Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics, expounding a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth.
Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.
प्रकरण सव्विसावें
चढती द्रव्य (तत्त्व) मालिका
एक आत्मा जडतत्त्वाचा (अन्नमय) आहे, या आत्म्यांत भरलेला दुसरा आंतर आत्मा प्राणमय आहे, तिसरा प्राणमयाच्या आंत मनोमय आत्मा आहे, मनोमयाच्या आंत विज्ञानमय (सत्यज्ञानमय) आत्मा आहे, त्याच्या आंत आनंदमय आत्मा आहे.
- तैत्तिरीय उप० २.१ ते ५
उंचच उंच इंद्रावर, शिडीवर चढत जावें, त्याप्रमाणें साधक चढत जातात. चढतांना एक शिखर चढून जावें, तें मागें टाकून दुसरें त्यावरचें शिखर चढून जावें असा चढण्याचा कार्यक्रम साधक करीत असतो तेव्हां प्रत्येक शिखरावरून, पुढें आणखी कितीतरी चढावयाचें आहे, हें चढणाऱ्याच्या प्रत्ययास येतें. तें अत्युच्च सर्वोच्च परम तत्त्व आपलें अंतिम ध्येय आहे या गोष्टीची जाणीव, इंद्र साधकाला करून देतो.
श्येन किंवा गृध्र पात्रावर उतरून ठाण मांडून तें वर उचलतो, त्याप्रमाणें इंद्र साधकाच्या देहपात्रावर उतरून ठाण मांडून तें देहपात्र वर उचलतो, (तें साधनदृष्टीनें अधिक कार्यक्षम बनवितो); इंद्र नदाच्या प्रवाहा प्रमाणें आपल्या गतीचा, चालीचा वेग अप्रतिहत असा ठेवतो आणि प्रकाशाचे किरण (तम:प्रधान देहांत सत्वाचा उजेड पाडणारे किरण) आपल्या गतीनें, चालीनें शोधून काढतो, गांठतो; इंद्र या वाटचालींत आपलीं शस्त्रें, अस्त्रें जवळ बाळगून असतो -- म्हणून त्याला प्रकाश गांठता येतो; दिव्य अंतरिक्षगत प्रवाही तत्त्वाच्या सागरांत उसळणाऱ्या लहरींचा आश्रय इंद्र घेतो; हा महान्, राजाधिराज, चतुर्थ आत्मिक अवस्था साधकाला उद्घोष करून कळवितो; मर्त्य माणसानें आपलें शरीर विशुद्ध, पवित्र करण्याचा कार्यक्रम तांतडीनें करावा; युद्धांतील अश्व विविध संपत्ति जिंकून घेण्यासाठीं चौखूर उधळत जावा -- त्याप्रमाणें इंद्र उद्घोष करीत आमच्या सर्व कोशांतून वेगानें उतरतो आणि आमच्या देहपात्रांत प्रवेश करतो.
- ऋग्वेद १-१०-१,२; ९-९६-१९,२०
पान क्र. ४७०
जडाची जडता कशांत आहे याचा आम्ही विचार करतों, तेव्हां जडाची घनता, स्पर्शविषयता, त्याची स्थिति बदलूं पाहणाऱ्या शक्तीला सारखा वाढता विरोध, स्पर्शाला कठीणपणाची प्रतिक्रिया, इतक्या गोष्टी जडाच्या जडतेच्या निदर्शक आहेत, असें आमच्या लक्षांत येतें. तें द्रव्य अधिक जड आणि सत्य, जें अधिक घनतासंपन्न, अधिक रोधक आणि या गुणांमुळें जें आकारांत अधिक टिकाऊ व ज्यावर आमची जाणीव लक्ष केंद्रित करून अधिक काळ तद्विषयक विचार करूं शकते; तें द्रव्य कमी जड, जें अधिक सूक्ष्म, कमी रोधक आणि संवेदना, जाणीव ज्यावर कमी काळ पकड ठेवूं शकते. बाह्य दृष्टीनें जडाची अशी वर्गवारी होते. आमच्या सामान्य जाणिवेची जडाकडे बघण्याची ही जी वृत्ति ती, जड द्रव्य ज्या मुख्य हेतूनें निर्माण केलें गेलें आहे त्या हेतूचें प्रतीकच आहे. द्रव्य हें जड-अवस्था याकरितां धारण करतें कीं, ज्या जाणिवेला त्याच्याशीं त्याच्या द्वारां व्यवहार करावयाचा असतो, त्या जाणिवेला घट्ट पकडून ठेवण्यासारख्या टिकाऊ प्रतिमा पुरविणें त्याला शक्य व्हावें. अशा प्रतिमांवर मन आपलें लक्ष केंद्रित करूं शकतें आणि असें लक्ष केंद्रित करून त्याला ज्या कांहीं क्रिया त्यांच्यावर व त्यांच्या साह्यानें करावयाच्या असतात त्या तें करूं शकतें; त्याच्याप्रमाणें प्राण हा या प्रतिमांवर आपली कारागिरी करून ती कारागिरी कांहीं काळ तरी टिकेल असा विश्वास धरूं शकतो. जुन्या वैदिक विश्वतत्त्वांच्या वर्णनांत पृथ्वीतत्त्व हें नांव जडतत्त्वाला दिलेलें आढळतें. हें प्रतीकात्मक नांव जडद्रव्याला देण्याचें कारण, द्रव्याच्या 'घन प्रकारांत पृथ्वीचा समावेश, एक नमुन्याचें घनद्रव्य' म्हणून केला जात होता. आम्ही आणि आमच्यासमोरचे आजूबाजूचे पदार्थ यांच्यामध्यें, अनुभव घेणारा आणि अनुभवाचा विषय, हा संबंध असतो; अनुभव घेणाऱ्याचा अनुभव स्पर्श, रस, गंध, शब्द, रूप असा पांच प्रकारचा असतो; यांत स्पर्श हा मूळ अनुभव आहे; संवेदनेचें मूळ स्पर्शांत आहे; त्वचा हें स्पर्शाचें इंद्रिय आहे. त्वचेचा आणि स्पर्शविषयाचा प्रत्यक्ष स्थूल संबंध येतो. दुसरी रसना, घ्राण, श्रवण, नेत्र हीं इंद्रियें क्रमश: अधिकाधिक अप्रत्यक्ष व सूक्ष्म स्पर्शानें अनुभव घेतात; सांख्य दर्शनांत आकाश, वायु, तेज, आप व पृथ्वी अशीं पांच तत्त्वें मानतात; त्यांत आकाश हें सर्वांत सूक्ष्म व पृथ्वी हें सर्वांत स्थूल तत्त्व आहे. अतिसूक्ष्मापासून आरंभ
पान क्र. ४७१
करून कमी कमी सूक्ष्मता, अर्थात् अधिक अधिक स्थूलता क्रमानें सांख्यांनीं सांगितलीं आहेत; सर्वांत स्थूल, घनतत्त्व पृथ्वी हें आहे. तेव्हां एकंदरींत जडतेचें अधिकांत अधिक प्रमाण असणारें स्थूल, घनद्रव्य ही शुद्ध द्रव्याची शेवटली अवस्था आहे. शुद्ध द्रव्य चैतन्यमय असतें; या द्रव्यांत रूपांतरें होत होत, शेवटलें विश्वव्यवहारांसाठीं झालेलें रूपांतर म्हणजे घन जडद्रव्य होय. या शेवटल्या रूपांतराचें द्रव्य चैतन्यमय असण्याचें ऐवजीं आकारमय असते आणि या आकारमय द्रव्याचा आकार हा द्रव्यकणांचें केंद्रीकरण, रोधक शक्ति, स्थूलता, टिकाऊपणा व अगदीं अभेद्य अलगपणा या गुणांत श्रेष्ठांत श्रेष्ठ असा असतो आणि म्हणून भेद, अलगपणा, विभागणी यांची परमावधि या शेवटल्या द्रव्यावस्थेंत झालेली असते. भौतिक जड विश्वाचें लक्षणच भेद, अलगपणा, विभागणी हें आहे -- त्या विश्वाच्या निर्मितीचा हेतूच मुळीं विभागणीच्या तत्त्वाची परमावधि गांठावी हा आहे आणि या तत्त्वाची परमावधि विश्वाच्या व्यवस्थेत गांठलेलीहि आहे.
