दिव्य जीवन 1879 pages 1960 Edition
Marathi Translation
  Senapati Bapat

ABOUT

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics, expounding a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth.

THEME

philosophymetaphysics

दिव्य जीवन

Sri Aurobindo symbol
Sri Aurobindo

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.

Sri Aurobindo Birth Centenary Library (SABCL) The Life Divine Vols. 18,19 1070 pages 1970 Edition
English
 PDF    philosophymetaphysics
Sri Aurobindo symbol
Sri Aurobindo

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.

Marathi Translations of books by Sri Aurobindo दिव्य जीवन 1879 pages 1960 Edition
Marathi Translation
Translator:   Senapati Bapat  PDF    LINK

प्रकरण सतरावें

 

दिव्य आत्मा

 

ज्याचा आत्मा सर्व भूतें झाला आहे, जो सर्वत्र एकतत्त्व पाहतो, त्याला ज्ञान हस्तगत असल्यानें, मोह कसा होईल? शोक कोठून होईल?

- ईश उपनिषद् ७.

 

अतिमानसाची कल्पना आपण समजून घेतली आहे, आपलें मानवी जीवन ज्या मनाच्या पायावर उभारलेलें आहे, त्या मनाच्या विरुद्ध गुण अतिमानसांत आहेत, हें आपण पाहिलेलें आहे. मन आणि अतिमानस या दोहोंची कल्पना आपल्याला याप्रमाणें स्पष्टतेनें आल्यानें, दिव्यता, दिव्यजीवन या संबंधींची आपली कल्पना आतां अंधुक, अस्पष्ट राहण्याचें कारण नाहीं; या संबंधींची स्पष्ट रेखीव कल्पना आतां आपण करूं शकतों, एवढेंच नव्हे, तर या दिव्यतेची आणि दिव्य जीवनाची कल्पना आतां आपण तत्त्वज्ञानी युक्तिवादाच्या भक्कम पायावर प्रतिष्ठित करूं शकतों. मानवता आणि मानवी जीवन यांच्याशीं, दिव्यत्व आणि दिव्य जीवन यांचें असलेलें नातें स्पष्टपणें पाहूं शकतों आणि विश्वाचा मूळ स्वभाव, आमचें विश्वगत पूर्ववृत्त आणि आमचा अटळ भावी विकास यांच्या आधारावर दिव्यता व दिव्य-जीवन या संबंधींची आमची आशा व आकांक्षा पूर्णपणें समर्थनीय आहे हें निःसंशय रीतीनें आपण जाणूं शकतों. आज आम्हांला फक्त मानवता व मानवी जीवन यांचाच अनुभव आहे. अतिमानसाची कल्पना नसतांना, मानवी जीवन व मानवता यांच्या पलीकडील दिव्य-जीवन व दिव्यता यांचा अनुभव मिळावा असें आम्हांस वाटलें, तरी या मोठ्या कल्पना स्पष्ट नव्हत्या, मोठी आकांक्षा व्यक्त करणाऱ्या अंधुक अशा ह्या कल्पना होत्या. अतिमानसाची ओळख झाल्यानें, दिव्यतत्त्व व ईश्वर म्हणजे काय याची आतां आमच्या बुद्धीला चांगली कल्पना येते, शाश्वत सत्य आमची बुद्धि ग्रहण करूं शकते व या शाश्वत सत्यांतून, ईश्वरी तत्त्वांतून विश्व कसें आलें हें आमच्या बुद्धीला कळूं शकतें. आम्हांला हेंहि समजतें कीं, ईश्वरापासून जें निघालें आहे, तें ईश्वराप्रत अवश्य परत गेलेंच पाहिजे. आतां आम्ही

 

पान क्र. २८२

 

विचारूं शकतों कीं, ईश्वराजवळ परत जावयाचें तर आहेच तेव्हां आमचा स्वभाव, आमचें जीवन, आमचीं इतरांशीं असलेलीं नातीं यांत आम्हीं कोणता बदल करावा? आम्हीं या सर्व बाबतींत कसें व्हावें म्हणजे ईश्वराचें सान्निध्य आम्हीं मिळविल्यासारखें होईल? आमच्या खोल अंतर्यामांत एकांत साधून, समाधि सुखाचा, ईश्वर सान्निध्याचा व ईश्वरांत विलीन होण्याच्या आनंदाचा अनुभव आम्हांला घेतां येईल; पण त्याचें आम्हांला जितकें आकर्षण आहे; तितकेंच दिव्य-जीवन जगून ईश्वररूप होण्याचें, ईश्वरसान्निध्य मिळविण्याचेंहि आकर्षण आम्हांला आहे; आणि याप्रमाणें दिव्य-जीवन जगणें म्हणजे काय हा प्रश्न, आतां अतिमानसाची ओळख झाल्यावर आम्ही विचारूं शकतों. या प्रश्नाचें उत्तर बरेंच स्पष्ट असें आतां आम्हांला मिळूं शकतें; आमचा प्रश्न आम्हांला लाभदायक होईल असा आतां संभव उत्पन्न झाला आहे. मात्र एक उणीवेची गोष्ट आमच्या आतांपर्यंतच्या विवेचनांत अशी आहे कीं मर्यादित निसर्गाकडे उतरून येत असतां, ईश्वरी-तत्त्वाचें स्वरूप कसें असतें, कसें बदलतें त्याची व्याख्या करण्याचा आम्हीं आतांपावेतों प्रयत्न केला आहे--आणि आम्ही कांहीं वरून खालीं येत नाहीं, आम्ही व्यक्तिभूत ईश्वरी तत्त्व आहों, आम्ही मर्यादित निसर्गांत आहों आणि आमचें मूळ ईश्वरी तत्त्व गांठण्यासाठीं आम्ही या निसर्गांतून वर चढत आहों--अर्थात् आतांपर्यंतचें विवेचन आम्हांला जसेंच्या तसें उपयोगी पडणारें नाहीं, ही त्यांतील उणीव आहे. असो. अतिमानसाचें क्षेत्र सच्चिदानंदाच्या खालचें; त्या क्षेत्रांत राहणारे, खालीं न उतरलेले तेथील देव व त्यांचें जीवन आणि मनाच्या क्षेत्रांतून वर चढून अतिमानसाच्या क्षेत्रांत जाणारे आम्ही, प्रथम देवत्व घालवून खालीं तळापर्यंत दौरा करून, परत वर चढून देवत्व मिळविणारे आम्ही मानव, ''देवभूत मानव'' यांचें जीवन; या दोन जीवनांत कांहीं फरक जरूर असणार आणि हा आमच्या ''देशाटनाच्या'' अनुभवाचा फरक असणार, खालीं न उतरलेल्या देवांपेक्षां आम्ही अनुभवानें अधिक श्रीमंत असणार! तथापि देवत्वाच्या सारभूत लक्षणांत मात्र, त्यांच्या आमच्यांत फरक असूं शकणार नाहीं. तेव्हां हें सारभूत देवत्व कशांत असतें? जें दिव्य-जीवन आम्ही जगूं इच्छितों, त्याचें सारभूत स्वरूप काय, तें आतां पहावयाचें आहे.

