दिव्य जीवन 1879 pages 1960 Edition
Marathi Translation
  Senapati Bapat

ABOUT

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics, expounding a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth.

THEME

philosophymetaphysics

दिव्य जीवन

Sri Aurobindo symbol
Sri Aurobindo

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.

Sri Aurobindo Birth Centenary Library (SABCL) The Life Divine Vols. 18,19 1070 pages 1970 Edition
English
 PDF    philosophymetaphysics
Sri Aurobindo symbol
Sri Aurobindo

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.

Marathi Translations of books by Sri Aurobindo दिव्य जीवन 1879 pages 1960 Edition
Marathi Translation
Translator:   Senapati Bapat  PDF    LINK

 

प्रकरण अठ्ठाविसावें

 

अतिमानस, मानस आणि अधिमानसी माया

 

सूर्य आपले घोडे (किरण) सोडतो (त्यांना विसांवा देतो) त्या ठिकाणीं एक शाश्वत तत्त्व आहे, एक शाश्वत सत्य आहे; दुसऱ्या सत्यानें (विखुरलेल्या किरणांच्या तेजानें) हें शाश्वत सत्य झांकलेलें असतें. सहस्त्र सूर्यकिरण (विसाव्यासाठीं मोकळे केल्यावर) एकत्र आले -- त्या ठिकाणीं तें शाश्वत तत्त्व, शाश्वत एकमेव सत्य आहे. देवांमध्यें सर्वांत अधिक भव्य दिव्य देवमूर्ति मीं पाहिली; एकमेव सत्य ही देवमूर्ति मीं पाहिलीं.

- ऋग्वेद ५.६२.१

 

सत्याचें मुख हिरण्याच्या झांकणानें झांकलेलें आहे; हे, सृष्टीचें पोषण करणाऱ्या सूर्या ! तें झांकण दूर कर; सत्याचा धर्म आम्हांला दिसावा यासाठीं तें झांकण दूर कर; हे सूर्या, तूं एकमेव कवि आहेस; तुझे किरण इतस्तत: विखुरलेले आहेत, ते व्यवस्थेनें एकत्र आण; तुझें सर्वांत सुखमय असें रूप मला पाहूं दे; सर्वत्र असणारें ज्ञानमय पुरुषतत्त्व हें तें सर्वांत सुखमय असें तुझें रूप आहे -- तो पुरुष मी आहे.

- ईश उपनिषद् श्लो० १५, १६.

 

सत्यम् ऋतम् बृहत्

- अथर्ववेद १२.१.१

 

तें ब्रह्म सत्य झालें, अनृतहि तेंच झालें; हें सर्व जें जें आहे, तें तें तेंच झालें आहे.

- तैतिरीय उपनिषद् २.६

 

आतां पर्यंतच्या विवरणांत अनेक गोष्टी आम्हीं स्पष्ट केल्या; परंतु एक गोष्ट स्पष्ट करावयाची राहिली आहे; सच्चिदानंद हें विज्ञानांतून अज्ञानांत कसें उतरलें ? ही गोष्ट स्पष्ट करावयाची राहिली आहे. मन, प्राण, जड द्रव्य यांचा जो मूळ स्वभावधर्म आम्हीं पाहिला त्यांत, त्यांनीं ज्ञानस्थितीपासून च्युत व्हावें अशी कांहीं अपरिहार्य गोष्ट दिसली

 

पान क्र. ५०६

 

नाहीं. अज्ञानाचा पाया, मूळ जाणिवेच्या विभागणींत आहे, इतकीच गोष्ट दाखविली गेली आहे : विश्वातीत आणि विश्वरूप अशा पुरुषाच्या जाणिवेचा एक अगदीं अंगभूत, आणि तत्त्वत: अविभाज्य असा भाग म्हणजे व्यक्तीची जाणीव असते; पण व्यक्तीची जाणीव विश्वातीत आणि विश्वमय जाणिवेपासून विभक्त केली गेली आहे; अतिमानसाच्या (विज्ञानाच्या) सत्याचें एक गौण कार्य, हें मनाचें वास्तविक स्वरूप असून, तें मन, त्या विज्ञान-सत्यापासून विभक्त केलें गेलें आहे; मूळ सत्तेच्या, जाणीवयुक्त शक्तीचा एक प्रयोग, हें ज्या प्राणाचें (जीवनाचें) सत्यस्वरूप, तो प्राण (तें जीवन) मूळ शक्तीपासून विभक्त केला गेला आहे; मूळ जाणीवयुक्त सत्तेचा, सत्ताद्रव्याचा एक प्रकार, हें ज्या जडाचें वास्तविक स्वरूप, तें जड, मूळ सत्तेपासून (अस्तित्वापासून) विभक्त केलें गेलें आहे : ही विविध विभक्तता प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष, मूळ जाणिवेची विभागणी आहे आणि या विभागणींतून अज्ञान उदयास आलें आहे, इतकी गोष्ट दाखविली गेली आहे; पण जें अविभाज्य सच्चिदानंद, तें वर निर्दिष्ट केलेल्या विविध विभागणीनें कां व कसें विभागलें गेलें ? या प्रश्नाचा उकल केला गेलेला नाहीं; सच्चिदानंदाच्या -- मूळ पुरुषाच्या -- जाणीवशक्तीनें स्वतःला स्वतःच कमी करण्याचा किंवा शून्य करण्याचा उद्योग कसातरी व कशाकरितां तरी केला; आणि म्हणून अविभाज्यांत विभागणी आली, एवढे आपल्याला खास म्हणतां येईल. सर्व जें आहे तें जाणिवेच्या शक्तीचें किंवा जाणीवयुक्त शक्तीचें स्पंदन असल्यानें, कार्य असल्यानें, या शक्तीनें आपली स्वाभाविक पूर्ण प्रकाशमयता आणि पूर्ण समर्थता स्वतःच दडपून व दडवून टाकण्याचा कांहीं उद्योग केला आणि म्हणूनच मूळ जाणीव (ज्ञान) अखंड ज्ञान खंडित होऊन, विभागमय होऊन, अज्ञानाचें गतिमान परिणामकारक दृश्य उभें राहिलें यांत संशय नाहीं. तथापि या उद्योगासंबंधाचा प्रश्न सध्यां चर्चिण्याची आवश्यकता नाहीं. आमची जाणीव ज्ञान-अज्ञानयुक्त आहे, दोन्ही वस्तू आमच्या जाणिवेंत आहेत; अंधार आणि प्रकाश यांचें बनलेलें मिश्र स्वरूप आम्ही अनुभवीत आहों. अतिमानसिक सत्याचा पूर्णप्रकाशमय दिवस आणि भौतिक पूर्णनेणिवेची रात्र या दोन टोंकामध्यें, अर्धवट प्रकाशाचा भाग असावा तशी आमच्या ज्ञान-अज्ञानयुक्त जाणिवेची स्थिति आहे. या स्थितीची बारकाईनें तपासणी पुढें ज्यावेळीं करूं, त्यावेळीं मूळ जाणीवशक्तीनें आपली प्रकाशमयता दडपून दडवून टाकण्याचा उद्योग कां केला, कसा

 

पान क्र. ५०७

 

केला, या संबंधानें चर्चा करूं. सध्यां एवढी गोष्ट नमूद करणें अवश्य आहे कीं, वर निर्दिष्ट केलेल्या उद्योगाचें व त्याच्या परिणामाचें स्वरूप थोडक्यांत पुढें दिल्याप्रमाणें असलें पाहिजे : जाणीवयुक्त मूळ पुरुषाच्या अस्तित्वाच्या, एका स्थितिशील अवस्थेवर आणि एका गतिशील अवस्थेवर, अर्थात् जाणिवेच्या व अस्तित्वाच्या विशिष्ट अंगावर सर्व लक्ष केंद्रित करण्याचें मूळ जाणीवशक्तीनें ठरविलें आणि म्हणून जाणिवेचा इतर सर्व भाग आणि अस्तित्वाचा इतर सर्व भाग तिला बाजूला ठेवावा लागला; अर्थात्, अस्तित्वाच्या एका विशिष्ट अवस्थेच्या अल्प जाणिवेला, हा बाजूला ठेवलेला भाग, पडद्या-आडचा भाग बनला. आपलें (अल्पज्ञ) मन एकाच विषयावर केंद्रित केलें गेलें, म्हणजे तें केंद्रित आहे तों पावेतों, बाकीचे सर्व विषय त्याला 'पडद्या आड' होतात, तशीच गोष्ट सर्वज्ञ मूळ जाणिवेची समजावी.

आपल्याला परिचित असलेलें मन आणि अतिमानसिक सत्य ज्ञान -- ज्याचा एक गौण व्यापार हें मनाचें अगदीं मूळ स्वरूप आहे -- यांजमध्यें फार मोठी खिंड आहे. या खिंडीचा विचार येथें करणें अगत्याचें आहे. आत्मा (सच्चिदानंद) उतरत उतरत जडामध्यें गुप्त होऊन बसला. जडांतून वर येऊन तो आत्मा परत आपल्या मूळ रूपाला प्राप्त व्हावयाचा आहे. आत्म्याचें अवतरण अतिमानसांतून एकदम आमच्या मानसांत होणें व आमच्या मानसांतून एकदम अतिमानसांत त्याचें ऊर्ध्वगमन होणें जवळ जवळ अशक्य आहे -- इतकी मोठी खिंड आमच्या मनाच्या आणि विज्ञानाच्या (अतिमानसाच्या) मध्यभागीं आहे. तेव्हां या दोन वस्तूंमध्यें, दोन भूमिकांमध्यें जाणिवेच्या कांहीं भूमिका असल्या पाहिजेत, ज्या भूमिकांमुळें आत्म्याला उतरणें व चढणें शक्य आणि सोईचें होईल. आमचें मन हें अज्ञानाची एक 'विभूति' आहे : हें मन सत्याच्या शोधांत असतें, मोठ्या संकटांशीं झुंज घेत, तें सत्यासाठीं चांचपडत चांचपडत शोध करीत मार्ग चालत असतें, -- शेवटीं मूळ सत्य त्याच्या हातीं लागत नाहीं, तें दूर राहतें व त्याच्या (सत्याच्या) कमी अधिक अंधुक वा स्वच्छ छायाचित्रांची रांग किंवा पट्टी तें (मन) आपल्या यत्नानें निर्माण करूं शकतें; सत्याचीं शब्दचित्रें, कल्पनाचित्रें, सत्याच्या इंद्रियरचित मनोरचित प्रतिमा, मूर्ती, प्रतीकें निर्माण करून त्यांच्या द्वारां मूळ सत्याची काय कल्पना करतां येईल ती करीत बसणें एवढेंच आमच्या मनाला -- अज्ञानाच्या 'विभूतीला' -- साधूं शकतें. विज्ञानाची गोष्ट मनाच्या अगदीं उलट आहे. विज्ञानाला

 

पान क्र. ५०८

 

सत्य स्वभावत: विदित असतें, विज्ञानाच्या हातीं खरेंखुरें सत्य स्वाभाविकपणेंच असतें; सत्याचीं स्वतःचीं रूपें, विज्ञान आपल्यासमोर आपल्या करणीनें उभीं करतें; सत्याच्या छायाचित्रांवर, सूचक प्रतीकांवर, कल्पित रचनांवर, विज्ञानाला, मनाप्रमाणें भागवावें लागत नाहीं. विकासक्रमांतील आमचें मन आणि तिरोधान क्रमांतील मूळ मन यांची तुलना केली, तर मूळ मनाची शक्ति आमच्या मनाहून पुष्कळ अधिक आहे असें दिसून येतें. आमच्या विकासी मनाला, प्राण आणि शरीर यांच्या अंधःकारमय कोठडींत रहावें लागत असल्यामुळें, त्याची सत्य-शोधनाची शक्ति ही, कोठडींत बंद नसलेल्या मूळ मनाइतकी असूं शकत नाहीं; हें मूळ मन त्याच्या क्षेत्रांत, आपल्या मनापेक्षां पुष्कळ अधिक मोकळेपणानें वावरू शकतें; सत्यभांडार असलेलें जें विज्ञान, त्याच्या तें बरेंच जवळ असतें, म्हणून त्याच्या सत्यविषयक रचनांत, सत्याचा प्रकाश बराच सामावलेला असतो; सहज भासमान होण्याइतका सत्याचा प्रकाश त्यांत असतो; त्यानें बनविलेल्या सत्याच्या प्रतिमा, आमच्या मनानें बनविलेल्या प्रतिमांहून पुष्कळच अधिक सूक्ष्म, सार्थ, प्रेरणामय व सत्याचा अप्रत्यक्ष साक्षात्कार घडविणाऱ्या अशा असतात; तथापि तें मन देखील, क्रियादृष्टीनें आमच्या मनाहून तत्त्वत: वेगळें असत नाहीं -- विज्ञानाच्या सत्य-ज्ञानाचा अविभक्त भाग, हें कांहीं त्याचें स्वरूप नसतें; त्या ज्ञानापासून फुटून विभक्त होऊन तें अज्ञानांत उतरलेलें असतें; आणि आमचें मन अज्ञानांत वावरत असतें; असो. विज्ञानाचे अंगभूत ज्ञानवेष्टित मन आणि अज्ञानांत प्रथम उडी घेणारें, अज्ञानवेष्टित मन या दोन जाणिवेच्या पातळ्यांमध्ये जी मोठी खिंड आहे, ती खिंड जाणिवेच्या विशिष्ट पातळीनें भरलेली असली पाहिजे -- या पातळीवरच्या ज्ञानाला, जाणिवेला निर्मायक शक्तीहि असली पाहिजे; या निर्मायकशक्तियुक्त जाणिवेंत, विज्ञानांतून आणि विज्ञानांगभूत ज्ञानवेष्टित मनांतून सच्चिदानंद उतरतें व नंतर तेथून तें अज्ञानांत, अज्ञानवेष्टित मनांत उडी घेतें, असें कांहींतरी घडत असलें पाहिजे, असें दिसतें; -- हीच मधली निर्मायक ज्ञानभूमि, आमच्या सच्चिदानंदाला विकासक्रमांत, अज्ञानांतून विज्ञानांत जाण्याला, मधल्या टप्प्यासारखी उपयोगी पडूं शकते. विकासक्रमांत आकारशून्य शक्ति ही संघटित जडाचा आकार घेते, जीवहीन जडांतून जीवतत्त्व वर येतें, मनोहीन जीवतत्त्वांतून विषयग्रहणसमर्थ, भावयुक्त, क्रियाशील जीवतत्त्व निघतें; प्राथमिक पशुसुलभ मनांतून विचारशील, तर्कशील, जीवतत्त्वावर देखरेख करून सत्ता चाल -

 

पान क्र. ५०९

 

विणारें आणि स्वतःचेंहि निरीक्षण करणारें मन उदयास येतें; हें मन स्वतंत्र जीवाप्रमाणें काम करूं शकतें व स्वतःच्या पलीकडे जाण्याचा यत्न बुद्धिपुरस्सरपणें करूं शकतें; सच्चिदानंद तिरोधानक्रमांत शेवटीं व्यवस्थाशून्य, आकारशून्य, जडशक्तींत तिरोभूत होतें -- तेथून मनापर्यंत वर चढतें. -- या अज्ञानवेष्टित मनांतून सत्यपूर्ण विज्ञानांत तें एकदम जाणें अशक्य दिसतें; मध्यें एक वा अधिक ज्ञानभूमिका असाव्यात असें तर्कदृष्टीनें व व्यवहारदृष्टीनें म्हणणें प्राप्त होतें; कारण अज्ञानग्रस्त मन आणि विज्ञान, यांमधील खिंड फार मोठी आहे आणि विकासक्रमांतील ज्या पायऱ्या वर दिल्या आहेत त्या सुखानें चढतां याव्या म्हणून प्रत्येक दोन पायऱ्यांमध्यें कांहीं पोट-पायऱ्याहि आपल्याला आढळतात; तेव्हां अशाच पोटपायऱ्या, अज्ञान आणि विज्ञान यांच्यामधील खिंड सुखानें चढण्यासाठीं, भरण्यासाठीं असाव्यात हें तर्काला व व्यवहाराला धरून आहे. तिरोधान क्रमांतहि या पोट-पायऱ्या असणें सोईचें असणार. याप्रमाणें या पोटपायऱ्यांची उपयुक्तता व संभवनीयता सिद्ध होते.

