Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics, expounding a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth.
Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.
प्रकरण पंचविसावे
जडाची गांठ
जडशक्ति किंवा द्वंद्व यांना प्रमाण मानून मला प्रकाशमय ईश्वररूप सत्याकडे प्रवास करतां येत नाहीं; ... असत्याच्या पायाचें संरक्षण करतात ते कोण ? असत्य विश्वाची राखण करतात ते कोण ?
--- ऋग्वेद ५.१२.२-४
तेव्हां सत् (अस्तित्व) नव्हतें, असत् (अनस्तित्व) हि नव्हतें; तेव्हां अंतरिक्ष नव्हतें, आकाश नव्हतें, त्याच्या पलीकडे असणारें तेंहि नव्हतें; सर्व आच्छादणारें तेव्हां काय होतें ? तें होतें तें कोठे होतें ? कोणत्या आश्रयाला होतें ? घन अंधकारमय आणि खोल खोल असा तो महासागर -- तो काय होता ? तेथें मरण नव्हतें, अमरत्व नव्हतें, दिवस-रात्र हें ज्ञान नव्हतें. एक अद्वितीय तत्त्व तेव्हां होतें -- त्याचें जीवन श्वासोच्छ्वासावाचून चालत होतें, त्याच्या जीवनाचा नियम त्याचा स्वतःचा स्वनिर्मित होता, त्यावांचून दुसरें कांहीं नव्हतें, त्याच्या पलीकडेहि कांहीं नव्हतें. आरंभीं अंधकार होता, त्याला अंधकाराचेंच आवरण होतें; नेणिवेचा महासागर असा हा आरंभींचा सर्व प्रकार होता -- विश्वव्यापी एकसत्ता (अस्तित्व) भागाभागांच्या ढिगाऱ्यांत लपली होती. त्या एकसत्तेच्या महान् शक्तीच्या प्रभावानें, तें एक अद्वितीय तत्त्व जन्मास आलें. प्रथम तें अंतरांत वासनेच्या रूपानें हालचाल करीत होतें; मनाचें मूळ बीज या वासनेंत होतें -- या वासनेंतून मनाची उत्पत्ति झाली. सत्यद्रष्ट्या ऋषींनीं हा शोध लावला कीं, असत् मध्यें सत् ची जी जी उभारणी झाली, ती हृदयांतील इच्छाशक्तीनें आणि विचारानें झाली; इच्छा आणि विचार यांचा किरणमय प्रकाश एका समपातळींत पसरत गेला. या पातळींच्या खालतीं काय होतें ? तेथें बीज टाकणारे होते, तेथें महान् आत्मे होते -- खालतीं आपापला 'स्वधर्म' होता, वरतीं महान् इच्छाशक्ति होती.
- ऋग्वेद १०.१२९.१ ते ५
पान क्र. ४४७
आमचा व्यवहारांतील अनुभव आणि आमच्या मनाची दीर्घकाळची संवय यांनीं, चैतन्य (सच्चिदानंद) आणि जड द्रव्य यांच्यामध्यें तीव्र भेदाची विभक्ततेची भिंत उभी केली असली, तरी ही भिंत, हा भेद, ही विभक्तता मूलत: सत्य नाहीं, अशा निर्णयाला आपण, आपल्याला उपलब्ध असलेल्या पुराव्याच्या आधारानें आलों आहों. विश्व ही 'एक' वस्तु आहे, त्यांतील भेद हे एकतेच्या पोटांत आहेत; विश्व ही विविधतामय एकता आहे; एकता ही प्रमुख आहे, विविधता एकतेच्या पोटांत आहे. शाश्वतचे विसंवाद, बेसूर आणि त्यांच्यामध्यें तडजोड घडवून आणण्याचा सारखा चाललेला प्रयत्न, हें कांहीं विश्वाचें खरें स्वरूप नव्हे; कधींहि अन्योन्यांचा मेळ होणार नाहीं अशा विरोधी गोष्टी आणि त्यांच्यामध्यें चालणारा कायमचा झगडा, हें कांहीं विश्वाचें खरें स्वरूप नव्हे. एकतत्त्वाची अटळ एकता आणि या एकतेनें निर्माण केलेली अनंत विविधता, असा विश्वाचा मूळ पाया आणि आरंभ आहे; त्याची मधली स्थिति, या स्थितीचें खरें स्वरूप असें आहे : दर्शनी भेद आणि झगडा आहे, त्याच्या पाठीमागें सारखा समन्वय, मेळ होत आहे; सर्व प्रकारचें वैषम्य व वैमनस्य असलेले या मेळांत मोठ्या ध्येयांसाठीं एकत्र होत आहेत; हीं मोठीं ध्येयें एका गुप्त जाणिवेकडून आणि संकल्पशक्तीकडून ठरविलीं जात आहेत आणि तिजकडूनच मेळहि घडविला जात आहे -- ही ज्ञानयुक्त गुप्त संकल्पशक्ति एकच एक असून, ती तिच्याकडून घडणाऱ्या गुंतागुंतींच्या व्यापारावर पूर्ण हुकमत चालविणारी आहे : ही विश्वाची मधली स्थिति आहे -- आरंभ आणि मधली स्थिति ही अशी असल्यानें आम्हांला अशा अनुमानास जागा आहे कीं, विश्वाची अंतिम स्थिति पुढीलप्रमाणे होईल -- जाणीवयुक्त संकल्पशक्ति उदयास आली आहे, तिची पूर्णता होणार, ती पूर्णतेला प्राप्त होणार आणि सर्वत्र सुसंवाद प्रस्थापित होणार. जाणीवयुक्त संकल्पशक्तीनेंच द्रव्य हें रूप घेतलेलें आहे. या तिनें घेतलेल्या रूपावरच तिची क्रिया चालत असते; ह्या द्रव्यरूपाचें एक टोंक जडद्रव्य आणि दुसरें टोंक चैतन्य किंवा आत्मद्रव्य होय. या दोन वस्तू अभिन्न आहेत, एकरूप आहेत : जडद्रव्य म्हणून ज्या वस्तूची संवेदना आम्हांस होते, त्याचें वास्तव सत्य-गर्भ 'चैतन्य' हें आहे; ज्याला आम्ही चैतन्य म्हणून ओळखतों, त्याचा दृश्य आकार, त्याचा देह 'जड-द्रव्य' हें आहे.