आम्ही ज्या दिव्य आत्म्याचें जीवन पहाणार आहों, तो दिव्य आत्मा

 

पान क्र. २८३

 

अज्ञानाच्या क्षेत्रांत उतरलेला नाहीं. त्याचें चैतन्य जडांत सुप्त झालेलें नाहीं, भौतिक जड निसर्गाचें त्या आत्म्याला ग्रहण लागलेलें नाहीं--असा उच्च शुद्ध स्थितींतला दिव्य आत्मा आपण पहात आहों; वस्तूंचें मूळ सत्य या आत्म्याचें जीवनक्षेत्र आहे, मूळ स्वयंसिद्ध एकत्व ही त्याची नित्य अनुभूति आहे, त्याचें अस्तित्व अनंत असून, स्वतःच्या अनंत अस्तित्वाच्या जगांत तो दिव्य आत्मा आपलें जीवन जगत आहे, ही त्याची जीवनकथा मूळ ईश्वराच्या जीवनाचीच कथा आहे, यापेक्षां वेगळा पैलूहि या दिव्य आत्म्याच्या जीवनाला आहे; ईश्वरी मायेच्या खेळांत तो भाग घेत आहे, सर्वसमावेशक सर्वदर्शी सत्य-जाणीव आणि त्रिपुटीबद्ध अंशदर्शी सत्य-जाणीव हे दोन सत्यजाणिवेचे प्रकार या दिव्य आत्म्याला उपलब्ध असल्यानें, तो ईश्वराशीं जसें एकत्व अनुभवतो, तसें त्यापासून वेगळेपण देखील अनुभवतो; तसेंच इतर आत्म्यांशींहि एकत्व आणि विभक्तत्व एकाच वेळीं त्याला अनुभवतां येतें व तो अनुभवतोहि. एकच एक परम ईश्वरी तत्त्व, स्वतःच अनेक झालें आहे. या त्याच्या एकत्वाधिष्ठित अनंत अनेकतेच्या लीलेंत, दिव्य आत्मा हा ईश्वराशीं आणि स्वतःसारख्या इतर आत्म्यांशीं एकत्व आणि अनेकत्व, अभेद व भेद सहजतेनें, अटळपणें अनुभवीत असतो. अशा दिव्य आत्म्याची जाणीव, अस्तित्व व जीवन आम्हांला ओळखीचें करून घ्यावयाचें आहे.

असा दिव्य आत्मा सच्चिदानंदाच्या ज्ञानपुरःसर लीलेमध्यें त्या लीलेचा शाश्वत घटक म्हणून असणार हें उघड आहे. अस्तित्वदृष्टीनें हा दिव्य आत्मा शुद्ध, अनंत व स्वयंभू अस्तित्व भोगणारा असेल; जीवनदृष्टीनें अमर जीवनाचा अमर्यादित मुक्त खेळ तो खेळत असणार; त्याला मृत्यु, जन्म, शरीरांतर या गोष्टी नसणार; कारण अज्ञानाचा पडदा, आमच्या भौतिक अस्तित्वाच्या अंधाराचा पडदा त्याच्यापासून दूर असेल. दुसरी गोष्ट, शक्तीच्या दृष्टीनें त्याची जाणीवशक्ति शुद्ध अनन्त असेल, तिचा पाया शाश्वत प्रकाशपूर्ण शान्ति हा असेल; तथापि ज्ञानाचे आकार, ज्ञानयुक्त शक्तीचे आकार मुक्तपणे धारण करून लीला करणारी अशी त्याची जाणीवशक्ति असेल; अडखळत मार्गक्रमण करायला लावणाऱ्या मनाच्या चुका हा दिव्य आत्मा करणार नाहीं; या चुकांच्या बाधेपासून तो अलिप्त, शांत असेल, आपल्या धडपडणाऱ्या इच्छाशक्तीकडून घडणाऱ्या गोंधळापासूनहि तो अलिप्त राहील; कारण सत्यापासून तो कधींहि दूर होत नाहीं; एकतेच्या अनुभूतीला तो कधीं पारखा होत नाहीं; त्याच्या दिव्य

 

पान क्र. २८४

 

अस्तित्वांत स्वयंभूपणें असलेला प्रकाश आणि स्वभावत: असलेला सुसंवाद या गोष्टींपासून तो केव्हांहि च्युत होत नाहीं. तिसरी गोष्ट आनंदाची. या दिव्य आत्म्याला शाश्वत अस्तित्वाचा जो अनुभव भोगतां येतो, तो अनुभव शुद्ध, स्वयंभू आनंदाचा असतो; तसेंच या आत्म्याला कालव्याप्त, कालव्यापी लीला क्रमप्राप्त असते, त्या लीलेंत त्याला आनंदाचे विविध प्रकार मुक्तपणें भोगावयास मिळतात; कारण आमच्या विकृती, घृणा, द्वेष, असमाधान, उद्वेग, या त्याला बाधा करीत नाहींत; आम्ही अस्तित्वांत विभागलेले आहोंत; आमची आग्रही इच्छाशक्ति सारखी चुकत असते; आमची वासना आंधळी प्रेरणा देऊन आम्हांला भलतें करावयास लावते; म्हणूनच घृणा, द्वेष, इत्यादि विकृतींचा ससेमिरा आमच्या पाठीमागें लागतो; दिव्य आत्मा या कटकटीपासून मुक्त असल्यानें, त्याला मुक्तपणें मूळ अस्तित्वाचा शुद्ध आनंद आणि लीलेचा विविध आनंद भोगावयास मिळतो.

या दिव्य आत्म्याची जाणीव, अनंत सत्याचा कोणताहि अंश पूर्णपणें जाणते, कोणत्याहि अंशापासून ती दूर नसते; दुसऱ्या आत्म्यांशीं या आत्म्याचीं जीं नातीं असतात, त्या नात्यांत या आत्म्यानें एखादी विशिष्ट बैठक स्वीकारली, तरी या बैठकीमुळें त्याला मर्यादा पडत नाहींत व त्यामुळें अनंत सत्याचा कोणताहि अंश त्याच्या नजरेआड होत नाहीं; त्यानें वरवर व्यक्तित्व धारण केलें, व्यवहारासाठीं भेद स्वीकारला, तरी त्याचें आत्मज्ञान पूर्ण असतें, त्यांत कमीपणा येत नाहीं. त्याची आत्मानुभूति त्याला नेहमीं निरतिशय परमतत्त्वाच्या निकट संगतीचा अनुभव देते. मी परमतत्त्वाच्या निकट आहे असाच अनुभव त्याला शाश्वतचा असतो. आम्हांला हें परमतत्त्व एक कल्पना मात्र आहे; ज्याची व्याख्या करतां येत नाहीं, अशा अस्तित्वाला आमची बुद्धि परमतत्त्व, परात्पर केवलतत्त्व, ब्रह्म अशी संज्ञा देते; तें अज्ञेय आहे, आमचें ज्ञान आणि स्वत: ब्रह्माचें स्वविषयक ज्ञान यांत अंतर आहे अशी कल्पना आमची बुद्धि बांधते; परंतु या ब्रह्माची संगति आम्हांला घडविणे हें कार्य ती करूं शकत नाहीं. दिव्य आत्म्याची गोष्ट याहून अगदीं वेगळी आहे. तो वस्तूंच्या सत्य रूपांत वावरतो, परमतत्त्वाचा मी एक आविष्कार आहे, ही नित्य जाणीव व नित्य अनुभूति त्याला असते. या आत्म्याचें जें अक्षर अस्तित्व असतें, तें अस्तित्व परात्पर परमतत्त्वाचें मूळ स्वरूप 'सच्चिदानंद' आहे, अशी जाणीव त्याला असते. त्याचा जो जाणीवयुक्त

