दिव्य जीवन 1879 pages 1960 Edition
Marathi Translation
  Senapati Bapat

ABOUT

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics, expounding a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth.

THEME

philosophymetaphysics

दिव्य जीवन

Sri Aurobindo symbol
Sri Aurobindo

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.

Sri Aurobindo Birth Centenary Library (SABCL) The Life Divine Vols. 18,19 1070 pages 1970 Edition
English
 PDF    philosophymetaphysics
Sri Aurobindo symbol
Sri Aurobindo

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.

Marathi Translations of books by Sri Aurobindo दिव्य जीवन 1879 pages 1960 Edition
Marathi Translation
Translator:   Senapati Bapat  PDF    LINK

प्रकरण दुसरें

 

दोन नकार

 

जडवादी नकार

 

त्यानें जाणीवशक्तीकडून श्रम घेतलें ( त्यानें विचाराचे तप केलें,) आणि या तपानें त्याला असें ज्ञान झालें कीं, जडतत्त्व हेंच ब्रह्म आहे. कारण सर्व भूतें जडांतून जन्म घेतात, जडानें वाढतात व येथून जातात तेव्हां तीं जडांत प्रवेश करतात. हें ज्ञान घेऊन तो, आपला पिता वरुण याजकडे गेला आणि म्हणाला, 'हे भगवन् ! मला ब्रह्म काय तें शिकवा'. वरुणानें त्याला उत्तर दिलें, 'तुझ्यांतील जाणीवशक्ति पुन: कामास लाव, तिच्याकडून (विचाराचें) तप करव; कारण तप हेंच ब्रह्म होय.'

- तैत्तिरीय भृगुवल्ली ३, , २.

 

पृथ्वीवर दिव्य जीवन असूं शकतें, मर्त्य अशा जीवनांत अमरत्वाचा अनुभव येऊं शकतो असें आम्हीं म्हटलें; या म्हणण्याला आधार काय ? यास आपल्या एका विशिष्ट मतप्रणालीचा-ज्ञानाचा आधार असतो. ही मतप्रणाली, हें ज्ञान येणें प्रमाणें : -- आपलें शरीर हें एक मंदिर आहे, त्या मंदिरांत राहणारा आत्मा अनश्वर आहे, हें मंदिर किंवा वस्त्र बदललें जातें, पण याचा वापरणारा बदलत नाहीं; तसेंच ज्या जडतत्त्वाचें हें निवासस्थान किंवा वस्त्र बनविलें जातें तें जडतत्त्व, मोठ्या किंमतीचा पण योग्य असा कच्चा माल आहे; या मौल्यवान् मालाचे पोषाख तो आत्मा सारखे एकामागून एक, स्वत:साठीं बनवीत असतो अथवा या मालाची कधीं न संपणारी मंदिरांची मालिकाच जणुं रहाण्यासाठी पुन: पुन: बांधत असतो. हें ज्ञान नसेल तर पृथ्वीवर दिव्य जीवन, मर्त्य जीवनांत अमर्त्य जीव, ही भाषा आपल्याला करतां येणार नाहीं.

 

पान क्र. ११

हें ज्ञान असून देखील शरीर धारण करून जीवन जगण्याचा वीट येण्याचा संभव आहे. हा संभव नाहींसा होण्यास उपनिषदांतील ज्ञान आत्मसात करून ''जडतत्त्व हें देखील ब्रह्मच आहे'' असें ब्रह्मवाद्यांच्याच भाषेंत आपल्याला म्हणतां आलें पाहिजे. अस्तित्वाच्या एका टोंकाला ब्रह्म (चैतन्य) वस्तु आणि दुसऱ्या टोंकाला जडवस्तु, या दर्शनीं कितीहि भिन्न दिसल्या तरी तत्त्वत: त्या अभिन्न आहेत, असें उपनिषदांत म्हटलें आहे. उपनिषदांत, जड विश्वाला ईश्वराचें स्थूल शरीर म्हटलेलें आहे. या जोरदार अलंकारिक वर्णनाचा पूर्ण अर्थ पूर्णपणें आम्हीं ध्यानांत घ्यावयास हवा व त्याचें पूर्ण मोल ओळखून पुढील मांडणी करावयास हवी. जडवस्तुहि ब्रह्म आहे हें उपनिषदीय ज्ञान आत्मसात् केलें तरी या दोन टोंकांना असलेंल्या दोन वस्तूंचें अभिन्नत्व, तादात्म्य तर्कनिष्ठ बुद्धीला पटावयास अवघड जातें; तीं दोन टोकें एकमेकांपासून फार दूर दिसत असल्यानें त्या दोहोंच्या मध्यभागीं त्यांना जोडणारी अनेक वस्तूंची चढती शिडी मानावी लागते. (ती प्राण, मन, अतिमन, तसेंच मन व अतिमन यांना जोडणाऱ्या दुव्यांची बनली आहे) ही शिडी मान्य केली म्हणजेच तर्कनिष्ठ बुद्धीला त्या दोहोंचें, म्हणजे ब्रह्माचें किंवा चैतन्याचें आणि जडाचें अभिन्नत्त्व पटूं शकतें; एरवीं तें पटूं शकत नाहीं. ही मधली शिडी मानली नाहीं तर एकमेकांचे कट्टर वैरी असलेंल्या दोन स्त्रीपुरुषांच्या विवाह संबंधाप्रमाणें चैतन्य व जड यांचा ऐक्यसंबंध, दुःखमय असला पाहिजें असें मानावें लागतें; आणि ज्याप्रमाणें त्या दोघा वैऱ्यांचा विवाहसंबंध त्या दोघांच्या सुखासाठींच तोडून टाकणें हें त्या प्रश्नाचें तर्कबुद्धीला पटणारें एकमेव समाधान असतें, त्याप्रमाणें चैतन्य व जड यांचा ऐक्यसंबंध तोडून टाकणें हेंच दोघांच्याहि हिताचें आहे असें तार्किक बुद्धीला सहजच वाटतें. जड व चैतन्य या दोहोंमध्यें प्राणादि कोणतेच दुवे नसतां त्यांचें अभिन्नत्त्व प्रतिपादणें, त्यांच्यापैकीं कोणतीही एक वस्तु दुसरीचें प्रतिनिधित्व करूं शकतें असें म्हणणें, ही कल्पना-प्रिय विचारशील मनाची कृत्रिम सृष्टि आहे व ती अनुभवप्रतिष्ठित तर्काला विरुद्ध असून केवळ तर्कशून्य, अंत:साक्षात्कारवादालाच मान्य होण्यासारखी व निर्माण करतां येण्यासारखी आहे.

विशुद्ध ज्ञानस्वरूप चैतन्य हें एक तत्त्व, आणि ज्ञानशून्य जड यंत्र-सदृश वस्तु किंवा शक्ति हें दुसरें तत्त्व; दुसऱ्याचें नांव निसर्ग व पहिल्याचें नांव ईश्वर किंवा आत्मा, या प्रकारची विश्वव्यवस्थेची मांडणी

 

पान क्र. १२

आम्हीं केली तर, त्या मांडणीचा अनिवार्य परिणाम ईश्वराला नकार देणें हा एक होईल, किंवा निसर्गाला अमान्य करून तिकडून तोंड फिरवणें, निसर्गनिवृत्त होणें हा होईल. वरील मांडणी मान्य केली असतां प्राण आणि मन, प्राणमय जीव आणि विचारशील मन या दोहोंनाहि, ईश्वर किंवा निसर्ग या दोहोंपैकीं कांहींतरी एक मानून दुसऱ्या तत्त्वाला नकार द्यावा लागेल; या प्रकारची निवड करणें हें त्याला अटळ होईल. मग ईश्वर हा कल्पनाजनित भ्रमरूप आहे असेंच विचारशील मन मानूं लागेल अथवा उलटपक्षीं निसर्ग हा इंद्रियांनीं निर्माण केलेंला भ्रम आहे असें तें मानील; त्याचप्रमाणें प्राण किंवा प्राणमय जीव जडेतर चैतन्यावर, दृष्टि स्थिर करून स्वतःचें जीवन जगणें तिरस्करणीय समजून सोडून देईल किंवा ईश्वराच्या चिंतनांत आत्मविस्मृति घडून आनंदातिशयाचा अनुभव मिळाल्यानें त्या आनंदासाठीं स्वतःचें स्वाभाविक जीवन टाकून देईल. दुसऱ्या पक्षीं तो आपलें अमृतत्व नाकारून ईश्वरापासून दूर, विरुद्ध दिशेला जाऊन आपलें जीवन पशुजीवनाप्रमाणें जगूं लागेल. सांख्यांची पुरुष आणि प्रकृति ही जोडी घ्या. यांत पुरुष हा ज्ञानमय निष्क्रिय असा आत्मा आहे, आणि प्रकृति ही ज्ञानशून्य क्रिया करणारी शक्ति आहे; या दोहोमध्यें दोघांना सारखी अशी एकहि गोष्ट नाहीं. दोघांची स्वयंप्रवृत्तिशून्यतादेखील दोन विरुद्ध प्रकारची; स्वयंप्रवृत्तिशून्य आत्मा निष्क्रिय तर निष्क्रियच राहणार, स्वयंप्रवृत्तिशून्य प्रकृति सक्रिय तर सक्रियच राहणार. अशा उभय तत्त्वांचा अन्योन्य विरोध दूर व्हावयाचा कसा ? प्रकृति थकून थांबली म्हणजेच हा विरोध दूर होतो. ज्ञानमय शांतीचा, निष्क्रिय शांतीचा अखंड उपभोग घेतांना आत्मा थकत नाहीं. आत्म्याला अनेक सोंगेंढोंगें एकामागून एक अखंडपणें दाखवीत प्रकृति यंत्राप्रमाणें सारखी भिरभिरत असतां, आत्म्यावर या प्रदर्शनाचा कांहींहि परिणाम न घडल्यानें, प्रकृति शेवटीं थकून थांबतें. याप्रमाणें प्रकृतिपुरुषांचा विरोध संपून पुरुष विजयी होतो. शंकराचार्यांचा 'आत्मा' हा एकच एक, अवाक् आणि अकर्ता आहे व त्यांची 'माया' ही बहुत्वाचा पसारा घातलेंली नामरूपमय आहे. येथेंहि पुरुष व प्रकृतिप्रमाणें दोन विसंवादी, अनिवार्यपणें विरोधी वस्तूंची ब्रह्म व माया ही जोडी विश्वव्यवस्थेचा पाया म्हणून घेतलेंली आहे. प्रकृति-पुरुष-विरोधाप्रमाणें या जोडीचा कट्टर अन्योन्य विरोध, मायेचा निरास होऊन (तिचा नामरूपाचा पसारा मिथ्या आहे, भ्रमरूप आहे असा निर्णय केल्यानें

 

पान क्र. १३

तिचा निरास होऊन) केवळ आत्म्याचा एकमेव शाश्वत, शांत, सत्य असा अनुभव येऊन थांबतो. मायेचा निरास करून शंकराचार्यांचा आत्मा विजयी होतो तर प्रकृतीची निराशा करून सांख्यांचा पुरुष विजयी होतो.

