दिव्य जीवन 1879 pages 1960 Edition
Marathi Translation
  Senapati Bapat

ABOUT

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics, expounding a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth.

THEME

philosophymetaphysics

दिव्य जीवन

Sri Aurobindo symbol
Sri Aurobindo

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.

Sri Aurobindo Birth Centenary Library (SABCL) The Life Divine Vols. 18,19 1070 pages 1970 Edition
English
 PDF    philosophymetaphysics
Sri Aurobindo symbol
Sri Aurobindo

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.

Marathi Translations of books by Sri Aurobindo दिव्य जीवन 1879 pages 1960 Edition
Marathi Translation
Translator:   Senapati Bapat  PDF    LINK

 

प्रकरण - सत्ताविसावें

 

अस्तित्वाच्या सात तारा (तंतू)

 

माझें मन अज्ञानांत गुरफटलेलें आहे, या अज्ञानामुळें, माझ्या अंतरांत या ज्या देवांच्या सात पायऱ्या आहेत त्यांच्या संबंधानें मी विचारपूस करीत आहे. देव हे सर्वज्ञ; एक वर्षाचें बाळ घेऊन त्याच्या अंगाभोंवतीं त्यांनीं सात तारांनीं (तंतूंनी) हें वस्त्र विणून घातलें आहे.

- ऋग्वेद १.१६४.५

 

येथवर आम्हीं अस्तित्वाच्या सात पायऱ्यांची तपासणी केली; या सात महान् पायऱ्या, विश्वाच्या एकंदर अस्तित्वाच्या पायाच्या ठिकाणीं आहेत, विश्वाचें सात प्रकारचें स्वरूप या पायावर आधारलेलें आहे, असा सिद्धांत प्राचीन ऋषींनीं केला; या पायऱ्या तपासून आम्हीं त्यांच्या प्रकटनाचे (विकासाचे) आणि तिरोधानाचे क्रमवार टप्पे पाहून घेतले; याप्रमाणें आम्हांला इष्ट असणारें पायाभूत ज्ञान आम्हीं प्राप्त करून घेतलें आहे. ईश्वरी सत्ता स्वभावत: सर्वातीत सर्वनिरपेक्ष अनंत अस्तित्व, अनंत जाणीव व अनंत आनंद या त्रिमुखी एकतत्त्वाची आहे आणि विश्वांत जें कांहीं आहे त्याचें मूळ हें त्रिमुखी एकतत्त्व आहे, त्याला पोटांत सामावणारें आहे, त्याचें मूळारंभींचें अंतिम सत्य आहे, ही गोष्ट आम्हीं नमूद केली आहे. मूळ जाणिवेच्या (ज्ञानाच्या) दोन बाजू आहेत, एक प्रकाशक आणि दुसरी कार्यकारी; एक आत्म-जाणिवेची सामर्थ्यशील अवस्था, दुसरी आत्मशक्तीची सामर्थ्यशील अवस्था; मूळ अस्तित्व, मूळ पुरुषोत्तम या द्विमुखी मूळ जाणिवेनें युक्त असतो; अक्रिय स्वस्थता किंवा सक्रिय गतिमानता, या मूळ अस्तित्वाच्या दोन अवस्था होत; या दोनहि अवस्थांत द्विमुखी मूळ जाणीव, मूळ अस्तित्वाला धरून असते; मूळ अस्तित्व ज्यावेळीं निर्मितीच्या क्रिया करतें, त्यावेळीं त्याच्या पोटांत गुप्तपणें काय काय सांठविलें आहे याचें ज्ञान, त्याचें सर्वसमर्थ आत्म-ज्ञान त्याला करून देतें; हें गुप्त भांडार प्रकट करणें म्हणजेच निर्मितीची क्रिया; मूळ अस्तित्वाला, त्याच्या सर्वज्ञ आत्मशक्तीच्या आश्रयानें ही प्रकटनाची किंवा निर्मितीची क्रिया करतां येतें; याच शक्तीच्या आश्रयानें

 

पान क्र. ४८९

 

मूळ अस्तित्वाला आपल्या प्रकटित गुप्त भांडाराच्या विश्वावर सत्ता चालवितां येतें. सत्, चित्, आनंद या तत्त्वत्रयाच्या अविभाज्य मिळणीनें ज्याचें स्वरूप बनलें आहे, त्या मूळ सर्वसत्तात्मक पुरुषोत्तमाचें निर्मितिकार्य, विश्वनिर्मितीचें कार्य घडून येण्यास, चौथ्या तत्त्वाची आवश्यकता असते; हें तत्त्व म्हणजे अतिमानस किंवा सत्य-कल्पना होय. सर्वातीत सच्चिदानंदाचें हें सर्वनिर्मायक स्वरूप आहे. सत्य-कल्पना, सत्य-संकल्प, सत्य-ज्ञान किंवा अतिमानस अथवा विज्ञान या नांवांनीं हें स्वरूप ओळखलें जातें; खालीं विश्व, वरतीं सच्चिदानंद आणि मध्यें सत्यज्ञानमय विज्ञान, अशी व्यवस्था आहे. विज्ञानांत जें दिव्य ज्ञान असतें, तें आत्मसत्ता आणि आत्म-ज्ञान यांच्याशीं एकरूप असें दिव्यज्ञान असतें; तशीच विज्ञानांत जी मूळ सत्तेची इच्छाशक्तिहि असते, ती दिव्यज्ञानाशीं पूर्ण मेळ असलेली अशी असते -- कारण ही इच्छाशक्ति स्वभावत: व स्वरूपतः आत्मज्ञानयुक्त आत्म-सत्ता वा स्वयंभू सत्ताच असते; प्रकाशमय कार्य करणारी, गतिमान अशी स्वयंभू आत्मज्ञानी सत्ता म्हणजेच विज्ञानांतील इच्छाशक्ति. विज्ञानांत याप्रमाणें दिव्यज्ञान आणि त्याशीं समरस अशी इच्छाशक्ति असल्यानें, विश्वांतील वस्तूंची हालचाल, त्यांचा आकार व त्यांच्या व्यवहाराचा कायदा या गोष्टी, त्या वस्तूंच्या पोटीं जें स्वयंभू सत्य असतें, त्याच्या धोरणानें व त्याला अनुरूप अशा तऱ्हेनें न चुकतां निश्चित करण्याचें कार्य विज्ञानाला करतां येतें; अर्थात् या स्वयंभू सत्याचा आविष्कार म्हणजेच विश्वांतील वस्तूंची निर्मिती, असें असल्यानें या आविष्काराचा जो मूळ हेतु असतो त्या हेतूशीं सुसंगत अशाच प्रकारें वस्तूंची हालचाल वगैरे विज्ञानाकडून ठरविली जाते. विश्वनिर्मितींत एकता आणि अनेकता हीं दोन तत्त्वें एकाच वेळीं उपयोगांत आणलीं जातात; या दोन तत्त्वांवर विश्वनिर्मिति अवलंबून असते; मूळ एकता आणि नियोजित अनेकता या दोन टोंकांच्या मध्यें निर्मितीची क्रिया चाललेली असते; विविध कल्पना, विविध शक्ती, विविध आकार या गोष्टी प्रकट होणें याला निर्मिति म्हणतात; मूल एकतत्त्वांतून या गोष्टी प्रकट होतात, या विविध गोष्टी त्या एकतत्त्वाचाच आविष्कार असतात; निर्मितीला आधार लागतो, सत्याचा पाया लागतो; शाश्वत एकतत्त्व हाच निर्मितीचा मूळ आधार आहे, एकतत्त्व हेंच तिच्या बुडाशीं असलेलें सत्यतत्त्व आहे; अनेक विश्वांचा पसारा आणि त्यांतील व्यवहार हा या एकतत्त्वाच्या सत्य मूलाधारामुळेंच शक्य होतो : म्हणून निर्मितीची कल्पना