तथापि ही गोष्ट खरी आहे कीं, चैतन्य आणि जडद्रव्य यांच्यामध्यें
पान क्र. ४४८
व्यवहारांत पुष्कळच भेद आहे; हा मोठा भेद असल्यानें विश्वांतील अस्तित्वाची एक माला झाली आहे, ही माला अर्थात् अविभाज्य माला आहे; या मालेंत एकाहून एक चढत्या दर्जाचें विश्वगत अस्तित्व गुंफलेलें आहे. द्रव्य म्हणजे जाणीवयुक्त सत्ता (अस्तित्व), संवेदनेचा विषय होणारें, संवेदनेपुढें एक पदार्थ म्हणून उभें राहणारे, जाणीवयुक्त अस्तित्व (चैतन्य); संवेदनेपुढें उभें राहणाऱ्या द्रव्याचा आणि संवेदनेचा जो कांहीं संबंध उत्पन्न होईल, तो संबंध पायाभूत धरून विश्वाची बांधणी करण्यांत येते, विश्वाची प्रगति घडविण्यांत येते. संवेदना आणि द्रव्य यांच्या मध्यें एकच प्रकारचा अपरिवर्तनीय संबंध उत्पन्न होतो अशी कांहीं वस्तुस्थिति नाहीं. वस्तुस्थिति अशी आहे कीं, या संबंधाची एक मालाच आहे; या मालेंत एकापेक्षां एक चढता, एकापेक्षां एक विकसित संबंध गुंफलेला आहे. आमचें स्थूल भौतिक जडद्रव्य ही जणुं आमच्या स्थूल शारीर संवेदनेची किमया आहे. शुद्ध मन ज्या द्रव्यांत काम करतें, तें द्रव्य या द्रव्याहून वेगळें आहे; मनाचें स्वाभाविक कार्यक्षेत्र असलेलें हें द्रव्य, आमच्या स्थूल जडद्रव्यापेक्षां कितीतरी सूक्ष्म, कितीतरी लवचिक, कितीतरी मृदु असतें. मनाचें द्रव्य असा शब्दप्रयोग आम्ही करूं शकतो, कारण या मनाच्या द्रव्यांत आकार तयार होतात, क्रिया चालतात (आमच्या शारीर द्रव्याप्रमाणें); या दोन द्रव्यांखेरीज शुद्ध गतिशील प्राणशक्तीचेंहि द्रव्य असतें; हें प्राणद्रव्य, अतिसूक्ष्म भौतिक द्रव्याहून निराळें असतें, या भौतिक सूक्ष्म द्रव्यापासून निघणाऱ्या स्थूल संवेदनाग्राह्य शक्तिप्रवाहाहून हें प्रवाही प्राणद्रव्य अधिक सूक्ष्म व वेगळें असतें, चैतन्य हें स्वत: शुद्ध द्रव्य, मूल शुद्ध सत्तेचें द्रव्यच आहे; अर्थात् येथें शारीर, प्राणिक किंवा मानसिक संवेदना यांच्यासमोर शुद्ध सत्ता उभी राहून त्यांचा विषय होऊन, स्वतांत द्रव्यत्व आणीत नाहीं -- येथें शुद्ध आध्यात्मिक संवेदनाशील ज्ञानाचा प्रकाश आणि शुद्ध सत्ता यांचा विषय-विषयी संबंध घडतो; या आध्यात्मिक ज्ञानप्रकाशाचा विषय होऊन शुद्ध सत्ता स्वतांत द्रव्यत्व आणते -- या ज्ञानावस्थेंत विषयी आणि विषय अगदीं एकरूप असतात, विषयीच आपल्या स्वतःचा विषय होतो -- शुद्ध ज्ञानमय सत्ता स्वतःचाच विषय होऊन द्रव्यत्व पत्करते : मूळ शुद्ध ज्ञानमय सत्ता कालस्थलातीत असते, तिचा शुद्ध आध्यात्मिक आत्मकल्पित आत्मविस्तार ती आपल्या जाणिवेसमोर धरून, त्या जाणिवेचें विषयत्व त्या आत्मविस्ताराला ती देते आणि याप्रमाणें त्याला द्रव्यत्व अर्पण
पान क्र. ४४९
करून, या मूळ द्रव्यानें, सर्व अस्तित्वाचा मूळ पाया घालते. या पायाच्या पलीकडे वरतीं विषय-विषयी, ज्ञाता-ज्ञेय हा जाणीवपुर:सर भेद सर्वथा नष्ट होतो; तेथें दोहोंत पूर्ण एकता, समरसता नांदते, तेथें द्रव्य हा शब्द आम्ही वापरूं शकत नाहीं.
तेव्हां, शुद्ध आध्यात्मिक विषय-विषयी या भेदाच्या कल्पनेंतून द्रव्य हें आरंभीं निर्माण झालें; शेवटीं हा आध्यात्मिक काल्पनिक भेद, स्थूल व्यावहारिक स्पष्ट भेदांत रूपांतर पावला आणि या रीतीनें प्रथम चैतन्य किंवा शुद्ध सत्ताद्रव्य, नंतर मानसिक द्रव्य, प्राणिक द्रव्य व शेवटीं स्थूल भौतिक द्रव्य, अशी द्रव्यांची माला तयार झाली. हीच माला खालून वर जातांना स्थूल भौतिक द्रव्य, प्राणिक द्रव्य, मानसिक द्रव्य आणि शेवटीं शुद्ध चैतन्यद्रव्य अशी प्रत्ययास येते. याप्रमाणें द्रव्यांची अनेकता विश्वांत दिसली, तरी येथें वस्तुत: एकच एक ब्रह्म वस्तु आहे आणि ही ब्रह्माची एकता केव्हांहि नाहींशी होत नाहीं. आपण विकासक्रमानें चढत चढत, अखेर वस्तुजाताकडे मूळ पूर्ण दृष्टीनें पाहूं लागलों, म्हणजे आपणांला असें दिसतें कीं, ब्रह्माची एकता अणुभरदेखील उणी झालेली नाहीं, सदोष झालेली नाहीं -- अगदीं भौतिक द्रव्याच्या स्थूलांत स्थूल, अलग अलग पडलेल्या कठीण बनावटीच्या वस्तू पाहिल्या, तरी तेथेंहि ब्रह्माची मूळ एकता प्रत्ययास येते. विश्वाचें मूळ कारण (कर्ता) ब्रह्म, त्याचा आधार ब्रह्म, त्यांत अंतर्यामित्वानें राहणारें ब्रह्म -- या गोष्टी तर खऱ्याच आहेत -- पण विश्वाचें घटकद्रव्य देखील ब्रह्म आहे -- आणि ब्रह्मच केवळ आहे, दुसरें कांहीं नाहीं, ही गोष्टहि नितांत सत्य आहे. भौतिक जडद्रव्य हें ब्रह्म आहे, ब्रह्माहून तें वेगळें नाहीं. भौतिक द्रव्य आणि चैतन्य यांची फारकत झालेली असती, यांचा संबंध सर्वस्वीं तुटला असतां, यांचा कांहींच संबंध नसतां, तर भौतिक द्रव्य हें ब्रह्म आहे असें म्हणतां आलें नसतें -- पण आपण हें पाहिलें आहें कीं, ईश्वरी सत्तेचा (अस्तित्वाचा) शेवटला आकार म्हणजे भौतिक द्रव्य आहे, ज्ञेयरूप ईश्वरी सत्ता ही शेवटीं भौतिक द्रव्य होते; या द्रव्याच्या पोटीं ईश्वर सर्वांशानें राहतो, नित्य राहतो; या द्रव्याच्या पाठीमागेंहि त्याचा सर्वांशानें नित्य निवास असतो; म्हणून भौतिक द्रव्य हें ब्रह्म आहे, ब्रह्माहून दुसरें, वेगळें कांहीं नाहीं असें म्हणणें पूर्ण सत्य आहे. स्थूल भौतिक द्रव्य दिसावयाला ज्ञानशून्य, गतिशून्य असें असलें, तरी त्यांत सर्वत्र आणि सर्वदा प्राणशक्तीचा महान् कार्यकारी सांठा स्वभावत: भरलेला
पान क्र. ४५०
आहे; ही कार्यकारी प्राणशक्ति दिसावयाला जाणीवशून्य असली, तरी तिच्या पोटीं सदा कार्यमग्न गुप्त असें मन असतें; तें मन ज्या गुप्त क्रिया करतें, त्या क्रियांनीं प्रकट होणारी शक्ति म्हणजेच प्राणशक्ति होय. प्राणयुक्त शरीरांतील हें मन अज्ञानपूर्ण, प्रकाशहीन, चांचपडत काम करणारें असतें, तरीपण त्याला अतिमानसाचा आधार असतो; अतिमानस हें मनाचा खरा आत्मा असतें, तें मनाला आधार देतें आणि सर्वशासक या नात्यानें त्याला मार्ग दाखवितें, त्याच्या वाटाड्याचें काम करतें; हें अतिमानस ज्याप्रमाणें मनाच्या पोटीं असतें, त्याप्रमाणें मनाच्या खालच्या भौतिक स्थूल द्रव्याच्या पोटींहि तें असतें -- या प्रकारचें स्थूल भौतिक द्रव्य, प्राण, मन आणि अतिमानस या सर्व वस्तू ब्रह्माच्या, शाश्वत चैतन्याच्या, सच्चिदानंदाच्या भिन्न भिन्न अवस्था आहेत -- ब्रह्म या सर्व वस्तूंत वस्ती करतें एवढेंच नव्हे, तर या सर्व वस्तू स्वरूपतः ब्रह्मच आहेत; ब्रह्मच या सर्व वस्तू बनलेलें आहे; मात्र या वस्तूंपैकीं एकहि वस्तु, त्याचें सर्वातीत सर्वनिरपेक्ष स्वयंपूर्ण स्वयंभू अस्तित्व (स्वरूप) नव्हे.