चैतन्यवाद्यांपेक्षां जडवाद्यांचें काम सोपें असतें. 'चैतन्यवस्तु नाहीं' असा चैतन्याला नकार देऊन, मनाला सहज पटणारा व पटविणारा सोपा युक्तिवाद करून जडवाद्यांना जडद्रव्याचें किंवा जडशक्तीचें खरेंखुरें अद्वैत पटवून घेतां येतें; तसेंच पटवून देतां येतें. चैतन्यवाद्यांना चैतन्य-अद्वैत इतक्या सुलभतेनें स्वत:ला व इतरांना पटवितां येत नाहीं. तथापि 'चैतन्य नाहींच,' केवळ जडच आहे, असें आपलें आग्रही प्रतिपादन कायमचें टिकवून धरणें जडवाद्यांना अशक्य होऊन जातें, विश्वापलीकडे दूर निष्क्रिय असें अज्ञेय कांहींतरी आहे अशा निर्णयावरच शेवटीं ते येतात. जसा शंकराचार्यांचा शांत आत्मा, सांख्यांचा निष्क्रिय पुरुष, तद्वतच जडवाद्यांचें हें 'अज्ञेय' तत्त्व. जडच सर्व कांहीं आहे ही कल्पना विचारशील बुद्धीला पटत नाहीं; बुद्धीच्या स्वाभाविक मागण्या जडवाद्याला सतावून सोडतात. अशा परिस्थितींत बुद्धीची समजूत काढून तिला तात्पुरती स्वस्थ बसविण्यासाठीं अज्ञेयाची स्पष्टार्थहीन कल्पना जडवाद्यांना उपयोगी पडते. जडाच्या पलीकडे संशोधनाचें क्षेत्र वाढवणें जडवाद्यांना टाळावयाचें असतें; व ही टाळाटाळी साधण्यासाठीं जडापाठीमागें कांहीं आहे, पण तें अज्ञेय आहे, अशी सबब ते काढतात.

विश्वाची व्यवस्था सांगतांना अन्योन्य विरोधक वस्तूंची एकत्र मोट बांधली जाते व त्यांतून कांहींच फलनिष्पत्ति होत नाहीं. म्हणून मानवी बुद्धीला या खटाटोपांत समाधान लाभत नाहीं. अंतर्बाह्य विश्वांत ज्या वस्तू आहेत, त्या सर्व सत्य आहेत, असें म्हणणाऱ्या पूर्ण अस्तिकवादांत मानवी बुद्धीला खरें समाधान लाभतें व म्हणून ती अशा पूर्ण अस्तिकवादाकडे झुकत असते. विश्वांतील सर्व वस्तूंचा भासमान विरोध व विसंवाद मिटवून, त्यांमध्यें सुस्पष्ट सुसंवाद निर्माण करण्यानेंच बुद्धीला अवश्य असणारा पूर्ण अस्तिकवाद शक्य होतो. हा सुसंवाद किंवा समन्वय सिद्ध करण्यासाठीं मानवी बुद्धीला मानवाच्या आंतरिक जाणिवेनें ठरविलेंल्या ज्ञानविकासाच्या पायऱ्या क्रमाक्रमानें चढाव्या लागतात; जड द्रव्याला जी बाह्य पृथक्करण पद्धति लावली जाते, ती प्राण व मन यांना लावून अथवा आंतर, आत्मगत संयोगीकरण व अंत:प्रकाशमंथन करून बुद्धीला आपलें इष्ट साधावें लागतें. हें इष्ट म्हणजे अगदीं अंतिम एकमेवाद्वितीयाची अचल शांति आणि त्या एकाच्या अंत-

 

पान क्र. १४

रंगाचे दर्शन घडविणारी त्याची अनेकता-निर्मायक व अनेकता-व्यापक शक्ति, या दोन गोष्टींची सारख्याच प्रमाणांत सत्यत्व सिद्धि. ही सत्यत्वसिद्धि साधली म्हणजे सर्व सुसंवाद सुगम होतो आणि त्यायोगें बुद्धीला अचल समाधान देणारा पूर्ण आस्तिकवाद शक्य होतो. असा समग्र सार्वत्रिक अस्तित्ववाद किंवा सर्वसत्यत्ववाद सिद्ध झाला म्हणजे अस्तित्वांतील दर्शनीं अन्योन्यविरोधी नानाकारधारी निसर्गदत्त गोष्टी एकमेकींशीं सुसंवादी करतां येतात, आणि आमच्या विचार व जीवन यांच्या प्रवाहाचें, नियमन करणाऱ्या नानाविध परस्परविरोधी शक्तींचा उगम कोणत्या मध्यवर्ति सत्यांत आहे व कोणत्या मध्यवर्ति सत्याचे हेतू नानाप्रकारें पूर्ण करण्याची कामगिरी करण्याकरितां त्यांचा येथें, त्या सत्याचे प्रतिनिधि म्हणून, अवतार झालेंला आहे या गोष्टीचा शोध त्यांच्या सहाय्यानें आपणांस लागतो. हें घडून आलें म्हणजे आमच्या विचाराला खरा मध्यवर्ति केंद्रबिंदु सांपडल्यानें त्याचें फेऱ्यामागें फेरें घेत घेत वृथा भ्रमन्ति करीत रहाणें थांबतें आणि तो उपनिषदीय ब्रह्माप्रमाणें काम करतो; अर्थात् ब्रह्माप्रमाणें सगळया विश्वांत दौरा करण्याचा खेळ खेळत असतां तो आपल्या मध्यवर्ति नितांत निश्चल उगमस्थानाला धरून निश्चल स्थिर असतो; तसेंच आपला प्राण किंवा प्राणमय जीवन, आपलें ध्येय ओळखून त्या ध्येयाची, केंद्रवर्ति सत्याची सेवा शांत आणि स्थिर आनंदानें व जाणिवेनें करीत राहतें आणि केव्हां कमी, केव्हां अधिक जोमानें व तालबद्धतेनें काम करणाऱ्या आपल्या शक्तीचाही ध्येयाच्या सेवेंत उपयोग करतें.

परंतु कोणत्याहि कारणानें विचाराचा आणि जीवनाचा, केंद्रसत्याच्या आश्रयानें चाललेंला सुसंवादी संसार, विसंवादमय होऊं लागला म्हणजे दर्शनीं विरोधी वस्तूंची वेगवेगळी परीक्षा घेऊन पाहणें मानवी बुद्धीला अवश्य असतें व उपकारकहि असतें. अशी परीक्षा केल्यानें मानवी बुद्धि पूर्वींपेक्षा अधिक दृढपणें त्या दोन वस्तूंच्या वास्तविक सुसंवादित्वाचा निर्णय पुन्हा आपलासा करतें. जडापासून परीक्षेला सुरुवात करतां येईल. जडच केवळ (जडद्रव्य किंवा जडशक्ति) सत्य आहे, ही मनाची बैठक कायम राहूं शकत नाहीं. त्याचे पाठीमागें कांहीं अज्ञेय आहे अशी मनाची समजूत काढावीच लागते, हें प्रत्ययास आलें म्हणजे पुढें जाऊन प्राणशक्ति, संवेदनाशक्ति, कल्पनाशक्ति यांची परीक्षा करितां येईल. जडापासून दुसऱ्या टोंकाला, चैतन्याला, जातांना मध्यें जाणिवेच्या विकासाचे प्राणादि टप्पे लागतात. त्यांचीहि जडाप्रमाणें परीक्षा करणें

 

