Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics, expounding a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth.
Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.
प्रकरण दहावें
चिन्मय शक्ति
ध्यानयोगाच्या आश्रयानें त्यांनीं देवाची आत्मशक्ति पाहिली. ही शक्ति तिच्या गुणांनीं -- तिच्या ज्ञानयुक्त क्रिया-प्रक्रियांनीं खोल ठिकाणीं झांकून टाकलेली, अतिगूढ केलेली अशी त्यांना दिसली.
- श्वेताश्वतर १.३
जे झोंप घेतात, जे झोंपेंत असतात, त्यांच्यामध्यें त्यावेळीं जागा असणारा, जागा राहणारा जो हा पुरुष तोच ब्रह्म.
- कठोपनिषद ५.८
जें कांहीं साकार रूपात्मक अस्तित्व आहे, त्याचें मूळ, शक्ति हें आहे. जेव्हां या शक्तीची क्रिया सुरूं होते, तेव्हां ही क्रियाशील शक्ति कमी अधिक भौतिक, कमी अधिक स्थूल किंवा सूक्ष्म रूपें व आकार धारण करते आणि हें आकार व हीं रूपें ती शक्ति आपल्या अनुभवाचा विषय करते. स्वत: निराकार शक्ति साकार होऊन आपला आपण अनुभव घेते. साकार अस्तित्वाचा हा कायदा आणि हें मूळ, प्राचीन विचारवन्तांनीं आपल्या मनाला नीट समजावें म्हणून अशी कल्पना केली आहे कीं, शक्तीचा जणुं अनंत सागर मुळांत सर्वत्र पसरलेला आहे. तो अगदीं शांत आहे आणि म्हणून त्यावर कसलेहि आकार दिसत नाहींत. ही आरंभींची शांत आकारहीन स्थिति कांहीं कारणानें संपते; सागरांत कशानें तरी कशीतरी हालचाल सुरू होते, आणि अशी हालचाल सुरू झाली कीं, अनिवार्यपणें आकार उदयास येतात. ही आकारनिर्मिति करणारी पहिली हालचाल हेंच सृष्टीचें बीज असतें; सृष्टीची उत्पत्ति शक्ति-सागरांतील या पहिल्या क्षोभानें होते.
जड भौतिक द्रव्य हें आपल्या बुद्धीला लवकर उमजणारे एक शक्ति-
पान क्र. १५१
रूप आहे. भौतिक मेंदूनें आमच्या मनाला वेष्टिलेलें आहे; हें मेंदुतंत्र-मन बाह्य भौतिक पदार्थांच्या विविध संसर्गांच्या प्रसंगीं विविध प्रकारें हालचाल करतें आणि या हालचालींनीं आमची बुद्धि जागृत होऊन विशिष्ट वळण घेते. आमची बुद्धि याप्रमाणें भौतिकाच्या आश्रयानें काम करायला शिकली असल्यानें, भौतिक द्रव्य हें जें शक्तीचें रूप, तें तिला समजायला सर्वांत अधिक सोपें जातें. भारतीय पदार्थविज्ञान-शास्त्रज्ञांच्या दृष्टीनें भौतिक शक्तीची मूळ अवस्था, स्थलगत (आकाशगत) शुद्ध भौतिक विस्ताराची अवस्था होय. या अवस्थेंत या शक्तीचा विशेष धर्म स्पंदन हा असतो. हें स्पंदन शब्दरूपानें आमच्या अनुभवास येतें. परंतु आकाशाच्या या अवस्थेंतील स्पंदन, रूपें व आकार घडविण्यास पुरेसें नसतें. शक्तिसागराच्या अखंड प्रवाहांत कांहीं अडथळा उत्पन्न व्हावा, कांहीं संकोच-विस्तार-रूप घटना व्हावी, स्पंदनाच्या विविध प्रकारांचा अन्योन्य संघर्ष घडून यावा, शक्तीच्या एका प्रकाराचा दुसऱ्या प्रकारावर आघात होऊं लागावा, तेव्हां कोठें थोडेबहुत, टिकाऊ अन्योन्यसंबंध स्पंदनप्रकारांमध्यें निर्माण होतात, यांच्यामध्यें अन्योन्यांवर थोडेबहुत परिणाम होऊं लागतात. कोणत्याहि रूपनिर्मितीच्या पूर्वीं हें सगळें घडून यावें लागतें. ही आरंभिक 'आकाशाची' अवस्था बदलून भौतिक शक्ति 'वायु' ही दुसरी अवस्था धारण करते. शक्ति-प्रकारांचा एकमेकांशीं संसर्ग हा या अवस्थेचा विशेष गुण होय. हा अन्योन्यस्पर्श सर्व भौतिक संबंधांचा पाया असतो. तथापि ज्यांना रूपें वा आकार म्हणतां येईल असें या स्थितींत कांहीं घडून येऊं शकत नाहीं. शक्तीचे विविध प्रकार मात्र या वायुस्थितींत घडून येतात. आकार होण्यासाठीं आकारधारक असें कांहीं तत्त्व लागतें. हें तत्त्व मूळ शक्तीच्या तिसऱ्या रूपांतरांतून मिळतें. या तिसऱ्या रूपांतरांत विशेषत: प्रकाश, वीज, अग्नि, उष्णता यांचा समावेश होतो. या रूपांतरानंतर त्यांच्या आश्रयानें आपापलीं विशिष्ट कार्यें करणारीं व आपापला स्वभावधर्म टिकवून धरणारीं अशीं शक्तीचीं विशिष्ट रूपें उपलब्ध होतात. परंतु सुस्थिर टिकाऊ अशीं जड द्रव्याचीं रूपें अद्यापिहि घडूं शकत नाहींत. भौतिक मूळ शक्तीच्या चौथ्या रूपांतरांत 'प्रसरण' हा विशेष धर्म असतो, आकर्षण-विकर्षण (दूर लोटणे) या क्रिया या चौथ्या रूपांत कायम होऊं लागतात. या चौथ्या रूपाला अलंकारिक रीतीनें 'आप' अथवा द्रव असें नांव दिलें गेलें आहे. मूळ भौतिक शक्ति आणखी एक पांचवें रूप धारण करते. या रूपांत द्रव्यकण एकमेकांना
पान क्र. १५२
चिकटून राहतात व संघात बनतो; या रूपाला पृथ्वी किंवा घनस्थिति म्हणतात. हीं पांच शक्तिरूपें म्हणजेच पंचतत्त्वें, पंचमहाभूतें होत. खऱ्या आकारासाठीं हीं पांच तत्त्वें अस्तित्वांत यावीं लागतात.
जडद्रव्याचीं जीं रूपें आमच्या परिचयाचीं आहेत, तीं सर्व आणि अगदीं सूक्ष्मांत सूक्ष्महि सर्व भौतिक वस्तू, वर सांगितलेल्या पांच तत्त्वांच्या संयोगानें बनलेल्या असतात. आमच्या इंद्रियांच्या द्वारां जो अनुभव आम्हांला येतो, तो सर्व अनुभव या पांच तत्त्वांवर अवलंबून असतो. स्पंदनांचें ग्रहण इंद्रियांनीं केलें म्हणजे शब्दाची संवेदना होते, शक्तिस्पंदनांच्या विश्वांत वस्तूंच्या संसर्गानें स्पर्शसंवेदना होते; प्रकाश, अग्नि, उष्णता यांच्या शक्तीनें उत्पन्न होणाऱ्या, रेखांकित केल्या जाणाऱ्या, टिकवल्या जाणाऱ्या आकारांमध्यें प्रकाशाचा व्यापार घडल्यानें दर्शनाची संवेदना होते, चौथ्या तत्त्वाच्या व्यापारानें रससंवेदना, पांचव्याच्या क्रियेनें गंधाची संवेदना होते. या सर्व संवेदनांचें स्वरूप, स्वभावत: शक्तीशक्तीमधील स्पंदनात्मक संसर्गांची प्रतिक्रिया हें असतें. शुद्ध निरुपाधिक शक्ति आणि तिचीं शेवटलीं रूपांतरें यांत जें महान् दरीसारखें अंतर आहे, तें भरून काढणारा सेतु, प्राचीन विचारवन्तांनीं वर सांगितलेल्या पांच तत्त्वांच्या बांधणीनें तयार केला. इंद्रियांना सर्व प्रकारें खरेखुरे, भरीव व टिकाऊ असे भासणारे आकार, वस्तुत: अल्पकाल टिकणारे आभास आहेत, आणि शुद्ध शक्तीसारखी वस्तु इंद्रियांच्या दृष्टीनें अभावात्मक, ग्रहण न होणारी, जवळजवळ अविश्वासार्ह वस्तु हीच एक सर्वकाळ टिकणारी विश्वव्यापी सत्य वस्तु आहे, ही गोष्ट सामान्य मानवी बुद्धीला मान्य करणें जड जातें. तिची ही अडचण प्राचीन विचारवंतांनीं उपरिनिर्दिष्ट पांच तत्त्वांच्या सेतूच्या उभारणीनें दूर केली.
