दिव्य जीवन 1879 pages 1960 Edition
Marathi Translation
  Senapati Bapat

ABOUT

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics, expounding a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth.

THEME

philosophymetaphysics

दिव्य जीवन

Sri Aurobindo symbol
Sri Aurobindo

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.

Sri Aurobindo Birth Centenary Library (SABCL) The Life Divine Vols. 18,19 1070 pages 1970 Edition
English
 PDF    philosophymetaphysics
Sri Aurobindo symbol
Sri Aurobindo

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.

Marathi Translations of books by Sri Aurobindo दिव्य जीवन 1879 pages 1960 Edition
Marathi Translation
Translator:   Senapati Bapat  PDF    LINK

प्रकरण बारावें

अज्ञानाचा उगम

 

      जाणिवेच्या तपानें ब्रह्म घन होतें. या घनीभूत ब्रह्मापासून जड भौतिक तत्त्व उत्पन्न होतें, जड तत्त्वापासून प्राण, मन आणि लोक उत्पन्न होतात.

- मुण्डक उप० १.१.८

 

      त्याला इच्छा झाली ''मी अनेक व्हावें.'' त्यानें तप केलें; तप करून (तपानें) त्यानें विश्व निर्माण केलें. विश्व निर्माण करून त्यांत तो प्रविष्ट झाला; प्रविष्ट होऊन तो सत् आणि असत्, व्यक्त आणि अव्यक्त, ज्ञान आणि अज्ञान, सत्य आणि अनृत झाला. तो सत्य झाला; हें सर्व जें कांहीं अस्तित्वांत आहे तें तो झाला. ''तें सत्य'' असें त्याला म्हणतात.

- तैत्तिरीय उप० २.६

     

      जाणिवेचें तप हें ब्रह्म आहे.

- तैत्तिरीय उप० ३-३ ते ५.

     

      अज्ञानाच्या संबंधानें बऱ्याच गोष्टी आतां निश्चित झाल्या आहेत; तेव्हां या अज्ञानाचा उगम कसा झाला, व्यवहारांत हें अज्ञान कसें उदयास आलें, जाणिवेच्या कोणत्या प्रक्रियेनें त्याला जन्म दिला, हा प्रश्न बारकाईनें हाताळणें आतां शक्य आहे, व असें करणें अवश्यहि आहे. अस्तित्वाचें सत्य एकमेव पूर्ण ब्रह्म आहे, एकच एक पूर्ण तत्त्व आहे, हा आपल्या विचाराचा पाया असणार. हा पाया न सोडतां अज्ञानाच्या उदयाचीं जीं भिन्न कारणें सांगितलीं जातात, सांगितलीं जाणें शक्य आहे त्यांचा विचार करावयाचा आहे. आमच्या पायाभूत सत्याशीं, अज्ञानाच्या उगमासंबंधींच्या कोणत्या शक्य कल्पना, कितपत जुळणाऱ्या आहेत तें आपल्याला पहावयाचें आहे. मूळ परमपुरुष, एकच एक आदिपुरुष तो पूर्ण आहे, त्याची जाणीव पूर्ण आहे; अर्थात् अज्ञानाच्या गुलामींत ही पूर्ण जाणीव जाणें किंवा

पान क्र. ४७७

 

राहणें शक्य दिसत नाहीं -- असें असतां या परम पुरुषाच्या अस्तित्वाच्या पोटीं नानाविध अज्ञान, स्वतःला अतिशय मर्यादित करणारें भेद-अधिष्ठित ज्ञान उत्पन्न कसें झालें, क्रियाशील कसें झालें, आणि क्रियाशील कसें राहूं शकलें, हा प्रश्न आहे. अविभाज्य अशा या परमपुरुषाच्या अस्तित्वांत व जाणिवेंत दर्शनी भेद तरी, दर्शनी विभागणी तरी परिणामकारक रीतीनें कशी केली गेली आणि कायम राखली गेली हा प्रश्न आहे. हा परम पुरुष एकच एक आणि सर्वथा परिपूर्ण असल्यानें स्वतःविषयीचें अज्ञान त्याचे ठिकाणीं संभवतच नाहीं; सगळ्या वस्तू तोच झाला आहे, त्या अस्तित्वांतच उभीं केलेलीं, त्या अस्तित्वाचींच जाणीवयुक्त रूपरूपांतरें, जाणीवयुक्त विशिष्ट आकार म्हणजे सर्व वस्तू, ही वस्तुस्थिति असल्यानें या परमपुरुषाला या वस्तूंची, त्यांच्या खऱ्या स्वभावधर्मांची, त्यांच्या खऱ्या क्रियांची माहिती नसणें शक्यच नाहीं; पण आम्ही प्रत्येकजण ब्रह्म, परम पुरुष आहों; जीवात्मा परमात्मा आहे, पूर्ण पुरुषच आहे त्यावेगळा नाहीं -- असें आम्ही म्हणत असलों, तरी आम्हांला स्वतःसंबंधाचें आणि वस्तूंच्या संबंधाचें खरें ज्ञान नाहीं, पूर्ण ज्ञान नाहीं ही गोष्ट निःसंशय खरी आहे; तेव्हां या वस्तुस्थितींतून हा विरोध, हा अंतर्गत विरोध प्रत्ययास येतो कीं, ज्याच्या किंवा ज्याच्या प्रकृतीच्या, कणाकणांत अज्ञानाच्या उदयाची संपूर्ण अशक्यता असली पाहिजे, तोच पुरुष अज्ञानाचें स्थान बनूं शकतो; त्यानें अज्ञानांत उडी घेतली आहे, बुडी घेतली आहे. मग या घटनेचें कारण, त्याची कांहीं अस्तित्वगत इच्छा असो, अथवा त्याच्या प्रकृतींतील कांहीं निकड वा शक्यता असो. अज्ञानाचें स्थान मन आहे, मन हें मायाकार्य आहे. अर्थात् असत् आहे, ब्रह्म नव्हे; ब्रह्म हें एकच सत् आहे, त्याला असत् अशा मनाच्या अज्ञानाचा स्पर्श होत नाहीं; या प्रकारें ब्रह्माची परम पुरुषाची बाजू घेतां येईल; पण मूळ तत्त्व, एकमेव पूर्ण असें ब्रह्म आहे असें मानणारांना पळवाट म्हणून ही वकीली उपयोगी पडणारी नाहीं; कारण ब्रह्म हें एकच एक अस्तित्व असेल, तर माया ही या एकच एक अस्तित्वाची शक्ति असली पाहिजे; त्याच्या अस्तित्वांतून ही शक्ति निघते किंवा त्याच्या जाणिवेची शक्ति म्हणजे माया असेंच मान्य करणें भाग आहे : आणि ब्रह्माशीं एकरूप असलेला जीवात्मा जर त्याच्या मायेचा अंकित होत असेल, तर जीवात्म्यांतील ब्रह्म हें मायेचें अंकित आहे असें होतें. वर जी वकीली केली आहे तिच्यांत केवळ शब्दाची किंवा कल्पनेची ''माया'' किंवा हातचलाखी वापरली आहे. भ्रमशून्य ब्रह्म आणि भ्रमरूप माया या वस्तुत: दोन स्वतंत्र वस्तू

पान क्र. ४७८

 

आहेत, अगदीं विरुद्ध स्वभावाच्या दोन वस्तू आहेत; एकच एक अस्तित्व म्हणजे ब्रह्म अशी व्याख्या करून, दुसऱ्या एका तद्विरोधी स्वभावाच्या वस्तूला त्या ब्रह्माशीं एकरूप ठरविण्याचा प्रयत्न वरील मायावादांत आहे; पण बारीक नजरेला त्यांतील फोलपणा स्पष्ट दिसतो. असो. ब्रह्मानें मायेचें, भ्रमाचें, अज्ञानाचें अंकित होणें हें त्याच्या स्वभावाच्या, मूलभूत प्रकृतीच्या विरुद्ध असल्यानें, अगदीं अशक्य आहे; अशी अंकित होण्याची शक्यता असेल, तर ती निसर्गाच्या, प्रकृतीच्या पसाऱ्यांतील एखाद्या वस्तूच्या ठिकाणीं असूं शकेल; ही वस्तु निसर्गाच्या, प्रकृतीच्या कांहीं एका क्रियेच्या अंकित होऊं शकेल. ही प्राकृतिक क्रिया म्हणजे वस्तूंच्या पोटीं असणाऱ्या ब्रह्माच्या, परम पुरुषाच्या जाणीवयुक्त स्वतंत्र व्यापाराचा, क्रियाकलापाचा एक भाग असणार, हें उघडच आहे. सर्वज्ञ परम पुरुषाच्या, ब्रह्माच्या आत्माविष्काराचा जो खेळ चाललेला आहे, त्या खेळाचा एक भाग कोणतीहि प्राकृतिक क्रिया असते व प्रकृतीच्या पसाऱ्यांतील विशिष्ट वस्तूवर या क्रियेची मात होऊं शकते; ब्रह्मावर अशी मात होऊं शकत नाहीं, हा वरील कहाणीचा इत्यर्थ आहे. तेव्हां अज्ञान हें, एकमेव पूर्ण ब्रह्माच्या हालचालीचा एक भाग असला पाहिजे, त्याच्या जाणिवेच्या विकासशील व्यवहाराचा एक भाग असला पाहिजे, हा जाणिवेचा विशिष्ट व्यवहार (अज्ञान) ब्रह्मानें जाणिवपुर:सर मान्य केला असला पाहिजे; या प्रयोजनाच्या सिद्धीसाठीं ब्रह्म अज्ञानाचा उपयोग करतें, त्याजवर अज्ञान कांहीं जुलूमानें लादलें जात नाहीं अशी वस्तुस्थिति असली पाहिजे.

      आमच्या अज्ञानाचें जें स्पष्टीकरण मायावादी देतात, तें आमच्या पायाभूत सिद्धान्ताशीं (एकच एक ब्रह्म हें अस्तित्वाचें मूलभूत सत्य आहे हा सिद्धान्त आमचा पायाभूत सिद्धान्त आहे) विसंगत आहे, हें आपण पाहिलें. जीवात्मा आणि परमात्मा एक नाहींत, दोन आहेत, नित्य दोन रहातात; जीवात्मा अज्ञानाधीन आहे आणि परमात्मा अस्तित्वांत, जाणिवेंत पूर्ण आहे, आणि म्हणून ज्ञानांतहि पूर्ण आहे, असा पक्ष कोणी मांडतात. यानें अंतर्विरोधाची आपली आपत्ति दूर होते; पण हा पक्ष आम्हांला मान्य करतां येत नाहीं, कारण अनुभूति या पक्षाच्या विरुद्ध आहे. अस्तित्त्व एकच एक आहे; प्रकृतीच्या व्यवहारांत कसलेंहि अनेकत्व असो, कसलेहि भेद असोत, अस्तित्व अभिन्न, अभेदरूप एकच एक आहे, असा सर्वोच्च अनुभव आहे, सार्वत्रिक अनुभव आहे. विश्वाच्या

पान क्र. ४७९

 

