दिव्य जीवन 1879 pages 1960 Edition
Marathi Translation
  Senapati Bapat

ABOUT

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics, expounding a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth.

THEME

philosophymetaphysics

दिव्य जीवन

Sri Aurobindo symbol
Sri Aurobindo

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.

Sri Aurobindo Birth Centenary Library (SABCL) The Life Divine Vols. 18,19 1070 pages 1970 Edition
English
 PDF    philosophymetaphysics
Sri Aurobindo symbol
Sri Aurobindo

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.

Marathi Translations of books by Sri Aurobindo दिव्य जीवन 1879 pages 1960 Edition
Marathi Translation
Translator:   Senapati Bapat  PDF    LINK

प्रकरण सातवें

 

अहम् आणि द्वंद्वें

 

निसर्ग-वृक्षावर आत्मा बसलेला आहे, तो निसर्गांत निमग्न झाला आहे, भ्रांत झाला आहे, आपण अनीश आहों या भावनेनें त्याला दुःख होत आहे; त्याच वृक्षावर ईश्वर आहे. दुःखी आत्म्यानें हा ईश्वर पाहिला आणि या ईश्वराला आपला आत्मा म्हणून ओळखून त्याच्याशीं, त्याच्या महिम्याशीं त्यानें ऐक्यभाव धारण केला म्हणजे त्याचें दुःख दूर होतें.

- श्वेताश्वतरोपनिषद् ४.७

 

वस्तुत: सगळेंच जर सच्चिदानंद आहे, तर मृत्यु, दुःख, दुष्टपणा, बंधन या गोष्टी कोठून आल्या? अर्थात् या गोष्टी वस्तुस्थितीचें विपरीत दर्शन घडविणाऱ्या जाणिवेनें निर्माण केल्या आहेत हें उघड आहे. या गोष्टी व्यवहारांत परिणामकारक आहेत यांत संशय नाहीं, परंतु त्यांना तात्त्विक अस्तित्व नाहीं. त्या आंतून पोकळ आहेत, वस्तुतत्त्व त्यांच्यांत नाहीं; त्यांच्यांत वस्तुतत्त्व नसतांना त्यांना व्यवहारांत वस्तुत्व देणारी विपरीत जाणीव तरी कशी अस्तित्वांत आली ? 'मुळांत जाणीव ही सर्वरूप, समग्र आणि एकच एक असून त्या जाणिवेचें हें समग्रतेचें, एकतेचें आत्मविषयक ज्ञान कसें तरी हरपलें, ती जाणीव पतित झाली, भेदाच्या भ्रमांत पडली, तिच्या ज्ञानाला एकांगित्व आलें आणि म्हणून ती विपरीत दर्शन घडवूं लागली व विपरीत जाणीव बनली.' हिब्रू लोकांच्या धर्मग्रंथांत जी विश्वनिर्मितीची काव्यमय बोधकथा आहे त्या कथेंत ''मानवाचें पतन'' म्हणून मूळ एकरूप जाणिवेचें हें पतन वर्णिलेलें आहे. प्रथम, मानव ईश्वरास पूर्णपणें मानीत होता. स्वत:च्या अंतरांतील ईश्वर, आपला निरंतरचा स्वामी म्हणून तो शुद्ध भावनेनें मानीत होता, ईश्वरच सर्व कांहीं आहे असें मानीत होता. ही त्याची शुद्ध आणि पूर्ण श्रद्धा जेव्हां ढांसळली तेव्हां त्याचें पतन झालें, त्याच्या ज्ञानाला फांटे फुटले, भेद-

 

पान क्र. ९८

 

ज्ञानामुळें व भेदज्ञानाचें सेवन केल्यामुळें द्वंद्वांची मालिका त्याच्यासमोर उभी राहिली; जीवन-मरण, साधुत्व-दुष्टत्व, सुख-दुःख, पूर्णता-अपूर्णता, हीं द्वंद्वें भेदज्ञानाची, तुकडे झालेल्या अस्तित्वाची प्रजा होय. भेद-ज्ञानाचें फळ ॲडॅम-ईव्ह, पुरुष-प्रकृति यांनीं - निसर्गानें मोहित केलेल्या आत्म्यानें - सेवन केलें. आजहि निसर्गानें मोहित केलेला आत्मा हें भेद-ज्ञानाचें फळ सेवन करीत आहे आणि द्वंदवांचें दुःख भोगीत आहे. निसर्गाच्या मोहांतून मानव कसा पार पडणार ? त्याचा उद्धार कसा होणार ? व्यक्तीमध्यें विश्वव्यापक जाणीव पुनरपि निर्माण झाली पाहिजे, भौतिक जाणिवेंत दिव्य आत्मवस्तूची प्रतिष्ठा पुनरपि झाली पाहिजे; हें घडून आलें म्हणजे मानवाचा उद्धार होईल. हें घडून आल्यावर निसर्गांत वावरणाऱ्या आत्म्यानें जीवनवृक्षाचें फळ सेवन करण्यास हरकत राहणार नाहीं. कारण मग हा आत्मा दिव्य आत्म्यासारखा, ईश्वरासारखा होऊन अमर होईल. साधुत्व आणि दुष्टत्व, सुख आणि दुःख, जीवन आणि मरण या द्वंद्वांसंबंधींचें खरें ज्ञान व्यक्तीला होईल; हें खरें ज्ञान, दिव्य आत्म्याच्या आणि विश्वात्म्याच्या श्रेष्ठ जाणिवेच्या साह्यानें होईल व या श्रेष्ठ ज्ञानामुळें द्वंद्वांचा विरोध हा आभास आहे असें कळेल. विश्वात्म्याच्या व्यवहारांत जीवन आणि मरण इत्यादि अन्योन्यविरोधी भासणाऱ्या वस्तू एकमेकांच्या पूरक आहेत असें ज्ञान होईल; सर्व विरोधी जोड्या एकाच वस्तूच्या दोन बाजू आहेत असें कळेल, एकच एक ब्रह्मवस्तु अनेक प्रकारें द्वंद्वरूप झाली आहे व त्या द्वंद्वांच्या क्षेत्रांत ब्रह्मवस्तु अभेदानें आहे अशी जाणीव होईल. द्वंद्वांची द्वंद्वता खोटी करून त्यांची अन्योन्य-पूरकता व दिव्य एकता सिद्ध करणें हें, ब्रह्मवस्तूचें भौतिक जाणिवेंत अवतरण होण्याचें किंवा अवतरण घडविण्याचें प्रयोजन आहे.

सच्चिदानंद सर्व वस्तूंत पसरलेलें आहे. क्षुद्रांत क्षुद्र वस्तु देखील सच्चिदानंदाचें वसतिस्थान आहे. कोणत्याहि भेदांना न मानता अगदीं नि:पक्षपातीपणें सर्वत्र सच्चिदानंद भरलेलें आहे. अशा व्यापक सच्चिदानंदाला मरण, दुःख, दुष्टत्व, बंधन या गोष्टी, तद्विरोधी जीवन, सुख इत्यादि प्रकाशमय गोष्टींच्या छायेप्रमाणें, नाण्याच्या दुसऱ्या बाजूप्रमाणें फारतर असणार. आम्हाला या गोष्टी संगतीची विसंगति करणाऱ्या, सुराचा बेसूर करणाऱ्या अशा भासतात. जेथें ऐक्य असावें, तेथें या गोष्टी बेकी उत्पन्न करतात; योग्य समज असावा, तेथें गैरसमज फैलावतात. एकाच वृंदवादनाचे सुरेल घटक म्हणून जेथें भिन्न घटकांनीं आपला सूर

 

पान क्र. ९९

 