जाणिवेचा, ज्ञानाचा प्रश्न या वर वर्णिलेल्या उपपत्तीनें सुटत नाहीं. शक्तीच्या स्पंदनांचा संसर्ग हा जडाचा कारभार. या कारभारानें ज्ञानमय संवेदना कां उत्पन्न व्हावी ? सांख्य-तत्त्व-प्रतिपादक विश्लेषणवादी विचारकांनीं या प्रश्नाचें उत्तर म्हणून, वर सांगितलेल्या पांच तत्त्वांत आणखी दोन तत्त्वांची भर घातली; महत् आणि अहंकार ही, पांच तत्त्वापूर्वींचीं तत्त्वें होत. हीं तत्त्वें भौतिक नाहींत, अतिभौतिक आहेत. विश्वव्यापी शक्तितत्त्व म्हणजेच महत्, 'मी'च्या निर्मितीला मूळ असणारें भेदतत्त्व म्हणजे अहंकारतत्त्व. हीं दोन तत्त्वें आणि बुद्धितत्त्व जाणिवेनें (ज्ञान पुरस्सर) क्रियाशील होतात, केवळ शक्तीच्या जोरावर होत नाहींत.
पान क्र. १५३
या ज्ञानमय क्रियाशीलतेसाठीं निष्क्रिय, साक्षीभूत अशा ज्ञानमय पुरुषाची या पुरुषांची, आत्म्याची वा आत्म्यांची नित्य उपस्थिति लागते; महत्, अहंकार व बुद्धि या तत्त्वांच्या द्वारां घडणाऱ्या शक्तीच्या क्रिया नित्य उपस्थित असणाऱ्या पुरुषांच्या जाणिवेंत प्रतिबिंबित होतात आणि या प्रतिबिंबांच्या द्वारां त्या जाणिवेचा रंग घेतात, ज्ञानयुक्त म्हणून प्रत्ययास येतात.
आधुनिक भौतिक जडवादी तत्त्वज्ञानाला जवळ असणाऱ्या भारतीय तत्त्वज्ञानाच्या सांख्य संप्रदायानें दृष्टीचें स्पष्टीकरण वरीलप्रमाणें केलेलें आहे. निसर्गांत यांत्रिक किंवा जड, ज्ञानहीन शक्ति कार्य करीत आहे ही कल्पना, दृष्टीच्या घडामोडींचें स्पष्टीकरण शक्य तितक्या व्यापक रीतीनें करण्यासाठीं; सांख्यांच्या भारतीय विचारशील गंभीर वृत्तीच्या बुद्धीनें मांडली आहे. सांख्य तत्त्वज्ञानांतील दोष कांहींहि असोत, यांतील मुख्य कल्पना इतकी वादातीत आहे कीं, सर्वसाधारणपणें सर्व प्राचीनांनी ती मान्य केली आहे. ती कल्पना ही कीं, निसर्ग हा शक्तिरूप आहे - निसर्गांत जाणीव दिसते ती कोठून व कशी आली याचें स्पष्टीकरण कांहींहि दिले जावो, निसर्ग जड स्फुरण असो किंवा ज्ञानमय तत्त्व असो, तो शक्तिरूप आहे यांत संशय नाहीं; सृष्टीचें मूळ, शक्तींच्या हालचालींत आहे, आकार किंवा रूपें शक्तीच्या हालचालींनीं निर्माण होतात, कोणताहि विशिष्ट आकार नसलेल्या शक्तीं-शक्तींमध्यें संसर्ग, सहकार, देवाणघेवाण घडूनच सर्व आकार उदयास येतात; सर्व संवेदना आणि कर्में यांचें तात्त्विक स्वरूप प्रतिक्रियात्मक आहे; शक्तींचे विविध प्रकार क्रियाशील असतांना, एका विशिष्ट प्रकारच्या शक्तीशीं त्यांचा संबंध येतो आणि या संबंधाचा, संसर्गाचा परिणाम म्हणून, ही विशिष्ट प्रकारची शक्ति, किंवा शक्तीचे हें विशिष्ट रूप कांहीं प्रतिक्रिया करते - ही प्रतिक्रिया म्हणजेच संवेदना किंवा कर्म. आमच्या अनुभवाला येणारें जग या प्रकारचें आहे आणि आम्हांला संशोधनाचा आरंभ करावयाचा, तर या अनुभवापासूनच करावयास हवा.
आधुनिक विज्ञान, जडाचें भौतिक पृथ:करण करून या वरील सिद्धान्ताचाच पुरस्कार करीत आहे. सामान्यत: हा सिद्धान्त नवीन भौतिक विज्ञानाला मान्य आहे. कांहीं थोडे संशय उरले असल्यामुळें कांहीं बाबतींत त्याला अद्यापि अखेरचा निर्णय घेतां येत नाहीं इतकेंच.
पान क्र. १५४
याप्रमाणें भौतिक विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांचें या बाबतींत एकमत असून अंतर्ज्ञान आणि अनुभव यांचाहि त्यांना पाठिंबा आहे. या सिद्धान्तांत शुद्ध स्वतंत्र बुद्धीला तिच्या सारभूत कल्पनांचें समाधान झालेलें दिसतें. कारण 'जग हें सारदृष्टीनें जाणिवेचें कार्य आहे' या पक्षांतहि कार्य, क्रिया ही गोष्ट गृहित आहे, आणि क्रिया म्हटलें कीं शक्तीची हालचाल, सामर्थ्याची लीला तिच्या पाठीमागें आलीच.
आपल्या अंतरांत जाऊन आपण आपला अनुभव पाहिला, तरी विश्वाचा मूलभूत स्वभाव शक्तिकार्य हाच दिसतो. आपल्या सर्व क्रिया नजरेखालून घातल्या असतां, प्राचीन तत्त्वज्ञानानें सांगितलेल्या तीन शक्तींचा त्या क्रिया खेळ आहेत असें दिसेल. ज्ञानशक्ति, वासनाशक्ति व क्रियाशक्ति या त्या तीन शक्ती होत. या तीन शक्तींकडे बारकाईनें पाहिलें, तर एका आद्यशक्तीचे, मूलभूत अद्वितीय, सर्वथा एकरस शक्तीचे त्या तीन प्रवाह आहेत, असें दिसून येतें. आपल्या विश्रामक्षणांचा, क्रियाशून्य अवस्थांचा विचार केला, तर त्याहि अवस्था, त्या आद्य शक्तीच्या विविध भ्रमणाचा समतोल झाल्यानें अनुभवास येतात, असें दिसेल.