बांधणींत भेदांत अभेद, अनेकतेंत एकता ही गोष्ट सर्वत्र प्रतीत होऊं शकते; सर्व सारभूत अस्तित्वाच्या दृष्टीनें आम्ही एकच वस्तु आहों, सारभूत प्रकृतीच्या दृष्टीनें एकच वस्तु आहों; आमच्या आत्म्याच्या आकारांत वेगळेपणा आहे, क्रियाशील प्रकृतींत वेगळेपणा आहे, म्हणून आम्ही एक वस्तु असूनहि भिन्न भिन्न वस्तू आहोंत; नित्य-द्वैत पक्षाला नित्य द्वैताच्या पोटीं नित्य अद्वैत असतें, अनुभवास येतें हें उत्तर ठीक आहे; पण यानें अंतर्विरोधाची आपत्ति दूर होत नाहीं : अस्तित्वाच्या सारभूत भागाच्या बाबतींत, जो जीवात्मा पूर्ण ब्रह्माशीं एकरूप आहे, आणि म्हणून जो ब्रह्माशीं आणि सर्वांशीं जाणिवेच्या बाबतींतहि एकरूप असावयास हवा, तो अज्ञानाचा अंकित कसा झाला, तो आत्म्याच्या गतिमान आकाराच्या आणि त्याच्या क्रियाशीलतेच्या बाबतींत ब्रह्मापासून विभक्त कसा झाला, हा प्रश्न वरील उत्तर देऊनहि कायम राहतोच; आणखी शिवाय या गोष्टीचीहि दखल घेणें अवश्य आहे की, ब्रह्माच्या स्थिर सारभूत एकत्वाशीं जीवात्मा एकरूप होऊं शकतो त्याप्रमाणें तो त्याच्या क्रियाशीलतेशींहि एकरूप होऊं शकतो आणि म्हणून जीवात्मा आणि परमात्मा नित्य भिन्न राहणाऱ्या वस्तू आहेत हा पक्षच असत्य आहे. असो. मायावाद आणि द्वैतवाद आमच्या अज्ञानाचें योग्य स्पष्टीकरण देऊं शकत नाहींत, हें पाहिल्यानंतर अज्ञेयवाद काय म्हणतो तें पाहूं. अस्तित्व आणि त्यांतील प्रश्न यांच्या पलीकडे, त्यांच्या वरती उंच जागीं अज्ञेय सद्‌वस्तु आहे. ती अज्ञेय वस्तु आमच्या अनुभवाच्या पलीकडे, अनुभवाच्या क्षेत्राहून फार उंच जागीं आहे; मायाकार्य अज्ञेय वस्तूंतच सुरू झालें, विश्वनिर्मितीपूर्वीं सुरू झालें आणि म्हणून तेंहि अज्ञेय आहे, त्याचें मूळ, त्याचें कारण बुद्धीला समजावून सांगणें शक्य नाहीं. जड अज्ञेयवाद असतो तसा, हा कल्पनानिष्ठ अजड अज्ञेयवाद आहे. सर्व प्रकारच्या अज्ञेयवादासंबंधानें असें म्हणतां येतें कीं, हा अज्ञेयवाद, खरोखरी जाणून घेण्याची इच्छा मनुष्याच्या ठिकाणीं जितकी तीव्र असावयास पाहिजे तितकी ती तीव्र नसल्यानें उत्पन्न होतो; जाणिवेच्या अनुभवास येणारा दर्शनी मर्यादितपणा, संकुचितपणा, अनिवार्य म्हणून, प्रयत्न न करतां, मान्य करण्याची प्रवृत्ति ही अज्ञेयवादाला जन्म देते; ज्ञान-शक्तिविषयक दुर्बलतेची भावना अज्ञेयवादाच्या मुळाशीं असते. मनाच्या प्रस्तुत मर्यादा लक्षांत घेतां, त्यानें अज्ञेयवादाच्या आहारीं जाणें हें स्वाभाविक असल्यामुळें समर्थनीय म्हणतां येईल; पण ब्रह्माशीं, परमात्म्याशीं एकरूप असणाऱ्या जीवात्म्याच्या

पान क्र. ४८०

 

संबंधात कोणताहि अज्ञेयवाद समर्थनीय होऊं शकत नाहीं. कारण त्याचे ठिकाणीं ज्ञानशक्तीची दुर्बलता असूं शकत नाहीं. परमात्म्याला स्वत:संबंधाचें ज्ञान असलेंच पाहिजे. अर्थात् त्याला अज्ञानाचेंहि मूळ ठाऊक असलें पाहिजे आणि म्हणून जीवात्म्याला ज्ञानासंबंधांत निराश होण्याचें कांहीं कारण नाहीं; पूर्ण परमात्म्याचें ज्ञान करून घेण्याची पात्रता त्याचे ठिकाणीं आहे, आणि म्हणून त्याच्या स्वतःच्या ठिकाणीं जें अज्ञान आज आहे, त्याचे मूळ कारण काय आहे त्याचेंहि ज्ञान करून घेण्याची पात्रता त्याचे ठिकाणीं आहे; ही पात्रता नाकारण्याचें जीवात्म्याला कांहीं कारण नाहीं.

      अज्ञेय असें कांहीं असेलच तर सच्चिदानंदाची उच्चतम अवस्था, उच्चतम अवस्थेंतील सच्चिदानंद, अस्तित्व-जाणीव-सुख संबंधींच्या आमच्या उच्चतम कल्पनांपलीकडे ज्याचें अस्तित्व-जाणीव-सुख आहे, असें सच्चिदानंद म्हणजे अज्ञेय तत्त्व, अशी गोष्ट असली पाहिजे. तैत्तिरीय उपनिषदांत ''आरंभीं केवल 'असत्' होतें, या असतापासून सत् निर्माण झालें'' असें जें वचन आहे त्या वचनांतील 'असत्', अशा अज्ञेय सच्चिदानंदाचें वाचक असलें पाहिजे हें उघड आहे; बुद्ध ज्याला निर्वाण म्हणतो त्या निर्वाणाचा खोलांत खोल अर्थहि असाच, म्हणजे अत्युच्च अज्ञेय सच्चिदानंदरूप अवस्था हाच असावा, आमची प्रस्तुतची अवस्था निर्वाणप्राप्तीनें नष्ट होते याचा अर्थ निर्वाणप्राप्ति म्हणजे आत्म्याची कल्पना किंवा अनुभव असणाऱ्या कोणत्याहि अवस्थेपलीकडील उच्चतम अवस्था प्राप्त होणें, अस्तित्वासंबंधींच्या आमच्या संवेदनेपासून, वेदनामय संवेदनेपासून पूर्ण मुक्तता झाल्याची अनिर्वचनीय सुखमय प्रतीति ज्या अवस्थेंत येते ती अवस्था प्राप्त होणें असाच असावा. उपनिषदांत अनिर्वचनीय, अ-बुद्धिगम्य असा जो निरुपाधिक केवल आनंद सांगितला आहे, त्या आनंदाला ''अज्ञेय'' म्हणतां येईल. कारण जाणीव आणि अस्तित्व या पदांनीं जिचें वर्णन करतां येईल, जिची कल्पना करतां येईल, त्या कोणत्याहि वस्तूच्या पलीकडे, त्या कोणत्याहि वस्तूपेक्षां श्रेष्ठ अशी, निरुपाधिक केवल आनंद ही वस्तु आहे. अज्ञेयाचा हा अर्थ आम्हांला मान्य आहे, आम्हीं मान्य केला आहे. अनंताच्या विकासक्रमांतील उर्ध्वगतीला मर्यादा नाहीं, मर्यादा घालतां येत नाहीं; ही मर्यादा घालण्याची गोष्ट आमच्या जाणीवशक्तीच्या पलीकडील आहे, असा आमचा मान्यतेचा अर्थ आहे. अज्ञेयतत्त्व हें असें कांहीं नसून (उपरिनिर्दिष्ट असत्, निर्वाण, आनंद नसून) अगदीं निरुपाधिक

पान क्र. ४८१

 

शुद्ध अस्तित्वाहून देखील वेगळें आहे असें म्हणणें असेल, तर तें शून्यवादी विचारकांचें शुद्ध शून्य असलें पाहिजे.

      शुद्ध शून्यांतून, शुद्ध अ-भावांतून, शुद्ध असत् मधून कांहींहि निघू शकत नाहीं; केवळ देखाव्यापुरतें, केवळ भ्रमात्मक देखील कांहीं निघूं शकत नाहीं. शुद्ध शून्याचा हा अर्थ घ्यावयाचा नसेल, तर अनंतकालांत कधींहि वास्तवांत न येऊं शकणारी शुद्ध अनंत शक्यता अथवा शक्ति असा शुद्ध शून्याचा अर्थ घेणें भाग आहे. या अर्थानुसार गूढरूप शून्य हें विश्वाचें आद्याद्य स्वरूप; हें ''अज्ञेय'' विश्वारंभीं असून त्यांतून, या निरपेक्ष अज्ञेय शून्यांतून, सापेक्ष शक्ती केव्हांहि वर डोकें काढतात; पण या वर डोकें काढणाऱ्या सापेक्ष शक्तींपैकीं कांहीं थोड्या मात्र साकार होऊं शकतात -- हा शुद्ध शून्याचा एकंदर नवा अर्थ लक्षांत घेऊन या शुद्ध शून्यापासून काय निर्माण होऊं शकेल याचा थोडा विस्तारानें विचार करूं. या अनंत गूढ शून्यांहून कांहींहि निघूं शकेल; काय निघू शकेल, जें निघेल तें कां निघेल हें कांहीं सांगतां येणार नाहीं, सांगता येणें शक्य नाहीं. हें शुद्ध शून्य शुद्ध गोंधळाचें बीज होय, व्यवहारदृष्ट्या तें दुसरें कांहीं नाहीं -- प्रस्तुत व्यवस्था, विश्वव्यवस्था, व्यवस्थित विश्व त्या शून्यांतून वर आलें आहे, हा एक योगायोग आहे; मग त्याला बरा म्हणा, वाईट म्हणा, भाग्याचा म्हणा, दुर्भाग्याचा म्हणा. आपण रहात आहों तें विश्व व्यवस्थित आहे असें आतांच म्हटलें, परंतु असें म्हणणें आवश्यक नाहीं; विश्व आहे तें व्यवस्थाशून्य आहे, आम्हांला जी व्यवस्था म्हणून वाटते ती आमच्या इंद्रियांची संवयीनें झालेली गैरसमजूत आहे, आमच्या प्राणमय जीवनाची संवयीनें झालेली गैरसमजूत आहे, मनाला संवयीनें व्यवस्था म्हणून वाटू लागलेली गैर व्यवस्था आहे, येथे व्यवस्था आहे ही मनाची कल्पना, आधारशून्य कल्पना आहे; येथें असलेल्या पसाऱ्यांत, पसाऱ्यापाठीमागें व्यवस्थाप्रिय बुद्धि आहे, अशा कल्पनेनें या पसाऱ्याची पाहणी करणें निराशजनक ठरेल. शुद्ध गोंधळ हें जेथें बीज आहे, तेथें त्यांतून अन्योन्यविरोधी गोष्टींचा, निर्बुद्ध घटनांचा बाजार उत्पन्न व्हावा हें साहजिक आहे; हें विश्व असा बाजार आहे, येथें गूढ अशी कोडीं, विसंवाद भरपूर आहेत; विश्व हें एक भयंकर, आदि ना अंत असें प्रमादांचें आगर आहे; वात झालेल्याला दिसतात, भासतात तशा कारण-कार्य-क्रमाला फांटा देणाऱ्या अफाट विनोदी आणि विषादजनक घटनांचें विश्व हें भांडार आहे, असें प्रतिपादन करणारा एक पक्ष

पान क्र. ४८२

 

आहे. पूर्ण जाणीव, पूर्ण ज्ञान (अर्थात् सच्चिदानंद) अशा व्यवस्थाशून्य विश्वाला जन्म देऊं शकणार नाहीं; त्याचा जन्मदाता पूर्ण नेणीव, पूर्ण अज्ञान हाच असण्याचा संभव आहे. अशा विश्वांत कांहींहि घडूं शकेल, सगळ्या वस्तू शन्यांतून निघाल्या असतील, विचार करणारें मन हा ''रोग'' असेल, अ-विचारी शक्तीचा किंवा अ-चेतन जडाचा ''रोग'' असेल; येथें जी व्यवस्था दिसते ती व्यवस्था म्हणजे वस्तुजाताच्या मुळाशीं असलेल्या सत्यानुसार चाललेला वस्तूंचा अस्तित्वक्रम, जीवनक्रम आहे, असा ज्या व्यवस्थेचा आम्ही पोवाडा गातो ती येथील व्यवस्था, वस्तुत: ज्ञानकार्य नसून, सर्वोच्च स्व-तंत्र ज्ञानयुक्त इच्छाशक्तीनें चालविलेलें स्वतःचें व्यवस्थापूर्ण विकासकार्य नसून, शाश्वत अज्ञानाच्या, आत्मविषयक शाश्वत अज्ञानाच्या यांत्रिक नियमाचें दर्शन आहे, प्रदर्शन आहे असें असूं शकेल; शाश्वत शून्यानें शाश्वत अस्तित्व हें कायमचें रूप धारण केलें असेल -- विश्वाच्या, वस्तुजाताच्या मुळांत गोंधळाचें बीज आहे, निश्चित आरंभस्थान नाहीं, विश्वचक्राच्या भ्रमन्तीला निश्चित अंतिम-स्थान नाहीं, असा पक्ष घेतल्यावर विश्वाचा पसारा कसा निर्माण झाला यासंबंधीं वाटेल ती उपपत्ति शक्य होते, सर्व उपपत्ती सारख्याच दर्जाच्या होतात, कारण सर्व सारख्याच प्रमाण किंवा अप्रमाण असूं शकतात. वर जेवढी विश्वोत्पत्तिविषयक मतें विचारांत घेतलीं, तीं कांहीं काल्पनिक नाहींत; कोणीं ना कोणीं तीं मतें प्रतिपादिलीं आहेत. मानवी मनानें कल्पिलेल्या या सर्व मतांनीं मानवाला कांहीं ना कांहीं लाभ झालेला आहे : मतें चुकीचीं वाटलीं किंवा ठरलीं, तरी एक गोष्ट निश्चित आहे कीं, मनाला त्याच्या सर्व चुका उपयुक्त असतात; अशीच ईश्वरी योजना आहे कीं, सत्याकडे नेणारीं द्वारें मनाला त्याच्याकडून घडणाऱ्या चुकांनीं उघडावीं : चुका, चुकीचीं मतें दुसऱ्या कांहीं विरोधी पण चुकीच्याच मतांचा निकाल लावतात : चुकीचीं मतें हें जरुरीचें विध्वंसक कार्य करतात, पण येथेंच त्यांचें कार्य संपत नाहीं; त्याचें विधायक कार्यहि असतें; नवी जी रचनात्मक उपपत्ति तयार केली जाते, तिची घडण करतांना चुकीच्या वाटणाऱ्या किंवा ठरणाऱ्या मतांपासून कांहीं उपयुक्त कल्पना घेतां येते, घेतां येतात. असो. अज्ञेय तत्त्व विश्वाच्या मुळाशीं आहे, या मताचा विचार आतांपर्यंत केला. अज्ञेय तत्त्व म्हणजे अनंत शक्यतांचें रहस्यमय, सर्वतोपरि वास्तवांत केव्हांहि न येणारें भांडार, या मताचाहि शेवटीं विचार केला. अशा या अर्थानें "अज्ञेय'' हें विश्वाचें मूळ समजावयाचें असेल, तर