पान क्र. १५

योग्य आहे. सर्व अंतर्बाह्य वस्तू, जडाची रूपें आहेत, या सिद्धान्ताची परीक्षा झाल्यावर सर्व अंतर्बाह्य वस्तू मूळ प्राणशक्तीची, मूळ संवेदनांची, मूळ कल्पनांची रूपें आहेत या सिद्धान्ताचा परामर्श घ्यावा. या एकांगी सिद्धांतांवर अवास्तवतेची छाया नेहमीच दिसते व ते सिद्धांत अवास्तव आहेत हें पटावयास फार वेळ लागत नाहीं. तर्कनिष्ठ बुद्धीला थोडा काळ ते बरे वाटतील, कारण तिचा व्यवसाय प्रत्यक्षातीत शुद्ध कल्पनांचा विचार करण्याचा असतो. पण प्रत्यक्षाचें, वास्तवाचें ज्ञान व ओढ असलेंल्या मनाला ते सिद्धांत समाधान देऊं शकत नाहींत. मनाला ही अनुभूति असतें कीं, त्याच्या पाठीमागें कांहीं आहे व तें कल्पनेच्या स्वरूपाचें नाहीं; तसेंच त्याला हेंहि कळतें कीं, त्याच्या आंत जें कांहीं आहे तें प्राणवायूहून वेगळें आहे, त्याच्याहून अधिक आहे. चैतन्य किंवा जड या वस्तु मनाला अंतिम सत्यासारख्या कांहीं काळ तरी वाटतात, परंतु या दोन टोंकामधील तत्त्वांचे तसें नाहीं. म्हणून बुद्धि अगोदर चैतन्य किंवा जड या टोंकाकडील वस्तूंची चिकित्सा करून नंतर मधील तत्त्वांचा परामर्श घेते. तिला असें करणें तिच्या स्वभावानुसार अपरिहार्य असते आणि असें करण्यानेंच तिची चिकित्सा लाभदायक होते. दोन सहकाऱ्यांच्या आधारानें बुद्धि आपलें काम करते. बाह्याचें किंवा आंतलें ज्ञान करून देणारा इंद्रियगण, हा एक सहकारी, व दुसरी सहकारी शक्ति म्हणजे वाणी. इंद्रियांना सगळें अस्तित्व ज्ञात होत नाहीं; अस्तित्वाचे वेगळे अंश तीं स्पष्टपणें जाणूं शकतात. तसेंच वाणी किंवा शब्दशक्ति इंद्रियगोचर वस्तूंचें काळजीपूर्वक वर्गीकरण करून त्यांच्या मर्यादा ठरविते, तेव्हांच तिचें त्या वस्तूंचें नामकरण स्पष्टतेनें युक्त होतें. या अशा दोन अंशदर्शी सहकाऱ्यांच्या सहाय्यानें काम करणाऱ्या बुद्धीला महान् तत्त्वभूत वस्तूंचा पसारा समोर दिसला आणि त्या अनेकतेंतून तिला एकता साधावयाची असली म्हणजे स्वभावतःच ती त्या समोर असणाऱ्या वस्तूंपैकींच एक वस्तु मूलभूत ठरवून बाकी वस्तू कशातरी दडपादडपीनें तिच्या पोटांत घालून मोकळी होते; किंवा एक सत्य ठरवून बाकी जबरदस्तीनें भ्रमरूप ठरवून टाकते. ही अशी ''प्रवेशबंदी''ची पद्धति उपयोगांत न आणतां अनेक तत्त्वांच्या एकतेचे, एकात्मतेचें खरें मूळ बुद्धीला तेव्हांच दिसूं शकेल, जेव्हां ती स्वत:च्या वर चढून जाईल (अर्थात् स्वत:पेक्षां श्रेष्ठ असलेंल्या जाणिवेच्या दृष्टीनें पाहील) किंवा सर्व चिकित्साचक्र फिरून संपवील. असें केलें म्हणजे तिच्या असें अनुभवास येईल कीं,

 

पान क्र. १६

जडापासून चैतन्यापर्यंतचीं, निसर्गापासून ईश्वरापर्यंतचीं विश्वसंसारांतील सर्व तत्त्वें, एका अनिर्वचनीय अव्याख्येय अर्थात्, तिला अज्ञेय परंतु मानवाला प्राप्त होण्यासारख्या, एका परम सत्याचीं वास्तव रूपें आहेत. कोणत्याहि मार्गानें आपण विचारप्रवास केला तर शेवटीं या अनिवर्चनीय, अज्ञेय परंतु अप्राप्य नसलेंल्या सत्याला आपण पोंचतो. आपण प्रवास मध्येंच थांबविला तर मात्र या सत्याची आपली भेट होत नाहीं.

तेव्हां ही चांगली शुभसूचक गोष्ट आहे कीं, अनेक प्रयोग व शाब्दिक निर्णयानंतर आमच्या पुढें दोनच कोटि उभ्या राहतात; जड ही एक कोटि, चैतन्य ही दुसरी कोटि; अनुभवाच्या कठीण परीक्षेंत प्राण, मन इत्यादि इतर कोटींपेक्षां या दोन टोंकांच्या दोन कोटि, उत्तम प्रकारें निभावून बराच काळ टिकून राहिल्या आहेत; आणि अनुभवाचा मार्ग क्रमतां क्रमतां शेवटीं या दोन कोटींचा परिणाम म्हणून जो मानवाच्या अनुभवाला आला आहे, तो त्याच्या स्वाभाविक, सार्वत्रिक, जन्मजात भावनेला समाधानकारक किंवा योग्य वाटत नाहीं. मानवजातीची जन्मजात सार्वत्रिक भावना किंवा भाव हाच विश्वव्यापक सारभूत सत्याचें प्रतिनिधित्व करणारा आणि गुप्त राहून पारख करणारा, संभाळणारा, मानवजातीचा खरा मित्र असल्यानें, त्यानें दिलेंला निर्णय हा आम्ही शुभसूचक मानतो. युरोपांत जडवाद्यांचा नकार आणि हिंदुस्थानांत संन्यासवाद्यांचा नकार प्रभावी आहे. आमचेच काय तें खरें असें ते दोघे आपापल्या क्षेत्रांत म्हणत आलें आहेत, आणि त्या त्या क्षेत्रांतील जीवनविषयक कल्पनेवर व जीवनसरणीवर तेथील प्रभावी तत्त्वज्ञानाचा रंग प्रामुख्यानें चढलेंला आहे. हिंदुस्थानांत संन्यासवादी तत्त्वज्ञानाच्या प्रभावामुळें आध्यात्मिक संपत्ति - सर्व प्रकारची नाहीं तरी निदान कांहीं प्रकारची - खूप सांठली आहे, पण भौतिक जीवन पहावें तर त्याचें मोठ्या प्रमाणावर दिवाळें निघालें आहे. युरोपांत भौतिक संपत्ति भरपूर आहे. या जगांतील मुलुख आणि सत्ता यूरोपनें झगडून यशस्वितेनें आत्मसात् केली आहे, पण युरोपांत आध्यात्मिक गोष्टींचें दिवाळें - हिंदुस्तानाप्रमाणेंच मोठें दिवाळें - निघण्यास याच संपत्तीचा व सत्तेचा वाढता प्रपंच, कारणीभूत झाला आहे; आणि ज्या तत्त्वज्ञानानें हें घडून आलें आहे तें जडवादी तत्त्वज्ञानहि आतां यूरोपीय बुद्धीला समाधानकारक वाटेनासें झालें आहे.

या घटनांचा परिणाम म्हणून आतां अशी वेळ आलेंली आहे कीं, जगाचा कल प्रस्तुत जडवादी किंवा चैतन्यवादी एकांगी सिद्धान्ताला

 

पान क्र. १७

प्रतिकूल व प्राणमन आदि मधील टप्प्यांसुद्धां जड आणि चैतन्य दोघांनाहि सामावून घेणारा सर्वांगीण नवा सिद्धांत पटवून घेण्याला अनुकूल होत आहे. मानवाचे विचार व आंतरिक आणि बाह्य अनुभव या सर्वांना हा नवा सर्वसमावेशक सिद्धांत, स्थान देतो आणि या सिद्धान्ताचा उपसिद्धांत असा होतो कीं, मानवाचें वैयक्तिक व वांशिक जीवन सर्वांगपूर्ण, पूर्वीं कधीं नव्हतें इतकें संपन्न, कृतार्थ व आत्मतृप्तिसाधक बनविणें, हेंच मानवाला योग्य आहे.

चैतन्य आणि जड दोन्ही वस्तू एका 'अज्ञेयाच्या' प्रतिनिधिरूप आहेत, हें अज्ञेय तत्त्व, दोघांचेंही मूळ आहे, पण अज्ञेयाशीं या दोघांचें नातें सारखें नाहीं, भिन्न आहे. या नात्याच्या किंवा संबंधाच्या भिन्नतेमुळें, जडवादी नकार आणि संन्यासवादी किंवा चैतन्यवादी नकार, यांच्या परिणामकारकतेंत फरक पडतो. चैतन्यवादी नकाराहून जडवादी नकार, अधिक आग्रही असतो व तात्पुरतें यशहि त्याला अधिक लाभतें ; तसेंच सामान्य मानवतेला हा नकार पटविणें अधिक सोपें असतें -- तथापि हा नकार टिकाऊपणांत कमी पडतो, त्याचा अंतिम परिणाम कमी दिसून येतो. संन्यासवाद्यांचा चैतन्यवादी नकार, अधिक टिकाऊ, अधिक परिणामकारी, मनाला व्यापून टाकणारा आणि भयकारक धोक्याचा असतो. जडवादी नकार, कमी टिकाऊ व कमी परिणामकारक असण्याचें कारण असें कीं, या नकारावरचा उतारा देखील त्याच्या अंतरांतच असतो. या नकाराचा अत्यंत प्रभावी व मोठा भाग म्हणजे अज्ञेयवाद. जें कांहीं दिसत आहे त्याच्या पाठीमागें अज्ञेय असें कांहीं आहे, असें प्रतिपादन करून या अज्ञेयाच्या मर्यादा वाढवीत वाढवीत, आज जें अज्ञात आहे तें सर्व नित्य अज्ञेय रहाणार, असें हा वाद म्हणावयास लागतो. त्याचा या सिद्धान्ताला आधारभूत पक्ष असा आहे कीं, भौतिक इंद्रियें एवढीच काय तीं आपलीं ज्ञानसाधनें आहेत; म्हणून तर्कबुद्धि कितीहि जोरदार आणि दूरवर भराऱ्या मारूं इच्छीत असली, तरी या भौतिक इंद्रियांच्या क्षेत्राबाहेर तिला जातां येणार नाहीं; या इंद्रियांनीं पुरविलेंल्या किंवा सूचित केलेंल्या गोष्टींवरच बुद्धीनें आपली कसरत नेहमीं करावयास हवी; इंद्रियसूचित गोष्टीहि इंद्रियांशीं, इंद्रियप्रत्यक्षांशीं नेहमीं बांधून टाकलेंल्या असल्या पाहिजेत; इंद्रियसूचित गोष्टींच्या आधारानें इंद्रियप्रत्यक्षाचा मुलुख आम्ही मागें टाकता कामा नये; इंद्रियप्रत्यक्षसूचित गोष्टींचा सेतु बांधून, आम्हीं इंद्रियातीत क्षेत्रांत पाऊल टाकण्याचें धाडस करूं नये;

 

पान क्र. १८

या इंद्रियातीत क्षेत्रांत ज्ञानसाधनें अधिक समर्थ आणि कमी मर्यादाबद्ध असतात आणि तपासणीचा प्रकारहि तेथें वेगळा असून त्याचा त्या क्षेत्रांत उपयोग करावा लागतो म्हणून अशा क्षेत्रांत प्रत्यक्षाश्रित अज्ञेयवादानें जातां कामा नये.