शक्तीची भ्रमन्ती, हालचाल हें विश्वाचें स्वरूप आहे हें मान्य केल्यावर दोन प्रश्न उभे राहतात. पहिला हा कीं, अस्तित्वाच्या पोटांत, स्थितिशील मूळ सद्वस्तूच्या पोटांत, ही गति निर्माण कशी झाली? अस्तित्वाचें सारच गति आहे; गति केवळ शाश्वतच आहे एवढेंच नव्हे तर अस्तित्वच सारतः गतिरूप आहे, असें मानले तर हा पहिला प्रश्न उभा रहात नाहीं. पण ही उपपत्ति आपण अमान्य केली आहे; कारण ज्याच्यावर गतीची सत्ता चालत नाहीं अशा ज्या अस्तित्वाचा अनुभव आम्हांला येतो, त्या अस्तित्वाच्या शाश्वत स्थितिशील स्वभावाला विरुद्ध अशी गति अशा अस्तित्वांत आली कशी व कोठून? या गतीचें मूळ कारण काय आहे ? या गतीची शक्यता त्या स्थितिशील अस्तित्वांत उत्पन्न कशी झाली ? कोणतें गूढ प्रेरक तत्त्व या गतीला कारण झालें ?
प्राचीन भारतीयांच्या बुद्धीनें बहुतांशीं मान्य केलेलें, या प्रश्नाचें उत्तर असें आहे कीं, स्थितिशील अस्तित्वाच्या पोटांत गतिशील शक्ति स्वभावतःच असते. शिव आणि काली, ब्रह्म आणि शक्ति एकच एक वस्तु आहेत. त्या एकमेकांपासून अलग करतां येत नाहींत. अस्तित्वाच्या स्वभावांत असलेली शक्ति स्थिर असेल किंवा गतिमान्
पान क्र. १५५
असेल; स्थिर असली तर ती नाहींशीं होते असें नाहीं, ती कमी होते किंवा बदलते असेंहि नाहीं; स्थिर असेल तेव्हां ती अस्थिर नाहीं एवढेंच म्हणतां येईल, तिचे अस्तित्व नाकारतां येणार नाहीं. तिचे अस्तित्व नाकारणें म्हणजे शुद्ध सद्वस्तूचें अस्तित्व नाकारण्यासारखें होईल. कारण या दोन वस्तू अविभाज्यपणें एक आहेत. हें उत्तर सृष्टिधर्माशीं जुळणारें व बुद्धीला सर्वथा पटणारें असें आहे. आपणाला हें उत्तर मान्य करावयास कांहींच हरकत नाहीं; कारण दुसरें जें उत्तर शक्य आहे, तें बुद्धीला कदापि पटणारें नाहीं, तिच्या स्वभावाला विरोधी असें आहे -- तें उत्तर असें कीं, एक आणि अनंत असें अस्तित्व हें वेगळें आणि शक्ति वेगळी. अस्तित्वांत शक्ति बाहेरून प्रवेश करती झाली किंवा असें म्हणा कीं, अस्तित्वांत ती आरंभीं नव्हती पण पुढें कोणत्यातरी क्षणीं ती त्यांत उदयास आली. हें बुद्धिविरोधी उत्तर मान्य करणें अशक्य असल्यानें, पहिलें उत्तर मान्य करावयास आपण सहजच तयार होतो. मायावादी उपपत्ति असें सांगते कीं, स्वत:लाच भ्रमामध्यें ढकलण्याची व राहण्याची शक्ति ब्रह्मामध्यें आहे. हें प्रतिपादन करणाऱ्या मायावादाला हेंहि मान्य करावें लागेल कीं, ही जी भ्रान्तिशक्ति ब्रह्मामध्यें आहे ती, ब्रह्माप्रमाणेंच शाश्वत असली पाहिजे. मग प्रश्न येवढाच उरतो कीं, ही भ्रांतीची शक्यता वास्तवांत केव्हां उतरावयाची ? मायेचा संसार व्यक्त केव्हां व्हावयाचा ? कां तो अव्यक्तच रहावयाचा ? सांख्यांनींहि असें प्रतिपादन केलें आहे कीं, प्रकृति किंवा निसर्ग आणि पुरुष किंवा ज्ञानमय आत्मा दोघेहि शाश्वत आहेत. दोघेहि एकाच वेळीं अस्तित्वांत असतात. प्रकृति एकतर समतोलांत किंवा शांत निश्चल स्थितींत असते अथवा तसें नसेल तेव्हां चंचल स्थितींत, विषम तोलाच्या स्थितींत असते, आलटून पालटून या दोन अवस्था प्रकृति घेत असते.
शक्ति ही अस्तित्वांत स्वभावत: अंतर्भूत असल्यानें आणि शक्तीचा स्वभावधर्म आलटून पालटून निश्चलता किंवा चंचलता स्वीकारण्याचा असल्यानें -- म्हणजेच स्वत:मध्यें एकवटून राहणे (आत्मकेंद्रितता) किंवा सर्वत्र पसरणें (आत्मविस्तार) -- या शक्तीच्या दोन अवस्था स्वभावतःच आलटून पालटून व्यक्त होत असल्यानें, शक्ति गतिमान् कशी होते, शक्तिप्रेरणा कोठून येते, इत्यादि प्रश्न उभे रहात नाहींत. कारण आम्हांला हें सहज कळूं शकतें कीं, शक्तीला जे दोन पर्याय शक्य आहेत, ते म्हणजे कालदृष्ट्या एकीपाठीमागून दुसरी अशी आलटून पालटून चंचलता व
पान क्र. १५६
निश्चलता येत असेल किंवा अंतर्यामी सतत निश्चलता व त्याबरोबरच पृष्ठभागीं लाटांचा खेळ चालूं असलेल्या सागराप्रमाणें अक्षर अस्तित्वाच्या अंतर्यामीं शाश्वत, आत्मकेंद्रित, निश्चल शक्ति आणि त्या अस्तित्वाच्या पृष्ठभागीं शाश्वत चंचलता किंवा सतत बदलणारी, आकारांची घडामोड करणारी शक्ति, असा प्रकार होत असेल. हा पृष्ठभागावरचा खेळ आत्मकेंद्रित निश्चल शक्तीइतकाच कालदृष्टीनें जुना, अनादि व अखंड आणि शाश्वतचा असेल किंवा तो कालदृष्टीनें आरंभ आणि शेवट यांनी युक्त असून आरंभ-शेवट-आरंभ-शेवट-आरंभ..... असा तालबद्ध शाश्वततेचा असेल, अर्थात् शाश्वत अखंडता किंवा शाश्वत पौनःपुन्य हें त्या पृष्ठभागीय खेळाचें स्वरूप असेल.
शक्तीचा क्रियात्मक खेळ कसा सुरु होतो हा प्रश्न याप्रमाणें निकालांत निघतो. हा खेळ सुरूं होतोच कां या प्रश्नाचा आतां विचार करणें प्राप्त आहे. शक्ति गतिमान् होण्याची शक्यता शक्तींत आहे हें ठरलें, तरी ही शक्यता वास्तवांत कां यावी ? शक्ति गतिमान् कां व्हावी ? शाश्वतपणें आत्मकेंद्रित अवस्थेंत अस्तित्वाची शक्ति कां राहूं नये ? रूप-रूपांतर-विविधता यांपासून ती नित्य मुक्त अशी कां राहू नये ? अस्तित्व जाणीवशून्य आहे आणि जाणीव ही भौतिक शक्तीच्या विकासांतून निर्माण होते व ती अतिभौतिक आहे असें म्हणणें हा आपला गैरसमज आहे, असा पक्ष जर आपण खरा म्हणून स्वीकारला तर वरील 'कां' चा प्रश्न उभा राहत नाहीं. कारण आम्हीं असें म्हणूं शकतों कीं, गति-विश्रांति, गति-विश्रांति ही तालबद्धता अस्तित्वातील शक्तीचा स्वभाव-धर्म आहे आणि जी गोष्ट स्वभावत: स्वयंभू आणि नित्य असणारी अशी आहे, तिच्या संबंधांत कां, कारण काय, प्रारंभींचा प्रेरक हेतु काय, अंतिम प्रयोजन काय, -- असले प्रश्न अस्थानीं ठरतात; बुद्धीला सर्वथा अमान्य ठरतात. शाश्वत अशा स्वयंभू अस्तित्वाला तूं कशाकरिता अस्तित्वात आहेस ? अस्तित्वात आलेंस कसें ? हें प्रश्न विचारणें बुद्धि मान्य करणार नाहीं; तसेंच अस्तित्वाची जी आत्मशक्ति आहे आणि तिचा जो गतिविषयक स्वयंप्रेरणेचा स्वभाव आहे, त्यांनाहि वरील प्रश्न विचारणें बुद्धि अमान्य करील. अशा परिस्थितींत आपण फक्त पुढील प्रश्नापुरतेंच संशोधन करूं शकतो; शक्तीचे आत्माविष्करण कोणत्या प्रकारे होतें ? गतीचे आणि आकारधारणाचे तिचे मूळ नियम कोणते आहेत ? तिची विकासाची प्रक्रिया कोणती ? अस्तित्व आणि शक्ति दोन्ही जड गोष्टी असल्यास, एक जड स्थिति व दुसरी जड
पान क्र. १५७
प्रेरणा अशी वस्तुस्थिति असल्यास, दोन्ही जाणीवशून्य, बुद्धिशून्य असल्यास, विकासक्रमांत कांहीं प्रयोजन किंवा अंतिम हेतु असणार नाहीं, त्याचप्रमाणें विकासाचा कांहीं मूळ हेतु किंवा कारण असणार नाहीं.