इतर घटकांत मिळवून न्यावयास हवा, तेथें हीं द्वंद्वें अनेक, भिन्न, स्वतंत्र स्वरमेळ उभे करूं पाहतात. जाणिवेची समग्रता, पूर्णता हाच एक या द्वंद्वांच्या आपत्तीवर उपाय आहे. पूर्णता, समग्रता ही सुरेल व तालबद्ध असतेच असते; असमग्रतेमुळें ज्या गोष्टी इतर कांहीं गोष्टींशीं विरोध करून कर्कशपणा, बेसुरेलपणा माजवीत असतील त्या विरोधी गोष्टींना समग्रता आपला विरोध सोडावयास लावते, त्यांचे मेळ घालून देते. विश्वांत भौतिक आणि भौतिकेतर अनेक पातळ्या आहेत, तेथें सारख्या हालचाली चालू आहेत. यांपैकीं केवळ एक - कोणतीहि स्थूल भौतिक जाणिवेची कां होईना - पातळी घेतली तरी तेथेंहि समग्र दृष्टीनें व्यवहार पाहिला तर बेसुरेलपणा त्या पातळीपुरता दिसणार नाहीं. भौतिक जाणिवेच्या पातळीच्या पलीकडे वर, खालीं, मागें, पुढें अनेक पातळ्या आहेत - भौतिक पातळीसह त्या सर्वांचा समग्रतेनें व्यवहार पाहिला तरीहि बेसुरेलपणा मुळींच दिसणार नाहीं हें वेगळें सांगावयास नको. तेव्हां जाणिवेची समग्रता गेल्यामुळें जी द्वंद्वांची बेसूर बेताल दुःखद हालचाल विश्वांत निर्माण झाली आहे ती, जाणिवेच्या समग्रतेनें पुन: सुरेल होणारी आहे, पुन: तालबद्ध व सुखद होणारी आहे. विश्वांत सच्चिदानंद साकारत्वानें आहे. सच्चिदानंदाला साकार विश्वांत जीं द्वंद्वांचीं नांवें आपण लावतो तीं या साकारत्वाच्या पलीकडे गेलें कीं, तेथें लावतां येत नाहींत. विश्वातीत निराकार सच्चिदानंद ब्रह्म हें द्वैत कायम ठेवून, द्वंद्वांचा मेळ घालीत बसत नाहीं, तर त्यांच्यापेक्षां श्रेष्ठ असणारें कांहीं तत्त्व निर्माण करतें आणि या रीतीनें द्वंद्वांचें अस्तित्व बदलून टाकून त्यांचा विरोध पार लयास नेतें. असो.

समग्रतेची सुसंवादिता, सुरेल गोडी द्वंद्वांच्या आपत्तींतहि व्यक्तीला कशी लाभेल हें प्रथम पाहूं. या संबंधांत एक गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे ती ही कीं, (आणि ही गोष्ट लक्षांत घेतली नाहीं तर आपला प्रश्न सुटणार नाहीं) विश्वांत अनुभवास येणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींना आमच्या सध्यांच्या जाणिवेनें जीं नांवें दिलीं आहेत तीं जरी आमच्या मानवी अनुभवाच्या व प्रगतीच्या दृष्टीनें जवळ जवळ योग्य असलीं तरी इतर कोणतींहि नांवें त्यांना योग्य होणार नाहींत असें नाहीं; एवढेंच नव्हे तर असेंहि असणें शक्य आहे कीं, त्या गोष्टींचें पूर्ण, अगदीं बरोबर वर्णन आमच्या नांवानीं होत नाहीं, त्या गोष्टींची अगदीं योग्य, पूर्ण, वर्णनात्मक आणि अखेरचीं निर्दोष नांवें वेगळीं असलीं पाहिजेत.

 

पान क्र. १००

 

आमचे भौतिक जग आमच्या इंद्रियांनीं, इंद्रियशक्तीनें आम्ही अनुभवतों, हेंच जग अनुभवणारीं आमच्या इंद्रियांहून वेगळ्या प्रकारचीं इंद्रियें व आमच्या इंद्रियशक्तीहून वेगळ्या प्रकारची इंद्रियशक्ति असूं शकते; त्यांना या जगाचा अनुभव आम्हापेक्षां अधिक पूर्णतेनें म्हणून अधिक चांगला घेतां येत असेल आणि तो अनुभव आमच्या अनुभवाहून वेगळा असूं शकेल, ही गोष्ट संभवनीय आहे. त्याचप्रमाणें हेंहि संभवनीय आहे कीं, आमचें आजचें मन विश्वाचें जें चित्र आपल्यासमोर उभें करतें त्यापेक्षां श्रेष्ठ असें विश्वाचें चित्र आमच्या मानसिक आणि अतिमानसिक दृष्टीनें दिसूं शकेल. जाणिवेच्या अशा अवस्था आहेत कीं, त्या अवस्थांत, मरण हें, अमर जीवनांतील एक बदल अथवा चालू जीवनाहून वेगळें जीवन म्हणून अनुभवास येतें; दुःख हें, विश्वव्यापी आनंदसागरांतील धक्का देणारा, त्या सागराचाच एक उलटा प्रवाह म्हणून भासतें; सीमेचें बंधन हें, असीम बंधनातीत अनंताचें एका दिशेनें मार्गक्रमण चालूं असतां मध्येंच तोंड फिरवून उलट दिशेनें किंवा दुसऱ्या दिशेनें चालू लागणें आहे असें दिसतें; दुष्टत्व हें, साधुत्वाचेंच त्याच्या स्वत:च्या पूर्णतेला प्रदक्षिणा घालणें आहे, असा अनुभव येतो; सारांश मरण, दुःख, दुष्टत्व व सीमाबद्धता हें सर्व केवळ आभास असून जीवन, आनंद, अनंतता, साधुत्व यांनाच केवळ खरें अस्तित्व आहे हें प्रतीत होतें. हे अनुभव केवळ वैचारिक चित्रें नसतात, तर इंद्रियप्रत्यक्षाप्रमाणें खरोखरीचे, नित्याचे, वास्तविक अनुभव असतात. व्यक्तीचा आत्मविकास होत होत शेवटीं तिला पूर्णता मिळावयाची आहे. या पूर्णतेकडे व्यक्ति प्रवास करीत असतां जीं महत्त्वाचीं, न टाळतां येणारीं पावलें तिला टाकावीं लागतात त्यांपैकीं सर्वांत अधिक महत्त्वाचें एक पाऊल या वर सांगितलेल्या ज्ञानभूमिकांचें (जाणिवेच्या अवस्थांचें) असतें असें म्हणतां येईल. पूर्णतेच्या सिद्धीसाठीं या ज्ञानभूमिका आपल्या ठिकाणीं सिद्ध करण्याचा प्रयत्न, प्रत्येक साधकानें अवश्य करावयास हवा.

तथापि, अशी श्रेष्ठ ज्ञानभूमिका जोंपर्यंत सिद्ध झाली नाहीं तोंपर्यंत, आमचीं इंद्रियें आणि आमचें इंद्रियाधिष्ठित द्वंद्वदर्शी मन आम्हाला जीं व्यवहारोपयोगीं मूल्यें देतील तीं मूल्ये त्या त्या क्षेत्रांत आम्हीं मानलीं पाहिजेत; आमच्या सर्वसाधारण जीवन-व्यवहारांत त्या मूल्यांना प्रमाण मानून आम्हीं वागलें पाहिजे. सामान्य ज्ञानभूमिकेहून श्रेष्ठ अशी उपरिनिर्दिष्ट ज्ञानभूमिका सिद्ध झाली म्हणजे आमचीं द्वंद्वात्मक मूल्यें, आपलें पहिलें विरोधात्मक स्वरूप बदलून एकमेकांशीं सुसंवादित्व धारण करतील

 

पान क्र. १०१

 