अज्ञानांतील मनांतून, विज्ञानांगभूत ज्ञानसंपन्न मनाकडे चढतांना कांहीं पायऱ्या -- ज्ञानभूमी -- असल्या, तर त्या पायऱ्या सामान्य मनाच्या जाणिवेपलीकडे असल्या पाहिजेत हें उघड आहे. अस्तित्वाच्या, मनोमय अवस्थेहून श्रेष्ठ अवस्था या मधल्या ज्ञानभूमीवर आहेत आणि त्या अवस्था सामान्य मनाला, त्याच्या सामान्य स्थितींत अनुभवांत येत नाहींत; त्या अवस्थांत आमच्या मनाला, त्याच्या सामान्य स्थितींत प्रवेश मिळूं शकत नाहीं. मनुष्याची जाणीव मनानें मर्यादित झालेली आहे -- नव्हे, मनाच्या विशिष्ट विभागानें मर्यादित झाली आहे असें म्हटलें पाहिजे : जें मनाच्या किंवा या विशिष्ट विभागाच्या खालीं आहे, तें आम्हांला अर्धनेणिवेनें व्याप्त किंवा जवळजवळ पूर्ण नेणिवेचें भासतें. जें मनाच्या वर आहे, त्याला जणुं जाणीवच नाहीं, प्रकाशमय नेणीव हें त्याचें स्वरूप आहे, असें आम्हांला भासतें. ध्वनि व रंग यांच्या बाबतींत आम्ही असें पहातों कीं, आम्हांला जे ध्वनी ऐकूं येतात व जे रंग दिसतात, त्यांच्या वर आणि खालींहि ध्वनी व रंग असतात पण ते आम्हांला दिसत नाहींत, ऐकूं येत नाहींत व त्यांपैकीं कांहीं कोणाला दिसले, ऐकूं आले तर तें स्पष्ट नसतात. श्रवणेंद्रियाची व नेत्रेंद्रियाची जी अवस्था, तीच मन या अंतरिद्रियाची अवस्था आहे. मनुष्याप्रमाणें मनुष्येतर प्राण्यांना मन आहे, अर्थात् तें मन मनुष्याच्या मनाइतकें प्रगल्भ नाहीं; पण जें आहे तें स्वभावधर्मानें

 

पान क्र. ५१०

 

मनुष्याच्या मनासारखें आहे. असें असून मानवी मनाला मानवेतर मनाशीं फारसा संपर्क ठेवतां येत नाहीं; उलट हें मानवेतरांचें मन मनच नव्हे, खरी जाणीव मानवेतर प्राण्यांत नाहीं असेंहि म्हटलें जातें; कारण एवढेच कीं, त्या प्राण्यांच्या जाणिवेच्या क्रिया मनुष्याहून वेगळ्या व मनुष्याहून कमी व्यापक असतात; ज्या अस्तित्वाला मन मिळालेलें नाहीं, त्या अस्तित्वाचें मानव बाहेरून निरीक्षण करतो, त्याच्याशीं हितगुज करूं शकत नाहीं, त्याच्या अंतरंगांत शिरूं शकत नाहीं; मानवी जाणिवेच्या वर जें स्थान आहे, तेंहि त्या जाणिवेच्या खालीं असणाऱ्या गोष्टींप्रमाणें मानवी मनाला अज्ञात असतें, तें स्थान सर्वथैव रितें असल्यासारखेंच त्याला भासतें. तेव्हां मनाच्या जाणिवेपेक्षां उच्च अशा जाणिवेच्या भूमिका असल्या, तरी त्या भूमिकांशी मनुष्याला कांहीं संबंध ठेवतां येत नसल्यानें, असा संबंध ठेवण्याचें कांहीं साधन त्याच्याजवळ दिसत नसल्यानें, ह्या उच्च ज्ञानभूमिका त्याला पायऱ्यासारख्या उपयोगीं पडूं शकणार नाहींत असें प्रथमदर्शनीं भासतें; व जर त्याला या पायऱ्या उपलब्ध नाहींत, तर त्याला वापरतां येणाऱ्या मर्यादित मनापाशींच त्याचा विकास थांबतो. निसर्गानें त्याच्या ऊर्ध्वगामी प्रयत्नासंबंधानें, या मर्यादित मनापाशींच 'विकासाची समाप्ति' असा लेख लिहून टाकला आहे असें म्हणावें लागतें.

पण प्रथमदर्शनीं मन जितकें पंगु दिसतें, तितकें तें पंगु नाहीं असें बारीक निरीक्षणानें लक्षांत येतें; मनाचा मर्यादितपणाचा सामान्य धर्म आम्हांला फसविणारा आहे, मन आपल्या सामान्य मर्यादा अनेक दिशांनीं उल्लंघून जात असते अशी वास्तविक स्थिति आहे; मनाला आत्मोल्लंघनाचें वावडें नाहीं; मनाच्या आत्मोल्लंघनाच्या वाटा त्याला, आत्मप्रकटन करणाऱ्या आत्म्याच्या (सच्चिदानंदाच्या) उच्च ज्ञानभूमिकांकडे नेतात. या वाटा अर्धवट किंवा पूर्णपणें अप्रकट वा गुप्त अशा आहेत किंवा पडद्याआड आहेत; अंतःस्फूर्ति नांवाची अशीच एक वाट आहे : मनुष्याच्या ज्ञानप्राप्तीच्या साधनांपैकीं अंतःस्फूर्ति हें एक साधन आहे, हे आपण पूर्वीं पाहिलें आहे; अज्ञानक्षेत्रांतील मनांत, मनापेक्षां श्रेष्ठ ज्ञानभूमीवरून ज्ञानाचा प्रकाश टाकण्याचा जो विशिष्ट प्रकार आहे, तो अंतःस्फूर्ति या नांवानें ओळखला जातो. मानवी मनांत येणारी अंतःस्फूर्ति सामान्य बुद्धीच्या व्यापारानें पुष्कळशी झांकली जाते; फारच क्वचित् आमच्या मनोव्यापारांत आम्हांला शुद्ध अंतःस्फूर्तीचा प्रत्यय लाभतो; सामान्यत: अंतःस्फूर्ति मनांत येण्याचा अवकाश, कीं तो प्रकाशाचा बिंदु सामान्य

 

पान क्र. ५११

 

मानसिक व्यापारांनीं, त्यांच्या पुटांनीं व्यापला जातो; केव्हां केव्हां अंत:स्फूर्ति विजेसारखी मनांत चमकतांच, त्या चमकणाऱ्या ज्ञानतेजाला व्यवस्थित आकारास येण्याला वाव न देतां, तिची नक्कल करणारा सामान्य बुद्धीचा व्यापार, तिला व्यवस्थेनें मनांत येऊं देण्याच्या आड येतो; तत्सम बौद्धिक सूचनेचें खरें-खोटें नाणें त्या स्फूर्तीच्या खऱ्या नाण्याऐवजीं चालवितो; असें जरी असलें तरी श्रेष्ठ ज्ञानभूमीवरून आमच्या अज्ञानवेष्टित मनांत ज्ञानप्रकाश येतो ही गोष्ट मात्र, मनाचा त्याच्या वरतीं असलेल्या ज्ञानभूमीशीं संबंध जोडण्यास पुरेशी आहे. आम्ही आमच्या मनांतून अंतःस्फूर्तीच्या वाटेनें जाऊन, आत्म्याच्या (सच्चिदानंदाच्या) श्रेष्ठ ज्ञानभूमींमध्यें प्रवेश करूं शकतों. अंतःस्फूर्ति ही आमच्या मौलिक मननांत, तसेंच विषयांचें यथातथ्य ग्रहण करण्याच्या मनोव्यापारांत आपल्या अनावृत, आवृत किंवा अर्ध-आवृत अशा तेजानें कार्यकारी स्वरूपांत उपस्थित असते, ही गोष्ट सुद्धां वर सांगितल्याप्रमाणेंच चैतन्याच्या (सच्चिदानंदाच्या) श्रेष्ठ भूमिकांशीं आमचा संबंध येऊन, त्या भूमिकांत आमचा प्रवेश घडून येण्यास उपकारक होते ही महत्त्वाची बाब आहे. श्रेष्ठ ज्ञानभूमीला जाण्यासाठीं अंतःस्फूर्ति ही जशी एक वाट आहे, तशी दुसरीहि एक वाट आहे. अहंची मर्यादा ओलांडून, मन अनहंभावानें, विश्वभावानें कोणत्याहि गोष्टीकडे अथवा घटनेकडे जें पाहूं शकतें, पाहतें, त्या मनाच्या व्यापारांत ती वाट अंतर्भूत आहे. विश्वात्म्याची पहिली विशिष्टता अनहंभाव, अवैयक्तिकता, 'मी-शून्यता' ही आहे; विश्वात्म्याचें विषयग्रहण, विषयज्ञान सर्वांगीण असतें; सर्वांगस्पर्शित्व, एकाच दृष्टिकोनानें मर्यादित नसणें, मर्यादा असलेल्या कोणत्याहि दृष्टिकोनानें बांधून न घेणें हें विश्वात्म्याच्या विषयग्रहणाचें, विषयज्ञानाचें वैशिष्ट्य आहे. तेव्हां, मनाच्या अनहंभावाच्या, विश्वभावाच्या व्यापारानें मनाचें मर्यादित क्षेत्र विस्तार पावून, विश्वाच्या क्षेत्राशीं एकरूप होण्याच्या मार्गाला लागतें हें उघड आहे; व्यापक क्षेत्र ही उच्च मानसिक भूमिकांची एक विशिष्टता असते; हा विशिष्ट गुण अनहंभावी मन मिळवितें ही गोष्ट स्पष्ट आहे; जें विश्वव्यापक विश्वमानस आमच्या मनाच्या मर्यादांपलीकडे दूर आहे, त्याची व्यापकता, विश्वदृष्टीनें वस्तुजातांकडे बघूं लागलेल्या मनाला क्रमश: येऊं शकते : मुळांत मन प्रथम विश्वमनच होतें, विश्वव्यापकत्व ही मनाच्या व्यापाराची मूळ स्थिति होती; पण नंतर त्या मनापासून, त्याचा एक कनिष्ठ व्यापार म्हणून आमचें मर्यादित मन उदयास आलें.

 

पान क्र. ५१२

 

मन मी-शून्य होऊन विश्वदृष्टीनें व्यवहाराकडे बघूं लागतें, या त्याच्या व्यापारांत मनाला त्याचें जन्मक्षेत्र - विश्वमानस पुन: लाभण्याचा मार्ग आहे, ही गोष्ट स्पष्ट आहे. मनाच्या पोटीं केव्हां केव्हां चमकणारी अंतःस्फूर्ति, मनाचा अनहंभावयुक्त विश्वभाव हे दोन मार्ग, मन आणि ज्ञानाच्या श्रेष्ठ भूमिका यांचा संबंध जोडणारे आहेत हें आपण पाहिलें. तिसरा मार्ग प्रतिभा नांवानें ओळखला जातो. श्रेष्ठ ज्ञानभूमींतून कांहीं ज्ञानप्रकार सरळ मनांत उतरतात. प्रतिभेचे व्यापार हे असे ज्ञानप्रकार आहेत. आमच्या मनाच्या पलीकडे, मनाच्या वर, जणुं मस्तकाच्या वर दिव्य-ज्ञानप्रकाशानें भरलेली जाणीव आहे -- या दिव्य जाणिवेच्या उच्च क्षेत्रांतून खालीं, मनांत, प्रतिभारूपानें जें ज्ञान उतरतें, तें मूळ तेजाळपणासह व व्यापकतेसह मनांत व्यवहार करीत नाहीं -- सामान्यत: विशिष्ट मर्यादित क्षेत्रांत प्रतिभा कार्य करते, तिच्या विशिष्ट शक्तीच्या व्यवहारासाठीं तिची स्वतंत्र संघटित व्यवस्था नसते, ती स्थिरतेनें कार्य करीत नाहीं, लहरीपणा हा तिचा स्वभाव दिसतो, तिची चाल बेजबाबदार दिसते; विचित्रपणा, असाधारण उच्चपणा, असाधारण विलक्षणपणा अशा प्रकारच्या गोष्टी, मनांतील तिच्या राज्यांत प्रत्ययास येतात; मनांत प्रतिभेच्या द्वारां जें ज्ञानतेज उतरतें, तें मनाच्या द्रव्याशीं आपलें कार्य जुळवून घेते -- एकंदरीत मूळ ज्ञानतेजाची दिव्यता, तें तेज प्रतिभेच्या द्वारां मनांत उतरल्यावर प्रत्ययास येत नाहीं, मनाचे ठायीं त्या तेजाचा तेजस्वीपणा कमी झालेला, मंद झालेला असा भासतो. या सर्व गोष्टी खऱ्या असल्या तरी, केव्हां केव्हां आमच्या मनांत एकदम उच्च विचार स्फुरतात, कांहीं साक्षात्कारी दर्शन घडतें, अंतःस्फुरणानें कांहीं विषयग्रहण घडतें, कांहीं निर्णय सुचतो; आणि या गोष्टी सामान्य मानसिक व्यापाराच्या आटोक्यांतल्या नाहींत, या गोष्टींत मनापेक्षां विशेष प्रकाश व विशेष सामर्थ्य यांचें दर्शन घडतें म्हणून मनाहून श्रेष्ठ ज्ञानभूमीच या गोष्टींचें मूळ स्थान आहे हें निःसंकोचपणें मान्य होतें. तेव्हां, अंत:स्फूर्ति, अनहंभाव आणि प्रतिभा या तीन वाटा मनांतून श्रेष्ठ ज्ञानभूमींत प्रवेश घडविणाऱ्या आहेत. आतां चौथी वाट : अध्यात्माचें आणि विविध योगाचें महान् क्षेत्र ज्या नानाविध दिव्य अनुभूतींनीं भरलेलें आहे, त्या अनुभूतींतून ही वाट जाते. या क्षेत्रांत जागोजाग अनुभूतींचे दरवाजे उघडे झाले आहेत, त्यांच्या द्वारां आमची जाणीव सांप्रतच्या तिच्या मर्यादा उल्लंघून पार दूर जाऊं शकेल. येथें एकच अडचण आहे; 'नको तें संशोधन' या तामस वृत्तीची, 'मनाला

 

पान क्र. ५१३

 

ज्या मर्यादा आहेत, त्या ठीक आहेत' या तामस संतोषीपणाची. या वृत्तींमुळें वर उल्लेखिलेले दरवाजे आम्ही बंद करून टाकतों, त्या दरवाज्यांतून दिसूं शकणाऱ्या, दूरपर्यंत पसरलेल्या दिव्य देखाव्याला आम्ही मुकतो. असो. आम्हीं जें संशोधन चालविलें आहे, त्या संशोधनाच्या प्रसंगीं आम्हांला या वरील आध्यात्मिक आणि योगसिद्ध अनुभूतींकडे दुर्लक्ष करतां येत नाहीं; आमची जाणीव समृद्ध व उच्च करण्याची जी शक्यता, मानवी प्रयत्नाचें हें क्षेत्र आम्हांला दाखवीत आहे, जी शक्ति आम्हांला समर्पित आहे, तिचा योग्य उपयोग करणें आम्हीं आमचें कर्तव्य समजतों; मानवजातीला, मानवाला त्याच्या आत्म्यासंबंधाचें, त्याला गूढ असलेल्या मूळ, सद्वस्तुसंबंधाचें त्याच्या सामान्य ज्ञानाहून पुष्कळ अधिक ज्ञान अध्यात्मसाधना व योगसाधना देऊन चुकल्या आहेत; या ज्ञानाकडे आम्हांला कानाडोळा करतां येत नाहीं. अध्यात्मशास्त्र आणि योगशास्त्र यांचा प्रकाश, आम्हांला सामान्यत: उपलब्ध होणाऱ्या मनाच्या प्रकाशाहून फार मोठा आणि व्यापक आहे; या महान् व्यापक प्रकाशामुळें त्या शास्त्रांना आमच्यावर शासन करण्याचा अधिकार पोंचतो; हा महान् व्यापक प्रकाश ही या शास्त्रांची अंगभूत आंतरिक महाशक्ति आहे, या महाशक्तीनें त्यांचें अस्तित्व शक्तिमान् झालेलें आहे. आमच्या जाणीवयुक्त अस्तित्वाच्या ज्या श्रेष्ठ भूमिका आहेत त्यांत प्रवेश मिळवावयाचा हेतु आम्ही धरून असलों, तर तो आम्ही पूर्ण करूं शकतो; एका पाठीमागून एक करावयाचे, असे जाणिवेचे दोन व्यापार आहेत; हे व्यापार अवघड आहेत पण आमच्या आवांक्याबाहेरचे नाहींत : हे व्यापार, पहिल्या पहिल्यानें व त्यानंतर दुसरा, असें आम्हीं केल्यास श्रेष्ठ ज्ञानभूमीवर, अस्तित्वभूमीवर आमचें पाऊल पडूं शकेल. पहिला करावयाचा जाणिवेचा व्यापार म्हणजे अंतर्मुख व्यापार. आम्ही सामान्यत: वरच्या मनांत, बाह्य मनांत राहून आपलें जीवन जगत असतों; हें बाह्यमन आणि अंतर्मन, आमचा बाह्य पुरुष आणि अंत:पुरुष यांच्यामधील भिंत आम्हीं अन्तर्मुख मनोव्यापारानें पाडावी, हें आमचें पहिलें काम. हें भिंत पाडण्याचें काम हळू हळू शिस्तीचा यत्न करून साधूं शकतें; एकदम जोर करूनहि हें काम साधूं शकतें; आमची इच्छा नसतांहि कधींकधीं ही मधली भिंत तिजवर कोठूनतरी जोराचा आघात होऊन कोसळते. अंतर्मनाला बाह्य मनापासून अलग ठेवणारी भिंत, आमच्याकडून वा इतराकडून एकदम जोराचा आघात होऊन कोसळणें हें आमच्या मनाच्या जीवनाला अपाय-