परंतु मूळ अस्तित्व हें जाणीवयुक्त आहे; अर्थात् मूळ अस्तित्व म्हणजे ज्ञानमय पुरुष आहे अशी आपण कल्पना केली किंवा असा आपणाला अनुभव आला तर वरील 'कां' 'कशाकरिता' हे प्रश्न अवश्य उभे राहतात. आपल्याला अशी कल्पना करतां येईल कीं, हा ज्ञानमय पुरुष त्याच्या शक्तीचा, त्याच्या प्रकृतीचा अंकित आहे; ती त्याजकडून तिला लागेल तें काम करून घेऊं शकते, तिनें किंवा त्यानें विश्वात व्यक्त व्हावयाचें वा न व्हावयाचें या संबंधानें कांहीं ठरविण्याचा कसलाहि अधिकार त्याला नाहीं. तांत्रिक आणि मायावादी यांचा ईश्वर, शक्तीच्या किंवा मायेच्या अधीन आहे; मायावाद्यांचा ईश्वर मायावृत पुरुष आहे; तांत्रिकांचा ईश्वर शक्ति-तंत्र पुरुष आहे. पण आपण सर्वोत्तम, सर्वोच्च, अनंत अस्तित्व किंवा सद्वस्तु ही विश्वाचें मूळ म्हणून मान्य केली आहे. ती सद्वस्तु म्हणजे तांत्रिकांचा किंवा मायावाद्यांचा ईश्वर खास नव्हे. त्या सद्वस्तूनें किंवा ब्रह्मानें विश्वापुरतें धारण केलेलें रूप म्हणजे हा ईश्वर आहे. हें ब्रह्म तर्कत:, शक्ति किंवा माया यांच्या अगोदरचें आहे आणि या शक्तीचें किंवा मायेचें कार्य संपतांच तिला आपल्या सर्वातीत स्वरूपांत परत विलीन करून घेणारें आहे. जें ज्ञानमय अस्तित्व, जो ज्ञानमय पुरुष सर्वातीत, सर्वनिरपेक्ष असा आहे, आपल्या रूपांच्या अधीन जो नाहीं, आपल्या क्रियांनीं जो बद्ध होत नाहीं, कमी-अधिक होत नाहीं, त्या पूर्ण स्वतंत्र आदि पुरुषाला (ब्रह्माला) त्याची गतिशील होण्याची शक्यता, वास्तवांत आणण्याची किंवा न आणण्याची पूर्ण मोकळीक आहे हें आम्हांला मान्य करावें लागेल. प्रकृतीच्या हुकुमानें चालणारें ब्रह्म हें वस्तुत: ब्रह्म नव्हेच. असलें प्रकृति-तंत्र ब्रह्म हें जड असें अनंत अस्तित्व मानलें पाहिजे; कारण या अस्तित्वाच्या पोटांत असणारें क्रियाशील तत्त्व, त्याला धारण करणाऱ्या अस्तित्वावर मात करतें; किंवा असें म्हणतां येईल कीं, हें प्रकृति-तंत्र ब्रह्म म्हणजे शक्ति धारण करणारा ज्ञानमय पुरुष आहे. परंतु हा पुरुष आपल्या अंकिताचा (शक्तीचा) अंकित झाला आहे. ब्रह्म ही मूळ सद्वस्तु आहे आणि मूळ शक्तिहि आहे आणि शक्तीचें अंकित ब्रह्म आहे म्हणजे ब्रह्म स्वतःचें अंकित आहे अशी कोटि केली, तर मूळ सद्वस्तूसंबंधाचा आपला सर्वोच्च सिद्धान्त आपण
पान क्र. १५८
अमान्य केल्यासारखें होणार आहे; कारण या शेवटल्या विवेचनाप्रमाणें मूळ सद्वस्तु ही वस्तुत: शक्तिस्वरूप आहे, असें म्हटल्यासारखें होतें. ही शक्ति स्थितिशील असेल किंवा गतिशील होईल -- ही शक्ति सर्वातीत स्वयंभू असेल, परंतु ती स्वयंभू सर्वातीत पुरुष असूं शकत नाहीं; मूळ सद्वस्तू ही सर्वातीत स्वयंभू ज्ञानमय पुरुष आहे असा तर आपला सर्वोच्च सिद्धान्त आहे.
आतां ज्ञानमय पुरुष आणि शक्ति अर्थात् ज्ञान आणि शक्ति, जाणीव आणि शक्ति यांच्या अन्योन्य संबंधाची चर्चा करणें अवश्य आहे. कारण जोपर्यंत यांचें परस्परांचें नातें स्पष्ट झालें नाहीं, तोंपर्यंत एकाचें स्थान दुसऱ्याला देण्याची चूक होणें अपरिहार्य आहे. या चर्चेंत आरंभींच ज्ञान (जाणीव) या कल्पनेचा अर्थ स्पष्ट करून घेणें अवश्य आहे. सामान्यत: या कल्पनेचा अर्थ, आपली जागृतींतील मानसिक जाणीव असा आपण घेतों. मनुष्य झोंपेंत नसतांना, त्याला मूर्छा आली नसतांना, झोंप किंवा मूर्छा यांखेरीज इतर कारणांनींहि संवेदना निर्माण करणाऱ्या स्थूल भौतिक बाह्य शारीर साधनांचा त्याला वियोग झाला नसतांना, शारीर अस्तित्वाच्या बव्हंश भागांत जागृतींतील जी मानसिक जाणीव त्याला असते, तिला आपण ज्ञान (जाणीव) हें नांव सामान्यत: देत असतो. या दृष्टीनें पाहतां, जाणीव ही भौतिक जगाचा नियम नसून ती अपवादभूत असते हें उघड आहे. असली जाणीव आम्हांलाहि नेहमी उपलब्ध नसते. परंतु जाणीव या कल्पनेचा हा अर्थ सामान्य विचारक्रमांत आणि सामान्य संदर्भांत जरी अद्यापि मान्य असला, तरी तत्त्वज्ञानविषयक मीमांसेंत जाणीवेच्या स्वभावाची ही प्राकृत उथळ कल्पना सर्वथा निश्चितपणें बहिष्कृत होणें अगदीं आवश्यक आहे. कारण, आपणाला हें ठाऊक आहे कीं, आम्ही गाढ झोंपेंत असतां, कांहीं औषधानें किंवा इतर कारणानें आम्ही मूर्च्छेंत किंवा बेशुद्धींत असतां, आमच्या स्थूल शारीर पुरुषाच्या दर्शनी जाणीव शून्य अशा सर्व अवस्थांत, आमच्यांतील कांहीं एक वस्तु जाणीवयुक्त असते. इतकेंच नव्हे तर आम्हांला प्राचीन विचारवंतांनीं सांगून ठेवलेली जाणिवेसंबंधाची एक गोष्ट आम्ही नि:शंकपणें खरी मानावी अशी आहे. ती गोष्ट ही कीं, आमच्या जागृत अवस्थेंत जी जाणीव म्हणून आम्ही ओळखतो, ती जाणीव म्हणजे आमच्या एकंदर ज्ञानमय अस्तित्वाचा फार थोडा भाग असतो. ही आमची जागृतीची जाणीव केवळ शारीर, पृष्ठभागावरची असते;
पान क्र. १५९
आमची मानसिक जाणीव देखील तिच्यांत सर्वच्या सर्व अंतर्भूत होऊं शकत नाहीं. जागृतीच्या या जाणिवेपाठीमागें अंतर्मन असतें, अर्धजागृत मन असतें. या मनांत आमची पुष्कळशी, अर्ध्याहून अधिक जाणीव राहते. येथें खोल भाग असतात, उंच भाग असतांत -- ज्यांची खोली, ज्यांची उंची अद्यापि कोणाहि मानवास मोजतां आलेली नाहीं. शक्तीचें व तिच्या कार्याचें खरें शास्त्र सिद्ध करण्यास आरंभींची पायरी म्हणून हें ज्ञान आपणांस उपयुक्त ठरतें. भौतिकाची चौकट व दर्शनी देखाव्यानें निर्माण होणारा भ्रम यांच्या कचाट्यांतून या ज्ञानामुळें आपण पार होऊन, आद्यशक्तीच्या स्वरूपाचा व कार्याचा विचार मोकळेपणानें करूं शकतों.