 

पान क्र. ४९०

 

व क्रिया एकता आणि अनेकता मिळून पूर्ण होते, असें म्हणावें लागतें. निर्मितीचें कार्य हें विज्ञानाचें -- अतिमानसाचें -- कार्य आहे. हें कार्य करण्यासाठीं ज्ञानाच्या दोन प्रकारांचा विज्ञान उपयोग करतें; एकता-बोधात्मक (समग्र बोधात्मक, समष्टि बोधात्मक) ज्ञान आणि अनेकता-बोधात्मक (व्यष्टि बोधात्मक, अ-समग्र बोधात्मक) ज्ञान : हीं दोन प्रकारचीं ज्ञानें विज्ञानांत अंगभूत असतात; एकतत्त्व हें मूळ असल्यानें, विज्ञानाला तेथूनच आरंभ करावा लागतो; अनेकता ही या एकतेंतूनच ज्ञानविशेषाच्या व्यष्टिबोधात्मक ज्ञानाच्या आश्रयानें निर्माण केली जाते; विज्ञान प्रथम एकतेवर भर देतें; एकतत्त्वाचीं अनेक अंगें म्हणून विज्ञान सर्व वस्तूंचा स्वतांत समावेश करून असतें; नंतर इच्छेचा विषय, ज्ञानाचा विषय म्हणून प्रत्येक वस्तूकडें, विषयदृष्टीनें बघून या वस्तू वेगळ्या आहेत, परंतु या सर्व वस्तू स्वतांमध्येंच आहेत अशा ज्ञानाचा पुरस्कार व अंगीकार विज्ञान करतें. विज्ञान हें सच्चिदानंदाचें विश्व-निर्मायक स्वरूप असल्यानें त्यामध्यें प्रथम, त्याचें मूळ आत्मज्ञान प्रभावी होतें : या ज्ञानानुसार, सर्व वस्तू या एक अस्तित्व, एक जाणीव, एक इच्छा किंवा संकल्प व एक आत्मानंद आहेत; अर्थात् एकच अस्तित्व एकच जाणीव इ० सर्व वस्तूंना व्यापून आहे. वस्तूंचा गतिमान् व्यवहार एक आणि अविभाज्य आहे; या प्रत्ययापासून, विज्ञान आपल्या निर्मितिकार्याला आरंभ करतें आणि मग निर्मितीच्या कार्यांत एकतेकडून अनेकतेकडे, अनेकतेकडून एकतेकडे फेऱ्या घालून त्या दोन तत्त्वांत, एक व्यवस्थित अन्योन्यसंबंध निर्माण करतें; अर्थात् विज्ञान हें वस्तूंत देखाव्यापुरती विभाग करीत जातें, ही विभागणी वास्तविक विभागणी असत नाहीं; ही अशी सूक्ष्म विभागणी असते कीं, विभागलेल्या वस्तू ह्या वस्तुत: अविभक्तच असतात; अविभाज्य एकतत्त्वांत मधून मधून रेषा आंखून भेदाचा देखावा करावा व त्या रेषाहि कायमच्या नसाव्या, असा विभागणीचा कार्यक्रम, विज्ञान हें या एकतत्त्वांत करीत असतें. विज्ञानाची ही विश्वनिर्मितीची क्रिया अशी असते; विज्ञान हें ईश्वरी ज्ञान असून त्याचें कार्य, विश्वमाला निर्माण करणें, तिचें रक्षण करणें आणि तिजवर सत्ता चालविणें हें आहे. आमचें ज्ञान आणि अज्ञान या दोहोंना हें ईश्वरी ज्ञान किंवा गूढ ज्ञान आपला आश्रय देऊन आपापलें कार्य करावयास लावतें

सत्, चित्, आनंद व विज्ञान या चार दिव्य तत्त्वांची, विश्वदृष्टीनें

 

पान क्र. ४९१

 

आपण ओळख करून घेतली. त्याचप्रमाणें मन, प्राण आणि जडद्रव्य यांचेंहि स्वरूप आपण पाहिलें आहे. अज्ञानाचा पुरस्कार करून चार दिव्य तत्त्वें वागू लागलीं, म्हणजे त्यांतूनच मन, प्राण व जडतत्त्व हीं उदयास येतात. विभागणी, अनेकता हा खेळ सच्चिदानंदरूप एकतत्त्व विज्ञानरूपानें खेळत असतां, तें स्वतःला विसरण्याचा देखावा करतें; या प्रकारचें अज्ञान एकतत्त्वानें बाह्यतः पांघरलें, म्हणजे मन, प्राण व जडतत्त्व यांचा आविष्कार होतो; हीं तत्त्वें, चार दिव्य तत्त्वांचेंच गौण व अज्ञानांकित पर्याय आहेत; विज्ञानाचा गौण अज्ञानांकित पर्याय मन आहे. मन या विभागणीच्या मागें एकत्व, एकतत्त्व आहे ही गोष्ट पार विसरून विभागणी खरी धरून चालणारें तें मन; विज्ञान मनाला पुन्हां एकत्वाची आठवण करून देऊं शकतें; सच्चिदानंदाच्या कार्यकारी शक्तीचा गौण पर्याय, हें प्राणाचें रूप होय; मनानें जे वस्तुविभाग अज्ञानानें खरें म्हणून कल्पिलेले असतात, त्या विभागांच्या आश्रयानें सच्चिदानंदाची कार्यकारी शक्ति आकारांची निर्मिति करते आणि या आकारांच्या आधारानें शक्तीचा खेळ खेळते; हा खेळ म्हणजे प्राणाची क्रिया होय. जडतत्त्व हा सच्चिदानंदाच्या मूळ सत्-रूप द्रव्याला चित्‌शक्तीनें अज्ञानांकित होऊन दिलेला आकार होय : सच्चिदानंदाची चित् म्हणजे जाणीव आणि तदभिन्न कार्यकारी शक्ति व अज्ञानाच्या, विस्मृतीच्या प्रभावानें जें कार्य बाह्यतः करतात, त्या कार्याला सच्चिदानंदानें प्राधान्य दिलें व त्याचें अंकितत्व पत्करलें म्हणजे त्याचें सत्-तत्त्व जो आकार घेतें, तें जडतत्त्वाचें रूप होय; इत्यर्थ असा कीं, सच्चिदानंदच विस्मृती पांघरून सत् अंशानें जडद्रव्य झालेलें आहे; आणि तें आपल्या विश्वनिर्मायक विज्ञानरूपांत विस्मृती पांघरून मन झालें आहे.