ब्रह्मच भौतिक द्रव्य बनलें आहे; ब्रह्माची व भौतिक द्रव्याची ताटा-तूट झालेली नाहीं; या गोष्टी खऱ्या असल्या, तरी ब्रह्मांत आणि भौतिक स्थूल द्रव्यांत व्यवहारतः अंतर आहे, विचारत: अंतर आहे आणि या अंतरामुळें ब्रह्माची, चैतन्याची आणि स्थूल द्रव्याची फारकत झाल्यासारखी भासते; इतकी कीं, चैतन्यात्मक आध्यात्मिक जीवन आणि भौतिक जीवन ही जीवनें अन्योन्यविरोधी दिसतात. भौतिक जीवनाचा कायदा आध्यात्मिक जीवनाच्या नियमाच्या अगदीं विरुद्ध दिशेचा असतो, भासतो आणि त्यामुळें ब्रह्मवादी, अध्यात्मवादी हा भौतिक जीवनाचा त्याग करूं पाहतो, करतो; त्याला त्याच्या अडचणींतून सुटण्याची त्याग हीच एकमेव जवळची वाट वाटते -- आणि ही जवळची वाट असतेहि : पण जीवनविषयक अडचणींतून जवळची वा लांबची पळवाट काढणें हा कांहीं जीवनाचा प्रश्न सोडविण्याचा मार्ग नव्हे. तथापि ही गोष्ट खरी आहे कीं, स्थूल भौतिक द्रव्य आमच्यापुढें मोठी अडचण उभी करतें; महत्त्वाची भानगड या द्रव्यामुळेंच उत्पन्न होते; या द्रव्याचा आश्रय घ्यावा लागतो म्हणून आमचें प्राणमय जीवन दुर्वासनामय होतें, त्याला फार मर्यादा पडतात, मरण त्याच्या मागें लागतें, दुःख त्याच्या वांट्याला येतें -- या भौतिक द्रव्यामुळें आमचें मन अर्धें अधिक आंधळें होतें, त्याचे
पान क्र. ४५१
पंख तोडल्यासारखे होतात, लहानशा जागेला त्याचे पाय बांधून टाकल्यासारखे होतात -- वरतीं त्याला अमर्याद विस्तार आणि स्वतंत्रता दिसत असते पण त्याला मात्र या विस्तृत क्षेत्रापासून आणि स्वतंत्रतेपासून, त्याच्या भौतिक आश्रयानें दूर ठेवलेलें असतें. शुद्ध अध्यात्माच्या साधकाला अशा या भौतिक द्रव्याचा गाळ किळस आणतो; दुर्वासनामय जीवनाची पशुता उबग आणते, मनाची अधोमुख दृष्टि, संकुचितपणा, बंधनप्रियता त्याला असह्य होते -- आणि हें सर्व कुंपण तोडून मोडून त्यांतून पार व्हावें, कर्मत्याग करावा, मौनाचा आश्रय करावा आणि या मार्गानें चैतन्याची, मूळ आत्म्याची कर्मातीत शांति आणि बंधनातीत अवस्था पुन्हां प्राप्त करून घेऊन मोकळें व्हावें असें या साधकाला वाटतें -- त्याच्या दृष्टीनें हें त्याचें वाटणें अगदीं रास्त आहे, तदनुरूप त्याचें वागणेंहि रास्त होईल. तथापि अध्यात्माचा दृष्टिकोन म्हणजे केवळ आतां वर्णिलेला दृष्टिकोन अशी कांहीं वस्तुस्थिति नाहीं -- अध्यात्माचा याहून वेगळा दुसराहि दृष्टिकोन असूं शकतो; अनेक तेजस्वी महात्म्यांचा वरील संन्यासी दृष्टिकोन होता, म्हणून तेंच सर्वोच्च अंतिमज्ञान आहे, त्यांतच सर्वांगपरिपूर्ण अध्यात्म आहे, असें आम्हीं मानावें असें नाहीं. आम्हांला आमच्या जीवनाचा जो वैताग येतो, उबग येतो, तो सर्व बाजूला ठेवून, तटस्थ निरीक्षकाच्या दृष्टीनें विश्वाच्या दिव्य संस्थेचा अर्थ आपण तपासला पाहिजे. भौतिक स्थूल जडद्रव्य हें, आत्मा आणि आत्मसत्ता जणुं नाहींच असा देखावा उभा करतें -- ही जडाची अवजड गुंतागुंतीची गांठ आम्हांला भेडसाविते, हिसका देऊन किंवा तिजवर कसातरी जोराचा आघात करून, घाव घालून आम्ही ती तोडूं इच्छितो -- पण असा आततायीपणा न करतां, आपण या गांठीचे पदर, तिचे धागे अलग अलग करून ती सैल करण्याचा, ती योग्य रीतीनें सुटेल असा प्रयत्न करूं. त्यानें जीवनाचा प्रश्न आम्हीं सोडविला असें होईल. आततायीपणाचा आश्रय करणें म्हणजे जीवनाचा प्रश्न डावलणें आहे; असो. भौतिक जडद्रव्य काय अडचणी उत्पन्न करतें, कोणत्या आत्मविरोधी गोष्टी आत्म्याच्या समोर उभ्या करतें, त्या आपण प्रथम पाहूं : ही विरोधी बाजू मांडतांना ती पूर्णपणें, कांटेकोरपणें मांडू, तिच्यांतून कांहीं वगळावयाचें नाहीं -- उलट तिच्यांत कांहीं अधिक घालून, ती अत्युक्तीनें सजवून मांडावयाची असें धोरण ठेवूं : याप्रमाणें आत्मविरोधी भौतिक-द्रव्याचा पक्ष मांडल्यानंतर, मग हा प्रश्न कसा सोडवावयाचा तें पाहूं.
