे जे हेतू आपल्याला कळत नाहींत, त्यांच्यासंबंधानें आपण निसर्गावर असा विश्वास ठेवण्यास हरकत नाहीं कीं, आमच्या अल्पदर्शी मानवी बुद्धीला निरर्थक वाटणाऱ्या गोष्टींच्या द्वारां ते हेतू पूर्ण करून घेण्यास तो समर्थ आहे.
निरर्थक वाटणाऱ्या गोष्टी, निसर्गाच्या व्यापक दृष्टीनें निरर्थक नसतात, हें सत्य ओळखलें म्हणजे निसर्ग निर्माण करणारी व चलविणारी आद्याशक्ति ही ज्ञानशक्ति आहे, या सिद्धान्ताला निःसंदेह मान्यता मिळावयास कांहींच अडचण राहत नाहीं. कारण पशुवर्ग, वनस्पतिवर्ग व जड वर्ग या सर्वांत विश्वशक्तीची, आद्याशक्तीची जी नानाविध क्रिया चालते, तिच्यांत निश्चित प्रयोजनाची आद्य प्रेरणा असते. दर्शनीं आंधळी वाटणारी प्रवृत्ति डोळस मार्गदर्शन करते, ठरलें असेल तें प्रयोजन अविलंबानें किंवा थोड्या विलंबानें कां होईना पण निरपवादपणें निश्चितपणें सफल होतें, या गोष्टी कोणालाहि नाकारतां येण्यासारख्या नाहींत. जडद्रव्य हा विश्वारंभ व जडद्रव्य हाच विश्वाचा शेवट असें भौतिक शास्त्रज्ञांच्या बुद्धीला जोंपावेंतों प्रामाणिकपणें वाटत होतें, पटत होतें, तोंपावेतों, निसर्गांत दिसणाऱ्या बुद्धियुक्त क्रियांचें मूळ कोणी श्रेष्ठ बुद्धीच असली पाहिजे, या कल्पनेला सत्य म्हणून मान्यता देणें वैज्ञानिकांना साहजिकच अप्रमाणिकपणाचें वाटे. परंतु आज ही स्थिति पालटली आहे. ''निसर्गाचें मूळ, बुद्धिशून्य व ज्ञानशून्य आंधळी प्रेरणा आहे; त्या मूळ आंधळ्या प्रेरणेंत, त्या मूळ नेणिवेंत, मानवी जाणिवेचें, बुद्धीचें, वा मानवी सामर्थ्याचें कसलेंहि अगदीं प्राथमिक स्वरूप देखील अंतर्भूत, अंतर्हित नव्हतें -- तरीपण त्या मूळ नेणिवेंतून मानवी जाणीव उदयास आली'', हा विरोधात्मक सिद्धान्त आज जीर्ण व निर्बुद्ध कल्पनांच्या वर्गांत जाऊन बसला आहे. मानवी जाणीव ही निसर्गाच्या जाणिवेचा एक प्रकार आहे, असलाच पाहिजे; निसर्गांत जाणीव असल्याशिवाय मानवांत जाणीव येऊं शकत नाहीं, हें सत्य आतां स्पष्ट झालें आहे. निसर्गांत मनाचा उदय होण्यापूर्वीं, जाणीव दुसऱ्या कमीअधिक गुप्त रूपांत काम करीत असते; नंतर ती जाणीव मानवांत मनाचें रूप घेते, आणि मनाच्या नंतर
पान क्र. १६७
मनापलीकडील श्रेष्ठ रूपेंहि ती धारण करणार आहे, अशी खरी स्थिति आहे; कारण विश्वाची उभारणी करणारी आद्यशक्ति ही जाणीवशक्ति आहे, ज्ञानशक्ति आहे; आणि या विश्वांत व्यक्त होणारें आद्य अस्तित्व, आद्य सद्वस्तु हा ज्ञानमय पुरुष आहे. विश्व म्हणजे अनंत रूपांचा संसार. ज्ञानमय पुरुषानें आपल्या ज्ञानशक्तीच्या द्वारां हा जो संसार निर्माण केला आहे, तो कशासाठीं, याचा विचार केल्यास असें म्हणावें लागतें कीं, त्या ज्ञानमय पुरुषांत जें जें कांहीं बीजरूपानें आहे, तें तें सर्व व्यक्त व्हावें, साकार व्हावें व ही साकारता सर्वथा पूर्ण अशी व्हावी हा एकच, या आकारमय विश्वाच्या निर्मितीचा, आविष्काराचा उद्देश आहे. आपल्या बुद्धीला पटण्यासारखें असें हें एकच उत्तर दिसते.
पान क्र. १६८
प्रकरण अकरावें
अस्तित्वाचा आनंद -- प्रश्न
जर आम्हांला हा अस्तित्वाचा आनंद आकाशाप्रमाणें वसतीसाठीं नसतां, तर कोण येथें श्वासोच्छ्वास करूं शकतें, कोण येथें जीवन जगूं शकतें?
- तैत्तिरीय उपनिषद् २.७
हीं सर्व भूतें आनंदांतून जन्मास येतात, आनंदाच्या आश्रयानें जगतात आणि वाढतात, शेवटीं आनंदांत परत विलीन होतात.
- तैत्तिरीय उपनिषद् ३.६
सर्व वस्तुजाताचा आरंभ, शेवट व त्या वस्तुजाताला आपल्या पोटांत सामावून घेणारी अशी अनादि वस्तु म्हणजे शुद्ध अस्तित्व, सद्वस्तु हें आम्हीं मान्य केलें; या ब्रह्माचे पोटीं त्याच्या अस्तित्वापासून अलग न करतां येण्यासारखें, त्याचें स्वाभाविक असें आत्मज्ञान आहे; हें त्याचें ज्ञान स्थितिशीलता टाकून गतिशील ज्ञानमय शक्तीचें रूप घेऊन बाहेर पडून अनेक शक्ती, अनेक रूपें, अनेक जगें निर्माण करतें हेंहि आम्हीं मान्य केलें. पण अद्यापि एका मोठ्या प्रश्नाचें उत्तर आम्हीं जाणूं इच्छितों; तो प्रश्न हा कीं, जर ब्रह्म हें पूर्ण आहे, अनादि आहे, अनंत आहे, त्याला जर कोणत्याहि गोष्टीची उणीव नाहीं, आणि कसलीहि इच्छा नाहीं, तर त्यानें आपली ज्ञानशक्ति पुढें करून तिच्या द्वारां स्वत:चे पोटीं हीं अनंत रूपांनीं, आकारांनीं भरलेली विश्वें कां निर्माण करावीं ? या बाबतींत असें एक उत्तर देतां येतें कीं, या ब्रह्माची ज्ञानशक्ति, ब्रह्माची इच्छा नसतांहि त्याजकडून निर्मितीचें कार्य करविते; ब्रह्मात जी गतिशीलता व रूपशीलता सुप्तगुप्त बीजरूपानें वास करतें, ती ब्रह्मावर त्याच्या इच्छेविरुद्ध अधिकार चाल-
पान क्र. १६९
वून त्याला अनंत रूपें धारण करावयास लावते. - पण हें उत्तर आम्हीं अमान्य केलें आहे. कारण वस्तुस्थिति अशी आहे कीं, ब्रह्मांत अनंत रूपें धारण करण्याची जी सुप्तगुप्त शक्ति आहे त्या शक्तीनें तें बांधलेलें नाहीं, या शक्तीचा त्याजवर अधिकार चालत नाहीं; -- तें स्वतंत्र आहे, शक्तितंत्र नाहीं. तेव्हां ब्रह्म हें नित्य निश्चल राहण्यास किंवा निश्चलता टाकून चंचलता धारण करण्यास सर्वस्वी स्वतंत्र आहे; रूपें धारण करण्यास किंवा रूपें धारण करण्याची स्वतःची शक्ति तशीच नेहमीं सुप्त ठेवण्यास पूर्णपणें मोकळें आहे; असें असतां तें आपली गतिमान् होण्याची व रूपवान् होण्याची शक्ति कार्यान्वित करतें तें कां, कशाकरितां, कोणत्या हेतूनें ? या प्रश्नाचें उत्तर 'आनंदाकरिता' हें एकच संभवतें. निश्चल निराकार अस्तित्वांत आनंद आहे, तसाच चंचल साकार अस्तित्वांत आनंद आहे म्हणून निश्चल ब्रह्म चंचल होतें, निराकार ब्रह्म साकार होतें.
वेदान्ती दृष्टीनुसार आदिम, अंतिम, अनंत शाश्वत अस्तित्व हें, 'दुसऱ्या कसल्याहि गोष्टी त्यांत नसलेलें असें केवळ अस्तित्व' नव्हे; किंवा ज्याची जाणीव प्राकृत संस्कारहीन रुक्ष अशा शक्तीच्या स्वरूपाची आहे असें 'जाणीवयुक्त अस्तित्व,' देखील नव्हे; तर ज्या अस्तित्वाचा व जाणिवेचा गाभा निर्भेळ आनंद आहे असें जाणीवयुक्त अस्तित्व हें तें मूळ अस्तित्व होय. अनादि पूर्ण अस्तित्वांत कसलेंहि अनस्तित्व असूं शकत नाहीं, कसल्याहि प्रकारची नेणिवेची रात्र त्यांत असू शकत नाहीं, त्यांत कसलीहि शक्तीची उणीव, अक्षमता असू शकत नाहीं -- कारण यांपैकीं एखादी गोष्ट त्या अस्तित्वांत असेल, तर तें अस्तित्व 'अनादि, आदिम व पूर्ण' मानतां येणार नाहीं. अनादि पूर्ण अस्तित्वाविषयीं वरील गोष्टी जशा निश्चयानें सांगतां येतात, तसेंच हेहि सांगतां येतें कीं, त्यांत कसल्याहि प्रकारचें दु:ख असूं शकत नाहीं, आनंदाचा अभाव तेथें असूं शकत नाहीं. जाणीवयुक्त अस्तित्वाची पूर्णता म्हणजे त्याची अमर्याद आनंदमयता. 'अमर्याद आनंदमय अस्तित्व' व 'पूर्ण जाणीवयुक्त अस्तित्व' या दोन शब्दसमुच्चयांनीं एकच गोष्ट दाखविली जाते. जें कांहीं अमर्यादित, अनंत अनादि व पूर्ण असतें तें शुद्ध आनंदरूपहि असतें. आम्हां सापेक्ष व अपूर्ण मानवांना असा अनुभव येतो कीं, आम्ही जेव्हां असमाधानी असतो, तेव्हां कांहीं तरी मर्यादा, कांहींतरी व्यत्यय आमच्या असमाधानाला कारण असतो. आमच्यापासून जें कांही
पान क्र. १७०
काढून घेतलेलें आम्हांला परत मिळालें, आम्ही मर्यादा उल्लंघूं शकलों, आम्हीं व्यत्यय दूर करूं शकलों म्हणजे आम्हांला समाधान वाटतें, संतोष वाटतो. हें असें असण्याचें कारण, आमचें मूळ अस्तित्व निरपेक्ष, पूर्ण आहे. तें आपली अनंत अमर्याद आत्मजाणीव आणि आत्म-सामर्थ्य पूर्णतया स्वत:पाशीं बाळगून आहे, आणि अशा प्रकारची आत्मस्वाधीनता म्हणजेच आत्मानंद होय. आम्ही आपली परापेक्षता टाकून जितक्या प्रमाणांत आमची मूळ पर-निरपेक्षता, आत्मस्वाधीनता जवळ करूं शकतो, स्पर्शूं शकतो, तितक्या प्रमाणांत समाधान, आनंद यांच्या जवळ आम्हीं जाऊं शकतो, त्यांना आम्ही स्पर्श करूं शकतो.
ब्रह्माचें स्वत:चें पूर्ण अस्तित्व गतिहीन, गतिविमुख शांत स्वरूपांत स्वत:च्या अधीन, पूर्ण स्व-तंत्र असण्यांत त्याचा आत्मानंद आहे. पण गतिविमुखतेनें तो बांधलेला नाहीं. ब्रह्माची जाणीवशक्ति ज्याप्रमाणें अनंत आकार अनंत प्रकारें धारण करूं शकते, त्याप्रमाणें त्याचा आत्मानंदहि अनंत प्रकारें गतिमान् होऊं शकतो, अनंत बदल धारण करूं शकतो. अगण्य विश्वाच्या अफाट पसाऱ्यांत या आत्मानंदाच्या अनंत प्रवाहांच्या व प्रकारांच्या प्रतिबिंबांचें दर्शनच आम्हांला घडतें. हा पसारा आत्मानंदामुळें, आत्मानंदासाठींच अस्तित्वांत आला आहे. ब्रह्माची शक्ति विस्ताराचा, निर्मितीचा खेळ खेळते. असा खेळ खेळण्यास ब्रह्म तिला मोकळीक देतें. यांत आपला आत्मानंद अनंत गतींनीं गतिमान् व्हावा व अनंत रूपांनीं रूपवान् व्हावा आणि या गतींचा व रूपांचा आस्वाद आपण चाखावा हा एकच ब्रह्माचा हेतु असतो.
तेव्हां हें आपण लक्षांत ठेवावयाचें आहे कीं, या विश्वांत जो आकारांचा पसारा आहे तो सच्चिदानंदाचा स्वयंनिर्मित पसारा आहे. सच्चिदानंद किंवा ब्रह्म हें त्रिमुखी एकमेव अद्वितीय तत्त्व आहे -- अस्तित्व, जाणीव आणि आनंद हे त्याचे तीन पैलू आहेत. या त्रिमुखी तत्त्वाची जाणीव किंवा ज्ञान म्हणजे ब्रह्माची निर्मितीची किंवा आत्मप्रकटनाची शक्ति होय. आकारांचे आणि घटनांचे अनंत प्रकार उभे करून आपल्या ज्ञानमय अस्तित्वाचा विविध आविष्कार करणें आणि या सर्व असीम विविधतेचा आनंद नित्य भोगणें, हें या ज्ञानशक्तीचें कार्य असतें. अर्थात् अस्तित्वांत असलेल्या सर्व वस्तू त्या ब्रह्माच्या अस्तित्वाला, जाणीव शक्तीला, आनंदाला व्यक्त रूप देणाऱ्या आहेत. एकाच अक्षर अस्तित्वाचीं (ब्रह्माचीं) बदलणारी रूपें म्हणजे विश्वांतील वस्तू, एकाच
पान क्र. १७१
अस्तित्वगत असीम शक्तीचीं सीमित कार्यें म्हणजे विश्वांतील वस्तू, हें जसें खरें आहे, त्याप्रमाणें त्या अस्तित्वाचा एकच सर्वव्यापी व सर्वदा सारखा असा जो आनंद, त्याची आत्मप्रकटनात्मक विविध रूपें म्हणजेहि विश्वांतील वस्तू हेंहि खरें आहे. अस्तित्वांत असलेल्या प्रत्येक वस्तूंत जाणीवशक्ति आहे आणि त्या वस्तूंचें अस्तित्व आणि तिचें विशिष्ट स्वरूप त्या जाणीवशक्तीनें निश्चित होतें; हें जसें तसेंच अस्तित्वांत असणाऱ्या प्रत्येक वस्तूंत अस्तित्वाचा आनंद आहे, आणि तिचें अस्तित्व आणि तिचें विशिष्ट स्वरूप या आनंदानें निश्चित होतें, हीहि वस्तुस्थिति आहे.
विश्वाच्या उदयाची, जन्माची ही उपपत्ति वेदान्ती तत्त्वज्ञानानें प्राचीन काळीं बसविली; या उपपत्तीमध्यें मानवी मनाला एकदम प्रबळ असा जो विरोधाभास वाटतो तो दोन कारणांनीं : एक कारण, शारीरिक आणि मानसिक दुःखाचें व दुसरें कारण, पापाच्या नैतिक प्रश्नाचें. प्रथम दुःखाच्या प्रश्नाची चर्चा करून नंतर पापाच्या प्रश्नाकडे वळूं. हें विश्व सच्चिदानंदाचा आत्माविष्कार आहे, म्हणजे जाणीव-शक्तिमय अस्तित्वाचा नव्हे, अनंत आनंदमय अस्तित्वाचाहि आविष्कार आहे असें प्राचीन वेदान्ती म्हणतात -- या जाणीव-शक्तीचा आविष्कार म्हणजे हें विश्व आहें हें आम्ही मान्य करूं शकतो. पण हें विश्व आनंदाचा आविष्कार म्हणावें, तर जें मानसिक व शारीरिक दुःख सर्वत्र अनुभवास येतें, त्याची वाट कशी लावावयाची ? हें विश्व अस्तित्वाच्या 'आनंदाचें घर' असण्यापेक्षां विविध 'दुःखांचेंच घर' आहे असेंच आमच्या प्रत्ययास येत असतें. पण या प्रत्ययाविषयीं प्रथम असें म्हणतां येतें कीं, यांत अतिशयोक्ति आहे; यांत कांहींसा दर्शनविषयक प्रमाद (error of perspective) आहे. या प्रश्नाकडे तिऱ्हाईत दृष्टीनें पहा; अगदीं अचूक आणि भावनाविवशतेपासून दूर असलेलें असें यासंबंधींचें मत बनविण्याच्या दृष्टीनें या प्रश्नाकडे पहा; असें केल्यास आपणास काय दिसेल ? अस्तित्वाचें, जीवनाचें एकंदर सुख, व त्याचें एकंदर दुःख यांची तुलना करतां, सुख हें दुःखाहून पुष्कळ अधिक असतें असें दिसेल. कांहीं वैयक्तिक अनुभव आणि वरवर पाहतां दिसणारें दुःख यावरून दुःखच अधिक आहे असें भासत असलें, तरी वरील सिद्धान्तच बरोबर आहे असें आपल्या प्रत्ययास येईल. निसर्गांतील सर्वसाधारण स्वाभाविक स्थिति पाहिली असतां, तेथें जीवन प्रकट किंवा अप्रकट सुखानें भरलेलें आहे असेंच दिसून येईल. अर्थात् तेथें दुःख मुळींच नसतें असें नव्हें; तें असतें, पण केवळ
पान क्र. १७२
अस्वाभाविक स्वरूपाचें असतें, थोडा वेळ टिकणारें असतें, स्वाभाविक सुखी स्थिति थोडावेळ स्थगित करणारें, किंवा तिच्यांत मिश्रण करून तिच्यांतील सुख कांहीं काळ किंचित् कमी करणारें, असें निसर्गांत दुःखाचें स्वरूप असतें. निसर्गांत दुःख हें स्वाभाविक नसून अपवादात्मक आहे. याच कारणामुळें जीवनांतील दुःख हें त्याहून कितीतरी अधिक असलेल्या सुखापेक्षां, आम्हांला अधिक तीव्रपणें भासमान् होतें आणि सुखाहून तें अधिक आहे असा आभास उत्पन्न करतें. सुख नेहमींचेंच व स्वाभाविक असल्यानें आम्ही त्याची फारशी कदर करीत नाहीं.-- तें सामान्यत: आमच्या लक्षांतहि येत नाहीं -- जर तें कांहीं कारणानें विशेष तीव्र स्वरूपांत परिणत झालें, सुखाची एक मोठी लाटच आमच्यावर आली, बेभान करणारी आनंदलहरी आमच्या वांट्यास आली, या लहरीच्या उच्चतम शिखरावर आम्हीं फेंकले गेलों, तरच आमच्या लक्षांत सुख भरतें व आम्हीं त्याला 'सुख' 'आनंद' असें नांव देतो; असें अपवादात्मक सुख मिळावे असा आम्ही हव्यास धरतो. जीवनाचें जें स्वाभाविक सुख, अस्तित्वाचें जें नेहमीचें सुख, ज्याला कांहीं घडणें न घडणें मुळींच महात्त्वाचें नसतें, विशिष्ट हेतूनें किंवा विशिष्ट पदार्थानें जें सुख कमी अधिक होत नाहीं असें जें अस्तित्वाचें स्वाभाविक नित्य सुख तें आम्हांला सामान्यत: आकर्षणहीन वाटतें. सुख किंवा दुःख कांहींच नांव आम्ही त्याला देत नाहीं. कारण तशा रूपानें तें आम्हांला भासतच नाहीं; स्पष्ट रूपांत सुखदुःख नसलेल्या तटस्थ वृत्तीच्या रूपानें तें आम्हांला भासते. पण तें नित्य सुख, निस्तरंग शांत असें सुख असतें, आमच्या अस्तित्वाशीं निगडित असें तें असतें; ही व्यवहारांतील न विसरण्यासारखी मोठी गोष्ट आहे. कारण सुख जर असें नसतें, तर आत्मसंरक्षणाची अर्थात् अस्तित्वाच्या संरक्षणाची, अस्तित्व टिकविण्याची अनिवार्य सर्वंकष सार्वत्रिक सहज-प्रेरणा असण्याचें कांहींच कारण नव्हतें. तथापि आम्ही ज्या सुखासाठीं धडपड करीत असतों, तें हें ''तटस्थ'' वृत्तीचें ''सुख'', निस्तरंग शांत सुख, नसतें. आमच्या मानसिक शारीरिक भावना-संवेदनांच्या लाभहानीच्या हिशोबांत आम्ही या तटस्थ निस्तरंग सुखाला कोठेंच जागा देत नाहीं. या हिशोबांत एका बाजूला आम्ही आमची स्पष्ट, प्रक्षोभक, सुखें मांडतों आणि दुसऱ्या बाजूला शारीरिक मानसिक दुःखें व असमाधान मांडतों; दुःख व असमाधान आम्हांला तीव्रपणें भासतें याचें कारण तें आमच्या अस्तित्वाच्या मूळ स्वभावधर्माशीं विरोधी आहे, न जुळणारें आहे, त्याला अपवादभूत
पान क्र. १७३
आहे; त्यामुळें असें दुःख आलें म्हणजे आमच्या स्वाभाविक जीवनक्रमावर कांहींतरी अत्याचार झाला आहे, असें आम्हांस वाटतें व जें जीवन आज नाहींतर उद्यां जगण्याचा आमचा सर्व खटाटोप आहे, त्या जीवनाला बाधक असा कोणीतरी बाहेरून त्याजवर हल्ला केला आहे -- असें आम्हांस वाटतें.
तथापि, दुःख हें अस्वाभाविक आहे, तें एकंदरीनें सुखापेक्षां अधिक किंवा कमी आहे हे मुद्दे अस्तित्वविषयक तत्त्वज्ञानाच्या दृष्टीनें गैरलागू आहेत -- दुःख असावेंच कां ? हा अस्तित्वविषयक तत्त्वज्ञानाचा प्रश्न आहे; सच्चिदानंद ब्रह्म हेंच जर सर्व कांहीं झालें आहे, तर मानसिक, शारीरिक दुःख असावेंच कां ? तें अस्तित्वांत कसें येऊं शकतें, हा मूळ प्रश्न आहे. या प्रश्नाचा विचार करतांना, विश्वाहून वेगळा व्यक्तिरूप ईश्वर आहे या कल्पनेची आणि त्याच्या अनुषंगानें उद्धवणाऱ्या नैतिक अडचणींच्या कल्पनेची त्यांत भेसळ करून या प्रश्नाचा विचार अवघड व गोंधळाचा करण्यांत येतो. यांपैकीं व्यक्तिरूप ईश्वराचा मुद्दा हा वस्तुस्थितीवर आधारलेला नाहीं आणि अशा ईश्वराच्या नीतिमत्तेचा मुद्दा हा एकांगी दृष्टीचा आहे. प्रथम पहिल्या मुद्याकडे वळू.
यांतील पूर्वपक्षाचा युक्तिवाद असा -- सच्चिदानंद ब्रह्म म्हणजेच ईश्वर आहे. हा ईश्वर ज्ञानमय पुरुष आहे आणि आज जें अस्तित्व, जें जीवन आहे तें त्यानें निर्माण केलें आहे. तेव्हां प्रश्न असा कीं, त्यानें असें जग कसे निर्माण केलें, जेथें निर्मिलेल्या प्राण्यावर तो दुःख लादतो, जेथें दुःखक्लेश त्याच्या अनुज्ञेनें स्वैर थैमान घालतात, जेथें पापहि त्याच्या संमतीनें घडतें ! ईश्वर तर सर्वथा साधुतेनें संपन्न असणार, तेव्हां दुःख व पाप जगांत दिसतें, तें कोण निर्माण करतो ? आपण जर अशी कल्पना केली कीं, विश्वांतील दुःख हें प्राण्यांच्या परीक्षेसाठीं आहे, प्राण्यांसाठींच त्यानें निर्मिलेलें तें एक दिव्य आहे, तर अशा ईश्वराच्या नीतिमत्तेचा प्रश्न येथें उभा राहतो. ईश्वर नीतिमान् नाहीं, अनीतिमान् आहे; निदान नीति-अनीतीची त्याला क्षिति नाहीं असें म्हणणें प्राप्त होतें. ईश्वर विश्वाचा उत्तम शिल्पकार आहे, कुशल मानसशास्त्रज्ञ आहे; पण तो साधुता व प्रेम या गुणांना पारखा आहे आणि म्हणून तो पूजेस पात्र नाहीं; केवळ तो शक्तिमान् व सत्ताधीश आहे म्हणूनच त्याचा कायदा आम्ही पाळला पाहिजे, त्याची लहर संभाळली पाहिजे असा याचा अर्थ होतो. फारतर त्याची लहर संभाळून त्याला अनुकूल करून
पान क्र. १७४
घेण्याची आशा फक्त आम्ही बाळगूं शकूं. अशा प्रकारचें ईश्वराचें वर्णन करावें लागतें. प्राण्यांच्या परीक्षेसाठीं व दिव्यासाठीं छळाचे विविध प्रकार शोधून उपयोगांत आणणारा हा ईश्वर एकतर बुद्धिपुरःसर क्रूरता करणारा आहे असें म्हणावें लागतें किंवा नैतिक संवेदनेला तो सर्वस्वीं पारखा आहे, तो नैतिक पुरुष असलाच तर निदान त्यानें निर्माण केलेल्या प्राण्यांच्या श्रेष्ठ नैतिक प्रेरणेपेक्षां त्याची नीतिविषयक भावना हिणकस दर्जाची आहे असें तरी म्हणावें लागतें. ही नीतिविषयक अडचण दूर करण्यासाठीं आम्ही असें म्हणूं शकतों कीं, दुःख हें नैतिक दुराचाराचें अटळ फळ असून दुराचाराचें साहजिक प्रायश्चित्त आहे; पण असें म्हटल्यानें आमचा नैतिक प्रश्न सुटत नाहीं. दुःख हें दुराचाराचें फळ आहे हें म्हणणें जीवनांतील वास्तव घटनांशीं जुळत नाहीं; आम्हीं कर्मसिद्धान्त मानला, पुनर्जन्म मानला आणि प्रस्तुत जन्मापूर्वींच्या काळीं दुसऱ्या शरीरांत असतांना केलेल्या पापांचें फळ प्राण्याला या शरीरांत, या जन्मांत भोगावें लागतें, असें मान्य केलें तर मात्र दु:ख हें दुराचाराचें फळ असें मानणें तर्कशास्त्रदृष्ट्या समर्थनीय ठरेल; असें झालें तरीहि मूळ नैतिक प्रश्न शिल्लक उरतोच. ज्यामुळें दु:खयातनारूप प्रायश्चित्त प्राण्याला भोगावें लागतें, ते नैतिक दुराचार कोणीं कसे व कां निर्माण केले ? नैतिक दुराचार हा वस्तुत: मानसिक रोगाचा, वा अज्ञानाचा एक प्रकार आहे, हें लक्षांत घेतल्यास असा प्रश्न उत्पन्न होतो कीं, मानसिक रोग वा अज्ञानाची क्रिया यांचें प्रायश्चित्त देणारा व तेंहि कधींकधीं अनन्वित राक्षसी छळाच्या स्वरूपाचें देणारा अटळ कायदा केला कोणी ? कर्माचा कठोर कायदा किंवा सिद्धान्त दयामय व सर्वश्रेष्ठ नीतिमान् व्यक्तिरूप ईश्वराच्या कल्पनेशीं जुळणारा नाहीं, हें लक्षांत घेऊन तर्कशुद्ध सुस्पष्ट विचार करणाऱ्या बुद्धानें असें प्रतिपादिलें कीं, सर्व विश्वावर सत्ता चालविणारा सर्वथा स्वतंत्र असा व्यक्तिरूप ईश्वर अस्तित्वांत नाहीं; सर्व प्रकारचें व्यक्तित्व ही अज्ञानाची निर्मिति असून तें कर्मसिद्धान्तानुसार कर्माचें अंकित आहे हें तत्त्वज्ञान त्यानें अंगीकारलें व प्रसृत केलें.
खरी गोष्ट अशी आहे कीं, विश्वांतील दु:खाचा प्रश्न सोडवावयास अतिशय अवघड होऊन बसण्याचें कारण आमची ईश्वराबद्दलची कल्पना आहे; ईश्वर वेगळा व विश्व वेगळें, हा ईश्वर आपल्यापासून वेगळें असें विश्व निर्माण करतो, तो स्वतः विश्वरूप नसतो; तो पाप व पुण्य, दुःख
पान क्र. १७५
व यातना निर्माण करतो पण स्वत: मात्र त्यांचेपासून वर अलिप्त राहून क्लेश भोगणाऱ्या व धडपडणाऱ्या जगाशीं स्वत:च्या मर्जीनुसार खेळ खेळून हुकुमत चालवितो व नजर राखतो; अथवा विश्वांतील चराचरावर एका निर्दय कायद्याची सत्ता तो विश्वेश्वर चालू देतो; त्या कायद्यानें जीवांना छळलें, तरी हा ईश्वर त्यांना साह्य करीत नाहीं किंवा केलें तरी तें पुरेसें नसतें; मग असा ईश्वर 'ईश्वर' राहत नाहीं, कारण तो सर्वशक्तिमान्, सर्वमंगलमय किंवा सर्वप्रेममय रहात नाहीं. विश्वाहून ईश्वर वेगळा आहे व तो नीतीला मान्यता देणारा आहे अशी कल्पना करून विश्वांतील पाप आणि दुःख यांच्या निर्मितीचें स्पष्टीकरण करतांच येत नाहीं. स्पष्टीकरणार्थ जो युक्तिवाद मांडण्यांत येतो, त्यानें समाधान तर होत नाहींच, उलट मुद्याचा प्रश्न बाजूला ढकलण्यांत येतो. किंवा विश्वाच्या मुळाशींच साधुता आणि असाधुता अशीं दोन स्वतंत्र तत्त्वें आहेत असें गृहीत धरून एक प्रकारचें द्वैत प्रकट वा अप्रकटपणें मान्य केलें जातें. अर्थात् हें द्वैत मान्य करणें म्हणजे ईश्वराचें ईश्वरत्व नाहींसें करणें आहे. या द्वैतानें ईश्वराच्या कृतीचा न्याय्यपणा दाखविण्याचा प्रयत्न केला जातो, किंवा ईश्वराच्या कृतीची तरफदारी करण्यांत येते; पण या द्वैतानें तें विशेषसें न साधतां ईश्वराचें 'ईश्वरत्व' मात्र नाहींसें करण्याचें चांगलें साधतें. ज्या ईश्वराची चर्चा येथवर आपण केली, त्या ईश्वराला वेदान्त मान्यता देत नाहीं. वेदान्ताचा ईश्वर सच्चिदानंद हा एकच एक परम तत्त्व, परम पुरुष आहे; तो एकच एक अद्वितीय अस्तित्व, सद्वस्तु आहे; जें कांहीं आहे तें तो एकटा आहे. अर्थात् या विश्वांत जर दुःख असेल, दुष्टपणा किंवा पाप असेल तर तें पाप व तें दुःख भोगणाराहि तो ईश्वरच आहे. ज्या प्राण्याला त्या दुःखाचा वा पापाचा ताप होत असेल, त्या प्राण्याचें रूप, त्या प्राण्याचें शरीर ईश्वरानेंच धारण केलें असल्यानें, ईश्वरच त्या प्राण्याच्या ठिकाणीं, त्या प्राण्याच्या रूपानें त्याचे भोग भोगीत असतो. ईश्वरासंबंधाचा हा वेदान्ताचा सिद्धान्त मान्य केला म्हणजे दुःखाच्या प्रश्नाचें स्वरूप अगदीं बदलून जातें. आपण स्वत: निर्मिलेल्या जीवांना ईश्वरानें दुःख आणि दुष्टता यांच्या चक्रांत घातलें, तें कां ? तो या चक्राच्या बाहेर स्वभावतःच असतो, कारण ईश्वराला दुःख होऊंच शकत नाहीं, आणि दुष्टता त्याचे ठिकाणी असूंच शकत नाहीं. पण असें असून जीवांना मात्र दुःखाच्या आणि दुष्टतेच्या चक्रांत त्यानें घातलें तें कां ? -- असा पूर्वींचा प्रश्न होता. वेदान्ती ईश्वराला हा प्रश्न
पान क्र. १७६
गैरलागू आहे. आतां प्रश्न असा आहे कीं, हा ईश्वर एकच एक अनंत सत्-चित्-आनंद असूनहि त्यानें, आनंदाच्या सरळ सरळ अभावाला, आनंदविरोधी तत्त्वाला स्वत:मध्यें कसें येऊं दिलें?
याप्रमाणें प्रश्नाचें स्वरूप बदलल्यानें नैतिक अडचण अर्धी नाहींशी होते. म्हणजे अगदीं समर्पक उत्तर न देतां येण्याजोगा नैतिक अडचणीचा भाग आतां उरत नाहीं; निरुत्तर करणारी अडचण प्रश्नाच्या नव्या मांडणींत रहात नाहीं. मीं दुसऱ्यांना क्रूरतेनें वागविलें किंवा वागवूं दिलें, स्वत: दूर राहिलों किंवा पश्चात्ताप वा दया दाखवून दुसऱ्यांच्या यातनांत सहभागी झालों किंवा उलट मी एकटाच एक सर्वत्र सर्वरूपांनीं असल्यामुळें त्या यातना स्वतःच स्वत:ला करून घेतल्या, तर माझ्या वागण्याचा दुसरा प्रकार पहिल्या प्रकाराप्रमाणें नीतिदृष्ट्या आक्षेपार्ह होऊं शकत नाहीं. तरीहि नैतिक आक्षेप थोड्या बदललेल्या स्वरूपांत पुढें आणतां येईल. सच्चिदानंद सर्वदा सर्वत्र सर्वथा आनंदरूप आहे. जो सर्वथा आनंदमय, तो सर्वथा साधुता-संपन्न आणि सर्वथा प्रेमसंपन्न अवश्यमेव असणार, तेव्हां अशा पुरुषांत असाधुता व दुःख कसें असूं शकतें, येऊं कसें शकतें ? या पुरुषाचें अस्तित्व यांत्रिक स्वरूपाचें नाहीं. हा जाणीवयुक्त स्वतंत्र पुरुष आहे; असाधुता आणि दुःख या गोष्टी दोषमय ठरवून स्वत:पासून त्यांना दूर करण्यास व ठेवण्यास तो पूर्ण मोकळा असतांना, त्याला या असाधुतेचा व दु:खाचा उपसर्ग होतो कसा ? हा उपसर्ग तो करून कां घेतो ? हा मांडलेला आक्षेप तर्कदुष्ट आहे, कारण त्यांत अपूर्ण विधेयांत उपयोजिलेली परिभाषा, संपूर्ण विधेयावर लादली गेली आहें. या विभक्ततेच्या संसारांत निर्माण होणाऱ्या व अपूर्ण जीवाजीवांमधील संबंधावर आधारलेल्या साधुता, प्रेम या द्वैती कल्पना आपण एकच एक, सर्वरूप सर्वानंद पुरुषोत्तमाच्या एकजिनसी, परिपूर्ण, मूळ स्वरूपाला लागू करीत आहोंत. तेव्हां हा आक्षेप बाजूस ठेवून प्रथम आपण मूळ प्रश्न त्याच्या शुद्ध स्वरूपांत कसा दिसतो व त्याचें उत्तर काय मिळूं शकते तें पाहूं; सर्व भेदांत अभेदरूप असें जें एकच एक आनंदरूप तत्त्व आहे, त्यानें आनंदविरोधी दिसणाऱ्या तत्त्वाला आपल्या आत्म्यांत जागा कशी दिली हा तो मूळ प्रश्न आहे. या प्रश्नाचा विचार अगोदर करून नंतर या एकाच्या विभागांचा व विकासक्रमांतील त्याच्या रूपांचा, उदाहरणार्थ विभक्तता आणि द्वैत या पायावर आधारलेल्या जीवाजीवांतील संबंधांचा आणि ते कसे व कां उत्पन्न होतात याचा विचार करू.
पान क्र. १७७
मानवी दृष्टिकोन व मानवी अडचण यांनीं आपणांस बांधून न घेतां, आपण अविभक्त एकतत्त्वमय विश्वरूपाचा विचार केला, तर असें दिसून येईल कीं, ज्यांत आपण राहतों तें विश्व, नीतीनें (अर्थात् मानवकल्पित नीतीनें) बांधलेलें नाहीं. सर्व निसर्गांत नीतिमय व्यवस्था बघण्याचा व हरप्रयत्नानें शोधून काढण्याचा मनुष्याच्या मनाचा आग्रह हा अकारण हट्ट असून त्यामुळें तो स्वत:च्या विचारांचा गोंधळ मात्र करून घेतो, व त्यामुळें विश्वविषयक खरें ज्ञान आणि समग्र दर्शन त्याला लाभत नाहीं. मनुष्यांत कांहीं विशेष आहे, मर्यादांनीं बांधलेला व त्याच्या सवयीचा झालेला असा एक व्यवहारगत आत्मा त्याला आहे; विकासक्रमांत त्याला एक विशिष्ट वैयक्तिक दृष्टिकोन त्याच्या प्रयत्नानें लाभलेला आहे -- हा आपला विशेष, आपला सवयीचा आत्मा व आपला दृष्टिकोन सर्वच निसर्गावर मनुष्य आरोपित करतो आणि तेथें नीतिदृष्ट्या अमुक बरें अमुक वाईट असे सर्व घटनांसंबंधांनें निकाल देत बसतो. हें त्याचें करणें अनुकंपनीय आहे. असो. वस्तुस्थिति अशी आहे कीं, जड निसर्ग नीति-अनीतीच्या कक्षेबाहेर आहे. या निसर्गांत जो कायदा शासनाचें काम करतो, तो वस्तुधर्मांच्या व निश्चित अशा वस्तुगत संवयींच्या संघटित सहकार्याचा कायदा आहे. हा कायदा चांगलें-वाईट, पाप-पुण्य, साधुत्व-असाधुत्व जाणत नाहीं; तो एक शक्ति जाणतो. निर्माण करणारी, निर्मित वस्तूंची व्यवस्था लावणारी, त्यांना टिकविणारी व या वस्तूंमध्यें अव्यवस्था निर्माण करून त्यांना नष्ट करणारी ही विविध प्रकारची शक्ति मात्र तो जाणतो. शक्तीचा हा कायदा बरेंवाईट हा नीतिविषयक विचार न करतां, या सर्व क्रिया नि:पक्षपातीपणें करीत असतो; या शक्तीच्या कायद्याच्या पोटीं गुप्त अशी ईश्वरी इच्छाशक्ति असते. ही ईश्वरी इच्छाशक्ति आपल्या लहरीप्रमाणें रूपें धारण करते व तीं रूपें आपल्या लहरीप्रमाणें नष्ट करते आणि या दोन्ही क्रियांत ती नि:शब्द असा आनंद अनुभवते. जड निसर्गाप्रमाणेंच प्राणिविषयक व प्राणविषयक निसर्गांतील कायदाहि नीतिनिरपेक्ष आहे. एवढेंच कीं, प्राणिसृष्टि जेव्हां एकावर एक वरच्या दर्जाचे प्राणी उदयास आणते, तेव्हां या प्रगतीच्या किंवा उन्नतीच्या क्रमांत हा निसर्ग अशा प्रवृत्ती उद्भूत करतो कीं, ज्यांतून वरच्या दर्जाच्या प्राण्यांत नीतिप्रेरणा उत्पन्न व्हावी, विकासक्रमानें उदयास यावी. वादळ अनेक वस्तूंचा विध्वंस करतें, अग्नि हाल करून जीव घेतो, म्हणून वादळाला व अग्नीला आम्ही नीतिदृष्ट्या दोष देत नाहीं; तद्वतच
पान क्र. १७८
वाघ भक्ष्य जनावराला मारून खातो म्हणून वाघालाहि आम्ही दोषी धरीत नाहीं आणि वादळामध्यें, अग्नीमध्यें व वाघामध्यें जी ईश्वरी जाणीव-शक्ति -- इच्छाशक्ति -- काम करते तीहि स्वत:ला दोष देत नाहीं, स्वत:चा धिक्कार करीत नाहीं. दोष देणें व धिक्कार करणें या क्रियांपासून अथवा अधिक काटेकोरपणें बोलावयाचें, तर स्वत:ला दोष देणें व स्वत:चा धिक्कार करणें या क्रियांपासून खरें नीतिशासन सुरू होतें. जोपर्यंत आपण दुसऱ्यांना दोष देतो व स्वत:ला दोष देत नाहीं, एकच कायदा आपणा स्वत:ला व इतरांना लागू करीत नाहीं, तोपर्यंत खऱ्या नीतीचा निर्णय आम्ही देतों असें होत नाहीं; नैतिक प्रेरणेनें व शास्त्रानें तयार केलेली भाषा केवळ आम्ही वापरतों इतकेंच. आम्हांला नाखुष करणाऱ्या व त्रासदायक होणाऱ्या गोष्टींबद्दल नापसंतीची भावना व्यक्त करण्यासाठीं आम्ही ही भाषा वापरीत असतो.
ही नापसंतीची अथवा घृणेची भावना नीतिशास्त्राच्या मूळ उगमस्थानीं आहे खरी, पण ही भावना स्वत:मात्र नैतिक नाहीं. वाघाला हरीण भितें, बलवान् प्राणी त्याच्यावर हल्ला करणाऱ्यावर संतापतो; ही भीति, हा संताप म्हणजे त्या त्या प्राण्याचा अस्तित्वाचा वैयक्तिक आनंद धोक्यांत आल्यानें उत्पन्न होत असतो. प्राण्याचा जीवनानंद धोक्यांत आल्यावर होणारी नैसर्गिक प्रतिक्रिया म्हणजेच ही भीति व हा संताप होय. प्राण्यांत मन जसजसें प्रगल्भ होतें, तसतशी हीच प्रतिक्रिया, शिसारी, नावड, नापसंति हीं संस्कारित रूपें धारण करते. आम्हांला भीतिदायक, त्रासदायक, इजा करणारें जें कांहीं असेल, तें आम्ही नापसंत करतों. आम्हांला खूष करणारें, संतोष देणारें जें काहीं असेल तें आम्ही पसंत करतों. या भावनांवर आणखी संस्कार होऊन आपल्या स्वत:च्या व इतरांच्या, आपल्या समाजाच्या व इतर समाजाच्या जें हिताचें, तें पसंत व अहिताचें तें नापसंत अशी हिताहित-विषयक पसंती-नापसंतीची सर्वसाधारण भावना उदयास येते. परंतु महत्त्वाची गोष्ट ही कीं, या भावनेचें स्वाभाविक मूळ-स्वरूप नंतरच्या प्रत्येक अवस्थेंत कायम राहतें. मनुष्य आत्मप्रकटन करूं इच्छितो, आत्म्याचा विकास, संवर्धन करूं इच्छितो; दुसऱ्या शब्दांत सांगावयाचें, तर मूळ अस्तित्वाची, सद्वस्तूची जी ज्ञानशक्ति तिची लीला स्वत:च्या ठिकाणीं प्रगत होत रहावी, अधिकाधिक उन्नत होत रहावी हें त्याला हवें असतें. त्याचा खरा, अगदीं आंतरिक पायाभूत आनंद अशा या आत्मप्रकटनलीलेंत, आत्मविकासलीलेंतच
पान क्र. १७९
आहे. या लीलेला जें बाधक असेल, त्याच्या विकासशील आत्म्याच्या समाधानाला जें प्रतिकूल असेल, तें त्याला अहितकारक असणार व वाटणार; जें कांहीं या विकासशील आत्म्याला साह्य करील, आधार देईल, उंच नेईल, विशाल करील, उदात्त करील तें त्याला हितकर असणार व वाटणार. आत्मविकासाची त्याची कल्पना मात्र बदलत जाते, हें लक्षांत ठेवणें अवश्य आहे. ही कल्पना क्रमाक्रमानें उंचावत व रुंदावत जाते; त्याच्या मर्यादित व्यक्तित्वाला मागें टाकून, इतर व्यक्तींचा व शेवटीं सर्वांचा समावेश ती त्यांत करते.
यावरून हें उघड होतें कीं, नीतिप्रेरणा ही विकासक्रमांतील एक पायरी आहे, पण विकासाच्या सर्व पायऱ्यांवर जी प्रेरणा काम करते ती सच्चिदानंदाची आत्माविष्काराची, आत्मप्रकटनाची प्रेरणा होय. ही प्रेरणा आरंभीं (जड सृष्टींत) नीतिनिरपेक्ष असते, नंतर प्राणिसृष्टींत ती आरंभीं नीतिनिरपेक्ष असून पुढें नीतीकडे अर्धवट वळलेली, पण नीति न कळलेली (नीत्यधोवर्ति, अधोनैतिक) अशी असते, नंतर बुद्धिमान् प्राण्यांत ती नीतिविरोधक देखील होते. दुसऱ्याला इजा करणें तिला पसंत असतें. पण तीच इजा स्वत:ला कोणी करणें हें तिला नापसंत असतें. या बाबतींत मनुष्यप्राणी आज देखील अर्धवट नीतिमान् (अर्ध-नैतिक) आहे. आम्हां मनुष्याच्या खालील जीवसृष्टि (व जडसृष्टि) नीतीच्या प्रांतांत नाहीं, अधोनैतिक प्रांतांत आहे. त्याप्रमाणें आमच्या प्रांताच्या वर -- नीतीच्या (नीति शब्दांत नीतिविरोधकता, अर्धनैतिकताहि येतात) प्रांताच्या वर असा प्रांत असूं शकेल, आहे, जेथे आम्हांला अंतीं जावयाचें आहे, आणि जेथें नीतिकल्पनेची आवश्यकता नाहीं; जो प्रांत अति-नैतिक आहे. नैतिक प्रेरणा व नैतिक वृत्ति ही मानवजातीला फारच महत्त्वाची वाटते आणि असतेहि पण ती एक साधनमात्र आहे; निसर्गांत नेणिवेच्या प्रांतांत सुसंवाद व व्यापक सर्वसमावेशकता असते पण नेणिवेमुळें तिला खालच्या दर्जाची म्हणतात. जीव, प्राण हा जड निसर्गांत उदयास आला म्हणजे व्यक्तित्व उदयास येतें व व्यक्तीव्यक्तींमधील विसंवाद उभे राहतात. या विसंवादांतून झगडत मार्ग काढून पुन: सुसंवादिता व सर्वसमावेशकता मानवी जीवांना साधावयाची असते. ही वरच्या दर्जाची म्हटली जाणारी सुसंवादिता व सर्वसमावेशकता साधावयास साधन म्हणून नैतिक प्रेरणा व नैतिक वृत्ति यांचा मानवास उपयोग होतो. ही नवी सुसंवादिता व सर्वसमावेशकता, सर्व अस्तित्वांतील चराचरांशीं ज्ञानपूर्वक
पान क्र. १८०
एकता संपादल्यानें सिद्ध होते, म्हणून तिला वरच्या दर्जाची म्हणतात. हें साध्य सिद्ध झालें म्हणजे त्याच्या साधनाची आवश्यकता संपते, नव्हे तें साधन अस्तित्वांतच राहत नाहीं. कारण हें नैतिक वृत्तीचें साधन ज्या मानवी गुणांवर व गुणविरोधांवर आपल्या अस्तित्वासाठीं अवलंबून असतें, ते गुण व गुणविरोध साध्य लाभाबरोबर किंवा त्याचे अगोदर नाहींसे झालेले असतात, सर्व चराचराशीं व्यक्तीचें ऐक्य, अंतिम अद्वैत स्थापित होण्यात नैतिकवृत्तीला आधारभूत असलेले सर्व गुणमय व गुणविरोधमय द्वैत सहजच समाप्त होत असतें आणि म्हणून अंतिम अद्वैत हें साध्य लाभलें म्हणजे द्वैतमूलक नैतिक प्रेरणा व प्रवृत्ति अस्तित्वांत राहत नाहीं.
नैतिक दृष्टिकोन हा विचारक्रमाच्या वाटचालींत एका विशिष्ट टप्प्यापुरतां अस्तित्वांत येतो, त्या टप्प्यांत, त्या विकासावस्थेंत या दृष्टिकोनाचें महत्त्व जरूर आहे. जीवसृष्टीखालीं जी सर्वसमावेशकता, विश्वात्मता, विश्वैक्य निसर्गाच्या व्यवहारांत असतें, तें मानवी जीवसृष्टींत पूर्णतया भंग पावतें व या द्वैताच्या अवस्थेंतून वर चढून पुन: जाणीवपूर्वक विश्वैक्य-अनुभव देणारी जी अवस्था मानव प्राप्त करून घेतो, ती नीतीच्या दृष्टिकोनाला मान देऊन प्राप्त करून घेतो. म्हणून या दृष्टिकोनाला फार महत्त्व आहे. कारण नेणिवेचें विश्वैक्य व जाणिवेचें विश्वैक्य यांमधील मोठा महत्त्वाचा प्रवास या दृष्टिकोनाच्या आधारें मानव करीत असतो. तथापि विश्वाचा प्रश्न सर्वच्या सर्व सोडविण्याला हा दृष्टिकोन उपयोगी पडूं शकत नाहीं; कारण तो सर्वस्पर्शी नाहीं, सार्वकालिक नाहीं. विश्वविकासाच्या एका विशिष्ट अवस्थेपुरता तो कांहीं काल मात्र असतो व काम करतो. विश्वाच्या प्रश्नाच्या उत्तरांत त्याला कांहीं स्थान आहे हें मात्र खरें, पण तें मर्यादित आहे हें विसरतां कामां नये. जें अंशमात्र उत्तर आहे, तें पूर्ण उत्तर समजून वागल्यास सत्याचा व वस्तुस्थितीचा पूर्ण विपर्यास होईल. नैतिक दृष्टिकोन सर्वत्र लावण्याचा आग्रह धरल्यास विश्वांतील सर्व वास्तव गोष्टी अवास्तव व खोट्या समजाव्या लागतील; आम्हां मानवांच्या पूर्वीं घडलेला विश्वविकास, व भावी विश्वविकास या दोन्ही विकासक्रमांचा अर्थ व उद्देश, नैतिक दृष्टिकोनाचा आग्रह धरल्यास, आम्हांला उमगणार नाहीं; हा अर्थ व हा उद्देश खोटा पडेल. विश्वाचे एकावर एक असे तीन थर आहेत, विभाग आहेत; अधोनैतिक, नैतिक आणि अतिनैतिक. या तीनहि विभागांत विद्यमान
पान क्र. १८१
असणारी गोष्ट आम्हीं शोधून काढली पाहिजे. विश्वाचा प्रश्न सोडवण्याचा हाच एक मार्ग आहे.
विश्वाच्या तीनहि विभागांत सर्वसामान्य अशी जी गोष्ट आपणाला शोधाअन्तीं सापडली आहे ती ही कीं, अस्तित्वाची, मूळ सद्वस्तूची जाणीवशक्ति (इच्छा-शक्ति) आपला विकासमार्ग चालण्याच्या क्रियेंत स्वत:साठीं रूपें निर्माण करीत असते आणि या रूप-निर्माण-क्रियेंत आत्मानंद शोधीत असते. ही इच्छाशक्ति सद्वस्तूच्या मूळ अरूप स्थितींत आनंदमयच असते आणि स्वतःकरितां रूपरचनाहि ती आनंदाकरितांच करते. या विश्वाचा तळाचा जड विभागहि गतिमान् अस्तित्वाच्या आनंदासाठींच मूळ ज्ञानमय शक्तीनें निर्माण केला ही गोष्ट आम्हांला उघड दिसते; आनंद हा मूळ ज्ञानशक्तीचा, इच्छाशक्तीचा स्वभाव आहे; आनंदाला ही शक्ति नित्य चिकटून राहते, आनंद हाच तिच्या सर्व खटाटोपांचा पाया असतो. आनंदासाठीं नवीं नवीं रूपें निर्माण करण्याची क्रिया चालूं असतां वरच्या दर्जाचीं रूपें स्वत:साठीं निर्माण करण्याच्या व्यापारांत, मध्येंच, म्हणजे तीं रूपें सिद्ध होण्याच्या अगोदर, आम्हांला दुःख, यातना म्हणून परिचित होणारें दृश्य अस्तित्वांत येतें; त्या ज्ञानशक्तीचा स्वभावधर्म जो आनंद त्याच्याशीं हें दृश्य अगदी न जुळणारें, अगदीं विरोधी वाटतें. आनंदरूप शक्तीच्या आनंदमूल व्यापारांत दु:ख-यातनामय दिसणारी ही उलटी घटना अस्तित्वांत येते कशी ? हा एकच एक मूळ प्रश्न आहे.
हा प्रश्न आम्ही कसा सोडविणार ? असें एक उत्तर सुचविलें जातें कीं, सच्चिदानंद हा कांहीं सृष्टीचा आरंभ व अन्त नव्हे; असत्-शून्य- हें सृष्टीचें मूळ व शेवट आहे. हें शून्य स्वत: कांहींच नसलें, तरी ते पक्षपात न करतां अस्तित्वशक्ति, जाणीवशक्ति, आनंदशक्ति आणि या शक्तींच्या विरोधी, अभावाची, नेणिवेची, दुःखाची शक्ति आपल्या पोटांत सामावून संभाळून आहे. या उत्तरांत सर्व गोष्टी समाविष्ट झाल्या असल्या, तरी आम्हांस हव्या असलेल्या एकीचेंहि स्पष्टीकरण त्यांत नाहीं. शून्य म्हणजे वस्तुत: कांहींहि नाहीं, असें ज्या वस्तूचें वर्णन त्या वस्तूच्या पोटीं सर्व कांहीं शक्तिरूपानें आहे असें तिचेंच वर्णन करणें यांत शब्दविरोध आणि वस्तुविरोध पूर्णतया विद्यमान आहे. आनंदाच्या विकासक्रमांत आरंभीं व अखेर आनंद असून मध्यें कांहीं काल दुःख कसें आलें ही लहानशी विसंगतीची अडचण दूर करण्यासाठीं आम्हीं या उत्तरांत दुसऱ्या एका विसंगतीची परिसीमा गांठली आहे. शून्यांत कसलीहि
पान क्र. १८२
शक्ति अंतर्भूत असूं शकत नाहीं. ज्यांत सर्व प्रकारची शक्ति, कांहीं पक्षपात न करतां सामावलेली आहे आणि ज्याला निश्चित व्यवस्थित स्वरूप कांहींच नाहीं, त्याला आम्ही शून्य हें नांव देऊं शकत नाहीं. त्याला 'व्यवस्थाशून्य द्रव्यपसारा' म्हणतां येईल -- तेव्हां 'शून्य' हें आमच्या प्रश्नाचें योग्य उत्तर नव्हे. तेव्हां आपण आपली सच्चिदानंदाची मूळ कल्पना घेऊन तिच्या पायावर आमच्यापुढील प्रश्नाचें योग्य उत्तर देतां येतें का तें पाहूं.
प्रथम आपण ही गोष्ट स्पष्टपणें आपल्या नजरेसमोर ठेवली पाहिजे कीं, ज्याप्रमाणें 'सर्वात्मक विश्व-जाणीव' ही मनुष्याच्या जागृत मानसिक जाणिवेहून निराळी, तिच्यापेक्षां फार व्यापक आणि मूलगामी जाणीव आहे, त्याप्रमाणें अस्तित्वाचा सर्वात्मक वैश्विक आनंद हा मानवी व्यक्तीच्या सामान्य भावना व संवेदना यांतील सुखाहून फार निराळा, व्यापक आणि मूलगामी आहे. सुख, संतोष, आनंद हीं नांवें आम्ही आमच्या ठिकाणीं उत्पन्न होणाऱ्या कांहीं मर्यादित ऊर्मींना देतों. या ऊर्मी कांहीं विशिष्ट संवयींच्या कारणांनीं आमच्या ठिकाणीं उत्पन्न होतात; सुखादींच्या उलट असलेलें दुःख, असंतोष, शोक याहि आमच्यांतील मर्यादित प्रासंगिक ऊर्मी असून विशिष्ट संवयींच्या कारणांतूनच त्यांचा उगम असतो; आणि या दोन्ही प्रकारच्या ऊर्मी स्वत: स्वत:तून उपजत नाहींत, त्यांना त्यांच्याहून अगदीं वेगळी अशी पार्श्वभूमि लागते. अस्तित्वाचा आनंद सर्वात्मक, अमर्याद व स्वयंभू असतो; विशिष्ट कारणांवर तो अवलंबून असत नाहीं, सर्व पार्श्वभूमींची पार्श्वभूमि, असा हा मूळ अस्तित्वानंद आहे. आमचें सुख-दु:ख आणि तटस्थ उदासीन वृत्ति हे सर्व अनुभव या मूळ अस्तित्वानंदांतून उगम पावतात. शुद्ध अस्तित्वानंद जेव्हां आपल्या पोटीं कांहींतरी होण्याचा, रूपधारणाचा आनंद घेऊं इच्छितो, तेव्हां त्याला गतिमान् व्हावें लागतें. मूळ ज्ञानशक्तीच्या, इच्छाशक्तीच्या भ्रमणाबरोबर या मूळ आनंदाचें भ्रमण सुरू होतें आणि या भ्रमणाच्या क्रमांत स्वत: हा आनंद भ्रमणाचे, हालचालीचे, ऊर्मीचे निरनिराळे आकार-प्रकार होतो, निरनिराळीं रूपें घेतो; सुख आणि दुःख हे अशा भ्रमणाचे, विजेच्या प्रवाहासारखे प्रकार आहेत. सुख हा 'धन प्रवाह' आहे, दुःख हा 'ऋणप्रवाह' आहे. जडामध्यें अस्तित्वानंदाची हालचाल नेणिवेंतल्यासारखी, झोंपेंतल्यासारखी होते; जड निसर्गाला त्याच्या पोटीं गतिमान् असलेल्या या अस्तित्वानंदाचें भान नसतें. मनाच्या पलीकडे अतिमानसाच्या क्षेत्रांत हा अस्तित्वानंद
पान क्र. १८३
आणि त्याच्या गतिमान् स्वरूपाचा आनंद, अतिमानसिक जाणिवेच्या मानवाला पूर्णतया अनुभवतां येतो. जीवाच्या आणि मनाच्या क्षेत्रांत अस्तित्वानंद हा स्वत: जेव्हां रूपधारणाचा आनंद होतो, तेव्हां जडाची नेणीव त्या क्षेत्रांत नसल्यानें रूपधारणाची क्रिया अधिकाधिक जाणीवपूर्वक तो करीत असतो. सरूप, साकार होण्याच्या अस्तित्वानंदाच्या क्रिया, प्रथम द्वंद्वात्मक, अशुद्ध असतात, दु:ख आणि सुख या दोन ध्रुवटोंकांमध्यें फेऱ्या घालीत असतात. परंतु स्वत:चें शुद्ध, श्रेष्ठ स्वरूप नसणारें पदार्थ आणि कारणरूप घटना यांच्यावर अवलंबून नसणारें स्वत:चें स्वयंभू स्वरूप आपल्या सरूप अवस्थेंत प्रकट करावयाचें हें या आनंदाचें ध्येय असतें. वैयक्तिक जाणिवेच्या व्यक्तींत सर्वात्मक व वैश्विक अस्तित्व प्रकट करण्याच्या मागें सच्चिदानंद ब्रह्म हें असतें. शरीर आणि मन या रूपांत रूपातीत जाणीव प्रकट करण्याच्या मागें तें असतें; त्याप्रमाणेंच विशिष्ट अनुभवांच्या आणि विषयांच्या नित्य प्रवाही अवस्थेंत सर्वव्यापी, स्वयंभू, पदार्थनिरपेक्ष असा आनंद प्रकट करण्याच्या मागें तें असतें. क्षणिक सौख्य आणि समाधान प्राप्त करण्याच्या उद्देशानें आम्ही त्या सुखसमाधानाला कारण होणाऱ्या पदार्थांच्या मागें आज लागत असतो. आम्हीं खरें स्वातंत्र्य प्राप्त केलें, आमचा खरा आत्मा आम्हीं आपलासा केला म्हणजे आम्ही या पदार्थांच्या मागें सुखाचे उत्पादक म्हणून लागणार नाहीं, तर हे पदार्थ आमच्या अंकित होतील, आमचा नित्य आत्मानंद प्रतिबिंबित करण्याचीं साधनें म्हणून आम्ही त्यांचा आमच्या इच्छेनुसार उपयोग करूं.
जडाच्या अंधुक प्रकाशाच्या कवचांतून बाहेर पडणारा मनोयुक्त पुरुष हा अहंवादी असतो. या अहंवादी मानवांत अस्तित्वाचा आनंद तटस्थ वृत्तीचा, अर्धसुप्त, अर्धनेणिवेच्या छायेनें झांकलेला असतो. भरपूर समृद्ध जमीन तिजवर उगवलेल्या रानानें झांकून टाकलेली असावी, तशी या अस्तित्वानंदाची स्थिति असते; या आनंदाच्या समृद्ध जमिनीवर जें रान माजलेलें असतें तें वासनांचें रान होय. वासनेचीं विषारीं झुडपें, तितकीच विषारीं फुलें या रानांत खूप वाढलेलीं व पसरलेलीं असतात. आमच्या अहंकेंद्रित जीवनांतील दु:खें, सुखें म्हणजे हीं विषारीं झुडपें व विषारीं फुलें होत. ईश्वराची जाणीवयुक्त शक्ति आमच्यांत आम्हांला न कळत आपलें काम करीत असते; वासनेचें वाढलेलें रान ही ईश्वरी शक्ति खाऊन टाकते, ऋग्वेदाच्या भाषेंत सांगावयाचें तर जेव्हां ईश्वरी
पान क्र. १८४
अग्नि पार्थिव अंकुरांचें रान जाळून टाकतो, तेव्हां आमच्या सुखांच्या आणि दु:खांच्या मुळाशीं जें लपलेलें आहे, या सुख-दुःखांचें जें कारण आहे, त्यांचें जें गुप्त जीवन आहे, अर्थात् त्यांच्यांत जो आनंदाचा जीवनदायी रस आहे, तो गुप्तता टाकून उघड होतो, नवे आकार, नवीं रूपें धारण करतो -- अर्थात् हीं रूपें, हे आकार वासनेचे नसतात, तर स्वयंभू स्वयंसिद्ध आनंदाचे असतात; आमचें नश्वर सुख नष्ट होऊन त्याची जागा अमर, स्वयंभू, निरतिशय नित्य सुखानें व्यापली जाते. आमच्या अहंकेद्रित सुखदु:खमय जीवनाचें हें असें महान् रूपांतर होऊं शकतें. कारण आमच्या सुखाच्या, तशाच दु:खाच्या संवेदनांचा, भावनांचा जो पसारा आहे, त्याचें सारभूत मूळ तत्त्व, त्याच्या जीवनाचा गाभा हें मूळ आनंदमय अस्तित्व किंवा मूळ अस्तित्वानंदच आहे; या भावनांचा खेळ तो आनंद व्यक्त करण्यासाठींच असतो. परंतु त्यांना तो व्यक्त करतां येत नाहीं, याचें कारण आमचें जीवन विभक्तता, आत्मविषयक अज्ञान आणि अहंपरायणता यावर आधारलेलें आहे, अर्थात् आमच्या जीवनाचा हा आधार दूर सारून अविभक्तता, आत्मज्ञान आणि विश्वात्मकता हा आमच्या जीवनाचा आधार आम्हीं केला म्हणजे स्वभावत:च आम्ही अमर स्वयंभू निरतिशय नित्य आनंदाचे स्वामी होऊं.
पान क्र. १८५
प्रकरण बारावें
अस्तित्वाचा आनंद - उत्तर
त्या ब्रह्माचें नांव आनंद आहे; आनंद म्हणून त्या ब्रह्माची आम्हीं पूजा केली पाहिजे, आणि आनंद म्हणून त्या ब्रह्माच्या प्राप्तीसाठीं यत्न केला पाहिजे, साधना केली पाहिजे.
- केन उपनिषद् ४.६
अगाध शांत सागर असावा आणि त्या सागराच्या पृष्ठभागावर अनेक प्रकारें फेंसाळणाऱ्या लाटांचा खेळ चालावा, त्याप्रमाणें आमच्या जीवनाचें स्वरूप आहे. आमच्या जीवनांत खोल, अस्तित्वाच्या आनंदाचा अनंत अगाध सागर आहे; हा आनंद आमच्या जीवनाशीं अविभाज्यपणें निगडित आहे आणि त्यावर लाटांप्रमाणें आमच्या बाह्य पृष्ठभागीय संवेदनांचा खेळ चाललेला आहे. कधीं सुखसंवेदना, कधीं दुःखसंवेदना, कधीं ना दु:ख ना सुख असा तीन प्रकारचा खेळ भरती-ओहोटीप्रमाणें आमच्या जीवनाच्या आद्यस्थानीं व अन्तीं असलेल्या अस्तित्वानंदरूप सागराच्या पृष्ठभागावर चाललेला असतो. विश्वाचें मूळ आनंद असतांना, त्याच आनंदाच्या विश्व-रचनाव्यापारांत दुःख घुसलें कसें ? या प्रश्नाचें खरें उत्तर वरील प्रकारचें आहे. सृष्टीचा आत्मा म्हणजे अनंत, अविभाज्य व एकच एक असें अस्तित्व, सद्वस्तु. त्या अस्तित्वाचा मूलभूत स्वभाव किंवा शक्ति ही ज्ञानमय, आत्मजाणीवयुक्त पुरुषाची अनंत अमर शक्ति आहे; आणि या आत्मजाणिवेचा मूळ स्वभाव किंवा तिचें स्वतःविषयीचें मूलभूत ज्ञान हें अस्तित्वाचें अनंत अटळ सुख आहे. सृष्टीचें मूळ असलेली स्वयंभू सद्वस्तु आपला स्वाभाविक आत्मानंद नित्य टिकवून असते; अरूप असतांना, आणि धारण केलेल्या सर्व रूपामध्यें आपला आत्मानंद सद्वस्तु नित्य भोगीत असते; स्वतःच्या अनंत अविभाज्य अस्तित्वाचें त्या सद्वस्तूला असणारें ज्ञान, कधीं खंड न पावणारें, नित्य
पान क्र. १८६
आत्मानंदपूर्ण असतें. तिचीं विभक्त असणारीं, मर्यादित व नानाप्रकारचीं जीं रूपें असतात त्या रूपांमध्येंहि ही सद्वस्तु नित्य आत्मानंदपूर्ण असते. सामान्यतः स्वत:ची जी बाह्य कृत्रिम संवय किंवा आत्मजाणीवयुक्त जीवनाची जी विशिष्ट रीति असते, त्या संवयीच्या व त्या जीवनरीतीच्या बंधनांत राहून आमचा आत्मा व्यवहार करीत असतो; या बंधनांतून त्यानें स्वतःस वर काढलें म्हणजे त्याला जड द्रव्याच्या दर्शनी नेणिवेंत, अनंत जाणीवयुक्त शक्तीचें दर्शन घडतें; ही शक्ति जडांत नित्य वसति करून आहे, ती आपलें स्थान कधींहि सोडीत नाहीं, अचलपणें ध्यानमग्न अशी राहून कार्य करीत असते, असें ज्ञान आमच्या आत्म्याला होतें. त्याचप्रमाणें जडाच्या दर्शनी संवेदनाशून्यतेंत आमच्या बंधनमुक्त आत्म्याला अनंत ज्ञानयुक्त आनंदाचें दर्शन घडतें. जडांत हा आनंद सर्वव्यापी आहे, निरतिशय स्वरूपाचा आहे, कोणत्याहि कारणानें त्यांत न्यूनता येऊं शकत नाहीं, असें ज्ञान त्यास होतें आणि या ज्ञानामुळें तो जडांतील आनंदाशीं समरस होतो. हा जो आनंद आमच्या आत्म्याला जडांत प्रतीत होतो, तो त्याचाच आत्मानंद असतो; जडांत असणारा आत्मा त्याचाच आत्मा (तोच) असतो. हा आत्मा सर्वत्र व सर्वव्यापी असतो; परंतु आमचें सृष्टीविषयींचें व स्वत:विषयींचें जें सामान्य ज्ञान तें वस्तूच्या अंतरंगाला स्पर्शच करीत नाहीं, तें वरवरच्या भागांतच जागृत राहतें, वावरत राहतें. या ज्ञानापासून आमचा स्वतःचा आत्मानंद किंबहुना आमचा स्वतःचा आत्मा लपलेला राहतो. आमच्या सामान्य ज्ञानाच्या कक्षेंत आमचा आत्मा व आत्मानंद न आल्याकारणानें ते खोल खोल दूरवर आहेत अशीच सामान्य ज्ञानाची भावना होते. खरोखरी आत्मानंद जसा सर्व रूपांत तसाच तो सर्व अनुभवांतहि असतो. सुखाचे, दु:खाचे आणि उदासीनतेचे सर्व अनुभव वस्तुतः आत्मानंदपूर्ण असतात. या सर्व अनुभवांत आत्मानंद गुप्त, खोल व अर्धनेणिवेनें व्याप्त अशा स्थितींत असतो आणि यामुळेंच सर्व वस्तूंना व जीवांना अस्तित्वांत राहणें शक्य होतें. दुःखाच्या, निसर्गक्षोभाच्या प्रतिकूल परिस्थितींतहि तो अस्तित्व टिकवून धरतो. जड वस्तु व जीव अस्तित्वाला चिकटून राहतात, अस्तित्वांत राहण्याची इच्छा सर्व परिस्थितीवर मात करते, याचें कारण सर्वगत आत्मानंद होय. जीवांत जी स्वत:च्या संरक्षणाची उपजत प्रेरणा असते, केव्हांहि नष्ट न होण्याचा जो स्वभावधर्म जडांत असतो व मनांत जी अमरत्वाची आंतरिक भावना
पान क्र. १८७
असते त्या सर्वाचें मूळ, अस्तित्वाची दुर्दम्य इच्छा हें होय व त्या इच्छेचें मूळ गूढ आत्मानंद होय. सरूप, साकार अस्तित्व स्वत:चा विकास करीत असतें व त्या विकासाच्या सर्व अवस्थांत मुळाशी हा आनंद दडलेला असतो; एवढेंच काय पण कधीं कधीं, आत्महत्या करण्याची जी प्रेरणा प्राण्यास होते ती देखील अस्तित्वाची, आनंदरूप शुद्ध अस्तित्व टिकविण्याचीच दुर्दम्य इच्छा असते. एवढेंच कीं ती विपरीत रूपांत व्यक्त होत असते. वास्तविक आत्महत्येची इच्छा म्हणजे प्रस्तुत जीवनाहून वेगळ्या जीवनाचें आकर्षण होय. या आकर्षणामुळें प्रस्तुत जीवनाविषयीं घृणा उत्पन्न होत असते. आनंद म्हणजेच अस्तित्व, आनंद हाच सृष्टीचें गूढ कारण, आनंद हाच जन्माचें मूळ, आनंद हाच जीवनांत टिकण्याचें कारण, आनंद हाच जन्माचा शेवट असून आनंदांतच सृष्टि विलीन होते. उपनिषदांत म्हटलें आहे : ''आनंदांतूनच ही सर्व भूतें जन्म पावतात, आनंदामुळेंच ती जगतात नि वाढतात व शेवटीं आनंदाप्रत जाऊन त्यांत विलीन होतात.''
मूळ सद्वस्तु (आत्मा, पुरुष) वस्तुतः एकरूप आहे. परंतु आमच्या मनाला तिचीं सत् चित् आनंद अशीं तीन अंगें वेगवेगळीं कल्पावीं लागतात. केवळ विभक्त जाणिवेला भासणारीं मूळ एका तत्त्वाचीच हीं तीन अंगें किंवा मुखें आहेत. हें लक्षांत ठेवलें म्हणजे जुन्या दर्शनांच्या विभिन्न सूत्रांचा समन्वय लागूं शकतो व प्रत्येकाला त्याचें त्याचें स्थान प्राप्त होऊन त्यांच्यामधील अन्योन्यविरोध मिटूं शकतो. विश्व हें माया आहे, या सूत्राचा प्रथम विचार करूं. मूळ अस्तित्व शुद्ध, अनंत, अविभाज्य व अव्यय आहे. या मूळ अस्तित्वाशीं विश्वाच्या अस्तित्वाचा जो संबंध आहे तो लक्षांत घेतला आणि विश्वाकडे पाहतांना केवळ त्याच्या दर्शनी रूपांकडे लक्ष दिलें म्हणजे विश्व, विश्वाचें अस्तित्व हें माया असल्याचा प्रत्यय येऊं शकतो; आणि त्याचें वर्णन 'माया' या शब्दानें करण्याचा अधिकार आम्हांस पोंचतो. मूळ अस्तित्वाच्या दृष्टीनें दृश्य विश्व माया आहे असें आम्ही लेखावयास कोणतीच हरकत नाहीं. माया या शब्दाचा मूळ अर्थ 'समावेशक संग्राहक जाणीव' असा आहे; ही जाणीव आकार व रूपें घेणारी आहे, कारण ती विषयाला व्यापून, मापून मर्यादेंत बसविणारी आहे; अरूप अस्तित्वांत वस्तूची बाह्य-रेषा काढणें, तिची लांबी-रुंदी-उंची निश्चित करणें, आणि या प्रमाणें अरूपांत रूप ढाळणें हें मायेचें काम आहे; जें अज्ञेय आहे त्याच्या
पान क्र. १८८
विषयीं मनानें कल्पना करून त्याला ज्ञानाच्या कक्षेंत आणल्यासारखें करणें हें मायेचें काम आहे; भूमितीची निर्मिति करून तिच्या साह्यानें अमर्याद असलेल्याचें मोजमाप घेतल्यासारखें करणें हें मायेचें काम आहे. याप्रमाणें 'माया' शब्दाच्या मूळ अर्थात ज्ञान, कौशल्य, बुद्धि या गोष्टींचा समावेश होत असे. पण पुढें या शब्दाचें अवनतीकरण होऊन माया म्हणजे धूर्तता, फसवेगिरी, आभास असे मायेचे अर्थ झाले आणि नंतर दर्शनकारांनीं 'माया' हा शब्द आभास, इंद्रजाल या अलंकारिक अर्थानें आपल्या तत्त्वज्ञानांत वापरावयास आरंभ केला. सर्व दर्शनांत तो या अर्थानेंच येतो.
विश्व माया आहे, मिथ्या, असत्य आहे याचा अर्थ विश्वाला कसल्याच प्रकारचें अस्तित्व नाहीं असा नव्हे. कारण विश्व हें आत्म्याचें स्वप्न मानलें, तरीहि स्वप्न असेंपर्यंत आपल्याला तें सत्यच आहे. स्वप्न संपेल तेव्हां तें अस्तित्वांतून नाहींसें होईल, मिथ्या होईल असें फारतर कोणी म्हणूं शकेल. विश्वाला कोणत्याहि प्रकारें शाश्वत अस्तित्व नाहीं म्हणून तें मिथ्या असेंहि म्हणतां येत नाहीं; विशिष्ट विश्वें, विशिष्ट रूपें व आकार स्थूल दृष्टीनें, पदार्थ दृष्टीनें नाहींसे होऊं शकतात, होतात; मनाच्या दृष्टीनें त्यांच्यासंबंधानें असलेली व्यक्ततेची जाणीव अव्यक्ततेच्या जाणिवेंत रूपांतरित होते. परंतु या तात्त्विक वस्तू कांहीं केव्हांहि नाहींशा होत नाहींत; त्या शाश्वत टिकणाऱ्या आहेत. त्या वस्तू व्यक्तांतून अव्यक्तांत जातात व अव्यक्तांतून परत व्यक्तांत येतात; नित्य अगदीं अटळपणें त्यांची व्यक्तांत पुनरावृत्ति होत राहते. नित्य एका रूपांत त्या टिकत नसतील पण पुन: पुन: व्यक्तांतून अव्यक्तांत व अव्यक्तांतून व्यक्तांत येत जात राहतात. त्यांचें दृश्य-रूप नेहमीं बदलतें पण त्यांची एकंदर संख्या व त्यांचा मूळ पाया कधींहि न बदलणारा आहे. एवढेंच नव्हे तर नित्य असें जें जाणीवयुक्त अस्तित्व, आत्मतत्त्व आहे त्याच्यापुढें, कोणत्या ना कोणत्या प्रकारचें विश्व, कोणत्यातरी प्रकारच्या अस्तित्वाचा खेळ नसलेला कालखंड होता किंवा नव्हता अथवा तसा कधीं येईल किंवा नाहीं याविषयीं आम्हांला खात्री देतां येत नाहीं. असें एक अंतःस्फूर्त ज्ञान मात्र आम्हांला होऊं शकतें कीं, आम्हांला ज्ञात असलेलें विश्व त्या मूळ आत्मतत्त्वांतून येऊं शकतें आणि परत त्यांत जाऊं शकतें, त्यांतून तें येतें व त्यांत तें परत जातें, आणि ही ये-जा नित्य चाललेली असते.
पान क्र. १८९
विश्व माया आहे या सूत्रांत माया म्हणजे काय नव्हे तें वर सांगितलें. माया म्हणजे कसल्याहि प्रकारच्या अस्तित्वाचा किंवा शाश्वत अस्तित्वाचा अभाव असें नव्हे. विश्व माया आहे म्हणजे विश्व हें अनंत अस्तित्वाचें मूळ-सत्य नव्हे तर तें, या सत्याची, या आत्मज्ञानपूर्ण मूळ आत्मतत्त्वाची निर्मिति आहे, त्यानें केलेली रचना आहे. ही रचना मूळ शाश्वत सत्यानें मूळ शून्यांत किंवा मूळ शून्यापासूनहि केलेली नाहीं, तर आपल्या स्वतःच्या पोटीं आपल्या स्वत:तून केलेली आहे. -- या विश्वाची सामग्री, म्हणजेच त्याचा उगम, त्याचें सर्वव्यापक वसतिस्थान मूळ सत् किंवा अस्तित्व आहे. त्यांत जे आकार आहेत ते बदलणारे असले, तरी ते त्या सत्याचे स्वतःचे आहेत, व त्या सत्याला, त्याच्या ज्ञानयुक्त दृष्टीला ते तसे दिसतात. त्यांची सर्व रूपरेखा त्या सत्याच्या निर्मितिकुशल ज्ञानशक्तीनें ठरवलेली व रचलेली असते -- हे सत्याचे आकार व्यक्त होऊं शकतात, व्यक्ताचे अव्यक्त होऊं शकतात, अव्यक्त राहूं शकतात, अव्यक्त झालेले पूर्वींहून निराळ्या प्रकारें व्यक्त होऊं शकतात. व्यक्त आकार अव्यक्त झाल्यानंतर पुन: व्यक्त होतांना पूर्वींच्याच रूपांत व्यक्त झाला पाहिजे असा नियम नाहीं, त्याचप्रमाणें व्यक्त आकार नेहमीं एका रूपांत राहिला पाहिजे असाहि नियम नाहीं. आकारांची ही रूपविषयक व व्यक्तताविषयक अशाश्वति लक्षांत घेऊन त्यांना अनंत ज्ञानाचे आभास, अनंत जाणिवेचे भ्रम, असें आम्हीं हवें तर म्हणावें. पण असें म्हणण्यांत, जिला भ्रमाची, असत्याची पकड कधींच स्पर्श करणार नाहीं, अशा मनाहून श्रेष्ठ असलेल्या असीम जाणिवेला, मनाचे दोष चिकटविण्यासारखें होतें हें विसरून चालणार नाहीं. मन हें मर्यादित जाणिवेचें आहे, तें चुका करूं शकतें, त्यांत अक्षमता असते. पण मनाचे हे दोष किंवा त्यांची छाया असीम जाणिवेवर टाकणें हें एक असमर्थनीय धाडस आहे. अस्तित्वाचें मूळ-तत्त्व, मूळ-द्रव्य हें मिथ्या नाहीं, सत्य आहे; अविभक्त अविभाज्य आत्मजाणीवयुक्त मूळ अस्तित्वाचें कोणतें तरी एखादें सत्य, आमच्या विभक्त, मानसिक जाणिवेकडून घडणाऱ्या चुकांत, तिच्या विकृत वृत्तींत आणि कृतींत व्यक्त होत असतें; या गोष्टी लक्षांत घेतां विश्वासंबंधानें आम्हांला असें म्हणतां येतें कीं, तें सद्रूप ब्रह्माचें मूळ तात्त्विक सत्य नाहीं, तें सद्रूपाच्या मूलभूत अव्यय एकतेचें सत्य नाहीं, तर तें त्याच्या अनिर्बंध अनेकतेचें रूपात्मक दृश्य-सत्य आहे, तें त्याच्या अमर्याद
पान क्र. १९०
रूपांतर-योग्यतेचें, आकारविषयक अमर्याद रूपांतरक्षमतेचें दृश्य सत्य आहे. विश्वासंबंधानें आम्हांला एवढेंच म्हणतां येतें; यापलीकडे कांहीं म्हणतां येत नाहीं. (विश्व माया आहे या सूत्राचा अर्थ, या वरील विवेचनांत व विधानांत स्पष्ट केलेला आहे. ब्रह्माचीं सत्, चित् व आनंद हीं जीं मनानें कल्पिलेलीं तीन अंगें आहेत, त्यांतील सत् या अंगाशीं विश्वाच्या अस्तित्वाची तुलना करून, विश्वाला कोणत्या अर्थीं माया म्हणतां येतें व सद्ब्रह्माला सत्य कां म्हणतात तें वर दाखविलें आहे.)