स्वभावतःच जडद्रव्य आणि चैतन्य यांजमध्यें जें अंतर आहे, तें द्रव्याच्या क्रमश: चढत्या पायऱ्यांनीं भरून काढलेलें आहे. या चढत्या पायऱ्यांत जडद्रव्याच्या ज्या खुणा वर सांगितल्या त्या क्रमश: कमी प्रमाणांत व त्यांच्याबरोबर उलट खुणा, उलट गुण क्रमश: अधिक प्रमाणांत सांपडतात -- चढत्या पायऱ्यांच्या शेवटीं शुद्ध आत्मिक विस्तार हें द्रव्याचें रूप सांपडतें. या चढत्या क्रमाचा अर्थ हा कीं, चढत्या पाय-यांवर क्रमशः आकाराचें अंकितत्व कमी होत जातें, द्रव्याची लवचिकपणाची आणि सूक्ष्मपणाची अवस्था, तशीच शक्तीची तत्सम अवस्था चढत्या पायऱ्यांवर अधिकाधिक प्रमाणांत दिसून येते; हें चढतें द्रव्य क्रमश: व रूपांरूपांत कठिणपणें अलग न राहतां मिसळणारें असतें -- चढत्या पायऱ्यांवरचे आकार एकमेकांत प्रविष्ट होण्यास अधिकाधिक पात्र असतात, एकमेकांना आत्मसात् करण्याची शक्ति अधिकाधिक प्रमाणांत त्यांच्यांत असतें, एकमेकांचीं रूपें घेण्याची पात्रता तेथें असते; बदल, रूपांतर, एकमेकांशीं एकरूप होणें या क्रियाप्रक्रिया चढत्या पायऱ्यांवर वाढत्या प्रमाणांत शक्य होतात. खालीं शेवटच्या जडतत्त्वाच्या पायरीवर आकाराचा टिकाऊपणा हा प्रमुख धर्म असतो; तेथून वर चढत असतां द्रव्याची सूक्ष्मता वाढत जाऊन, आकारधारक आत्मतत्त्वाच्या अधिकाधिक शाश्वततेचा अनुभव आम्हांस येत जातो; भौतिक जडाच्या रोधक आणि
पान क्र. ४७२
भेदक गुणांचा टिकाऊपणा, खालीं आमच्या प्रत्ययास येतो तर जसे आपण वर चढूं तसा आम्हांला उलट त्यांचा अनुभव अधिकाधिक प्रमाणांत येत जातो. अनंतता, एकता, अविभाज्यता या आत्मतत्त्वाच्या दिव्य सर्वोच्च स्वभाव धर्मांचा अनुभव, खालून वर चढत असतां द्रव्याच्या सूक्ष्मतेच्या वाढत्या मानामुळें आम्हांला वाढत्या प्रमाणांत येत जातो. स्थूल भौतिक द्रव्य आणि शुद्ध चैतन्य-द्रव्य या दोहोंचे मूलभूत गुण व व्यापार अन्योन्यविरोधी आहेत : स्थूल भौतिक जडांत चित् अर्थात् जाणीवशक्ति आपले अंश जागजागीं घट्टपणें एकत्र करून अनेक घन आकार निर्माण करते व हे घन आकार एकमेकांपासून अलग राहतात, एकमेकांना धक्के देतात, प्रतिकार करतात; उलट शुद्ध चैतन्यद्रव्यांत तीच चित्, शुद्ध जाणिवेच्या स्वरूपांत आपले जे अनेक आकार कल्पिते ते कल्पितांना आपलें स्वतंत्रत्व घालवीत नाहीं, कायम ठेवते; आपलें स्वरूप विसरत नाहीं, कायम ध्यानांत ठेवते; हे कल्पिलेले आकार स्वभावत: अविभाज्य तत्त्वाचे आहेत, हें ती विसरत नाहीं आणि या आकारांना जड द्रव्याप्रमाणें अलग आणि अमिश्रणार्ह ठेवीत नाहीं : या शुद्ध चैतन्यद्रव्यांत ते अन्योन्यांत स्वैरपणें मिसळतात, सारखे एकरूप होण्याच्या धडपडींत असतात -- जाणीवशक्ति या शुद्ध चैतन्यद्रव्याच्या क्षेत्रांत कितीहि विविध रूपांना जन्म देती झाली, तरी हीं रूपें एकमेकांत मिसळून जाणारीं, एकमेकांची जागा घेणारीं व द्रव्याची अविभाज्यता, एकता सारखी पटविणारीं अशीं असतात. जड भौतिक स्थूल घनद्रव्य आणि शुद्ध चैतन्य-द्रव्य हीं दोन टोंकाचीं द्रव्यें व या दोन टोंकांना जोडणारीं अनेक द्रव्यांची चढती म्हणा, उतरती म्हणा मालिका, अशी एकंदर विश्व-द्रव्याची व्यवस्था दिसते. एकाच शुद्ध चैतन्य द्रव्याच्या, क्रमश: स्थूल, स्थूलतर होणाऱ्या या सर्व अवस्था होत. सर्वांत शेवटीं, म्हणजेच सर्वात खालच्या पायरीवर जड घनद्रव्य ही चैतन्य-द्रव्याची अवस्था असते.
हे जे द्रव्याचे प्रकार अथवा चैतन्य-द्रव्याच्या अवस्था वर सांगितल्या, त्यांचा विचार दिव्य जीवनाच्या चर्चेंत फार महत्त्वाचा आहे. मानवी आत्मा पूर्णता पावला, म्हणजे त्याचा दिव्य प्राण व त्याचें दिव्य मन एका बाजूला आणि त्याचें स्थूल दर्शनी अ-दिव्य शरीर, अर्थात् भौतिक अस्तित्वाचा आकार दुसऱ्या बाजूला, अशी स्थिति कायम असणार कीं काय ? अशा स्थितींत या दोन अ-दिव्य व दिव्य अंगांचें नातें कसें
पान क्र. ४७३
व कोणतें असेल ? भौतिक विश्वाच्या आरंभीं, द्रव्य आणि संवेदना यांचें जें एक विशिष्ट नातें स्थापित झालेलें होतें, तें नातें स्थूल जड द्रव्याला जन्म देतें झालें आणि या द्रव्याचें कार्य म्हणजे आमचें भौतिक अ-दिव्य शरीर होय. संवेदना व द्रव्य यांच्या ज्या नात्यानें हें शरीर निर्माण झालें तेंच एक नातें या विश्वांत, संवेदना व द्रव्य यांजमध्यें नाहीं -- आणि म्हणून अ-दिव्य शरीर हें एकच शरीर विश्वांत आहे, अशीहि गोष्ट नाहीं. द्रव्याशीं असलेलें प्राणाचें व मनाचें जें नातें, हें अ-दिव्य शरीर व त्याचे नियम बनवितें, त्या नात्याहून प्राणाचें व मनाचें द्रव्याशीं वेगळें नातें असूं शकतें आणि आहे. या भिन्न नात्यांमुळें शरीराचे भौतिक नियमहि भिन्न होतात. शरीराच्या संवयी अगदीं संकुचित वृत्तीच्या न राहतां विशाल वृत्तीच्या होतात; सामान्य संवयींहून वेगळ्या संवयीहि शरीराला पडतात; शरीराचें द्रव्य देखील बदलतें -- हें बदललेलें शरीर-द्रव्य इंद्रियशक्तींत अधिक विशालता व स्वतंत्रता आणतें, जीवनाची क्रिया अधिक मोकळी व अनिर्बंध अशी बनविते, मनाची प्रक्रिया देखील अधिक स्वैरतेनें, स्वछंदतेनें चालेल असें करतें : आमचें जें भौतिक अस्तित्व आज आहे, त्यांत मरण, विभक्तता, शरीरांचें अन्योन्यांना विरोध करणें, शरीरांनीं अन्योन्यांना अगदीं दूर दूर धरणें (हीं शरीरें अर्थात् एकाच जाणीवयुक्त प्राणशक्तीचे निरनिराळे भौतिक संघ असतात) या गोष्टी या अस्तित्वाची विशिष्टता दाखविणाऱ्या आहेत. आमच्या भौतिक अस्तित्वाच्या या सूत्रभूत विशिष्ट गोष्टी प्राणिशरीरांत आम्हाला बंधनरूप होतात; आमच्या अंतरांत जी प्राण व मन हीं श्रेष्ठ तत्त्वें आहेत त्यांना या