 

पान क्र. ५१४

 

कारक आहे, सुरक्षितपणाचें नाहीं : मन त्याच्या सामान्य मर्यादांच्या आंत सुरक्षितपणें व्यवहार करण्यास शिकलेलें असतें -- त्याला एकदम अफाट विस्तारांत ढकलणें, म्हणजे त्याच्या सुरक्षित व्यवहाराला बाधा आणण्यासारखें होतें -- तें कसेंहि असो -- मधली भिंत सुरक्षितपणें वा असुरक्षितपणें पाडली जाऊं शकते इतकें खरें. ही भिंत पडली म्हणजे आम्हाला आमच्या अस्तित्वाचा जो अंतर्भाग, गुप्तभाग प्रकट होतो तेथें आम्हाला आमचा अंतःपुरुष भेटतो, आत्मा भेटतो; तेथें आंतलें मन असतें, आंतलें जीवन (प्राण) असतें, सूक्ष्म-भौतिक आंतलें शरीर असतें; या आत्म्याच्या व इतरांच्या शक्ती, बाह्य मन-प्राण-शरीरापेक्षां पुष्कळच अधिक आणि मोठ्या असतात; ही आंतील मंडळी बाह्य मनाहून, प्राणाहून, शरीराहून अधिक लवचिक, अधिक सामर्थ्यवान् असते; विविध ज्ञान मिळविण्याची, विविध कार्य करण्याची त्यांची पात्रता, क्षमता बाह्य मनाहून, प्राणाहून व शरीराहून पुष्कळच अधिक असते. तेव्हां बाह्य पुरुष (बाह्य मनप्राणशरीरयुक्त) आणि अंतःपुरुष (अन्तर्वर्ती सूक्ष्म मनप्राणशरीरयुक्त) मिळून आमचें अस्तित्व असतें, आणि अंत:पुरुष बाह्यपुरुषाहून सर्व साधनांनीं अधिक सामर्ध्यवान् असतो; विशेषत: विश्वपुरुषाशीं आणि त्याच्या विश्वव्यापी व्यापारांशीं या अंत:पुरुषाला आपलें प्रत्यक्ष नातें जोडतां येतें; विश्वभर काम करणाऱ्या शक्ती, विश्वव्यापीं आंदोलने, विश्वांतील सर्व पदार्थ हे आमच्या अंत:पुरुषाला प्रत्यक्ष पाहतां येतात; त्याच्या भावना संवेदना त्या गोष्टींनीं व्याप्त होतात, त्या गोष्टी त्याला हाताळतां येतात, त्यांच्यावर कांहीं प्रत्यक्ष क्रिया हा अंतःपुरुष करूं शकतो, इतकेंच नव्हे, तर त्याचे वैयक्तिक मन-प्राण-शरीर त्याला ज्या मर्यादा घालतें त्या मर्यादा उल्लंघून हा अंत:पुरुष विस्तृत, व्यापक होऊं शकतो; आपण विश्वपुरुष आहोंत असें देखील त्याला अधिकाधिक स्पष्टपणें वाटू लागतें. आमच्या अतिसंकुचित मानसिक, प्राणिक, शारीर अस्तित्वाच्या सांप्रतच्या भिंती त्या अंतःपुरुषाला कोंडू शकत नाहींत. आमचा अंतःपुरुष आपली व्याप्ति वाढवीत वाढवीत शेवटीं विश्वपुरुषाच्या, विश्वमानसाच्या जाणिवेंत पूर्णतया प्रविष्ट होतो, होऊं शकतो. विश्वजीवनाशीं पूर्ण ऐक्य पावूं शकतो; इतकेंच नव्हे, तर विश्वद्रव्याशींहि एकरूप होऊं शकतो. परंतु हें सर्व घडलें तरी विश्वगत पूर्ण सत्याशीं तो एकरूप होऊं शकतो असें नाहीं, तर तो ज्याशीं एकरूप होतो तें अपूर्ण व भंगलेले विश्वसत्य असतें, किंवा विश्वव्यापक अज्ञान असतें.

 

पान क्र. ५१५

 

पण एकदां आम्ही आमच्या अंतरंगांत विशेष साधना करून अंत:पुरुषाची गांठ घेतली, कीं आमच्या अज्ञानप्रदेशांतील मनाची पातळी ओलांडून ज्ञान प्रदेशांत जाणें आम्हाला अवघड रहात नाहीं. आमच्या जाणिवेच्या अंतर्मुख व्यापारानें आम्ही प्रथम अंत:पुरुष गांठतो व नंतर हा अंतःपुरुष ऊर्ध्वमुख वाटचालीनें उच्चतर ज्ञानभूमिकांवर आम्हाला घेऊन जाऊं शकतो. आमच्या अंत:पुरुषानें ऊर्ध्वमुख होऊन वर चढणें सुरूं केलें -- आणि मनाच्या वर असलेल्या उच्च ज्ञानभूमींत प्रवेश केला, कीं सामान्यत: तेथें त्याला प्रथम दर्शन घडतें तें कर्मातीत, अचल, शांत, महान् आत्म्याचें. आमचें खरे पायाभूत अस्तित्व, आम्ही जें कांहीं आहों, त्या सर्वाचा मूलाधार हा सर्वगत, सर्वातीत, शांत, स्थिर पुरुष आहे अशी अनुभूती आम्हाला होते, असा भाव आमचे ठिकाणीं उत्पन्न होतो. या शांत आत्म्याचे ठिकाणीं आमच्या कर्मपर आत्म्याचें विलीन होणेंहि घडून येऊं शकतें. आमची कर्मपरता, आमचें आत्मभान, सर्वकांहीं या अलक्षण, अनिर्वचनीय सद्‌वस्तुमध्यें (सत्यामध्यें) निर्वाणाला प्राप्त होऊं शकतें. आमचें व सर्वांचेंच मूळ असें आत्मतत्त्व, विश्वाच्या अस्तित्वाचें पायाभूत सत्य हा शांत व अचल पुरुष आहे अशी प्रतीति आपल्याला येते, येऊं शकते. सर्व प्रकारच्या वैयक्तिकतेचें निर्वाण भोगणें, ही आमची अंतिम स्थिति होऊं शकते; शांत, अचल, आत्मरूप सांपडल्यावर आम्ही तेथें बैठक मारून कायमचें बसणें ही गोष्ट शक्य आहे; विश्वव्यवहार वरवरचा खेळ आहे, भ्रमात्मक व्यापार आहे -- मूळच्या शांत आत्म्यावर हा व्यापार आरोपित केलेला आहे, लादलेला आहे, अशी समजूत करून घेऊन, विश्वातीत अशी अचल, अव्यय व एकप्रकारची सर्वश्रेष्ठ अवस्था, शांत आत्मस्थिति, आम्ही आमच्या अस्तित्वाला आणून देऊं शकतो. श्रेष्ठ ज्ञानभूमीचा हा एक प्रकारचा अनुभव आमच्या अंत:पुरुषाच्या ऊर्ध्वगामी प्रयत्नानें आम्हांला मिळतो. दुसरा याहून वेगळा भावात्मक व क्रियात्मक अनुभवहि आम्हाला मिळूं शकतो. आमचा शांत आत्मा आम्हांला प्राप्त होऊन, त्याची अचल शांति आम्ही अनुभवीत असतां, वरून महान् प्रकाश, ज्ञान, सामर्थ्य, आनंद या व आणखी दुसऱ्या असामान्य शक्तींचा जोरदार, अधोमुख प्रवाह आमच्या शांत आत्मक्षेत्रांत पडत असतो; तसेंच आम्ही शांत आत्मस्थितींतून वर चढून जाऊं शकतो; चैतन्याच्या उच्चतर क्षेत्रांत चढूं शकतो; जेथें वर उल्लेखिलेल्या महान् प्रकाशमय शक्ती, शांत आत्मस्थितीच्या मूलाधारावर

 

पान क्र. ५१६

 

आपलें महान् कार्य करीत असतात. शांत आत्मा असो किंवा त्यावरचा क्रियाशील आत्मा असो -- दोन्ही ज्ञानभूमी, आध्यात्मिक श्रेष्ठ भूमी आहेत -- आणि अज्ञानबद्ध मनांतून, आपण प्रथम अंतर्मुख साधना आणि नंतर आपल्या अंतःपुरुषाची ऊर्ध्वमुख साधना या क्रमवार साधनाबळानें, दोनहि ज्ञानमय आध्यात्मिक भूमींवर जाऊं शकतों, इतकें ठरलें. क्रियाशील ज्ञानभूमीवर मूळ जाणीवशक्तीचा महान् चैतन्यव्यापार संघटित व असंघटित अशा दोन अवस्थांत चालूं असतो; या व्यापाराच्या संघटित अवस्थेंत ज्ञानमय, अध्यात्मसंपन्न, सद्‌वस्तु ओळखणारें, सद्‌वस्तुसंबंधींची नेणीव नष्ट झालेलें असें मन कार्य करीत असतांना आढळतें; हें मन कांहीं विज्ञानाच्या पातळीवरलें मन असत नाहीं, पण तेथील सत्यज्ञानांतून उदयास आलेलें आणि तेथील तेजोमय ज्ञान थोडेंबहुत जवळ आणलेलें अशा प्रकारचें मन असतें; मन असतें असें म्हणण्यापेक्षां मनांची रांग, शिडी, श्रेणी असते असें म्हणणें, अधिक सत्यास धरून होईल.

आमच्या मनांतून आम्हीं अतिमानसांत, विज्ञानांत जावयाचें, तर आमचें अज्ञानबद्ध मन आणि विज्ञान यांच्यामध्यें मोठी खिंड असल्यानें ही खिंड भरून काढणारी शिडी, ज्ञानाची -- ज्ञानमय मनाची -- शिडी आम्हांला हवी होती, ती मनाच्या वरील रांगेमध्यें आम्हांला मिळते. येथें चढणीवर अनेक टप्पे आहेत; यामुळें ही चढण सोईनें, हळू हळू चढून जाऊन शेवटीं विज्ञानांत पाऊल टाकतां येतें; प्रत्येक वरचा टप्पा खालच्यापेक्षां अधिक खोल, अधिक व्यापक ज्ञान व सामर्थ्य देणारा असतो; अर्थात् हें सर्व ज्ञान व सामर्थ्य वरून येत असतें. हे टप्पे सच्चिदानंदाला विज्ञानांतून क्रमश: खालीं उतरून, आमच्या मूळ अज्ञानमय मनांत येण्याला, तसेंच विकास-क्रमांत, खालून आमच्या कोठीबंद (शरीर-प्राणाच्या कोठींत बंद असलेल्या) मनांतून वर विज्ञानांत चढण्याला उपयोगी पडतात. आमच्या मनाच्या वर उच्चमन, नंतर प्रकाशित किंवा प्रकाशमय मन, नंतर खरी अंतःस्फूर्ति किंवा स्फूर्तिमय मन, नंतर अधिमानस अशा चार पायऱ्यांनी आम्ही अतिमानसाला पोंचतों. आम्ही आमच्या मनांतून वर उच्च मनाकडे (Higher Mind) चढू लागलों म्हणजे या उच्च मनांतून आमच्यावर जणुं स्वयंभू ज्ञानाचा सागर वर्षाकाळच्या मेघासारखा ज्ञानाचा पाऊस पाडूं लागतो; या ज्ञानाला विचाराचें रूप येतें -- विचाराचें रूप हें ज्ञान घेतें -- पण आम्हाला परिचित असलेली विकासाची प्रक्रिया येथें असत नाहीं. येथें सत्याच्या शोधाची भानगड

 

पान क्र. ५१७

 

नाहीं; बौद्धिक रचना करण्याचा त्रास नाहीं; कल्पना श्रमवावी लागत नाहीं, शोधाची कठीण प्रक्रियाच नाहीं; स्वयंसिद्ध, स्वयंचालित ज्ञान, उच्च मनांत ज्याचें भांडार असतें, तें ज्ञान आमच्यावर पावसासारखें वर्षत असतें : उच्चमन सत्य सांठवून असतें; दडलेलें, दडवलेलें सत्य शोधीत बसण्याचें काम उच्च मनास करावें लागत नाहीं. उच्च मनांतील सत्यगर्भ विचार हा एका दृष्टिक्षेपांत ज्ञानाचा डोंगर जणुं हाताळू शकतो; त्याचें स्वरूप विश्वव्यापी असतें, व्यक्तिगत विचाराचा शिक्का त्याच्यावर मुळींच आढळत नाहीं. या उच्च मनाच्या पलीकडे प्रकाशित मन (Illumined Mind) आपलें कार्य करीत असतें. -- येथे उच्च मनाच्या सत्य-विचाराच्या ऐवजीं, सत्य-दर्शनाचा प्रकाश असतो; सत्य-दर्शनांतून मग त्याची एक गौण क्रिया म्हणून सत्य-विचार उभा राहूं शकतो. प्रकाशित मनांत विजेच्या किंवा विजांच्या झगमगाटासारखे महान् प्रकाशझोत सारखे हेलावत असतात; उच्च मनांतील प्रकाश हा स्थिर सूर्यप्रकाशासारखा असतो. प्रकाशित मनांतील तेज जसें उच्च मनाहून पुष्कळ अधिक असतें, तशी त्या श्रेष्ठ तेजाची क्रियाशक्तीहि अधिक असते; त्याची तीव्रता आणि सामर्थ्यहि अधिक असतें. प्रकाशित मनाच्या वर खरी अंत:स्फूर्ति (Intuition) असते. येथें सत्य-शक्ति प्रकाशित मनाहून अधिक क्रियाशील व अधिक सामर्थ्यवान् असते; येथें सत्य-दर्शन अगदीं पूर्ण आणि अचूक असतें; सत्य-विचार, सत्य-संवेदना, सत्य-भावना, सत्य-व्यापार या सर्व गोष्टी अंत:स्फूर्तिमय मनांत अगदीं अचूक आणि अंत:स्पर्शी असतात. बुद्धीहून वरच्या प्रकारचें प्रत्यक्ष ज्ञानाचें कोणतेंहि आंतरिक साधन 'अंत:स्फूर्ति' या नांवानें सामान्यत: ओळखले जातें. पण खरी अंत:स्फूर्ति आतां वर्णन केल्याप्रमाणें स्वयंभू ज्ञानाची एक खास क्रिया-प्रक्रिया आहे. आमच्या मनांत होणाऱ्या स्फुरणांना या खऱ्या अंत:स्फूर्तीपासूनच त्यांचें विशेष स्वरूप प्राप्त होतें; या अंत:स्फूर्तीला जो सत्य-प्रकाश कायमचा उपलब्ध असतो; त्या प्रकाशाशीं प्रत्यक्ष नातें आमच्या मनाला अर्थातच जोडतां येत नाहीं; या खऱ्या अंत:स्फूर्तीच्या द्वारांच आमचें मन त्या प्रकाशाशीं जोडलें जाऊं शकतें. या खऱ्या अंत:स्फूर्तीच्या उगमस्थानीं अधिमानस (Overmind) असतें. अधिमानसाचें थोडक्यात वर्णन करावयाचे तर तें ज्ञानमय विश्वमन आमच्या मानसिक जाणिवेच्या पलीकडे असलेलें, अतिमानसिक सत्यज्ञानाशीं प्रत्यक्ष संपर्क ठेवणारें असें श्रेष्ठ जाणिवेचें विश्वमन असतें. या विश्वमनाच्या खालीं होणाऱ्या

 

पान क्र. ५१८

 

