दिव्य जीवन 1879 pages 1960 Edition
Marathi Translation
  Senapati Bapat

ABOUT

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics, expounding a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth.

THEME

philosophymetaphysics

दिव्य जीवन

Sri Aurobindo symbol
Sri Aurobindo

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.

Sri Aurobindo Birth Centenary Library (SABCL) The Life Divine Vols. 18,19 1070 pages 1970 Edition
English
 PDF    philosophymetaphysics
Sri Aurobindo symbol
Sri Aurobindo

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.

Marathi Translations of books by Sri Aurobindo दिव्य जीवन 1879 pages 1960 Edition
Marathi Translation
Translator:   Senapati Bapat  PDF    LINK

प्रकरण अकरावें

अज्ञानाच्या सीमा

 

      हेंच एक जग, हाच एक लोक आहे. परलोक म्हणून कांहीं नाहीं असा कोणी कोणी दावा करतात.

- कठ उप० २.६

     

      अनंताच्या पोटांत तो पसरलेला आहे... शिर (अतिचेतनता) नाहीं, पाय (अचेतनता) नाहींत असा तो आहे... हीं आपलीं दोन टोकें त्यानें गुप्त, झांकून ठेवलीं आहेत.

- ऋग्वेद ४.१.७, ११

     

      मी ब्रह्म आहे अशी जाणीव ज्याला होते, असते, तो हें सर्व जें आहे तें होतो; एकमेव आत्मा सोडून जो दुसऱ्या कोणत्याहि देवतेची उपासना करतो, आणि ''हा आत्मा वेगळा, आणि मी वेगळा'' अशी कल्पना करतो तो अज्ञान, ज्ञानापासून दूर आहे.

- बृदहारण्यक उप० १.४.१०

     

      हा आत्मा चतुर्विध आहे : चार पादांचा, पायऱ्यांचा, अवस्थांचा आहे : जागृतींतील आत्मा हा त्याचा पहिला पाद होय : हा बहि:प्रज्ञ असतो, बाह्य वस्तूंचा भोग घेतो; स्वप्नांतील आत्मा हा त्याचा दुसरा पाद : हा अंतःप्रज्ञ असतो, सूक्ष्म वस्तूचा भोग घेतो; गाढ झोंपेंतील आत्मा हा त्याचा तिसरा पाद : येथें (जागृतींतील आणि स्वप्नांतील अनेकता जाऊन) एकदा आलेली असते, प्रज्ञा घनीभूत झालेली असते, हा आनंदमय असतो, आनंदाचा भोग घेत असतो; हाच सर्वेश्वर, सर्वज्ञ, सर्वांचें आतून नियमन करणारा असतो; चतुर्विध आत्म्याचा चौथा पाद हा खरा आत्मा होय; या खऱ्या आत्म्याचें ज्ञान करून घेणें आमचें कर्तव्य आहे : हा खरा आत्मा, अदृश्य असतो, त्याचें कांहींहि लक्षण सांगतां येत नाहीं. हा स्वयंसिद्ध एकच एक आत्मा म्हणून आम्हांला खोल अंतरंगांत स्वयंप्रत्यक्ष असतो.

- मांडूक्य उप० श्लोक २ ते ७

पान क्र. ४५४

 

      आमच्या आत्म्याच्या मध्यभागी माणसाच्या अंगठ्याएवढा जाणीवयुक्त पुरुष राहतो; तो भूतकालाचा आणि वर्तमानकालाचा स्वामी आहे : आज तो आहे; उद्यांहि तोच आहे.

- कठ उप० ४.१२,१३

     

      अज्ञान किंवा भेद-अधिष्ठित ज्ञान हें आमच्या मानवी मनाचें स्वरूप आहे, आमच्या मानवी पातळीच्या खालीं जाणिवेचा जो विकास झालेला आहे, त्या विकासांतील सर्व प्रकारची जाणीव आमच्या मनाहून अस्पष्ट अशा स्वरूपांत वर सांगितलेल्या भेद-अधिष्ठित ज्ञानाचीच बनलेली आहे. या भेद-अधिष्ठित ज्ञानाची किंवा अज्ञानाची वाटचाल, धडपड अभेद-अधिष्ठित ज्ञानाच्या दिशेनें चाललेली आहे. अशा या अज्ञानाचें रेखाचित्र, ठळक ठळक रेखांचें असें रेखाचित्र आतां आपल्याला रेखाटतां येऊं शकेल. आम्हांमधील अज्ञान, भेदज्ञान वर्णावयाचें तर असें म्हणतां येईल : अस्तित्व आणि शक्ति यांच्या लहरी आम्हांवर बाहेरून आघात करीत असतात, आमच्या आंतहि अशा लहरी उठत असतात : आमच्या जाणिवेचें घटकद्रव्य या लहरींचेंच असतें; आत्मा आणि तदितर वस्तू, कालांत आणि स्थलांत वावरत आहेत असें मानसिक संवेदन आणि ज्ञान हें रूप, या जाणिवेंतील लहरींना आमच्या ठिकाणीं येतें. काल आम्हांला प्रवाहासारखा भासतो. गतिशील आंदोलनाचा प्रवाह हें कालाचें स्वरूप आम्हांला दिसतें. स्थल किंवा अवकाश (आकाश) हें क्षेत्र, वस्तु भरलेलें, आम्हांसमोर असलेलें क्षेत्र म्हणून आम्हांला दिसतें. कालाचा आंदोलनप्रवाह आणि स्थलांतील वस्तुसंभार हा आमच्या अनुभवासाठीं असतो; विकास पावत असलेली अपूर्ण अशी आमची जाणीव, कालस्थलांतील कर्मप्रवाहाच्या आणि वस्तुसंभाराच्या अनुभवानें वाढत जावी, हा या व्यवस्थेंत निसर्गाचा हेतु असतो. आमचा मनोमन पुरुष कालाबरोबर गतिमान् असतो. नेहमीं वर्तमानकालांत याचें अस्तित्व याला प्रत्यक्ष जाणिवेनें भासत असतें. नित्य वर्तमानकालाचा निवासी असें स्वतःचें स्वरूप मनोमय पुरुषाला प्रत्यक्ष प्रतीतीने दिसतें; याला स्मरणशक्तीची मदत असते. स्मरणानें आत्मविषयक आणि वस्तुविषयक अनुभवाचा कांहीं भाग हा स्वतःजवळ राखून ठेवूं शकतो. स्वभावत: भूतकालांत त्याचा अनुभव वाहून जाऊन त्याला हा पारखा होत असतो; पण स्मृतीमुळें या भूतकालांत वाहून जात राहणाऱ्या आपल्या अनुभवाचा कांहीं भाग वांचवून तो, तो आपल्याजवळ ठेवू

पान क्र. ४५५

 

शकतो. त्याला स्मृतीप्रमाणें विचार, संकल्पशक्ति, कृति यांची मदत असते. या मदतीनें मनाची, प्राणाची, शरीराची जी शक्ति त्याजजवळ असते त्या त्रिविध शक्तीच्या सहाय्यानें स्वतःच्या वर दिलेल्या अनुभवाचा उपयोग करून वर्तमान कालचें आणि भविष्यकालांतील आपलें स्वरूप मनोमय पुरुष बनवितो, बनवीत असतो. या मनोमय पुरुषाच्या वर्तमानकालीन स्वरूपाची रचना त्याच्यांतील अस्तित्वगत शक्तीनें केलेली असते; आणि हीच शक्ति त्याचें भविष्यकालीन स्वरूप विकसित करते आणि ते विस्तृत, व्यापक आणि चिरंजीवी करण्याचें काम करीत असते. आत्मप्रकटनाला उपयोगी पडणारें अनुभवसाहित्य, वस्तुजाताचा मिळालेला अनुभव, पृष्ठभागीय आत्म्याला (मनोमय पुरुषाला) टिकवून धरतां येत नाहीं; हें त्याचें ज्ञान एकांगी, अपूर्ण असें असतें, कालाच्या क्रमवार गतीच्या परिस्थितींत बाह्य आत्मा आपलें असुरक्षित, तुटकें ज्ञान जमवीत असतो -- या ज्ञानाला व्यवस्थित करण्याचें काम या आत्म्याची (मनोमय पुरुषाची) ग्रहणशक्ति, बुद्धि, स्मृति या शक्ती करीत असतात; त्याची अस्तित्वांत टिकून राहण्याची इच्छा हीहि त्याच्या ज्ञानाला व्यवस्थित स्वरूप देण्याच्या कामीं सहाय्यक होते. हें व्यवस्थित केलेलें त्याचें त्रोटक ज्ञान त्याला त्याचें स्वरूप सारखें नवें नवें करण्याच्या कामीं उपयोगी पडतें; जुनें स्वरूप कांहीं भागांत पक्कें करण्याच्या कामीं उपयोगी पडतें. मानसिक, प्राणिक, शारीरिक क्रिया, या ज्ञानाच्या आधारावर तो करतो आणि ही क्रिया तो वर्तमानकालांतील आपलें अंतरंग प्रकट करण्यासाठीं आणि भविष्यकालांतील स्वतःचें स्वरूप निश्चित करून तें घडवून आणण्यासाठीं उपयोगांत आणतो. त्याचे ठिकाणीं अहम्-संवेदना असते. या अहम्-संवेदनेचें केंद्र, ह्या बाह्य मनोमय पुरुषाचा सर्व जाणीवगत अनुभव आणि सर्व शक्ति-व्यय संघटित करण्यास उपयोगी पडतें. निसर्गाचे जे संपर्क ह्या पुरुषाला घडतात, ते त्याच्या मर्यादित जाणीवयुक्त अस्तित्वाच्या क्षेत्रांत घडत असतां, त्यांना उत्तररूप प्रतिक्रिया करण्यासाठी अहम्-संवेदनेचें केंद्र त्याला उपयोगी पडतें. हें केन्द्र नसतें, तर मनोमय पुरुषावर घडणारे संपर्क व संस्कार अव्यवस्थितपणें ढीग घातलेल्या, घरंगळून जात राहणाऱ्या फुटकळ मण्याप्रमाणें भासले असते. या संस्कारांना संघटित स्वरूप आमच्या संवेदनाकेन्द्रामुळें येत असतें. या अहम्‌संवेदन-केन्द्राप्रमाणें मनोमय पुरुषाचे ठिकाणी दुसरें अहम्-कल्पनेचें केन्द्र असतें. बाह्य आत्म्याच्या प्राणिक द्रव्याला संघटित रूप देणारें अहम्‌चें संवेदन-केन्द्र