विशिष्ट बंधनरूप गोष्टींचें जोखड खांद्यावर वागवून पाउलें टाकण्याचा प्रयत्न करावा लागतो : इंद्रियशक्तीच्या व्यापाराला अगदीं संकुचित क्षेत्र; जीवनाच्या व्यापारांना क्षेत्र संकुचित, काल संकुचित, शक्तीहि अल्प; मनाचा व्यापार अंधारांत, खुरडत, लंगडत, मध्यें मध्यें शून्य होत, एकंदरींत अतिमर्यादित असा चालावयाचा; मूळ भौतिक अस्तित्वाच्या बंधनांचें जोखड वागविणाऱ्या श्रेष्ठ तत्त्वांचा म्हणजे प्राणशक्तीचा व मानसिक शक्तीचा असा लंगडालुळा व्यापार अपरिहार्यपणें आम्हाला पहावा लागतो. पण वर सांगितल्याप्रमाणें प्राणशक्ति आणि मन यांचें द्रव्याशीं एकच प्रकारचें नातें असलें पाहिजे किंवा आहे असें नाहीं. द्रव्य आणि संवेदना यांजमधील ज्या संबंधानें भौतिक स्थूल शरीर निर्माण केलें आहे, त्यापेक्षां वेगळेहि संबंध निसर्गांत, विश्वांत
पान क्र. ४७४
आहेत -- तालबद्ध निसर्गांत एकच ताल नाहीं, अनेक ताल आहेत; द्रव्याच्या व द्रव्यसंघांच्या, अनेक श्रेष्ठ-कनिष्ठ अवस्था आहेत. कनिष्ठतम भौतिक विश्वाप्रमाणें त्याहून श्रेष्ठ अशीं विश्वें आहेत; या श्रेष्ठ द्रव्य-अवस्थांचा, या श्रेष्ठ विश्वांचा नियमसंघहि श्रेष्ठ आहे -- मनुष्य हा विकासाची वाटचाल करीत आहे. त्याचें शरीरद्रव्य सध्यांच्या दोषांपासून व उणीवांपासून क्रमश: मुक्त होऊन उच्च प्रतीचें बनत आहे; आमचा आजचा जो देह आहे, आमच्या जीवनाचें जें आजचें साधन आहे त्याजवर वर सांगितलेल्या द्रव्याच्या श्रेष्ठ अवस्थांचें व श्रेष्ठ विश्वांचे नियम, आमचा विकास होऊन त्या विकासाच्या बळावर जर लादतां आले, तर आमचें दिव्य मन व आमची दिव्य इंद्रियशक्ति आमच्या स्थूल देहाच्या द्वारांहि प्रकट होऊं शकेल; आमचें दिव्य आंतरिक जीवन आमच्या शरीराच्या द्वारां बाह्य स्वरूप धारण करूं शकेल; इतकेंच नव्हे, तर आमचें मानवी शरीरदेखील आमच्या विकासाचा एक भाग म्हणून एकप्रकारची दिव्यता धारण करील; या पृथ्वीवर जीवन जगत असतांना या सर्व गोष्टी होऊं शकतील. मानवाच्या शरीराचें रूपांतर दिव्य शरीरांत होईल -- पृथ्वीमाता तिच्यांतील देवत्व, दिव्यत्व आमच्या द्वारां प्रकट करील -- असा संभव भरपूर आहे.
भौतिक जगाचा जो द्रव्यसंभार आहे त्यांतहि जड द्रव्याच्या प्रकारांची चढती श्रेणि आहे; अगदीं खालीं घनतम द्रव्य असतें; पुढें जसें जसें वर चढावें तसें तसें कमी घनद्रव्य लागतें; अगदीं खालीं स्थूलतम द्रव्य आहे व वरतीं चढत्या प्रमाणांत सूक्ष्म सूक्ष्मतर द्रव्य लागतें; या मालिकेंत सगळ्यांत वरची पायरी आम्हीं गांठल्यावर पुढें काय लागतें ? भौतिक जडद्रव्य व भौतिक जडशक्ति ही सगळ्यांत वरच्या थरांत अति सूक्ष्म आकाशाच्या सूक्ष्मतेहूनहि सूक्ष्म अशी असते -- पुढें काय असतें ? अगदीं शून्य पुढें असतें कीं काय ? पुढें सर्व पूर्ण पोकळी आहे कीं काय ? पुढें शून्य नाहीं, पोकळी नाही; आमच्या संवेदनाशक्तीला न आकलन होणारी अशी कांहीं वस्तु पुढें असते; आपल्या मनाला, आपल्या अतिसूक्ष्म जाणीवशक्तीलाहि ती अनाकलनीय आहे, एवढेंच. या अनाकलनीय वस्तूला आम्ही पोकळी म्हणतों; शून्य म्हणतों; अति-सूक्ष्म जड द्रव्याच्या पलीकडे शून्य नाहीं -- खरें शून्य नाहीं; किंवा हें अतिसूक्ष्म जडद्रव्य विश्वाचें शाश्वत असें आरंभक द्रव्यहि नाहीं; आपणास हें ठाऊक झालें आहे कीं, जडद्रव्य, जडशक्ति या वस्तू शुद्ध (चैतन्य) द्रव्य व शुद्ध
पान क्र. ४७५
(चैतन्य) शक्ति यांच्या व्यापाराचा अंतिम परिणाम म्हणून उदयास येतात. या शुद्ध द्रव्याच्या व शुद्ध शक्तीच्या पोटीं जाणीव अथवा चैतन्य असतें आणि या चैतन्याची आत्मजाणीव नित्यप्रकाशमय असते व हें चैतन्य नित्य आत्मतंत्र असतें, जाणीवपुरस्सर आत्मतंत्र असतें; हें चैतन्य (वा जाणीव) जडद्रव्यांत स्वत:ला विसरलेलें असतें, त्याला जणुं झोंप लागते आणि त्याची हालचाल परतंत्र होते; जड द्रव्यांत व शक्तींत जाण्यानें, नेणीव आणि स्वयंगतिशून्यता हे गुण मूळ जाणिवेच्या व जाणीवयुक्त शक्तीच्या ठिकाणीं येतात; अशा भौतिक जडद्रव्याच्या वरच्या पायऱ्यांवर व शुद्धद्रव्याच्या खालच्या पायऱ्यांवर काय असतें ? त्या दोन वस्तूंच्या मध्यभागीं, अशा पायऱ्या अवश्य आहेत; जडतेच्या निरतिशय जाणिवेंतून एकदम चैतन्याच्या निरतिशय जाणिवेंत आम्ही प्रवेश करीत नाहीं, यांत कांहीं संशय नाहीं; नेणीव युक्त द्रव्य आणि पूर्ण आत्मजाणीवयुक्त आत्मविस्तार किंवा जडतत्त्व आणि आत्मतत्त्व या दोन टोंकांच्या वस्तूंच्या दरम्यान अनेक पायऱ्या, द्रव्याच्या अनेक अवस्था असल्या पाहिजेत आणि आहेत.
जडतत्त्वाच्या वरच्या दर्जाच्या आणि शुद्ध चैतन्यतत्त्वाच्या खालच्या दर्जाच्या द्रव्यावस्था कांहीं साधकांनीं अनुभवल्या आहेत. त्यांचा अनुभव असा आहे कीं, भौतिक विश्वाचा जो कायदा आहे तो कायदा या सूक्ष्म, सूक्ष्मतर द्रव्यांस लागू पडत नाहीं. जडतत्त्व, प्राण, मन, अतिमानस (विज्ञान) आणि त्रिमुखी दिव्य सच्चिदानंद ही जशी चढती तत्त्व श्रेणी आहे, त्याप्रमाणें या श्रेणीला अनुरूप अशी चढती द्रव्यश्रेणी आहे. जसें तत्त्व, तसें विश्वांतील त्याच्या आत्म-प्रकटनाला अनुकूल असें खास द्रव्य, अशी एकंदर व्यवस्था आहे. द्रव्य हें तत्त्वाच्या आत्मप्रकटनाचें साधन आहे. प्रत्येक तत्त्व आत्म्याप्रमाणें आणि तदनुकूल द्रव्य त्याच्या देहाप्रमाणें, कोशाप्रमाणें -- अशी विश्वांतील व्यवस्था आहे. जडमय (अन्नमय) आत्मा हा जड (अन्न) शरीराच्या द्वारां पूर्णतया प्रकट होतो; प्राणमय आत्मा प्राणानुकूल सूक्ष्म द्रव्याच्या बनलेल्या प्राणशरीराच्या द्वारां पूर्णतया प्रकट होतो, इत्यादि व्यवस्था विश्वांत आहे.