जडवाद आग्रहानें असें प्रतिपादन करतो कीं, जाणीव कितीहि विस्तृत क्षेत्र व्यापणारी असो, ती भौतिक घटना आहे; आमच्या स्थूल शारीर इंद्रियांपासून ती अलग कल्पितां येत नाहीं; इंद्रियांचा उपयोग करून घेणारी ती एक स्वतंत्र वस्तु नसून त्यांचा ती परिणाम आहे. हें भौतिकवादाचें परंपरागत मत आतां संशयानें व्याप्त झालेलें आहे; जसजसें ज्ञान वाढत आहे, तसतशी या मताची पक्कड ढिली होत आहे. या उपपत्तीनें वास्तव गोष्टींचें स्पष्टीकरण पुरतेपणीं होईनासें झालें आहे. हें स्पष्टीकरण करण्यांत बुद्धीला अधिक ताण द्यावा लागत असल्यामुळेंच या उपपत्तीची सदोषता उघड होत आहे. ही गोष्ट दिवसानुदिवस अधिकाधिक स्पष्ट होत आहे कीं, आमच्या एकंदर जाणिवेची समर्थता आमच्या अवयवांच्या, इंद्रियांच्या, नाड्यांच्या व मेंदूच्या सामर्थ्याहून पुष्कळच अधिक असतें; इतकेंच नव्हे, तर आमचा सर्वसामान्य विचारक्रम आणि जाणीव यांना आमच्या अवयवांनीं निर्माण केलें नसून, आमचे अवयव हे त्यांच्या सवयींचीं झालेलीं त्यांच्या कार्यसिद्धीचीं साधनें आहेत. मेंदू हा, जाणीवेनें आपल्या ऊर्ध्वगामी धडपडीनें निर्माण केलेली वस्तु आहे आणि ती आपल्या कार्यासाठीं या वस्तुचा उपयोग करून घेत असते. जाणीव कांहीं मेंदूनें निर्मिलेली नाहीं. हा मेंदू जाणीवेचा साधन म्हणून उपयोग करीत नाहीं. आमचे अवयव अवश्य व अपरिहार्य अशीं साधनें आहेत हा सिद्धान्त ज्यामुळें टिकूं शकणार नाहीं, अशींहि कांहीं असाधारण उदाहरणें सांपडतात -- हृदयाचें स्पंदन किंवा श्वास-उच्छ्वास हे जगण्यास अगदीं आवश्यकच आहेत असें नाहीं. तसेंच विचारासाठीं मेंदुगत संघटित पेशीहि आवश्यक नाहींत. एंजिन चालविणारी वाफ किंवा वीज एंजिनमुळें उत्पन्न झालेली नसते. एंजिनची रचना कांहीं वाफेच्या
पान क्र. १६०
किंवा विजेच्या -- चालकशक्तीच्या -- अस्तित्वाचें स्पष्टीकरण करूं शकत नाहीं. हीच गोष्ट, आमचें शरीरयंत्र आणि विचारशक्ति व जाणिवशक्ति यांना लागूं आहे. शक्ति अगोदरच आहे. आमचें शरीरयन्त्र आधींचें व शक्ति त्या यन्त्राची निर्मिति अशी वस्तुस्थिति नाहीं.
शरीर निश्चेष्ट, जड होऊन पडलेलें असलें, तरीहि त्यांत मानसिक जाणीव असतें असें आपण पाहतो. त्यावरून आपण असें म्हणूं शकतो कीं, भौतिक पदार्थांत सर्वगामी अर्धजागृत मन असूं शकेल; या मनाला योग्य तें अवयवरूप साधन उपलब्ध नसल्यानें तें आपलें अस्तित्व पृष्ठभागीं व्यक्त करूं शकत नाहीं, इतकेंच. भौतिक जड अवस्था ही कांहीं जाणीवशून्य अवस्था नव्हे -- जाणीव सुप्त असलेली अवस्था होय. विकासक्रमाच्या सिद्धान्ताच्या दृष्टीनें ही सुप्तावस्था मूळ आदिम सुप्तावस्था समजावयाची; मनुष्याच्या सुप्तावस्थेप्रमाणें विकासाच्या कोठल्या तरी मधल्या पायरीवरील अवस्था समजावयाची नाहीं एवढेंच. मनुष्याची सुप्तावस्था म्हणजे जाणीव नाहींशी होणें नव्हे, तर ती, अंतर्यामीं एकीभूत होणें. जागृतावस्थेंत बाह्य वस्तूंच्या संसर्गाच्या प्रसंगीं जाणीवयुक्त शारीर-प्रतिक्रिया होत असते. त्या प्रतिक्रियेचा त्याग करून दूर आंत एकवटून निष्क्रिय होणारी जाणीव म्हणजे मनुष्याची सुषुप्ति, हें आपण जाणतोंच. ज्या निसर्गांत, ज्या अस्तित्वांत बाह्य भौतिक जगाशीं संबंध ठेवण्यासाठीं लागणारीं साधनें विकसित झालेलीं नाहींत, त्या निसर्गाची, त्या अस्तित्वाची अवस्था मनुष्याच्या सुषुप्तीसारखीच आहे, असें समजावयास कांहीं हरकत दिसत नाहीं. जें कांहीं सुप्त अवस्थेंत आहे, त्यांत नेहमीं जागा राहणारा ज्ञानमय पुरुष, ज्ञानमय आत्मा आहे असें मानावयास काय प्रत्यवाय आहे?
आपण यापेक्षांहि पुढें जाऊं शकतों. ज्याविषयीं वर सांगितले तें अर्धजागृत मन बाह्य मनाहून निराळया प्रकारचें असत नाहीं, तर तें पृष्ठभागाखालीं काम करतें इतकेंच. त्याचें काम जागृत माणसाला ठाऊक होत नाहीं; तरी त्याचें काम वरच्या मनासारखेंच, पण अधिक विस्तृत क्षेत्रांत व अधिक खोल भागांत होत असतेंच. अर्धजागृत मनाबरोबर अंतर्मनाचा (Subliminal) उल्लेख वरतीं आला आहे. या अंतर्मनाचा व्याप मात्र अर्धजागृत किंवा जागृत मनाच्या व्यापाहून फार मोठा असतो. त्याचें कार्य या दोन मनांहून सामर्थ्यामध्यें फारच मोठें असतें आणि त्याच्या कार्याचा प्रकारहि जागृत मनाच्या कार्याहून वेगळा असतो.