पान क्र. ४५६

 

आणि त्याच्या मानसिक द्रव्याला संघटित रूप देणारें अहम्-कल्पनेचें केन्द्र हीं दोन केन्द्रें भेदनिष्ठ अहम्‌चीं केन्द्रें होत. हा अहम् बाह्य पुरुषाचे ठिकाणीं खऱ्या आत्म्याचें प्रतिनिधित्व करतो; खरें अस्तित्व भोगणारा चैतन्यरूप खरा आत्मा हा गुप्त असतो, आमच्या अंतरंगांत खोल ठिकाणी असतो. अहम्‌चे केन्द्र हें बाह्य मनोमय पुरुषांत नेहमींच प्रभावी असतें. या पुरुषाचे केवळ स्वार्थपर व्यवहार अहम् प्रभावित असतात असें नाहीं, तर त्याचे परार्थ परोपकारी व्यवहारदेखील अहम्-प्रभावित असतात. त्याचा परार्थ, परोपकारहि स्वार्थपूर्ण असतो. आमचें निसर्गचक्र, प्रकृतिचक्र गतिमान् असतांना त्याच्या गतीला विशिष्ट वळण लावण्यासाठी, ती गति विशिष्ट दिशेनें होत रहावी यासाठीं कृत्रिम अहम्-केन्द्राची योजना असते; खरा आत्मा, खरा चैतन्यपुरुष विकासक्रमानें मनोमय पुरुषाची जागा घेईपर्यंत अहम्-केन्द्राच्या कृत्रिम योजनेची गरज संपत नाहीं आमचा सर्वश्रेष्ठ चैतन्यपुरुष हा चक्रहि असतो आणि गतिहि असतो, आणि गतिमान् चक्र फिरविणारें सुस्थिर केन्द्रहि असतो; तोच केन्द्र, तोच परिघ आहे. असा हा चैतन्यपुरुष आमचे ठिकाणीं उदयास आला, म्हणजे अहम्‌च्या कृत्रिम कामचलाऊ केन्द्राची आवश्यकता संपते आणि मग तो अहम् चैतन्यपुरुषांत विलीन होतो.

      आमच्या एकंदर अस्तित्वाचा तपास घेतां असें दिसून येतें की, आमचा अनुभव जो आम्ही संघटित करून जीवनव्यवहारासाठीं जाणतेपणें उपयोगांत आणतों, तो अनुभव, आमच्या केवळ जागृतीतील वैयक्तिक जाणिवेचा एक अगदी लहानसा भाग असतो. आमचें अस्तित्व अखंड वर्तमानकालांत वावरत असतें -- या अखंड वर्तमानकालीन अस्तित्वांत आमच्या बाह्य पृष्ठगत जाणिवेंत आत्मविषयक आणि वस्तुविषयक मानसिक संवेदना आणि विचार मोठ्या संख्येने येत असतात; या विचारांतील आणि संवेदनांतील फार थोड्या संवेदना आणि विचार आम्ही धरून ठेवतो, धरून ठेवूं शकतो. वर्तमानाचा सारखा भूतकाल होत असतो. भूतकाळाच्या खड्ड्यांत आमच्या धरलेल्या संवेदना आणि विचार-कल्पना सारख्या गडप होत असतात, आमची स्मरणशक्ति त्यांतील कांहीं थोड्या आमच्यासाठीं राखून ठेवू शकते. स्मृतिसंग्रहित ठेव्यापैकीं लहानसा भाग आमची बुद्धि संघटित ज्ञानाच्या रूपाला आणूं शकते आणि बुद्धि जेवढा भाग वापरते त्यापेक्षांहि लहान भाग कृतिशील इच्छाशक्ति कृतीसाठीं वापरते. तेव्हां भौतिक विश्वांत निसर्गाची जी व्यवहार-पद्धति अनुभवास येते तीच आमच्या

पान क्र. ४५७

 

जाणीवयुक्त आत्मरचनेच्या रूपरूपान्तरग्रहणाच्या व्यवहारांत त्याची पद्धति आहे असें दिसतें; म्हणजे उपलब्ध मालांतील अगदीं थोडा माल कामासाठीं निवडावयाचा, पुष्कळसा नापसंत करावयाचा किंवा बाजूला राखून ठेवावयाचा; कद्रुपणा आणि उथळेपणा करावयाचा, साधनसामग्री पुष्कळशी फुकट घालवावयाची (उधळून टाकावयाची), उपयोगांत आणावयासारखी पुष्कळ सामग्री असून तिचा उपयोग करावयाचा नाहीं, राहिलेल्या थोड्या सामग्रीचा खर्च उपयोगासाठीं करावयाचा तो कद्रूपणानें अव्यवस्थितपणें करावयाचा; ही निसर्गाची व्यवहारपद्धति जड भौतिक क्षेत्रांत आणि आमच्या जाणीवयुक्त क्षेत्रांत सारखीच प्रभावी दिसते. पण निसर्गाची दर्शनी उधळपट्टी वगैरे दर्शनीच असते; वस्तुत: निसर्ग कांहींहि फुकट जाऊं देत नाहीं; स्मृति ज्या संवेदन-कल्पना वांचवून राखून ठेवते म्हणून वर सांगितलें त्याखेरीज असणारा संवेदन-कल्पनांचा माल निसर्ग नष्ट होऊं देतो, हें खरें नाहीं, फुकट जाऊं देतो हें खरें नाहीं. जो माल आमची बुद्धि आणि कृतिशील इच्छाशक्ति वापरते, त्याखेरीज बाकीचा माल फुकट घालविला जातो हेंहि खरें नाहीं. जडविश्वांत काय किंवा आमच्या चेतन विश्वांत काय, निसर्ग कांहींहि फुकट घालवीत नाहीं. आमच्या आत्मरचनेंत स्मृतीनें न राखलेल्या संवेदना-कल्पनांचा उपयोग निसर्ग गाजावाजा न करतां करीत असतो. आमची बुद्धि, इच्छाशक्ति ज्या मालमसाल्याचा उपयोग आमच्या वाढीसाठीं वगैरे करीत नाहींत किवा करूं शकत नाहींत तो मालमसालाहि, आमची वाढ घडविण्यांत, आमची कृति घडविण्यांत निसर्ग खर्च करीत असतो. जो संवेदना-कल्पनांचा मसाला याप्रमाणें निसर्ग उपयोगांत आणतो, त्यापेक्षां अधिक मसाला तो बाजूला राखून ठेवून, या सांठ्याचा उपयोग तो वेळोवेळीं करीत असतो. आम्ही सर्वस्वी विसरून गेलेल्या मालाचा हा सांठा असल्याकारणानें आम्हांला त्याचा उपयोग करतांना असा भास होतो कीं, आम्हीं तो नव्यानेंच निर्माण केला आहे; वास्तविक तो आम्ही निर्माण करीत नसतो, निसर्गानें तो अगोदरच राखून ठेवलेला असतो, निसर्ग त्याला विसरत नाहीं, आम्ही मात्र विसरतो व नवा माल नर्माण केल्याच्या, खोट्या कर्तृत्वानें फुगतो. आमचें कर्तृत्व, तयार असलेल्या मालाची जुळवाजुळव करण्यापुरतेंच असतें. असो. पुनर्जन्म हा निसर्गाच्या व्यवस्थेचा एक भाग आहे, हें आपण मान्य करीत असलों तर आमचा झाडून सर्व अनुभव उपयोगी आहे, उपयोगी पडतो हें आम्हांला कबूल

पान क्र. ४५८

 

करावें लागतें. जीवनाची चिरंतन शाश्वत रहाणारी, वाढणारी इमारत घडवितांना निसर्गाला सर्व तऱ्हेच्या सर्व मालाचा उपयोग असतो -- कांहींहि माल तो नापसंत करीत नाहीं; ज्याचा उपयोग संपला आहे आणि भविष्यकालीन जीवनावर ज्याचा केवळ भार होणार आहे, तेवढाच माल निसर्ग बाजूला टाकून देतो, नापसंत करतो. आमच्या पृष्ठगत जाणिवेंत आज काय घडतें त्यावरून निसर्गाच्या व्यवहाराविषयीं मत बनविणें चुकीचें होईल. कारण आम्ही अभ्यास करून निसर्गाचा, प्रकृतीचा व्यवहार समजून घेण्याचा प्रयत्न केला, म्हणजे आम्हांला कळतें कीं, आमच्यांत प्रकृतीची जी वाढ होते, प्रकृतीचें जें कार्य होतें त्या कार्यापैकीं फार थोडें कार्य, त्या वाढीपैकीं फार थोडी वाढ आमच्या जाणिवेच्या क्षेत्रांत येते. आम्हांला न कळताच प्रकृति पुष्कळसें कार्य आमच्या ठिकाणीं करीत असते. आम्हांला न कळतांच प्रकृतीची पुष्कळशी वाढ आमच्या ठिकाणीं होत असते; प्रकृतीच्या जडविषयक व्यवहारांत जाणीवरहित कार्य चालतें व वाढ चालते; तसाच प्रकार मोठ्या प्रमाणांत आमच्या जीवनाच्या क्षेत्रांतहि होत असतो. आमचें आम्हांला थोडेसें ज्ञान आहे; आमच्या अस्तित्वाची, जीवनाची माहिती आम्हांला थोडीशी आहे, आमचें सर्व अस्तित्व, सर्व जीवन आमच्या ज्ञानाच्या आवांक्यांतलें नाहीं, आम्हांला माहीत नाहीं असा आमच्या अस्तित्वाचा व जीवनाचा फार मोठा प्रदेश आहे : आमचें अस्तित्व आणि जीवन सागरासारखें आहे आणि त्याच्यावर क्षणभर तरंगणारा एक बुडबुडा हें आमच्या क्षणिक व्यक्तित्वाचें, जाणीवयुक्त अहम्‌चें खरें स्वरूप आहे.