भौतिक इंद्रियांशिवाय वेगळी ज्ञानसाधनें नाकबूल करणारा हा पक्ष अगदींच लहरी असून त्याची व्याप्ति अपुरी आहे, त्याचें विधान वस्तुस्थितीला पुरतेपणीं लक्षांत घेणारें नाहीं, म्हणून तो त्याज्य आहे, असें साहजिकपणेंच म्हणावें लागतें. या पक्षाला चिकटून रहावयाचें तर त्याला एकच मार्ग आहे आणि तो असा कीं, या विधानाला विरोधी असणारा पुरावा आणि अनुभव विस्तृत क्षेत्र व्यापणारा असतांहि, त्याची कशीतरी वासलात लावावयाची किंवा त्याकडे पाठ फिरवावयाची; इंद्रियप्रत्यक्ष नसलेंल्या अनेक उदात्त आणि उपयुक्त शक्ती आमच्यामध्यें आहेत, या शक्ती जाणीवपूर्वक काम करीत आहेत, किंवा कमी अधिक नेणिवेनें काम करीत आहेत, अथवा निदान सुप्तस्थितींत तरी आम्हां सर्वांमध्यें आहेत. इंद्रियप्रत्यक्षपक्षाला चिकटून राहिलें तर या सर्व शक्ती आम्हाला अमान्य तरी कराव्या लागतील किंवा त्यांचें महत्त्व कमी मानावें लागेल; त्याचप्रमाणें भौतिकाच्या पलीकडील घटनांचें संशोधन, परीक्षण करणें बहुतांशानें आम्हाला सोडून द्यावें लागेल; फक्त अशा अतिभौतिक घटनांचें परीक्षण आम्हाला करतां येईल कीं, ज्या घटनांचा जडाशीं संबंध आला आहे, जडाच्या संसर्गानें वा जडाच्या हालचालीच्या संसर्गानें, ज्या अनुभवास आल्या आहेत आणि जड शक्तींचें एक गौण कार्य, अशी ज्या घटनांच्या संबंधानें आमची निश्चित कल्पना झाली आहे. मनाचे आणि अतिमनाचे व्यवहार हें जडाचे गौण आनुषंगिक कार्य आहेत हा पूर्वग्रह टाकून देऊन, त्या व्यवहारांचें निरीक्षण-परीक्षण स्वतंत्रपणें आपण करूं लागलों म्हणजे अशा घटनांचा मोठा पसारा आपल्यासमोर उभा राहतो कीं, जो जडवाद्यांच्या आग्रही संकुचित सूत्राच्या घट्ट पकडींतून सर्वथा पार निसटून जातो. इंद्रियांच्या क्षेत्रापलीकडे ज्ञान होण्यासारख्या सत्यांचीं अनेक जगतें आहेत, ज्या शक्तींवर भौतिक इंद्रियांची निर्णायक सत्ता नसून, भौतिक इंद्रियांवरच ज्यांची सत्ता आहे, अशा शक्ती मानवामध्यें आहेत; आणि मानवाच्या खऱ्या पूर्ण अस्तित्वाचें बाह्य कवच असलेंल्या इंद्रियप्रत्यक्ष जगाशीं संबंध ठेवण्यासाठींच फक्त त्या शक्ति भौतिक इंद्रियांचा उपयोग करतात. या गोष्टी आमच्या वाढत्या अनुभवामुळें आम्हांला मान्य कराव्या लागतात.

 

पान क्र. १९

हा अनुभव आम्हाला आला कीं भौतिक अज्ञेयवादाचा सिद्धांत सत्यसृष्टींतून तत्काल नाहींसा होतो; त्यापेक्षां व्यापक सिद्धांत मांडावयास, व सारखी वाढती शक्ति-चिकित्सा करावयास आम्ही मोकळे होतो.

याप्रमाणें बुद्धिनिष्ठ भौतिकवादाच्या (जडवादाच्या) चक्रांत मानवता मधूनमधून थोडा थोडा काळ फेरे घालीत आली आहे. तरीपण या कालखंडांचा मानवाला अतिशय उपयोग झालेंला असून या अल्पकालीन भौतिकवादाची मानवाला फार आवश्यकता होती, हें मान्य करणें आपलें पहिलें कर्तव्य आहे. कारण, नव्या अनुभवांचे व पुराव्यांचें जें अफाट क्षेत्र, आपलें कांहीं काळ बंद राहिलेले दरवाजे आमच्यासाठीं, अलीकडे पुन: उघडीत आहे, त्या क्षेत्रांत सुरक्षितपणें पाऊल टाकावयाचें तर मानवाच्या बुद्धीला कडक शिस्त लागून ती अतिशय सरळ, स्वच्छ, व कुशाग्र व्हावयास हवी. या क्षेत्रांत अपरिपक्व मनाच्या लोकांनीं प्रवेश केला तर, तेथील अनुभवांनीं, फार अनिष्ट अशा, दिशाभूल करणाऱ्या कल्पना या लोकांच्या डोक्यांत निर्माण होण्याचा संभव असतो. पूर्वकाळीं असें खरोखर घडलेलें आहे. या क्षेत्रांत अनुभवलेलें वास्तव सत्य पोटांत आणि त्यावरील कवच सत्याचा विपर्यास करणाऱ्या वेडगळ भ्रमांचें, निर्बुद्ध श्रद्धांचे, असें पूर्वीं अनेकदां घडलेलें आहे, व त्यामुळें सत्यज्ञानाची वाढ अशक्य होऊन ती  थबकलेली आहे. असें घडल्यानेंच, तें खरोखरीचें सत्य आणि त्यावर चढलेला भ्रमांचा मुखवटा, दोन्ही थोडा काळ तरी उचलून दूर फेंकून द्यावींत आणि सत्यशोधनाला पुन: आरंभ करून सत्यज्ञानाची वाढ खात्रीनें होईल असा प्रयत्न करण्याला, संशोधनाचा मार्ग मोकळा करावा, हें अवश्य होऊन बसलें. जडवादांत जी बुद्धिनिष्ठा आहे, तिनें वरीलप्रमाणें सत्यशोधनाचा मार्ग मोकळा करून मानवजातीची फार मोठी सेवा केली आहे.

इंद्रियांच्या क्षेत्राबाहेर असणाऱ्या गोष्टींचें ज्ञान देणाऱ्या ज्या इंद्रियापलीकडील शक्ती मानवांत आहेत, त्यांना जड देहाच्या जड द्रव्यांत बसवून, त्या देहांत त्या जड देहाच्या द्वारां काम करावयाचें व्रत दिलें असल्यानें आणि भावनामय वासना, नाडीगत प्रेरणा यांजबरोबर त्यांना एकच संसारगाडा ओढावयास जुंपलें असल्यानें, त्यांचें कार्य अलगपणें, स्वतंत्रपणें होऊं शकत नाहीं, दुसऱ्या शक्तींचें कार्य व त्यांचें कार्य मिसळलें जातें आणि त्यायोगें त्यांच्याकडून एखाद्या सत्याचें सुस्पष्ट ज्ञान होण्याऐवजीं, सत्य आणि मिथ्या याचा अनाकलनीय गोंधळ मात्र संवर्धित होण्याचा

 

पान क्र. २०

धोका उत्पन्न होतो. ज्यांच्या मनाला कसलीच शिस्त लागलेली नाहीं, ज्यांच्या वासनांतील, विकारांतील मलिनता मुळींच दूर झालेली नाहीं, अशा लोकांनीं आध्यात्मिक अनुभवाच्या उच्च क्षेत्रांत चढून जाण्याचा यत्न केला तर वरील भिन्न शक्तींच्या कार्यांची भेसळ, विशेष धोक्याची होण्याचा संभव असतो. अशा लोकांनीं हे अविचारी अकालीं साहस केलें, आपली पूर्वतयारी नसतां उच्च आध्यात्मिक क्षेत्रांत प्रवेश करण्याचें धाडस केलें, म्हणजे त्यांचा जो गोंधळ उडतो त्याला सीमा नाहीं; दिखाऊ ढग, धूसर अर्धवट तेजाचें धुकें, अथवा गडद अंधार भरलेल्या प्रदेशांत जणुं ते जाऊन पडतात. त्या प्रदेशांत मधून मधून वीज चमकून जावी, तसें प्रकाशाचे-सत्याचे, क्षणिक अनुभव त्यांना येतात, त्यांच्यामुळें त्यांना खरें ज्ञान होण्याऐवजीं त्यांच्या अंधपणांत, अज्ञानांत अधिक भर पडते ! असें हें साहस करणें टाळण्यासारखें मात्र नसतें. निसर्गरूप प्रकृति, आपला विकास करून घेण्याचा जो मार्ग स्वेच्छेनें पसंत करते, त्या मार्गांत वरील प्रकारचें साहस हा एक अटळ भाग आहे. कारण विकासाचें गंभीर कार्य करीत असतां, तिला स्वत:ची करमणूक करून घेण्याचीहि लहर येते व वरील साहसांत तिची करमणूक होते. तें कसेंहि असलें तरी, मानवी बुद्धीच्या दृष्टीनें असल्या साहसाला अवेळीं केलेलें अविचारी साहस असेंच नांव द्यावें लागतें.