व हें सुसंवादित्व धारण करतांना व केल्यावरहि, ज्या सत्य वास्तव घटना त्या मूल्यांचें मूळ होत्या त्या घटनांवरची आपली पकड तीं मूल्यें सोडणार नाहींत. इंद्रियशक्ति वाढविणें आणि ज्ञानभूमिका मात्र सामान्य, जुनीच ठेवणें यामुळें व्यक्तीच्या अंतर्बाह्य व्यवहारांत अनेक तऱ्हेची गंभीर अव्यवस्था व अपात्रता निर्माण होण्याचा संभव आहे; व्यक्ति व्यवहाराला निरुपयोगी होण्याचा, आपली बुद्धि व्यवस्थेनें व शिस्तीनें वापरण्यास असमर्थ होण्याचा संभव आहे. इंद्रियशक्तीच्या वाढीबरोबर इंद्रियांकडून जीं जुन्या तऱ्हेचीं मूल्यें वाढत्या प्रमाणावर मिळणार, त्यांचा योग्य अर्थ लावून त्यांना सुसंवादित्व देणारी श्रेष्ठ ज्ञानभूमिका सिद्ध असेल तरच, वाढत्या इंद्रियशक्तीनें येणारी वर सांगितलेली आपत्ति टळेल. अशाच प्रकारची आपत्ति मानसिक जाणिवेच्या वाढीनेंहि एका विशिष्ट परिस्थितींत येऊं शकते. मानसिक जाणीव वाढली, अहम् नें निर्माण केलेल्या द्वंद्वांचा या वाढलेल्या जाणिवेनें परामर्श घेण्याचें सोडून दिलें, कुठल्यातरी प्रकारच्या समग्र जाणिवेशीं या वाढलेल्या मानसिक जाणिवेनें कशीतरी शिस्तशून्य एकता साधली आणि अर्धवट समग्रतेच्या अभिमानानें द्वंद्वांचें द्वंद्वत्व दृष्टिआड केलें, द्वंद्वांच्या कोंडींतून आपण बाहेर पडलो असा आंव आणून त्यांचा योग्य परामर्श घेण्याचें सोडून दिलें, तर त्यायोगें व्यक्तीच्या व्यवहारांत गोंधळ माजण्याचा फार संभव आहे. जगांत अन्योन्य सापेक्ष द्वंद्वमय घटनांचें जें सुप्रतिष्ठित राज्य आहे त्या राज्यांत व्यवहारी क्रियाशील मानवी जीवन योग्य रीतीनें जगण्याची पात्रता त्या व्यक्तींत फार कमी होण्याचा संभव आहे. गीतेमध्यें ज्ञानी माणसाला असा आदेश दिला आहे कीं, अज्ञानी माणसाच्या जीवनाची आणि विचाराची बैठक ज्यानें बिघडून जाईल, व त्याचा ''बुद्धिभेद'' होईल असें ज्ञानी माणसानें कांही करूं नये. हा आदेश देण्याचें कारण, बुद्धिभेदामुळें जीवन योग्य रीतीनें जगण्याची पात्रता अज्ञानी माणसाचें ठिकाणीं राहणार नाहीं हे आहे; ज्ञानी माणूस कसें आचरण करतों तें अज्ञानी माणूस पाहूं शकेल परंतु त्या आचरणाचें तत्त्व त्याला उमगणार नाहीं. ज्ञानी माणसाच्या आचरणाची नक्कल तो करूं लागेल तर त्यामुळें त्याची स्वत:ची मूल्य-संस्था तो गमावून बसेल, आणि तिजहून श्रेष्ठ जी तात्त्विक बैठक ती त्याला अप्राप्त असल्यामुळें त्याच्या जीवनांत गोंधळ निर्माण होणें अपरिहार्य होईल.

तात्पुरती गोंधळाची किंवा अपात्रतेची, अक्षमतेची अवस्था मान्य करून साधक आपली वाटचाल, जीवनाच्या क्षेत्रविस्तारासाठीं करीत

 

पान क्र. १०२

 

राहील हें संभवनीय आहे; नव्हे, अशी वृत्ति व कृति पुष्कळ महात्म्यांनीं आपल्या साधकावस्थेंत दाखविली आहे. जीवनाच्या क्षेत्राचा विस्तार करावयास संधि मिळण्यासाठीं तात्पुरता गोंधळ मान्य करणें, ही जणुं किंमत म्हणून ते देतात. तथापि अस्तित्वाच्या आणि जीवनाच्या मर्यादा लांबरुंद करावयाच्या आणि वाढत्या जीवनांत व अस्तित्वांत गोंधळ अव्यवस्था, अपात्रता व अक्षमता यांचें राज्य मान्य करावयाचें, हा कांहीं मानवी प्रगतीचा योग्य आदर्श नव्हे. योग्य प्रगति व्हावयाची तर हें अवश्य आहे कीं, इंद्रियशक्ति किंवा मनाची शक्ति वाढून साधकाचें अस्तित्व व जीवन रुंदावलें कीं जुन्या मूल्यांचें पुन: निरीक्षण-परीक्षण करून, नव्या रुंदावलेल्या जीवनाला योग्य अशी त्यांची परिणामकारक समन्वयी पुनर्रचना केली पाहिजे; कारण नव्या जीवनाचा कायदा वेगळा असतो, जुन्या मर्यादांतील जीवनाचा कायदा येथें चालत नाहीं; याप्रमाणें जुनीं मूल्यें नव्या कायद्यानें सुधारून किंवा बदलून घेतलीं म्हणजे नव्या सत्यांची मालिका साधकाला प्राप्त होईल, आणि विश्वांत जें जीवनाचें साहित्य त्याच्यासमोर असेल त्यावर त्याच्या कर्तबगारीचा प्रयोग पूर्वींपेक्षां अधिक रसरशीत व अधिक समुचित होऊन साधकाचें जीवन पूर्वींपेक्षां अधिक सामर्थ्यवान् आणि सुसंगत होईल. पृथ्वीभोंवतीं सूर्य फिरतो अशी आपल्या इंद्रियांची साक्ष आहे. तेव्हां इंद्रियांच्या दृष्टीनें सूर्य-पृथ्वीचें हें नातें जीवनाचा केंद्र, जीवनव्यवस्थेचें केंद्रतत्त्व म्हणून एका काळीं मानलें गेलें; एक चुकीची कल्पना पायाभूत धरून जीवनाचा व्यवहार तिच्या तंत्रानें मानवांकडून आंखला गेला. सूर्याभोंवतीं पृथ्वी फिरते हें सत्य नंतर सांपडलें; पण जर नवीन भौतिक शास्त्र सिद्ध नसतें, तर हें सत्य सांपडूनहि कदाचित् त्याचा कांहीं उपयोग झाला नसता. नव्या सत्यकल्पनेला केंद्रस्थानीं बसवून तिच्या समर्थनार्थ तर्कसिद्ध सुव्यवस्थित ज्ञानाचा संग्रह करून इंद्रियांना घडणाऱ्या दर्शनाचा योग्य अर्थ सांगण्यास नवें शास्त्र सिद्ध होतें, म्हणून तर सूर्याभोंवतीं पृथ्वी फिरते या कल्पनेचा मानवाला उपयोग करतां येऊन जीवन पूर्वींपेक्षां अधिक यशस्वी करतां आलें. असाच प्रकार मानवाच्या आंत घडणाऱ्या घटनांच्या संबंधांत होतो. मानवाच्या मनाला, सामान्य मानसिक जाणिवेला, अहम्-वैयक्तिक मी - हाच पृथ्वीच्या ठिकाणीं मध्यवर्ति असून ईश्वर-सूर्य या 'मी' भोंवतीं फिरत असतो, ईश्वर जें कांहीं करतो तें व ज्या मार्गानें तो तें करतो तो मार्ग किंबहुना त्याच्या सर्व कृती व त्याचे सर्व मार्ग 'मी'च्या न्यायासनापुढें

 

पान क्र. १०३

 

हजर केले जातात; ईश्वराच्या कृती व रीती या सर्वांची तपासणी करून न्यायनिवाडा देण्यासाठीं 'मी'च्या संवेदना, भावना, कल्पना बसलेल्या असतात; या कृति-रीतींचा अर्थ त्या लावतात, त्या अर्थानुसार त्यांचें कमी-अधिक महत्त्व ठरवितात आणि या महत्त्वानुसार त्यांचा क्रम, श्रेष्ठ-कनिष्ठता ठरवितात. 'मी'नें दिलेला हा निकाल वस्तुजातांतील सत्याला धरून नसतो, या सत्याला त्या निकालांत विकृत किंवा निखालस उलटें स्वरूप आलेलें असतें. तथापि मानवी जीवनाच्या आणि प्रगतीच्या एका विशिष्ट विकासावस्थेंत 'मी'च्या निकालांत समाविष्ट झालेले ईश्वरी कृति-रीतींचे अर्थ आणि त्यांचें महत्त्वमापन, मूल्यमापन व्यक्तीला उपयुक्त असतें, तिच्या व्यवहाराला कांहीं कमी पडूं न देणारें असतें. आम्हाला विश्वांत जो अनुभव येतो त्या अनुभवाचें व्यवहारासाठीं व्यवस्थित स्थूल सूत्रीकरण 'मी' करीत असतो; आणि आम्ही जोपर्यंत एका विशिष्ट वैचारिक आणि आचारविषयक भूमिकेवर असतो तोंपर्यंत हीं व्यवहारसूत्रें आम्हाला शिरोधार्य होतात. मात्र मानवी जीवनाची आणि ज्ञानाची परमोच्च अंतिम अवस्था ही या व्यवहारसूत्रांनीं चाललेल्या जीवनापासून व या व्यवहारसूत्रांत प्रतिबिंबित झालेल्या ज्ञानापासून फार दूर आहे. ''सत्य हाच (जीवनाच्या कृतार्थतेचा) मार्ग आहे, असत्य नव्हे'', आणि हें सत्य आहे कीं, ईश्वर हा जीवनाचा केंद्रबिंदु आहे, 'मी' नव्हे. 'मी'च्या भोंवतीं ईश्वर फिरत नाहीं, 'मी'च्या द्वंद्वदर्शी दृष्टीला ईश्वरावर टीका करून बरें-वाईट म्हणण्याचा न्यायाधीशाचा अधिकार नाहीं, तर उलट 'मी' चा जो अनुभव असेल त्या अनुभवांतील खरें सत्य, खरा अर्थ 'मी'च्या संवेदना-भावना-कल्पनांनीं ठरवावयाचा नसून विश्वपुरुष आणि विश्वातीत पुरुष यांच्या दृष्टीनें ठरवावयाचा असतो. तथापि, विश्वात्मता आणि विश्वातीतता याविषयींचें ज्ञान अपूर्ण असतां, वैयक्तिक 'मी'च्या अनुभवासंबंधानें त्या 'मी'च्या कल्पना आपल्या व्यवहाराचा पाया म्हणून जर व्यक्तीनें वापरावयाचें ठरविलें, तर जुन्या अयुक्त कल्पनांऐवजीं नव्या, पण जुन्या इतक्याच खोट्या व निराधार कल्पना मान्य केल्यासारखें होईल आणि याचा परिणाम असा होईल कीं, वैयक्तिक 'मी'चा अधिकार असतांना जी गोंधळाची स्थिति होती तिच्यांत आणखी गोंधळ माजेल. नव्या तत्त्वज्ञानांचा व नव्या धर्मांचा उदय होतांना अशा प्रकारचा, रास्त मूल्यांसंबंधींचा विसंवाद, मानवसमाजांत बहुधा आढळून येतो; पण पुष्कळ वेळां त्यांतून उपयुक्त क्रांतीचा जन्म होतो. परंतु आम्हाला