पान क्र. ४५२
भौतिक द्रव्याचे ठिकाणीं, ज्ञानमय आत्म्याला विरोधी अशी जी मूलभूत गोष्ट आहे, ती अज्ञान या तत्त्वाची परिसीमा, पराकोटी होय : स्थूल भौतिक द्रव्याचे ठिकाणीं पराकोटीचें अज्ञान आहे. सच्चिदानंदाचें ज्ञान, आपलें कार्य करतां करतां, त्या कार्याच्या या स्थूल भौतिक रूपांत स्वतःला सर्वतोपरी विसरलें आहे -- मनुष्य एखादें काम करीत असावा, त्या कामासाठीं आपल्या शक्तीचा उपयोग करीत असावा आणि या व्यापारांत त्यानें आपलें अंतरंग उत्कटपणें ओतल्यानें, स्वत: कोण आहों हें त्यानें विसरून जावें, स्वतःचें अस्तित्वहि विसरून जावें -- केवळ काम आणि कामासाठीं लावलेली शक्ति, एवढेंच क्षणभर त्याचें स्वरूप व्हावें -- तशी ही सच्चिदानंदाच्या ज्ञानाची स्थूल भौतिकांतील अवस्था आहे. सच्चिदानंदाचें आत्मचैतन्य स्वयंप्रकाश आहे, शक्तीच्या सर्व प्रकारच्या क्रिया होत असतां, त्या क्रिया प्रभुत्वानें तें चालवितें, आणि स्वतःच्या प्रभुत्वाची जाणीव त्याला असतें; या जाणिवेला कोणतीहि मर्यादा नसते. अशी सामान्यत: चैतन्याची गोष्ट असतां, स्थूल भौतिकांत मात्र तें जणुं नाहींसें झाल्यासारखें, अस्तित्वांत नसल्यासारखें होतें, वागतें; दुसरीकडे कोठें तें असेल -- पण या स्थूल भौतिक द्रव्यांत तें स्वत: नाहींसारखेंच आहे, येथें केवळ जडशक्ति, जाणीवहीन हृदयशून्य भौतिक शक्ति ठेवून, तें नाहींसें झालें आहे -- ही शक्ति नित्यशः निर्माणाचा आणि संहाराचा व्यापार चालवीत असते. तिला स्वतःचें ज्ञान नसतें; ती काय निर्मिते, निर्माणाची उठाठेव ती कशासाठीं करते, निर्माण करून निर्मिलेल्याचा संहार ती कां करते, हें कांहीं तिला कळत नाहीं; तिला मन नाहीं, म्हणून कळत नाहीं. हृदय नाहीं, म्हणून कशाचीच फिकीर वाटत नाहीं. स्थूल भौतिक द्रव्याच्या, स्थूल भौतिक शक्तीच्या व्यवहारांत हा असा देखावा असतो. वास्तविक भौतिक विश्वांत देखील खरी वस्तुस्थिति अशी नाहीं, हा सर्व देखावा खोटा देखावा आहे; याच्या पाठीमागें मन आहे, इच्छाशक्ति आहे; मन आणि मनाची इच्छा याहून थोर, याहून दिव्य असें कांहीं आहे -- अशी वस्तुस्थिति आहे; पण या भौतिक विश्वांत, त्यांतून, त्याच्या अंधारांतून जी जाणीव वर येते, प्रकट होते, त्या जाणिवेला हा अंध:कारमय देखावा सत्य म्हणूनच भासत असतो; हा देखावा सत्य नसून मिथ्या आहे, आभास आहे असें जरी असलें, तरी हा आभास अत्यंत परिणामकारी आहे -- कारण आमचें बाह्य साकार सदेह जीवन हें या आभासाच्या पार्श्वभूमीवर अवलंबून असतें; आमच्या
पान क्र. ४५३
सर्व थोर आकांक्षा व प्रयत्न या आभासानें व्यापलेले असतात, वेढलेले असतात.
भौतिक विश्वांत हा एक भयंकर निर्दयतेचा राक्षसी चमत्कार घडून येत असतो कीं, त्यांतून, त्या मनाचा अभाव असलेल्या विश्वांतून, मन नव्हे, तर मनें वर येतात, उदयास येतात व अफाट अमर्याद अज्ञान हा ज्या भौतिक विश्वाचा कायदा आहे, त्या विश्वाच्या पसाऱ्यांत हीं मनें ज्ञानासाठीं धडपड करूं लागतात; या धडपडींत कांहीं जोर नसतो; व्यक्तिश: हीं मनें अगदींच अगतिक होतात; आत्मरक्षणासाठीं हीं मनें त्यांची वैयक्तिक बळाची पुंजी एकत्र करतात, संघटित होतात, तेव्हां कोठें त्यांची आत्यंतिक वैयक्तिक अगतिकता थोडीफार कमी होते. विश्वाच्या राक्षसी अज्ञानाला हृदय नाहीं. या हृदयशून्य अज्ञानाच्या क्षेत्रांत हृदयें उदयास आलीं आहेत, त्यांना या अज्ञानाच्या कडक कायद्याच्या कक्षेंत आपली हालचाल करावयाची असते; हीं हृदयें कांहीं उच्च आकांक्षा धरतात आणि या आकांक्षामुळें त्यांचे हालहाल होतात; विश्वाच्या लोहमय व मार्दवशून्य पसाऱ्यांत, अज्ञानाची आंधळी क्रूरता धिंगाणा घालीत असते; या धिंगाण्याच्या भारानें आणि मारानें, या पसाऱ्यांत उदयास आलेलीं हृदयें चिमटून फुटून रक्ताच्या थारोळ्यांत निश्चेष्ट होतात. विश्वाची आंधळी क्रूरता या हृदयांवर आपला कायदा लादते, या हृदयांना लाभलेली जाणीव ही आंधळी क्रूरता आत्मसात करते आणि ही हृदयें मग जाणीवयुक्त क्रूरतेनें, पाशवी, भयंकर हिंस्त्र क्रूरतेनें विश्वांत वावरूं लागतात. हा देखावा एक महान् गूढ आहे; गूढ दिसणाऱ्या या महान् चमत्कारपूर्ण देखाव्याच्या पाठीमागें खरोखरी काय चाललेलें असतें? सच्चिदानंदाची जाणीव, भौतिक स्थूल द्रव्यांत स्वतःला सर्वस्वीं विसरली होती, ती आपल्या आसुरी आत्मविस्मृतींतून बाहेर येत आहे; हा बाहेर येण्याचा क्रम हळूं हळूं चालला आहे, यांत दुःखाचा अनुभव घ्यावा लागत आहे; ती जाणीव जीवरूपानें जडभूतांतून वर येत आहे, या जीवरूपांत कोठें ती वर येऊं पहात आहे, कोठें अर्धवट वर आलेली आहे; कोठें अंधुक आहे, कोठें पूर्ण आहे; अशी ही क्रमश: दुःख भोगीत, हळूं हळूं वर येणारी जाणीव, जीवांत जीवदृष्टीनें पूर्ण होऊन, नंतर आणखी वर चढण्यासाठीं धडपडत असते; पुन्हां (आरंभीं होती तशी) दिव्य आत्मज्ञानानें युक्त, पूर्ण स्वतंत्र, अमर्याद, अमर होण्यासाठीं ती धडपडत असते. पण ही खटपट ती ज्या कायद्याच्या कक्षेंत करीत
पान क्र. ४५४
असते, तो कायदा या सर्व ध्येयभूत गोष्टींच्या विरुद्ध असतो; भौतिक स्थूलाच्या, म्हणजे अज्ञानाच्या परिसरांत आणि पकडींत असतांना तिला ही खटपट करावयाची असते. स्थूल जड भौतिक, ज्ञानशून्य व अनंत तुकडे पडलेलें जडद्रव्य, हें या जाणिवेच्या हालचाली ठरवितें, तिचीं साधनें तिला तयार करून देतें -- आणि या जडानें, अज्ञानानें ठरविलेल्या क्रिया व दिलेलीं उपकरणें, प्रगतीची धडपड करणाऱ्या जाणिवेला पावलोपावलीं अज्ञानानें अडवितात, मर्यादा घालतात.