      आमच्या जागृतींतील जाणिवेंत वरवर शोध केला, तिचें वरवर निरीक्षण केलें, तर हें दिसून येतें कीं, आमच्या वैयक्तिक अस्तित्वाचा आणि जीवनाचा फार मोठा भाग आम्हांला अज्ञात आहे; हा आमचा भाग आमच्या दृष्टीनें अचेतन भाग आहे; वनस्पति, धातु, पृथ्वी, जडतत्त्वें यांचें ''जीवन'' अचेतनाच्या प्रांतांत आहे, तद्वतच आमचें पुष्कळसें अस्तित्व आणि जीवन आमच्या दृष्टीनें अचेतनाच्या प्रांतांत आहे असें, आमच्या जागेपणींचें ज्ञान वरवर निरीक्षिलें असतां, आमच्या लक्षांत येतें. केवळ वरवर न पाहतां खोल अभ्यास करून आमचें ज्ञान वाढविण्याचें आम्हीं ठरविलें, मानसिक प्रयोग आणि निरीक्षण सामान्य मर्यादांच्या पलीकडे आम्हीं नेटानें चालूं ठेवलें, तर आमचें (आमच्या अस्तित्वाचें) जें आम्हांला अचेतन भासणारें, अवचेतन (गुप्तचेतन) भासणारें क्षेत्र आहे तें

पान क्र. ४५९

 

फारच मोठें आहे आणि आमच्या जागृत आत्मजाणिवेच्या क्षेत्रांत आमच्या अस्तित्वाचा फारच लहान तुटका भाग येतो, असें आमच्या नजरेस येतें. आमचें जागृत मन आणि मी, हा आमच्या अंतरीं बुडी मारून बसलेल्या आमच्या आंतर-आत्म्याचा, पुरुषाचा पृष्ठगत दर्शनी भाग आहे; मंदिराचा मोठा भाग महाजलाशयात बुडालेला असावा आणि त्याचा कळस आणि घुमट मात्र पाण्यावर दिसावें तशी आमच्या अस्तित्वाची स्थिति आहे, आमचें जागृत मन व मी, ही दुक्कल त्या घुमट व कळसासारखी आहे आणि त्या मंदिराच्या मुख्य भागासारखा आमचा आंतरपुरुष आहे. या आंतरपुरुषाची अनुभव घेण्याची शक्ति बाह्य 'मी' पेक्षां आणि मनापेक्षां फारच मोठी आहे.

      आंतर गुप्त जाणीव आणि आत्मा (आंतरपुरुष) हा आमचें खरें पूर्ण अस्तित्व होय. बाह्य आत्मा, बाह्य अस्तित्व हें या पूर्ण अस्तित्वाचा केवळ एक दृश्यरूपात्मक भाग आहे, पृष्ठगत व्यवहाराकरिता पूर्ण खऱ्या अस्तित्वाचा कांहीं भाग निवडून तो बाह्य आत्मा म्हणून कामास लावला आहे. वस्तूंचे जे संपर्क आम्हांला (बाह्य आत्म्याला) घडतात त्यांपैकी फार थोडे आम्ही जाणू शकतो; आंतरपुरुष मात्र, जें जें आम्हांला किंवा आमच्या परिसराला स्पर्श करतें किंवा परिसरांत अथवा आमच्यांत शिरतें तें तें सर्व जाणतो; आमच्या अस्तित्वाचा आणि जीवनाचा व्यवहार थोडासा आम्ही जाणूं शकतो; आंतर पुरुषाला इतकें ह्यासंबंधीचें ज्ञान असतें व होतें की त्याच्या नजरेंतून बहुधा कांहींहि सुटत नाहीं, असें आपणांला म्हणतां येईल. आम्हांला ज्या गोष्टी दिसतात व कळतात त्यांपैकीं कांहीं थोड्या आमची स्मरणशक्ति राखून ठेवते आणि स्मरणसंग्रहांत असलेल्या या गोष्टींपैकीं पुष्कळशा गोष्टी आम्हांला जरूर असतात तेव्हां सांपडत नाहींत, उलटपक्षीं आंतरपुरुषाला दिसलेली, लाभलेली कोणतीहि गोष्ट तो विसरत नाहीं आणि त्याला ती केव्हांहि हाताशीं असते. आम्हांला दिसलेल्या गोष्टी आणि आम्ही स्मरणांत ठेवलेल्या गोष्टी यांचा उपयोग करून आम्ही आमचें ज्ञान आणि आकलनबुद्धि संघटित करीत असतो, पण त्यासाठीं आमच्या मानसिक ग्रहणशक्तीला आणि विचारशक्तीला वस्तूंचें स्वरूप व संबंध ओळखण्याचें शिक्षण देऊन तयार करावें लागत असतें. ह्या शक्ती जितपत अशा रीतीनें तयार झाल्या असतील तितपतच, दिसलेल्या आणि स्मरलेल्या गोष्ट त्या उपयोगांत आणू शकतात; या गोष्टीचें अलग अलग खरें स्वरूप आणि त्यांचें परस्परसंबंध

पान क्र. ४६०

 

ओळखणें ही गोष्ट, विशिष्ट शिक्षणक्रमांतून आमची ग्रहणशक्ति व विचारशक्ति जाईल तेव्हांच तिला शक्य होते -- अर्थातच दिसलेल्या, स्मरलेल्या गोष्टींपैकीं फारच थोड्या गोष्टी आम्हांला ज्ञान व आकलनशक्ति संघटित करण्यासाठीं वापरतां येतात. आंतरपुरुषाच्या ग्रहणशक्तीला, विचारशक्तीला शिक्षणाची आवश्यकता नसते; त्याला दिसलेल्या, स्मरलेल्या सर्व गोष्टींचीं रूपें आणि अन्योन्यसंबंध तो बिनचूकपणें जाणतो आणि संग्रहित करतो; वस्तूंचा अर्थ त्याला अगोदर अवगत नसला, तर हा अर्थ समजण्यास त्याला मुळींच वेळ लागत नाहीं वस्तु दिसतांक्षणीं तिचा अर्थ तो ओळखूं शकतो. (हा शेवटचा गुणधर्म आंतरपुरुषाचे ठिकाणीं आहे ही गोष्ट सर्वांना सहज मान्य होईल अशी नाहीं.) आमचीं भौतिक इंद्रियें काय जें थोडें येथें, थोडें तेथें टिपून घेतील तेवढेंच आमच्या जागृत मनाचें पाहणें. आंतरपुरुषाची गोष्ट अगदी वेगळीं, भौतिक इंद्रियांचें जेवढें क्षेत्र आहे त्यापेक्षां आंतरपुरुषाचें दर्शनक्षेत्र फार मोठें आहे; त्याला सूक्ष्म इंद्रियें, इंद्रियशक्ती आहेत. या इंद्रियशक्तींचें क्षेत्र फारच मोठें आहे, त्याच्या मर्यादा ठरविणें सोपें नाहीं. (दूर विचारवाहनाच्या गोष्टी नजरेस येतात त्यावरून आंतरपुरुषाला उपलब्ध असलेल्या सूक्ष्म इंद्रियशक्तींची कल्पना येऊं शकते); आंतरपुरुषाची प्रेरणा आणि बाह्य इच्छेची प्रेरणा यांचा संबंध नीट तपासला गेलेला नाहीं. (आंतरपुरुषाच्या प्रेरणेला कोणी कोणी अचेतनाची किंवा अवचेतनाची प्रेरणा म्हणतात, पण हें म्हणणें बरोबर नाहीं -- आंतरपुरुष हा अचेतन आणि अवचेतन सदरांत येत नाहीं.) या प्रेरणांचा संबंध असामान्य आणि अव्यवस्थित आविष्कारांपुरताच तपासला गेला आहे, रोगट मानवी मनांत ज्या असाधारण दुर्घटना घडतात, त्यांच्या बाबतींतहि आंतर व बाह्य प्रेरणांचा संबंध तपासला गेला आहे. पण एवढी तपासणी या संबंधाची यथार्थ कल्पना येण्यास अगदीं अपुरी आहे; आम्ही जर ही आमची तपासणी योग्य प्रकारें पुढें नेली, तर आम्हांला दिसून येईल कीं, आंतरपुरुषाचें ज्ञान आणि प्रेरणाच आमच्या सर्व बाह्य जाणीवयुक्त व्यवहाराच्या बुडाशीं असतात; आंतरपुरुष गुप्तपणें धडपड करीत असतो; सिद्धि मिळवीत असतो; या धडपडीचा आणि यशाचा कांहीं थोडा भाग आमच्या जीवनाच्या पृष्ठभागावर उमटून येतो, या वर उमटलेल्या भागाला आम्ही आमचा (बाह्य आत्म्याचा) जाणीवयुक्त व्यवहार मानतो, वस्तुत: सर्वच व्यवहार हा आंतर आत्म्याचा असतो. आमच्या आत्म्याचें ज्ञान करून

पान क्र. ४६१

 

घेणें खऱ्या आत्मज्ञानाची प्राप्ति करून घेण्याच्या मार्गांतील पहिलें पाऊल असतें.

      खऱ्या आत्म्याचा शोध लावावयाचें आम्हीं पत्करलें आणि आंतरपुरुषाची आमची कल्पना थोडी विस्तारून आमचें खालच्या पातळीवरचें अवचेतन क्षेत्र आणि वरच्या पातळीवरचें अतिचेतन क्षेत्र -- आंतरपुरुषाच्या खास क्षेत्राचीं दोन्हींकडचीं दोन टोंकें -- आंतर पुरुषाच्या क्षेत्रांत धरलीं, तर आम्हांला असा शोध लागतो कीं, हा आंतरपुरुषच खरोखरी आमच्या दर्शनी, वरच्या, अस्तित्वाचा सर्व मालमसाला पुरवितो; आमच्या वस्तुप्रतिमा, आमच्या स्मृती, आमच्या इच्छाशक्तीच्या क्रिया, आमच्या बुद्धिशक्तीची क्रिया या सर्व गोष्टी हाच आंतरपुरुष आम्हांला पुरवितो; आमच्या वस्तुप्रतिमा वगैरे गोष्टी त्या आंतरपुरुषाच्या वस्तुप्रतिमा वगैरेपैकींच असतात; त्यांतून पुष्कळशा वगळून कांहीं थोड्याशा वर बाह्य अस्तित्वांत प्रकट झालेल्या असतात; आमचा ''मी'' देखील त्याच्या आत्म-जाणिवेचा, आत्म-अनुभवाचा लहानसा पृष्ठगत प्रतिनिधिरूप आकार असतो. आमचें जाणीवयुक्त नानाविध रूपात्मक अस्तित्व हें सागरांतील लहरीप्रमाणें आहे -- आमचें आंतरपुरुषाचें अस्तित्व हा सारखा उसळणारा सागर आणि त्यांतून उठणाऱ्या लहरी म्हणजे आमचें नानाविध रूपात्मक अस्तित्व, अशी वस्तुस्थिति असल्याचें आम्हांला शोधाअंतीं आढळून येतें. या सागराच्या मर्यादा कोणत्या ? या सागराचा विस्तार कोठपर्यंत आहे ? त्याची मूलभूत प्रकृति कोणती ? सामान्यत: आमच्या जागृत पृष्ठभागावर जें नाहीं तें सर्व अवचेतन अस्तित्वांत आम्ही घालतों; पण ''अवचेतन अस्तित्व'' हें नांव सर्व आंतर-आत्म्याच्या अस्तित्वाला तर देतां येत नाहींच, पण त्याच्या बऱ्याच मोठ्या भागालाहि हें नांव लागू पडत नाहीं. अवचेतन म्हटलें कीं, अंधुक अचेतनता, अर्धचेतनता, आमच्या जागृत, संघटित चेतनतेच्या खालची, खालच्या दर्जाची, आंत दबलेली चेतनता -- असा आम्ही अर्थ घेतो; ही दबलेली चेतनता आमच्या जागृत चेतनेहून कमी स्वायत्तता भोगणारी असते असा आमचा अर्थ असतो. पण आम्ही आंत गेलों म्हणजे आंतरपुरुषाच्या अस्तित्वाच्या एका भागांत आम्हांला आमच्या पृष्ठगत जाणिवेहून, रोजचें तासानुतासाचें जीवन बघणाऱ्या जाणिवेहून, पुष्कळच अधिक व्यापक, पुष्कळच अधिक प्रकाशमय, पुष्कळच अधिक स्वायत्त आणि वस्तुस्वामित्वयुक्त जाणीव आमच्या प्रत्ययास येते; या जाणिवेचें आंतरअस्तित्व म्हणजे आमचा आंतरपुरुष असें आम्हीं लक्षांत ठेवलें पाहिजे;