 

पान क्र. २८५

 

अस्तित्वाचा--जीवनाचा--खेळ असतो, तो खेळ म्हणजे त्या परमतत्त्वाचा आविष्कार आहे, तो खेळ म्हणजे सच्चिदानंदाचे लीलामय आकार आहेत, अशी जाणीव त्याला असते. त्याची प्रत्येक ज्ञानक्रिया, ज्ञानस्थिति, म्हणजे अज्ञेय परमतत्त्वाच्या विविध आत्मज्ञानाची स्थिति, अशी जाणीव त्याला असते; त्याची सामर्थ्याची, इच्छाशक्तीची, वीर्याची प्रत्येक स्थिति व कृति म्हणजे परात्पराची स्वत:ला स्वाधीन ठेवण्याची क्रिया आहे, परात्पराच्या अस्तित्वाच्या व ज्ञानाच्या शक्तीचा एक सरूप आविष्कार आहे, अशी जाणीव त्याला असते; त्याची आनंदाची, प्रेमाची प्रत्येक अवस्था व कृति, परात्पराची स्वत:ला आलिंगन देण्याची कृति आहे, परात्पराचा जाणीवयुक्त आत्म-तर्पणाचा, आत्मसुख-भोगाचा तो एक प्रकार आहे, अशी जाणीव त्याला असते. या प्रमाणें दिव्य आत्म्याची जाणीव, सर्व अवस्थांत व सर्व कृतींत सदासर्वदा परात्परमय असेल. दिव्य आत्म्याला घडणारा परात्पराचा अनुभव म्हणजे एकाद्या वेळीं ओझरता आलेला किंवा प्रयत्नांतीं मिळविलेला, परंतु मुश्किलीनें टिकणारा अनुभव नसतो; नेहमींची अवस्था वेगळी आणि परात्पराचा अनुभव या अवस्थेला जोडून मिळालेला किंवा मिळविलेला, या अवस्थेवर कळस म्हणून लाभलेला, असा तो अनुभव नसतो; तर त्याचा हा अनुभव त्याच्या अस्तित्वाचा पायाच असतो. एकतेची काय किवा भेदस्थितिची काय, दोन्ही प्रकारची दिव्य आत्म्याची लीला ही परात्पराच्या या अनुभूतीवर अधिष्ठित असते. त्याचें सर्व जाणणें, संकल्प करणें, कृति करणें, आनंद अनुभवणें हें सर्व परात्परमय असतें; त्याचा कालातीत आत्मा आणि त्याच्या काळाचा प्रत्येक क्षण परात्पराच्या अनुभूतीनें भरलेला असतो. त्याचा स्थलातीत आत्मा आणि त्याचे स्थलनिष्ठ विस्तारांतील प्रत्येक स्वरूप परात्परमय असतें. सर्व कार्यकारणभाव आणि सर्व परिस्थिति यांच्या अतीत असलेली त्याची निर्भेळ सर्व-निरपेक्ष शुद्धता आणि त्याची परिस्थितिबद्ध पूर्वयोग-सापेक्ष कारणभावनियंत्रित अशी शुद्धेतर अवस्था, दोन्ही सारख्याच परात्परमय असतात. याप्रमाणें परात्पराची शाश्वत संगति दिव्य आत्म्याला लाभत असल्यानें, त्याला अनंत स्वातंत्र्य, अनंत आनंद यांचा लाभ होतो; परात्पराच्या लीलेंत त्याला कसलीहि असुरक्षितता स्पर्श करीत नाहीं; त्याच्या दिव्य अस्तित्वाचा व दिव्य जीवनाचा जीवनरस, सारभूत सत्त्व, मूळ आधार, त्याची ही शाश्वत परात्परमयताच त्याला पुरविते.

 

पान क्र. २८६

 

सच्चिदानंदाच्या शाश्वत अस्तित्वाचे जे दोन अविभाज्य पर्याय, परात्पराच्या आत्म-अभिव्यक्तीचे जे दोन अविभाज्य ध्रुवबिंदू--एकता आणि अनेकता-- यांचे दोन प्रकारचें जीवन दिव्य आत्मा एकाच वेळीं अनुभवील, व्यवहारांत आणील. वस्तुत: जें कांहीं अस्तित्वांत आहे, तें सर्वच याप्रकारें दोन पर्यायांचें जीवन जगत असतें; परंतु आमची आत्म-जाणीव विभागलेली आहे आणि तिला हे दोन पर्याय एकमेकांशीं विसंगत दिसतात; आणि म्हणून या दोहोंपैकीं एक जीवन ती पसंत करते; ती अनेकतेंत राहणें पसंत करते व असें करतांना प्रत्यक्ष आणि पूर्ण एकत्वाची अनुभूति, ती आपण होऊन दूर सारते किंवा ती एकतेच्या अनुभूतींत राहणें पसंत करते आणि असें करतांना अनेकतेची अनुभूति ती दूर सारते. दिव्य आत्मा याप्रकारें अकारण द्वैताचा, जीवनैक्यविच्छेदाचा दास होत नाहीं. त्याला एकाच वेळीं स्वतःमध्यें अनन्त आत्म-एकीभवन आणि अनन्त आत्म-विस्तार, आत्म-प्रसार यांचा अनुभव घेतां येतो. परात्पर एकतत्त्व, स्वतःच्या एकतामय जाणिवेंत अपार अनेकता ह्या संभाव्य म्हणून, अव्यक्त म्हणून धारण करतें; (आमच्या मनाला अर्थातच हें जें अव्यक्त, तें अभावासारखेंच वा अभावच वाटतें.) आणि तेंच एकतत्त्व, स्वतःच्या जाणीवयुक्त अस्तित्वाची, संकल्पाची व आनंदाची लीला म्हणून गतिमान् असणारी अशी व्यक्त अनेकता, स्वतःच्या विस्तारमय जाणिवेंत धारण करतें. आम्ही ज्याचें स्वरूप पाहत आहोंत, तो दिव्य आत्मा, स्वतःमध्यें परात्पर एकतत्त्वाचे हे दोन कारभार एकाच वेळीं समग्रतेनें अनुभवतो. एकतत्त्व आणि त्याचीं अनेक रूपें यांचें अन्योन्य-आकर्षण या दिव्य आत्म्याला स्पष्टपणें अनुभवावयास मिळतें; अनेक रूपांचा शाश्वत उगम व त्यांचें पायाभूत असें जें एकतत्त्व, त्याला आपल्याकडे आकर्षित करून, त्याच्या उच्च पातळीवरून त्याला आपल्या पातळीवर आणण्यांत नित्य मग्न असलेलीं अनेक रूपें या दिव्य आत्म्याच्या नजरेस पडतात; त्याचबरोबर जें एकतत्त्व या अनेक रूपांच्या भेदमय लीलेचें आनंदपूर्ण समर्थन करणारें आहे आणि या लीलेच्या शाश्वत कळसासारखें आहे, त्या एकतत्त्वाचा आकर्षणानें हीं अनेक रूपें त्याजकडे चढत जाण्याचा नित्य प्रयत्न करीत असलेलीं दिव्य आत्म्याच्या नजरेस पडतात. दिव्य आत्म्याच्या दृष्टीसमोर वस्तुजाताचा हा महान् देखावा नित्य असतो. हें महान् वस्तु-दर्शन दिव्य आत्म्याच्या सत्य-जाणिवेचें अंगभूत दर्शन आहे. वैदिक ऋषींनीं ''सत्यं कृतं बृहत्'' असें जें सत्य-जाणीवविषयक

 

पान क्र. २८७

 

मंत्र-गान केलें, त्याचा पाया हें महान् वस्तु-दर्शन आहे; अन्योन्य-विरोधी सर्व पर्यायांची ही एकात्मता, ही एकता हें खरें ''अद्वैत'' होय. परम अज्ञेयाचें ज्ञान ज्यांत सामावलें आहे, असा सर्वोच्च, सर्वसमावेशक शब्द ''अद्वैत'' हाच आहे. दिव्य आत्मा या अद्वैतांत आपलें जीवन व्यतीत करीत असतो.