पान क्र. १६१
अंतर्मनाच्या कार्यामुळें आम्हांला उन्मनाच्या, अतिमनाच्या किंवा अतिमानसाच्या अस्तित्वाचा (मनाहून श्रेष्ठ अशा ज्ञानावस्थेचा) पुरावा मिळतो. या ज्ञानावस्थेंत, मनाच्या क्षेत्राहून फार मोठ्या क्षेत्रांत, ज्ञान ग्रहण करणाऱ्या आपल्या सामान्य मनापेक्षां श्रेष्ठ शक्ती सुसंघटितपणें काम करतात. ही अतिमनाची ज्ञानावस्था आपल्यामध्यें आपणाला उपलब्ध होण्यासारखी आहे. ह्या श्रेष्ठ अवस्थेपर्यंत अंतर्मन जर जाऊं शकतें, तर मन, अर्धजागृत मन यांच्या खालीं असलेल्या कनिष्ठ ज्ञानावस्थेंत तेंच अंतर्मन प्रवेश करूं शकणार नाहीं काय ? प्राणमय कोश व अन्नमय कोश यांजमध्यें जी जाणीव आहे, ती मन व अर्धजागृत मन यांच्या खालच्या पायरीवरची जाणीव होय. अशा प्रकारची जाणीव वनस्पतीमध्यें व धातूमध्येंहि दिसून येते. जाणीव किंवा ज्ञान हा शब्द मनुष्याच्या मानसिक जाणिवेला किंवा ज्ञानाला लावण्याचा जुना प्रघात आहे. मानसिक जाणिवेचें विशिष्ट स्वरूप मनाच्या वरहि नाहीं, किंवा खालींहि नाहीं. तेव्हां जाणीव हा शब्द, खालच्या किंवा वरच्या ज्ञानावस्थांना लावला कीं त्याचा अर्थ, मानसिक जाणिवेहून वेगळा आहे, एवढे लक्षांत ठेवावयास हवें. असो.
मनाहून खालच्या पातळीवर जाणीव असते कीं नाहीं अशी शंका घेतली जाते. आपल्या शरीराच्या पेशींमध्यें आणि स्वयंचालित प्राणक्रियांमध्यें प्राणीय जाणीव असल्याचें आम्हांला दिसून येते, कारण आपल्या पेशीकडून व प्राणक्रियांकडून कांहींतरी विशिष्ट उद्देशानें व तो उद्देश साधण्यासाठीं कांहीं हालचाल होत असल्याचे आम्हांला ठाऊक आहे, त्याचप्रमाणें कांहीं गोष्टींचें आम्हांला आकर्षण वाटतें, आणि कांहीं गोष्टींची घृणा वाटते.
पण या घृणेचा किंवा आकर्षणाचा आमच्या मनाशीं कांहीं संबंध नसतो -- शारीर पेशींच्या क्रियांनीं व प्राणक्रियांनीं आमचे जे उद्देश साधतात, त्यांचाहि मनाशीं संबंध नसतो. याप्रमाणें आमच्यांत प्राणीय जाणीव (Vital consciousness) असल्याचें सिद्ध होतें. मानवेतर प्राण्यांत ही प्राणीय जाणीव विशेषच महत्त्वाचें जीवनकार्य करीत असते. वनस्पतीमध्यें ही जाणीव अंत:स्फुरित ज्ञानाच्या स्वरूपाची असते. कांहींतरी मिळविण्याची धडपड व कांहीं वस्तूंपासून दूर होण्याची क्रिया वनस्पतींमध्यें दिसतें, त्यांच्यांत सुखाची, असुखाची उर्मि आढळून येते; त्यांच्यांत झोंप, जागृति याहि अवस्था आढळतात. भौतिक शास्त्रीय पद्धतीचा
पान क्र. १६२
कांटेकोर उपयोग करून एका महान् भारतीय वैज्ञानिकानें या सर्व गोष्टी सिद्ध केलेल्या आहेत; या सर्व जाणिवेच्या क्रिया आहेत -- पण अर्थात् च आम्ही ज्याला मन म्हणून ओळखतों, त्याच्या ह्या क्रिया नाहींत. या प्राणीय जाणिवेच्या आरंभींच्या प्रतिक्रिया मनासारख्या असतात; पण, ज्याप्रमाणें उच्च पातळीवरील अतिमानसी जाणिवेचें संघटन किंवा घडण मनाहून वेगळी असते, त्याचप्रमाणें मनाहून खालच्या पातळीवरील या प्राणीय जाणिवेचा स्वानुभव, तिच्या स्वानुभवाची घडण मनाहून वेगळ्या प्रकारची असते.
जाणिवेचा प्रांत वनस्पतीपर्यंत पोंचतो हें आपण पाहिलें; वनस्पतींचें जीवन प्राणिजीवनाच्या खालच्या प्रतीचें असतें व हें जीवन एका जाणिवेनें -- विशिष्ट प्राणीय जाणिवेनें -- चालतें याबद्दलची आपली शंका दूर झाली. पण जाणिवेचा प्रांत वनस्पतीच्या खालीं नाहीं असें आपण मानावयाचें काय? तसें आपण मानलें, तर असें म्हणावें लागेल कीं, जड द्रव्याशीं कांहीं नातें नसलेली एक जीवनाची व जाणिवेची शक्ति, कदाचित् दुसऱ्या जगांतून येऊन जड द्रव्यांत शिरते व स्थायी होतें* -- येथील जड-द्रव्यांत जर प्राण सुप्त नसेल, तर अर्थात् दुसऱ्या जगांतून तो येथें आला असें मानणें सयुक्तिक आहे. प्राचीन विचारवंत अशीं अनेक जगें मानीत. आमच्या जगांतील जीवन आणि जागृत असलेली जाणीव हीं जगें आपल्या प्रभावानें टिकवून धरतात, किंवा जागृत नसलेली जाणीव आपल्या दडपणानें जागृतींत आणतात, असें ते मानीत -- पण आपल्या प्रवेशानें आमच्या जगांत हीं दुसरीं जगें नसलेली जाणीव उत्पन्न करतात असें ते मानीत नव्हते. जडद्रव्यांत अगोदरच जें अंतर्भूत, अंतर्हित नाहीं, तें त्यांतून विकसित होऊं शकत नाहीं, असें तें मानीत.
आम्हांला हें त्यांचें मत पटावयास हरकत नाहीं. जीवन (प्राण) आणि जाणीव जड व ज्ञानशून्य दिसणाऱ्या भौतिक द्रव्यांत सुप्त अवस्थेंतहि असत नाहीं, जडद्रव्यापर्यंत ती खालीं उतरलेली आहे पण पुढें
-------------------------
*अशी एक विचित्र कल्पना प्रसृत झाली आहे कीं, येथें पृथ्वीवर जीवन आले ते दुसऱ्या जगतांतून नव्हे तर दुसऱ्या ग्रहावरून आलें. पण विचारवंताला हें स्पष्टीकरण पुरेसें वाटणार नाहीं. कोणत्याहि किंवा कोठल्याहि जडद्रव्यांत प्राण-तत्त्व (जीवन) आलें कसें, हा मूळ प्रश्न आहे, विशिष्ट ग्रहाच्या जड द्रव्यांत तें कोठून शिरलें हा मूळ प्रश्न नव्हे.