मन, प्राण आणि जडतत्त्वाचें शरीर याखेरीज अज्ञान-विश्वांत या तीन तत्त्वांच्या संगतींत चौथें एक तत्त्व व्यक्त होतें; या तत्त्वाला आम्ही आत्मा हें नांव देत असतों. हा आत्मा दोन प्रकारचा आहे; बाह्य व्यवहारांत वासनात्मा काम करीत असतो; वस्तु मिळवाव्या, वस्तुगत आनंद भोगावा असा वासनात्म्याचा व्यवहार असतो; याच्या पाठीमागें, यानें पुष्कळ अंशीं झांकलेला किंवा सर्वथा झांकलेला दुसरा आत्मा, खरा आंतरिक पुरुष, असतो; चैतन्याला येणारे अनुभव, या खऱ्या आत्म्यांत सांठविलें जातात. हा दोन प्रकारचा आत्मा किंवा दोन रूपांचा आत्मा, सच्चिदानंदाच्या आनंद या अंशाचा अज्ञान-विश्वांतील पर्याय आहे, आनंदाचें तो

 

पान क्र. ४९२

 

कार्य आहे, आनंदाची अज्ञान-विश्वांत पुढें टाकलेली प्रतीकमूर्ति आहे; आमची जी मानसिक जाणीव व या विश्वांत असणाऱ्या आत्मविकास-क्रमाच्या आमच्या ज्या पार्श्वभूमिका, त्यांना अनुसरून आणि त्यांना अनुरूप असें जें आनंदाचें कार्य, तेंच द्विविध आत्मरूपानें आमच्या मन, प्राण, शरीर या त्रयीच्या संगतींत कामाला लागलें आहे. परमात्म्याचें अस्तित्व स्वभावत: अनंत ज्ञानानें आणि या ज्ञानाच्या आत्म-शक्तीनें युक्त असतें आणि हें अनंत ज्ञान, स्वभावत: शुद्ध असीम आनंदानें युक्त असतें; परमात्म्याच्या या आत्मानंदाचा, शुद्ध असीम आत्मानंदाचा गाभा आत्म-सत्ता आणि आत्म-जाणीव व आत्म-स्वामित्व आणि आत्म-परिज्ञान यांचा बनलेला असतो. परमात्म्याच्या आत्मानंदाचा एक व्यवहार म्हणजेच विश्व होय. विश्वरूप परमात्मा या विश्वाच्या व्यवहाराचा आनंद पूर्णत्वानें भोगतो. व्यष्टिभूत जीवात्मा बाह्यतः अज्ञान आणि विभक्तता यांच्या कोंडींत सापडल्यामुळें त्याच्या वांट्याला हा आनंद येत नाहीं -- व्यष्टीच्या अस्तित्वाचा, जाणिवेचा बाह्य पृष्ठभाग आनंदहीन असला, तरी त्याच्या या बाह्य जाणिवेच्या आंत प्रच्छन्न तलवर्ती व अतिमानसिक जाणीव असते; व ही जाणीव विश्वक्रीडेचा पूर्ण आनंद भोगीत असते. व्यष्टीची वैयक्तिक जाणीव क्रमश: विकसित करून, विश्वमय आणि विश्वातीत करतां येते; हा विकास-प्रयत्न वाढता आत्मानंद देणारा असतो आणि हा प्रयत्न पूर्णतया यशस्वी झाला म्हणजे परमात्म्याचा पूर्ण आत्मानंद भोगावयास मिळतो.

याप्रमाणें एकंदर अस्तित्वाचीं तत्त्वें सात अधिक एक (आत्मा) अशीं आठ समजण्यास हरकत नाहीं. (वेद-ऋषींनीं किरण (तत्त्वें) सात, आठ, नऊ, दहा व बारा असे भिन्न ठिकाणीं भिन्न संख्येचे मानले आहेत) हीं आठ तत्त्वें पुढील प्रमाणें आहेत : --

सत् (अस्तित्व)            जडतत्त्व (शरीर)

चित् (जाणीव-शक्ति)       प्राण

आनंद                   आत्मा (आंतरात्मा)

विज्ञान (अतिमानस)        मन

परमात्म्याच्या अस्तित्वाचीं सत्, चित्, आनंद व विज्ञान हीं अंगें आणि जीवात्म्याची शरीर, प्राण, आत्मा व मन हीं अंगें यांचा अन्योन्यसंबंध वर वर्णिलेला लक्षांत घेतां, आमचें जीवन (अस्तित्व) परमात्म्याच्या अस्तित्वाचें एक प्रकारचें परावर्तित स्वरूप आहे हें ध्यानांत येतें. शुद्ध

 

पान क्र. ४९३

 

सत् (अस्तित्व) पासून उतरत उतरत चित् आनंद आणि निर्मितीचें माध्यम विज्ञान मागें टाकून, परमात्मा विश्वपुरुष होतो, विश्व होतो आणि आम्ही जडद्रव्याच्या शरीरापासून चढत चढत विकासक्रमांतून जाणाऱ्या प्राण, आत्मा, मन यांना मागें टाकून, प्रकाशमय माध्यम जें विज्ञान त्यांत चढून जाऊन पुढें परमात्म्याच्या शुद्ध अस्तित्वाकडे वाटचाल करून तेथेंहि पोचूं शकतों. अस्तित्वाचा वरचा अर्ध (परार्ध) आणि खालचा अर्ध (अपरार्ध) यांची गांठ, विज्ञान आणि मन यांच्या भेटीच्या स्थानीं आहे. विज्ञान आणि मन यांच्यामध्यें पडदा आहे. हा पडदा नाहींसा करणें, फाडून टाकणें ही क्रिया मानववंशांत दिव्य जीवन, दिव्य मानवी जीवन शक्य होण्यास आवश्यक आहे. मधला पडदा दूर झाला, वरच्या श्रेष्ठ अस्तित्वाचा प्रकाशमय स्वभावधर्म खालच्या अस्तित्वाच्या अंतरांत उतरला आणि खालचे कनिष्ठ अस्तित्व जोर करून वरच्या श्रेष्ठ अस्तित्वाचा स्वभावधर्म आत्मसात् करूं लागलें, म्हणजे मन, आत्मा, प्राण, शरीरद्रव्य हीं आमच्या अस्तित्वाचीं तत्त्वें पार बदलून जातील : मनाला सर्वज्ञ सर्वसमावेशक विज्ञानांतील दिव्य प्रकाश, त्याच्या मूळ स्वभावांतील, स्वरूपांतील दिव्य प्रकाश परत मिळेल; आत्म्याला सर्वसंग्रही, सर्वमुखी आनंदाच्या स्वरूपांत आपलें दिव्य निजरूप प्राप्त होईल; प्राणाला सर्वसमर्थ ज्ञानशक्तीच्या व्यापारांत प्रकट होणारी स्वतःची दिव्य शक्ति परत मिळेल आणि जडतत्त्वाला (शरीराला) 'परमात्म्याच्या सत् अंशाचें एक रूप' या नात्यानें त्याची स्वाभाविक असलेली मोकळीक, दिव्य मुक्तता लाभेल. विश्वांत जडांतून नाना श्रेणींचे जीव व श्रेष्ठतम मानवेतर जीवांतून मानव, असा विकास होऊन मानवाचा आणखी पुढें सारखा विकास होत आहे; या विकासक्रमांत मानव हा विकासाचा मुकुट म्हणून आज वावरत आहे; हा विश्वांतील विकास कांहीं हेतूनें चालला असेल, या विकासाचें अंतिम ध्येय कांहीं असेल तर -- मानवी प्राण्याचें आतांच वर्णन केल्याप्रमाणें महान् ओजस्वी तेजस्वी रूपांतर होणें आणि त्याचे ठिकाणीं परमात्म्याची, पुरुषोत्तमाची, मूळ सच्चिदानंदाची पूर्णता पूर्णतया प्रकट होणें, हेंच तें परम उदात्त ध्येय, हाच तो परमोच्च हेतु असला पाहिजे -- मानवानें जन्माचे अकारण फेरे करीत रहावे, अकारण चक्राकार येरजाऱ्या कराव्या आणि एखाद्या भाग्यवान् व्यक्तीनें या जन्ममरणाच्या चक्रांतून आपली सुटका करून घ्यावी यापेक्षां विश्वांतील मानवी जीवनाला कांहीं दुसरें ध्येय नाहीं; जीवनांत निराशा अनुभवून या जीवनाच्या मायाक्रमांतून मानवानें जागें व्हावे,

 

पान क्र. ४९४

 

विश्वाचा विश्वप्रयत्न निराशेच्या आघातांनीं निष्फळ झालेला पाहून या प्रयत्नाचा मानवाला उबग यावा आणि या प्रयत्नांत सहयोगी होण्याचें मानवानें पूर्णतया सोडून द्यावें -- हीच गोष्ट युक्त आहे, असें सांगणारे दुसरे पक्ष आहेत -- पण मानवांत असलेल्या शक्तींना कांहीं मर्यादा नाहीं, चैतन्य आणि जडतत्त्व यांच्यामध्यें मध्यस्थी करून त्यांचें मीलन करण्याची शक्ति असलेला मानव हा एकच प्राणी या विश्वांत आहे, ही वस्तुस्थिति लक्षांत घेतां निराशावादी पक्ष चुकत आहेत व मानवाच्या जीवनाचें ध्येय जड देहांतच पूर्णतया सच्चिदानंदत्व प्राप्त करून घेणें हेंच आहे असें म्हणावें लागतें.