पान क्र. ४६२

 

आणि ''अवचेतन'' हें नांव आम्हीं आमच्या प्रकृतीच्या गुप्त, अगदीं खालच्या दर्जाच्या प्रांतासाठीं राखून ठेवलें पाहिजे. (आंतरपुरुषाच्या अस्तित्वाचा सर्वच प्रांत वर सांगितल्याप्रमाणें आमच्या जागृत जाणिवेहून व्यापक, प्रकाशमय, स्वायत्त नसतो -- त्यांतील कांहीं भाग अज्ञानमय, अंधकारमय असतो हेंहि आपण विसरूं नये.) याप्रमाणें अवचेतन आणि आंतरपुरुष यांच्या प्रांतांची व्यवस्था सांगितल्यानंतर आणखी एक गोष्ट सांगावयाची ती ही कीं, आमच्या एकंदर अस्तित्वांत ''अतिचेतन'' म्हणून एक भाग आहे. या भागांत आमचा खरा उच्चतम आत्मा आम्हांस सांपडतो; हा अतिचेतन प्रांत आमच्या प्रकृतीचा गुप्त, उच्चतर प्रांत आहे.

      आतां, अवचेतन ज्याला म्हणतात त्या प्रांताची व्यवस्था विस्तारानें पाहूं. अवचेतन प्रांत सुरू कोठें होतो ? आमचें पृष्ठगत अस्तित्व आणि अवचेतन ह्यांचा संबंध कसा असतो ? आंतरपुरुषाशीं त्याचा संबंध कसा असतो ? आंतरपुरुषाच्या प्रांतांत अवचेतनाचा प्रांत थोडाबहुत समाविष्ट होतोसा दिसतो, पण ह्या दोघांचा खराखुरा संबंध कोणत्या प्रकारचा असतो ? हें पाहणें आवश्यक आहे. आम्ही आमचें शरीर जाणतो, म्हणजे आम्हांला शरीर आहे हें आम्ही जाणतों, भौतिक अस्तित्व आम्हांला आहे हें आम्ही जाणतों; ह्या अस्तित्वाशीं आम्ही बहुतांशीं तद्‌रूपहि होतों, तरी ह्या शरीराच्या भौतिक अस्तित्वाच्या बहुतेक क्रिया आमच्या मनोमय पुरुषाच्या जाणिवेच्या बाहेर -- खालीं अवमनस्क (अवमानसिक) अशा असतात, आमचें मन त्यांत कांहीं भाग घेत नाहीं इतकेंच नव्हे, तर आमची अशी समजूत असते कीं, त्या गुप्त भौतिक क्रियांचें ज्ञान आमच्या भौतिक अस्तित्वालादेखील नसतें; आमच्या भौतिक अस्तित्वाला त्याच्या स्वतःच्या अस्तित्वाचेंहि ज्ञान स्वतःच्या शक्तीनें होत नाहीं, अशीहि आमची समजूत आहे; अंतःकरणाच्या संवेदनेनें आणि बुद्धीच्या निरीक्षणानें जेवढ्या अस्तित्वाच्या भागावर प्रकाश पडतो, तेवढाच अस्तित्वाचा भाग भौतिक अस्तित्वाला ज्ञात होऊं शकतो, निदान भासमान होऊं शकतो अशी समजूत असते. आमच्या शरीरांत प्राणशक्ति काम करीत आहे हें ज्ञान आम्हांला आहे; वनस्पतींमध्यें, खालच्या दर्जाच्या प्राण्यांमध्यें जशी प्राणशक्ति असते, तशीच आमच्यामधील प्राणशक्ति आहे हें आम्ही ओळखतों; आम्हांला प्राणमय अस्तित्व आहे हें आम्ही जाणतो : हें अस्तित्व बहुतांशीं आमच्या मानसिक जाणिवेच्या बाहेर, अवमानसिक असें असतें, या अस्तित्वाचा कांहीं थोडा भाग, या अस्तित्वाच्या कांहीं

पान क्र. ४६३

 

थोड्या हालचाली आणि प्रतिक्रिया मात्र आमच्या मनाला समजतात, विदित होतात. प्राणमय अस्तित्वाच्या ज्या क्रिया आम्हांला ज्ञात होतात, त्या विशेषत: बिघडलेल्या प्रकृतीच्या असतात; प्राणमयाच्या गरजा आम्हांला जाणवतात; त्याची तृप्ति आमच्या जाणिवेंत विशेष स्पष्टपणें येत नाहीं; त्याच्या रोगांची, बिघाडाची जाणीव आम्हांला तीव्रतेनें होते; त्याची निरोगिता, नियमित तालबद्ध गति आम्हांला विशेष भासतहि नाहीं; त्याचें जीवन आम्हांला स्पष्टपणें जाणवत नाहीं; त्याचें मरण मात्र फार बोंचतें; आम्ही जाणीवयुक्त रीतीनें जेवढे प्राणमय अस्तित्व पाहूं शकतों, उपयोगांत आणू शकतों तेवढेंच आम्हांला नीट कळतें, जें प्राणमय अस्तित्व, दुःख, सुख, इतर वेदना, संवेदना आमच्यासमोर उभें करतें तेंहि आम्ही ओळखतो; नाड्यांची, स्थूल शारीर अवयवांची प्रक्षोभाची अवस्था व प्रतिक्रिया ज्या प्राणिक अस्तित्वामुळें घडून येते, तेंहि प्राणिक अस्तित्व आमच्या मनाला समजतें; पण याहून वेगळें जें प्राणिक अस्तित्व तें आमच्या जाणिवेच्या टप्पाच्या बाहेर असतें. या कारणानें आमची अशी समजूत होते कीं, जो प्राणिक (आणि शारीरिक-प्राणिक) अस्तित्वाचा भाग आमच्या जाणिवेच्या कक्षेंत येत नाहीं, तो भाग स्वतःच्या क्रिया देखील नेणिवेनें करीत असतो; त्याचे ठिकाणीं वनस्पतीसारखी दबलेली जाणीव किंवा नेणीवच असते किंवा प्राथमिक जीवाप्रमाणें अगदीं प्राथमिक अशी अंधुक अंधुक जाणीव असते; त्याचे ठिकाणीं स्वतःची जी जाणीव निर्माण होते ती, आपलें मन आणि बुद्धि त्यावर प्रकाश पाडते, त्याला निरीक्षणाचा विषय करते त्यामुळें आणि तेवढ्यापुरतीच, निर्माण होते.

      शारीरिक, प्राणिक किंवा प्राणिक-शारीरिक अस्तित्वाला स्वतःची, स्वत: करीत असलेल्या क्रियांची जाणीव नसते, असा जो वाद आहे तो, आम्ही जाणीव आणि मन, मानसिक जाणीव यांचा घोटाळा करीत असतो, म्हणून सत्यच होतो. जाणीव म्हणजे मानसिक जाणीव हें आमचें समीकरण चुकीचें आहे. भौतिक शरीर आणि भौतिक प्राणमय अस्तित्व यांच्या ज्या खास हालचाली असतात, त्यांच्याशीं मन कांहीं मर्यादेपर्यंत तद्रूप होऊन त्या हालचाली आपल्याशा करून टाकते, आणि त्यामुळें जाणीव तेवढी सारी मानसिकच असते, असा भास उत्पन्न होतो. परंतु शारीरिक हालचालींपासून मन हें साक्षी म्हणून वेगळें, दूर ठेवलें तर आपल्या नजरेस येतें कीं, अगदीं भौतिकाचा कळस ज्यांत आहे अशा

पान क्र. ४६४

 