सर्व हालचाली हें विश्वमन ठरवितें, चालवितें; त्या सर्व हालचालींचें मूळ-संयोजक हें विश्वमन आहे. सर्व मानसिक शक्तींच्या व्यापारांचें मूळहि या विश्वमनांत आहे; ज्ञान आणि अज्ञान या जोडीनें व्यापलेला, ब्रह्मांडाचा खालचा गोलार्ध, या विश्वमनाच्या पंखाखालीं जणुं सुव्यवस्थितपणें काम करीत आहे; या गोलार्धाची निर्मिति बहुतांशीं याचेंच कार्य आहे; अतिमानसिक सत्यज्ञानाशीं या गोलार्धाचा संबंध जोडण्याचें काम या मनाकडे आहे; हें काम तें करतें; तथापि स्वतःच्या तेजानें हें विश्वमन अतिमानसाचें सत्य-ज्ञान आम्हांपासून लपवितें -- आपल्या प्रकाशाचें, 'हिरण्य'समान तेजोमय झांकण त्यावर टाकून लपवितें; आपल्या अनंत शक्यतांचा महापूर, अतिमानस आणि खालचा गोलार्ध यांच्यामध्यें, विश्वमन वाहवितें -- हा महापूर एका दृष्टीनें आम्हां खालच्या गोलार्धांतल्या जीवांना अडचणीसारखा, तर दुसऱ्या दृष्टीनें अतिमानसांत प्रवेश देऊं शकणाऱ्या, सोईच्या मार्गासारखा असतो -- आमच्या अस्तित्वाचा आध्यात्मिक व्यवहारनियम शोधून काढणें, त्याचें श्रेष्ठांत श्रेष्ठ प्राप्तव्य, त्याचें गूढ सत्य शोधून काढणें व आत्मसात् करणें हें जें आमचें कर्तव्य, तें नीटपणें पार पाडण्याच्या कामांत विश्वमनाच्या अनंत शक्यतांचा महापूर मदतहि करतो आणि अडचणहि करतो -- या महापुरांतून पुढची वाट असल्यानें तो आमचा मदतगार आहे; हा महापूर आपल्या झगमगाटानें आम्हांला मोह पाडून स्वतःच्या क्षेत्रांत थांबवूं शकतो, म्हणून तो आम्हांला अडचणीसारखा आहे. असो. तेव्हां हें अधिमानस ही वस्तु, विज्ञानाशीं आमचें अज्ञानक्षेत्र जोडून देणारी महाशक्ति आहे -- याच गूढ दुव्याच्या शोधांत आम्ही होतो. हा दुवा म्हणजे श्रेष्ठांत श्रेष्ठ ज्ञान आणि विश्वव्यापक अज्ञान या दोन वस्तूंना एकाचवेळीं जोडणारी आणि तोडणारी अशी महाशक्ति आहे.

अज्ञानाकडे येणारा विज्ञानाचा प्रतिनिधि, हें अधिमानसाचें स्वरूप आहे : अधिमानसाचा स्वभावधर्म आणि कायदा हा त्याला हें प्रतिनिधीचें स्वरूप देणारा आहे; अज्ञानावर विज्ञान जी उद्धारक क्रिया करूं इच्छितें, ती क्रिया त्यानें प्रत्यक्षपणें करणें अवघड असतें -- कारण विज्ञानाचा श्रेष्ठ प्रकाश प्रत्यक्षपणें अज्ञानावर कार्य करूं लागला, तर तो प्रकाश वा त्याचा संपर्क सहन करण्याचें सामर्थ्य अज्ञानांत नसतें; तेव्हां अप्रत्यक्षपणें, एकाद्या पडद्याआडून, विज्ञानाला अज्ञानावर कार्य करणें भाग पडतें -- हा पडदा अधिमानस होय. आमच्या अज्ञानाला संभाळण्याचें व सुधारण्याचें

 

पान क्र. ५१९

 

अशीं दोन्हीं कामें हा पडदा करतो -- कारण त्याच्याद्वारां विज्ञानाचें सुधारक - उद्धारक कार्य अज्ञानावर घडत असतें आणि हें कार्य अज्ञानाला झेपेल अशा सावकाशीच्या क्रमानें घडत असतें. या पडद्यांत अतिमानसाशीं साम्य आणि वैषम्य हे दोन्ही गुण आहेत. म्हणून याला अतिमानसाची संरक्षक प्रत -- दुसरी प्रतिमा म्हणतां येईल. प्रत म्हणण्याचें कारण अधिमानस अतिमानसाचेंच काम करतें; संरक्षक म्हणण्याचें कारण अज्ञानावर एकदम तेजाचा विध्वंसक बोझा न आणतां, त्याला संभाळून संभाळून, ज्ञानाची दीक्षा देण्याचें काम तें करतें. अज्ञान आणि अचेतना हीं क्षेत्रें शक्य होण्याचें कारणहि अधिमानस आहे. अतिमानस हें अत्यंत देदीप्यमान प्रकाशाचें माहेरघर -- यानें प्रथम आपणांतून स्वतःपेक्षां कमी देदीप्यमान असा बेताचा प्रकाश असणारें अधिमानस पुढें केलें, तेव्हा नंतर त्यांतून ज्ञान, आणखी कमी व विखुरलेल्या प्रकाशाचें अज्ञान आणि नंतर सर्व प्रकाश गिळून टाकणारी छाया किंवा अचेतनता हीं क्षेत्रें शक्य झालीं. विज्ञान आपल्या सर्व वास्तव गोष्टी अधिमानसाच्या हवालीं करतें, पण त्या गोष्टींचें संचलन कसें करावयाचें, त्या संचलनापाठीमागें कोणती जाणीव ठेवावयाची तें त्याच्याकडून अधिमानसावर सोंपविलें जातें -- अधिमानस हें काम करतांना सत्याचें दर्शन न सोडतां, अज्ञानाला जन्म देण्यात अग्रेसर होतें. अतिमानस (विज्ञान) आणि अधिमानस या दोहोंना विभागणारी एक सीमारेषा आहे; या सीमारेषेचें तन्त्र असें आहे कीं, वरच्या (विज्ञानाच्या) शक्तीच्या नजरेस दिसणारें किंवा स्वाधीन असणारें सर्व कांहीं खालच्या (अधिमानसाच्या) शक्तीच्या हातीं येऊं शकतें; कांहींहि अडथळा न होतां अधिमानस तें सर्व आपल्या हातीं घेऊं शकतें; परंतु ही स्थानांतराची, सत्तान्तराची व्यवस्था होत असतां, एक महत्त्वाचा बदल अटळपणें घडवून आणला जातो : अतिमानस समग्रेतेनें काम करणारें असतें; वस्तुजाताचें मूळ सत्य, समग्र सत्य आणि त्यानेंच उदयास आणलेल्या वैयक्तिक आत्मनिर्णयांचें सत्य पूर्णपणें आणि स्पष्टपणें, एकत्र एकमेकांत गुंफून, नित्य तसें गुंफलेलें ठेवण्यांत तें हयगय करीत नाहीं; या दोन सत्यांच्या व्यवहारांत अतिमानस अभेद्य ऐक्य ठेवतें, दोन्हीं सत्यें एकमेकांत अगदीं पूर्णपणें मिसळून असतात; दोन्हीं सत्यें एकमेकांची पूर्ण जाणीव स्वयंस्फूर्तीनें ठेवीत असतात : याच्या उलट अधिमानसांत समग्रतेला, समग्र सत्याला, मूळ सत्याच्या अधिकाराला फांटा दिला जातो. हें मधल्या सीमारेषेचें तंत्र आहे : या रेषेच्या एका अंगाला

 

पान क्र. ५२०

 

समग्र सत्याचा नित्य व्यवहार व दुसऱ्या अंगाला अ-समग्र सत्यांचा स्वतंत्र व्यवहार. अधिमानसाला समग्र सत्य, मूळ सत्य पूर्णपणें सदैव परिचयाचें असतें; वैयक्तिक सत्यांचा तें उपयोग करतें, पण त्यांनीं तें स्वत: बांधलें जात नाहीं, मर्यादित होत नाहीं; वैयक्तिक स्वयंनिर्णय एकसत्याचीं अंगें आहेत ही गोष्ट अधिमानस जाणतें, त्याच्या आध्यात्मिक दृष्टीला ही एकता स्पष्ट दिसते -- पण तें कार्याचा जो पसारा घालतें, तो सुरक्षित चालण्यासाठीं जरी एकतेची आठवण तें ठेवीत असतें, तरी हा पसारा, हा आंदोलनाचा व्याप एकतेच्या आश्रयानें तें करीत नाहीं. जें एकच एक परम सत्य (सच्चिदानंद) सर्व कांहीं सामावून घेणारें, अविभाज्य आणि सामग्र्यानें राहणारें आहे, त्याच्या अनेक शक्ती आहेत, त्याचीं अनेक अंगें आहेत; हीं अनेक अंगें, या अनेक शक्ती वेगळ्या वेगळ्या करणें, त्या वेगळ्या केलेल्या शक्ती एकत्र जोडणें -- हें जोडण्यातोडण्याचें काम करण्याची अमर्याद शक्ति अधिमानसाचे ठिकाणीं असते. या शक्तीचा वापर करून अधिमानस आपला पसारा अस्तित्वांत आणतें : मूळ सत्याचें एक अंग किंवा शक्ति घेऊन, अधिमानस त्या अंगाला किंवा शक्तीला स्वतंत्र कार्य देतें; या कार्यांत अर्थातच या अंगाला किंवा शक्तीला स्वतःचें स्वतंत्र महत्त्व पूर्णतया प्राप्त होतें, आणि या स्वतंत्र महत्त्वाच्या व अधिकाराच्या बळावर, ही शक्ति किंवा हें अंग आपलें स्वतःचें जग निर्माण करूं शकतें. उदाहरणार्थ, पुरुष आणि प्रकृति (ज्ञानमय आत्मा आणि प्राकृतिक कार्यशक्ति) विज्ञानाच्या क्षेत्रांत, एका सत्याचीं दोन अंगें म्हणून सुसंवादित्वानें राहतात; पुरुष किंवा ज्ञानमय आत्मा हें सद्वस्तूचें अस्तित्वरूप अंग आहे; आणि प्रकृति किंवा प्राकृतिक कार्यशक्ति ही त्या सद्वस्तूचीं क्रियारूप बाजू आहे -- या दोन बाजूंत किंवा अंगांत समतोलाचा अभाव, एकानें अधिक सत्ता घेऊन, दुसऱ्यावर हुकमत चालवावी अशी गोष्ट विज्ञानाच्या क्षेत्रांत घडत नाहीं. अधिमानसाच्या क्षेत्रांत हीं दोन अंगें, एका सद्वस्तूचीं अंगें न राहतां, स्वतंत्र वस्तू होतात; सांख्यांचें तत्त्वज्ञान हें अशा अधिमानसी व्यवहाराचें दर्शन आहे. प्रकृति पुरुषावर मात करूं शकते, त्याचें स्वातंत्र्य, त्याचें सामर्थ्य आपल्या प्रभावानें, असून नसल्यासारखें करूं शकतें, दडपून दडवून टाकूं शकते; त्यानें केवळ बघणाराचें, साक्षीचें, द्रष्ट्याचें काम करावे, ती (प्रकृति) काय रूपें घेईल, काय करणी करील, त्या रूपांचें, त्या करणीचें त्यानें स्वागत करावें आणि स्वस्थ रहावें, अशी घटना प्रकृति घडविते. उलटपक्षीं पुरुष आपल्या

 

पान क्र. ५२१

 

साधनेनें आपलें स्वतंत्र अस्तित्व परत मिळवूं शकतो; प्रकृतीनें आपल्या ज्या मूळ भौतिक तत्त्वाच्या सामर्थ्यानें पुरुषावर मात करून, त्याचें सामर्थ्य झांकून दडपून टाकलेलें असतें, त्या भौतिक तत्त्वाचा परित्याग करून, पुरुष आपलें स्वतंत्र आत्मराज्य, सार्वभौम आत्मराज्य परत मिळवितो आणि या सार्वभौम आत्मराज्याचा उपभोग सर्वकाळ घेऊं शकतो. याप्रमाणें प्रकृति-पुरुष या जोडीचा विज्ञान क्षेत्रांतील आणि अधिमानस क्षेत्रांतील अन्योन्यसंबंध अगदीं निरनिराळा आहे. दिव्य सत्याच्या, मूळ सद्वस्तूच्या, अनेक दुसऱ्या अंगभूत शक्तींसंबंधानें हीच गोष्ट दिसून येते. एकत्व आणि अनेकत्व, दिव्य व्यक्तित्व आणि दिव्य व्यक्तित्वशून्यता (तत्त्वमयत्व वा भावमयत्व) अशा सद्वस्तूच्या अनेक अन्योन्यपूरक अंगांच्या जोड्या अधिमानस फोडून टाकतें आणि प्रत्येक अंगाला स्वतंत्र वस्तु म्हणून कार्य करण्यास वाव देतें; मग प्रत्येक अंग, आपलें स्वतंत्र वेगळें अस्तित्व कामास लावून, त्यांत अंतर्भूत असलेल्या शक्यता वास्तवांत आणतें, आणि वेगळेपणाचे क्रियात्मक सर्व परिणाम अधिमानसी संसारांत उभें करतें. एवढें मात्र खरें कीं, अधिमानस क्षेत्रांतील सद्वस्तूच्या स्वतंत्र बनविलेल्या अंगांचा वेगळा संसार मूळ एकतेच्या पायावर, अप्रकटपणें कां होईना पण निश्चितपणें उभारलेला असतो. अधिमानसाला सर्व वस्तूंच्या मूळ एकतेची स्मृति नित्य असते; आणि म्हणून एका मूळ सद्वस्तूच्या, विविध शक्ती आणि अंगें स्वतंत्रपणें कामास लावलीं गेलीं, तरी एक विशिष्ट नातें कोणाहि दोन अंगांमध्यें किंवा शक्तींमध्यें कायमचें उभें केलें जात नाहीं -- अनेक प्रकारें शक्तींना व अंगांना एकत्र आणलें जातें, स्वतंत्र केलें जातें; त्यांच्या शक्तीचा परस्पर विनिमय मोकळेपणानें घडेल अशी व्यवस्था असते, त्यांचे अन्योन्यसंबंध जेवढे संभवनीय असतील, तेवढे सर्व केव्हांहि वास्तवांत येण्याची व्यवस्था असते.