मानवाच्या जीवनाचें आमूलाग्र रूपांतर होणें व तें दिव्य होणें शक्य आहे हें आपण पाहिलें. हें जें शक्य आहे तें वास्तवांत घडून येण्याकरितां कांहीं मानसिक व व्यावहारिक पार्श्वभूमीची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीसंबंधानें विचार करण्यापूर्वीं, जें सच्चिदानंद ब्रह्म आपल्या सर्वातीत स्थानावरून उतरून विश्वरूप धारण करतें झालें, त्या ब्रह्माच्या उतरण्याविषयींच्या तत्त्वांचा जसा आपण विचार केला, तसा त्याची विश्वांत कार्य करण्याची तऱ्हा काय आहे या संबंधींची त्याची योजना ढोबळपणें तरी आपण पाहिली पाहिजे; त्याचप्रमाणें सच्चिदानंदाची जी जाणीवशक्ति आमच्या अस्तित्वाच्या परिस्थितीवर सत्ता चालविते, त्या शक्तीच्या व्यक्त सामर्थ्याचा स्वभावधर्म आणि व्यवहार काय आहे, कसा आहे याकडेहि आम्हीं लक्ष दिलें पाहिजे. सध्यां प्रथम ही गोष्ट आपण लक्षांत ठेवली पाहिजे कीं, आपण जीं सात किंवा आठ तत्त्वें तपासलीं तीं सर्व तत्त्वें विश्वाच्या अस्तित्वाला आणि विश्वांतील वस्तूंच्या अस्तित्वाला आवश्यक आहेत; या वस्तूंमध्यें व्यक्त वा अव्यक्त स्थितीमध्यें तीं अवश्य असतात, आमच्यामध्येंहि तीं सर्व व्यक्त व अव्यक्त आहेत; आम्ही ''वर्षाचें बाळ'' आहोंत, अजूनहि ''एक वर्षाचें बाळच'' आपण आहोंत; विकासशील निसर्गांत आम्ही अजून प्रौढत्व पावलों नाहीं. आमच्या अप्रौढ अवस्थेंत, बाल्यावस्थेंत त्या सात किंवा आठ तत्त्वांपैकीं कांहीं व्यक्त झालीं आहेत; कांहीं व्यक्त व्हावयाचीं आहेत, तीं आज अव्यक्त स्थितींत आम्हांमध्यें आहेत. सत्-चित्-आनंद ही सर्वश्रेष्ठ तत्त्वत्रयी सर्व अस्तित्वाची आणि अस्तित्वाच्या सर्व व्यवहाराची मूळ जननी आहे, मूळ पाया आहे; सर्व विश्व हें या त्रयीरूप मूळसत्याचा आविष्कार आहे, कार्य आहे; आणि तसें तें असलें पाहिजे. कसलेंहि

 

पान क्र. ४९५

 

विश्व -- आकारलेलें अस्तित्व -- शुद्ध शून्यांतून उदय पावून आकाराला येत नाहीं, अगदीं अभावाच्या पोकळींत भावरूपानें उभें राहत नाहीं; तसें तें येऊं शकत नाहीं व राहूं शकत नाहीं. अनंत अस्तित्वाचा पुरुषोत्तम आरंभीं आणि सर्व आकारांच्या अतीत असलेल्या त्या पुरुषोत्तमांतून विशिष्ट आकार घेतलेलें त्याच्या पोटांत वावरणारें अस्तित्व, हें विश्वाचें स्वरूप असलें पाहिजे किंवा विश्व आणि विश्वपुरुष (पुरुषोत्तम) एकच आहेत अशी तरी स्थिति असली पाहिजे; तिसरी गोष्ट शक्य नाहीं. वस्तुस्थिति अशी आहे कीं, विश्वाच्या अस्तित्वाशीं, विश्वपुरुषाशीं आम्ही एकरूप होतो तेव्हां -- अनंतसत्तेचा विश्वपुरुष (पुरुषोत्तम) -- हा विश्वपुरुष अनंत प्रकारें जे स्वतःचे प्रमाणबद्ध आकार स्वतःच्या कालस्थलांकित कल्पनामय विस्तारांत उभे करतो, ते आकार मिळून हें विश्व आहे ही गोष्ट आम्हांस स्पष्ट होते. आकारातीत अनंत सत्तेचा पुरुषोत्तम अनंत प्रकारें साकार झालेला म्हणजेच विश्व; हें विश्वाचें एकंदर स्वरूप आहे. अनंत निराकार अस्तित्वांत, साकार अस्तित्व अनंत प्रकारें उदयास येणें, हें जें विश्वनिर्मितीचें कार्य, तें अस्तित्वगत अनंत शक्तीचें कार्य आहे; ही शक्ति विश्वांतील सर्व आकार व आंदोलनें निर्माण करते व त्यांचें नियंत्रण करते; या शक्तीची स्थितिगति ही अनंत जाणिवेचें कार्य आहे. कारण ही शक्ति स्वभावत: विश्वविषयक संकल्पाच्या स्वरूपाची असते -- कोणतेहि संबंध निश्चित करणें आणि ते संबंध विशिष्ट ज्ञानक्रियेनें जाणणें हें या विश्वविषयक संकल्पशक्तीचें काम असतें -- आणि हें काम करावयास त्या शक्तीच्या पाठीमागें तिला आधार म्हणून सर्वसमावेशक जाणिवेची आवश्यकता आहे. मूळ निराकार अस्तित्व क्रमश: साकार होणें या क्रियेला विश्वनिर्मिति म्हणतात -- या निर्मितीच्या व्यापारांत वस्तू-वस्तूंचे अनेक संबंध अस्तित्वांत आणावें लागतात; हे संबंध ठरविणें, कायम करणें, ते विश्वगत जाणिवेनें ग्रहण करणें या सर्व गोष्टी सर्वसमावेशक अनंत जाणिवेच्या आधाराशिवाय, विश्वविषयक संकल्पशक्तीला करतां येणार नाहींत.