मायावादांत विश्वाला माया म्हणतात, त्याप्रमाणें सांख्य दर्शनांत (प्रकृतिपुरुषवादांत) विश्व ही प्रकृतीची कृति आहे असें म्हणतात. सत् आणि आनंद हीं अंगें बाजूस ठेवून विश्वाच्या अस्तित्वाकडे केवळ जाणिवेच्या अंगाकडून, ब्रह्माच्या 'चित्' या अंगाकडून पाहिलें तर जाणीव ही शक्तिरूप असल्यानें विश्व हें शक्तीची कृति आहे अशी दृष्टि आपल्याला स्वीकारतां येते; शक्तीची कृति म्हणजे विश्व असें विश्वाचें वर्णन आपण करूं शकतो आणि तसा प्रत्ययहि आम्हांला येऊं शकतो. अर्थात् विश्वरचना करणाऱ्या या शक्तीला कामाला लावणारी ब्रह्माच्या जाणिवेची गुप्त इच्छाशक्ति आहे, किंवा जी ब्रह्मजाणीव विश्वाची मालक आहे व निरीक्षक आहे तिनें विश्वरचना करणाऱ्या शक्तीवर आपल्या मालक-निरीक्षकपणानें कांहींतरी अनिवार्य बंधन न कळत लादलें आहे व म्हणून ती शक्ति विश्वरचना करीत आहे असें म्हणणें आपणांस प्राप्त होतें. विश्व हें ब्रह्मजाणिवेच्या दृष्टीनें प्रकृतीची क्रीडा आहे; प्रकृति म्हणजे क्रियाशक्ति, जाणिवेची क्रियाशक्ति; पुरुष म्हणजे क्रियाशक्तीच्या कृतीकडे बघणारें, आणि दर्शनानंद भोगणारें जाणीवयुक्त अस्तित्व; पुरुषाच्या आनंदासाठीं, पुरुषाला राजी राखण्यासाठीं प्रकृति जो खेळ खेळते त्याचें नांव विश्व, असें या नव्या दृष्टीनें म्हणतां येतें; किंवा असेंहि म्हणतां येईल कीं, पुरुषाचें प्रतिबिंब शक्तीच्या (प्रकृतीच्या) हालचालींत पडतें, आणि या प्रतिबिंबयुक्त प्रकृतीच्या हालचाली माझ्याच आहेत असें पुरुष समजतो, असा हा प्रकृतीच्या पुरुष-प्रतिबिंबयुक्त हालचालींचा खेळ आहे. तेव्हां वस्तुजाताची जननी जी शक्ति किंवा प्रकृति तिचा खेळ म्हणजे विश्व होय; सर्व काळ न थांबतां अनंत आकार घेण्याची व घेत राहण्याची प्रेरणा या विश्वजननीचे ठिकाणीं आहे; नाना अनुभव स्वत: घेण्याचा व पुरुषाला देण्याचा हव्यास या प्रकृतीला आहे, आणि हा तिचा हव्यास शाश्वतचा आहे, कधीं पुरा न होणारा आहे.
पान क्र. १९१
मूळ अस्तित्वाच्या दृष्टीनें विश्वाला माया म्हणतां येतें; मूळ जाणीवशक्तीच्या दृष्टीनें विश्वाला शक्ति प्रकृतीचा पसारा म्हणतां येतें. आतां तिसरी दृष्टि मूळ आत्मानंदाची. शाश्वत अस्तित्व असणाऱ्या मूळ आत्म्याचा निजानंद आणि विश्व या दोहोंकडे एकदम दृष्टि टाकली कीं बालाचा आनंद, कवीचा आनंद, नटाचा आनंद, यंत्रनिर्मात्याचा आनंद ज्याप्रमाणें नाना प्रकारांनीं व्यक्त होतो त्याप्रमाणें मूळ आत्म्याच्या निजानंदाची लीला विश्वरूपानें व्यक्त झाली आहे, अशा प्रकारचें विश्वाचें वर्णन आपण यथार्थतेनें करूं शकतो आणि तसा प्रत्ययहि आपणांस येऊं शकतो. विश्वाचा वस्तुजाताचा आत्मा नित्य-युवा आहे, त्याचा आनंद कधींहि न संपणारा आहे. हा आनंदरूप आत्मा स्वत:च्या पोटांत स्वत:ला पुन: पुन: निर्माण करतो, आणि हा व्याप ते केवळ स्वत:मध्यें स्वत:च्या निर्मितींत होणाऱ्या आनंदासाठींच करतो. स्वत:च्या आविष्कारांत त्याला जो आनंदलाभ होतो त्या आनंदलाभासाठीं तो स्वत:मध्यें आविष्कार करीत राहतो. या सर्व व्यापांत लीला तोच, लीला करणारा तोच, लीला-भूमि तोच -- अशी ही अद्भुत वस्तुस्थिति आहे.
शाश्वत निश्चल अक्षर सच्चिदानंदाच्या दृष्टीनें विश्वाच्या अस्तित्वाचा विचार करतां माया, प्रकृति व लीला या तीन कल्पनांवर आधारलेलीं अशीं जीं तीन सामान्य विधानें आमच्या दर्शनग्रंथांत सांपडतात आणि जीं सामान्यत: अन्योन्यविरोधी म्हणून मांडण्यांत येतात तीं तीन विधानें वस्तुत: एकमेकांशीं पूर्णपणें सुसंवादी व एकमेकांना पूरक आहेत. विश्वाचा आणि जीवनाचा संपूर्ण पसारा समग्रतेनें ध्यानांत आणावयाच्या दृष्टीनें हीं तीन विधानें सर्व मिळून एकत्र मांडणें अवश्य आहे. ज्या विश्वाचा एक भाग आम्ही आहों तें विश्व म्हणजे शक्तीचा गतिमान् अस्तित्वाचा पिंगा घालणें आहे असें उघड उघड दिसतें. (अस्तित्व म्हणजे गतिहीन शक्ति व शक्ति म्हणजे गतिमान् अस्तित्व असा येथें अर्थ होतो.) परंतु या शक्तीच्या दृश्य धडपडीच्या अंतरंगांत आम्ही शिरलों तर ती शक्ति म्हणजे एका निर्मितिसमर्थ अशा ज्ञानाचें नित्य व तरीहि नित्य बदलणारें असें तालबद्ध स्पंदन आहे असें आमच्या प्रत्ययास येतें; हें ज्ञान आपल्या शाश्वत अनंत अस्तित्वाचीं दृश्य सत्य-रूपें आपणां स्वत:च्या पोटांत आपल्या तालबद्ध स्पंदनानें निर्माण करून आपल्यापुढें उभीं करीत असतें. आत्मप्रकटन करणारीं स्वत:ची असंख्य रूपें लीलेसाठीं निर्माण करण्यांत मग्न झालेला अस्तित्वाचा अनंत आनंद
पान क्र. १९२
हा या तालबद्ध ज्ञानस्पंदनाचें अंतरंग कारण व हेतु असल्याचें दिसून येतें. विश्वासंबंधानें आम्हांला यथार्थ ज्ञान व्हावें यासाठीं हें सच्चिदानंदाचें त्रिमुखी दर्शन आम्हीं आरंभीं आत्मसात् करावयास हवें.
अस्तित्वाचा अनंत, अक्षर आनंद गतिशील होऊन, अनंत क्षर-रूपें धारण करण्याचा, अनंत क्षर आनंदाचा भोग घेत असतो -- हें विश्वाचें स्वरूप आहे, विश्वाच्या एकंदर प्रश्नाची गुरुकिल्ली या एका प्रत्ययांत आहे. तेव्हां, आमच्या संवेदनात्मक अस्तित्वांत ज्या सुख, दु:ख व उदासीन वृत्ति आलटून पालटून आमच्या वांट्याला येतात त्या सर्वाच्या पाठीमागें एक अविभाज्य जाणीवयुक्त अस्तित्व आहे, तें आपल्या नित्य स्वभावगत आनंदाचा आधार या सर्व सुखादि वृत्तींना, तसेंच अनुभवांना देतें, आपल्या आनंदाच्या विविध गतीनें या वृत्तींतील व अनुभवांतील विविधता निर्माण करतें, असें आम्हीं ओळखलें पाहिजे. हें आनंदमय ज्ञानमय अस्तित्व आमचा खरा आत्मा आहे. ज्या मनोमय पुरुषाला सुख, दु:ख आणि उदासीनता या तीन वृत्तींचा - स्पंदनांचा अपरिहार्यपणें अनुभव येतो, तो या आमच्या खऱ्या आत्म्यानें वस्तूचा संवेदनात्मक अनुभव घेण्यासाठीं पुढें केलेला त्याचा प्रतिनिधि आहे. विश्वाच्या विविध स्पर्शांना उत्तर म्हणून, त्यांची प्रतिक्रिया म्हणून घडणारें आमच्या विभक्त जाणिवेचें पहिलें तालबद्ध स्पंदन आमच्या संवेदनात्मक प्रत्ययांत आहे. हें उत्तर ही प्रतिक्रिया अपूर्ण व सदोष असते. हें स्पंदन संकीर्ण तालवैविध्यामुळें विसंवादपूर्ण असतें. आमच्या खऱ्या आत्म्याची पूर्ण एकता-प्रधान लीला आमच्यांत पुढें उदयास यावयाची असते. त्या भावी लीलेची पूर्वतयारी, प्रस्तावना या अपूर्ण, संकीर्ण व विसंवादी तालगतीच्या त्रिविध संवेदना करीत असतात; त्रिविध संवेदनाप्रत्ययांत खऱ्या पूर्ण स्वरमेळाचा, सुसंवादाचा अनुभव आम्हांला येत नाहीं. आमचा खरा आत्मा एकच एक विश्वात्मा आहे; कोणत्याहि अनुभवाचे प्रसंगीं, विविध अनुभव घडत असतां त्या एकच एक आत्म्याशीं आम्ही भावनेनें एकरूप व्हावयास शिकलों, त्याचा सर्वगामी पूर्ण स्वतंत्र सुसंवाद आम्ही आमच्या मनाचे ठिकाणीं अभ्यासानें प्रतिबिंबित करावयासं शिकलों म्हणजे विश्वांत सर्व संवेदनांच्या प्रसंगीं आत्म्याच्या पूर्ण स्वरमेळाचा, पूर्ण सुसंवादाचा आम्हांला अनुभव येऊं शकेल.
ही वरील दृष्टि व विचारसरणि बरोबर असेल, तर या दृष्टीचे
पान क्र. १९३
व विचारसरणीचे परिणाम म्हणून अपरिहार्यपणें कांहीं विशिष्ट गोष्टी आम्हांला मानाव्या लागतात. पहिली गोष्ट : आमच्या खोल अंतरांत आम्ही एकमेवाद्वितीय सच्चिदानंद ब्रह्म आहों, आमचें खरेंखुरें अस्तित्व पाहतां आम्ही अविभाज्य सर्वगामी जाणीव आहों आणि म्हणून स्वभावत: अटळपणें आम्ही सर्वागामी आनंद आहों, त्या अर्थीं आमच्या संवेदनात्मक अनुभवांत अनुस्यूत असलेलीं सुख, दुःख व उदासीनता हीं तीन स्पंदनें आमच्या अस्तित्वाच्या बाह्य व्यवस्थेचा भाग म्हणून असलीं पाहिजेत; आणि आमच्या जागृतींतील जाणिवेनें युक्त असा जो आमच्या अस्तित्वाचा सर्वांत बाहेरचा, सर्वांत वरचा मर्यादित भाग आहे, त्यानें ही व्यवस्था केलेली असली पाहिजे. या बाह्य व्यवस्थेच्या पाठीमागें खोल आमच्या अंतरांत वरच्या बाह्य जाणिवेपेक्षां पुष्कळच व्यापक खोल आणि सत्य असें कांहींतरी असलें पाहिजे आणि या आंतर वस्तूला बाहेरील सर्व अनुभवांत समानतेनें आनंदाचा नित्य अनुभव येत असला पाहिजे; वरचें मानसिक अस्तित्व या आंतरिक गूढ आनंदाच्या आधारानेंच काम करीत असलें पाहिजे. सर्व तऱ्हेच्या खटपटींत दुःखयातनांत कसोटीच्या प्रसंगांत -- रूपधारणाच्या या खळबळयुक्त घटनेंत मनोमय अस्तित्वाला अर्थात् पुरुषाला चिकाटीनें, धैर्यानें आपलें काम करीत राहण्याचें बळ या आंतरिक आनंदापासूनच मिळत असलें पाहिजे. आम्ही ज्याला आत्मा म्हणतो, मी म्हणतो, तो आमच्या अस्तित्वाच्या वरच्या पृष्ठभागावर कंपायमान असा एक आत्मकिरण असतो, त्याच्या पाठीमागें, त्याच्या खालीं सर्वत्र महान् अर्धजागृत जाणीव, तसेंच महान् अतिमानसिक जाणीव असते; या दोन्ही जाणिवांना बाहेरच्या सर्व प्रकारच्या अनुभवांतून कांहींतरी लाभ होत असतो; आमचा अर्धजागृत आणि अतिमानसिक जाणीवयुक्त आत्मा बाह्य 'मी'ला हे नानाविध अनुभव बुद्धिपुर:सर घ्यावयास लावीत असतो; विश्वांतील वस्तूंचा व घटनांचा संपर्क होण्यासाठीं हा बाह्य 'मी'चा एक प्रकारचा नाजुक ठसे घेणारा पडदाच जणुं आंतरिक द्विमुख आत्म्यानें अस्तित्वाच्या पृष्ठभागावर बसविलेला असतो; अर्धजागृत किंवा अधोमानसिक आणि अतिमानसिक जाणिवेचा महान् आत्मा स्वत: पडद्याआड असतो. बाह्य जगाचे संपर्क व त्यांचे अनुभव बाह्य 'मी'च्या पडद्याच्या द्वारां घेऊन तो आत्मसात् करतो आणि त्यांतून पहिल्यापेक्षां अधिक सत्य अधिक गूढ नि गाढ, अधिक सामर्थ्यवान व निर्माणकुशल अशी अनुभूति-अनुभूतिमूल्यें
पान क्र. १९४
तो अंतरात्मा अस्तित्वांत आणतो; हीं मूल्यें तो आपल्या खोल वसतिस्थानीं तयार करून मग वर पाठवितो; वरच्या 'मी' मध्यें वैयक्तिक बल, शील, ज्ञान, स्फूर्ति, या रूपांनीं तीं दृग्गोचर होतात; या महान् गुणांचीं बीजें येतात कोठून हें आम्हांला गूढ असतें; कारण आमचें मन फक्त वरतीं वरतीं फिरत, थरथरत असतें; त्याला एकाग्र होऊन खोल अंतरात्म्यांत राहून जीवन जगण्याचे ज्ञान आणि शिक्षण मिळालेले नसतें.
आमच्या सामान्य बहिर्मुख जीवनांत आमच्या खऱ्या आत्म्याचें हें सत्य आम्हांला अज्ञात असतें, आम्हांपासून लपलेलें असतें; केव्हां केव्हां या सत्याचें अंधुक दर्शन आम्हांला घडत असतें; हें सत्य आम्हांला सामान्य जीवनांत ज्ञात झालें, तरी तें आम्हांला पूर्णपणें ज्ञात होत नाहीं, पक्केपणें आमच्यांत तें स्थिर होत नाहीं. आम्ही आंतरिक जीवन जगण्यास शिकलों म्हणजे अगदीं निश्चितपणें आम्हांला आमच्या खऱ्या आत्म्याचें दर्शन घडतें; हा आमचा आत्मा खोल, गंभीर वृत्तीचा, शांत आनंदमय, सामर्थ्यसंपन्न आहे, विश्वाचा हुकुम त्याचेवर चालत नाहीं, तर विश्वावर त्याची सत्ता चालते, हा आत्मा स्वत: ईश्वर नाहीं, परंतु त्या ईश्वराचा आमच्या अंतरांत कार्य करणारा दिव्य तेजोमय अंश आहे; हा आमचा अंतरात्मा, ईश्वरांश आमच्या पृष्ठभागीं काम करणाऱ्या 'मी' ला आंतून आधार देतो, साह्य करतो, लहान बालकाप्रमाणें या 'मी'स तो वागवितो, 'मी'च्या चुका, त्याच्या रागलोभादि वृत्ती, त्याच्या सुखाच्या उड्या व दुःखाच्या हांका यांजकडे हा अंतरात्मा सस्मित होऊन पाहत असतो व त्या सर्व प्रसंगीं 'मी'ला धीर देऊन व सहानुभूति देऊन त्याचा हळूहळू विकास करीत असतो. एकदां आम्ही आंतरिक जीवन जगूं लागलों म्हणजे ही गोष्ट आमच्या प्रत्ययास येते. मुळांत जेथें होतों तेथें जर आम्ही परत गेलों -- अंतरात्म्यांत शिरलों -- आणि बाह्य अनुभवांशीं एकरूप न होतां आंतील ईश्वरी तेजोमय अंशाशीं एकरूप झालों, तर त्या आंतरिक तेजाच्या ईश्वरी वृत्तीनें जगांतील घटनांचा संपर्क आम्ही तोलूं शकूं, आमचें शरीर, प्राण, मन यांच्या संपर्कांच्या सुखदुःखांपासून दूर, आमच्या समग्र जाणिवेच्या स्थानीं आम्ही सुखेनैव राहूं शकूं; इतकेंच नव्हे तर, हे सर्व अनुभव आमच्या मर्यादित बाह्य जाणिवेचे अनुभव आहेत हें जाणून त्यांचा आम्ही योग्य तो उपयोग करूं; पण आमच्या आत्म्यावर -- आमच्या खऱ्या समग्र जाणिवेच्या अस्तित्वावर -- ज्यांचा परिणाम बाह्य जाणिवेवरील परिणामासारखा
पान क्र. १९५
होणार नाहीं. आंतील ईश्वरी अंशाशीं एकरूप झाल्यानें आम्हांला हें सर्व सहज करतां येईल. मनोमय कोशाच्या पाठीमागें आनंदमय कोश आहे; मनोमय कोश लहानसा मर्यादित आहे, तर आनंदमय कोश महान् आहे. तोच आमचा आनंदमय आत्मा आहे आणि विश्वसंपर्कानें क्षोभ पावणारी त्याची छाया म्हणजे मनोमय कोश किंवा मानसिक आत्मा होय. आमचा सत्य आत्मा वर पृष्ठभागावर नाहीं, तर तो आंत खोल आहे.
सुख, दुःख व उदासीनता ही स्पंदनव्यवस्था, आमच्या विकासाच्या अपूर्ण स्थितींतली वरवरची व्यवस्था असल्यानें, ही कायमची, अंतिम, अनिवार्य व्यवस्था होऊं शकत नाहीं, ही आणखी एक महत्त्वाची गोष्ट आम्हीं ध्यानांत घेतली पाहिजे. अमुक संपर्क झाला कीं त्याची प्रतिक्रिया म्हणून सुखाची वा दुःखाची अथवा उदासीनतेची अमुकच संवेदना झाली पाहिजे असा कांहीं अटळ नियम होऊं शकत नाहीं; संवयीप्रमाणें आमचे शरीर, प्राण, मन प्रतिक्रिया करतात; कांहीं एक विशिष्ट संपर्कानें आम्हांला सुख किंवा दुःख होतें याचें कारण एवढेंच कीं, तशी संवय आमच्या प्रकृतीला झाली आहे, तसें नातें आम्हीं त्या विशिष्ट संपर्काशीं नेहमींचें करून ठेवलें आहे. ज्या संपर्काला सुखसंवेदनेनें आम्हीं प्रतिक्रिया देत असतो, त्या संपर्काची प्रतिक्रिया उलट दुःखसंवेदनेनें देणें आणि जेथें आम्ही प्रतिक्रिया म्हणून दुःखसंवेदना प्रकट करतों, तेथें उलट सुखसंवेदना प्रकट करणें हें आम्हांला सर्वथा शक्य आहे. इतकेंच नव्हे, तर आमचे शरीर-प्राण-मनयुक्त बाह्य अस्तित्व विश्वाच्या संपर्कांना प्रतिक्रिया म्हणून सुख, दुःख किंवा उदासीन वृत्ति हें जें उत्तर संवयीने देतें, त्याचे ऐवजीं आमच्या खऱ्या महान् आनंदमय आत्म्याचा नित्यस्वभाव असलेल्या अक्षर आनंदाच्या रूपानें सर्वस्वीं स्वावलंबी असें उत्तर संवयीनें आम्ही देऊं शकूं, तें आमच्या स्वाधीन आहे. बाहेर शरीर-प्राण-मन यांना सुख-दुःख-उदासीनता यांची संवयीप्रमाणें प्रतीति होणें आणि खोल आंत आंतरात्म्यानें ह्या बाह्य प्रतिक्रिया नित्य अलिप्तपणें व आनंदानें स्वीकारणें यापेक्षां बाहेरच शरीर-प्राण-मन यांनीं सर्व संपर्कांना, अलिप्त आनंदानें उत्तर देणें यांत श्रेष्ठतर आत्मविजय असून, त्यात आत्मोपलब्धि-आत्मलाभ गाढतर व पूर्णतर झाल्याचा पुरावा आहे. आमचा खरा आत्मा पूर्णतया 'आमचा' झाला म्हणजे बाहेरच्या अनुभवांनीं आमच्या बाहेरच्या अस्तित्वांत उत्पन्न होणारी त्रिविध प्रतिक्रिया तत्काळ रूपांतर पावून, तिचे ठिकाणीं
पान क्र. १९६
आत्म्याचा नित्य आनंद प्रतीत होतो. सुख-दुःख व उदासीनता या प्रतिक्रिया आत्मदृष्टीनें अपूर्ण आणि खोट्या आहेत, त्या अपूर्ण प्रतिक्रिया बाहेर होत असतां आंतरात्मा नेहमींच त्या सर्वांचें सारखें स्वागत करतो व आपण नित्यानंदांत असतो. हाच आत्मा पूर्णपणें आम्हीं आपलासा केला म्हणजे बाह्य अस्तित्वांत देखील नित्य आनंद स्थिर होतो, सुख-दु:ख-उदासीनता या प्रतिक्रिया मुळींच होत नाहींत किंवा क्षणभरांत नाहींशा होऊन नित्यानंदाचें रूप घेतात.
मनाच्या ज्या प्रतिक्रिया असतात, त्यांत विशिष्ट संपर्काची प्रतिक्रिया सुख किंवा दु:ख होणें हें केवळ संवयीवर अवलंबून आहे, ही गोष्ट लक्षांत यावयास कठीण नाहीं. आमच्यांतील नाडीमय पुरुषाची (Nervous Being) गोष्ट निराळी आहे; त्याच्या बाबतींत प्रतिक्रिया थोडीबहुत नेहमींची ठरलेली असते, त्याच्या प्रतिक्रिया बदलूं शकणाऱ्या नाहींत असा त्याचा समज असतो, पण तो खोटा असतो. या नाडीमय पुरुषाला कोणत्याहि प्रकाराचा विजय, सिद्धि, मानसन्मान, सुदैव या गोष्टी जात्याच निरपवादपणें सुखद आहेत असें वाटतें. साखर ही जशी गोड लागलीच पाहिजे तशा या गोष्टी सुखद असल्याच पाहिजेत असें त्यास वाटतें; उलटपक्षीं कोणत्याहि प्रकारचा पराजय, असिद्धि, निराशा, अवमान, दुर्दैव या गोष्टी जात्याच निरपवादपणें दु:खद आहेत, कारलें जसें कडूच लागणार तशाच या वस्तू दु:खदच असणार, असें या नाडीपुरुषाला वाटतें. या प्रतिक्रियांत बदल करणें हें त्याच्या दृष्टीनें वास्तवापासून दूर जाणें आहे, अस्वाभाविक किंबहुना विकृत, रोगी वृत्तीचें आहे; नाडीमय पुरुष हा संवयींचा अंकित आहे, गुलाम आहे; विशिष्ट संपर्काला नेहमीं एका निश्चित प्रतिक्रियेनें मनुष्याकडून उत्तर मिळावें व संपर्कांसंबंधीं मनुष्याचा अनुभव विशिष्ट प्रतिक्रियांनींच व्यक्त व्हावा आणि त्यावरून मनुष्याच्या विश्वजीवनाशीं येणाऱ्या संबंधाचा निश्चित नकाशा तयार करतां यावा यासाठीं, या योजनेचें साधन म्हणून निसर्गानें नाडीपुरुष निर्मिला आहे. नाडीमय पुरुषाशीं तुलना करतां मनोमय पुरुष पुष्कळच स्वतंत्र आहे. कारण मनुष्यांत लवचिकपणा यावा, त्यांत बदल सुलभ व्हावा, त्यांत विविधता यावी, त्याची प्रगति सोपी व्हावी यासाठीं निसर्गानें या मनोमय पुरुषाची योजना केली आहे. हा पुरुष संवयींचा ताबेदार असला, तरी ती ताबेदारी जोंपर्यंत तो खुषीनें पत्करतो तोंपर्यंतच ती असते; त्याची इच्छा होईल तेव्हां
पान क्र. १९७
तो एक संवय टाकून दुसरी संवय लावून घेऊं शकतो; नाडीमय पुरुषाला स्वतःवर हुकमत करण्याची जोपर्यंत त्यानें मुभा दिली असेल, तोंपर्यंतच तो विशिष्ट संवयींचा गुलाम असतो; वस्तुत: नाडीमय पुरुष हा मनोमय पुरुषाचें एक साधन आहे, एक हत्यार आहे. मनोमय पुरुषाची सत्ता नाडीमय पुरुषावर चालते व चाललीच पाहिजे, ही स्वाभाविक सत्ता त्यानें न चालविण्याचें ठरविलें कीं नाडीमय पुरुषाची सत्ता त्याजवर चालू होते. वस्तुत: पराजय, अवमान, नुकसान या गोष्टींनीं मनोमय पुरुषाला दुःख झालें पाहिजे असें कांहीं त्याजवर बन्धन नाहीं; या गोष्टी आणि इतर अशा गोष्टी किंवा कोणत्याहि गोष्टी घडल्या असतां दुःख करणें किंवा त्यांजकडे पूर्णपणें कानाडोळा करणें किंवा त्यांचें मोठ्या आनंदानें स्वागत करणें ही त्याच्या खुषीची गोष्ट आहे; तो यांपैकी कांहींहि करूं शकतो. अशी वस्तुस्थिति असल्यानें मज्जातंतूव्यूह किंवा नाडीसंघ (Nerves) आणि शरीर यांची सत्ता आपल्यावर चालूं द्यावयाची नाहीं असें जितक्या प्रमाणांत मनुष्य ठरवितो व त्याच्या शारीर व प्राण-संबंधीं अंगांच्या विश्वविषयक संपर्कांशीं आणि प्रतिक्रियांशीं जितक्या प्रमाणांत तो तटस्थतेनें वागतो, तितक्या प्रमाणांत त्याचें जीवन स्वातंत्र्यसंपन्न होतें. तेव्हां, मनुष्य मनांत आणील तर बाह्य स्पर्शाची गुलामगिरी पार झुगारून देऊं शकेल आणि विश्वाच्या संपर्कांना कोणत्या प्रतिक्रियांनीं उत्तर द्यावयाचें हें तो आपल्या स्वतंत्र इच्छेनुसार ठरवूं शकेल.
शारीरिक सुखदुःखाला वर दिलेला संवयींच्या सार्वत्रिक सत्याचा नियम लावणें थोडें अवघड आहे. कारण नाडीसंघ आणि शरीर यांचा हा खास प्रांत आहे. बाह्य संपर्क, बाह्य दडपण यांची ज्यावर स्वाभाविकपणें हुकमत चालते, त्याची वसतीची जागा, त्याचें केंद्र हा प्रांत आहे. तरीपण येथेंहि त्या सार्वत्रिक सत्याचें ओझरतें दर्शन घडते. आपण असें पाहतों कीं संवय असेल त्याप्रमाणें विशिष्ट शारीर संपर्क एकाला सुखद तर दुसऱ्याला दुःखद, एकाच मनुष्याला आज सुखद तर उद्यां भिन्न परिस्थितींत किंवा भिन्न विकासावस्थेंत दुःखद भासेल. आपण असेंहि पाहतो कीं, फार मन:क्षोभाचा किंवा फार उच्च नैतिक किंवा भावनिक ध्येयविलासाचा काळ असतांना किंवा ध्येयसिद्धीच्या फार मोठया आनंदाच्या काळांत, साधारण स्थितींत तीव्र यातना देणारे संपर्क आणि त्या संपर्काचे दुःख मनुष्याला भासत देखील नाहीं आणि
पान क्र. १९८
भासलेंच तर त्या संबंधानें तो बेफिकीरपणें वागतो, त्याची दखल घेत नाहीं. पुष्कळ उदाहरणें अशीं असतात कीं, अतिक्षोभाचा, अतिआनंदाचा काळ संपून मज्जातंतूंच्या स्वाभाविक शारीर प्रतिक्रियेला पुन: वाव मिळाला आणि त्या विशिष्ट प्रसंगीं दुःख करण्याचें मनाचें संवयीचें कर्तव्य किंवा धर्म आहे अशी मनाला आठवण करून देतां आली म्हणजे मन पुन्हां दु:ख करूं लागते; पण या संवयीच्या प्रतिक्रियेला परत वाव देणें किंवा मिळणें अपरिहार्य नाहीं. तोहि संवयीचाच प्रकार आहे, निसर्गाचा नियम नाहीं. संमोहन विद्येच्या प्रयोगांत (Hypnotism) असें दिसून येतें कीं, प्रयोगविषय झालेल्या मनुष्याला प्रयोगकाळीं अर्थात् प्रयोगनिर्मित अस्वाभाविक मनोवस्थेंत जखमेचें किंवा कापण्याचें दु:ख वाटतां कामा नये असा यशस्वी आदेश जसा देतां येतो तसा तो पुन: जागृतीवर आल्यावर देखील त्याला नेहमीच्या संवयीप्रमाणें दु:ख वाटतां कामा नये असाहि आदेश यशस्वीपणें देतां येतो. या घटनेचें कारण अगदीं सरळ आहे. नाड्यांच्या-मज्जातंतूंच्या नेहमींच्या प्रतिक्रियांची गुलाम असलेली प्रयोगविषयाची जागृतींतली नेहमींची जाणीव आपल्या मोहिनीक्रियेनें कामावरून दूर करून, हा मोहिनीप्रयोग करणारा मनुष्य तिच्या पाठीमागें खोल असलेल्या अंतर्यामींच्या मनोमय पुरुषाला विनवून कामाला लावीत असतो; हा अंतर्यामींचा पुरुष नाडीसंघ आणि शरीर या दोहोंचा मालक असून, आपल्या इच्छेनुसार तो आपली मालकी गाजवूं शकतो. अर्थात् या मालकाकरवीं जागृतींतहि, मोहिनीमुक्त झाल्यावरहि, दु:ख न करण्याचा आदेश मोहिनीप्रयोगकार प्रयोगविषयाला देत असतो. सुखदु:खांच्या प्रतिक्रियांपासून ही जी स्वतंत्रता, प्रयोगविषय झालेल्या मनोमय पुरुषाला लाभते, ती मोहिनीकाराच्या इच्छेनें, अस्वाभाविकपणें, मोहिनीनिर्मित कृत्रिम व्यवस्थेनें लाभते; ती त्वरेनें लाभते -- पण ही स्वतंत्रता ''परतंत्र'' असते, ती प्रयोगविषयाच्या खऱ्या मालकीची नसते; अर्थात् ती त्याला वाटेल तेव्हां उपलब्ध होऊं शकत नाहीं. तथापि मोहिनीकाराची इच्छाशक्ति जें घडवून आणते, तें आमची स्वत:ची इच्छाशक्तीहि घडवून आणूं शकते; अर्थात् त्याकरतां मनाला हळूहळू पाठ द्यावे लागतात. आपल्या स्वत:च्या इच्छाशक्तीनें स्वत:च्या मनाला पाठ देऊन शरीराच्या नाडीगत संवयीच्या प्रतिक्रियांवर जें प्रभुत्व मनाला प्राप्त होतें, तें त्याच्या स्वभावाचा भाग होऊन सर्वस्वीं त्याच्या मालकीचें होतें -- वाटेल तेव्हां त्याला तें गाजवतां येतें. हें प्रभुत्व पूर्ण व सर्वांगीण असेल किंवा
पान क्र. १९९
आंशिक व एकांगी असेल; तें आमच्या इच्छाशक्तीच्या कार्यक्षमतेवर व आकांक्षेवर अवलंबून राहील.
शारीर आणि मानसिक दुःख ही निसर्गाची अर्थात् आद्यशक्तीची योजना आहे. या शक्तीच्या उर्ध्वमुखी विकासक्रमांत, एक विशिष्ट संक्रमणविषयक हेतु साधण्यासाठीं ही दुःखाची व्यवस्था आहे. व्यक्तीच्या दृष्टीनें हा अनेक शक्तींचा, गुंतागुंतीचा, व्यक्तीला नाना प्रकारचे धक्के देणारा खेळ आहे. व्यक्ती म्हणजे मर्यादित अनेक घटकांचा बनलेला, बनविलेला असा जीव आहे; त्या जीवाची शक्ति मर्यादित आहे; विश्वाच्या संकीर्ण शक्तींच्या मध्यें त्याचें स्थान आहे; या विश्वशक्तींकडून त्याला अगणित धक्के बसतात; त्या धक्यांनीं त्याला जखमा होतात, त्याचा एखादा अवयव नाहींसा होतो, त्याचा देह-प्राणादि घटक-वर्ग मोडून तोडून जातो, जीर्णजर्जर होतो, शेवटीं तो ज्याला 'मी' म्हणतो त्याचाहि विनाश होतो. या सर्व गोष्टी व्यक्तीच्या बाबतींत होऊं शकतात; व्यक्तीला अपायकारक असा संपर्क किंवा धक्का यापासून शरीराला आणि नाडीसंघाला वांचविणारा व त्यापासून दूर करणारा शरीराचा आणि नाडीसंघाचा संकोचात्मक अथवा घृणादर्शक व्यापार, असें व्यक्तींच्या ठिकाणीं असलेल्या या दुःखाचें स्वरूप आहे. उपनिषदांत ज्या व्यापाराला 'जुगुप्सा' म्हणतात, त्याचा दुःख हा एक भाग आहे; आपणाहून दुसरें कोणी किंवा आपल्याशीं सहानुभूति नसलेलें, आपणाशीं विसंवादी अशा प्रकृतीचें जें कांहीं असेल, त्याच्यापासून दूर राहण्यासाठीं स्वतःच्या मर्यादित अस्तित्वाचा संकोच करणें, 'दुसऱ्यांच्या' हल्ल्याविरुद्ध, सहजप्रेरणेनें स्वसंरक्षणाची व्यवस्था करणें हा 'जुगुप्सा' शब्दाचा भावार्थ आहे. काय टाळावें तें सुचविणारी किंवा तें यशस्वीरीतीनें टाळतां न आलें, तर त्यावर उपाय करणें अवश्य आहे हें सुचविणारी निसर्गयोजना म्हणजे दुःख होय. शुद्ध जड जगतांत ही व्यवस्था नसते, असण्याचें कारणहि नाहीं, त्या जड जगतांत प्राणतत्त्व उदयास आलें म्हणजे ही व्यवस्था केली जाते; जड जगतांत दुःख टाळण्याची क्रिया यांत्रिक रीतीनें करतां येते -- जीववर्गांत यांत्रिक रीति पुरेशी नसते म्हणून 'दुःख संवेदनेची' रीति उपयोजिली जाते. जीव दुर्बळ व नाजूक शरीररचनेचा असतो. त्याची स्वतःच्या जडघटकांवरची सत्ता अगदीं तोकडी असते. म्हणून असा जीव जड जगतांत अस्तित्वांत येतांच ही 'दुःखसंवेदनेची' योजना बरोबर आणतो. जीवांत मनाचा अविर्भाव होऊन, त्याची जसजशी वाढ होत
पान क्र. २००
जाते, तसतशी त्याच्या बरोबर जन्माला आलेली व कामाला लागलेली दु:खयोजना वाढीस लागते. जोपर्यंत शरीर आणि जीव किंवा प्राण यांच्या बंधनांत मन वागत आहे, विश्वविषयक ज्ञानासाठीं व विश्वांत कृति करण्यासाठीं तें प्राणावर व देहावर अवलंबून रहात आहे, त्यांच्या मर्यादा तें स्वत:च्याच मर्यादा मानीत आहे व या मर्यादांमुळें उत्पन्न होणाऱ्या अहंमय स्वार्थी प्रेरणांना व हेतूंना शिरोधार्य मानून कार्य करीत आहे तोपर्यंत ह्या निसर्गनिर्मित दु:खसंवेदनेच्या योजनेची जरुरी असते. मनुष्याचें मन स्वतंत्र, अहंभावशून्य झालें, दुसऱ्या सर्व जीवांशीं आणि विश्वशक्तींच्या खेळाशीं जुळवून घेऊन खेळीमेळीनें राहण्याची कला त्याला साधली म्हणजे दु:खाचे नियोजित कार्य संपतें, त्याची उपयुक्तता संपते. जवळजवळ पूर्णपणें स्वतंत्र, अहंभावशून्य व विश्वमय झालेल्या मनुष्यांत जर तें दिसलें, तर त्याला जुन्या प्रकृतीचा केवळ अवशेष व संवयीचा निरुपयोगी प्रकार असें म्हणतां येईल. तरीपण नियतीच्या कार्यक्रमांत मनुष्याच्या आत्म्याचा अंतिम विजय निश्चित आहे. आज मनुष्याचा आत्मा जडाचें अंकितत्व करीत आहे; मनाच्या पातळीवरील अहंमयतेनें मर्यादित आहे. निश्चितपणें यांतून तो मुक्त होणार आहे आणि या मुक्ततेचा, या अंतिम विजयाचा एक महत्त्वाचा सारभूत घटक म्हणजे दु:खसंवेदनेचा अंतिम विलय हा असणार हेंहि निश्चित आहे.
दु:खसंवेदनांचा अंतिम विलय शक्य आहे याचें कारण मूळ अस्तित्वाचा आनंद हा सुखदु:खाच्या मुळाशीं आहे. सुख आणि दुःख दोन्हीहि या मूळ आनंदाच्याच प्रवाहांत आहेत. सुख-प्रवाह हा अपूर्ण प्रवाह आहे तर दु:ख-प्रवाह हा विकृत प्रवाह आहे. ही अपूर्णता आणि ही विकृति निर्माण होण्याचें कारण मूळ पुरुषाच्या जाणिवेचें अखंडत्व जाऊन, तिचें विभजन होऊन, त्यामुळें पुरुषाच्या आत्म्याचें विभजन झालें आहे हें आहे. मूळ पुरुषाला मर्यादा घालणारी व त्याचें मोजमाप करणारी जी माया, तिनें हें विभजन केलें आहे; या विभजनामुळें व्यक्ति व व्यक्तीचा 'मी' निर्माण झाला आहे आणि व्यक्तीच्या ठिकाणीं समग्र जाणिवेचा अभाव असल्यानें, तिला विश्वाच्या संपर्काचा अनुभव, खंडश: आणि 'मी'च्या अहंमय मर्यादित दृष्टीनें घ्यावा लागतो. हा खंडश: घेतलेला 'मी' दृष्टीचा अनुभव, मूळ आनंदाचे भिन्न भिन्न प्रवाह बनवून त्यांत कांहीं अपूर्ण व कांहीं विकृत करण्यास कारणीभूत होतो. जो आत्मा विश्वव्यापी आहे त्याला सर्व वस्तू आणि सर्व वस्तूंचे सर्व
पान क्र. २०१
संपर्क आनंदाच्या सत्त्वानें सुसंपन्न असेच वाटतात. या आनंदसत्त्वाला 'रस' म्हणतात; वस्तूंतील जीवनभूत द्रव्य किंवा सत्त्व आणि वस्तूंचा आस्वाद किंवा रुचि या दोन्ही गोष्टींना 'रस' हें नांव आहे. 'रस' हा सौंदर्यशास्त्रांतला शब्द आहे. आमचा ज्या गोष्टींशीं संबंध येतो, त्यांचा 'रस', त्यांतील आनंदसत्त्व आम्ही शोधीत नाहीं; सर्व वस्तूंत सर्व काळ असणाऱ्या आनंदसत्त्वाचें भान आम्हांला नसतें, आम्हांला आमच्या वैयक्तिक 'मी'च्या वासना, शंका, भीती, आवडीनिवडी यांचें तीव्र भान असतें आणि कोणत्याहि गोष्टीचा संबंध आला, कीं तिच्यामुळें आमच्या वासनादिकांवर काय परिणाम होतो इकडे आमचें सारें लक्ष असतें, म्हणून त्या गोष्टींतील आनंदरस आम्हांला त्याच्या स्वाभाविक स्वरूपांत प्रतीत होत नाहीं, तर तो केव्हां दुःख आणि यातना, केव्हां अल्पकालिक अल्प सुख, केव्हां औदासीन्य किंवा स्पष्ट संवेदनेची अक्षमता अशा नाना रूपांत अनुभवास येतो. आम्ही जर आमचे वैयक्तिक स्वार्थमय विचार आणि भावना पूर्णपणें दूर ठेवूं शकलों आणि आमच्या नाडीमय पुरुषावर आमची ही नितान्त निःस्वार्थता आम्हांला लादतां आली, तर आनंदरसाची विकृत आणि अपूर्ण रूपें, दुःखे आणि सुखें, हळूहळू आम्हांला नाहींशी करतां येतील आणि आमच्या आत्म्याचा स्वाभाविक धर्म असलेल्या अस्तित्वाच्या आनंदाचा खरा मूळ स्वाद विविध संपर्कांत व विविध प्रकारांनीं आम्हांला अनुभवतां येईल. कला आणि काव्य यांनीं आमच्यापुढें उभ्या केलेल्या वस्तूंचें व प्रसंगांचें आम्ही जेव्हां रसिकपणें ग्रहण करतों, तेव्हां सर्व वस्तूंत व सर्व प्रसंगांत एकच प्रकारचा नव्हे, तर विविध प्रकारचा आनंद अनुभवण्याची पात्रता, सामर्थ्य व शक्ति आमच्या ठिकाणीं थोडीबहुत असल्याचें आमच्या प्रतीतीस येतें. काव्यकृतींतील व कलाकृतींतील करुण, भयानक किंवा बीभत्स प्रसंग देखील आमच्या ठिकाणीं आनंदवृत्ति जागृत करतात; या विविध प्रसंगांतील करुण, भयानक, बीभत्स इत्यादि विविध रस आम्ही अनुभवूं शकतो व अनुभवतो. याचें कारण काव्यकृति व कलाकृति आम्ही अलिप्ततेनें बघत असतों; आमच्या वासनादिकांचा विचार, आमच्या संरक्षणाचा विचार (जुगुप्सा) त्या वेळीं आम्हांला त्रस्त करीत नसतो; केवळ समोरील चित्र आणि त्यांतील सारभूत भाग याकडेच आमचें सर्व लक्ष लागून राहिलेलें असतें. वस्तुसंपर्कांचें रसिकतेनें केलेलें हें रसग्रहण, ही आनंदप्रतीति, शुद्ध अस्तित्वानंदाच्या प्रतीतीचें अचूक प्रतिबिंब म्हणून
पान क्र. २०२
मानतां येत नाहीं. कारण शुद्ध अस्तित्वानंद हा मनाच्या क्षेत्रापलीकडील, कलातीत उच्च भूमिकेवरील अतिमानसिक आनंद आहे; या आनंदानें दुःख, भीति, भयानकता, बीभत्सता यांचा व त्यांच्या कारणांचाहि विलय होत असतो; कलेंतील आनंद असा विलय करीत नाहीं; तथापि वस्तुजातांत क्रमश: व्यक्त होतांना विश्वमय आत्म्याला जो अधिकाधिक आनंद अनुभवास येतो, त्या आनंदाची एक अवस्था अपूर्णपणें कां होईना कलानंद आमच्या प्रत्ययास आणतो, अपूर्णपणें ती अवस्था प्रतिबिंबित करतो. आमच्या स्वभावाच्या एका अंगास कलानंद मी-प्रधान संवेदनेपासून अलिप्त राहण्यास शिकवितो आणि विश्वात्मक वृत्तीहि शिकवितो. या वृत्तीमुळें आमचा एकचएक आत्मा एकाच परिस्थितींत आमच्या विभागलेल्या 'मी'हून वेगळ्या अनुभवाचा लाभ घेऊं शकतो; जेथें 'मी'ला अव्यवस्था आणि विसंवाद दिसतो, तेथेंच एकचएक आत्म्याला सुव्यवस्था, सुसंवाद, सौंदर्य प्रतीत होतें. आमच्या कलात्मक वृत्तींत आम्ही जी स्वतंत्रता व अहंमुक्तता उपभोगतों, ती जेव्हां आमच्या स्वभावाच्या सर्व वृत्तींत आमच्या वांट्यास येईल, तेव्हां आम्ही पूर्णपणें स्वतंत्र होऊं -- पूर्णपणे अहंमुक्त होऊं. आमचें ज्ञान वाढून आमचा दृष्टिकोन विश्वात्मक झाला, सर्वच वस्तूंसंबंधानें आमच्या ठिकाणीं अलिप्तता, असंगता निर्माण झाली, अनासक्ति असूनहि आम्ही आमच्या भावनात्मक व नाडीमय जीवनांत सर्वांशीं सहानुभूति ठेवून वागूं लागलों, म्हणजे आम्ही पूर्णपणें स्वतंत्र झालों व अहंमुक्त झालों असें होईल आणि आम्हांला सर्वत्र सौंदर्य प्रत्ययास येईल, सर्वत्र आनंदच आनंद लाभेल.
दु:खाचें स्वरूप, त्याचा स्वभाव आतां आपल्याला समजला. आम्हांमध्यें जी सामान्य जाणीव आहे, तिला विश्वाकडून होणाऱ्या आघातांना तोंड देण्याची, ते सहन करण्याची शक्ति नसते, म्हणून हे आघात टाळण्यासाठी किंवा हे आघात आल्यावर त्यांचा परिणाम म्हणून आमची जाणीव संकोचन पावते, आपलें अंग आंवरून घेते. हें संकोचन म्हणजे दु:ख होय. हें दु:ख होण्याचें कारण आमची आघात झेलण्याची व ते आत्मसात् करण्याची शक्ति सर्व आघातांच्या बाबतींत सारखी नाहीं; तसेंच, आमची आघात झेलण्याची शक्ति आणि आमच्यावर आघात करणारी विश्वाची स्वत:ची सर्वस्वामित्वशक्ति या दोहोंत सारखेपणां नाहीं; आम्ही आपली शक्ति 'मी' कल्पनेनें मर्यादित केलेली आहे; व विश्वशक्ति मात्र अमर्यादित आहे. आम्हीं 'मी' तंत्र होण्याचें कारण
पान क्र. २०३
आमचें खऱ्या आत्म्यासंबंधाचें अज्ञान, सच्चिदानंदविषयक अज्ञान हें होय. दु:खाचें हें स्वरूप आणि मूळ लक्षांत घेता दु:खाचें निर्मूलन कोणत्या मार्गानें होईल हें समजू शकतें. या निर्मूलनाची पहिली पायरी म्हणजे आघातप्रसंगींचें संकोचन - 'जुगुप्सा' - टाकून 'तितिक्षे'चा अंगीकार करणें ही होय. 'तितिक्षा' म्हणजे विश्वाच्या आघातांना तोंड देणें, ते सहन करून त्यांच्यावर जय मिळवणें. तितिक्षापूर्वक विजय मिळविल्यानें आम्ही हळूहळू दुसरें पाऊल टाकूं शकूं, ही दुसरी पायरी किंवा पाऊल म्हणजे 'वृत्तीची समता'. ही दोन प्रकारची असूं शकते. कोणताहि आघात असला, तरी उदासीन राहणें, आघाताचा कसलाच परिणाम स्वत:वर न होऊं देणें हा एक प्रकार, यांत सर्व आघातांना आम्ही सारखेच परिणामशून्य करतों. या उलट सर्व आघात सारख्याच आनंदानें स्वीकारावयाचे हा समतेचा दुसरा प्रकार. यापैकीं कोणतीहि समता आमची कायमची स्वाधीन होण्यासाठीं आम्ही प्रथम आमच्या 'मी' जाणिवेला (सुखदु:खबद्ध जाणिवेला) बाजूला करून, तिच्या जागीं सदानंद, सर्वानंद अशी 'सच्चिदानंद-जाणीव' पक्की केली पाहिजे. 'सच्चिदानंद-जाणीव' ही एकतर विश्वातीत किंवा विश्वापासून अलिप्त असूं शकेल; सारख्या औदासिन्यानें सर्व संपर्कांचा 'समाचार' घ्यावयाच्या मार्गानें ही दूरची आनंदावस्था प्राप्त होते; हा मार्ग संन्यास-मार्ग होय. तसेंच 'सच्चिदानंद-जाणीव,' विश्वातीत आणि विश्वमय अशी एकाच वेळींहि असूं शकेल; या सार्वकालिक व सर्वव्यापी आनंदावस्थेला पोंचण्याचा मार्ग म्हणजे समर्पण; 'मी'ने विश्वमय आत्म्याच्या स्वाधीन होणें, त्यांत विलीन होणें; सर्व संपर्कांचा सारख्याच सर्वस्पर्शी आनंदानें परामर्श घेणें हा आहे; प्राचीन वैदिक ऋषींचा हा मार्ग आहे. तथापि सुखाचे अपूर्ण संपर्क आणि दु:खाचे विकृत संपर्क, यांना सारख्याच औदासिन्यानें, तटस्थतेनें किंवा अलिप्ततेनें वागविणें ही गोष्ट आत्मनियंत्रणाचा पहिला प्रत्यक्ष व स्वाभाविक परिणाम असतो. ही गोष्ट साधल्यावर या तटस्थ वृत्तीचे रूपांतर सर्व संपर्कांचें सारख्याच 'गोडीनें' स्वागत करणाऱ्या आनंद-वृत्तींत हळूहळू घडून येऊं शकतें. सामान्यत: आत्मनियंत्रणाच्या मार्गानें साधक प्रथम सर्वत्र 'तटस्थ वृत्ति' व नंतर सर्वत्र 'आनंद-वृत्ति' सिद्ध करतो. सुख, दु:ख व उदासीन वृत्ति या त्रिमुखी स्पंदनाचें सर्वप्रेमी आनंदवृत्तींत एकदम रूपांतर करणें अशक्य नाहीं; परंतु मनुष्यप्राण्याला ही गोष्ट तितकी सोपी नाहीं. वर सांगितलेल्या
पान क्र. २०४
दोन टप्प्यांनीं हें ध्येय गांठणें त्याला अधिक सोपें असतें.
वेदान्तानें समग्रतेच्या दृष्टीनें जो सिद्धान्त प्रतिपादिला आहे, त्या सिद्धान्तावरून विश्वाचे वरील प्रकारचें दृश्य आपल्यासमोर उभें राहतें. वेदान्तानुसार एक अस्तित्व, सद्वस्तु आहे; ती अनंत आहे, अविभाज्य आहे. तिची शुद्ध आत्म-जाणीव पूर्ण आनंदमय आहे; ही जाणीव शक्तिरूप आहे, ही आनंदमय जाणीवशक्तीची शुद्ध निश्चल सद्वस्तु चलायमान होते, जाणीवशक्तीचा विविध खेळ उभा करते; प्रकृतीचा गतिमान् संसार व मायेचा खेळ उभा करते. जड भौतिक विश्वांत, तिच्या खेळाच्या पायाभूत विभागांत, जाणिवेच्या पातळीखालीं या सद्वस्तूचा अस्तित्वाचा आनंद असतो. तिच्या स्वतःच्या अंतरांत एकीभूत झालेला, जणुं आत्मध्यानमग्न असा तो असतो; नंतर हा आनंद एका तटस्थ वृत्तीचें, महान् सामूहिक तटस्थ स्पंदनाचें रूप घेतो; नेणिवेंतून किंचित् वर येतो; तथापि अद्यापि त्याला संवेदनेचें स्वरूप आलेलें नसतें; यानंतर मन आणि 'मी' उदयास येऊन वाढूं लागतांच हा आनंद त्रिमुखी स्पंदनाचें -- सुख-दुःख-औदासीन्याचें रूप धारण करतो; सर्वगत आनंदानें हें त्रिमुखी रूप घ्यावयाचें कारण म्हणजे रूपामध्यें, आकारामध्यें कोंडल्यामुळें त्याच्या जाणीवशक्तीचा संकोच झालेला असतो, तिला मर्यादा पडलेली असते आणि तिजवर आघात येतात ते सर्वव्यापी विश्वशक्तीचे येतात; हे आघात मर्यादित झालेल्या जाणिवेला परक्या शक्तीचे भासतात; तिचें स्वतःचें मोजमाप, प्रमाणमाप लहान झालेलें असल्यामुळें त्या मानानें तिला विश्वशक्ति अतिमहान् वाटते. तिच्याशीं या आकारबद्ध क्षुद्र शक्तीचें जुळत नाहीं आणि म्हणून विश्वशक्तीचा संपर्क तिला विसंवादी भासतो. अस्तित्वाचा मूळ आनंद याप्रमाणें भिन्न अवस्थांतून मार्ग क्रमून विश्वव्यापकता, समता, आत्मलाभ व प्रकृतीवरील विजय या मार्गानें शेवटीं मूळ सच्चिदानंद होतो. विश्वाच्या गतीचा मार्ग, प्रवाह, हा असा आहे.
आतां, असा एक प्रश्न विचारतां येण्यासारखा आहे कीं, एकच एक असें जें अस्तित्व मुळांत होतें व जें आनंदमय होतें त्याला, आपल्या अनुभवास येणाऱ्या या विश्वव्यापाराची आवश्यकता कां भासली ? त्याला अशा व्यापारांत आनंद कां वाटतो ? या प्रश्नाचे उत्तर असें देतां येतें कीं, मूळ सत् अनंत आहे. अनंत सद्रूपामध्यें अनंत शक्यता आहेत; या सद्वस्तूचा आनंद मूळ अक्षर अरूप स्वरूपांतहि आहे आणि क्षर,
पान क्र. २०५
बदलणारीं अशीं रूपें धारण करण्यांतहि आहे. अनंत स्वतंत्र सद्वस्तु कशानेंहि बांधलेली नाहीं. एकरूप वा अरूपच राहिलें पाहिजे असें कांहीं तिजवर बंधन असूं शकत नाहीं. तेव्हां अरूपाच्या पोटीं आपलें रूप विविध करण्यांत तिला आनंद होतो म्हणून ती तसें करते. ज्या शक्यता तिच्यांत आहेत, त्या अनेक प्रकारांनीं वास्तवांत आणणें यांतच साकारतेचा आनंद तिला भोगतां येतो. ज्या विश्वाचे आम्ही भाग आहोंत, तें विश्व म्हणजे त्या अनंत सद्वस्तूच्या पोटांतील अनंत शक्यतांपैकीं वास्तवांत आणलेली एक शक्यता होय. येथें सच्चिदानंद ही मूळ सद्वस्तु तिच्या अगदीं विरुद्ध स्वभावाच्या भासणाऱ्या वस्तूंत प्रथम लपते आणि शेवटीं या विरुद्धस्वभावी भासणाऱ्या वस्तूच्या पडद्यांत राहूनहि आपलें आवरणरहित स्थितींतलें मूळ सच्चिदानंदत्व प्रकट करते. अनंत असें मूळ अस्तित्व, दर्शनीं नास्तित्व भासणाऱ्या वस्तूच्या पोटी लपतें आणि तेथें पुढें अनंतत्व जणुं टाकून सांत आत्म्याच्या रूपानें प्रकट होतें. मूळ अनंत जाणीव दर्शनीं महान् रूपरेखाशून्य असलेल्या नेणिवेच्या पोटीं लपते. आणि पुढें तेथें मर्यादित उथळ जाणिवेच्या रूपानें प्रकट होते. स्वयंपूर्ण स्वप्रतिष्ठित आणि अनंत मूळ शक्ति, दर्शनीं अव्यवस्थामय अणूंच्या पसाऱ्याच्या रूपांत जणुं प्रथम नाहींशी होते आणि पुढें अस्थिर तोल असलेलें विश्व या रूपानें प्रकट होते. मूळ अनंत आनंद, दर्शनीं संवेदनाशून्य भौतिक द्रव्यांत लपतो आणि पुढें तेथें सुख-दुःख-औदासीन्य किंवा प्रेम-द्वेष-तटस्थता या त्रिमुखी बेसूर संवेदनांच्या रूपानें प्रकट होतो. मूळ अनंत एकत्व हें अव्यवस्थामय अनेकतेच्या रूपांत लपतें आणि पुढें तेथें शक्तींचा व जीवांचा संघर्ष या रूपांत प्रकट होतें. मूळ एकता परत स्थापण्यासाठीं एका जीवानें दुसऱ्याला अंकित करावें, त्याचा अंत करावा, भक्षण करावें; प्रत्येक शक्तीनेंहि असेंच करावे -- शक्तींचा व जीवांचा अशा स्वरूपाचा संघर्ष मूळ एकतेची जागा घेतो. ही अशी सृष्टि मूळ सच्चिदानंदांतूनच निर्माण होते. अशा या सृष्टींत खऱ्या मूळ सच्चिदानंदानें पुन: प्रकट व्हावयाचें आहे. या प्रक्रियेंत, व्यक्तीचें रूप घेतलेल्या मनुष्याला विश्व-समरस जीव होऊन विश्वमय जीवन जगावयाचें आहे; त्याची मर्यादित मानसिक जाणीव व्यापक होऊन अतिमानसिक एकतासंपन्न व्हावयाची आहे, जीमुळें मनुष्य सर्व चराचराला आपल्या आत्म्यांत समाविष्ट करून घेईल. आज आकुंचित व कृपण
पान क्र. २०६
असलेल्या मानवाच्या हृदयाला अनंत चराचराला आपल्या कवेंत घेण्यास व आपल्या तीव्र स्वार्थी वासना व विसंवाद टाकून सर्वांवर प्रेम करण्यास शिकावयाचें आहे. मनुष्याच्या संकुचित प्राणनिष्ठ जीवनास विश्वाचे कसलेहि आघात सहन करण्याजोगेंच नव्हे, तर कसल्याहि आघातांचें मोठ्या आनंदानें स्वागत करण्यास, सर्वत्र सर्व परिस्थितींत आनंदानुभव घेण्यास समर्थ व्हावयाचें आहे. त्याच्या शारीर जीवनास देखील सर्व जीवनाशीं भिन्नत्व नव्हे तर स्वतःचें ऐक्य अनुभवावयाचें आहे; मूळ अविभाज्य शक्तीचा सर्व ओघ स्वत:शी एकरूप मानून, त्या प्रचंड शक्तिप्रवाहाला आधारभूत होण्यासारखी शक्ति धारण करावयाची आहे. एकूण, त्याच्या वैयक्तिक रूपांत त्याच्या स्वभावाच्या सर्व अंगांत आणि एकंदर स्वभावांत, परात्पर सच्चिदानंदरूप मूळ सद्वस्तूची एकता, सुसंवादिता, सर्वतामय एकता आणि एकतामय सर्वता पुन: आविष्कृत केली जाणार आहे. आजच्या मानवी व्यक्तींत हें सर्व परिवर्तन व्हावयाचें आहे.
या सर्व लीलेंत सर्व परिस्थितींत गुप्त सत्य एकच आहे. तें म्हणजे सर्वदा सर्वत्र एकच एक समान असा अस्तित्वाचा आनंद. व्यक्तीच्या उदयापूर्वीं नेणिवेची सुषुप्ति असते, तेथें हा आनंद असतो; मूळ अस्तित्वाचा आनंद हा नेणिवेच्या सुषुप्तींत राहून व तेथील आनंद भोगून नंतर व्यक्तिकेन्द्रित अर्धवट जाणिवेच्या स्वप्नाचें रूप घेतो. या स्वप्नांत अनेक वळणें वळणें घेऊन मार्ग क्रमावा लागतो. या वळणांच्या गोंधळांत अस्तित्वाचा आनंद आपला स्वतःचा शोध घेत हिंडतो. या शोधाच्या खटपटींत त्याला आनंद असतो. या शोधासाठीं कराव्या लागणाऱ्या झगड्यांतहि त्याला आनंद असतो. शोधाची धडपड अनेक प्रकारची असते. कमी अधिक यश-अपयश यांनीं धडपडीला विविधता येते. शोधाची खटपट विकृतपणेंहि केली जाते, या खटपटीचें स्वरूप कधीं उच्च होते व पुन: मूळ पदावर येतें, या सर्व परिस्थितींत व परिवर्तनांत अस्तित्वानंद आनंद अनुभवतो. शेवटीं अर्धवट जाणिवेचें स्वप्न संपतें आणि व्यक्तिकेन्द्रांत पूर्ण जागृत स्थिति येते; (व्यक्तीला ही पूर्ण जागृति शेवटीं यावयाची आहे; या पूर्ण जागृतींत व्यक्ति अविभाज्य अशा सच्चिदानंद सद्वस्तूशीं एकरूप होणार आहे.) या जागृतींत अस्तित्वाचा आनंद हा पूर्ण जागृत व्यक्तीच्या रूपानें, अतिमानसिक पूर्ण जाणिवेनें युक्त असा, शाश्वत आत्मलाभाचा आनंद अनुभवतो. याप्रमाणें मूळ सद्वस्तु आनंदमय आणि तिची सर्व लीला आनंद-हेतुक व
पान क्र. २०७
आनंदमय आहे. या भौतिक विश्वांत आम्हांला जो विचाराचा दृष्टिकोन लाभलेला आहे, त्या दृष्टिकोनांतून आमच्या प्रकाशपूर्ण, बंधनशून्य व पूर्ण-मुक्त जाणिवेला एकच एक परमतत्वाच्या, परमेश्वराच्या, सर्वरूपाच्या खेळाचे जें दर्शन घडलें आहे, व जें परमतत्वानें घडविलें आहे तें हें असें आहे.
पान क्र. २०८
प्रकरण तेरावें
दैवी माया
परमेश्वर आणि प्रकाशमाता यांच्या नांवांचा उपयोग करून (त्यांच्या आज्ञेनें) मायापतींनीं त्या मातेच्या शक्तीला रूप दिलें, तिला मोजमाप दिलें. (तिला मर्यादा घातल्या.) त्या शक्तीचें विविध सामर्थ्य क्रमाक्रमानें झग्याप्रमाणें अंगावर घेऊन, मायापतींनीं या निराकार पुरुषोत्तमाचे ठिकाणीं आकार निर्माण केले.
- ऋग्वेद ३.३८.७
मायापतींनीं त्यांच्या मायेच्या आश्रयानें सर्व आकार तयार केले, सर्वांना रूप दिलें, या पितरांना, पूर्वजांना (मायापतींना) दिव्यदृष्टि आहे, ते पूर्वज (मायापती) त्या आकारांच्या पोटीं त्याला ठेवतात, जन्म घेणाऱ्या मुलाला ठेवावें त्याप्रमाणें; अर्थात् आकारांच्या पोटीं तो ठेवला गेला म्हणजे पुढें तो योग्यवेळीं जन्म घेतो -- साकार म्हणून उदयास येतो.
- ऋग्वेद ९.८३.३
आमचें वास्तव स्वरूप, आमच्या सर्व वृत्तींचें, सर्व वर्तनप्रकारांचें मूळ तत्त्व, आमचें करणें, होणें, निर्माण करणें या सर्व गोष्टींचें कारण, हेतु व साध्य एक महान् सद्वस्तु आहे, जी आपल्या सामर्थ्यानें कृतिशील होते आणि विविध निर्मिति करते; आणि हें सर्व स्वतःच्या जाणीवयुक्त अस्तित्वाच्या शुद्ध निर्भेळ आनंदासाठीं, आनंदाच्या प्रेरणेनें करीत असते. कवि, कलाकार, संगीतज्ञ कांहीं निर्माण करतो, तेव्हां त्याच्या अव्यक्त आत्म्यांतील कांहीं सामर्थ्य विकसित व व्यक्त करण्यापलीकडे तो वस्तुत: कांहीं करीत नाहीं; विचारक, मुत्सद्दी, यंत्रविशारद जेव्हां त्यांच्या अंतरांत गुप्तसुप्त असलेलें कांहीं आकारास आणतात, तेव्हां तें त्यांच्यापासून वेगळें असें कांहीं नसतें; आकारास येण्यापूर्वीं, आकारास आल्यानंतर तें
पान क्र. २०९
त्यांचेंच अव्यक्त वा व्यक्त रूप असतें -- ही जशी वस्तुस्थिति असते तशीच गोष्ट शाश्वत मूळ सद्वस्तु आणि हें विश्व यांची आहे. सर्व निर्मिति, सर्व रूप-धारण, सर्व नामरूप हें मूळ सद्वस्तूचें, निराकार अव्यक्त सद्वस्तूचें साकार होणें, व्यक्त होणें आहे, दुसरें कांहीं नाहीं. अस्तित्वांत अगोदरच असलेलें, रूपयुक्त होण्याची इच्छा नियतीनुसार धारण करणारें, रूप घेण्याचा आनंद पूर्वींच निश्चित झालेलें, असें जें कांहीं मूळबीजांत अगोदरच असेल, तेंच त्या बीजांतून वर येतें, विकसित होतें. मूळ जीव, बीजांत पुढें निर्माण होणारा जीव, अस्तित्वाची, जीवत्वाची शक्ति या रूपानें असतोच. जेथें जेथें रूप, आकार अस्तित्वांत येतो तेथें तेथें स्वतःला जाणणारी, विशिष्ट रूप स्वतःचें पोटीं धारण करणारी, आपल्या दृष्टीपासून लपलेली, शक्ति सर्वत्र असते. त्या शक्तीचे ठिकाणीं विशिष्ट रूपानें व्यक्त होण्याची अनिवार्य अशी प्रेरणा असते, अखेर या अनिवार्य प्रेरणेच्या दडपणामुळें ही शक्ति स्वतःचें विशिष्ट रूप, व्यक्त रूप धारण करते; एवढेंच कीं, व्यक्तिरूप मनुष्य आपणांतूनच सर्व कांहीं विकसित किंवा निर्माण करीत असूनहि त्याच्यामध्यें कार्य करणारी शक्ति व ज्या द्रव्याचा उपयोग कार्यासाठीं करण्यांत येतो किंवा ज्यावर क्रिया करण्यांत येतें तें द्रव्य, यांजमध्यें तो स्वत: एकता मानीत नाहीं -- हें सर्व भिन्न भिन्न आहे असें मानतो. खरी गोष्ट अशी आहे कीं, त्याच्यांत काम करणारी शक्ति तो स्वतःच असतो, ही शक्ति जिचा साधन म्हणून उपयोग करते, ती वैयक्तिक जाणीव तो स्वतःच असतो, जें द्रव्य ती वापरते, तें द्रव्यही तो स्वतःच असतो आणि या शक्तीचा वगैरे परिणाम म्हणून जें रूप, जो आकार बनतो, तें रूप, तो आकार तो स्वतःच असतो. दुसऱ्या शब्दांत हीच गोष्ट सांगावयाची, तर असें म्हणतां येईल कीं, एकच अस्तित्व, अस्तित्वाची शक्ति व अस्तित्वाचा आनंद असलेला असा आत्मा निरनिराळ्या स्थानीं स्वत:ला केन्द्रित करून, प्रत्येक स्थानासंबंधानें ''हा मी आहे'' असा वाक्प्रयोग करतो आणि त्या प्रत्येक स्थानीं स्वतःचीं निरनिराळी रूपें बनविण्यासाठीं स्वतःच्या शक्तीचा निरनिराळा प्रयोग करून काम करीत असतो.
या कार्यानें तो जें निर्माण करतो, तें अर्थांतच तो स्वतःच असतो; आणि स्वतःखेरीज दुसरें कांहीं तें असूंच शकणार नाहीं. कारण हा आत्मा आपल्या स्वतःचें अस्तित्व, स्वतःची जाणीवशक्ति व स्वतःचा अस्तित्वाचा आनंद आपल्या क्रियाव्यापारांनीं गतिमान् करून त्यांचा
पान क्र. २१०
एक विशिष्ट लीलाप्रयोग, एक विशिष्ट सुसंगत प्रयोग, एक विशिष्ट सुविकसित आकार उदयास आणण्यासाठीं धडपडत असतो. म्हणून विश्वांत जें कांहीं उदयास येतें, त्याची धडपड केवळ याचसाठीं चाललेली असते कीं, आपण अस्तित्वांत असावें, आपला नियोजित आकार आपणांस मिळावा, त्या आकारांत आपलें आत्मास्तित्व आपण विस्तृत करावें. आपल्यांत जी जाणीव व जी शक्ति आहे, ती कोणतीहि सीमा न मानतां आपण विकसित करावी, व्यक्त करावी, वाढवावी, कार्यान्वित करावी; व्यक्त रूपांत येण्याचा आनंद आपण उपभोगावा; अर्थात् विशिष्ट आकाराचा आनंद, विशिष्ट जाणीव-रागदारीचा आनंद, विशिष्ट शक्तिप्रयोगाचा आनंद आपण उपभोगावा; हा आनंद आपण वाढवावा, पूर्णतेस न्यावा व हें करतांना आपल्या खोल अंतरांत जो आत्मा (अस्तित्व-जाणीव-शक्ति-आनंदरूप आत्मा) सक्रिय झालेला आहे, त्यानें स्वतःसंबंधाची जी कल्पना सुचविली असेल, त्या कल्पनेला धरून सर्व शक्य साधनांचा सर्व दिशांनीं आपण उपयोग करावा -- कसेंहि करून वर सांगितलेला आपला त्रिविध आनंद वाढवावा व पूर्णतेस न्यावा.
विश्वांतील व्यक्तीच्या व वस्तुजाताच्या धडपडीला जर कांहीं साध्य असेल आणि पूर्णता हें जर तें साध्य असेल, तर व्यक्तीमध्यें आणि व्यक्तींनीं बनणाऱ्या मानवसमाजामध्येंहि स्वतःच्या अस्तित्वाची पूर्णता, स्वतःच्या शक्तीची आणि जाणिवेची पूर्णता, स्वतःच्या अस्तित्वानंदाची पूर्णता हेंच तें साध्य असणें शक्य आहे. विश्वांतील धडपडीचें दुसरें कोणतेंहि साध्य असणें शक्य नाहीं. पण ही ध्येयभूत पूर्णता, समग्रता, वैयक्तिक आकारांत कोंडलेल्या वैयक्तिक जाणिवेला लाभणें अशक्य आहे; असीम निरतिशय पूर्णता, सीमित साकाराचें ठिकाणीं शक्यच नाहीं. कारण सीमिताची स्वतःची स्वत:संबंधाची कल्पना, असीम पूर्णतेच्या कल्पनेला अर्थातच सर्वस्वीं विरोधी आहे. यासाठीं व्यक्तीमध्यें, सीमित जाणिवेच्या ठिकाणीं, असीम अनंत जाणीव उदयास येणें, उदयास आणणें हेंच एक व्यक्तीच्या धडपडीचें अंतिम ध्येय असलें पाहिजे; व्यक्तीनें आत्मज्ञान व आत्मप्रतीति यांच्या आधारानें आपलें मूळ स्वरूप, सत्य पुन: आपलेसें केलें पाहिजे; आपण मूळ रूपांत अस्तिवानें अनंत आहोंत, जाणिवेनें अनंत आहोंत, आनंदानें अनंत आहोंत हें तिनें ओळखलें पाहिजे आणि हा तिचा त्रिमुखी मूळ वास्तव आत्मा तिनें पुन्हां आपलासा केला पाहिजे; तसेंच आपलें सीमित रूप हें केवळ एक आवरण, विविध प्रकारच्या आविष्कारांचें
पान क्र. २११
साधन म्हणून आपण अंगीकारलें आहे, हें व्यक्तीनें पक्केपणीं जाणलें पाहिजे.
विश्वाचा जो खेळ सच्चिदानंदानें अस्तित्वांत आणला आहे, त्याचा स्वरूपधर्म पाहता असें दिसतें कीं, सच्चिदानंदानें आपलें मूळ अस्तित्व काल आणि आकाश (अवकाश) या कल्पनांच्या द्वारां अति विस्तृत करून, त्या विस्तृत आधारावर विश्वाचा खेळ उभारला आहे; या खेळांत कमी अधिक घन असें जड द्रव्य आहे, हें द्रव्य विभाज्य आहे, त्याच्या विभाज्यतेला सीमा नाहीं; या द्रव्याच्या पोटीं जाणीवयुक्त मूळशक्तियुक्त अस्तित्व, अर्थात् मूळ आत्मा लपतो, द्रव्यांत जणुं विलीन होतो -- समाधिस्थ होतो; द्रव्याची असीम विभाज्यता आत्म्याला मर्यादित व विविध आकार धारण करावयास उपयोगी पडते; जड द्रव्याच्या पोटीं चैतन्यानें -- चैतन्यशक्तीनें, आत्म्यानें लपणें हा विश्वलीलेचा पहिला अंक आहे; या लीलेच्या दुसऱ्या अंकांत, स्वतःला द्रव्याच्या पोटीं कोंडून घेणारी आत्मशक्ति प्रकट होते; साकार आत्मा, जीवयुक्त आत्मा, विचारसमर्थ आत्मा अशीं रूपें हा आत्मा प्रकट होऊन क्रमाक्रमानें घेतो; लीलेच्या तिसऱ्या अंकांत साकार विचारसमर्थ आत्मा, विचारमार्गानें प्रवास करून, शेवटीं असा साक्षात्कार संपादन करतो कीं, विश्व-खेळ खेळणारा एकच एक अनंत आत्मा मीच आहे -- याप्रमाणें अज्ञानाच्या बंधनांतून पूर्णपणें मुक्त होऊन, आरंभीं जडद्रव्यलीन झालेला आत्मा शेवटीं पुन: आपलें मूळस्वरूप, अनंत सत्-चित्-आनंदरूप प्रकटपणें साकारतेंत प्राप्त करतो; अर्थात् गुप्तपणें आजहि तो सच्चिदानंदच आहे, तो शाश्वतचाच सच्चिदानंद आहे, त्याचें वास्तव रूप सदासर्वदा, अरूप वा सरूप अवस्थेंत, सच्चिदानंद हेंच आहे व असावयाचें. असो. बुद्धीला दुर्गम असलेल्या विश्वखेळाचा सुगमतेनें बोध करून घ्यावयास या खेळाची तीन अंकांत केलेली वरील मांडणी उपयोगी पडेल. या तीन अंकांत गतिमान् सच्चिदानंदाची त्रिपदा-प्रवृत्ति समाविष्ट आहे.
जो क्रमविकासाचा आधुनिक सिद्धान्त विश्वांतील घटनांना लावण्यांत येतो, तो वर निर्दिष्ट केल्याप्रमाणें प्राचीन वेदान्ताच्या विश्वात्मक सनातन सिद्धान्ताच्या पोटांत अंतर्भूत आहे. हा सनातन सिद्धान्त आधुनिक सिद्धान्तावर प्रकाश टाकून, त्याचा पूर्ण अर्थ आमच्या मनावर ठसवितो व त्याचें पूर्ण समर्थन करतो. आधुनिक सिद्धान्ताची पूर्ण सार्थता सनातन वेदान्ती सिद्धान्ताच्या साह्याशिवाय होतच नाहीं. जडद्रव्य आणि जडशक्ति यांच्या अभ्यासावरून आधुनिकांनीं क्रमविकासाचा
पान क्र. २१२
सिद्धान्त बसविला. पूर्ण निराकार विश्वात्मा कालदृष्ट्या क्रमाक्रमानें साकारतेंत (जडता, जीवता, विचारशीलता असा) स्वतःचा विकास करीत, मानवतेच्या आजच्या विकासावस्थेपर्यंत येऊन पोंचला आहे आणि मानव शेवटीं साकार ''व्यक्तीचा'' साकार विश्वात्मा होणार आहे किंवा विकासशील विश्वात्मा मानवाच्या आकारांत स्वतःचा पूर्ण विकास करून घेऊन, संकुचित व्यक्तित्व टाकून पुन: विश्वात्मा होणार आहे, असा सिद्धान्त प्राचीन वेदान्त्यांनीं विश्वाच्या सर्व अंगांचा अभ्यास करून प्रस्थापित केला. विश्वांतील विचारवन्त पाश्चात्यांचा नवा जडविकास-सिद्धान्त व पौर्वात्यांचा जुना आत्मविकास-सिद्धान्त दोन्ही एकत्र अभ्यासीत आहेत आणि विश्वांतील विचारसरणी आजच असें वळण घेत आहे कीं, जुनें पौर्वात्य व नवें पाश्चात्य या ज्ञानांचें मीलन झाल्यास ती गोष्ट दोघांनाहि लाभदायक आहे, कारण या मीलनानें दोघांनीं स्वतंत्रपणें प्रस्थापित केलेल्या सत्यविषयक सिद्धान्तांचा एकमेकांवर प्रकाश पडून, दोन्ही सिद्धान्तांतील सत्यांश पूर्वींपेक्षां अधिक स्पष्ट होतो.
विश्वांतील सर्व वस्तू, सर्व घटना या स्वरूपतः सच्चिदानंद आहेत, ही गोष्ट आपण शोधून काढली पण एवढ्यानें विश्वाचें स्पष्टीकरण पूर्ण होत नाहीं. विश्वाचें मूळ सत्य, अरूप रूप, आपल्याला सापडलें; पण हें मूळ अरूप सत्य आजचें विश्वाचें दृश्य रूप घेतांना कोणकोणत्या प्रक्रियांतून गेलें, तें अद्यापि आपण पाहिलेलें नाहीं. विश्वाच्या कूट प्रश्नाची गुरुकिल्ली आपल्या हातांत आलेली आहे, आतां ही गुरुकिल्ली कोणत्या कुलपांत चालतें तें पहावयाचें आहे. जादूगार आपलें जादूचें जग शब्दानें निर्माण करतो, तशी या विश्वाची किंवा विश्वांची उभारणी सच्चिदानंदानें कांहीं केवळ लहरी शब्दानें किंवा मंत्रानें केलेली नाहीं. येथें आपल्याला विशिष्ट कायदा, नियम, पद्धति, प्रक्रिया दिसते. मूळ सच्चिदानंद एकदम विश्वरूप घेत नाहीं, लहरीनेंहि घेत नाहीं -- तो मूळ पुरुष विशिष्ट कायद्यानें काम करतो.