अविचारी साहसाच्या वरील कहाणीवरून हें लक्षांत येईल कीं, वाढतीं नवीन नवीन अतिभौतिक क्षेत्रें पायाखालीं घालीत जाणाऱ्या ज्ञानाचा पाया, स्वच्छ, शुद्ध व शिस्तीच्या बुद्धीचा असणें आवश्यक आहे. त्याचप्रमाणें हेंहि आवश्यक आहे कीं, या बुद्धीनें वेळोवेळीं इंद्रियप्रत्यक्ष घटना, भौतिक विश्वांतील दृश्य स्पर्श्य सत्य वस्तु यांजकडे वळून, त्यांच्या सत्यनिर्णायक नियंत्रणेच्या आधारानें, आपल्याकडून घडलेल्या किंवा घडूं पाहणाऱ्या प्रमादांचें संशोधन व शोधन करावें. मानव हा पृथ्वीचें अपत्य आहे. त्याला पृथ्वीचा स्पर्श, नेहमींच नवीन जोम, नवीन उत्साह देऊं शकतो. अतिपार्थिव ज्ञान मिळविण्याच्या मागें तो लागला असला तरी, पार्थिवाचा पाठिंबा त्याच्या उत्साहांत भर घालून त्याला ती ज्ञानप्राप्ति सुलभ करून देईल. असें देखील म्हणतां येतें कीं, अतिभौतिक क्षेत्र, वास्तवतेनें पूर्णपणें आपलेंसें करण्यासाठीं, (या क्षेत्राची उंच उंच ठिकाणेंहि मानवाच्या केव्हांहि आवांक्यांत येण्यासारखीं आहेत) भौतिकावर आपण आपलें पाय घट्ट रोंवलेले असावेत. उपनिषदांत असें म्हटलें आहे कीं,

पान क्र. २१

पृथ्वी त्याच्या - विराट् पुरुषाच्या - पायांचे ठिकाणीं आहे. विश्वांत व्यक्त होणाऱ्या चैतन्याचें स्वरूप वर्णन करतांना, उपनिषदांत वरील प्रकारचें विधान येतें (पहा. मुंडकोपनिषद् २ - १ - ४ ''पद्भ्याम् पृथिवी,'' बृहदारण्यक उपनिषद् १ - १ - १ ''पृथिवी पाजस्यम्'') आणि ही गोष्ट खरी आहे कीं, भौतिक विश्वाचें आपलें ज्ञान आपण जितकें अधिक विस्तृत व अधिक संशयातीत करूं, तितका श्रेष्ठतर अतिभौतिक ज्ञानासाठीं आपला पाया अधिक विस्तृत, अधिक मजबूत होतो; इतकेंच नव्हे तर श्रेष्ठतम ज्ञानाचा, ब्रह्मविद्येचा पाया म्हणून देखील, हा भौतिकाचा सुदृढ पाया उपयोगी पडतो.

तेव्हां, मानवी ज्ञानाच्या जडवादप्रधान विचारसरणीचा व तत्प्रधान कालखंडाचा निरोप घेतांना आपण फार काळजीपूर्वक एक गोष्ट केली पाहिजे. ती ही कीं, त्याचा अविचारानें सर्वस्वीं धिक्कार न करतां त्यांत उपलब्ध झालेल्या उपयुक्त गोष्टींपैकीं एकहि गोष्ट आपण हलगर्जीपणानें टाकून देतां कामा नये. असें आपण वागलों तरच नव्या अतिभौतिक क्षेत्रांत असें अनुभव आणि अशा शक्ती आपण मिळवूं शकूं कीं, ज्यांचें स्वरूप आम्हाला नीटपणें आकलन होईल, आणि ज्यांचा उपयोग आम्हाला निश्चितपणें करतां येऊन, ज्यांना जुन्या भौतिक अनुभवांच्या आणि शक्तींच्याप्रमाणें कामाला लावतां येईल. जडवादी युगांतील नास्तिक्यानें दिव्य शक्तीला उपयुक्त असें जें काम केलें आहे त्याला नांवें ठेवण्याऐवजीं त्याचा आपण कौतुकपूर्वक गौरव करावयास हवा. तसेंच त्या युगांतील अज्ञेयवादानें ज्ञानाच्याच अमर्याद वाढीसाठीं पूर्वतयारी करण्याचें जें विविध प्रकारचें काम केलें आहे त्याबद्दल आश्चर्य व आनंद वाटून त्याला धन्यवाद द्यावयास हवेत. सत्यसंशोधनांत घडलेला प्रमाद किंवा दोष हा सत्याचा मार्ग शोधून काढणारा सहाय्यक या नात्यानें आमच्या जगांत सारखें काम करीत आलेला आहे; कारण अर्धसत्य हेंच खरोखरीं प्रमादाचें खरें स्वरूप असतें; या अर्धसत्यरूप प्रमादाला अर्थातच फार मर्यादित कार्यक्षमता असल्यानें, कार्य करतांना अडखळल्यासारखें होतें; पुष्कळ वेळां प्रमाद हा पूर्ण सत्यानें घेतलेलें सोंग असतें -- त्या सत्याचें जें ध्येय असतें त्या ध्येयाप्रत कोणाच्या नकळत त्याला पोंचतां यावें असा या सोंगाचा हेतु असतो ! आपण जो महत्त्वाचा कालखंड मागें टाकीत आहों, त्या कालखंडात सत्यसंशोधनकार्यांत घडलेला प्रमाद हा अतिरेकी आत्मविश्वासानें धरलेल्या आडमार्गाच्या स्वरूपाचा नसून,

 

पान क्र. २२

अर्धसत्याच्या स्वरूपाचा होता; आपलें काम शिस्तीनें, सदसद्विवेकाला मान देऊन, सरळपणें करणारा आणि आपल्या मर्यादित कार्यक्षेत्रांत अवश्य त्या ज्ञानानें संपन्न असणारा, सत्याचा विश्वासू सहाय्यक असें त्याचें स्वरूप होतें. प्रमादाचें स्वरूप असेंच यापुढेंहि नेहमीं चालू राहील तर तें सत्यसंशोधनाला फार हिताचें होईल यांत संशय नाहीं.

सर्व ज्ञानाचें, सर्व ज्ञानशाखांतील ज्ञानाचें, ज्ञानाला सांपडणारें अंतिम सत्य एक प्रकारचा अज्ञेयवाद असतो. विश्वविषयक संशोधन करणाऱ्या कोणत्याहि ज्ञानशाखेच्या मार्गाचा शेवट आपण गांठला, म्हणजे विश्व हें एका अज्ञेय सत्याचें प्रतीकरूप आहे, त्या सत्याचें भासमान रूप आहे, असें आपल्या नजरेस येतें; त्या त्या ज्ञानशाखेनुसार या अज्ञेय सत्याला निरनिराळया मूल्यसंघाचें स्वरूप येतें; भौतिक, प्राणिक, संवेदनात्मक, बौद्धिक, ध्येयात्मक, आध्यात्मिक अशा अनेक प्रकारच्या मूल्यांचे संघ, अनेक प्रकारच्या ज्ञानशाखा, एका अज्ञेय सत्याचीं प्रतीकें, भासमान् रूपें म्हणून मानवापुढें ठेवतात. तें अज्ञेय सत्य आपल्याला जितक्या अधिक प्रमाणांत सत्य म्हणून प्रत्ययास येतें, तितक्याच अधिक प्रमाणांत तें, व्याख्येचें बंधन घालूं पाहणाऱ्या विचारापलीकडे व स्पष्ट सूत्रांचें बंधन घालूं पाहणाऱ्या शब्दापलीकडे असल्याचें, नेहमींच आपल्या अनुभवास येतें. ''मन तेथें पोंचत नाहीं, वाणीहि तेथें पोंचत नाहीं'' (केन १ - ३) असें आप्तवाक्य आहे. तथापि मायावादी जसें दृश्य पसाऱ्याच्या मिथ्यत्वाचें अतिरेकी प्रतिपादन करतात, त्याप्रमाणें अज्ञेयवादी अज्ञेय वस्तूच्या अज्ञेयत्वाचें अतिरेकी प्रतिपादन करण्याचा संभव आहे. म्हणून हें स्पष्ट करणें बरें कीं, आम्हीं 'अज्ञेय' हा शब्द जेव्हां सत्याला लावतो, तेव्हां त्याचा अर्थ खरोखर एवढाच असतो कीं, तें सत्य आमच्या बुद्धीच्या आणि वाणीच्या आवांक्यापलीकडचें आहे; कारण बुद्धि आणि वाणी हीं साधनें नेहमींच भेदप्रत्ययाला व भेददर्शक शब्दाला, व्याख्येला आपला वाटाड्या करून मार्गक्रमण करीत असतात; तथापि बुद्धीच्या, विचाराच्या आटोक्यांत न येणारें हें अज्ञेय सत्य, विशाल जाणिवेच्या महत्तम प्रयत्नानें प्राप्त होणाऱ्या अवस्थेंत, मानवाला लाभणारें आहे. ज्ञानाची एक प्रक्रिया तादात्म्याच्या रूपाची असते आणि या तादात्म्याच्या ज्ञानावस्थेंत, त्या अज्ञेयाचें उत्तरोत्तर ज्ञान होऊं शकतें, असें एका उच्च दृष्टीनें म्हणतां येतें. हें जें अज्ञेयाशीं तादात्म्य साधून मिळविलेलें अज्ञेयाचें ज्ञान, तें विचाराच्या आणि वाणीच्या द्वारां यशस्वी रीतीनें

 