विश्व निर्मितीचा जो व्यवहार होतो त्यांत अनंत अस्तित्वसंपन्न पुरुष, अनंत अस्तित्वाची अनंत शक्ति, त्या शक्तीची जननी आणि सहयोगिनी अनंत सर्वसमावेशक जाणीव (ज्ञान) आणि शेवटीं अनंत आनंद इतक्या गोष्टी अनुस्यूत असतात. विश्वनिर्मात्याची जाणीव सर्वज्ञ आणि सर्वसमर्थ असते, तिला आपली सर्व अंगभूत संपत्ति स्पष्टपणें ज्ञात असते

 

पान क्र. ४९६

 

आणि अशी सर्वसंपन्न, सर्वज्ञ, सर्वसमर्थ जाणीव स्वभावत: व अपरिहार्यपणें आनंदरूप असते; कारण ती तशी नसणें असंभाव्य आहे. म्हणून विश्वातीत पुरुषानें विश्वरूप धारण करण्यांत, महान् सर्वव्यापी आनंद, आत्मानंद हा त्याला प्रेरक होत असला पाहिजे, विश्वाच्या निर्मितीचें आणि अस्तित्वाचें सार आणि उद्दिष्ट असा आनंदच असला पाहिजे, हें उघड आहे. एका प्राचीन ऋषीनें म्हटलें आहे : ''अस्तित्वाच्या आनंदाचें आकाश, सर्व स्थिरचराला वेष्टून आहे, आम्ही या आकाशाच्या पोटांत वावरत आहों, तें आनंद-आकाश आमचेंहि आकाश आहे -- असें जर नसतें तर आम्ही कोणीहि श्वासोछ्वास करूं शकलों नसतों, आम्ही कोणीहि जिवंत राहूं शकलों नसतों.'' हा आत्मानंद आमच्या ज्ञानाच्या, भानाच्या पातळीच्या खालीं दडलेला असेल, वरच्या जागृत जाणिवेला त्याची ओळख होत नसेल, पण आमच्या मुळांत, आमच्या मूळ स्वरूपांत हा आनंद असलाच पाहिजे; हा आनंद शोधून काढून त्याला आत्मसात् करण्याकरितां सर्व अस्तित्व, सर्व जीवन हें धडपडत आहे; अशी धडपड हीच सर्व अस्तित्वाची, सर्व जीवनाची प्रेरक शक्ति असली पाहिजे. विश्वांतील कोणताहि जीव ज्या प्रमाणांत स्वतःचें मूळ स्वरूप शोधून काढील व आत्मसात् करील, त्या प्रमाणांत त्याच्या मूळ स्वरूपांत असलेला गूढ आत्मानंद त्याला अवश्य लाभेल. कोणी आपलें मूळ स्वरूपांतील संकल्प-सामर्थ्य आणि क्रिया-सामर्थ्य शोधून परत मिळवील, कोणी आपला मूळ प्रकाश आणि ज्ञान मिळवील, कोणी आपलें विस्तृत अस्तित्व पुन: आपलेसें करील, कोणी आपलें मूळ प्रेम आणि प्रेमसुख पुन: गांठील. ज्या प्रमाणांत या मूळ स्वरूपाच्या अंगांची पुन:प्राप्ति कोणी जीव करूं शकेल, त्या प्रमाणांत सध्यां गूढ असलेला स्वरूपानन्द त्याला पुन: लाभेल. जीवन हें विकास पावत जातें; विकासशील जीवनाच्या श्रेष्ठांत श्रेष्ठ पायरीवरच अस्तित्वाचा असीम आनंद लाभतो; ज्ञानाचा मार्ग आनंदमय आत्मसाक्षाकार व परमात्म-साक्षात्कार हा होतो; संकल्प व सामर्थ्य किंवा निर्मितिसामर्थ्य यांच्या योगें आत्मविश्वाचें राज्य मिळून सुखातिशयाची प्राप्ति होते; प्रेमाची, प्रेमानंदाची विश्वाशीं व विश्वपुरुषाशीं एकता, एकरूपता होऊन पराकोटीचें समाधान होतें -- या आनंदमय गोष्टींचा लाभ विकासी जीवाला होण्याचें कारण, त्या त्याच्या मूळ स्वरूपांत आहेत आणि त्या आज त्याला अप्राप्त असलेल्या अदृष्ट अशा उंच पायरीवर त्याच्यासाठीं वाट पाहत आहेत हें होय. अस्तित्वाचें सार या आनंदमय गोष्टींत

 

पान क्र. ४९७

 

आहे आणि व्यक्त विश्वांतील अस्तित्वांत पाऊल टाकलेल्या विकासी जीवाला त्या योग्य वेळीं लाभणें अपरिहार्य आहे. व्यक्त विश्वाचें अस्तित्व जेथें जेथें असेल, तेथें तेथे त्या अस्तित्वाच्या पाठीमागें, त्याचा पाया म्हणून आणि त्या अस्तित्वाच्या पोटीं विकासशील वस्तु म्हणून, सत्, चित् व आनंद ही त्रयी असणारच असणार, हें एक महान् आध्यात्मिक सत्य आहे.

पण अनंत निराकार सत् चित् आनंद यांनीं व्यक्त स्वरूप धारण करावें अशी कांहीं निकड त्यांना असते अशी गोष्ट नाहीं. त्यांनीं लहरीनुसार व्यक्त स्वरूप धारण केलें, तर तें नियमबद्ध असावें अशीहि कांहीं अपरिहार्यता नाहीं; अनंत रूपें क्रमशून्य, संबंधशून्य अस्ताव्यस्त पसरलेली अशीहि अभिव्यक्ति होऊं शकते. नियमबद्ध अभिव्यक्ति, ज्याला आम्ही विश्व असें नांव देतों तें अस्तित्वांत यावयाचें असेल, तर मात्र विज्ञान (दिव्य ज्ञान) म्हणून जी वस्तु आहे ती सच्चिदानंदाच्या पोटीं असली पाहिजे व ती वस्तु सच्चिदानंदानें प्रथम व्यक्त केली पाहिजे. विश्व किंवा सच्चिदानंदाचा व्यवस्थित आविष्कार जेथें जेथें आहे, तेथें तेथें ज्ञान आणि संकल्प यांचें जोड-सामर्थ्य असलेली विज्ञानमूर्ति असली पाहिजे; ती अनंत शक्य वस्तुसंबंधांतून निश्चित वस्तुसंबंध नियोजित विश्वासाठीं पसंत करून घेऊं शकते; बीजांतून फल विकसित करूं शकते, त्या विश्वाच्या व्यवस्थेचा महान् कायदा प्रमाणबद्ध अंगांचा असा रचूं शकतें आणि या विश्वांतील सर्व विभागांवर देखरेख ठेवून सर्वांचें नियमन करूं शकते : ही विज्ञानमूर्ति अथवा विज्ञानपुरुष, या विश्वाचा अमर अनंत असा साक्षी आणि संचालक अधिपति असतो (कवि: मनीषी परिभू: स्वयंभू: असें वर्णन ईशोपनिषदांत आहे : कवि: -- द्रष्टा; मनीषी -- मनन चिंतन करणारा; परिभू: -- सर्वत्र साकार होणारा; स्वयंभू: -- अजन्मा) सच्चिदानंद स्वत:च विज्ञानाचें रूप घेतो; विज्ञान हें सच्चिदानंदाचें विश्वनिर्मायक शक्तिरूप असतें. स्वत:च्या अस्तित्वाच्या पोटांत जें असतें तेंच हें विज्ञान निमितिक्रियेनें व्यक्त करतें; म्हणून विश्वाचा कायदा हा विश्वांतर्गत सत्याचा कायदा असतो; तो कांहीं बाहेरून लादलेला नसतो, तर वस्तूंच्या आंतूनच तो कार्य करीत असतो; विश्वांतील सर्व प्रकारचा वस्तुविकास हा त्या वस्तूचा आत्म-विकास, स्वतःच्या कायद्यानें स्वतःचा घडविलेला विकास असतो; विश्वांत जें कांहीं बीज असेल, तें वस्तुविषयक सत्याचें बीज असतें; जें कांहीं फळ त्या बीजाला

 

पान क्र. ४९८

 