आतां हें खरें कीं, येथें जो कायदा आम्हांला दिसतो, त्याचें विश्लेषण केल्यास आमच्या नजरेस प्रथमदर्शनीं असें येतें कीं, येथें विविध शक्तींचा समतुलनाचा खेळ चालला आहे आणि या खेळांत ज्या विशिष्ट प्रक्रिया किंवा क्रियापद्धती निश्चित होतात, त्या पूर्वयोजनेनें निश्चित होत नसून, विकासक्रियेंतील आकस्मिक व्यापार व घटना आणि अगोदरच जी शक्ति कार्यान्वित झाली आहे, तिची कार्य करण्याची सहज पडलेली
पान क्र. २१३
संवय, या दोन गोष्टींनीं निश्चित होतात. विश्वाच्या कायद्याचें हें जें स्वरूप दिसतें, तें दर्शनी व दुय्यम स्वरूप आहे. आपण जोपर्यंत केवळ शक्तीचा विचार करतों, तोंपर्यंत कायद्याचें हें दर्शनी स्वरूप त्याचें खरें अंतिम स्वरूप आहे असें आम्हांला वाटतें. पण शक्ति ही स्वयंभु सदवस्तूची स्वतःला व्यक्त करण्याची प्रवृत्ति आहे, सद्वस्तूचा आत्माविष्कार म्हणजे शक्ति हें आपण ध्यानांत घेतलें म्हणजे, जी कार्यपद्धति किंवा प्रक्रिया ही शक्ति अनुसरते; ती कार्यपद्धति किंवा प्रक्रिया मूळ सद्वस्तूच्या कोणत्यातरी निजीं-सत्याला धरून असते आणि त्या कार्यपद्धतीचें अंतिम साध्य आणि तें साधण्याचा कमी अधिक वळणाचा मार्ग हें सद्वस्तूचें विशिष्ट आत्मीय सत्य पूर्णाधिकारानें ठरवीत असतें, हें आपल्या लक्षांत येतें. जाणीव, ज्ञानमयता हा मूळ स्वयंभु सद्वस्तूचा स्वभावधर्म असल्यानें आणि ही जाणीव तिच्या शक्तीची प्रकृति असल्यानें, त्या सद्वस्तूचें विशिष्ट निजीं-सत्य पुरुषाचें विशिष्ट आत्मदर्शनरूप असलें पाहिजे; अर्थात् तें सत्य म्हणजे मूळ ज्ञानमय पुरुषाची स्वतःची कांहीं आंतरिक योजना असली पाहिजे, हें उघड आहे. त्याचप्रमाणें त्या सत्याची शासकता म्हणजे ज्ञानमय पुरुषाच्या ज्ञानामध्यें असलेली स्वाभाविक स्वयंशासकता होय. अर्थात् हें आत्मशासक ज्ञान स्वतःच्या शक्तीची प्रक्रिया ठरवितें व स्वतःच्या मूळ योजनेनुसार या प्रक्रियेचा मार्ग तर्कशुद्ध रीतीनें ठरवून आपल्या शक्तीला त्या मार्गानें, स्वत: निश्चित केलेल्या साध्यापर्यंत घेऊन जातें. अशी एकंदर ''शक्तीच्या प्रक्रियेची'' कथा आहे. तेव्हां, विश्वाची उभारणी सच्चिदानंदाच्या विश्वव्यापक ज्ञानानें आपल्या अध्यक्षत्वाखालीं, आपल्या मार्गदर्शकत्वाखालीं आपल्या पूर्ण पूर्वयोजनेनुसार केलेली आहे. त्याच्या विश्वात्मक ज्ञानांत स्वयंशासनाचें सामर्थ्य आहे, त्याच्या अनंत अस्तित्वाच्या स्वाभाविक आत्मजाणिवेमध्यें स्वतःमधील विशिष्ट सत्य बघण्याचें सामर्थ्य आहे; तसेंच या विशिष्ट सत्याच्या मार्गानें आपली निर्माणशक्ति, आविष्कारशक्ति चालविण्याचेंहि सामर्थ्य त्या आत्मजाणिवेमध्यें आहे.
अनंत ज्ञान, त्या ज्ञानाची एक क्रियाशील विशिष्ट शक्ति आणि नंतर विशिष्ट विश्वाचा आविष्कार अशी मांडणी वर केलेली आहे. अनंत ज्ञान आणि विश्वरचना, अनंत ज्ञान व त्याच्या क्रियाशीलतेचें फल या दोहोंच्यामध्यें त्या ज्ञानाच्या एका विशिष्ट शक्तीची योजना करण्याचें कारण काय ? अनंताची आत्मजाणीव जर स्वैरपणें रूपें निर्माण
पान क्र. २१४
करीत राहिली व त्या जाणिवेनें त्यांना विलीन होण्याचा आदेश देईपर्यंत तीं अनंतांत वावरलीं व नंतर तिच्या स्वैर आदेशानुसार विलीन झालीं, तर त्यांत बिघडेल काय ? ज्यू लोकांचा धर्मग्रंथ सांगतो : ''ईश्वर बोलला, प्रकाशानें आतां प्रकट व्हावें आणि ईश्वर असें बोलतांच प्रकाश प्रकट झाला''. आतां असें पहा कीं, ''प्रकाशानें प्रकट व्हावें, असें ईश्वर बोलला.'' असें आपण जेव्हां म्हणतो, तेव्हां आपण एक महत्त्वाची गोष्ट गृहीत धरीत असतो, प्रकाशाखेरीज इतर गोष्टींनीं दूर राहून प्रकाशानें मात्र पुढें यावें, हें अधिकारानें ठरविण्याची ईश्वराच्या ज्ञानशक्तीची एक क्रिया आपण गृहीत धरीत असतो. ईश्वराची ज्ञानशक्ति ही क्रिया करते असा आपल्या म्हणण्याचा आशय असतो. तसेंच ''आणि प्रकाश प्रकट झाला'' असें आपण म्हणतो, तेव्हां ईश्वराच्या ज्ञानशक्तीची दुसरी क्रिया -- निवडीनुसार मार्गदर्शनाची क्रिया -- आपण गृहीत धरतो. अनंत गोष्टींतून प्रकाश या गोष्टीची निवड करणें व नंतर त्या निवडलेल्या गोष्टीला योग्य मार्गदर्शन करून, तिच्या मार्गांतील विघ्नें दूर करून तिच्या ठरीव स्थानीं तिला बसविणें या ज्ञानशक्तीच्या दोन क्रिया गृहीत धराव्या, तेव्हांच ज्यू धर्मग्रंथांतील वरील वाक्य सार्थ होतें. अनंत ज्ञान अनंततेनें स्वैरपणें क्रियाशील झाल्यानें, अनंत स्वैर फलांची निष्पत्ति होणार, दुसरें कांहीं होणें शक्य नाहीं. कोणतेंहि विश्व निश्चित सत्याला किवा सत्यसंघाला धरून उभारावयाचें, त्या सत्याला किंवा सत्यसंघाला व्यक्त करण्यासाठीं उभें करावयाचें, तर असें सत्य किंवा असा सत्यसंघ निश्चित करणें व तदनुसार विश्वरचना करणें, या क्रियांसाठीं अनंत ज्ञानाच्या पोटीं विशिष्ट सान्त गोष्टीची निवड करणारी व त्या निवडीनुसार अनंतांत (अनंत निराकार सद्रूपांत) सान्त दृश्यरचना आकारास आणण्यास समर्थ असलेली व नियुक्त केलेली अशी एक विशिष्ट ज्ञानशक्ति असणें अवश्य आहे व अशी शक्ति अनंत सद्वस्तूच्या आत्मभांडारांत आहे.
या विशिष्ट ज्ञानशक्तीला वैदिक ऋषि ''माया'' म्हणत. अनंत अस्तित्वाच्या अमर्याद, अतिमहान् सत्यांतून नाम आणि रूप ग्रहण करण्याची, तें आपल्यांत सामावून घेण्याची आणि तें साकार करण्याची, ''मापून उभें करण्याची,'' अनंत जाणिवेची जी विशिष्ट शक्ति तिला वैदिक ऋषि माया म्हणत. मूळ अस्तित्व हें स्थितिशील सत्य आहे. स्थितिशील अस्तित्वाला गतिशील व्यवस्थाप्रधान अस्तित्वाचें रूप देणारी जी शक्ति, ती मायाशक्ति होय. तत्त्वज्ञानाच्या अधिक तात्त्विक भाषेंत असें
पान क्र. २१५
म्हणतां येईल कीं मूळ सर्वोत्तम अस्तित्वांत -- पुरुषांत भेदक जाणिवेचा पडदा नव्हता व सर्वच सर्वरूप होतें; त्यांत मायेनें साकार अस्तित्वपुरुष उदयास येतो व या साकार पुरुषांत प्रत्येकांत सर्व व प्रत्येक सर्वांत अशी व्यवस्था असते. या व्यवस्थेचा हेतु, एका अस्तित्वाचा दुसऱ्या अस्तित्वाबरोबर, एका जाणिवेचा दुसऱ्या जाणिवेबरोबर, एका आनंदाचा दुसऱ्या आनंदाबरोबर लीलेचा व्यवहार व्हावा हा असतो. पण हा हेतु एकदम सिद्ध होत नाहीं. प्रथम मनाचा खेळ सुरू होतो, त्यांत मायेचा भ्रम आम्हांला चकवितो -- ''प्रत्येकांत सर्व, प्रत्येक सर्वांत'' ही अनुभूति मनाचा खेळ चालूं असेपर्यंत पडद्याआड गुप्त रहाते; मन किंवा माया आमची प्रत्येकाची अशी कल्पना करून देते कीं, ''मी सर्वांत आहे. पण सर्व माझ्यांत नाहीं; आणि सर्वांत मी आहे तो अविभक्त सर्वांशीं अविभाज्यपणें एकरूप नसून विभक्तपणें आहे.'' मनाची माया संपून आणि ओलांडून आम्ही जेव्हां अतिमानसी क्षेत्रांत चढून जातों, तेव्हां आमची चूक संपते, आमचा भ्रम संपतो आणि मायेचें सत्य आमच्या अनुभवास येतें. अतिमानसी क्षेत्रांत एकमेव सत्य आणि त्याचीं अनेक प्रतीकें, अर्थात् ''प्रत्येक'' आणि ''सर्व'' एकाच वेळीं अटळपणें अस्तित्वांत असल्याचें आणि एका सत्याची आणि त्याच्या अनेक प्रतीकांची एकता अतूट असल्याचें आमच्या अनुभवास येतें. मनाची माया आज आहे, ही खालच्या प्रतीची आणि भुलविणारी माया आहे; ही आम्ही अगोदरच आपली स्वामिनी म्हणावयाची व नंतर हिच्यावर स्वामित्व मिळवावयाचें अशीं योजना आहे; या अपरा मायेच्या राजवटींत भेद, अंधार, मर्यादा; वासना, संघर्ष आणि दुःख यांनीं भरलेला खेळ ईश्वर खेळतो. स्वत:तून उदय पावलेल्या शक्तीचा तो अंकित होतो, ही शक्ति स्वत: अंधकारमय असते व या शक्तीच्या आवरणानें ईश्वर स्वत:ला झांकून घेतो. ही मनाची माया अतिमानसी मायेला आवरणरूप असते. म्हणून ती झांकलेली श्रेष्ठ माया आम्ही प्रथम बाजूला ठेवून, मनाची माया आपली करतों -- परंतु मनाच्या भ्रमवती मायेचें क्षेत्र ओलांडून आम्ही शेवटीं अतिमानसी सत्यवती माया आपली करतों -- अशी ईश्वरी योजना आहे. या श्रेष्ठ मायेच्या संसारांत, ईश्वराचा खेळ कनिष्ठ मायेच्या राजवटींतल्या खेळाहून अगदीं वेगळा असतो. येथें शक्तीचें अंकितत्व सोडून, ईश्वर मोकळा झालेला असतो, त्याचें स्वामित्व शक्तीवर चालते, ज्या हेतुकरितां ती त्याज-
पान क्र. २१६
पासून निघून कामाला लागली, तो हेतु तिला तो प्रकाशमय करून पूर्ण, सिद्ध करतो; येथें अतिमानसी मायेच्या क्षेत्रांत अस्तित्वाला मर्यादा नसतात - अनंत अस्तित्व आणि अस्तित्वप्रकार, तेजोमय ज्ञानाचे तेजस्वी प्रयोग, आत्मांकित शक्तीच्या वैभवशाली क्रिया, असीम प्रेमाचा विविध अमाप आनंद या गोष्टी अनुभवास आणून देणारा असा ईश्वरी खेळ या श्रेष्ठ मायेच्या क्षेत्रांत चालतो.
माया दोन प्रकारची आहे, कनिष्ठ माया आणि श्रेष्ठ माया. जें निराशावादी किंवा भ्रमवादी तत्त्वज्ञान आहे, त्या तत्त्वज्ञानाला मायेचे हे दोन प्रकार आणि त्यांतील अंतर हें एकतर अज्ञान असतें किंवा या गोष्टीकडे त्याचें दुर्लक्ष झालेलें असतें. परंतु विश्वाच्या वास्तव रचनेंत हे दोन प्रकार आहेत आणि विश्वविषयक विचारांतहि हे दोन प्रकार आहेत. विचारांतील आणि वास्तवांतील हा दुवा -- दोन भिन्न मायांचें अस्तित्व हा दुवा -- दुर्लक्षित किंवा दुर्गम झाल्यानें निराशावादी व भ्रमवादी तत्त्वज्ञान अस्तित्वांत आलें आणि प्रसृत केलें गेलें. या तत्त्वज्ञानाच्या दृष्टीनें मनाची माया किंवा फार तर अधिमानसी माया विश्वाची जननी आहे; आणि मनाच्या मायेनें निर्माण केलेलें विश्व हें सहजच अनिर्वचनीय अशा विरोधांनीं आणि विरोधाभासांनीं भरलेली घटना असणार; जाणिवेनें युक्त अशा जीवनाचें भयंकर, सतत बदलणारें परंतु कायमचें स्वप्न, असें या मनोनिर्मित विश्वाचें स्वरूप असणार; या अशा विश्वाला सत्यहि म्हणतां येणार नाहीं व असत्य किंवा भ्रमरूपहि म्हणतां येणार नाहीं -- भ्रमवादी तत्त्वज्ञानांत, निराशावादी तत्त्वज्ञानांत, विश्वाचें वर्णन वरील प्रकारचें येतें तें, अर्थात् त्यांची दृष्टि मनानें मर्यादित असल्यानें त्यांना साजेसेंच आहे व त्यांची दृष्टि खरी मानल्यास तें खरेंहि आहे. पण आम्हांला जें शिकावयाचें आहे, तें हें कीं, मन ही अंतिम अवस्था नाहीं, मधली अवस्था आहे -- निर्माण करणारें सर्वशासक ज्ञान (किंवा आत्मा) वरतीं आणि आपण निर्माण केलेल्या रचनांत कैद होऊन पडलेला आत्मा (किंवा ज्ञान) खालतीं आणि मध्यें मन अशी वस्तुस्थिति आहे. सच्चिदानंद परमात्मा ज्या लीला करतो, त्यांत एका कनिष्ठ लीलेंत तो आपल्या शक्तींत मग्न होऊन स्वतःला विसरतो, शक्तीहि तिच्या क्रियेनें निर्माण झालेल्या रूपांत गुप्त होते -- हा आत्मविस्मृत परमात्मा आत्मविस्मृति टाकून परत आपल्या मूळ ज्ञानरूपाकडे येतो; वरून खालीं येतांना व खालून
पान क्र. २१७
वर जातांना, मन हें एक साधन त्याला उपयोगी पडणारें आहे. निर्मितीचें कार्य वरून खालीं येत असतें -- वरून खालीं उतरणाऱ्या निर्माणकार्याचें एक साधन मन आहे; तें निर्माण करणारें ज्ञान नव्हे -- तसेंच खालून वर येण्याची जी आत्म्याची क्रिया, त्या क्रियेंत मन ही एक मधली पायरी आहे; आमचें मूळ, सर्वोच्च उगमस्थान, विश्वांतील आमच्या अस्तित्वाची सर्वोच्च अवस्था मनाच्या पुष्कळ वरतीं आहे, मन नव्हे.
मन हेंच विश्वाचें निर्माण करणारें आहे, असें कांहीं दर्शनें मानतात, कांहीं दर्शनें, विश्व निर्माण करणारें तत्त्व मनाहून वेगळें मानतात, पण या तत्त्वामध्यें व विश्वांतील रूपांमध्यें केवळ मनच मध्यस्थाचें काम करतें असें मानतात. या दर्शनांचे दोन वर्ग पडतात. रूपतत्त्ववादी (Noumenal) दर्शनें आणि कल्पनातत्त्ववादी किंवा आदर्शतत्त्ववादी (Idealistic) दर्शनें. ''विश्व हें मनाचें, विचाराचें, कल्पनेचें कार्य आहे; कल्पना स्वैररूप असूं शकेल, अस्तित्वाच्या कोणत्याहि सत्याशीं कल्पनेचा तात्विक संबंध असला पाहिजे असें नाहीं; असें कांहीं अस्तित्वाचें सत्य असेल, तर ते शुद्ध विश्वनिरपेक्ष असें असेल, ज्याच्यांत वस्तूंचे अन्योन्यसंबंध निश्चित आहेत, अशा विश्वाशीं त्याचा कांहीं संबंध नसेल, कोणत्याहि संबंधापासून तें अलिप्त असेल'': रूपतत्त्ववादी दर्शनांची विश्वविषयक कल्पना या प्रकारची आहे. समोर दिसणारें कल्पना-रूप आणि त्याच्या पाठीमागचें सत्य यांचा संबंध आहे असें कल्पनातत्त्ववादी दर्शनें मानतात; पण हा संबंध विरोधात्मक, विसंवादात्मकच असला पाहिजे असें मानीत नाहींत. येथें विश्वविषयक जो सिद्धान्त मी मांडीत आहे, तो कल्पनातत्त्ववादी असला, तरी वर्तमान कल्पनातत्त्ववादाच्या पुढें जाणारा असा आहे. या सिद्धान्तानुसार विश्व निर्माण करणारी कल्पना शून्यांतून उदय पावत नाहीं किंवा ती खोट्या, नसत्या गोष्टी निर्माण करीत नाहीं. ही विश्व निर्माण करणारी कल्पना सत्य-कल्पना आहे, ती सत्य अस्तित्वाला व्यक्त करणाऱ्या ज्ञानमय शक्तीचें एक अंगभूत सामर्थ्य आहे, ती सत्य अस्तित्वांतून उगम पावली आहे आणि सत्य अस्तित्वाचा जो स्वभावधर्म, तो या कल्पनेचा स्वभावधर्म आहे. माझ्या सिद्धान्तानुसार, विश्व निर्माण करणारी कल्पना ही आत्मज्ञानसंपन्न सद्वस्तु आहे. तिचा अरूप आत्मा अक्षर आणि अविनाशी आहे, या आपल्या अरूप आत्मद्रव्यांतून ती क्षर आकार निर्माण करते, अर्थात् ती स्वतःच क्षर आकार बनते -- आपल्या अक्षर आत्मद्रव्यांतून क्षर नामरूपात्मक आत्मे
पान क्र. २१८
ती निर्माण करते, अर्थात् ती स्वत: हे आत्मे बनते -- तेव्हां हें नामरूपात्मक विश्व, विश्वात्मक मनांतील स्वैर कल्पना नव्हे -- विश्वात्मक मनाच्या पलीकडे असणाऱ्या सद्वस्तूचें ज्ञानपूर्वक आकारास येणें आहे, एका सद्वस्तूनें स्वतःतून अनेक आकार बनवून, त्या आकारांत तिनें स्वत: जाणीवपूर्वक वसति केली आहे -- येथील सर्व आकारांना जाणीवयुक्त सत्य-अस्तित्वाचा आधार आहे. या आकारांच्या द्वारां तें सत्य-अस्तित्व आपलें स्वरूप व्यक्त करतें. याप्रमाणें व्यक्त झालेल्या किंवा होणाऱ्या अस्तित्वाच्या सत्याला अनुरूप, त्याशीं अनुस्यूत जें ज्ञान, तें अतिमानसी *सत्य-जाणीव या स्वरूपांत सर्वशासक असतें, तें सत्य-कल्पना व्यवस्थेनें संघटित करतें -- या सर्व सत्य-कल्पना एकमेकींशीं पूर्णतया सुसंवादी रहाव्या अशी त्यांची अतिमानसी ज्ञानाकडून सुसंघटित व्यवस्था केली जाते, व नंतर त्या सत्य-कल्पना, मन-प्राण-जडतत्त्व यांच्या सांच्यांत त्याचेकडून ओतल्या जातात. मन-प्राण-देह ही त्रिमूर्ति-जाणीव आहे, जाणिवेचेंच एक रूप आहे. परंतु तें रूप कनिष्ठ पायरीचें रूप आहे, तें सद्वस्तूचें व तिच्या जाणिवेचें व्यक्तीकरण आहे; पण अगदीं अल्पांशस्पर्शी असें व्यक्तीकरण आहे. विविध विकासाच्या मार्गानें स्वतःचें श्रेष्ठ रूप मिळविण्यासाठीं हें कनिष्ठ रूप झगडत असतें. मनापलीकडील अतिमानस ज्ञानामध्यें हें श्रेष्ठ रूप तयार असतेंच. त्या ज्ञानाच्या पायरीवर मूळ सत्य-कल्पना आहे. ही सत्य-कल्पना, मन-प्राण-देह ही त्रिमूर्ति, तिच्या स्वतःच्या परिस्थितीला धरून जेवढ्या प्रमाणांत व्यक्त करतां येईल, तेवढया प्रमाणांत व्यक्त करण्यासाठीं खटपट करीत असते.
आपण विकासक्रमाच्या मार्गानें खालून वर चढत आहों, तेव्हां या चढण्याच्या दृष्टीनें असें म्हणतां येईल कीं, सद्वस्तु, मूळ वास्तव पुरुष सर्व अस्तित्वाच्या पाठीमागें आहे; ही मूळ सद्वस्तु प्रथम एखाद्या आदर्श सत्य-कल्पनेचें रूप घेते. या रूपांत तिचें स्वतःशीं सुसंवादी असें एखादें सत्य
* ऋग्वेदांत ऋत-चित् असें एक पद येतें; सत्य चित्, ऋत चित्, बृहत् चित् किंवा सत्यं हृतं बृहत् (चित्) एवढा सगळा अर्थ ऋत-चित् पदानें दाखविला जातो : सत्यम् = अस्तित्वाच्या मूळ सत्याची जाणीव. हृतम् = क्रियाशील अस्तित्वाच्या सुसंघटित सत्याची जाणीव. बृहत् = महान् अनंत आत्म-जाणीव. महान् अनंत आत्म-जाणिवेच्या पोटींच सत्य-जाणीव आणि ऋत-जाणीव असूं शकते.
पान क्र. २१९
अंतर्भूत असतें; ही आदर्श सत्य-कल्पना बदलत जाणारें असें जाणीवयुक्त अस्तित्व -- ज्ञानयुक्त जीव उदयास आणते; हा जीव साकार सत्याचें रूप घेतो; या साकार सत्याची ओढ त्याच्या मूळ सत्याकडे अपरिहार्यपणें असते. या ओढीच्या जोरदार प्रेरणेनें हें साकार सत्य, हा ज्ञानयुक्त जीव, आपलें मूळ सत्य-स्वरूप पूर्णपणें आपलें करण्यासाठीं सामान्य क्रममार्गानें आदर्श सत्य-कल्पनेच्या (ज्या कल्पनेच्या द्वारां तो मूळ सत्यांतून दृश्य सृष्टींत अवतरला, त्या कल्पनेच्या) आश्रयानें खटपट करतो, किंवा हा स्वाभाविक सामान्य क्रममार्ग सोडून, एक तऱ्हेचें त्वेषयुक्त आंतरिक उड्डाण करून, आपलें मूळ स्वरूप तो मिळवूं पहातो. अशी ही व्यवस्था कल्पिली म्हणजे अनेक गोष्टींचा उलगडा होतो. मानवी-जीवन अपूर्ण सत्य असल्याचें मनाला दिसतें; मनोमय जीवांत पूर्णतेकडे जाण्याची किंवा पूर्णता प्राप्त करून घेण्याची स्वाभाविक आकांक्षा असते; पूर्णता आपल्या आवांक्यापलीकडे आहे असें मनाला नेहमींच वाटत असलें, तरीहि तें पूर्णतेचाच मार्ग क्रमीत असतें; ज्यांत सर्वत्र सुसंवाद अनुभवास येईल, असें आदर्श जीवन किंवा पूर्ण जीवन मनापासून लपलेलें असतें व मन त्याकडे ओढ घेत असतें, धांव घेत असतें आणि आदर्श जीवनाच्याहि पलीकडे सर्व आदर्शांचें मूळ-भांडार असलेलें जें सर्वातीत सत्य, त्याजकडे आत्मा उसळी मारून जाऊं पहातो -- वर जी व्यवस्था कल्पिली आहे, तिनें या सर्व गोष्टींचा उलगडा होतो. आमच्या जाणिवेच्या वास्तव गोष्टी, आमच्या जाणिवेची रचना, तिच्या निकडीच्या गरजा यावरून असें तर्कशुद्ध, निश्चित अनुमान करतां येतें कीं, विश्वव्यवस्थेंत मूळ सद्वस्तु, आदर्श सत्य-कल्पना आणि साकार जीव अशी तीन पायऱ्यांची त्रिपदी व्यवस्था आहे. एका टोंकाला केवळ निरपेक्ष सद्वस्तु आणि दुसऱ्या टोंकाला केवळ सापेक्षता-साकार, सत्य, अन्योन्यावलंबी जीवांचा पसारा -- अशी दोन पायऱ्यांची द्विपदी व्यवस्था नाहीं. या दुसऱ्या कल्पित व्यवस्थेंत दोन टोंकांच्या दोन वस्तूंचा जो अन्योन्यविरोध आहे तो मिटण्यासारखा व मिटवतां येण्यासारखा नाहीं -- आणि तो वस्तुस्थितीस सर्वस्वीं सोडून आहे.
विश्वांतील अस्तित्व उलगडून दाखविण्यास मन पुरें पडत नाहीं. मूळ अनंत जाणीवेनें प्रथम अनंत ज्ञानशक्तीचें किंवा आमच्या दृष्टीनें सर्वज्ञतेचें रूप घ्यावें लागतें. परंतु मन ही कांहीं ज्ञानाची शक्ति नव्हे, सर्वज्ञतेचें एक साधन असेंहि मनाचें स्वरूप नाहीं; ज्ञानाचा शोध
पान क्र. २२०
करण्याची शक्ति, या शोधानें जें ज्ञान लाभेल तें सापेक्ष विचाराच्या विशिष्ट सांच्यांत व्यक्त करण्याची शक्ति आणि तें ज्ञान विशिष्ट क्रियासामर्थ्य उत्पन्न करण्यासाठीं उपयोगांत आणण्याची शक्ति, अशी त्रिविध शक्ति म्हणजे मन होय. ज्ञानाचा शोध करून मनानें कांहीं सत्य हस्तगत केलें, तरी त्या सत्याचें स्वामित्व त्याला असाध्य असतें -- तें कोणतेंहि सत्य जवळ बाळगीत नाहीं, त्या सत्याचें चलनी नाणें थोडें बहुत जवळ बाळगतें -- स्मृति ही मनाची पेढी आहे, या पेढींत हें चलनी नाणें मन ठेवतें व त्याच्या गरजेनुसार हें नाणें पेढींतून तें वेळोवेळीं काढीत असतें. ज्याला सत्याची ओळख नसते, सत्याची ओळख करून घेण्यासाठीं जें धडपडतें, पण ज्याला मलिन कांचेंतून एखाद्या दृष्याचें दर्शन घडल्याप्रमाणें सत्याचें घडलेंच तर अगदीं अंधुक दर्शन घडतें तें मन. विश्वव्यापी अस्तित्वाचें सत्य मनासमोर असतें -- पण मन ज्या कार्यक्षेत्रांत वावरतें, त्या क्षेत्रांत व्यवहारोपयोगी होईल एवढाच आणि असाच अर्थ तें या विश्वव्यापी अस्तित्वाच्या सत्यांतून काढतें -- एवढीच मनाची शक्ति आहे. विश्वव्यापी अस्तित्वाला ओळखणारी, त्याला मार्गदर्शन करणारी शक्ति मन नव्हे; अर्थात् हें विश्वाचें अस्तित्व निर्माण करणारी अथवा आविष्कृत करणारी शक्ति मन नव्हेच नव्हे; ही शक्ति मन असूंच शकत नाहीं, हें उघड आहे.
आपणाला असलेल्या कोणत्याहि मर्यादा नसलेलें अनंत मन विश्वाची उत्पत्ति करतें, असें कोणी म्हटलें तर हें मान्य केलें पाहिजे कीं, अशा या मनाला विश्वाची उत्पत्ति करतां येईल ही गोष्ट खरी आहे. पण हें जें 'मन' म्हणून आम्ही कल्पितों, तें आमच्या मनाहून अगदीं वेगळें, आमच्या मनाच्या फार पलीकडलें, वस्तुत: अतिमानसिक तत्त्व आहे, हें आम्ही विसरतों. ज्याला आम्ही जाणतों, त्या मनाच्या अर्थानें मन ही संज्ञा त्या अनंत तत्त्वाला लावणेंच चुकीचें होईल. आमचें मन जसें बनलेलें आहे तशा बनावटीचें ''अनंत'' मन निर्मितीच्या भानगडींत पडलें, तर अनंत गोंधळ मात्र निर्माण करील, त्याचें ध्येय नेहमीं गोंधळाचें व अनिश्चित असणार -- या ध्येयाकडे तें चांचपडत धांवणार आणि अनेक संभवांचा, अपघातांचा, स्थित्यंतरांचा अनावर अफाट परस्परसंघर्ष असेंच आणि एवढेंच काय तें मनाच्या ''विश्वाचें'' स्वरूप असणार ! अनंत, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान् मन अशी मनाची कल्पना करणें, हें मनाच्या सर्वमान्य व्याख्येला दृष्टीआड करणें आहे. हीं विशेषणें अतिमानसिक
पान क्र. २२१
सत्यज्ञानालाच लावणें योग्य आहे. तेव्हां विश्वाची उत्पत्ति मनाकडून होणें शक्य नाहीं. तें कार्य अतिमानसिक ज्ञानाचें आहे.
आम्हांला जें मन माहीत आहे, तें प्रतिबिंब घेऊन दाखविणाऱ्या आरशाप्रमाणें आहे; अगोदरच अस्तित्वांत असलेल्या सत्याच्या अथवा वास्तव घटनेच्या, स्वतःच्या बाहेर असलेल्या, निदान स्वतःहून मोठ्या असलेल्या सत्याच्या अथवा घटनेच्या प्रतिमा, प्रतिबिंबें या मनाच्या आरशांत घेतलीं जातात. जें कांहीं दृश्य घडत असतें किंवा घडलेलें असतें, तें क्षणाक्षणाला स्वतःच्या समोर ठेवणें ही क्रिया मन करीत असतें; त्याला अशीहि शक्ति आहे कीं, जी घटना त्याच्यासमोर आली आहे, तिच्या प्रतिमांखेरीज दुसऱ्या शक्य अशा प्रतिमा स्वतःचे ठिकाणीं उभ्या कराव्या; म्हणजे जें दृश्य घडलें आहे, त्याच्या देखाव्याप्रमाणें, जें दृष्य घडूं शकेल त्याचाहि देखावा तें स्वतःचें ठिकाणीं उभा करूं शकतें -- अर्थात् त्यानें उभे केलेले भावी संभाव्य देखावे घडून येतीलच असा कांहीं त्याचा अर्थ नसतो. जें कांहीं घडलें असेल किंवा घडत असेल तेंच पुन: निश्चित घडणार अशी वस्तुस्थिति असेल, तरच मनाची तद्विषयक चितारणी खात्रींची, संभाव्य चितारणी होऊं शकते. मनाला आणखीहि एक शक्ति आहे : जें घडलें आहे आणि जें घडणे संभवनीय आहे, जी शक्यता पूर्ण झाली आहे आणि जी अपूर्ण आहे, अशा दोन गोष्टी एका ठिकाणीं करून, मन नवें कांहींतरी त्यांतून उभें करूं शकतें आणि हें नवें कांहींतरी वास्तवांत उभें करण्याच्या आधीं मन त्याचें भविष्य सांगू शकतें. हें भविष्य वर्तविल्यानंतर त्यानें योजलेली नवी रचना मन कधीं कधीं अगदीं योजनेनुसार यशस्वीपणें उभी करूं शकतें; कधीं कधीं असें करूं शकत नाहीं, परंतु सामान्यत: असें घडतें कीं, योजनेहून वेगळीच रचना त्याच्याकडून घडविली जाते; आणि ज्या हेतूनें, ज्या इच्छेनें ही रचना मन करीत असतें, तो हेतु किंवा ती इच्छा अपूर्ण राहून, ती रचना वेगळ्याच कामाला लाविली जाते.
अशा स्वभावधर्माचें मन, अनंत असेल तर असा संभव आहे कीं, तें एखादें विश्व आकस्मिकपणें उभें करूं शकेल; या विश्वांत अनेक शक्यता असतील व त्या अन्योन्यविरोधी असतील; तें अनंततासंपन्न मन या विश्वाला अशी एक वस्तु बनवील कीं, जी नेहमीं बदलत राहील, नेहमीं क्षणभंगुर असेल, नेहमीं कोठेंतरी अनिश्चितपणें वाहत जात असेल, धड सत्य नाहीं - असत्य नाहीं असें जिचें स्वरूप असेल आणि जिला कांहींहि
पान क्र. २२२
निश्चित प्रयोजन वा हेतु असणार नाहीं. सारखीं बदलणारीं अनेक क्षणिक प्रयोजनें त्या वस्तूला इकडे तिकडे सारखी खेंचीत असतील. अर्थात् त्यामुळें असल्या खेंचाखेंचींत कोणत्याहि निश्चित हेतूची पूर्तता ती केव्हांहि करूं शकणार नाहीं. ज्ञान हीच श्रेष्ठ मार्गदर्शक शक्ति असल्यामुळें, तें ज्ञानसामर्थ्य नसलेलें अनंत मन विश्व म्हणून कांहीं उभें करूं शकणार नाहीं. अशा अनंत मनाच्या कल्पना विश्वांतील रूपांच्या मुळाशीं आहेत असें शुद्धरूपतत्त्ववाद (Noumenalism) मानतो. शून्यवाद (Nihilism) भ्रमवाद (Ilusionism) किंवा अशा सारखा आणखी एखादा वाद हेंच एक असल्या रूपतत्त्ववादाचें तर्कशुद्ध फळ होऊं शकतें. रूपतत्त्ववादानुसार पाहिलें असतां, अनंत (ज्ञानशून्य) मनानें उभें केलेलें विश्व म्हणजे जी वस्तु जशी नाहीं तशी ती मनानें प्रतिबिंबित करणें, तशी ती स्वतःपुढें ठेवणें आहे, अर्थात् सदा सर्वदा शेवटपर्यंत असें विश्व म्हणजे असत्याचें प्रदर्शन असणार, जें आहे त्याचें विकृत प्रतिबिंब असणार; या विश्वांतील जीवन सर्वच्या सर्व मनाच्या अयशस्वी खटपटीच्या स्वरूपाचें असणार -- मन आपल्या कल्पना वास्तवांत पूर्णपणें आणण्याकरितां खटपट करीत रहाणार आणि नित्यश: त्याला अपयश येत रहाणार -- कारण या कल्पनांना आत्मसत्याचा सर्वशासक आधार नसतो. मन आपल्या शक्ती खर्च करीत रहाणार, त्याच्या भूतकालीन शक्तींचा दिशाशून्य प्रवाह त्याला कोठेंतरी ओढून नेत रहाणार, कांहीं निश्चित हेतूची सिद्धि अशा मनाच्या विश्वपसाऱ्यापुढें ध्येय म्हणून देखील नसल्यामुळें, कोठेंतरी कशीतरी भ्रमन्ती करीत, हें विश्व आणि तें उभें करणारें मन शेवटीं स्वतःचा नाश करून घेणार किंवा शाश्वत शांततेंत त्याचा अंत होणार आणि असा अंत त्याला नसेल, तर त्याची भ्रमन्ती शाश्वत चालणार. मनाच्या या प्रपंचाचा आमूलाग्र विचार केला, म्हणजे या प्रपंचांतून शून्यवाद आणि भ्रमवाद उभा करून तो पोसला जातो असें दिसून येईल. मनाला विश्वजनक मानावयाचें, तर या वादांतील तत्त्वज्ञान हेंच एक आमचें सांसारिक शहाणपण होऊं शकतें; जर आणि जोंपावेतों, आमच्या मानवी मनाला किंवा तत्सम शक्तीला श्रेष्ठतम विश्वशक्तीचा मान आम्ही देत राहूं, विश्वाच्या उभारणींतील मूळ योजकशक्तीचा मान देत राहूं, तर आणि तोंपावेतों आमचें संसारिक शहाणपण शून्यवाद आणि भ्रमवाद मान्य करण्यांतच आहे हें निःसंशय.
पान क्र. २२३
आमचें मानवी मन शक्तीनें संपन्न आहे; पण या शक्तीहून श्रेष्ठ अशी ज्ञानाची मूळ आद्यशक्ति विश्वांत आहे. या श्रेष्ठ शक्तीचा शोध आपल्याला लागला, कीं त्या क्षणीं वर उभी केलेली विश्वाची कल्पना आपल्या बुद्धीला अपुरी वाटते, अयथार्थ वाटते आणि म्हणून ती आपल्या बुद्धीला अमान्य व अप्रमाण होते. या वरील कल्पनेंत सत्य कांहींच नाहीं असें नाहीं; तींत सत्य आहे, पण सर्व सत्य तींतच आहे असें नव्हे. विश्व प्रथमदर्शनीं कसें दिसतें किंवा कसें दिसेल त्याचा नियम वरील विश्वकल्पनेंत आहे. परंतु विश्वाचें आद्य सत्य आणि अंतिम वास्तवता, वरील विश्वकल्पनेंतील नियमांत अंतर्भूत होत नाहीं. मन-प्राण-शरीर यांच्या व्यापाराच्या पाठीमागें कांहीं एका वस्तूचें आम्हांला दर्शन घडतें. ही वस्तु शक्तीच्या ओघाला आपल्या पोटांत वागविणारी असून, त्याजवर सत्ता चालविणारी, त्याचें नियंत्रण करणारी आहे, त्या शक्तीच्या ओघाच्या धारेंत सांपडून वाहवत जाणारी नाहीं; आपल्या अस्तित्वाच्या पोटीं या वस्तूनें विश्व निर्माण केलें आहे आणि या विश्वांत ती सर्वज्ञता भोगते -- ती विश्वाच्या पोटीं जन्म घेऊन, त्या जन्मदात्या विश्वाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करणारी नाहीं; या वस्तूच्या जाणिवेच्या पोटीं तिचें स्वतःचें एक पूर्ण रूप वावरत असून, तें जाणिवेंतील निराकार रूप या विश्वांत ती क्रमाक्रमानें व्यक्त करीत आहे -- तिला अनावर झालेल्या भूतकालीन शक्तीच्या सर्वस्वीं आहारीं जाऊन, त्या शक्ती नेतील तिकडे वाहत जाणारी आणि अशी अगतिकपणें वाहवत असतां, आपल्यांतून स्वतःहून कांहीं वेगळी रचना उभी करण्यासाठीं बहुधा अयशस्वीपणें सदैव धडपडणारी अशी वस्तु नाहीं. मन-प्राण-शरीर यांच्या व्यापारांच्या पाठीमागें ज्या वस्तूचें दर्शन आम्हांला घडतें, ती वस्तु ही अशी आहे. मनाशीं तिची तुलना करून तिचें श्रेष्ठपण वर दाखविलें आहे. ही वस्तु विश्वाचें आद्य सत्य व अंतिम वास्तवता आहे. अगोदरच या वस्तूला स्पष्ट दिसत असलेल्या सत्याचें आविष्करण म्हणजे हें विश्व आहे; अगोदरच पुढची योजना निश्चित करणाऱ्या दिव्य संकल्पशक्तीचे-इच्छाशक्तीचे नियम हें विश्व पाळीत आहे; आद्य सत्याला स्वतःच्या ठिकाणीं जें विशिष्ट रूपविषयक दर्शन प्रतीत होतें, त्या दर्शनानुसार या विश्वांत रूपरचना प्रत्यक्षांत येत असते; जी दिव्य सृष्टि अगोदरच तयार असते, तिची क्रमाक्रमानें वाढत जाणारी प्रतिमा म्हणजे हें विश्व होय.
पान क्र. २२४
आमचें मन दृश्याच्या शासनाखाली काम करणारें आहे. जोंपावेतों या मनाच्या चालीनें आम्ही चालत असतों, तोंपावेतों सर्व दृश्याच्या व मन-प्राण-शरीर यांच्या व्यापाराच्या पाठीमागें, त्यांच्या पलीकडे आणि त्याबरोबर या सर्वांत, सर्वदा सर्वत्र भरून राहिलेलें तत्त्व आम्हांला अनुमानानेंच जाणावें लागतें, त्याचें अस्तित्व आम्हांला अगदीं अंधुकपणेंच प्रतीत होऊं शकतें. आम्हांला दृष्यांत व आमच्यांत प्रगति दिसते, वळणावळणानें, चक्राकार गतीनें ही प्रगति चाललेली आमच्या नजरेस येते आणि त्यावरून आम्हीं असें अनुमान करतो कीं, अगोदरच माहीत असलेल्या कसल्यातरी वस्तूची कोठेंतरी पूर्णतेकडे वाटचाल सुरू आहे आणि ही वस्तु अवश्य अधिकाधिक पूर्ण होणार आहे. आम्हांला चोहोंकडे कायदा काम करतांना दिसतो आणि हा कायदा आत्मतत्त्वाच्या अस्तित्वावर आधारलेला, आत्मतत्त्वांतून निघालेला आहे असें दिसते; या कायद्याचें काम आंतून बारकाईनें पाहिलें, त्या कामांत दिसून येणारी कार्यकारणदृष्टि तपासली म्हणजे आपल्या लक्षांत येतें कीं, हा कायदा विश्वरूपानें व्यक्त होणाऱ्या, आत्मतत्त्वांत स्वभावत: असलेल्या ज्ञानाचें प्रकट रूप आहे आणि हें आत्मतत्त्व किंवा मूळ अस्तित्व ज्या शक्तीच्या द्वारां व्यक्त होतें, त्या शक्तीच्या कार्यांत हा कायदा तिचा अंगभूत म्हणून तिचें नियंत्रण करतो; तो ज्ञानानें बनविलेला असून प्रगतीला साहाय्यक होईल अशा तऱ्हेनें बनविलेला आहे. त्या कायद्यावरून असें अनुमान निघतें कीं, आमची व विश्वाची गति, चाल ज्या दिशेनें चालू आहे, ती दिशा विश्वजनक दिव्य सत्तेनें ठरविलेली आहे आणि या सत्तेनें अगोदरच जें अंतिम साध्य आम्हांसाठीं व विश्वासाठीं ठरविलें आहे, त्या साध्याच्या दिशेनें आमची व विश्वाची वाटचाल चालूं आहे. आपल्या हेंहि लक्षांत येतें कीं, आमचें जें मन अगतिकपणें वहात जात असतें, त्या मनामधून बुद्धि बाहेर येण्याचा प्रयत्न करते आणि बाहेर आल्यावर त्या मनावर सत्ता चालविण्याच्या व त्याची अगतिक गति आपल्या स्वत:च्या धोरणानें ठरविण्याच्या कामांत ती मग्न होते. पुढें आमच्या प्रतीतीला असें येतें कीं, आमची बुद्धि मनाला मार्गदर्शक होत असली, तरी ती कांहीं स्वयंसिद्ध नाहीं -- ती केवळ दूताचें, प्रतिनिधीचें काम करणारी आहे, तिच्याहून श्रेष्ठ अशी जाणीव तिच्यापलीकडे आहे -- या श्रेष्ठ जाणिवेचें प्रतिनिधित्व, दूतकार्य बुद्धि करीत असते, या जाणिवेच्या छायेप्रमाणें ही बुद्धि आहे -- ती जाणीव बुद्धीप्रमाणें
पान क्र. २२५
बुद्धिवाद करून सत्य-स्थापना करीत नाहीं. तीच सर्व असल्यानें आणि जें जें आहे तें तें मी आहे अशी नित्य प्रतीति तिला असल्यानें, तिला बुद्धिवाद करून कोणत्याहि गोष्टीचें ज्ञान करून घेण्याचें कारण पडत नाहीं. या स्वयंभू सर्वरूप ज्ञानापर्यंत आपण पोंचल्यावर आपल्याला असें अनुमानतां येतें कीं, बुद्धीचें हें उगमस्थान आणि विश्वांत कायदा म्हणून शासन-व्यवहार करणारें ज्ञान ह्या दोन्हीं एकच वस्तु आहेत. हें ज्ञान आपला स्वतःचा कायदा पूर्णाधिकारानें, सार्वभौमत्वानें ठरविते; कारण, होऊन गेलेलें, विद्यमान असलेलें आणि भविष्यकाळीं घडणारें सर्व त्याला ज्ञात असतें. त्याला असें ज्ञान असण्याचें कारण तें स्वत: शाश्वत आहे, सार्वकालिक आहे आणि स्वतःचें त्याचें ज्ञान असीम व अनंत आहे. जें अस्तित्व, आत्मतत्त्व अनंत ज्ञानरूप आहे, जें अनंत ज्ञान सर्वसमर्थ शक्तिरूप आहे, तें एखादें विश्व -- अर्थात् स्वतःची एक सुरेल सुसंवादपूर्ण अमूर्त ''मूर्ति'' -- आपल्या जाणिवेचा जेव्हां विषय करतें, तेव्हां तें आपल्या विचारशक्तीला विश्वास्तित्व, विश्वात्मतत्त्व म्हणून प्रतीत होतें -- स्वतःचें सत्य या आत्मतत्त्वाला विदित आहे आणि स्वतःला विदित असणारें स्वतःचें जें सत्य तें नाना आकारांच्या द्वारां दृष्य सृष्टींत दाखल करतें, तें सत्यहि आमच्या विचारशक्तीला विश्वात्म-तत्त्वाचा स्वभाव म्हणून प्रतीत होतें.
पण विचारद्वारां येणारी प्रतीति वेगळी आणि प्रत्यक्ष अनुभूति वेगळी. आम्ही बुद्धिवाद करण्याचें सोडून, जेव्हां आमच्या अंतरांत खोल खोल उतरतों आणि जेथें मनाची धडपड शांत होते, अशा गुप्त स्थानीं पोंचतों, तेव्हांच बुद्धीहून श्रेष्ठ अशी अनंत आणि विश्वरूप जाणीव तेथें खरोखरी आमच्या प्रत्यक्ष अनुभवास येते; अर्थात् आम्हांला मानसिक प्रतिक्रियेची, मानसिक कोंडीची मर्यादितपणाची फार काळाची संवय असल्यानें, ही प्रत्यक्ष अनुभूति थोडीबहुत अपूर्णच असते; तथापि पूर्वीं बुद्धीच्या मंद आणि अस्थिर प्रकाशांत ज्या गोष्टी आम्ही विचारानें जाणून घेऊनहि ज्यांच्याविषयी कांहींसा संशय आमच्या बुद्धींत कायम राहिला, त्या गोष्टी या प्रत्यक्ष अनुभूतीनंतर अधिकाधिक उज्ज्वल प्रकाशांत आम्हांला स्पष्टपणें विदित होऊं शकतात आणि त्यांच्या विषयींचा आमचा संशय पार नाहींसा होतो. मन आणि बुद्धि यांच्या युक्तिवादाच्या पलीकडे खरें ज्ञान आहे. हें ज्ञान जिज्ञासूंची वाट पहात आपल्या सिंहासनावर बसलेलें आहे; हें सिंहासन अतिमहान् तेजोमय प्रदेशांत आहे; या
पान क्र. २२६
प्रदेशांत ज्ञानाला सर्व दिशांकडे आत्मदर्शन घडतें, या दर्शनाला कोणत्याच दिशेला सीमा असत नाहीं, या दर्शनाला कालाचीहि सीमा नसते.
(दिक्कालाद्यनवच्छिन्नानंत चिन्मात्र मूर्तये ।
स्वानुभूत्येकमानाय नम: शान्ताय तेजसे ।। -- भर्तृहरि)
पान क्र. २२७
प्रकरण चौदावें
अतिमानस हें सृष्टीची उभारणी करतें.
ईश्वरी ज्ञानानें स्वतःचें केलेलें विविध आविष्करण म्हणजे विश्वांतील सर्व वस्तु व घटना होत.
- विष्णु पुराण २.१२.३९.
मूळ निश्चल आत्मैकतुष्ट एकतत्त्व आणि अनेक चंचल वस्तूंचा हा विश्वांचा पसारा या दोहोंमध्यें एक मध्यगामी शक्ति आहे, मध्यवर्ति अस्तित्वदशा आहे. हें मध्यस्थ अस्तित्व आणि सामर्थ्य म्हणजे मन नव्हे, तर मनापेक्षां श्रेष्ठ, मनापलीकडे असणारें, क्रियाशील संकल्पाचें (इच्छाशक्तीचें) आणि ज्ञानाचें तत्त्व होय. या तत्त्वानें विश्वाचा पसारा निर्माण केला आहे. सृष्टीची उभारणी करण्याचें काम, या ज्ञानाचें, या अतिमानसिक विज्ञानाचें आहे. हें विज्ञानाचें तत्त्व आम्हांला अगदींच परकें आहे असें नव्हे; आम्हांहून अगदीं वेगळा असा एक आत्मा आहे आणि त्याच्या एकट्याच्या मालकीचें हें तत्त्व त्याजपाशीं असून त्याला तें इतरांना देतां येण्यासारखें नाहीं अशी स्थिति नाहीं; किंवा अशीहि गोष्ट नाहीं कीं, एक अस्तित्वाची अवस्था आहे, जेथें हें तत्त्व स्वभावत: असतें, जेथून गूढ रीतीनें आम्हांला बाहेर काढून जन्माला घालण्यांत येतें पण ज्या ठिकाणीं आम्हांला परत जातां येत नाहीं, परत येऊं दिलें जात नाहीं -- अशी अस्तित्वाची अवस्था नाहीं. ही गोष्ट खरी कीं, हें विश्वनिर्मायक तत्त्व आमच्या वरतीं, फार फार उंचावर असलेल्या प्रदेशांत प्रतिष्ठित असल्याचें आम्हांला दिसतें -- पण हा उंचावरचा प्रदेश आम्हांला परका नाहीं; आमच्या अस्तित्वाचाच तो भाग आहे आणि आम्हांला तेथें जातां येतें, वावरतां येतें ही गोष्टहि तितकीच खरी आहे. तें महान् सत्य आम्हांला केवळ अनुमानानेंच जाणतां येतें, त्याचें केवळ ओझरतेंच दर्शन आम्हांला
पान क्र. २२८
घडतें असें नव्हे, तर आम्हांला त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतां येतो, तें आमचें स्वतःचें करण्याची शक्ति आम्हांत आहे. या सत्याच्या उंच प्रदेशीं चढून जावें असें आम्हांला वाटल्यास आम्ही तसें करूं शकतों, आम्ही आमचा क्रमाक्रमानें विकास करीत तेथें जाऊं शकतों किंवा ज्ञानाच्या प्रकाशाचा एकदम संस्कार घडून आम्ही आमच्या प्रस्तुत आत्मावस्थेंतून तत्काल वर चढून त्या प्रदेशांत तांतडीनें पाऊल टाकूं शकतों; हें आमचे त्या प्रदेशांत पाऊल टाकण्याचे क्षण आम्हीं एकदां अनुभवल्यानंतर ते आम्ही कधींहि, केव्हांहि विसरू शकत नाहीं; आम्हांला वाटल्यास आम्ही त्या उंच प्रदेशीं कांहीं तास, कांहीं दिवस घालवूं शकतों -- सामान्य मानवाच्या वांट्याला कधींच येणार नाहीं असा सर्वश्रेष्ठ दिव्य अतिमानवी अनुभव या तासांत, या दिवसांत आम्हांला सारखा येत असतो. या उंच प्रदेशावरून आम्ही परत खालीं उतरलों म्हणजे आमचा या प्रदेशाशीं संबंध तुटलाच पाहिजे असें नाहीं; आमचा प्रदेश आणि तो उंच प्रदेश जोडणारे दरवाजे आम्ही नेहमीं उघडे ठेवूं शकतों, किंवा ते सारखे बंद होत राहिले, तर पुन: सारखे उघडे करूं शकतों. आमची क्रमाक्रमानें विकास पावणारी जी मानवी जाणीव आहे, तिचें ध्येय आत्मलय नसून आत्मपूर्णता असेल, तर तिच्यासमोर सर्वोच्च अंतिम साध्य हेंच आहे कीं, वर वणिलेलें जें निर्मित आणि निर्मायक अस्तित्वाचें उंच आणि शेवटचें शिखरस्थान आहे, त्या स्थानावर तिनें कायम वस्ती करावी. हें शिखरस्थान म्हणजेच एकमेव मूळ सत्यानें सृष्टि-निर्माणासाठीं पुढें केलेली मूलभूत सत्य-कल्पना होय; हेंच स्थान विकासगम्य अंतिम सत्य व अंतिम सुसंवादपूर्ण अस्तित्व होय; येथूनच आम्ही विश्वांत उतरलों आणि विश्वांत आम्ही जें क्रमवार आत्म-आविष्करण करीत आहों, त्या आविष्करणाच्या द्वारां आम्हांला येथेंच पोंचावयाचें आहे; आमच्या आत्माभिव्यक्तीचें पूर्वनियत साध्य हेंच आहे.
तथापि अशी शंका आम्हांला येणें वाजवी आहे कीं, मानवी बुद्धीला उमजेल अशा रीतीनें या उच्च अवस्थेची माहिती देणें आज किंवा केव्हांतरी शक्य आहे काय ? अशीहि शंका येणें रास्त आहे कीं, या उच्च अवस्थेंतील दिव्य व्यापार आमचें मानवी ज्ञान व मानवी कार्य उन्नत करण्यासाठीं उपयोगांत आणतां येतील किंवा नाहीं, त्यांच्या अशा उपयोगासाठीं कोणालाहि वापरतां येण्याजोगा मार्ग तयार करणें शक्य
पान क्र. २२९
आहे किंवा नाहीं ? असा संशय येण्याचें कारण कीं, या दिव्य शक्तीचें मानवी व्यवहारांतील कार्य दाखविणाऱ्या ज्या घटना आमच्या नजरेस आणल्या जातात, त्या एकतर फार विरळा घडतात व दुसरें, त्या घटना संशयातीत नसतात; तसेंच या दिव्यशक्तीचें कार्य आणि आमचें सामान्य मानवी, तपासण्यासारखें ज्ञान व अनुभव या दोहोंत फार फार अंतर आहे; पण या कारणांपेक्षां आमच्या संशयाचें जास्त प्रभावी कारण हें आहे कीं, मानवाचें मन आणि ईश्वरी दिव्य विज्ञान यांत त्यांच्या आंतर प्रकृतींच्या दृष्टीनें आणि त्यांच्या बाह्य व्यापारांच्या दृष्टीनें तीव्र अन्योन्यविरोधित्व आम्हांला प्रथम दर्शनीं तरी स्पष्ट दिसत आहे.
ही दिव्य विज्ञानाची, अतिमानसाची जाणीव आणि मानवी मन यांचें जर कांहींच नातें नसतें, मनोमय पुरुषाशीं (mental being) या जाणिवेचें कोठेंहि, कसलेंहि ऐक्य नसतें, तर आमच्या मानवी कल्पनाशक्तीला समजेल अशा रीतीनें या दिव्य जाणिवेचें कसलेंहि वर्णन देतां येणें अशक्य झालें असतें. तसेंच, हें दिव्य विज्ञान जर स्वभावत: 'केवळ ज्ञानाची दृष्टि' या स्वरूपाचें असतें आणि त्यांत ज्ञानाची क्रियाशील शक्ति नसती, तर या विज्ञानाच्या संपर्कानें आम्हांला मनाची प्रकाशमय आनंदमय स्थिति फक्त अनुभवतां आली असती, त्या संपर्कापासून विश्वांतील व्यवहारासाठीं आजच्याहून थोर प्रकाश व सामर्थ्य आम्हांला लाभलें नसतें. परंतु ही दिव्य विज्ञानशक्ति विश्वाची जननी आहे; अर्थात् ती केवळ निष्क्रिय ज्ञानावस्था नव्हे, ती ज्ञानाची क्रियाशील अवस्थाहि आहे; ती केवळ प्रकाशविषयक आणि दर्शनविषयक इच्छा नाहीं, तर सामर्थ्यविषयक आणि क्रियाविषयक इच्छाहि आहे. या विज्ञानशक्तीनें विश्वाची जी निर्मिति केली, तिचा एक भाग मनाची निर्मिति हा आहे. स्वतःच्या सामर्थ्याला स्वतःच मर्यादा घालून, मनाची निर्मिति विज्ञानानें केलेली आहे. विज्ञान स्वत: सर्वश्रेष्ठ, एकमेवाद्वितीय चैतन्याची मूळ क्रियाशक्ति आहे. विश्वनिर्मितिसाठीं ही शक्ति त्यानें स्वत:मधून उभी करून पुढें केली. विश्व आणि तें चैतन्य यांच्यामध्यें मध्यस्थाचें काम ही विज्ञानशक्ति करते. मनाचे आणि विज्ञानाचे (Supermind) वास्तवांतील आकार-प्रकार कितीहि भिन्न असले, त्यांच्या क्रियाव्यापारांच्या ठाम झालेल्या रीती कितीहि भिन्न असल्या, नव्हे त्यांत कितीहि अन्योन्यविरोध दिसत असला, तरी मनाची आणि विज्ञानाची आंतरप्रकृति एकच आहे आणि मनाच्या पोटीं विज्ञानाची शक्यता
पान क्र. २३०
गुप्तपणें भरलेली आहे. तेव्हां आमच्या बुद्धिप्रधान ज्ञानाच्या शब्दांत आणि त्याच्याच दृष्टीनें साम्य आणि वैषम्य दाखवून, जिज्ञासूंस या विज्ञानाची कांहीं कल्पना आणून देण्याचा प्रयत्न करणें खात्रीनें गैरफायद्याचें किंवा गैरवाजवी होणार नाहीं. ही जी कल्पना आम्ही आणून देऊं इच्छितों, ती कल्पना, जे शब्द आम्ही वापरणार ते शब्द, विज्ञानभूमीचें यथार्थ ग्रहण होण्यास अपुरे पडतील, ही गोष्ट शक्य आहे. तथापि मार्गदर्शक तेजोमय अंगुलीप्रमाणें त्यांचा उपयोग निश्चित होईल. त्यांच्यायोगें आम्हांला आमचा पुढचा मार्ग कांहीं अंतरापर्यंत तरी स्वच्छ दिसेल व तेवढा मार्ग आम्ही चालून जाऊं शकूं. मनाला विज्ञानाच्या उंचीवर चढणें अवघड असलें, तरी विज्ञानाच्या खालीं आणि सामान्य मनाच्या वर कांहीं ज्ञानभूमिका आहेत, तेथें मनाला फार प्रयास न करतां चढून जातां येतें. विज्ञानभूमींतील ज्ञानाचें सामर्थ्य आणि प्रकाश, कांहीं बदल होऊन या ज्ञानभूमीवर उतरत असतो; या प्रकाशाचें व सामर्थ्याचें प्रभावी कार्य मनाला अभूतपूर्व उज्ज्वल ज्ञान, स्फूर्ति, साक्षात्कार, संस्पर्श यांच्याद्वारां प्रतीत होतें. तथापि या उच्च ज्ञानभूमीवर वस्ती करून, तेथून विश्वाकडे पाहण्याची व विश्वांत कार्य करण्याची पात्रता अद्यापि मानवी मनाला लाभलेली नाहीं.
विज्ञानभूमीचें ज्ञान आमच्या बुद्धीला होईल असा प्रयत्न करावयाचे बाबतींत प्रथम, आमच्या प्राचीन ज्ञानाला विचारून, तेथें या अ-शोधित ज्ञानविभागासंबंधानें कांहीं मार्गदर्शक प्रकाश मिळतो कां तें पाहिलें पाहिजे. आम्हीं या विभागाला अतिमानस किंवा विज्ञान (Supermind) असें नांव दिलें आहे. अतिमानस म्हणजे मनाच्या श्रेष्ठ पातळीच्याहि वर असलेली ज्ञानभूमि; मनांत मूलभूत बदल केल्यानेंच प्राप्त होऊं शकेल अशी ज्ञानभूमि. ती मनाच्या पलीकडे असल्यामुळे तिला 'अतिमानस' म्हणतां येऊं शकेल. तथापि 'अतिमानस' या शब्दानें शेवटली ज्ञानभूमि, एकमेवाद्वितीय सच्चिदानंदाची भूमि समजावयाची नाहीं; असो. अतिमानसाचें थोडेसें स्पष्ट वर्णन केल्यानें, त्याचें बरोबर स्थान कोणतें, 'अतिमानस' या शब्दाला अर्थदृष्ट्या कोणती मर्यादा घातली पाहिजे हें लक्षांत येईल.
आमच्या वेद-वाङ्मयांत कांहीं गूढ भाषा असलेले मंत्र आहेत, ऋचा आहेत. या ऋचांत गूढपणें दिव्य अनश्वर अतिमानसाचें तारक ज्ञान भरलेलें आहे. या ऋचांतील गूढाच्या पडद्यांतून बाहेर पडणारे
पान क्र. २३१
कांहीं तरल प्रकाशाचें उज्ज्वल किरण आमच्या बुद्धीला मार्गदर्शक होतात. या तरल प्रकाशाच्या साह्यानें आम्हांला गूढ वेदवचनांतील अतिमानसाची कल्पना आत्मसात् करतां येते. ती कल्पना अशी आहे : अतिमानस ही ज्ञानभूमि अति महान् आहे, आमच्या सामान्य मानसिक जाणिवेचें आकाश अलीकडे आहे. त्याच्या पलीकडे अतिमानसाचें अति महान् आकाश आहे, या अतिमानसिक ज्ञानाकाशांत अस्तित्वाचें सत्य आणि हें अस्तित्व व्यक्त करणारे सर्व कांहीं अभिन्न आहे, एक आहे आणि प्रकाशमय आहे; तेथें अस्तित्व जितकें सत्य असतें, तितकेंच वस्तुदर्शन, आकार, व्यवस्था, शब्द, कृति, गति, गतीचे फल, कृतीचें आणि आविष्कृतीचें फल हेंहि सर्व सत्य असतें, तेथील कायदा हा कधींहि चूक न करणारा असतो -- तेथें ही सर्व सत्यता स्वाभाविक आणि अटळ अशी आहे. वेदांतील अतिमानसाच्या वर्णनांत जो सारभूत भाग -- जी सारभूत शब्द योजना आहे, ती अशी : ''अतिमानसांत सर्व कांहीं सामावलेलें आहे, अतिमहान् सर्वसमावेशकता हा अतिमानसाचा एक विशेष आहे. या अतिमहान् विस्तारांत अस्तित्वाचें प्रकाशमय सत्य, अस्तित्वाचा प्रकाशमय सुसंवाद आहे. तेथें गोंधळ नाहीं, अस्पष्टता नाहीं, आत्मविस्मृति नाहीं, अज्ञान नाहीं; तेथें अस्तित्वाचें सुसंवादपूर्ण सत्य जसें आहे, तसेंच तें व्यक्त करणारें कायद्याचें, कृतीचें व ज्ञानाचेंहि सत्य आहे'' -- अतिमानसाचें वैदिक वर्णन हें असें आहे. वेदांत देवदेवता आहेत. अतिमानसाच्या (विज्ञानाच्या) विविध शक्ती हेंच या देवांचें श्रेष्ठ गूढ स्वरूप आहे. हे देव अतिमानसापासून जन्म घेतात. अतिमानस हें त्यांचें खरें धाम, वसतिस्थान आहे, तेथें ते राहतात; त्यांचें ज्ञान 'सत्यदर्शी,' त्यांचें कार्य 'दर्शित्वसंपन्न संकल्पाचें' असतें. देवांची जाणीव-युक्त शक्ति जेव्हां कृति करण्याकडे, निर्मिति करण्याकडे वळते, तेव्हां जें कांहीं करावयाचें असेल, निर्मावयाचें असेल त्याचें प्रत्यक्ष पूर्ण ज्ञान, त्याचें अंतःस्वरुप, त्याचा कायदा, यांचें प्रत्यक्ष पूर्ण ज्ञान या देवांना असतें व तेंच त्यांना मार्गदर्शक होतें. या ज्ञानामुळें त्यांची संकल्पशक्ति पूर्णपणें परिणामकारक बनते; ती आपला मार्ग चालतांना किंवा परिणाम घडवितांना किंचितहि चांचपडत नाहीं; किंवा इकडे तिकडे ढळत नाहीं. तिच्या सत्य-दृष्टीला जें करावयाचें म्हणून दिसतें, तें ती कृतींत अटळपणें आणि स्वाभाविकपणें यशस्वीं करून टाकते. या देवांच्या बाबतींत, या अतिमानसाच्या क्षेत्रांत,
पान क्र. २३२
शक्ति आणि ज्ञान यांच्यांत अभेद असतो; इच्छाशक्तीचा ताल आणि ज्ञानाचें स्पंद एकरूप असतात आणि इच्छा व ज्ञान दोन्हींहि परिणामाशीं एकरूप असतात. ही एकरूपता अर्धवट नसते, तर परिपूर्ण असते; परिणाम अगदीं खात्रीनें, इच्छेनुसार होतो आणि हा परिणाम घडवितांना इच्छाशक्तीला व ज्ञानाला आयास करावें लागत नाहींत. परिणामाची 'ज्ञान-इच्छा' या जोडीशीं एकरूपता होण्यासाठींहि कसलेच कष्ट पडत नाहींत. ईश्वरी प्रकृतींत दोन प्रकारची शक्ति आहे. जी वस्तु व्यक्त व्हावयाची असते, ती आपल्या सारभूत सत्त्वांतून आपला विशिष्ट आकार आणि आपल्यांतील घटकांची विशिष्ट व्यवस्था स्वभावत: स्वयंस्फूर्तीनें घेऊन व्यक्त होते; तिच्यांत जें मूळ सत्य असतें, तें या विशिष्ट आकारानें आणि व्यवस्थाप्रकारानें व्यक्त केलें जातें. याप्रमाणें आकार आणि अंत:संघटनविषयक स्वयंस्फूर्त स्वयंकारिता ही एक दिव्य प्राकृतिक वस्तूची शक्ति आहे; दुसरी शक्ति ज्ञानाचें आत्मगत सामर्थ्य; जी वस्तु व्यक्त व्हावयाची असते, तिच्यांत स्वभावत: हें आत्मसामर्थ्ययुक्त ज्ञान असतें; ती वस्तु या ज्ञानामुळें सहज स्वयंस्फूर्तीनें आपलें अटळ अंत:संघटन व अंतर्व्यवस्था करून घेते.
वरील सारभूत गोष्टीखेरीज कांहीं गौण परंतु महत्त्वाच्या अशा तपशिलाच्या गोष्टी वैदिक ऋषींनीं सांगितल्या आहेत. जो आत्मा सत्यदर्शी, सत्यज्ञानी असतो, त्याच्या ठिकाणीं दोन प्राथमिक शक्ती आढळतात असें वैदिक ऋषि सांगतात. या दोन प्राथमिक शक्ती म्हणजे एक पाहण्याची शक्ति व दुसरी ऐकण्याची शक्ति, अर्थात् सत्यदर्शन व सत्यश्रवण; सत्य-जाणीवसंपन्न आत्म्याला जें स्वाभाविक ज्ञान असतें, त्या ज्ञानाचें प्रत्यक्ष अतींद्रिय व्यापार, सत्यदर्शन आणि सत्यश्रवण या शब्दांनीं वर्णन करण्यासारखे असतात. आमच्या मानवी मनांत या वरील शक्तींचें दूरदूरचें प्रतिबिंब पहावयास मिळतें. मनाची अंत:साक्षात्कारशक्ति (Revelation) ही सत्यदर्शनशक्तीची छाया आहे व त्याची अंत:प्रेरणाशक्ति (Inspiration) ही सत्यश्रवणशक्तीची छाया आहे. अतिमानसाच्या एकमेकीपासून भिन्न अशा दोन प्रकारच्या ज्ञानक्रिया वेदवाङ्मयांत वर्णिल्या आहेत. एका ज्ञानक्रियेंत अतिमानसिक जाणीव ही ज्ञान-विषयाला व्यापून आपल्यांत समाविष्ट करून घेते; आमच्या मनाला जी तादात्म्य-अधिष्ठित, स्व-विषयक ज्ञानक्रिया परिचित आहे, तिला ही अतिमानसिक ज्ञान-क्रिया पुष्कळ जवळ आहे; दुसऱ्या
पान क्र. २३३
अतिमानसिक ज्ञानक्रियेंत, अतिमानसिक जाणीव ज्ञान-विषयाला व्यापीत नाहीं. ती ज्ञानविषयाकडे झेंप घेते, त्याच्यासमोर राहून त्याला स्पर्श करते; ही ज्ञानक्रिया बाह्यपदार्थविषयक ज्ञानाची प्रारंभिक क्रिया आहे. वेद वाङ्मयांत अतिमानसासंबंधानें ज्या सूचक गोष्टी सांपडतात, त्या वर दिल्या आहेत. आमच्या प्राचीन ऋषींचा, वर दिलेला अतिमानसविषयक अनुभव ध्यानांत घेऊन, अतिमानस या शब्दाला पर्याय शब्द म्हणून 'सत्य-जाणीव' हा शब्द आम्हीं वापरणें उचित होईल. अतिमानस या शब्दांत जी अतिव्याप्ति शक्य आहे, ती या पर्यायशब्दानें दूर केली जाते; या पर्यायशब्दानें अतिमानस या शब्दाचा अर्थ योग्य रीतीनें मर्यादित केला जातो.
अतिमानस किंवा सत्य-जाणीव या शक्तीच्या वर दिलेल्या विशेष गुणांवरून ही शक्ति मध्यस्थ शक्ति आहे हें उघड आहे; हिच्या वरतीं हिच्याहून श्रेष्ठ वस्तु आहे आणि हिच्या खालीं हिच्याहून कनिष्ठ वस्तु आहे. कनिष्ठ वस्तु हिच्याद्वारां श्रेष्ठ वस्तूंतून उदयास येतें, अर्थात् उलट मार्गानें ती कनिष्ठ वस्तु हिच्याद्वारां त्या सर्वश्रेष्ठ वस्तूकडे, आपल्या खऱ्या उगमस्थानाकडे जाऊं शकेल, हें स्पष्ट आहे. हिच्या वरतीं जी वस्तु आहे, ती सच्चिदानंद होय; शुद्ध सच्चिदानंदाची अविभाज्य, एकतामय, अद्वैती जाणीव ही सत्य-जाणिवेच्या वरतीं आहे; या अद्वैती, अभेदमय जाणिवेंत कसलेहि भेद, कसलेहि अलग अलग भाग नाहींत; हिच्या खालतीं मन आहे. मानसिक जाणीव ही विभाजक, विश्लेषक व भाग पाडणारी जाणीव आहे; दोन वस्तू एकमेकींपासून वेगळ्या करून, त्या दोहोंतला भेद शोधून, मानसिक जाणीव आपलें ज्ञान मिळविते; तिला ज्ञान मिळविण्याचा हा एकच मार्ग आहे; एकता, अनंतता या गोष्टी मनाला कळतात, पण अंधुकपणें कळतात; अप्रत्यक्षपणें समजून घ्याव्या लागतात. मन विभागणी करतें आणि विभागांची जुळणी करून, एक तऱ्हेची एकता पण निर्माण करतें, तथापि खरी अविभक्त, अविभाज्य एकता किंवा सर्वैकता त्याला आपल्या शक्तीनें कळणें अशक्य आहे. सच्चिदानंद आणि मन या दोहोंच्यामध्यें अतिमानस आहे, सत्य-जाणीव आहे; ही जाणीव सर्व-समावेशक व सर्व-निर्मायक आहे; या सत्य-जाणिवेची सर्वसमावेशक सर्वव्यापक ज्ञानशक्ति, ब्रह्माच्या-सच्चिदानंदाच्या, ''सर्व मी आहे'' या तादात्म्य-अधिष्ठित आत्मजाणिवेपासून जन्मास आलेली आहे -- ''सर्व मी आहे,'' ही ब्रह्माची नित्य
पान क्र. २३४
ज्ञानावस्था आहे; अतिमानसाची, सत्य-जाणिवेची दुसरी शक्ति -- विषयाकडे झेंप घेण्याची, त्याच्यासमोर जाऊन त्याला स्पर्श करण्याची ज्ञानशक्ति -- ही मनाच्या भेद-अधिष्ठित ज्ञानाच्या स्वाभाविक प्रक्रियेला जन्माला घालणारी आहे. ब्रह्माची कन्या आणि मनाची जननी अशी अतिमानसाची अथवा सत्य-जाणिवेची मध्यस्थाची भूमिका आहे.
वरतीं शाश्वत, स्थिर आणि अव्यय असें एकतत्त्व; खालतीं नित्य बदलणाऱ्या स्वरूपाची व सारख्या प्रवाही असलेल्या वस्तुजातांत स्थिर आणि अव्यय असा एखादा बिंदु शोधण्यांत मग्न असलेली अशी अनेकता आहे. परंतु असा स्थिर बिंदु तिला बहुधा सांपडत नाहीं; या दोहोंच्यामध्यें अतिमानसाचें स्थान आहे, हें स्थान सर्व त्रिमुखी वस्तूंचें व सर्व द्विमुरवी वस्तूंचें स्थान आहे. ''एकांत अनेक'' होऊन जें ''अनेकांत एक'' हें आपलें एकत्व टाकीत नाहीं, अशा सर्व वस्तुजाताचें तें स्थान आहे; आरंभीं एकच एक असणारें परंतु अनेक होण्याची पात्रता नित्य आपल्या अंतरीं ठेवणारें असें तत्त्व सर्वाच्या मुळाशीं असल्यानें 'एक-अनेक अनेक-एक' असें विश्वसंसारांतील सर्व वस्तूंचें व घटनांचें स्वाभाविक स्वरूप होऊं शकतें. एक स्थिर एकत्व आणि एक अस्थिर अनेकत्व अशा दोन वस्तूंमधली अतिमानस ही वस्तु, वरील कारणास्तव सर्व सृष्ट संसार आणि तेथील सर्व क्रम, व्यवस्था यांचा आरंभ आणि शेवट आहे व यांचा आद्य आणि अंत्य वर्ण आहे; सर्व भेदांचें आरंभस्थान या मधल्या वस्तूंत आहे, सर्व एकीकरणाचें स्थान येथेंच आहे; या सृष्ट संसारांत ज्या अनेक तालबद्ध, सुसंगत व सुंदर रचना झाल्या आहेत, किंवा होणार आहेत, त्या सर्वांची पूर्वयोजना, त्यांची उभारणी, त्यांची पूर्ण वाढ व परिपूर्णता याच ठिकाणीं होते. या मध्यस्थ वस्तूला मूळ 'एकच एक' वस्तूचें पूर्ण ज्ञान आहे आणि या एका वस्तूच्या पोटीं ज्या अनेक वस्तुसंभारांचा संसार दडलेला आहे, तो सर्व संसार बाहेर काढण्याचें काम ही मध्यस्थ वस्तु करीत असते; अनेकता व्यक्त करूनहि, ही मध्यस्थ वस्तु त्या अनेकतेच्या भेदाभेदांत स्वतःचें स्वरूप विसरत नाहीं व त्या अनेकांची एकताहि विसरत नाहीं. अनेकता व्यक्त करणारी ही मध्यस्थ वस्तु आणि हिच्या वरची अनिर्वचनीय एकत्व असणारी श्रेष्ठ वस्तु यांच्या पलीकडे, एकत्व आणि अनेकत्व या आपल्या मनाच्या कल्पनांना न मानणारी, यापैकीं कोणत्याहि एका कल्पनेनें बद्ध न होणारी, पूर्ण मुक्त अशी 'एकत्व-अनेकत्व-अतीत', मनाला सर्वस्वीं अचिंत्य अशी
पान क्र. २३५
वस्तु -- खरी केवलता, निःसंबंधता व सत्यता असलेली वस्तु -- असावी अशी आमची कल्पना आहे. ही वस्तु सर्वश्रेष्ठ स्थानीं ठेवली म्हणजे एक ईश्वर आणि अनेकतेचा विश्व-संसार या दोहीं संबंधींचें आमचें ज्ञान सत्यज्ञान म्हणून समर्थन करण्याची पूर्ण सोय होते.
या गोष्टी फार मोठ्या आणि मोठाले दुर्बोध शब्द वापरल्यानें समजायला अधिक कठीण आहेत. आतां आपण स्पष्ट अशा तपशिलांत शिरून, या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करूं. एकच एक वस्तूला आपण 'सच्चिदानंद' म्हणतो -- म्हणजे तीन वस्तु आहेत असें प्रथम कल्पून, नंतर त्या एकत्र करून, एक त्रिमुखी वस्तु आम्ही बनवितों. अस्तित्व आहे, जाणीव आहे व आनंद आहे असें प्रथम कल्पून नंतर या तीन वस्तू भिन्न नसून, अभिन्न एक आहेत असें आम्ही म्हणतों. ही मांडणी मनाला परिचित व स्वाभाविक अशी आहे. मात्र एकताप्रधान एकत्वमय जाणीव अशी कल्पना करूं शकत नाहीं -- अस्तित्व म्हणजेच जाणीव, या दोहोंमध्यें किंचितहि अलगपणा असूं शकत नाहीं; जाणीव म्हणजेच आनंद, या दोहोंतहि कांहीं अलगपणा नाहीं. याप्रमाणें अस्तित्व, जाणीव व आनंद सर्वथा एकरूप आणि पूर्णतया अभिन्न असल्यानें, अशा एकापासून विश्व होऊं शकत नाहीं. असें एकतत्त्व हें जर एकच एक सत्य वास्तव तत्त्व असेल, तर विश्व नाहीं, विश्व केव्हांहि नव्हतें. विश्वाची कल्पनादेखील केव्हांहि करणें अशक्य होतें. जी जाणीव अविभाज्य आहे, ती जाणीव स्वभावत: अविभाजकहि असणार; भाग करणें व भागाभागांत भेद करणें हें अविभाज्य जाणिवेला अशक्य आहे. अर्थात् एकतत्त्व अविभाज्य सच्चिदानंद या मुळापासून विश्वाची उभारणी कल्पितां देखील येत नाहीं -- आणि विश्व तर आहे; तेव्हां वरील मांडणींतून आम्हांला अखेर एक ''निर्बुद्ध सिद्धान्त'' मात्र प्राप्त होतो. अशक्य व अनिवार्य असा अन्योन्यविरोध हा या सिद्धान्तानुसार आम्हांला विश्वाचा पाया म्हणून मानावा लागेल. विश्वाचा असा पाया आम्ही मान्य करूं शकत नाहीं.
सच्चिदानंदाची अभेद्य एकत्वाची कल्पना घेऊन आपण एका निर्बुद्ध सिद्धान्तापर्यंत प्रवास केला. आतां मनाच्या स्वभावधर्मापासून काय निघतें तें पाहूं. मनाला भेद स्पष्टपणें सत्य दिसतात. भिन्न वस्तू एकत्र जुळवून, एकतऱ्हेची समग्रता, संयुक्त एकता मनाला कल्पितां येते; मर्यादित वस्तूचा विस्तार होत राहून, ती वाटेल तितकी विस्तृत होऊं शकते हें मनाला समजतें; अलग असणाऱ्या वस्तूंचे समूह मन
पान क्र. २३६
कल्पूं शकतें आणि या समूहांतील सर्व घटक-वस्तूंत काय सामान्यधर्म आहे तें त्याला समजतें; समूहासमूहांतहि सामान्यधर्म मन ओळखूं शकतें; परंतु अंतिम शुद्ध एकता, अंतिम शुद्ध अनंतता या वास्तव गोष्टी म्हणून मनाच्या जाणिवेला ग्रहण करतां येत नाहींत. या गोष्टींना अवास्तव कल्पना असें नांव मन देतें; मनाला त्या स्वभावतःच अवास्तव वाटतात, असत्य वाटतात; आणि त्या सत्य आहेत व त्याच खऱ्या 'सत्य' आहेत, इतर गोष्टी सत्य नाहींत, ही गोष्ट तर मनाला अगदीं अनाकलनीय अशी असते. सच्चिदानंदाची अखंड एकरस एकत्वाची जी स्वाभाविक अभेद्य जाणीव वर वर्णिली, तिच्या अगदीं उलट ही मनाची जाणीव आहे. या मनाच्या जाणिवेंत अनेकता हीच स्वाभाविक आहे, या जाणिवेला एकत्वाची अनुभूति हवी असेल, तर स्वतःचा विलय करून घेणें हाच एक मार्ग तिला यासाठीं मोकळा आहे; पण असें तिनें केलें म्हणजे स्वतःची अनेकतेची जाणीव हा वस्तुत: भ्रम होता, खरोखरी तिला अस्तित्व नव्हतें, असें एकत्वाच्या अनुभूतीनें तिनें कबूल केल्यासारखें होतें. परंतु खरी गोष्ट अशी आहे कीं, अनेकतेची अनेकता सत्य आहे ही जाणीव मनाला होती, या जाणिवेनें एकतेच्या जाणिवेसाठी खटपट करून ती मिळविली, व ती मिळवण्यांत स्वतःचा विलय करून घेतला. तेव्हां, येथेंहि मनाच्या स्वाभाविक जाणिवेपासून आरंभ करून, आपण एका निर्बुद्ध सिद्धान्तापर्यंत आलों आहोंत. येथेंहि एकच गोष्ट 'आहे आणि नाहीं' असा बुद्धीला धक्का देणारा, अगतिक करणारा, अनिवार्य विरोधमय सिद्धान्त आमच्यापुढें उभा राहतो आणि तो आम्हांला मान्य होऊ शकत नाहीं.