या भौतिक विश्वांत भौतिक द्रव्याच्या सूत्रावर सर्व व्यवहार आधारलेला आहे. प्राचीनांनीं ज्या भौतिक तत्त्वाला पृथ्वीतत्त्व अशी संज्ञा दिली आहे, त्या तत्त्वावर भौतिक विश्वांतील संवेदना, प्राण, विचार आधारलेले आहेत; त्यांचा आरंभ भौतिक पृथ्वीतत्त्वापासून, त्यांना
पान क्र. ४७६
कायदा भौतिकाचा, त्यांचा व्यापार भौतिकाशीं जुळते घेणारा, भौतिकाची मर्यादा ती त्यांची मर्यादा -- अशी स्थिति आहे. -- कांहीं नव्या गोष्टी त्यांना (संवेदना, प्राण, विचार यांना) करावयाच्या असल्यास, भौतिकाच्या मर्यादा वाढावयाच्या असल्यास या विकासक्रमाच्या कार्यांतहि मूळ सूत्राकडे त्यांना लक्ष ठेवावें लागतें; मूळ सूत्राचा हेतु व दिव्य विकासक्रमाकडून मूळ सूत्राच्या अपेक्षा, या सर्व गोष्टी लक्षांत घेऊन व त्यांना योग्य तो मान देऊन मगच नव्या गोष्टी, भौतिकाच्या मर्यादा वाढविण्याच्या गोष्टी, संवेदना-प्राण-विचार यांना, आपल्या व्यवहारांत आणणें शक्य होतें. संवेदनाशक्ति स्थूल भौतिक इंद्रियांच्या आणि इतर साधनांच्या द्वारां काम करते; प्राणशक्ति ही भौतिक नाडीसंघ आणि जीवनसाहायक भौतिक अवयव यांच्या द्वारां काम करते; मनाला शारीर अवयवांच्या पायावर आपला व्यवहार उभारावा लागतो आणि या व्यवहारासाठीं भौतिक साधनांचा उपयोग करावा लागतो -- मनाची जी शुद्ध क्रिया असते त्या शुद्ध क्रियेला वर दिलेल्या साधनांनीं मिळालेला अनुभवच, आपलें कार्य क्षेत्र म्हणून उपयोगांत आणावा लागतो; या अनुभवाच्या कच्च्या मालावरच आपली इमारत उभारावी लागते. मनाचा, संवेदनाशक्तीचा, प्राणाचा जो स्वभावधर्म आहे त्यानुसार वरीलप्रमाणें भौतिक साधनांवर त्यांनीं अवलंबून रहावें असें नाहीं; भौतिक इंद्रियें कांहीं संवेदना निर्माण करीत नाहींत, उलट हीं इंद्रियें विश्वात्म्याच्या संवेदनाशक्तीनें आपल्या सोईसाठीं निर्माण केलेलीं आहेत; भौतिक नाडीसंघ आणि जीवनअवयव हे कांहीं प्राणाची क्रिया-प्रतिक्रिया निर्माण करीत नाहींत तर विश्वात्म्याच्या प्राणशक्तीनें आपल्या सोईसाठीं त्यांना निर्माण केलें आहे; मेंदू कांहीं विचार निर्माण करीत नाहीं, तर विश्वात्म्याच्या मनानें आपल्या सोईसाठीं तो मेंदू निर्माण केला आहे. संवेदना वगैरेंना या भौतिक विश्वांत भौतिक अवयवांचा उपयोग आवश्यक असतो -- तो कांहीं त्यांना सर्वत्र आवश्यक नसतो. ईश्वरानें, विश्वात्म्यानें आपल्या इच्छेनें या भौतिक विश्वांत संवेदना आणि तिचा विषय यांच्यामध्यें भौतिक नातें निर्माण करण्याच्या हेतूनें भौतिक इंद्रियें निर्माण केलीं आहेत; संवेदना, प्राण, विचार यांना भौतिक साधनांची, अवयवांची पडणारी आवश्यकता म्हणजे ईश्वराच्या विशिष्ट इच्छेचें फळ आहे. ईश्वरानेंच मूळ जाणीवयुक्त शक्तीला या भौतिक विश्वांत, भौतिक द्रव्याचें व नियमाचें बंधन घातलें आहे आणि ती शक्ति या भौतिक
पान क्र. ४७७
नियमानुसार जाणीवयुक्त मूळ अस्तित्वाला विविध भौतिक आकार देते आणि हा भौतिक आकार या विश्वांत विकासाचा आरंभ करणारी, सर्वशासक, सर्वनियंत्रक वस्तु होते. अस्तित्वाचा मूळ पायाभूत नियम, संवेदना-प्राणमन यांनीं भौतिक द्रव्याच्या व नियमांच्या बंधनांत वागावे हा नाहीं -- हें बंधन आतांच सांगितल्याप्रमाणें, एक रचनात्मक तत्त्व म्हणून ईश्वरानें योजिलें आहे; भौतिक द्रव्यानें बांधलेल्या विश्वांत, मूळ चैतन्याला, आत्मतत्त्वाला आपला विकास घडवून आणण्याची इच्छा झाली, म्हणून त्यानें, त्या ईश्वरानें संवेदनादिकांना या भौतिक विश्वापुरती भौतिक अवयवांचीं बंधने निर्माण केलीं.
जड भौतिक द्रव्य ही द्रव्याची सर्वात खालची अवस्था. या द्रव्यांत आकार व जडशक्ति या गोष्टी सर्व व्यवहाराच्या मुळाशीं असतात, सर्व व्यवहारावर सत्ता चालवितात, त्याचें स्वरूप ठरवितात. या भौतिक द्रव्याच्या शेजारचे, वरच्या दर्जाचें जें द्रव्य आहे, तेथें आकार आणि जडशक्ति यांऐवजीं, जीवन (प्राण) आणि जाणीवयुक्त वासना या जेव्हां पायाभूत, प्रधान, निर्णायक गोष्टी असतात, तेव्हां या भौतिक विश्वापलीकडील विश्वाचा पाया, जाणीवयुक्त विश्वव्यापी क्रियाशील जीवनशक्ति प्राणशक्ति तिची भूक आणि तिच्या विविध वासना आणि त्यांचें प्रकटीकरण हा असतो; भौतिक शक्तीचें रूप घेणारी नेणीवमय इच्छा किंवा अर्धजागृत इच्छा, हा काही या वरच्या जगाचा पाया नसतो. या जगांत जाणीवयुक्त प्राणशक्ति ही पायाभूत गोष्ट असल्यानें, जडद्रव्य आणि मन यांना या पायाभूत गोष्टीशीं जमवून घ्यावे लागतें, त्यांचें अंकित होऊन काम करावे लागतें. या जगांत जे आकार, शरीरे, शक्ती, प्राणांचीं आंदोलने, संवेदनाशक्तीच्या हालचाली, विचाराचे व्यापार, विकासक्रम, अंतिम सिद्धी व आत्मपरिपूर्तिरूप घटना घडतात, त्या सर्वांवर जाणीवयुक्त जीवनशक्तीचा छाप अवश्यमेव असतो; ही जीवनशक्ति या सर्व गोष्टींचें स्वरूप ठरवितें व त्यांजवर सत्ता चालविते; जडद्रव्य आणि मन यांना, वर सांगितल्याप्रमाणें या जीवनशक्तीचें अंकित होऊन काम करावे लागतें; या जीवनशक्तीस मूळ आधार करून आपला व्यवहार आरंभावा लागतो; या शक्तीच्या मर्यादांनीं मर्यादित व्हावें लागतें; अर्थात् या शक्तीच्या ज्या नियमावली, पात्रता, क्रिया सामर्थ्यें असतील, तीं जडद्रव्याचें संकुचित क्षेत्र वाढवितील, मनाचें विशाल क्षेत्र संकुचित करतील; या जीवनशक्तीच्या जगांत मनाला आपल्या शक्ती
पान क्र. ४७८
वाढविणें असेल, तर वासनशक्ति हा जो जीवनशक्तीचा मूळ कायदा, तो मनानें लक्षांत घेतला पाहिजे; या कायद्याचा हेतु ध्यानांत घेतला पाहिजे आणि दिव्य आत्मतत्त्वाचें प्रकटीकरण हा मनाचा हेतु असला, तरी जीवनशक्तीच्या वासनांना प्राधान्य देऊन त्या वासनांना झेपेल एवढेंच दिव्यतेचें प्रकटीकरण त्यानें केलें पाहिजे; अर्थात् त्या वासनांचें साधेल तेवढेच उदात्तीकरण करणें हेंहि मनाचेंच काम आहे.