पान क्र. २३

दुसऱ्यापुढें मांडतां येणार नाहीं, नव्हे तीं तादात्म्यस्थिति संपल्यावर स्वत:पुढें देखील विचार-वाणीद्वारां पुन्हां उभें करतां येत नाहीं हें खरें आहे; तथापि एकदां तें ज्ञान आपलें झालें म्हणजे, त्याचा परिणाम म्हणून, त्या परम सत्याचें स्वरूप व मूल्य, तें अज्ञेय असतां भासत होते त्यापेक्षां अगदीं वेगळें  आमच्या प्रत्ययास येतें. त्याचीं जुनीं प्रतीकें, सर्व क्षेत्रांतील सर्व प्रतीकें, नव्या विश्वव्यापक जाणिवेनें  भारलीं आणि भरलीं जाऊन वेगळींच बनतात, आमच्या आंतरिक अस्मितेंत क्रांति घडून येते आणि त्या क्रांतीच्या द्वारां आमचें बाह्य जीवनहि समूळ वेगळें बनतें. वर सांगितलेल्या तादात्म्याच्या या ज्ञानाखेरीज आणखी एक प्रकारचें ज्ञान आहे. या दुसऱ्या प्रकारच्या ज्ञानाच्या द्वारां, तें परम सत्य, आम्हाला असा अनुभव देतें कीं, दृश्य सृष्टींतील नामरूपें - नामरूपमय दृश्य-गोचर वस्तुजात हीं त्या सत्याचा खरोखरी बाह्य आविष्कार आहेत. सामान्य बुद्धीला हा सत्याचा आविष्कार, आविष्कार न भासतां, त्याला झांकून टाकणारा पडदा किंवा आवरण म्हणून प्रत्ययास येत असतो. दृश्याला सत्याचा आविष्कार म्हणून पाहणारी ही ज्ञानप्रक्रिया, सामान्य ज्ञानप्रक्रियेहून श्रेष्ठ आहे (अर्थात् ती श्रेष्ठतम ज्ञानप्रक्रिया नव्हे.) आणि ही श्रेष्ठ ज्ञानसरणि आपलीशी व्हावयास, जडवादी ज्ञानसूत्रांचा बांध उल्लंघून, प्राण, मन आणि अतिमन यांचीं वैशिष्ट्यपूर्ण - त्यांचे स्वभावधर्म विशिष्टतेनें दाखविणारीं - कार्यें आम्हीं तपासलीं पाहिजेत; जडाशीं त्यांचा सबंध घडविणाऱ्या, व जडाशीं जोडले जाण्याच्या हेतूनेंच होणाऱ्या, त्यांच्या दुय्यम हालचाली तपासून, दृश्याला सत्याचा आविष्कार म्हणून पाहणारी श्रेष्ठ ज्ञानावस्था आम्हाला लाभणार नाहीं.

तेव्हां, आज जें अज्ञात आहे, तें सदैव अज्ञेय आहे, हें म्हणणें चुकीचें आहे. (''तें ज्ञानाहून वेगळें  आहे, तें अज्ञानाच्या वरतीं आहे.'' - केन उपनिषद् १. ३) जें सांप्रत आम्हास अज्ञात आहे, तें नेहमीं आम्हास अज्ञात राहणार, असें कांहीं नियतीचें सूत्र नाहीं; आम्हींच अज्ञानांत रहावयाचें पसंत केलें, आमचीं पहिलीवहिलीं मर्यादित ज्ञानसाधनें कवटाळून बसलों,  तेथेंच कायमचा मुक्काम ठोकण्याचा हट्ट धरला, तर मात्र गोष्ट वेगळी. विश्वांत आहेत त्या सर्व गोष्टी ज्ञेय आहेत; आणि या ज्ञेय गोष्टींचा परामर्श घेऊं शकतील अशी अनुरूप ज्ञानसाधनें - ज्ञानशक्ती विश्वांत आहेत; मनुष्य हा विश्वाचीच लहानशी प्रतिमा आहे, आणि या प्रतिमारूप लहान विश्वांत, महान् विश्वांतील सर्व ज्ञानशक्ती नित्य उप-

 

पान क्र. २४

स्थित असून, एका विशिष्ट विकासावस्थेंत त्यांचें संवर्धन होणें क्रमप्राप्त असतें. अर्थात् हें क्रमप्राप्त संवर्धन मुळींच होऊं द्यावयाचें नाहीं, असें आम्ही मोठ्या यशस्वितेनें खुशाल ठरवूं शकतो; तसेंच, कांहीं ज्ञानशक्ती थोड्याफार वाढल्या असल्या तर, त्यांची ती वाढ अधिक होऊं न देणें, नव्हे, झालेंली वाढ अनुपयोगानें निरुपयोगी करून नाहींशी करणें, ही गोष्ट देखील आमच्या ताब्यांतील आहे व ती आम्ही करूं शकतो. तें कसेंहि असो, मुख्य मुद्दा हा कीं, जें जें ज्ञान म्हणून विश्वांत आहे, विश्वांत जें जें ज्ञान संभवनीय आहे, तें सर्व ज्ञान मानवाच्या आवाक्यांत आहे; आणि दुसरा मुद्दा हा कीं, मानवात आत्मज्ञानाची, आत्मानुभवाची निसर्गदत्त प्रेरणा आहे व ती अटळ, अनिवार्य असल्यानें, मानवी बुद्धीनें त्याच्या ज्ञानशक्ती एका निश्चित क्षेत्राच्या आंत डांबून ठेवण्याचा कितीहि अट्टाहास केला तरी, तो शेवटीं विफल होणार आहे, तो नेहमींच यशस्वी होऊं शकणारा नाहीं. आम्हीं जडद्रव्याची तपासणी करून त्यांतील गुप्त शक्तींचें ज्ञान प्राप्त करून घेतलें कीं, त्या जडाच्या चतुःसीमेंत वावरण्यांत ज्या ज्ञानाला आतांपावेतों सोईचें वाटत होतें तें ज्ञानच स्वत: ओरडून आम्हाला आदेश देईल, वेदांतील नियन्त्याप्रमाणें उद्घोष करून हांक देईल कीं, ''आतां मारा धांव, आणि दुसऱ्या क्षेत्रांतहि पुढें पुढें जाण्याचा विक्रम करा.'' (ऋग्वेद १ - ४ - ५)

भौतिक जीवनांत निर्बुद्धपणें संतोष मानण्यापलीकडे आधुनिक जडवादांत अधिक कांहीं नसतें तर, ज्ञानाची प्रगति किती काळपर्यंत दुरावली असती तें सांगता येत नाहीं. परंतु या जडवादाचा गाभाच मुळीं, ज्ञानाचा शोध करीत राहणें हा आहे आणि असें असल्यानें हा जडवाद अमुक ठिकाणीं ''थांबा पुरें आतां'' असें म्हणूं शकणार नाहीं. इंद्रियप्राप्त ज्ञान आणि त्यावर उभारलेली अनुमानांची इमारत, यांची मर्यादा या जडवादानें गांठली कीं, त्याची ज्ञानाची तृष्णा त्याला त्या मर्यादेच्या पलीकडे ओढून नेईल. दृश्य जगांतील ज्ञेयाला त्यानें किती त्वरित व किती निःसंदेहपणें आत्मसात् केलें आहे, हें आपण पाहत आहों. दृश्य जगाच्या पलीकडील जगांत पाऊल टाकल्यावर, जें कांहीं त्याच्या मार्गांत येईल, तें जिंकून आत्मसात् करण्याच्या कार्यांत, आजपर्यंत दृश्य जगांत दाखविलेली उत्साही शीघ्रकारिता आणि यशस्विता, तो आमच्या प्रत्ययास आणून देईल, असें त्याच्या आजवरच्या पराक्रमावरून म्हणतां येतें. दृश्यातीत क्षेत्रांत जडवादानें ज्ञानतृष्णेनें टाकलेलीं पहिलीं पावलें अस्पष्टपणें कां होईना

 

पान क्र. २५

आजच आपणांस दिसत आहेत.

ज्ञानाचें जुने-नवे मार्ग अनेक आहेत. या मार्गांपैकीं कोणत्याहि मार्गानें ज्ञानाच्या मागोमाग आम्ही गेलो, तर असें दिसून येईल कीं, केवळ अंतिम कल्पनेच्या बाबतींतच नव्हे, तर सर्वसाधारण फलनिष्पत्तींच्या बाबतींतहि, सर्व मार्गांतील ज्ञानाचा कल एकरूप, सारख्या स्वरुपाचें होण्याकडे आहे. आधुनिक भौतिक शास्त्र आणि वेदांत - मूळ वेदांत, अतिभौतिक तत्त्वज्ञानशाखांतील अनेक आचार्यांचा वेदांत नव्हे, तर उपनिषदांतील वेदांत - यांचे ज्ञानप्राप्तीचे मार्ग निरनिराळे आहेत; तरी वेदांतानें ज्या कल्पना सिद्ध केल्या व त्या ज्या सूत्रांत गोंवल्या, त्या कल्पना, जवळजवळ त्याच सूत्रांत आधुनिक भौतिक शास्त्रानें सिद्ध केल्या आहेत. भौतिक शास्त्राचा ज्ञानविषयक खटाटोप जडाच्या क्षेत्रांत, व वेदांताचा खटाटोप जडातीत क्षेत्रांत, असें असून दोघांच्या सिद्धान्तात व सूत्रांत जें एकरूपत्व आहे, भौतिक शास्त्रानें वेदांत-शास्त्राचें जें समर्थन केलें आहे, त्याचें स्वरूप व क्षेत्र इतकें लक्षांत भरण्यासारखें व इतकें सूचक आहे कीं, अशीं दुसरी गोष्ट सांपडणें विरळाच. आधुनिक भौतिक शास्त्रानें अनेक प्रकारचे शोध लावून जो नव्या ज्ञानाचा प्रकाश उपलब्ध करून दिला आहे, त्या प्रकाशांत जुन्या वेदांतप्रणीत सिद्धांतांकडे व सूत्रांकडे पाहिलें असतां, त्यांचा सारभूत संपन्न अर्थ, जितक्या पूर्णतेनें नजरेस भरतो, तितक्या पूर्णतेनें त्या प्रकाशाच्या अभावीं तो नजरेंत भरत नाहीं, भरूंच शकत नाहीं. उदाहरणादाखल वेदांतांतील एक सूत्रवाक्य देतां येईल. विश्वांतील वस्तूंचें वर्णन करतांना त्या सूत्रांत असें म्हटलें आहे कीं, विश्वनिर्मायक शक्तीनें, एक बीज, अनेक रूपें देऊन विश्वांत टाकलेलें आहे. (श्वेताश्वतर उपनिषद् ६-१२) मूळ सारभूत वस्तु एकच असून तिच्या अनेक वस्तू बनलेल्या आहेत. ती एकच वस्तु अनेक वस्तू झालेली आहे ही वेदांतील कल्पना आहे, आणि भौतिक शास्त्राची वाटचालहि याच कल्पनेच्या दिशेनें होत आहे. अनेकतेशीं सुसंवादी अशीं मूळ एकता, हीच विश्वविषयक कल्पना, भौतिक शास्त्राला अंतत: मान्य होत आहे; किंवा होणार आहे, ही गोष्ट विशेष उद्बोधक आहे. जडद्रव्य आणि जडशक्ति अशी द्वैती मांडणी भौतिक शास्त्र करीत आहे; ही मांडणी आग्रहानें करण्यांत येत असली तरी ती वस्तुत: वरील प्रकारच्या अद्वैताच्या आड येऊं शकत नाहीं. कारण मूलभूत जडद्रव्य इंद्रियांना ज्ञात होत नाहीं. इंद्रियांच्या दृष्टीनें तें वास्तव द्रव्य नव्हे, तर सांख्याच्या 'प्रधान' या तत्त्वा-