जीवनाच्या (प्राणाच्या) हालचालींत, शरीर, प्राण, यांत त्यांची त्यांची खास अशी जाणीव आहे, प्राथमिक जीवजंतूंना जशी असते तशी जाणीव आहे; एवढेंच कीं, आम्हांमध्यें या जाणिवेंत मनाचा अंशत: प्रवेश झाला आहे आणि म्हणून तिला मानसिक जाणिवेचें स्वरूप तेवढ्यापुरतें प्राप्त झालें आहे. शरीर, प्राण जेव्हां स्वतंत्ररीत्या गतिमान होतात, क्रिया करतात तेव्हां, आम्हांला जशी मानसिक जाणीव आहे, तशी जाणीव त्यांना नसते; मन त्यांच्या पोटांत लपलेलें असतें, सुव्यवस्थित अशी आत्मजाणीव, शुद्ध शारीर, प्राणिक क्रियांत नसते; केवळ क्रिया-प्रतिक्रिया यांची संवेदना, तसेंच हालचाल, प्रेरणा आणि वासना, भूक, सहजभावना, दुःख, सुख यांचीं संवेदना, बधिरतेची संवेदना या गोष्टी शुद्ध शारीर व प्राणिक हालचालींत दिसून येतात. याप्रमाणें प्राणिक, शारीरिक अस्तित्वांत जाणीव जी असते, ती मनाहून खालच्या दर्जाची असते; अंधुक मर्यादित, आपोआप कृति करणारी अशी ती असते -- तिला अवमानसिक जाणीव म्हणतां येईल; कारण ती आमच्या मानसिक जाणिवेइतकी स्वायत्त असत नाहीं. अर्थात् तिला आमच्या अस्तित्वाचा अवचेतन भाग म्हणणें मात्र बरोबर नाहीं. त्या जाणिवेपासून मन दूर केलें, म्हणजे ती जाणीव नाडीगत जाणीव आहे, अर्थात् शुद्ध भौतिक शारीरिक किंवा प्राणिक जाणीव आहे असें आपणांस स्पष्टपणें दिसतें -- ही जाणीव ऐंद्रिय संवेदनात्मक जाणीव असते; हिच्या द्वारां विचार न करतां निसर्गाला काम करून घेतां येतें; स्वयंगतिक, स्वयंचलित, स्वयंकार्यकारी अशी ही जाणीव असते; संपर्क घडला कीं, ही जाणीव प्रतिक्रिया करते; या प्रतिक्रिया मनाच्या प्रतिक्रियेहून वेगळ्या आणि स्वतंत्र असतात; मनाची वस्तुग्रहणशक्ति आणि उत्तर देण्याची शक्ति यांजवर ही नाडीगत प्रतिक्रिया कांहीं अवलंबून नसते -- जाणिवेची ही एक स्वतंत्र पातळी आहे : मनाची जाणिवेची पातळी वेगळी आणि ही भौतिक, प्राणिक जाणिवेची पातळी वेगळी. या प्राणिक, शारीरिक (अवमानसिक) जाणिवेहून खरी अवचेतन जाणीव ही वेगळी असते. खरी अवचेतन जाणीव ही मानसिक, अवमानसिक जाणिवेच्या खालच्या सीमाप्रांतांत हालचाल करणारी अचेतन ''जाणीव'' असते; या कंपनशील अचेतनतेंतून अथवा अवचेतन जाणिवेंतून तिच्या कंपनांचा थवा वर फेंकला जात असतो -- या कंपनांचें रूपांतर मानसिक जाणिवेच्या घटकांत व्हावयाचें असतें, होत असतें; आमच्या पृष्ठगत मानसिक जाणिवेंत जे संस्कार सारखे होत असतात ते

पान क्र. ४६५

 

भूतकालीन होऊन या अवचेतनाच्या प्रांतांत उतरतात. आमच्या गत अनुभवाचे संस्कार अवचेतनांत सांठविले जातात; आमच्या जाणीवशून्य संवयीचीं बीजें या अवचेतनांत सांठविलेल्या संस्कारांत असतात; अवचेतन जाणीव, हे बीजरूप संस्कार वर पृष्ठगत जाणिवेकडे पाठविते, सारखे पाठवीत असते; पण हा व्यवहार अव्यवस्थितपणें चाललेला असतो. पुष्कळसा अर्थशून्य किंवा भयंकर माल याप्रमाणें अवचेतनांतून वर येत असतो; या मालाचें मूळ आम्हांला कळत नाहीं. स्वप्नामध्यें, सर्व प्रकारच्या यांत्रिक पुनरुक्तींमध्यें, आकस्मिक प्रेरणांमध्यें, अकारण हेतूंमध्यें, मानसिक, प्राणिक, शारीरिक प्रक्षोभांमध्यें व बंडांमध्यें, आमच्या प्रकृतीच्या अंधकारमय भागांत उठणाऱ्या मूळ स्वयंगतिक आकांक्षांमध्यें आणि निकडींच्या गरजांमध्यें अवचेतनांतून अव्यवस्थितपणें वर फेकल्या जाणाऱ्या या संस्कारांचा प्रत्यय आम्हांला येत असतो.

      अवचेतन प्रांत कसा असतो याची कल्पना याप्रमाणें दिल्यानंतर हें सांगणें अवश्य आहे कीं, आंतर आत्मा तपासल्यास त्यांत या अवचेतनाचीं लक्षणें बिलकुल सांपडत नाहीत; मन, प्राणशक्ति, सूक्ष्म भौतिक (शारीरिक) स्वच्छ वस्तुसंवेदना या गोष्टी पूर्णतया आंतर पुरुषाचे ठिकाणीं असतात; आमच्या जागृत पुरुषाच्या ठिकाणीं ज्या शक्ती आहेत, त्या सर्व आंतर पुरुषाच्या ठिकाणीं आहेत. मात्र आंतर पुरुषाच्या या शक्ती जागृत बाह्य पुरुषापेक्षां अधिक व्यापक, अधिक विकसित, अधिक प्रभुत्वयुक्त आहेत; त्याचे ठिकाणीं सूक्ष्म संवेदनशक्ति आहे, वस्तुचित्र घेण्याची शक्ति आहे, व्यापक स्मृति आहे, निवडानिवडीची तीक्ष्ण बुद्धि आहे : आमच्या मनालाहि या शक्ती कमी विकसित अवस्थेंत आहेत -- पण मनाला नसणाऱ्या शक्तीहि आंतर पुरुषाचे ठिकाणीं आहेत, हा त्याचा खास विशेष आहे. या पुरुषाला साधनाशिवाय प्रत्यक्ष ज्ञानाची शक्ति आहे, त्याचा आत्मा स्वतःविषयीं निरीक्षणादि क्रिया करीत असला किंवा वस्तुविषयक निरीक्षणादि करीत असला, तरी दोन्हीहि प्रसंगीं त्याला सर्व गोष्टींचें प्रत्यक्ष ज्ञान होऊं शकतें; आणि म्हणून त्याला ज्ञान अविलंबानें, त्वरित होऊं शकतें. त्याची कर्तृत्वशक्ति (इच्छाशक्ति) वेगानें यशस्वी क्रिया करूं शकते; वासनांचा प्रेरणांचा थांगपत्ता त्याला अगदीं खोलवर लागतो आणि त्यांची तृप्ति त्याला खोलवर करतां येते. आमचें पृष्ठगत मन हें, खरें मनपण असलेली वस्तु आहे, असें म्हणणें धाडसाचें होईल. त्याला खरें मन म्हणतांना संकोचच वाटतो; कारण, शरीर, शारीर

पान क्र. ४६६

 

जीवन, नाडीसंघाच्या आणि शारीर अवयवांच्या संकुचित मर्यादा यांच्या बंधनांत हें आमचें पृष्ठगत मन कायमचें पडलेलें आहे. या उपाधी त्याच्या गतीला, कृतीला कायम अडथळा करणाऱ्या आहेत : या उपाधींच्या दडपणामुळें, दबावामुळें त्याची गति सारखी कुंठित होत असते. उलटपक्षीं आंतर आत्म्याची मानसिक शक्ति या मर्यादांना, उपाधींना न जुमानणारी आहे; स्थूल शारीर मन, स्थूल शारीर अवयव आणि त्यांची क्रिया आंतर पुरुषाला (त्याच्या खऱ्या मनाला) विदित असते, उपयोगी पडते; पण या मनाहून, अवयवांहून त्याची ज्ञानशक्ति, क्रियाशक्ति फार अधिक असते; वस्तुत: या मनाचें आणि अवयवांचें जनकत्व मोठ्या प्रमाणांत आंतर पुरुषाकडे (त्याच्या खऱ्या मनाकडे) असतें. या आंतर पुरुषाला अवचेतन म्हणावयाचें तर या अर्थानें म्हणतां येईल कीं, आपलें सर्व स्वरूप किंवा स्वरूपाचा मोठा भाग तो पृष्ठगत आत्म्याप्रमाणें दृश्य करीत नाहीं, आपले बहुतेक स्वत्व पृष्ठगत न करतां पडद्याआड ठेवतो, नेहमींच पडद्याआड राहून तो काम करतो; त्याला अवचेतन म्हणण्यापेक्षां गुप्त आंतरचेतन आणि परिचेतन म्हणणें शोभेल; कारण बाह्य प्रकृतीला त्याचा आधार असतो, एवढेंच नव्हे, तर त्या प्रकृतीला बाहेरून चोहोंबाजूंनीं तो व्यापून असतो आणि बाह्य आत्म्याच्या (मनोमय पुरुषाच्या) दृष्टीनें आंत राहून काम करतो (बाह्य आत्म्याला आधार देतो) हें जें वर्णन आहे तें आंतर पुरुषाच्या विशेष खोल असणाऱ्या अस्तित्वाला सर्वांत अधिक लागूं पडतें; या आंतर पुरुषाचे, आमच्या बाह्य पुरुषाच्या जवळ जवळ असणारे, जे भाग आहेत त्यांत खोल असलेल्या भागांहून अधिक अज्ञानमय कार्य घडत असतें; जे कोणी स्वत:च्या आंत प्रवेश करतात आणि बाह्य पुरुषाला लागून आंत असलेल्या ज्या भागांत संघटना कमी आहे अशा भागापर्यंतच पोचतात, खऱ्या आंतर पुरुषाच्या आणि पृष्ठगत पुरुषाच्या मध्यें जी व्यवस्थाशून्य अराजकाची जागा आहे त्या जागेंतच जे थांबतात, त्यांचा अर्थांतच फार गोंधळ उडतो, त्यांना फार भ्रमांत पडावें लागतें; पण हा भाग देखील अवचेतनाच्या गुणधर्माचा असत नाहीं, अज्ञानाच्या गुणधर्माचा असतो. अचेतन क्षेत्र आणि हीं त्याच्यावरचीं मध्यवर्ती क्षेत्रें यांच्यांत स्पष्ट भेद आहे : या मध्यक्षेत्रांतील गोंधळ आणि अचेतन-अवचेतनांतील गोंधळ यांची जात एक नाहीं, हें लक्षांत ठेवणें योग्य आहे. आमच्या एकंदर अस्तित्वाचे तीन घटक आहेत, असें वरील विवेचनावरुन म्हणतां येतें : एक घटक अवमानसिक आणि अवचेतन प्रांत,

पान क्र. ४६७

 