प्राणद्रव्य हें जसें भौतिक द्रव्याहून वरच्या दर्जाचें, तसें मनाचें द्रव्य प्राणद्रव्याहून वरच्या दर्जाचें आहे. भौतिक विश्वांत भौतिकद्रव्य प्रधान, प्राणमय जगांत प्राणद्रव्य प्रधान, तसें मनोमय जगांत मनोद्रव्य प्रधान. या मानसिक द्रव्याचें नियंत्रण मनानें करावयाचें असतें. मन जे आकार योजील, ते आकार हें मनोद्रव्य घेऊं शकतें आणि घेतें -- हें द्रव्य प्राणद्रव्याहूनहि सूक्ष्म आणि लवचिक असतें. हें द्रव्य मनाचे व्यवहार-नियम पाळते; मनाची आत्मप्रकटीकरणाची, आत्म-परिपूर्तीची मागणी पुरवितां येईल, अशा रीतीनें मनाचें प्रमुखत्व मान्य करून, हें द्रव्य आपलें कार्य करतें; संवेदना आणि द्रव्य यांचीं नातीं द्रव्याच्या सूक्ष्मतेनुरूप सूक्ष्म आणि लवचिक असतात; भौतिक इंद्रियें आणि भौतिक पदार्थ यांच्या संबंधांप्रमाणें मनोमय जगांतलें मन आणि पदार्थ यांचे संबंध बिनलवचिक व कठीण नसतात; मन जसें सूक्ष्म, तसे त्याचे विषयीभूत पदार्थ, तत्त्वें, विषयीभूत द्रव्य हेंहि सूक्ष्म असतें; या सूक्ष्म द्रव्यावरच मनाचें कार्य होत असते. अशा मनाच्या जगांतील जीवन (प्राण) मनाचें सेवक असतें; आमच्या भौतिक जगांत आमच्या मनाचे व्यापार दुबळे असतात आणि आमच्या प्राणशक्तीचे व्यवहार मर्यादित, खडबडीत, बंडखोरपणाचे असतात : असल्या भौतिक जगांत, प्राणशक्ति आणि मन यांचें जें नातें असतें त्यावरून मनोमय जगांतल्या त्यांच्या परस्परनात्याची कल्पना करतां येणार नाहीं. मनाच्या जगांत मन प्रबळ असतें आणि प्राणशक्ति त्याच्या सेवेचें काम नम्रपणें करते. मनाच्या जगांत मनाची सत्ता चालते; मूळ व्यवहारसूत्र मन हें असतें; मनाचें प्रयोजन, सर्व प्रयोजनांहून श्रेष्ठ मानलें जातें, मनाची जी मागणी असेल, ती दुसऱ्या सर्व मागण्या मागें सारून पुरवावीं लागते; विश्वांत दिव्यतेचा जो कशा आविष्कार नियोजित आहे, त्या आविष्कारांत मनाचें प्रभुत्व सर्वप्रथम, सर्वश्रेष्ठ मानून व्यवहार होत असतो. (ज्याप्रमाणें भौतिक जगांत भौतिक रूपाचें प्रभुत्व, प्राणाच्या जगांत प्राणाच्या वासनेचे प्रभुत्व, तसें मनाच्या जगांत मनाच्या
पान क्र. ४७९
मताचें प्रभुत्व) मनाच्या वरचें जग, मनापेक्षां श्रेष्ठ अशा तत्त्वाला, विज्ञानाला (अतिमानसाला) प्राधान्य देतें -- विज्ञानानें भारलेलीं, विज्ञानापेक्षां कमी दर्जाचीं पण मनाहून वरच्या दर्जाचीं तत्त्वें, विज्ञान आणि मन यांच्या मधल्या विश्वविभागांत प्रधानपदस्थ असतात; विज्ञानाच्या वरतीं, शुद्ध आनंद, शुद्ध जाणीवशक्ति, शुद्ध अस्तित्व हीं तत्त्वें क्रमश: प्रधान असतात : विश्वाचे, मनाच्या वरचे विज्ञानलोकादि विभाग हे प्राचीन वैदिक ऋषींनीं, प्रकाशमय दिव्य अस्तित्वाचीं क्षेत्रें म्हणून वर्णिले आहेत. या प्रकाशमय विश्वविभागांत वा विश्वांत अमर जीवन आहे -- हींच विश्वें अमरत्वाला मूलाधार आहेत. अर्वाचीन भारतीय धर्मांनीं या अमरताप्रधान विश्वांना ब्रह्मलोक, गोलोक इत्यादि नांवें दिलीं आहेत. मूळ जी चैतन्य सत्ता, आत्मसत्ता ती आपलें आविष्करण सर्वोच्च पायरीवर गोलोक-जीवन, ब्रह्मलोक-जीवन या स्वरूपांत करते. या सर्वोच्च आत्मस्वरूपाची आत्मजीवनाची प्राप्ति, जो विकासशील आत्मा करून घेतो, तो सर्वबंधमुक्त होतो आणि सर्वश्रेष्ठ पूर्णतेला प्राप्त होतो -- शाश्वत देव-देवत्वाचें निरतिशय सुख आणि असीम अनंत जीवन त्या आत्म्याला लाभतें. याप्रमाणें अन्नलोक किंवा जडलोक, प्राणलोक, मनोलोक, विज्ञानलोक, आनंदलोक, चित्लोक (ज्ञानलोक), सत्-लोक (सत्यलोक) अशी एकंदर लोकांची व्यवस्था आहे आणि जडलोकांत उतरलेला आत्मा, पुन: विकासक्रमानें सत्-लोकांत (सत्यलोकांत) पोंचतो, अशी दिव्य विचारसरणी आहे.
आमचें भौतिक जग सर्वांत खालीं आणि त्याजवर सारखीं एकापेक्षां एक श्रेष्ठ अशीं जगें -- त्यांत श्रेष्ठ आणि श्रेष्ठतर असा अनुभव आणि साक्षात्कार -- ही जी व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेचें प्रमुख तत्त्वच हें आहे कीं, विश्वांतील जीवन हें तालबद्ध संगीतमय जीवन आहे -- मात्र या जीवनांतील ताल व संगीत साधें सरळ नसून गुंतागुंतीचें, संकीर्ण व संमिश्र असें आहे; आमचें सामान्य मानवी मन आणि जीवन ज्या मर्यादित जाणिवेच्या कोंडींत कमीअधिक समाधानानें व्यतीत होत असतें व व्यवहार करीत असतें, त्या कोंडीच्या मर्यादांनीं विश्वांतील जीवन मर्यादित होत नाहीं. अस्तित्वाची उंचच उंच अशी जणुं शिडी आहे; या शिडीला अनेक पायऱ्या आहेत; अस्तित्व आणि त्याचे सहयोगी जाणीव, शक्ति व द्रव्य यांची तळपायरीवर अवस्था काय असते ती आम्ही जाणतोंच. तळपायरी आमचें भौतिक अस्तित्व व त्याचे सहयोगी यांचें स्थान; हेंच आमचें भौतिक विश्व. या तळपायरीच्या वर अनेक पायऱ्या आहेत;
पान क्र. ४८०
प्रत्येक पायरीवर तिच्या खालच्या पायरीपेक्षां, अस्तित्व अधिक विस्तृत क्षेत्राचें असतें; जाणीव विस्तारानें, विशालतेनें व आनंदानें अधिक संपन्न असते; शक्तीमध्यें तीव्रता, वेग आणि कार्यक्षमतेचें सुख अधिक असतें. द्रव्य अधिक सूक्ष्म, लवचिक, हलकें व वांकणारें असें असतें -- त्याचें मूळ स्वरूप, जें चैतन्य-द्रव्य, त्या मूळ स्वरूपाचे गुण वरच्या वरच्या पायरीवर अधिकाधिक प्रमाणानें तें आपल्या ठिकाणीं व्यक्त करतें. द्रव्यांत सूक्ष्मतेच्या प्रमाणांत शक्तीचें प्रमाण असतें; जें द्रव्य अधिक सूक्ष्म, तें अधिक शक्तिमान् अशी व्यवस्था आहे; अधिक शक्तिमान म्हणजे वस्तुत: अधिक व्यवहारक्षम म्हणतां येईल -- कारण अधिक स्थूल द्रव्याला बंधनें अधिक, आणि अधिक सूक्ष्म द्रव्याला बंधनें कमी, टिकाऊपणा अधिक, आणि त्याचें मूळ अस्तित्व जसें अधिक टिकाऊ आणि कमी बंधनाचें, तसें त्याचें सरूप व साकार अस्तित्व अधिक व्यापक -- कारण तें अधिक मृदु आणि लवचिक असल्यानें त्याचे अनेक आकार सहज करतां येतात. अस्तित्व हें जणुं अनेक पठारें एकावर एक असलेल्या टेंकडीसारखें, डोंगरासारखें आहे; अधिक वरच्या पठारावर अधिक विस्तृत अनुभव मिळतो, अधिक उंच अशी जाणिवेची पातळी प्राप्त होते, अधिक संपन्न असें विश्व, आम्हांला जीवन जगण्यासाठीं लाभतें.