मन हें सारभूत ज्ञानाचें साधन आम्ही मानतों, म्हणून अडचण उत्पन्न होते; पण तें तसें नाहीं, तें वियोजनाचें आणि संयोजनाचें साधन आहे. आमच्या जाणिवेची प्राथमिक अवस्था म्हणजे मन होय. अज्ञात स्वरूपाच्या मूळ वस्तूचा कांहीं भाग आपल्या वियोजनाच्या, विभाजनाच्या (विश्लेषण-पृथक्करणाच्या) शक्तीनें मन अस्पष्टपणें वेगळा काढतें आणि हा वेगळा मापलेला मर्यादित भाग, एक सगळी वस्तु आहे असें कल्पून, मन तिचे पुन: भाग पाडतें आणि या भागांना आपले विषय मानून त्यांचा अभ्यास करतें. वस्तूचे भाग आणि गौण गुणधर्म यांचें स्पष्ट दर्शन मनाला घडतें आणि त्याच्या कुवतीप्रमाणें याचेंच ज्ञान त्याला होते. वस्तूच्या समग्रतेसंबंधानें मनाची अशी स्पष्ट निश्चित कल्पना असते कीं, ती एकत्र केलेल्या भागाभागांची बनलेली
पान क्र. २३७
आहे, एकत्र केलेले गुणधर्म आणि असारभूत विशेष, यांची बनलेली आहे. कोणतीहि समग्र वस्तु दुसऱ्या वस्तूचा भाग आहे किंवा ती स्वत: भागाभागांची, गुणांची, विशेषांची झालेली आहे, यापेक्षां वेगळा समग्रतेचा प्रत्यय मनाला फार अंधुकपणें घडतो; वस्तूचें विश्लेषण करावें, दुसऱ्या एका समग्र वस्तूच्या पोटांत समोरच्या समग्र वस्तूला घालावें, तेव्हांच ''आतां मला ही वस्तु समजली'' असें मन म्हणूं शकतें; आणि खरी गोष्ट अशी असते कीं, मनाला ती वस्तु समजत नाहीं, ज्ञात होत नाहीं -- त्याला समजतें फक्त त्यानें केलेलें पृथक्करण आणि या पृथक्करणानें त्याला सांपडलेल्या भागांचे व गुणधर्मांचें त्यानें केलेलें एकीकरण. एवढेंच मनाचें खरें काम असतें, त्याची स्वाभाविक शक्ति इतकीच; यापेक्षां अधिक, अधिक खोल आणि खरेंखुरें ज्ञान हवें असेल तर तें मनाकडून मिळावयाचें नाहीं -- आपल्याला खरें खोल ज्ञान झालें अशी तीव्र भावना मनाच्या कांहीं खोल भागांना केव्हां केव्हां येते. त्या तसल्या आकारशून्य भावनेला खरें ज्ञान म्हणतां येत नाहीं. असल्या भावनेपलीकडे व पृथक्करणपूर्वक एकीकरणानें मिळणाऱ्या 'ज्ञाना' पलीकडे, खरें श्रेष्ठ दर्जाचें गाढ ज्ञान मिळावयास मनाच्या पलीकडे असलेल्या जाणिवेची आवश्यकता आहे. मनानें अर्धवट मिळविलेल्या ज्ञानाच्या वरतीं जाऊन, मनाच्या वरतीं जाऊन, त्याच्या क्रियेच्या उलट क्रिया करून, ही जाणीव मनानें अर्धवट मिळविलेलें ज्ञान पुरें करूं शकते. या जाणिवेला वस्तूचें खरें समग्र दर्शन, सार-दर्शन स्वाभाविकपणें घडत असतें. मनाच्या ज्ञानाची जी परिसीमा असते, ती मनाच्या पातळीवरून उडी मारून मनापलीकडे, त्याच्या वरतीं जावयास, त्याच्याहून श्रेष्ठ असलेल्या, खरें ज्ञान देणाऱ्या जाणिवेला उपयोगी पडते. जडाच्या अंधःकारमय बंदीखान्यांतून बाहेर पडलेल्या व आमच्या ठिकाणीं आलेल्या अर्धवट अंधुक दृष्टीच्या जाणिवेला शिस्त लावणें, तिनें बरोबर आणलेल्या आंधळ्या प्रेरणांना, भटक्या स्फूर्तींना, अस्पष्ट संवेदनांना आपल्या जवळच्या प्रकाशानें अनुक्रमें डोळस करणें, स्थिरता देणें, स्पष्टता देणें हें मनाचें खरें मोठयांत मोठें नियत कार्य आहे. जडांतून वर आलेली अर्धवट जड जाणीव, मनाच्या या शिस्तीनें व शिक्षणानें आपली ज्ञानपात्रता वाढवीत वाढवीत, मनापलीकडे चढून जाण्याला व तेथें जो प्रकाश आहे, तो आत्मसात् करण्याला समर्थ होते. अंतिम स्थानाकडे जाण्याचा मन हा केवळ मार्ग आहे, तें अंतिम स्थान नव्हे.
पान क्र. २३८
ही मनाची गोष्ट झाली. आतां, सच्चिदानंदाच्या अविभाज्य एकत्वाचा, शुद्ध एकरस जाणिवेचा विचार करूं. हें एकत्व, ही एकरस जाणीव पूर्णतया निर्वस्तुक आहे; विश्वांतील अखिल वस्तू या निर्वस्तुक मूळ एकत्वांतून, शून्यानें भरलेल्या एकत्वांतून बाहेर आलेल्या आहेत आणि शेवटीं या सर्व वस्तू त्या मूळ शून्यमय एकत्वांत विलीन होऊन नाहींशा होतात; ही एकत्वाची कल्पना सच्चिदानंदाशीं जोडली गेल्यानें अडचणी उत्पन्न होतात. एकत्वाची ही कल्पना विश्वाच्या उगमस्थानाशीं जोडणें स्वच्छ तर्कबुद्धीला केवळ अशक्य कोटींतील आहे. विश्वाच्या कालस्थलनिष्ठ आविष्कारांत जें जें कांहीं व्यक्त झालेलें आहे किंवा होणार आहे, तें सर्व कालस्थलातीत अशा सच्चिदानंदाच्या पोटीं पूर्णतया आत्मसमाविष्ट, आत्मकेन्द्रस्थित अशा मूळ स्वरूपांत असलेंच पाहिजे. अगदीं अचिंत्य व अनिर्वचनीय असें अस्तित्व आरंभीं सर्व कांहीं आंवरून, आत्मकेन्द्रस्थ एकत्व रूपानें असतें. शून्यवादी (Nihilist) आपल्या मनाशीं या अस्तित्वासंबंधानें अशी कल्पना करतो कीं, आम्ही जें कांहीं आहों आणि जें कांहीं जाणतों, त्या सर्वाचें मूलस्थान हें नकारात्मक अस्तित्व अथवा शून्य आहे; सर्वातीतवादी (Transcendentalist) या अस्तित्वासंबंधानें आपल्या मनाशीं अशी वेगळी कल्पना करतो कीं, आम्ही जें कांहीं आहों आणि जें कांहीं जाणतों, तें सर्व नकारात्मक अस्तित्वाच्या पोटीं नसून, भावात्मक अस्तित्वाच्या पोटीं आहे; हें भावनात्मक मूळअस्तित्व मूळ सत्य आहे, तें आमच्या मनाला अमुक म्हणून ओळखतां येत नाहीं, इतकेंच. वेदान्तांत ''आरंभीं एक अस्तित्व होतें, दुसरें कांहीं नव्हतें'' असें म्हटलें आहे. विश्वाच्या आरंभीं एकच एक अद्वितीय अस्तित्व होतें हें वेदान्ताचें म्हणणें बरोबर आहे; आरंभाच्या पूर्वीं काय होतें तें वेदान्तानें सांगितलेलें नाहीं. आरंभाच्या पूर्वीं, आरंभाच्या नंतर, आज, सर्व काळ आणि काळ नसतांना, काळाच्या पलीकडे अशी वस्तु आहे कीं, तिला अद्वितीय एक असें तर्कशुद्ध दृष्टीनें म्हणतां येत नाहीं. तिच्याविषयीं आपल्याला प्रथम हें कळतें कीं, ही मूळ वस्तु प्रथम सर्व कांहीं स्वतःच्या आत्म्यांत, निजरूपांत सांठवून राहिली; या तिच्या आद्य आत्मकेन्द्रीकरणाला अविभाज्य, अद्वितीय एकतत्त्व म्हणून ओळखण्याचा आम्ही प्रयत्न करतों; यानंतर तिजविषयीं दुसरी गोष्ट आम्हांला अशी कळते कीं, या प्रथम धारण केलेल्या एकत्वरूपांत जें सांठविलें होतें, त्याचें एकत्व जणुं मोडून भाग भाग होतात व तें
पान क्र. २३९
चोहोंकडे पसरतात, विखुरले जातात. मन विश्वाची कल्पना करतें, ती या प्रकारची असते; आणि तिजविषयीं जी तिसरी गोष्ट आम्हांला कळते ती ही कीं, ती निश्चितपणें आणि व्यवस्थेनें स्वतःचा विस्तार करून सत्य-जाणीव, सत्य-कल्पना हें रूप धारण करते; यालाच अतिमानस, विज्ञान असें म्हणतात. हें विज्ञान स्वतःला आणि स्वत: जें जें बनतें त्याला सत्यत्वानें पूर्णपणें जाणतें; मनानें या पसाऱ्याला जें मोडतोडीचे स्वरूप दिलेलें असतें, तसें स्वरूप खरोखरीच त्याला येऊं नये, अशी काळजी हें विज्ञान घेतें. अधिकांत अधिक भेदाच्या पसाऱ्यांत तें अभेद, एकत्व राखतें; पराकोटीच्या अस्थिर पसाऱ्यांत स्थिरता जपून ठेवतें; सार्वत्रिक झगड्याच्या प्रदर्शनांत आग्रहानें सुसंवाद स्थापन करतें; व्यवस्थापूर्ण अशी विश्वरचना सर्व काळ संभाळून टिकवितें -- मनाची गति अशा व्यवस्थेपर्यंत होऊं शकत नाहीं -- मनाला विश्व हा अव्यवस्थित बाजार असतो, मनाच्या दृष्टीनें नित्यश: हा पसारा कांहींतरी व्यवस्थित आकार धारण करण्याचा प्रयत्न करीत असतो पण हा प्रयत्न त्याच्या दृष्टीनें नित्यशः अयशस्वी होत असतो. मनाला विश्वरूपाचें दर्शन हें असें घडत असतें.
विज्ञान किंवा अतिमानस हा ब्रह्माचा बृहत्, अतिमहान् आत्मविस्तार आहे. सर्वकांहीं सामावून घेऊन, त्याचा आपल्या पोटांत आविष्कार किंवा विकास करण्याचा या विस्तृत ब्रह्मरूपाचा धर्म आहे. अविभाज्य एकत्वाच्या स्वरूपांत असलेलें सत्-चित्-आनंद हें जें मूलतत्त्व, त्याचें कल्पनेच्या आश्रयानें, विज्ञान त्रिमुखी एकतत्त्व बनवितें. या तीन अंगांना विभागून अलग अलग न करतांहि, त्यांच्यामध्यें भेदाची कल्पना विज्ञान करतें. एकांतून तीन आविष्कृत करणें हें काम विज्ञान करतें. मन, तीन अलग अलग घटकांचें एक तत्त्व बनवितें. त्याच्या उलट विज्ञानाची ही कृति आहे, एकतत्त्वाचें त्रिमुखी एकतत्त्व बनवून, विज्ञान त्याच्यांत अनेकता आणि एकता एकाच वेळीं स्थापन करते. विज्ञान सर्वसमावेशक, सर्वज्ञतासंपन्न असल्यानें, त्याच्याकडून अभिव्यक्त झालेल्या पसाऱ्यांत एकता नित्य अनुस्यूत असते. प्रथम सच्चिदानंदाला सत्, चित्, आनंद असें त्रिधा भिन्न (अर्थात् एकत्व न सांडतां) कल्पून, विज्ञान हें विश्वाच्या आविष्काराला आरंभ करतें. या भेद-कल्पनेनंतर या तीनपैकीं कोणतीहि एक दिव्य वस्तु मुख्य म्हणून, मुख्य देवता म्हणून तें निश्चित करतें; या मुख्य देवतेंत दुसऱ्या दोन देवता अव्यक्त
पान क्र. २४०
किंवा अप्रकटपणें अंतर्भूत धरल्या जातात. यानंतर विज्ञान जे अनेक भेद कल्पितें, ते सर्व या नमुन्याप्रमाणें असतात. सर्वत्र विकासाची, अभिव्यक्तीची प्रक्रिया वरीलप्रमाणेंच -- एक मुख्य, दुसरें त्यांत अव्यक्त वा अप्रकटपणें अंतर्भूत -- अशीच असते. सच्चिदानंद या त्रिमुखी एकतत्त्वांतूनच तें नाना तत्त्वें, नाना शक्यता आविष्कृत करतें, विकसित करतें; कोणतेंहि तत्त्व वा शक्यता व्यक्त करणें, विकसित करणें, प्रकट करणें ही शक्ति विज्ञानांत आहे; अर्थात् या शक्तीची पूरक, म्हणजे अव्यक्त करणें, संकोचित करणें, अप्रकट करणें हीहि दुसरी शक्ति विज्ञानांत आहे. एका अर्थानें सगळी सृष्टि दोन अव्यक्तीकरणाच्या क्रियांमधील, दोन अव्यक्त-भांडारांमधील वाटचाल आहे. सृष्टीचें वरचें टोंक आत्मा हें एक अव्यक्त भांडार आहे, त्यांत सर्व कांहीं अव्यक्त रूपांत सांठविलेलें आहे; हें सर्व काही अव्यक्त आत्म्यांतून व्यक्त होत होत, सृष्टीचें दुसरें ध्रुवटोंक जें जडतत्त्व, तेथपर्यंत तळाला पोचतें; या तळाच्या जडतत्त्वांत सर्व व्यक्त सांठविले जातें, सर्व व्यक्त अव्यक्त होऊन बसतें -- तें क्रमानें त्या जडतत्त्वांतून बाहेर निघून पुनरपि व्यक्त होत होत, वरचें आत्म्याचें ध्रुवटोंक गांठतें.
तेव्हां सत्य कल्पनेच्या आश्रयानें सच्चिदानंदांत भेद कल्पून, नंतर त्या भेदांत आणखी भेद कल्पून विज्ञान विश्वनिर्मिति करतें. या विश्वनिर्मितीसंपादक एकंदर भेदप्रक्रियाव्यवहारांत विज्ञान खरोखरी अनेक तत्त्वें, अनेक शक्ती, अनेक आकार उभे करीत असतें; विज्ञानाची सर्वसमावेशक जाणीव या तत्वादिकांपैकीं प्रत्येकांत तदितर सर्व अस्तित्व समाविष्ट असलेलें पाहते; आणि त्याची सर्वस्पर्शी जाणीव या प्रत्येकाच्या पाठीमागें इतर सर्व अस्तित्व अव्यक्त दशेंत पाहते. म्हणजे 'सर्व प्रत्येकांत आहे आणि प्रत्येकाच्या पाठीमागें म्हणा, आंत म्हणा, सर्व आहे' असें नित्यज्ञान विज्ञानाला असतें. प्रत्येक वस्तुबीज अनंत शक्यता आपल्या अंतरीं सांठवून असतें; तथापि वाढीच्या क्रियेचा आणि अंतिम फळाचा एक विशिष्ट नियम तें पाळीत असतें -- हा नियम मूळ संकल्पशक्ति किंवा इच्छाशक्ति त्याला घालून देत असते. अर्थात् ही इच्छाशक्ति म्हणजे मूळ जाणीवयुक्त अस्तित्वाची (ज्ञानमय पुरुषाची) ज्ञानशक्ति असते. हा पुरुष, हा आत्मा, आत्माविष्कार करीत असतो; त्याच्या अंतरीं जी सत्य-कल्पना असते, तिचें त्याला असलेलें पूर्ण निश्चित ज्ञान कामाला लावून त्या कल्पनेनुसार आपले स्वत:चें
पान क्र. २४१
आकार आणि हालचाली तो अगोदरच योजून ठेवतो. ही योजना वर सांगितलेल्या विशिष्ट नियमाचें मूळ होय. मूळ स्वयंभू अस्तित्व -- ज्ञानमय आत्मा -- आपल्या अंतरीं आपल्या अस्तित्वांतील जें एखादें सत्य विशेष दृष्टीनें पाहतो, तें वस्तुबीज होतें; विशिष्ट आत्मदर्शनाचें तें विशिष्ट बीज जें फळ स्वतःतून निर्मितें, तें आत्म-व्यापाराचें सत्य होय; विकासाचा, आकार-धारणाचा, क्रियात्मकतेचा विशिष्ट स्वाभाविक नियम हेंच आत्म-व्यापाराचें स्वरूप होय; विशिष्ट आत्म-दर्शन हें विशिष्ट आत्मव्यापाराला अटळपणें कारणीभूत होतें; आणि आत्मदर्शनांत जें मूळ सत्य असतें, त्यांत गर्भित असलेल्याच विकासप्रक्रिया हा आत्मव्यापार कांटेकोरपणें कार्यान्वित करीत असतो. तेव्हां, सर्व निसर्ग हा केवळ ज्ञानमय, मूळ आत्म्याची कार्यमग्न ज्ञानशक्ति किंवा ज्ञानयुक्त इच्छाशक्ति आहे. ज्ञानमय आत्म्यानें प्रथम स्वत: कल्पनेचें रूप घेतलें, ही त्याची सत्यकल्पना जें सत्य स्वाभाविकपणें स्वत: जवळ बाळगीत होती, त्या सर्व सत्याला शक्तीच्या आणि आकाराच्या स्वरूपांत विकसित, संवर्धित करण्याचें काम, ज्ञानमय आत्म्याची ज्ञानशक्ति किवा ज्ञानयुक्त इच्छाशक्ति करते आणि हें कार्य म्हणजेच निसर्ग होय.
मानसिक जाणीव आणि सत्य-जाणीव यांतील सारभूत भेद कोणता तें वर दिलेल्या विवेचनावरून ध्यानांत येईल. अस्तित्व ही वस्तु वेगळी आणि विचार ही वस्तु वेगळी असें आपण मानतों; विचार ही द्रव्यमय वस्तु नाहीं, भावरूप आहे; सत्य वास्तव गोष्ट असें विचाराला म्हणतां येत नाहीं, विचार ही भावरूप, अद्रव्यरूप गोष्ट कोठून तरी उदयास येते, कोठून तें आम्हांला समजत नाहीं; द्रव्यमय सत्यविषयापासून ही अद्रव्यरूप गोष्ट स्वतःला अलग करते आणि मग त्या विषयाचें निरीक्षण करणें, तो विषय समजून घेणें, त्यासंबंधीं निर्णय घेणें या क्रिया ती करते; विचाराची हकीकत आमच्या मनाला ही अशी दिसते आणि आमचें मन म्हणजे एक सर्व विभागणारी, सर्व पृथक् पृथक् करणारी वस्तु असल्यानें, वर सांगितल्याप्रमाणें मनाला दिसणारें विचाराचें स्वरूप मनाच्या दृष्टीनें पूर्ण सत्य आहे. वस्तू वेगळ्या वेगळ्या करण्याचें, वस्तूमध्यें चिरा, भेगा पाडण्याचें, वस्तूचे तुकडे करण्याचें मनाचें आद्य कार्य आहे; वस्तु स्पष्टतेनें समजून घेण्याकडे मनाचें तितकें लक्ष नसतें; मनाच्या या स्वभावधर्मामुळें विचार आणि सत्य वस्तु, विचार आणि सत्य-अस्तित्व यांच्या अविभक्त सलग रूपामध्यें त्यांना विभक्त
पान क्र. २४२
व अलग करणारा चिरा मनानें कल्पिला आहे. अति-मानसाच्या क्षेत्रांत कोणतेंहि अस्तित्व जाणिवेपासून अलग असत नाहीं, जाणीव ही अस्तित्वाची नित्यसहचारिणी व त्याच्याशीं एकरूप अशी असते; कल्पना (जिचें वर विवेचन आलें आहे ती) जाणिवेचें स्पंदन आणि त्याचवेळीं अस्तित्त्वाचेंहि स्पंदन असते, दोन्हीं स्पंदनें अनेक परिणाम घडविणारीं असतात; अस्तित्वाचें स्पंदन हें नाना आकार व जाणिवेचें स्पंदन नाना जाणीवप्रकार उदयास आणतें; सत्य-कल्पना हें आरंभीचें निर्मायक आत्मज्ञान आहे; निष्क्रिय, निर्मितिविमुख अशी आत्मजाणिवेच्या पोटीं जें केन्द्रित झालेलें, एकत्र सांठविलेलें होतें, त्याचें निर्मायक आत्मजाणीवरूपानें आरंभींचें बहिरागमन म्हणजे कल्पना किंवा सत्य-कल्पना होय; हेंच अतिमानस, विज्ञान, सत्य-जाणीव वगैरे नांवांनीं ओळखलें जातें. जी निर्मायक आत्म-जाणीव किंवा कल्पना अ-निर्मायक आत्मजाणीवेच्या पोटीं दडलेली असते, तिचें बाहेर येणें हें सृष्टीच्या निर्मितींतील पहिलें पाऊल. ही जी कल्पना बाहेर येते, ती सत्य-कल्पना म्हणूनच बाहेर येते, तिचें सत्यत्व, सद्वस्तुत्व पुढें आत्मविकास करून घेतें; ही क्रिया तें नेहमीं आपल्या अंतर्गत ज्ञानाच्या आणि शक्तीच्या आश्रयानें चालवितें; तें नेहमीं स्वत:ला जाणतें, स्वत:चा स्वत: विकास घडवितें; कल्पनेच्या पोटीं स्वभावत:च इच्छाशक्ति असते, त्या शक्तीच्या बळावर तें आपला विकास करून घेतें; त्याच्या प्रत्येक प्रेरणेच्या पोटीं स्वभावत: असलेल्या ज्ञानाच्या बळावर तें आपला आविष्कार करीत असतें. निर्मिति व विकास हा असा चालतो. सर्व निमितीचें, सर्व विकासाचे वास्तव स्वरूप वर दर्शविल्याप्रमाणें असतें.
अतिमानसांत अस्तित्व, ज्ञानाची जाणीव व इच्छाशक्तीची जाणीव या गोष्टी विभागलेल्या नसतात; आमच्या मानसिक क्रियांमध्यें या गोष्टी अलग अलग भासतात; खरोखरी त्या तिन्ही मिळून एक वस्तु होते; तीन परिणामकारक अंगांची एकच कृति, तीन परिणामकारक घटकांचा एकच व्यापार या अस्तित्वादि त्रितयीनें व्यक्त होतो; प्रत्येक अंगाचा स्वतंत्र परिणाम असतो -- अस्तित्वामुळें त्या व्यापारांत द्रव्यत्वाचा परिणाम, जाणिवेमुळें त्यांत ज्ञानाचा परिणाम, स्वत:चें मार्गदर्शन करणाऱ्या, स्वत:ला आकार देणाऱ्या कल्पनेचा परिणाम, सर्वसमावेशक आणि सर्वस्पर्शी ज्ञानक्रियेचा परिणाम, इच्छाशक्तीमुळें त्या व्यापारांत स्वत:ची योजना-परिपूर्ति करणाऱ्या शक्तीचा परिणाम -- अशा विविध परिणामांचा
पान क्र. २४३
एक व्यापार, अतिमानसाच्या अस्तित्वादि त्रितयाच्या एकतेमुळें व अविभक्ततेमुळें घडून येत असतो. मूळ सद्वस्तु प्रकाशमय असते, या सद्वस्तूचा जो प्रकाश किंवा जें ज्ञान, त्यालाच कल्पना म्हटलें आहे; हें ज्ञान किंवा कल्पना म्हणजे, मानसिक विचार किंवा मानसिक कल्पना नव्हे; हें ज्ञान किंवा कल्पना म्हणजे सत्याची परिणामकारक आत्मजाणीव होय. ही कल्पना सत्य-कल्पना (Truth Idea) होय.
अतिमानस अवस्थेंत कल्पनेंत (Idea) जें ज्ञान असतें, तें त्या कल्पनेंतील इच्छाशक्तीपासून वेगळें निघालेलें नसतें; कल्पनेंतील ज्ञान अस्तित्वाशीं किंवा वस्तुद्रव्याशींहि एकरूप असतें. द्रव्याची प्रकाशमय शक्ति हेंच त्या ज्ञानाचें स्वरूप असतें; वस्तुद्रव्यापासून तें वेगळें निघालेलें नसतें. ज्याप्रमाणें अग्निद्रव्यापासून दाहक प्रकाशशक्ति वेगळी नसते, त्याप्रमाणें कल्पनेच्या शक्तीची गोष्ट आहे; जें मूळ अस्तित्व विस्तारप्रक्रियेनें कल्पनेचें आणि कल्पनेच्या विकासाचें रूप घेतें, त्या अस्तित्वाच्या घटकद्रव्याशीं कल्पनेंतील शक्ति एकरूप असते, त्या द्रव्यापासून वेगळी असत नाहीं. आमच्या मनाची स्थिति अगदीं निराळी आहे. आमच्या मनांत एक कल्पना येते, त्या कल्पनेला अनुरूप अशी इच्छा होते, किंवा आमच्या मनांत इच्छेची विशिष्ट प्रेरणा होते आणि त्या प्रेरणेंतून एक विशिष्ट कल्पना वेगळी होऊन मनांत उभी राहते; परंतु एक गोष्ट आम्ही न चुकतां करतों, ती ही कीं, कल्पना वेगळी, इच्छा वेगळी आणि आम्ही दोन्ही गोष्टींहून निराळे, हा सर्वांना स्पष्टपणें अलग अलग वस्तु समजणारा विचार, आम्ही सत्य मानतों. आमच्या मनाच्या दृष्टीनें वरील तीन वस्तू एकमेकींपासून अगदीं स्वतंत्र, अलग आहेत. मी आहे; माझ्यामध्यें कल्पना उदयास येते, ती कांहीं एखादी वस्तु नव्हे, ती केवळ एक भावना, गूढ वस्तुगुणरूप गोष्ट आहे; इच्छा ही माझ्यांत उदयास येणारी एक दुसरी गूढ गोष्ट आहे; वस्तुद्रव्याजवळ असलेली परंतु वस्तु नव्हे अशी शक्ति म्हणजे ही इच्छा आहे; पण एक गोष्ट निश्चित कीं, कल्पना असो वा इच्छा असो, या गोष्टी म्हणजे मी नव्हे, या गोष्टी मीपासून निराळ्या -- या मजमध्यें असतात, येतात, मला एकाएकीं सुचतात, भंडावतात; पण मी वेगळा व त्या वेगळ्या. माझी इच्छाशक्ति, तिचें साधन व तिचा परिणाम या गोष्टीहि 'मी' एकमेकींपासून निराळ्या समजतों; त्या एकमेकींमध्येंहि मोठी दरी 'मी' निर्माण करतो; इच्छेचीं साधनें, त्या इच्छेचे परिणाम म्हणजे माझ्या बाहेर
पान क्र. २४४
असणाऱ्या, मजपासून वेगळ्या सत्य वस्तू आहेत असें 'मी' मानतो. अर्थात् मी स्वत:, माझ्यांत उद्भवणारी कल्पना किंवा इच्छा यांपैकीं कोणीहि स्वत:ची स्वत: परिपूर्ति करूं शकत नाहीं. कल्पना कदाचित् मजपासून दूर होईल, इच्छा कदाचित् मला सोडून जाईल, साधन कदाचित् उपलब्ध होणार नाहीं किंवा या गोष्टींपैकीं एखादी किंवा सर्वच अनुपलब्ध होऊन, मी स्वत: अयशस्वी, अपूर्णकाम होईन -- असा संभव आमच्या मानसिक संसारांत असतो.
अतिमानसिक संसारांत मानसिक संसारासारखी निर्बळ करणारी विभागणी नसते; ज्ञान हें स्वत:मध्यें भाग भाग पाडीत नाहीं. शक्ति स्वतांत तुकडे पाडीत नाहीं, अस्तित्व स्वतांत विभाग करीत नाहीं. या वस्तू स्वत: परिपूर्ण, अखंडित राहतात आणि एकमेकींना धरून एकतेनें असतात; अतिमानस हें बृहत्, अतिमहान्, अति व्यापक, अति विस्ताराचें तत्त्व आहे; एकता किंवा अभेद हा त्या तत्त्वाचा आद्यमंत्र आहे, भेद नव्हे; मूलत: अतिमानस हें सर्वसमावेशक आहे; भेद ही तेथें गौण क्रिया आहे. म्हणून जेव्हां अस्तित्वाचें कोणतेंहि सत्य व्यक्त होत असेल, तेव्हां कल्पना त्या सत्याला अगदीं अनुकूल अशीच असेल, इच्छाशक्तिहि कल्पनेला पूर्ण अनुकूल अशीच असेल आणि परिणाम इच्छाशक्तीला अनुरूप असाच होणार. इच्छाशक्ति ही जाणिवेचें, अर्थात् कल्पनेचें स्वाभाविक सामर्थ्य असतें, म्हणून जेथें कल्पना, तेथें तिला अनुकूल इच्छाशक्ति स्वभावतःच असते. अतिमानसिक संसारांत एक कल्पना दुसऱ्या कल्पनांशीं विसंवादी नसते; त्याचप्रमाणें इच्छा-इच्छांचा किंवा शक्ती-शक्तींचाहि विसंवाद तेथें नसतो. हें सर्व विसंवाद-प्रकरण मनुष्यांत आणि त्याच्या विश्वांत मिळावयाचें; अतिमानसिक जाणीव ही अतिमहान्, अतिव्यापक जाणीव आहे; तिच्याबरोबर स्वभावत: अतिव्यापक इच्छाशक्ति असते -- अतिमानसिक जाणीव ही सर्व कल्पना स्वत:मध्यें समाविष्ट करून असते; सर्व कल्पना तिच्या स्वत:च्या असतात आणि या सर्वांमध्यें योग्य सुसंवादी संबंध ती निर्माण करते; त्याचप्रमाणें अतिमानसिक अतिव्यापक जाणिवेची स्वाभाविक सहचरी जी अति व्यापक इच्छाशक्ति, तिच्या पोटीं सर्व शक्ती तिच्या अंगभूत म्हणून वावरतात आणि या सर्वांमध्यें सुसंवादी संबंध ती निर्माण करते. अतिमानसिक जाणिवेच्या क्षेत्रांत, कल्पना व इच्छा एकोप्यानें काम करतात; ही जोडी अगोदर योजना ठरवून, त्या योजनेनुसार विशिष्ट प्रसंगीं अस्तित्वाचें एखादें सत्य पुढें नेते वा एखादें मागें ठेवते.
पान क्र. २४५
आज रूढ असलेल्या धर्मकल्पनांत ईश्वर हा सर्वव्यापी, सर्वज्ञ व सर्वशक्तिमान् आहे. या ईश्वरविषयक धर्मकल्पनांचें समर्थन वरील अतिमानसिक शक्तीमध्यें सांपडतें. या कल्पना बुद्धीला, विचारशक्तीला सोडून नाहींत; त्या पूर्णपणें बुद्धिसंमत विचारविहित आहेत. सर्वसंग्रही व्यापक तत्त्वज्ञानाचें तर्कशास्त्र किंवा निरीक्षण आणि अनुभव यांना वरील धर्मकल्पना विरोध करीत नाहींत. आमची चूक होते ती ही कीं, ईश्वर आणि मनुष्य, ब्रह्म आणि विश्व यांच्यामध्यें आम्ही सेतुदेखील बांधतां येणार नाहीं अशी, दोघांना एकमेकांपासून कायमचें दूर ठेवणारी महान् दरी आमच्या कल्पनेनें उभी करतों. या चुकीमुळें असें होतें कीं, अस्तित्व, जाणीव आणि शक्ति यांच्यामध्यें वास्तवांत व्यवहारासाठीं जे भेद आहेत, त्यांना आम्ही सारभूत मानतों; हे भेद वरवरचे किवा व्यवहारापुरते नसून, मुळांतच अस्तित्वादि वस्तु अलग अलग आहेत असें आम्ही मानतों. या प्रश्नाकडे विशेष लक्ष पुढें केव्हां तरी देऊं. सध्यां एवढेंच ध्यानांत ठेवावयाचें कीं, आपण विचाराच्या मार्गानें दिव्यनिर्मितिशील अतिमानसतत्त्वाची कांहीं कल्पना समजून घेतली आहे आणि हें तत्त्व 'आहे' असें ठरविलें आहे. आमच्या विचारदृष्टीप्रमाणें हें तत्त्व अभेदाधिष्ठित भेदाचें आहे; येथें मूळ अस्तित्व, जाणीव, इच्छाशक्ति आणि आनंद या गोष्टी भिन्न नसून एकरूप आहेत; सर्व कांहीं या चतुर्मुखी मूळ एकतत्त्वांत एकत्वानें, अभेदानें राहतें. या अभेदनिष्ठ एकतत्त्वामध्यें, भेदाची अनंत अमर्याद शक्ति आहे. ही भेदशक्ति एकतत्त्वाचें एकत्व सांभाळून त्याचा अनंत विस्तार करते. या अनंत विस्तारांत जें द्रव्य आहे, तें सत्याचें आहे, सत्य आहे; मूळ सत्य अस्तित्त्वाचा हा सत्यविस्तार आहे. येथें मूळ सत्य हें कल्पनारूपानें व्यक्त होतें, तेंच सत्य आकारांत व्यक्त होतें; येथें ज्ञान आणि इच्छा अभिन्न सत्यरूप आहेत; मूळ अस्तित्वाचें ज्ञान व इच्छाशक्ति येथें अभिन्न असल्यानें, येथें आत्म-परिपूर्तीचें आणि म्हणून आत्मानंदाचेंहि सत्य राहतें; कारण आनंद हा आत्म-परिपूर्तींत असतो; या वरील कारणांसाठीं येथें नाना प्रकारचे संयोग, नाना प्रकारचीं रूपांतरे घडत असलीं, तरी या सर्व व्यवहारांत सर्वदा स्वयंभू स्वाभाविक अपरिहार्य असा सुसंवाद, मेळ, गोडवां असतो.
पान क्र. २४६
प्रकरण पंधरावें
परात्पर सत्य-संविद्
एक, अतिमानसरूप व सुषुप्तीच्या स्थानीं बसलेला आत्मा, प्रज्ञानाचा आणि प्रज्ञेचा घनीभूत सांठा आहे, तो आनंदमय आहे, आनंदभोक्ता आहे....हाच सर्वेश्वर, हाच सर्वज्ञ, हाच अंतर्यामी, हाच सर्वांचा प्रभव किंवा उगम होय.
- मांडुक्य उपनिषद् ५, ६
अतिमानस किंवा सत्य-संविद्, सत्य-जाणीव हा दिव्य अस्तित्वाचा दिव्य मूळ आत्म्याचा, परात्पराचा स्वभाव आहे; ही सत्य-संविद् सर्व-समावेशक, सर्व-जनक, सर्व-परिपूरक आहे. दिव्य अस्तित्वाचें किंवा आत्म्याचें सर्वातीत, केवळ, निःसंबंध, निष्क्रिय व स्वयंसिद्ध स्वरूप अर्थात् अतिमानसयुक्त नाहीं; स्वतःच्या विश्वांचें निर्माण करणारें आणि त्यांचें स्वामित्व करणारें जें त्या दिव्य आत्म्याचें सक्रिय स्वरूप, त्या स्वरूपाचा किंवा त्या क्रियाशील स्वरूपांतील दिव्य आत्म्याचा स्वभाव, सत्य-संविद्, सत्य-जाणीव किंवा अतिमानस हा आहे. आम्ही ज्याला ईश्वर म्हणतों, त्या संबंधीचें हें सत्य आहे. तो सत्य-जाणिवेचा मूळ, दिव्य आत्मा आहे. हा ईश्वर आणि पाश्चात्यांनीं कल्पिलेला ईश्वर वेगळे आहेत; पाश्चात्यांचा ईश्वर एक मर्यादित शक्तीची व्यक्ति आहे. तो मोठा केलेला निसर्गाच्या बाहेर, वरतीं, उंच असलेला एक मनुष्य आहे; मनुष्याचा 'मी' आणि सृष्टि निर्माण करणारें विज्ञान किंवा अतिमानस यांच्या परस्परांतील एका विशिष्ट नात्याची, मनुष्याला बरीच जवळ असणारी, महामानवी प्रतिमा वा छाया पाश्चात्यांच्या ईश्वरांत दिसते. ईश्वराला जी वैयक्तिक बाजू आहे, ती आपल्याला दुर्लक्षितां येत नाहीं. अव्यक्तिता किंवा सर्वता ही जशी अस्तित्वाची एक बाजू आहे, तशी व्यक्तिता पण दुसरी बाजू आहे; ईश्वर सर्व अस्तित्व आहे, त्याप्रमाणें तो एकमेव
पान क्र. २४७
सद्वस्तु आहे; एक आत्मा आहे; तो एकच एक ज्ञानमय अस्तित्व आहे--तसेंच अस्तित्व असलेला तो एक आत्मा आहे. पण सध्यां आपल्याला ईश्वराच्या व्यक्तित्वाकडे बघावयाचें नाहीं; दिव्य जाणिवेचें मानसिक, अव्यक्तिक, व्यक्तित्वातीत, सार्वत्रिक सत्य खोलपर्यंत समजून घेण्याचा, त्याचें पूर्ण मोजमाप करण्याचा आपण सध्यां प्रयत्न करीत आहों. त्याच्या महत्त्वाला अनुरूप अशी विस्तृत, स्पष्ट कल्पना निश्चित करण्याच्या उद्योगांत आपण सध्यां आहोंत.
सत्य-संविद् विश्वांत सर्वत्र विद्यमान आहे, व्यवस्था करणारें आत्मज्ञान हें त्याचें स्वरूप सर्व ठिकाणीं असतें, मूळ एकतत्त्व हें या सत्य-संविदेच्या आश्रयानें, त्याच्या ठिकाणीं शक्यतेच्या रूपांत असणाऱ्या अनंत, सुसंगत व सुसंवादपूर्ण रचना व्यक्त करतें. हें आत्मविषयक, व्यवस्था लावणारें ज्ञान जर नसतें, तर एकतत्त्वापासून जी अभिव्यक्ति झाली असती, ती व्यवस्थाशून्य, कोठें तरी कशी तरी वाहवणारी अशी झाली असती; एकतत्त्वाच्या अभिव्यक्तीची शक्यता असीम अनन्त असल्यानेंच, व्यवस्थातत्त्वाच्या अभावीं असीम आकस्मिकतेचा, अनियंत्रित यदृच्छेचा अनागोंदी पसारा चोहोंकडे आम्हांस दिसला असता. रचनांची अनंत शक्यता आहे पण त्यामध्यें मार्गदर्शक सत्याचा नियम किंवा सुसंवादपूर्ण आत्म-दर्शनाधिष्ठित रचनेचा नियम मात्र उपलब्ध नाहीं, अशी जर स्थिति असती, तसेंच विकासाकरितां व वाढीकरितां विकासक्षेत्रांत टाकलेल्या वस्तूच्या बीजाच्या पोटीं विकासाची पूर्वयोजना विद्यमान् नसती, तर विश्व हें प्रचंड, आकारशून्य व अश्चिततापूर्ण गोंधळाचा देखावा झाला असता. परंतु निर्माण करणारें जें ज्ञानतत्त्व आहे, त्यानें निर्माण अथवा व्यक्त केलेलें सर्व कांही त्यानें दुसऱ्या कोठून आणलेलें नसून स्वत:तूनच बाहेर काढलेलें असतें; त्याच्या स्वत:च्या शक्ती, त्याचे स्वत:चे आकार हेच त्या ज्ञानतत्त्वानें व्यक्त केलेले असतात; अर्थात् जी जी शक्यता किवा बीज, या ज्ञानतत्त्वाला विकसित करावयाचें असतें, त्या बीजाला लागूं असणारा सत्याचा विकासनियम, त्याला स्वत:चे ठिकाणीं स्पष्ट दिसत असतो; त्याचप्रमाणें प्रत्येक बीजाचें दुसऱ्या बीजाशीं असणारें नातेंहि त्याला स्वभावत:च अवगत असतें आणि या सर्वांपासून कोणत्या सुसंगत रचना होऊं शकतात, तेंहि या निर्मायक ज्ञानतत्त्वाला स्पष्ट दिसत असतें. विश्वाची सुसंगत, संपूर्ण कल्पना व योजना त्याच्या समोर असते. त्या योजनेंत सर्वसामान्य रचनासौष्ठवाबरोबर वर सांगितलेली प्रत्येक
पान क्र. २४८
बीजाची विकासयोजना चितारलेली असते; विश्वाच्या निर्मितीला कारण असणारें ज्ञान, याप्रमाणें विश्वाचें पूर्ण सुसंवादी चित्र आपल्या स्वतःच्या ठिकाणीं आंखून काम करीत असल्यानें, या चित्राचे घटक हे पूर्वयोजनेनुसार एकमेकांवर क्रिया-प्रतिक्रिया करीत राहून, अखेर पूर्वनियोजित सुसंवादी रचनासंभार अटळपणें उभा करतात; सृष्टिनिर्मिति करणारें ज्ञान हेच सृष्टींतील कायद्याचा उगम आहे, तेंच हा कायदा कार्यान्वित करून नेहमीं तो चालवितें; हा कायदा अर्थात् लहरी स्वैरपणा नसतो; व्यक्त होणाऱ्या वस्तूचा जो स्वतःचा स्वभाव असतो, त्याचें प्रकट रूप म्हणजे हा कायदा. प्रत्येक वस्तु तिच्या आरंभींच्या स्वरूपांत सत्य-कल्पनारूप असते. या वस्तुगत सत्यकल्पनेच्या पोटीं जें अवश्य कार्यकारी सत्य असतें, त्या सत्यानेंच वस्तूचा स्वभाव ठरत असतो. या स्वभावाचें प्रकट रूप म्हणजे त्या वस्तूचा विकास-नियम--विकासाचा कायदा होय. तेव्हां, आरंभापासूनच विश्वनिर्मितीचा सर्व व्यापार पूर्वनियोजनाप्रमाणें चालतो. तो व्यापार मूळ जाणीवयुक्त अस्तित्वाचा विकास असल्यानें, त्याचा विकासक्रम त्या अस्तित्वाच्या आत्मज्ञानांत अंतर्भूत असतो; या आत्मज्ञानानुसार तो चालतो. प्रत्येक क्षणीं जें विकासकार्य घडतें, तेंहि स्वकृत कार्याच्या स्वरूपाचें असतें; पूर्वनियोजनानुसार तें चालतें. विश्वव्यापाराच्या पोटीं प्रत्येक क्षणीं जें विवक्षित, स्वाभाविक मूळ विकाससत्य असेल, त्याप्रमाणें जें विकासकार्य अवश्य घडावयास पाहिजे तेंच घडत असतें. दुसऱ्या क्षणीं त्या अंतर्गत मूळ सत्याच्या प्रेरणेनें, ज्या बिंदूकडे विकासकार्य जावयास पाहिजे, तिकडे तें जातें आणि शेवटीं विश्वबीजांत जें नियोजनपूर्वक सांठविलें होतें, तें नियोजनानुसार प्रकट होणार हें निश्चित आहे.
विश्वाचा विकास, विश्वाची प्रगति ही त्याच्या स्वतःच्या अस्तित्वाच्या विकसित मूळ सत्याला धरून चाललेली असते हें आपण पाहिलें. ही अशी प्रगति होण्यासाठीं कालाचा अनुक्रम अवश्य आहे, स्थलाशीं संबंध अवश्य आहे; स्थलांतील संबंधित वस्तूवस्तूंमध्यें नियमबद्ध क्रिया-प्रतिक्रिया अवश्य आहे; कालानुक्रमानें या स्थलांतील वस्तुसंबंधाला कार्यकारणसंबंध असें स्वरूप येतें. काल आणि स्थल (अवकाश, आकाश) या वस्तू सत्य द्रव्यसृष्टींतील नसून, कल्पना-सृष्टींतील आहेत असें तत्त्वज्ञानी म्हणतात; परंतु खरी गोष्ट अशी आहे कीं, केवळ काल आणि स्थल नव्हे, तर सर्वच वस्तू मूळ ज्ञानमय आत्म्यानें (जाणीवयुक्त
पान क्र. २४९
अस्तित्वानें) आपल्या जाणिवेला दिलेले आकार आहेत; किंवा असें म्हणा, आपल्या जाणिवेच्या क्षेत्रांत आपण स्वत: घेतलेले आकार आहेत. तेव्हां, तत्त्वज्ञानी लोकांनीं काल, स्थल आणि इतर वस्तू यांमध्यें मानलेला भेद तितकासा महत्त्वाचा नाहीं. मूळ ज्ञानमय आत्म्याची स्वतःकडे पाहण्याची एक दृष्टि, काल आणि स्थल यांनीं व्यक्त होते; मूळ आत्मा आपलें एकत्व सांभाळून एकत्वाच्या पोटीं खूप विस्तार पावला, त्यानें महान् आत्मविस्तार केला. हा आत्मविस्तार आंत व बाहेर अशा स्वरूपाचा आहे; कालदृष्टि, ही अंतर्गत आत्मविस्ताराकडे पाहण्याची दृष्टि आहे; स्थलदृष्टि, ही बाह्य आत्मविस्ताराकडे पाहण्याची दृष्टि आहे; मूळ ज्ञानमय आत्माच काल आहे, तोच स्थल आहे; विषयदृष्टीनें तो स्थलरूप आहे, विषय-ज्ञानी, 'विषयी' या दृष्टीनें तों कालरूप आहे; विषय तोच झाला आहे, 'विषयी' तोच झाला आहे. सर्व अनुभव अनुभवण्याचे, काल आणि स्थल हे दोन सांचे आहेत. मनाच्या दृष्टीनें मोजणें, मापणें या त्याच्या क्रियेंतून हे सांचे निर्माण झाले आहेत. मनाचा स्वाभाविक व्यापार पृथक्करणाचा, विभाग करण्याचा. या व्यापाराला मोजमापाची अनिवार्य आवश्यकता आहे; मनाच्या दृष्टीनें काल हा आत्म्याचा हलता-फिरता विस्तार आहे; भूत, वर्तमान, भविष्य या अनुक्रमानें, या कालविभागणीनें हा हलता विस्तार मापला जातो; या क्रियेच्या व्यवहारांत मन एका विशिष्ट कालबिंदूंत उभें राहून, कालदृष्ट्या आपल्यामागें, आपल्यापुढें नजर टाकतें; स्थल हा स्थायी विस्तार आहे; येथें द्रव्य विभागतां येतें, द्रव्याची ही विभजनक्षमता स्थायी विस्ताराचें मोजमाप करावयास उपयुक्त ठरते; स्थायी विस्ताराचें विभाजन करतांना, मन एका स्थलबिंदूंत उभें राहून, आपल्या सभोंवर पसरलेल्या द्रव्याचा अंदाज घेतें व त्याचें मोजमाप करतें.
व्यवहारांत वस्तुस्थिति अशी आहे कीं, घटना ही कालाचें मोजमाप करण्याचें साधन म्हणून मन वापरतें आणि द्रव्याच्या साधनानें तें स्थलाचें मोजमाप करतें. परंतु घटना आणि द्रव्याची मांडणी यांचा उपयोग न करतां, काल व स्थल यांचा समावेश असलेली ज्ञानयुक्त शक्तीची शुद्ध क्रिया, शुद्ध मनाला जाणतां व अनुभवतां येणें शक्य आहे. काल आणि स्थल विश्वव्यापक जाणीवशक्तीच्या दोन बाजू आहेत; कापडाचे उभे-आडवे धागे असावे, त्याप्रमाणें जाणिवेच्या या दोन अंगांचे अन्योन्यसंबंधीं गुंतागुंतीचे क्रिया-प्रतिक्रियारूप व्यापार, जाणिवेचें स्वतःवर होणारें कार्य
पान क्र. २५०
घडवून आणतात. काल आणि स्थल यांचें हें स्वरूप शुद्ध मनाच्या लक्षांत येऊं शकतें. व्यवहारी मन हें घटनांच्या साधनानें काल मोजतें, द्रव्यानें स्थल मोजतें. शुद्ध मनाच्या आणि व्यवहारी मनाच्या पलीकडे जी श्रेष्ठ जाणीव आहे, तिला मनाला अनुभवाला येणारें भूत, वर्तमान, भविष्य एकाच दृष्टिक्षेपांत समोर दिसतें; ही जाणीव कालाच्या या तीन विभागांत विभागलेली किंवा सामावलेली नसून, हें तीन विभाग त्या जाणिवेच्या पोटीं सामावलेले आहेत. कालाच्या विवक्षित क्षणीं बसून, तिला कालदर्शनासाठीं इकडे तिकडे नजर टाकावी लागत नाहीं; अशा श्रेष्ठ जाणिवेला काल हा शाश्वत वर्तमानरूप असतो. त्याचप्रमाणें या जाणिवेला सर्व स्थानबिंदू सर्व प्रदेश तिच्या पोटीं असल्यानें, स्थलाच्या एखाद्या बिंदूवर उभें राहून, स्थलदर्शनासाठीं मागें पुढें पहावें लागत नाहीं आणि म्हणून तिला कालाप्रमाणेंच स्थलहि आपल्या आंतला विस्तार, अविभाज्य, अविभक्त असा अंतर्गत विस्तार वाटणें स्वाभाविक आहे. आपल्या जीवनांत असे क्षण येतात कीं, जेव्हां विश्वांतील विविध व्यापारांना, आपल्या जाणीवयुक्त आत्मगत अविभाज्य एकतेच्या पोटीं सामावून घेणारी व्यापक ज्ञानदृष्टि आपल्याला येते. काल आणि स्थल यांच्या अंतर्गत असणाऱ्या वस्तू, त्या ज्ञानदृष्टीला कालस्थलातीत, तात्विक सत्यस्वरूपांत दिसणार--त्या कशा दिसत असतील याचा विचार सध्यां अप्रस्तुत आहे. आपल्या मनाला या गोष्टीची कल्पना करणें देखील अशक्य आहे. आमच्या मनाला किंवा इंद्रियांना विश्वाचें जें ज्ञान होतें त्याहून निराळ्या प्रकारचें ज्ञान या एकतामय व अविभाज्य ज्ञानदृष्टीला होणें शक्य आहे, ही गोष्ट देखील आमचें मन मान्य करूं शकत नाहीं.
अतिमानस आपल्या व्यापक समावेशक रूपांत, कालाचे अनुक्रम व स्थलाचे विभाग अंतर्भूत करून घेतें आणि त्यांच्यांत एकता, अविभक्तता आणतें. कारण अतिमानसाला एका दृष्टिक्षेपांत सर्व स्थल-काल आणि त्यांचा व्यापार दिसतो; त्याची जाणीव सर्व कांहीं सामावून घेणारी आहे, ही गोष्ट समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. विचाराचे थोडे कष्ट केल्यानें ही गोष्ट आम्हांला समजू शकेल. आतां प्रथम 'कालाचा अनुक्रम' ही बाब नाहींच अशी कल्पना करूं. बदल, प्रगति ही क्रमयुक्त काल-कल्पनेचा परिणाम असल्यानें, क्रमयुक्त काल नसेल तर बदल नाहीं, प्रगति नाहीं; त्यामुळें विश्वांत पूर्ण सुसंगतता शाश्वत काल व्यक्त होत
पान क्र. २५१
राहील; अनेक सुसंगत घटना जणुं एकाच शाश्वत क्षणांत, एकाच वेळीं आपल्याला दिसतील; कांहीं भूतकालीन व कांहीं भावी असा प्रकार दिसणार नाहीं. पण मनाला क्रमयुक्त काल असल्यामुळें, अतिमानसाला घडणारें दर्शन आणि मनाला घडणारें दर्शन यांत अंतर आहे. आम्हांला विश्वाची सुसंगत घटना एका दृष्टिक्षेपांत दिसत नाहीं, विकासशील घटना दिसते, सुसंगतीचा एक घटक आतां, एक नंतर, याप्रमाणें सारखा क्रम नित्य चाललेला प्रत्ययास येतो, एका घटकांतून दुसरा घटक निघतांना दिसतो, नंतरच्या घटकांत पूर्वींचा घटक गुप्त होऊन बसतो. ही कालाची गोष्ट झाली. आतां, विभागतां येण्याजोगें स्थल, ही गोष्ट नसती व विश्वाचें आत्म-अभिव्यक्तीचें कार्य चाललें असतें, तर आकारांआकारांत असलेले संबंध बदलणें, शक्तीशक्तींचा अन्योन्यांवर आघात प्रत्याघात होणें या गोष्टी घडल्या नसत्या; सर्व कांहीं एकाच वेळीं एकाच रूपांत अस्तित्वांत असलेलें प्रत्ययास आलें असतें-कांहीं क्रिया घडून अस्तित्वांत येणें, हा प्रकार दिसला नसता. स्थलाभावीं मूळ आत्मजाणीव आपल्या अंतरांत सर्व वस्तू सामावून राहिली असती. एकादा विश्वकवि हा विश्वस्वप्नदर्शी असावा आणि त्याच्या अंतरांत सर्व विश्व असावें, तसें सर्व विश्व आमच्या आंतरात्म्यांत सामावलेलें प्रत्ययास आलें असतें. बाह्य आत्म-विस्तार आणि त्या विस्तारांत वस्तूवस्तूंत आत्म-जाणीव विभागून राहिलेली, अशी परिस्थिति घडली नसती--कारण स्थल-कल्पनेच्या पोटीं हा प्रपंच शक्य असतो, एरव्हीं शक्य असत नाहीं. विश्व-वस्त्राचा ताणा-बाणा जो स्थल आणि काल, त्याचा अभाव कल्पिल्यानें विश्व कसें दिसलें असतें तें सांगितलें. आतां, काल सत्य आहे, पण स्थल नाहीं अशी कल्पना करून काय होतें तें पाहूं. काल आहे अर्थात् कालक्रम आहे; या कालक्रमाच्या आधारानें विश्वविकास व्हावयाचा, तर त्यांत स्थलाचा गोंधळ नसल्यानें, या सरळ असंकीर्ण विकासाची एक पायरी दुसऱ्या पायरींतून सहजपणें आंतरात्म्यांत उदयास येत जाईल. वाद्याचे ध्वनितरंग एकांतूनएक, एकसारख्या अविरत क्रमानें निघत रहावे किंवा कवीच्या मनांत एकामागून एक प्रतिमा व्यक्त होत रहाव्या, त्याप्रमाणें विश्वघटना सुसंगतपणें, क्रमवार व्यक्त होत रहातील. परंतु काल आणि स्थल दोन्हीहि सत्य असल्यामुळें, आम्हांला जो विश्वविकास प्रत्ययास येतो, त्यांत कालक्रम हा आकार आणि शक्ति यांच्या स्वरूपांत सुसंगत घटना निर्माण करतो आणि हे आकार व या शक्ती सर्वसमावेशक,
पान क्र. २५२
स्थलात्मक आत्मविस्ताराच्या क्षेत्रांत कांहीं विशिष्ट संबंधांनीं एकमेकींशीं बांधलेल्या असतात; म्हणजे अस्तित्वाच्या बाह्य क्षेत्राचें जें दर्शन घडतें, त्यांत वस्तूंच्या आणि घटनांच्या प्रतिमा आणि शक्ती अविरतपणें एकीपाठीमागून दुसरी अशा सारख्या उदय पावतांना आम्हांला दिसतात.
काल आणि स्थल यांच्या या विश्वरूप क्षेत्रांत, भिन्न भिन्न शक्यता, वस्तुबीजें व घटनाबीजें यांना आकार देण्यांत येतो; त्यांना स्थान देण्यांत येतें आणि त्यांचें अन्योन्यसंबंध ठरविण्यांत येतात. अर्थात् प्रत्येक वस्तुबीज आपल्या प्रकट आणि अप्रकट शक्तींसह दुसऱ्या वस्तुबीजांशीं जणुं सामना करीत असतें; याचा परिणाम असा होतो कीं, कालक्रमानें ज्या वस्तू एकामागून एक उदयास येतात, त्या मनाच्या दृष्टीनें स्वाभाविक स्वयंस्फूर्त क्रमवारीनें उदयास येत नसून, एकमेकींशीं झगडून पुढें होतात. खरें पाहतां, व वस्तूंच्या पोटीं त्यांच्या विकासाचा जो ज्ञानमय नियम असतो, तदनुसार स्वयंस्फूर्तरीतीनें वस्तूंचा विकास होत असतो. बाह्यतः जो झगडा आणि संघर्ष दिसतो, ती स्वाभाविक अंतर्विकासाची वरवरची गौण बाजू असते. एक आणि समग्र असें जें मूळतत्त्व आहे, त्याच्यांत स्वभावत: पूर्ण सुसंगति, सुमेळ असणार. या सुसंगत पूर्णतत्त्वाचा अंतर्यामींचा, अंतःस्वभावस्थ नियम, हाहि सुसंगतिपूर्ण असणार; त्या एकतत्त्वाचे जे भाग होतात, जीं रूपें होतात, त्यांच्या बाह्य प्रक्रियाविषयक नियमांवर या एकतत्त्वाच्या सुसंवादी अंतर्नियमाची यंत्रणा असते. हे भाग, हे आकार आम्हांला एकमेकांशी झगडतांना दिसतात; पण हा फक्त बाह्य देखावाच असतो. अतिमानस दृष्टीला, एकतत्त्वगत सर्वशासक सुसंवादाचे श्रेष्ठ आणि गूढ सत्य नेहमीं स्पष्ट दिसतें. मनाला जी गोष्ट दर्शनीं विसंवादपूर्ण वाटते, ती त्याला तशी वाटण्याचें कारण, प्रत्येक वस्तु स्वतंत्र, दुसऱ्या सर्व वस्तूंपासून अलग आहे, अशा कल्पनेनें मन त्या गोष्टीचा विचार करतें हें होय. वस्तुत: अतिमानसाच्या दृष्टीनें, विश्वरचना ही एक सुसंगत विकासशील रचना आहे. विश्वरचनेंत प्रत्येक क्षणीं सुसंगतपणा वसत असतो. मनाला दर्शनीं विसंगत, विसंवादी दिसणारी गोष्ट, ही या नित्य विश्वरचना-सुसंवादाचें एक आवश्यक अंग असते. अतिमानस हें विश्वाकडे अविभक्त दृष्टीनें पाहतें--एकच अनेक झालें आहे, होत आहे, अनेक एकाचेंच व्यक्तीकरण आहे हीं गोष्ट अतिमानसाला स्पष्ट दिसते; एका दृष्टिक्षेपांत भूत, भविष्य वर्तमान विश्व पाहण्याची शक्ति अतिमानसांत असल्यानें, त्याच्या दृष्टीला
पान क्र. २५३
मनाप्रमाणें विसंवादाचा अनुभव या विश्वपसाऱ्यांत येत नाहीं. मनाला फक्त विवक्षित काल आणि विवक्षित स्थल दिसतें; या कालांत, स्थलांत, 'घडून येण्याचा अधिक संभव असलेल्या' अनेक गोष्टी एकमेकींत मिसळलेल्या, एकमेकांत गोंधळ करीत असलेल्या त्याला दिसतात; म्हणजेच त्याला विसंवाद, विरोध व झगडा दिसतो. अतिमानसाची गोष्ट निराळी आहे; अतिमानस ही दिव्य ईश्वरी जाणीव आहे. तिला काल आणि स्थल यांचा अखिल विस्तार-पट दिसतो; मनाला दिसणाऱ्या सर्व संभवनीय गोष्टी आणि त्याला न दिसणाऱ्याहि कितीतरी अधिक संभवनीय गोष्टी तिला दिसतात; कोठेंहि चूक, चांचपडणें किंवा गोंधळ तिला दिसत नाहीं; याचें कारण, प्रत्येक संभवनीय गोष्टीची विकासशक्ति काय आहे, तिची मूलभूत निकड कोणती आहे, तिची इतर संभवनीय गोष्टींशीं योग्य नातीं कोणतीं आहेत, हें तिला दिसतें आणि प्रत्येक संभवनीय गोष्ट क्रमाक्रमानें विकसित होत, शेवटीं तिचें स्वरूप काय होणार आहे, या क्रमविकासाचे काल, स्थल, परिस्थिति या दृष्टीनें टप्पे कोणते आणि शेवटीं जें तिचें स्वरूप व्हावयाचें तें केव्हां, कोठें व कोणत्या परिस्थितींत वास्तवांत येणार आहे, हें सर्व अतिमानस दिव्य जाणिवेला स्पष्ट दिसत असतें. सर्व गोष्टी स्थिरपणे पाहणें व एका दृष्टिक्षेपांत समग्रतेनें पाहणें हें मनाला शक्य नाहीं; परंतु अशी स्थिर व्यापक समग्र दृष्टि हा, मनापलीकडे असलेल्या अतिमानसिक जाणिवेचा मात्र आंतरिक प्राकृतिक स्वभावच आहे.
अतिमानस स्वतःचे जे आकार आपल्या जाणीवशक्तीच्या द्वारां घडवितें, ते सर्व त्याच्या पोटीं सामावलेले असतात; ते सर्व स्वतःच्या पोटीं त्याला स्पष्ट दिसतात; शिवाय अतिमानसिक जाणीव या सर्व आकारांनाहि आंतून व्यापून असते; या विविध आकारांच्या पोटीं ती, आत्मप्रकाशक ज्योतीच्या स्वरूपांत, त्या आकारांना मार्गदर्शक म्हणून राहते. विश्वाच्या प्रत्येक आकारांत, प्रत्येक शक्तींत अतिमानस गुप्तपणें राहतें; आकार, शक्ति व विशिष्ट क्रिया हें सर्व अतिमानस स्वयंस्फूर्तपणें आणि सार्वभौमपणें ठरवितें; ज्या परिवर्तनाच्या व भिन्नतेच्या गोष्टी तें ठरवितें आणि आपल्या छंदानुसार घडवितें, त्या सर्वांना मर्यादा घालण्याचें काम पण तेंच करतें; तें जी शक्ति उपयोगांत आणतें, ती एके ठिकाणीं आणणें, विखरून पसरविणें किंवा कमी-अधिक करणें हीं कामेंहि तेंच करतें आणि हें सर्व तें त्या प्राथमिक आद्य नियमानुसार
पान क्र. २५४
करीत असतें. आकाराच्या जन्मक्षणीं, शक्तीच्या कार्यारंभक्षणीं तो नियम त्याच्या आत्मज्ञानानें ठरवून दिलेला असतो. (वेदामध्यें एका ठिकाणीं म्हटलें आहे : देवता आद्य नियमानुसार वागतात; हे नियम मूळतत्त्वाचे आणि म्हणून सर्वशासक असतात; वस्तूंच्या सत्य अंतस्तत्त्वानें निश्चित केलेला जो नियम, तोच आद्य नियम होय.) अतिमानस सर्व भूतांच्या हदयीं त्यांचा ईश्वर म्हणून वास करतें; यंत्रारूढ करून वस्तूंना फिरवावें त्याप्रमाणें मायाशक्तीनें तें सर्व भूतांना हिंडवीत असतें. (गीता १८-६१;) सर्व भूतांच्या पोटीं तें असतें आणि सर्वांना तें व्यापून असतें. दिव्य द्रष्टा (कवि) तेंच आहे; त्यानें सर्व वस्तू विविध रीतीनें विश्वांत स्थापिल्या आहेत व त्यांना विविध वर्तन-नियम त्यानें घालून दिले आहेत; प्रत्येक वस्तूला तिचें तत्त्व पाहून योग्य तें स्थान त्यानें दिलें आहे व योग्य तो नियम तिला लावून दिला आहे; ही व्यवस्था त्यानें शाश्वतची केली आहे. (ईश-उपनिषद् ८ वा श्लोक)
तेव्हां निसर्गातील प्रत्येक वस्तु, मग ती सजीव असो वा जड असो, मानसिक आत्मजाणिवेनें युक्त असो वा नसो, तिचें अस्तित्व, जीवन व तिचे व्यापार, त्या वस्तूच्या अन्तरंगांत वसत असलेल्या सर्व-दर्शी ज्ञानानें व सर्वसमर्थ शक्तीनें नियंत्रित केलेले असतात; आमच्या मनाला या ज्ञानाचें व शक्तीचें दर्शन घडत नसल्यानें, त्यांना आम्ही अधोमानसिक ज्ञान व शक्ति म्हणतों, नेणीवव्याप्त ज्ञान व शक्ति म्हणतों--पण हें ज्ञान व सामर्थ्य स्वतःला नेणीवव्याप्त असत नाहीं किंवा तें अधो-मानसिकहि असत नाहीं; तें मनाहून श्रेष्ठ, सर्वव्यापी, सखोल, आत्मजाणीवयुक्त असें ज्ञान व सामर्थ्य असतें. अशी वस्तुस्थिति असल्यामुळेंच प्रत्येक वस्तु, तिचें ठिकाणीं बुद्धि दिसत नसतांहि बुद्धीनें करावें तसें काम करीत असते; वनस्पति, मनुष्येतर प्राणी व मनुष्य सर्वजण त्यांच्या अंतरांत असलेल्या दिव्य अतिमानसाच्या सत्यात्मक कल्पनेच्या आदेशानुसार वागतात; वनस्पति व मनुष्येतर प्राणी, त्यांच्या कमी-अधिक अधोमानसिक जाणिवेच्या मध्यस्थीनें वरील आदेश घेतात व पाळतात; मनुष्य अर्धवट अशा (मानसिक) जाणिवेच्या मध्यस्थीनें वरील आदेश घेतो व पाळतो. सर्व वस्तूंच्या अंतरीं राहून, त्यांजवर सत्ता चालवणारें ज्ञान किंवा प्रज्ञा हें मानसिकज्ञान नसतें, मानसिकप्रज्ञा नसते; अस्तित्व आणि ज्ञान अविभाज्यपणें ज्या मूळ सद्रूपांत एकत्र असतात, त्या अस्तित्वाचें, त्या सद्रूपाचें स्वतःला पूर्णतया जाणणारें सत्य-थोडक्यांत, सत्याची
पान क्र. २५५
आत्म-जाणीव-सत्यजाणीव ही सर्व वस्तूंच्या अन्तरीं राहून, त्यांजवर सत्ता चालवीत असते; या सत्य-जाणिवेला, सत्य-प्रज्ञेला विचार करून निर्णय घ्यावे लागत नाहींत; आत्मपरिपूर्ति करणाऱ्या एकच एक मूळ अस्तित्वाचा, सद्रूपाचा व अचूक आत्मज्ञान आणि आत्मसामर्थ्य यांचा सांठा तिला उपलब्ध असल्यानें, त्या अचूक ज्ञान-सामर्थ्याचा वापर करून, ती वस्तुव्यवस्था करीत असते. मानसिक प्रज्ञा ही विचार केल्याशिवाय काम करूं शकत नाहीं; कारण मूळ सत्य-प्रज्ञेचें केवळ प्रतिबिंब मानसिक प्रज्ञेच्या रूपानें व्यक्त होतें; तिला खरें ज्ञान असत नाहीं-ज्ञानाचा शोध करणें हें तिचें कार्य असतें; ती कालाच्या आश्रयानें प्रथम एक पाऊल नंतर दुसरें पाऊल, अशीं पावलें टाकीत तिच्याहून श्रेष्ठ अशा ज्ञानाचें- प्रज्ञेचें कार्य समजून घेत असते; त्या श्रेष्ठ ज्ञानाच्या गुप्त आदेशानुसार वागत असते; हें श्रेष्ठ ज्ञान शाश्वत काल एकतामय आणि समग्र असतें; काल या ज्ञानाच्या पकडींत असतो, पोटांत असतो; भूत-वर्तमान- भविष्य सर्व कांहीं एका दृष्टिक्षेपांत या श्रेष्ठ ज्ञानाला जाणतां येतें, अनुभवतां येतें.
दिव्य अतिमानसाचें पहिलें क्रियातत्त्व हें कीं, तें विश्वव्यापक ज्ञान आहे; सर्वसमावेशक, सर्वव्यापक, सर्वांच्या अन्तर्यामीं रहाणारें, विश्वैकदर्शी, विश्वमय ज्ञान आहे. सर्व वस्तू अस्तित्वदृष्टीनें अतिमानसांत समाविष्ट आहेत; त्याचा क्रियारहित, काल-स्थलरहित आन्तरात्मा हा स्वतःच्या ज्ञानांत, आत्मविषयक ज्ञानांत सर्व वस्तूंचा आत्मस्थ म्हणून संग्रह करून असतो; आणि म्हणून त्याचें क्रियाशील ज्ञानहि सर्वसमावेशक असतें. कालांत व स्थलांत स्वतःला आकार देण्याचें, अर्थात् स्वतःमधील वस्तूंना आकार देण्याचें काम तो आपल्या स्वतःच्या नियंत्रणाखालीं चालवितो; हे कालस्थलबद्ध आकार, ज्ञानविषय किंवा पदार्थ बनून अतिमानसिक आत्मा त्यांचा ज्ञाता बनतो. ज्या ज्ञानाच्या स्वतःवरील क्रियेनें ज्ञाता आणि ज्ञेय ही जोडी निर्माण केली, तें ज्ञान, ती ज्ञानक्रिया या जोडीला जोडणारा दुवा बनते.
अतिमानसिक जाणिवेच्या क्षेत्रांत ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान (क्रिया) या मूलत: एकरूप असतात, वेगळ्या वेगळ्या वस्तू असत नाहींत हें वरील विवेचनावरून उघड आहे. या तीन वस्तू वेगळ्या वेगळ्या आहेत असें आपलें मन मानतें; कारण त्याला असा भेद केल्यावांचून आपलें कार्य करतांच येत नाहीं; असा भेद न मानल्यास मन गतिशून्य होऊन बसेल.
पान क्र. २५६
मी स्वतःकडे जेव्हां मनानें पाहतों, तेव्हां देखील मला माझ्यामध्यें असा त्रिधा भेद कल्पावा लागतो. मी आहे म्हणणारा, मी पाहतों म्हणणारा असा ज्ञाता; या ज्ञात्याचा ज्ञानविषय किंवा ज्ञेय, माझ्यामध्यें जें मी पहात असेन तें, म्हणजे मीच (ज्ञाताच) परंतु 'मी नव्हे' म्हणून बाजूला काढलेला मी, किंवा त्यापैकीं कांहीं अंश; ज्ञान म्हणजे ज्ञाता आणि ज्ञेय यांना जोडणारी क्रिया; या क्रियेनें 'ज्ञाता मी' आणि 'ज्ञेय मी' यांना 'ज्ञानक्रिया मी' हा एकत्र आणून जोडतो. ही जी विभागणीची क्रिया चालते, ती कृत्रिम आहे. व्यवहाराला सोईची म्हणून ती करण्यांत येते; वस्तूंच्या संबंधाचें पायाभूत सत्य या कृत्रिम भेदांत नाहीं, हें उघड आहे. वस्तुत: 'मी ज्ञाता' म्हणजे जाणण्याची क्रिया करणारी जाणीव. ज्ञान (क्रिया) ही सुद्धां ती जाणीवच होय. म्हणजे मीच क्रिया करणारा आहे, ज्ञेयहि मीच आहे. त्या एकाच जाणिवेनें घेतलेला आकार किंवा फेरी--या स्वरूपांतील मी आहे; या तीन दिसणाऱ्या वस्तू, वस्तुत: एकच अविभाज्य अशी वस्तु किंवा क्रिया आहेत; दिसतांना त्या विभागल्या सारख्या दिसतात एवढेंच; तीन रूपें जरी दिसलीं, तरी जाणीव ही वस्तु आणि क्रिया, तिहींमध्यें वांटून दिलेली नाहीं--दिसावयास मात्र, एक वस्तु व क्रिया तीन ठिकाणीं वाटून दिली आहे आणि म्हणून तीन वस्तू किंवा क्रिया वेगळ्या आहेत असें दिसते. हें खऱ्या एकतेचें ज्ञान मनाला विचारानें आत्मसात् करतां येतें, त्याची भावना तशी होऊं शकते. परंतु बुद्धिपुरस्सर व्यवहार करतांना, त्या व्यवहाराचा पाया म्हणून हें ज्ञान मन सहजासहजीं वापरूं शकत नाहीं. स्वतःसंबंधानें मन काय करतें, काय करूं शकत नाहीं हें सांगितलें. आतां, 'मी' असें ज्या जाणिवेच्या रूपाला नांव दिलें जातें, त्या 'मी' च्या बाहेरचे असणारे पदार्थ पाहिले तर, ते पदार्थ व 'मी' स्वत: एकच आहोंत ही एकता समजणें व्यवहारिक मनाला अधिकच दुर्लभ वाटतें, जवळ जवळ अशक्य कोटींतील वाटतें. अशी एकतेची भावना होणें देखील असामान्य खटपटीनें साधूं शकतें; परंतु ही भावना टिकविणें, तिला आपल्या क्रियाशील जीवनाची कायमची प्रेरणा म्हणून स्वीकारणें, ही गोष्ट तर मनाला केवळ अशक्यच आहे; मनाच्या क्षेत्रांत जीं कामें स्वाभाविकपणें मोडतात, त्या कामांहून हें अगदीं निराळें, परकें, नवें व मनाला न पेलणारें असेंच काम आहे. मनाला फार तर एवढें करतां येईल कीं, 'मी' ची आणि 'मी-बाह्य' जीवनांची अथवा वस्तूंची एकता नीट समजून घेऊन, तें ज्ञान जवळ
पान क्र. २५७
सांभाळून ठेवणें आणि आपल्या स्वाभाविक क्रिया करतांना किंवा केल्यावर त्यांतील झालेल्या किंवा होऊं शकतील अशा चुका दुरुस्त करणें, स्वाभाविकपणें योजिलेलें कार्य हें वरील एकतेचें सत्य लक्षांत घेऊन शक्य तेवढें बदलून करणें--अर्थात् वस्तू व जीव, वेगळे वेगळे आणि स्वतंत्र आहेत, या व्यावहारिक सिद्धान्ताला धरूनच मन आपलें हें कार्य करीत राहील; कार्यांत थोडासा बदल किंवा त्यांतील चुकीची दुरुस्ती करावयास एकतेची भावना उपयोगांत आणील. आमच्या बुद्धीला हें ठाऊक आहे कीं, पृथ्वी सूर्याभोंवतीं फिरते. पण सूर्य पृथ्वीभोंवतीं फिरतो हें जें डोळ्यांना दिसतें, ती चूक या बुद्धीच्या सत्याचा उपयोग करून आपण दुरुस्त करतो, त्याप्रमाणेंच वरील गोष्ट समजावयाची. डोळ्यांना जें दिसतें, त्यांत फरक होत नाहीं, स्थूल इन्द्रिय-व्यवहाराला सोईची अशी जी रचना निसर्गानें केली आहे, ती कांहीं आम्हांला रद्द करतां येत नाहीं; ती तत्त्वत: गैरसोईची व कृत्रिम आहे, पण ती व्यवहारतः निसर्गाला सोईची आहे. त्याप्रमाणेंच विभागणीवर अवलंबून असलेली मनाची क्रिया निसर्गाला सोईची आहे. ती न बदलतां, 'मी' व 'इतर' तत्त्वत: एक आहोंत, ही सत्य गोष्ट समजून घेऊन, मनाकडून घडणाऱ्या व्यवहारांत चूक दुरुस्तीसाठीं, थोड्याशा बदलासाठीं आपण तिचा उपयोग करतो.
अतिमानसाची गोष्ट वेगळी आहे. हें अतिमानस एकतेचें सत्य कधीं विसरत नाहीं; एकता हें मूलभूत सत्य आहे, हें नेहमीं दृष्टीसमोर ठेवून, अतिमानस आपला व्यवहार करतें; अतिमानसाला एकता हें स्वाभाविक सत्य आहे; पण मनाला तें तसें नाहीं; त्याच्या दृष्टीचा नैसर्गिक भाग हें सत्य नाहीं--त्याला तें समजून घेऊन प्रयत्नानें लक्षांत ठेवावें लागतें. विश्व आणि त्यांतील सर्व वस्तू मीच आहे असा प्रत्यय अतिमानसाला येतो; अविभाज्य अशी एकच ज्ञानक्रिया ही, हा प्रत्यय त्याला आणून देते; ही क्रिया त्याच्या जीवनाचा प्राण आहे, त्याच्या गतिमान् अस्तित्वाची गतिमानताच या क्रियेंत आहे. अतिमानसाची सर्व-समावेशक दिव्य जाणीव जेव्हां तिच्या इच्छाशक्तीच्या स्वरूपांत विश्वजीवनाचा विकास करते, तेव्हां नियंत्रण किंवा मार्गदर्शन करून ती हें कार्य घडवून आणीत नाहीं, तर आपल्या सर्वसमर्थ क्रियाशक्तीनें तें स्वतःच्या पोटांत पूर्ण करतें; याचें कारण, तिची ज्ञानक्रिया व तिची इच्छाक्रिया (शक्तिक्रिया) या दोन विभक्त गोष्टी नसून, एकच क्रिया असते; आणि या दोन्हीं क्रिया (किंवा एक क्रिया) अस्तित्वाच्या क्रियेशीं
पान क्र. २५८
एकरूप असतात; अस्तित्व, ज्ञान व शक्ति या तीन गोष्टी अतिमानसांत सर्वथैव एकरूप असतात. विश्वशक्ति व विश्वजाणीव एक असतात; कारण विश्वशक्ति हें विश्व-जाणिवेचें क्रियारूप आहे. याप्रमाणें ईश्वरी ज्ञान आणि ईश्वरी इच्छाशक्ति एक असतात; कारण ईश्वरी अस्तित्वाची मूलभूत क्रिया या ज्ञानानें आणि इच्छाशक्तीनें व्यक्त होत असते.
वस्तू व घटना, वेगळ्या वेगळ्या व स्वतंत्र आहेत अशा कल्पनेनें आमची पृथक्करण-अधिष्ठित मनाची जाणीव काम करते. ही कल्पना चूक आहे, ही चूक मनाच्या स्वभावांत आहे; ही प्राथमिक चूक आपण समजलों नाहीं व दूर ठेवली नाहीं, तर विश्वाचें खरें स्वरूप आपल्याला कळणार नाहीं. तें कळण्यासाठीं जें एक सत्य आम्हीं नेहमीं निर्धारानें आमच्यासमोर ठेवलें पाहिजे, तें अतिमानसिक सत्य होय. अतिमानस सर्वसमावेशक आहे--ही सर्वसमावेशकता विभागतां येत नाहीं--तें अविभाज्य आहे; आणि त्याची अविभाज्य एकता यत्किंचितहि कमी न होतां, त्यांत सर्व अनेकता, विश्वपसारा, सामावलेला आहे. हें अतिमानसिक सत्य नेहमीं समोर राहील, तरच विश्वाचा, विश्वरचनेचा उकल आम्हांस होणें शक्य आहे. बीजांत वृक्ष असतो, तो बीजांतून वर येतो व वृक्षांतून बीज येतें; आपण ज्याला वृक्ष म्हणतों, तें एक विश्वांतील रूप आहे; जें ज्ञानरूप एकतत्त्व विश्वांत अभिव्यक्त झालें आहे, त्या एकतत्त्वाच्या अभिव्यक्तीचें एक रूप म्हणजे वृक्ष आहे. या रूपाच्या शाश्वततेमध्यें एक सार्वभौम निश्चित नियम आहे, निश्चित व न बदलणारी प्रक्रिया आहे; तो नियम हाच कीं, वृक्षांतून बीज, बीजांतून वृक्ष. विवक्षित वृक्षाचा जन्म, जीवन आणि संतानोत्पादन या घटनेकडे पाहतांना, ही घटना स्वतंत्र आहे असें कल्पून मन तिचा अभ्यास करतें; तिचें वर्गीकरण व कार्यकारण दृष्टीनें तिचें स्पष्टीकरण करतें. वृक्षाचें अस्तित्व बीजामुळें व बीजाचें अस्तित्व वृक्षामुळें शक्य होतें--असा निसर्गनियम आहे, असा उद्घोष मन करतें. पण या उद्घोषानें स्पष्टीकरण मुळींच होत नाहीं. एक गूढ घटना कशी घडते ती प्रक्रिया, पृथक्करण पद्धतीनें शोधून टिपून ठेवणें एवढेंच खरोखरी मन या बाबतींत करतें. वृक्षाचा, वृक्षाच्या रूपाचा म्हणजेच वृक्षदेहाचा आत्मा ही गुप्त अशी जाणीवयुक्त शक्ति आहे, ही शक्ति हेंच वृक्षाचें खरें अस्तित्व आहे, बाकी सर्व या शक्तीची नियमबद्ध क्रिया आहे, अभिव्यक्ति आहे असें जरी मनाला कळलें, तरी वृक्ष, वृक्षाकार ही स्वतंत्र वस्तु आहे, तिचा निसर्गनियम स्वतंत्र आहे, तिची
पान क्र. २५९
विकास-प्रक्रिया स्वतंत्र आहे, असेंच त्याच्या स्वभावानुसार मन मानणार; असेंच मानण्याकडे त्याची प्रवृत्ति असणार. मनुष्येतर प्राणी आणि मनुष्य यांत म्हणजेच ज्यांच्यामध्यें मनाची जाणीव आली आहे त्या जीवांत, आपल्या विभक्ततेच्या प्रवृत्तीमुळें मन स्वतःलाहि स्वतंत्र वस्तु, जाणीवयुक्त ज्ञाता समजतें आणि इतर वस्तूंना आपले ज्ञेय पदार्थ म्हणजेच आपल्याहून वेगळे व स्वतंत्र असे पदार्थ समजतें. जीवनाला उपयुक्त व आवश्यक अशी ही मनाच्या कल्पनेची व्यवस्था आहे; जीवनाचा सर्व व्यवहार त्याच्या प्राथमिक अवस्थेंत या कल्पनेवर आधारलेला असतो. कल्पना केवळ कल्पनाच नसून मूळ शाश्वत सत्य आहे, अशी समजूत मन करून घेतें--व त्यामुळेंच अहंकाराच्या विभक्तपणाच्या सर्व चुका निर्माण होतात.