हा प्रांत आम्हांला अचेतनवत् भासतो; आमच्या अस्तित्वाचा भौतिक जड पाया या प्रांतांत येतो, आमच्या जीवनाचा (प्राणमय अस्तित्वाचा) आणि शरीराचा मोठा भाग या प्रांतांत येतो; दुसरा घटक आंतर पुरुषाचा प्रांत. आंतर मन, प्राण, शरीर, आणि या सर्वांचा आधार असणारा आत्मा किंवा चैत्य पुरुष या दुसऱ्या प्रांतांत येतात; तिसरा घटक आमची जागृत जाणीव, आंतर पुरुष आणि अवचेतन अस्तित्व यांतून ही जागृत जाणीव वर पृष्ठभागावर येते; ही जाणीव त्या गुप्त खळबळणाऱ्या जलाशयावरील लहरीसारखी असते. आमच्या अस्तित्वाचा हा हिशोबहि अपुराच आहे : आमच्या सामान्य आत्मजाणिवेच्या मागें, खोल, खालीं आमचें अस्तित्व जसें पसरलें आहे, तसें तें आमच्या सामान्य आत्मजाणिवेच्या वरतीं उंच प्रदेशीं पण पसरलें आहे. हा वरचा प्रदेश आमच्या खऱ्या आत्म्याचा प्रदेश आहे. आंतर पुरुष हा ज्ञान-अज्ञानमय पुरुष आहे. त्याला आमच्या जागृत मनाहून खूप अधिक प्रकाश, सामर्थ्य, व्यापकता आहे, पण तो कांहीं आमचें सर्वोच्च अस्तित्व नव्हे, आमच्या अस्तित्वाचें सारसर्वस्व नव्हे, आमच्या अस्तित्वाचें अंतिम रहस्य नव्हे; तो वर सांगितल्याप्रमाणें ज्ञान-अज्ञानाच्या प्रांतांतला असाच आमच्या एकंदर अस्तित्वाचा घटक आहे. वर आमच्या अस्तित्वाचे जे तीन घटक सांगितले त्या घटकांच्या जाणिवेपलीकडे असलेला असा आमच्या अस्तित्वाचा अतिचेतन प्रांत, आमच्या विशिष्ट प्रसंगींच्या अनुभवाचा विषय होत असतो -- हा आमच्या खऱ्या आत्म्याचा प्रदेश होय. या उच्च प्रांताप्रमाणें आम्हांला एका उच्चतम वस्तूचाहि अनुभव येतो; ही वस्तु वरील सर्व प्रांतांचा आधार असून त्याच्या पलीकडे तिचें अस्तित्व आहे. या सर्वोच्च सर्वश्रेष्ठ वस्तूला, सद्‌वस्तूला आम्ही माणसें चैतन्य, ईश्वर, परमात्मा अशीं नांवें देतो; तिचें स्पष्ट ज्ञान आम्हां सामान्य मानवांना नसतें. अतिचेतन प्रांतांतून आम्हां सामान्य मानवांच्या जीवनांत मधून मधून कांहीं गोष्टी अकस्मात् येतात; आमचें जें सर्वोच्च अस्तित्व व जीवन, त्याचा ओढा या अतिचेतन प्रदेशाकडे असतो, तसाच तो या प्रदेशाच्याहि पलीकडे असणाऱ्या आणि या प्रदेशाला आधारभूत होणाऱ्या सर्वश्रेष्ठ चैतन्याकडेहि असतो. तेव्हां आमच्या अस्तित्वाच्या एकंदर प्रदेशांत जसा अवचेतन प्रदेश आहे, अचेतन प्रदेश आहे, तसा अतिचेतन प्रदेशहि आहे -- आमचा जागृत आत्मा आणि आमचा आंतर आत्मा यांना हा अतिचेतन प्रदेश चोहोंबाजूंनीं व्यापून आहे. त्यांच्या मर्यादांच्या वर उंच या प्रदेशाचें

पान क्र. ४६८

 

सर्वसमावेशक स्वरूप विशिष्ट प्रसंगीं अनुभवास येतें -- आम्हां सामान्य मानवांना हा प्रदेश अज्ञात आहे. आम्हांला तो अप्राप्य भासतो, त्याच्याशीं कांहीं संबंध ठेवतां येईल अशी शक्यता दिसत नाहीं.

      आमचें ज्ञान वाढलें म्हणजे वर ईश्वर, परमात्मा म्हणून वर्णिलेलें सर्वश्रेष्ठ चैतन्य आमचा स्वतःचाच आत्मा आहे, सर्वोच्च सर्वांतर सर्वाधिक विस्ताराचा आमचा स्वतःचा आत्मा आहे, हें आम्हांला कळतें. तो त्याच्या सर्वोच्च स्थानीं आमच्या प्रत्ययास येतो, त्याचें प्रतिबिंब आमच्या अंतरंगांत प्रत्ययास येतें. त्याचे स्वरूप ''सच्चिदानंद'' हें आहे; आमची निर्मिति त्यानें केली आहे; आमचें विश्व त्यानें निर्मिलें आहे; या निर्मितीच्या कार्यांत त्यानें आपल्या दिव्य ज्ञानयुक्त इच्छाशक्तीचा उपयोग केला आहे व आजहि तिचा उपयोग तो करीत आहे; ही शक्ति आध्यात्मिक शक्ति आहे. अतिमानसिक, सत्य-जाणिवेची, अनंत अशी शक्ति आहे. हें सर्वश्रेष्ठ चैतन्यच खरें अस्तित्व, खरा पुरुष आहे. सर्वांचा स्वामी आहे, स्रष्टा आहे; हाच विश्वात्मा होऊन, मन, प्राण, जडतत्त्व यांत लपून, ज्याला आम्ही अचेतन तत्त्व म्हणतो त्यांत उतरला आहे; तो आपलें अचेतन आणि अवचेतन अस्तित्व आपल्या अतिमानसिक ज्ञान आणि इच्छाशक्ति यांच्या सामर्थ्यानें बनवितो आणि त्या अस्तित्वाला मार्गदर्शन पण करतो; अचेतनांतून तो वर आलेला आहे, आंतर पुरुषांत तो वास करीत आहे. या पुरुषाचें अस्तित्वहि त्यानें आपल्या ज्ञानयुक्त इच्छाशक्तीनेंच बनविलें आहे आणि त्या अस्तित्वाला पण त्याचेंच मार्गदर्शन आहे; आंतर पुरुषांतून आमचें पृष्ठगत अस्तित्व तोच वर फेंकतो; या अस्तित्वाच्या पोटींहि तोच गुप्तपणें वास करतो आणि आमच्या या पृष्ठगत पुरुषाच्या चांचपडत, अडखळत घडणाऱ्या हालचालींवर तो वर सांगितलेल्या सर्वश्रेष्ठ ज्ञानयुक्त इच्छाशक्तीनें, स्वामित्वसुलभ प्रभावानें परिणामकारक नजर ठेवीत असतो, देखरेख करीत असतो, त्या हालचालींतील उणीव भरून काढीत असतो, दोष दूर करीत असतो. अवचेतन अस्तित्व आणि आंतर (तलवर्ती) अस्तित्व हें सागरासारखें आहे असें मानलें, तर आपलें पृष्ठगत मानसिक अस्तित्व हें या सागरांतून वर उठलेल्या, सागरानें वर फेंकलेल्या लहरीसारखें आहे, आणि अतिचेतन अस्तित्व हें आकाशासारखे (ईथर सारखें) आहे. हें अतिचेतनरूप आकाशतत्त्वच, सागर आणि त्यावरील लहरी, तसेंच सागराच्या आणि लहरींच्या हालचाली यांत भरलेलें आहे. या सागराला आणि त्याच्या

पान क्र. ४६९

 

लहरींना आपल्या पोटांत हें आकाशतत्त्व सामावून घेत आहे. या सागरावर व लहरींवर या आकाशतत्त्वाचेंच आच्छादन आहे, हें आकाशतत्त्वच या सागराच्या आणि लहरींच्या पोटांत वास करीत आहे आणि त्यांच्या सर्व हालचालींचे स्वरूप तेंच निश्चित करीत आहे. हें जें अतिचेतनरूप उच्च आकाशतत्त्व आहे, त्या आकाशतत्त्वांत प्रविष्ट होऊनच आम्हांला आमच्या खऱ्या आत्म्याची जाणीव होते; तेथें ही जाणीव स्वाभाविक असते, अपरिहार्य असते. येथें खालच्या पातळीवर आम्ही आहोंत तोंवर, आमच्या शांत झालेल्या मनांत या आत्म्याचें प्रतिबिंब आम्ही पाहूं शकतो, एवढेंच. प्रयत्नानें, साधना करून, आमच्यांत जो गूढ पुरुष आहे त्यांचें ज्ञान मिळविल्यानेंहि आम्हांला आत्म्याचे दर्शन आमच्या अंतरीं घडूं शकतें; अतिचेतनाच्या तत्त्वांतून जाऊनच आम्हांला सर्वश्रेष्ठ अवस्था, सर्वोच्च ज्ञान, सर्वोत्तम अनुभूति प्राप्त करून घेतां येते. आमचें हें जें अतिचेतन अस्तित्व आहे, ज्याच्यामधून जाऊन आम्हांला आमचा खरा आत्मा जो सर्वश्रेष्ठ चैतन्य त्याच्या अवस्थेप्रत पोंचतां येतें, त्या अतिचेतन अस्तित्वाची सामान्यतः आम्हांला आमच्या इतर अस्तित्वापेक्षांहि कमी जाणीव असते. त्यासंबंधाचें आमचें अज्ञान आमच्या इतर अस्तित्वासंबंधींच्या अज्ञानापेक्षां सामान्यत: अधिक असतें. पण वस्तुस्थिति अशी आहे कीं, अचेतनांत गडप झालेलें आमचें अस्तित्व, जें विकासक्रमानें वर येत आहे आणि सारखें वर वर जाण्यासाठीं धडपडत आहे, त्याचा, त्याच्या विकासाच्या धडपडीचा उद्देश, आमच्या या अतिचेतन अस्तित्वाचें ज्ञान प्राप्त करून घेणें हाच आहे. आमचें सर्वप्रथम महत्त्वाचें, आमच्या सर्व अज्ञानाच्या शिरोभागीं असणारें आमचें अज्ञान म्हणजे, आमच्या पृष्ठगत अस्तित्वाची ही कोंडी, ही मर्यादा, आमच्या सर्वोच्च, सर्वांतर आत्म्यासंबंधानें त्याचें ठिकाणी असलेलें अज्ञान होय.