आमचें जें भौतिक जीवन आहे त्या जीवनांत, दिव्यतेच्या दृष्टीनें, कमीअधिक होण्याची शक्यता, या वर वर्णिलेल्या चढत्या तत्त्वश्रेणीमुळें, द्रव्यश्रेणीमुळें कितपत आहे ? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. वर वर्णिलेल्या श्रेणींतील प्रत्येक जाणीव-भूमिका, प्रत्येक जीवन-विश्व, प्रत्येक द्रव्य-प्रकार, प्रत्येक विश्व-शक्तिप्रकार -- या वस्तू, श्रेणींतील खालच्या आणि वरच्या, अगोदरच्या आणि नंतरच्या स्ववर्गीय वस्तूंपासून सर्वथा तुटलेल्या असतील, तर या श्रेणीमुळें आमच्या भौतिक जीवनांत, दिव्यतेच्या दृष्टीनें, कांहींहि कमीअधिक होऊं शकणार नाहीं; परंतु श्रेणीतील वस्तू एकमेकींपासून तुटलेल्या नाहींत. विश्व किंवा विश्वसंघ हा सर्व, एका चैतन्याचा एकसंधी आविष्कार आहे; हा आविष्कार साधा, सरळ, एकरंगी, एकढंगीं नाहीं; -- अनेक तत्त्वें यांत गुफलेलीं आहेत; नाना रंगांच्या धाग्यांची, गुंतागंतीच्या वेलबुट्टीची शाल असावी तसें हें चैतन्याचें विश्व-वस्त्र आहे, यांत एकाच तत्त्वाची सरळ वीण कोठेंहि नाहीं; प्रधान प्रकट वीण एका तत्त्वाची, इतर सर्व तत्त्वें त्यांत गौणत्वानें, गुप्तत्वानें गुंफलेलीं -- अशी प्रत्येक तत्त्वाची व्यवस्था या विश्ववस्त्रांत आहे. एक अखंड वस्त्र असावें
पान क्र. ४८१
तसा हा अखंड चैतन्याविष्कार विश्वपसाऱ्याच्या रूपानें आपणासमोर उभा आहे. आमचें हें भौतिक विश्व, इतर सर्व विश्वांचा परिणाम म्हणूनच अस्तित्वांत आलें आहे; कारण जडेतर सर्व तत्त्वें जडांत उतरल्यानेंच जडतत्त्वाचें हें विश्व निर्माण झालें आहे; जडाचा प्रत्येक कण, हीं सर्व जडेतर तत्त्वें आपल्या पोटीं सामावून आहे; जडाची, जड कणाची प्रत्येक हालचाल ही, प्रत्येक क्षणीं, हीं जीं जडेतर तत्त्वें त्याच्या पोटीं लपलेलीं आहेत त्या तत्त्वांच्या व्यापारावर अवलंबून असते. जडतत्त्व हें, खालीं उतरलेल्या चैतन्याचें सर्वांत खालचें, तळचें रूप आहे; अर्थात् जडीभूत चैतन्याच्या विकासाचा आरंभ, या जडाच्या हालचालीपासून आहे -- जडाच्या अस्तित्वांत, जडेतर सर्व ज्ञानभूमी, जीवनक्षेत्रें, द्रव्यप्रकार व शक्तिप्रकार, आपापल्या धर्मासह गुप्तरूपानें जें अंतर्भूत आहेत ते सर्व, जडांतून विकास-क्रमानें प्रकट होण्याच्या या सामर्थ्यानें युक्त आहेत. यासाठीं जडतत्त्वाचा संसार अनेक वायू, अनेक रासायनिक संयुक्त पदार्थ, अनेक भौतिक शक्तिप्रकार, अनेक भौतिक हालचाली, अनेक सूर्य, पृथ्वीसारखे अनेक ग्रह, अनेक तेजोमेघ -- एवढ्यानें संपत नाहीं; तर या संसारांत प्राणतत्त्वाचा विकास, मनाचा विकास, शेवटीं विज्ञानाचा किंवा अतिमानसाचा विकास आणि त्याच्याहि वरतीं असलेल्या, आनंद, ज्ञान व सत्ता या सच्चिदानंदाच्या तत्त्वत्रयीचा विकास अंतर्भूत धरला पाहिजे. -- जडांत प्राणाचा उदय, प्राणांत मनाचा उदय -- वगैरे विकासक्रम घडून येतो कसा, याचा विचार केल्यास असें दिसतें कीं, हा विकासक्रम घडून येण्यास जडाच्या पातळीवर जडेतर उच्च पातळ्यांचें, सारखें अप्रतिहत दडपण येत असतें. जडाच्या पोटांत जीं जडेतर तत्त्वे दडून असतात, तीं तत्वें जडानें आपल्या पोटांतून बाहेर दवडावीं, असें जडेतरांचें दडपण जडावर सारखें येत असल्यानें जडेतर तत्त्वें जडांतून क्रमशः उदयास येतात, वाढतात व आपल्यांतून आपल्यापेक्षां उच्च तत्त्वांना प्रकट करतात. हें जडेतर भूमिकांचें दडपण जडावर न येतें, तर जडाच्या कठीण कवचांतून कदाचित् जडेतरांचा उदय, विकास झाला नसता, जडेतर तत्त्वें कायमचीं जडाच्या बंदिखान्यांत कोंडलेलीं राहिलीं असतीं, अशी कल्पना होणें शक्य आहे; पण ही कल्पना तितकीशी सयुक्तिक नाहीं -- कारण जडेतर तत्त्वें जडाच्या पोटांत येऊन राहिलीं -- याचा अर्थ तीं तत्त्वें त्या जडांतून बाहेर येऊन आपला विकास करण्याकरितां राहिलीं, असाच खरोखर होतो; तथापि जडेतर पातळ्यांचें जडावर दडपण येत नसतांहि जडांतून जडेतर तत्त्वें केव्हांतरी वर आलीं
पान क्र. ४८२
असतीं, हें जरी खरें असलें, तरी हें दडपण वास्तवांत येत असतें आणि जडेतर तत्त्वें जडांतून बाहेर येण्यास या दडपणाचा पुष्कळ उपयोग होतो हेंहि खरें आहे.
प्राण, मन, अतिमानस, आत्मचैतन्य (सच्चिदानंद) या, जडाच्या वरच्या तत्त्वांना जडतत्त्व आपल्या पोटांतून उदयास आणतें, तें नाखुषीनें आणतें आणि हीं तत्त्वें जडांतून जडाचे ठिकाणीं उदयास आलीं तरी जडाच्या क्षेत्रांत त्यांचा फारसा विकास होत नाहीं, होऊं शकत नाहीं. या तत्त्वाचें दर्शन जडांत आपणांस घडूं शकतें, अल्पसा विकासहि जडाच्या क्षेत्रांत होऊं शकतो -- आणि अल्पशा विकासावरच या तत्त्वांना जडाच्या क्षेत्रांत संतुष्ट रहावें लागतें, असें वाटण्याचा संभव आहे; पण वस्तुस्थिति अशी नाहीं. हीं जडेतर तत्त्वें जडांतून वर आलीं, जागृत झालीं, आपआपली शक्ति किती आहे, कोणती आहे हें त्यांना कळूं लागलें, त्या शक्तीचा तीं उपयोग करूं लागलीं व हा उपयोग अधिकाधिक करावा असें त्यांस वाटूं लागलें (आणि हें सर्व क्रमश: घडून येतेंच) कीं उच्च जडेतर पातळ्यांचें त्यांजवरचें दडपणहि वाढत जातें, त्या जडपणाची शक्ति वाढते, चिकाटी वाढते, परिणामकारकता वाढते. सर्व विश्वें, जड व जडेतर, एकमेकांशीं अगदीं लागून आहेत, एकमेकांवर अवलंबून आहेत; म्हणून वर सांगितल्याप्रमाणें त्या त्या जडेतर विश्वाचें दडपण त्याच्या त्याच्या प्रधान तत्त्वावर व इतर जागृत तत्त्वांवरहि वाढत्या प्रमाणांत येत राहून त्या सर्वांचा सारखा विकास होत राहतो. खालून जडांतून हीं जडेतर तत्त्वें जडांत प्रकट होतात; अर्थात् हा त्यांचा आविष्कार मर्यादित आणि विशिष्ट बंधनांनीं बद्ध असा असतो -- पण त्याबरोबर वरच्या भूमिकांवर, आपापल्या विशिष्ट क्षेत्रांत काम करीत असलेलीं हीं जडेतर तत्त्वें आपल्या विशिष्ट सामर्थ्यासह जडपुरुषांत उतरणें अपरिहार्य असतें आणि तीं उतरून आपलें पूर्ण तेज, जडपुरुषांत आणतात. या जडेतर तत्त्वांच्या क्रिया, जडामध्यें विकासक्रमानें अधिकाधिक व्यापक होत जातात आणि या क्रियांना जडपुरुषांत जागा मिळणें अवश्य असतें, अपरिहार्य असतें; योग्यतऱ्हेचें पात्र, माध्यम वा साधन, जडेतरतत्त्वांच्या व्यापक होत जाणाऱ्या या व्यापारांना मिळालें कीं तीं तत्त्वें आपला संसार वाढवीत जातात -- आणि असें माध्यम मनुष्याच्या शरीरांत, प्राणांत, जाणिवेंत जडेतर तत्त्वांना उपलब्ध होतें.