अतिमानसाची दृष्टि आणि सृष्टि वेगळी आहे. तेथें विभक्ततेचें नांव नाहीं. वृक्ष आणि त्याची प्रक्रिया ही जर स्वतंत्र वस्तु म्हणून असती, तर अतिमानसाच्या निर्मितिक्रियेंत ती अस्तित्वांतच आली नसती. ती आहे आणि विशिष्ट प्रकारची आहे याला कारण, वृक्षाचें विश्वाच्या अस्तित्वाशीं, विश्वशक्तीशीं आणि विश्वांत वृक्षाखेरीज दुसरे जे विश्वशक्तीनें घेतलेले आकार आहेत, त्या सर्वांशीं असलेलें जवळकीचें नातें हें एकतेचें आहे. जे जे आकार विश्वांत आहेत, त्यांचें विशिष्ट स्वरूप आणि विशिष्ट विकास, हाहि त्या नात्यावर अवलंबून असतो; या नात्याचा तो परिणाम असतो. विश्वांतील नानाविध आकारांचें अस्तित्व आणि विकास सर्वस्वीं विश्वाच्या अस्तित्वाची शक्ति घडवीत असते. वस्तूंच्या प्रकृतीचा जो भिन्न कायदा, तो सर्व निसर्गाच्या सार्वत्रिक कायद्याचें प्रसंगनिष्ठ विशिष्टीकरणरूप असतो; विश्वाचा जो सर्वसाधारण विकास ठरलेला असतो, त्यांत कोणत्याहि वस्तूचें जें स्थान असेल, त्याप्रमाणें त्या वस्तूचा विशिष्ट विकास ठरला जातो; वृक्षबीजाचें स्पष्टीकरण वृक्षांत सांपडत नाहीं, वृक्षाचें स्पष्टीकरण बीजांत सांपडत नाहीं; तर विश्व (विश्वविकास) हें दोघांचेंहि स्पष्टीकरण आहे आणि ईश्वर (ईश्वराची ज्ञानयुक्त इच्छाशक्ति) हें विश्वाचें स्पष्टीकरण आहे. अतिमानस एकाच वेळीं वृक्षबीज, वृक्ष आणि इतर सर्व पदार्थ यांना व्यापून असतें आणि यांच्या अंतरीं त्या त्या पदार्थाचा ''आत्मा'' म्हणून राहतें; हें त्याचें श्रेष्ठ आत्मज्ञान अविभाज्य आहे, एकतामय आहे आणि त्याला हें सदासर्वदा समोर असतें. या ज्ञानाच्या आश्रयानें
पान क्र. २६०
तें काम करतें; आपला जीवन-व्यवहार करतें; अतिमानसाच्या ज्ञानाची अविभाज्यता आणि एकता कठोरपणें अपरिवर्तनीय नाहीं; ती आपल्या पोटांत अनेकतेला वाव देणारी अशी लवचिक आणि व्यवहारी आहे. अतिमानसाच्या सर्वसमावेशक ज्ञानदेहांत स्वतंत्र असें अस्तित्वकेन्द्र कोठेंहि नाहीं. आमच्यांत आहे त्याप्रमाणें कोठेंहि वैयक्तिक अलग असा अहम् नाहीं; सर्व अस्तित्व त्याच्या आत्मजाणिवेच्या दृष्टीनें सर्वत्र सारखें विस्तारलेलें आहे; तें जसें एकतेमध्यें 'एक' आहे, तसें अनेकतेच्या विस्तारांतहि 'एकच' आहे; कोणत्याहि परिस्थितींत सर्वत्र सर्वदा एकच आहे. अतिमानसाच्या क्षेत्रांत एकाच अस्तित्वाला 'सर्व' आणि 'एक' अशीं दोन रूपें आहेत; येथें व्यक्तिरूप आत्मा केव्हांहि हें विसरत नाहीं, विसरूं शकत नाहीं कीं, तो सर्व आत्म्यांशीं, सर्व भूतांशीं एकरूप आहे आणि सर्वभूतप्रभव जें एकमेव आत्मतत्त्व, त्याच्याशींहि एकरूप आहे. कारण ही एकरूपता, एकात्मता अतिमानसिक जाणिवेंत स्वभावतःच भरलेली असते; मूळ एकता व सार्वत्रिक एकता हा तिच्या स्वयंभूपणाचा, स्वयंसिद्ध अस्तित्वाचा, सहजज्ञानाचा एक अविभाज्य भाग असतो.
अतिमानसिक अतिमहान् क्षेत्रांत एकता समतेनें विस्तारलेली असते, मूळ एक अस्तित्व येथें विभागलें जात नाहीं, वांटून दिलें जात नाहीं, त्याचा विस्तार त्यानें स्वत: समतेनें सारखेपणानें केलेला असतो; या सर्व विस्तारांत तें एकत्वानें सर्व व्यापून असतें, अनेक आकारांच्या अन्तरांत आत्मा म्हणून अविभक्तपणें तें राहतें, सर्वत्र एकाच वेळीं, एक आणि सम असें असणारें तें अस्तित्व वा ब्रह्म, कोठेंहि अधिकपणा, कमीपणा धारण करीत नाहीं. कारण काल आणि स्थल यांत ब्रह्म जें पसरलेलें आहे, तें त्याचें पसरणें आणि त्याचें सर्वाला व्यापून राहणें व सर्वांतरीं आत्मत्वानें राहणें--ही ब्रह्माची व्याप्ति त्याच्या सर्वनिरपेक्ष मूळ, केवळ, एकतेशीं व अविभाज्यतेशींहि निकटतेनें बांधलेली आहे. ब्रह्माचें मूळ स्वरूप केवल, एक व अविभाज्य असें असतें; या स्वरूपांतूनच त्याचें व्यापक स्वरूप उदय पावतें--अर्थात् त्या दोन स्वरूपांचा आन्तरिक नित्य-संबंध कधींहि तुटत नाहीं, बदलत नाहीं; अविभाज्य स्वरूपाच्या मूळ ब्रह्मांत कोठेंहि मध्यबिंदु, परीघ अशी व्यवस्था नसते; मूळ ब्रह्म अविभाज्य स्वरूपांत कालस्थलरहित एकत्वसंपन्न असतें. जेव्हां ब्रह्म स्वत:चा विस्तार करतें, तेव्हां विस्ताररहित ब्रह्माची ही अतिकेन्द्रित एकता अनिवार्यपणें सर्वत्र सारखेपणानें व्यापून राहते; सर्व वस्तू आपल्यांत
पान क्र. २६१
अविभाज्यपणें सामावून घेते, सर्वत्र अविभक्तपणें अन्तर्यामित्व धारण करते; सर्वत्र अशी एकता नांदविते कीं, अनेकतेचा कसलाहि प्रयोग त्या एकतेंत दोष उत्पन्न करीत नाहीं, तिच्यांत कमीपणा आणीत नाहीं, तिला दूर करण्याचें नांव घेत नाहीं. ''ब्रह्म सर्व वस्तूंत आहे, सर्व वस्तू ब्रह्मांत आहेत, सर्व वस्तु ब्रह्म आहे'' हें त्रिपदी सूत्र सर्वसमावेशक अतिमानसाच्या स्वरूपवैशिष्ट्याचें दर्शक आहे; ब्रह्माच्या आत्म-आविष्काराची त्रिविध एकता या सूत्रांत सांगितली आहे; हे तीन आविष्कार मिळून एकच सत्य आहे असें हें सूत्र सुचवितें; हे तीन आविष्कार अविभक्तपणें आपले स्वतःचे आहेत हें नित्य ओळखून, या पायाभूत ज्ञानावर अतिमानस आपला विश्व-रचनेचा खेळ उभा करतें.
अतिमानसाचें विश्व म्हणजे आपलें मनाचें विश्व नव्हे. तर मग मन-प्राण-जडद्रव्य या तीन स्वतंत्र वस्तू असलेलें हें विश्व आलें कोठून? अतिमानसिक जाणीव आणि मानसिक जाणीव या वेगळ्या जाणीवा आहेत. मानसिक जाणीव ही अर्थात् कनिष्ठ जाणीव आहे; या जाणीवेंत मन-प्राण-जड अशा तीन वस्तू अंतर्भूत आहेत. असें मन आलें कोठून? मनाची त्रिविध संघटना (आमचें मानसिक विश्व) कशी घडून आली? या प्रश्नांचा आतां विचार करावयाचा आहे. जें जें कांहीं अस्तित्त्वांत आहे, किंवा येतें, तें सर्व सर्वसमर्थ अतिमानसाच्या क्रियेचा परिणाम असतें; मूळ ज्या तीन अविभक्त वस्तू--अस्तित्व, जाणीव शक्ति आणि आनंद--या वस्तूंवर अतिमानसाची क्रिया घडून सर्व कांहीं अस्तित्वांत येतें. ही वस्तुस्थिति असल्यानें, अतिमानसांत, अतिमानसाच्या सृजनसमर्थ सत्य-जाणिवेंत अशी कांहीं शक्ति असली पाहिजे, कीं त्या शक्तीच्या मूळ तीन वस्तूंवरील विशिष्ट क्रियेनें त्या तीन वस्तूंतूनच आमच्या परिचयाच्या मन, प्राण व जडद्रव्य या तीन वस्तू उदयास येतील. अतिमानसाच्या सत्य-जाणिवेंत ही जी शक्ति आहे, ती म्हणजे स्वनिर्मित वस्तू स्वत:पासून दूर धरण्याची, त्या वस्तूसमोर बैठक घेण्याची आणि तिला स्पर्श करून, तिचें होईल तें ज्ञान करून घेण्याची त्या जाणिवेची शक्ति होय. या व्यवस्थेंत ज्ञान हें एका बिंदूत आत्मकेन्द्रित होऊन, आपण निर्मिलेल्या वस्तूंपासून दूर उभें राहून, त्या वस्तूंचें निरीक्षण करतें. सर्वसमावेशक समग्रदर्शी अतिमानस किंवा सत्यजाणीव स्वनिर्मित सर्व वस्तूंत जशी समतेनें राहते, तशी गोष्ट या तिच्या गौणशक्तीची नसते--ही सर्वत्र समतेनें रहात नाहीं; विशिष्ट बिंदूंत अधिक केन्द्रित होते; स्वनिर्मित
पान क्र. २६२
वस्तूंत विषमतेनें राहणें, हें या शक्तीचें वैशिष्ट्य आहे. स्वतःमध्यें भाग पाडण्याची क्रिया, जाणिवेच्या या विषम वांटणीमुळें सुरू होते--अतिमानसिक जाणिवेची, स्वनिर्मित वस्तूमध्यें तिच्या दुय्यम शक्तीच्या क्रियेनें घडणारी ही विषम वांटणी दृश्य विश्वांतील आत्म-विभाजन घडवून आणण्यासहि मूळ कारण होते.
ज्ञानग्रहणकर्ता म्हणून ज्ञानामध्यें स्वतःला केन्द्रित करणारा तो ज्ञाता; त्याची ज्ञानशक्ति त्याजपासून निघून, त्याच्या प्रत्येक आकारांत प्रवेश करते, तेथें काम करते; नंतर परत त्याच्यामध्यें जाते, पुन्हां त्याच्यापासून निघून जुना कार्यक्रम चालविते. असें सारखें पुन: पुन: चाललेलें असतें अशी प्रतीति या ज्ञात्याला होते. ही जी स्वतःमधील समतेचें राज्य घालवून, ज्ञाता, ज्ञेय, व ज्ञानक्रिया असा विषम व्यवहार घडवून आणणारी क्रिया, तिच्यापासून सर्व व्यावहारिक भेद निघतात; या भेदांवर विश्वांतील सापेक्ष-दर्शन, सापेक्ष-व्यवहार आधारलेले आहेत. ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय हे सर्व एकमेकांपासून वेगळे वेगळे आहेत, अशा व्यावहारिक मूळ भेदांतून ईश्वर, त्याची शक्ति आणि त्या शक्तीचीं अपत्यें आणि इतर कार्यें या वेगळ्या वेगळ्या वस्तू आहेत, असा एक भेद प्रस्थापित होतो; भोक्ता वेगळा, भोग वेगळा व भोग्य वेगळें अशी त्रिपुटी त्यांतूनच निघते; परमात्मा, माया व परमात्म्याच्या नामरूपात्मक विभूती, ही त्रिपुटीहि तेथूनच निघते. दृश्य विश्वांतील आत्मविभाजन हें असें त्रिपुटीयुक्त होत असतें. दृश्य विश्वांतील आत्मविभाजनाचा हा आरंभ होय.
यानंतर दुसरी गोष्ट घडते ती अशी : ज्ञानकेन्द्रित ज्ञानमय आत्मा किंवा पुरुष, त्याच्यापासून निघणारी जी शक्ति किंवा प्रकृति तिचें निरीक्षण आणि नियंत्रण करीत असतो--हा पुरुष त्याच्या प्रत्येक रूपांत, आकारांत आपली बैठक घालतो; जणुं त्याच्या ज्ञानशक्तीबरोबर तिनें घडविलेल्या वस्तूंत तो जातो आणि त्या वस्तूंत, त्या आपल्या रूपांत आत्मविभाजनक्रिया करतो; या क्रियेंतूनच ज्ञेय, ज्ञान या संवगडयांसह ज्ञातारूपी जाणीव निर्माण होते हें वर आलेंच आहे. प्रत्येक देहांत, आकारांत, रूपांत हा आत्मा किंवा पुरुष आपल्या प्रकृतीसह राहतो आणि दुसऱ्या देहांत असणाऱ्या स्वतःलाच त्या आपल्या विशिष्ट कृत्रिम व्यावहारिक ज्ञानकेन्द्रांतून बघत असतो. सर्व ठिकाणीं तोच एकच आत्मा, तोच एकच दिव्य पुरुष असतो; मूळ, अतिमानसिक, सर्वसमावेशक
पान क्र. २६३
समग्रदर्शी, एकतासंपन्न व समताप्रधान जाणिवेचें, केन्द्राची अनेकता हें एक व्यवहारदृष्टीचें कार्य आहे. भेदाचा खेळ उभा करणें हा या कार्याचा, या अनेक ज्ञानकेन्द्रांमागील अतिमानसिक हेतु आहे; मूळ अभेदाच्या पायावर व्यवहारापुरता भेदाचा खेळ उभारावा, त्या भेदांत अभेदाचा साक्षात्कार सर्वांनीं करून घ्यावा, भेदांतूनच निर्माण होऊं शकणारे अन्योन्यसंबंध निर्माण व्हावे, अन्योन्यांचें ज्ञान अन्योन्यांनीं करून घ्यावें, अन्योन्यशक्ती अन्योन्यांवर कार्यान्वित केल्या जाव्या, अन्योन्यांचा आनंद अन्योन्यांनीं भोगावा, या अशा अन्योन्य व्यवहारानें सर्वांचें ऐक्य सर्वांच्या अनुभवास यावें--ऐक्य हेंच मूळ असून, अन्योन्यता ही विशिष्ट वर सांगितलेल्या हेतूंसाठीं निर्माण केलेली दुय्यम गोष्ट आहे ही प्रतीति सर्वांना व्हावी--अनेक केन्द्रें करण्यांत अतिमानसाचा, सत्य-ज्ञानमय विभूतीच्या रूपानें क्रियाशील झालेल्या सच्चिदानंद ब्रह्माचा हा हेतु आहे.
सर्वव्यापक अतिमानस हें या वरील दशेला प्राप्त झाल्यानें, वस्तूच्या एकत्व-सत्यापासून आरंभिक त्रिपुटीदशेपेक्षां तें दूर झालेलें आहे. त्याचप्रमाणें विश्वाच्या अस्तित्वाला आवश्यक जी मूलभूत एकता, तिचें एकत्व ज्या अविभाज्य जाणिवेवर अनिवार्यपणें अवलंबून असतें, त्या जाणिवेपासूनहि वरील अतिमानसाची दुसरी दशा पहिल्या दशेपेक्षां अधिक दूर गेलेली आहे. अतिमानस जर आणखी थोडें दूर जाईल, तर तें अविद्या हें रूप घेईल; तें खरोखरीची 'अविद्या' होईल हें आपल्या लक्षांत येण्यासारखें आहे. अविद्या म्हणजे 'महान् अज्ञान,' अनेकता हेंच मूलभूत सत्य आहे असें तें मानतें; आणि खऱ्या एकतेला परत यावयासाठीं त्याला अहम् ची खोटी एकता खरी धरून प्रवासाला आरंभ करावा लागतो. तसेंच हेंहि आपल्या लक्षांत येऊं शकतें कीं, व्यक्तिकेन्द्र हा निर्णायक दृष्टिबिंदू म्हणून स्वीकारला, व्यक्तिकेन्द्र हाच ज्ञाता म्हणून पत्करला म्हणजे मानसिक संवेदना, मानसिक प्रज्ञा, मानसिक कृतिप्रवण इच्छाशक्ति या सर्व गोष्टींचे परिणाम घडून आल्याशिवाय राहणार नाहींत. तथापि आत्मा जोपर्यंत अतिमानसक्षेत्रांत कार्य करीत असतो, तोपर्यंत अविद्या त्याला बाधा करीत नाहीं; अविद्येचें क्षेत्र अतिमानसाच्या क्षेत्रांत अंतर्भूत होत नाहीं. त्या क्षेत्रांत ज्ञानाचे आणि क्रियेचे व्यवहार सत्य-जाणिवेवर आधारलेले असतात, त्यांचा पाया एकता हाच असतो.
कारण या अतिमानसिक क्षेत्रांत आत्मा (परमात्मा) ही गोष्ट विसरत नाहीं कीं, सर्वांमध्यें तो एकटा स्वतःच भरून राहिला आहे, सर्व त्याच्याच
पान क्र. २६४
विभूती आहेत आणि या सर्व विभूती त्याच्या पोटांतच वावरतात. ईश्वर (ईश्वररूप परमात्मा) हा त्याची शक्ति म्हणजे क्रियाशील स्वयम् आहे आणि प्रत्येक भूत अथवा विभूति आत्मदृष्टीनें आणि रूपदृष्टीनें तो स्वयम् आहे, ही गोष्ट विसरत नाहीं; भोक्ता (भोक्तारूप परमात्मा) अनेकतेच्या भूमींत भोग घेतो; तें भोग स्वत: स्वतःलाच भोग्य करून घेत असतो, ही गोष्ट तो विसरत नाहीं. सर्वसमावेशक समग्रदर्शी अतिमानसांत जो केवळ एकच खरा बदल झालेला असतो, तो हा कीं, जाणीव विषमतेनें वांटलेली असते, केन्द्राकेन्द्रांत विषमतेनें सांठविलेली असते आणि शक्ति अनेकतेच्या घटकांत सर्वत्र विभागलेली असते. जाणिवेमध्यें स्थानास्थानांत व्यवहारापुरता भेद मानला जातो, परंतु मूलत: जाणिवा सर्वत्र खरोखरीच वेगळ्या वेगळ्या आहेत असें मात्र अतिमानसिक परमात्मा मानीत नाहीं; त्याच्या स्वतःच्या स्वतःविषयींच्या ज्ञानांत खरें विभजन अतिमानसिक क्षेत्रांत होत नाहीं. सत्य-जाणीव, सत्य-ज्ञान हें अनेकतेंत अनेक त्रिपुटीयुक्त झाल्यानें, (प्रत्येक जीव त्रिपुटी असतो) अशा अवस्थेला आलेलें असतें कीं, त्यांतून आपली मनाची जाणीव निघूं शकते; तथापि अतिमानसाची ही अवस्था म्हणजे मनाची अवस्था नव्हे, मनाची जाणीव नव्हे. अतिमानसाच्या या अवस्थेचा अभ्यास आम्हीं करावयास हवा, कारण या अवस्थेंतून मनाचा उदय व्हावयाचा असतो; उंच आणि महान् विस्ताराचें जें सत्य-ज्ञान, तेथून त्याला पारखें होऊन, खऱ्या विभागणीच्या आणि अज्ञानाच्या क्षेत्रांत जी उडी घेतली जाते, ती या अवस्थेंतून घेतली जाते; येथें उगमापाशीं मन कसें असतें त्याचा अभ्यास आम्हीं करावयास हवा. सत्यज्ञानाच्या या अवस्थेला 'प्रज्ञान' म्हणतात. या अवस्थेंत शुद्ध, निर्भेळ, सर्वसमावेशकत्व, समग्रदर्शित्व टाकून (किंवा बाजूला ठेवून म्हणा) सर्वत्र त्रिपुटीयुक्त होऊन, ज्ञाता ज्ञेय व ज्ञान या पद्धतीनें अतिमानसानें अंशदर्शित्व स्वीकारलेलें असतें. याप्रमाणें अंशदर्शी झालेल्या अतिमानसाला 'प्रज्ञान' व मूळ समग्रदर्शी अतिमानसाला 'विज्ञान' हीं नांवें योग्य आहेत. विज्ञानालाच परात्पर-सत्य-संविद् हें नांव आहे; कारण प्रज्ञान हें अज्ञानाहून श्रेष्ठ म्हणजे पर; आणि विज्ञान हें प्रज्ञानाहून श्रेष्ठ म्हणजे परात्पर. या प्रकरणांत विज्ञानाचें स्वरूप विस्तारानें सांगितलें आहे व प्रज्ञानचर्चेला आरंभ केला आहे. प्रज्ञान हें आमच्या मानसिक जाणिवेला जवळ असल्यानें, त्याची नीट कल्पना करून घेणें अवघड नाहीं; विज्ञान हें मानसिक जाणिवेला दूर असल्यानें,
पान क्र. २६५
त्याची नीट कल्पना देण्यासाठीं आमच्या बुद्धीची भाषा पुरी पडत नाहीं; तथापि या भाषेचा उपयोग करून, विज्ञानाची कल्पना आणून देण्याचा प्रयत्न आम्हीं केला आहे. प्रज्ञानाची जी ज्ञानक्रिया असते, ती आमच्या मनाच्या ज्ञानक्रियेला जवळ असल्यानें, आमची ज्ञान-प्रक्रिया प्रज्ञानाच्या ज्ञान-प्रक्रियेची छायाच असल्यानें, प्रज्ञानाचें विवेचन आपल्याला विज्ञानाच्या विवेचनापेक्षां समजावयास सोपें जाईल. प्रज्ञान आणि मन यांच्या क्षेत्रांना विभागणारी तटबंटी पार करून जावयास अगदींच सोपी आहे असें नाहीं. तथापि विज्ञान आणि मन यांच्यामधील तटबंदीपेक्षां ही कमी कठीण आहे, कमी अवघड आहे.
पान क्र. २६६
प्रकरण सोळावें
अतिमानसाच्या तीन अवस्था
तो माझा आत्मा, जो सर्व भूतांचा आधार आहे, सर्व भूतांचें भूतत्व (अस्तित्व) जो स्वत: झाला आहे. ... मी तो आत्मा आहे, जो सर्व भूतांच्या आंत वसति करतो.
- गीता ९-५; १०-२०
प्रकाशाच्या तीन शक्ती ह्या तीन ज्योतिर्मय दिव्य विश्वें आपल्या सामर्थ्यानें चालवितात.
- ऋग्वेद ५.२९.१
आपण रहात आहों तें जग आपल्याला प्रज्ञानाच्या दृष्टिकोनांतून पहावयाचें आहे, समजून घ्यावयाचें आहे--मनाच्या मर्यादा ओलांडून मोकळा झालेला, दिव्य अतिमानसाच्या व्यापार-व्यवहारांत भाग घेण्याचा अधिकार प्राप्त झालेला व्यक्तीचा आत्मा आणि अतिमानसिक प्रज्ञानात्मा यांचा दृष्टिकोन सारखाच असतो--या दृष्टिकोनांतून आपल्याला जग समजून घ्यावयाचें आहे; विज्ञानाच्या जगापेक्षां तें समजून घ्यावयास सोपें आहे, हें वर सांगितलेंच आहे--पण हें प्रज्ञानाचें विश्व तपासण्यापूर्वीं आम्हांला थोडी आवृत्ति केली पाहिजे. ईश्वराचें अस्तित्व, मूळरूप, निरतिशय घनीभूत एकतेचें असतें; त्यांतून अनेकतेचें जग तो आपल्या मायेनें निर्माण करतो--या व्यवहारांत ईश्वराची जाणीव कशी असते, या संबंधानें यापूर्वीं जें ज्ञान आम्हीं मिळविलें आहे त्याची आवृत्ति करावी आणि त्यासंबंधीं अधिक कांहीं ज्ञान मिळाल्यास मिळवावें व नंतर प्रज्ञानाच्या जगाची तपासणी करावी असें आम्हीं योजिलें आहे.
आमचा प्राथमिक सिद्धान्त आम्हीं यापूर्वीं सांगितलाच आहे कीं, सर्व अस्तित्व हें एकच एक 'सद्वस्तु' किंवा अस्तित्व आहे. तिचा प्राकृतिक सारभूत धर्म जाणीव हा आहे; सर्व अस्तित्व एकच एक 'जाणीव' असून, तिचा क्रियाशील स्वभावधर्म शक्ति किंवा इच्छाशक्ति
पान क्र. २६७
हा आहे. ही सद्वस्तु आनंदरूप आहे, ही जाणीव आनंदरूप आहे व ही शक्ति किंवा इच्छाशक्तीहि आनंदरूपच आहे. अस्तित्वाचा शाश्वत व अव्यय आनंद, जाणिवेचा, शक्तीचा किंवा इच्छाशक्तीचा शाश्वत व अव्यय आनंद, आत्मकेन्द्रित विरामस्थितींतील आनंद आणि क्रियाशील निर्मितिशील स्थितींतील आनंद--हें ईश्वराचें रूप आहे, हा ईश्वर आहे; आम्ही आपल्या सारभूत निराकार अस्तित्वाच्या किंवा स्वत्वाच्या स्थितींत हेंच ईश्वरी रूप आहोंत. हें ईश्वरी तत्त्व जेव्हां आत्मकेन्द्रित असतें, तेव्हां मूलभूत शाश्वत, अव्यय सुख हें त्याचें असतें किंवा असें सुख म्हणजेच आत्मकेंद्रित ईश्वरतत्त्व होय. तें क्रियाशील व निर्मितिशील झालें म्हणजे अस्तित्वाच्या, जाणिवेच्या शक्तीच्या किंवा इच्छेच्या लीलेचा आनंद त्याचा होतो किंवा असा आनंद हेंच क्रियाशील ईश्वरतत्त्व होय. ही जी लीला, तिलाच विश्व हें नांव आहे आणि विश्वाच्या अस्तित्वाचें कारण, हेतु व उद्देश केवळ विश्वलीलेचा आनंद हाच असतो. ईश्वरी जाणिवेला या लीलेचा आणि या आनंदाचा भोग शाश्वतचा आणि अटळपणें मिळतो; आमचें मूलभूत अस्तित्व, आमचा खरा आत्मा जो आमच्या खोट्या आत्म्यानें, मानसिक 'मी' नें झांकलेला आहे, आमच्यापासून लपविलेला आहे, त्याला सुद्धां विश्वलीला आणि या लीलेचा आनंद शाश्वतचा आणि अटळपणें भोगावयास मिळतो. आमचा खरा आत्मा ईश्वरी जाणिवेशीं एकरूप असल्यानें, आमच्या आत्म्याला त्या जाणिवेचा खेळ आणि आनंद भोगावयाला मिळणें स्वाभाविक आहे, अपरिहार्य आहे. तेव्हां आम्हांला जर दिव्य जीवन जगावें अशी आकांक्षा असेल, तर आमच्यांतील पडद्यामागें लपविलेला आत्मा, तो पडदा दूर करून आम्हीं प्रकट करणें अवश्य आहे. आज आम्ही खोटा आत्मा किंवा मानसिक 'मी' यांजमध्यें जी बैठक मारून बसलों आहों, ती बैठक सोडून, तिच्या वर चढून, आम्हीं दिव्यजीवनासाठीं आमच्या खऱ्या आत्म्याची श्रेष्ठ बैठक आमची करावयास हवी. दिव्य जाणिवेशीं आमच्या प्रकट जागृत मनाची एकता नाहीं; दिव्य जीवन जगावयाचें असेल, तर ती घालविलेली एकता त्यानें परत मिळवावयास हवी. आमच्यांत असलेलें अतिमानसिक तत्त्व हें ही एकता सदोदित भोगतें व म्हणूनच आमचें अस्तित्व आहे. या आंतरिक एकतेशिवाय आम्ही अस्तित्वांत असूं शकणार नाहीं.
सच्चिदानंदाची विश्वातीत एकता एका बाजूला आणि विभक्त मन
पान क्र. २६८
दुसऱ्या बाजूला--या दोन वस्तू अन्योन्यविरोधी आहेत--यांपैकीं एकच खरें तत्त्व आहे, असें आपण मान्य केलें म्हणजे दुसरें आपोआपच खोटें ठरतें. कोणत्याहि एकाचा आनंद भोगावयाचा, तर दुसऱ्याला कायमची रजा देणें भाग आहे. मन आणि त्याचे आकार यांच्या, म्हणजेच प्राण आणि देह यांच्या आश्रयानें आज आम्ही पृथ्वीवर अस्तित्वांत आहों. मन-प्राण-देह यांची आम्हांला असलेली जाणीव नाहींशी केल्याशिवाय, एकचएक सच्चिदानंद आम्हांला जर लाभणार नसेल, तर पृथ्वीवर दिव्य जीवन जगणें अशक्य आहे. विश्वजीवन केवळ भ्रम आहे, असें मानून तें सर्वथा टाकून देऊनच विश्वातीत सच्चिदानंदत्व आम्ही परत मिळवूं शकूं, विश्वातीत सच्चिदानंद परत होऊं शकूं. विश्वातीत सच्चिदानंद आणि मन यांच्या विरोधी जाणिवांना जोडणारा योग्य जाणिवेचा दुवा या दोहोंच्या मध्यभागीं नसेल, तर सच्चिदानंद लाभासाठीं विश्वजीवन भ्रम म्हणून टाकून देणें हा एकच मार्ग रहातो. कार्यकारण दृष्टीनें दोघांचें स्वरूप दोघांना स्पष्ट करून सांगणारी आणि दोघांमध्यें विशिष्ट नातें निर्माण करणारी--मन-प्राण-शरीरांत राहून एकचएक सच्चिदानंदाचा लाभ आम्हांला करून घेतां येण्यासाठीं दोघांमध्यें नातें निर्माण करणारी--जाणीव मध्यभागीं असेल, तरच विश्वजीवन टाकून देण्याचा प्रसंग येणार नाहीं; तरच आमचें हें विश्वजीवन आम्हांला दिव्य-जीवन करतां येईल.
सच्चिदानंद आणि मन या दोहोंच्या मध्यभागीं दोघांना जोडणारी अशी जाणिवेची सांखळी आहे, जाणिवेचा दुवा आहे. अतिमानस किंवा सत्य-जाणीव या नांवानें तो दुवा ओळखला जातो. मनाच्या वरतीं मनाहून श्रेष्ठ असें हें जाणीवतत्त्व आहे. जें वस्तूंचें सत्य म्हणजेच पायाभूत असलेली वस्तूंची जी एकता आहे, तिच्या क्षेत्रांत राहून ही जाणीव काम करते, वावरते; हिच्या उलट, वस्तूंचे दृश्य आकार, त्यांची दृश्यांतील विभागणी, विविध भेदाभेद यांच्यामध्यें मन राहतें, काम करतें व वावरतें. ज्या सिद्धान्ताला आमच्या मान्यतेंत आम्हीं आद्यस्थान दिलें आहे, त्या सिद्धांताच्या बैठकींतून अतिमानसाचें अस्तित्व तर्कदृष्ट्या अपरिहार्यपणें सिद्ध होतें. कारण सच्चिदानंद मूलत: कालातीत, स्थलातीत केवलतत्त्व, जाणीवयुक्त आनंदरूप अस्तित्वाच्या स्वरूपाचें असतें; (हेंच मूलसत्य हा आमचा आद्यसिद्धान्त आहे.) आणि विश्व हें त्याच्या उलट, काल आणि स्थल यांच्या पसाऱ्यांतील विस्तार आहे, तें गतिरूप
पान क्र. २६९
आहे; काल आणि स्थल यांच्या आधारावर कार्यकारणभावानें विविध संबंध आणि संभाव्य घटना यांची घडण आणि जोपासना म्हणजेच विश्व--असें विश्वाचें स्वरूप आहे. आम्हांला जो कार्यकारणभाव म्हणून भासतो, तो मूळ सत्यस्वरूपांत 'ईश्वरी नियम' आहे. विकास पावणाऱ्या वस्तूच्या (संबंधाच्या घटनेच्या) अन्तरंगांतील वस्तुसत्याचा, नियोजित सत्यमय वस्तुकल्पनेचा अपिरहार्य स्वयंविकास हें या नियमाचें अन्तरंगस्वरूप, सारभूत सर्वस्व आहे. संभवनीय अनन्त वस्तुसंबंध व घटनांपैकीं अमुक वस्तुसंबंध व घटना घडावयाच्या, अशी निश्चित पूर्वयोजना ईश्वरी नियमांत असते. सर्व वस्तूंचा या प्रकारें विकास करणारी शक्ति अर्थात् पूर्ण ज्ञानयुक्त, पूर्ण समर्थ इच्छाशक्ति असली पाहिजे; कारण मूळ अस्तित्त्वाचा स्वभावधर्म ज्ञानमय शक्ति हा आहे आणि विश्वरचना, विश्व-आविष्कार ही या ज्ञानमय शक्तीची लीला आहे. अशी ही विश्वविकास करणारी ज्ञानयुक्त इच्छाशक्ति ही मनाची शक्ति खास नव्हे; कारण मनाला सत्याचें ज्ञान नसतें, ईश्वरी सत्यनियमाचें ज्ञान नसतें; तो नियम त्याच्या भांडारांतील नसतो, तो नियम त्याच्या अंकित नसतो; उलट मन त्या नियमाचें अंकित असतें, त्या नियमाचें शासन मनावर चालतें, त्या नियमाच्या परिणामांपैकीं मन हा एक परिणाम आहे. वस्तूंच्या स्वयंविकासाच्या दृश्य साकार परिणामांच्या क्षेत्रांत मन फिरत असतें, या स्वयंविकासाच्या मुळाशीं मनाचें अस्तित्व नसतें, मनाचें कार्य नसतें; स्वयंविकासानें ज्या गोष्टी घडून येतात, त्या भिन्न भिन्न आहेत अशा भावनेनें मन त्यांजकडे बघतें आणि या गोष्टींचें मूळ सत्यस्वरूप काय असावें, या गोष्टींच्या मुळाशीं काय असावें, याचा शोध घेण्याचा मन प्रयत्न करीत असतें. विश्वांतील सर्व विविध वस्तूंचा विकास करणारी ज्ञानयुक्त इच्छाशक्ति ही, वस्तूंची मूळ एकता आत्मगत म्हणून अनुभवणारी आणि या मूळ एकतेंतून वस्तूंच्या अनेकतेचा, विविधतेचा, बहुत्वाचा आविष्कार करणारी अशी असते आणि अशी असणें अवश्य आहे; उलट वस्तूंची एकता मन मुळींच अनुभवीत नाहीं--अनेकतेचा थोडासा भाग थोड्याशा प्रमाणांत आत्मगत म्हणून अनुभवावा, एवढीच मनाची शक्ति आहे.
वर सांगितल्याप्रमाणें विश्वाची आणि मनाची रचना असल्यानें, मनाच्या रचनेंत ज्या उणीवा आहेत, त्या नसणारें मनाहून श्रेष्ठ असें जाणीवतत्त्व मनावरतीं असलें पाहिजे, हें उघड आहे. तसेंच हेंहि
पान क्र. २७०
उघड आहे कीं, हें जें श्रेष्ठ ज्ञानतत्त्व, तें सच्चिदानंदच असलें पाहिजे, मात्र हें मनाहून श्रेष्ठ ज्ञानतत्त्व म्हणजे, बदल न होणाऱ्या अनंत शुद्ध जाणिवेच्या अवस्थेंत आराम करीत राहणारें सच्चिदानंद तत्त्व नव्हे, तर या मूळ क्रियाहीन शान्त अवस्थेच्या पायावर, तिच्या सर्वसमावेशक उदरांत, शांतता टाकून गतिमान् व सक्रिय होणारें सच्चिदानंदतत्त्व हेंच, मूळ सच्चिदानंद आणि मन यांच्यामध्यें असणारें, मनाहून श्रेष्ठ, मध्यस्थ, सक्रिय ज्ञानतत्त्व होय. ही सक्रियता म्हणजे मूळ सच्चिदानंदाची साकार झालेली शक्ति होय. ही त्याची सक्रियताच विश्वनिर्मितीचें साधन आहे. अस्तित्वाची जी शुद्ध शक्ति असते, तिचें मूळ स्वरूप दुहेरी असतें--जाणीव आणि क्रियाशक्ति हें तिचें दुहेरी स्वरूप होय. हीं दोन तत्त्वें जुळ्यासारखीं एकमेकांना धरून असतात; अस्तित्व-शक्तीचें अन्तरंगच मूलत: या दोन तत्त्वांचें असतें. काल आणि स्थल यांच्या विस्तारांत नाना संबंधांनीं भरलेलें विश्व निर्माण करण्यासाठीं मूळ अस्तित्व-शक्ति ही, ज्ञान आणि इच्छाशक्ति यांचें रूप घेते; हें रूप घेणें तिला आवश्यकच असतें. हें ज्ञान आणि त्याची जोडीदार इच्छाशक्ति या विश्वांत गतिमानता आणि आकार या रूपांनीं जें जें व्यक्त करते, तें तें सर्व स्वत:च्या अन्तरंगांत नित्य समाविष्ट करून असते. ज्ञान आणि इच्छा ही जोडी अविभक्त एकत्वानें असते, तिचा विस्तार अनंत असतो; ती सर्वव्यापी, सर्वसंग्राहक, सर्वरूपनिर्मायक अशी असते; हेंच अतिमानस होय. मूळ अस्तित्व, मूळ सच्चिदानंद आपल्या मूळ अवस्थेंतून पुढें होऊन निश्चित, नियामक आत्मज्ञानाचें रूप घेतें; हें ज्ञान स्वत:मधील कांहीं सत्यें आपल्या नजरेसमोर ठेवतें आणि हीं सत्यें आपल्या कालस्थलविशिष्ट विस्तारयुक्त अस्तित्वांत (हा विस्तार अर्थात् त्याच्या मूळ कालस्थलरहित अस्तित्वाचा असतो.) व्यक्त करावयाची इच्छा या ज्ञानाला असते--मूळ आत्मकेन्द्रित निष्क्रिय अवस्था सोडून, पुढें झालेलें मूळ अस्तित्व म्हणजेच अतिमानस होय. मूळ अस्तित्वाच्या अन्तरंगांत जें असतें, तें आत्मज्ञानाचें रूप घेतें; हेंच सत्य-ज्ञान, हीच सत्य-कल्पना अतिमानस या नांवांनें ओळखली जाते. आत्मवीर्य, आत्मशक्ति, आत्मसामर्थ्य यांना सोडून हें आत्मज्ञान नसतें. जेथें ज्ञान तेथें वीर्य, ज्ञान तेंच वीर्य, अशी मुळांत व्यवस्था असल्यानें, कालस्थलपसाऱ्यांत मूळ-ज्ञान अनिवार्यपणें आपलें इष्ट आत्मसत्य, पूर्णतया आकारास आणतें.
दिव्य-जाणिवेचा मूळ स्वभाव हा असा आहे. ही जाणीव आपल्या
पान क्र. २७१
ज्ञानयुक्त शक्तीच्या व्यापारानें आपल्या उदरांत सर्व वस्तू निर्माण करते. या वस्तूंचा विकास तीच नियंत्रित करते. वस्तुगत सत्य-कल्पना किंवा वस्तुगत अस्तित्व-सत्य हें या सर्व वस्तू स्वयंविकासमार्गानें आकारास आणतें; सत्य-कल्पनेच्या पोटीं जें स्वाभाविक इच्छाशक्तियुक्त ज्ञान असतें, त्या ज्ञानाच्या बळावर सत्य-कल्पनेचें स्वयंप्रेरित वा स्वयंकृत-विकसन, संवर्धन हाच वस्तुविकास-नियंत्रणाचा मार्ग दिव्य-जाणीव स्वीकारते. अशा जाणिवेच्या मूळ महान् अस्तित्वालाच आम्ही ईश्वर म्हणतो; अर्थात् असा हा ईश्वर सर्वव्यापी, सर्वज्ञ, सर्वसमर्थ, असला पाहिजे हें उघड आहे. त्याला एवढ्यासाठीं सर्वव्यापी म्हणावयाचें, कीं सर्व आकार त्याच्या ज्ञानयुक्त अस्तित्वाचे आकार आहेत; त्या अस्तित्वाच्या स्वतःच्या क्रियाशक्तीनें हे आकार निर्मिले आहेत. त्या अस्तित्वाचा कालस्थलाच्या रूपानें जो विस्तार त्यानें स्वत: केला आहे, त्या विस्ताराच्या क्षेत्रांत हे सर्व आकार आहेत; हा ईश्वर सर्वज्ञ कां म्हणावयाचा तर, सर्व वस्तू त्याच्या ज्ञानयुक्त अस्तित्वाच्या पोटांत आहेत, ज्ञानयुक्त अस्तित्वानेंच त्या रूपाला आणल्या आहेत आणि त्या वस्तू त्या अस्तित्वाच्या सर्वस्वीं स्वाधीन आहेत; त्याला सर्वसमर्थ म्हणावयाचें तें याकरितां, कीं सर्व वस्तू स्वाधीन ठेवणारी जी ईश्वरी जाणीव, तीच सर्व वस्तू स्वाधीन ठेवणारी शक्तीहि आहे, सर्व वस्तूंना आत्मा पुरविणारी इच्छाशक्ति सुद्धां तीच आहे. सर्वज्ञ, सर्वसमर्थ असें ईश्वरी ज्ञान आणि ईश्वरी इच्छा एकमेकांशीं संघर्ष करीत नाहींत; आमची इच्छा व ज्ञान एकमेकांशीं लढूं शकतात, एकमेकांच्या विरोधी होऊं शकतात; पण ईश्वरी ज्ञान व ईश्वरी शक्ति मात्र अन्योन्यविरोधी होऊं शकत नाहींत; कारण त्या वस्तू भिन्न नाहींत. एकाच दिव्य अस्तित्वाच्या एकाच क्रियेचीं तीं दोन अंगें आहेत. तसेंच या ज्ञानाला आणि इच्छेला दुसऱ्या कोणत्याहि आंतील किंवा बाहेरील इच्छेचा, शक्तीचा व ज्ञानाचा विरोध होईल हेंहि संभवत नाहीं--कारण जें एकच एक मूळ अस्तित्व, सत्तत्त्व आहे, त्याला ''बाहेरचें'' असें जाणिवेचें किंवा शक्तीचें तत्त्व असूंच शकत नाहीं; आणि त्याचें जें ''आंतील'' ज्ञान सर्व प्रकारच्या शक्तींच्या आणि आकारांच्या रूपानें त्याच्या अन्तरंगांत व्यक्त होतें, तें ज्ञान आणि त्याचे अन्तरंगांतील आविष्कार म्हणजे वस्तुत: तें एकतत्त्वच असतें; त्या वेगळें दुसरें कांहीं असत नाहीं; त्या एकाची एकच सर्व-निर्णायक इच्छाशक्ति आणि एकच सर्वसंवादी ज्ञान यांची लीला, हेंच केवळ, उपरिनिर्दिष्ट
पान क्र. २७२
सर्व ज्ञानरचित शक्तींच्या आणि आकारांच्या अन्तरंगांतील अभिव्यक्तीचें स्वरूप असतें. इच्छांचा आणि शक्तींचा संघर्ष आमच्या दृष्टीला दिसतो याचें कारण, आमचा व्यवहार व वसति समग्रतेंत, पूर्णांत नसून त्याच्या विशिष्ट अंशांत, तदंतर्गत अलग अलग विभक्त वस्तूंच्या पसाऱ्यांत आहे. आम्हांला समग्र व पूर्ण विश्वाचें दर्शन घडत नसल्यामुळेंच इच्छांचा आणि शक्तींचा संघर्ष येथें असल्याचें आम्हांला भासतें--याच संघर्षांना एका पूर्वनियोजित संवादी रचनेचे सहकारी घटक म्हणून अतिमानस ओळखते; ही संवादी, सुसंगत रचना अतिमानसाच्या दृष्टीला नेहमींच स्पष्ट दिसत असते; कारण समग्र विश्वरचनाच नित्य तिच्यासमोर असते.
दिव्य जाणिवेच्या क्रियेनें कोणतीहि बैठक किंवा कोणतेंहि रूप धारण केलें, तरी तिचा स्वभावधर्म सदोदित असाच असतो. या जाणिवेचें अस्तित्व मुळांत सर्वबंधनातीत असल्यानें, तिच्या विस्तारांतहि हें वैशिष्ट्य, हें बंधनातीतत्त्व असतेंच; आणि म्हणून क्रियाशील जाणीव एकच बैठक किंवा एकच रूप धरून राहते असें होत नाहीं. आम्ही माणसें, साकार विश्वाचा भाग म्हणून, जाणिवेचा एक विशिष्ट प्रकार धारण करतों, हा जाणीवप्रकार म्हणजेच आम्ही असतों; ही जाणीव कालस्थल यांच्या बंधनांत वावरते; म्हणजेच आम्ही स्थलकालाचें अंकित असतों; आमच्या वरच्या पृष्ठभागींच्या जाणिवेखेरीज आम्हांला आमची ओळखहि नसते; या बाह्य जाणिवेंत एका वेळीं एकच वस्तु, एकच रूप, एकच अस्तित्व-अवस्था, एकच अनुभवसंघ आम्ही असूं शकतों; आणि ही जी एकच वस्तु आम्ही असतों, तीच आमचें सत्य स्वरूप म्हणून आम्ही ओळखतों; भूतकालांत जाऊन जें जें आमच्या दृष्टीआड झालेलें आहे, किंवा जें भविष्यकालांत येणार असल्यानें, आमच्या दृष्टिपथांत अद्यापि आलेलें नाहीं तें तें सर्व, सत्यत्व संपलेलें सत्य किंवा सत्यत्व अद्यापि प्राप्त न झालेलें सत्य, या वर्गांत आम्ही घालतों, आणि प्रस्तुत क्षणीं आम्ही जें असतों, तेवढेंच आमचें सत्यरूप म्हणून आम्ही ओळखतों. दिव्यजाणीव अशी विशिष्ट रूपानें बांधलेली नसते, अशी मर्यादा तिला नसते, एकाच वेळीं ती अनेक वस्तू असूं शकते; अनेक स्थायी अवस्था सर्वकाल धारण करणें हें देखील दिव्य जाणिवेला शक्य असतें. विश्वाची स्थापना करणाऱ्या दिव्य जाणिवेनें, अतिमानसाच्या तत्त्वांत विश्वाधारभूत ज्ञानाच्या सर्वव्यापी अशा तीन स्थायी अवस्था धारण केल्या आहेत; अतिमानसाच्या
पान क्र. २७३
या तीन अवस्थांपैकीं पहिली अवस्था वस्तूंची अनिवार्य निर्भेळ एकता दृढतेनें स्थापित करते; दुसरी अवस्था या पायाभूत एकतेंत थोडा फरक करते; एकांत अनेक आणि अनेकांत एक अशा स्वरूपाच्या आविष्काराला आधारभूत होणारी एकता, अतिमानसाच्या या दुसऱ्या स्थायी अवस्थेंत उचलून धरण्यांत येते; अतिमानसाची तिसरी स्थायी अवस्था, मूळ एकतेंत दुसऱ्या अवस्थेतल्या पेक्षांहि अधिक बदल करते; या अवस्थेंत विविध व्यक्तींच्या विविध व्यक्तित्वाचा विकास घडवून आणावयाचा असतो. म्हणून त्या विकासाला उपकारक व आधारभूत होईल अशी एकता (मूळ एकतेहून दोन पायऱ्या खालची) प्रमाण धरण्यांत येते; अतिमानसाच्या तिसऱ्या अवस्थेंत हें जें व्यक्तित्व विकसित केलें जातें, त्या व्यक्तित्वावर अज्ञानाचा प्रयोग होऊं लागला, म्हणजे अतिमानसाच्या खालीं असलेल्या अज्ञानाच्या भूमीवर, त्या व्यक्तित्वांतून स्वतंत्र अहम्चा, भ्रमात्मक 'मी' चा आम्हांत उदय होतो.
वस्तूंच्या अटळ एकतेचा पाया घालून देणारी जी अतिमानसाची प्राथमिक आणि प्रमुख अवस्था किंवा बैठक, तिचा स्वभावधर्म काय आहे हें आपण गेल्या प्रकरणांत व या प्रकरणांत पाहिलेलें आहे. शुद्ध एकतेची जाणीव या बैठकींत नसते. शुद्ध एकतेची जाणीव हें सच्चिदानंदाचें कालस्थलरहित आत्मकेन्द्रित अस्तित्व असतें; या आत्मकेन्द्रित अवस्थेंत सच्चिदानंदाची जाणीव-शक्ति कोणत्याहि प्रकारच्या स्वत:च्या विस्ताराच्या भानगडींत पडत नाहीं; या अवस्थेंत तिच्या पोटीं विश्व असलेंच तर तें बीजरूपानें, अक्षय शक्यतेच्या रूपानें असतें, कालविशिष्ट वास्तव स्वरूपांत निश्चितच असत नाहीं. याच्या उलट अतिमानसिक प्राथमिक पायाभूत एकतेची जी अवस्था असते, ती सच्चिदानंदाचा समताविशिष्ट आत्मविस्तार या स्वरूपाची असते. हा समानतेनें विस्तार पावलेला सच्चिदानंद, सर्वसमावेशक, सर्वसंग्राहक, सर्वाकारधारक असा असतो. पण या स्वरूपांतील ''सर्व'' हें अभिन्न, अभेद्य व एक या स्वरूपाचें असतें, त्याला अनेकाचें स्वरूप आलेलें नसतें; त्यांत व्यक्तित्व उदयास आलेलें नसतें. आमचा मानसिक आत्मा शुद्ध आणि शांत झाला म्हणजे या अतिमानसाचें, अतिमानसाच्या या प्रथम प्रमुख अवस्थेचें प्रतिबिंब त्यांत पडतें; आणि त्याच्या प्रभावानें आमचें व्यक्तित्वाचें भान सर्वस्वीं हरपतें; कारण व्यक्तित्वाला आधार देणारी एकाग्र जाणीव, या प्रथम बैठकींतील अतिमानसांत मुळींच नसते. या
पान क्र. २७४
अतिमानसांत ''सर्व'' विकसित झालेलें असतें. पण तें एकतेंत आणि एकत्वाला बिलगून विकसित झालेलें असतें. ही प्राथमिक अतिमानसिक दिव्यजाणीव स्वतःच्या अस्तित्वाचे 'सर्व' आकार, कोणत्याहि प्रकारें अलग अलग नसलेले आकार किंवा पदार्थ या स्वरूपांत आपणामध्यें निर्माण करून, धरून व भरून असते. आमच्या मनांत जे अनेक विचार व कल्पना येतात, त्या आपण स्वतंत्र वस्तू मानीत नाहीं, आपल्या मानसिक जाणिवेनें घेतलेले आकार मानतो; तशीच गोष्ट प्राथमिक अतिमानसांत सर्व नामरूपांची असते. जाणीवयुक्त दिव्य अस्तित्वानें आपल्या सत्यक्रीडेचा व्यवहार म्हणून अनंतामध्यें शुद्ध दिव्य रूपें आणि कल्पना उभ्या करणें, असें अतिमानसाच्या या प्रथम अवस्थेंतील नामरूपांचें स्वरूप असतें. अर्थात् मनांत सुद्धां आपण असें रूपांचें आणि कल्पनांचें संघ उभे करतो; पण हा सर्व मानसिक खेळ असत्याचा, भ्रमाचा असतो; तसें दिव्य जाणिवेच्या खेळाचें स्वरूप नसतें. अशा अवस्थेंतील जाणीवयुक्त आत्मा आणि शक्तिरूप आत्मा यांजमध्यें दिव्य आत्मा फरक करीत नाहीं; कारण या अवस्थेंत सर्व शक्ति ही जाणिवेची क्रिया असणार; तसेंच तो जड आणि चैतन्य यांजमध्यें फरक करीत नाहीं; कारण या अवस्थेंत चैतन्य वस्तूच साकार होऊन, स्वतःला सांचविण्याचें व राहण्याचें स्थान बनलेली असणार.
अतिमानसाच्या दुसऱ्या अवस्थेकडे आतां वळूं. दुसऱ्या अवस्थेंत अतिमानसिक दिव्य जाणीव ही कल्पना आणि क्रिया असे आपले दोन विभाग कल्पिते. आपल्या कल्पनेंत ती स्वत: बैठक घेते, आपली क्रिया ती स्वतःच्या समोर धरते आणि विषय-ग्राहक-पद्धतीनें (ज्ञाता-ज्ञेय-ज्ञान पद्धतीनें) या क्रियेची प्रतीति ती घेते--त्या क्रियारूप विषयाच्या मागोमाग ती कल्पनारूप जाणीव जाते, त्या क्रियेचीं कार्यें व्यापून तेथें राहते; हीं कार्यें-आकार जितके असतील, तितक्यांत वेगळी वेगळी व्यापून राहिल्यासारखी ती राहते. प्रत्येक नामरूपाचे ठिकाणीं दोन प्रकारची प्रतीति ती घेऊं इच्छिते, घेते; सर्व नामरूपांत समत्वानें राहणारा सुस्थिर ज्ञानमय आत्मा, ही एक प्रतीति आणि दुसरी प्रतीति ती घेते ती अशी : वर असें सांगितलेंच आहे कीं, स्वतःच्या कल्पनेंत ती स्वतःला केन्द्रित करते आणि तिच्या क्रियेनें बनविलेला प्रत्येक आकार स्वतःसमोर धरते. दुसऱ्या प्रतीतींत ती कल्पनारूप स्थितींत प्रत्येक आकारांत, कल्पनाकेन्द्रित ज्ञानमय आत्मा म्हणून वास करते आणि तेथें व्यक्तित्वाच्या
पान क्र. २७५
व्यापाराला आधारभूत होते, भिन्न आकारांतील व्यक्तित्वाच्या व्यापारांची भिन्नता, हा कल्पनाकेन्द्रित ज्ञानमय आत्मा उचलून धरतो--तेव्हां आत्मतत्त्व दृष्टीनें सर्वत्र एकरूप असलेलें आणि आत्म-आकार- दृष्टीनें भिन्नतेनें भरलेलें असें अतिमानसाचें दुहेरी रूप, त्याच्या दुसऱ्या अवस्थेंत असतें. भिन्न भिन्न आकारांना, भिन्नतेनें आधारभूत होणारा कल्पनाकेन्द्रित ज्ञानमय आत्मा हा, दिव्य व्यक्ति, व्यक्तिरूप दिव्यात्मा अथवा जीवात्मा (Individual Divine) म्हणून ओळखला जातो; सर्वाकारधारक एकच एक आत्मा हा, विश्वात्मक विश्वरूप दिव्यात्मा (Universal Divine) म्हणून ओळखला जातो. विश्वरूप दिव्यात्मा आणि व्यक्तिरूप दिव्यात्मा या दोहोंत आत्मतत्त्वदृष्ट्या कांहीं भेद नसतो; खऱ्या एकतेला धक्का न लावतां विश्वलीलेच्या सोईसाठीं व्यवहारत: मात्र दोहोंमध्यें भेद केलेला असतो. विश्वरूप दिव्यात्मा सर्व आत्मरूपें स्वत:चींच रूपें म्हणून ओळखतो; आणि तरीहि प्रत्येक वेगळ्या रूपाशीं वेगळें नातें ठेवतो; तसेंच प्रत्येकांत राहून इतर सर्वांशीं वेगळीं वेगळीं नातीं स्थापित करतो. व्यक्तिरूप दिव्यात्मा, आपलें स्वत:चे अस्तित्व हें एकाच विश्वरूपानें घेतलेला विशिष्ट आत्माकार व विशिष्ट आत्मक्रिया या स्वरूपाचें आहे हें ओळखतो; त्याचें सर्वसमावेशक ज्ञान हें विश्वरूपाशीं आणि स्वत:खेरीज इतर सर्व आत्मरूपांशीं असलेली त्याची एकच एक एकता त्याच्या प्रतीतीस आणून त्याला आनंद देतें. त्याचें त्रिपुटी-अधिष्ठित ज्ञान हें त्याची वैयक्तिक क्रिया स्वतःच्या आधारानें, साधार आणि समर्थित करून तिच्यांतील आनंदाचा आस्वाद त्याला देतें; तसेंच त्याची, एकत्वाशीं आणि एकत्वाच्या सर्व रूपांशीं असलेलीं एकताधारित भिन्न भिन्न नातीं, साधार आणि समर्थित करून, त्यांतील आनंदाचा आस्वादहि त्याला देतें. अतिमानसाची ही दुसरी अवस्था आपल्या शुद्धीकृत मानसांत प्रतिबिंबित झाली, तर आमच्या आत्म्याला स्वत:चें वैयक्तिक अस्तित्व राखून त्यांत व्यवहार करतां येईल; आणि असें करीत असतां, 'जें तत्त्व सर्व झालें आहे, सर्वांत रहात आहे, सर्व स्वतांत समाविष्ट करून आहे, तें एकतत्त्व आपण आहों' असा अनुभव त्याला घेतां येईल; त्याला स्वतःच्या विशिष्ट रूपांतहि ईश्वराशीं आणि इतर सर्व जीवात्म्यांशीं एकता अनुभवतां येईल. अतिमानसाच्या दुसऱ्या अवस्थेंत पहिलीहून जो वेगळेपणा आहे, तो एवढ्यापुरताच कीं, या दुसरींत एकतत्त्वानें स्वतांत गर्भित असलेली अनेकता व्यक्त केलेली आहे आणि या व्यक्त
पान क्र. २७६
केलेल्या अनेकतेंत त्याच्या एकतेचें सूत्र अखंडितपणें व्यापून आहे--हा एकात्म अनेकतेचा आणि अनेकात्म एकतेचा खेळ आणि हा खेळ अखंडपणें चालविण्यासाठीं लागणारा तत्त्वप्रपंच, एवढेंच काय ते अतिमानसाच्या दुसऱ्या अवस्थेंत पहिलीपेक्षां नवें असतें.
आतां, अतिमानसाची तिसरी अवस्था पाहूं. अतिमानसिक जाणीव ही कल्पनाकेन्द्रित होऊन, त्या जाणिवेच्या क्रियाशील भागाला पाठीमागून आधार देते; त्या भागांत प्रवेश करून त्याजपेक्षां वरिष्ठतेच्या बुद्धीनें त्याची दखल घेते; त्याजबरोबर त्यांतील आनंदाचा आस्वादहि घेते. अतिमानसाच्या दुसऱ्या अवस्थेंतील ही परिस्थिति बदलली व ती कल्पनाकेन्द्रित जाणीव सर्वस्वीं क्रियाशील जाणिवेंत स्वतःला फेंकून, स्वतःला बुडवून घेऊन, आपल्या वरिष्ठतेच्या दर्जाला व अलगपणाला मुकली व एक प्रकारें गुप्त होऊन बसली, म्हणजे अतिमानसाची तिसरी अवस्था उत्पन्न होते. दुसऱ्या अवस्थेंत विश्वक्रीडेचा जो प्रकार आढळतो, त्यांत आतां बदल होतो. व्यक्तिरूप दिव्यात्मा विश्वात्म्याशीं आणि त्याच्या इतर रूपांशीं त्याचें असलेलें भेदाचें नातें किंवा भेदाचीं नातीं हीं आपलीं मुख्य नातीं म्हणून ओळखील व त्याचा व्यवहार या नात्यांतच मुख्यत: चालेल; विश्वात्म्याशीं व त्याच्या इतर रूपांशीं व्यक्तिरूप आत्म्याचें जें पूर्ण एकतेचें नातें वस्तुत: असतें, तें नातें त्याला व्यवहारांत पदोपदीं अग्रेसर म्हणून आठवणार नाहीं. अनुभूतीचा सर्वश्रेष्ठ परिपाक म्हणून त्याला एकतेच्या नात्याचें भान गौणत्वानें होईल. दुसऱ्या अवस्थेंत एकतेचें भान प्रमुख व प्रभावी असतें, अनेकतेचें भान हें एकतेची लीला या रूपानेंच केवळ होत असतें; तर तिसऱ्या अवस्थेंत एकता बुडाशीं असते आणि वर द्वैत, अनेकता असते; येथें आनंदमय द्वैत हें गुप्त एकतेवर आधारलेलें असतें; दिव्य वैयक्तिक आत्मा आणि त्याचा उगम जो विश्वात्मा, यांजमध्यें तिसऱ्या अवस्थेंत आनंदमय द्वैताचा अनुभव हा मूलभूत अनुभव असतो; दुसऱ्या अवस्थेप्रमाणें येथें एकता मूलभूत आणि द्वैत गौण असा अनुभव नसतो. द्वैताला प्राथम्य व अद्वैताला गौणत्व आल्यानें अतिमानसाच्या तिसऱ्या अवस्थेंत कांहीं विशिष्ट परिणाम घडून येण्याची शक्यता उत्पन्न होते.
असाहि एक संभव आहे कीं, तिसऱ्या अवस्थेंत अद्वैत बुडाशीं गेल्यानें, गौण झाल्यानें त्याचा परिणाम म्हणून व्यक्तीच्या दिव्यात्म्यावर अविद्या झडप घालील. 'अनेकता हीच वास्तवता आहे, एकता ही
पान क्र. २७७
वस्तूंच्या बेरजेनें उत्पन्न होते; विश्वाची एकता म्हणजे विश्वांतील सर्व वस्तूंची गोळाबेरीज होय' ही अविद्येची विचारसरणी आहे. या प्रकारची अविद्या वैयक्तिक दिव्यात्म्यावर झडप घालण्याचा संभव असला, तरी हा संभव घडून आलाच पाहिजे अशी कांहीं वैयक्तिक दिव्यात्म्याची अगतिक स्थिति नसते. एकच एक तत्त्वाचें फळ आपण आहों, ही जाणीव दिव्यात्मा ठेवूं शकतो; 'एकतत्त्वानें आपल्या जाणिवेनें स्वतःची निर्मिति केलेली आहे, तें अनेक होऊन अनेकांपैकीं प्रत्येक वस्तूंत वसूं शकतें व वसत आहे, तें आपल्या या अनेकीभूत अस्तित्वावर सत्ता चालवितें आणि अनेक तऱ्हेचा आनंद या अनेक रूपांत घेतें--काल आणि स्थल यांची निर्मिति त्यानेंच केली असून, त्यांत विविध आनंदासाठीं स्वतःचा विस्तार त्यानें केला--या विस्तारांत जे दिव्यात्मे निर्माण केले गेले, त्यांपैकीं मी एक आहे; मी कांहीं स्वतंत्र अस्तित्व नव्हे; त्या एकतत्त्वापासून मी वेगळा नव्हे,'--ही जाणीव वैयक्तिक दिव्यात्मा ठेवूं शकत असल्यानें, अविद्येच्या डोहांत तो पडेलच असें नाहीं. ही दिव्य आध्यात्मिक व्यक्ति आग्रहानें एवढेंच म्हणेल कीं, स्थायी एकतेचें तत्त्व जितकें सत्य आहे, तितकीच अनेकता उत्पन्न करणारी एकतेची गतिमानताहि सत्य आहे; स्थायित्व आणि गतिमानता हीं एकाच अखंड सत्याचीं दोन टोंकें आहेत; एक टोंक विश्वलीलेचा पाया आहे, दुसरें टोंक विश्वलीलेचा कळस आहे; एकतेचा आनंद पूर्णतेला जावयाचा असेल, तर त्याला अनेकतेंतील भेदाचा आनंद भरीला घालणें अवश्य आहे.
अतिमानसाच्या ज्या तीन अवस्था आतांपर्यंत वर्णिल्या, त्यांत एकाच सत्य वस्तूचा उपयोग तीन प्रकारचा केलेला आहे; जें अस्तित्वाचें सत्य आनंदाचें स्थान आहे, तें तिन्हीं अवस्थांत एकच आहे; या सत्याचा उपभोग घेण्याची रीत प्रत्येक अवस्थेंत निराळी आहे--भोग घेणारा आत्मा तीन अवस्थांत तीन निराळ्या दृष्टींनीं भोग घेतो. प्रत्येक अवस्थेंत आनंद निराळा मिळेल, पण हा आनंद तीनहि अवस्थांत सत्यजाणिवेच्या मर्यादेंतच असेल. अविद्या व अज्ञान यांचा स्पर्श या आनंदाला होणार नाहीं. पहिल्या अवस्थेंत सर्व आनंद दिव्य एकतेंत सामावलेला असतो; दुसऱ्या आणि तिसऱ्या अवस्थेंत तो दिव्य अनेकतेंत वांटला जाऊन, दिव्य आत्म्याला वेगळ्या चवीचा म्हणून भोगतां येतो. या कोणत्याहि अवस्थेंत दिव्य आत्म्याला किंवा त्याच्या व्यवहाराला अविद्या, अज्ञान किंवा भ्रम असा दोष लावतां येत नाहीं. उच्च अनुभूतीचीं हीं
पान क्र. २७८
सत्यें उपनिषदांत सांगितलेलीं किंवा सुचविलेलीं आहेत. या सत्यांच्या बाबतींत प्राचीन सर्वश्रेष्ठ प्रमाण म्हणजे उपनिषदेंच होत. ईश्वरी अस्तित्वाच्या सत्याच्या अभिव्यक्तीसंबंधानें उपनिषदें जेव्हां वर्णन करतात, तेव्हां वर सांगितलेले अतिमानसिक अवस्थात्रयाचे सर्व अनुभव सत्य असल्याचें त्या वर्णनांत ध्वनित केलेलें सांपडतें. एकता आणि अनेकता यांत जाणिवेच्या दृष्टीनें एकता प्रथम आणि अनेकता नंतर--अनेकता सर्वथा आणि नित्य एकतेवर अवलंबून असते, ही गोष्ट सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक अनुभव आणि सर्व प्रकारचा वेदान्त मान्य करतो. अनेकता सत्य नव्हेच असा आग्रह कोणी धरतात, त्याचें कारण कालदृष्टीनें अनेकता नित्य दिसत नाहीं, ती एकतेंतून येते आणि तिच्यांत परत विलीन होते--तिचें 'सारभूत तत्त्व' एकता हें आहे व तिची अनेकता अनित्य असल्यामुळें 'असार' आहे, असा कांहीं वेदान्त्यांचा अभिप्राय दिसतो--पण असाहि युक्तिवाद करतां येईल : अनेकतेची अभिव्यक्ति पुन: पुन: होत असते, व्यक्त--अव्यक्त-व्यक्त--अव्यक्त--व्यक्त....याप्रमाणें अनेकता ही कालदृष्ट्या अखंडपणें पुन: पुन: अभिव्यक्त होत असल्यानें, कालातीत सर्वोत्तम दिव्य तत्त्वाचे, दिव्य एकता आणि दिव्य अनेकता असे दोन सारखेच शाश्वत पैलू असले पाहिजेत--अनेकता ही कालातीत सर्वोत्तमाची एकतेइतकीच वास्तव बैठक नसती, तर कालदृष्ट्या जी अनेकतेची अटळ व नित्य अशी पुनरावृत्ति होत असते ती झाली नसती.
खरी गोष्ट अशी आहे कीं, आमचें मानवी मन आध्यात्मिक अनुभवाचा परामर्श घेतांना, त्याच्या एका अंगावर सर्व जोर देऊन, इतर अंगांकडे बघत नाहीं; त्यानें जोर दिलेलें अंग हें केवळ एक अंग नसून सर्व शाश्वत सत्य तेंच आहे, असा सिद्धान्त करतें आणि सर्वाचें विभजन करण्यांत गुंतलेल्या मानसिक तर्कशास्त्राच्या भेदप्रधान परिभाषेंत आपला एकांगी सिद्धान्त मांडतें--तेव्हां तत्त्वज्ञानाच्या अन्योन्यविरोधी अन्योन्यमारक शाखांची आवश्यकता उत्पन्न होते. एकच एक जाणिवेचें निरतिशय एकत्व तें एकटेंच सत्य आहे असा अभिनिवेश धरून, आपण या एका दिव्य सत्यानें--दिव्य अद्वैतानें--उभा केलेला विश्वाचा खेळ पाहतो; या खेळांत अनेक वस्तूंचे जे भेद आहेत, ते वास्तव आहेत, एकतेच्या पोटांतले अवास्तव भेद नव्हेत, असें आपलें मन त्याच्या स्वभावाप्रमाणें पुकारा करतें; श्रेष्ठ अतिमानसिक तत्त्वाच्या आधारानें ही मनाची चूक
पान क्र. २७९
दुरुस्त करावी हा खरा मार्ग; पण हा मार्ग घेण्याचें सोडून, विश्वाचा भेदमय खेळ भ्रम आहे असें विधान आपण करतों. एकांगी आग्रही युक्तिवादाचें हें एक उदाहरण झालें. एकतत्त्वाचा अनेकतेच्या द्वारां चाललेला खेळ पाहून, एकतत्त्व हें नेहमींच अनेकताविशिष्ट आहे, असा आम्ही सिद्धान्त करतों, जीवात्मा म्हणजे परमात्म्यानें स्वतःच्या स्वरूपाला स्वत: दिलेला आकार आहे असें आम्ही म्हणतों, पण हें परमात्म्यानें जीवात्म्याच्या रूपानें स्वीकारलेलें विशिष्ट अस्तित्व शाश्वतचें आहे असें विधान आम्ही करतों. जीवात्मस्थितिहीन शुद्ध एकत्वजाणिवेची परमात्मस्थिति मुळांत नाहीं असा आग्रह आम्ही धरतों, शुद्ध अद्वैताचा अनुभव येतच नाहीं असा हट्ट धरतों; हें अस्थानीं आग्रहाचें दुसरें उदाहरण आहे. विश्वाचा जो विविधतेचा खेळ चाललेला आहे, त्याजवर जोर देऊन, परमात्मा आणि मानवी जीवात्मा हे नेहमींच विभक्त असतात, ते कधींहि एक नव्हते व नसणार असा आग्रह आम्ही धरतों; आणि हें विभक्तपण ज्या अनुभवानें नाहींसें होत असतें, विभक्तपणाच्या पलीकडला दोघांच्या अविभक्ततेचा, अविभाज्य एकतेचा जो अनुभव असतो, तो अनुभव खरा नव्हे असें विधान आम्ही करतों. हा तिसरा अत्याग्रहीपणाचा नमुना होय. याला द्वैतवाद म्हणतात. पहिल्या दोन आग्रही मतांना, अद्वैतवाद व विशिष्टाद्वैतवाद अशीं नांवें आहेत. आम्हीं जी तत्त्वज्ञानाची बैठक घेतली आहे, ती अशी आहे कीं, या तीन वादांत बहिष्कार आणि नकार यांचा आश्रय करून सत्याला जसा धक्का दिला आहे, तसा धक्का आम्ही सत्याला देऊं शकत नाहीं; या वादांतील बहिष्कार आणि नकार यांच्या भानगडींत आम्ही पडूं शकत नाहीं; आम्ही हें जाणतों कीं, या प्रत्येक वादांत सत्य आहे, पण त्याबरोबर त्याची अतिरेकी मांडणीहि आहे आणि त्या मांडणीमुळें त्या प्रत्येकांत सत्याच्या कोणत्या तरी अंगाचा अवास्तव निषेध केलेला आहे किंवा कोणत्या तरी अंगाला युक्तिविसंगत नकार दिलेला आहे, बहिष्कार घातलेला आहे. जें सर्वातीत परम सत्य आहे, तें सर्वस्वीं सर्वबंधनातीत, पूर्णमुक्त, पूर्णस्वतंत्र आहे असें आम्ही मानतों; आमच्या एकत्वाच्या किंवा अनेकतेच्या कल्पनेनें तें बांधलेलें नाहीं असें आम्ही मानतों; अनेकतेच्या अभिव्यक्तीसाठीं, अनेकतेचा आधार म्हणून तें एकतेचा आश्रय करतें; एकतेच्या दिव्य व विस्तृत अभिव्यक्तीचा आनंद लुटावा यासाठीं आणि परत एकतेचें स्थान गांठण्यासाठीं अनेकतेचा आश्रय तें करीत असतें, असा
पान क्र. २८०
आमचा सिद्धान्त आहे. अनंत दिव्य परमतत्त्वाला सर्व तऱ्हेचें निरतिशय स्वातंत्र्य आहे, हा आमचा पायाभूत सिद्धान्त आहे; आमच्या मनानें जे भेद कल्पिले आहेत, ज्या भेदाधिष्ठित व्याख्या केल्या आहेत, त्या भेदांच्या आणि त्या व्याख्यांच्या बंधनांत आम्ही परमतत्त्वाला टाकूं इच्छीत नाहीं--कारण असा सर्व खटाटोप हा सर्वथा विफल होणार अशी आमची खात्री आहे; म्हणून कोणत्याहि पक्षाशीं वाद घालावयाचा नाहीं असें आम्हीं येथें ठरविलें आहे.
पान क्र. २८१
प्रकरण सतरावें
दिव्य आत्मा
ज्याचा आत्मा सर्व भूतें झाला आहे, जो सर्वत्र एकतत्त्व पाहतो, त्याला ज्ञान हस्तगत असल्यानें, मोह कसा होईल? शोक कोठून होईल?
- ईश उपनिषद् ७.
अतिमानसाची कल्पना आपण समजून घेतली आहे, आपलें मानवी जीवन ज्या मनाच्या पायावर उभारलेलें आहे, त्या मनाच्या विरुद्ध गुण अतिमानसांत आहेत, हें आपण पाहिलेलें आहे. मन आणि अतिमानस या दोहोंची कल्पना आपल्याला याप्रमाणें स्पष्टतेनें आल्यानें, दिव्यता, दिव्यजीवन या संबंधींची आपली कल्पना आतां अंधुक, अस्पष्ट राहण्याचें कारण नाहीं; या संबंधींची स्पष्ट रेखीव कल्पना आतां आपण करूं शकतों, एवढेंच नव्हे, तर या दिव्यतेची आणि दिव्य जीवनाची कल्पना आतां आपण तत्त्वज्ञानी युक्तिवादाच्या भक्कम पायावर प्रतिष्ठित करूं शकतों. मानवता आणि मानवी जीवन यांच्याशीं, दिव्यत्व आणि दिव्य जीवन यांचें असलेलें नातें स्पष्टपणें पाहूं शकतों आणि विश्वाचा मूळ स्वभाव, आमचें विश्वगत पूर्ववृत्त आणि आमचा अटळ भावी विकास यांच्या आधारावर दिव्यता व दिव्य-जीवन या संबंधींची आमची आशा व आकांक्षा पूर्णपणें समर्थनीय आहे हें निःसंशय रीतीनें आपण जाणूं शकतों. आज आम्हांला फक्त मानवता व मानवी जीवन यांचाच अनुभव आहे. अतिमानसाची कल्पना नसतांना, मानवी जीवन व मानवता यांच्या पलीकडील दिव्य-जीवन व दिव्यता यांचा अनुभव मिळावा असें आम्हांस वाटलें, तरी या मोठ्या कल्पना स्पष्ट नव्हत्या, मोठी आकांक्षा व्यक्त करणाऱ्या अंधुक अशा ह्या कल्पना होत्या. अतिमानसाची ओळख झाल्यानें, दिव्यतत्त्व व ईश्वर म्हणजे काय याची आतां आमच्या बुद्धीला चांगली कल्पना येते, शाश्वत सत्य आमची बुद्धि ग्रहण करूं शकते व या शाश्वत सत्यांतून, ईश्वरी तत्त्वांतून विश्व कसें आलें हें आमच्या बुद्धीला कळूं शकतें. आम्हांला हेंहि समजतें कीं, ईश्वरापासून जें निघालें आहे, तें ईश्वराप्रत अवश्य परत गेलेंच पाहिजे. आतां आम्ही
पान क्र. २८२
विचारूं शकतों कीं, ईश्वराजवळ परत जावयाचें तर आहेच तेव्हां आमचा स्वभाव, आमचें जीवन, आमचीं इतरांशीं असलेलीं नातीं यांत आम्हीं कोणता बदल करावा? आम्हीं या सर्व बाबतींत कसें व्हावें म्हणजे ईश्वराचें सान्निध्य आम्हीं मिळविल्यासारखें होईल? आमच्या खोल अंतर्यामांत एकांत साधून, समाधि सुखाचा, ईश्वर सान्निध्याचा व ईश्वरांत विलीन होण्याच्या आनंदाचा अनुभव आम्हांला घेतां येईल; पण त्याचें आम्हांला जितकें आकर्षण आहे; तितकेंच दिव्य-जीवन जगून ईश्वररूप होण्याचें, ईश्वरसान्निध्य मिळविण्याचेंहि आकर्षण आम्हांला आहे; आणि याप्रमाणें दिव्य-जीवन जगणें म्हणजे काय हा प्रश्न, आतां अतिमानसाची ओळख झाल्यावर आम्ही विचारूं शकतों. या प्रश्नाचें उत्तर बरेंच स्पष्ट असें आतां आम्हांला मिळूं शकतें; आमचा प्रश्न आम्हांला लाभदायक होईल असा आतां संभव उत्पन्न झाला आहे. मात्र एक उणीवेची गोष्ट आमच्या आतांपर्यंतच्या विवेचनांत अशी आहे कीं मर्यादित निसर्गाकडे उतरून येत असतां, ईश्वरी-तत्त्वाचें स्वरूप कसें असतें, कसें बदलतें त्याची व्याख्या करण्याचा आम्हीं आतांपावेतों प्रयत्न केला आहे--आणि आम्ही कांहीं वरून खालीं येत नाहीं, आम्ही व्यक्तिभूत ईश्वरी तत्त्व आहों, आम्ही मर्यादित निसर्गांत आहों आणि आमचें मूळ ईश्वरी तत्त्व गांठण्यासाठीं आम्ही या निसर्गांतून वर चढत आहों--अर्थात् आतांपर्यंतचें विवेचन आम्हांला जसेंच्या तसें उपयोगी पडणारें नाहीं, ही त्यांतील उणीव आहे. असो. अतिमानसाचें क्षेत्र सच्चिदानंदाच्या खालचें; त्या क्षेत्रांत राहणारे, खालीं न उतरलेले तेथील देव व त्यांचें जीवन आणि मनाच्या क्षेत्रांतून वर चढून अतिमानसाच्या क्षेत्रांत जाणारे आम्ही, प्रथम देवत्व घालवून खालीं तळापर्यंत दौरा करून, परत वर चढून देवत्व मिळविणारे आम्ही मानव, ''देवभूत मानव'' यांचें जीवन; या दोन जीवनांत कांहीं फरक जरूर असणार आणि हा आमच्या ''देशाटनाच्या'' अनुभवाचा फरक असणार, खालीं न उतरलेल्या देवांपेक्षां आम्ही अनुभवानें अधिक श्रीमंत असणार! तथापि देवत्वाच्या सारभूत लक्षणांत मात्र, त्यांच्या आमच्यांत फरक असूं शकणार नाहीं. तेव्हां हें सारभूत देवत्व कशांत असतें? जें दिव्य-जीवन आम्ही जगूं इच्छितों, त्याचें सारभूत स्वरूप काय, तें आतां पहावयाचें आहे.