एकतत्त्व हें मूलत: अनंत आहे, त्याची आत्मकेन्द्रित घनीभूत एकता ही असीम व अनंत आहे, त्याप्रमाणें त्याची विस्ताराची स्थिति हीहि अनन्त आहे. अनन्त एकतेचे हे दोन प्रकार आहेत, एक विस्तारशून्य घनीभूत आत्मैककेंद्रित एकता आणि दुसरी विस्तारमय प्रवाही आत्मप्रसार-विशिष्ट एकता. अस्तित्व, जाणीव, संकल्प आणि आनंद या मूळ एकतत्त्वाच्या चार पैलूंत नानाविधता उत्पन्न झालेली दिव्य आत्म्याच्या प्रत्यायास येते आणि ही नानाविधता मूळ घनीभूत एकतेचाच प्रवाह, विस्तार व प्रसार असून त्यांत वस्तुत: भेद आणि विभागणी यांचा कांहीं संबंध नाहीं. या नानाविधतेचें खरें स्वरूप म्हणजे मूळ घनीभूत, विस्तारशून्य एकतेनें, स्वत: होऊन घेतलेलें विस्तारमय रूप आहे. पूर्वीचें रूप आणि हें नवें रूप हीं दोन्हीं एकतेचींच रूपें आहेत, ही गोष्ट दिव्य आत्मा ओळखतो. स्वत:च्या अस्तित्वाच्या सारभूत अंशांत हा दिव्य आत्मा सदैव घनीभूत एकतेचा असेल आणि स्वत:च्या अस्तित्वाच्या विस्तारमय स्थितींत हा दिव्य आत्मा सदैव नानाविध रूपें घेऊन व्यक्त होत राहील. त्याचे ठिकाणीं जें कांहीं साकार होईल तें सर्व, एकतत्त्वांतील शक्तिबीजांचें व्यक्त स्वरूप असेल; अनाम, अशब्द शांतींतून नाम किंवा शब्द स्पंदन करीत त्याचे ठिकाणीं व्यक्त होईल; त्याचे ठिकाणीं निराकार सारतत्त्वाला आकार हा व्यक्तांत आणील; शांत शक्तीला प्रेरणा होऊन, तींतून क्रियाशील संकल्प वा वीर्य त्याचें ठिकाणीं बाहेर येईल; 'मी आत्मा' अशा जाणिवेचा किरण कालातीत आत्मज्ञानांतून सूर्यकिरणाप्रमाणें त्याचें ठिकाणीं पुढें येईल; शाश्वत आत्म-जाणिवेच्या एकरूप अस्तित्वांतून, 'मी अमुक' अशीं जाणीवयुक्त रूपें धारण करणारी विभूतींची लाट त्याचें ठिकाणीं उसळेल. जिवन्त झऱ्यांतून अखंडपणें पाणी वर यावें त्याप्रमाणें शाश्वत शांत सुखांतून आनंद आणि प्रेम नित्यश: त्याचे ठिकाणीं वर येत राहतील; दिव्य आत्म्याच्या अस्तित्वाचा गाभा परात्पर एकतत्त्वाचा असतो; त्यांत जें सर्व कांहीं शक्तिरूपानें, बीजरूपानें असतें, तेंच पुढें त्याच्या विस्तारमय रूपांत स्वयंप्रेरणेनें व्यक्त होतें. या दिव्य आत्म्याचा स्वत:चा आविष्कार म्हणजे परात्पराच्या अद्वैतमय द्वैताचा किंवा द्वैतमय अद्वैताचा

 

पान क्र. २८८

 

आविष्कार होय. या आविष्कारांत जें कांहीं अन्यसापेक्ष व्यक्त होतें, तें एकप्रकारें स्वतःपुरतें परात्परासारखेंच अन्यनिरपेक्ष असतें; कारण तें हें जाणून असतें कीं, मी परात्पराचा आविष्कार आहे; तसेंच त्याचे ठिकाणीं अज्ञान असत नाहीं; आणि म्हणून 'अन्यसापेक्ष इतर गोष्टी परक्या नाहींत' ही जाणीव त्याला असते, व स्वतःइतक्याच इतर अन्यसापेक्ष रचना पूर्ण आहेत, हीहि अनुभूति त्याला असते.

अतिमानसाच्या क्षेत्रांत अस्तित्वाच्या तीन पायऱ्या असतात हें आपण पाहिलें आहे; दिव्य आत्मा जेव्हां एकतत्त्वाच्या विस्तारमय अस्तित्वांत जीवन जगतो, तेव्हां वरील तीन पायऱ्या त्याच्या समोर असतात; पण आम्ही आमच्या मनाच्या पातळीवरून या पायऱ्यांना जशा तीन समजतो, तसा तीनपणा दिव्य आत्म्याच्या दृष्टीनें त्यांच्या ठिकाणीं नसतो; सच्चिदानंद परमतत्त्व साकार होतांना, व्यक्त होतांना या तीन पायऱ्यांचा एकाच वेळीं उपक्रम करतें; त्याच्या एकाच आविष्काराचे हे तीन पैलू आहेत अशी दिव्य आत्म्याची या तीन पायऱ्यासंबंधाची अनुभूति असते. सत्य-ज्ञानपूर्ण अतिमानसाचा पाया महान् सर्वसमावेशकता असतो; या कारणानें दिव्य आत्मा आपल्या सर्वसमावेशक आत्मविषयक अनुभूतीच्या पोटांत वरील तीन पायऱ्यांचा म्हणा, पैलूंचा म्हणा, एकदम एका ज्ञानक्रियेनें संग्रह करूं शकतो; सर्व वस्तूंसंबंधाचा, सर्व अस्तित्वासंबंधाचा या दिव्य आत्म्याच्या बुद्धीचा, मनाचा, इन्द्रियांचा अनुभव एकाच वेळीं तीन प्रकारच्या दिव्य स्वरूपाचा असतो :-- १) आत्माच सर्व वस्तु बनलेला आहे, हा आत्मा माझा आत्मा आहे, सर्वांचा आत्मा आहे; येथें सारभूत अस्तित्व (Self-being) हें आत्मा असून, विभूतिमय अस्तित्वहि (Self-becoming) आत्माच आहे; विभूतींत अलग अलगपणा नाहीं, माझ्या आत्मजाणिवेच्या पोटांत सर्व विभूती आहेत--त्यांना जाणिवेच्या बाहेर अस्तित्वच नाहीं; २) सर्व अस्तित्वें -- सर्व जीव एकाच आत्म्याचे आकार आहेत; प्रत्येक साकार आत्मा अस्तित्वदृष्टीनें मूळ एक आत्म्यांत आहे, या एकांत प्रत्येक आत्मविभूतीला विशिष्ट दृष्टिकोन आहे; या एकांतच रहाणाऱ्या दुसऱ्या सर्व विभूतींशीं प्रत्येक विभूतीचीं विशिष्ट नातीं आहेत. मात्र या एकावर सर्व विभूती अवलंबून आहेत; या एकाची व्याप्ति अनन्त असून, तींत प्रत्येक विभूति त्या एकाचा जाणीवयुक्त आकार आहे; स्वत: एकच हें स्वतःच्या निराकार अनन्त स्वरूपांत साकार होऊन, अनन्त जाणीवयुक्त रूपांनीं वावरत आहे; ३) सर्व जीवांना व्यक्तित्व आहे; प्रत्येक जीव