पूर्ण ज्ञानमय स्वयं-तंत्र आत्म्याला, स्थूल भौतिक द्रव्य जसें पराकोटीच्या अज्ञानानें विरोध करतें, त्याप्रमाणें पराकोटीच्या परतंत्रतेनेंहि विरोध करतें; पराकोटीचें अज्ञान, हा जसा स्थूल भौतिकाचा एक मूलभूत आत्मविरोधी गुण आहे, तसा त्याचा दुसरा मूलभूत आत्मविरोधी गुण पराकोटीची परतंत्रता हा आहे -- यांत्रिक नियमाच्या पराकोटीच्या बंधनांत स्थूल भूत काम करतें; स्थूल भूताच्या आश्रयानें असलेला आत्मा आपली मुक्तता करून घेऊं इच्छितो, पण त्याच्या प्रयत्नाला स्थूल भूताचा यांत्रिक व्यवहाराचा कायदा आड येतो, त्याची अति महान् जडता त्याच्या आश्रिताच्या मुक्तिविषयक खटपटीला महान् विरोध करते. स्थूल भौतिक द्रव्याची जडता म्हणजे गतिशून्यता नव्हे, हें द्रव्य आत्यंतिक गतीनें गतिमान् असतें; अचिंत्य शक्तीनें शक्तिमान् असतें; अमर्याद क्रियाशीलता त्याचे ठिकाणीं असते; या भौतिक द्रव्याच्या भव्य हालचाली आम्ही पाहूं लागलों, तर आम्हांला अत्यंत आश्चर्य वाटतें, त्यांचें सारखें कौतुक आम्ही करूं लागतो. पण आत्मा आणि जड भौतिकद्रव्य यांत हा भेद आहे कीं, आत्मा स्वयं-तंत्र आहे, स्वतःचा धनी आहे, स्वतःच्या क्रियांचा प्रभु आहे, त्या क्रियांनीं बद्ध होणारा नाहीं; कायदा करणारा आहे, त्या कायद्याच्या अंकित राहणारा नाहीं; उलट स्थूल जडद्रव्य मात्र, महान् गतीनें, शक्तीनें आणि कर्तृत्वानें युक्त असलें, तरी तें दुसऱ्यानें लादलेल्या कडक बंधनांत काम करणारें आहे. त्यांच्यांत स्वयंकर्तृत्व नाहीं, त्याच्यावर ठाम यंत्राचा कायदा लादलेला आहे; हा कायदा या द्रव्याला उमजत नाहीं, त्यासंबंधानें या द्रव्यानें कांहीं विचार केलेला नसतो; यंत्राप्रमाणें, न उमजतां हा कायदा त्याला पाळावा लागतो; कोणीं हा कायदा केला, तो कसा व कशाकरितां केला गेला, याचें या भौतिक द्रव्याला मुळींहि ज्ञान नसतें. अशा या स्थूल भूतांत प्राण उदयास आला, जीवन जागृत झालें आणि त्यानें आपल्या भौतिक शरीरावर,
पान क्र. ४५५
भौतिक बळावर आपला स्वतःचा कायदा चालविण्याचा प्रयत्न सुरू केला व आपल्या स्वतःच्या लहरीप्रमाणें, स्वतःच्या गरजा भागविण्यासाठीं सर्व गोष्टींचा तें उपयोग करूं लागलें, म्हणजे भौतिक प्रकृति, या प्राणाचें, या जीवनाचें बळ चालूं देते, त्याचें ऐकते, त्याचा व्यवहार पसंत करून, त्याला मदतहि देते -- पण या सर्व गोष्टी थोड्याफार विरोधानंतर, नाराजीनें आणि कांहीं एका मर्यादेपर्यंतच भौतिक प्रकृति करीत असते. प्राण व जीवन यांच्या उदयानंतर मनाचा उदय होतो, मन जागृत होतें आणि स्थूल भौतिक शरीरांत राहून, मी कोण आहे, कशाकरितां येथें आहे, येथें कसें काम करावयाचें -- या सर्व गोष्टी काय आहेत, कशाकरितां आहेत, कशा होतात इत्यादि प्रश्नांचीं उत्तरें तें शोधावयास लागतें आणि याप्रमाणें त्याला मिळवितां येईल तें ज्ञान, आपला कायदा आणि व्यवहार सर्व वस्तुजातावर लादण्यासाठीं तें उपयोगास आणूं पाहतें -- अर्थात् हा कायदा प्राणाच्या कायद्याहून अधिक स्वतंत्र असतो, हा व्यवहार अधिक स्वयंनिर्णित असतो; मन याप्रमाणें करूं लागलें म्हणजे भौतिक प्रकृति जशी प्राणाच्या बाबतींत वागते, तशीच या मनाच्या बाबतींही वागते. म्हणजे थोडक्यांत, कांहीं एका मर्यादेपर्यंत त्याचें ऐकते, त्याला साह्य करते. पण ही मर्यादा संपली कीं, पुढें भौतिक प्रकृति प्राणापुढें आणि मनापुढें महान् अडचणी उभ्या करते, आपल्या हट्टी जडतेची, यांत्रिक व्यवहाराची धोंड त्यांच्या मार्गांत उभी करते, त्यांच्या योजनांना स्पष्ट नकार देते. त्यांना समजाविते कीं, त्यांना जो थोडा विजय मिळाला आहे, तेवढ्यावर त्यांनीं समाधान मानावें; अधिक कांहीं घडवून आणणें, आपलें इष्ट मिळविण्यासाठीं यशस्वी रीतीनें अधिक धडपड करणें त्यांना यापुढें जमणार नाहीं. प्राणमय जीवन हें विस्तृत व व्यापक होण्यासाठीं, दीर्घ काल टिकण्यासाठीं धडपडतें; या धडपडींत त्याला बरेंच यशहि येतें; पण तें जेव्हां आत्यंतिक व्यापकता मिळवूं पाहतें, तें जेव्हां अमरत्व मिळवूं पाहतें, तेव्हां स्थूल भौतिकाचें कठीण लोखंडी भिंताड त्याला अडवितें आणि आपली व्यापकता संकुचितच राहणार, आपल्याला मरण चुकणार नाहीं हें जीवनाला मान्य करावें लागतें; स्थूल भौतिकाच्या दोषांमुळें, संकुचित क्षेत्राला व मरणाला जीवन बांधलें गेलें आहे. प्राणमय जीवनांतून उदय पावल्यावर, मन हें जीवनाला साह्य करूं पाहतें; ज्ञान मिळविण्याची व दुसऱ्या कांहीं गोष्टी साधण्याची स्वतःची तीव्र इच्छा तृप्त करूं पाहतें
-- सर्व ज्ञान मिळवावें, सर्व प्रकाश आत्मसात् करावा, सत्य हस्तगत करावें,
पान क्र. ४५६