येतें, तें त्या बीजाच्या शक्य फळांपैकीं, त्या बीजाच्या स्वतःच्या कायद्यानुसार ठरलें गेलेले फळ असतें. हा जो वस्तूंचा कायदा असतो, तो बाहेरून लादलेला नसून वस्तूंचा स्वतःचाच तो कायदा असल्यानें, तो नेहमीं एकसारखा रहाणारा नसतो; कोणताहि कायदा न बदलणारा नसतो; न बदलणारें, सारखें एकरस राहणारें, केवळ एक अनंत ब्रह्म आहे; या ब्रह्माच्या सच्चिदानंदाच्या पोटीं चाललेल्या विश्वलीलेंतील प्रत्येक वस्तु ही अनंत शक्यता आपल्या पोटांत सांठवून असते; तिचें विशिष्ट रूप आणि वाटचाल जी विशिष्ट काळीं, स्थळी निश्चित झालेली दिसेल, त्याहून अगदीं वेगळीं अनंत रूपें आणि गती तिला शक्य असतात; या सर्व गती व आकृती, ती वस्तु स्वत: स्वतःला वेगळ्या वेगळ्या मर्यादा घालून धारण करते -- तिला असीम स्वतंत्रता असते -- ब्रह्माच्या अनंत शक्य कल्पनांतून ती कांहीं एक विशिष्ट कल्पना पसंत करते आणि नंतर त्या कल्पनेनुसार आपली स्थितिगति, रूप-आकार ठरविते व धारण करते. सर्व वस्तूंच्या पोटीं -- सूक्ष्मांत सूक्ष्म कणांच्या, परमाणूंच्या पोटीं अनंत सर्वरूप ब्रह्म आहे आणि ब्रह्माच्या स्वभावांत स्वतःला मर्यादा घालून घेण्याची सत्ता अपरिहार्यपणें अंगभूत आहे. जें अनंत असीम आहे, त्याला सीमित सांत अशा नानाविध अनंत वस्तु होण्याची शक्ति व सत्ता नसेल तर त्याला अनंत, असीम कसें म्हणतां येईल ! जें सर्वसंबंधनिरपेक्ष स्वयंभू तत्त्व आहे, तें सहजच स्वयंनिर्णयाची अपार सत्ता बाळगून असतें -- स्वयंभू सर्वनिरपेक्ष केवळ तत्त्वाला ज्ञान, कार्यशक्ति, संकल्पशक्ति, आविष्कार शक्ति या सर्व बाबींत अकुंठित स्वयंनिर्णय नसेल तर त्याला वेगळें नांव द्यावें लागेल. असो. या अनंत स्वयंभू सच्चिदानंद ब्रह्मानें विश्वनिर्मितीसाठी जें विज्ञानाचें रूप धारण केलें तें स्वभावत: ''सत्याची वास्तवाची कल्पना'' या स्वरूपाचें आहे. ब्रह्म हें सत्य आहे पण तें निर्मितिक्षम व्हावयाचें, तर स्वतांच्या पोटांतील अनंत सत्यांचें ज्ञान त्यानें समोर ठेवून तदनुसार विश्व उभारणें त्याला अवश्य आहे -- म्हणून सत्य-ज्ञान, सत्य-कल्पना हेंच जिचें स्वरूप अशी आपली विभूति सत्याला, ब्रह्मांत पुढें करावी लागते. ही विभूति म्हणजे विज्ञान होय. विश्वशक्ति, विश्वसत्ता ही कसल्याहि प्रकारची असो, तिच्या पोटीं विज्ञान ही विभूति स्वभावत: अंतर्हित असते; ही विभूति, स्वत: अनंतत्व धारण करणारी असून, विश्वाच्या व्यक्त पसाऱ्यांत नाना संबंध, क्रमव्यवस्था व व्यक्ताच्या महान् रूपरेषा ही ठरविते, त्यांत अनेक

 

पान क्र. ४९९

 

संयोग घडवून आणते व एकंदरीनें सर्व पसारा आपल्या आधारानें चालविते. वैदिक ऋषींच्या भाषेंत अनंत अस्तित्व, अनंत ज्ञान, अनंत आनंद हीं अनाम ब्रह्माची तीन गूढ, सर्वश्रेष्ठ नामें आहेत आणि विज्ञान हें त्याचें चौथें नाम आहे. (तुरीयम् स्विद् = चौथी विशिष्ट स्थिति; तुरीयम् धाम = चौथी अवस्था [अस्तित्वाची] किंवा स्थिति असें विज्ञानाला प्राचीन वैदिक शब्द आहेत.) चौथें वरून खालीं किंवा खालून वर; सत्, चित्, आनंद व विज्ञान हा वरून खालीं येण्याचा ब्रह्माचा क्रम जड शरीर, प्राण, मन, विज्ञान हा आमचा खालून वर चढण्याचा क्रम -- दोन्ही क्रमांत विज्ञानाचा क्रमांक चौथा आहे.

सत्, चित्, आनंद व विज्ञान या चार उच्च तत्त्वाप्रमाणें मन, प्राण व जडतत्त्व या तीन कनिष्ठ तत्वांचीहि विश्वाच्या रचनेला आवश्यकता आहे. आमच्या पृथ्वीवर, भौतिक विश्वांत मन, प्राण, जडद्रव्य ज्या स्वरूपांत आहेत, त्यांच्या ज्या क्रिया होतात, ज्या परिसरांत तीं तत्त्वें वावरतात, तसेंच सर्व कांहीं त्यांचें स्वरूप वगैरे असलें पाहिजे असें मात्र नाहीं. त्यांची क्रिया, येथील त्यांच्या क्रियेपेक्षां प्रकाशमय असेल, बलवान् असेल, सूक्ष्म असेल -- असा फरक शक्य आहे; पण कोणत्या तरी स्वरूपांत मन, प्राण व जडद्रव्य या तत्त्वांची सत्, चित्, आनंद व विज्ञान यांच्या इतकीच विश्वाच्या अस्तित्वाला आवश्यकता आहे एवढेंच खरें. मन ही विज्ञानाचीच एक क्रिया आहे, क्रियाशक्ति आहे; या शक्तीचा धर्म मापणें, मर्यादा घालणें हा आहे; ही शक्ति विशिष्ट मर्यादित केंद्रें निर्माण करते आणि या केंद्रांतून विश्वाची हालचाल व विश्वांतील नानाविध क्रिया-प्रतिक्रिया पाहते, अनुभवते. असें विश्व, अस्तित्वाची भूमि वा विश्वव्यवस्था असूं शकेल कीं, जेथें मनाला मर्यादांचें बंधन नाहीं; किंवा असें म्हणूं कीं, जेथें जो पुरुष मन वापरतो, एक अप्रधान शक्ति म्हणून वापरतो त्याला मर्यादांचें बंधन नाहीं -- तो स्वतःच्या केंद्राखेरीज इतर केन्द्रांतून, इतर स्थानांतून, सर्व विश्वाच्या मध्यवर्ति केंद्रांतून देखील विश्वांतील व्यवहार अनुभवूं शकतो; तो आपला आत्मा सर्व विश्वभर पसरून सर्व गोष्टी पाहूं, अनुभवूं शकतो -- अशा प्रकारचें विश्व असूं शकेल -- पण या पुरुषाला, कांहीं दिव्य व्यवहाराकरितां त्याचें म्हणून एक ठाम ठिकाण नेहमीं वापरण्यासाठीं असलें पाहिजे आणि सामान्यत: तो या ठिकाणाला धरून वागला पाहिजे, वागूं शकला पाहिजे; असें असेल तरच त्या विश्वाला

 

पान क्र. ५००

 