पान क्र. ४८३

 

तत्त्वज्ञानाचा उद्देश मुळींच साधणार नाहीं, ही गोष्ट लक्षांत घेणें अवश्य आहे. तत्त्वज्ञान ज्ञानाच्या पाठीमागें लागलेलें असतें. ''अनंत शक्यतांचा गोंधळ विश्वाच्या मुळाशीं आहे'' असलें गोंधळाचें दर्शन तत्त्वज्ञानाला निरुपयोगी आहे; विश्वाचें मूळ वर सांगितल्याप्रकारचें 'अज्ञेय' आहें, हें सांगण्यासाठीं तत्त्वज्ञानाचा खटाटोप केला जात नाहीं, केला जाऊं नये. विश्वाचें मूळ ''ज्ञेय'' आहे आणि तें असें ज्ञेय आहे कीं, त्याच्या ज्ञानानें सर्व ज्ञात होतें, असें उपनिषदांत सांगितलें आहे, आणि तत्त्वज्ञानाचा उद्देश सिद्ध व्हावयास अंतिम ज्ञेय हें अशाच प्रकारचें असणें अवश्य आहे. या अंतिम ज्ञेयाला ''अज्ञेय'' हें नांव अशा अर्थानें देतां येईल कीं, तें मनाला ज्ञेय नाहीं. मनाला ज्याचें ज्ञान शक्य आहे, त्या अस्तित्वाहून श्रेष्ठ असें हें ''अज्ञेय'' अस्तित्व आहे; सर्वथा अज्ञेय असें मात्र हें अस्तित्व नाहीं. मनाला अज्ञेय अशा या अस्तित्वाचे ठिकाणीं सत्तेचें घनत्व मनोमय मानवाला प्राप्य अशा सर्वोच्च अस्तित्वापेक्षां अधिक आहे : या सत्ताघन अस्तित्वाला स्वतःसंबंधीचें ज्ञान जितकें आणि जसें आहे, तसें व तितकें त्या सत्ताघनाचें ज्ञान आम्हांला झालें, तर तें ज्ञान आम्हांला मनाच्या शक्तीनें मिळणाऱ्या सर्वोच्च ज्ञानाला धक्का लावील किंवा नाहींसें करील, अशी गोष्ट नाहीं; तर आमच्या ज्ञानाला कांहीं अंशांनीं तें पुढें नेईल. आम्हीं आत्मदृष्टीनें आत्म-अनुभवानें मिळविलेल्या ज्ञानाला तें अधिक पूर्णता आणील. तें ज्ञान आमच्या ज्ञानांत विशालतर उच्चतर सत्याची भर टाकील. सर्व सत्यें ज्या सत्यांत, अस्तित्वांत अंतर्भूत आहेत, ज्या सत्याचा सर्व सत्यांना आधार आहे, ज्या सत्याच्या आश्रयानें सर्व सत्यांचा अन्योन्यसुसंबंध सिद्ध होतो, तें पूर्ण सत्य होय. हें पूर्ण, सर्वसमावेशक, सर्वाधार, सर्वनिरपेक्ष सत्य, आमचें (मनोमय पुरुषाचें) ज्ञान वाढवीत वाढवीत आम्हीं जाणून घ्यायचें आहे; हें सत्य शोधून काढून, आमचा निरीक्षणाचा आणि विचाराचा आरंभ-बिंदु आणि शाश्वत पाया म्हणून हें पूर्ण सत्य नजरेपुढें ठेवून, आमच्यापुढील प्रश्नाचें उत्तर आम्हांला शोधावयाचें आहे; विश्वांतील विरोधमय दृश्यांची सुसंवादिता पटवून देणारी गुरुकिल्ली या पूर्ण सत्यांतच आम्हांला मिळणें शक्य आहे; आमच्या अज्ञानाचा उगम कोठें आहे, वगैरे प्रश्नांचीं उत्तरें या पूर्ण सत्याच्या आश्रयानेंच आम्हांला मिळूं शकतील.

      हें पूर्ण सत्य त्याच्या प्रकट प्रकृतीकडे लक्ष देतां ''सच्चिदानंद'' आहे; पूर्ण अस्तित्व, पूर्ण जाणीव, पूर्ण आनंद या तीन तत्त्वांनीं बनलेलें त्रिमुखी

पान क्र. ४८४

 

एकतत्त्व आहे. अज्ञानाच्या प्रश्नाचा विचार करतांना या प्राथमिक सत्यापासून आपण आरंभ करावयास हवा : अशा रीतीनें आपण अज्ञानाचा प्रश्न हाताळू लागलों, म्हणजे सच्चिदानंदाच्या जाणिवेच्या क्रियेंतून अज्ञान ही घटना घडली असली पाहिजे हें उघड होतें : सच्चिदानंदाची जाणीव क्रियाशील होऊन ज्ञानरूपानें प्रकट होते, आणि या ज्ञानाला ती जाणीव अशा मर्यादा घालते कीं त्या मर्यादांमुळें त्या ज्ञानाचें अज्ञान व्हावें. जाणीवशक्ति क्रियाशील झाल्यानें अज्ञान ही घटना घडते. अज्ञान ही कांहीं मूलभूत गोष्ट नाहीं, तर एक निर्मिति, निर्मित वस्तु आहे, जाणीवशक्तीच्या क्रियेचा परिणाम आहे; तेव्हां जाणिवेची ती एक शक्ति आहे, या दृष्टीनें विचार करणें उपयुक्त होईल. पूर्ण जाणीव ही स्वभावत: पूर्ण शक्ति असणार; जाणिवेचा स्वभावच शक्ति आहे; ही शक्ति ज्ञानासाठीं किंवा कृतीसाठीं केंद्रित करून कार्यप्रवण, कार्यान्वित केली जाते, तिला उत्पादक शक्तीचें, निर्माणशक्तीचें रूप दिलें जातें, मूळ जाणीवयुक्त परम पुरुष आपली जाणीवशक्ति क्रियाशील करतो, ही शक्ति स्वतःचे ठिकाणीं ध्यानमग्न होते आणि या ध्यानाच्या तपानें तिच्या पोटीं असलेल्या सर्व गोष्टी, सर्व सत्यें आणि शक्यता, त्यांचें बीज, त्यांची वृद्धि प्रकट करते, बाहेर काढते. या प्रकारें विश्वाची निर्मिति मूळ

-------------------------

      १ तप : तप म्हणजे (शब्दार्थानें) ताप, उष्णता. जाणीवशक्ति स्वतांवर किंवा वस्तूवर एकाग्रतेनें क्रिया करीत असतां तिच्या कोणत्याही प्रकारच्या शक्तियुक्त क्रियेला ''तप'' म्हणतात. विश्व हें तपाच्या साधनानें अंड्याच्या आकाराचें बनविलें गेलें; नंतर तें तपानें फोडलें गेलें व त्यांतून, अंड्यांतून, पक्षी निघावा तसा प्रकृतीत वावरणारा आत्मा, पुरुष निघाला असें प्राचीन वर्णन आहे. तपस्या म्हणजे ''पेनन्स'', (प्रायश्चित्त) असें इंग्रजींत भाषांतर केले जातें तें बरोबर नाहीं : भारतांतील संन्याशांच्या तपस्येंत प्रायश्चित्ताची कल्पना बहुधा नसे, शरीराला यातना देणें हा हेतूहि त्यांच्या कठोरांत कठोर तपस्येंत नसे. त्यांचा तपस्येंतील हेतू, जाणिवेवरची शरीराची पकड निर्बळ करण्याचा असे. जाणिवेचें क्षेत्र, जाणिवेची शक्ति वाढविण्याचा असे; इच्छाशक्तीचें सामर्थ्य व क्षेत्र वाढविण्याचा असे : आध्यात्मिक किंवा दुसरा एखादा हेतु सिद्ध करण्यासाठी ते इच्छाशक्ति व जाणीव यांची शक्ति व क्षेत्र वाढविण्याची खटपट तपस्येनें करीत असत.

पान क्र. ४८५

 

सच्चिदानंदानें केलेली आहे. आम्ही आमच्या जाणिवेची तपासणी करून पाहिली, तर आम्हांला असें दिसून येईल कीं, या जाणिवेच्या शक्तीनें त्या शक्तीच्या विषयावर आपलें लक्ष केंद्रित केलें कीं महान् विधायक क्रियाशक्तीचें रूप तिला येतें; या विधायक शक्तीच्या बळावर आमची जाणीव तिला प्राप्त होणारें सर्व ज्ञान मिळविते, तिजकडून होणारी सर्व कृति करते, सर्व निर्मिति करते. आमच्या दृष्टीनें आमच्या क्रियाशील जाणिवेला दोन विषय आपलें कर्तृत्व प्रकट करण्यासाठीं असतात : १) आम्ही स्वत: किंवा आंतर विश्व, आणि २) इतर जीव व जड वस्तु, अर्थात् आमच्या भोंवतालचें विश्व, बाह्य विश्व. आंतर विश्व, बाह्य विश्व हा भेद सच्चिदानंदाचे ठिकाणीं नसतो. अर्थात् या भेदाचे क्रियादृष्टीनें व फलदृष्टीनें होणारे परिणाम सच्चिदानंदाचे ठिकाणीं अस्तित्वांत येत नाहींत; सच्चिदानंदाला, सर्व-कांहीं त्याचे पोटांत असतें, सर्व-कांहीं तोच असतो, तोच होत असतो; आम्ही आमच्या मनाच्या मर्यादांमुळें जो भेद, जी विभागणी करतो, ती सच्चिदानंद करत नाहीं. दुसरी गोष्ट; आमच्या बाबतीत, आमचें इच्छापूर्वक होणारें जें कार्य, मानसिक किंवा इतर क्रियेंत मग्न झालेली आमची जी इच्छाशक्ति, त्या इच्छाशक्तीशीं, त्या कार्याशीं आमच्या अस्तित्वाची थोडीशी शक्ति तादात्म्य पावते, आमच्या अस्तित्वाची बाकीची शक्ति (आमच्या पृष्ठगत मनाच्या ज्ञानानुसार) अनिच्छेनें कार्य करीत असते; किंवा ती अवचेतन असते, किंवा अतिचेतन असते; या विभागणीमुळें व्यवहारतः महत्त्वाचे असे पुष्कळच परिणाम घडतात : सच्चिदानंदाच्या बाबतींत ही विभागणी नसते, तिचें परिणामहि नसतात; कारण तेथें सर्व त्याचा अविभाज्य एकमेवाद्वितीय आत्माच असतो, तेथें सर्व क्रिया आणि क्रियेचे परिणाम त्याच्या एकमेव अविभाज्य इच्छाशक्तीचें, त्याची एकमेव अविभाज्य जाणीवशक्ति क्रियाशील झाल्यानें घडलेलें नाना प्रकारचें आंदोलन असतें. आमच्या जाणिवेच्या विशिष्ट गुणधर्माच्या क्रियेला ''तप'' म्हणतात, त्याप्रमाणें सच्चिदानंदाच्या जाणिवेच्या विशिष्ट गुणधर्माच्या क्रियेलाहि ''तप'' म्हणतात. सच्चिदानंदाचें तप हें पूर्ण तप, त्याच्या अविभाज्य अस्तित्वांत चाललेलें, त्याच्या पूर्ण जाणिवेचें पूर्ण तप असतें.