सत्यरूप व्हावें, प्रेम व्यवहारांत आणावें, आनंद व्यवहारांत आणावा, स्वत: प्रेममय व प्रेमरूप व्हावें, आनंदमय व आनंदरूप व्हावें अशी मनाची धडपड व तळमळ असते, तीव्र इच्छा असते व ही इच्छा तें तृप्त करूं पाहतें, पण त्याला तें साधत नाहीं; भौतिक जीवनाच्या वासना, भौतिक संवेदना, शरीरगत व इतर भौतिक उपकरणें मनाच्या आड येतात; भौतिक संवेदना आणि उपकरणें हीं मनाच्या मार्गांत अडथळे निर्माण करतात, त्याच्या इच्छांना नकार देतात; भौतिक जीवनवासना त्याला आडमार्गानें नेतात, त्याजकडून प्रमाद घडवितात, त्याला क्षुद्र विषयाकडे ओढतात. मनानें ज्ञान मिळविलें, तर त्यांत प्रमादांची गर्दी होते; त्यानें प्रकाश मिळविला, तर त्या प्रकाशाची पार्श्वभूमि आणि सहयोगिनी निश्चितपणें तमो-देवता (अंधकार) असते; मन जेव्हां सत्याचा यशस्वीपणें शोध लावतें, तेव्हां तें शोध लावलेलें सत्य हस्तगत होतांच तें सत्याच्या वर्गांतून बाहेर जातें -- असत्य ठरतें आणि शोधाचा रगाडा पुन्हां चालूं होतो; प्रेम व्यवहारांत येतें पण त्याची तृप्ति होत नाहीं; आनंदहि व्यवहारांत येतो, पण त्याच्या मागें न्याय दिसत नाहीं -- आणि क्रोध, द्वेष, तिटकारा, उबग, दुःख, यातना या गोष्टी प्रेमामागून, आनंदामागून त्यांच्या छायेप्रमाणें येऊन, आम्हांला सतावतात. याप्रमाणें मनाच्या आणि प्राणमय जीवनाच्या ज्या मागण्या असतात, त्या मागण्यांना भौतिक स्थूल द्रव्याच्या जडतेच्या यंत्रवत् व परतंत्र व्यवहाराचा विरोध होतो आणि म्हणून अज्ञानावर विजय मिळविणें आणि अज्ञानाचा स्वभावधर्म जी पाशवी शक्ति तिच्यावर सत्ता संपादन करणें, या गोष्टी मनाला व जीवनाला साधत नाहींत.
अज्ञान आणि जड यांत्रिकता या त्याच्या दोन स्वभाव-धर्मांचा महान् साहाय्यक म्हणजे स्थूल भौतिक द्रव्याचा तिसरा स्वभावधर्म, पराकोटीची विभागणी आणि संघर्ष हा आहे. आत्मा हा ज्ञानमय, स्वतंत्र आणि एकरस, अविभाज्य एकतेचें आदितत्त्व, तर स्थूल भूत हें अज्ञानमय, परतंत्र आणि अणूअणूंचें, तुकड्यातुकड्यांचें बनलेलें अंतिम तत्त्व -- अशी वस्तुस्थिति असल्यानें, आत्म्याच्या योजनांना आणि व्यापारांना स्थूल भूताकडून तीन प्रकारचा मूलभूत विरोध होतो. अज्ञानाचा विरोध, जडतेचा विरोध आणि तिसरा संघर्षमय भेदाचा विरोध. मनाचा आणि प्राणाचा (जीवनाचा) पराजय करण्यांत स्थूल भूताच्या जडतेला व अज्ञानाला यश येतें, याचें महत्त्वाचें कारण, स्थूल भूताचा तिसरा स्वभावधर्म, म्हणजेच संघर्षमय भेद हा आहे. स्थूल भौतिक द्रव्य मूलत: साकार
पान क्र. ४५७
सच्चिदानंद असल्यानें, वस्तुत: अभेद्य अविभाज्य व एकरूप आहे; परंतु या द्रव्याकडून ज्या क्रिया घडतात त्यांचा पाया भेदमयता, विभागमयता हाच असतो; हें द्रव्य दोन प्रकारांनीं अभेद एकता निर्माण करूं शकतें -- एक प्रकार म्हणजे त्याचे जे भाग असतात त्यांचा समुदाय बनविणें; दुसरा प्रकार म्हणजे त्या भागांपैकीं एका भागानें दुसऱ्या भागाला पचवून टाकणें; (या प्रकारांत पचविणाऱ्या भागाकडून दुसऱ्या भागाचा नाश होणें अपरिहार्य असतें) अभेद, ऐक्य निर्माण करण्याच्या या दोन्हीं प्रकारांनीं स्थूल भौतिकांतील विभागतत्त्व, भेदतत्त्वच स्पष्टपणें प्रत्ययास येतें; या तत्त्वाचा व्यवहार भौतिक द्रव्यांत अखंड चालत असल्याचें दोन्ही प्रकारच्या ऐक्यप्रयोगांनीं आमच्या अनुभवास येतें. जे भाग संघीकरणानें एकत्र आणले ते केव्हांतरी अलग होणार हा संभव कायम असतो; अर्थात् शेवटीं केव्हांतरी ते विलग होऊन संघ मोडणार हें निश्चित असतें. संघाची, संघाताची मोडतोड म्हणजे मरण; असें हें मरण नव्या संघाताच्या निर्माणासाठीं अवश्य असतें. याप्रमाणें संघीकरणाच्या प्रकारांत मरण हें जीवनाची आवश्यक पार्श्वभूमि असतें; दुसऱ्या प्रकारांत मरण हें जीवन टिकविण्याचें साधन असतें -- एकूण मरण हें दोन्ही ऐक्य प्रयोगांत अपरिहार्य असतें. मरणाप्रमाणेंच दुसरी अपरिहार्य गोष्ट, संघर्ष ही होय. विश्वांतील जीवनांत ज्या अलग अलग मूर्ती आहेत त्यांचा स्वत:च्या संरक्षणासाठीं एकमेकींशीं झगडा चालणें अपरिहार्य असतें; स्वत:च्या जीवनाला साहाय्यक असणारे द्रव्यसंघात टिकविणें, स्वत:ला विरोध करतील त्यांना कबजांत घेणें किंवा मारून टाकणें, आपल्याला जगतां यावें म्हणून दुसऱ्यांना अन्नादाखल भक्षण करणें -- मात्र आपल्यावर कोणी कबजा करूं पाहील, आपल्याला कोणी मारूं पाहील, भक्षूं पाहील, तर त्यापासून पळून जाणें, या संघर्ष-कथा विश्वजीवनाच्या अंगभूत आहेत. स्थूल भूतांत जेव्हां प्राणतत्त्व उदयास येतें, तेव्हां त्याचा व्यापार वर सांगितलेल्या या संघर्षाच्या व मरणाच्या पायावरच चालतो; आपण हें पाहिलेंच आहे कीं, प्राणमय जीवनाच्या, पहिल्या अवस्थेंत मरण, वासना, मर्यादित क्षेत्र, त्याचप्रमाणें भक्षणासाठीं, कबजासाठीं, प्रभुत्वासाठीं जीवाजीवांचा सारखा संघर्ष या गोष्टी अपरिहार्य असतात. स्थूल भूतांत प्राणानंतर मनाचें तत्त्व उदयास आलें म्हणजे त्यालाहि मर्यादांचें बंधन (ज्या सांच्यांत व ज्या द्रव्यांत तें काम करतें त्यांच्या स्वाभाविक मर्यादांचें बंधन) पत्करावें लागतें; तें शोध करीत राहतें --