विश्व हें नांव लावतां येईल : जर तेथें सर्व पुरुष, सर्व आत्मे सर्वत्र व्यापून राहत असतील, जर तेथें अनंत केंद्रें असतांहि प्रत्येक केन्द्राला कांहीं स्वयंमर्यादित कार्य नसेल, तर त्या पसाऱ्याला विश्व हें नांव देतां येणार नाहीं. त्या ठिकाणीं मूळ पुरुष आपल्या अंतरांत कल्पनेच्या अनंत मूर्ती बनवितो असें म्हणतां येईल; कवि किंवा निर्माता आपली निश्चित व्यवस्थित कृति रचण्यापूर्वीं अनेक मनोमय मूर्ती निर्माण करीत बसतो, तशी मूळ पुरुषाची विश्वरचनेच्या पूर्वींची कल्पनाविलासाची अव्यवस्थित क्रीडा तेथें चालली आहे, असें म्हणतां येईल. असें अनियंत्रित कल्पनाविलासाचें स्थानहि अस्तित्वाच्या अनंत श्रेणीमध्यें कोठेंतरी असेल -- असलें पाहिजे -- पण या स्थानाला आम्ही विश्व हें नांव देत नाहीं. या कल्पनाविलासाच्या स्थानांत कांहीं व्यवस्था असलीच तर ती सारखी बदलती असेल; विज्ञान असें कांहीं सारख्या बदलत्या व्यवस्थेचें कच्चें विश्व किंवा विश्वाचा मसाला असलेलें भांडार निर्मीतहि असेल, आणि असें कच्चें विश्व निघून नंतर निश्चित वस्तुविकासाची, वस्तूच्या मोजमापाची, मर्यादांची व्यवस्था करीत असेल; नाना संबंधांनीं बांधलेल्या वस्तूंच्या अन्योन्य क्रिया-प्रतिक्रिया नंतर निश्चित करीत असेल. हें जें वस्तूंचें मर्यादीकरण, वस्तुमापन, वस्तूंची क्रियाप्रतिक्रिया निश्चित करणें -- हें मनाचें कार्य आहे. या क्रियांसाठीं मनाची आवश्यकता आहे. पार्थिव निसर्गांत व्यवहार करणारें आमचें मन, स्वनिर्मित कैदेंत राहणाऱ्या अहंच्या पायावर जीवाजीवाचे व जीवाचे जडाचे परस्परसंबंध व परस्पर क्रिया-प्रतिक्रिया निश्चित करतें, विकसित करतें, संवर्धित करतें. पण हें आमच्या मनाचें रूप, सर्व ठिकाणच्या मनाचें स्वरूप असलें पाहिजे असें नाहीं -- विज्ञानाचें एक अप्रधान परंतु विश्वरचनेच्या दृष्टीनें अवश्य असें कार्य करणारें अंग, एवढींच आपल्या स्वरूपासंबंधानें मनानें जाणीव ठेवली, तरी त्याला मन ही संज्ञा यथार्थपणें लागू होते आणि हेंच मनाचें मूळ स्वरूप आहे. असो.

मन अस्तित्वांत आलें कीं, त्याच्या पाठीमागून प्राण आणि एक प्रकारचें द्रव्य या वस्तु अवश्यमेव अस्तित्वांत येतात. प्राण हा मूळ ब्रह्माच्या जाणीवयुक्त क्रियाशील शक्तीचा खेळ आहे. मनानें अनेक कमीअधिक स्थिर अशीं जाणीवकेंद्रें आपल्या धर्मानुसार निर्माण केलीं, म्हणजे या केंद्रांतून मूळ शक्तीचा व्यापार सुरू होतो; केंद्राकेंद्रामध्यें शक्तीची देवघेव, क्रियाप्रतिक्रिया सुरू होते. विभक्त केंद्रांतून होणारी

 

पान क्र. ५०१

 

देवाणघेवाण व अन्योन्यविषयक हें जें शक्तीचें कार्य, त्यालाच प्राण ही संज्ञा आहे. स्थिर जाणीव-केंद्र असें वर म्हटलें आहे; ही केंद्राची स्थिरता, कालांतील किंवा स्थलांतील स्थिरताच असली पाहिजे असें नव्हे. सुसंवादमय विश्वांत, शाश्वत ब्रह्मापासून निघालेल्या ब्रह्मकोशरूप साकार आत्म्यांचें, पुरुषाचें टिकाऊ व त्या सुसंवादाला आधारभूत असें सहजीवन म्हणजेच स्थिर जाणीवकेंद्रांचें सहजीवन होय. काल आणि स्थल या कल्पना अस्तित्वांत व व्यवहारांत येण्यापूर्वींहि हें सहजीवन शक्य असतें. हा जो कालस्थलातीत जीवनव्यवहार, तो आपल्या परिचयांतील व आपल्या संकुचित कल्पनाक्षेत्रांतील जीवनव्यवहाराहून फार वेगळा असेल. तथापि या विश्वांत ज्याला आम्ही जीवतत्त्व म्हणतो त्या तत्त्वाचाच प्रामुख्यानें तो कालस्थलातीत व्यवहार असतो. या जीवतत्त्वाला प्राचीनांनीं वायु, प्राण असें नांव दिलें. प्राण म्हणजे जीवनशक्ति किंवा विश्वांत कार्य करणारी मूळ चैतन्याची संकल्पशक्ति -- मूळ अस्तित्वाला निश्चित रूप, निश्चित क्रिया, जाणीवयुक्त निश्चित गतिशीलता यांनीं संपन्न करणारी, ब्रह्माची संकल्पशक्ति म्हणजेच जीवन-शक्ति किंवा प्राणशक्ति होय. मनामागून याप्रमाणें प्राणशक्ति उदयास येते व वर सांगितल्याप्रमाणें द्रव्यहि प्रकट होतें. आमच्या अहंबद्ध मनाहून विज्ञानकार्य -- मन जसें कांहींसें वेगळें व त्या मनाला लागून उदयास येणारी प्राणशक्ति जशी आमच्या परिचयाच्या प्राणशक्तीहून कांहींशी निराळी, त्याप्रमाणें त्या प्राणामागून उदयास येणारें द्रव्य पण आमच्या परिचयाच्या जड भौतिक शरीरद्रव्याहून निराळें असेल; तें पुष्कळ लवचीकपणानें वागणारें असेल, रोधक शक्तींतहि आमच्या भौतिक द्रव्याहून लवचीक असेल; त्या द्रव्यानें बनलेलें शरीर आमच्या शरीराप्रमाणें आत्म्याच्या कारागृहाचे काम न करतां आत्म्याच्या साधनाचें काम करीत असेल; तथापि विश्वांत वस्तूंची अन्योन्य क्रिया-प्रतिक्रिया ही आवश्यक गोष्ट असल्यानें, या अन्योन्य व्यवहारापुरता कांहींतरी निश्चित आकार व निश्चित द्रव्यप्रकार विज्ञान - उपकारक द्रव्याच्या बाबतींतहि असणार हें निःसंशय. विज्ञानकार्य पूर्ण होण्यासाठीं जो आकार वा जें अतिमानसिक द्रव्याचें शरीर ब्रह्माच्या आत्मरूपांना मिळेल, तें केवळ मानसिक-द्रव्याचें मानसिक शरीर असेल किंवा त्यापेक्षांहि अधिक प्रकाशमय अधिक सूक्ष्म आणि अधिक समर्थपणें प्रतिक्रियाशील असेल.