 

पान क्र. १०४

 

खरें ध्येय गांठावयाचें तर आमची मध्यवर्ति कल्पना बरोबर पाहिजे आणि या कल्पनेच्या भोंवतीं तर्कप्रतिष्ठित परिणामकारक श्रेष्ठ ज्ञानाचें कडें आम्हाला उभें करतां आलें पाहिजे; व्यक्तीचें अहंकेंद्रित जीवन वापरीत असलेलीं सर्व मूल्यें ज्या ज्ञानानें शुद्धीकृत व रूपांतरित होऊन व्यक्तीला परत मिळतील असें तें श्रेष्ठ ज्ञान असेल. आम्हीं याप्रमाणें खरें ध्येय गांठलें म्हणजे आम्हाला सत्यांची नवी श्रेणी लाभेल व आज आम्ही जें जीवन जगत आहों त्याला रजा देऊन त्यापेक्षां अधिक दिव्य असें जीवन आम्हाला जगतां येईल; जीवनासाठीं आम्हाला जें साहित्य विश्व पुरवीत आहे त्यावर आमच्या शक्तींचा पूर्वींहून अधिक दिव्य आणि सामर्थ्यवान् प्रयोग, या नूतन सत्यांच्या बळावर आम्हाला करतां येईल.

आमच्या मानवी विचारपद्धतीला धरून दिव्य जीवनाचें लक्षण व्यक्त करणारीं जीं महान् सत्ये आहेत त्यांचा परिचय करून घेणें व तीं आत्मसात् करणें या गोष्टीवरच मानवी व्यक्तीचें नवें जीवन आणि नवें सामर्थ्य अवलंबून राहील. या नव्या जीवनासाठीं व्यक्तीच्या 'अहम्'नें प्रथम आपला चुकीचा दृष्टिकोन टाकून दिला पाहिजे, त्याला अगदीं खऱ्या वाटणाऱ्या पण खोट्या असणाऱ्या सर्व कल्पना त्यानें सोडून दिल्या पाहिजेत; हा अहम् म्हणजे पूर्ण वस्तु नाहीं; अनेक समष्टींचा तो घटक आहे. एक घटक या नात्यानें या अहम् नें त्या त्या समष्टीशीं योग्य नातें जोडून पूर्ण मेळानें वागलें पाहिजे. तो जसा अनेक समष्टीचा घटक आहे त्याप्रमाणेंच त्याच्याहून उच्च पातळींवरील अनेक वस्तूंच्या व विश्वातीत सत्यांच्या मेळाव्यांतून तो खालीं उतरलेला आहे. या उच्चस्थानीय वस्तूंशींहि योग्य नातें जोडून त्यानें पूर्ण गोडीनें वागलें पाहिजे; तसेंच या अहम् चे जे सत्याचे संकेत आहेत, जे व्यवहारनियम आहेत, त्यांच्याहून श्रेष्ठ असणारें सत्य आणि व्यवहारनियम त्यानें मोकळेपणानें आत्मसात् करण्याची तयारी ठेवली पाहिजे; हें श्रेष्ठ सत्य अहम् चें जीवन कृतार्थ करील आणि हा श्रेष्ठ व्यवहार-नियम अहम् ची सर्व बंधनांतून मुक्तता करील. या वरील क्रमानें जें नवें दिव्य जीवन घडावयाचें असतें त्याचा अंतिम हेतु, वैयक्तिक अहम् नें निर्माण केलेल्या मूल्यांचा त्याग करणें हा असतो; आणि सीमा, अज्ञान, मरण, दुःख, दोष आणि दुष्टत्व यांच्या पार जाणें, यांपासून सर्वथा मुक्त असें जीवन जगणें हा अशा जीवनाचा कळस असतो.

 

पान क्र. १०५

 

हा त्याग, ही मुक्तता या पृथ्वीवर, या आमच्या मानवी जीवनांत शक्य आहे काय ? अर्थात् दिव्य जीवन शक्य आहे काय ? जर आमची आजचीं अहम्-निर्मित मूल्यें आमच्या जीवनाशीं अटळपणें बांधलेलीं असलीं तर तें शक्य नाहीं. जीवन म्हणजे वैयक्तिक अहम् चा व्यवहार, अशीच जर जीवनाची निसर्ग-निर्मित घडण असेल, तें जर विश्वव्यापक अस्तित्वाचें, सद्वस्तूचें व्यक्त स्वरूप नसेल, तें जर महान् चैतन्यमय आत्म्याचें निश्वसन नसेल, तर या पृथ्वीवर मानवाला वर उल्लेखिलेली मुक्तता अथवा दिव्य जीवन शक्य नाहीं असेंच म्हणावें लागेल. व्यक्तीचा आणि वस्तूंचा संबंध आल्यानंतर, व्यक्तीच्या होणाऱ्या केवळ बाह्य प्रतिक्रिया या स्वरूपाचीं हीं द्वंद्वें नसून, सर्व जीवनाचें सार आणि पाया जर हीं द्वंद्वें असतील, सीमाबंधन हा जर, मन आणि शरीर यांच्या द्रव्याचा अपरिहार्य स्वभावधर्म असेल, मरणानें विघटन हीच जर सर्व जीवनाची प्राथमिक व अंतिम शर्त असेल, त्याचा प्रारंभ नि अखेर असेल, सुखदुःख हें जर संवेदनांचें अविभाज्य दुहेरी द्रव्य असेल, हर्ष आणि विषाद हा जर अन्य सर्व भावनांचा छाया-प्रकाशाप्रमाणें दुहेरी व अटळ सहयोगी असेल, सत्यता आणि भ्रम किंवा प्रमाद या दोन ध्रुवांभोंवतीं जर सर्व ज्ञान सदैव फेरे घालण्यास बांधलेलें असेल तर वर उल्लेखिलेली मुक्ति एकाच मार्गानें मनुष्याला प्राप्त होण्यासारखी आहे; आणि तो मार्ग म्हणजे सर्व अस्तित्वाच्या पलीकडे असलेल्या निर्वाणांत मनुष्यानें आपल्या जीवनाचा लय करावा किंवा या भौतिक दुनियेहून, इहलोकाहून अत्यंत वेगळ्या घडणीच्या जगांत म्हणा, किंवा स्वर्गांत म्हणा, त्यानें जाऊन रहावें.