 

पान क्र. २६

प्रमाणें द्रव्याचें विचारदृष्ट रूप किंवा विचारदृष्ट द्रव्य आहे; आणि भौतिक शास्त्र हळूहळू अशा मुक्कामाला पोंचत आहे कीं, जेथें द्रव्य आणि शक्ति यांच्या स्वरूपांत मानलेला विचारदृष्ट भेद देखील तर्कशुद्ध नसून, केवळ आग्रही तर्कदुष्ट आहे असें स्पष्ट दिसतें.

संशोधनाचा मार्ग चोखाळीत असतां शेवटी संशोधकाला जडद्रव्य हें एका अज्ञात शक्तीचें साकार रूप आहे असें स्पष्ट होतें. प्राण किंवा जीव हा, जडवाद्यांना अद्यापि न उलगडलेल्या रहस्यांच्या वर्गांत आहे. तथापि तीहि एक शक्ति आहे, जडाच्या बनलेल्या आकारांत कोंडलेली अस्पष्ट संवेदनाशक्ति म्हणजे प्राण किंवा जीव, असें हळूहळू प्रत्ययास येत आहे; आणि जडद्रव्य व प्राण किंवा जीव यांच्यामध्यें यांना अलग करणारी मोठी दरी आहे असा भास उत्पन्न करणारें, आमचें भेददर्शी अज्ञान दूर होईल तेव्हां मन, प्राण आणि जड या तीनहि वस्तू एकाच शक्तीचीं रूपें आहेत, (वेदकालीन ऋषींचें त्रैलोक्य म्हणजे जड लोक, प्राणलोक, मनोलोक हे तीन लोक होत,) ही गोष्ट आमच्या निदर्शनास येईल अशी निश्चिति वाटते. याहून वेगळी वस्तुस्थिति नजरेस येईल अशी कल्पना करणें देखील अवघड आहे. इतकी प्रगति ज्ञानांत झाली म्हणजे जाणीवशून्य जडशक्ति ही मनाची माता आहे, ही जडवादी कल्पना तग धरूं शकणार नाहीं, आणि जग निर्माण करणारी शक्ति ही एक इच्छाशक्ति, संकल्पशक्ति असली पाहिजे, आणि संकल्पशक्ति ही, स्वभावत: केवळ जाणीवशक्ति आहे, कांहींतरी कार्य, कांहींतरी परिणाम घडवून आणण्याकडे लक्ष देणारी जाणीवशक्ति म्हणजेच संकल्पशक्ति किंवा इच्छाशक्ति होय, या गोष्टी संशोधकाला स्पष्ट होतील.

जाणीव-शक्तीनें योजिलेलें हें कार्य, त्याचें फल वा परिणाम यांचें स्वरूप काय असावें, याचा विचार करतां असें दिसतें कीं, आकारमय विश्व निर्माण करणें, आकारांच्या पोटांत स्वत: क्रमश: प्रवेश करून बसणें आणि नंतर या आकारांच्या पोटांतून क्रमश: स्वत: बाहेर पडणें आणि ही उठाठेव करून आकारमय विश्वांत स्वत:ची कांहीं एक प्रचंड रचनाशक्ति, कांहीं एका प्रचंड रचनेद्वारां, साकार करून पाहणें हीच जाणीव-शक्तीची योजना असावी. मानवाचें ठिकाणीं या शक्तीची जी विभूति आहे, तिची, अनंत जीवन, असीम ज्ञान, अनिर्बंध सत्ता मिळविण्याची व भोगण्याची इच्छा आहे. भौतिक शास्त्रालाहि मरणावर भौतिक विजय मिळविण्याचीं स्वप्नें पडत आहेत, त्याची ज्ञानतृष्णा कधींहि न शमणारी

 

पान क्र. २७

अशी आहे, असें त्याच्या धडपडीवरून दिसत आहे; मानवाला पृथ्वीवर जवळ जवळ सर्वशक्तिमान् कर्तुमकर्तुमन्यथाकर्तुम् सत्ताधीश बनविण्याचा त्याचा खटाटोप चाललेला आहे. भौतिक शास्त्राच्या कामगिरींत स्थलाचें अंतर व कालाचें अंतर कमीकमी होत जवळ जवळ संपुष्टांत येत आहे, आलेलें आहे. मानवाला परिस्थितीचा दास न ठेवतां, कमीअधिक प्रमाणांत तिचा पूर्ण मालक बनविणें आणि या रीतीनें त्याला अडचणीचें असणारें, भौतिक कार्यकारणभावाच्या नियमांचें बंधन सैल करून शक्य तितका स्वतंत्र, खरा स्वतंत्र करणें या दिशेनें शेंकडों मार्गांनीं या शास्त्राचा प्रयत्न चालला आहे. मानवाच्या शक्तीला मर्यादा आहेत, मानवाला कांहीं गोष्टी अशक्य आहेत; या मर्यादेच्या व अशक्यतेच्या कल्पना थोड्याबहुत मिथ्या ठरूं लागल्या आहेत, मिथ्या वाटूं लागल्या आहेत आणि त्याऐवजीं असें दृष्टोत्पत्तीस येत आहे कीं, मनुष्य जें करण्याची इच्छा सतत बाळगील तें करण्याची शक्ति त्याला अखेर प्राप्त होणारच होणार; कारण मानवजातीची ज्ञानशक्ति धडपड करतां करतां शेवटीं मानवाला संकल्पित गोष्ट घडवून आणण्याचें साधन उपलब्ध करून देते. सर्वशक्तिमत्ता ही अर्थात् कोणाहि व्यक्तींत असल्याचें दिसत नाहीं, तर मानवजातीची जी सामूहिक इच्छाशक्ति, तिच्या ठिकाणीं ही सर्व शक्ति असते आणि ही सामूहिक सर्वसमर्थ इच्छाशक्ति, मानवी व्यक्तीचा साधन म्हणून उपयोग करून, तिच्या द्वारां आपलें काम करते. या घटनेचा आणखी खोल विचार केला तर असें दिसून येईल कीं, मानवी व्यक्तीचा, अधिष्ठान आणि साधन म्हणून जो उपयोग केला जातो आणि मानवी समष्टीचा, परिस्थिति व क्षेत्र अशा स्वरूपानें जो उपयोग करण्यांत येतो, तो उपयोग करून घेण्याचें काम, मानवी समष्टीच्या जाणीवयुक्त इच्छाशक्तीचें किंवा कार्यकारी जाणिवेचें नसून, तें मानवी जाणिवेच्या पलीकडे, वर उंच व खालीं खोल असलेल्या अतिमानवी, अतिमानसी जाणिवेचें, त्या जाणिवेच्या खऱ्या सर्वसमर्थ शक्तीचें, इच्छाशक्तीचें असतें. हें सर्व प्रकरण काय आहे आणि अतिमानसी शक्ति खरोखरी काय वस्तु आहे ? ही अतिमानसी शक्ति म्हणजे मानवांतील ईश्वर होय. अनंत एकरस एकतत्त्व, अनेकाकारधारी एकतत्त्व, सर्वज्ञ सर्वसमर्थ एकतत्त्व, हेंच मानवांतील ईश्वराचें स्वरूप होय. या ईश्वरानें मानवरूपानें आपली स्वत:ची प्रतिमा निर्माण केली. या प्रतिमारूप मानवांत समष्टिमानव आणि व्यष्टिमानव, मानववंश आणि मानवव्यक्ति हीं रूपें अविभाज्य असून 'मी मी' करणारी व्यक्ति, आपल्या

 

पान क्र. २८

कार्याचें केंद्र म्हणून ईश्वरानें योजिली आहे, व मानववंश, समष्टि-नारायण, विश्वमानव हा आपल्या कार्याचा सांचा आणि आंखाडा म्हणून योजिला आहे. (- 'नारायण' हें विष्णूचें एक नांव आहे; हा मानवांतील ईश्वर असून नराशीं म्हणजे मानवाशीं अभेदाचें आणि भेदाचें असें दोन्ही प्रकारचें नातें नित्य ठेवीत असतो. मानवाशीं अभेदाचें नातें असलेल्या ईश्वराचें नांव 'विश्व-मानव'-) याप्रमाणें योजना करून आपल्या प्रतिमारूप व्यष्टि-समष्टि-मानवांत प्रतिमारूप नर-नारायणांत आपल्या मूळ ईश्वरीय एकत्वाची, सर्वज्ञत्वाची, सर्वसमर्थत्वाची म्हणजे आपल्या स्वयंकल्पित ईश्वरत्वाची छाया प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न ईश्वर करीत आहे. ''मर्त्यामध्यें अमर्त्य असें कांहीं आहे. हें अमर्त्य म्हणजे देवात्मा होय, देव होय. हा देव मर्त्यांच्या अंतरांत कायम राहणारा आहे. याचें अंतरांतील स्वरूप दैवी कार्यशक्ति होय. आपणांत दिव्य सामर्थ्यें उदयास येतात ती या शक्तीच्या कार्यकुशलतेनें उदयास येतात'' (वामदेव ऋग्वेद ४ - २ - १.) मर्त्यांमधील अमर्त्य देवाची वर वर्णिलेली विश्वव्यापी महान् प्रेरणा आधुनिक जग अजाणतां शिरोधार्य करून वागत आहे; आपण कोठें जात आहोंत याचें त्याला भान नाहीं, पण तें नेणतेपणें कां होईना आपल्या सर्व खटाटोपांत वरील महान् प्रेरणेनुसार कार्य करीत आहे, तिची सेवा करीत आहे, तिच्या योजनांची परिपूर्ति करीत आहे.