पान क्र. १६३
ती जडद्रव्यांत शिरलेली नाहीं असें मानावयास कांहीं कारण दिसत नाहीं. संशोधन जसें वाढत आहे, तसें हें स्पष्ट होत आहे कीं, धातूंमध्यें, जमिनीमध्यें आणि इतर जीवनरहित आकारांमध्यें अस्फुट असें जीवन, दडपलेली गतिशून्य अशी जाणीव -- निदान पुढें ज्या गोष्टीला जाणिवेचें स्वरूप येतें अशी कांहीं गोष्ट -- वसति करून आहे. एवढेंच कीं ज्याला आम्ही प्राणीय जाणीव म्हणतो, ती अस्पष्टपणें कां होईना वनस्पतीमध्यें जशी प्रतीत होते, ओळखतां येते, तशी गतिशून्य रूपांतील जाणीव, जड-लीन जाणीव आम्हांला सुलभपणें प्रतीत होत नाहीं, सुलभपणें कल्पितां येत नाहीं; आणि आम्हांला कळायला किंवा कल्पना करायला जें अवघड तें अस्तित्वांतच नाहीं, असा सिद्धान्त करण्याचा आम्हांला अधिकार आहे असें आम्ही समजतों. तथापि वनस्पतीपर्यंत जाणिवेचा प्रत्यय आम्हांला आल्यानंतर त्या वनस्पतिवर्गाच्या खालीं, जाणीव नसलेली ओसाड दरी निसर्गांत आहे, अशी कल्पना करणें आम्हांला कठीण जातें. असल्या जाणीवशून्य निसर्ग-विभागावर आमचा विश्वास बसत नाहीं. निसर्गांत एकरसता असावी, निसर्गाच्या सर्व विभागांत जाणिवेच्या बाबतींत एकरूपता असावी असा विचार, विचारशक्ति आम्हांस सुचविते व असा विचार सुचविण्याचा तिला अधिकार पोंचतो; कारण, निसर्गांतील जडद्रव्याचा भाग सोडतां, बाकी सर्व भागांतील वस्तू व घटना जाणिवेच्या बाबतींत एकरूपता दाखवितात, आणि जडविभागांतहि ही एकरूपता नाकारली जात नाहीं, केवळ इतर विभागांपेक्षां ती तेथें अधिक झांकलेली दिसते इतकेंच. तेव्हां निसर्गांत वरपासून खालपर्यंत सर्वत्र, जाणिवेच्या बाबतींत अखंड एकता आहे, असें आपण मानलें म्हणजे, शक्तीचे जितके प्रकार जगांत काम करीत आहेत त्या सर्वांचें पोटीं जाणीवशक्ति आहे असा सिद्धांत आपण करूं शकतो. सर्व रूपांत मनोमय पुरुष किंवा अतिमानसी पुरुष नसला, तरी त्या सर्वांत एक प्रकारची जाणीवशक्ति असून, त्या रूपांचा अगदीं बाहेरचा, अगदीं वरचा भाग देखील स्पष्टपणें किंवा गुप्तपणें जाणिवेनें युक्त असतो एवढें तरी आपण मानूं शकतो.
या निसर्गविषयक दर्शनांत, विवेचनांत, जाणीव या शब्दाचा पूर्वींचा परंपरागत अर्थ मात्र राहत नाहीं. जाणीव म्हणजे मन, असा परंपरागत सर्वसामान्य अर्थ बदलून जाणीव म्हणजे स्वत: स्वतःला ओळखणारी, जाणणारी अस्तित्वाची क्रियाशक्ती असा अर्थ घ्यावा लागतो. मन ही एक
पान क्र. १६४
अशी मधल्या ठिकाणची शक्ति आहे. मनाच्या पातळीखालीं ही अस्तित्वशक्ति प्राणमय आणि जड भौतिक हालचालींत व्यक्त होते. या हालचाली आपण अर्धजागृत मनाच्या सदरांत घालतों; मनाच्या वरच्या प्रदेशांत ही अस्तित्वशक्ति अतिमानस-शक्ति म्हणून काम करते. तेथें तिला अतिमानसी जाणीव म्हणतात. पण खालपासून वरपर्यंत ती एकच एक वस्तु आहे -- भिन्न ठिकाणीं तिनें आपली संघटना भिन्न करून घेतली आहे इतकेंच. भारतीय तत्त्वज्ञानांत 'चित्' म्हणून जी शक्ति कल्पिलेली आहे, तिचें स्वरूप वर वर्णन केल्याप्रमाणेंच आहे. एकच चित्-शक्ति अनेक रूपें धारण करून अनेक जगें निर्माण करते, अशी भारतीय तत्त्वज्ञानाची शिकवण आहे. मन हें जडाहून वेगळी शक्ति असूं शकत नाहीं, जडशक्तीचाच विकास होऊन मन बनलें आहे, असें एकतेचें प्रतिपादन भौतिक शास्त्रहि आपल्या बाजूनें करतें. भारतीय तत्त्वज्ञान खोलांत खोल विचार करून, भौतिक शास्त्राच्या उलट असें प्रतिपादन करतें कीं, मन आणि जडद्रव्य एकाच शक्तीचीं भिन्न अवस्थेंतील रूपें आहेत, अस्तित्वाची एकच जाणीवशक्ति भिन्न संघटित रूपें धारण करून मन बनते, जडद्रव्य बनते.
पण जाणीव-शक्ति, चित्-शक्ति हें नांव आद्यशक्तीला देणें योग्य आहे कीं नाहीं, हा एक प्रश्न उद्भवतो. जाणीव किंवा ज्ञान या कल्पनेंत बुद्धि, हेतुपुरस्सरता किंवा आत्मभान यांचा अंतर्भाव होतो. आमच्या मनाला परिचित अशा प्रकारची बुद्धि, हेतुपूर्वकता, आत्मभान आद्यशक्तीच्या जाणिवेंत, ज्ञानांत अनुभवास येत नसली, तरी थोड्या वेगळ्या प्रकारची कां होईना, ही त्रयी आद्य शक्तींत अनुभवास येत असेल तरच तिला, त्या शक्तीला, जाणीव किंवा ज्ञान हें नांव देतां येईल. ही कसोटी आद्यशक्तीला लावल्यास असें दिसून येईल कीं, विश्वांत जाणीवयुक्त शक्ति काम करीत आहे या विधानाला त्यामुळें बळकटीच येते. मानवेतर प्राण्यांची गोष्ट घ्या. या प्राण्यांची मनाची शक्ति अगदींच अल्प असते. या अल्पशक्तीच्या मानानें फारच पलीकडे असलेलें भौतिकशास्त्रीय सूक्ष्म ज्ञान, आणि ज्यांत पूर्ण हेतुपूर्वकता स्पष्टपणें प्रत्ययास येते अशीं कामें हें मनुष्येतर प्राणी करतांना दिसतात. मनुष्येतर प्राण्यांत हें जें सूक्ष्म शास्त्रीयज्ञान व योजनेचें पूर्णत्व प्रत्ययास येतें, तें ज्ञान व पूर्ण नियोजन मनुष्याला पुष्कळ काळपर्यंत शिक्षण घेऊन व अभ्यास करूनच बऱ्याच प्रमाणांत कमावता येत असलें, तरीहि मनुष्येतर प्राणी या सूक्ष्म ज्ञानाचा व नियोजनाचा प्रयोग जितक्या त्वरेनें व यशस्वीपणें करूं शकतात, तितक्या
पान क्र. १६५
त्वरेनें व यशस्वितेनें मनुष्याला आपलें ज्ञान व नियोजनकौशल्य उपयोगांत आणतां येत नाहीं. तेव्हां मनुष्येतर प्राण्यासंबंधानें व मनुष्यासंबंधानें जी सर्वसाधारण ज्ञानविषयक वस्तुस्थिति अनुभवास येते, तिच्यावरून असें म्हणतां येतें कीं, पृथ्वीवर कोणत्याहि व्यक्तीमध्यें जी सर्वांत उच्च अशी मानसिक शक्ति व्यक्त झालेली आहे, त्या शक्तीपेक्षां श्रेष्ठ अशी जाणीवशक्ति, कीटकवर्गांत व पशुवर्गांत काम करीत आहे. या जाणिवेंत उच्चतम मानवी मनापेक्षां अधिक बुद्धि आहे, अधिक हेतुपुरस्सरता किंवा नियोजनकौशल्य आहे, आपल्या हेतूंचें, आपल्या प्रयोजनांचें साधनांचें, परिस्थितीचें अधिक सूक्ष्म व नि:संशय असें ज्ञान आहे. जी गोष्ट सजीव निसर्गाची तीच अजीव मानल्या जाणाऱ्या निसर्गाचीहि आहे. तेथेंहि पशुवर्गाप्रमाणें, कीटकवर्गाप्रमाणें सर्वश्रेष्ठ गुप्त बुद्धि सर्वत्र काम करतांना आढळते. श्वेताश्वतरांत सांगितल्याप्रमाणें आपल्या गुणांनी अर्थात् क्रिया-प्रक्रियांनीं झांकून टाकलेली 'देवात्मशक्ति', सर्वश्रेष्ठ बुद्धि किंवा ज्ञानशक्ति, सर्वत्र काम करीत आहे.