माणसाचें रूढिप्रिय व रूढिबद्ध मन जुन्या संबंधांचा आणि चालू संबंधांचा नेहमीं रवंथ करीत असतें, या संबंधांचा त्याला फार ओढा असतो; त्या संबंधांना सोडून पलीकडचा, रूढ संवयीच्या गोष्टींपलीकडचा विचार किंवा कल्पना करणें त्याला जड जातें. मानवाच्या प्रस्तुतच्या कायम वाटणाऱ्या परिस्थितींत, त्याच्या सभोंवारच्या गोष्टींत, व त्याच्या स्वतांत आमूलाग्र बदल घडूनहि त्याचें मानवत्वहि राहूं शकतें अशी कल्पना करणें हें आमच्या पुराणप्रिय, व प्रस्तुतप्रिय संवयींचा गुलाम असलेल्या मनाला तितकेसें सोपें नाहीं. आमचा जो थोर विकास यापुढें होणार आहे, होणें संभवनीय आहे, त्याच्या तुलनेनें आमची आजची अवस्था डार्विनच्या विकास-विषयक सिद्धांतांतील मूळ वानराच्या अवस्थेप्रमाणें आहे. डार्विनचा वानर जुनाट अरण्यांत झाडाझुडपांच्या आश्रयानें आपलें जीवन आपल्या

 

पान क्र. १०६

 

जन्मजात सहजप्रेरणांनुसार जगत होता. त्याला अशी कल्पना करणें अशक्य झालें असतें कीं, पुढें एक दिवस त्याच्याहून एक वेगळा प्राणी या पृथ्वीवर जन्माला येईल, त्याला एक नवीन बुद्धि नांवाची शक्ति मिळालेली असेल, ही बुद्धि तो प्राणी आपल्या बाहेरील आणि आंतील अस्तित्वाच्या सामग्रीवर खर्च करून, आपल्या उपजत प्रेरणांवर आणि संवयींवर हुकुमत चालवील, आपल्या स्थूल भौतिक जीवनाची परिस्थिति या बुद्धीच्या प्रभावानें तो बदलून टाकील, तो स्वत:साठीं दगडाची घरें बांधील, निसर्गाच्या शक्ती तो आपल्या तंत्रांत आणील, समुद्रावर तो जहाजानें प्रवास करील, आकाशांत तो विमानानें भराऱ्या मारील, तो आचारांचे नियम बांधील, बौद्धिक व आध्यात्मिक विकासासाठीं तो ज्ञानपूर्वक, संकल्पपूर्वक चालावयाचे मार्ग हळूहळू, क्रमाक्रमानें तयार करील - पुढें जन्मास येणाऱ्या अशा प्राण्याची कल्पना करणें डार्विनच्या वानराला अशक्य झालें असतें. तथापि असें समजूं कीं, ही कल्पना त्याला करतां आली असती; तरीपण याच्यापुढें जाऊन त्याला अशी कल्पना करतां आली असती काय कीं, निसर्गांत प्रगति होत होत किंवा दीर्घकाळ पावेतों केलेल्या स्वत:च्या इच्छाशक्तीच्या व मनोवृत्तीच्या खटाटोपानें आपण स्वतःच क्रमविकासानें वर वर्णिलेला बुद्धिमान् प्राणी होऊं शकू ? त्या वानराला ही दुसरी कल्पना करणें निश्चितच फार फार अवघड होतें. पण मानवाला बुद्धि लाभली आहे, त्याला कल्पनाशक्ति आहे, त्याला अंत:स्फूर्तीची शक्ति आहे; या शक्तींचा तो भरपूर उपयोग करीत असतो, म्हणून त्याला स्वत:च्या जीवनापेक्षा श्रेष्ठ तऱ्हेचें जीवन कल्पनेनें आपल्या समोर उभें करतां येतें. एवढेंच नव्हे तर, स्वत:ची प्रस्तुत जीवनसरणी मागें टाकून, कल्पनेनें रंगवलेलें तें श्रेष्ठ श्रेणीचें जीवन आपण जगूं शकूं, अशीहि कल्पना त्याला करतां येते. परंतु श्रेष्ठांत श्रेष्ठ, सर्वोच्च, सर्वोत्तम जीवनाचें जें चित्र तो रंगवतो त्या चित्रांत तो स्वत:ला तें जीवन जगणारा म्हणून बसवावयास धजत नाहीं. त्याच्या स्वाभाविक आकांक्षेला ज्या गोष्टी स्पृहणीय वाटतात, त्याच्या विचारांना ज्या गोष्टी संग्राह्य वाटतात, त्या गोष्टींचें निरतिशय श्रेष्ठ स्वरूप त्याच्या सर्वोत्तम जीवनाच्या कल्पनेंत सामावलेलें असतें. सर्वोत्तम जीवनांत त्याला ज्ञान दिसतें; त्या ज्ञानाची पडछाया, भ्रम किंवा प्रमाद अर्थात् अ-ज्ञान दिसत नाहीं. सामान्य जीवनांत ज्ञान आणि अ-ज्ञान अविभाज्य असतात, तर सर्वोत्तम जीवनांत त्याला आनंद दिसतो. सामान्य जीवनांत अटळपणें अनुभवास येणारा, विरुद्ध प्रकृतीचा

 

पान क्र. १०७

 

त्याचा जोडीदार विषाद, उद्वेग, संताप, त्याला त्यांत दिसत नाहीं. सर्वोत्तम जीवनांत त्याला सामर्थ्य दिसतें; त्याला नेहमीं नष्टवत् करणारें अ-सामर्थ्य, अक्षमता, अपात्रता तेथें त्याला दिसत नाहींत. सर्वोत्तम जीवनांत त्याला अस्तित्वाची असीम शुद्धता, समृद्धता दिसते; त्यांच्या विरोधी गोष्टी - अशुद्धता किंवा दोष, असमृद्धता किंवा सीमाबद्धता - दिसत नाहींत. वानर जेव्हां देवांची कल्पना करतो, तेव्हां त्यांना हें सर्वोत्तम जीवन तो बहाल करतो; तो स्वर्गाची कल्पना करतो, तेव्हां त्या स्वर्गांत सर्वोत्तम जीवन सार्वत्रिक असल्याचें तो समजतो. परंतु पृथ्वीचें किंवा पृथ्वीवरील मानवतेचें कितीहि दूरचें, भावी चित्र काढलें तरी त्यांत त्याची बुद्धि सर्वोत्तम जीवन पाहूं शकत नाहीं. पृथ्वीचा केव्हांतरी स्वर्ग होईल व मानवाचा इथेंच देव बनेल हें त्या बुद्धीला संभवनीय वाटत नाहीं. परंतु मानवाचें जें स्वर्गाचें व त्यामधील देवांचें स्वप्न आहे, तें वस्तुत:, स्वत: तो पूर्णतेला पोंचल्यानंतर कसा असेल त्या स्थितीचेंच स्वप्न आहे. परंतु मानवाचा ''मूळ पुरुष'' जो वानर, त्याला 'तूं पुढें मनुष्य होणार' असें कुणी सांगितलें असतें तर त्यावर विश्वास ठेवणें जसें त्याला जड गेलें असतें, तसेंच मानवाला स्वत:च्या पूर्णतेचें स्वप्न येथें वास्तवांत आणणें व तें स्वतःचें अंतिम साध्य म्हणून निश्चित करणें जड जात आहे. त्याची कल्पनाशक्ति, त्याची धार्मिक आकांक्षा पूर्णतेचें साध्य त्याच्यासमोर ठेवील परंतु त्याची बुद्धि काम करूं लागली व तिनें 'आपलें तेंच खरें' असा हट्ट धरून एकदां का बुद्धीपलीकडील अंतःस्फूर्तीनें व कल्पनेनें रंगवलेलें चित्र स्वत:ला नापसंत म्हणून बाजूला टाकलें, म्हणजे मानवहि बुद्धीलाच प्रमाण मानतो आणि अंत:स्फूर्तीचें चित्र म्हणजे एक भव्य पण बिनबुडाची निराधार कल्पना असून भौतिक विश्वांतील रोखठोक वस्तूंच्या व घटनांच्या अगदीं उलट स्वरूपाचें व वास्तवांत बिलकुल न येण्याजोगें टाकाऊ चित्र आहे, असा निकाल तो देतो. अशक्य, असंभाव्य अशा ध्येयभूत अवस्थेचें तें दर्शन आहे असें तो फारतर मानतो; आणि आपलें सामान्य जीवन उंचावण्यासाठीं त्यापासून थोडीबहुत प्रेरणा, थोडीबहुत स्फूर्ति, तो घेत राहतो. आपल्या बुद्धीला प्रमाण मानून तो असें ठरवितो कीं, जें जीवन येथें शक्य आहे त्या जीवनांत ज्ञान, सुख, सामर्थ्य, सौजन्य या सर्व गोष्टी सापेक्ष, मर्यादित व अनिश्चित स्वरूपाच्या असणार.