      आम्ही बाह्य पृष्ठगत अस्तित्व भोगतो, तें अस्तित्व कालांकित, कालगत असें नामरूपात्मक अस्तित्व असतें; हें जें आमचें कालांकित अस्तित्व, त्या अस्तित्वांतील एक भाग म्हणजे आमचें पृष्ठगत मन आहे. (आम्ही या मनालाच ''आमचा आत्मा'' म्हणत असतों) हें पृष्ठगत मन, त्याचा लांबलचक भूतकाळ व लांबलचक भविष्यकाळ जाणत नाहीं; त्याला केवळ त्याचें लहानसें त्याच्या स्मरणांत रहाणारें जीवन ठाऊक असतें; या लहानशा जीवनाचा पुष्कळसा भाग पृष्ठगत मनाला पहावयास मिळत नाहीं; आणि पहावयास मिळालेल्या पुष्कळशा भागाचें त्याच्या स्मृतींतून उच्चाटन

पान क्र. ४७०

 

होत असतें; म्हणजे लहानशा जीवनाचाहि फार थोडा भाग पृष्ठगत मनाला ज्ञात असतो. आमचा विश्वास या गोष्टीवर सहज बसतो कीं, जड शरीराच्या जन्माबरोबर आम्ही जन्मास आलों आणि जड शरीर मरण पावतांच आम्ही मरणार -- काय थोडीशी शारीरिक हालचाल या जन्मांत आम्ही करतों ती संपली कीं आम्ही संपतों. आमचें जड शरीर आणि या शरीरावर अवलंबून असणारा शारीर प्राण आणि शारीर मन हें सर्व मरणाचें भक्ष्य होतें हें खरें आहे -- कारण यांना जन्म आहे, जन्मतांना यांची रचना होत असते, मरणानें ती संपते, नष्ट होते. पण आमचें खरें कालांकित, कालगत, नामरूपात्मक अस्तित्व जड शरीराबरोबर जन्मणारें आणि त्या शरीराबरोबर मरणारें नसतें. विश्वांत आमचा खरा आत्मा आहे, तो अतिचेतन जाणिवेचा आहे; आंतर पुरुष हा अतिचेतन आत्माच बनत असतो; आमचा दृश्य पृष्ठगत आत्मा म्हणून जो आहे, तोहि आमच्या खऱ्या आत्म्यानें आपल्या सागरासारख्या आंतर पुरुषरूप अस्तित्वांतून वर फेंकलेला असतो, त्याला मर्यादित अल्पकाळापुरतें काम दिलेलें असतें; जन्म आणि मरण यांच्या मधला काळ त्यानें काम करावयाचें असतें; अचेतन निसर्गाचा भाग असलेल्या विश्वाच्या घटकद्रव्याच्या साहाय्यानें मूळ अस्तित्वाला खरा आत्माच जाणीवयुक्त, रूपात्मक अस्तित्वाचें स्वरूप देत असतो. हें स्वरूप म्हणजे आमचा आजचा अल्प जीवन जगणारा व मरणारा बाह्य पृष्ठगत आत्मा होय. आम्ही वस्तुत: खरें अस्तित्व आहों, एका जन्माच्या समाप्तीनें हें खरें अस्तित्व समाप्त होत नाहीं; नाटकांत काम करणारा नट, त्याची एक भूमिका संपली म्हणजे संपत नाहीं; कवि एक कविता संपवली कीं स्वत: संपत नाहीं; आमची मर्त्य व्यक्तिता या नटाच्या भूमिकेप्रमाणें असते, कवीच्या कवितेप्रमाणे असते, आमच्या खऱ्या आत्म्याला स्वतःच्या स्वरूपाचें आविष्करण करावयाचें आहे, तें आविष्करण अंशत: जन्ममरणवश पृष्ठगत आत्म्याच्या द्वारां तो करीत असतो; आमचा आत्मा, चैत्य पुरुष या पृथ्वीवर अनेक मानवी शरीरें धारण करतो, अनेक जन्म घेतो ही उपपत्ति मान्य करा वा न करा, ही गोष्ट सर्वथा खरी आहे कीं, आमचें कालांकित, कालगत, नामरूपात्मक अस्तित्व एका जन्मापुरतें नाहीं, त्याला फार मोठा भविष्यकाळहि आहे. कारण अतिचेतन आत्मा कालाच्या थोड्याशा क्षणांनी मर्यादित होत नाहीं; अतिचेतन आत्मा कालातीत शाश्वत पुरुष आहे. काल त्याच्या आविष्काराची एक पद्धति आहे आणि आंतर पुरुषाला

पान क्र. ४७१

 

काल हा त्याच्या नानाविध अनुभवांचें अनंत असें क्षेत्र आहे; आंतर पुरुषाचें अस्तित्व म्हटलें कीं त्याचा अर्थच, सर्व भूतकाळ व तसाच सर्व भविष्यकाळ ज्या अस्तित्वाचा काळ आहे तें अस्तित्व, असा घ्यावा लागतो. आमचें आजचें अस्तित्व ज्या स्वरूपाचें आहे त्या स्वरूपाचें तें कां आहे, याचें स्पष्टीकरण म्हणजे या आमच्या अस्तित्वाच्या मागें असलेला आमचा सर्व भूतकाळ. पण आमचें आजचें शारीर जीवन आणि त्यांतील स्मृतिगत गोष्टी एवढाच आमचा भूतकाळ आमच्या मनाला ज्ञात आहे. त्याला आमचा भविष्यकाळ तर बिलकुल ठाऊक नाहीं; पण आमच्या रूपात्मक अस्तित्वाची विकासगति या आमच्या अज्ञात भविष्यानें क्षणोक्षणीं ठरत असते, अशी वस्तुस्थिति आहे. आमच्या अज्ञानग्रस्त अनुभवाची एवढी छाप, एवढी भक्कम पकड आमच्यावर आहे कीं आम्ही असें आग्रहानें म्हणत असतों कीं, भूतकाळ हा आम्हांला केवळ त्यानें ठेवलेल्या खुणांवरून, निशाण्यांवरून कळूं शकतो आणि भविष्यकाळ आम्हांला कळणें शक्यच नाहीं : कारण भविष्यकाळ हा अद्यापि अस्तित्वांत आलेलाच नाहीं तर तो कसा कळणार ? आणि भूतकाळ अस्तित्वांत येऊन आतां अस्तित्वांतून गेला आहे, तेव्हां कांहीं निशाण्यांचा आधार घेऊनच त्याचें ज्ञान, थोडेसें ज्ञान, आम्ही करून घेऊं शकूं, एरव्हीं हें ज्ञान आम्हांला कसें होणार? अशी आमची विचारसरणी असते; पण वस्तुस्थिति अशी आहे कीं, हे दोनहि काळ आमच्या ठिकाणीं या क्षणीं आहेत : भूतकाळ हा दडून बसून कार्य करीत आहे आणि भविष्यकाळ विकासक्रमांत उदयास येण्याच्या नेहमीं तयारींत असतो. गुप्त आत्मा अखंडपणें सर्व काळ व्यापून आहे, त्याचा आविष्कार अखंडपणें चालूं आहे; त्या आविष्काराच्या क्रमांत भविष्यकाळ हा नेहमीं उदयास येत असतो व येऊं पहात असतो भूत आणि भविष्य यांसंबंधाचें आमचें हें अज्ञान, आम्हांला संकुचित करणारें आणि निराशेनें ग्रासून टाकणारें असें हें आमचें अज्ञान म्हणजे वर सांगितलेल्या सर्वप्रथम महत्त्वाच्या आमच्या अज्ञानाला साथ देणारें दुसऱ्या दर्जाचें अज्ञान होय असें म्हणतां येईल.

      मनुष्याचें स्वतःसंबंधींचें अज्ञान येथेंच संपत नाहीं; त्याला त्याच्या अतिचेतन आत्म्याची ओळख नाहीं, आंतरचेतन आत्माची ओळख नाहीं, अवचेतन आत्म्याची ओळख नाहीं. एवढेंच नव्हे, तर ज्या जगांत तो राहत आहे त्याचीहि त्याला ओळख नाहीं. हें जग अविश्रांतपणें त्याजवर कार्य करीत असतें, त्याच्या द्वारां कार्य करीत असतें, तसेंच मनुष्यहि त्याजवर

पान क्र. ४७२

 

क्रिया करीत असतो; मनुष्याच्या जगद्विषयक अज्ञानाची ही खूण आहे कीं, तो जगाला स्वत:पासून अगदीं वेगळी वस्तु मानतो, अनात्मा मानतो; कारण एवढेंच कीं, त्याचा अहम् आणि त्याची वैयक्तिक प्रकृतिगत मूर्ति जगापासून वेगळी दिसते. त्याला त्याचा अतिचेतन आत्मा जेव्हां दिसतो, तेव्हां प्रथम त्या आत्म्यालाहि तो स्वत:हून वेगळा, बाह्य पदार्थ, बाह्य पुरुष, विश्वातीत परमेश्वर, विश्वाहून वेगळा परमेश्वर मानीत असतो. त्याला त्याचा आंतरचेतन आत्मा जेव्हां दिसतो, तेव्हां त्यालाहि स्वत:हून वेगळा असा महापुरुष, त्याला स्वत:ला आचार देणारा आणि मार्गदर्शन करणारा पुरुष तो मानतो. त्याचा प्राण आणि त्याचें शरीर हा जगाचा एक लहानसा भाग, त्याला तो आपला ''स्व'' मानतो. सागराच्या पृष्ठभागावर क्षणभर उठणाऱ्या फेंसाच्या बुडबुड्यासारखा असणारा जगाचा हा भाग (मनुष्याचें प्राणयुक्त शरीर) मनुष्याला ''आत्मा'' म्हणून भासतो. पण आम्हीं आंतर पुरुषाच्या जाणिवेंत प्रवेश केला म्हणजे असा अनुभव येतो की, ही जाणीव, स्वत:च्या विस्तारानें सर्व जग व्यापून टाकते, सर्व जगाइतकी मोठी होते; आम्ही आमच्या अतिचेतन आत्म्यांत प्रविष्ट झालों म्हणजे आम्हांला जग हें अतिचेतन आत्म्याचें साकार प्रकटन आहे, याहून दुसरें कांहीं नाही हें कळून येतें. जगांत एकच एक आत्मचैतन्य भरलेलें आहे, जगांत सर्वकांहीं जें आहे तें आमचा आत्माच आहे असें ज्ञान आम्हांला होतें; अविभाज्य एकच एक जड भौतिक तत्त्व, अविभाज्य एकच एक प्राणतत्त्व, अविभाज्य एकच एक मनस्तत्त्व, अविभाज्य एकच एक चैतन्य, आत्मतत्त्व -- आमचें शरीर ही अखंड भौतिक तत्त्वाला दिलेल्या गांठींपैकीं एक गांठ; आमचा प्राण हा अखंड प्राणतत्त्वाच्या जलाशयातील एक लहानसा भोंवरा; आमचें मन हें अखंड मनस्तत्त्वाच्या पसाऱ्यांतील एक संदेश घेणारें, देणारें, संदेश तयार करून पाठविणारें, संदेश संग्रह करून ठेवणारें कार्यालय; आमचा आत्मा वा व्यक्तित्व हा अखंड चैतन्याचा एक अंश, एक आविष्कार; -- असें या विश्वाचें स्वरूप आहे ही गोष्ट, आम्हीं अतिचेतन प्रांतांत प्रवेश केल्यावर आम्हांला स्पष्टपणें दिसते. अविभाज्य चैतन्य, मन, प्राण, जडतत्त्व यांचा हा विश्वसंभार असतांना येथें विभक्तता आम्हांला जाणवते. या गोष्टीचें कारण आमची अहम्-संवेदना आहे. आम्ही अज्ञानमय पृष्ठवर्ती पुरुष आहों, या आमच्या अज्ञानाला अहम्‌ची मदत असल्यानें तें, त्यानें (अज्ञानानें) स्वत: निर्माण केलेल्या भिंती, ज्या त्याला तुरुंगाच्या भिंतीसारख्या