आम्ही ज्या दिव्य आत्म्याचें जीवन पहाणार आहों, तो दिव्य आत्मा
पान क्र. २८३
अज्ञानाच्या क्षेत्रांत उतरलेला नाहीं. त्याचें चैतन्य जडांत सुप्त झालेलें नाहीं, भौतिक जड निसर्गाचें त्या आत्म्याला ग्रहण लागलेलें नाहीं--असा उच्च शुद्ध स्थितींतला दिव्य आत्मा आपण पहात आहों; वस्तूंचें मूळ सत्य या आत्म्याचें जीवनक्षेत्र आहे, मूळ स्वयंसिद्ध एकत्व ही त्याची नित्य अनुभूति आहे, त्याचें अस्तित्व अनंत असून, स्वतःच्या अनंत अस्तित्वाच्या जगांत तो दिव्य आत्मा आपलें जीवन जगत आहे, ही त्याची जीवनकथा मूळ ईश्वराच्या जीवनाचीच कथा आहे, यापेक्षां वेगळा पैलूहि या दिव्य आत्म्याच्या जीवनाला आहे; ईश्वरी मायेच्या खेळांत तो भाग घेत आहे, सर्वसमावेशक सर्वदर्शी सत्य-जाणीव आणि त्रिपुटीबद्ध अंशदर्शी सत्य-जाणीव हे दोन सत्यजाणिवेचे प्रकार या दिव्य आत्म्याला उपलब्ध असल्यानें, तो ईश्वराशीं जसें एकत्व अनुभवतो, तसें त्यापासून वेगळेपण देखील अनुभवतो; तसेंच इतर आत्म्यांशींहि एकत्व आणि विभक्तत्व एकाच वेळीं त्याला अनुभवतां येतें व तो अनुभवतोहि. एकच एक परम ईश्वरी तत्त्व, स्वतःच अनेक झालें आहे. या त्याच्या एकत्वाधिष्ठित अनंत अनेकतेच्या लीलेंत, दिव्य आत्मा हा ईश्वराशीं आणि स्वतःसारख्या इतर आत्म्यांशीं एकत्व आणि अनेकत्व, अभेद व भेद सहजतेनें, अटळपणें अनुभवीत असतो. अशा दिव्य आत्म्याची जाणीव, अस्तित्व व जीवन आम्हांला ओळखीचें करून घ्यावयाचें आहे.
असा दिव्य आत्मा सच्चिदानंदाच्या ज्ञानपुरःसर लीलेमध्यें त्या लीलेचा शाश्वत घटक म्हणून असणार हें उघड आहे. अस्तित्वदृष्टीनें हा दिव्य आत्मा शुद्ध, अनंत व स्वयंभू अस्तित्व भोगणारा असेल; जीवनदृष्टीनें अमर जीवनाचा अमर्यादित मुक्त खेळ तो खेळत असणार; त्याला मृत्यु, जन्म, शरीरांतर या गोष्टी नसणार; कारण अज्ञानाचा पडदा, आमच्या भौतिक अस्तित्वाच्या अंधाराचा पडदा त्याच्यापासून दूर असेल. दुसरी गोष्ट, शक्तीच्या दृष्टीनें त्याची जाणीवशक्ति शुद्ध अनन्त असेल, तिचा पाया शाश्वत प्रकाशपूर्ण शान्ति हा असेल; तथापि ज्ञानाचे आकार, ज्ञानयुक्त शक्तीचे आकार मुक्तपणे धारण करून लीला करणारी अशी त्याची जाणीवशक्ति असेल; अडखळत मार्गक्रमण करायला लावणाऱ्या मनाच्या चुका हा दिव्य आत्मा करणार नाहीं; या चुकांच्या बाधेपासून तो अलिप्त, शांत असेल, आपल्या धडपडणाऱ्या इच्छाशक्तीकडून घडणाऱ्या गोंधळापासूनहि तो अलिप्त राहील; कारण सत्यापासून तो कधींहि दूर होत नाहीं; एकतेच्या अनुभूतीला तो कधीं पारखा होत नाहीं; त्याच्या दिव्य
पान क्र. २८४
अस्तित्वांत स्वयंभूपणें असलेला प्रकाश आणि स्वभावत: असलेला सुसंवाद या गोष्टींपासून तो केव्हांहि च्युत होत नाहीं. तिसरी गोष्ट आनंदाची. या दिव्य आत्म्याला शाश्वत अस्तित्वाचा जो अनुभव भोगतां येतो, तो अनुभव शुद्ध, स्वयंभू आनंदाचा असतो; तसेंच या आत्म्याला कालव्याप्त, कालव्यापी लीला क्रमप्राप्त असते, त्या लीलेंत त्याला आनंदाचे विविध प्रकार मुक्तपणें भोगावयास मिळतात; कारण आमच्या विकृती, घृणा, द्वेष, असमाधान, उद्वेग, या त्याला बाधा करीत नाहींत; आम्ही अस्तित्वांत विभागलेले आहोंत; आमची आग्रही इच्छाशक्ति सारखी चुकत असते; आमची वासना आंधळी प्रेरणा देऊन आम्हांला भलतें करावयास लावते; म्हणूनच घृणा, द्वेष, इत्यादि विकृतींचा ससेमिरा आमच्या पाठीमागें लागतो; दिव्य आत्मा या कटकटीपासून मुक्त असल्यानें, त्याला मुक्तपणें मूळ अस्तित्वाचा शुद्ध आनंद आणि लीलेचा विविध आनंद भोगावयास मिळतो.
या दिव्य आत्म्याची जाणीव, अनंत सत्याचा कोणताहि अंश पूर्णपणें जाणते, कोणत्याहि अंशापासून ती दूर नसते; दुसऱ्या आत्म्यांशीं या आत्म्याचीं जीं नातीं असतात, त्या नात्यांत या आत्म्यानें एखादी विशिष्ट बैठक स्वीकारली, तरी या बैठकीमुळें त्याला मर्यादा पडत नाहींत व त्यामुळें अनंत सत्याचा कोणताहि अंश त्याच्या नजरेआड होत नाहीं; त्यानें वरवर व्यक्तित्व धारण केलें, व्यवहारासाठीं भेद स्वीकारला, तरी त्याचें आत्मज्ञान पूर्ण असतें, त्यांत कमीपणा येत नाहीं. त्याची आत्मानुभूति त्याला नेहमीं निरतिशय परमतत्त्वाच्या निकट संगतीचा अनुभव देते. मी परमतत्त्वाच्या निकट आहे असाच अनुभव त्याला शाश्वतचा असतो. आम्हांला हें परमतत्त्व एक कल्पना मात्र आहे; ज्याची व्याख्या करतां येत नाहीं, अशा अस्तित्वाला आमची बुद्धि परमतत्त्व, परात्पर केवलतत्त्व, ब्रह्म अशी संज्ञा देते; तें अज्ञेय आहे, आमचें ज्ञान आणि स्वत: ब्रह्माचें स्वविषयक ज्ञान यांत अंतर आहे अशी कल्पना आमची बुद्धि बांधते; परंतु या ब्रह्माची संगति आम्हांला घडविणे हें कार्य ती करूं शकत नाहीं. दिव्य आत्म्याची गोष्ट याहून अगदीं वेगळी आहे. तो वस्तूंच्या सत्य रूपांत वावरतो, परमतत्त्वाचा मी एक आविष्कार आहे, ही नित्य जाणीव व नित्य अनुभूति त्याला असते. या आत्म्याचें जें अक्षर अस्तित्व असतें, तें अस्तित्व परात्पर परमतत्त्वाचें मूळ स्वरूप 'सच्चिदानंद' आहे, अशी जाणीव त्याला असते. त्याचा जो जाणीवयुक्त
पान क्र. २८५
अस्तित्वाचा--जीवनाचा--खेळ असतो, तो खेळ म्हणजे त्या परमतत्त्वाचा आविष्कार आहे, तो खेळ म्हणजे सच्चिदानंदाचे लीलामय आकार आहेत, अशी जाणीव त्याला असते. त्याची प्रत्येक ज्ञानक्रिया, ज्ञानस्थिति, म्हणजे अज्ञेय परमतत्त्वाच्या विविध आत्मज्ञानाची स्थिति, अशी जाणीव त्याला असते; त्याची सामर्थ्याची, इच्छाशक्तीची, वीर्याची प्रत्येक स्थिति व कृति म्हणजे परात्पराची स्वत:ला स्वाधीन ठेवण्याची क्रिया आहे, परात्पराच्या अस्तित्वाच्या व ज्ञानाच्या शक्तीचा एक सरूप आविष्कार आहे, अशी जाणीव त्याला असते; त्याची आनंदाची, प्रेमाची प्रत्येक अवस्था व कृति, परात्पराची स्वत:ला आलिंगन देण्याची कृति आहे, परात्पराचा जाणीवयुक्त आत्म-तर्पणाचा, आत्मसुख-भोगाचा तो एक प्रकार आहे, अशी जाणीव त्याला असते. या प्रमाणें दिव्य आत्म्याची जाणीव, सर्व अवस्थांत व सर्व कृतींत सदासर्वदा परात्परमय असेल. दिव्य आत्म्याला घडणारा परात्पराचा अनुभव म्हणजे एकाद्या वेळीं ओझरता आलेला किंवा प्रयत्नांतीं मिळविलेला, परंतु मुश्किलीनें टिकणारा अनुभव नसतो; नेहमींची अवस्था वेगळी आणि परात्पराचा अनुभव या अवस्थेला जोडून मिळालेला किंवा मिळविलेला, या अवस्थेवर कळस म्हणून लाभलेला, असा तो अनुभव नसतो; तर त्याचा हा अनुभव त्याच्या अस्तित्वाचा पायाच असतो. एकतेची काय किवा भेदस्थितिची काय, दोन्ही प्रकारची दिव्य आत्म्याची लीला ही परात्पराच्या या अनुभूतीवर अधिष्ठित असते. त्याचें सर्व जाणणें, संकल्प करणें, कृति करणें, आनंद अनुभवणें हें सर्व परात्परमय असतें; त्याचा कालातीत आत्मा आणि त्याच्या काळाचा प्रत्येक क्षण परात्पराच्या अनुभूतीनें भरलेला असतो. त्याचा स्थलातीत आत्मा आणि त्याचे स्थलनिष्ठ विस्तारांतील प्रत्येक स्वरूप परात्परमय असतें. सर्व कार्यकारणभाव आणि सर्व परिस्थिति यांच्या अतीत असलेली त्याची निर्भेळ सर्व-निरपेक्ष शुद्धता आणि त्याची परिस्थितिबद्ध पूर्वयोग-सापेक्ष कारणभावनियंत्रित अशी शुद्धेतर अवस्था, दोन्ही सारख्याच परात्परमय असतात. याप्रमाणें परात्पराची शाश्वत संगति दिव्य आत्म्याला लाभत असल्यानें, त्याला अनंत स्वातंत्र्य, अनंत आनंद यांचा लाभ होतो; परात्पराच्या लीलेंत त्याला कसलीहि असुरक्षितता स्पर्श करीत नाहीं; त्याच्या दिव्य अस्तित्वाचा व दिव्य जीवनाचा जीवनरस, सारभूत सत्त्व, मूळ आधार, त्याची ही शाश्वत परात्परमयताच त्याला पुरविते.
पान क्र. २८६
सच्चिदानंदाच्या शाश्वत अस्तित्वाचे जे दोन अविभाज्य पर्याय, परात्पराच्या आत्म-अभिव्यक्तीचे जे दोन अविभाज्य ध्रुवबिंदू--एकता आणि अनेकता-- यांचे दोन प्रकारचें जीवन दिव्य आत्मा एकाच वेळीं अनुभवील, व्यवहारांत आणील. वस्तुत: जें कांहीं अस्तित्वांत आहे, तें सर्वच याप्रकारें दोन पर्यायांचें जीवन जगत असतें; परंतु आमची आत्म-जाणीव विभागलेली आहे आणि तिला हे दोन पर्याय एकमेकांशीं विसंगत दिसतात; आणि म्हणून या दोहोंपैकीं एक जीवन ती पसंत करते; ती अनेकतेंत राहणें पसंत करते व असें करतांना प्रत्यक्ष आणि पूर्ण एकत्वाची अनुभूति, ती आपण होऊन दूर सारते किंवा ती एकतेच्या अनुभूतींत राहणें पसंत करते आणि असें करतांना अनेकतेची अनुभूति ती दूर सारते. दिव्य आत्मा याप्रकारें अकारण द्वैताचा, जीवनैक्यविच्छेदाचा दास होत नाहीं. त्याला एकाच वेळीं स्वतःमध्यें अनन्त आत्म-एकीभवन आणि अनन्त आत्म-विस्तार, आत्म-प्रसार यांचा अनुभव घेतां येतो. परात्पर एकतत्त्व, स्वतःच्या एकतामय जाणिवेंत अपार अनेकता ह्या संभाव्य म्हणून, अव्यक्त म्हणून धारण करतें; (आमच्या मनाला अर्थातच हें जें अव्यक्त, तें अभावासारखेंच वा अभावच वाटतें.) आणि तेंच एकतत्त्व, स्वतःच्या जाणीवयुक्त अस्तित्वाची, संकल्पाची व आनंदाची लीला म्हणून गतिमान् असणारी अशी व्यक्त अनेकता, स्वतःच्या विस्तारमय जाणिवेंत धारण करतें. आम्ही ज्याचें स्वरूप पाहत आहोंत, तो दिव्य आत्मा, स्वतःमध्यें परात्पर एकतत्त्वाचे हे दोन कारभार एकाच वेळीं समग्रतेनें अनुभवतो. एकतत्त्व आणि त्याचीं अनेक रूपें यांचें अन्योन्य-आकर्षण या दिव्य आत्म्याला स्पष्टपणें अनुभवावयास मिळतें; अनेक रूपांचा शाश्वत उगम व त्यांचें पायाभूत असें जें एकतत्त्व, त्याला आपल्याकडे आकर्षित करून, त्याच्या उच्च पातळीवरून त्याला आपल्या पातळीवर आणण्यांत नित्य मग्न असलेलीं अनेक रूपें या दिव्य आत्म्याच्या नजरेस पडतात; त्याचबरोबर जें एकतत्त्व या अनेक रूपांच्या भेदमय लीलेचें आनंदपूर्ण समर्थन करणारें आहे आणि या लीलेच्या शाश्वत कळसासारखें आहे, त्या एकतत्त्वाचा आकर्षणानें हीं अनेक रूपें त्याजकडे चढत जाण्याचा नित्य प्रयत्न करीत असलेलीं दिव्य आत्म्याच्या नजरेस पडतात. दिव्य आत्म्याच्या दृष्टीसमोर वस्तुजाताचा हा महान् देखावा नित्य असतो. हें महान् वस्तु-दर्शन दिव्य आत्म्याच्या सत्य-जाणिवेचें अंगभूत दर्शन आहे. वैदिक ऋषींनीं ''सत्यं कृतं बृहत्'' असें जें सत्य-जाणीवविषयक
पान क्र. २८७
मंत्र-गान केलें, त्याचा पाया हें महान् वस्तु-दर्शन आहे; अन्योन्य-विरोधी सर्व पर्यायांची ही एकात्मता, ही एकता हें खरें ''अद्वैत'' होय. परम अज्ञेयाचें ज्ञान ज्यांत सामावलें आहे, असा सर्वोच्च, सर्वसमावेशक शब्द ''अद्वैत'' हाच आहे. दिव्य आत्मा या अद्वैतांत आपलें जीवन व्यतीत करीत असतो.
एकतत्त्व हें मूलत: अनंत आहे, त्याची आत्मकेन्द्रित घनीभूत एकता ही असीम व अनंत आहे, त्याप्रमाणें त्याची विस्ताराची स्थिति हीहि अनन्त आहे. अनन्त एकतेचे हे दोन प्रकार आहेत, एक विस्तारशून्य घनीभूत आत्मैककेंद्रित एकता आणि दुसरी विस्तारमय प्रवाही आत्मप्रसार-विशिष्ट एकता. अस्तित्व, जाणीव, संकल्प आणि आनंद या मूळ एकतत्त्वाच्या चार पैलूंत नानाविधता उत्पन्न झालेली दिव्य आत्म्याच्या प्रत्यायास येते आणि ही नानाविधता मूळ घनीभूत एकतेचाच प्रवाह, विस्तार व प्रसार असून त्यांत वस्तुत: भेद आणि विभागणी यांचा कांहीं संबंध नाहीं. या नानाविधतेचें खरें स्वरूप म्हणजे मूळ घनीभूत, विस्तारशून्य एकतेनें, स्वत: होऊन घेतलेलें विस्तारमय रूप आहे. पूर्वीचें रूप आणि हें नवें रूप हीं दोन्हीं एकतेचींच रूपें आहेत, ही गोष्ट दिव्य आत्मा ओळखतो. स्वत:च्या अस्तित्वाच्या सारभूत अंशांत हा दिव्य आत्मा सदैव घनीभूत एकतेचा असेल आणि स्वत:च्या अस्तित्वाच्या विस्तारमय स्थितींत हा दिव्य आत्मा सदैव नानाविध रूपें घेऊन व्यक्त होत राहील. त्याचे ठिकाणीं जें कांहीं साकार होईल तें सर्व, एकतत्त्वांतील शक्तिबीजांचें व्यक्त स्वरूप असेल; अनाम, अशब्द शांतींतून नाम किंवा शब्द स्पंदन करीत त्याचे ठिकाणीं व्यक्त होईल; त्याचे ठिकाणीं निराकार सारतत्त्वाला आकार हा व्यक्तांत आणील; शांत शक्तीला प्रेरणा होऊन, तींतून क्रियाशील संकल्प वा वीर्य त्याचें ठिकाणीं बाहेर येईल; 'मी आत्मा' अशा जाणिवेचा किरण कालातीत आत्मज्ञानांतून सूर्यकिरणाप्रमाणें त्याचें ठिकाणीं पुढें येईल; शाश्वत आत्म-जाणिवेच्या एकरूप अस्तित्वांतून, 'मी अमुक' अशीं जाणीवयुक्त रूपें धारण करणारी विभूतींची लाट त्याचें ठिकाणीं उसळेल. जिवन्त झऱ्यांतून अखंडपणें पाणी वर यावें त्याप्रमाणें शाश्वत शांत सुखांतून आनंद आणि प्रेम नित्यश: त्याचे ठिकाणीं वर येत राहतील; दिव्य आत्म्याच्या अस्तित्वाचा गाभा परात्पर एकतत्त्वाचा असतो; त्यांत जें सर्व कांहीं शक्तिरूपानें, बीजरूपानें असतें, तेंच पुढें त्याच्या विस्तारमय रूपांत स्वयंप्रेरणेनें व्यक्त होतें. या दिव्य आत्म्याचा स्वत:चा आविष्कार म्हणजे परात्पराच्या अद्वैतमय द्वैताचा किंवा द्वैतमय अद्वैताचा
पान क्र. २८८
आविष्कार होय. या आविष्कारांत जें कांहीं अन्यसापेक्ष व्यक्त होतें, तें एकप्रकारें स्वतःपुरतें परात्परासारखेंच अन्यनिरपेक्ष असतें; कारण तें हें जाणून असतें कीं, मी परात्पराचा आविष्कार आहे; तसेंच त्याचे ठिकाणीं अज्ञान असत नाहीं; आणि म्हणून 'अन्यसापेक्ष इतर गोष्टी परक्या नाहींत' ही जाणीव त्याला असते, व स्वतःइतक्याच इतर अन्यसापेक्ष रचना पूर्ण आहेत, हीहि अनुभूति त्याला असते.
अतिमानसाच्या क्षेत्रांत अस्तित्वाच्या तीन पायऱ्या असतात हें आपण पाहिलें आहे; दिव्य आत्मा जेव्हां एकतत्त्वाच्या विस्तारमय अस्तित्वांत जीवन जगतो, तेव्हां वरील तीन पायऱ्या त्याच्या समोर असतात; पण आम्ही आमच्या मनाच्या पातळीवरून या पायऱ्यांना जशा तीन समजतो, तसा तीनपणा दिव्य आत्म्याच्या दृष्टीनें त्यांच्या ठिकाणीं नसतो; सच्चिदानंद परमतत्त्व साकार होतांना, व्यक्त होतांना या तीन पायऱ्यांचा एकाच वेळीं उपक्रम करतें; त्याच्या एकाच आविष्काराचे हे तीन पैलू आहेत अशी दिव्य आत्म्याची या तीन पायऱ्यासंबंधाची अनुभूति असते. सत्य-ज्ञानपूर्ण अतिमानसाचा पाया महान् सर्वसमावेशकता असतो; या कारणानें दिव्य आत्मा आपल्या सर्वसमावेशक आत्मविषयक अनुभूतीच्या पोटांत वरील तीन पायऱ्यांचा म्हणा, पैलूंचा म्हणा, एकदम एका ज्ञानक्रियेनें संग्रह करूं शकतो; सर्व वस्तूंसंबंधाचा, सर्व अस्तित्वासंबंधाचा या दिव्य आत्म्याच्या बुद्धीचा, मनाचा, इन्द्रियांचा अनुभव एकाच वेळीं तीन प्रकारच्या दिव्य स्वरूपाचा असतो :-- १) आत्माच सर्व वस्तु बनलेला आहे, हा आत्मा माझा आत्मा आहे, सर्वांचा आत्मा आहे; येथें सारभूत अस्तित्व (Self-being) हें आत्मा असून, विभूतिमय अस्तित्वहि (Self-becoming) आत्माच आहे; विभूतींत अलग अलगपणा नाहीं, माझ्या आत्मजाणिवेच्या पोटांत सर्व विभूती आहेत--त्यांना जाणिवेच्या बाहेर अस्तित्वच नाहीं; २) सर्व अस्तित्वें -- सर्व जीव एकाच आत्म्याचे आकार आहेत; प्रत्येक साकार आत्मा अस्तित्वदृष्टीनें मूळ एक आत्म्यांत आहे, या एकांत प्रत्येक आत्मविभूतीला विशिष्ट दृष्टिकोन आहे; या एकांतच रहाणाऱ्या दुसऱ्या सर्व विभूतींशीं प्रत्येक विभूतीचीं विशिष्ट नातीं आहेत. मात्र या एकावर सर्व विभूती अवलंबून आहेत; या एकाची व्याप्ति अनन्त असून, तींत प्रत्येक विभूति त्या एकाचा जाणीवयुक्त आकार आहे; स्वत: एकच हें स्वतःच्या निराकार अनन्त स्वरूपांत साकार होऊन, अनन्त जाणीवयुक्त रूपांनीं वावरत आहे; ३) सर्व जीवांना व्यक्तित्व आहे; प्रत्येक जीव
पान क्र. २८९
दिव्य-व्यक्ति आहे; या दिव्य व्यक्तीला तिचा स्वतंत्र दृष्टिकोन आहे; या प्रत्येक दिव्य-व्यक्तीच्या अन्तर्यामीं परम एकतत्त्व वसति करून आहे; आणि म्हणून प्रत्येक व्यक्ति केवळ आकार नव्हे, केवळ प्रतिमा नव्हे, पूर्ण अशा सत्यरूप एकतत्त्वाचा केवळ आभासमय भाग नव्हे; शांत अद्वैत सागरावरील केवळ पृष्ठभागची फेंसाळ लाट नव्हे, (जीवासंबंधानें मनानें या कल्पना बांधल्या आहेत आणि त्या सहजच अपूर्ण व सदोष आहेत) तर प्रत्येक व्यक्ति पूर्ण-एकरूपांत उदयास आलेलें, स्वत: पूर्ण असेंच रूप आहे; प्रत्येक व्यक्ति मूळ अनंत सत्यांत त्या सत्याला द्विरुक्त करणारें सत्यच आहे; पूर्ण सागराला स्वतःमध्यें पूर्णतया सामावून घेणारी, सागराची लाट, असेंच व्यक्तीचें सत्य स्वरूप आहे; प्रत्येक व्यक्ति अन्य-सापेक्ष रचना तर खरीच, परंतु ही रचना तिच्या आकाराच्या मागें जाऊन अवलोकन केली, तिचें पूर्ण स्वरूप पाहिलें म्हणजे असा प्रत्यय येतो कीं, ती स्वत: सर्व-निरपेक्ष, मूळ एकतत्त्वच आहे. दिव्य आत्म्याचे हे तीन दिव्य अनुभव त्याला एकाच वेळीं मिळणारे असे आहेत.
एका परम अस्तित्वाचे हे तीन पैलू आहेत. आत्मज्ञानाचा आधार या सर्वांना आहे. परम दिव्य-तत्त्वाच्या मानवी साक्षात्कारानुसार उपनिषदांत ही आत्मविषयक अनुभूति तीन प्रकारें वर्णिली आहे. १) आत्मज्ञानी अनुभवतो कीं, त्याचा आत्मा सर्वभूत झाला आहे. २) आत्मज्ञानी स्वतःच्या आत्म्याचे ठिकाणीं सर्व भूतें पाहतो. ३) आत्मज्ञानी सर्व भूतांचे ठिकाणीं स्वतःचा आत्मा पाहतो. आमची सर्व भूतांशीं एकता आहे, ती पहिल्या अनुभूतीवर आधारलेली आहे; आम्ही भिन्न व्यक्ति असून, अभिन्न-एक विश्वात्मा आहोंत, ही गोष्ट दुसऱ्या अनुभूतीवर आधारलेली आहे; आम्ही विश्वरूप असून, आम्हांला व्यक्तित्व आहे, ही गोष्ट तिसऱ्या अनुभूतीवर आधारलेली आहे. आमची मानसिक जाणीव अपूर्ण व सदोष आहे; कोणतीहि गोष्ट नीट आकलन होण्यासाठीं तिला एकांगीपणानें त्या गोष्टीवर, तिच्या भिन्नतेवर, अलगपणावर एकाग्रतेनें जोर द्यावा लागतो. अशी वस्तुस्थिति असल्यानें, आत्मविषयक ज्ञानाच्या, वर सांगितलेल्या तीन बाजू मनाला एकतेनें आकलन करतां येत नाहींत; तें एक बाजू सत्य मानून बाकीच्या असत्य मानतें; सत्याला बहिष्कार घालणारें त्याचें हें अपूर्ण दर्शन महान् सत्याच्या क्षेत्रांत मानवी प्रमादाला नेहमींच जागा करून देतें; सर्वसमावेशक एकतेच्या क्षेत्रांत अन्योन्यविरोधाला, अन्योन्यनिषेधाला नेहमींच डोक्यावर घेतें--अशी आमची
पान क्र. २९०
मानसिक क्षेत्रांतील शोचनीय अवस्था असली, तरी जो आत्मा अतिमानसिक जाणिवेचा आहे, दिव्यतासंपन्न आहे, त्याचें क्षेत्र त्याच्या स्वभावधर्मानेंच सर्वसमावेशक एकतेचें, अनंत समग्रतेचें क्षेत्र असल्यानें, वर आत्मविषयक जाणिवेच्या ज्या तीन बाजू सांगितल्या, त्या तीन बाजू एकाच आत्मज्ञानाच्या बाजू आहेत, हें तो दिव्य आत्मा ओळखतो; त्याच्या दृष्टीनें आत्मा सर्व भूतें आहे, आत्म्यांत सर्व भूतें आहेत, आत्मा सर्व भूतांचें पोटीं आहे, या तीन अनुभूती वेगवेगळ्या नसून एकाच महान् अनुभूतीचीं तीं तीन अंगें आहेत; तीन अंगांची ती एकच महान् अनुभूति आहे. प्रत्येकाची सर्व भूतांशीं एकता, प्रत्येकाची सर्वता, प्रत्येकाची व्यक्तिता या तीन स्वतंत्र अनुभूती नसून, एकाच अनुभूतीचीं तीन अंगें आहेत, हें दिव्य आत्मा अनुभवतो आणि या अनुभवानुसार त्याचें वागणें असतें.
या अतिमानसिक आत्म्यानें दिव्य व्यक्तीच्या व्यक्तित्वाची, व्यक्तित्वाच्या जाणिवेची बैठक घेतली, इतर व्यक्तीशीं वेगळेपणाचा संबंध लक्षांत घेऊन वागण्याचें या अतिमानसिक व्यक्तीनें ठरविलें, तरी तिच्या जाणिवेच्या पायांत ही महान् जाणीव अटळ आणि अढळ असेल : सर्व कांहीं मूळ पूर्ण एकतेच्या पोटीं उदयास आलें आहे, येत आहे; तसेंच या मूळ घनीभूत एकतेची प्रवाही आवृत्ति जी विस्तारमय एकता, तीहि या अतिमानसिक व्यक्तीच्या जाणिवेच्या पाठीमागें उभी असणार--आणि या दोन्ही एकता या व्यक्तीला केव्हांहि अनुभवतां येतील; व्यक्तित्वाच्या जाणिवेंतून उठून, केव्हांहि परत मूळ एकतेच्या किंवा विस्तारमय एकतेच्या जाणिवेंत या व्यक्तीला स्थान घेतां येईल आणि तेथून आपल्या व्यक्तित्वाकडे बारकाईनें पाहता येईल. या सर्व अवस्था देवता अनुभवतात, असें वेदांत दाखविलें आहे. तत्त्वदृष्टीनें सर्व देव एकच अस्तित्व आहेत; या एकच अस्तित्वाला ऋषी भिन्न नांवें देतात आणि ही भिन्न नांवें म्हणजेच देव होत. या देवांचें कर्म पाहिलें, तर महान् सत्य आणि ऋत यापासून तें उगम पावतें; या दोन तत्त्वांवर तें आधारलेलें असतें. या गोष्टीवर लक्ष ठेवून अग्नि किंवा इतर कोणतीहि देवता सर्वदेवतारूप आहे असें म्हटलें जातें; कोणतीहि एक देवता सर्व इतर देवता झाली आहे असें म्हटलें जातें; तसेंच कोणतीहि देवता सर्व देवतांना स्वतःमध्यें समाविष्ट करून आहे, रथचक्राच्या नाभीमध्यें चक्राचे आरे असतात, त्याप्रमाणें सर्व देवता प्रत्येक देवतेशीं संलग्न आहेत, असेंहि म्हटलें जातें. प्रत्येक देवता
पान क्र. २९१
मूळ एकतत्त्व, देवदेव आहे असेंहि वर्णन येतें. तथापि अग्नि स्वतंत्र देवता आहे, इतर सर्व देवतांना त्याची मदत होते, त्यांच्याहून अग्नीत सामर्थ्य अधिक आहे, ज्ञान अधिक आहे, तरीहि विश्व-व्यवस्थेंत अग्नीला इतर देवतांच्या खालचें स्थान आहे. त्याला इतर देवतांचा दूत, 'होता', कर्मकर्ता म्हणून काम देण्यांत येतें असेंहि वर्णन येतें. विश्वाचा जनक अग्नि आहे, विश्वाचा तो पिता आहे, तरी आमच्या क्रियांमधून तो जन्मास येतो, असें वर्णन येतें. तो जसा मूळ दिव्य आंतरात्मा आहे, तसेंच, व्यक्त झालेला दिव्य आंतरात्मा हेंहि त्याचें स्वरूप आहे, सर्व व्यक्त वस्तूंच्या अंतर्यामीं वास करणारें मूळ एकतत्त्व हेंहि अग्नीचें स्वरूप आहे, असा वेदांतील अग्नीच्या वर्णनाचा अभिप्राय आहे. अग्नीच्या वर्णनाप्रमाणेंच इतर देवतांचेंहि वर्णन वेदांत आढळतें. याचा इत्यर्थ हा कीं, एकता, सर्वता व व्यक्तिता या तीनहि अवस्था देव एकाच वेळीं अनुभवतात.
दिव्य आत्मा हा या देवांसारखा सर्वसमावेशक आत्म-जाणिवेनें युक्त असतो. त्याचा मूळ ईश्वर किंवा त्याचा परम आत्मा आणि दुसऱ्या रूपांतील त्याचे दुसरे आत्मे यांच्याशीं दिव्य आत्म्याचे संबंध त्याच्या सर्वसमावेशक आत्म-ज्ञानानेच निश्चित होतात. अस्तित्व, जाणीव आणि ज्ञान, संकल्प आणि शक्ति, प्रेम आणि आनंद एतद्विषयक हे दिव्य आत्म्याचे संबंध असतात. हे संबंध इतके भिन्न भिन्न असूं शकतात कीं त्यांची गणती करतां येत नाहीं. कोणत्याहि भेदांत एकतेचें भान अढळ राखणारा, आत्म्याआत्म्याचा कोणताहि संबंध या अगणित भिन्न संबंधांत अंतर्भूत होऊं शकेल. उदाहरणार्थ, दिव्य आत्म्याचे आनंदविषयक संबंध घ्या. दिव्य आत्म्याला स्वतःचे ठिकाणी जो अनेक प्रकारचा अनुभव येतो, त्या सर्व अनुभवांचा आनंद तो भोगतो; त्याचीं इतरांशीं जीं नातीं असतात, त्यामुळें त्याला मिळणारा सर्व प्रकारचा अनुभव त्याला आनंद देत असतो; हे इतर रूपांतील इतर आत्मे, विश्वांतील खेळांत विविधता येण्यासाठीं असतात; या इतर आत्म्यांशीं होणारें दिव्य आत्म्याचे हितगुज हें अर्थातच त्याला सर्व प्रकारें आनंददायक असतें; शिवाय या इतर आत्म्यांचे अनुभवहि स्वत:च्या अनुभवाप्रमाणेच दिव्य आत्म्याला आनंद देतात--आणि वस्तुत: हे इतर आत्मे कांहीं वेगळे नाहींत; दिव्य आत्म्याचे ते खरोखरीच अविभाज्य अंगरूप आहेत; आणि म्हणून त्यांचे अनुभव आणि त्यांचा आनंद तो दिव्य आत्म्याचा स्वतःचाच अनुभव आणि आनंद आहे. हा विविध
पान क्र. २९२
आनंदभोग दिव्य आत्म्याला प्राप्त होऊं शकतो याचें कारण, त्याला मूळ एकतत्त्वाची शाश्वत स्मृति व अनुभूति असते; तें जें एकतत्त्व, तो जो परम आत्मा, दिव्य आत्म्याचा आत्मा, तो सर्व आत्म्यांत वेगळा वेगळा वसति करीत असल्यानें भेदयुक्त दिसला, तरी हे सर्व आत्मे त्या एकतत्त्वाच्या पोटांत असल्यानें, सर्व प्रकारचे हे दर्शनी भेद अभेदाच्या पोटांतच असतात; दिव्य आत्म्याचे स्वतःचे अनुभव, त्याचीं इतरांशीं असलेलीं नातीं, इतरांचे अनुभव, त्या सर्वांची त्याच्या स्वतःशीं असलेलीं नातीं, या सर्व गोष्टी या मूळ एकतत्त्वाचा, स्वतःच्या आत्म्याचा विविध आनंद आहे, त्याची आनंदलीला आहे अशी अनुभूति व कायम स्मृति दिव्य आत्म्याला असते. ही त्याची शाश्वत जाणीव त्याला विविध संबंधांतील विविध आनंद भोगण्यास समर्थ करते. दिव्य आत्म्याचा जो जो अनुभव असतो, त्या त्या अनुभवाचा पायाभूत व प्राणभूत आधार ही एकता, ही एकतत्त्वानुभूतिच असते. या एकतेच्या अनुभूतीच्या पोटांत त्याचे सर्व अनुभव सामावलेले असतात, म्हणून तो सर्वदा आनंदमय असतो; आमच्या विभक्त त्रुटित जाणिवेनें निर्माण केलेले आनंद-विघातक विसंवाद व संघर्ष त्याला स्पर्श करीत नाहींत; तो या विसंवादांच्या पलीकडे असतो; विभक्ततेचा झेंडा मिरविणारा 'मी' व अज्ञान यामुळें आमच्या जाणिवेचे तुकडे पडतात. जाणिवेची एकता नष्ट करणारा अज्ञानाचा व 'मी' चा धक्का दिव्य आत्म्याला लागलेला नसतो, म्हणून दिव्य आत्म्याचे इतर आत्म्यांशीं असलेले विविध संबंध एकमेकांना उपकारक व पूरक असेच असतात. हे सर्व आत्मे बुद्धिपुरस्सर एकमेकांचे हित पाहतात. सर्व काळ चालणाऱ्या सुरेल संगीताचे एकमेकांत मिळून जाणारे भिन्न भिन्न अनंत अन्योन्यपूरक स्वर हीच उपमा या दिव्य आत्म्यांच्या परस्परसंबंधांना बरोबर लागूं पडते; हे संबंध नित्य आनंदपूर्ण असतात.
जी गोष्ट दिव्य आत्म्याच्या आनंदविषयक संबंधांची, तीच गोष्ट इतर संबंधांची--त्याचें अस्तित्व, ज्ञान व इच्छा आणि इतरांचें अस्तित्व, ज्ञान व इच्छा यांच्या परस्परसंबंधांना वरील सुसंवादाचा नियम लागूं आहे. कारण त्याचा अनुभव आणि त्याचा आनंद हा सर्व, त्याच्या अस्तित्वाच्या जाणीवयुक्त आनंदमय शक्तीचा खेळ असतो; या खेळांत एकतेचें सत्य अविरतपणें पाळलें जातें आणि म्हणून ज्ञान आणि इच्छा यांमध्यें संघर्ष किंवा आनंदाचा ज्ञानाशीं वा इच्छेशीं संघर्ष अशी गोष्ट केव्हांहि शक्य नसते; तसेंच एका आत्म्याचें ज्ञान, इच्छा व आनंद दुसऱ्याच्या ज्ञानाशीं,
पान क्र. २९३
इच्छेशी व आनंदाशीं विसंवादी असत नाहींत, कारण त्या सर्वाना आपण एकाचे अंश आहोंत ही जाणीव सतत असते; आमच्या जीवनांत व अस्तित्वांत भाग पडलेले असल्यानें व ऐक्यभंग झालेला असल्यानें, विसंवाद, संघर्ष, आणि विरोध हे प्रकार आमच्या परस्परांच्या ज्ञान, इच्छा व आनंद यांच्या एकत्र येण्यानें निर्माण होतात; अतिमानसिक क्षेत्रांत स्थिति वेगळी असते; या भिन्न गोष्टींचें एकत्र येणें म्हणजे, एका असीम संगीताच्या भिन्न भिन्न स्वरांचें एकत्र येणें, एकमेकांत मिळणें, एकमेकांना पूरक होऊन जीवन-संगीताची गोडी वाढविणें, असा प्रकार तेथें असतो.
दिव्य आत्म्याचीं अंगें परस्पर सुसंवादी असतील आणि त्याचीं इतर आत्म्यांशीं असलेलीं सर्व नातीं सुसंवादमय असतील या गोष्टी आपण पाहिल्या. आतां, त्याचें ईश्वराशीं, त्याच्या परम आत्म्याशीं जें नातें असतें, त्याचा विचार करावयाचा. सर्वरूप आणि सर्वातीत दिव्य तत्त्वाशीं दिव्य आत्म्याच्या अस्तित्वाचें नातें पूर्ण एकतेचें असतें आणि त्याची अनुभूति त्याला निरंतर असते. त्याच्या व्यक्तिगत जीवनांत त्याचें ईश्वराशीं असलेलें वैयक्तिक एकतेचें नातें त्याला आनंद देतें; सर्व इतर आत्मे त्याचेच अंगभूत आहेत, ही अनुभूति त्याला असल्यानें, ईश्वराचें त्या आत्म्यांशीं असलेलें एकतेचें नातें, हेंहि दिव्य आत्म्याला वैयक्तिक एकतेच्या नात्याप्रमाणें आनंद देतें; सर्वता ही व्यक्तितेप्रमाणेंच दिव्य आत्म्याची नित्य अनुभूति असते आणि सर्वतेच्या पोटांत सर्वच आत्मे असतात--तेव्हां या सर्वांचें ईश्वराशीं असलेलें आनंदपूर्ण एकतेचें नातें, दिव्य आत्म्याला स्वतःच्या व्यक्तरूपाशीं असलेल्या एकतेच्या नात्याइतकेंच जवळचें असतें ही गोष्ट उघड आहे, दिव्य आत्म्याचें ईश्वराशीं जें वैयक्तिक आणि सार्वत्रिक एकतेचें नातें असतें, त्या नात्यांतील ज्ञानविषयक संबंध घेतले, तर या संबंधांत ईश्वराच्या सर्वज्ञतेचा खेळ त्याच्या अनुभवास येतो, ही गोष्ट स्पष्ट आहे; कारण ईश्वर ज्ञानरूप आहे. आपल्या मानसिक भूमीवर आपल्याला जें अज्ञान म्हणून अनुभवास येतें, तें अतिमानसिक भूमीवर वेगळ्या प्रकारें अनुभवास येतें; कांहीं ज्ञान अक्रिय शांत जाणिवेच्या रूपांत मागें ठेवणें व कांहीं सक्रिय करून विशिष्ट क्रियाशील आत्मजाणीवयुक्त व ज्ञानयुक्त रूपें आकारास आणणें, असा ईश्वरी ज्ञानाचा खेळ तेथें चाललेला दिसतो; कांहीं आत्मरूपें सक्रिय ज्ञानशील व्हावींत म्हणून कांहीं ज्ञान अक्रिय शांत जाणिवेच्या रूपांत अव्यक्त ठेवण्याचा खेळ सर्वज्ञ ईश्वर खेळत असतो. जें ज्ञान अव्यक्त ठेवलें जातें, तें आपल्याला मानसिक
पान क्र. २९४
भूमीवर अज्ञान म्हणून प्रत्ययास येतें. जी गोष्ट ईश्वरी ज्ञानाची, तीच त्याच्या इच्छाशक्तीची, आनंदाची व विभूतियोगाची (Becoming) असते. दिव्य आत्म्याचे अतिमानसिक क्षेत्रांतील इच्छाशक्तिविषयक संबंध पाहतां, या संबंधांत ईश्वराच्या सर्वसमर्थतेचा खेळ अनुभवास येतो; कारण ईश्वर अनिरुद्ध संकल्पशक्तिरूप, सामर्थ्यरूप आहे. आम्हांला येथें जी असमर्थता व जो दुबळेपणा म्हणून दिसतो तो म्हणजे तेथें, कांहीं संकल्पसामर्थ्य शान्त आत्मकेन्द्रित अवस्थेंत मागें ठेवून विशिष्ट शक्तिरूपांना व्यक्त स्वरूपांत पुढें करण्याचा खेळ असतो. प्रेम व आनंद यांच्या संबंधांतील दिव्य आत्म्याचा अनुभव पाहतां, येथें ईश्वरी आनंदातिशयाचा खेळ आपल्या प्रत्ययास येतो--कारण ईश्वर प्रेमरूप, आनंदरूप आहे; आम्हांला येथें ज्या ठिकाणीं प्रेमाचा आणि आनंदाचा अभाव दिसतो, त्या ठिकाणीं अतिमानसिक भूमीवर अशी वस्तुस्थिति असते कीं, ईश्वरी आनंदाच्या सागरांत, कांहीं आनंद अव्यक्त शांत स्थितींत मागें ठेवून, विशिष्ट ईश्वरी मीलनाचीं व आनंदाचीं रूपें, सागरांतील उसळणाऱ्या लाटांप्रमाणें, व्यक्त करून पुढें आणलीं जात असतात. दिव्य आत्मा जीं नाना रूपें धारण करतो त्यांत, वरील प्रेम, आनंद व संकल्पशक्ति इत्यादींच्या क्रियांची प्रतिक्रिया म्हणून ईश्वरी मूळ स्वरूपाचें, नाना विभूतींत रूपांतर होत असलेलें आपल्या प्रत्ययास येईल; या विभूति-योगाच्या क्रियासंभारांत आपल्याला येथें ज्या समाप्ति, मरण, विनाश अशा अवस्था दिसतात, त्या तेथें अतिमानसिक भूमीवर विसांवा, संक्रमण, निर्मितिशील आनंदमय मायेची तात्पुरती निवृत्ति, अशा सत्य स्वरूपांत प्रतीत होतात. सच्चिदानन्द शाश्वत अस्तित्वरूप असल्यानें मरणादि अवस्था तेथें असूंच शकत नाहींत. सर्वातीत सर्वरूप देवदेवाशीं असलेलें एकतेचें नातें दिव्य आत्म्याला कोणते अनुभव आणून देतें हें आपण येथवर पाहिलें. यांत आतां एवढीच भर घालावयाची आहे कीं, हें जें एकतेचें नातें दिव्य आत्मा अनुभवतो, त्यामुळें भेदाच्या नात्यांतील आनंदाला तो मुकतो असें होत नाहीं; दिव्य आत्मा ईश्वराशीं जसा एकरूप असतो, तसा त्याच्याशीं दिव्य व्यक्ति म्हणून भेद ठेवून, मूळ एकतेचा आनंद वेगळ्या स्वरूपांत लुटण्याला तो मोकळा असतो; ईश्वराचा प्रेमळ भक्त हा ईश्वराच्या आलिंगनांत सर्वश्रेष्ठ व सर्वज्येष्ठ आनंद अनुभवतो. या ईश्वरी आनंदपूर्ण मीलनाचे अनेक सौंदर्यपूर्ण प्रकार दिव्य आत्म्याला अनुभवतां येतात. ईश्वराशीं त्याची असलेली तात्त्विक एकता या आनंदमय द्वैताच्या आड येत नाहीं.
पान क्र. २९५
दिव्य आत्म्याच्या जीवनाचा स्वभावधर्म काय असतो तो आतांपर्यंत परोपरीनें वर्णन केला. हा स्वभावधर्म वास्तवांत कशा प्रकारें येत असेल? वास्तवांतील दिव्य-जीवनाची परिस्थिति कशी असेल? वास्तवांतील दिव्य-जीवन कोणत्या गोष्टींनीं युक्त असेल? या प्रश्नांचा आतां विचार करणें आहे. अस्तित्वाच्या शक्ती अव्यक्तांतून कांहीं आकार घेऊन व्यक्त होतात आणि या साकार शक्तींच्या द्वारां आम्हांला कोणत्याहि नात्यांत अनुभव मिळत असतो. शक्तींना आकार देणारी जी साधनसामग्री असते, तिला पदार्थांचे गुणधर्म, विशेष धर्म, क्रिया, सामर्थ्यें अशा नांवांनीं आपण ओळखतो. उदाहरणार्थ मन. मानसिक शक्ति साकार होऊन मानसिक जीवन व्यक्त होतें; निर्णय, निरीक्षण, स्मृति, सहानुभूति या मनाच्या स्वाभाविक शक्ती आहेत, त्या साकार झाल्यानें मानसिक जीवन बनतें. याप्रमाणेंच सत्य-जाणिवेचें अतिमानसिक जीवन हें अतिमानसाच्या स्वाभाविक शक्ती साकार होऊन बनत असणार; अतिमानसिक क्षेत्रांत एका आत्म्याचें दुसऱ्या आत्म्याशी जें नातें असेल, तें नातें व्यवहारान्वित करतांना, अतिमानसाला स्वाभाविक असणाऱ्या कांहीं शक्ती, सामर्थ्यें व व्यापार अतिमानसानें वास्तवांत आणले पाहिजेत; असें न होईल तर व्यवहारांत भेद म्हणून कांहीं दिसणारच नाहीं आणि म्हणून 'अतिमानसिक जीवन' या कल्पनेला अर्थहि राहणार नाहीं. अतिमानसिक जीवन कोणत्या अतिमानसिक व्यापारांचें व क्रियांचें असतें, तें दिव्य जीवनाच्या मानसिक पूर्वपरिस्थितीचा विचार करतांना पाहतां येईल; सध्यां आपण त्या जीवनाचा तात्विक पाया पाहत आहोंत; त्याचा मूलभूत स्वभावधर्म आणि तत्त्वसंभार पाहत आहोंत. म्हणून सध्यां एवढें लक्षांत ठेवणें पुरेसें आहे कीं, भेद करणारें 'मी-मी पण' नसणें किंवा असेल तर तें नाहींसें करणें, जाणिवेचे स्पष्ट विभाग पडून तिची एकता नष्ट झालेली नसणें किंवा झालेली असल्यास ती रद्द करून जाणिवेची एकता पुन: स्थापित करणें-- ही एकच गोष्ट दिव्य जीवनाची अगदीं आवश्यक अशी पूर्वपरिस्थिति आहे. आमच्यामध्यें 'मी' आहे, एकता भंगलेली जाणीव आमच्यामध्यें आहे. ईश्वरी दिव्य जीवनाला मुकून आम्ही जें अध:पतित जीवन जगत आहों, त्या पतित व मृत्युव्याप्त जीवनाचा पाया या भेदक 'मी' नें व भंगलेल्या जाणिवेनें भरला आहे. आमचा 'मी', आमची भंगलेली जाणीव म्हणजेच आमची मर्त्यता आणि पतितता आहे. मनुष्याचें 'मूळ पातक' (Original Sin) त्याच्या दु:ख-
पान क्र. २९६
मय जीवनाचें कारण आहे असें कांहीं धर्मांत विधान आहे तें ''मूळ पातक'' म्हणजे आमच्या दृष्टीनें त्याची भग्न जाणीव आणि 'मी-मी पण' हें आहे. तत्त्वज्ञानाला शोभेल अशा भाषेंत बोलावयाचें, तर असें म्हणतां येईल कीं, आत्म्याच्या मूळ चैतन्याच्या सत्यापासून, ऋतापासून च्युत होणें, त्याची एकता, समग्रता व सुसंवादपूर्णता टाकून भलता वेगळा मार्ग धरणें, ही गोष्ट अज्ञानक्षेत्रांत, अज्ञानसागरांत मोठी उडी किंवा बुडी घेण्याची पूर्व तयारी म्हणून अवश्य होती. ''मूळ पातक'' करून म्हणा, चैतन्याचें सत्य सोडून देऊन म्हणा, घेतलेली उडी किंवा बुडी ही आत्म्याची साहसी, धाडसी क्रिया होती; आणि विश्वाच्या क्षेत्रांत धाडसाच्या हौसेनें आत्म्यानें घेतलेल्या या उडीमुळेंच ही दुःख भोगणारी आणि उच्च आकांक्षा धरणारी मानवता, मानवजाती, विश्वांत उदयास आली.
पान क्र. २९७
प्रकरण अठरावें
मानस आणि अतिमानस
मन हें ब्रह्म आहे, असा शोध त्याला लागला.
- तैत्तिरीय उपनिषद् ३, ४
तें ब्रह्म अविभक्त असून भूतांमध्यें विभक्तपणें असल्यासारखें आहे.
- गीता १३, १६
अतिमानसिक जीवनाचें सार काय आहे तें पाहण्याचा, त्याची कल्पना बांधण्याचा प्रयत्न आपण येथवर केला. सच्चिदानंदाच्या अस्तित्वाच्या पोटांत हें दिव्य-जीवन दिव्य आत्म्याला निर्वेधपणें लाभतें, मानवी आत्म्याला हें दिव्य-जीवन आपल्या राहणींत व्यक्त करावयाचें आहे, सच्चिदानंदानें येथें जो मानसिक आणि शारीरिक जीवनाचा सांचा अंगीकारला आहे, त्या सच्चिदानंदाच्या ऐहिक जीवनरूपी देहांत मानवी आत्म्याला दिव्य आत्म्याचें दिव्य-जीवन जगावयाचें आहे; ही त्याची आकांक्षा आहे, पण आपण जें जीवन वास्तवांत जगत आहों, पाहत आहों त्याच्याशीं आपल्याला माहीत झालेलें अतिमानसिक जीवन कोणत्याहि प्रकारें संबंध राखतांना दिसत नाहीं; तें त्याच्याशीं जुळणारें दिसत नाहीं; मन आणि शरीर या दोन क्षेत्रांत आमच्या मामुली जीवनाचें गतागत चाललेलें असतें; या जीवनाचें दिव्य-जीवनाशीं कांहींच नातें दिसत नाहीं. दिव्य-जीवन हें अशरीर आत्म्याचें जीवन असावें असें दिसतें; जेथें स्थूल भौतिक शरीर आत्म्यानें धारण केलेलें नाहीं, जेथें स्थूल भौतिक रूपें नाहींतच अशा विश्वांत अशरीर आत्मे अस्तित्वाची, जाणिवेची, सक्रिय संबंधांची अन्योन्यांना आनन्द देण्याघेण्याची जी स्थिति मिळवूं शकतात व भोगूं शकतात ती स्थिति म्हणजे दिव्य-जीवन असावें असें दिसतें; या शरीरशून्य विश्वामध्यें आत्म्या-आत्म्यांत भेद निर्माण झाला आहे पण या भिन्न आत्म्यांना भिन्न शरीरें मिळालेलीं नाहींत; आनंदमय, क्रियाशील मर्यादांनीं न बांधलेलें
पान क्र. २९८
अनन्त व्यापकतेचे आत्मे या विश्वांत असतात; येथें रूपांत वा आकारांत कोंडलेले आत्मे नसतात--दिव्य-जीवन जेथें जगलें जातें, त्या विश्वाचें असें वर्णन करतां येईल. तेव्हां असा संशय घेणें वाजवी आहे कीं, शारीर आकारांत कोंडलेले मन, आकारांत बांधलेल्या शक्ती, यांच्या मर्यादांत चाललेलें जें जीवन आपल्या परिचयाचें आहे, त्या जीवनाहून वेगळें दिव्य-जीवन या मर्यादांच्या बंधनांत राहून जगणें कसें शक्य आहे?
परमश्रेष्ठ अनन्त सद्रूप जाणीवशक्ति व आत्मानंद हेंच जगाचें आदिकारण आहे, आमचें मन हें या सच्चिदानंदाचें विकृत रूप आहे-- अशा या सच्चिदानंदाची कल्पना कांहींशी स्पष्ट करण्याचा येथवर आम्हीं प्रयत्न केला आहे. या सर्वातीत सर्वरूप अस्तित्व-भोक्त्यानें आपल्या आनंदमय अस्तित्वाचें व्यक्तरूप असलेल्या सुव्यवस्थित व सुनियंत्रित विश्वाची, कल्पनेंत व वास्तवांत रचना करून, आपल्या जाणीवमय शक्तीच्या प्रभावानें त्याचें शासन चालविलें आहे--सच्चिदानंदाच्या जाणीवमय शक्तीनें हा सर्व कारभार आपल्या दिव्य मायेच्या द्वारां, अर्थात् सत्य-ज्ञान अथवा सत्य-कल्पना यांच्या द्वारां सुरू केला व चालविला आहे; या दिव्य मायेसंबंधानें आपण कांहीं कल्पना मिळविली आहे. परंतु अनंत परात्पर अस्तित्व, ज्ञानमय शक्ति, स्वानंद आणि दिव्य माया (सत्य-ज्ञान किंवा सत्य-कल्पना) या चार दिव्य व महान् गोष्टींचा, आपल्या परिचयाच्या मन-प्राण-शरीर या तीन गोष्टींशीं काय संबंध आहे त्याचा विचार आपण अद्यापि केलेला नाहीं. मन-प्राण-शरीर ही दर्शनी अदिव्य माया आहे; हिच्यामुळें आपण धडपड, तडफड करतो व नाना प्रकारच्या आपत्ती व दुःखें भोगतो; ही अदिव्य माया दिव्य मायेंतून कशी उद्भवली, दिव्य सत्यांतून हिचा विकास कसा झाला, या गोष्टीची चिकित्सा आपण अद्यापि केलेली नाहीं. ही चिकित्सा आपण करूं. मूळ चार दिव्य गोष्टींचा, विशेषत: दिव्य मायेचा, आमच्या परिचयाच्या तीन दर्शनी अदिव्य गोष्टींशीं ज्या धाग्यानीं किंवा रज्जूंनीं संबंध घडतो, ते धागे किंवा रज्जू आपण जेव्हां शोधून काढूं किंवा तयार करूं, तेव्हांच आमच्या या विश्वाचें स्पष्टीकरण आम्हांला मिळाल्यासारखें होईल. हें स्पष्टीकरण जोपर्यंत मिळत नाहीं, तोंपर्यंत हें आमचें अदिव्य अधोवर्ती जीवन, त्या उच्च दिव्य जीवनाशीं एकरूप होऊन जाईल कीं नाहीं, एकरूप होऊन जाणें शक्य आहे कीं नाहीं, असा संशय घेण्याला जागा राहील. ही गोष्ट आम्ही
पान क्र. २९९
जाणतों कीं, आमचें जग सच्चिदानंदांतून आलें आहे, सच्चिदानंदाच्या पोटांतच त्याचें अस्तित्व आहे, त्याचें जीवन आहे; भोक्ता आणि ज्ञाता, स्वामी आणि आत्मा म्हणून या विश्वाच्या पोटीं सच्चिदानंद परमात्मा राहतो अशी आमची साधार कल्पना आहे; त्याचा जो आनंद, जें ज्ञानमय सामर्थ्य, जें दिव्य अस्तित्व, त्यांतूनच आमची द्वंद्वमय संवेदना, आमचें द्वंद्वमय मन, आमची द्वंद्वमय शक्ति त्यांची छाया म्हणून निघाली असली पाहिजे, हें आम्हांला कळतें. परंतु आमच्या जीवनांतील ही छायारूप त्रयी आणि सच्चिदानंद परमात्मा यांच्यांत इतका विरोध आहे व तो परमात्मा इतका वर आणि आम्हीं इतकें खालीं आहों कीं, जोंपर्यंत आम्ही आमच्या अस्तित्वाच्या तीन प्रकारांत कोंडलें गेलों आहोंत, तोपर्यंत आम्हांला दिव्य-जीवन प्राप्त होणें अशक्य आहे असेंच दिसतें. खालच्या प्रतीचें असलेलें आमचें जीवन उदात्त करून, आम्ही दिव्य-जीवनाच्या दर्जाला नेलें पाहिजे, किंवा शरीर टाकून शुद्ध अस्तित्वाचा, प्राणमय जीवन टाकून ज्ञानमय शक्तीच्या शुद्ध अवस्थेचा, संवेदना आणि मन टाकून शुद्ध आनंद आणि शुद्ध ज्ञान यांचा अंगीकार आम्हीं केला पाहिजे. आध्यात्मिक सद्वस्तूचें सत्य, वास्तव दिव्य-जीवन अशाच त्यागानें व अंगीकारानें आम्हांला लाभूं शकेल. पण हा दुसरा पर्याय स्वीकारावयाचा म्हणजे याचा अर्थ, आत्म्याची शुद्ध स्थिति किंवा वस्तुजाताचें सत्य व्यक्त करणारें, दिव्य ईश्वरी अस्तित्व, आनंद व शक्ति जेथें आहे असें विश्व किंवा विश्वें यांचा स्वीकार करून, पार्थिव, मर्यादित, मानसिक जीवन सर्वस्वीं टाकून द्यावयाचें असा होतो. हा दुसरा पर्याय स्वीकारावा लागत असेल, तर मानवाची पूर्णता मानवरूपांत होऊं शकत नाहीं असें मान्य केलें पाहिजे; किंवा मानवाचा जो पृथ्वीवर विकास झाला आहे, त्याचा कळस म्हणजे मानवाची मनःशक्ति विलय पावत पावत एका सूक्ष्म बिंदूत सामावणें व या बिंदूंतून उडी घेऊन निराकार अस्तित्वांत मानवानें स्थान घेणें हा आहे किंवा सशरीर मनाच्या आवांक्याबाहेर असलेल्या जगांत, त्या सूक्ष्म मनोबिंदूंतून मानवानें उडी घेणें यांत त्याच्या पार्थिव विकासाचा कळस आहे, या दोन पक्षांपैकीं एक पक्ष आम्हांला मान्य करणें भाग आहे.
परंतु सूक्ष्म विचार केल्यास दुसरा पर्याय आवश्यक आहे असें दिसत नाहीं. पहिला पर्याय म्हणजे आमचें खालच्या दर्जाचें जीवन वरच्या दर्जाचें म्हणजेच दिव्य करणें हें शक्य दिसतें. जीं चार दिव्य तत्त्वें (सत्,
पान क्र. ३००
चित्, आनंद आणि दिव्य माया) सर्व गोष्टींचें मूळ आहेत, त्यांच्या क्रियेंतूनच आम्हीं अदिव्य माया समजत असलेली मन-प्राण-शरीर ही त्रयी निर्माण झालेली आहे; ही स्थूल, सूक्ष्म रूपांची दुनिया निर्माण करण्यासाठीं जी क्रिया आवश्यक होती, त्या क्रियेंतूनच अदिव्य म्हटली जाणारी मन-प्राण-शरीर ही त्रयी उदयास आली आहे यांत संशय नाहीं. कारण या त्रयीच्या पूर्वीं, दिव्य तत्त्वचतुष्टयाखेरीज दुसरें कांहींच नव्हतें. विश्वासाठीं रूपें म्हणून जीं निर्माण केलीं गेलीं, तीं कांहीं दिव्य सत्-चित्-आनंद किंवा दिव्य सत्य-कल्पना (दिव्य माया) यांच्या क्षेत्राच्या बाहेर निर्माण केलीं गेलीं नाहींत; तर सत्-चित्-आनंदाच्या क्षेत्रांत, तसेंच जें चौथें दिव्य तत्त्व सत्य-कल्पना किंवा दिव्य माया त्याच्या क्षेत्रांत आणि त्याच्या क्रियाशीलतेनें निर्माण केलीं गेलीं. अर्थात् अशी कल्पना करण्याचें कांहींच कारण नाहीं कीं, उच्च दिव्य जाणिवेचा सत्यमय व्यापार, रूपांच्या दुनियेंत (मन-प्राण-शरीरांच्या दुनियेंत) शक्य नाहीं; तसेंच रूपें आणि त्यांचे निकटचे आधार--मानसिक जाणीव, प्राणशक्ति, रूपद्रव्य--हे त्यांजकडून व्यक्त होणारें सर्व कांहीं विकृत स्वरूपांतच व्यक्त करतील किंवा रूपांना आणि त्यांच्या आधारांना कशाचीच अविकृत अभिव्यक्ति करतां येणार नाहीं अशीहि कल्पना करण्याचें कारण नाहीं. उलट असें शक्य दिसतें, नव्हे बरेंच संभवनीय दिसतें कीं, मन-प्राण-शरीर यांना शुद्ध रूपें आहेत आणि या शुद्ध रूपांचें मन-प्राण-शरीर-त्रय दिव्य ईश्वरी सत्याच्या पोटांत आहे; या सत्याच्या दिव्य जाणिवेच्या दुय्यम क्रिया ह्या शुद्ध मन-प्राण-शरीर यांच्याच क्रिया असतात; सर्वश्रेष्ठ दिव्य शक्ति आपलें कार्य करतांना जी साधनसामुग्री वापरते, त्या पूर्ण साधन-सामुग्रीचा एक भाग म्हणजे शुद्ध मन-प्राण-शरीर ही त्रयी असते. तेव्हां, आपलें मन-प्राण-शरीर दिव्य होण्याची शक्यता भरपूर आहे, असली पाहिजे; नवें विज्ञान पार्थिव विकासाचें एक चक्र आम्हांला परिचित करून देतें--या चक्रांत म्हणजेच एकाद्या लहानशा कालखंडांत मन-प्राण-शरीर यांचें जें रूप आणि कार्य अनुभवास आलें आहे, तेवढेंच त्यांना शक्य असून, दुसरें कसलेंच रूप आणि कार्य त्यांना शक्य नाहीं, असा आग्रह धरणें चुकीचें होईल; सजीव शरीरांत मन-प्राण-शरीर सध्यां ज्या क्रिया करतात व करूं शकतात, त्याच तेवढ्या त्यांना शक्य आहेत, असें म्हणणें चुकीचें होईल. त्यांची ज्या प्रकारची क्रियाशक्ति अनुभूत आहे, त्यापेक्षां वेगळी उच्च प्रकारची अननुभूत क्रियाशक्ति त्यांजमध्यें असूं
पान क्र. ३०१
शकतें. ज्या दिव्य ईश्वरी सत्यापासून त्यांची उत्पत्ति झाली आहे, त्या आपल्या उगमाचा कांहींतरी कारणानें या त्रयीला विसर पडला आहे म्हणून त्यांच्या आजच्या अदिव्य क्रिया त्यांजकडून घडतात. ही जाणिवेची विभक्तता, ही सत्याची विस्मृति नाहींशी झाली--मानवतेंत जी दिव्य-शक्ति सुप्त आहे, तिच्या जागृतीनें, तिच्या विस्तारानें, आजची जाणिवेची विभक्तता, सत्य-विस्मृति दूर होणें शक्य आहे--ही गोष्ट वास्तवांत घडून आली आणि सत्यस्मृति व अविभक्त जाणीव परत आली, म्हणजे मन-प्राण-शरीराचें सध्यांचें क्रियास्वरूप बदलेल. विकासाचा उच्च टप्पा, प्रगतीचा उंचावरचा मार्ग मन-प्राण-शरीर चालून जातील आणि या विकासप्रक्रियेनें त्यांचें क्रियास्वरूप शुद्ध होऊन, सत्य-जाणिवेच्या (दिव्य मायेच्या) क्षेत्रांत ही त्रयी जसें काम करतें, तसें काम या पृथ्वीवरहि ती करूं लागेल.
मानवांतील ईश्वरी शक्तीच्या संवर्धनानें त्याची विभक्त जाणीव दूर होऊन, अविभक्त जाणिवेची प्रस्थापना त्याचें ठिकाणीं शक्य झाली, तर मानवी मनांत व शरीरांत दिव्य-जाणीव व्यक्त करून कायम ठेवतां येईल, इतकेंच नाहीं तर ही दिव्य-जाणीव, मन-प्राण-शरीर या तीनहि क्षेत्रांत आपला प्रभाव पाडून या तीनहि अंगांना नवें रूप देऊं शकेल. जें शाश्वत सत्य दिव्य-जाणिवेंत स्वभावत: सांठविलेलें असतें, त्या सत्याची प्रतिमा मन-प्राण-शरीर या त्रयीला अधिक पूर्णतेनें व्यक्त करण्याचें काम दिव्य-जाणीव करूं शकेल; दिव्य जाणिवेच्या प्रांतांत स्वभावतःच असलेलें स्वर्गीय राज्य, केवळ मानवाच्या आत्म्यांतच व्यक्त करून दिव्य-जाणीव राहणार नाहीं, तर त्याच्या मन-प्राण-शरीर रूपानें जें आत्म-अभिव्यक्तीचें द्रव्य तिला उपलब्ध असतें, तें द्रव्यदेखील स्वर्गीय दिव्यतेनें भरण्याचें काम दिव्य-जाणीव करूं शकेल; याप्रमाणें आत्मा आणि आत्मप्रकटनाचें साधनभूत द्रव्य, या दोन्हींचे द्वारां दिव्य-जाणीव या पृथ्वीवर स्वर्गीय राज्याचें अवतरण करूं शकेल. पृथ्वीवर कांहींजणांनीं, किंवा पुष्कळांनीं देखील म्हणतां येईल, आंतरिक विजय मिळविण्याचें व आत्म्याची विशुद्धता व दिव्यता सिद्ध करण्याचें कार्य केलेलें आहे; कोणीं हें कार्य पुष्कळच केलेलें आहे, कोणीं थोडेंफार केलेलें आहे; बाह्य विजय मिळविण्याचें कार्य, मन-प्राण-शरीर यांना दिव्यता आणण्याचें कार्य अद्यापि पार्थिव प्रकृतीच्या अप्रकट जाणिवेंतच बीजरूपानें दडून असलें; तरी तेंहि भविष्यकाळीं व्हावयाचें आहे; मानवी विकासाच्या कार्यांतील ईश्वराचा भावी
पान क्र. ३०२
मोठा विजय या बाह्य आत्म-साधनरूप मन-प्राण-शरीर या त्रयीच्या दिव्यतासंपन्नतेनें व्हावयाचा आहे, असें मानण्यास भरपूर जागा आहे. आमचें जें पार्थिव जीवन आहे, तें अपरिहार्यपणें सदासर्वदा अर्धवट सुखमय व अर्धवट दुःखमय धडपडींच्या चाकोरींत व्यतीत होत रहावें असें कांहीं नियतीचें ठरलेलें दिसत नाहीं; या जीवनांत ध्येयसिद्धि व्हावी, ईश्वराचें आनंदमय वैभव मानवी जीवनाच्या पूर्णतेच्याद्वारां या पृथ्वीवर प्रकट व्हावें, असा नियतीचा निश्चय असावा असें मानावयास हरकत दिसत नाहीं.
आमच्यापुढें आतां जो प्रश्न आहे, तो म्हणजे ज्या उच्च स्थानावरून मन-प्राण-शरीर ही त्रयी खालीं उतरली, त्या उच्च उगमस्थानीं या त्रयीचें मूळ स्वरूप काय होतें, हा आहे. कारण ईश्वराच्या आविष्कारांत जेव्हां समग्रता व पूर्णता येईल, तेव्हां वरील मूळ स्वरूपच मन-प्राण-शरीर धारण करतील, या पूर्ण आविष्कारांत मन-प्राण-शरीर या त्रयीचा आंतरात्मा सत्य-पूर्ण होईल, सत्यापासून अलग रहाणार नाहीं; आज अलगपणा आणि अज्ञान यांत जसें आम्ही वावरत आहों व मन-प्राण-शरीराचें ठिकाणीं सत्यापासून दूर आहों, तसें पूर्ण आविष्कारांत आम्ही असणार नाहीं. सत्यानें पूर्ण झालेली मन-प्राण-शरीर ही त्रयी म्हणजे मूळ स्वरूपांतील ही त्रयी होय. ही त्रयी तिच्या उच्च उगमस्थानीं पूर्णतासंपन्न आहे; पण आमच्या पार्थिव जीवनांत आम्ही त्या पूर्णतेच्या दिशेनें वाढत आहों, विकसित होत आहों; जड द्रव्याच्या, जड पार्थिव शरीराच्या बंधनांत आमचें मन पहिल्या वहिल्या नियंत्रित हालचाली करून, हळूंहळूं आपला विकास करीत आहे; चैतन्यानें जड आकारांत स्वतःला दडविले, त्या गोष्टीचे परिणाम अद्यापि आम्हांला अडवीत आहेत; पूर्ण प्रकाशानें आपल्या स्वतःच्या छायेंत बुडी घेतली व भौतिक निसर्गांत अंधकारमय द्रव्यगत चेतना निर्माण केली, त्या गोष्टीचे परिणाम अद्यापि आम्हांला आमच्या विकास-प्रवासांत अडथळा आणीत आहेत. अशा रीतीनें मन-प्राण-शरीराची मूळ पूर्णता मिळविण्याच्या मार्गावर आम्ही हळूंहळूं वाटचाल करीत आहोंत. ईश्वरी सत्य-कल्पनेच्या क्षेत्रांत आमची विकासाची परमसीमा, आमच्या भावी पूर्णतेची सर्वोच्च अवस्था अगोदरच वास्तवांत असली पाहिजे. त्या विद्यमान अवस्थेकडे जावयाचें व ती आत्मसात् करावयाची हेंच आमचें काम आहे. दिव्य ईश्वरी ज्ञानाच्या पोटांत अगोदरच जी गोष्ट अस्तित्वांत आहे, ती गोष्ट आमचें मन ध्येय म्हणून ठरवितें व मग तिच्या
पान क्र. ३०३
पाठीमागें तें लागतें, असा नियम आहे. आमच्या अस्तित्वाच्या परिस्थितींत जें शाश्वत सत्य अद्यापि आम्हीं साकार केलेलें नाहीं, त्याचे नांव ध्येय असें असतें. ध्येय म्हणजे अशी कांहीं गोष्ट नसते कीं, जी अस्तित्वांतच नाहीं, किंवा जी शाश्वत ईश्वरी आत्म्याला सुचलेली नाहीं पण आम्हांलाच फक्त--आम्हांसारख्या अपूर्ण जीवांना--सुचलेली आहे आणि जी आम्हीच फक्त अस्तित्वांत आणणार आहों.
याप्रमाणें ध्येयाच्या पाठीमागें लागणारें मन हें आमच्या मानवी जीवनाच्या शास्त्याचें काम करतें. अर्थात् मन कांहीं सर्वतंत्र, स्वतंत्र शासक नाहीं. त्याला बंधनें आहेत, त्याला विरोधक आहेत. तात्विक दृष्टीनें पाहतां, मन म्हणजे अशी जाणीव कीं, जी अविभाज्य अशा समग्र वस्तूचे भाग पाडते, त्यांना सीमाबद्ध करते, त्यांचे मोजमाप घेते आणि या भागांपैकीं प्रत्येक भाग स्वतंत्र व समग्र वस्तु आहे असें कल्पून त्यांचा संग्रह वा समावेश आपल्या पोटांत करून ठेवते. ज्या गोष्टी उघडपणें कोणत्या तरी वस्तूचे अंश असतात, तुकडे असतात, त्यांच्या संबंधांतहि मन आपल्या व्यवहाराचें हें स्वतंत्रतेचें काल्पनिक तत्त्व अंमलांत आणतें; ते तुकडे म्हणजे स्वतंत्र अलग अलग वस्तू आहेत, कोणत्याहि पूर्णाचे भाग नाहींत, असें कल्पून त्यांच्याशीं व्यवहार करतें. विशिष्ट वस्तू मूळ स्वरूपांत आपल्यासमोर नाहींत असें स्पष्ट माहीत असतां देखील, त्या मूळ स्वरूपांतच आपल्यासमोर आहेत अशी कल्पना मनाला करावी लागते; कारण त्याशिवाय त्या वस्तूंच्या संबंधांत त्याला आपली विशिष्ट क्रियासरणी अंमलांत आणतां येत नाहीं. असमग्राला समग्र समजून, अंशाला पूर्ण समजून व्यवहार करण्याचा मनाचा स्वभावधर्म त्याच्या सर्व क्रियांत व्यक्त होतो व सर्व क्रियांचा पाया असतो; त्याच्या कल्पना, त्याच्या अनुभूती, त्याच्या संवेदना, त्याच्या निर्मितिशील विचार-परंपरा--या सर्व गोष्टी त्याच्या स्वतंत्र वस्तुकल्पनेच्या पायावर आधारलेल्या असतात; मन आपली कल्पनाशक्ति, अनुभवशक्ति, संवेदनाशक्ति कामास लावून जेव्हां कांहीं वस्तू स्वतःसमोर उभ्या करतें, तेव्हां त्या वस्तु कोणत्यातरी सलग एकरूप पार्श्वभूमीचें, समग्र अखंड पदार्थाचे तुकडे आहेत असें समजत नाहीं, तर स्वतःला निर्मितिकरितां किंवा भोगाकरितां मिळालेले स्वतंत्र पदार्थ आहेत असें समजतें आणि या समजुतीप्रमाणें त्यांचा उपयोग करतें. एका अखंड पदार्थाचे तुकडे आपल्यासमोर आहेत, अशी जरी मनाला कल्पना झाली, तरी हे तुकडे कायमचेच पडलेले आहेत, त्यांचा व मूळ वस्तूचा कांहीं संबंध राहिलेला
पान क्र. ३०४
नाहीं, तें स्वतंत्र वस्तूप्रमाणेंच आहेत अशी मनाची समजूत असते. मनाची दृष्टि अशी असल्यानें, त्याची क्रिया असो वा भोग असो--त्यांचा विषय नेहमींच समग्र वस्तू हा असतो. या समग्र वस्तू ह्या, त्यांजपेक्षां मोठ्या अशा समग्र वस्तूचे अंश असतात, तसेंच भोग्य किंवा क्रिया-विषय असलेल्या दुय्यम समग्र वस्तूंचे तुकडे पाडून, मन त्या तुकड्यांना कांहीं उद्दिष्टांच्या दृष्टीनें समग्र वस्तूंच्याप्रमाणें लेखतें. तेव्हां, वस्तूच्या दुप्पट तिप्पट अशा गुणाकाराच्या क्रियेनें पटी करणें किंवा वस्तूंचे भाग पाडणें, त्यांची बेरीज करणें किंवा त्या दुसऱ्या कांहींतून वजा करणें या गणिती क्रिया हें मन करीत असतें; या क्रियांच्या पलीकडे त्याची धांव जात नाहीं. ही आपली नेहमींची चाकोरी सोडून खऱ्या समग्र वस्तूची कल्पना करण्याच्या भानगडींत मन पडलें, कीं भलत्याच अपरिचित वातावरणांत आल्यासारखें त्याला होतें; काय करावें तें त्याला उमगत नाहीं, आपल्या ओळखीच्या भक्कम पायाच्या जमिनीवरून स्पर्शातीत, इंद्रियातीत वस्तूच्या महासागरांत पडल्यासारखें त्याला होतें; अनन्ताच्या महान् दऱ्यांत लोटून दिल्याप्रमाणें तें किंकर्तव्यमूढ होतें, समोर असलेल्या वस्तूचा अनुभव, कल्पना किंवा संवेदना या भांबावलेल्या मनाला मुळींच होत नाहीं; निर्मितीसाठीं किंवा भोगासाठीं त्याच्या समोरच्या वस्तूचा त्याला मुळींच उपयोग करतां येत नाहीं. अनंताची कल्पना वगैरे मनानें केली, अनन्ताची प्राप्ति करून घेऊन, अनन्ताचा उपभोग मनानें घेतला असें जेव्हां आम्हांला वाटतें, तेव्हां खरोखरी अनन्ताशीं मनाची गांठ झालेली नसते; तसें केवळ दर्शनीं दिसतें इतकेंच. अनन्ताच्या विशिष्ट प्रतिमेची मनाला अनुभूति मिळते व ती खुद्द अनन्ताची अनुभूति आहे असा भास त्याला होतो अशी वस्तुस्थिति असते. अरूप, निराकार, महान् तत्त्वाचा अनुभव मनाला अंधुकपणें येऊं शकतो, पण वास्तव दिक्कालरहित अनन्ताचा अनुभव त्याला येऊं शकत नाहीं. अशा वास्तव अनन्ताचा विचार मन करूं लागलें, कीं त्याचा मर्यादा घालण्याचा, तुकडे पाडण्याचा जो अंगभूत स्वभाव तो आपलें काम करूं लागतो आणि मनापुढें खरें अनन्त उभें राहण्याऐवजीं, त्याच्या लहानमोठ्या प्रतिमा उभ्या राहतात. शब्द आणि आकार यांच्याशींच तें व्यवहार करतांना आढळतें. तेव्हां अनन्त हें, मनाच्या आवाक्यांत येणारी वस्तु नव्हे, अनंतानें आपल्याला पोटांत घ्यावें, अनन्तानें आपल्याला जवळ करावें, अशी भावना मनानें करावी हवी तर; कारण अनन्त हें मनावर आपली पांखर घालूं शकतें, त्याला
पान क्र. ३०५
जवळ घेऊं शकतें. मनाच्या मर्यादेच्या पलीकडे असलेल्या अस्तित्वाच्या स्तरांतून अनन्ताची सत्य वस्तूची तेजस्वी छाया खालीं येऊं शकते आणि या छायेंत मनाला बालकाप्रमाणें असहाय्य अनन्यगतिक होऊन, आनंदमय आराम करतां येतो. अनन्ताची प्राप्ति व्हावयाची, तर त्याकरितां मनाच्या वरतीं असलेल्या अतिमानसिक भूमिकांवर चढून गेलें पाहिजे. अनन्ताचें ज्ञान व्हावयास हवें असेल, तर मनानें नम्र झालें पाहिजे, सत्यज्ञानमय सद्वस्तूकडून जे आदेश व निर्देश खालीं येतात, त्यांना अविचल नम्रतेनें स्वीकारून तदनुसार मनानें वागलें पाहिजे.