मूळ सद्वस्तूच्या, सत्याच्या, सच्चिदानंदाच्या शक्तींना आपण देवता मानावयाचें ठरविलें, तर असें म्हणतां येईल कीं, अधिमानस लाखों देवता कामाला लावतें; प्रत्येकीनें आपापलें विश्व बनवावें आणि अशा सर्व विश्वांचा एकमेकांशीं संबंध रहावा, दळणवळण रहावें अशी योजना करतें. वेदांमध्यें देवतांच्या स्वभावासंबंधानें, स्वरूपासंबंधानें वेगवेगळीं सूत्रें आहेत, वेगवेगळीं वर्णनें आहेत : अस्तित्व, मूळ वस्तु, मूळ देव एकच आहे, या एका सत्याला ऋषी अनेक नांवें देतात, म्हणून अनेक देव आहेत असा समज होतो -- असें वेदांत एका ठिकाणीं म्हटलें आहे. तथापि दुसऱ्या

 

पान क्र. ५२२

 

प्रकारचींहि वर्णनें आहेत : प्रत्येक देवता अथवा देव म्हणजे मूळ सत्य आहे अशा भावनेनें प्रत्येक देवाची पूजा केली जाते, सर्व देव मिळून हा देव आहे, सर्व देव या देवाच्या रूपांत अंतर्भूत आहेत, असें प्रत्येक देवासंबंधानें म्हटलें जातें; प्रत्येक देव स्वतंत्र आहे, तो आपल्या साथी-देवांबरोबर केव्हां मेळानें काम करतो, केव्हां स्वतंत्र काम करतो, केव्हां इतर देवांच्या विरूद्ध दिसेल असें काम करतो; असेंहि वर्णन सांपडतें. विज्ञानाच्या क्षेत्रांत एका सद्‌वस्तूच्या या सर्व शक्ती एकमेकींशीं सुसंवादी राहून आपला व्यवहार करतात, एका सद्‌वस्तूचीच विविधरूपाची लीला असें स्वरूप या शक्तींच्या व्यवहाराला असतें. वर जे देवांच्या व्यवहाराचें प्रकार सांगितले -- १) प्रत्येक देवानें स्वतंत्र व्यवहार करणें २) इतर देवांशीं सहकार्य करणें ३) इतर देवांना विरोध करणें -- यांपैकीं प्रत्येक व्यवहारप्रकाराला अधिमानसक्षेत्रांत पूर्ण वाव मिळतो -- त्या देवांची पायाभूत एकता जणुं विसरल्यासारखी होते आणि प्रत्येक व्यवहार-प्रकाराचे सर्व परिणाम पूर्ण आकाराला येतात. मात्र हें सर्व व्यवहार-प्रकार एकमेकांशीं मिळून जाऊं शकतात आणि अशा मेळानें एक प्रकारची मिश्र तालबद्धता देव-व्यवहारांत निर्माण होते. सच्चिदानंदाच्या अस्तित्व, जाणीवशक्ति (जाणीव आणि शक्ति) व आनंद अशा तीन अविभाज्य अंशांपैकीं विश्वाच्या मुळाशीं जें अस्तित्व आहे, त्या एका अस्तित्वाचे अधिमानसक्षेत्रांत नाना प्रकार (देव) कसे बनतात वगैरे वर्णन आतांपर्यंत केलें. आतां जाणीव आणि शक्ति यांच्या संबंधानें काय होतें तें पाहूं. एक जाणीव फोडून तिचे स्वतंत्र असे जाणिवेचे आणि ज्ञानाचे अनेक आकार-प्रकार केले जातात. प्रत्येक स्वतंत्र जाणीव व स्वतंत्र ज्ञान आपल्यांत अंतर्भूत असलेलें सत्य, आपल्या विशिष्ट मार्गानें आकारास आणतें. अनेकांगीं असलेली एक सत्य-कल्पना फोडून, प्रत्येक अंग वेगळें वेगळें केलें जातें, प्रत्येक अंग स्वतंत्र कल्पना-सामर्थ्य बनून, आपलें अंतर्भूत अंतर्हित स्वरूप वास्तवांत आणतें. एकच जाणीव-शक्ति अनंत जाणीव-शक्तींच्या रूपांनीं दिसूं लागते; या अनंत रूपांपैकीं प्रत्येक शक्तिरूपाला आपलें अंतर्गत सत्य वास्तवांत आणण्याचा अधिकार असतो -- केव्हां केव्हां इतर सर्वांच्या वरतीं अधिकाराची जागा घेऊन, त्या इतर सर्वांचा आपल्या कार्यासाठीं उपयोग करून घेण्याचाहि हक्क असतो व हा हक्क वास्तवांत बजावला जातो : जी गोष्ट एका अस्तित्वाची, एका जाणीवेची, तीच गोष्ट एका अविभाज्य आनंदाची. अस्तित्वाचा एकरूप आनंद फोडून

 

पान क्र. ५२३

 

नानाप्रकारचे आनंद अधिमानसांत आकारास येतात आणि त्यांपैकीं प्रत्येक आनंद स्वतंत्रपणें आपलें उच्चतम वा आत्यंतिक स्वरूप प्राप्त करून घेण्यास मोकळा असतो. या प्रमाणें अधिमानसाच्या समोर एकमेव सत्-चित्-आनंद आलें, कीं या एकाचे अनंत प्रकार होतात, तेथें अनंत संभव निर्माण होतात आणि प्रत्येक प्रकारांतून, प्रत्येक संभवांतून स्वतंत्र विश्व निर्माण होऊं शकतें -- अर्थात् अनंत विश्वें अधिमानस उभीं करूं शकतें, किंवा सर्व संभवांचें एकीकरण करून एक महान् विश्व उभें करूं शकतें -- या महान् एकीभूत विश्वांत संभवांचा हा विविध खेळ अनंत प्रकारें विश्वांतर्गत रचना करतो, तेथील व्यवहार-पद्धती, तेथील कार्यक्रम आणि तेथील अखेरचें दृश्य अनंत प्रकारें ठरवूं शकतो.

विश्वनिर्माणाचें कार्य शाश्वत सद्वस्तूच्या जाणीवशक्तीचें असल्यानें, विशिष्ट विश्वाचा स्वभावधर्म हा त्या विश्वांत जाणिवेनें आपला जो स्वयंरचित प्रकार व्यक्त केला असेल, आकारास आणला असेल त्या जाणीवप्रकारावर अवलंबून राहील. त्याचप्रमाणें प्रत्येक व्यक्तींत ही जाणीव ज्याप्रकारचें रूप धारण करून असेल, त्या आकारांत वा अवस्थेंत असेल त्या रूपावर, आकारावर वा अवस्थेवर त्या व्यक्तीचीम, ती रहात असलेल्या विश्वाकडे बघण्याची दृष्टि अवलंबून राहील. आमचें मानवी मन (मानसिक जाणीव) जेव्हां विश्वाकडे बघतें तेव्हां बुद्धि आणि संवेदना यांनीं पाडलेल्या विभागांचें विश्व बनलें आहे असें त्याला दिसतें; हे विभाग एकत्र करून, कांहीं रचना केलेली आमच्या मनाला दिसते; पण या रचनेंतहि विभागणीचें तत्त्व अंतर्भूत असतें; जें घर हें मन आपल्या दृष्टीनें उभें करतें त्यांत त्याच्या योग्यतेनुसार सत्याचा एकादा दुसरा, सामान्य स्वरूपाचा प्रकार राहूं शकतो; सत्याचे बाकीचे सर्व प्रकार घराच्या बाहेर ठेवले जातात किंवा त्यांतील कांहींना पाहुणे म्हणून किंवा घर-मालकावर अवलंबून असलेले घरांतील इतरेजन या नात्यानें घरांत जागा दिली जाते. याच्या उलट, अधिमानसिक जाणिवेला सर्व समावेशक, व्यापक शक्ति आहे; दिसायला मूलभूत असे अनेक भेद समन्वयी दृष्टीनें एकत्र वागविण्याची शक्ति अधिमानसिक जाणिवेला स्वभावत:च असते. आमची बुद्धि (मानसिक बुद्धि) व्यक्ति आणि तत्त्व यांत विरोध मानते, तत्त्वमय अस्तित्व हें मूळ अस्तित्व आहे आणि व्यक्ति वा व्यक्तित्व या, त्या तत्त्वावर आरोपिलेल्या, अल्पकाल टिकणाऱ्या, अज्ञानाच्या भ्रमात्मक रचना आहेत, असा सिद्धांत ही

 

पान क्र. ५२४

 

बुद्धि करते; किंवा याच्या उलट असाहि सिद्धांत ती मांडूं शकते कीं, व्यक्ति (पुरुष) हीच मूळ सद्वस्तु आहे आणि जें तत्त्व दिसतें, तें मनानें रचलेला भाव किंवा कल्पना आहे, तत्त्व हें पुरुषाचें व्यक्त होण्याचें साधन आहे. अधिमानसिक बुद्धि ही तत्त्व आणि व्यक्ति या दोन वस्तू एका अस्तित्वाच्या, सद्वस्तूच्या, वेगळेपणानें वावरण्यासारख्या दोन शक्ती आहेत असा सिद्धांत करते; तत्त्व आपल्या परीनें, व्यक्तित्व आपल्यापरीनें आपलें अंतरंग व्यक्त करून आपला आपला संसार स्वतंत्रपणें थाटूं, शकतें, त्याचप्रमाणें या दोन वस्तू आपल्या भिन्न कार्यपद्धती एकीकृत करूं शकतात, एकमेकीला जोडूं शकतात; त्यांचा संसार स्वतंत्र असो वा सामयिक असो, त्यांत जाणिवेच्या आणि अस्तित्वाच्या ज्या भिन्न भिन्न अवस्था अंतर्भूत होतात, त्या सर्व अवस्था सत्य, सत्यमय व न्यायसंगत असूं शकतात आणि त्या सर्व एकाच वेळीं अस्तित्वांत राहूं शकतात, सहजीवन जगूं शकतात. केवळ तात्त्विक व्यक्तिशून्य अस्तित्व आणि जाणीव ही कांहीं केवळ कल्पना नाहीं -- वास्तव गोष्ट आहे आणि असूं शकते; पण त्याबरोबरच पूर्णतया व्यक्तिगत जाणीव आणि अस्तित्व हीहि गोष्ट वास्तव आहे आणि असूं शकते; व्यक्तिशून्य तत्त्वरूप ईश्वर (निर्गुण ब्रह्म) आणि व्यक्तिरूप ईश्वर (सगुण ब्रह्म) हीं, एका नित्य सद्वस्तूचीं दोन समान, सह-अस्तित्वच असलेलीं अंगें आहेत. ब्रह्म एकाच वेळीं सगुण आणि निर्गुण असून त्याचें निर्गुणत्व व सगुणत्व सारख्याच दर्जाचें आहे. तात्त्विक निर्गुण ब्रह्म आविष्कृत होतांना, सगुण ब्रह्म, त्याच्या आविष्काराचा एक प्रकार म्हणून निर्गुणाच्या खालच्या पायरीचें होऊ शकतें; तसेंच व्यक्तिरूप ब्रह्म हें मूळ सत्य आणि निर्गुणत्व म्हणजे त्याच्या स्वभावाचा एक आविष्कार अशीहि व्यवस्था असूं शकते; जाणीवयुक्त मूळ अस्तित्व, सद्‌वस्तु ज्या अनंत प्रकारांचीं व्यक्त होतें, जें अनंत प्रकारचें विविध अस्तित्व मूळ अस्तित्वांतून व्यक्त झालें आहे, त्या व्यक्त पसाऱ्यांत वर सांगितलेलें दोनहि आविष्कार-प्रकार आहेत आणि ते एकमेकांच्या समोर वावरत आहेत. मानसिक बुद्धीला जे भेद समन्वय करण्यास अशक्य वाटतात, तेच अधिमानसिक बुद्धीला सह-अस्तित्वाला पात्र व समर्थ असे अन्योन्यसंबंधीं अन्योन्य-उपकारक व्यवहार व व्यवहारविषय वाटतात; मानसिक बुद्धीला ज्या गोष्टी अन्योन्यविरोधी दिसतात, त्या अधिमानसिक बुद्धीला अन्योन्यपूरक दिसतात. आमचें मन विश्वाकडे पाहून, काय निर्णय घेत असतें, तें आपल्याला ठाऊक

 

पान क्र. ५२५

 

आहे : सर्व वस्तुजाताला जडद्रव्य किंवा जडशक्ति जन्म देते, त्यांना अस्तित्वांत टिकविते, शेवटीं वस्तुजाताचा लय जडद्रव्य किंवा शक्ति यांतच होतो -- म्हणून जडतत्त्व (अन्न) हें शाश्वत तत्त्व आहे, मूळ सत्य आणि अंतिम सत्य किंवा ब्रह्म हें जडतत्त्वच (अन्न) आहे, हा एक निर्णय आमचें मन घेतें -- तसेंच त्याचे दुसरे निर्णय हे, प्राण, मन, विज्ञान, आनंद (आनंदरूप चैतन्य) या वस्तू अलग अलग स्वतंत्रपणें सर्व वस्तुजाताला जन्म देणाऱ्या, अस्तित्वांत टिकविणाऱ्या आणि शेवटीं पोटांत घेऊन नष्ट करणाऱ्या आहेत, असे मानणारे आहेत -- या प्रत्येकाला स्वतंत्रपणें ब्रह्म ही संज्ञा मनानें दिलेली आहे. मनाची दृष्टि सामग्र्यानें बघणारी नसून, विभागणारी व विभागनिष्ठ अशी असते; म्हणून अन्न, प्राण, मन, विज्ञान व आनंद यांपैकीं जेव्हां एकाला मन ब्रह्म ठरवितें, तेव्हां तें इतर तत्त्वांना ब्रह्मबाह्य ठरवितें. अधिमानस सामग्र्यानें बघू शकतें; सामग्र्य बुद्धीसमोर ठेवून तें प्रत्येक अंगाला, स्वतंत्रपणें आपलें विश्व उभारण्याची प्रेरणा देतें -- म्हणून अन्न, प्राण, मन, विज्ञान व आनंद यांपैकीं प्रत्येकाचें स्वतंत्र जग आहे, या स्वतंत्र जगांत तें तें तत्त्व प्रधानत्वानें व्यवहार करणारें असतें; पण हीं सर्व तत्त्वें मिळून एक विश्व निर्माण करतात; हीं सर्व तत्त्वें, या एका विश्वाचे, सहकारी समान घटक बनतात, हीहि गोष्ट खरी आहे, असा अधिमानसाचा सिद्धान्त आहे. सर्व विश्वांची जननी जी मूळ सद्वस्तूची जाणीव-शक्ति, त्या शक्तीचें जें स्व-रूप आमचें जग निर्माण करण्यांत अधिमानसानें उपयोगांत  आणलें आहे, त्यांत आमच्या विश्वाचा पाया दर्शनी अचेतनता हा आहे; या अचेतनांत सर्वोच्च जाणीवयुक्त सद्‌रूप लपलेलें आहे; अस्तित्वाच्या सर्व शक्ती लपलेल्या आहेत; जडतत्त्वाचें  विश्व (अचेतनाचें विश्व) पायाभूत असून, तें आपल्या ठिकाणीं प्राण, मन, अधिमानस, अतिमानस (विज्ञान) आणि सच्चिदानन्द (मूळ आत्मतत्त्व) क्रमानें व्यक्त करतें; कोणतेंहि तत्त्व व्यक्त झालें कीं तें इतर सर्व तत्त्वांना आपल्या आविष्काराचीं साधनें म्हणून जवळ करतें, उपयोगांत आणतें; जडतत्त्व हें आत्मदृष्टीला, आत्माविष्काराचें एक स्वरूप असते; आत्मतत्त्वाचें एक व्यक्त रूप म्हणजे जडतत्त्व अशीच नेहमींची आत्मदृष्टि आहे -- अधिमानसाला हा सृष्टिपर्याय स्वाभाविक आणि रचनेला सुकर असाच वाटतो. त्याला योजनाशक्ति व योजना कार्यरूपानें परिणत करण्याची कार्यकारी शक्ति भरपूर आहे. मूळ सद्वस्तूच्या अनेक सामर्थ्यांची विविध संघटना, अधिमानस आपल्या योजना-

 

पान क्र. ५२६

 

शक्तीचा व कार्यकारी शक्तीचा उपयोग करून वास्तवांत आणतें; अधिमानसिक प्रेरणेनें प्रत्येक सद्‌वस्तुसामर्थ्य आपलें सत्य स्वतंत्रपणें व्यक्त करतें व शिवाय त्यांचे अनेक प्रकारचे संयोग त्याच प्रेरणेनें एकाच वेळीं संघटित होतात; अधिमानस हा जणुं जादूगार कारागीर आहे, मूळ एका सत्याची गुंतागुंतीची विश्वमाला बनविणें हें त्याचें कार्य आहे; या रचनेंत विविध रंगांचा ताणाबाणा घेऊन, हा कारागीर आपलें बहुरंगी विश्ववस्त्र विणून चैतन्याला सादर करतो.