      येथें असा एक प्रश्न उत्पन्न होतो कीं, अस्तित्वांत आणि निसर्गांत क्रिया, गतिशीलता आहे तशी अ-क्रियता, निष्क्रियता, निश्चलता स्थितिशीलतापण आहे; तेव्हां ही जी जाणिवेची शक्ति तिचें आणि तिच्या

पान क्र. ४८६

 

केन्द्रीकरणाचें, या स्थितिशील अवस्थेच्या संबंधांत काय कार्य असतें, कोणतें स्थान असतें ? आमच्या बाबतींत आम्हांला अशी संवय आहे कीं, तप किंवा जाणीवयुक्त शक्ति म्हणजे क्रियाशील सक्रिय जाणीव, कार्यमग्न शक्ति, आंतर किंवा बाह्य क्रिया आणि गतिमानता यांत मग्न असलेली शक्ति, असा तपाचा (जाणीवयुक्त शक्तीचा) अर्थ घ्यावयाचा. आमच्यांत जें स्थितिशील आहे तें क्रिया उत्पन्न करीत नाहीं, किंवा अनिच्छेनें यंत्रवत् क्रिया उत्पन्न करतें, या आमच्या स्थितिशील अंगांचा आमच्या इच्छेशीं किंवा जाणीवयुक्त शक्तीशीं आम्ही संबंध जोडीत नाहीं; तथापि त्या स्थितिशील अंगाचे ठिकाणीं क्रियेची, यंत्रवत् क्रियेची शक्यता असल्यानें त्या ठिकाणीं स्थितिशील प्रतिक्रिया करणारी, किंवा यंत्रवत् हालचाल करणारी जाणीवयुक्त शक्ति आहे असें मानावें लागतें; किंवा दुसऱ्या शब्दांत, अक्रिय, क्रियाविमुख तप किंवा गुप्तपणें सक्रिय, क्रियासंमुख असणारें तप, त्या स्थितिशील अंगाचे ठिकाणीं आहे असें मानावें लागतें. आमच्या स्थितिशील अंगाकडून जी अनिच्छायुक्त क्रिया घडते, तिच्या पाठीमागें आमच्या अस्तित्वांतील आम्हांला अज्ञात  होते किंवा विश्वशक्तीच्या संपर्कांना, सूचनांना, प्रेरणांना उत्तर म्हणून प्रतिक्रिया करते, अशी कोणतीतरी शक्ति, अनिच्छायुक्त क्रिया करणाऱ्या आमच्या स्थितिशील अंगाच्या पाठीमागें असण्याचा संभव आहे. निसर्गांतहि ज्या स्थिर, जड, अप्रतिकारक वस्तू असतात, त्यांच्या शक्तीला टिकवून धरण्याचें काम नित्य, अखंड, गुप्त गतीच करीत असते; म्हणजे क्रियाशील शक्ति ही दर्शनी स्थिरता टिकवून धरण्याचें काम करते. शक्तीच्या अस्तित्वामुळें, तिच्या केन्द्रीकृत सामर्थ्याच्या क्रियेमुळें, तिच्या तपामुळें निसर्गांतील व अस्तित्वांतील स्थितिशील वस्तूंचें शक्तियुक्त स्वरूप टिकूं शकते, हें आतांपर्यंत आपण पाहिलें. आमच्या जाणिवेची सापेक्ष स्थिरता आणि गतिमानता, सापेक्ष सक्रियता आणि अक्रियता आमच्या अनुभवास येते, त्याप्रमाणें पूर्ण निश्चलताहि आमच्या अनुभवास येऊं शकते; जाणिवेच्या या पूर्ण निश्चल स्थितींत मानसिक, शारीरिक सर्व हालचाल बंद झालेली आमच्या अनुभवास येते. तेव्हां जाणीव ही चंचल किंवा क्रियाशील आणि निश्चल किंवा क्रियाशून्य, अशा दोन प्रकारची आहे असें दिसतें : क्रियाशील जाणीव आपल्या शक्तिकार्यानें ज्ञान आणि कृति स्वतांमधुन

पान क्र. ४८७

 

मधून निर्माण करते (या जाणिवेला तप-विशिष्ट जाणीव म्हणतां येईल). दुसरी क्रियाशून्य जाणीव मात्र असें शक्तिकार्य करून दाखवीत नाहीं; ती स्थितिशील अवस्थेंत असते (या जाणिवेला तपविहीन जाणीव म्हणतां येईल). येथें तप म्हणजे क्रियाशील, क्रियामग्न शक्ति असा अर्थ घ्यावयाचा आहे. स्थितिशील अवस्थेंतील आमच्या जाणिवेची दर्शनी तपविहीनता खरोखरीच तपविहीनता असतें कां ? सच्चिदानंदाचे ठिकाणीं स्थितिशील जाणीव, गतिशील जाणीव असा परिणामकारक भेद आहे कां ? कोणी म्हणतात असा भेद आहे : ब्रह्म नितान्त शांत अवस्थेंत असतें, ब्रह्म निर्मितिशील अवस्थेंत असतें; तें निर्गुण असतें, तें सगुणहि असतें. भारतीय तत्त्वज्ञानांत हें निर्गुण-सगुण द्वन्द्व, या द्वंद्वांत असलेला भेद एक फार महत्त्वाचा आणि फार परिणामकारक असा भेद आहे. आध्यात्मिक अनुभवांत या भेदाचा अनुभव हा एक महत्त्वाचा अनुभव गणला जातो.

       आम्हीं आमच्या ठिकाणीं जाणिवेची शान्त, गतिशून्य अवस्था निर्माण केली, तर आम्हांला असा अनुभव येतो कीं, आमचें जें ज्ञान अल्प आणि तुकड्या तुकड्यांचे, वेगळ्या वेगळ्या विशिष्ट गोष्टीचें असतें, तें रूपांतर पावून महान् होतें, त्यांत एकसूत्रता येते, एकता येते; दुसरा अनुभव असा येतो कीं, आमच्या (मानसिक) क्षेत्राच्या पलीकडे असलेल्या क्षेत्रांतील शक्तींना आमच्या अंतरांत प्रवेश करण्यासाठीं आवाहन केलें, आम्ही सर्वभावानें उच्चतर शक्तींना संमुख झालों, तर आम्हांला असें स्पष्ट ज्ञान होतें कीं, एक श्रेष्ठ शक्ति, जी आमची (आमच्या अहम्-प्रधान व्यक्तित्वाची) नव्हे, अशी श्रेष्ठ शक्ति आमच्यावर क्रिया करीत आहे; ही शक्ति विश्वशक्ति आहे, किंवा विश्वातीत शक्ति आहे; आणि ही शक्ति आमच्या द्वारां ज्ञानाचा, शक्तीचा, कृतीचा, फलाचा व्याप, पसारा मोठा व्हावा म्हणून काम करीत आहे; हा व्याप, हा पसारा आमचा नसून ईश्वराचा आहे, सच्चिदानंदाचा आहे, आम्ही केवळ या पसाऱ्याचें क्षेत्र म्हणून, पात्र म्हणून वापरले जात आहों, असेंहि स्पष्ट ज्ञान आम्हांला होतें. आमची वैयक्तिक जाणीव, स्वतःचें अज्ञानमय मर्यादित कार्य करण्याचें बंद करते आणि श्रेष्ठ शांत अवस्था किंवा श्रेष्ठ कृतिशील अवस्था स्वतःला प्राप्त व्हावी म्हणून उच्चतर शक्तींना आवाहन करते, म्हणून एकता-एकसूत्रता-प्रधान महान् ज्ञानाची शांत अवस्था किंवा महान् कृतीच्या क्षेत्राची अवस्था तिला प्राप्त होते. दुसऱ्या अवस्थेंत, ज्ञान आणि कृति यांचा महान् व्याप आमच्या अंतरी प्रत्ययास येतो; या व्यापाला

पान क्र. ४८८

 

तप म्हणावेंच लागतें. पण पहिल्या शांत ज्ञानमय अवस्थेंतहि ज्ञानाचा व्याप वाढविण्याची शक्ति असते; जाणिवेची एकाग्रता तिच्या निश्चल अवस्थेला आणि आत्मानुभूतीला साहाय्यक होत असते; अर्थात् येथेंहि जाणिवेची अवस्था तपाची असते यांत संशय नाहीं. तेव्हां ब्रह्माची कृतिशील जाणीव आणि शांत स्थितिशील जाणीव या दोन्ही ठिकाणीं जाणीवशक्तीची एकाग्रता, केन्द्रीकरण असतें; अर्थात् तप हें ब्रह्मावस्थांचें लक्षण असतें; आणि आमच्या शांत अवस्थेंतहि तिला श्रेष्ठ सच्चिदानंदाच्या व्यापाराचें साधन बनविणारें तप, गुप्त तप असतें, अर्थात् जाणिवेची एकाग्रता असते. निर्मिति, कृति, गति सच्चिदानंदाकडून किंवा आम्हांकडून होत असतां, जाणिवेच्या शक्तीची एकाग्रता हाच निर्मिति वगैरेंना आधार असतो; तसेंच आमची व सच्चिदानंदाची शांत स्थितिशील अवस्था, सर्वांत निश्चल आणि शांत अवस्था, अनंत शांति, शाश्वत शांति या अवस्था देखील, त्यांना आंतून जाणिवेच्या शक्तीच्या एकाग्रतेचा     असा एक मुद्दा उपस्थित होण्यासारखा आहे कीं, ब्रह्माची शांत अवस्था आणि त्याची सक्रिय अवस्था, या अवस्था एकाच ब्रह्माच्या असल्या तरी त्या दोन अवस्थांत इतका भेद आहे कीं, त्या दोन ब्रह्मावस्था अगदीं भिन्न स्वतंत्र वस्तू आहेत असें म्हणावें लागतें; कारण त्या अवस्थांचा आश्रय करणाराला, केवळ भिन्न नव्हे, तर विरुद्ध फलांचा लाभ होतो. ब्रह्माची शांत अवस्था ज्या साधकानें आत्मसात् केली, त्याचें ऐहिक व्यवहाराचें जीवन, अस्तित्व समाप्त होतें; उलट पक्षीं सक्रिय ब्रह्माचा जो आश्रय करील, त्याचे व्यवहारी ऐहिक अस्तित्व, जीवन चालूं रहातें. पण येथें वैयक्तिक आत्म्याचा ऐहिक जीवनव्यवहार समाप्त होणें किंवा चालूं रहाणें हें कां घडतें, याचा विचार करतां असें दिसतें कीं, हा आत्मा विश्वगत ब्रह्मजाणीव आपलीशी करतो तेव्हां, विश्वांतील आपले व्यवहार चालवूं शकतो; कारण, ही ब्रह्मजाणीव विश्वगत कर्माचा आधार असते; या विश्वगत ब्रह्मजाणिवेला सोडून व्यक्तिगत आत्मा विश्वातीत ब्रह्मजाणिवेशीं समरस झाला, म्हणजे त्याचा व्यवहार स्थगित होतो; कारण तेथें विश्वापलीकडे असलेली ब्रह्म-जाणीव आपली शक्ति विश्वगत कर्माच्या खटाटोपांतून मागें घेत असते. दोन्हीं ठिकाणीं एकाग्र केलेल्या जाणीवशक्तीचा उपयोग करूनच (तप करूनच) इष्टसिद्धि केली जाते. विश्वगत कर्मांत अस्तित्वाच्या शक्तीचा खर्च तपानेंच, तप:सामर्थ्यानेंच शक्य

पान क्र. ४८९

 