तथापि बुद्धीच्या अतीत कांहीं श्रेष्ठ वस्तु आहे हें बुद्धितत्त्वांतच गृहीत धरल्यासारखें दिसतें. कारण बुद्धीचें सारसर्वस्व व एकमेव ध्येय म्हणजे

 

पान क्र. १०८

 

ज्ञानाच्या अर्थात् सत्याच्या शोधांत अविरत राहणें हें होय. सर्व असत्य व विपरीत ज्ञान नाहींसें करीत करीत सत्य व खरें ज्ञान आत्मसात् करणें हा बुद्धीचा उपजत गुण. फार चुकत असतें तेथें कमी चूक व्हावी, असत्याच्या, भ्रमाच्या कक्षा निमूळत्या करून त्यांचे प्रांत कमी कमी करावे हाच केवळ बुद्धीचा हेतु अथवा दृष्टि नसते. बुद्धीच्या दृष्टीपुढें सत्य म्हणून कांहीं स्वतंत्र व तिच्या उदयाच्या पूर्वींपासून अस्तित्वांत असणारी वस्तु असते; आणि खरें ज्ञान, खोटें ज्ञान या द्वंद्वाच्या मार्गानें हळूहळू क्रमाक्रमानें त्या वस्तूच्या जवळजवळ जात रहावें असा तिचा हेतु असतो. तें सत्य आहे याबद्दल बुद्धीला संशय नसतो. सत्यवस्तूच्या अस्तित्वाबद्दल जशी बुद्धीला खात्री असते तशी खात्री तिला मनुष्याच्या दुसऱ्या आकांक्षित गोष्टींबद्दल असत नाहीं. याचें कारण, तिच्या विशिष्ट प्रांतांत, सत्याच्या प्रांतांत, तिला ज्या स्वयंभू अंतःप्रकाशाचें साह्य मिळतें त्या प्रकाशाचें साह्य तिला इतर प्रांतांत मिळत नाहीं हें होय. सुखाची निरतिशय स्थिति आम्हाला प्राप्त होऊं शकेल अशी आम्ही कल्पना करूं शकतो याचें कारण, बुद्धीहून वेगळें हृदय म्हणून जें आमचें अंग आहे, ज्याला स्वभावत: सुखाचा ओढा असतो, त्या हृदयाला निश्चित-ज्ञानाचा एक प्रकार उपलब्ध असतो; अर्थात् त्याला श्रद्धा ठेवण्याची शक्ति असते आणि दुःखाचें मूळ जी अतृप्त इच्छा ती समूळ उपटून टाकतां येईल अशी भविष्यासंबंधानें आमच्या मनाला कल्पना करतां येते. हृदयाला निर्भेळ सुखाच्या अंतिम प्राप्तीची ज्याप्रमाणें खात्री असते, त्याप्रमाणें शारीर ज्ञानतंतूना दुःखसंवेदनांपासून व शारीरिक जीवनाला मरणापासून मुक्तता मिळण्याची खात्री आहे काय ? शारीर संवेदनांतील दुःखाचा अभाव, शारीर जीवनाच्या अंताचा अभाव आम्हाला कसा काय कल्पितां येणार ? मात्र वस्तुस्थिति अशी आहे कीं, संवेदनांत अशी उपजत प्रभावी भावना असते कीं, दुःख म्हणून नसावेंच, दुःख ही कांहींतरी आगंतुक गोष्ट आहे व ती नाहींशी होऊं शकेल. शरीरांत काम करणाऱ्या प्राणाला, स्वभावत: स्वतःचा अंत अस्वाभाविक वाटतो; हा अंत होतां कामा नये अशी त्याच्या अंतरांत सारखी मागणी चालू असते आणि ही 'हक्काची मागणी' आहे अशी त्याची प्रभावी प्रबल भावना असते. आमच्या बुद्धीला संवेदनांच्या व प्राणाच्या या गोष्टी म्हणजे नैसर्गिक, जन्मजात भावना, कल्पना व आकांक्षा आहेत असें वाटतें परंतु त्या केव्हांतरी पूर्ण होऊं शकतील अशी कल्पना तिला होत नाहीं.

 

पान क्र. १०९

 

परंतु यांत बुद्धीची अप्रबुद्धता दिसते. वस्तुत: एकच नियम सर्वत्र लावणें हें बुद्धीचें काम आहे. परंतु व्यवहारवादी बुद्धि अशी चूक करते कीं, जी गोष्ट स्पष्टपणें तिच्या प्रत्ययास येते तिच्या ती अतिरिक्तपणें अंकित होऊन राहते; आणि ज्या गोष्टी आज स्पष्ट प्रत्ययास येत नाहींत पण ज्या महत्त्वाच्या गोष्टींची शक्यता स्पष्ट प्रत्ययास येते त्या गोष्टींसंबंधानें ती तर्कशुद्ध रीतीनें विचार करून तर्कशुद्ध निर्णय घेत नाहीं, तसें धैर्य ती दाखवीत नाहीं. खरी गोष्ट अशी आहे कीं, आज जें जें अस्तित्वांत आहे, तें पूर्वीं एका काळीं 'शक्यतेच्या,' शक्य अस्तित्वाच्या वर्गांत होतें. तेव्हां आज जें शक्यतेच्या वर्गांत असेल, तें भावी कालांत 'वास्तव अस्तित्वाच्या' वर्गांत जाईल असा तर्क करणें युक्तिसंगत आहे. बुद्धि, हृदय, शारीर संवेदना, शारीरजीवन यांना ज्या गोष्टी हव्याशा वाटतात त्या गोष्टींची शक्यता आज स्पष्ट प्रत्ययास येत आहे. कारण, वस्तूंचें व घटनांचें अस्तित्व कशावर अवलंबून आहे, त्यांचीं कारणें कोणतीं, त्यांच्या प्रक्रिया कोणत्या या गोष्टींच्या ज्ञानानें वस्तूंवर व घटनांवर सत्ता प्राप्त होत असते आणि पूर्ण सत्याच्या आड येणाऱ्या प्रमादाचीं, भ्रमाचीं कारणें, नित्य सुखाच्या विरोधी असलेल्या मानसिक दुःखाचे हेतू, नित्य सुखाला दूर ठेवणाऱ्या शारीर दुःखाचें मूळ, नित्य जीवनविरोधी असलेल्या मरणाचें मूळ, या गोष्टींचें स्वच्छ ज्ञान जर आम्हाला शक्य झालें, तर हीं कारणें नाहींशीं करण्यासाठीं आम्ही प्रयत्न करूं शकूं आणि या प्रयत्नांत यशस्वी होण्याची आशा-अपेक्षा देखील थोडीबहुत बाळगूं शकूं. कारण ज्ञान ही सत्ता आहे, ज्ञान हेंच प्रभुत्व आहे.

वास्तविक गोष्ट अशी आहे कीं, प्रमाद, मानसिक दुःख आदि विरोधी, अनिष्ट गोष्टी शक्य तेवढ्या दूर करणें, नाहींशा करणें हें आम्ही आमचें ध्येय मानतो. प्रमादाचीं आणि मानसिक व शारीरिक दु:खांचीं कारणें शक्य तेवढीं कमी करण्यासाठीं आम्ही सारखा प्रयत्न करीत असतो. भौतिक विज्ञान वाढत आहे. वाढतें भौतिक शास्त्रीय ज्ञान जन्माचें नियमन करण्याचें, व आयुर्मर्यादा शक्य तितकी अधिक वाढविण्याचें स्वप्न पहात आहे; मरणावर पूर्ण विजय मिळविण्याची गोष्ट हें नवें शास्त्र अद्यापि काढीत नसलें तरी मरण खूप खूप दूर लोटण्याचें स्वप्न त्याला दिसत आहे, अनिष्ट गोष्टींचीं जीं कारणें दूर करण्याचा आम्ही यत्न करतों तीं, अगदीं मुळांतलीं कारणें नसून दुय्यम, बाह्य कारणें असतात; अर्थात् ही बाह्य, दुय्यम कारणें शक्य तितकी दूर हटविण्याचाच

 

पान क्र. ११०

 