तेव्हां, विश्व या संस्थेसंबंधानें ही गोष्ट स्पष्ट आहे कीं, या संस्थेला

 

पान क्र. ५०२

 

सात (किंवा आठ) तत्त्वांची नितांत आवश्यकता असते. सत्, चित्, आनंद, विज्ञान, मन, (आत्मा) प्राण, जडद्रव्य हीं तत्त्वें मिळून विश्व बनतें. यांपैकीं कोणतेंहि एक तत्त्व दिसायला पुढें असेल -- यामुळें कदाचित् सर्व विश्व यापुढें प्रकट असलेल्या तत्त्वाचेंच वस्तुत: बनलेलें आहे आणि या विश्वांत दुसरी जीं कांहीं तत्त्वें नंतर प्रकट होतील, तीं या प्रथमदर्शनीं अद्वितीय विश्वघटक असणाऱ्या किंवा भासणाऱ्या तत्त्वापासून निघालेलें फल, परिणाम असून या इतरांची विश्वरचनेला आवश्यकता नाहीं, अशी समजूत होण्याचा संभव आहे. पण ही समजूत भ्रामक आहे. विश्वाचें हें एकतत्त्वमय भासणारें स्वरूप त्याच्या पोटांतील वास्तव स्थितीला पांघरुणाखालीं लपविणारें आहे. तें फसव्या मुखवट्यासारखें आहे. सत्य हें आहे कीं, विश्वांत कोणतेंहि तत्त्व प्रकटपणें कार्यकारी असो, त्याच्याबरोबर बाकी सर्व तत्त्वेंहि तेथें असतात आणि तीं गुप्तपणें कार्यकारी असतात. असें एखादें विश्व संभवतें कीं, ज्याच्या सुसंवादमय अस्तित्वपटांत सातहि तत्त्वें उच्च प्रकारच्या किंवा खालच्या दर्जाच्या क्रियाशीलतेचा आश्रय करून प्रकटपणें कार्य करीत असतील; असेंहि एखादें विश्व संभवतें कीं, जेथें एक तत्त्व प्रकट व इतर सर्व तत्त्वें त्या प्रकट तत्त्वाच्या आड राहून काम करणारीं असतील, त्या प्रकट तत्त्वाच्या पोटांत क्रमवार अंतर्हित झालेलीं असतील -- ही अंतर्हित तत्त्वें क्रमवार विकसित व्हावयाचींच हें अशा विश्वाचें निश्चित भवितव्य असतें. (असें देखील विश्व संभवतें कीं, एक तत्त्व प्रधान व इतर तत्त्वें गौण रीतीनें काम करणारीं, एका तत्त्वांत इतरांचा अंतर्भाव झालेला : अशा ठिकाणीं एका तत्त्वांत इतर तत्त्वांचें क्रमवार अंतर्धान नसल्यानें त्यांचा क्रमवार विकासहि नसतो.) असो. तेव्हां हा सिद्धांत स्पष्ट झाला कीं, एका तत्त्वाच्या पोटांत विश्वघटक इतर तत्त्वें जेथें क्रमवार अंतर्हित होऊन विश्वरचनेला प्रारंभ झाला असेल, त्या विश्वाची नियति वा नियोजित भवितव्य हेंच असतें कीं, त्याच्या अस्तित्वाचीं सातहि अंगें, सातहि 'नांवें' (सत्, चित् इत्यादि) क्रमवार विकसित होऊन सार्थ व्हावयाचीं, प्रकटपणें कार्यकारी व्हावयाचीं. या सिद्धान्तानुसार, भौतिक विश्व हें त्याच्या पोटीं गुप्त असलेलें जीवतत्त्व (प्राणतत्त्व) स्वभावतःच प्रकट करणार, विकासक्रमानें प्रथम उदयास आणणार हें ठरल्यासारखें होतें; यानंतर तें गुप्त मन प्रकट करणार; आज या गोष्टी प्रकट झाल्या आहेतच : यानंतर स्वाभाविकपणेंच त्याच्या पोटीं गुप्त असलेलें विज्ञान, प्रकट विज्ञानरूप धारण करील आणि नंतर

 

पान क्र. ५०३

 

मूळ चैतन्य प्रकट होऊन भौतिक विश्वांत सच्चिदानंदाची त्रिमुखी तेजोमय मूर्ति कार्यकारी होईल. हा स्वाभाविक विकासक्रम आहे आणि तो निश्चितपणें व्यवहारांत येणार -- प्रश्न एवढाच आहे कीं, हें विज्ञानाचें व सच्चिदानंदाचें प्रकटीभवन या पृथ्वीवर होणार कीं इतर भौतिक विश्वांत ? आज पृथ्वीवर विकसित होत असलेल्या मानवतेंत प्रकट होणार कीं, इतरत्रच्या मानवसमान जीवांत प्रकट होणार ? या युगांत प्रकट होणार कीं, कालांतरानें अन्य युगांत प्रकट होणार ? विज्ञानाच्या व सच्चिदानंदाच्या प्रकटीकरणार्थ मानव हाच साधन व पात्र होणार कीं मानवाहून श्रेष्ठ कोणी जीव साधन व पात्र होणार? प्राचीन ऋषींची श्रद्धा होती कीं, अप्रकट विज्ञान व सच्चिदानंद, मानवांत प्रकट होणें शक्य आहे; स्वतःचे ठिकाणीं विज्ञान व सच्चिदानंद प्रकटपणें कार्यकारी करणें हीच मानवाची दिव्य नियति आहे. आधुनिक विचारवंत या शक्यतेची कल्पना मनांत देखील आणीत नाहीं; समजा अशी कल्पना त्याच्या मनांत आलीच, तर ही गोष्ट संशयास्पद आहे असें तो म्हणतो किंवा ती अशक्य आहे असेंहि आपलें मत देतो. या आधुनिक विचारवंताला भविष्यदर्शनांत या अतिमानवाचें दर्शन घडलेंच, तर आतांच्यापेक्षां पुष्कळ अधिक प्रमाणांत ज्याच्यांत मानसिक किंवा प्राणिक शक्तीचा विकास झाला असेल अशा मानवाचें दर्शन घडतें; या दोन तत्त्वांखेरीज इतर श्रेष्ठ तत्त्वांची शक्यता मानवाचे ठिकाणीं त्याला दिसत नाहीं; या तत्त्वांनी आम्हां मानवांसाठीं एक मर्यादित विकासचक्र निर्मिलें आहे व नेमून दिलें आहे, त्या चक्राच्या पलीकडे मानव जाऊं शकेल हें त्यांना पटत नाहीं. पण हें विश्व प्रगतिशील आहे, यांतील मानवप्राणी दिव्य तेजाचा स्फुल्लिंग आपल्या ठिकाणीं धारण करीत आहे; अशा स्थितींत, वर सूचित केलेली विज्ञान व सच्चिदानंद यांच्या प्रकटीकरणाची आकांक्षा आम्हीं बाळगावी, यांत खरें शहाणपण आहे, ही आकांक्षा फोल आहे असें मानण्यांत अर्थ नाहीं; तसेंच मानसिक व प्राणिक शक्तीच्या संभाव्य वाढीच्या अरुंद क्षेत्रांत आम्हीं आपली आशा मर्यादित करून ठेवावी, यांतहि शहाणपण नाहीं. कारण, मानसिक व प्राणिक क्षेत्रें, हीं आम्हांला आमचें आत्मविकासकर्तव्य शिकून घेण्यासाठीं स्थापन केलेलीं मध्यस्थानींचीं अभ्यासमंदिरें आहेत; यापलीकडे त्यांना महत्त्व नाहीं. विश्वांत जी व्यवस्था आहे, ती अध्यात्मावर आधारलेली आहे आणि या अध्यात्मनिष्ठ व्यवस्थेंत आपण जितकी उंच दृष्टि ठेवूं, आकांक्षा जितकी उदात्त ठेवू, तितकी उच्च भूमिकेवरील श्रेष्ठतर सत्यें

 

पान क्र. ५०४

 

आम्हांमध्यें प्रकट होण्याची शक्यता अधिक वाढेल -- कारण असें सत्य आमच्या अंतरंगांत प्रथमपासूनच आहे आणि या व्यक्त निसर्गांत, त्याला झांकून टाकणारें जें आवरण त्याजवर, त्याजभोंवतीं आहे व त्याला बंदींत ठेवीत आहे, तें आवरण दूर करून मला मोकळें करा अशी त्या सत्याची हांक आमच्या अंतरंगांत उठत आहे.

 

पान क्र. ५०५

 









Let us co-create the website.

Share your feedback. Help us improve. Or ask a question.

Image Description
Connect for updates