होतो; विश्वगत कर्मांत खर्च होणारी ही शक्ति मागें घेणें ही गोष्टदेखील तपानेंच, तपःसामर्थ्यानेंच, एकाग्र केलेल्या जाणीवशक्तीच्या बळानेंच शक्य होते. तेव्हां हें उघड आहे कीं, ब्रह्माची जाणीवशक्ति दोन अवस्था घेत असली, तरी या दोन अवस्था अन्योन्यविरोधी, विसंवादी नाहींत; तिची शांत अवस्था ही संचयाची, स्वत:च्या संग्रहाची अवस्था असते आणि तिची सक्रिय अवस्था ही स्वत:चे दान करण्याची, स्वत:च्या संचयाचा, संग्रहाचा उपयोग करण्याची अवस्था असते -- टाकींत किंवा जलाशयांत पाणी शांत असावें, व तें वेळोवेळीं त्यांतून काढून दिलेल्या नळांतून वहात रहावें तशी ही ब्रह्माची शांत आणि सक्रिय अवस्था आहे. या दोन अवस्थांत विरोध तर नाहींच, तर उलट एक दुसरीला मदत करणारी आहे. क्रिया म्हटली कीं, तिच्या पाठीमागें अस्तित्वाची स्थिर, शांत, अ-क्रिय शक्ति असते व असावी लागते; क्रिया ही या अ-क्रिय शक्तीतूनच उत्पन्न होते, क्रियेला हिचाच आधार असतो; ही संचित अ-क्रिय शक्तीच, क्रियेला पाठीमागून मार्गदर्शन करून तिचें नियंत्रण करीत असते, क्रियेशीं ती सामग्ऱ्यानें केव्हांच एकरूप होत नाहीं; अर्थात् सर्व संचित अ-क्रिय शक्ति सगळीच क्रियेंत स्वतःला ओढून घेत नाहीं; क्रियेपासून ती आपलें पृथकत्व अनिवार्यपणें राखीत असते. क्रिया कितीहि महान् असो, सामग्ऱ्यानें तिच्याशी सर्व अक्रिय शक्ति एकरूप होणें अशक्य असतें : मूळ शक्ति, जी मोठ्यांत मोठ्या क्रियेला जन्म देते ती, त्या क्रियेंत आपलें सर्वस्व संपवून टाकीत नाहीं, कांहीं भाग मागें ठेवूनच त्या विशिष्ट क्रियेंत स्वत:चा खर्च करीत असते. आम्ही आमच्या स्वत:च्या क्रियेपासून दूर उभें राहिलों, आमच्या जाणीवयुक्त अस्तित्वांत बैठक मारून आमच्या क्रियेकडे आम्ही पाहूं लागलो आणि ती कशी घडते याचें निरीक्षण केलें, तर आम्हांला असें आढळून येतें कीं, आमच्या विशिष्ट क्रियेमागें किंवा विशिष्ट क्रियाकलापामागें आमचें सर्व अस्तित्व उभें असतें; आमच्या समग्र अस्तित्वाचा लहानसा भाग क्रियामग्न असतो; आमच्या अस्तित्वाच्या शक्तीपैकीं कांहीं शक्तीचा खर्च क्रियेंत होत असतो, बाकी अस्तित्व (अस्तित्वाची शक्ति) शांत अ-क्रिय असते; पण ही शांत स्थिति, शक्ति संचित करणारी स्थिति असते; जड, शक्तिशून्य अवस्था नसते. हीच गोष्ट अनंताच्या जाणीवयुक्त अस्तित्वाला अधिक पूर्णतेनें लागू आहे. अनंताची शक्ति ही, जशी अक्रिय शांत अवस्थेंत, तशीच सक्रिय निर्मितिशील अवस्थेंत अनंतच असणार हें उघड आहे.

पान क्र. ४९०

 

ज्या अवस्थेंतून सर्व निर्माण होतें, ती ब्रह्माची शांत निष्क्रिय अवस्था निरपेक्ष आहे कीं सापेक्ष (दृश्य कृति जिच्यांत नाहीं, दृश्य कृतींपासून जी मागें हटते ती सापेक्ष) आहे, अर्थात् कसलीच दृश्य व अदृश्य कृति, केव्हांच न करणारी अशी निरपेक्ष अवस्था म्हणजे ब्रह्माची शांत, निष्क्रिय अवस्था मानावयाची कीं अदृश्य कृति असूं शकेल, दृश्य मात्र नसणार, अशी सापेक्ष शांत निष्क्रिय अवस्था ब्रह्माचे ठिकाणीं मानावयाची हा प्रश्न सध्यां बाजूला ठेवूं. सध्यां एवढेंच लक्षांत ठेवूं कीं, शांत ब्रह्म वेगळें आणि सक्रिय ब्रह्म वेगळें अशी वस्तुस्थिति नाहीं, एकच एक ब्रह्म आहे, एकच एक अस्तित्व आहे, जें शांत अवस्थेंत आपलें तप राखून ठेवतें आणि सक्रिय अवस्थेंत निर्मितिसाठीं स्वतःचें दान करतें : आत्मशक्तिसंचयाचें तप शांत अवस्थेंत आणि आत्मशक्तिदानाचें, आत्मशक्तिव्ययाचें तप सक्रिय अवस्थेंत, एकच एक अस्तित्व, ब्रह्म करीत असतें; कृतीसाठीं अस्तित्वाचे ठिकाणीं दोन शक्तिस्थानें असतात, निर्मितिसाठीं दोन शक्तींची आवश्यकता असते : कृति ही चक्राकार गतीची असते; संचयस्थानातून, शक्तिसंचयाच्या स्थानापासून कृतीच्या गतीचा प्रारंभ होतो, कृति आपलें भ्रमण पुरें करून पुन: संचयस्थानीं शक्ति घेऊन येते; ही परत आणून घातलेली शक्ति पुन: कृतिरूपानें प्रवासाला निघूं शकते; ब्रह्माची शांत अवस्था ही तपाच्या स्वरूपाची आहे; ब्रह्माचें अस्तित्व एकाग्रतेनें स्वतःवर लक्ष लावून असतें, त्याची निश्चल शक्ति स्वतःचे ठिकाणीं एकाग्रपणें ध्यानमग्न असते; ब्रह्माचें शांत अवस्थेंतील तप या प्रकारचें असतें; ब्रह्माची सक्रिय अवस्था हीहि तपाच्या स्वरूपाची असते; ब्रह्माचें अस्तित्वाचें तप स्वतःच्या शक्तीचा संचय करून असतें तें, ब्रह्माच्या सक्रिय अवस्थेंत या संचित शक्तीला निश्चल अवस्थेंतून गतिमान अवस्थेच्या मार्गाला लावतें; ब्रह्माची सक्रियता म्हणजे संचित शक्तीची ही गतिमानता होय; क्रियेच्या लाखों लहरी या गतियुक्त शक्तींतून निघतात; कृतीच्या प्रत्येक लहरीवर ब्रह्माचें लक्ष असतें, प्रत्येक लहरीच्या निमित्तानें, प्रत्येक लहरीच्या क्षेत्रांत ब्रह्म त्याच्या अस्तित्वाच्या घटकभूत असलेलीं सत्यें आणि शक्यता, संचयाच्या बंदींतून मोकळ्या करून कामाला लावतें; ब्रह्माचें सक्रिय अवस्थेंतील तप हें या प्रकारचें असतें. अ-क्रिय अवस्थेंत जसें शक्तीचें केन्द्रीकरण असतें, तसें या सक्रिय अवस्थेंतहि शक्तीचें केन्द्रीकरण असतें; एवढेंच कीं सक्रिय अवस्थेंत अनेक स्थानीं शक्तीचें केन्द्रीकरण केलें जातें; या अनेकताप्रधान केन्द्रीकरणाला आम्ही शक्तीचें

पान क्र. ४९१

 

विस्कळीतपण समजतों; परंतु हा समज खोटा आहे. शक्ति कांहीं पोकळींत, ब्रह्माहून वेगळ्या बाह्य खोट्या अशा पोकळींत व्यर्थ फेंकली जात नाहीं; ब्रह्म आपली शक्ति स्वतःच्या अस्तित्वाच्या क्षेत्रांतच कामाला लावीत असतें; तें ही शक्ति कमी न होऊं देतां तिचीं रूपांतरें घडवून आणीत असतें; ही शक्तीच्या रूपांतराची प्रक्रिया सारखी चालूं असते; एक रूप, त्यांतून दुसरें, त्यांतून तिसरें असें सारखें रूपनिर्माण चालूं असतें -- पण या रूपनिर्माणाच्या आणि रूपभेदाच्या प्रक्रियेंत शक्तीचें मूळ माप कमी होत नाहीं. ब्रह्माची शांत अवस्था म्हणजे शक्तीचा महान् संचय, तपाचा महान् संचय असतो; यांतून, याच्या आधारानें अनेक आंदोलनें सुरू होतात, रूपें आणि घटना याचा महान् पसारा संचित शक्तीच्या आंदोलनांतून, तिच्या नानाविध रूपपरिवर्तनांतून निर्माण होतो. ब्रह्माची जी सक्रिय अवस्था असते तींतहि शक्तीचा संचय होत असतो; मात्र तो आंदोलनांच्या प्रक्रियेंत, रूपरूपान्तराच्या प्रक्रियेंत होत असतो. आमच्या ठिकाणीं ज्याप्रमाणें अ-क्रिय आणि सक्रिय अवस्था समकालीन असतात, त्याप्रमाणें ब्रह्माचे ठिकाणींहि त्या समकालीन असतात; आमचे ठिकाणीं या दोन अवस्था अन्योन्यसापेक्ष असतात, तशा त्या ब्रह्माचे ठिकाणींहि अन्योन्यसापेक्ष असतात : आमचे ठिकाणीं काय, ब्रह्माचे ठिकाणीं काय, एकाच अस्तित्वात दोन टोंकाला, या दोन अवस्था आपापलें काम करून दुसरीला सहाय्यक होत असतात.

      मूळ सद्‌वस्तु (ब्रह्म) निश्चल अस्तित्वाची शाश्वत शांत अवस्था नव्हे वा आंदोलनमय अस्तित्वाची शाश्वत सक्रिय अवस्था नव्हे किंवा या दोन अवस्था, एकीनंतर दुसरी, दुसरीनंतर पहिली, पुन: पहिली नंतर दुसरी अशा क्रमानें, आळीपाळीनें येत राहणें ही कालगत शाश्वत अशी अ-क्रिय सक्रिय अवस्थांची क्रमवारी हीहि मूळ सद्‌वस्तु, मूळ सत्य नव्हे. ब्रह्माच्या सत्यांतील पूर्णसत्यत्व, अक्रियता किंवा सक्रियता यांपैकीं कोणत्याहि एका पर्यायांत नाहीं : ब्रह्माची जाणीव क्रियाशील असतां या दोन पर्यायांत विरोध दिसतो आणि असतो; जाणीव क्रियाशील नसेल तेथें हा विरोध दिसत नाहीं, असत नाहीं. ब्रह्म हें, आपल्या अस्तित्वाची जाणीवयुक्त शक्ति विश्वगत कार्यांत प्रकट करतें असें आम्ही पाहातों तेव्हां, त्या ब्रह्माला आम्ही सक्रिय, चंचल ब्रह्म म्हणतो; जेव्हां ब्रह्म आपल्या अस्तित्वाची जाणीवयुक्त शक्ति

पान क्र. ४९२

 