विचार आम्ही करूं शकतो. आम्हाला जें नको आहे, ज्याच्या विरुद्ध आम्ही झगडतो त्या अनिष्टाचीं खरीं मुळें उखडून फेंकून देण्याचा विचार आम्ही करूं शकत नाहीं. कारण तीं खरीं मुळें हुडकून काढण्याचा यत्न आम्ही करीत नाहीं. मूळ सत्याचा शोध करण्याचा आमचा यत्न नसतो, तर दुय्यम अनुभव घेण्याकडे आमचें सर्व लक्ष असतें; वस्तूंच्या क्रिया-प्रक्रिया आम्ही जाणून घेतो, परंतु वस्तूंचें सारतत्त्व, वस्तूंचा गाभा आम्ही जाणून घेत नाहीं. अर्थात् परिस्थिति बदलण्याचें काम आम्ही प्रभावीपणें करूं शकतो, पण मुळावर सत्ता चालवणें, नियंत्रण ठेवणें आम्हास शक्य होत नाहीं. परंतु प्रमाद किंवा भ्रम, दुःख व मरण या गोष्टींचें तात्त्विक कारण काय आहे हें ज्ञान जर आम्हीं आत्मसात् केलें तर या अनिष्टावर मर्यादित नव्हे, तर पूर्ण हुकमत चालविण्याचें सामर्थ्य आम्हाला लाभेल, लाभणें शक्य होईल; इतकेंच नव्हे तर, अशी देखील शक्यता आहे कीं, या अनिष्ट गोष्टी आम्हाला अजिबात नाहींशा करतां येतील, आणि निर्भेळ, निरतिशय सौजन्य, सुख, ज्ञान आणि अमर जीवन आम्हाला मिळवितां येईल. आमच्या निसर्गजात अंतर्दृष्टीला मानवी अस्तित्वाची जी अंतिम, वास्तव अवस्था स्पष्टपणें दिसते ती याप्रमाणें आम्हाला लाभून, आमची जन्मजात बलिष्ठ भविष्यविषयक भावना बरोबर आहे असें आमच्या यशस्वी प्रगतीनें व अंतिम ध्येयप्राप्तीनें सिद्ध होईल, अशी आशा करण्याला भरपूर जागा आहे.

अनिष्ट गोष्टी नष्ट करून, इष्ट असलेल्या निरतिशय निर्भेळ सुखादि गोष्टी कशा मिळवितां येतील, या प्रश्नाचा आमच्या प्राचीन वेदांतानें विचार करून, आमच्यापुढें ब्रह्मविचार मांडला आहे. ब्रह्माचा स्वभाव सच्चिदानंद हा आहे. ब्रह्म ही एकच एक सर्वव्यापी मूळ सद्वस्तु सर्व विश्वघटनांच्या मुळाशीं आहे, हा विचार आणि अनुभव, आमचें अनिष्ट दूर करील आणि आमचें इष्ट आम्हाला देईल असें वेदांताचें आपल्यापुढील प्रश्नाला उत्तर आहे.

या वेदांती दृष्टीनुसार एका सर्वव्यापी अनश्वर सद्वस्तूची गतिशीलता, हें सर्व जीवांच्या जीवनाचें सारभूत स्वरूप आहे; सर्व संवेदना आणि भावना यांचें मूळस्वरूप, सर्वव्यापी स्वयंभू आनंदाचा -- अस्तित्वाच्या आनंदाचा -- खेळ, हें आहे, सर्वव्यापी सर्वांतर्यामी सत्यापासून स्वभावत: बाहेर पडणारे किरण, हें सर्व विचार आणि सर्व प्रत्यय यांचें सारभूत तत्त्व आहे; सर्वव्यापी स्वयंप्रकटनसमर्थ साधुत्वाचें, मांगल्याचें सदैव पुढें पुढें जाणें हें सर्व क्रियांचें हृदयभूत सर्वस्व आहे.

 

पान क्र. १११

 

पण हा खेळ, ही एकतत्त्वाची गतिशीलता अनेक आकारांत, अनेक वृत्तींत, अनेक शक्तींच्या परस्परांवरील अनेक प्रयोगांत व्यक्त होते. या अनेकत्वामध्यें वैयक्तिक 'मी'च्या अस्तित्वाला, त्याच्या हस्तक्षेपाला जागा असते, हा 'मी', सर्वव्यापी एकतत्त्वाच्या आविष्काराला कांहीं नियमित रूप देतो, आणि कांहीं काळपर्यंत या आविष्कारांत वैगुण्यहि आणतो. सर्वव्यापी जाणिवेनें स्वत:ला मर्यादित करणें, हा या 'मी' चा स्वभाव व स्वरूप आहे. सर्वव्यापी खेळाचा थोडासा भाग जाणिवेच्या क्षेत्रांत ठेवून, बाकी सर्व भाग बुद्धिपुरःसर जाणिवेंतून काढून टाकणें, हें 'मी'चें स्वरूप आहे. एका विशिष्ट रूपांत, आकारांत (बाकी सर्व विसरून) जाणिवेनें निमग्न होऊन राहणें, हें 'मी'चें स्वरूप आहे; एका विशिष्ट रूपांत, वृत्तींच्या एका विशिष्ट संघांत, शक्तींच्या एका विशिष्ट कार्यक्षेत्रांत सर्वव्यापी जाणिवेनें स्वत:ला कोंडून घेणें हें 'मी'चें स्वरूप आहे. प्रमाद किंवा भ्रम, मानसिक तथा शारीरिक दुःख, दुष्टत्व आणि मरण या गोष्टी, 'मी' उत्पन्न करतो; या गोष्टी 'मी'च्या प्रतिक्रियेनें जन्मास येतात. वस्तुत: एकच एक तत्त्व, आनंद-सत्य-शिवरूप अस्तित्व, आपल्या गतिशीलतेनें ज्या हालचालींना जन्म देतें त्या हालचालींचा, त्या जन्मदात्या एकतत्त्वाशीं योग्य तो संबंध असतो. पण हा संबंध आपला 'मी' ओळखीत नाहीं. तो आपल्या संकुचित दृष्टीनें या हालचाली बघतो आणि त्यांतील कोणाला प्रमाद किंवा भ्रम, कोणाला मानसिक दुःख इत्यादि नांवें, त्याच्या अनुभवानुसार देतो. 'मी' नें अनुभवलेल्या दु:खादि प्रतिक्रियारूप गोष्टी आम्हाला नाहींशा करतां येतील, जर आम्ही वरील हालचालींचा एका सद्वस्तूशीं असलेला संबंध अनुभवण्यास समर्थ होऊं. हा मूळ संबंध आम्हाला अनुभवतां आला तर दु:खादि रूपानें भासणाऱ्या गोष्टींचें खरें मूल्य, खरा अर्थ, आम्हाला कळेल. विश्वसमष्टीच्या जाणिवेशीं व्यक्तीनें योग्य संबंध ठेवला, ती जाणीव आपलीशी केली, तिच्यांतील योग्य तो वांटा आत्मसात् केला, त्याचप्रमाणें, ही समष्टि ज्या विश्वातीत जाणिवेचें व्यक्त रूप आहे त्या जाणिवेचाहि योग्य वांटा व्यक्तीनें आपलासा केला, म्हणजे विश्वातीत एकतत्त्वाच्या, विश्वांतील हालचालींचा योग्य संबंध व्यक्तीच्या पुन: अनुभवास येईल व संकुचित प्रतिक्रियेनें उदय पावणारे भ्रमादि अनुभवाचें प्रकार नाहींसे होतील.

उत्तर वेदांतामध्यें अशी कल्पना आली आणि रूढ होऊन बसली कीं,

 

पान क्र. ११२

 