 

पान क्र. २८९

 

दिव्य-व्यक्ति आहे; या दिव्य व्यक्तीला तिचा स्वतंत्र दृष्टिकोन आहे; या प्रत्येक दिव्य-व्यक्तीच्या अन्तर्यामीं परम एकतत्त्व वसति करून आहे; आणि म्हणून प्रत्येक व्यक्ति केवळ आकार नव्हे, केवळ प्रतिमा नव्हे, पूर्ण अशा सत्यरूप एकतत्त्वाचा केवळ आभासमय भाग नव्हे; शांत अद्वैत सागरावरील केवळ पृष्ठभागची फेंसाळ लाट नव्हे, (जीवासंबंधानें मनानें या कल्पना बांधल्या आहेत आणि त्या सहजच अपूर्ण व सदोष आहेत) तर प्रत्येक व्यक्ति पूर्ण-एकरूपांत उदयास आलेलें, स्वत: पूर्ण असेंच रूप आहे; प्रत्येक व्यक्ति मूळ अनंत सत्यांत त्या सत्याला द्विरुक्त करणारें सत्यच आहे; पूर्ण सागराला स्वतःमध्यें पूर्णतया सामावून घेणारी, सागराची लाट, असेंच व्यक्तीचें सत्य स्वरूप आहे; प्रत्येक व्यक्ति अन्य-सापेक्ष रचना तर खरीच, परंतु ही रचना तिच्या आकाराच्या मागें जाऊन अवलोकन केली, तिचें पूर्ण स्वरूप पाहिलें म्हणजे असा प्रत्यय येतो कीं, ती स्वत: सर्व-निरपेक्ष, मूळ एकतत्त्वच आहे. दिव्य आत्म्याचे हे तीन दिव्य अनुभव त्याला एकाच वेळीं मिळणारे असे आहेत.

एका परम अस्तित्वाचे हे तीन पैलू आहेत. आत्मज्ञानाचा आधार या सर्वांना आहे. परम दिव्य-तत्त्वाच्या मानवी साक्षात्कारानुसार उपनिषदांत ही आत्मविषयक अनुभूति तीन प्रकारें वर्णिली आहे. १) आत्मज्ञानी अनुभवतो कीं, त्याचा आत्मा सर्वभूत झाला आहे. २) आत्मज्ञानी स्वतःच्या आत्म्याचे ठिकाणीं सर्व भूतें पाहतो. ३) आत्मज्ञानी सर्व भूतांचे ठिकाणीं स्वतःचा आत्मा पाहतो. आमची सर्व भूतांशीं एकता आहे, ती पहिल्या अनुभूतीवर आधारलेली आहे; आम्ही भिन्न व्यक्ति असून, अभिन्न-एक विश्वात्मा आहोंत, ही गोष्ट दुसऱ्या अनुभूतीवर आधारलेली आहे; आम्ही विश्वरूप असून, आम्हांला व्यक्तित्व आहे, ही गोष्ट तिसऱ्या अनुभूतीवर आधारलेली आहे. आमची मानसिक जाणीव अपूर्ण व सदोष आहे; कोणतीहि गोष्ट नीट आकलन होण्यासाठीं तिला एकांगीपणानें त्या गोष्टीवर, तिच्या भिन्नतेवर, अलगपणावर एकाग्रतेनें जोर द्यावा लागतो. अशी वस्तुस्थिति असल्यानें, आत्मविषयक ज्ञानाच्या, वर सांगितलेल्या तीन बाजू मनाला एकतेनें आकलन करतां येत नाहींत; तें एक बाजू सत्य मानून बाकीच्या असत्य मानतें; सत्याला बहिष्कार घालणारें त्याचें हें अपूर्ण दर्शन महान् सत्याच्या क्षेत्रांत मानवी प्रमादाला नेहमींच जागा करून देतें; सर्वसमावेशक एकतेच्या क्षेत्रांत अन्योन्यविरोधाला, अन्योन्यनिषेधाला नेहमींच डोक्यावर घेतें--अशी आमची

 

पान क्र. २९०

 

मानसिक क्षेत्रांतील शोचनीय अवस्था असली, तरी जो आत्मा अतिमानसिक जाणिवेचा आहे, दिव्यतासंपन्न आहे, त्याचें क्षेत्र त्याच्या स्वभावधर्मानेंच सर्वसमावेशक एकतेचें, अनंत समग्रतेचें क्षेत्र असल्यानें, वर आत्मविषयक जाणिवेच्या ज्या तीन बाजू सांगितल्या, त्या तीन बाजू एकाच आत्मज्ञानाच्या बाजू आहेत, हें तो दिव्य आत्मा ओळखतो; त्याच्या दृष्टीनें आत्मा सर्व भूतें आहे, आत्म्यांत सर्व भूतें आहेत, आत्मा सर्व भूतांचें पोटीं आहे, या तीन अनुभूती वेगवेगळ्‌या नसून एकाच महान् अनुभूतीचीं तीं तीन अंगें आहेत; तीन अंगांची ती एकच महान् अनुभूति आहे. प्रत्येकाची सर्व भूतांशीं एकता, प्रत्येकाची सर्वता, प्रत्येकाची व्यक्तिता या तीन स्वतंत्र अनुभूती नसून, एकाच अनुभूतीचीं तीन अंगें आहेत, हें दिव्य आत्मा अनुभवतो आणि या अनुभवानुसार त्याचें वागणें असतें.