कार्यापासून निवृत्त अशा स्थितींत राखून ठेवतें (शक्ति राखून ठेवण्याची ही क्रिया, कांहीं शक्ति कार्यनिविष्ट करण्याच्या क्रियेबरोबरच होत असते) हें आम्हीं पहातों, तेव्हां ब्रह्माला आम्ही निश्चल, शांत ब्रह्म म्हणतों : सगुण (सक्रिय), निर्गुण (अक्रिय); क्षर (सक्रिय), अक्षर (अक्रिय); हीं दुहेरीं नांवें एकाच ब्रह्माला दिलीं जातात; एकच ब्रह्म नसतें, तर या जोड्या अर्थशून्य झाल्या असत्या; ब्रह्म, मूळ सत्य एकच एक आहे; मुळांत दोन स्वतंत्र सत्यें नाहींत, एक निश्चल, एक चंचल अशीं दोन स्वतंत्र सत्यें मुळांत नाहींत, ही गोष्ट आपण पक्की लक्षांत ठेवणें अवश्य आहे. आमच्या व्यक्तिगत आत्म्याची प्रवृत्ति, विकासशील कार्यप्रवणता, आणि त्याची निवृत्ति, कार्यपराङ्मुखता आणि शांतता या दोन अवस्थांच्या संबंधांत सामान्यत: असें मानण्यांत येतें कीं, आत्मा कार्यप्रवृत्त असतां अज्ञानानें घेरला जातो, त्याचें खरें अस्तित्व, जें शांत अक्रिय अस्तित्व, त्याचें त्याला विस्मरण होतें; तो शांत झाला असतां त्याला त्याच्या सक्रियतेचें कायमचें विस्मरण होतें. सक्रिय अस्तित्व हें केवळ दर्शनी, खोटें अस्तित्व असतें. हें असें मत आत्म्याच्या प्रवृत्ति-निवृत्तिसंबंधांत आम्हीं बनवितो, याचें कारण प्रवृत्ति ही क्रिया आणि निवृत्ति ही क्रिया आमच्या व्यक्तिगत आत्म्याच्या संबंधांत एकदम घडत नाहींत; एक अगोदर, एक नंतर अशा क्रमानें घडतात. आमची निद्रा आणि आमची जागृती या क्रिया समकालीन नसतात; जागृतीमध्यें आम्हांला सुषुप्तिकालीन अवस्थेचें अज्ञान असतें, सुषुप्तीमध्यें आम्हांला जागृतींतील अस्तित्वाचें अज्ञान असतें -- तशीच गोष्ट आमच्या आत्म्याच्या प्रवृत्ति-निवृत्तीची आहे. पण निद्रा व जागृति, जागृति व निद्रा या अवस्थांतून क्रमश: जाणारें आमचें अस्तित्व आमच्या पूर्ण अस्तित्वाचा एक अंश मात्र असतें, आणि या अंशाला आम्ही आमचें पूर्ण अस्तित्व मानतों, येथें आमची चूक होत असते. आम्हांला खोल मानसिक अनुभव घेतां आला म्हणजे आमच्या विशाल अस्तित्वाची आम्हांला ओळख होते; हें आमचें आंतरिक विशाल अस्तित्व निद्रा, जागृति या घटकांनीं बांधलें जात नाहीं; आमच्या पृष्ठगत आंशिक अस्तित्वाला जी अवस्था नेणिवेची भासते, त्या अवस्थेंत (निद्रेंत) होणाऱ्या क्रिया, हें आमचें विशाल अस्तित्व, जाणिवेंत (जागृतींत) होणाऱ्या क्रियांप्रमाणें स्पष्टपणें जाणतें. आमचें ब्रह्माशीं जें नातें आहे, त्या संबंधांत असेंच घडत असतें : ब्रह्म हें आमचें खरें समग्र अस्तित्व आहे; पण अज्ञानाच्या स्थितींत आमच्या जाणिवेच्या एका अंगाशीं, मानसिक किंवा आत्मिक- मानसिक

पान क्र. ४९३

 

प्रकृतीच्या अंशाशीं, आम्ही तादात्म्य करून घेतों. हा अंश सक्रिय स्थितींत स्वतःच्या अक्रिय शांत अवस्थेला मुकतो, सर्वथा विसरतो; क्रियेची अवस्था संपली कीं या अंशाला शांत अवस्था लाभते; पण त्याबरोबर सक्रियतेचें त्याला विस्मरण होतें; तेव्हां मानसिक किंवा मन:प्रधान आत्मिक जाणिवेच्या क्षेत्रांत अर्थात् अज्ञानाच्या क्षेत्रांत सक्रिय आत्मा आणि अक्रिय शांत आत्मा एकाच वेळीं आमच्या अनुभवास येत नाहींत. पूर्ण अक्रियता मनाला साधली म्हणजे तें निद्रामग्न होतें, किंवा त्याची समाधी लागते, किंवा त्याला आध्यात्मिक शांति (मुक्ति) लाभते; ही शांतिरूप मुक्ति अज्ञानाच्या बंधनांतून आम्हांला मुक्त करते. अंशमात्र अस्तित्व, क्रियेच्या भोंवऱ्यांत गिरक्या खाणारें अंशमात्र अस्तित्व म्हणजे 'आम्ही'; हें आमचें अज्ञानाचें बंधन तुटण्यासाठीं (आध्यात्मिक शांतीसाठीं) सक्रिय ब्रह्माचें अज्ञान किंवा सक्रिय ब्रह्मापासून विभक्तता पत्करणें मात्र आम्हांला भाग पडतें. शांत सारभूत मूलभूत अशा स्वतःच्या विशाल अस्तित्वाच्या अवस्थेंत आमचें मानसिक-आध्यात्मिक अस्तित्व एकाग्रतेनें बुडून जातें, मग त्याला सक्रिय जाणिवेची पात्रता राहत नाहीं, किंवा सक्रियतेची घृणा त्याचे ठिकाणीं उत्पन्न होते; आमच्या आत्म्याला ही एकांगी शांतीची मुक्ति अनुभवूनच पुढें पूर्ण (सक्रिय-अक्रिय) ब्रह्माकडे मार्गक्रमण करावें लागतें; कारण आमचा आत्मा अचेतनांतून वर येऊन अज्ञानाच्या (जाणिवेच्या एका अंगाशीं, मनाशीं तादात्म्य पावणाऱ्या) स्थितींतून ज्ञानाकडे जात असतो. पण शेवटीं तो आपलें इष्टस्थान प्राप्त करून घेतो. आमच्या खऱ्या समग्र अस्तित्वाची पूर्ण दशा आम्हांला शेवटीं लाभते; या दशेंत आमच्या आत्म्याच्या दोनहि बाजू, सक्रिय आणि अक्रिय, सगुण आणि निर्गुण, पूर्ण मुक्त होतात. आमचे खरें समग्र अस्तित्व, पूर्ण ब्रह्म आमचें होतें आणि या ब्रह्माचे ठिकाणी आमच्या दोन्ही, निर्गुण आणि सगुण आत्मकक्षांना आधार मिळतो, कारण हें पूर्ण ब्रह्म, शांति किंवा क्रिया यांपैकीं कशाचेंहि बंधन मानत नाहीं, तें एकसमयावच्छेदेंकरून शांतिपूर्ण आणि क्रियाशील असतें.

      ब्रह्म अशा स्वरूपाचें नसतें, शांतींत क्रियाशून्य, क्रियाशीलतेंत शांतिशून्य, अशी क्रमवार अवस्था ब्रह्म अनुभवीत असतें, तर विश्व असतांना शांत ब्रह्माचें अस्तित्व राहिलें नसतें, सर्व कांहीं क्रिया, क्रिया असें झालें असतें -- आणि विश्व संपतांच, क्रियाशील ब्रह्माचा अवतार संपला असतां,

सर्व कांहीं शांत, शांत झालें असतें. पण अशी वस्तुस्थिति नाहीं; कारण

पान क्र. ४९४

 

आम्हांला असा अनुभव येतो कीं, विश्वांतील व्यापार, व्यवहार, विश्वाची एकाग्रतेनें नानामुखी हालचाल, चालूं असतां त्या व्यापारव्यवहारांत, त्या नानामुखी हालचालींत, आंतून सर्वव्यापी असणारी अशी, त्या हालचालींना आणि व्यवहारांना आधार देणारी (विश्वजनक सद्‌वस्तूची) शाश्वत अक्रिय आत्मकेन्द्रित शांत शांत अवस्था पूर्णतेनें विद्यमान असते. पूर्ण ब्रह्म एकाच वेळीं शांत आणि सक्रिय असतें; आम्ही झोंप आणि जागेपण एकावेळीं न अनुभवतां क्रमानें अनुभवतों, तसें शांति आणि क्रियामग्नता ब्रह्म अनुभवीत नाहीं; असा (शांतींचा आणि सक्रियतेचा) क्रमशील अनुभव ब्रह्माचा नसतो, तर आम्हांमधील एकांगी अंशव्यापी अशी जी कांहीं क्रिया, प्रवृत्ति असते तिला असा अनुभव येत असतो; आम्ही या प्रवृत्तींशीं आमचें तादात्म्य करून घेतों, त्यामुळें एका अज्ञानांतून (सक्रियेच्या किंवा शांतीच्या) दुसऱ्या अज्ञानाकडे (शांतीच्या किंवा सक्रियतेच्या) आम्ही प्रवास करतों असा आम्हांला अनुभव येतो पण हा अनुभव दर्शनी, पृष्ठगत अस्तित्वापुरता आणि जाणिवेपुरता असतो. आमचें खरे समग्र अस्तित्व अशा विरोधांचें अंकित नसतें; त्याला शांतीचा आत्मा आत्मसात् करण्यासाठीं सक्रिय आत्मा दृष्टीआड करावा लागत नाहीं, विसरावा लागत नाहीं. आम्हांला पूर्ण ज्ञान झालें, आमचा आत्मा आणि आमची प्रकृति यांना अंशमात्र अज्ञानग्रस्त संचित अस्तित्वाच्या स्वभावगत अक्षमता, न्यूनता यांच्या कचाट्यांतून पूर्णतया मुक्तता मिळाली म्हणजे आम्ही सक्रिय आणि शांत अवस्था एकाच वेळीं अनुभवू शकूं; विश्वसंसाराचीं हीं दोन टोंकें आहेत; शांति हें एक टोंक आहे व क्रियाशीलता हें दुसरें टोंक आहे. आत्म्याच्या, परमात्म्याच्या या दोन शक्ती आहेत, प्रकृतीशीं संबंध असतां एक शक्ति (क्रियाशक्ति) काम करते, प्रकृतीशीं संबंध तोडणारी अशी दुसरी शक्ति (शांतिशक्ति) असते. या दोन्ही शक्ती एकसमयावच्छेदेंकरून परमात्म्याचे ठिकाणीं काम करतात, तशा त्या, आम्हांला पूर्ण ज्ञान झाल्यावर आमच्या ठिकाणींहि एकाच वेळीं काम करूं लागतील.

      गीतेंत क्षर, (सगुण, सक्रिय) आणि अक्षर (निर्गुण, निष्क्रिय) पुरुषांहून पुरुषोत्तम (पूर्ण ब्रह्म) अधिक शक्तीचा आहे असें सांगितलें आहे : दोन्हीं एकत्र केल्यानेंहि पुरुषोत्तमाचें स्वरूप पूर्णतया प्रकट केल्यासारखें होऊं शकत नाहीं. सगुणता (सक्रियता) आणि निर्गुणता (निष्क्रियता) एकाच वेळीं ब्रह्माचे ठिकाणीं असतात, याचा अर्थ तो एक

पान क्र. ४९५

 

पूर्णांक आहे आणि हा पूर्णांक दोन अपूर्णांकांच्या बेरजेनें होतो, असा आम्ही घेत नाहीं हें उघड आहे; आम्ही असें समजत नाहीं कीं, ३/४ ब्रह्म शांत आहे आणि १/४ ब्रह्म सक्रिय आहे; असेंच जर असेल, तर ब्रह्म हें अज्ञानाची बेरीज असूं शकेल, शांत ३/४ ब्रह्म १/४ सक्रिय ब्रह्मासंबंधानें उदासीन किंवा पूर्ण अज्ञानांत, आणि १/४ सक्रिय ब्रह्म ३/४ शांत ब्रह्मासंबंधानें पूर्ण अज्ञानांत -- आणि ही शांतता, सक्रिय ब्रह्माला हवी असल्यास त्यानें सक्रियता सोडल्याशिवाय गत्यंतर नाहीं -- अशी स्थिति असूं शकेल. ''बेरीज ब्रह्म'' त्याच्या घटकभूत अपूर्णांकांहून अगदीं भिन्न देखील असूं शकेल. गूढ माया ही हट्टानें या ब्रह्माच्या अस्तित्वाच्या ३/४, १/४ या क्षेत्रांत शांतता आणि क्रियाशीलता गाजवीत असेल आणि ''बेरीज ब्रह्म'' या मायाकृत व्यवहारासंबंधानें पूर्ण अज्ञानांत असूं शकेल; अर्थात् त्या व्यवहाराची कोणतीहि जबाबदारी ''बेरीज ब्रह्मावर'' नसेल; व्यवहाराच्या पातळीहून अगदीं उंच अशा वरच्या पातळीवर, तें व्यवहारासंबंधानें पूर्ण अज्ञानांत आणि त्या संबंधींच्या जबाबदारीपासून सर्वथा मुक्त असूं शकेल. पण पूर्ण ब्रह्म, पुरुषोत्तम हें असलें ''बेरीज ब्रह्म'' असूं शकणार नाहीं; कारण या असल्या ''बेरीज ब्रह्मांत'' पूर्णतेचा पूर्ण अभाव आहे. पूर्ण ब्रह्माला आपली अक्रिय अवस्था आणि सक्रिय अवस्था दोन्ही सर्वदा, सर्वथा ज्ञात असल्याच पाहिजेत. या अवस्थांपैकीं कोणतीहि एक किंवा दोन्हीं मिळून आपली पूर्ण ब्रह्मता होत नाही, हेंहि त्या पूर्ण ब्रह्माला कळत असलें पाहिजे; स्वतःच्या विश्वरूपाच्या या दर्शनी विरोधी पण संवादी (अन्योन्य सहाय्यक) अशा दोन ध्रुवावस्था आहेत, ही गोष्ट त्याला स्पष्टपणें प्रतीत होत असली पाहिजे. ब्रह्म नित्य शांत (अक्रिय) असतें; म्हणून त्याला स्वतःचे व्यापारव्यवहार सर्वथा अज्ञात, असतात; तें सर्वथा त्या व्यापारांपासून दूर, अस्पष्ट असतें अशी गोष्ट होऊं शकत नाहीं; हा ब्रह्म-पुरुषोत्तम सर्वथा आत्मतंत्र, बंधनातीत असतो : सर्व व्यापारव्यवहार तो आपल्या अंतरांत ठेवून असतो, त्यांना तो आधार देतो, आपल्या नित्य शांतिशक्तीनें आधार देतो; आपल्या शक्तीच्या नित्य शांत अवस्थेंतच तो या व्यापारव्यवहारांना आरंभ करून देतो. हा पुरुषोत्तम क्रियामग्न असतां स्वतःच्या शांत अवस्थेला विसरतो, पारखा होतो हीहि गोष्ट अशक्य आहे; तो सर्वव्यापी आहे, सर्व व्यापारव्यवहारांना तो शांत राहूनच आधार देत असतो, आंदोलनाच्या धुमाकुळांत त्याची शांति विचलित होत नाहीं, तो नित्य शांत, स्वस्थ, स्वतंत्र, आनंदमय असा