पान क्र. ४७३

 

होतात त्या, फार काळ टिकवू शकतें; अहम्‌च्या जोरावर अज्ञानाला स्वनिर्मित भिंतींचा तुरुंग टिकवितां येतो. आम्ही अज्ञानाला पुष्कळ काळ बांधलेले राहतो त्याला कारण, आमचा ''मी''. ''मी'' ची गांठ सर्वांत भयंकर आहे, या गांठीमुळें आमचें अज्ञानाचें बंधन लवकर सुटत नाहीं; तथापि हें लक्षांत ठेवणें अवश्य आहे कीं, अज्ञानानें उभ्या केलेल्या भिंती कितीहि भक्कम दिसल्या व अहम्‌चा कितीहि जोर असला, तरी या भिंतीतून ज्ञान पाझरून येऊन अज्ञानावर कमीअधिक प्रभाव पाडू शकतें; या भक्कम भिंतीहि सूक्ष्म छिद्रांनीं व्यापलेल्या असतात आणि या छिद्रांचा उपयोग करून ज्ञानाचा पाझर केव्हांहि या भिंतींतून अज्ञानाच्या क्षेत्रांत येईल अशी व्यवस्था करतां येते.

      आमचें जें कालांकित अस्तित्व, त्याविषयीं आमच्या ठिकाणीं, आम्हांला आठवणारी लहानशी घटका सोडून, पूर्ण अज्ञान असतें, ही जशी आमच्या कालगत अस्तित्वाची गोष्ट आहे, तशीच आमच्या स्थलगत अस्तित्वाचीहि गोष्ट आहे. या आमच्या स्थलगत अस्तित्वाचा एक लहानसा भाग आम्हांला आमचा म्हणून ज्ञात असतो, एक शरीर आणि त्याच्याशी एकात्मता पावलेला प्राण व मन एवढेंच आमचें स्थलगत अस्तित्व आम्हांला आमचें म्हणून ज्ञात असतें; या शरीराच्या सभोंवारचें जें आमचें स्थलगत अस्तित्व, त्याला आम्ही ''अनात्मा'' मानतो, आणि या परिसराला ''इतर'' समजून त्याच्याशीं आम्ही व्यवहार करतो, त्याचा उपयोग करतो आणि करूं चाहतो; वरील एकात्मतेंत आणि वरील व्यवहारविषयक कल्पनेंत अहम् चें विभक्त जीवन आहे. वस्तूचें सह-अस्तित्व, आत्म्यांचें सह-अस्तित्व या पलीकडे ''स्थल'' (अवकाश, आकाश) या कल्पनेंत अधिक कांहीं नाहीं, असा एक वाद आहे, अशी एक दृष्टि आहे. सांख्यांच्या मतें आत्मे अनेक असून त्यांचें अस्तित्व वेगळें वेगळें, स्वतंत्र स्वतंत्र आहे. या स्वतंत्र आत्म्यांचें अनुभवक्षेत्र प्रकृति साहे. या अनुभवक्षेत्राच्या, प्रकृतीच्या निसर्गशक्तीच्या एकतेमुळें सांख्यप्रतिपदित आत्म्यांचें सह-अस्तित्व शक्य होतें. प्रकृतीमध्यें आत्म्यांचें सह-अस्तित्व याचा अर्थ, एका परम पुरुषाचे ठिकाणीं या अनेक पुरुषांचें सहअस्तित्व असा होतो. कारण प्रकृति ही पुरुषाची अंगभूत शक्ति आहे. हा परम पुरुष म्हणजे एकमेव चैतन्य, अस्तित्व होय. या चैतन्यमय अस्तित्वाची जाणीवयुवत शक्ति (प्रकृति) अंगभूत असते. या शक्तीचें (प्रकृतीचें) आंदोलन-क्षेत्र, हें चैतन्य स्वतःच्या पोटांत प्रकट करतें; हें क्षेत्र म्हणजे ''स्थल, अवकाश, आकाश'' होय; हें

पान क्र. ४७४

 

क्षेत्र म्हणजे एकच एक जो चैतन्यपुरुष, त्याचा आत्मकल्पित विस्तार असेंहि म्हणतां येईल. या चैतन्यपुरुषाचीं जाणीवयुक्त शक्ति (प्रकृति) नाना शरीरांत, प्राणांत, मनांत केंद्रीभूत होऊन राहते, आणि आत्मा मात्र एकेका शरीरांत, प्राणांत, मनांत अध्यक्षत्व करतो. असें असल्यानें आमचा मनोमय आत्मा एका शरीर-प्राण-मनांत केंद्रित होतो, आपल्या निवासालाच केवळ ''मी'' मानतो आणि निवासाखेरीज बाकी सर्व ''अनात्मा'', ''इतर'' या सदरांत ढकलतो; सर्व भूत आणि भविष्य कापून टाकून केवळ एक जन्म म्हणजे आपलें सर्व कालांकित अस्तित्व हा जसा अज्ञानामुळें आमच्या आत्म्याचा खोटा समज होतो, त्याप्रमाणेंच एक शरीर (व तत्संबद्ध प्राण-मन) सोडून बाकी सर्व विश्व ''अनात्मा'' आहे असा त्याचा खोटा समज अज्ञानामुळें होतो. वस्तुस्थिति अशी आहे कीं, आमचें स्वतःचें मन खऱ्या रीतीनें जाणावयाचें, तर तें विशाल, विश्वव्यापी, एकमेव अविभाज्य मन जाणल्याशिवाय जाणतां येत नाहीं; आमच्या स्वतःच्या प्राणाची व शरीराचीहि खरीखुरी ओळख ही, विश्वव्यापी, एक अविभाज्य प्राण, विश्वव्यापी, एक अविभाज्य भौतिक जड तत्त्व यांची ओळख करून घेतल्यावरच होऊं शकते; कारण आमच्या मनाचें, प्राणाचें, शरीराचें स्वाभाविक स्वरूप, या विश्वव्यापी मनाच्या, प्राणाच्या, भौतिक जड तत्त्वाच्या स्वभावावर अवलंबून असतें. एवढेंच नव्हे, तर आमच्या मनाच्या, प्राणाच्या, शरीराच्या हालचाली क्षणीं क्षणीं विश्वव्यापी मनानें, प्राणानें, जड तत्त्वानें प्रभावित होत असतात, प्रवर्तित होत असतात. याप्रमाणें अस्तित्वाचा महान् सागर आम्हांवर चोहोंकडून येऊन आदळत आहे. पण या महान् अस्तित्वाची महान् जाणीव आम्हांला पारखी असते; आम्ही या महान् अस्तित्वाशी जाणिवेनें एकरूप होऊं शकत नाहीं. आमच्या मनाच्या पृष्ठभागीय विभागांत जेवढें अस्तित्व आणतां येईल व संघटित करतां येईल तेवढेंच अस्तित्व आम्ही आमचें म्हणून ओळखूं शकतों. आम्हांमध्यें विश्व जीवन जगत असतें, विश्व विचार करीत असतें, विश्व साकार होत असतें. पण आमची अशी खोटी कल्पना होते कीं, आम्ही अलग अलग, स्वतःकरितांच व स्वतःच्या बळावर जीवन जगत आहों, विचार करीत आहों आणि आमच्या अस्तित्वाला विविध आकार देत आहों. आमचा कालातीत आत्मा, आमचा अतिचेतन आत्मा, आमचा आंतरचेतन आत्मा, आमचा अवचेतन आत्मा यांचीं आम्हांला जशी ओळख नाहीं, तशी आम्हांला आमच्या विश्वव्यापी आत्म्याचीहि ओळख नाहीं; असें

पान क्र. ४७५

 

आमचें अज्ञान आहे. त्यांतल्या त्यांत ही एक गोष्ट आणि ही एकच गोष्ट आम्हांला तारक होणारी आहे कीं, आत्मज्ञान आणि आत्मप्राप्ति सिद्ध करण्याच्या दिशेनें नित्य धडपडत राहण्याचा आमच्या अज्ञानाचा स्वभावधर्म आहे; कोणत्याहि, कितीहि अडचणींना तोंड देऊन अखेर आत्मज्ञान मिळवावयाचें, आत्मप्राप्ति करून घ्यावयाची, अशी अनिवार्य प्रेरणा आमच्या अज्ञानाच्या पोटीं स्वभावत:, त्याच्या अस्तित्वाच्या नियमानुसारच वास करीत आहे. मनुष्य हा मनोमय पुरुष आहे; त्याच्या जाणिवेचें लक्षण करावयाचें तर असें म्हणतां येईल कीं, ही जाणीव म्हणजे धडपडणारें अनेकविध अज्ञान असून, या अज्ञानाला सर्वस्पर्शी व सर्वसमावेशक ज्ञानाचें रूप देण्यासाठीं तिची (त्या जाणीवेची) धडपड चाललेली आहे; या जाणिवेकडे दुसऱ्या बाजूनें पाहून तिची अशीहि व्याख्या करतां येईल : मनुष्याची जाणीव म्हणजे वस्तूंचें भेद-अधिष्ठित मर्यादित ज्ञान असून, स्वतःच्या या ज्ञानाचें पूर्ण अभेद-ज्ञान करण्यासाठीं तिची धडपड चाललेली आहे.

पान क्र. ४७६

 









Let us co-create the website.

Share your feedback. Help us improve. Or ask a question.

Image Description
Connect for updates