स्थूल शरीराच्या ज्या कार्यमर्यादा, शक्तिमर्यादा आहेत, त्या मर्यादांनीं
पान क्र. ४८३
मनुष्याच्या शरीर-प्राण-मनाची ही त्रयी बांधली गेली असेल, तर (आणि या मर्यादांचें बंधन स्थूल भौतिक इंद्रियें आणि भौतिक मेंदूचें मन यांना सर्वथा मान्य आहे) जडेतर तत्त्वांचा विकास जडांत फारच अल्पप्रमाणांत होऊं शकेल; आणि आज जें जीवन मनुष्य जगत आहे, त्यापेक्षां तत्त्वत: श्रेष्ठ असें जीवन जगण्यासारखी पात्रता त्याला आपल्या ठिकाणीं आणतां येण्याचा संभव जवळजवळ मुळींच असणार नाहीं; पण वस्तुस्थिति अशी आहे कीं, हें जें आमचें स्थूल शरीर आहे, तें आमच्या भौतिक अस्तित्वाचा एक अंश आहे, आमचें शरीरद्रव्य सर्वच कांहीं घनद्रव्य -- स्थूल शरीरद्रव्य -- नव्हे. प्राचीन गुप्तविद्येनें ही गोष्ट शोधून काढली होती. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय किंवा आत्मिक -- अशा पांच आत्म्यांचा मनुष्य बनला आहे, असें मनुष्याच्या अस्तित्वाच्या पांच पाय-यांचें किंवा पातळ्यांचें वर्णन जुन्या वेदांतांत आहे. मनुष्याचा आत्मा जसा पांच आत्मिक अवस्थांचा आहे, तसें प्रत्येक आत्मिक अवस्थेला अनुरूप असें द्रव्य आहे आणि आपल्या अनुरूप द्रव्याच्या बनलेल्या शरीरांत प्रत्येक अवस्थेंतील आत्मा राहतो. जुन्या अलंकारिक भाषेंत या शरीरांना कोश अशी संज्ञा दिली आहे. अर्वाचीन भारतीय मानसशास्त्रानें या पांच कोशांचा तीन देहांत अंतर्भाव केला आहे; स्थूल, सूक्ष्म आणि कारण देह; आत्मा या सर्व देहांत राहतो, एकाचवेळीं या सर्व देहांत त्याचें वास्तव्य असतें; आपल्याला, म्हणजे आपल्या बाह्य जाणिवेला स्थूल जड शरीराचेंच भान सांप्रत काळीं, सांप्रत स्थळी असतें -- पण आमच्या दुसऱ्या देहांत, तसा प्रयत्न केल्यास आम्ही जाणीवपूर्वक काम करूं शकतो व या आमच्या जडेतर शरीराचे आणि जड स्थूल शरीराचे संबंध तोडणारा पडदा दूर होऊं शकतो; हा पडदा दूर होऊन आमच्या अंगभूत शारीर, मानसिक, विज्ञानमय व्यक्तींमध्यें किंवा आत्म्यांमध्यें अन्योन्यसंबंध स्थापित झाल्यानें कांहीं गूढ घटना, कांहीं मानसिक चमत्कार घडतात : या घटनांचा व चमत्कारांचा अभ्यास अधिकाधिक प्रमाणांत होऊं लागला आहे, तरीपण एकंदरीनें हा अभ्यास अद्याप अल्प आणि अव्यवस्थित असाच आहे; मात्र या चमत्कारांचा व गूढ घटनांचा स्वार्थासाठीं खूप उपयोग केला जात आहे. भारतांतले जुने तांत्रिक आणि हठयोगी यांनीं फार पूर्वींच, मानवी जीवनाचे आणि शरीराचे जे श्रेष्ठ प्रकार आहेत, त्यांच्या अभ्यासाचें एक शास्त्रच बनविलें होतें. आमच्या स्थूल शरीरांत सहा नाडीमय जीवनकेंद्रें आहेत, आमच्या सूक्ष्म शरीरांतील सहा जीवन-
पान क्र. ४८४
गत आणि मानसिक शक्तिकेंद्रांचा या सहा स्थूल केंद्राशीं निकट संबंध आहे व तो क्रमवार आहे हें त्यांनीं शोधून काढलें होतें; असे सूक्ष्म शारीरिक व्यायामहि त्यांनीं शोधून काढले होते कीं, त्यांच्या योगानें आज बंद असलेलीं स्थूल जीवनकेंद्रें उघडतां येतात आणि स्थूल जीवनाहून श्रेष्ठ असें सूक्ष्म जीवन आम्हांला जगतां येतें; असेंहि व्यायाम त्यांनीं शोधले होते कीं, त्यांच्या आश्रयानें विज्ञानमय आणि आनंदमय (आत्मिक) जीवनाचा अनुभव, ज्या शारीर आणि प्राणिक अडचणींमुळें आम्हांला घेतां येत नाहीं, त्या अडचणी समूळ दूर करतां येतात. हठयोगी आपल्या अभ्यासानें स्थूल भौतिक प्राणशक्ती आपल्या अंकित करतात, ही गोष्ट अनेक उदाहरणांनीं सिद्ध झालेली आहे. हठयोग्यांनीं प्राणशक्ति आपल्या अंकित केल्यामुळें, भौतिक शास्त्रानें शारीर जीवनाचें जे नियम म्हणून निश्चित केले आहेत, मान्य केले आहेत, त्यापैकीं कांहीं सामान्य नियमांचें बंधन हठयोग्यांना असत नाहीं, ही गोष्ट अनेक हठयोग्यांनीं प्रत्यक्षांत दाखविली आहे. वर जे नियम म्हणून सांगितले, ते नियम म्हणजे शारीर जीवनाच्या सर्वसाधारण संवयी होत. त्या संवयी हठयोगी जुमानीत नाहींत, विशिष्ट अभ्यासानें बदलून टाकतात व आम्हां सामान्य माणसांना चमत्कार वाटण्यासारख्या गोष्टी करून दाखवितात.