पान क्र. ४९६

 

असतो; त्याच्या शक्तींच्या अमर्याद भ्रमन्तींत, या भ्रमन्तीच्या अंतरंगांत, हृदयांत त्याची बैठक नित्य असते आणि ती नित्य शांतीची, स्वस्थतेची, स्वतंत्रतेची, आनंदाची अशी असते. आणखी एक गोष्ट. पुरुषोत्तम हेंहि जाणतो कीं, त्याचें ''पूर्ण अस्तित्व'' अक्रियतेनें किंवा सक्रियतेनें किंवा दोहोंच्या बेरजेनें पूर्णतेनें व्यक्त केलें जात नाहीं : हें अव्यक्त पूर्णत्व सक्रियतेनें तो व्यक्त करीत असतो, अक्रियतेनें व्यक्त करीत असतो : सक्रियतेला, अक्रियतेला अर्थ येतो, मोल येतें, तें त्याच्या अव्यक्त पूर्णत्वामुळें येतें. या अव्यक्त पूर्णत्वाची त्या पूर्ण पुरुषोत्तमाला नेहमींच पूर्ण जाणीव असते; अक्रिय असतांना जाणीव असते, सक्रिय असतांना जाणीव असते. पूर्ण पुरुषोत्तम (ब्रह्म) आणि त्याची सक्रियता व अक्रियता या संबंधांत जें सत्य वर सांगितलें आहे, तें आमच्या प्रत्ययास येत नाहीं याचें कारण, आम्ही ब्रह्माच्या एका अंशाशीं तादात्म्य करून घेतों हें आहे : या आंशिक तादात्म्यामुळें आम्हांला पूर्ण ब्रह्माची अनुभूति घडत नाहीं. आमचें अंतरंग पूर्ण ब्रह्माच्या स्वागताला मोकळें नसेल, तर तेथें त्यानें यावें कसें ?

      पूर्ण ब्रह्माचे वर्णन वर आलें आहे, त्यावरून हें स्पष्ट होत आहे कीं, पूर्ण ब्रह्माच्या अस्तित्वांत अज्ञान उगम पावत नाहीं, पूर्ण सच्चिदानंदाच्या अस्तित्वांत तें उगम पावत नाहीं; अज्ञानाच्या अस्तित्वाचें मूळ, विभागणी करणाऱ्या त्याच्या क्रियांचा आरंभबिंदु, पूर्ण ब्रह्मांत नसून त्याच्या अस्तित्वाच्या एकांगी क्रियेंत आहे; आम्ही या एकांगी क्रियेशीं तादात्म्य करून घेतो, या आमच्या एकांगी एकरूपतेंत आहे; आमची पृष्ठगत एकांगी जाणीव झोंप आणि जागेपण क्रमानें अनुभवते आणि या जाणिवेशीं आम्ही एकरूप होऊन आमचा आत्मा, जागृति आणि सुषुप्ति क्रमानें अनुभवतो असें मानतो. त्याप्रमाणें ब्रह्माच्या एकदेशी अस्तित्वाशी (पूर्ण अस्तित्वाशीं नव्हे) एकरूप झालेली आमची जाणीवच अज्ञानाच्या मुळाशीं असते : ब्रह्म केवळ सगुण, केवळ निर्गुण, केवळ सगुण निर्गुण आहे, एकाच वेळीं सगुणनिर्गुण नाहीं; सगुणत्व कांहीं काळ, नंतर निर्गुणत्व अशा क्रमानें ब्रह्म सगुणनिर्गुण असतें -- या कल्पना 'अज्ञान' या वर्गांत येतात. पूर्ण ब्रह्माशीं एकरूप झालेल्या आत्माच्या ठिकाणीं या अज्ञानाच्या कल्पना येऊं शकत नाहींत; पूर्ण ब्रह्माच्या प्रकृतींत अज्ञान घटकरूपानें असूं शकत नाहीं, हें ठरलें म्हणजे अज्ञान ही मूळ वस्तु, आदिवस्तु, विश्वाच्या मुळाशीं असलेली वस्तु असूं शकत नाहीं. पूर्ण शाश्वत ब्रह्माच्या जाणिवेची

पान क्र. ४९७

 

एक मूळ शक्ति ''माया'' आहे असें आम्हीं मानलें, तर ही माया म्हणजे अज्ञान किंवा अज्ञानाच्या जातीची वस्तु नसून, आत्मज्ञान आणि सर्वज्ञान या द्विविध ज्ञानाची विश्वव्यापी आणि विश्वनिरपेक्ष अशी शक्ति असली पाहिजे, हें उघड आहे; अज्ञान हें आमच्या प्रत्ययास येतें तें, या आदिमायेच्या कार्याच्या पसाऱ्यांत केव्हांतरी नंतर येतें. अज्ञान ही मायेसारखी प्रथम आणि प्रधान हालचाल नसून, गौण आणि मध्येंच येणारी दुय्यम हालचाल असते; ही हालचाल एकदेशी, सापेक्ष असते : आतां प्रश्न असा कीं, आत्मा मुळांत एकच एक असतो, तो अनेक आत्म्यांचें रूप धारण करतो; या अनेकतेंत अंगभूत अनिवार्य घटक म्हणून अज्ञान असतें किंवा कसें ? अनेक आत्म्यांतील प्रत्येक आत्मा अनिवार्यपणें अज्ञानानें व्यापलेला असतो कीं काय ? ब्रह्मानें स्वतःला अनेक आत्म्यांचे ठिकाणीं पाहण्यास आरंभ करतांच अज्ञान सुरू होतें काय ? ब्रह्माची ही अनेकात्मता म्हणजे अपूर्णांकरूप असलेल्या आत्म्याची बेरीज असते कां ? प्रत्येक आत्मा (अनेकात्मतेंतील आत्मा) स्वतःच अपूर्णांक रूप असतो, हें खरें कां ? प्रत्येक आत्मा जाणिवेंत इतर सर्व आत्म्यांपासून वेगळा, विभक्त असतो, त्याला इतर आत्म्यांचें जें ज्ञान होतें त्या ज्ञानांत त्याला इतर आत्मे स्वतःच्या बाहेर प्रतीतीस येतात, या आत्म्यांशीं त्याचा संबंध शरीराच्या किंवा मनाच्या द्वारां घडूं शकतो, अन्यथा घडूं शकत नाहीं,  ''सर्व आत्म्यांशीं मी एकरूप आहे'' या प्रकाराची एकता कोणत्याहि आत्म्याचे ठिकाणीं अनुभवास येणें अशक्य असतें -- हें खरें कां ? अर्थात् ब्रह्म एकात्मता टाकून अनेकात्मता धारण करतें झालें कीं लागलींच अनेकात्मतेंतील प्रत्येक आत्म्याला अज्ञान झपाटतें कां ? असा प्रश्न आहे. 'या प्रश्नाचें उत्तर ''नाहीं'' असें आहे. आमचा जो जाणिवेचा पृष्ठगत, अगदीं बाहेरचा थर असतो, बाहेरचें शरीर आणि मन यांच्या ठिकाणीं जी आमची जाणीव असते, तिच्या संबंधांत ही गोष्ट खरी आहे कीं, अज्ञानाचें तेथें राज्य असतें; पण जेथें आमची सूक्ष्म, खोल, विशाल जाणीव असते तेथें आम्ही पोंचलों म्हणजे तेथें विभक्ततेच्या भिंती पातळ असलेल्या आमच्या अनुभवास येतात; आमच्या सूक्ष्मतर, विशालतर, गाढतर, जाणिवेंत त्या आणखी पातळ असलेल्या दृष्टोत्पत्तीस येतात; असें होता होतां शेवटीं भेदाची भिंत नाहींशी झालेली दिसते, अज्ञानाचें राज्य पूर्णपणें संपुष्टांत येतें.

      जाणिवेच्या दर्शनी विभक्ततेचा अगदीं खालचा पाया, अगदीं

पान क्र. ४९८

 

बाहेरची निशाणी म्हणजे शरीर होय; प्रकृतीनें हें जाणिवेचें दर्शनी विभक्तपण अस्तित्वांत आणलें आहे; अज्ञान, आत्मनेणीव प्रकृतीनें स्वीकारली आहे; अज्ञानांत, आत्मनेणिवेंत बुडी घेऊन शेवटीं अगदीं खालच्या टोंकाला तिनें शरीर निर्माण केलें आहे -- तिनें दर्शनी भेदाचा कळस येथें केलेला आहे. जेथें दर्शनी भेदाचा कळस प्रकृतीनें केला आहे तें शरीर, व्यक्तिगत आत्म्याचे ठिकाणीं एकतेची पुनर्जागृति करण्याच्या कार्यांत, प्रकृतीनें आरंभस्थान केलें आहे : प्रकृतीची जाणीव एकरूप होती ती अनेकरूप झालेली आहे. जाणिवेच्या अनेक रूपांतील कांहीं रूपें, अतिरेकी भेदाचीं स्थानें आहेत; या अतिरेकी भेदाचीं स्थानें असलेल्या रूपांत, शरीरांत राहणाऱ्या जीवात्म्याला शरीरांत राहत असतांच, आपल्या मूळ एकतेची पुन: प्राप्ति व्हावी यासाठीं प्रकृतीचा खटाटोप, आत्म्यानें शरीर धारण केल्या क्षणापासून सुरू झालेला आहे. असो. शरीरें एकमेकांशीं बाह्य साधनांनींच संबंध ठेवूं शकतात; बाह्यता ही खिंड दोन शरीरांच्या मध्यें कायमची असते. एका शरीरानें दुसऱ्यांत प्रवेश करायचा, तर दुसऱ्या शरीराला छेद करणें अवश्य होतें; किंवा दुसऱ्या शरीरांत कोठें छेद असेल त्याचा फायदा घेणें अवश्य होतें. एक शरीर दुसऱ्या शरीरांशीं मिळून जावयाचें, एकरूप व्हावयाचें, तर एकानें दुसऱ्याचे तुकडे करणें व तें भक्षण करून टाकणें किंवा तुकडे न करतां गिळणें व पचविणें अवश्य होतें, किंवा दोन्हीं शरीरें, दोन्हीं रूपें आकार नाहींसे होऊन तिसरा स्वतंत्र आकार आपल्या घटकांतून निर्माण करून त्याच्या रूपानें एकरूप होऊं शकतात : अर्थात् दोन आकार वितळवून त्यांना एकरूप करतां येतें. ही शरीराची कथा झाली. शरीराशीं एकरूप असणाऱ्या मनालाहि शरीराचीं बंधनें लागूं होतात; परंतु मन स्वत: शरीराहून सूक्ष्म आहे; दोन मनें एकमेकांना इजा न करतां एकमेकांत छेद न करतां एकमेकांत प्रविष्ट होऊं शकतात; एकमेकांना न दुखवितां, एकमेकांचा माल देऊं, घेऊं शकतात : एका अर्थानें तें एकमेकांचे घटकभाग होऊं शकतात; तथापि मनालाहि त्याचा आकार म्हणून असतो, या आकारामुळें एका मनाचा दुसऱ्या मनापासून वेगळेपणा प्रतीत होऊं शकतो, आणि ही आकाराच्या वेगळेपणाची बैठक घेऊन कोणतेंहि मन आपला सवता सुभा बनवूं शकतें. मनाच्या पलीकडे आमचा आत्मा असतो; आत्मजाणीव आम्हांला पुन: प्राप्त झाली म्हणजे एकतेच्या मार्गावरील अडचणी कमी होऊं लागतात, आणि शेवटीं समूळ