तथापि आधुनिक शास्त्रानें जें ज्ञान उपलब्ध होतें, त्या ज्ञानाला नेहमींच एक मर्यादा असते; म्हणजे त्याचा व्याप भौतिक क्षेत्रापुरताच असतो. तसेंच त्यामुळें जी सत्ता उपलब्ध होते, त्या सत्तेच्या व्यवहाराला नेहमींच एका गोष्टीचें ओझें, अडचण करणारें ओझें वागवावें लागतें. हें ओझें म्हणजे भौतिक साधनांचे ओझें होय. अशी आजची स्थिति असली तरी, आधुनिक शास्त्राची अगदीं अलीकडील प्रवृत्ति पाहिली तर, भावी काळांत आजच्या पेक्षां पुष्कळच अधिक अनिर्बंधपणें मानवाचे व्यवहार चालतील असा त्या प्रवृत्तींतून स्पष्ट अर्थ काढतां येतो. भौतिक शास्त्रीय ज्ञानाच्या क्षेत्रांतील दूरचीं ठाणीं अलीकडे अलीकडे भौतिक आणि अतिभौतिक यांना विभागणाऱ्या सीमारेषांवर अधिकाधिक बांधली जात आहेत, त्याप्रमाणें व्यवहारविषयक भौतिक शास्त्रानेंहि अलीकडे अलीकडे मोठे मोठे विक्रम केले आहेत. ज्या साधनांनीं हें शास्त्र पूर्वीं सर्वांत मोठे परिणाम घडवून आणीत होतें तीं साधनें संख्येनें कमी आणि कमी संकीर्ण करीत करीत जवळ जवळ शून्य करून ते पूर्वींचे परिणाम

 

पान क्र. २९

तसेंच आणि तशाच प्रमाणावर तें अलीकडे घडवून आणीत आहे. बिनतारी संदेशवाहन हें त्याचें एक उदाहरण आहे. निसर्गानें आपल्या कार्याची दिशा बदलण्यास आरंभ केला आहे या गोष्टीची सूचना आणि निशाणी या उदाहरणांत आहे. येथें भौतिक शक्ति एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे पाठवतांना जे प्रत्यक्ष भौतिक साधन पूर्वीं वापरीत, तें दूर केलें आहे; शक्ति हस्तगत करून तिला गति देणारें, संदेश देणारें स्थान आणि तिच्या मार्गक्रमणानंतर तिला थांबवून घेणारें तेथें संदेश घेणारें स्थान, असा फक्त दोन टोंकांनाच दृश्य भौतिक साधनांचा वापर केला जातो. शुद्ध व व्यावहारिक भौतिक शास्त्राची प्रगति होत होत, अतिभौतिकाचे नियम व शक्ति यांचा अभ्यास व्हावा, असें वाटूं लागेल आणि हा अभ्यास झाला म्हणजे वर सांगितलेलीं दोन टोंकांना वापरलीं जाणारीं दृश्य भौतिक साधनेंही नाहींशी होतील, होणारच; कारण योग्य रीतीनें योग्य ठिकाणापासून या नव्या अभ्यासाला आरंभ करून त्यांत चिकाटी धरली तर मनाला असें अतिभौतिक अदृश्य साधन नि:संशय सांपडेल कीं, ज्याच्या आधारें त्याला संदेशवाहक भौतिक शक्ति प्रत्यक्षपणें हस्तगत करतां येईल, आणि तिच्या हातीं संदेश देऊन, तो संदेश ज्या मार्गानें जावयाचा त्या मार्गानें व त्या ठिकाणीं तिला न चुकतां नेतां येईल अशी गति तिला देण्याची व्यवस्था करतां येईल. अतिभौतिक क्षेत्राची एकदां आपल्याला ओळख झाली व भौतिकाप्रमाणें त्याची सत्यता आपणांस पटली, आपण अभ्यासानें पटवून घेतली, म्हणजे आपल्याला कळेल कीं, अतिभौतिक क्षेत्रांत असे दरवाजे आहेत, जे उघडलें असतां आपणांसमोर भावी घटनांच्या अफाट व अद्भुत मालिकाच मालिका उभ्या राहतील.

तथापि हें लक्षांत ठेवलें पाहिजे कीं, जड इहलोकाला लागून असलेल्या लगतच्या जगाचें पूर्ण ज्ञान आपण करून घेतलें व तेथें पूर्ण सत्ता गाजवूं शकलों तरी, या लगतच्या जगापलीकडे आणखीहि जग वा जगें असल्यानें, आपल्या कार्यशक्तीच्या व ज्ञानशक्तीच्या व्यापाला असलेल्या मर्यादा संपल्या, असें आपण या लगतच्या श्रेष्ठ जगांत वावरतांनाहि समजतां कामा नये. मग आमच्या मर्यादांचें बंधन संपतें कोठें ? आम्हाला बांधून गुलामगिरींत राबविणाऱ्या मर्यादांच्या दोरखंडाची शेवटली गांठ आहे कोठें व ती कशी सुटणार ? आमच्या बाहेर अमुक आहे, आमच्या आंत तमुक आहे असा आंत-बाहेरचा भेद आम्हीं करतो. हा भेद खोटा

 

पान क्र. ३०

आहे असें आम्हाला पटून सर्व आमच्या आंतच आहे, ही प्रतीति आम्हाला येईल, बाहेरचें आंतल्याशीं एकरूप होईल; आमचा 'मी' हें साधन, विशिष्ट कार्यप्रणालीचें साधन आहे, तें साधन सूक्ष्म होत होत शेवटीं शून्य होईल; आमच्या व्यवहाराचा नियम आज 'मी'ला अग्रस्थान देतो आणि अनेक 'मीं'च्या संघर्षांतून एक प्रकारची एकता साधणें हें त्याचें उद्दिष्ट आहे; ही स्थिति बदलून आमच्या व्यवहाराचा नियम मानवांच्या नव्हे, सर्व भूतांच्या एकतेला अग्रस्थान देईल, या सर्वव्यापी एकतेच्या पोटांत सर्व भिन्न भासणारे 'मी' घेतले जातील, आणि तेथें ते अभेदानें एका सर्वव्यापी 'मी'चे अवयव होतील, अंश होतील. याप्रमाणें आमचा 'मी' व्यापक होऊन, आजचें सर्व बाह्य आमच्या पोटांत आलें व आमचा वैयक्तिक मी नष्ट झाला म्हणजे आमची गुलामगिरी संपेल, आमच्या भौतिक, अतिभौतिक सर्व मर्यादा नाहींशा होतील व सर्व विश्व आमचें व्यवहारक्षेत्र होईल. आमच्यांत उपरिनिर्दिष्ट बदल झाला म्हणजे विश्वव्यापक ज्ञानाचें, जाणिवेचें, विश्वेश्वराचें मध्यवर्ति सिंहासन आम्हाला आमच्या अगदीं जवळ असलेलें दिसेल. या सिंहासनावरून ईश्वरी ज्ञानशक्ति आपल्या अति विस्तृत साम्राज्यावर आपली सर्वसमर्थ दृष्टि टाकीत असलेली दिसेल. या ईश्वरी ज्ञानशक्तीशीं एकरूप होण्यानें स्वाराज्याचा आणि साम्राज्याचा लाभ घडेल.

 

-------------------------

 

   ( १ २ प्राचीन ऋषींच्या प्रवृत्तियोगाचीं हीं दोन उद्दिष्टें होतीं; स्वाराज्य म्हणजे स्वत:वरची पूर्ण सत्ता आणि साम्राज्य म्हणजे स्वत:च्या विश्वावरची पूर्ण सत्ता; स्वाराज्य आणि साम्राज्याप्रमाणें सालोक्यमुक्तीचा व साधर्म्यमुक्तीचा लाभहि, ईश्वरीय ज्ञानशक्तीशीं एकरूप होणाराला घडूं शकतो, घडतो; सालोक्यमुक्ति म्हणजे ईश्वराच्या लोकांत जाणीवपूर्वक वावरणारें मुक्त जीवन, सदैव पूर्ण अशा सनातन पुरुषोत्तमाच्या आंतरिक आश्रयानें जगलें जाणारें मुक्त जीवन; साधर्म्यमुक्ति म्हणजे ईश्वराचा स्वभावधर्म आपला स्वभावधर्म करून साधलेलें मुक्त जीवन, आमच्या मानवी जीवनांत पूर्ण पुरुषोत्तमाच्या दैवी प्रकृतीचा अवतार, आविष्कार, घडवून साधलेलें, मानवाचें सर्वथा मुक्त ईश्वरी जीवन.)

 









Let us co-create the website.

Share your feedback. Help us improve. Or ask a question.

Image Description
Connect for updates