मर्यादित 'मी' हा केवळ द्वंद्वांचें कारण नव्हे, तर विश्वाच्या अस्तित्वाचा मूळ पाया आहे. 'मी'चें अज्ञान दूर केल्यानें आणि त्याच्या अज्ञानजन्य मर्यादा नाहींशा केल्यानें आपण द्वंद्वें नाहींशीं करतों हें तर खरेंच, पण या द्वंद्वांच्या निकालाबरोबर आम्ही विश्वांतील आमच्या अस्तित्वाचाहि लय करतो. या कल्पनेनुसार मानवाचें अस्तित्व मुळांतच दुःखमय आणि भ्रमरूप आहे, आणि विश्वांत राहून पूर्णता मिळविण्याचा प्रयत्न करणें निरर्थक आहे. या विश्वांत सर्व कांहीं सापेक्षच लाभेल, चांगल्या बरोबर वाईटहि बांधलेलें आहे, अन्योन्यविरोधी गोष्टींचें भांडार म्हणजे विश्व, येथें इष्ट गोष्ट मिळविण्याचा प्रयत्न आम्हीं करावा, पण तिची विरोधी, अनिष्ट गोष्ट तिला जोडलेली असल्यानें ती पत्करण्याची तयारी ठेवावी - अशी विश्वासंबंधींची व त्या विश्वांतील आमच्या जीवनासंबंधींची उत्तरवेदांताची कल्पना आहे. या कल्पनेहून अधिक विशाल आणि सत्यस्पर्शी कल्पना ही आहे कीं, 'मी' हा त्याच्या पलीकडे असलेल्या परम तत्त्वाचा मध्यस्थ प्रतिनिधिरूप आहे, परमतत्त्वाचें अल्पकालिक प्रतीक आहे. ही विशाल कल्पना आम्हीं आत्मसात् केली, तर पूर्णतेच्या प्रयत्नाची निरर्थकता ही खोटी कल्पना आहे, असें आमच्या प्रत्ययास येईल आणि आमचें जीवन पूर्णतासंपन्न करण्यासाठीं आम्ही वेदान्त उपयोगांत आणूं, जीवनांतून पळून जाण्यासाठीं त्याचा उपयोग करणार नाहीं. विश्वाचें अस्तित्व हें ईश्वर किंवा पुरुष या तत्त्वावर आधारलेलें आहे. विश्वाचा मूळ पाया, मूळ कारण ईश्वर आहे; व्यक्तीचीं रूपें, समष्टीचीं रूपें ईश्वर व्यक्त करतो व या रूपांत तो प्रवेश करून जीवन जगतो, हें विश्वाच्या अस्तित्वाचें स्वरूप आहे. वैयक्तिक 'मी', मर्यादित 'मी' हें जाणिवेचें एक मधल्या अवस्थेंतील रूप आहे; जाणिवेचा विकास एका विशिष्ट मार्गानें करण्यासाठीं या वैयक्तिक 'मी'ची आवश्यकता असते. या मार्गानें गेले असतां, व्यक्ति तिच्या पलीकडील ज्या सद्वस्तूची प्रतीक आहे त्या सद्वस्तूशीं एकरूप होऊन, शिवाय त्या सद्वस्तूचें ती प्रतिनिधित्व करूं शकते. अर्थात् हें प्रतिनिधित्व अंधारांत चांचपडणारा व मर्यादांच्या कोंडींत वावरणारा 'मी' होऊन किंवा राहून व्यक्ति करीत नाहीं, तर त्या दिव्य सद्वस्तूचें आणि विश्वपुरुषाचें ती एक केंद्रस्थान बनते; आणि वैयक्तिक म्हणून जे कांहीं नियतसंबंध असतील त्या सर्वांना हें दिव्य केंद्र व्यापून टाकते, त्यांचा दिव्य उपयोग करतें आणि दिव्य सद्वस्तूशीं त्या सर्व संबंधांचा व संबंधित गोष्टींचा सुंदर मेळ बसवितें.

 

पान क्र. ११३

 

ज्ञानमय पुरुषोत्तम हा भौतिक निसर्गाची समष्टि या रूपानें व्यक्त झाला आहे. ही समष्टि, भौतिक विश्वांतील मानवी अस्तित्वाचा पाया आहे. प्राण, मन व विज्ञान (अतिमानस) हीं आवरणें घेऊन हा पुरुषोत्तम, जड निसर्गांत दडला आहे. तो या निसर्गांत प्राणमय, मनोमय, व विज्ञानमय अशा रूपांनीं क्रमश: एकाहून एक श्रेष्ठ रूपांत व्यक्त होणें - हें आमच्या सर्व हालचालींचे मूळ कारण आहे. या अनिवार्य विकासक्रमामुळें मानव जडांत अवतरला. आपल्या शरीरांत ईश्वर क्रमश: व्यक्त करण्याचें सामर्थ्य हा विकासक्रम त्याला देईल - तो शेवटीं देहधारी विश्वपुरुष होईल, तो ईश्वराचा मानवदेहधारी विश्वव्यापी असा अवतार होईल. वरील विकास घडवून आणण्यासाठीं वैयक्तिक 'मी' ची रचना केलेली आहे. जड निसर्ग हा ईश्वराचें अगदीं खालचें समष्टिरूप. हें तळांतलें रूप आणि मानवाच्या पातळीवरील ईश्वराचें रूप, या दोहोंमध्यें 'हृद्य समुद्र' या शब्दांनीं ऋग्वेदांत वर्णिलेलें समष्टिरूप आहे. या समष्टिरूपांत स्पष्ट प्रकाश नाहीं, रचना नाहीं - रचनाहीन, वैशिष्ट्यशून्य, अमर्याद पसारा, असें या समष्टीचें रूप आहे. निश्चेतन समष्टीच्या वरील ही अर्धजड - अर्धचेतन समष्टि होय. मानवी पातळीवरील समष्टि ही चेतन समष्टि. हिच्यामध्यें वैयक्तिक 'मी' द्वंद्वें निर्माण करतो. जीवन-मरण, मानसिक सुखदु:ख, शारीरिक सुखदु:ख, सत्य-असत्य, साधुत्व-असाधुत्व या रचना मींच्या कर्तृत्वानें निर्माण होतात. निर्भेळ नित्य असें सत्य, साधुत्व, जीवन व सुख यांची मूर्ति म्हणजे विश्वसमष्टि. या समष्टीला, समष्टीच्या एकत्वाला बहिष्कृत करून आपली रचना ही विकासकार्यापुरती आहे हें न जाणून, आपलें स्वतंत्रत्व, स्वतंत्र एकत्व अनुभवण्याचा प्रयत्न करून, व्यक्ति -- वैयक्तिक मी -- स्वाभाविकपणें व अगतिकपणें द्वंद्वें उभीं करतो. विश्वाला व ईश्वराला ओळखून त्यांना सामावून घेण्यासाठीं विकासक्रमांत व्यक्ति, आपला ''आत्मा'', सुटा मोकळा करते; आणि असें झालें म्हणजे ''मी'' या रचनेचा उपयोग संपून ती नाहींशीं होण्याच्या मार्गास लागते. विश्व आणि विश्वेश्वर यांना आत्म्यांत सांठविण्याचा उद्योग व्यक्तीनें आरंभिला म्हणजे, जें श्रेष्ठांत श्रेष्ठ कृतार्थपण व्यक्तीला मिळावयाचें, वा मिळवावयाचें असतें त्याची साधना तिनें सुरू केली असें समजावें. ''मी'' चें जीवन हें, या कृतार्थतेच्या सिद्धीसाठीं अवश्य असणारी पूर्वभूमिका आहे, ज्याप्रमाणें मानवी जीवनाच्या सिद्धीसाठीं पशु जीवन ही एक आवश्यक पूर्वभूमिका आहे. मर्यादित 'मी' चें, संपूर्ण रूपांतर घडून व्यक्तीमध्यें

 

पान क्र. ११४

 

सर्वात्मक पुरुष अभिव्यक्त होतो, व्यक्ति सर्वरूप होते. हा मर्यादित 'मी', विश्वात्मा व विश्वातीत ईश्वर यांच्या दर्शनामुळें, आपलें संकुचित स्वरूप टाकून, ईश्वरी एकत्वाचें जाणीवयुक्त केंद्र बनतो, ईश्वरी स्वतंत्रतेचें ज्ञानपूर्ण केंद्र बनतो. याप्रमाणें मानव कृतार्थ होतो, व्यक्ति कृतार्थ होते, आणि विश्वांत ज्या अनेक व्यक्ती असतात त्या व्यक्तींच्या जीवनावर व जीवनक्षेत्रावर अशा कृतार्थ व्यक्तीच्या द्वारां, अनंत असीम अस्तित्व-सत्य-शिव-आनंद यांची पावन गंगा वाहूं लागते. या कृतार्थ व्यक्तीला निरतिशय पुष्टि-तुष्टि देणारा हा पवित्र प्रवाह, ती व्यक्ती स्वयंस्फूर्तीनें सभोवारच्या सहचर आत्म्यांच्या तुष्टि-पुष्टीसाठीं, त्यांच्या जीवनक्षेत्रांत नेऊन सोडते - आमच्या विकासाच्या फेऱ्या याच दिव्य फलाच्या सिद्धीसाठीं चालल्या आहेत. निसर्गमाता आपल्या उदरांत हें सर्वोत्तम फलरूपीं बाळ वागवीत आहे; या बाळाला विश्वाच्या कृतार्थतेसाठीं जन्म देऊन, आपण कृतार्थ व्हावें या उद्देशानें ती सर्व प्रकारचे प्रयत्न करीत आहे.

 

पान क्र. ११५









Let us co-create the website.

Share your feedback. Help us improve. Or ask a question.

Image Description
Connect for updates