या अतिमानसिक आत्म्यानें दिव्य व्यक्तीच्या व्यक्तित्वाची, व्यक्तित्वाच्या जाणिवेची बैठक घेतली, इतर व्यक्तीशीं वेगळेपणाचा संबंध लक्षांत घेऊन वागण्याचें या अतिमानसिक व्यक्तीनें ठरविलें, तरी तिच्या जाणिवेच्या पायांत ही महान् जाणीव अटळ आणि अढळ असेल : सर्व कांहीं मूळ पूर्ण एकतेच्या पोटीं उदयास आलें आहे, येत आहे; तसेंच या मूळ घनीभूत एकतेची प्रवाही आवृत्ति जी विस्तारमय एकता, तीहि या अतिमानसिक व्यक्तीच्या जाणिवेच्या पाठीमागें उभी असणार--आणि या दोन्ही एकता या व्यक्तीला केव्हांहि अनुभवतां येतील; व्यक्तित्वाच्या जाणिवेंतून उठून, केव्हांहि परत मूळ एकतेच्या किंवा विस्तारमय एकतेच्या जाणिवेंत या व्यक्तीला स्थान घेतां येईल आणि तेथून आपल्या व्यक्तित्वाकडे बारकाईनें पाहता येईल. या सर्व अवस्था देवता अनुभवतात, असें वेदांत दाखविलें आहे. तत्त्वदृष्टीनें सर्व देव एकच अस्तित्व आहेत; या एकच अस्तित्वाला ऋषी भिन्न नांवें देतात आणि ही भिन्न नांवें म्हणजेच देव होत. या देवांचें कर्म पाहिलें, तर महान् सत्य आणि ऋत यापासून तें उगम पावतें; या दोन तत्त्वांवर तें आधारलेलें असतें. या गोष्टीवर लक्ष ठेवून अग्नि किंवा इतर कोणतीहि देवता सर्वदेवतारूप आहे असें म्हटलें जातें; कोणतीहि एक देवता सर्व इतर देवता झाली आहे असें म्हटलें जातें; तसेंच कोणतीहि देवता सर्व देवतांना स्वतःमध्यें समाविष्ट करून आहे, रथचक्राच्या नाभीमध्यें चक्राचे आरे असतात, त्याप्रमाणें सर्व देवता प्रत्येक देवतेशीं संलग्न आहेत, असेंहि म्हटलें जातें. प्रत्येक देवता

 

पान क्र. २९१

 

मूळ एकतत्त्व, देवदेव आहे असेंहि वर्णन येतें. तथापि अग्नि स्वतंत्र देवता आहे, इतर सर्व देवतांना त्याची मदत होते, त्यांच्याहून अग्नीत सामर्थ्य अधिक आहे, ज्ञान अधिक आहे, तरीहि विश्व-व्यवस्थेंत अग्नीला इतर देवतांच्या खालचें स्थान आहे. त्याला इतर देवतांचा दूत, 'होता', कर्मकर्ता म्हणून काम देण्यांत येतें असेंहि वर्णन येतें. विश्वाचा जनक अग्नि आहे, विश्वाचा तो पिता आहे, तरी आमच्या क्रियांमधून तो जन्मास येतो, असें वर्णन येतें. तो जसा मूळ दिव्य आंतरात्मा आहे, तसेंच, व्यक्त झालेला दिव्य आंतरात्मा हेंहि त्याचें स्वरूप आहे, सर्व व्यक्त वस्तूंच्या अंतर्यामीं वास करणारें मूळ एकतत्त्व हेंहि अग्नीचें स्वरूप आहे, असा वेदांतील अग्नीच्या वर्णनाचा अभिप्राय आहे. अग्नीच्या वर्णनाप्रमाणेंच इतर देवतांचेंहि वर्णन वेदांत आढळतें. याचा इत्यर्थ हा कीं, एकता, सर्वता व व्यक्तिता या तीनहि अवस्था देव एकाच वेळीं अनुभवतात.

दिव्य आत्मा हा या देवांसारखा सर्वसमावेशक आत्म-जाणिवेनें युक्त असतो. त्याचा मूळ ईश्वर किंवा त्याचा परम आत्मा आणि दुसऱ्या रूपांतील त्याचे दुसरे आत्मे यांच्याशीं दिव्य आत्म्याचे संबंध त्याच्या सर्वसमावेशक आत्म-ज्ञानानेच निश्चित होतात. अस्तित्व, जाणीव आणि ज्ञान, संकल्प आणि शक्ति, प्रेम आणि आनंद एतद्विषयक हे दिव्य आत्म्याचे संबंध असतात. हे संबंध इतके भिन्न भिन्न असूं शकतात कीं त्यांची गणती करतां येत नाहीं. कोणत्याहि भेदांत एकतेचें भान अढळ राखणारा, आत्म्याआत्म्याचा कोणताहि संबंध या अगणित भिन्न संबंधांत अंतर्भूत होऊं शकेल. उदाहरणार्थ, दिव्य आत्म्याचे आनंदविषयक संबंध घ्या. दिव्य आत्म्याला स्वतःचे ठिकाणी जो अनेक प्रकारचा अनुभव येतो, त्या सर्व अनुभवांचा आनंद तो भोगतो; त्याचीं इतरांशीं जीं नातीं असतात, त्यामुळें त्याला मिळणारा सर्व प्रकारचा अनुभव त्याला आनंद देत असतो; हे इतर रूपांतील इतर आत्मे, विश्वांतील खेळांत विविधता येण्यासाठीं असतात; या इतर आत्म्यांशीं होणारें दिव्य आत्म्याचे हितगुज हें अर्थातच त्याला सर्व प्रकारें आनंददायक असतें; शिवाय या इतर आत्म्यांचे अनुभवहि स्वत:च्या अनुभवाप्रमाणेच दिव्य आत्म्याला आनंद देतात--आणि वस्तुत: हे इतर आत्मे कांहीं वेगळे नाहींत; दिव्य आत्म्याचे ते खरोखरीच अविभाज्य अंगरूप आहेत; आणि म्हणून त्यांचे अनुभव आणि त्यांचा आनंद तो दिव्य आत्म्याचा स्वतःचाच अनुभव आणि आनंद आहे. हा विविध

 

पान क्र. २९२

 

आनंदभोग दिव्य आत्म्याला प्राप्त होऊं शकतो याचें कारण, त्याला मूळ एकतत्त्वाची शाश्वत स्मृति व अनुभूति असते; तें जें एकतत्त्व, तो जो परम आत्मा, दिव्य आत्म्याचा आत्मा, तो सर्व आत्म्यांत वेगळा वेगळा वसति करीत असल्यानें भेदयुक्त दिसला, तरी हे सर्व आत्मे त्या एकतत्त्वाच्या पोटांत असल्यानें, सर्व प्रकारचे हे दर्शनी भेद अभेदाच्या पोटांतच असतात; दिव्य आत्म्याचे स्वतःचे अनुभव, त्याचीं इतरांशीं असलेलीं नातीं, इतरांचे अनुभव, त्या सर्वांची त्याच्या स्वतःशीं असलेलीं नातीं, या सर्व गोष्टी या मूळ एकतत्त्वाचा, स्वतःच्या आत्म्याचा विविध आनंद आहे, त्याची आनंदलीला आहे अशी अनुभूति व कायम स्मृति दिव्य आत्म्याला असते. ही त्याची शाश्वत जाणीव त्याला विविध संबंधांतील विविध आनंद भोगण्यास समर्थ करते. दिव्य आत्म्याचा जो जो अनुभव असतो, त्या त्या अनुभवाचा पायाभूत व प्राणभूत आधार ही एकता, ही एकतत्त्वानुभूतिच असते. या एकतेच्या अनुभूतीच्या पोटांत त्याचे सर्व अनुभव सामावलेले असतात, म्हणून तो सर्वदा आनंदमय असतो; आमच्या विभक्त त्रुटित जाणिवेनें निर्माण केलेले आनंद-विघातक विसंवाद व संघर्ष त्याला स्पर्श करीत नाहींत; तो या विसंवादांच्या पलीकडे असतो; विभक्ततेचा झेंडा मिरविणारा 'मी' व अज्ञान यामुळें आमच्या जाणिवेचे तुकडे पडतात. जाणिवेची एकता नष्ट करणारा अज्ञानाचा व 'मी' चा धक्का दिव्य आत्म्याला लागलेला नसतो, म्हणून दिव्य आत्म्याचे इतर आत्म्यांशीं असलेले विविध संबंध एकमेकांना उपकारक व पूरक असेच असतात. हे सर्व आत्मे बुद्धिपुरस्सर एकमेकांचे हित पाहतात. सर्व काळ चालणाऱ्या सुरेल संगीताचे एकमेकांत मिळून जाणारे भिन्न भिन्न अनंत अन्योन्यपूरक स्वर हीच उपमा या दिव्य आत्म्यांच्या परस्परसंबंधांना बरोबर लागूं पडते; हे संबंध नित्य आनंदपूर्ण असतात.