पान क्र. ४५८
निश्चित सिद्धी त्याजपासून दूर राहते; तें जें कांहीं मिळवील, तें केव्हांतरी त्याच्यापासून हिरावून नेले जातें; जें काय काम तें करील, त्या कामाचे अंगभूत भाग आज एकत्र, तर उद्यां एकमेकांपासून तुटलेले अशी स्थिति त्याच्या कामाची होते; एकंदरींत मनोमय मनुष्य जें ज्ञान मिळवितो, तें संशयातीत कधींच नसतें, तें अज्ञान ठरण्याचा संभव नेहमीं असतो; त्याचे श्रम हे क्रिया-प्रतिक्रिया, जोडणें-मोडणें या आपत्तीच्या चक्रांतून सुटत नाहींत; कांहीं निर्माण करा, थोडे दिवस तें टिकवा, नंतर मरणाच्या, विध्वंसाच्या तें हवालीं करून, पुष्कळ दिवस थांबा -- पुन्हां निर्माणादि क्रिया करा, असें मनुष्याच्या सर्व प्रकारच्या श्रमाचें चक्र चालतें. निश्चित खात्रीची, संशयातीत प्रगति मात्र अशा श्रमांनीं होऊं शकत नाहीं.
अज्ञान, जडता आणि संघर्षात्मक भेद यांनीं व्यापलेल्या अशा स्थूल भौतिक द्रव्याच्या पोटांतून जीवन आणि मन उदयास येतें -- तेव्हां अर्थांतच या जीवनाला आणि मनाला वरील गुणत्रयीचा, दोषत्रयीचा परिणाम म्हणून दुःख, यातना व असमाधान हे भोग भोगावे लागतात. त्यांच्या वांट्याला आलेले हे भोग त्यांना अतिशय जाचक होतात. जर अज्ञान हें मनाच्या जाणिवेला सर्वथा व्यापून असतें, तर त्यानें मनाला असमाधान वाटण्याचें कांहीं कारण नव्हतें; तें अज्ञानव्याप्त पण अज्ञानाची जाणीवहि नसलेलें मन, एखादी रुढीची चाकोरी धरून नित्य व्यवहार करूं शकलें असतें; जाणिवेचा, ज्ञानाचा अमर्याद महासागर आपल्या भोंवतीं पसरलेला आहे, हें मनाला ठाऊक नसतें, तर त्याला आपल्या स्वतःच्या अज्ञानामुळें दुःख झालें नसतें; पण स्थूल भौतिकांतून प्राणानंतर मन उदयास आलें म्हणजे त्याला अनेक गोष्टी कळूं लागतात : ज्या विश्वांत आपल्याला रहावयाचें, त्यासंबंधीं आपल्याला पाहिजे तेवढें ज्ञान नाहीं हें त्याला कळतें; सुखी व्हावयासाठीं विश्वाचें ज्ञान हवें, त्यावर प्रभुत्व हवें ही गोष्ट त्याला कळतें; तें ज्ञान मिळवूं लागतें, पण हें मिळविलेलें ज्ञान अत्यंत मर्यादित आणि वांझ असतें आणि असणार हें त्याला समजतें; या ज्ञानानें जें सामर्थ्य प्राप्त होतें, जें सुख मिळतें, तें सामर्थ्य व सुख अगदीं अल्प आणि तेंहि केव्हां संपेल याचा नेम नाहीं, असा प्रत्यय त्याला येतो; कायमचें विजयी अमर्याद सुख हा ज्याचा स्वभावधर्म आहे असें अनंत चैतन्य, ज्ञान, वास्तव अस्तित्व आपल्या सर्व बाजूंना, वर, खालीं, पसरलेलें आहे, हें ज्ञानहि मनाला हळू हळू होतें;
पान क्र. ४५९
या अमर्याद ज्ञानाशिवाय अमर्याद नित्यसुख नाहीं, हेंहि त्याला उमजूं लागतें -- आणि या सर्व गोष्टी कळल्यानें त्याला असमाधान वाटणें, दु:ख वाटणें अपरिहार्य होतें. स्थूल भौतिकाच्या अज्ञान या धर्माच्या प्रतापाची ही कहाणी झाली. दुसरा धर्म जडता -- स्थूल भौतिकांत उदय पावणाऱ्या जीवनाला त्याच्यापुरतें कांहीं ज्ञान असतें, संवेदना असते, त्याचें अस्तित्व मर्यादित अर्धनेणिवेचें व अर्धजाणिवेचें असतें. या अर्धनेणिवेच्या जीवनाला जडता जर पूर्णपणें व्यापून असती, म्हणजेच आपल्या मर्यादित व्यवहारांत जर तें समाधान मानून राहिलें असतें, तर स्थूल भौतिकाची जडता अशा जीवनाला जाचक झाली नसती, त्याला असमाधान देणारी, तळमळावयास लावणारी झाली नसती; पण अमर जीवनाचा व अनंत शक्तीचा एक भाग आपण असून, त्या अनंत शक्तीच्या अमर जीवनाशीं संबंध तुटल्यासारखें विभक्तपणें आपण राहत आहों, वागत आहों, ही जाणीव जीवनाला असते आणि अशा जाणिवेच्या अंतरंगांत, एक प्रेरणा सतत त्याला टोंचून गति देत असते -- ती प्रेरणा ही कीं, आपण अनंत शक्तीच्या अनंतत्वांत अमर जीवनाच्या अमरत्वांत सहभागी व्हावें, त्यासाठीं धडपड करीत असावें. ही प्रेरणा नसती, या प्रेरणेला जागी करणारी अमर जीवनाची जाणीव प्राणमय जीवनाला नसती, तर अशा जडतामय जीवनाला आपल्या मर्यादित व्यवहारांत समाधानानें राहतां आलें असतें. पण प्रथमपासून त्याला आपलें अस्तित्व असुरक्षित वाटत असतें आणि तें टिकून रहावें असेंहि खूप वाटत असतें; आपलें अस्तित्व मर्यादितच असणार हें त्याला शेवटीं उमगतें -- आणि तें विस्तृत, विशाल व्हावें, खूप टिकावें, अनंत व अमर व्हावें अशी तळमळ त्याला लागते.