याप्रमाणें मनाचें मौलिक सामर्थ्य आणि मौलिक मर्यादा काय आहेत तें आपण पाहिलें; मनासंबंधींचें सत्य हें असें आहे, त्याचा स्वभाव आणि स्वधर्म या सत्यावरून ठरतो. वरिष्ठ मायेच्या पूर्ण साधनसामुग्रींत मनाचें स्थान काय आहे, तें ईश्वरी आदेशानें वरीलप्रमाणें ठरविलें आहे. स्वयंभू सद्वस्तूची शाश्वत आत्म-कल्पना मनाला जन्म देते व त्याची जी कामगिरी ठरविते ती वरीलप्रमाणें आहे. थोडक्यांत, अनन्ताचें रूपांतर सान्ताच्या रूपांत करणें, अनन्ताला आपल्या मानदंडानें मोजून मापून, मर्यादा घालून, त्याचे अंश अंश करून सोडणें ही मनाची ईश्वरनियोजित कामगिरी आहे; आपल्या जाणिवेंत ही कामगिरी मन करतें आणि ती करतांना, अनन्ताची वास्तव संवेदना पार नाहींशी करून टाकतें. महान अज्ञान (Great Ignorance) म्हणून जो भाग विश्वरचनेंत असतो, त्याचें मूळ याप्रमाणें मनांत आहे. विभागणीचें, वांटणीचें काम मूलत: मनाचें असल्यानें, अशा मनापासूनच अज्ञानक्षेत्राला सुरुवात होते--विश्वाचें मूळ मन आहे, ईश्वरी माया सर्व मनच आहे असाहि कांहींजणांचा अभिप्राय आहे; पण तो चुकीचा समज आहे. वस्तुत: ईश्वरी माया ही, विद्या आणि अविद्या, ज्ञान आणि अज्ञान अशा दोन प्रकारची आहे. जें सान्त आहे, तें मूळ अनन्ताचें दर्शनीं रूप आहे, यापलीकडे कांहीं नाहीं; अनन्ताच्या क्रियाशीलतेंतून सान्ताची उत्पत्ति आहे, अनन्ताच्या कल्पनेचा, सान्त हा खेळ आहे, अशी वस्तुस्थिति आहे; अनन्ताशिवाय सान्त हें अस्तित्वांत येऊं शकत नाहीं, अस्तित्वांत राहूं शकत नाहीं; सान्त अनन्ताच्या पोटांतच राहतें, अनन्त हें सर्वत्र सान्ताची अपरिहार्य पार्श्वभू असतें; सान्त हें अनन्ताला मिळालेला आकार आहे, सान्त हें अनन्ताच्या शक्तीच्या व्यापारानें उदयास येतें, अशी एकंदर वस्तुस्थिति असल्यानें एक अशी मूळ जाणीव अवश्य असली पाहिजे कीं, जिच्या पोटांत सान्त आणि अनन्त दोन्ही
पान क्र. ३०६
वस्तू एकाच वेळीं असतात, दोन्ही वस्तूंचें दर्शन जिला एकाच वेळीं घडतें, या दोन वस्तूंचे जे संबंध आहेत, ते सर्व जिला अगदीं आतून पूर्णतया कळतात, अवगत होतात, अवगत असतात. या जाणिवेंत अज्ञानाला वाव नसतो; कारण तेथें अनन्ताचें ज्ञान असतें आणि अनंतापासून सान्त वेगळें काढून त्याला स्वतंत्र सत्याचा दर्जा दिलेला नसतो; तथापि येथें मर्यादा घालण्याची क्रिया गौण म्हणून कां होईना सुरू झालेली असते--विश्वाचें अस्तित्व या क्रियेशिवाय शक्य होत नाहीं--या मर्यादीकरणाच्या क्रियेनें, नित्य विभागणी करणारी आणि नित्य विभागलेले भाग एकत्र जोडणारी मनाची जाणीव, मूळ निराकार वस्तूच्या पोटीं साकार अस्तित्व धारण करते; त्याचप्रमाणें त्याच प्रधान मूळ क्रियेनें प्राणाचा-जीवनाचा-- वेगळ्या वेगळ्या दिशांनीं जाण्याचा आणि पुन्हां एका दिशेनें मार्गक्रमण करण्याचा व्यापार अस्तित्वांत येतो; तसेंच अनन्त विभाग झालेलें आणि अनन्त प्रकारें एकत्र येऊन, स्वयंसंघातरूप होणारें जड-द्रव्य त्याच गौण क्रियेनें अस्तित्वांत येतें. ही जी गौणक्रिया नित्याचा द्रष्टा आणि नित्याचा विचारकर्ता अनुसरतो, तिला ईश्वरी मन (Divine Mind) म्हणतां येईल--हा नित्य द्रष्टा पूर्णतया स्वयंप्रकाश आहे, स्वतःचें आणि सर्वांचें पूर्ण ज्ञान त्याला आहे, तो जें काय करतो, त्याचें पूर्ण ज्ञान त्याला असतें. सान्ताला जन्मास घालण्याची क्रिया तो करतो; पण ती करतांना त्या सान्तांतहि त्याला अनन्ताची पूर्ण जाणीव असते. ईश्वरी किंवा दिव्य मनाचें स्वरूप आपण पाहिलें. अतिमानस किंवा सत्य-कल्पना हें ईश्वराचें एकमेव क्रियासाधन आहे, त्या अतिमानसाचीच एक गौण-क्रिया दिव्य-मन ही असली पाहिजे, दिव्यमनरूपी क्रिया ही स्वतंत्र अतिमानसिक क्रिया नव्हे हें उघड आहे. सत्य-जाणिवेची (सत्य-कल्पनेची) जी बाह्य विषयग्राहक क्रिया वर वर्णिलेली आहे, ती क्रिया म्हणजेच दिव्य मनाची क्रिया होय.
कवि आपल्या जाणिवेंतून कांहीं वस्तू निर्माण करतो, त्या तो स्वत:समोर धरतो; स्वत: त्या वस्तूंचा तो निर्माता असतो, त्याच्या निर्मितिशक्तीतून त्या वस्तू त्याने निर्माण केलेल्या असतात, त्या वस्तू स्वत:पासून व स्वतःच्या निर्माणसामर्थ्याहून निराळ्या आहेत अशा भावनेनें त्यांना तो स्वतःसमोर धरून त्यांजकडे पाहतो, त्यांचें निरीक्षण-परीक्षण करतो; तथापि ह्या सर्व वेळीं त्या वस्तू त्याच्याहून (निर्मात्याहून) वेगळ्या नसतात, वेगळ्या केल्या जाऊं शकत नाहींत; त्याच्या अस्तित्वाचा,
पान क्र. ३०७
जीवनाचा, साकारतेचा 'खेळ' यापेक्षां त्या वस्तूंना खरेखुरें अस्तित्व नसतें--ही कवीची आणि त्याच्या कल्पनांची जशी गोष्ट, तशीच प्रज्ञानाची, अतिमानसाच्या गौण बाह्यग्राहक क्रियेची गोष्ट आहे. सर्वरूप हें एक अविभाज्य आहे, त्याच्या क्रियाशील रूपनिर्मायक अवस्थेंत त्याजकडून घडणारी क्रिया, प्रज्ञान त्या सर्वरूप एकासमोर ठेवतें. अर्थात् ही क्रिया निर्मितिशील ज्ञानाची क्रिया असते आणि सर्वरूप एक हा त्या क्रियेचा मूळ आरंभक आणि ज्ञाता असतो; त्या क्रियेचा मालक तो असतो, साक्षी तो असतो, त्याचीच त्याच्या एका विशिष्ट अवस्थेंत घडलेली ती क्रिया असते. सर्वरूप एकाची जाणीव क्रियाशील होऊन क्रिया करते व ती मूलत: ज्ञानशील असल्यानें स्वतःकडून घडलेली व घडणारी क्रिया ती अवलोकन करते; स्वतःच स्वतःला विषय करून बाह्य-ग्रहणाचें नाटक करणें म्हणजेच प्रज्ञान-कार्य. हें कार्य म्हणजे स्वतःच्या कल्पना स्वतःसमोर ठेवून, त्या स्वतंत्र म्हणून बघण्याच्या कवीच्या कार्याप्रमाणें आहे हें उघड आहे. याप्रमाणें प्रज्ञान हें मूळ विभागणी करतें; ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान ही त्रिपुटी ज्यांत आहे, अशा ज्ञानप्रकाराची उभारणी प्रज्ञान करतें; या विभागणींतून इतर सर्व विभाग-प्रकार उदयास येतात; मूळ एकरूप जाणिवेंत पुरुष आणि प्रकृति यांची उभारणी करणें ही मूळ विभागणी होय. पुरुष म्हणजे ज्ञाता आत्मा; हा आत्मा जाणतो, पाहतो, आपल्या दृष्टीनें सृष्टि-निर्मिति करून तिची व्यवस्था करतो; प्रकृति म्हणजे शक्तिरूप आत्मा, निसर्गरूप आत्मा; हा आत्मा पुरुषाच्या ज्ञानाहून वेगळा असत नाहीं; पुरुषाचें ज्ञान, त्याची दृष्टि, त्याची सृष्टि आणि त्याची सर्वनियामक शक्ति म्हणजे निसर्ग-आत्मा किंवा शक्ति-आत्मा किंवा प्रकृति होय. पुरुष आणि प्रकृति या कांहीं दोन वस्तू नाहींत. त्या एकच वस्तु किंवा एकच 'महाभूत' आहेत. मूळ एकच एक महाभूत असतें. नंतर तें आपल्या दृष्टीच्या प्रभावानें आपले अनन्त आकार उत्पन्न करते, तो स्वत: ज्ञाता व हे सर्व आकार त्याचे ज्ञान विषय; तो स्वत: निर्माणकर्ता व हे सर्व आकार त्याच्या क्रिया-शक्तीचा प्रभाव; ज्ञान तोच, ज्ञाता तोच, निर्माता तोच, निर्माणशक्तिहि तोच, ज्ञान-विषय व शक्ति-कार्यहि तोच. ज्ञात्यापुढें ज्ञान हें ज्ञान-विषय ठेवतें -- निर्मात्यापुढें क्रियाशक्ति ही शक्तिकार्य ठेवते. ही सर्व प्रज्ञानाची अतिमानसाच्या पोटांतील क्रिया होय. प्रज्ञानाची शेवटली क्रिया अशी आहे :-- पुरुष आपल्या अस्तित्वाच्या जाणीवपूर्वक केलेल्या विस्ताराला व्यापून असतो; तो
पान क्र. ३०८
या विस्ताराच्या प्रत्येक बिंदूचे ठिकाणीं विभक्तपणें असतो आणि त्याच वेळीं समग्र विस्तारांत समग्रतेनेंहि असतो; हा असा पुरुष, प्रत्येक रूपांत राहून, समग्र वस्तु जणुं स्वतःपासून, स्वतःच्या विशिष्ट साकार रूपापासून वेगळी आहे, अशा रीतीनें तिजकडे बघतो व तिजशीं व्यवहार करतो; आपल्या प्रत्येक रूपांतून तो याप्रमाणें समग्र वस्तूशीं विभक्तपणाच्या नात्यानें व्यवहार करतो; त्याचप्रमाणें त्याचीं जीं आत्मरूपें असतात, त्या विविध आत्मरूपांशीं कोणत्याहि एका आत्मरूपांतून व्यवहार करतांना, त्या विशिष्ट आत्मरूपांतील इच्छा आणि ज्ञान ज्या प्रकारचें असेल, त्याला अनुसरून, तो इतर सर्व संबंधित आत्मरूपांशीं विभक्तपणानें व्यवहार करतो. हा विभक्ततेचा व्यवहार ही प्रज्ञानाची शेवटची प्रक्रिया आहे.
विभक्ततेच्या मूलभूत गोष्टी याप्रमाणें अस्तित्वांत येतात. एकच एक परमतत्त्व अनन्त असतें, त्या अनन्ततेचा काल आणि स्थल दृष्टीनें कल्पनाकाशांत जो विस्तार होतो, ती पहिली क्रिया; नंतर ह्या जाणीवपूर्वक आत्मविस्ताराच्या कार्यानें घडलेल्या विस्तारांत सर्वत्र असणारें एकतत्त्वाचें सार्वकालिक अस्तित्व रूपांतरित होऊन, जाणीवयुक्त आत्म्याची अनेकता निर्माण होते; सांख्यांचे अनेक पुरुष बनतात; नंतर तिसरी पायरी म्हणजे अनेक आत्मरूपांचें एकात्मत्व जाऊन, प्रत्येक आत्म्याला वेगळा देह, वेगळें घर, अशी विभक्त संसाराची स्थिति निर्माण होते. एकतत्त्वाचाच विस्तार झालेला असतो परंतु ही वस्तुस्थिति मागें पडून, प्रत्येक आत्मा वेगळ्या घरांत राहत आहे अशी अनुभूति निर्माण होते, ही विभक्त संसाराची तिसरी पायरी होय. जितके पुरुष व आत्मे, तितकीं घरें व देह असा प्रकार होण्याचें कारण, प्रकृति व तिनें निर्माण केलेलें विश्व एक असून, या एकाच प्रकृतीचा, या एकाच विश्वाचा भोग सर्वांना घ्यावयाचा असतो--हे आत्मेहि एकाच परम आत्म्याचीं विविध रूपें असतात व त्यांचे एकमेकांशीं विविध संबंध असतात. प्रत्येक पुरुषाची प्रकृति व जग जर स्वतंत्र असतें, तर पुरुषागणिक घर असा प्रकार व्हावयाचें कारण नव्हतें. पुरुषागणिक प्रकृति नसल्यानें पुरुषागणिक घर व एक भोग्य प्रकृति अशी व्यवस्था अस्तित्वांत येते. प्रत्येक रूपांतील पुरुष त्या रूपाशीं एकरूप होतो. त्याचा व्यवहार या एकरूपतेनें आंखला जातो; आपण याच देहांत आहोंत, इतर देहांत जे इतर आत्मे आहेत, ते मूळ अस्तित्वाच्या दृष्टीनें माझ्याशीं एकरूप असले, तरी संबंधांच्या
पान क्र. ३०९
दृष्टीनें व विस्ताराच्या दृष्टीनें मजहून वेगळे आहेत, त्यांच्या हालचाली माझ्या परिमाणांच्या दृष्टीनें व दिशांच्या दृष्टीनें भिन्न आहेत, एकच वस्तुतत्त्व, शक्ति, जाणीव व आनन्द यांचा जो उपयोग आणि उपभोग प्रत्येकाकडून कोणत्याहि विशिष्ट काळीं व विशिष्ट स्थळीं व्यवहारांत होत आहे, त्यासंबंधींचा माझा आणि इतर प्रत्येकाचा दृष्टिकोन भिन्न भिन्न आहे--या गोष्टी त्याला त्याच्या जाणिवेंत स्पष्टपणें जाणवतात. एकच पुरुष सर्व रूपांत असला, तरी प्रत्येक रूपांत त्या रूपांशीं एकरूप होऊन वागणें आणि इतर रूपांतहि स्वतःच तो असला, तरी तीं रूपें विशिष्ट रूपांतील स्वतःच्या आत्म्याहून भिन्न आत्मे धारण करणारीं आहेत, अस्तित्वाखेरीज इतर गोष्टींत सर्वजण भिन्न भिन्न आहेत, ही जाणीव प्रतिरूपीं पुरुषाला प्रतीत होते, ही गोष्ट विभक्त संसाराचा उगम समजण्याच्या दृष्टीनें महत्त्वाची आहे. ईश्वरी किंवा दिव्य अस्तित्व पूर्णतया स्वतःविषयीं जागरूक असतें, स्वतःचें ज्ञान त्याला पूर्ण आणि अप्रतिहत असतें, म्हणून प्रज्ञानाची मर्यादीकरणाची क्रिया, विशिष्ट रूपगत आत्म्याची त्या रूपाशीं एकरूप होऊन वागण्याची क्रिया, ईश्वरी किंवा दिव्य अस्तित्वाला, जीवनाला बंधनकारक होऊं शकत नाही. कोणताहि रूपगत आत्मा त्या रूपाचा गुलाम होत नाहीं, त्या रूपापलीकडे इतर रूपांतहि मीच आहे ही गोष्ट तो विसरत नाहीं; म्हणून त्याचें वागणें सर्वात्मभूत आत्म्याचें वागणें असतें--आमची, अदिव्य आत्म्याची गोष्ट वेगळी आहे. आम्ही आमच्या देहाशीं एकरूप झालों आहों; या एकरूपतेचें आम्ही गुलाम होऊन बसलों आहों. आमच्या अहंप्रज्ञ 'मी' ची मर्यादा ओलांडून वागणें आम्हांला जमत नाहीं; काल आणि स्थल यांच्या बंधनांत आम्हाला वागावें लागतें; कालाच्या ओघांत आमची जाणीव विशिष्ट क्षणीं जी विशिष्ट हालचाल करील, तिजवर स्थलदृष्ट्या आमचें विशिष्ट कार्यक्षेत्र अवलंबून असतें; जाणिवेच्या या विशिष्ट हालचालीला दूर सारून, आम्हांला स्वतंत्रपणें कांहीं करतां येत नाहीं; जाणिवेच्या विशिष्ट काळाच्या विशिष्ट हालचालीचे आम्ही गुलाम असतों. आमच्या अस्तित्वाची व जीवनाची ही कथा दिव्य आत्म्याच्या अस्तित्वाला आणि जीवनाला लागूं नाहीं, हें आतांच सांगितलें आहे. तथापि क्षणाक्षणाला आत्मा आपल्या देहाशीं स्वैरपणें एकरूप होत असतो; हें एकरूप होणें क्षणाक्षणाला अस्तित्वांत येतें व अस्तित्वांतून जातें; याचें कारण प्रज्ञान आपलें विघटनेचें व विभागणीचें कार्य करीत असतां; तें आपलें संघटनेचें,
पान क्र. ३१०
मूळ एकतेचें ज्ञान कायमपणें जिवंत राखण्याचेंहि काम करीत असतें हें आहे. दिव्य आत्म्याचें हें अंगभूत एकत्व-ज्ञान कांहीं कारणानें शिथिल झालें, अकार्यक्षम केलें गेलें, कीं दिव्य आत्मा आपली दिव्यता टाकून विभक्ततेच्या साखळींत--कालाच्या अनुक्रमाच्या आणि स्थलाच्या विभागांच्या भक्कम साखळींत अर्थात् विभक्त जाणिवांच्या आणि विभक्त देहांच्या साखळींत--आपल्यासाठीं कोठलें तरी स्थान कायमचें म्हणून घेऊन बसेल; आमची जाणीव अशीच कालस्थलबद्ध होऊन बसली आहे. अर्थात् हें बंधन आत्मविकासाच्या दृष्टीनें केव्हांतरी दूर होणारें असल्यानें याला 'दर्शनीं बंधन' म्हणतां येतें. तथापि व्यवहारांत विशिष्ट विकास-टप्पा गांठण्यापूर्वीं आमची स्थिति कैद्याची स्थिति असते हें विसरतां येत नाहीं.
तेव्हां, प्रज्ञानाच्या अंतिम प्रक्रियेनें रूपगत साकार आत्म्यांचें (दर्शनी) विभक्तीकरण झालेलें असतें; एका रूपाचें दुसऱ्या कोणत्याहि रूपाशीं नातें हें, जणुं कांहीं तीं रूपें वेगळे वेगळे आत्मे आहेत अशा प्रकारचें झालेलें असतें; एका आत्म्याची इच्छा आणि दुसऱ्या कोणत्याहि आत्म्याची इच्छा यांचें नातें, जणुं कांहीं या इच्छा स्वतंत्र वेगळ्या वेगळ्या शक्ती आहेत अशा प्रकारचें झालेलें असतें; एका आत्म्याचें ज्ञान आणि दुसऱ्या कोणत्याहि आत्म्याचें ज्ञान यांचें नातें, जणुं कांहीं तीं ज्ञानें अगदीं विभक्त ज्ञानें आहेत अशा प्रकारचें झालेलें असतें. ''जणुं कांहीं'' हा शब्द महत्त्वाचा आहे; दिव्य आत्मा विभक्तपणाच्या देखाव्यानें फसत नाहीं असा त्या शब्दाचा अभिप्राय आहे; मूळ एकतामय निराकार अस्तित्वाचें, 'सर्व' हें साकार रूप आहे हें दिव्य आत्मा जाणतो आणि सत्य-अस्तित्वांतील आपल्या स्थानाला घट्ट धरून राहतो; आपलें एकत्व तो गमावीत नाहीं; आपल्या अनंत ज्ञानाची एक गौण अंगभूत क्रिया या दृष्टीनें तो मनाकडे पाहतो व त्याचा उपयोग करतो; अनंताची स्वतःला कायम असलेली जाणीव बाजूला न ठेवतां, वस्तूंचें विभक्तीकरण व त्यांचें लक्षण करण्याची गौण क्रिया करणारें एक साधन या नात्यानें तो मन वापरतो; मूळ वस्तूची जी मौलिक समग्रता त्याच्या जाणिवेंत स्पष्टपणें ठाम बसलेली असते, तिला प्राधान्य ठेवून, त्या समग्र वस्तूचे विभाग पाडून, त्यांच्या मर्यादा निश्चित करण्याचें काम करणारें साधन म्हणून दिव्य आत्मा मनाला उपयोगांत आणतो. मौलिक समग्रता वेगळी आणि बेरजेनें म्हणजेच एक एक वस्तु जमवून ढीग केल्यानें निर्माण होणारी 'समग्रता' वेगळी; ही दुसऱ्या प्रकारची समग्रता, किंवा दर्शनी अनेकता-अधिष्ठित
पान क्र. ३११
समग्रता घडविणें, घडणें हा साकारतेच्या व्यवहारांतील मनाचा एक व्यापार आहे; दिव्य आत्म्याच्या व्यवहारांत ही दुसऱ्या प्रकारची समग्रता उदयास आलेली नसते. अतिमानसिक क्षेत्रांत दिव्य आत्मा खऱ्या विभक्तपणाला पोंचत नाहीं. तो मर्यादा असलेल्या देहाशीं एकरूप होऊन वागला, तरी या मर्यादा ओलांडूनहि वागत असतो. त्याचे ठिकाणीं मर्यादा घालण्याची शक्ति असते पण या शक्तीच्या आहारीं तो जात नाहीं, तर तिला तो आपल्या सोईप्रमाणें राबवितो; एकमेकांपासून स्पष्टपणें अलग अलग म्हणून ओळखतां येणारे आकार आणि शक्ति यांचा खेळ खेळतां यावा या उद्देशानें मर्यादीकरण-शक्तीचा उपयोग करून, तो विभक्त वाटणाऱ्या रूपांचा आणि शक्तींचा संसार उभा करतो.
याप्रमाणें दिव्य आत्म्याचें मन, असहाय्यपणें मर्यादाबद्ध नसून, स्वतंत्रपणें मर्यादा घालणारें व काढणारें असतें; हें मन त्याच्याकडून घडणाऱ्या व्यवहाराचें स्वामित्व करतें, त्या व्यवहाराची वास्तव स्थिति तें जाणतें--याच्या उलट परतंत्र जीवाचे मन असहाय्यपणें मर्यादित असलेलें, स्वतःच्या व्यवहाराचें दास व त्या व्यवहारानें फसणारें असें असतें; दिव्य आत्म्याचें मन दिव्य तर अ-दिव्य सामान्य जीवाचें मन अ-दिव्य असतें. हें अ-दिव्य मन दिव्य मनांतून तयार होण्यासाठीं मूळ जाणीवशक्तीची कांहीं विशिष्ट, नवी प्रक्रिया अवश्य असते. ही नवी प्रक्रिया, हा नवा घटक म्हणजे अविद्या होय. अविद्या म्हणजे मूळ जाणिवेची आत्म-विस्मृतीची शक्ति, स्वतःला आत्म-ज्ञानच्युत करण्याची शक्ति, आत्म-नेणीवशक्ति; या शक्तीमुळें अतिमानसिक क्रिया आणि मनाची क्रिया यांच्यामध्यें भक्कम पडदा उत्पन्न होऊन, त्या दोन क्रिया एकमेकींपासून अलग होतात; या भक्कम पडद्याच्या आड राहून, अतिमानस हें मनाची क्रिया आपल्या शासनाखालीं ठेवतें; मनाची क्रिया मूलतः अतिमानसानेंच घडवून आणलेली असते व तिचें अनुशासन तें करीत राहतें; पण आत्म-विस्मृति-शक्तीच्या कार्यानंतर हें अनुशासन तें पडद्याआडून करतें एवढेंच. याप्रमाणें मन अतिमानसापासून वेगळें पडलें म्हणजे त्याला फक्त विशिष्ट गोष्टी दिसतात, सर्वव्यापक तत्त्व दिसत नाहीं; तें कल्पना करूं शकतें फक्त विशिष्ट गोष्टींची; या गोष्टी सर्वव्यापक तत्त्वाच्या पोटीं असूं शकतील अशी अंधुक कल्पना त्याला येऊं शकते, परंतु त्याची याविषयीं खात्री नसते. सर्वव्यापक तत्त्व आणि विशिष्ट गोष्टी दोन्ही अनंत एकतत्त्वाच्या साकारतेच्या लीलेचा भाग आहेत, हें दिव्य मनाला होणारें
पान क्र. ३१२
ज्ञान तर त्याला मुळींच होऊं शकत नाहीं. याप्रमाणें अविद्येच्या प्रक्रियेनें मर्यादित मन अस्तित्वांत येतें. हें मन प्रत्येक साकार वस्तूला मूळ वस्तु मानतें; ही वस्तु कोठल्या तरी समग्र वस्तूचा स्वतंत्र भाग म्हणून तें कल्पितें; ही समग्र वस्तु तिजपेक्षां मोठ्या वस्तूंत स्वतंत्रपणें असल्याचें दृश्य त्याला दिसतें; याप्रमाणें हें मर्यादित मन मोठाले वस्तुसंघ करूं शकतें, परंतु खऱ्या अनंतत्वाची कल्पना मात्र त्याच्या आवांक्याच्या बाहेर असते; ती त्याला कल्पितां देखील येत नाहीं. मूळ अनंतत्वांतून तें निघालेलें असलें, तरी त्या अनंतापासून तें कायमचें दुरावलेलें असतें. अनन्ताची एक क्रिया म्हणून मनाचा जन्म झाला असल्यानें, वस्तूचे अनंत विभाग पाडण्याची व वस्तू अनंतपणें एकाला एक जोडून अमर्यादपणें संघ करण्याची शक्ति त्या मनाला आलेली असते. हें मन अस्तित्वाचे, एकच एक अस्तिरूप पदार्थाचे, आपल्या विभाजन शक्तीनें अनेक समग्र पदार्थ घडवितें; या नव्या पदार्थांचे लहान लहान पदार्थ करतें, शेवटीं अणु, परमाणु कल्पितें आणि हा परमाणुहि तोडून शेवटीं शून्य बनविण्याच्याहि मार्गांत मन असतें; परंतु शून्य कांहीं त्याला यशस्वीपणें कल्पितां येत नाहीं, कारण मनाच्या विभागणीच्या व्यवहारामागें अतिमानसाचें खरें तारक ज्ञान असतें; प्रत्येक समग्र पदार्थ, प्रत्येक अणु परमाणु सर्व शक्तीचें, सर्वज्ञतेचें, सर्व अस्तित्वाचें केंद्रस्थान आहे, अणु परमाणूंचीं लहान मोठ्या पदार्थांचीं रूपें, हीं सर्वव्यापी शक्तीनें, ज्ञानानें व अस्मितेनें स्वतःच्या लीलेसाठीं घेतलेलीं रूपें आहेत, ही गोष्ट अतिमानस कधीं विसरत नाहीं. या रूपांचें विभजन, विभागलेल्यांचें पुन: विभजन असें होत होत, मनाच्या दृष्टीनें असीम शून्यत्व जेथें प्राप्त झाल्यासारखें दिसतें, तेथें अतिमानसाला शून्य दिसत नसून, ज्या ज्ञानयुक्त पूर्णानें आत्मसंकोच करून विशिष्ट रूप धारण केलें होतें, त्या पूर्णानें परत आपली मूळ अनंत अस्तित्वाची अवस्था स्वीकारली आहे असें त्याला दिसतें. अनंत विभजनानें किंवा अनंत विस्तारानें या पूर्णाची जाणीव ही एकाच स्थानाला किंवा एकाच अवस्थेला पोंचते. ती अवस्था म्हणजे तिचें मूळ स्वरूप--अर्थात अनंत एकता आणि शाश्वत सत्ता, अस्तित्वाची नित्यता. मूळ जाणीव, तिच्या साकार रूपांच्या विस्ताराची वाढ सारखी करीत राहिल्यानें किंवा त्यांचे तुकडे व तुकड्यांचे तुकडे अशी सारखी त्या साकार रूपांची सूक्ष्मता वाढवीत गेल्यानें, दोनहि मार्गांनीं (अनंत वाढीनें किंवा अनंत विभागणीनें) शेवटीं तिचें स्वाभाविक 'रूप' आपल्याला भेटतें.
पान क्र. ३१३
हें मूळ तत्त्व शाश्वत आहे, एक आहे, अनंत आहे व ज्ञानमय आहे. मनाची विभजनाची क्रिया चालूं असतां, मनाला या अतिमानसिक ज्ञानाचा जर विसर पडला नाहीं, अतिमानसिक एकत्व-अनुभूतीच्या पोटांत मनाची ही विभजन-क्रिया दुय्यम म्हणून चालू असली, म्हणजे विभजन-क्रियेचें खरें तत्त्व मनालाहि उमगतें. तें तत्त्व असें कीं, मनाची विभजन-क्रिया ही खरे तुकडे पाडीत नाहीं, तर मूळ पूर्णाचीं अनेक, अनंत रूपें बनविते; या रूपांत पूर्ण ज्ञानमय रूपें परस्परांशीं अनेक रीतींनीं संबंधित केलीं जातात; स्थलकालनिष्ठ रूपलीला शक्य व्हावी यासाठीं हा दर्शनीं विभजनाचा व्यापार मनाकरवीं केला जातो. मनानें पदार्थाचे तुकडे करून, अगदीं सूक्ष्मतम परमाणु गांठला किंवा पदार्थ वाढवीत वाढवीत, सगळीं विश्वें व विश्वमाला ज्याच्यांत राहतील असा महत्तम पदार्थ मनानें बनविला, तरी दोनहि क्रियांनीं मूळ वस्तु मनाच्या आवाक्यांत येत नाहीं. हे सर्व पदार्थ सूक्ष्मतम व महत्तम अशा एका मूळ शक्तीचीं रूपें आहेत, ही मूळ ज्ञानमय शक्तीच फक्त खरी सत्य आहे आणि तिचे बनलेले सर्व पदार्थ हे शाश्वत शक्तिमय जाणिवेचीं व्यक्त आत्मरूपें या एकाच दृष्टीनें फक्त सत्य आहेत.
आतां असा प्रश्न आहे कीं, आत्म्याच्या व्यापकतेला मर्यादा घालणारी ही अविद्या मुळांत येते कोठून? अतिमानस क्षेत्रांत वावरणारें दिव्य मन दिव्यता टाकून खालीं येतें कसें? या अधःपतनाचा परिणाम म्हणून येणारी विभागणी सत्य आहे, ही कल्पना कशी निर्माण होते? अतिमानसिक व्यापाराची विकृति होऊन अ-दिव्य मन, अविद्या अस्तित्वांत येते; पण कोणत्या व्यापाराची विकृति होते हा प्रश्न आहे. या प्रश्नाचें उत्तर असें आहे कीं, अतिमानसिक क्षेत्रांत जो दिव्य वैयक्तिक आत्मा असतो, त्याच्या व्यापाराच्या विकृतीनें अविद्या अस्तित्वांत येते. हा दिव्य वैयक्तिक आत्मा आपली स्वाभाविक व्यापक दृष्टि सोडतो आणि आपल्या वैयक्तिक दृष्टिकोनांतून सर्व गोष्टी पाहूं लागतो; अन्य सर्व दृष्टिकोन आपल्या कक्षेबाहेर ठेवतो म्हणून अविद्या मूळ धरते. इतर सर्व स्थानें वगळून, एका विशिष्ट स्थानीं आत्म्यानें आपल्या जाणिवेचें केंद्रीकरण करणें, काळाचें आणि स्थळाचें एक विशिष्ट कार्य हें आत्म्याच्या एकंदर जीवनलीलेचा केवळ एक भाग असतांना, तें कार्य म्हणजेच आपलें सर्व जीवन आहे अशी समजूत करून घेऊन, त्याच्याशीं आपलें पूर्ण तादात्म्य करून बसणें, ही जी दिव्य वैयक्तिक आत्म्याची चूक, तीच अविद्येचें मूळ आहे.
पान क्र. ३१४
कालाच्या एका विशिष्ट क्षणाचें कार्य, स्थळाच्या एका विशिष्ट बिंदूचें कार्य व या बिंदूंत या क्षणीं जें एक विशिष्ट रूप आत्म्याला असतें, तें विशिष्ट रूप -- या गोष्टी वैयक्तिक आत्मा आपल्या म्हणून मानतो आणि ही त्याची बुद्धि बरोबर असते; पण तो ही गोष्ट दृष्टिआड करतो कीं, दुसरे वाटणारे आत्मे तो स्वतःच झाला आहे, दुसऱ्यांचीं वाटणारीं कार्यें त्याचीं स्वत:चीच आहेत. अस्तित्वाच्या आणि जाणिवेच्या दुसऱ्याच्या म्हणून वाटणाऱ्या अवस्था सर्व त्याच्याच आहेत; आत्म्याला झालेली ही विस्मृति हीच अविद्येचें मूळ आहे. अमुक क्षण, अमुक क्षेत्र, अमुक रूप, अमुक व्यापार, यांजवर वैयक्तिक अविद्या-बद्ध आत्मा आपलें सर्व लक्ष केंद्रित करतो; अर्थात् दुसरे सर्व क्षण इत्यादि तो आपल्या कक्षेंतून घालवून बसतो; आणि मग हे घालविलेले क्षण वगैरे पुन्हां मिळविण्यासाठीं त्याला क्रमवारीनें येणारे क्षण, स्थलबिंदू, कालगत आणि स्थलगत रूपें, तसेंच कालगत आणि स्थलगत हालचाली एकत्र जोडून घ्याव्या लागतात. वस्तुत: काल अविभाज्य आहे, शक्ति आणि द्रव्य अविभाज्य आहेत; परंतु अविद्याबद्ध आत्मा हें अविभाज्यतेचें सत्य घालवून बसतो. मन वस्तुत: एक आहे, त्याचे अनेक दृष्टिकोन आहेत, हे अनेक दृष्टिकोन म्हणजेच अनेक मनें होत; प्राणशक्ति एक आहे, ती अनेक क्रियास्त्रोत उदयास आणते, हे अनेक क्रियास्त्रोत म्हणजेच अनेक प्राणमय वस्तू किंवा जीव; शक्ति आणि जाणीवयुक्त द्रव्य एक आहे, अनेक शक्ती आणि जाणीवयुक्त दर्शनी स्थितिशील वस्तू या द्रव्यांतून निर्माण होतात, त्या वस्तू म्हणजेच शरीरे आणि रूपें होत; दर्शनीं स्थितिशील दिसणारीं हीं रूपें आणि शरीरें वस्तुत: स्थितिशील नसतात, सारखीं गतिमान आणि परिवर्तनी असतात; कोणतेंहि रूप वा शरीर बदलतहि असतें आणि एक प्रकारें क्षणक्षणाला आपली पूर्वस्थिति कायम राखण्याचा प्रयत्नहि करीत असतें; येथवर सांगितलेली मनाची, प्राणाची व शरीराची (रुपाची) एकता (द्रव्यदृष्ट्या एकता) अविद्याबद्ध आत्मा विसरून जातो आणि अनेक मनें, अनेक प्राण (जीव) व अनेक शरीरें सत्य आहेत ही कल्पना धरून बसतो. अविद्याबद्ध आत्म्याचा किंवा मनाचा हा धर्म आहे कीं, तें मन प्रत्येक गोष्ट निश्चित ठाम आकारांत वा रूपांत बसविण्याचा प्रयत्न करतें, दर्शनी अपरिवर्तनी आत्मबाह्य घटकांची प्रत्येक गोष्ट बनलेली आहे असें कल्पिण्याचा प्रयत्न करतें; या कल्पनेच्या आश्रयावांचून या मनाला आपलें नियत-कार्य करतांच येत
पान क्र. ३१५
नाहीं; न बदलणारें असें वस्तुत: कांहींच नाहीं; बदल आणि पुनर्रचना हा सार्वत्रिक नियम आहे. ठाम रूप-तन्मात्र म्हणून कांहीं नाहीं, न बदलणारा बाह्य घटक कोठेंहि नाहीं. न बदलणारें ठाम कांहीं असेल, तर शाश्वत सत्य-कल्पना ही न बदलणारी आहे आणि सारख्या बदलणाऱ्या वस्तूप्रवाहांत रूपांची व संबंधांची कांहीं नियमबद्ध निश्चितता व शाश्वती, शाश्वत सत्य-कल्पनेच्या प्रभावानेंच केवळ शक्य होते; सत्य कल्पनेच्या या प्रभावासारखा प्रभाव, मन आपल्या परीनें आपल्या कार्यांत दाखवूं पाहतें व जें शाश्वत नाहीं तें शाश्वत आहे अशी वृथा कल्पना करून ती पक्की धरून बसतें. जीं सत्यें अविद्येमुळें मन घालवून बसतें, तीं सत्यें त्याला पुन्हां आत्मसात् करावयाचीं असतात, तीं त्याला शोधून काढून आपलीं करावयाचीं असतात; मनाच्या जाणिवेच्या गुप्त भागांत हीं सत्यें नेहमींच उपस्थित असतात, मनाच्या आत्मजीवनाच्या गुप्त प्रकाशांत हीं सत्यें तळपत असतात; पण हा गुप्त प्रकाश मनाला अंधारासारखा झालेला असतो याचें कारण, मनानें संकुचित होऊन अज्ञान निर्माण करून तें पांघरलेलें असतें; त्याचा धर्म अविभाज्याची विभागणी करून, त्या विभागणीचा आत्मलीलेसाठीं धनीपणानें उपयोग करण्याचा असतो; पण तें स्वतःच विभागणीला बळी पडून स्वतःचे तुकडे तुकडे करून घेतें. एका मनाचीं अनेक मनें करून बसतें व स्वत: जीं कार्यें केलेलीं असतात आणि जीं रूपें निर्माण केलेलीं असतात, त्या कार्यांत व रूपांत स्वत: परतंत्रपणें अडकून बसतें.
अज्ञान किंवा अविद्या ही मनुष्याच्या संबंधांत गाढतर होण्याचें कारण मनुष्य हा देहालाच 'स्व' किंवा आत्मा मानतो हें होय. मन हें शरीरावलंबी आहे, शरीराच्या कार्यावर मनाचें कार्य अवलंबून आहे, शरीर अगोदर व मन नंतर असा आपला समज होतो, याचें कारण मन शरीराच्या भानगडींत गुरफटलेलें असतें, त्याचें लक्ष शरीराकडेच सर्वथा किंवा प्रधानतः लागलेलें असतें, स्थूल क्रियांकडे तें लक्ष लावून बघत असतें. या स्थूल जड जगतांत मन जी जाणीवयुक्त वरवरची कृति करण्यांत गुंतलेलें असतें, त्या कृतीसाठीं शरीराच्या क्रियांचा त्याला उपयोग होतो म्हणून त्या क्रियांकडे तें सारखे लक्ष लावून असतें. मनाची शरीरांत राहून जी वाढ झाली, त्या वाढीच्या कार्यक्रमांत मेंदू आणि नाडीसंघ यांचा मनानें विकसित केलेला व्यापार मन नेहमीं उपयोगांत आणीत असतें; मेंदू व नाड्या यांची ही स्थूल यांत्रिक संघटना मनाला जी कांहीं सामग्री
पान क्र. ३१६
पुरविते, तिचें निरीक्षण परीक्षण करून तिचा उपयोग करण्यांत मन इतकें गढून गेलेलें असतें कीं मागें वळून शरीरावर अवलंबून नसणारें आपलें शुद्ध व स्वतंत्र कार्य करण्याकडे त्याचें लक्षच जात नाहीं. हें स्वतंत्र शुद्ध मानसिक कार्य, बहुतांशी मनाच्या सामान्य जागृत जाणिवेच्या खालीं असलेल्या अप्रकट जाणिवेंत होत असतें. तथापि स्थूल शारीरिक कार्याच्या निरीक्षणांत व उपयोगांत गढलेलें राहण्याची स्थिति विकासक्रमाच्या आवश्यकतेप्रमाणें एका विशिष्ट टप्प्यांत मनाला प्राप्त झालेली असते, ही गोष्ट आपण लक्ष्यांत ठेवली पाहिजे. पुढें विकासक्रमांत ही आवश्यकता दूर होऊन शारीर-कार्यावलंबित्व टाकून मन हें प्राण-कार्यावलंबी होतें. प्राणावलंबी मन, हा प्राणमय पुरुष असा अनुभव घेऊं शकतो कीं तो स्वत: कायम राहून त्याला एका शरीराच्या पतनानंतर दुसरें शरीर त्याच्या पतनानंतर तिसरें शरीर अशीं एकामागून एक शरीरें प्राप्त होत असतात. हा प्राणमय पुरुष किंवा हें प्राणमय मन, प्रत्येक शरीराबरोबर वेगळें निर्माण केलें जातें व त्या शरीराच्या पतनाबरोबर नाहींसें होतें, अशी वस्तुस्थिति नाहीं ही गोष्ट प्राणमय मनाला कळतें. प्रत्येक शरीराबरोबर निर्माण होऊन, जें त्याबरोबर नाहींसें होतें, तें शारीरमन होय; जडावर मनाचा जो भौतिक ठसा उमटविण्यांत येतो, तो शरीराच्या आंत मन राहूं लागल्यानंतर उमटवण्यांत येतो व हा ठसा, हें शारीर मन, शरीराच्या नाशाबरोबर नष्ट होतें. सर्वच्यासर्व मन कांहीं शरीरांत बनविलें जात नाहीं किंवा शरीराच्या नाशाबरोबर नष्ट होत नाहीं. शारीर-मन हें आमचें वरच्या दृष्य पातळीवरील मन आहे; आमच्या मनाचा पृष्ठभाग आहे. स्थूल भौतिक अनुभवासाठीं एकंदर मन आपला जो भाग पुढें करतें, तो भाग म्हणजे शारीर-मन होय. आमच्या पार्थिव शरीरांत देखील शारीर-मनाच्या पाठीमागें अर्धनेणिवेच्या प्रांतांत आमचें मन काम करीत असतें; जागृत जाणिवेच्या खालील भागांत काम करणाऱ्या या मनाला हें ठाऊक असतें कीं, आपण शरीराहून अधिक व्यापक आहों आणि शारीर-मनाला जें केवळ जडनिष्ठ कार्य करावें लागतें, त्यापेक्षां जडावर कमी अवलंबून असणारें अधिक कार्य आपल्याला करतां येतें. आमच्या पृष्ठभागीय मनाकडून जें विशेष व्यापक, खोल आणि जोरदार गतिशील कार्य घडतें, तें खरोखरी या अंतर्मनाचें, अर्धनेणिवेच्या मनाचें प्रत्यक्ष कार्य असतें. हें अन्तर्मन आपल्याला कळूं लागलें किंवा त्याचा आपल्यावर होणारा प्रभाव आपणाला कळूं
पान क्र. ३१७
लागला म्हणजे त्यालाच आपण आंतर-पुरुष किंवा प्राणमय पुरुष म्हणतो; आत्म्यासंबंधाची पहिली कल्पना म्हणजे हा प्राणमय-पुरुष होय.
या प्राणमय मनाकडून शारीर-मनाचे प्रमाद होत नाहींत. तथापि मनाची सर्वच क्रिया बिनचूक करणें ही गोष्ट या प्राणमय मनाकडूनहि घडत नाहीं. मूळ अविद्येचें कार्य त्याजवरहि स्वामित्व गाजवीत असतें; वैयक्तिक झालेला आत्मा आपल्या एकट्याच्या दृष्टिकोनांतून सर्व गोष्टी पाहतो व त्यांचें खरेंखोटेंपण, बरेंवाईटपण ठरवितो; हा वैयक्तिक दृष्टिकोन प्राणमय मनाचे ठिकाणीं असतो व त्याजकडून तो चुका घडवितो; वैयक्तिक झालेल्या आत्म्याला आणि या प्राणमय मनाला जें वस्तुजातांतील सत्य उमगतें तें आंतून व पूर्णतया उमगत नाहीं; बाहेरून त्याच्यासमोर वस्तू येतात आणि या समोर आलेल्या वस्तूंचें सत्य अंशत: त्याच्या प्रत्ययास येतें इतकेंच; या प्राणमय मनाची जाणीव काल-स्थल-विशिष्ट अशी स्वतंत्र जाणीव असते; त्याचा जुना आणि नवा अनुभव, जीं रूपें घेतो आणि जें परिणाम घडवितो ते या स्वतंत्र जाणिवेच्या द्वारां त्याच्या नजरेसमोर येतात आणि मग वस्तुजातांतील कांहीं सत्य त्याला कळतें इतकेंच; या अपूर्ण सत्यामुळें त्याच्या हांतून प्रमाद घडत राहतात. या प्राणमय मनाचें, पुरुषाचें सर्वच प्राणमय पुरुष वस्तुत: आत्मरूप असतात; परंतु तो ज्या शरीरांत राहतो, त्या शरीरांहून भिन्न शरीरांत राहणाऱ्या त्याच्या आत्म्यांचें ज्ञान त्याला प्रत्यक्ष मुळींच होत नाहीं; हे दुसरे आत्मे विचार, भाषा, कृति, कृतीचीं फळें यांच्याद्वारां आपलें जें अस्तित्व बाहेरून व्यक्त करतात तें फक्त, या प्राणमय मनाला किंवा पुरुषाला ज्ञात होतें; तसेंच शारीर पुरुषाला प्रत्यक्ष भासत नाहींत असे प्राणमय संबंध आणि प्राणमय आघात, दुसऱ्या आत्म्यांकडून एका विशिष्ट शरीरांतील आत्म्यावर किंवा प्राणमय पुरुषावर घडतात आणि या सूक्ष्म सूचक खुणांनीं इतर आत्म्यांची जाणीव विशिष्ट शरीरधारी प्राणमय मनाला किंवा आत्म्याला होत असते; अर्थात् या जाणिवेंत पूर्ण सत्य असत नाहीं व म्हणून प्राणमय मनाकडून किंवा पुरुषाकडून प्रमाद घडतात. ज्याप्रमाणें इतर आत्म्यांसंबंधीं पूर्णज्ञान प्राणमय मनाला होत नाहीं, त्याप्रमाणें स्वतःसंबंधींचें त्याचें ज्ञान देखील अपुरें असतें; कारण जी कालगत हालचाल त्याच्याकडून घडते, ती त्याला स्वतःसंबंधींचें जेवढें ज्ञान करून देतें तेवढेंच त्याचें स्वतःसंबंधींचें ज्ञान; अनेक देह क्रमवारीनें धारण करून, प्राणमय मन किंवा पुरुष आपल्या शारीर शक्तींचा विविध रीतींनीं विनियोग करतो.
पान क्र. ३१८
या क्रमवार देहधारणाच्या क्रियेनें होईल तेवढेंच त्याचें स्वतःसंबंधींचें ज्ञान; अर्थात् हें ज्ञान अपुरें असतें. प्राणमय मन किंवा पुरुष स्वत:संबंधींहि अज्ञानांत असतो असें म्हणतां येतें. यंत्रवत् कार्य करणारें शारीर-मन, 'शरीर सत्य आहे' या भ्रमानें कार्य करणारें असतें; त्याप्रमाणें नेणिवेच्या प्रांतांतील कृतिशील असलेलें मन किंवा प्राणमय मन, 'प्राण हेंच सत्य आहे' या भ्रमानें कार्य करणारें असतें. प्राणमय मन प्राणांत केंद्रित झालेलें व त्या प्राणानें मर्यादित झालेलें असतें; प्राणमय मन आपलें जीवन प्राणाशीं एकरूप करून असतें; त्याच्याशीं त्याचें तादात्म्य झालेलें असतें. मन आणि अतिमानस यांचा जेथें वियोग होतो, जेथें मन अतिमानसापासून वेगळें होऊन स्वतंत्रपणें कार्य करूं लागतें, तें दोघांच्या शेवटल्या मीलनाचें स्थान मात्र, प्राणमय-मन नव्हे. गतिशील प्राणमय मनाच्या पाठीमागें विचारमय शुद्ध मन आहे. हें मन प्राणाशीं तादात्म्य करण्याचें टाळूं शकतें, प्राण आणि शरीर या दोनहि वस्तू स्वतःपासून निराळ्या आहेत हें ज्ञान या विचारमय मनाला असतें. या दोन वस्तू आत्मसात् करून, आपलीं शक्तिकार्यें हें मन प्रत्यक्षांत आणतें. आपल्या विचारांत आणि इच्छाक्षेत्रांत जी शक्ति त्याला प्रतीत होते, त्या शक्तीचें कार्य खालच्या पातळीवर व्यक्त करण्यासाठीं, प्राण आणि शरीर यांचा आश्रय मी करीत आहे ही जाणीव या विचारमय मनाला स्पष्ट असते. शक्तीची कृतिशीलता, गतिमानता ही प्राण व शरीर यांच्याखेरीज व्यक्त होऊं शकत नाहीं. विचारमय शुद्ध मनाच्या क्षेत्रांत विचार आणि इच्छा यांचाच संभार असतो. या विचारांना आणि इच्छांना अनुरूप अशी शक्तिक्रिया करण्यासाठीं, या शुद्ध मनाला प्राण आणि शरीर यांचा आश्रय घ्यावा लागतो. आमच्यामध्यें शुद्ध विचारक म्हणून जो असतो, तो म्हणजे हें विचारमय मन. खरी स्वाभाविक मानसिक शक्ति म्हणजे हें विचारमय मन. या मनाला जें विश्व दिसतें, तें प्राणमय किंवा शरीरमय दिसत नाहीं, तर मनोमय दिसतें. विकासक्रमांत शारीरमन व प्राणमय मन यांचा अनुभव घेऊन, या शुद्ध विचारमय मनापर्यंत-- मनोमय पुरुषापर्यंत आपण जेव्हां पोंचतो-- (परत येऊन पोंचलों असें म्हणणें योग्य, कारण अगोदर मूळ चैतन्य हें जडाकडे जातांना या मनोमय पुरुषाच्या अवस्थेंतून खालीं प्राणमय व शारीर पुरुषाच्या अवस्थेंत उतरलें होतें व नंतर जडाशीं एकरूप झालें होतें.) तेव्हां या पुरुषाला आपण शुद्ध चैतन्य मानूं लागतों; जसें पूर्वीं गतिशील
पान क्र. ३१९
प्राणमय मनाला आपण आत्मा समजलों, तसेंच मनोमय पुरुषाला आपण आत्मा समजूं लागतो; तथापि हा आत्मा नव्हे. मनाचा मूळचा प्रमाद या शुद्ध विचारशील मनालाहि चुका करण्यास भाग पाडतो. शुद्ध मन हें, शारीर आणि प्राणमय मनाहून श्रेष्ठ दर्जाचें असतें. दुसरे आत्मे आपल्या शुद्ध स्वत्वाचीं दुसरीं रूपें आहेत, तें ज्या शरीरांत आहे त्या शरीरांत त्याचें एक रूप व इतर शरीरांत त्याचीं दुसरीं रूपें आहेत हें या श्रेष्ठ मनाला कळतें व या ज्ञानानुसार तें सर्वांशीं वागतें; या दुसऱ्या आत्म्यांचा अनुभव या श्रेष्ठ मनाला केवळ मानसिक संपर्कानें व संवादानें करून घेतां येतो. केवळ प्राण आणि शरीर यांच्याद्वारां मिळणाऱ्या सूचनांनीं इतर आत्म्यांची ओळख करून घ्यावी अशी स्थिति या श्रेष्ठ मनाची नसते; एकता हें तत्त्व या मनाला स्पष्टपणें उमगतें व या एकतेचें मानसिक प्रतीक तें बनवितें; याची कृति आणि इच्छा व्यापक असते, स्वतःच्या जीवनांत आणि मनांत ज्याप्रमाणें हें मन कांहीं निर्मिति करून, तिचा उपभोग स्वामित्वानें घेतें, त्याप्रमाणें इतर आत्म्यांच्या मनांत व जीवनांत आपल्या कृतीनें व इच्छेनें तें कांहीं निर्मिति प्रत्यक्षपणें करून, तिचा स्वामित्वानें उपभोग घेऊं शकतें. सर्वसाधारण भौतिक जीवनांत आपल्याला दुसऱ्यांच्या मनांत व जीवनांत कांहीं नवें निर्माण करावयाचें, तर तें प्रत्यक्षपणें निर्माण करतां येत नाहीं--शरीराच्या व प्राणमय मनाच्या द्वारां आपल्याला अप्रत्यक्षपणें नवनिर्मितीचें काम करावें लागतें हें सर्वांस विदित आहे. जी गोष्ट निर्मितीची तीच उपभोगाची. हा उपभोगहि अप्रत्यक्षपणें घेणें आम्हांला शक्य असतें. श्रेष्ठ मनाप्रमाणें प्रत्यक्षपणें सर्वांच्या जीवनांतील व मनांतील भोगांचा उपभोग आम्हांला घेतां येत नाहीं. असो. याप्रमाणें श्रेष्ठ शुद्ध विचारमय मनाला पुष्कळशा गोष्टी व्यापकपणें करतां येत असल्या, तरी मनाची मूलभूत भ्रांति येथेंहि असते. श्रेष्ठ मन हेंहि, आपल्या सर्वांहून अलग व स्वतंत्र असलेल्या आत्म्याला विश्वाचा निरीक्षक, परीक्षक व केंद्र मानतें आणि या स्वतंत्र आत्म्याच्या द्वारां आपल्या सर्वोच्च परमात्म्याला व वस्तुतत्त्वाला गांठण्याचा प्रयत्न करतें; दुसरे आत्मे याला 'दुसरे' असतात. एवढेंच कीं ते याच्या अंवतींभोंवतीं आपुलकीनें गोळा झालेले आहेत, असें हें श्रेष्ठ मन मानतें; याला मुक्त होण्याची इच्छा झाली म्हणजे प्राण आणि मन यांजपासून हें परावृत्त होतें आणि मूळ सत्यरूप एकतत्त्वांत विलीन होतें. अविद्येचा पडदा अद्यापि त्याजवर असल्यानें, हें असें श्रेष्ठ मनाचें वर्तन
पान क्र. ३२०
होतें. मन आणि अतिमानस यांच्या क्रिया अविद्येचा पडदा मध्यें आल्यानें वेगळ्या वेगळ्या होतात. अतिमानसिक क्षेत्रांत मुक्तपणें वावरणारें सत्य या पडद्यामुळें मनाच्या क्षेत्रांत उतरत नाहीं; या सत्याची छाया मात्र या पडद्यांतून मनांत उतरूं शकते.
अतिमानस आणि मानस यांना एकमेकांपासून विभक्त करणारा अविद्येचा पडदा फाडून टाकला, अनेकधा विभागलेलें मन अविद्येचा पडदा फाटून गेल्यानें निःसत्त्व झालें आणि अतिमानसाच्या क्रियांचा तें शांतपणें विनयशीलपणें मार्गदर्शक व आत्मोद्धारक म्हणून स्वीकार करूं लागलें म्हणजे वस्तुजातांतील मूळ सत्य या मनाला पुन: पूर्णपणें प्रतीत होऊं शकतें. अविद्येचा पडदा फाटला म्हणजे विचारमय मन प्रकाशानें भरलें जातें आणि दिव्य सत्यमय उन्मनाचें (सत्यकल्पनेचें) काम तें आज्ञाधारकपणें यंत्रवत् करूं लागतें. या ठिकाणीं विश्वाचें खरें स्वरूप आपल्याला स्पष्ट दिसतें; प्रत्येक प्रकारें आम्ही दुसऱ्यांत असल्याचें, दुसरें असल्याचें किंवा दुसरे आपण असल्याचें ज्ञान तितकेंच स्पष्टपणें होतें; आणि सर्वजण विश्वव्यापी एकतत्त्वच बनलें आहे, एकतत्त्वानें स्वतःला स्वयंप्ररणेनें अनेक रूपांनीं व्यक्त केलें आहे, एकतत्त्व स्वयंप्रेरणेनें सर्व बनलें आहे असा स्वच्छ प्रकाश आम्हांला प्राप्त होतो. वैयक्तिक दृष्टिकोन स्वतंत्रपणें व अलगपणें आतांपर्यंत काम करीत होता, लवचिकपणा किंचितहि त्यांत नव्हता; अशी स्थिति या नव्या ठिकाणीं राहत नाही. सर्व मर्यादा, बंधनें, भ्रम, प्रमाद यांचें मूळ म्हणजे हा बिनलवचिक वैयक्तिक दृष्टिकोनच असतो. अविद्येचा पडदा फाटल्यावर तो समूळ नाहींसा होतो. अविद्याबद्ध मन जें सत्य म्हणून समजत होतें, तें सत्य नव्हतें असें मात्र नव्हे; तें सत्यच होतें पण वक्रतेनें दूषित झालेलें, भ्रमाने भरलेलें व मिथ्या कल्पनेनें भारलेलें असें तें सत्य होतें हें आपण आतां उमजतों. आतांहि आपल्याला विभाग दिसतात; व्यक्ती, अणु, परमाणु यांची दृष्टि आतांहि आपल्याला प्रतीत होते; पण हें सर्व वस्तुत: काय आहे, आपण वस्तुत: काय आहों, हें ज्ञान आपल्याला या ठिकाणीं स्पष्ट असतें. दिव्य-मन आणि सत्यमय जाणीव किंवा अतिमानस यांचा अन्योन्यसंबंध येथें आपल्याला स्पष्ट दिसतो. दिव्यमन हें वस्तुत: सत्यमय जाणिवेचें एक गौण कार्य आहे, व्यवहाराचें एक गौण साधन आहे हें आपल्याला दिसतें. जोंपावेतों अतिमानसिक स्वामित्व-जाणिवेला, सर्वसमावेशक सर्वेशत्व-जाणिवेला अवमानून मन आपलें वेगळें आत्मत्व कल्पून,
पान क्र. ३२१
वेगळें घर करून वागत नाहीं, एक साधन म्हणून सर्वेशत्व-जाणिवेचें काम निमूटपणें करतें, आपल्या खासगी लाभासाठीं कांहीं गोष्ट आपल्या मालकीची समजत नाहीं, तोंपावेतों तें त्याचें नियत कर्तव्य सोज्ज्वळपणें करूं शकतें व करीत असतें. विश्वांत सत्य एक व रूपें अनेक अशी वस्तुस्थिति आहे. मन आपलें कर्तव्य जेव्हां योग्य रीतीनें करतें, तेव्हां हीं अनेक रूपें एकमेकांपासून वेगळीं ठेवण्याचें काम तें करतें, मात्र हें वेगळेपण त्यांच्या त्यांच्या मर्यादित व्यापारानुसार केवळ तांत्रिक वा वरवरचें असें कल्पिलेलें असतें. आत्म्याची एकच एक सर्वव्यापी स्पष्ट व निर्दोष अशी जाणीव, त्या तांत्रिक वेगळेपणाच्या मागें त्याचें व्यवहाराचें नियंत्रण व शासन करीत असते. हें दिव्य-मन सत्याच्या आश्रयानेंच नेहमीं काम करतें, सत्याला केव्हांहि दृष्टीआड करीत नाहीं; स्वत: वस्तुसत्य आत्मसात् करून, त्या सत्याची वांटणी सर्वोच्च सर्वव्यापी आत्मदृष्टीच्या व आत्म-संकल्पाच्या बिनचूक प्रतीतीनुसार व्यक्तीव्यक्तींत व रूपारूपांत करणें हें दिव्य-मनाचें काम असतें. क्रियाशील जाणीव, आनंद, शक्ति व द्रव्य यांचें व्यक्तीव्यक्तींत वांटप हें दिव्य-मन करतें आणि या वांटपाची सर्वसमर्थता, सत्यता व आनंदमयता, व्यक्तींच्या पाठीमागें असलेल्या अनिवार्य सर्वव्यापी आत्म्यामुळेंच शक्य आहे ही जाणीव दिव्य-मन नेहमीं ठेवतें. एकतत्त्वाचीं अनेक रूपें वरकरणीं विभक्त ठेवण्याचें, या रूपांचे अन्योन्यसंबंध निश्चित करण्याचें व या संबंधांना कमी अधिक स्थायी रूप देऊन हीं अलग झालेलीं सर्व रूपें पुन: एक होऊन एकमेकांत मिळतील असें करण्याचें काम दिव्य-मनाचें असतें. शाश्वत एकता आणि शाश्वत अन्योन्यसंमीलन हें सत्य नित्य पुढें ठेवून, त्याच्या पोटांत व्यक्ती अलग होऊन पुन: अन्योन्य-संपर्काचा आनंद भोगतील अशी व्यवस्था करण्याचें काम दिव्य-मनाचें असतें. मूळ सत्य एकचएक आत्मा हें आहे. या आत्म्यानें आपली मूळ एकता नित्य संभाळून, वरकरणी व्यक्ति होऊन, इतर व्यक्तींशीं नानाविध व्यवहार करण्याचा खेळ खेळावा अशी व्यवस्था करणें हें दिव्य-मनाचें काम आहे. विश्व हें वस्तुत: अशा खेळाचें क्षेत्र आहे; असा खेळ म्हणजेच विश्व होय. त्रिपुटीयुक्त (त्रिपुटी = ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान) सत्यमय जाणिवेचें अंतिम कार्य म्हणजे दिव्य-मन आणि या दिव्य-मनामुळेंच वर सांगितलेला एकतत्त्वाचा अनेकतामय व्यवहार शक्य होतो. अविद्या, अज्ञान म्हणून जें ओळखलें जातें, तें कांहीं नवी गोष्ट बनवीत नाहीं; किंवा सर्वस्वीं मिथ्या अशी गोष्टहि बनवीत नाहीं. तें केवळ
पान क्र. ३२२
यथातथ्यता टाकून अयथार्थतेनें आपणापुढें सत्य ठेवीत असतें. परम सत्य, एकचएक आत्मा विश्वरूपानें व्यक्त झाला आहे आणि हा विश्वरूपाचा खेळ सर्वथा सुसंवादित्वानें चाललेला आहे. हेंच परम सत्य, सर्व ज्ञानाचें मूळ आहे, या मुळांतूनच दिव्य-मनाचें ज्ञान येतें; दिव्य-मन त्याच्या ज्ञानाच्या उगमापासून--मूळ आत्म्यापासून--जाणिवेनें, कल्पनेनें विभक्त होणें म्हणजेच अविद्या, अज्ञान होय; मी वेगळा, आत्मा वेगळा अशी जाणीव म्हणजे अज्ञान वा अविद्या. विश्वाच्या सुसंवादमय खेळांत अविद्याग्रस्त किंवा अदिव्य मन विसंवाद आणि विरोध यांचा देखावा पाहतें, हे विसंवाद आणि विरोध तात्पुरते नसून कायम स्वरूपाचे आहेत, असा समज करून घेतें, पण हा त्याचा समज खोटा असतो, त्याला दिसणारा केवळ वरवरचा देखावाच असतो. वस्तुत: विश्वरूपानें झालेला परम सत्याचा आविष्कार सुसंवादमय आहे, यांतील कोणतेच दर्शनी विसंवाद कायम स्वरूपाचे नसून, व्यापक व अंतिम दृष्टीनें ते विश्वखेळाच्या सुसंवादित्वांत भर घालणारे आहेत. त्यांत जे विसंवाद, विरोध व जो कडक एकांगीपणा दिसतो, तोहि अज्ञानामुळे दिसतो. वस्तुत: या खेळांत लवचिक नियमांनीं काम चालत असतें. खोटाच कडकपणा, खोटाच विसंवाद व विरोध खरा म्हणून जें भासवितें तेंच अज्ञान. दिव्य-मन अतिमानसिक सत्यमय जाणिवेपासून सत्यज्ञान मिळवितें; तें या ज्ञानाच्या उगमापासून दूर होऊन वेगळें झालें, स्वतःला वेगळें व स्वतंत्र समजू लागलें म्हणजे अज्ञानाचा प्रभाव सुरू झाला, दिव्य मनाचें अदिव्य मन झालें असें समजावें.
तेव्हां, मनाची मूलभूत चूक ही कीं, तें आत्मज्ञानच्युत होतें, आत्मस्वरूपासंबंधाचें सत्यज्ञान तें घालवून बसतें; या च्युतीमुळें, या अध:पतनामुळें वैयक्तिक आत्मा आपलें व्यक्तित्व एक स्वतंत्र वस्तु आहे असें मानूं लागतो, एकमेव अद्वितीय सत्याचें अनन्तरूपांतील एक रूप आपण आहों याची विस्मृति त्याला होते; विश्वव्यापक, विश्वरूप एकमेव सत्याच्या अनेक, अनंत केंद्रांपैकीं एक केंद्र आपण आहों, या गोष्टीचा विसर त्याला पडतो आणि स्वतःला स्वतंत्र केंद्र समजून, आपल्याभोंवतीं स्वतंत्र विश्व उभें करण्याची चूक तो करतो. वैयक्तिक आत्म्याची मूलभूत चूक वर सांगितली-- या चुकीचा परिणाम म्हणून त्याचे ठिकाणीं नाना प्रकारचें विशिष्ट अज्ञान उत्पन्न होतें; तसेंच नाना प्रकारच्या विशिष्ट मर्यादा व बंधनें त्याला अडवितात आणि त्याचें जीवन संकुचित करतात. नदीच्या
पान क्र. ३२३
अखंड प्रवाहाप्रमाणें वस्तुजात हें प्रवाही आहे. या प्रवाही विश्वाचा कांहीं अंश वैयक्तिक आत्म्यावरून व आत्म्यांतून वाहत चोहोंकडे पसरतो, वैयक्तिक आत्मा हा अंशच फक्त बघतो; वैयक्तिक आत्मा या अंशदर्शित्वामुळें आपल्या अस्तित्वाला मर्यादा घालतो; त्याचें अस्तित्व मर्यादित झालें कीं त्याची जाणीव, अर्थात् त्याचें ज्ञान, जाणीवयुक्त शक्ति व इच्छाशक्ति अर्थात् सामर्थ्य, आणि आत्मानन्द अर्थात् जीवनानन्दहि मर्यादित होतो. वैयक्तिक आत्म्याला वस्तूंचें जें ज्ञान होतें तें, त्याच्या व्यक्तित्वावर वस्तूंचा जो ठसा उमटेल, त्याच्या व्यक्तित्वाला वस्तूंचा जो देखावा दिसेल त्यावरूनच केवळ होतें; अर्थात् या देखाव्यांत अंतर्भूत न होणाऱ्या अशा गोष्टींचें ज्ञान त्याला होत नाहीं; त्यांच्यासंबंधानें तो अज्ञानांत राहतो आणि म्हणून जें ज्ञान आपल्याला झालें असें तो मानतो, तेंहि बिनचूक असूं शकत नाहीं; सर्व अस्तित्व अन्योन्यावलंबी असल्यानें सर्वाचें ज्ञान, निदान सारभूत भागाचें ज्ञान असल्याशिवाय कोणत्याहि भागाचें यथार्थ ज्ञान होऊं शकत नाहीं. मानवी ज्ञानांत या कारणानें चुकीचा भाग सर्वत्र असतो. ही मानवी ज्ञानाची गोष्ट झाली. आमची इच्छाशक्ति सर्वेशाच्या इच्छाशक्तीचा एक अंशरूप असते; अर्थात् ही आमची आंशिक इच्छा ईश्वराची तदितर इच्छा जाणत नसल्यानें, कार्यप्रवणतेनें कामास लागली तरी कामांत निश्चितपणें चुका करते, तिचें कार्य प्रमादशील होणें अनिवार्य असतें आणि कमी अधिक असमर्थता आणि दुर्बळता तिच्या वांट्यांस अटळपणें येते; तसेंच त्याचा आत्मानन्द आणि वस्तुनिष्ठ आनंद हा सर्वेशाचा सर्वानन्द जाणत नाहीं, तो जाणून घेण्याची शक्ति त्याला नसते व भावनाहि त्याला नसते; त्याची इच्छाशक्ति दुर्बळ, त्याची ज्ञानशक्ति दुर्बळ अर्थात् जें विश्व तो स्वतःचें म्हणून मानतो, तें त्याला आपल्या तंत्रानें चालविणें अशक्य होतें--अर्थात् वस्तुनिष्ठ वस्तुशासनाचा आनंद त्याला हवा तसा प्राप्त होत नाहीं. एकंदरींत सर्वानन्दाच्या प्रतीतीच्या अभावीं, त्याचा आत्मानंद हिणकस आणि वस्तुविजयाच्या अभावीं वस्तुनिष्ठ आनंदहि हिणकस, अशी त्याची स्थिति होते; आत्मजयाचा आणि वस्तुजयाचा आनन्द मिळविण्याची अपात्रता त्याचे ठिकाणीं स्वतंत्र व्यक्तित्वामुळें आल्यानें, त्याला दुःखभोग अनिवार्य होतो. याप्रमाणें अविद्या, आत्मविषयक अज्ञान हेंच आमच्या जीवनाच्या एकंदर विकृतीचें एकमेव मूळ आहे, आत्मविषयक अज्ञानानें अहंभावाचें रूप घेतलेलें आहे, या अहंभावानें आत्म्याला मर्यादांचें बंधन
पान क्र. ३२४
घातलेलें आहे; हें बंधन व हा अहंभाव सर्व जीवनविकृतीचा भक्कम आधार होऊन बसला आहे.
तथापि एक गोष्ट ध्यानांत ठेवणें अवश्य आहे ती ही कीं, अज्ञान आणि विकृति ही कांहीं निर्भेळ असत्याचा खेळ नव्हे, तर वस्तुजातांतील सत्य आणि ऋत यांचा कमीअधिक विपर्यास मात्र आहे. मन हें स्वभावत: विभाग पाडतें, यांत कांहीं दोष नाहीं; पण स्वत: पाडलेल्या विभागांच्या पोटीं तें स्वतःला बंद करून घेतें आणि या बंदीखान्यांतून विश्वाकडे बघतें; म्हणून सर्व सत्यविपर्यास होतो. त्यानें जर स्वतःकडे आणि स्वत: पाडलेल्या सत्य वस्तूच्या विभागांकडे, तीं सत्याच्या-सच्चिदानन्दाच्या लीलेचीं साधनें वा लीलेसाठीं घडलेलीं दर्शनी रूपें आहेत, या दृष्टीनें पाहिलें, तर सत्यविपर्यास होण्याचें आणि त्याचा परिणाम म्हणून जीवन विकृत होण्याचें कांहीं कारण राहणार नाहीं. ज्या सत्याला विसरून दिव्य-मन पतित होऊन, सामान्य मानवी मन झालें, त्या सत्याचा आश्रय त्यानें जर परत केला, तर सत्यमय जाणिवेचें अंतिम त्रिपुटीयुक्त कार्य हें स्वरूप त्याला परत प्राप्त होऊन, या दिव्य अवस्थेंत प्राप्त होणाऱ्या सामर्थ्यानें व प्रकाशानें जे संबंध हें दिव्य-मन निर्माण करील, ते सर्व संबंध सत्यमय असतील; विकृतिमय असणार नाहींत. वैदिक ऋषि वस्तूंचें आणि घटनांचें ऋजु (सरळ गोष्टी) व वक्र (वांकड्या, वळणावळणाच्या गोष्टी) असें वर्गीकरण करतात. या उद्बोधक वर्गीकरणानुसार बोलावयाचें, तर सत्याचा परत आश्रय करणाऱ्या मनाकडून घडून येणारे वस्तुसंबंध ऋजू, सरळ असतील; वक्र, वळणावळणाचे असणार नाहींत; दुसऱ्या शब्दांत म्हणावयाचें, तर हें सत्याश्रयी मन दिव्य, ईश्वरी जीवनाचीं सत्यें पुन: प्रस्थापित करील; मन सत्याश्रयी झाल्यानें, वैयक्तिक आत्मा हा व्यक्तित्वाला त्याचें योग्य (ईश्वरी लीलेचें साधन म्हणून) स्थान देऊन, ईश्वरी अस्तित्वाशीं एकरूप होईल आणि त्या अस्तित्वाशीं निगडित असलेली आत्मतंत्र दिव्य-जाणीव, इच्छा व आनन्द आत्मसात् करून, आपल्या सर्व क्रिया, आपल्या स्वतःच्या अनन्त क्षेत्रांत पूर्ण सुसंवादित्वानें करीत राहील. सध्यां आमची वाटचाल सरळ मार्गानें होत नाहीं. मन आणि प्राण यांची वाटचाल म्हणजेच आजची आमची वाटचाल. यांची आजची हालचाल वाकड्यातिकड्या वळणावळणांनीं चाललेली आहे. आमचा आत्मा स्वतःचें खरें स्वरूप विसरून बसला असून, तें स्वरूप पुन: प्राप्त करून घेण्यासाठीं
पान क्र. ३२५
धडपड करीत आहे; या धडपडींत त्याला वेडेवांकडे अंगविक्षेप करावे लागत आहेत; आमचा आत्मा, आमचा प्राण व आमचें मन स्वतःचें म्हणजेच आत्म्याचें मूळ स्वरूप पुन: मिळावें यासाठीं वांकडीतिकडी धडपड करीत आहेत. या धडपडीचा हेतु थोड्या विस्तारानें सांगावयाचा, तर आमच्या भ्रमांचा अन्त होऊन सत्याचा पुन्हां उदय होण्यासाठीं ही धडपड आहे; आज आम्ही ज्याला सत्य किंवा भ्रम, न्याय किंवा अन्याय मानतों, तें सर्वच मूळ सत्याला मर्यादित करीत आहे किंवा विपर्यस्त करीत आहे; म्हणून हें सर्व भ्रांतीचें, प्रमादाचें भांडार नाहींसें करून, खऱ्या सत्याची पुन्हां प्रस्थापना करण्यासाठीं आमच्या आत्म्याची, मनाची व प्राणाची वेडीवाकडी धडपड चाललेली आहे; आज आम्ही जिला सामर्थ्य समजतों व जिला दुर्बलता समजतों, त्या दोन्ही गोष्टी मूळ शक्तीच्या खटाटोपाचा भाग आहेत आणि आमची आजची सर्व प्रकारची अक्षमता दूर होऊन, आमच्यांत खरी क्षमता येण्यासाठीं हा खटाटोप चालला आहे. आज आम्ही जिला सुख समजतों व जिला दुःख समजतों त्या दोन्ही गोष्टी संवेदनाशक्तीच्या तडफडीचा भाग आहेत आणि आजचें आमचें सर्व प्रकारचें दुःख दूर होऊन, त्याची जागा निरामय आनंदानें घ्यावी यासाठीं ही अंग मोडून तडफड चालली आहे; आज आम्ही ज्या गोष्टीला जीवन म्हणतो व ज्या गोष्टीला मरण म्हणतो, त्या दोन्ही गोष्टी मूळ अस्तित्वाच्या नित्याच्या खटपटीचा भाग आहेत आणि आम्हांपासून मरण दूर जाऊन, त्याची जागा अमरत्वानें घ्यावी, आमच्या अस्तित्वानें, जीवनानें परत आपल्या अमरत्वाची प्राप्ति करून घ्यावी यासाठीं ही खटपट चाललेली आहे; अर्थात् आमच्या अविद्याग्रस्त आत्म्याला स्वतःच्या खऱ्या स्वरूपाचा पुनर्लाभ होणें म्हणजे पूर्णसत्य, सर्वसमर्थता, नित्यानन्द व अमरता यांचा पुनर्लाभ होणें आहे; व या पुनर्लाभासाठीं आमचा आत्मा, मन व प्राण यांची सारखी धडपड सुरू आहे.
पान क्र. ३२६
प्रकरण एकोणिसावें
प्राणशक्तिमय जीवन
प्राणशक्ति हीच भूतांचें जीवन होय; प्राणालाच विश्वव्यापी जीवनतत्त्व म्हटलें आहे.
- तैत्तिरीय उपनिषद् २, ३.
आमचें मानवी जीवन बनविणाऱ्या तीन कनिष्ठ घटकांपैकीं मन हें सर्वश्रेष्ठ घटकतत्त्व आहे. या मनाचें उगमस्थान, दिव्य ईश्वरी अतिमानसिक क्षेत्र आहे आणि हें मन सत्यमय जाणिवेशीं निगडित आहे; दिव्यमन कसें असतें आणि सत्यमय जाणिवेशीं त्याचा संबंध काय आहे हें आपण पाहिलें आहे. ईश्वरी जाणिवेचें एक खास विशिष्ट कार्य म्हणजे मन होय; किंवा असे म्हणतां येईल कीं, ईश्वरी जाणिवेच्या निर्मितिकार्याचा अंतिम भाग म्हणजे मन होय. पुरुषाला, आत्म्याला या मनाच्या शक्तीनें आपल्या विविध रूपांचे आणि शक्तींचे अन्योन्य संबंध व्यवस्थितपणें वेगळे वेगळे ठेवतां येतात. या मनाकडून जे दर्शनी भेद निर्माण केले जातात, त्यांचा ईश्वरी लीलेला उपयोग असतो; मात्र वैयक्तिक आत्मा सत्यमय जाणिवेच्या संपर्काला मुकला म्हणजे हे दर्शनी भेद मौलिक व खरेखुरे भेद आहेत अशी त्याची प्रामाणिक भावना होते; आणि या मूळ विकृतीपासून पुढें अनेक विकृती निर्माण होतात; अविद्येच्या, अज्ञानाच्या बंधनांत पडलेल्या आत्म्याच्या जीवनांत, स्वभावतःच जीं द्वंद्वें, जे विसंवाद गोंधळ घालतात, ते सर्व वर सांगितलेल्या मूळ विकृतीचीं फळें होत. जोपर्यंत आपल्या जन्मदात्या अतिमानसाला मन चिकटून असतें, तोंपर्यंत तें विकृतींना आणि असत्यांना थारा देत नाहीं, तर सर्वव्यापी सत्याच्या विविध प्रकारच्या निर्मिति-कार्याला आपल्या विशिष्ट शक्तीचा आधार देत असतें.
विश्वाची निर्मितिकारकता मनाकडे आहे, त्याच्याकडे विश्वव्यापी कार्यकर्तेपण आहे असें वरील गोष्टीवरून दिसतें. पण आम्हांला मनासंबंधींची जी सामान्य कल्पना आहे, त्या कल्पनेनुसार मन हें अनुभूतीचें
पान क्र. ३२७
साधनरूप इन्द्रिय आहे; जडद्रव्यांत शक्ति जें कार्य करतें, त्या कार्यानें बनलेल्या गोष्टींचा अनुभव आम्हांला आणून देणें, हें आम्हीं सामान्यत: मनाचें कार्य समजतों; मन स्वत: कांहीं निर्माण करीत असेल तर दुय्यम गोष्टी-शक्तीनें जडद्रव्याचीं जीं रूपें बनविलेलीं असतात, त्या रूपांचा एकमेकांशीं संयोग करून 'नवी' गोष्ट बनविणें, असलें दुय्यम रचनेचें काम मन करूं शकतें व करतें असें आम्ही मानतों; यापेक्षां मन अधिक कांहीं स्वतंत्र निर्मिति करूं शकतें असें आम्ही मानीत नाहीं. पण मनासंबंधींची ही आमची कल्पना आतां खोटी ठरत आहे. आम्हांला मनासंबंधींचें जें नवीन ज्ञान प्राप्त होत आहे आणि नवें भौतिक विज्ञान जे शोध लावीत आहे, त्यावरून आम्हांला हें समजूं लागलें आहे कीं, जडद्रव्य म्हणून जें आहे आणि जडशक्ति म्हणून जी शक्ति जडद्रव्यावर कार्य करून, कांहीं रचना करतांना दिसत आहे, त्या जडद्रव्यांत आणि जडशक्तींत मन गुप्तपणें कार्य करीत आहे; त्या दोघांच्याहि पोटीं अप्रकट मन आहे आणि जी रचना जडशक्तीनें केलेली दिसते, ती त्याच्या पोटीं असलेल्या अप्रकट मनामुळेंच शक्य होते; आम्हांला हें अवगत आहे कीं, जडांत मनाचा आविष्कार होतो. प्रथम जडाचे ठिकाणी मन विविध जीवप्रकारांच्या रूपानें व्यक्त होतें, नंतर पूर्वी घडलेल्या जीवांच्या आश्रयानें अप्रकट मन मानसिक शक्तीचे अनेक प्रकार निर्माण करतें, वनस्पति-जीवनांत आणि प्राथमिक देहधारी प्राण्यांच्या जीवनांत नाडीसंघद्वारां जाणीव काम करूं लागते; ही नाडीमय जाणीव जडाच्या पोटीं असलेल्या अप्रकट मनानें घेतलेलें रूप होय. पुढें कमीअधिक विकसित अशा मनुष्येतर प्राण्यांत आणि स्वत: मनुष्यांत, सारखी विकास पावणारी मानसिक संघटना काम करते. ही मानसिक संघटना अप्रकट मनाचें पुढारलेलें व्यक्त रूप होय. हा जो अप्रकट मनाचा आविष्कार क्रमवारीनें जडांत होत असतो, तो अप्रकट मन स्वत: करीत असतें. जडद्रव्य किंवा जडशक्ति ही कांहीं मनाला वर ढकलीत नाहीं--जड तें जड. उलट जडशक्ति ही, मनाचें एक शक्तिरूप आहे असेंच आपल्याला आढळून येईल. जडद्रव्य हें जडशक्तीनें घेतलेलें द्रव्यरूप आहे. मुळांत जडद्रव्य ही वस्तु नाहीं; मुळांत जडशक्ति आहे असें भौतिक विज्ञानाचें अलीकडे सिद्ध झालेलें तत्त्व आहे. या तत्त्वाचें संशोधन होऊन, जडशक्ति म्हणून मुळांत नाहींच, मुळांत मन आहे आणि त्याचें एक रूप जडांत काम करणारी शक्ति हें आहे, असा सिद्धान्त सिद्ध होईल असें मानण्यास
पान क्र. ३२८
भरपूर जागा आहे. जडशक्ति किंवा भौतिक शक्ति म्हणून जी दिसते, ती वस्तुत: ईश्वरी इच्छेची अप्रकट क्रिया आहे; आमच्यामध्यें काम करणाऱ्या इच्छाशक्तीला ज्ञानाचा आधार असतो, पण तो अर्धवट ज्ञानाचा, पूर्ण ज्ञानाचा नव्हे; भौतिक शक्ति मात्र पूर्ण अज्ञानाच्या अंधारांत काम करतांना दिसते. या दोन शक्ती तत्त्वत: एक आहेत; जडवादी विचारसरणीला हे ऐक्य वा तादात्म्य पटलेलें आहे. खालून केलेल्या जड वस्तूंच्या संशोधनानें व सहज-प्रेरणेनें, जडवाद्यांना हें ऐक्य मान्य झालेलें आहे. हेंच तादात्म्य वरून शोध घेत घेत आध्यात्मिक ज्ञानानें फार पूर्वीं सिद्ध केलेलें आहे. तेव्हां आम्हांला असें म्हणतां येतें कीं, कार्यकारी निसर्गशक्ति किंवा प्रकृति आपल्यांतून व्यक्त करून, तिच्याद्वारां अप्रकट मनानें किंवा बुद्धीनें हें भौतिक विश्व निर्माण केलें आहे.