जी गोष्ट दिव्य आत्म्याच्या आनंदविषयक संबंधांची, तीच गोष्ट इतर संबंधांची--त्याचें अस्तित्व, ज्ञान व इच्छा आणि इतरांचें अस्तित्व, ज्ञान व इच्छा यांच्या परस्परसंबंधांना वरील सुसंवादाचा नियम लागूं आहे. कारण त्याचा अनुभव आणि त्याचा आनंद हा सर्व, त्याच्या अस्तित्वाच्या जाणीवयुक्त आनंदमय शक्तीचा खेळ असतो; या खेळांत एकतेचें सत्य अविरतपणें पाळलें जातें आणि म्हणून ज्ञान आणि इच्छा यांमध्यें संघर्ष किंवा आनंदाचा ज्ञानाशीं वा इच्छेशीं संघर्ष अशी गोष्ट केव्हांहि शक्य नसते; तसेंच एका आत्म्याचें ज्ञान, इच्छा व आनंद दुसऱ्याच्या ज्ञानाशीं,

 

पान क्र. २९३

 

इच्छेशी व आनंदाशीं विसंवादी असत नाहींत, कारण त्या सर्वाना आपण एकाचे अंश आहोंत ही जाणीव सतत असते; आमच्या जीवनांत व अस्तित्वांत भाग पडलेले असल्यानें व ऐक्यभंग झालेला असल्यानें, विसंवाद, संघर्ष, आणि विरोध हे प्रकार आमच्या परस्परांच्या ज्ञान, इच्छा व आनंद यांच्या एकत्र येण्यानें निर्माण होतात; अतिमानसिक क्षेत्रांत स्थिति वेगळी असते; या भिन्न गोष्टींचें एकत्र येणें म्हणजे, एका असीम संगीताच्या भिन्न भिन्न स्वरांचें एकत्र येणें, एकमेकांत मिळणें, एकमेकांना पूरक होऊन जीवन-संगीताची गोडी वाढविणें, असा प्रकार तेथें असतो.

दिव्य आत्म्याचीं अंगें परस्पर सुसंवादी असतील आणि त्याचीं इतर आत्म्यांशीं असलेलीं सर्व नातीं सुसंवादमय असतील या गोष्टी आपण पाहिल्या. आतां, त्याचें ईश्वराशीं, त्याच्या परम आत्म्याशीं जें नातें असतें, त्याचा विचार करावयाचा. सर्वरूप आणि सर्वातीत दिव्य तत्त्वाशीं दिव्य आत्म्याच्या अस्तित्वाचें नातें पूर्ण एकतेचें असतें आणि त्याची अनुभूति त्याला निरंतर असते. त्याच्या व्यक्तिगत जीवनांत त्याचें ईश्वराशीं असलेलें वैयक्तिक एकतेचें नातें त्याला आनंद देतें; सर्व इतर आत्मे त्याचेच अंगभूत आहेत, ही अनुभूति त्याला असल्यानें, ईश्वराचें त्या आत्म्यांशीं असलेलें एकतेचें नातें, हेंहि दिव्य आत्म्याला वैयक्तिक एकतेच्या नात्याप्रमाणें आनंद देतें; सर्वता ही व्यक्तितेप्रमाणेंच दिव्य आत्म्याची नित्य अनुभूति असते आणि सर्वतेच्या पोटांत सर्वच आत्मे असतात--तेव्हां या सर्वांचें ईश्वराशीं असलेलें आनंदपूर्ण एकतेचें नातें, दिव्य आत्म्याला स्वतःच्या व्यक्तरूपाशीं असलेल्या एकतेच्या नात्याइतकेंच जवळचें असतें ही गोष्ट उघड आहे, दिव्य आत्म्याचें ईश्वराशीं जें वैयक्तिक आणि सार्वत्रिक एकतेचें नातें असतें, त्या नात्यांतील ज्ञानविषयक संबंध घेतले, तर या संबंधांत ईश्वराच्या सर्वज्ञतेचा खेळ त्याच्या अनुभवास येतो, ही गोष्ट स्पष्ट आहे; कारण ईश्वर ज्ञानरूप आहे. आपल्या मानसिक भूमीवर आपल्याला जें अज्ञान म्हणून अनुभवास येतें, तें अतिमानसिक भूमीवर वेगळ्या प्रकारें अनुभवास येतें; कांहीं ज्ञान अक्रिय शांत जाणिवेच्या रूपांत मागें ठेवणें व कांहीं सक्रिय करून विशिष्ट क्रियाशील आत्मजाणीवयुक्त व ज्ञानयुक्त रूपें आकारास आणणें, असा ईश्वरी ज्ञानाचा खेळ तेथें चाललेला दिसतो; कांहीं आत्मरूपें सक्रिय ज्ञानशील व्हावींत म्हणून कांहीं ज्ञान अक्रिय शांत जाणिवेच्या रूपांत अव्यक्त ठेवण्याचा खेळ सर्वज्ञ ईश्वर खेळत असतो. जें ज्ञान अव्यक्त ठेवलें जातें, तें आपल्याला मानसिक

 

पान क्र. २९४

 