पान क्र. ४९९

 

नाहींशा होतात; आत्म्याआत्म्यांची एकदा प्रस्थापित होते. आत्मा आपल्या जाणिवेनें दुसऱ्या आत्म्याशीं तादात्म्य पावूं शकतो, त्यांना आपल्या स्वत:च्या अंतरंगांत सामावून घेऊं शकतो, त्या दुसऱ्या आत्म्यांत प्रविष्ट होऊन त्यांना आपलें वसतिस्थान करूं शकतो, त्यांच्याशीं स्वतःची एकता अनुभवूं शकतो; आणि हा सर्व एकरूपतेचा व्यवहार पूर्ण जागृतींत तो करूं शकतो, या जागृतींत सर्व प्रकारचे भेद तो आत्मा पाहत असतो, अनुभवीत असतो; पण हे सर्व भेद अनुभवून तो त्यांच्या पलीकडील, त्यांना पोटांत घेणारी एकताहि अनुभवूं शकतो. आत्म्याच्या आत्मजाणिवेची ही महति आहे; निर्वाण स्थितीमध्यें आत्मा, मन, शरीर हे सर्व भेद नष्ट होत असतात, सर्व व्यक्तित्व (आत्म्यांचे, शरीरांचें, मनांचें व्यक्तित्व) शून्य होत असतें, म्हणून त्या स्थितींत आत्म्याला एकरूपतेचा अनुभव येणें सोपें असतें; सुषुप्तींत विशेष, भेद सर्व मावळून जात असतो, म्हणून तेथें एका दृष्टीनें एक रूपतेचा अनुभव सोपा असतो; परंतु पूर्ण जागृतींत एकरूपतेचा, एकतेचा अनुभव येणें सोपें नसतें. आत्मा क्रमश: आपली जाणीव विशालतर करीत करीत शेवटीं सर्व आत्म्यांशीं व सर्व आत्म्यांच्या आत्म्याशीं एकरूपता अनुभवतो.

      आत्मे अनेक झाले कीं या अनेकांपैकीं प्रत्येक आत्मा अज्ञान आणि आत्मबंधनकारक विभक्तता यांना स्वभावतःच पत्करतो, त्यांना तो टाळूंच शकत नाहीं अशी वस्तुस्थिति नाहीं; ब्रह्म अनेक झालें कीं स्वभावतःच अज्ञान आणि मर्यादा घालणारा भेद त्याला आपल्या पकडींत घेतात, ही गोष्ट खरी नाहीं. ब्रह्म किंवा पुरुषोत्तम हा शांति (अक्रियता) आणि सक्रियता या दोन अवस्थांहून अधिक आहे, त्याप्रमाणें एकता आणि अनेकता या दोन अवस्थांहूनहि तो अधिक आहे. तो स्वभावतःच एक आहे, पण त्याची एकता त्याला बंधन घालणारी नाहीं; एकतेबरोबरच अनेक होण्याचीहि शक्ति त्याचे ठिकाणीं आहे; या अनेकतेच्या शक्तीला तेथें बहिष्कृत केलेलें नाहीं; शरीराची, मनाची एकता विभक्ततासंपादित, विभक्ततानिष्ठ असल्यानें तेथें अनेकतेच्या शक्तीला बहिष्कार आहे : अशी गोष्ट मूळ एकतेची, ब्रह्माच्या, पुरुषोत्तमाच्या एकतेची नाहीं; ही एकता स्वत:ला एकतेंत कायमचें कोंडून घेणारी नाहीं, अनेकतेला वाळींत टाकणारी नाहीं -- अनेकतेबरोबर सहकार्य करणारी आहे : पुरुषोत्तम हा कांहीं गणितांतला 'एक' नव्हे; गणितांतील 'एक' स्वतःच्या पोटीं शंभर (कोणतीहि स्वत:हून वेगळी संख्या) धारण करूं शकत नाहीं

पान क्र. ५००

 

आणि म्हणून तो शंभराहून लहान आहे आणि लहानच राहतो. पुरुषोत्तम हा 'एक' शंभराला स्वतःमध्यें धारण करतो आणि सर्व शंभरांत 'एक' म्हणून असतो व रहातो. पुरुषोत्तम स्वत: एकच एक आहे, अनेकांतील एकच आहे, आणि ते अनेक त्याच्या ठिकाणीं एक आहेत, त्याच्या एकत्वानें एक आहेत. दुसऱ्या शब्दांत, ब्रह्म स्वतःचें मूळ, चैतन्याचें एकत्व जाणतें व त्याबरोबरच स्वतःमधील अनेक आत्म्यांनाहि जाणतें; तसेंच त्याच्या अनेक आत्म्यांपैकीं प्रत्येकाच्या ठिकाणीं जी जाणीव आहे त्या जाणिवेनें तें सर्व आत्म्यांशीं एकताहि अनुभवतें. प्रत्येक आत्म्याच्या ठिकाणीं ब्रह्म किंवा पुरुषोत्तम असतो, तो प्रत्येकाच्या हृदयांत अंतर्यामी ईश्वर म्हणून राहतो आणि स्वतःचें एकत्व सर्वत्र अनुभवतो. जीवात्म्याला त्याजकडून ज्ञानाचा प्रकाश मिळतो, या प्रकाशाच्या आश्रयानें जीवात्मा ईश्वराशीं स्वतःचें ऐक्य ओळखतो, आणि सहजच या ऐक्याच्या द्वारां सर्व जीवात्म्यांशीं स्वतःचें ऐक्य असल्याचें तो अनुभवतो. शरीर, विभक्तप्राण, विभागणारें मन यांच्याशीं आमची पृष्ठगत जाणीव तादात्म्य पावते आणि म्हणून ती अज्ञानानें व्याप्त असते; तथापि या जाणिवेलाहि प्रकाश मिळूं शकतो आणि या प्रकाशाच्या साह्यानें तिलाहि सर्व आत्म्यांच्या एकतेचें ज्ञान होऊं शकतें; तसेंच पुरुषोत्तमाशीं प्रत्येक आत्म्याच्या असलेल्या एकतेचें ज्ञान होऊं शकतें : आत्म्यांची अनेकता ही आत्म्याच्या अज्ञानाच्या मुळाशीं अनिवार्यपणें आहे ही गोष्ट खरी नाहीं, हें वरील विवेचनाचें सार आहे.

      ब्रह्म एकाचें अनेक होतें तेव्हांपासून अज्ञान निर्माण होत नाहीं. तें पुढें निर्माण होतें : मन आपल्या आत्मिक, अतिमानसिक मूळ आधारापासून तोडलें जातें, तेव्हां अज्ञानाच्या आक्रमणाला आरंभ होतो; आणि या पृथ्वीवरील जीवनांत अज्ञान कळसाला पोंचतें; कारण या पार्थिव जीवनांत व्यक्तीची जाणीव, विभागणाऱ्या मनाच्या आकाराशीं, शरीराशीं तादात्म्य पावते. विभाजनाचा अत्यंत सुरक्षित पाया, एकमेव सुरक्षित आधार म्हणजे आकार वा शरीर होय. आकार म्हणजे काय तें आतां पाहावयाचें आहे. आम्हांला येथें या पृथ्वीवर आकार म्हणून जो दिसतो, ती शक्तीची, केन्द्रीभूत शक्तीची, एक रचना असते; जाणीवशक्ति क्रियाशील, गतिमान झाली म्हणजे या चंचल शक्तीच्या भ्रमन्तींत अनेक गांठी तयार होतात. अशा गांठींतील एक गांठ म्हणजे आकार होय; ही गांठ गांठींच्या रूपांत टिकविण्यासाठीं गति, क्रिया एकसारखी

पान क्र. ५०१

 

भिरभिरत ठेवावी लागते. आकाराचा उगम सर्वातीत सत्यांत आहे; आकार कांहीं अंशांनीं सर्वातीत सत्य व्यक्त करीत असतो; पण तें कसेंहि असलें, तरी आकाराचा कोणताहि भाग, व्यक्त आकाराचा कोणताहि भाग टिकाऊ असत नाहीं, नित्य असत नाहीं. आकार हा सगळा, साकल्यानें नित्य टिकणारा नाहीं, त्याचे घटकहि, घटक परमाणूहि नित्य टिकणारे नाहींत. या परमाणूंना फोडतां येतें; शक्ति एकाग्रतेनें सारखी भिरभिरत असते, गांठी करून भिरभिरत राहते -- या भिरभिरणाऱ्या गांठीं म्हणजे परमाणु : या गांठी स्थिर भासतात, याचें कारण शक्तीचें भिरभिरणें, विशिष्ट प्रकारें भिरभिरणें. या भिरभिरण्याला त्याच्या विशिष्ट गतीहून वेगळी गति देतां येते, त्याची गति थांबवितांहि येते, आणि अशा युक्तीनें परमाणू (गांठी) फोडतां येतात; अर्थात् ते नित्य नाहींत व त्यांनीं बनलेला आकारहि नित्य नाहीं हें उघड आहे. असो. शक्तीच्या क्रियाशीलतेंत, कोणत्याहि आकारावर तपाची (जाणीवशक्तीची) एकाग्रता होते आणि त्यामुळें हा आकार अस्तित्वांत टिकविला जातो; या प्रक्रियेनें विभागणीचा भौतिक पाया तयार होतो. ब्रह्माच्या जाणीवशक्तीचें तिच्या विषयावरील एकाग्रतायुक्त कार्य, अर्थात् तपाचें कार्य म्हणजेच क्रियाशील ब्रह्माच्या व्यवहारांतील सर्व गोष्टी होत. तेव्हां अज्ञानाचें मूळ शोधावयाचें तर तें तपाच्या विशिष्ट आत्मसमाधींत, आत्मविस्मृति घडविणाऱ्या एकाग्रतेंत शोधावयास हवें; क्रियाशील मूळ जाणीवशक्तीनें आत्मविस्मरण घडविणाऱ्या एकाग्रतेनें शक्तीची कोणतीहि भेदनिष्ठ हालचाल चालविण्यांत अज्ञानाचें मूळ असावें, असा सिद्धान्त करतां येतो : अज्ञानाचा आम्हांला जो अनुभव येतो त्यांत, मन भेदाच्या हालचालीशीं दर्शनी तादात्म्य करून घेतें, आणि या भेदमय हालचालींत जे आकार तयार होतात त्यांतील प्रत्येक आकाराशींहि दर्शनी तादात्म्य करून घेतें. याप्रमाणें भेदाची भिंत उभी करून, स्वतःच्या पूर्ण आत्म्याविषयीं, दुसऱ्या शरीरधारी जाणिवांविषयीं आणि विश्वपुरुषाविषयीं, प्रत्येक आकारांतील जाणीव अज्ञानांत राहील अशी मन व्यवस्था करतें. शरीरधारी मनोमय पुरुषाचे ठिकाणीं जें अज्ञान दिसतें, भौतिक निसर्गांत जी महान् अचेतनता दिसते, त्या दर्शनी अवचेतनतेचें व दर्शनी अज्ञानाचें गुप्त कारण हें मूळ जाणीवशक्तीच्या व मनाच्या उपरिनिर्दिष्ट तादात्म्यरूप तपांत आहे, हें स्पष्ट आहे. आतां आपल्यापुढें प्रश्न आहे तो या एकाग्रतेचा. आत्म्याला आत्मविस्मृत करणाऱ्या, विषयरूप करणाऱ्या, भेदमय

पान क्र. ५०२

 

करणाऱ्या या एकाग्रतेचा, स्वभावधर्म काय, तिचें स्वाभाविक स्वरूप काय हा आतां प्रश्न आहे : या एकाग्रतेंत विश्वरूप चमत्काराचें रहस्य सांठविलेलें आहे.

पान क्र. ५०३









Let us co-create the website.

Share your feedback. Help us improve. Or ask a question.

Image Description
Connect for updates