परंतु मन ही स्वतंत्र वस्तु नाहीं, सत्यमय जाणिवेचें किंवा अतिमानसाचें अन्तिम कार्य, अन्तिम व्यापार म्हणजेच मन होय हें आपल्याला ठाऊक आहे. तेव्हां मन असेल तेथें अतिमानस असलेंच पाहिजे हें आपणाला समजतें. विश्वाच्या अस्तित्वाची खरी निर्माणकर्ती वस्तु अतिमानस किंवा सत्यमय जाणीव होय. आपली जाणीव अंधारमय करून, मन हें जेव्हां अतिमानसापासून विभक्त होतें, तेव्हां देखील मन ज्या क्रिया करतें, त्या क्रियांच्या पोटीं अतिमानसाची विशाल कर्तबगारी उपस्थित असते. मन ज्या कांहीं रचना करतें, त्या रचनांचे अन्योन्यसंबंध व्यवस्थित ठेवावे, कोणत्याहि रचनेच्या पोटीं जें अटळ फळ असेल, तें फळ विकासक्रमानें योग्य वेळीं उदयास आणावें, विशिष्ट योग्य बीजापासून विशिष्ट योग्य वृक्ष अस्तित्वांत आणावा, हें सर्व काम मनाच्या क्रियांच्या पोटीं असलेली गुप्त अतिमानसिक कर्तबगारी करीत असते. जड भौतिक शक्ति ही अंधारमय, प्रेरणाहीन व बुद्धिहीन असतांहि, त्या शक्तीचे व्यापार, हें नियमांनीं बांधलेलें, व्यवस्थायुक्त, योग्य संबंधांनीं युक्त असलेलें असें विश्व परिणामत: अस्तित्वांत आणतात; अव्यवस्थित व अकारण आकस्मिक घटनांनीं भरलेलें असें गोंधळाचें विश्व अस्तित्वांत येऊं देत नाहींत, या घटनेलाहि मनाच्या पोटीं असलेलें अतिमानसच कारण होय. अर्थात् ही जी व्यवस्था व हे जे योग्य संबंध विश्वांत गुप्त अतिमानसिक क्रियेनें स्थापित होतात, ते आदर्श सर्वोत्तम प्रकारचें नसतात. मनाचा व अतिमानसाचा जिव्हाळ्याचा संबंध जर कायम टिकला असतां, मन आपल्या जाणिवेनें अतिमानसापासून विभक्त झालें नसते, तर असे आदर्श
पान क्र. ३२९
संबंध निर्माण होऊं शकले असते. विभाग पाडण्यांत वाकबगार असलेल्या मनाच्या व्यापाराला अनुरूप अशीच, आज विश्वांतील व्यवस्था आहे; मनाच्या विभागणीच्या क्रियेनें वस्तूंचा व व्यक्तींचा अलगअलगपणा, विरोध, द्वंद्वमय पक्ष, एकाच सत्याचे, सद्वस्तूचे अन्योन्यविरोधी पक्ष उत्पन्न होतात; या सर्व मनोव्यापाराला अनुरूप अशी, अर्थात् सर्वश्रेष्ठ आदर्श व्यवस्थेहून निराळी, खालच्या दर्जाची व्यवस्था आज जगांत आहे. दिव्य ईश्वरी जाणीव स्वतःची द्वंद्वमय विभागणी करण्याचा निर्णय घेते; या निर्णयानंतर त्याला अनुरूप अशी सत्यमय कल्पना ती अस्तित्वांत आणते आणि या कल्पनेचा स्वाभाविक अटळ परिपाक म्हणून व्यवहारांत आपलें कनिष्ठ सत्य, विविध संबंधांची निर्मिति हें सत्य प्रस्थापित करतें; कारण विश्वांत सत्याचा किंवा सत्यनियमाचा असा स्वभाव आहे कीं, मूळ अस्तित्वांत जें अन्तर्भूत असतें, मूळ सद्वस्तूच्या स्वभावांत आणि सारभागांत जें न्यायतः अगोदरच असतें, दिव्य ईश्वरी ज्ञानाला वस्तूचा जो स्वभाव आणि स्वधर्म म्हणून स्पष्ट दिसतो त्यांत जें लपलेलें असतें, तें तत्त्व व्यक्त करावयाचें; त्या तत्त्वाचा त्याच्या धर्मानुसार आविष्कार व व्यवहार करावयाचा. अर्थात् या कार्यांत समग्र सत्यमय जाणीव ही विशिष्ट सत्यमय कल्पनेच्या पाठीमागें राहून तिचें व्यावहारिक रूपांतर नीटपणें होण्याच्या कामीं आपल्या सर्वश्रेष्ठ शासनाधिकाराचा उपयोग करीत असते. या सर्व ईश्वरी क्रियेचें सूत्रमय वर्णन एका उपनिषदांत (ईशोपनिषदांत) आलेलें आहे. थोडक्या साक्षात्कारी शब्दांत ज्ञानाचें विश्व आमच्या हातीं देणारीं जीं अनेक अद्भूत सूत्रें उपनिषदांत सांपडतात, त्यापैकींच पुढील सूत्र आहे : कविर्मनीषी परिभू: स्वयंभूर्याथातथ्यतोऽर्थान् व्यदधात् शाश्वतीभ्य: समाभ्य: ।। परमात्मा स्वयंभू आहे, द्रष्टा आहे, चिंतनशील आहे; चिंतनशील द्रष्टेपणानें तो सर्वत्र सर्व स्थलें आपल्या विभूतींनीं व्यापून आहे; त्यानें आपल्या विभूतिमय विस्तारांत सर्व वस्तू व्यवस्थेनें मांडलेल्या आहेत; ही व्यवस्था शाश्वत कालाची आहे, त्या त्या वस्तूचें जें सत्य-स्वरूप आहे, त्या सत्यस्वरूपानुसार त्यांची त्यांची व्यवस्था त्या परमात्म्यानें शाश्वतकालीन अशी लावलेली आहे. (ईशोपनिषद्, ८)
आजपर्यंत जेवढा विश्वविकास वास्तवांत घडून आलेला आहे, त्या वास्तव विकासाच्या दृष्टीनें आमचें विश्व मन-प्राण-शरीर या तीन भागांचें--त्रिभागात्मक--आहे. जडामध्यें जो प्राण अंतर्हित होता, तो विचार-
पान क्र. ३३०
प्रवण आणि मानसिक जाणीवयुक्त अशा जीवनांत आतां वावरत आहे. विकासक्रमाच्या नियमानुसार या जीवनाचें रूप त्यानें आतां घेतलेलें आहे आणि या मनांत अतिमानस अंतर्हित असतें; तेव्हां जें मनाच्या पोटीं आहे, तें अर्थात् प्राणाच्या व जडाच्याहि पोटीं आहेच हें आपण जाणतो. अतिमानस हेंच मन, प्राण, शरीर या तिघांचें उगमस्थान व शासक आहे हेंहि आपण जाणतों. शरीर-प्राण-मन यांत अंतर्हित, गुप्त असलेलें हें जें अतिमानस, तेंहि विकासक्रमाच्या नियमानुसार व्यक्त झालेंच पाहिजे हेंहि उघड आहे. तेव्हां आमचें आजचें वास्तव विश्व जरी त्रिभागात्मक आहे, तरी उद्यां, भविष्यकाळी, तें चतुर्भागात्मक व्हावयाचें आहे हें आपण लक्षांत ठेवलें पाहिजे. विश्वाच्या मुळाशीं बुद्धितत्त्व (Intelligence) असलें पाहिजे असें आम्ही म्हणतों याचें कारण, विश्वांत आम्हांला सर्वश्रेष्ठ असें जें तत्त्व प्रतीतीस येतें तें बुद्धितत्त्व होय. आमच्या सर्व कार्याचें आणि निर्मितीचें स्पष्टीकरण करणारें आणि नियंत्रण करणारें तत्त्व 'बुद्धि' हें आहे असें आम्हांस दिसतें. म्हणून आम्ही असें अनुमान करतों कीं, जर विश्वांत चेतना, जाणीव असेल, तर त्या जाणिवेचें स्वरूप बुद्धि, मानसिक जाणीव हें असलें पाहिजे. परंतु बुद्धीहून श्रेष्ठ असें तत्त्व (सत्य) मूळ सद्वस्तूंत आहे; या श्रेष्ठ तत्त्वाकडून (सत्याकडून) जें कार्य घडतें, तें आपल्या शक्तीनुसार बघणें, त्यावर मनन करणें आणि त्याचा व्यवहारांत उपयोग करणें हें बुद्धीचें काम आहे. तेव्हां बुद्धीच्या मागें राहून काम करणारी जी श्रेष्ठ सत्याची शक्ति आहे, ती त्या श्रेष्ठ सत्याला अनुरूप अशी, मानसिक जाणिवेहून वेगळी व तिजहून श्रेष्ठ प्रकारची जाणीव असली पाहिजे, हें उघड आहे. तेव्हां विश्वाच्या मुळासंबंधाची आमची कल्पना आम्हीं बदलली पाहिजे. अप्रकट मन किंवा बुद्धि विश्वरचना करीत नाहीं, तर ही रचना अतिमानसाकडून केली जाते, हें आपण आतां लक्षांत घेतलें पाहिजे. मनाच्या पोटीं अतिमानस गुप्त असतें, तें मनाला पुढें करतें; अतिमानसाच्या ज्ञानमय इच्छाशक्तीचें क्रियाशील असें त्याच्या लगतचें खास स्वरूप म्हणजे मन होय. हें मन दर्शनीं जडशक्तींत अप्रकट रूपानें असतें; ही दर्शनीं जडशक्ति म्हणजे अस्तित्वघटक द्रव्याच्या पोटीं असणारी गुप्त इच्छाशक्तीच होय; या गुप्त इच्छाशक्तीनें भरलेल्या जडशक्तीचा, कार्यकारी निसर्गशक्तीच्या किंवा प्रकृतीच्या रूपानें व नांवानें उपयोग करून, अप्रकट अतिमानसाकडून आपलें हें भौतिक विश्व याप्रमाणें निर्माण केलें जातें.
पान क्र. ३३१
विश्वविकासाच्या क्रमांत जडांत गुप्त असलेलें (अतिमानसगर्भ) मन, प्रथम शक्तीच्या एका विशिष्ट रूपानें--प्राणशक्तिमय जीवनाच्या रूपानें--व्यक्त होतें हें आपण पाहिलें. हें जीवन म्हणजे काय वस्तु आहे? अतिमानसाशीं या जीवनाचें (Life) नातें कोणतें आहे? सच्चिदानंद या त्रिमुखी मूळ सत्याचें निर्मितीचें कार्य हें, सत्यमय कल्पना, सत्यमय जाणीव यांच्याद्वारां चालत असतें--या सच्चिदानन्दाशीं आमच्या जीवनाचा संबंध कोणता आहे? सत्, चित्, आनंद या तीन तत्त्वांपैकीं कोणत्या तत्त्वांतून आमचें जीवन उदयास येतें? सत्याच्या किंवा भ्रमाच्या, दिव्य किंवा अदिव्य स्वभावधर्माचा परिपाक म्हणजे आमचें जीवन असेल, तर तो स्वभावधर्म, ती निकड कोणती असूं शकेल? प्राचीन काळापासून शतकानुशतकें एक आवाज कायम उठत आहे कीं, ''जीवन हें दोषमय आहे, आभासमय आहे, भ्रांतिमय आहे, वेडेपणानें भरलेलें आहे. शाश्वत आत्म्याची शांति आपणास हवी असेल, तर या जीवनांतून पळून जाणें हाच एक मार्ग आहे'' -- या आवाजांत, या उद्घोषांत कांहीं तथ्य आहे काय? तथ्य असेल तर हें असें कां केलें गेलें आहे? शाश्वत परमात्म्यानें आपणा- स्वतःवर म्हणा किंवा आपल्या मायेनें (सर्वांना मोह पाडणाऱ्या भयंकर मायेनें) उत्पन्न केलेल्या जीवांवर म्हणा, हें दोषमय, भ्रांतिमय वेडेपणाचें जीवन, कारण नसतां कां लादलें आहे? किंवा हा शतकानुशतकाचा उद्घोष खोटा तर नाहीं? विश्वांतील विविध जीवनाच्या रूपानें कोणतें तरी दिव्य ईश्वरी तत्त्व प्रकट झालेलें आहे अशी तर गोष्ट नाहीं? शाश्वत परमात्मा आनंदमय आहे, त्या सनातन पुरुषाच्या आनंदशक्तीला व्यक्त व्हावयाची इच्छा झाली आणि म्हणून त्या शक्तीनें काल-स्थल-अंकित क्षेत्रांत उडी घेतली असें तर नव्हे? विश्वांत अगण्य लोक आहेत आणि त्या अगण्य लोकांत अब्जावधि प्रकारचे जीव सारखे अस्तित्वांत येत आहेत, हा सारा प्रकार सनातन परमात्म्याची आनंदलीला तर नव्हे?
पृथ्वीवर जें जीवन व्यक्त होत आहे, त्याचा अभ्यास केला असतां असें दिसतें कीं, जडद्रव्य हें पार्थिव जीवनाचा पाया आहे आणि हें जीवन तत्त्वत: एकच एक असलेल्या विश्वशक्तीचें रूप आहे; 'विश्वशक्तीचा धन आणि ऋण दोनहि प्रकारचा अन्योन्यपूरक वेगवान् प्रवाह' असें या जीवनाचें रूप आहे; विश्वशक्ति अविरतपणें काम करीत आहे आणि या कामाचें स्वरूप रूपें घडणें, त्यांच्यांत चेतनेचा प्रवाह सारखा चालूं ठेवून त्यांना चैतन्यमय करणें, रूपांसाठीं लागलेलें जडद्रव्य सारखें वर खालीं
पान क्र. ३३२
करून, जुनें निकामी झालेलें दूर करून, त्याच्या जागीं नवें कार्यक्षम द्रव्य घालून रूपें कायम ठेवणें, या प्रकारचें असतें; हें चैतन्यमय रूपरचनेचें आणि रूपद्रव्याची काढघाल करून रूपरक्षण करण्याचें, अविरत चाललेलें विश्वशक्तीचें कार्य म्हणजे पृथ्वीवरील जीवन होय. या जीवनकथेवरून हें लक्षांत येईल कीं, आम्ही मरण आणि जीवन यांत जो स्वाभाविक विरोध मानतों, ती आमच्या मनाची चूक आहे. असा विरोध वस्तुत: नसतांना दर्शनी गोष्टींनीं फसून, आमचें मन असे अनेक खोटे विरोध विश्वाच्या अविभाज्य एकतेंत सारखें उभें करीत असतें. हे विरोध अर्थात् आंतरिक सत्याच्या दृष्टीनें खोटे असतात; वरवरचा व्यवहार फक्त पाहिला तर मात्र हे विरोध 'विरोध' म्हणून मान्य करावे लागतात. असो. तेव्हां मरण ही एक जीवनाची अंगभूत प्रक्रिया आहे, जीवनरूप क्रियेचा मरण हा एक अंश आहे, स्वतंत्र रीतीनें मरणाला कांहीं अस्तित्व नाहीं, त्यांत सत्यता नाहीं. जीवनाची अविरत प्रक्रिया म्हणजे रूपघटक द्रव्य विघटित करून बाजूला टाकणें आणि त्या दूर केलेल्या द्रव्याच्या जागीं नवें द्रव्य संघटित करून घालणें व या रीतीनें विशिष्ट रूप रक्षण करणें किंवा तें रूप निकालांत काढून विघटित करून इतर द्रव्यांतून नवें रूप बनविणें-- या जीवन प्रक्रियेंत ''मरण'' म्हटली जाणारी विघटनप्रक्रिया अंतर्भूत आहे. सामान्यत: रूपाच्या जीवनावस्थेंत रूपद्रव्याचें जें विघटन (व संघटन) हळूं हळूं चालूं असतें, ते ''मरण'' प्रक्रियेंत जोरानें व त्वरेनें होतें एवढेंच. विविध अनुभवांसाठीं जीवनाला विविध रूपांची नितांत आवश्यकता असते--मरणरूपी शीघ्र द्रव्यविघटनाची क्रिया जीवनाच्या वरील आवश्यकतेला साहाय्यक म्हणून घडून येत असते. शारीरिक मृत्यूच्या क्रियेंतसुद्धां जीवन कांहीं मरत नाहीं; फक्त त्याच्या एका रूपाचें द्रव्य मोडतोड करून, त्याच्यासाठी निश्चित केलेल्या दुसऱ्या रूपांच्या बनावटीसाठीं वापरण्यांत येतें. बाह्य शारीर आकाराच्या आंत मानसिक शक्ति, आत्मिक शक्ति असते, तीहि जीवशक्तीप्रमाणेंच अमर असते व मोडतोडीनें शरीर निकामी झालें म्हणजे तीहि तें शरीर सोडून दुसरीं शरीरे धारण करण्यासाठीं वाटचाल करूं लागते आणि योग्य वेळीं दुसरीं शरीरें धारण करते. सर्व कांहीं नवीं नवीं रूपें धारण करतें, नाश म्हणून कशाचाहि होत नाहीं, निसर्गाचा हा नियम सर्व गोष्टींना सारखाच लागूं असणारा आहे
पृथ्वीवरील जीवनाच्या या कथेवरून असा निष्कर्ष निघतो कीं,
पान क्र. ३३३
जीवनशक्ति किंवा गतिमय शक्ति सर्वव्यापी अशी एकच आहे; तिचा भौतिक विभाग हा तिचा सर्वांत बाहेरचा गतिप्रकार आहे; भौतिक विश्वांत जीं कांहीं रूपें आहेत, तीं सर्व रूपें या एका सर्वव्यापी क्रियाशील जीवनशक्तीनें निर्माण केलीं आहेत. ही एकच एक जीवनशक्ति, अविनाशी आणि नित्य स्वरूपाची असल्यानें, विश्वाची मूर्ति सर्वच्या सर्व नष्ट झाली, तरी ती शक्ति नष्ट होणार नाहीं; ती कायम काम करीत राहील आणि जुन्या विश्वाच्या जागीं नवें विश्व निर्माण करील. जीवनशक्तीपेक्षां श्रेष्ठ असणाऱ्या शक्तीनें तिला अडविलें किंवा तिनें स्वतःच काम थांबविण्याचें ठरविलें तर गोष्ट निराळी--एरवीं निसर्गनियमाप्रमाणें तिनें विश्वाची उभारणी सारखी करीत राहणें हें अटळ आहे. तेव्हां विश्वांत रूपांची बांधणी, राखण आणि विनाश करणारी शक्ति म्हणजे जीवनशक्ति असें ठरतें; पृथ्वीचें रूप हें या जीवनशक्तीचें एक व्यक्तरूप आहे; पृथ्वीवर उगवणाऱ्या वनस्पती हें त्याच शक्तीचें रूप आहे; वनस्पतींतील जीवन-शक्ति किंवा एकमेकांची जीवनशक्ति भक्षून, पचवून आपलें अस्तित्व टिकविणारे प्राणी, या जीवनशक्तीचींच रूपें आहेत. जें कांहीं सर्व अस्तित्वांत आहे, तें सर्वव्यापी जीवन आहे; जडाचेंहि रूप धारण करणारें सर्वव्यापी जीवन एकच एक आहे. विविध निर्मितीच्या उद्देशानें प्रथम हें जीवन भौतिक जड प्रक्रियेंत जीवनाची प्रक्रिया गुप्ततेनें ठेवील, नंतर मनाच्या खालची संवेदना-शक्ति हें रूप तें धारण करील, नंतर मनानें युक्त अशी प्राणमयता, जीवता हें रूप धारण करील--असा कांहींहि क्रम जीवनशक्तीनें स्वीकारला, तरी 'निर्मितिशील जीवनतत्त्व' हें त्या शक्तीचें मूळ स्वरूप, या सर्व विकासक्रमांत कायम असेल.
असा एक पक्ष पुढें येण्याचा संभव आहे कीं, जीवन म्हणून आम्ही जें ओळखतों, तें हें व्यापक जीवन नव्हे; विश्वशक्तीचा जो विशिष्ट परिणाम आमच्या नेहमींच्या अनुभवांतला आहे आणि जो वनस्पति, मनुष्येतर प्राणी व मनुष्य यांत व्यक्त झाला आहे--परंतु धातु, दगड, वायु यांत जो व्यक्त नाहीं, जो प्राणिवर्गाच्या पेशींत कार्यकारी आहे, पण जो शुद्ध भौतिक अणुपरमाणूमध्यें काम करीत नाहीं--तो विश्वशक्तीचा विशिष्ट परिणाम, आम्ही जीवन या नांवानें ओळखतो. या पक्षाची आतां चिकित्सा करूं. या पक्षानुसार ज्या विश्वशक्तीच्या परिणामाला जीवन हें नांव दिलें जातें, तो परिणाम काय वस्तु आहे, त्याचें स्वरूप काय, त्याचे बरोबर घटक कोणते याचें परीक्षण करून, जड वस्तूचे ठिकाणीं त्याच विश्व-
पान क्र. ३३५
शक्तीचा जो परिणाम होतो, ज्याला आपण जीवन हें नांव देतो, तो परिणाम आणि हा पक्ष ज्या परिणामाला 'जीवन' हें नांव देत नाहीं तो परिणाम--या दोन परिणामांत काय अंतर आहे तें आपण पाहूं. विश्वशक्तीच्या व्यापाराचीं पृथ्वीवर तीन क्षेत्रें आहेत. प्राणिवर्ग (मनुष्यप्राणी सुद्धां), वनस्पतिवर्ग आणि ज्यांत जीवन नाहीं असें आम्हीं मानतो तो तिसरा केवळ जड भूतवर्ग; आमच्यांतील जीवन आणि वनस्पतींतील जीवन, वनस्पतिजीवन आणि धातुवर्गाचें अ-जीवन--धातुवर्ग ज्या जुन्या खनिजवर्गांत (जड भूतवर्गांत) मोडतो त्या खनिज वर्गाचें किंवा नव्या भौतिक विज्ञानानें शोधून काढलेल्या नव्या रसायन वर्गाचें अ-जीवन (जडत्व)-- यांत काय अंतर आहे त्याचा आतां विचार करूं.
सामान्यत: जीवन याचा अर्थ प्राणिवर्गाचें जीवन असा आम्ही करतों ! हें जीवन हलतें, चालतें, श्वासोच्छ्वास करतें, खातें, सुखदुःख भोगतें, शीतोष्णादि ओळखतें, इच्छा करतें; वनस्पतीसंबंधानें जेव्हां जीवन हा शब्द आम्ही उपयोगांत आणतों, तेव्हां तो पुष्कळ अंशीं अलंकारिक रीतीनें; वनस्पति-जीवन ही शुद्ध जड-भौतिक प्रक्रिया आहे; त्यांत जीव-प्रक्रिया जवळजवळ नाहींच असा समज अलीकडे अलीकडे देखील होता. जीवनाचा श्वासोच्छ्वासाशीं जोडलेला संबंध--जीवन म्हणजे श्वासोच्छ्वास हा समज--फार जुना आहे : प्रत्येक भाषेंत अशा प्रकारची समजूत व्यक्त झालेली दिसते; श्वासोच्छ्वास म्हणजे जीवन हें सूत्र खरें धरावयाचें असल्यास श्वासोच्छ्वासाचा अर्थ बदलावा लागेल. असो. हें उघड आहे कीं, स्वयंचलन, स्थलान्तर करणें, श्वासोच्छ्वास करणें, खाणें पिणें, या क्रिया म्हणजे खुद्द जीवन नव्हे, तर त्या जीवनाकडून घडणाऱ्या जीवन-साहाय्यक क्रिया-प्रक्रिया आहेत; आमची जीवनशक्ति म्हणजे सतत चालना देणारी शक्ति होय. या शक्तीच्या उत्पत्तीसाठीं किंवा कार्यप्रवृत्तीसाठीं साधनभूत गोष्टी म्हणून, तसेंच आमचें द्रव्यघटित अस्तित्व टिकविण्यास जी द्रव्याची मोडतोड आणि पुनर्रचना अवश्य असते ती करण्यासाठीं साधनसंभार म्हणून, खाणेंपिणें, श्वासोच्छ्वास वगैरे गोष्टींचें महत्त्व आहे. तथापि श्वासोच्छ्वास, खाणेंपिणें या गोष्टी उपलब्ध नसतांहि आमची जीवनशक्ति टिकूं शकते, इतर साधनांनीं टिकवितां येते, ही गोष्ट लक्षांत घेणें अवश्य आहे. श्वासोच्छ्वास, हदयाचे ठोके किंवा याचेपूर्वीं अवश्य समजल्या जाणाऱ्या दुसऱ्या कांहीं क्रिया कांहीं काळ थांबवूनहि मानवी जीवनशक्ति मनुष्याच्या शरीरांत टिकून
राहते; आणि या शक्तीबरोबर त्याची जाणीवहि पूर्णपणें टिकून राहते, ही गोष्ट प्रयोगांनीं सिद्ध झालेली आहे. वनस्पतींच्या बाबतींत असा पुरावा पुढें आला आहे कीं, त्यांचा भौतिक जीवनक्रम आमच्या भौतिक जीवनक्रमासारखाच आहे, त्या जीवनाची संघटन-व्यवस्थाहि बाह्यतः वेगळी भासली, तरी आमच्यासारखीच आहे--मात्र आमच्याप्रमाणें वनस्पती ही प्रतिक्रिया जाणून करतात असें आम्हांला अद्यापि म्हणतां येत नाहीं.
नुकतेच जे शोध* लावले गेले आहेत, त्यांत एका सुविख्यात भारतीय विज्ञानकोविदानें या गोष्टीकडे विशेष लक्ष वेधलें आहे कीं, जीवनाची अचूक निशाणी म्हणजे प्रयोग-विषयाची बाह्य प्रेरणेला आंतून होणारी प्रतिक्रिया ही होय. या वैज्ञानिकानें वनस्पति-जीवनावर विशेष प्रकाश टाकला आहे; परंतु ही गोष्ट लक्षांत ठेवणें अवश्य आहे कीं, धातू हेहि वनस्पतींप्रमाणें प्रतिक्रिया दाखवितात हें या वैज्ञानिकानें सिद्ध केलें आहे. वनस्पती आणि धातू स्वतःमधील जीवनाची भावात्मक अवस्था व अभावात्मक अवस्था (अर्थात् मरण) या दोन्ही अवस्था, विशिष्ट प्रेरणांना विशिष्ट प्रतिक्रिया दाखवून आमच्या नजरेस आणतात. वनस्पतींत जीवन आहे या संबंधींचा पुरावा भरपूर आहे. धातूंच्या संबंधांत
*नुकत्याच झालेल्या वैज्ञानिक संशोधनांतील विचार या ठिकाणीं घेतले आहेत. जडांत जीवनाची प्रक्रिया व स्वभावधर्म या संबंधानें आम्हीं मांडलेल्या विचारांना अप्रत्यक्षपणें पुष्टिदायक म्हणून ते आम्हीं घेतले आहेत. आधुनिक विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांचे प्रांत व चिकित्सापद्धती वेगळ्या आहेत. हीं शास्त्रें एकमेकांवर आपले सिद्धांत लादूं शकत नाहींत. तथापि आम्हीं जर हें मान्य केलें कीं, सत्ता (अस्तित्व) आणि निसर्ग यांची अवस्था कोणतीहि असो, त्या सर्व अवस्थांत त्या दोहोंमध्यें असणारें सामान्य सत्य व्यक्त करणारी समान गोष्टींची माला सर्व अवस्थांतून दृग्गोचर होते--आणि हें मान्य करणें युक्तीला, तर्काला धरून आहे--तर असें अनुमान करणें योग्य आहे कीं, विश्वांत जी आदिशक्ति काम करीत आहे, तिची प्रक्रिया आणि स्वभावधर्म यांजवर भौतिक विश्वाचीं सत्यें कांहीं प्रकाश टाकूं शकतील; हा प्रकाश अर्थातच सर्वांगपूर्ण असूं शकणार नाहीं--कारण भौतिक विज्ञान त्याच्या चिकित्सा-क्षेत्रांत अपरिहार्यपणें मर्यादाबद्ध व अपूर्ण असतें, आदिशक्तीच्या अप्रकट क्रियांचा पत्ता त्याला लागूं शकत नाहीं.
पान क्र. ३३६
तितका भरपूर पुरावा नाहीं; -- तथापि जेवढा पुरावा आहे तेवढा निःसंशय असल्यानें, धातु हे जीवनशक्तियुक्त आहेत असें ठरतें. धातूंमध्यें जीवन आहे; तसेंच तें धातूंच्या जातीचे दुसरे पार्थिव पदार्थ आणि स्वत: पृथ्वी यांतहि गुप्त किंवा प्राथमिक स्वरूपांत असलें पाहिजे, असें अनुमान करणें शास्त्रशुद्ध आहे. पृथ्वी व तिजवरील पदार्थ यांचें जीवनविषयक संशोधन आम्हीं बरेंच लांबवर नेलें, तर आम्हांला असें आढळून येईल कीं, पृथ्वी आणि तिजवर तयार होणारे धातू, त्याचप्रमाणें धातू आणि वनस्पती, तसेंच पृथ्वीचे घटक-अणू व मूलतत्त्वें आणि पृथ्वी यांजमध्यें जीवन हें सारखें, खंड न पडतां, भरलेलें आहे. अणु, पृथ्वी, धातु, वनस्पति अशा पायऱ्यांची जी अस्तित्वाची शिडी आहे, त्या शिडीच्या सर्व पायऱ्यांत जीवन अखंडपणें आहे, वरच्या वरच्या पायरींतील जीवन खालच्या पायरींत गुप्त असतें व विकासक्रमानें आधीं खालच्या व मग वरच्या पायरीवर व्यक्त होत असतें, एवढेंच. जीवन सर्वत्र आहे. तें गुप्त किंवा व्यक्त, संघटित किंवा प्राथमिक स्वरूपाचें, अंतर्हित किंवा विकसित, अशा कोणत्याहि स्वरूपांत असेल, पण तें सर्वत्र आहे, सर्वव्यापक आहे, अविनाशी आहे; केवळ त्याचीं रूपें भिन्न भिन्न असतील, त्याचें संघटन भिन्न ठिकाणीं भिन्न असेल येवढेंच.
प्रेरणा-प्रतिक्रियेच्या सिद्धान्तानुसार जीवन सार्वत्रिक आहे असें ठरतें. पण विशिष्ट भौतिक प्रेरणेला विशिष्ट भौतिक प्रतिक्रिया ही जी जीवनाची खूण आहे, ती श्वासोच्छ्वास, स्थलांतरक्रिया या आमच्या जीवनक्रियांप्रमाणेंच अंतर्गत जीवनशक्तीची बाह्य निशाणी आहे, हें आपण ध्यानांत ठेवलें पाहिजे. प्रयोग करणारी व्यक्ति प्रयोगविषयावर (उदाहरणार्थ, विशिष्ट वनस्पतीवर) असामान्य प्रेरकाचा, उत्तेजकाचा, प्रयोग करते आणि याला उत्तर म्हणून प्रयोग-विषयांतून स्पष्ट प्रतिक्रिया झालेल्या आपल्या नजरेस येतात. या स्पष्ट प्रतिक्रिया प्रयोगविषयांतील जीवनशक्तीचा निःसंदेह पुरावा म्हणून आपण मांडतों व समजतों. पण वनस्पति जेव्हां प्रयोगविषय नसते, तेव्हांहि ती अस्तित्वांत असतेच; आणि तिच्या अस्तित्वाच्या सर्व काळांत तिच्यावर परिसरातून सारखा प्रेरकांचा, उत्तेजकांचा, मारा चालूं असतो आणि या माऱ्याला उत्तरादाखल तिजकडून सारखी अविरत प्रतिक्रिया होत असते; याचा अर्थ त्या वनस्पतीचें ठिकाणीं सारखी टिकणारी शक्ति असते आणि या शक्तींत त्या वनस्पतीच्या परिसरांतून होणाऱ्या परिसरीय शक्तीच्या माऱ्याला योग्य उत्तर
पान क्र. ३३७
देण्याचें सामर्थ्य असतें. वनस्पतीवर उत्तेजकाचा मारा करणें याचा अर्थ गतिमान् शक्ति आघातार्थ तिच्यावर घालणें आणि वनस्पतीकडून प्रतिक्रिया होणें याचा अर्थ त्या आघाताला वनस्पतींतील गतिमान्, संवेदनशील व क्रियाशील शक्तीकडून उत्तर मिळणें असा होतो. प्रयोगविषय केलेल्या वनस्पतींत बाहेरच्या प्रेरणेचें कंपनयुक्त स्वागत होतें व त्या प्रेरणेला वनस्पतीकडून योग्य उत्तर मिळतें; तसेंच त्या वनस्पतींत वाढण्याची आणि अस्तित्वांत टिकून राहण्याची इच्छा व्यक्त होते. त्या वनस्पतीच्या रूपांत गुप्तपणें जाणीवयुक्त-शक्ति राहत आहे, त्या शक्तीचें मनाच्या उदयापूर्वींचें भौतिक संघटन, प्राणनिष्ठ (जीवननिष्ठ) संघटन झालेलें आहे हेंच या सर्व गोष्टी दर्शवितात. वनस्पतिविषयक व इतर प्रयोगांवरून एकंदर वस्तुस्थिति पाहिली, तर ती अशी दिसते कीं, विश्वांत जी गतिमान् क्रियाशील शक्ति सारखी वावरत आहे, ती शक्ति नानाविध सूक्ष्म व स्थूल भौतिक पदार्थांचीं रूपें घेते; प्रत्येक भौतिक पदार्थांत, वनस्पतींत, प्राण्यांत, धातूंत ही सारखी गतिमान् असलेली विश्वशक्ति सांठविली जाते व ही सांठविलेली शक्ति सारखी क्रियाशील राहते; विश्वांत मोकळेपणें वावरणारी शक्ति आणि प्रत्येक पदार्थात भरलेली तीच शक्ति यांच्या विशिष्ट अन्योन्य-संपर्कानें, अन्योन्य विनिमयानें, 'जीवन' म्हटली जाणारी प्रक्रिया तयार होते. क्रियाशील जीवनशक्तीचें कार्य म्हणजे, मोकळ्या व पदार्थगत विश्वशक्तीच्या प्रकारांचा अन्योन्यसंपर्क व अन्योन्यव्यवहार किंवा जीवनप्रक्रिया. भौतिक, प्राणिक किंवा जीवनिक आणि मानसिक क्रियाशील शक्ति अशीं विश्वशक्तीचीं भिन्न भिन्न क्रियाशील रूपें आहेत. अ-क्रिय किंवा स-क्रिय एकच एक विश्वशक्ति, विश्वांतील सर्व घडामोडींचें मूळ आहे.
एखादें रूप मरणाधीन झाल्याचें दिसलें, तरी ही सर्वव्यापक विश्वशक्ति अ-क्रिय रूपानें त्या रूपांत उपस्थित असते; तिचीं व्यक्त जीवनकार्यें स्थगित झालेलीं असतील, कायमचीं बंद होणार असतील, तरीपण ही शक्ति तेथें अ-क्रिय स्वरूपांत असतेंच. मरणाधीन झालेलें जीवरूप कांहीं मर्यादेच्या आंत पुन्हां जीवनांत आणतां येतें; जीवनाचीं संवयीचीं कार्यें, प्रेरणेला प्रतिक्रिया देणें, देहांत क्रियाशील शक्तीचा प्रवाह सारखा चालत राहणें -- हीं व इतर स्थगित झालेलीं कार्यें उत्तेजकाच्या माऱ्यानें कांहीं मर्यादेपर्यंत पुन्हां सुरू करतां येतात; याचा अर्थ दर्शनीं मरणानंतरहि शरीरांत जीवनशक्ति उपस्थित होती; फक्त या शक्तीच्या नेहमींच्या
पान क्र. ३३८
क्रिया बंद झाल्या होत्या इतकेंच. 'जीवन म्हणून जी स्वतंत्र वस्तु आहे, ती मरणानें शरीराच्या सर्वस्वीं बाहेर जाते आणि शरीरावर कोणीं उत्तेजकाचा मारा केला असतां, तो मारा या वस्तूला समजतो (समजतो कसा? हा प्रश्न आहे) आणि मग ही 'जीवन' नांवाची शरीराबाहेर गेलेली वस्तु शरीरांत परत येते,' अशी कोणी कल्पना करतात; पण ही कल्पना बुद्धीला न पटणारी आहे. मूर्च्छारोगांत जीवनशक्तीच्या बाह्य खुणा, बाह्य शारीरक्रिया बंद होतात; पण मन जागृत आणि स्वत्वपूर्ण असतें, फक्त त्याला शारीर हालचाली (बाह्य आघातानुरूप) शरीराकडून करवितां येत नाहींत. अशा स्थितींत मनुष्य असतां, तो शरीरदृष्ट्या मरण पावला आहे आणि मनानें जिवंत आहे, अर्थात् जीवन शरीर सोडून गेलें आहे आणि मन अद्यापि शरीरांत आहे असें म्हणणें सयुक्तिक नाहीं, वस्तुस्थितीस धरून नाहीं; मन क्रियाशील आहे, परंतु त्याला शारीर क्रिया घडवितां येत नाहींत, त्या तात्पुरत्या स्थगित झाल्या आहेत, असें म्हणणेंच वस्तुस्थितीस धरून होईल.
समाधीच्या कांहीं प्रकारांतहि शारीर क्रिया आणि मनाच्या बाह्य क्रिया स्थगित होतात व या क्रिया कांहीं बाबतींत बाहेरच्या प्रेरणेनें आणि सामान्यत: बाहेरची प्रेरणा नसतां, आंतूनच स्वयंप्रेरणेनें पुन्हां चालूं होतात असा अनुभव आहे. अशा बाबतींत असें घडतें कीं, वरवर व्यक्त कार्य करणारी मानसिक शक्ति अन्तर्मनांत ओढून घेतली जाते, त्याचप्रमाणें व्यक्त कार्य करणारी जीवनशक्ति क्रियाहीन जीवनशक्तींत ओढून घेतली जाते; आणि हा समाधिस्थ मनुष्य नेणिवेच्या अस्तित्वक्षेत्रांत पडून राहतो किंवा तो केवळ बाह्य जीवनाला नेणिवेच्या क्षेत्रांत ठेवून, आपलें आंतर-जीवन अतिमानसाच्या क्षेत्रांत वर नेतो व तेथील व्यवहारांत पडतो. तें कसेंहि असो. सध्यां लक्षांत घ्यावयाचा मुद्दा हा कीं, शरीरांत गतिमान् जीवनशक्ति राखण्याचें कार्य जी महान् शक्ति करते, ती कोणतीहि असो, ती समाधिस्थ मनुष्यांत आपलीं बाह्य कार्यें स्थगित करते, पण शरीररूपी संघटित द्रव्यरचनेंत उपस्थित असते--कांहीं अंशीं अक्रिय स्थितींत उपस्थित असते आणि बाह्य प्रेरणेनें किंवा स्वयंप्रेरणेनें ती पुन्हां काम करूं लागते. परंतु स्थगित क्रिया शरीराच्या सामान्य स्थितींत पुन्हां सुरूं करतां आल्या, तरी जर शरीर निकामी करण्यासारखी जखम वगैरे शरीराला झाली किंवा शारीरद्रव्याची अखेरची मोडतोड सुरू झाली, तर स्थगित क्रिया पुन्हां सुरू करतां येत नाहींत. मोडतोडीच्या प्रक्रियेनें असें होतें कीं,
पान क्र. ३३९
जीवनप्रक्रिया निर्माण करणारी व कायम ठेवणारी जी अंतर्गत महान् शक्ति, परिसरांतून येणाऱ्या शक्तीच्या आघाताला प्रत्युत्तर देऊन, आंतल्या आणि बाहेरच्या शक्तींचें अन्योन्य संमीलन करून जीवनप्रक्रिया निर्माण करीत होती व कायम ठेवीत होती ती आतां उत्तर देण्याच्या स्थितींत राहत नाहीं, बाह्य प्रेरणा ती अगदीं जडवत् अंगावर घेते. या घटनेचें कारण असें असतें कीं, शरीरद्रव्याचें संघटन मोडून, द्रव्य मोकळें करण्यांत शरीरांतील ही जीवनशक्ति खर्च होत असते. व्यक्त जीवनप्रक्रिया यामुळें बंद होते. शरीरद्रव्य मोकळें करण्याचा हेतु असा असतो कीं, त्या द्रव्यानें आपल्या मूळ अणु-परमाणु-स्वरूपांत शरीरांतून निघून जाऊन, दुसरीं शरीरें बनविण्यांत भाग घ्यावा. विश्वशक्तीच्या पोटीं असलेली विश्वात्म्याची जी इच्छाशक्ति शरीर-द्रव्य एकत्र करून, शरीर बनवून, तें रक्षण करीत होती, ती आतां शरीर संघटनाचें काम रद्द करून, शरीरद्रव्याचें विघटन करावयास लागते; यामुळें शरीराचें मरण अटळपणें ओढवतें. विश्वात्म्याच्या इच्छेनें शरीरद्रव्याचें अंतिम विघटन निश्चित होईपर्यंत शरीराला मरण येऊं शकत नाहीं.
तेव्हां, एका विश्वव्यापक शक्तीच्या क्रियाशील व्यवहाराला जीवन म्हणतात; या शक्तीच्या पोटीं मानसिक जाणीव आणि नाडीमय जीवनशक्ति कोणत्या तरी स्वरूपांत किंवा निदान मूलतत्त्वाच्या रूपानें नेहमीं उपस्थित असतात आणि म्हणून स्वभावत: नित्योपस्थित असलेल्या त्या गोष्टी आमच्या विश्वांत, जडद्रव्याच्या बनलेल्या रूपांत विकासक्रमानें व्यक्त व संघटित होतात. विश्वशक्तीनें निर्माण केलेल्या नानाविध रूपांच्यामध्यें एकमेकांकडून एकमेकांना उत्तेजक प्रेरणा देण्याचें व या प्रेरणांना उत्तर म्हणून योग्य प्रतिक्रिया त्यांजकडून घडविण्याचें कार्य हें विश्वशक्तीच्या जीवनलीलेचें स्वरूप असतें. आपण निर्मिलेल्या सर्व रूपांत, ही विश्वशक्ति आपलें कंपनात्मक आंदोलन सारखें अविरत चालूं ठेवीत असते; सर्वत्र वावरणाऱ्या विश्वशक्तींतील क्रियात्मकशक्ति आणि प्राणशक्ति प्रत्येक रूपाकडून सारखी स्वतःचे ठिकाणीं घेतली जात असते आणि स्वतःतून बाहेर फेंकली जात असते; दिल्या व घेतल्या जाणाऱ्या क्रियाशक्तीवर सर्व रूपांचें पोषण होत असतें; शक्तीचें सांठवण असलेलीं रूपें भक्षून किंवा मोकळ्या शक्तीला स्वतःचे ठिकाणीं प्रत्यक्षतः पचवून, विश्वांतील रूपें आपला निर्वाह करतात व पुष्ट होतात. ज्यांत जीवनशक्तीचें संघटन आमच्यांतील नाडीमय संघटनासारखें असतें, किंवा
पान क्र. ३४०
निदान जीवनाच्या बाह्य संकीर्ण क्रिया आम्हांला स्पष्ट दिसतील असें जीवनसंघटन जेथें असतें, तेथें आम्हांला जीवनक्रिया सहज व लवकर ओळखतां येते. वनस्पतींत जीवन आहे असें आम्ही मान्य करतो, तें याचसाठीं कीं, वनस्पतीच्या जीवनक्रिया आम्हांला स्पष्ट दिसतात. धातु, पृथ्वी, रासायनिक अणु यांत जीवन आहे असें आम्ही मोठ्या प्रयासानें मान्य करतों किंवा मान्य करीत नाहीं तें याचसाठीं कीं, त्यांतील व्यक्त जीवनक्रिया सूक्ष्म असल्यानें आम्हांला फार कष्टानें जाणतां येतात, कांहीं क्रिया तर कांहीं केलें तरी अवगतच होत नाहींत.
व्यक्त जीवन-प्रक्रियांमधील हें अंतर, मौलिक अंतर मानण्याचें कांहीं तर्कशुद्ध कारण आहे काय? आमच्यामधील जीवन आणि वनस्पतिजीवन यांमधील अंतर तपासूं : आम्ही स्थलान्तर करूं शकतों, वनस्पतीमध्यें ही शक्ति नाहीं; पण स्थलांतर करण्याची शक्ति ही कांहीं जीवनशक्तीची सारभूत क्रिया नाही; आम्हांला जाणीवयुक्त संवेदना आहे, वनस्पतींत ती दिसत नाहीं; पण आमच्या नाडीसंघाचेद्वारां ज्या प्रतिक्रिया होतात, त्या प्रतिक्रियांबरोबर नेहमींच जाणीवयुक्त मानसिक संवेदना असते असें नाहीं. सर्व नाडीगत प्रतिक्रियांबरोबर जाणीवयुक्त संवेदनांची मानसिक प्रतिक्रिया असते असेंहि नाहीं. आतां एवढें खरें कीं, आमच्या नाडीगत प्रतिक्रिया बहुधा मानसिक संवेदनायुक्त असतात; शरीर, नाडी-संघ आणि मन या तिघांनाहि त्यांचें महत्त्व असतें. वनस्पतींमध्यें नाडीगत संवेदनांचीं चिन्हें दिसतात; आम्हांला सुखदुःख, जागृति-सुषुप्ति, आनंद, सुस्ती व थकवा होण्यास वा वाटण्यास ज्या नाडीगत संवेदना कारण होतात, अशा प्रकारच्या संवेदना वनस्पतींमध्यें दिसतात; वनस्पतींचें शरीर या नाडीगत संवेदनांनीं आंतून क्षोभयुक्त होतें; परंतु आमच्यासारख्या मानसिक जाणीवयुक्त संवेदना मात्र वनस्पतींत आढळत नाहींत; परंतु नाडीगत काय किंवा मनोगत काय संवेदना ती संवेदना--आणि जीवनशक्तिगत, नाडीसंघावलंबी संवेदना ही मानसिक जाणीवयुक्त संवेदनेप्रमाणें चैतन्याची खूण आहे, चेतनेचें (जाणिवेचें) एक रूप आहे. कोणी पानांना बोट लावूं लागलें, तर लाजाळूचें लहान झाड पानें मिटून घेतें हें आपण पाहिलें आहे; अशीं लाजाळू झाडें दुसरीहि आहेत; पानें मिटून घेण्याच्या त्यांच्या क्रियेवरून हें दिसतें कीं, त्यांना नको असलेली कांहींतरी आपत्ति आल्याचें त्यांच्या नाडीसंघाच्या द्वारां त्यांना कळतें; अशा झाडांत मानसिक जाणिवेच्या खालीं असलेल्या पातळीवरची (अधोमानसिक अवचेतन)
पान क्र. ३४१
संवेदना असते असा याचा अर्थ. आमच्यांत देखील अशा अधोमानसिक क्रिया चालतात. मनुष्यांत चालणाऱ्या अधोमानसिक क्रिया, अनुभूति आणि संवेदना नाडीसंघांत घडल्यानंतर आणि नाडीसंघावरील त्यांचा परिणाम नाहींसा झाल्यानंतर पुष्कळ काळानें त्या मनाच्या पातळीवर आणतां येतात. असा पुरावा सारखा वाढत्या प्रमाणावर मिळत आहे कीं, आमच्या जागृत जाणिवेपेक्षां पुष्कळच अधिक व्यापक अर्ध-जागृत जाणीव आमच्यामध्यें आहे; आमच्या जागृत मनापेक्षां आमचें अर्धजागृत मन, अंतर्मन फार मोठें आहे. वनस्पतींत वरचें जागृत मन नाहीं; त्यांतील अधोमानसिक संवेदना कळण्यासाठीं जें पृष्ठवर्ती मन अवश्य आहे, तें मन त्यांच्यांत नाहीं. पण म्हणून, मनुष्य आणि वनस्पति यांत ज्या संवेदनात्मक घटना तत्त्वत: एकरूप आहेत, त्यांच्या एकरूपतेंत कांहीं कमतरता मानण्याचें कारण नाहीं. घटना ज्याअर्थी एकरूप, त्याअर्थीं त्या घटना घडविणारी गोष्टहि एकच असली पाहिजे. अर्थात् वनस्पतींत मनुष्यासारखेंच अर्धजागृत मन, अंतर्मन असलें पाहिजे, असें मानावयास हरकत नसावी; आणि धातूंचा विचार करतां, अर्धजागृत इन्द्रियरूप मनाची प्राथमिक जीवनप्रक्रिया धातूंमध्यें आहे, मात्र त्यांच्यांत वनस्पतींप्रमाणें किंवा आमच्याप्रमाणें नाडीप्रतिक्रिया दाखविणारे शारीर-कंपन आढळत नाहीं, असेंहि मानतां येण्याइतका पुरावा मिळतो; शारीर क्षोभ नसला, तरी धातूचे ठिकाणीं जीवन-प्रक्रिया आढळत असल्यानें, तेथें जीवन आहे असें मानण्यास हरकत नसावी; वनस्पतींत स्थलांतर करण्याची शक्ति नाहीं, म्हणून तेथें जीवन नाहीं असें आम्ही मानीत नाहीं; तशीच गोष्ट धातूच्या बाबतींत समजावी. शारीर स्थलांतर, शारीर क्षोभ या गोष्टी जीवनाचीं चिन्हें असल्या, तरी त्याच केवळ जीवनदर्शक चिन्हें नाहींत. बाह्य उत्तेजक प्रेरणेला आंतून उत्तरादाखल प्रतिक्रिया होणें, हें जीवनचिन्ह धातु, वनस्पति व मनुष्य या सर्वांत सारखें आढळतें, म्हणून जीवन सर्वत्र आहे असें मानणें तर्कशुद्ध आहे.
शरीरांत जाणिवेनें घडणारी क्रिया नेणिवेच्या (Subconscient) प्रांतांत जाते आणि नेणिवेनें घडणारी क्रिया जाणिवेच्या प्रांतांत येते या घटनेचा अर्थ काय? दुसऱ्या कार्यभागांकडे दुर्लक्ष करून, जाणीवशक्ति, तिचा एखादा कार्यभाग करण्यांत एकाग्रतेनें जेव्हां गुंतविली जाते, तेव्हां हा दुसरा कार्यभाग नेणिवेच्या प्रांतांत उतरतो, अशी वस्तुस्थिति आहे. ज्याला आपण मन, प्रज्ञान (त्रिपुटीयुक्त ज्ञान) म्हणतो, तें ज्ञान, तें मन
पान क्र. ३४२
एकाग्रतेच्या कांहीं प्रयोगांत जाणिवेनें काम करण्याचें जवळ जवळ किंवा पूर्णपणें बंद करतें, तरी शरीराचें, नाडीसंघाचें व इंद्रियमनाचें कार्य चालूं राहतें; त्या कार्याची दखल जाणीव घेत नसली तरी तें सारखें आणि निर्दोषपणें चालू राहतें; याचा अर्थ तें नेणिवेच्या प्रांतांत उतरतें, अंतर्मनानें चालविलें जातें आणि पृष्ठवर्ती मन केवळ एकाच क्रियेच्या किंवा क्रियासंघाच्या बाबतींत जाणिवेनें क्रियाशील असतें. मी लिहीत असतांना लेखनाची शारीर क्रिया बहुधा किंवा सर्वांशीं अंतर्मन करीत असतें; न जाणतां कांहीं नाडीगत हालचाली शरीर करीत असतें; मन जागृत असतें, तें केवळ त्या विचाराच्या बाबतींत, जो त्याला व्यापून असतो, जो त्याच्यापुढें मननाकरितां ठेवलेला असतो. मनुष्य सर्वच्या सर्व अंतर्मनांत बुडी मारून बसला, तरी मनाची क्रिया दाखविणाऱ्या शरीराच्या सवयींच्या नित्याच्या हालचाली होत राहतात; याला उदाहरण म्हणून झोपेंत होणाऱ्या हालचालींचें देतां येईल. तसेंच असेंहि शक्य आहे कीं, मनुष्य मनाच्या खालीं न जातां, मनाच्या वर उन्मनाच्या, अतिमानसाच्या क्षेत्रांत चढून बसल्यावर शरीरांत जें पृष्ठांतर्वर्ती विशाल प्रच्छन्न मन आहे, तें काम करीत राहूं शकेल; --समाधींत वा योगनिद्रेच्या कांहीं प्रकारांत असें घडतेंहि. या सर्व गोष्टींचा इत्यर्थ हा आहे कीं, वनस्पतींतील संवेदना आणि आमच्यांतील संवेदना यांत फार थोडें अंतर आहे; विश्वांत काम करणारी जी जाणीवयुक्त शक्ति जडद्रव्याचे ठिकाणीं बाह्यतः झोंपेंत असते, तिची झोंप वनस्पतींतहि पुरती दूर झालेली नसते; ही जाणीवयुक्त विश्वशक्ति अतिमानसिक ज्ञानाच्या पायरीवर विश्वकार्य करण्यांत इतकी एकाग्रतेनें गुंतलेली असते कीं, जडामध्यें आणि अंशत: वनस्पतीमध्यें तिची जी कार्यकारी शक्ति काम करीत असते ती तिच्या उगमस्थानापासून म्हणजेच त्या विश्वशक्तीपासून अगदीं अलग होऊन जाते. अर्थात् ही अलग झालेली कार्यशक्ति जाणीवयुक्त असत नाहीं; तिला जाणीवयुक्त प्रेरणा मिळते, ती अंतर्मनांतून म्हणजेच बाह्यदृष्टीनें नेणिवेच्या प्रांतांतून मिळते. अंतर्मनांत जाणिवेनें काम करणारी ही कार्यशक्ति वनस्पतींत बाह्यदृष्ट्या नेणिवेंत असली, तरी मनुष्याचे ठिकाणीं ती बाह्यतः देखील जाणीवयुक्त होते. विश्वशक्तीची अतिमानसिक एकाग्रता, अंतर्मनांतील एकाग्रता कमी होऊन, ती मनुष्यांत बाह्य मनाचें रूप घेते आणि हें बाह्यमन, त्याचा आत्मा जो ज्ञानमय पुरुष, त्याचें थोडेसें ज्ञान अप्रत्यक्षपणें मिळवूं लागतें. जाणीवयुक्त विश्वशक्ति आमच्या ठिकाणीं, मानसिक
पान क्र. ३४३
जाणिवेचेद्वारां जीं कार्यें करते, तींच कार्यें अधोमानसिक जाणिवेच्याद्वारां ती वनस्पतींमध्यें करते; मानसिक जाणिवेच्या दृष्टीनें आणि कार्यपद्धतीच्या दृष्टीनें वनस्पतींमधील कार्य आणि मनुष्यांमधील कार्य यांत फरक असेल, असतोहि परंतु कार्यदृष्टीनें पाहतां दोन्हीं ठिकाणीं सारखींच आणि तींच कार्यें घडत असतात.
आम्हांमध्यें इच्छाशक्ति (संकल्पशक्ति) आणि वासनाशक्ति आहे, तिचें मूळ अणूंतील आकर्षणशक्तींत आणि उत्सारणशक्तींत आहे, अशी कल्पना करणें आतां शक्य झालें आहे. आकर्षण आणि उत्सारण (विकर्षण, अपसारण) या गोष्टी आमच्यामधील आवड आणि नावड, अनुराग आणि द्वेष यांसारख्या आहेत. अर्थात् अणूमध्यें या गोष्टी नेणिवेच्या प्रांतांतील आहेत. आमच्यांतील आकर्षण (अनुराग) व विकर्षण (द्वेष) जाणिवेनें युक्त असतें. अणुमध्यें तें अर्धनेणीव किंवा पूर्ण नेणीव यांनीं युक्त असतें हाच काय तो फरक. निसर्गामध्यें वासना (भोगाची इच्छा) व संकल्पशक्ति (कर्तृत्वाची इच्छा) सर्वत्र आहे; त्याचप्रमाणें बुद्धि आणि संवेदनाशक्ति सर्वत्र आहे; वासना, संकल्प, संवेदना व बुद्धि या सर्व शक्ती एकमेकींना धरून सर्वत्र आहेत--संवेदना आणि बुद्धि यांतूनच संकल्प आणि वासना यांचा उदय, आविष्कार होतो; आतां हें खरें कीं, संवेदना व बुद्धि निसर्गांत नेणिवेच्या किंवा अर्धनेणिवेच्या प्रांतांतून काम करतात आणि त्यांच्यापासून जन्म घेणारी संकल्पशक्ति व वासनाशक्ति याहि निसर्गांत त्याच नेणिवेच्या व अर्धनेणिवेच्या प्रांतांतून काम करतात. जडद्रव्याच्या प्रत्येक अणूंत, अर्थात् या अणूंच्या संयोगानें बनणाऱ्या प्रत्येक पदार्थांत या शक्ती असतात; अणूंत या शक्ती आल्या कोठून? अणु-परमाणूंची रचना करणारी, अणु-परमाणूंची घटकभूत असणारी जी महान् आदिम विश्वशक्ति, तिच्या ठिकाणीं या सर्व शक्ती अंतर्हित आहेत हें या प्रश्नाचें उत्तर होय. ही जी विश्वशक्ति, ती मूलत: वेदांतवर्णित चित्शक्ति (चित्तपस्) जाणीवयुक्त आदिपुरुषाची स्वभावगत जाणीवयुक्त शक्ति होय; ही शक्ति वनस्पतीचे ठिकाणीं अधोमानसिक संवेदनांनीं युक्त अशा नाडीगत शक्तीचें स्वरूप घेते; प्राथमिक प्राणिवर्गामध्यें वासनामय संवेदना व वासनामय संकल्प यांचें रूप व विकासमार्गावर पुढें गेलेल्या प्राण्यांत आत्म-जाणीवयुक्त संवेदना आणि आत्म-जाणीवयुक्त कार्यशक्ति यांचें रूप ती घेते, तर मनुष्यामध्यें, मानसिक संकल्पशक्ति आणि मानसिक ज्ञानविज्ञान यांचें सर्वश्रेष्ठ स्वरूप ती घेते. जाणीवयुक्त
पान क्र. ३४४
विश्वशक्तीची जडामधील नेणीव आणि मनुष्यांमधील व मनुष्येतर प्राण्यांमधील जाणीव या दोन टोंकांना जोडणारी शिडी किंवा मध्यस्थ-शक्ति म्हणजे जीवनशक्ति होय. जडामध्यें ही जीवनशक्ति गुप्त असते, ती आपल्या स्वतःच्या कर्तृत्वानें अधोमानसिक क्रियाशील जीवनाचें अर्धगुप्त स्वरूप घेते; शेवटी तिजमधून या अर्धगुप्त स्वरूपांतून मनाचा आविष्कार होतो आणि या आविष्कारानें तिच्यांतील क्रियाशीलता पूर्णतया कामीं येते व तिचें कर्तृत्व कृतार्थ होतें.
विकासक्रमाच्या दृष्टीनें शक्तींच्या क्रमवार आविष्काराचा विचार केला, तरी वरील सिद्धांत तर्कशुद्ध ठरतो; जड प्राणहीन द्रव्य तळाशीं, मनोयुक्त प्राणिवर्ग वर आणि मध्यें प्राणयुक्त मनोहीन वनस्पतिवर्ग-- अर्थात् प्राणशक्ति किंवा जीवनशक्ति ही जडवर्ग आणि प्राणिवर्ग यांना जोडणारी मध्यस्थ शक्ति आहे, ही गोष्ट विकाससिद्धांतानुसार देखील तर्कशुद्ध रीतीनें सिद्ध होते. वनस्पतींतील जीवन प्राणि-जीवनाहून वेगळ्या रीतीनें संघटित केलेलें असलें, तरी तें एकाच शक्तीचें स्वरूप आहे ही गोष्ट उघड आहे; वनस्पतिवर्गाला प्राणि-वर्गाप्रमाणें जन्म, वाढ, मरण आहे; बीजद्वारां संतानोत्पत्ति होते, शक्तिक्षयानें, रोगानें, तीव्र आघातानें मरण येतें; बाहेरून पोषकतत्त्वें आपल्या पिंडांत ग्रहण करून व पचवून त्यांचें पोषण होत असतें; प्रकाश व उष्णता यांजवर वनस्पती अवलंबून असतात; त्यांच्यापैकीं कोणाला संतानोत्पादन शक्ति नसते, कोणाला ती पुष्कळ असते; त्यांना निद्रा आणि जागृति, शक्तिउद्रेक आणि शक्तिमांद्य या अवस्था असतात; त्यांना बालपण, वयांत येणें, वृद्धावस्था यांतून जावें लागतें; जीवनशक्तीचीं सत्त्वें वनस्पतींत असल्यानें, प्राणिवर्ग त्यांना आपलें स्वाभाविक अन्न करतो व त्यांतून जीवनसत्त्वें आत्मसात् करून आपलें पोषण करतो; वनस्पतींत प्राथमिक स्वरूपांतली कां होईना, पण नाडीसंघटना आहे; बाह्य प्रेरणेला त्यांजकडून योग्य प्रतिक्रिया घडते; त्यांच्यांत अधोमानसिक किंवा शुद्ध प्राणनिष्ठ अशा प्राथमिक संवेदना आहेत; प्राणि-जीवन व वनस्पति-जीवन यांजमधील हीं सर्व साम्यें पाहिलीं, म्हणजे त्यांच्यांत कार्य करणारी प्राणशक्ति किंवा जीवनशक्ति एकच आहे ही गोष्ट सहज पटते. अर्थात् प्राणहीन जडवर्ग आणि मनोयुक्त प्राणिवर्ग या दोहोंच्या मध्यें वनस्पति-वर्गाच्या जीवनाचें विकासक्रमांतील स्थान आहे ही गोष्ट उघड आहे. विकाससिद्धांतानुसार प्राण किंवा जीवन ही शक्ति जडांतून उदयास आली असून, तिच्यांतून
पान क्र. ३४५
विकासक्रमानें मनाचा उदय होणें हा तिचा परिपाक आहे, ही गोष्ट आम्हीं मान्य केल्यास, जडांत ही जीवनशक्ति सुप्तगुप्त स्थितींत आहे, जडाच्या अधोमानसिक अर्धनेणिवेंत अथवा पूर्ण नेणिवेंत ही जीवनशक्ति अप्रकट अशी उपस्थित असते, असें मान्य करण्यावाचून गत्यंतर नाहीं. कारण जडांत ही जीवनशक्ति नसेल, तर ती जडाचे ठिकाणीं कोठून व्यक्त होते? जडांतून प्राणशक्ति जर वर येते, तर ती जडांत पूर्वीं लपून असली पाहिजे. विकास याचा अर्थ पडदा दूर करून प्रकट होणें; पडदा घेऊन अप्रकट होणें हीच या क्रियेची पूर्वकालीन पूरक क्रिया असली पाहिजे. ही विकासाची कल्पना दूर सारली, तर जीवन-शक्ति ही, जड निसर्गांत नसलेली, जादूनें पैदा केली गेली, वगैरे कल्पना कराव्या लागतील. शून्यांतून जीवन-शक्ति पैदा केली गेली व ती जडावर लादली, ही कल्पना केवळ निराधार म्हणून त्याज्य आहे; भौतिक क्रिया जडाचे ठिकाणीं कांहींतरी कशातरी घडून जीवनशक्ति उदयास आली, त्या क्रियांमध्यें जीवनशक्तीशीं साम्य असणारी कोणतीहि गोष्ट नव्हती, ही दुसरी कल्पना पहिलीसारखीच बिनबुडाची म्हणून त्याज्य ठरते; तिसरी कल्पना, भौतिक विश्वाच्या वर अतिभौतिक विश्व असेल व तेथून जीवनशक्ति उतरून भौतिक विश्वांत आली असेल--ही कल्पना पहिल्या दोन कल्पनांहून सरस आहे, विचारार्ह आहे; या कल्पनेप्रमाणें वस्तुस्थिति असणें शक्य आहे; गुप्तलोकविद्या असें सांगते कीं, भौतिक विश्वापेक्षां श्रेष्ठ असणाऱ्या जीवनविश्वांतून येथील भौतिकावर दडपण येऊन, त्याचा परिपाक म्हणून येथें भौतिकांत, जडांत जीवनशक्तीचा-प्राणशक्तीचा-उदय होण्यास मदत झाली. गुप्तविद्येचें हें विधान खरें धरून चाललें, तरी जडांतून जीवनाचा उदय झाला, जड हेंच जीवनाचें उगमस्थान आहे, जीवनाची प्राथमिक आवश्यक हालचाल जडांतच सुरू झाली हें विधान कांहीं त्यावरून खोटें ठरत नाहीं. जडाच्या पातळीच्या वर जीवनाची पातळी अथवा विश्व आहे, एवढ्यावरून कांहीं, जडांतून जीवन वर येऊं शकत नाहीं; आदिपुरुष आपल्या अनेक शक्तींच्यामधून खालीं उतरत उतरत नेणिवेच्या प्रांतांत शेवटीं उतरला; या उतरण्याच्या क्रियेंत त्याला मध्यें जीवनाच्या पातळीवर येऊन खालीं उतरावे लागलें; याप्रमाणें उतरून आपल्या सर्व शक्तींसह तो जडांत अप्रकट होऊन बसला; अशी सर्व वस्तुस्थिति असली, तरच पुढें विकासकार्य सुरूं होऊन जीवनशक्तीनें जडांतून वर येणें शक्य होतें आणि जीवनशक्तीनंतर मानसिक शक्ति आणि त्यानंतर
पान क्र. ३४६
आणखी श्रेष्ठ शक्ति विकासमार्गानें वर येणें क्रमप्राप्त होतें. भौतिक जडवस्तूमध्यें जीवनशक्ति गुप्त असल्याचें अगदीं प्राथमिक स्वरूपाचें चिन्ह आढळून येत असेल किंवा असलें कोणतेंहि चिन्ह आढळून येत नसेल (गुप्त जीवनशक्ति पूर्ण झोंपेंत असल्यास चिन्ह मिळावयाचें नाहीं हें उघड आहे) -- हा चिन्हांचा प्रश्न मुळींच महत्त्वाचा नाहीं -- निदान विशेष महत्त्वाचा नाहीं. जडशक्ति (जडांत काम करणारी शक्ति) ही वस्तुघटक द्रव्य एकत्र करते, त्या एकत्रित द्रव्याला कसलें तरी रूप देते, त्या रूपांतील द्रव्याचें पुढें विघटन करते, * ही गोष्ट आमच्या परिचयाची आहे. जन्म, वाढ, मरण या घटनांच्याद्वारां जीवनशक्ति व्यक्त होते; अर्थात् जडशक्ति आणि जीवनशक्ति या दोन शक्ती एकाच मूळ शक्तीचे दोन पायऱ्यावरचे दोन प्रकार आहेत, हें उघड आहे; झोंपेंत काम करणाऱ्या अधोमानसिक जाणिवेकडून बुद्धीचें काम होत असतें आणि मनुष्याच्या मानसिक शक्तीकडून बुद्धीचें काम स्वाभाविकपणें होतें; यावरून जी शक्ति अधोमानसिक जाणिवेचें रूप घेते, तीच पुढें मानसिक जाणिवेचें रूप घेते, ही गोष्ट सहज कळूं शकते. जी शक्ति प्रथम जडशक्तीचें व नंतर जीवनशक्तीचें रूप घेते तीच त्यानंतर मानसिक जाणिवेचें रूप घेते. (जीवनशक्ति आणि अधोमानसिक जाणीवशक्ति एकच होत.) जडशक्तीचें स्वाभाविक स्वरूप आपण पाहिलें; त्यावरून, तींत जीवनशक्ति आणि मानसिकशक्ति गुप्त आहे, या शक्तींच्या विशिष्ट क्रिया व संघटित अवस्था मात्र जडशक्तीच्या कार्यात दिसत नाहींत--हें आपण तर्कशुद्ध रीतीनें म्हणूं शकतों.
* जन्म, वाढ, मरण या गोष्टी बाह्यदृष्ट्या द्रव्याचें एकत्रीकरण, त्याला कसलें तरी रूप देणें व शेवटीं त्या रूपाचें विघटन करून द्रव्य पुन्हां मोकळें करणें या क्रियांप्रमाणेंच आहेत. अर्थात् जन्म, वाढ, मरण यांची आंतरिक प्रक्रिया आणि महत्त्व द्रव्याच्या एकत्रीकरणादि भौतिक क्रियांहून वेगळें आहे आणि श्रेष्ठ आहे. आत्म्याची शरीरधारणाची क्रियाहि गुप्तविद्येच्या दृष्टीनें, बाह्यतः वरीलप्रमाणेंच असते. जन्मासाठींच आत्मा केंद्रस्थानीं बसून आपल्या भावी मानसिक, प्राणिक आणि स्थूल शरीराचीं घटक-द्रव्यें एकत्र करून आपणाजवळ ओढून घेतो; जीवनांत हीं शरीरें वाढवितो आणि हीं सोडतांना संघटित केलेलें द्रव्य विघटित करून मोकळें करतो -- आपल्या आंतरिक शक्ती मात्र आपल्या केंद्रांत ओढून घेतो-- पुन्हां जन्म घेतांना वरील क्रिया त्याला पुन्हां करावी लागते.
पान क्र. ३४७
तेव्हां अणूपासून मनुष्यापर्यंत जीवनशक्ति किंवा प्राणशक्ति तत्त्वत: एकच आहे; अणूमध्यें तिचें स्वरूप अधोमानसिक सत्ता-द्रव्य आणि संचलन हें असतें व प्राण्यामध्यें मानसिक जाणीवयुक्त अस्तित्व आणि हालचाल असें तिचें स्वरूप होतें; प्राणिवर्ग आणि जडवर्ग यांच्यामधील वनस्पतिवर्गांत विकासाची मधली पायरी सांपडते. मूळ जाणीवयुक्त शक्ति विश्वव्यापी आहे व ती विश्वव्यापी क्रिया करीत असून जीवनशक्ति किंवा प्राणशक्ति म्हणजे वस्तुत: या मूळ जाणीवयुक्त शक्तीचा विश्वव्यापी व्यवहार होय; ही प्राणशक्ति जडावर व जडांत काम करीत असतां अधोमानसिक स्वरूपाची असते; रूपें किंवा शरीरें निर्माण करणें, राखणें पुष्ट करणें, पुन: निर्माण करणें हें प्राणशक्तीचें विश्वव्यापी कार्य असतें; हीं जीं शरीरें निर्माण केलीं जातात, त्यांत नाडीशक्तीच्या व्यापारानें अर्थात् उत्तेजक शक्तीच्या अन्योन्ययोगी प्रवाहांच्याद्वारां जाणीवयुक्त वेदना जागृत करण्याची धडपड करणें हेंहि प्राणशक्तीचें सर्वव्यापी कार्य असतें. या जागृतीच्या कार्याच्या तीन पायऱ्या आहेत; पहिल्या तळाच्या पायरीमध्यें द्रव्य-आंदोलन हें जडाच्या झोंपेंत होत असतें; तें पूर्णतया अधोमानसिक असतें, पूर्णपणें यांत्रिक दिसतें--परतंत्र दिसतें; दुसऱ्या किंवा मधल्या पायरींत पूर्वींचें यांत्रिक आंदोलन 'मानसिक जाणिवेच्या सीमेवर असलेलें' असें अधोमानसिक प्रतिक्रियेचें स्वरूप घेतें; तिसऱ्या सर्वोच्च पायरींत जीवनशक्ति किंवा प्राणशक्ति जाणीवयुक्त मनाचें एक विशिष्ट रूप घेते; अर्थात् मनानें अनुभवण्यासारख्या संवेदनेचें रूप घेते--इंद्रियस्वरूपाचें मन आणि बुद्धि यांच्या विकासाला ही संवेदना पायासारखी साहाय्यक होते. वर जी मधली पायरी सांगितली, ती एका बाजूला जडद्रव्य व दुसऱ्या बाजूला मन यांच्यापासून स्वरूपतः भिन्न अशा प्राणशक्तीची किंवा जीवनशक्तीची पायरी, असें आम्ही सामान्यत: मानीत असतो. परंतु ही भिन्नतेची कल्पना चुकीची आहे; एकच शक्ति तीन पायऱ्यांनीं विकसित होत जाते आणि या विकासक्रमांत जीवनशक्ति ही मध्यें असते; तळचें जडद्रव्य ती स्वतःपासून बनविते, जडद्रव्याची ती घटकभूत असते. अर्थात् ती स्वत: जडद्रव्य बनते आणि तिच्या पोटीं मन ही तिसरी श्रेष्ठ वस्तु गुप्त असते. मूळ जाणीवयुक्त शक्तीची क्रिया हेंच प्राणशक्तीचें स्वरूप असतें हें वर आलेंच आहे. वस्तु बनणें किंवा बनविणें, वस्तुद्रव्य बनणें किंवा बनविणें ही क्रिया अथवा मनाची क्रिया, वस्तु आणि वस्तूचा आकार यांना ज्ञानविषय करणारी
पान क्र. ३४८
मनाची क्रिया हेंच कांहीं केवळ, प्राणशक्तीचें किंवा मूळ जाणीवयुक्त शक्तीचें कार्य नव्हे; तर मुख्यत: मूळ ज्ञानमय पुरुषानें गतियुक्त होणें, क्रियाशील होणें हें त्या शक्तीच्या क्रियेचें खरें स्वरूप आहे; ही क्रियाशीलता व गतिमानता वस्तुद्रव्य बनण्यास कारण होते व त्या द्रव्याचा ती आधार असते; जाणीवयुक्त मानसिक विषयग्रहणाला मध्यगामी कारण व आधार हीच क्रियाशीलता व गतिमानता असते. जाणीवयुक्त पुरुषाचें वा सत्तेचें मध्यस्थ रीतीनें क्रियाशील होणें, हें जें प्राणशक्तीचें वा जीवनशक्तीचें स्वरूप, त्या स्वरूपाचें कार्य, जडशक्तींत संवेदनातुल्य क्रियाप्रतिक्रिया निर्माण करण्याचें असतें; मूळ सत्तेच्या निर्मितिशील शक्तीचा एक प्रकार हा स्वतःच्या घटकद्रव्याच्या स्वरूपांत कार्यमग्न झाल्यानें, तो अधोमानसिक किंवा पूर्ण नेणिवेच्या पद्धतीनें जडाचे ठिकाणीं कार्य करीत असतो. अस्तित्वांतील वस्तूंचें विषयरूपानें ग्रहण करणारी जाणीव अथवा मन यालाहि प्राणशक्ति मोकळें करून कामाला लावते व त्याला आपला आधार देते; या मनाला ही प्राणशक्ति गतिशील कार्यक्षम साधनसंभार पुरविते; या साधनांच्या आश्रयानें मन स्वतःच्या रूपांवर क्रिया करूं शकतें आणि त्याबरोबर जीवरूपांवर व जडरूपांवर देखील क्रिया करूं शकतें; तसेंच प्राणशक्ति मध्यस्थ होऊन मन आणि जडवस्तु यांना एकत्र आणते आणि त्या दोहोंमध्यें अन्योन्यांचा व्यवहार होण्यास मदत करते; प्राणशक्तीनें पुरविलेलें या अन्योन्य व्यवहाराचें साधन म्हणजे नाडीशक्तीच्या नित्य गतिशील प्रवाहधारा होत. या प्रवाहधारा जड वस्तुरूपांतील शक्ति-संवेदनारूपानें मनाकडे वाहून नेऊन, तिच्यायोगें मनावर त्याला बदलविणारे संस्कार करतात; आणि मनाची शक्ति, इच्छा वा संकल्प या रूपानें परत वस्तूंकडे वाहून नेऊन जड वस्तूंत बदल घडवून आणतात. नाडीशक्ति ही हें मध्यस्थाचें काम करणारी असल्यानें, प्राण-शक्ति किंवा जीवनशक्ति हें नांव आम्ही बहुधा या नाडी-शक्तीलाच देतो. परंतु प्राणशक्ति ही प्राणिवर्गाचे ठिकाणींच फक्त नाडीशक्ति हें रूप घेते; परंतु सर्वांचे तळाशीं असलेला अणु धरून, सर्व रूपांत प्राणशक्ति उपस्थित असते व या सर्व रूपांत मौलिक स्वरूप व कार्य सारखेंच असतें, ती सर्वत्र मूळ जाणीवयुक्त शक्तीची एक क्रिया असते. ही प्राणशक्ति स्वत: जीं रूपें धारण करते, त्या रूपांतील द्रव्य राखणें व त्यांत बदल करणें, रूपांचें अस्तित्व सांभाळणें व त्यांत बदल करणें हें अर्थात् तिचेंच कार्य असतें; संवेदनाशक्ति आणि मानसिक शक्ति गुप्तपणें या
पान क्र. ३४९
प्राणशक्तीबरोबर काम करीत असतात; मात्र प्रथम या दोन शक्ती, रूपांचे ठिकाणीं अप्रकट असतात, नंतर उदयोन्मुख होतात व शेवटीं पडदा दूर सारून बाहेर प्रकट होतात. प्राणशक्ति वा जीवनशक्ति सर्वव्यापी आहे; तिनें ही सर्व भौतिक सृष्टि व्यक्त स्वरूपांत आणली आहे; ती प्राणशक्ति सृष्टीच्या अंतर्यामीं सर्वत्र राहत असून या शक्तीचा एकंदर महत्त्वाचा व्यवहार व कार्यभाग वर सांगितलेल्या प्रकारचा आहे.
पान क्र. ३५०
प्रकरण विसावें
मृत्यु, वासना आणि असामर्थ्य
आरंभीं, सर्व कांहीं भुकेनें म्हणजे मृत्युनें झांकलेलें होतें; त्यानें स्वत:करितां मन बनविलें, अशाकरितां कीं, त्याला आत्म्याची प्राप्ति व्हावी.
- बृहदारण्यकोपनिषद् १, २. १
मर्त्य मनुष्यानें ही शक्ति शोधून काढली आहे; वासनांचा तांडा या शक्तीचे ठिकाणीं आहे; सर्व वस्तूंना संरक्षक आधार देण्यासाठीं ही शक्ति आहे, या वासना आहेत; ही शक्ति सर्व खाद्याची चव घेते आणि आत्म्याकरितां वसतिस्थान बांधते.
- ऋग्वेद ७-६
मागील प्रकरणांत आम्हीं प्राणशक्तीचा जो विचार केला, तो विकासमय भौतिक अस्तित्वाच्या दृष्टीनें आणि जडामध्यें प्राणतत्त्व उदयास कसें येतें, काय काम करतें या प्रश्नाच्या दृष्टीनें केला. विकासमय पार्थिव अस्तित्व, ज्या गोष्टी व घटना आम्हांला उपलब्ध करून देतें, त्या घेऊन त्यांवरून आम्हीं प्राणशक्तीसंबंधानें काय अनुमानें काढतां येतील तीं काढलीं. पण हें उघड आहे कीं, प्राणशक्ति कोठेंहि उदयास येवो, कसेंहि काम करो, कोणत्याहि परिस्थितींत तिचें काम चालूं असो, तिच्या उदयाचें व कार्याचें सामान्य तत्त्व स