या ज्ञानशक्तीच्या सार्वत्रिकतेविरुद्ध जो एक मुद्दा उपस्थित केला जातो, तो निसर्गांत आढळून येणाऱ्या निरर्थक क्रियांचा. निवडीचें, परिस्थितीशीं जुळवून घेण्याचें, विशिष्ट आकांक्षेनें हालचाल करण्याचें, हें सर्व बुद्धीचें हेतुपुरस्सर कार्य निसर्गांत चाललें आहे; या सर्व हेतुपुरस्सर कार्याच्या मुळाशीं, जाणीवयुक्त, बुद्धियुक्त कोणीतरी असलें पाहिजे या कल्पनेला विरोध करणारी निसर्गांतलीच एक गोष्ट म्हणजे, त्याच्या कार्यांत जो अर्थशून्य निरुपयोगी गोष्टींचा भरणा असतो किंवा दिसतो ती होय. आद्यशक्ति ही ज्ञानशक्ति आहे या सिद्धान्ताला बलवान् विरोध करणारा वस्तुत: हा एकच मुद्दा आहे. पण त्याला कारण आमची अगदीं मर्यादित अशी मानवी बुद्धि आहे. सर्वस्थळीं, सर्वकाळीं चालणाऱ्या विश्वशक्तीच्या क्रियांना मर्यादित मानवी बुद्धि आपलें युक्तायुक्ततेचें, निरर्थक-सार्थकतेचें मोजमाप लावूं पाहते. हें मोजमाप मानवी मर्यादित उद्दिष्टाच्या दृष्टीनें बरोबर असलें, तरी विश्वशक्तीच्या महाव्यापक संसाराला हें एकदेशीय बुद्धिवादी मोजमाप जाणूनबुजून लावणें चुकीचें ठरतें. कारण निसर्गाच्या हेतूचा, प्रयोजनाचा एखादा अंश आपण पाहूं शकतो, जाणूं शकतो. त्या अल्प प्रयोजनाला जें उपयुक्त नाहीं, तें सारें निरुपयोगी व निरर्थक, असें आम्हीं म्हणत असतो. आमचें मानवी कार्य पाहिलें, तर त्यांतहि विशिष्ट व्यक्तीच्या दृष्टीनें पुष्कळशी निरर्थकता नजरेस येते,
पान क्र. १६६
तथापि या निरर्थक वाटणाऱ्या गोष्टी विश्वाच्या व्यापक हेतूंच्या दृष्टीनें उपयुक्त असतात, हेंहि आपण पाहूं शकतो. किंवा असेंहि म्हणतां येईल कीं, या निरर्थक भासणाऱ्या गोष्टींच्या मदतीनेंच निसर्ग आपला हेतु सफल करतो. आपल्याला निसर्गाचे जे हेतू कळतात, त्यासंबंधांनें ही गोष्ट लक्षांत घेतां, त्याचे जे हेतू आपल्याला कळत नाहींत, त्यांच्यासंबंधानें आपण निसर्गावर असा विश्वास ठेवण्यास हरकत नाहीं कीं, आमच्या अल्पदर्शी मानवी बुद्धीला निरर्थक वाटणाऱ्या गोष्टींच्या द्वारां ते हेतू पूर्ण करून घेण्यास तो समर्थ आहे.
निरर्थक वाटणाऱ्या गोष्टी, निसर्गाच्या व्यापक दृष्टीनें निरर्थक नसतात, हें सत्य ओळखलें म्हणजे निसर्ग निर्माण करणारी व चलविणारी आद्याशक्ति ही ज्ञानशक्ति आहे, या सिद्धान्ताला निःसंदेह मान्यता मिळावयास कांहींच अडचण राहत नाहीं. कारण पशुवर्ग, वनस्पतिवर्ग व जड वर्ग या सर्वांत विश्वशक्तीची, आद्याशक्तीची जी नानाविध क्रिया चालते, तिच्यांत निश्चित प्रयोजनाची आद्य प्रेरणा असते. दर्शनीं आंधळी वाटणारी प्रवृत्ति डोळस मार्गदर्शन करते, ठरलें असेल तें प्रयोजन अविलंबानें किंवा थोड्या विलंबानें कां होईना पण निरपवादपणें निश्चितपणें सफल होतें, या गोष्टी कोणालाहि नाकारतां येण्यासारख्या नाहींत. जडद्रव्य हा विश्वारंभ व जडद्रव्य हाच विश्वाचा शेवट असें भौतिक शास्त्रज्ञांच्या बुद्धीला जोंपावेंतों प्रामाणिकपणें वाटत होतें, पटत होतें, तोंपावेतों, निसर्गांत दिसणाऱ्या बुद्धियुक्त क्रियांचें मूळ कोणी श्रेष्ठ बुद्धीच असली पाहिजे, या कल्पनेला सत्य म्हणून मान्यता देणें वैज्ञानिकांना साहजिकच अप्रमाणिकपणाचें वाटे. परंतु आज ही स्थिति पालटली आहे. ''निसर्गाचें मूळ, बुद्धिशून्य व ज्ञानशून्य आंधळी प्रेरणा आहे; त्या मूळ आंधळ्या प्रेरणेंत, त्या मूळ नेणिवेंत, मानवी जाणिवेचें, बुद्धीचें, वा मानवी सामर्थ्याचें कसलेंहि अगदीं प्राथमिक स्वरूप देखील अंतर्भूत, अंतर्हित नव्हतें -- तरीपण त्या मूळ नेणिवेंतून मानवी जाणीव उदयास आली'', हा विरोधात्मक सिद्धान्त आज जीर्ण व निर्बुद्ध कल्पनांच्या वर्गांत जाऊन बसला आहे. मानवी जाणीव ही निसर्गाच्या जाणिवेचा एक प्रकार आहे, असलाच पाहिजे; निसर्गांत जाणीव असल्याशिवाय मानवांत जाणीव येऊं शकत नाहीं, हें सत्य आतां स्पष्ट झालें आहे. निसर्गांत मनाचा उदय होण्यापूर्वीं, जाणीव दुसऱ्या कमीअधिक गुप्त रूपांत काम करीत असते; नंतर ती जाणीव मानवांत मनाचें रूप घेते, आणि मनाच्या नंतर
पान क्र. १६७
मनापलीकडील श्रेष्ठ रूपेंहि ती धारण करणार आहे, अशी खरी स्थिति आहे; कारण विश्वाची उभारणी करणारी आद्यशक्ति ही जाणीवशक्ति आहे, ज्ञानशक्ति आहे; आणि या विश्वांत व्यक्त होणारें आद्य अस्तित्व, आद्य सद्वस्तु हा ज्ञानमय पुरुष आहे. विश्व म्हणजे अनंत रूपांचा संसार. ज्ञानमय पुरुषानें आपल्या ज्ञानशक्तीच्या द्वारां हा जो संसार निर्माण केला आहे, तो कशासाठीं, याचा विचार केल्यास असें म्हणावें लागतें कीं, त्या ज्ञानमय पुरुषांत जें जें कांहीं बीजरूपानें आहे, तें तें सर्व व्यक्त व्हावें, साकार व्हावें व ही साकारता सर्वथा पूर्ण अशी व्हावी हा एकच, या आकारमय विश्वाच्या निर्मितीचा, आविष्काराचा उद्देश आहे. आपल्या बुद्धीला पटण्यासारखें असें हें एकच उत्तर दिसते.
पान क्र. १६८
Home
Sri Aurobindo
Books
SABCL
Marathi
Share your feedback. Help us improve. Or ask a question.