अधिमानसाची निर्मिति सत्याची,ज्ञानाची, सत्यमय व ज्ञानमय असते; सत्यापासून, ज्ञानापासून च्युतीची, पतनाची प्रक्रिया गोंधळ, विरोध इत्यादि गोष्टी अधिमानसनिर्मित विश्वांत आलेल्या नसतात; सद्‌वस्तूच्या अनेक शक्तींचा, शक्यतांचा समकालिक विकास, प्रत्येक शक्तीचा स्वतंत्र विकास किंवा अनेकींचा सामुदायिक विकास अधिमानसिक कारागिरीनें चाललेला असतो; सत्यांची निर्मिति अधिमानस करतें; भ्रमांची, असत्यांची निर्मिति करीत नाहीं; कोणत्याहि अधिमानसिक आंदोलनांत, शक्तिव्यापारांत सत्यच वास्तवांत आणलेलें असतें, विकसित केलेलें असतें; सद्‌वस्तूचें जें अंग, सामर्थ्य, कल्पना, शक्ति, आनंद -- सद्‌वस्तूचें अंगभूत असें जें कांहीं स्वतंत्र क्रियेसाठीं मोकळें केलें असेल त्याचें, त्या सद्‌वस्तुसंबंधित वस्तूचें सत्य फलित करणें, त्या वस्तूच्या सत्याचे स्वतंत्र व्यवहारांत जे परिणाम घडतील ते सत्यदृष्टीनें संघटित करणें, हें काम अधिमानस करतें. अधिमानसिक व्यवहारांत सत्य वस्तूचा कोणताहि अंश घेऊन, हा अंश म्हणजे सर्व सत्य किंवा प्रधान सत्य आणि बाकीचे अंश म्हणजे 'कनिष्ठ सत्यें,' असा विचार मुळींच नसतो; प्रत्येक देव (शक्ति) सर्व देवांना ओळखतो, अस्तित्वांतील त्यांचें स्थान ओळखतो; प्रत्येक कल्पना दुसऱ्या सर्व कल्पनांना, आपल्या इतकाच अस्तित्वाचा हक्क देते आणि त्यांचें स्वागत करते; प्रत्येक सामर्थ्य इतर सर्व सामर्थ्यांना त्यांचें त्यांचें योग्य स्थान देणें मान्य करतें, त्यांचें सत्य आणि त्यांचें परिणाम यांचें स्थान मान्य करतें -- वेगळें यशस्वी अस्तित्व, वेगळेपणें घेतलेला अनुभव हा आनंद देणारा असतो, पण असा कोणताहि विशिष्ट, वेगळ्या अस्तित्वाचा किंवा अनुभवाचा आनंद हा इतर वेगळ्या अस्तित्वांत, अनुभवांत आनंद नाहीं असें म्हणत नाहीं -- किंवा तो आनंद स्वतःहून कमी दर्जाचा व त्याज्य असाहि दावा करीत नाहीं. अधिमानस हें विश्वदृष्टीचें सत्य आहे, विश्वगत सत्याचें तत्त्व आहे; असीम, अतिव्यापक सर्वसमावेशकता हा या तत्त्वाचा आत्मा

 

पान क्र. ५२७

 

आहे; त्याची कार्यशक्ति सर्वगत आणि व्यक्तिगत दोन्ही प्रकारची आहे; अतिमानसाचें कनिष्ठ रूप, किंवा दुसऱ्या दर्जाचें अतिमानस असें नांव अधिमानसाला शोभेल; अतिमानस आणि अधिमानस यांच्या स्वरूपांत आणि व्यवहारांत अर्थांतच कांहीं भेद आहे. अतिमानसाचा संबंध मूळ अंतिम वस्तूशीं, सत्-चित्-आनंद या वस्तूंशीं असतो -- अधिमानसाचा संबंध या वस्तूंच्या गतिशील शक्तींशीं, व्यावहारिक अंगांशीं असतो; मूळ सत्याचा विचार अतिमानस करतें; अधिमानस, त्या सत्याचीं जी व्यावहारिक रूपें, क्रियाशील सामर्थ्यें, त्यांचा विचार करतें; अंतिम सत्याशीं अतिमानसाचा कायमचा अटळ संबंध असतो, तर त्या सत्यांची जी निर्माणशक्ति -- व्यावहारिक मूल्यें, रचनात्मक मूल्यें निर्माण करण्याची जी शक्ति, त्या शक्तीशीं अधिमानस निगडित असतें. अतिमानस सर्वसमावेशक आहे, तसेंच अधिमानसहि सर्वसमावेशक आहे; पण या दोन, समान दिसणाऱ्या गुणांत एक मोठा भेद आहे; अतिमानसाची सर्वसमावेशकता सामग्र्याधिष्ठित आहे, एकताप्रधान आहे; अधिमानसाची सर्वसमावेशकता अनेकताप्रधान आहे, संयोगाधिष्ठित आहे; स्वतंत्र अलग अलग असणाऱ्या सत्यांचा, अधिमानस मेळ करून व त्यांना एकत्र आणून त्यांचा एक महान् संघांत समावेश करतें -- अतिमानस मुळांतच सर्वांना व्यापून असतें; अगोदर एकता व नंतर त्यांतून अनेकांचा आविष्कार अशी अतिमानसाची पद्धति असते -- अनेकता करण्याचें कार्यच मुळीं अधिमानसाकडे सोंपविलेलें असतें; अधिमानसाला एकतेचें भान असतें, वस्तुजाताचा पाया एकता हें त्याला कळतें, व्यक्त विश्वांत एकता व्यापून आहे हेंहि अधिमानस ओळखतें -- पण अधिमानसाचें मुख्य काम एकाचे अनेक करण्याचें असल्यानें, अतिमानस ज्या निष्ठेनें एकतेला वस्तुजाताचें अगदीं आंतरिक व सार्वकालिक, सार्वभौम, सर्वांना नित्य पोटांत वागविणारें, सर्वांची क्रियाशक्ति आणि स्वभावधर्म सुसंवादी होईल व राहील अशी रचना करण्याचें काम प्रकटपणें नेहमीं करणारें असें गूढ तत्त्व, म्हणून मान्यता देतें, तसें कांहीं अधिमानस करीत नाहीं.

अधिमानसाची अतिमानसाशीं तुलना करून, अतिमानसाची समावेशकता व्यापक पण संयोगावलंबी आहे असें आपण पाहिलें. आतां ही समावेशकता आणि आमच्या मनाची भेदप्रधानता, अगदींच दुबळी संयोगशीलता यांचें तुलनात्मक दृष्टीनें अवलोकन करूं. आमच्या भौतिक विश्वांत जे व्यवहार चालतात, त्यांजकडे आमचें मन कसें पाहतें आणि

 

पान क्र. ५२८

 

अधिमानस कसें पाहतें तें पाहिल्यास अधिमानस आणि आमचें मन, यांजमधील अंतर आम्हांला नीट कळेल. आमच्या जगांत अनेक धर्म आहेत, अनेक तत्त्वज्ञानें, अनेक राजकीय सिद्धान्त व त्या सिद्धान्तानुसार अनेक राजकीय व्यवहार चालूं आहेत; अधिमानसाला सर्व धर्म, एका शाश्वत धर्ममार्गाचा आपापल्यापरी विकास करणारे म्हणून, खरे वाटतात; सर्व तत्त्वज्ञानें सत्यवादी आहेत -- प्रत्येक तत्त्वज्ञान त्याच्या क्षेत्रांत, त्याच्या दृष्टीनें विश्वविषयक सत्यनिरूपण करणारें आहे, असा अधिमानसाचा सिद्धान्त असतो; प्रत्येक राजकीय सिद्धान्त आणि त्याचा व्यवहार हा कल्पनाशक्तीचा रास्त व्यवहार आहे, निसर्गाच्या ज्या शक्ती विश्वांत काम करीत आहेत, त्यांच्या समवेत, मानवी मनाच्या हरतऱ्हेच्या कल्पनाशक्तीला काम करण्याचा पूर्ण अधिकार आहे, मानवी व्यवहारावर जसा निसर्गशक्तीचा परिणाम घडतो, तसा तो मानवी कल्पनाशक्तीचाहि घडतो -- आणि ती शक्ति निसर्गशक्तींतूनच निघालेली आहे; तेव्हां निसर्गशक्तीच्या व्यवहारांतील अधिकाराइतकाच, मानवी कल्पनाशक्तीचा व्यवहारांतील अधिकार न्याय्य मानला पाहिजे -- असें अधिमानसाचें तर्कशास्त्र आहे. आमच्या भेदनिष्ठ मानसिक जाणिवेला या गोष्टी अशा दिसत नाहींत -- या जाणिवेला क्वचित् सर्वसमावेशकतेचा स्पर्श होतो, पण ही गोष्ट विरळाच घडते -- या जाणिवेला धर्म धर्म हे केवळ वेगळे नव्हे, तर अन्योन्यविरोधी दिसतात. तीच गोष्ट तत्त्वज्ञानें, राजकीय सिद्धान्त आणि व्यवहार यासंबंधीं. कोणताहि धर्म, तत्त्वज्ञान वा राजकीय व्यवहाराचा सिद्धान्त घ्या : मी सत्य व दुसरे असत्य असेंच प्रत्येकजण मानीत असतो, म्हणत असतो व त्यानुसार वागत असतो; दुसऱ्यांचा पाडाव किंवा नाश करण्यासाठीं, प्रत्येक धडपडत असतो; स्वत: सत्य म्हणून जगावें व दुसरे नाहींसे व्हावेत, निदान दुसरे आपल्याहून कमी दर्जाचे, कमी प्रमाणांत सत्य-आविष्कार करणारें, इतकें तरी सिद्ध व्हावें, यासाठीं धडपडत असतो. अधिमानसिक बुद्धीला ही बहिष्काराची प्रवृत्ति बिलकुल मंजूर नसते; एकंदर विश्वव्यवहाराला सर्वच धर्म, सर्वच तत्त्वज्ञानें, सर्वच राजकीय सिद्धान्त आणि व्यवहार आवश्यक असल्यानें, सर्वांनींच जगावें, प्रत्येकानें आपापलें स्थान सांभाळावें, प्रत्येकाला त्याचा विशिष्ट प्रयत्न करण्याला, त्याचें ध्येय वास्तवांत आणण्याला क्षेत्र नेमून दिलें जावें व तेथें त्याला मोकळेपणानें खटपट करतां यावी, असें अधिमानसिक बुद्धि सांगते. आमचें मन आणि अधिमानस यांत इतकें अंतर

 

पान क्र. ५२९

 

पडण्याचें कारण, अधिमानस हें ज्ञानक्षेत्रांत अतिमानसाच्या (पूर्ण सत्यज्ञानाच्या) अगदीं शेजारचें आहे आणि आमचें मन पूर्णतया अज्ञानात, त्याच्या विभक्ततेच्या 'तत्त्वज्ञानांत' गवसलेलें आहे. सत्य हें अनंत आहे, विश्वव्यापक आहे, त्याचे आविष्कार अनेक प्रकारचे होऊं शकतात, अनेक रूपांनीं तें व्यवहारांत येऊं शकतें -- ही मूळ दृष्टि पार नाहींशी होऊन मनाला, मानसिक जाणिवेला सत्य म्हणजे एक कांटेकोर विधान असें वाटतें -- इतर सर्व विधानांना असत्य मानणारें, केवळ तीं विधानें वेगळीं आहेत म्हणूनच तीं असत्य असा आग्रह धरणारें, त्या सत्यांचा व्यवहार स्वतःहून वेगळ्या मर्यादांनीं बांधला आहे, वेगळ्या आधारावर सुरळीत चालला आहे म्हणून तीं खोटी असा पक्ष घेणारें जें कांटेकोर विधान, तें सत्य असें आमच्या मानसिक जाणिवेला वाटतें. आमच्या मनाला आपली जाणीव, तसें पाहिलें तर, पुष्कळच व्यापक करतां येते; समावेशकता, सर्वसंग्राहकता पुष्कळशी मिळवितां येते; परंतु या जाणिवेनुसार कृति करणें, जीवन संघटित करणें ही गोष्ट मात्र त्याच्या शक्तीबाहेरची दिसते. विकासक्रमांत जडांतून व जीवांतून वर आलेलें मन, मग तें व्यक्तीचें असो किंवा व्यक्तिसमुदायाचें असो, अनेक भिन्न भिन्न दृष्टिकोन व कार्यप्रणाली उभ्या करतें आणि या दृष्टिकोनांनीं, या कार्यप्रणालींनीं मिळूनमिसळून काम करावें, सहकार्य करावें किंवा अन्योन्यविरोधी व्हावें किंवा कांहीं सहकार्य, तर कांहीं विरोध असें वागावें, अशी व्यवस्था करतें; त्याच्या विश्वांत कोठें कोठें सुसंवादमय संसार तें उभें करूं शकतें -- पण एकंदर सर्व घटनांची सुसंवादी व्यवस्था करण्याची सामुदायिक वा व्यक्तिगत शासनपात्रता मनाचे ठिकाणीं नाहीं. उलट, विश्वमन, विकासशील अज्ञानाच्या क्षेत्रांत देखील सर्व घटनांची सुसंवादी घटना करण्यांत निपुण असलेंच पाहिजे; अज्ञानाच्या क्षेत्रांतील सुसंवाद हा अर्थातच कांहीं मेळ, कांहीं तेढ यांची कुशलतेनें एकत्र गुंफण करण्यानेंच उत्पन्न करतां येतो; या मेळ-तेढीची सुसंवादी व्यवस्था वरच्या पातळीवर विश्वमन करीत असतां, त्या पातळीच्या खालीं त्याला आधार व सामर्थ्य देणारें पायाभूत एकतेचें कार्यकारी तंत्र काम करीत असतें; परंतु पूर्णतया एकतातत्त्व विश्वमनांत फार खोल असतें. हें तत्त्व अतिमानस-अधिमानसांची संयुक्त पातळी आपल्या ठिकाणीं खोल, विश्वमनाला आधार म्हणून वागवितें; पण विकासक्रमांत जें व्यक्तिगत मन उदयास येतें, त्याला ही एकतेची दृष्टि विश्वमन देऊं शकत नाहीं; निदान

 

पान क्र. ५३०

 

अद्यापि, खोल तळांतून ही एकता विश्वमनानें पृष्ठभागावर आणून, व्यक्तिगत मनाच्या हवालीं केलेली नाहीं. अधिमानसाचें विश्व हें सुसंवादमय असावयाचेंच; आणि जेथें आम्ही आहों, तें अज्ञानाचें विश्व विसंवाद आणि विरोध यांनीं भरलेलें आहे आणि असेंच तें असावयाचें.

पण हें अज्ञान आलें कोठून ? अधिमानसांतून. मूळ विश्वमाया, अज्ञानाची नव्हे, ज्ञानाची विश्वमाया हें अधिमानसाचें स्वरूप आहे आणि या ज्ञानाच्या मायेनेंच अज्ञान हें केवळ शक्य नव्हे, तर अटळ, अनिवार्य केलेलें आहे. एका सत्याच्या अंगभूत असलेल्या प्रत्येक तत्त्वाला अधिमानस हें स्वतंत्रपणें कार्य करण्यास प्रवृत्त करतें, आणि याप्रमाणें कोणतेंहि तत्त्व स्वतंत्रपणें कार्य करूं लागलें, म्हणजे त्या कार्याचे सर्व परिणाम त्याला पूर्णपणें वास्तवांत आणणें भागच आहे. विभागणीचें तत्त्वहि या नियमानुसार वागतें, त्याला असें वागूं देणें प्राप्तच होतें; विभागणीच्या तत्त्वाचा पूर्ण प्रवास व या प्रवासाची अखेर अधिमानसाच्या सामान्य नियमानुसारच होते : मूळ जाणिवेने हें विभागणीचें तत्त्व अनुसरावयाचें ठरविलें कीं या ठरावानुसार ती खालीं उतरत उतरत, तिचे अनंत तुकडे होऊन, त्या अत्यंत सूक्ष्मातिसूक्ष्म कणांच्या -- त्या जाणिवेला अंधारांत टाकणाऱ्या कणांच्या -- आश्रयानें ती शेवटीं जड निश्चेतनांत गुप्त होते. विभागणीच्या तत्त्वाच्या प्रवासाची अखेर या निश्चेतनांत मूळ अनंत जाणीव प्रविष्ट झाल्यानेंच होते. या निश्चेतन पसाऱ्याला ऋग्वेदांत अचेतनाचा सागर म्हटलें आहे; एक (सच्चिदानंद) या अचेतनांतून आपल्या महान् पराक्रमानें वर येतें, त्यांतून जणुं जन्म घेतें; हें एकतत्त्व प्रथम अलग अलग भागनिष्ठ, भागभूत अस्तित्व आणि जाणीव यांत लपलेलें असतें; आमचें अस्तित्व आणि जाणीव अशी भागभूत आहे; आम्हांला एखादा व्यापक गण तयार करावयाचा, तर तुकडे तुकडे एकत्र करून तो उभारावा लागतो. झगडा सर्व वस्तूंच्या मुळाशीं आहे, असें जें सूत्र हेराक्लायटस् या ग्रीक तत्त्ववेत्यानें आपल्या तत्त्वज्ञानांत घातलें, त्याचा अनुभव आम्हांला कोणताहि गण हळूहळू मोठ्या अडचणींना तोंड देऊन उभा करतांना येत असतो : प्रत्येक कल्पना, शक्ति, विभक्त जाणीव, विभक्त जीव त्याला स्वाभाविक असलेल्या अज्ञानामुळें दुसऱ्याशीं झगड्याला प्रवृत्त होतो; आपलें तें खरें या भावनेनें स्वतंत्रपणें जगण्याचा, वाढण्याचा, कृतार्थ होण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करीत असतो; आपल्याखेरीज इतर जें कांहीं अस्तित्वांत आहे, त्याच्याशीं मेळ राखून जगण्याचा

 

पान क्र. ५३१

 