भूमीवर अज्ञान म्हणून प्रत्ययास येतें. जी गोष्ट ईश्वरी ज्ञानाची, तीच त्याच्या इच्छाशक्तीची, आनंदाची व विभूतियोगाची (Becoming) असते. दिव्य आत्म्याचे अतिमानसिक क्षेत्रांतील इच्छाशक्तिविषयक संबंध पाहतां, या संबंधांत ईश्वराच्या सर्वसमर्थतेचा खेळ अनुभवास येतो; कारण ईश्वर अनिरुद्ध संकल्पशक्तिरूप, सामर्थ्यरूप आहे. आम्हांला येथें जी असमर्थता व जो दुबळेपणा म्हणून दिसतो तो म्हणजे तेथें, कांहीं संकल्पसामर्थ्य शान्त आत्मकेन्द्रित अवस्थेंत मागें ठेवून विशिष्ट शक्तिरूपांना व्यक्त स्वरूपांत पुढें करण्याचा खेळ असतो. प्रेम व आनंद यांच्या संबंधांतील दिव्य आत्म्याचा अनुभव पाहतां, येथें ईश्वरी आनंदातिशयाचा खेळ आपल्या प्रत्ययास येतो--कारण ईश्वर प्रेमरूप, आनंदरूप आहे; आम्हांला येथें ज्या ठिकाणीं प्रेमाचा आणि आनंदाचा अभाव दिसतो, त्या ठिकाणीं अतिमानसिक भूमीवर अशी वस्तुस्थिति असते कीं, ईश्वरी आनंदाच्या सागरांत, कांहीं आनंद अव्यक्त शांत स्थितींत मागें ठेवून, विशिष्ट ईश्वरी मीलनाचीं व आनंदाचीं रूपें, सागरांतील उसळणाऱ्या लाटांप्रमाणें, व्यक्त करून पुढें आणलीं जात असतात. दिव्य आत्मा जीं नाना रूपें धारण करतो त्यांत, वरील प्रेम, आनंद व संकल्पशक्ति इत्यादींच्या क्रियांची प्रतिक्रिया म्हणून ईश्वरी मूळ स्वरूपाचें, नाना विभूतींत रूपांतर होत असलेलें आपल्या प्रत्ययास येईल; या विभूति-योगाच्या क्रियासंभारांत आपल्याला येथें ज्या समाप्ति, मरण, विनाश अशा अवस्था दिसतात, त्या तेथें अतिमानसिक भूमीवर विसांवा, संक्रमण, निर्मितिशील आनंदमय मायेची तात्पुरती निवृत्ति, अशा सत्य स्वरूपांत प्रतीत होतात. सच्चिदानन्द शाश्वत अस्तित्वरूप असल्यानें मरणादि अवस्था तेथें असूंच शकत नाहींत. सर्वातीत सर्वरूप देवदेवाशीं असलेलें एकतेचें नातें दिव्य आत्म्याला कोणते अनुभव आणून देतें हें आपण येथवर पाहिलें. यांत आतां एवढीच भर घालावयाची आहे कीं, हें जें एकतेचें नातें दिव्य आत्मा अनुभवतो, त्यामुळें भेदाच्या नात्यांतील आनंदाला तो मुकतो असें होत नाहीं; दिव्य आत्मा ईश्वराशीं जसा एकरूप असतो, तसा त्याच्याशीं दिव्य व्यक्ति म्हणून भेद ठेवून, मूळ एकतेचा आनंद वेगळ्या स्वरूपांत लुटण्याला तो मोकळा असतो; ईश्वराचा प्रेमळ भक्त हा ईश्वराच्या आलिंगनांत सर्वश्रेष्ठ व सर्वज्येष्ठ आनंद अनुभवतो. या ईश्वरी आनंदपूर्ण मीलनाचे अनेक सौंदर्यपूर्ण प्रकार दिव्य आत्म्याला अनुभवतां येतात. ईश्वराशीं त्याची असलेली तात्त्विक एकता या आनंदमय द्वैताच्या आड येत नाहीं.

 

पान क्र. २९५

 

दिव्य आत्म्याच्या जीवनाचा स्वभावधर्म काय असतो तो आतांपर्यंत परोपरीनें वर्णन केला. हा स्वभावधर्म वास्तवांत कशा प्रकारें येत असेल? वास्तवांतील दिव्य-जीवनाची परिस्थिति कशी असेल? वास्तवांतील दिव्य-जीवन कोणत्या गोष्टींनीं युक्त असेल? या प्रश्नांचा आतां विचार करणें आहे. अस्तित्वाच्या शक्ती अव्यक्तांतून कांहीं आकार घेऊन व्यक्त होतात आणि या साकार शक्तींच्या द्वारां आम्हांला कोणत्याहि नात्यांत अनुभव मिळत असतो. शक्तींना आकार देणारी जी साधनसामग्री असते, तिला पदार्थांचे गुणधर्म, विशेष धर्म, क्रिया, सामर्थ्यें अशा नांवांनीं आपण ओळखतो. उदाहरणार्थ मन. मानसिक शक्ति साकार होऊन मानसिक जीवन व्यक्त होतें; निर्णय, निरीक्षण, स्मृति, सहानुभूति या मनाच्या स्वाभाविक शक्ती आहेत, त्या साकार झाल्यानें मानसिक जीवन बनतें. याप्रमाणेंच सत्य-जाणिवेचें अतिमानसिक जीवन हें अतिमानसाच्या स्वाभाविक शक्ती साकार होऊन बनत असणार; अतिमानसिक क्षेत्रांत एका आत्म्याचें दुसऱ्या आत्म्याशी जें नातें असेल, तें नातें व्यवहारान्वित करतांना, अतिमानसाला स्वाभाविक असणाऱ्या कांहीं शक्ती, सामर्थ्यें व व्यापार अतिमानसानें वास्तवांत आणले पाहिजेत; असें न होईल तर व्यवहारांत भेद म्हणून कांहीं दिसणारच नाहीं आणि म्हणून 'अतिमानसिक जीवन' या कल्पनेला अर्थहि राहणार नाहीं. अतिमानसिक जीवन कोणत्या अतिमानसिक व्यापारांचें व क्रियांचें असतें, तें दिव्य जीवनाच्या मानसिक पूर्वपरिस्थितीचा विचार करतांना पाहतां येईल; सध्यां  आपण त्या जीवनाचा तात्विक पाया पाहत आहोंत; त्याचा मूलभूत स्वभावधर्म आणि तत्त्वसंभार पाहत आहोंत. म्हणून सध्यां एवढें लक्षांत ठेवणें पुरेसें आहे कीं, भेद करणारें 'मी-मी पण' नसणें किंवा असेल तर तें नाहींसें करणें, जाणिवेचे स्पष्ट विभाग पडून तिची एकता नष्ट झालेली नसणें किंवा झालेली असल्यास ती रद्द करून जाणिवेची एकता पुन: स्थापित करणें-- ही एकच गोष्ट दिव्य जीवनाची अगदीं आवश्यक अशी पूर्वपरिस्थिति आहे. आमच्यामध्यें 'मी' आहे, एकता भंगलेली जाणीव आमच्यामध्यें आहे. ईश्वरी दिव्य जीवनाला मुकून आम्ही जें अध:पतित जीवन जगत आहों, त्या पतित व मृत्युव्याप्त जीवनाचा पाया या भेदक 'मी' नें व भंगलेल्या जाणिवेनें भरला आहे. आमचा 'मी', आमची भंगलेली जाणीव म्हणजेच आमची मर्त्यता आणि पतितता आहे. मनुष्याचें 'मूळ पातक' (Original Sin) त्याच्या दु:ख-

 

पान क्र. २९६

 

मय जीवनाचें कारण आहे असें कांहीं धर्मांत विधान आहे तें ''मूळ पातक'' म्हणजे आमच्या दृष्टीनें त्याची भग्न जाणीव आणि 'मी-मी पण' हें आहे. तत्त्वज्ञानाला शोभेल अशा भाषेंत बोलावयाचें, तर असें म्हणतां येईल कीं, आत्म्याच्या मूळ चैतन्याच्या सत्यापासून, ऋतापासून च्युत होणें, त्याची एकता, समग्रता व सुसंवादपूर्णता टाकून भलता वेगळा मार्ग धरणें, ही गोष्ट अज्ञानक्षेत्रांत, अज्ञानसागरांत मोठी उडी किंवा बुडी घेण्याची पूर्व तयारी म्हणून अवश्य होती. ''मूळ पातक'' करून म्हणा, चैतन्याचें सत्य सोडून देऊन म्हणा, घेतलेली उडी किंवा बुडी ही आत्म्याची साहसी, धाडसी क्रिया होती; आणि विश्वाच्या क्षेत्रांत धाडसाच्या हौसेनें आत्म्यानें घेतलेल्या या उडीमुळेंच ही दुःख भोगणारी आणि उच्च आकांक्षा धरणारी मानवता, मानवजाती, विश्वांत उदयास आली.

 

पान क्र. २९७

 









Let us co-create the website.

Share your feedback. Help us improve. Or ask a question.

Image Description
Connect for updates