भौतिक-मानसिक असें जें प्राचीनांचें विज्ञान आहे, त्या विज्ञानानें, शास्त्रानें शोधून काढलेल्या गूढ गोष्टी वर सांगितल्या आहेत. या गोष्टींच्या पाठीमागें, त्या शक्य करणारी जी महान् गोष्ट आहे, आमच्या अस्तित्वाच्या संबंधींचा जो महान् नियम आहे तो हा कीं, आमच्या अस्तित्वाचा (जीवनाचा) आकार, त्या जीवनाची जाणीव, त्यांत अंतर्भूत असणारी शक्ति विकासक्रमांत आज कोणत्याहि तात्पुरत्या स्वरूपाची असो -- या वैशिष्ट्यांनी युक्त अशा आजच्या आमच्या बाह्य अस्तित्वाच्या (जीवनाच्या) पाठीमागें (आंत) त्याहून श्रेष्ठ, त्याहून अधिक वास्तव, अधिक सत्यमय असें आमचें अस्तित्व असलें पाहिजे आणि आहे -- आणि त्या अधिक सत्यमय अस्तित्वाचा एक बाह्य परिणाम म्हणजे आमचें भौतिक अस्तित्व आहे, भौतिक इंद्रियांना ग्रहण करतां येण्यासारखा एक देखावा आहे. आम्हांला भौतिक स्थूलद्रव्याचें शरीर आहे, पण आमच्या आत्म्याचा साधनभूत द्रव्यसंभार सर्व कांहीं स्थूल शरीरांत संपतो असें नव्हे; पार्थिव स्तंभ म्हणा, पाया म्हणा, असें हें स्थूल शरीर आहे -- आत्म्याच्या विकासाची इमारत या पायावर, या स्तंभावर उभारलेली
पान क्र. ४८५
आहे; विकासाचें भौतिक आरंभस्थान होणें, हें या स्थूल शरीराचें नियत कार्य आहे. आमची जागृतींतील मानसिक जाणीव एवढीच कांहीं आमची जाणीव नव्हे, तर तिच्या पाठीमागें, आंत तिच्यापेक्षां पुष्कळच अधिक व्यापक क्षेत्रांचे जाणिवेचे अनेक थर आहेत; ह्यांतील आमच्या बाह्य जाणिवेच्या खालच्या दर्जाचे कांहीं थर तिच्या खालीं आहेत, कांहीं वरच्या दर्जाचे तिच्या वर आहेत -- वरचे आणि खालचे दोन्ही प्रकार आमच्या जाणिवेच्या कक्षेंत नसल्यानें, आम्हांला सामान्यत: त्यांचें भान नसतें; कधीं कधीं कांहीं असामान्य गोष्ट घडून या अज्ञात अननुभूत जाणीव-प्रकारांचा अनुभव आम्हांला येतो. ही जशी आमच्या जाणिवेची गोष्ट आहे, तशीच आमच्या जाणिवेच्या साधनभूत आवरणाची, देहाची गोष्ट आहे; आमच्या स्थूल देहापाठीमागें, त्याच्या आंत सूक्ष्म, सूक्ष्मतर, सूक्ष्मतम द्रव्याचे देह आम्हांला आहेत; या देहांची शक्ति, त्यांचे व्यवहार-नियम हे स्थूल देहापेक्षां अधिक सामर्थ्यवान्, अधिक बारकाईनें काम करणारे आहेत; आमच्या स्थूल देहाला त्यांचा आधार आहे; त्या आंतरिक सूक्ष्म देहांना त्यांच्या त्यांच्या विशिष्ट जाणिवांचें साधन म्हणून काम करावें लागतें -- या आंतरिक विविध प्रकारच्या उच्चतर जाणिवांच्या क्षेत्रांत विशिष्ट अभ्यासानें आम्हांला प्रवेश मिळतो; हा प्रवेश मिळाल्यावर, या जाणिवांचीं जीं श्रेष्ठ शक्तीचीं व सूक्ष्म नियमानें कार्य करणारीं शरीरें व शरीरद्रव्यें आहेत, त्यांच्या शक्तीचा व नियमांचा प्रभाव आमच्या स्थूल भौतिक द्रव्याच्या शरीरावर पाडतां येतो आणि त्यायोगें आमचें आजचें क्षुद्र आणि पाशवी वासनांनीं आणि संवयींनीं व्यापलेलें आणि अनेक मर्यादांनीं मर्यादित असलेलें भौतिक शरीर, बदलून टाकून त्याचे जागीं अधिक विशुद्ध, उच्चतर असें भौतिक शरीर आम्हांला बनवितां येतें. इत्यर्थ असा कीं, आजच्या शरीरांतून उदात्त, दिव्य भौतिक शरीर विकसित होईल ही कल्पना स्वप्न नव्हे, भ्रम नव्हे; आजचें मानवाचें भौतिक शरीर अनेक मर्यादांच्या व बंधनांच्या कोंडींत आहे; पशूप्रमाणें जन्मणें, पशूप्रमाणें जगणें, पशूप्रमाणें मरणें; भरणपोषण अवघड, प्रकृतींत बिघाड होणें सोपें, रोग जडणें सोपें; गुलामगिरी क्षुद्र आणि अतृप्त वासनांची; -- अशा प्रकारचें आजचें मानवी भौतिक शरीर हें कांहीं न बदलू शकणारे असें शरीर नव्हे; यांतून उदात्त, दिव्य, भौतिक शरीर मानवाला प्रयत्नानें उदयास आणतां येईल, ही कल्पना भ्रम नव्हे, स्वप्न नव्हे, तर ती, वर वर्णिलेली द्रव्याच्या व द्रव्यगत ''आत्म्याच्या'' चढत्या
पान क्र. ४८६
श्रेणीची व्यवस्था लक्षांत घेतां पूर्णपणें बुद्धिगम्य, बुद्धिमान्य तात्विक सत्यावर आधारलेली आहे.
आमचा प्राणमय आत्मा, मनोमय आत्मा जर आम्हांला क्रमानें विकसित करून दिव्य करतां येतो, तर आमचा अन्नमय आत्माहि दिव्य करतां आला पाहिजे ही गोष्ट तर्कशुद्ध विचारसरणीला धरून आहे. कारण हे सर्व आत्मे एकमेकांशीं अखंडपणें संलग्न आहेत. अर्थात् यांपैकीं दोघांना दिव्यतेची शक्यता असावी आणि तिसऱ्याला ती नसावी हें युक्तीला, तर्काला धरून नाहीं. आत्मदृष्टीनें भौतिक जीवनापासून आरंभ करून चढत चढत मनुष्य अतिमानसिक जीवन गांठतो, तेव्हां हेंहि शक्य असलें पाहिजे कीं, या चढत्या आत्म्याचें व्यवहार-साधन जें द्रव्य किंवा द्रव्यात्मक शरीर, तेंहि चढत्या प्रमाणांत सूक्ष्म व अधिक कार्यक्षम होत असावें -- कारण हें जें विज्ञानमय अतिमानसिक आत्म्याचें शरीर तें याप्रमाणें मानसिक शरीरापेक्षां अधिक सूक्ष्म, अधिक कार्यक्षम असलें पाहिजे आणि आहे. अतिमानस किंवा विज्ञान हें त्याच्या खालच्या मानवी आत्म्यावर सत्ता चालवितें, प्राणमय आत्मा आणि मनोमय आत्मा या विज्ञानमय आत्म्याच्या मार्गदर्शनाखालीं व नियंत्रणाखालीं दिव्यता धारण करतो -- अर्थात् हें शक्य असलें पाहिजे कीं, अतिमानसिक शरीरद्रव्याचा, शरीरशक्तीचा भौतिक द्रव्यावर, भौतिक शरीरावर परिणाम होऊन त्याच्या ज्या मर्यादा आहेत, त्या मर्यादा नष्ट व्हाव्या आणि त्यालाहि दिव्यता प्राप्त व्हावी. हें सर्व सिद्ध होणें याचा अर्थ, अगदीं अनिर्बंध अशी जाणीव विकसित होणें, मन आणि संवेदनाशक्ति भौतिक अहंच्या भिंतींच्या कोंडींतून मोकळी होणें, भौतिक इंद्रियें देतील तेवढ्या ज्ञानाच्या क्षुद्र पायावर मनाला आणि संवेदनाशक्तीला जी आज आपली कसरत करावी लागते ही स्थिति पालटून भौतिक इंद्रियांच्या कोंडींतूनहि त्यांची मोकळीक होणें, जीवनशक्ति मर्त्य अशा भौतिक मर्यादांच्या बंधनांतून पायरीपायरीनें मुक्त होणें, दिव्यतासंपन्न आत्म्याला योग्य असें त्याचें भौतिक जीवन होणें, अर्थात् त्यानें मरणावर मात करणें, पार्थिव अमरता मिळविणें -- इतक्या गोष्टी घडून येणें असा आहे. आमची आजची जी शरीरकोटी, शरीराची चौकट आहे, तिलाच जीवनानें कायम चिकटून राहणें, असा पार्थिव अमरतेचा, मरणावर मात करण्याचा अर्थ नाही, तर भौतिक शरीराचा जो कायदा आहे, त्या कायद्याच्या बंधनांतून मोकळें होणें असा पार्थिव अमरतेचा अर्थ आहे. मन आणि प्राण यांजबरोबर पार्थिव शरीरालाहि दिव्य-द्रव्यसंपन्नता आणि दिव्य कार्यक्षमता प्राप्त
पान क्र. ४८७
होणार आहे हें निश्चित; कारण वस्तुत: मूळ दिव्य सत्तेचा, अस्तित्वाचा आनंद बरोबर घेऊन अमरतेचा प्रभू आपल्या मूळ सर्वातीत स्थानावरून उतरून खालीं येत आहे; आमचें वसतिस्थान जीं मनोयुक्त, जीवयुक्त जडद्रव्याचीं पात्रें, त्या पात्रांत तो प्रभु, त्या आपल्या परम आनंदाची सुधा, सोम या गूढ नांवानें प्रसिद्ध असलेली सुधा, ओतीत ओतीत खालीं येत आहे; सौंदर्यसंपन्न, अमरत्वसंपन्न असा तो आनंदमय, आनंदरूप प्रभु आमच्या द्रव्यघटित कोशांत प्रवेश करीत आहे, आमचें अस्तित्व, स्वभाव, जीवन सर्वथा सर्वांगांनीं संपूर्ण समग्र रूपांतरित दिव्यतासंपन्न करून टाकण्यासाठीं तो आमच्या द्रव्यमय कोशांत प्रवेश करीत आहे.
पान क्र. ४८८
Home
Sri Aurobindo
Books
SABCL
Marathi
Share your feedback. Help us improve. Or ask a question.