कोणीहि यत्न करीत नाहीं. आमचा आरंभींचा प्रवास असा नित्य झगड्याचा असला, तरी विश्वाच्या पोटीं लपलेलें एकतत्त्व, आम्हांला न कळत, हळूहळू कसल्यातरी प्रकारच्या सुसंवादी जीवनाकडे आमची इच्छा नसतांहि आम्हाला नेत असतें; तें आम्हाला अन्योन्याश्रयी व्हावयास लावतें; तें आम्हाला आमच्या तेढी दूर करावयास, तेढींच्या जागीं मेळ करावयास लावतें; कष्टानें कां होईना, आम्हाला तात्पुरतें ऐक्य करावयास लावतें. आमच्या या गुप्त एकतत्त्वाच्या प्रेरणेनें होणाऱ्या सुसंवाद-यत्नांना थोडेंसें फळ जरूर येतें; पण एकंदरीनें आमचे हे प्रयत्न निर्दोष नसतात, सदोष आणि अपूर्ण असतात; आम्ही ज्या सुसंवादी म्हणून रचना करतों, त्यांतहि अपूर्णता आणि सदोषता असते; आम्ही एक रचना करतों -- ती उणी पडते म्हणून दुसरी करतों. अशा, आदर्शाच्या जवळ जाणाऱ्या परंतु आदर्श कधींहि न गांठणाऱ्या, नेहमीं बदलाव्या लागणाऱ्या रचना आम्ही करीत असतों, करूं शकतों; टिकाऊ आदर्श रचना आम्ही करूं शकत नाहीं. ही आमची स्थिति तेव्हांच पालटेल, जेव्हां क्रमविकासानें आमच्यांत, विश्वसत्याच्या शक्ती, आज आमच्या जाणिवेच्या पलीकडे असलेल्या श्रेष्ठ अतिचेतन शक्ती, आणि त्या शक्ती ज्या परमसत्यांत एकीभूत होतात, तें परमसत्य विकसित होईल : त्या अतिचेतन शक्ती आणि तें परम चैतन्य आमच्यांत विकसित झालें, म्हणजे आमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक नसेंत सुसंवाद आणि एकता क्रियाशील स्वरूपांत भरून राहील आणि आमच्या अस्तित्वाचें जें वास्तवांत आविष्करण होईल, त्याच्या प्रत्येक अंगांत एकता आणि सुसंवाद नांदेल. जर आमचें आजचें अज्ञानग्रस्त जीवन संपून, ज्ञानमय व विश्वमय जीवनांत आमचा प्रवेश, आमचा जन्म व्हावयाचा असेल, तर आध्यात्मिक मनाचे उच्चतर प्रांत आमच्या अस्तित्वाला, आमच्या जाणिवेला खुले व्हावयास हवेत; इतकेंच नव्हे, तर या आध्यात्मिक मनाच्या पलीकडे असलेलें परम सत्यहि आमच्यांत प्रकट व्हावयास हवें -- अशा जन्माचा, अशा दिव्य-जन्माचा संभव आम्हाला, मानवाला आहे आणि तो शक्यतेच्या स्थितींतून अनुभवाच्या स्थितींत यावयाचा आहे, येवढें मात्र खरे.

अधिमानस आणि अतिमानस यांचे प्रांत निराळे करणारी जशी सीमारेषा आहे, त्याप्रमाणें अधिमानस आणि विश्वव्यापक अज्ञान याचे प्रांत वेगळे करणारी सीमारेषा आहे. विश्वव्यापक सत्य हें अधिमानसाचें स्वरूप आहे. अधिमानसानें प्रवृत्त केलेली, मूळ सत्याच्या अंगा-

 

पान क्र. ५३२

 

अंगाची स्वतंत्र क्रिया व हालचाल आपल्या सहकारानें, मूळ जाणीवशक्ति जेथें जोरदार करते आणि या अंगांच्या एकतेची जाणीव दुबळी करून, दडवून, दडपून टाकते तेथें अधिमानस किंवा विश्वव्यापक सत्य आणि विश्वव्यापक अज्ञान यांचे प्रांत अलग करणारी सीमारेषा असते; कारण, जाणीवशक्तीच्या वरील व्यापारानें, मन त्याच्या अधिमानसी उगमापासून फोडलें जातें; स्वतंत्र भिन्न विभागांवर व त्यांच्या स्वतंत्र भिन्न हालचालींवर लक्ष केंद्रित करणें आणि एकतेची वस्तुस्थिति विसरून जाणें हें, अज्ञानक्षेत्रांतील मनाचें स्वरूप आहे. अधिमानस आणि अतिमानस यांच्यामधील सीमेचा पडदा व अधिमानस आणि (अज्ञानक्षेत्रांतील) मानस यांच्यामधील सीमेचा पडदा यांत अंतर आहे. पहिला पडदा पारदर्शक आहे -- त्यांतून अतिमानसिक गोष्टींचें अधिमानसांत जाणीवयुक्त स्थानांतर होऊं शकतें; अतिमानसाशीं अधिमानसाचा प्रकाशमय संबंध राहूं शकतो; दुसरा पडदा पारदर्शक नाहीं; त्यामुळें अधिमानसिक गोष्टी मनांत स्पष्टपणें येऊं शकत नाहींत -- मनाशीं त्यांचें जें नातें घडतें, तें अप्रकट व अस्पष्ट असेंच घडतें. मन अधिमानसापासून विभक्त झालें म्हणजे तें अगदीं स्वतंत्र तत्त्व असल्याप्रमाणें वागतें. प्रत्येक मनोमय पुरुष, प्रत्येक मूलभूत मानसिक कल्पना, शक्ति, स्वतंत्र असल्याप्रमाणें व्यवहार करतात; इतर पुरुषांशीं, कल्पनांशीं, शक्तींशीं त्यांनीं संबंध ठेवलाच, त्यांच्याशीं ऐक्य केलेंच तर हा संबंध ठेवतांना, हें ऐक्य करतांना अधिमानसिक व्यापक ममत्वानें, मुळांत एकता आहे या भावनेनें, तो संबंध केला जात नाहीं, तें ऐक्य केलें जात नाहीं, तर आम्ही सगळे स्वतंत्र आहोंत आणि कांहीं हेतूनें एक स्वतंत्र संघ संघटित करीत आहोंत, या भावनेनें सगळें घडतें. विभक्ततेच्या स्पष्ट भावनेनें वागण्याची ही जी प्रवृत्ति, हीच विश्वव्यापक सत्य आणि विश्वव्यापक अज्ञान यांना अलग करणारी प्रवृत्ति आहे. या पातळीवरचें विश्वमन स्वतःचें ऐक्य ओळखतें, पण आपला उगम चैतन्यांत, सच्चिदानंदांत आहे, सच्चिदानंद आपला पाया आणि मूलाधार आहे या गोष्टीची त्याला जाणीव रहात नाहीं. या गोष्टीची जाणीव त्याला झालीच, तर ती जाणीव बुद्धीच्या व्यापारानें होते, सतत टिकणारा असा तो अनुभव नसतो. हें मन जो व्यवहार करतें, तो आपला स्वतंत्र व्यवहार म्हणून काम करतें; त्याला त्याच्या व्यवहारासाठीं जो माल मिळतो, तो अर्थात् विश्वव्यापक सत्यानें युक्त अशा अधिमानसाकडून मिळतो; पण या अधिमानसाचा व त्याचा प्रत्यक्ष कांहीं

 

पान क्र. ५३३

 

संबंध नसतो, त्याची ओळखहि या विश्वमनाला नसते. या विश्वमनाचे घटक म्हणजे व्यक्तिगत मनें; हीं मनेंहि एकमेकांना न ओळखतां, एकमेकांविषयीं अज्ञानांत राहून, तसेंच विश्वमनाविषयींहि अज्ञानांत राहून आपआपलीं कामें स्वतंत्रपणें करीत राहतात -- या व्यक्तिगत मनांना एकमेकांचें किंवा विश्वमनाचें जें काय थोडे ज्ञान होतें, तें फक्त बाह्य संपर्कानें वा व्यवहारानेंच. आम्ही सर्व मनें एक आहोंत, एका विश्वमनाचे घटक आहोंत, हें मूलभूत ज्ञान त्यांना नसतें व म्हणून या ज्ञानामुळेंच शक्य असलेलें अन्योन्यांचें अंतरंगज्ञान आणि अन्योन्यांशीं एकरूपतेनें वागणें त्यांजकडून घडत नाहीं. मानसिक शक्ति अज्ञानक्षेत्रांत अज्ञान आणि अज्ञानकृत भेद यांच्या पायावरच आपला सर्व व्यवहार करीत असते; हा सर्व व्यवहार एक प्रकारें जाणीवयुक्त असतो, ज्ञानानें केला जातो हें खरें; तथापि हें ज्ञान, ही जाणीव एकांगी असते; खरें समग्र आत्मज्ञान, खरें समग्र विश्वज्ञान याठिकाणीं असत नाहीं. ही ज्ञानाची एकांगिता प्राणाच्या व्यवहारांत, सूक्ष्म जडद्रव्याच्या क्रियांत अनुस्यूत असते आणि सच्चिदानंद निश्चेतनांत अंतर्हित झाल्यावर त्या निश्चेतनांतून जी भौतिक दुनिया, स्थूल विश्व प्रकट होतें, त्या विश्वांत मानसिक शक्तीचा, प्राणशक्तीचा आणि जडाचा अज्ञान-अधिष्ठित एकांगी ज्ञानाचा व्यवहार पुन्हां आपलें दर्शन घडवितो.

अधिमानसाशीं संबंध तुटलेलें हें जें मन, तें आमच्यांतील प्रच्छन्न अंतर्मनाप्रमाणें, आमच्या प्रकट मानवी मनाहून पुष्कळ अधिक शक्तिमान् असतें. आमच्या प्रकट मनाला इतर मनांशीं दळणवळण ठेवतां येत नाहीं, अन्योन्यांचें अंतरंग नीट समजत नाहीं, तशी कांहीं या अधिमानसाच्या खालच्या मनाची स्थिति नसते. त्याला आमच्या मनापेक्षां अधिक मोकळेपणानें वावरतां येतें, त्याच्या संवेदनांना आमच्या मनापेक्षां पुष्कळ अधिक वाव असतो -- या मनाच्या क्षेत्रांत अज्ञान पूर्णतेला गेलेलें नसतें; तेथें मनामनांत बुद्धिपुरःसर सुसंवाद घडवून आणतां येतो -- आमच्या मनापेक्षां तेथें मूळ मनांत म्हणजेच अधिमानसापासून विभक्त झालेल्या मनांत एकमेकांसंबंधानें योग्य नातें आणि अन्योन्यावलंबी संघटन निर्माण करतां येतें. आमचें मन अंध प्राणशक्ति आणि प्रतिक्रियाशून्य जडद्रव्य यांनीं जसें व्यापलेलें आणि दुबळें केलेलें आहे, तशी त्या मूळ मनाची स्थिति नसते. मनाची ती पातळी अज्ञानाची असली, तरी तेथें खोटें पिकत नाहीं, प्रमाद घडत नाहींत; त्या मनाच्या पातळीवर असत्य आणि

 

पान क्र. ५३४

 

प्रमाद घडावा अशी अनिवार्य स्थिति उत्पन्न झालेली नसते -- तेथील अज्ञान मर्यादा घालणारें असतें, खोटें करणारें तें असलेंच पाहिजे असें नाहीं -- मर्यादा घालण्यानें अप्रत्यक्षत: क्वचित् खोटें निपजेल इतकेंच. तेथील अज्ञानांत ज्ञानाला मर्यादा घातलेली असते, एकांगीं सत्यें पुरस्कारलीं जातात; परंतु सत्य किंवा ज्ञान यांना विरोध नसतो. त्यांचा इन्कार केला जात नाहीं. या मनानंतर प्राण आणि सूक्ष्म जडद्रव्य यांची पातळी निर्माण होते -- या मनाची जी विभक्तता असते आणि तिजवर आधारलेलें त्याचें एकांगी सत्यांचें जें भांडार असतें, ती किंवा तसली म्हणा, विभक्तता आणि तो किंवा तसला एकांगी सत्यांचा पसारा, प्राण आणि सूक्ष्म जडाच्या पातळ्यांवरहि असतो; मूळ जाणीवशक्ति मनापासून प्राण आणि सूक्ष्म जडद्रव्य यांना विभक्तपणें कार्य करावयास लावते; पण मन आणि प्राण यांचा संबंध समूळ तोडून टाकीत नाहीं, मन आणि प्राण यांच्यामध्यें अभेद्य भिंत उभी करीत नाहीं; त्याचप्रमाणें सूक्ष्म जडद्रव्यहि मन आणि प्राण यांच्यापासून पूर्णपणें अलग केलें जात नाहीं. निश्चेतनता ही अवस्था, ही पातळी परत एकदां आली आणि त्या पातळींतून, त्या अंधकारमय योनींतून आमचें विविध अज्ञानाचें विश्व वर आलें म्हणजे मग जड, प्राण आणि मन यांजमध्यें अभेद्य भिंती उभ्या राहतात. सच्चिदानंदाचा तिरोधानक्रम चालला असतां, त्या तिरोधानाच्या पायऱ्या सर्वच कमीअधिक ज्ञानमय असतात; प्राण आणि सूक्ष्म जडद्रव्य देखील थोडेसें ज्ञान बाळगून असतात. मूळ जाणीवयुक्त शक्तीचे ते विशिष्ट संघटित प्रकार असतात. अधोमानसापासून निघालेलें मन काय किंवा प्राण आणि सूक्ष्म जडद्रव्य काय, सर्व मूळ जाणीवशक्तीचीं विशिष्ट रूपें आहेत. त्यांचा स्वभावधर्म स्वतंत्रपणें वागण्याचा असतो -- प्रत्येकाचें व्यवहारकेंद्र त्याच्या स्वतांत असतें; स्वतःसाठीं मन जगतें, प्राण जगतो, सूक्ष्म जडतत्त्व जगतें -- सर्वजण स्वत:साठीं व्यवहार करतात, स्वतांत काय शक्ति असेल ती कार्यरूपानें प्रकट करतात; पण जें कांहीं प्रकट केलें जातें तें सर्व सत्य असतें; मन मनाचीं सत्यें प्रकट करील, प्राण प्राणाचीं, सूक्ष्म जड त्याची स्वत:चीं : कोणीहि असत्य वा भ्रम उभा करणार नाहीं किंवा ज्ञान आणि अज्ञान यांची भेसळ कोणीहि उभी करणार नाहीं. मूळ जाणीवशक्ति आपलें सर्व लक्ष एकेका तत्त्वावर केंद्रित करीत करीत मन, प्राण, सूक्ष्म जडद्रव्य येथपर्यंत आल्यावर, पुढें शक्ति आणि आकार या दोन गोष्टींवर ती

 

पान क्र. ५३५

 

आपलें सर्व लक्ष केंद्रित करूं लागते; जाणीव आणि शक्ति यांच्या जोडीची एकता फुटून जाणीव वेगळी आणि शक्ति वेगळी अशी परिस्थिति मूळजाणीव निर्माण करते -- ही परिस्थिति निर्माण झाली, जाणिवेनें आकार आणि शक्ति यांच्यांत गुप्त लुप्त होऊन, अंधकारमय झोंपेंत राहण्याचें ठरविलें म्हणजे मग जाणिवेला धडपड करून परत जागृतींत यावयाला फार त्रास पडतो -- विकासक्रमांत ही जाणीव पूर्णतेनें पूर्वस्थितींत एकदम येऊं शकत नाहीं -- तुकड्या तुकड्यांनीं तिला मार्ग क्रमावा लागतो; जड आकारांत लीन झालेल्या जाणिवेचा विकास अंशाअंशांनीं होतो आणि या आंशिक विकासामुळें तिच्याकडून प्रमाद आणि असत्य घडविलें जातें, घडतें. तरीपण, मूळ अभावांतून उदयास आलेला भ्रम, भ्रमाचा पसारा हें कांहीं या असत्यांचें व प्रमादांचें स्वरूप नसतें. अचेतनतेंतून उदयास आलेलीं विश्वांतील अपरिहार्य सत्यें, असेंच त्यांचें वास्तविक स्वरूप असतें. कारण अज्ञान हें वस्तुत: ज्ञान असतें; अचेतनेचा पडदा किंवा बुरखा घेऊन, स्वतःचा शोध करीत ज्ञान प्रवास करूं लागलें म्हणजे त्याला अज्ञान हें नांव दिलें जातें. असें हें पडद्याआडून स्वतःचा शोध करणारें ज्ञान, आपलें इष्ट मिळविण्यांत एकदम यशस्वी होऊं शकत नाहीं -- तें चुकतें, सांवरतें; हरवतें, गांठतें; पूर्ण ज्ञानानें अचेतनतेंत उडी किंवा बुडी घेतल्याचा सरळ परिणाम असाच असणार; अज्ञानरूपानें प्रवास करणारें ज्ञान असेंच चुकत, चांचपडत आपला विकास करूं शकणार -- एकदां पूर्ण च्युति झाल्यावर, ज्ञानानें पुन: आपला मार्ग चालावयाचा म्हणजे तो त्याला असाच चालावा लागणार -- ज्ञानाच्या पुनरुद्धाराचा अगदीं रास्त मार्ग म्हणजे चुकणें, सांवरणें -  चुकणें, सावरणें हाच आहे. सच्चिदानंद उतरत उतरत पूर्णतया खालीं उतरलें म्हणजे सत् (अस्तित्व) हें दर्शनी असत् (अस्तित्वाचा अभाव) मध्यें, ज्ञान हें दर्शनी अचेतनामध्यें व अस्तित्वाचा आनंद विश्वव्यापी संवेदनाशून्यतेंत बुडून बसतो : सच्चिदानंदाच्या खालीं उडी घेण्याचा हा पहिला परिणाम होय; यानंतर स्वतःला शोधीत सच्चिदानंद वरचा प्रवास करूं लागला म्हणजे, अंशाअंशानें झगडत अनुभव घेऊन त्याला प्रवास करावयाचा असल्यानें, त्याच्या जाणिवेचें, ज्ञानाचे सत्य-असत्य, ज्ञान आणि प्रमाद असे भाग पडणें, जीवन आणि मरण असे त्याच्या अस्तित्वाचें भाग पडणें, दु:ख आणि सुख असे त्याच्या आनंदाचे भाग पडणें अगदीं स्वाभाविक आहे : स्वत:ला परत शोधून काढण्याची जी धडपड सच्चिदानंद अचेतन-

 

पान क्र. ५३६

 

तेंत बुडी मारल्यानंतर करीत असतें, त्या धडपडीची प्रक्रिया ही अशीच असणें स्वाभाविक, अपरिहार्य आहे. या आत्मशोधाच्या प्रक्रियेंत सत्याचा शुद्ध अनुभव, ज्ञानाचा, आनंदाचा, अमर अस्तित्वाचा शुद्ध अनुभव येणें वास्तवाला धरून होणार नाहीं. विकासशील प्राणी सबंध विकासक्रमांत, त्यांच्या अंतरंगांत असलेल्या आत्मतत्त्वानुरोधानें वागले, त्या आत्मतत्त्वाच्या प्रेरणेनुसार शांतपणें वर्तन करूं लागले, निसर्गाच्या सर्व व्यवहाराच्या पोटीं असलेल्या अतिमानसाच्या प्रेरणेनुसार वागूं लागले, तर मात्र सत्य, ज्ञान, आनंद, अमर सत्ता यांचा शुद्ध अनुभव शक्य होईल. परंतु अधिमानसाचा कायदा याठिकाणीं काम करीत असतो : प्रत्येक शक्ति या कायद्यानुसार आपल्या शक्यता वास्तवांत आणीत असते. मूळ अचेतनता आणि जाणिवेची विभागणी या मुख्य तत्त्वावर ज्या जगाची उभारणी आहे, त्या जगांत स्वाभाविकपणें प्रथम प्रथम कांहीं विशिष्ट गोष्टींचाच संभव आहे : त्या जगांत सर्वप्रथम अज्ञानाचे अंधाराचे शक्तिगण प्रामुख्यानें उभे राहणार आणि ज्या अज्ञानावर ते जगतात तें अज्ञान सांभाळून ठेवण्याच्या प्रेरणेनें ते क्रियाशील होणार हें ठरलेलें आहे : त्या जगांत ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न हा अज्ञानानें अडखळत चालणारा प्रयत्न असणार आणि या प्रयत्नाचा अपरिहार्य भाग म्हणून असत्य आणि प्रमाद यांचा पसारा निर्माण होणार; या जगांत जीवनाचा झगडा, अज्ञानानें उभा केलेला आणि पोसलेला झगडा असणार आणि त्यापासून अन्याय आणि अमंगल यांचा तांडा निघणार; या जगांत आनंदासाठीं, मौज करण्यासाठीं अहंभावप्रेरित संघर्ष चालणार आणि त्यापासून सुख, दुःख, यातना, 'मी मी' करणाऱ्या प्राण्यांना येतां जातां भोगाव्या लागणार; अचेतनता आणि विभक्त जाणीव या तत्त्वांवर उभारलेल्या जगांत या गोष्टी प्रथम प्रथम स्वभावत: असणार; आमच्या विकासशील अस्तित्वाच्या प्राथमिक अनिवार्य अनुभवांचा पाढा हा असा असणार -- अर्थात् याच्याहून अधिक असें त्या अस्तित्वांत कांहींच शक्य होणार नाहीं असें नाहीं -- पण त्या अस्तित्वाचा सामान्य आराखडा प्रथम प्रथम हा असाच असणार हें मात्र खरें. निराकार सच्चिदानंद जडाकार झालें म्हणजे, आमच्यासमोर सत्‌चा अभाव दिसतो; पण त्यांत सत् लपलेलें असतें; आमच्यासमोर अचेतन दिसतें पण त्यांत चित् (चेतना, ज्ञान, जाणीव) लपलेली असते; आमच्यासमोर संवेदनाशून्यता दिसते, पण तिच्या पोटीं आनंद लपलेला असतो, सुप्त आनंदाचें तें रूप असतें -- या गूढ अशा सत्, चित् व आनंद या सत्यांना विकास-

 

पान क्र. ५३७

 

क्रमानें प्रकट झाल्यावांचून गत्यंतरच नसतें. तेव्हां विकासाची प्राथमिक पायरी कांहींहि दृश्य दाखवो, शेवटीं जडाच्या भूमींत सत् चित् आनंद यांचा आविष्कार होणें अटळ आहे : अधिमानस, अतिमानस हीं तत्त्वेंहि जडापोटीं लपलेलीं आहेत; अंधकारमय अनंत जडांतून प्रथम या तत्त्वांना विरोधी असा संघटित संसार जरी उभा राहिला, तरी या दर्शनीं विरोधी संसारांत अधिमानस आणि अतिमानस या तत्त्वाचें कार्य पूर्णतया होऊन, तीं तत्त्वेंहि कृतार्थ होणार यांत संशय नाहीं.

विश्वांत जो विकास चाललेला आहे, त्याची अखेर वर सांगितल्याप्रमाणें फारशी अडचण न येतां होईल असें म्हणावयास दोन कारणें आहेत. एक कारण हें कीं, अधिमानस भौतिक सृष्टीकडे खालीं उतरत असतां, स्वतःच्या कार्यांत मदत करणारीं आपलीं रूपांतरें -- स्फूर्तिमय मन, प्रकाशमय मन, उच्च मन हीं रूपांतरें -- निर्माण करून कामास लावतें. हीं जीं रूपांतरें किंवा पर्याय, त्यांच्याकरवीं आमच्या मानसिक जाणिवेंत वस्तुजाताचें गूढ सत्य आम्हांला कळेल अशा स्वरूपांत आणलें जातें; विशेषत: स्फूर्तिमय मन हें, सत्याचे विजेच्या झगझगाटासारखे तेजस्वी झोत आमच्या मानसिक क्षेत्रांत टाकून, त्यांतील कांहीं भाग, कांहीं क्षेत्र प्रकाशानें पुरेपूर भरून टाकतें, या स्फूर्तिच्या प्रकाश-झोतांनीं व प्रकाशमय मनाच्या आणि उच्च मनाच्या क्रियांनीं आम्हांला ज्या गूढ सत्याचें ज्ञान पुरविलें जातें, त्याचा आम्हीं उपयोग केला, तर आमचा विकास द्रुत गतीनें होऊं शकतो; प्रथम आमच्या आंतरात्म्यांत उच्च मन आदिकांकडून, आमच्या मनाच्या वरील उच्चतर जाणिवेच्या प्रांतांतून, जे संदेश येतात, त्यांचा उपयोग करून आम्हीं आपला आंतरात्मा त्या संदेशानुसार रूपांतरित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे -- तसेंच आंतरात्म्यांतून आमच्या बाह्य आत्म्याकडे वरच्या श्रेष्ठ ज्ञानप्रांतांतील संदेश आम्हीं घेतले पाहिजेत, आणि बाह्य व्यवहारांतहि त्या संदेशानुसार आम्हीं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे; असें आम्ही करीत राहिलों, तर कालांतरानें आम्ही स्फूर्तिप्रधान, अधिमानसप्रधान आत्मे होऊं, आम्हांला बुद्धीच्या आणि बाह्य संवेदनांच्या मर्यादेंत रहावें लागणार नाहीं; आमचें ज्ञान खूप व्यापक होईल, प्रत्यक्ष सत्य, सत्याचा आत्मा आणि देह यांना आम्ही कोणत्याहि मध्यस्थाशिवाय स्पर्श करून, अनुभव आत्मसात् करूं शकूं. वस्तुस्थिति अशी आहे कीं, उच्च मन, प्रकाशमय मन, स्फूर्तिमय मन व अधिमानस यांजकडून त्या श्रेष्ठ ज्ञानेभूमींवरून विजेच्या किंवा सूर्याच्या

 

पान क्र. ५३८

 

लकाकीप्रमाणें ज्ञानाच्या प्रकाशाचे, सत्याच्या प्रकाशाचे कमीअधिक तेजोमय फवारे आजहि आमच्या अंतरंगांत येत असतात; पण हें त्याचें येणें कधींमधीं होतें; तें आमच्या अस्तित्वाच्या एखाद्याच कोपऱ्याचे ज्ञान करून देणारें असतें; आम्ही स्वत: त्या सत्यांच्या व्यापकतेनुसार आमच्या मनाची व्यापकता बनविण्याचा, त्या सत्यांच्या स्वरूपानुसार आमचें स्वरूप बनविण्याचा प्रयत्न करूं लागलों, उच्चतर सत्यें आमच्या वृत्ती-प्रवृत्तींत आणण्याची आमच्यामध्यें जी शक्ति आहे, ती शक्ति आम्ही कामास लावूं लागलों, कीं अधिमानसानें आमची जी सोय आपल्या दुय्यम पर्यायांच्या द्वारां करून ठेवलेली आहे, तिचा फायदा घेऊन, आम्ही आपला विकास वेगानें करून घेऊं शकूं. सच्चिदानंद अधिमानस अतिमानस या तत्त्वांची, विशेष अडचण न येतां, आमच्या पार्थिव संसारांत पूर्ण अभिव्यक्ति सुखानें होण्यांत विश्वांतील विकासाची अखेर होईल, असें जें आम्हीं म्हटलें त्याचें एक कारण आतांपर्यंत सांगितलें. दुसरें कारण हें कीं, अधिमानस, स्फूर्तिमय मन व अतिमानस हीं तत्त्वें अचेतन जडांत तिरोभूत स्थितींत आहेत व म्हणून तीं अटळपणें विकसित व्हावयाचीं आहेत, एवढेंच नव्हे, तर तीं आजहि मन, प्राण, जडतत्त्व यांच्या विश्वव्यापी क्रियांत भाग घेत असतात; अर्थात् हा भाग तीं सामान्यत: प्रकटपणें घेत नाहींत, पडद्याआड राहून घेतात; पण मधून मधून स्फूर्तिच्या प्रकाशानें तीं प्रकटपणेंहि कार्यकारी होतात : या तत्त्वांचें कार्य सामान्यत: लपून केलें जातें, तेव्हांहि भौतिक, प्राणिक, मानसिक व्यापारांनीं त्या त्या क्षेत्रांत तें आच्छादलें जाऊन ओळखावयास अवघड होऊन बसतें, ही गोष्ट खरी आहे. पण हीं तत्त्वें आजहि मनाच्या, प्राणाच्या व जडतत्त्वाच्या विश्वव्यापी कार्यांत क्रियाशील आहेत ही महत्त्वाची बाब आहे. विश्वांतील विकासाची अखेर विशेष अडचण न येतां दिव्य मानवी जीवनांत होणार आहे, असा सिद्धान्त करावयास, अधिमानस स्फूर्तिमय मन व अतिमानस यांची आजची आतांच सांगितलेली क्रियाशीलता हें दुसरें कारण आहे. असो. अतिमानस विश्वाच्या विकासांत आरंभीच प्रकट होत नाहीं याचें कारण उघड आहे : अतिमानसिक शक्ति ही विश्व निर्मिणारी शक्ति आहे. ही शक्ति आरंभींच व्यक्त रूप धारण करील, तर अज्ञानक्षेत्रहि असणार नाहीं, अचेतन क्षेत्रहि असणार नाहीं; विकासक्रम हा सावकाशीचा असतो व म्हणून विविध लीला शक्य होते; अतिमानस हें प्रकट होऊन विकास करूं म्हणेल, तर तो विकास अतिदृतगतीनें होऊन

 

पान क्र. ५३९

 

त्या क्रमाला विकासक्रमहि म्हणतां येणार नाहीं -- एकदम रूपांतर, देखावा क्षणांत बदलणें याला विकास कसें म्हणणार ? पण अतिमानस विकासारंभीं उभे ठाकून आपलें कार्य करूं म्हणेल, तर असा कांहीं प्रकार होणार हें निश्चित. तेव्हां, विकासी विश्वलीला व्हावयास अतिमानसाचें जडांत अंतर्धान होणेंच इष्ट आहे व जडांतून प्राण, मन, या क्रमानें विश्वाचीं घटकभूत तत्त्वें प्रथम विकसित होणेंच इष्ट आहे. असो. अतिमानसाचा आणि अधिमानसाचा प्रत्यय आम्हांला विश्वसंसारांत नित्य कोठें पहावयास मिळतो, त्याजविषयीं दोन शब्द लिहूं. भौतिक शक्ति विश्वांत कामें करीत आहे, तें आपण पाहतों; या भौतिक शक्तीच्या कार्यांत जो अटळपणाचा, अनिवार्यपणाचा प्रत्यय आम्हांला येतो तो प्रत्यय अतिमानसाच्या निर्माणशक्तीचा प्रत्यय आहे हें आम्हीं ओळखलें पाहिजे; अचूक, अटळ कार्य हा अतिमानसाचा स्वाभाविक विशेष आहे. प्राणशक्ति, मनाची शक्ति ह्या आपल्या आपल्या शक्यता आपल्या आपल्या पद्धतीनें वास्तवांत आणण्याच्या कार्यांत मग्न असतात, त्यांच्या कार्यांचे विविध संयोग-वियोग घडून येतात, हा अधिमानसाचा अप्रत्यक्ष-प्रत्यक्ष संसार आहे, हें आम्हीं ओळखावें. प्राण व मन या तत्त्वांना जडाच्या भूमींत आपलें आपलें विशिष्ट जीवन जगण्यास मोकळीक मिळाली आहे, त्याप्रमाणें योग्य वेळीं अधिमानस, अतिमानस या श्रेष्ठ ज्ञानमय तत्त्वांना -- गुप्त सच्चिदानंदाच्या श्रेष्ठ शक्तींना -- तिरोधानाच्या गुप्ततेंतून प्रकट होतां येईल आणि आमच्या जीवनांत त्यांचा सर्वोत्तम प्रकाश भरून जाईल; तो प्रकाश आज आमच्या पातळीच्या फार वर आहे, पण तो योग्य वेळीं खालीं उतरून, आमचें जीवन उजळून दिव्य करील ही गोष्ट निश्चित. सत् चित् आनंद या त्रयींविषयीं वेगळें सांगणें नको. जेथें अतिमानस तेथें सच्चिदानंद, जेथें यंत्र तेथें यंत्री; अतिमानस हें निर्माणयंत्र आहे, यंत्री सच्चिदानंदच आहे.

तेव्हां शेवटीं इतकेंच सांगावयाचें कीं, जें विश्व अभिव्यक्त झालें आहे, त्या विश्वांत मानवाचें जीवन दिव्य होणें केवळ संभवनीयच नाहीं, तर निसर्गाचा जो विकासयत्न चालला आहे, त्याचा अटळ परिणाम, त्याची अनिवार्य परिणति, पूर्णता अशा दिव्य जीवनांतच आहे. आज आमचें जीवन अज्ञानांत आपला खडतर मार्ग क्रमीत आहे, पण आमच्या अज्ञानाला शेवट आहे, आमच्या कष्टांना शेवट आहे आणि तो शेवट आमच्या कष्टांतूनच कष्टाचें गोड फळ, कष्टाचा मोबदला म्हणून आम्हांला

 

पान क्र. ५४०

 

दिव्य जीवनाच्या रूपानें अनुभवावयास मिळणार आहे. अंतर्बाह्य निसर्ग आम्हांला जसा दिसत आहे, दिसला आहे, तसाच वास्तवांत असेल, तर त्याच्याकडून होत असलेला विकासाचा खटाटोप मानवी जीवन दिव्य करूनच पूर्ण होणार आहे, हे निःसंशय.

 

पान क्र. ५४१

***









Let us co-create the website.

Share your feedback. Help us improve. Or ask a question.

Image Description
Connect for updates