जीवन हें मनुष्येतर स्थितींत असतां त्याला जो झगडा, जी खटपट, जी आकांक्षा अटळ होती, ती आकांक्षा, ती खटपट, तो झगडा, पूर्ण आत्म-जाणीवयुक्त अशा मनुष्यांत आल्यावर त्याला आत्यंतिकतेनें करावा लागतो आणि शेवटीं त्याला विश्वांत इतकें दु:ख, इतका विसंवाद भासूं लागतो कीं, संतोष समाधान त्याला पार सोडून जातात. मनुष्य पुष्कळ काळपर्यंत आपल्या मर्यादांत समाधान मानून स्वस्थ राहीलहि, ज्या भौतिक विश्वांत त्याला रहावेंच लागतें, त्याजवर शक्य तेवढी सत्ता मिळविण्याचें ध्येय आपल्यासमोर ठेवून, त्या सत्तेसाठींच फक्त झगडावयाचें ठरवून स्वस्थ राहणें, त्याला पुष्कळ काळपर्यंत जमेलहि;
पान क्र. ४६०
जड-अचल-वस्तुविषयक वाढत्या ज्ञानानें जो बौद्धिक व व्यावहारिक विजय या जडावर मिळवितां येईल तेवढ्या विजयानें आपलें समाधान करून घेण्यांत त्याला पुष्कळ काळपर्यंत यश मिळेलहि, तसेंच विश्वांतील जड आसुरी शक्तींवर त्याच्या लहान परंतु केंद्रित शक्तीचा -- ज्ञानयुक्त इच्छाशक्तीचा आणि शरीरबळाचा -- जो कांहीं विजय होईल, तेवढ्यावर संतुष्ट राहण्याचें त्याला दीर्घ काळपर्यंत साधेलहि -- परंतु शेवटीं हा संतोष, हें समाधान, ही स्वस्थता नष्ट होतेंच होते; मोठ्यांत मोठे परिणाम त्यानें घडवून आणावे व ते शेवटीं अगदीं क्षुद्र निष्फल ठरावे, या वस्तुस्थितीचा -- आपल्या कोंडीचा, कैदेचा -- त्याला कंटाळा येतो आणि आपल्यापलीकडे तो पाहूं लागतो, त्याला असें पाहणें अटळ होतें. आपल्या स्वत:पेक्षा कोणी मोठें आहे, तें मर्यादितच असलें तरी आपल्याहून महान् आहे; आपल्या पलीकडे मर्यादातीत अनंत आहे आणि तें असाध्य नाहीं अशी जाणीव मर्यादित जीवाला असली किंवा झाली, तर तो जीव आपल्या जीवनांत समाधान मानून नेहमीं राहूं शकत नाहीं. ज्याला वास्तवांतच मर्यादा आहेत, तो जीव आपल्या स्थितींत कदाचित् समाधानांत राहूं शकेल; पण जो केवळ दिसायला मर्यादित आहे, पण आतून ज्याला 'मी मर्यादित नाहीं, वस्तुत: मी अमर्यादित अनंत आहे' असा प्रत्यय येतो किंवा आपल्या अंतरांत अनंत असून, त्याची प्रेरणा स्वतःला ओढीत असल्याचा ज्याला साक्षात्कार होतो तो जीव, त्याचें आणि अनंताचे मीलन झाल्याशिवाय -- अनंताला त्यानें किंवा अनंतानें त्याला कमी-अधिक प्रमाणांत कोणत्या तरी प्रकारें आपलेंसें, आत्मसात् केल्याशिवाय -- स्वस्थता पावणार नाहीं, समाधानांत राहूं शकणार नाहीं. मनुष्य हा असा सांत दिसणारा अनंत आहे आणि अनंताची ओढ लागणें हें त्याला टळणारें नाहीं, केव्हांतरी ही ओढ त्याला लागणारच. पृथ्वीनें जें प्राणी जन्मास घातले आहेत, त्यांत मनुष्य हेंच तिचें असें अपत्य आहे कीं, त्याला आपल्या अंतरांत ईश्वर असल्याची अंधुक कां होईना जाणीव होते, आपण अमर आहोंत, निदान अमर होणें आपल्याला अवश्य आहे, निकडीचे आहे अशीहि जाणीव त्याला होते -- आणि ही जाणीव त्याला झाली कीं ती त्याला चैन पडून देत नाहीं, चाबकाचें किंवा क्रूसाचें काम ही जाणीव करीत राहते; अर्थात् त्याला पुढें पुढें हांकीत असते आणि बेचैन व यातनामय करून भराभर पावलें टाकावयास लावीत असते. आरंभीं जी जाणीव चाबूक किंवा क्रूस असते, त्या अंधुक जाणिवेला
पान क्र. ४६१
शेवटीं, अनंत प्रकाश, आनंद आणि सामर्थ्य यांना जन्म देणाऱ्या दिव्य ज्ञानाचें स्वरूप मनुष्य प्राप्त करून देतो.
मनुष्याला स्थूल भौतिक द्रव्याचा देह घेऊन जीवनाची प्रगति करावयाची असते. या प्रगतीच्या कार्यांत भौतिकाचें अज्ञान आणि जडत्व हे कसे अडथळे आणतात, तें आतांपर्यंत सांगितलें -- आतां त्याचा तिसरा स्वभावधर्म विभक्तता हा प्रगतीला कसा विरोध करतो तें पहावयाचें : सच्चिदानंदाचें जें ज्ञान आणि संकल्पशक्ति, त्याची जी मूळ जाणीव आणि शक्ति स्थूल भूताच्या अज्ञानांत आणि जडत्वांत स्वत:ला विसरून लोपल्यासारखी झाली होती, ती हळू हळू त्यांतून वर येऊन आपली प्रगति करूं लागल्यावर, स्थूलाची विभक्तता ही या प्रगतीचा मार्ग कठीण करीत असते. केवळ जडता आणि अज्ञान यांचाच त्रास असता तर आधीं थोडा आनंद, नंतर क्रमश: अधिक अधिक आनंद अशी प्रगति होऊन, शेवटीं मनुष्य अनंत आनंदाचा वांटेकरी -- वाटेंत विशेष जळजळ, खळखळ आणि खोळंबा न होतां -- झाला असता. पण मर्यादित विभक्त मनाच्या, प्राणाच्या व देहाच्या, वैयक्तिक मीच्या जाणिवेंत मनुष्य कोंडला गेल्यानें हा स्वाभाविक विकासक्रम व्यवहार्य होत नाहीं. वैयक्तिक 'मी'मुळें शरीरामध्यें राग-द्वेष, संरक्षण-आक्रमण, विसंवाद आणि यातना यांचा कायदा अंमलांत येतो. प्रत्येक देह हा मर्यादित जाणीव युक्त सामर्थ्य आहे -- देहादेहांचा संबंध येतो, देहाचा व विश्वशक्तीचा संबंध येतो; विश्वशक्तींचे किंवा इतर देहाचें वा देहांचें आपल्यावर आक्रमण होणार अशी प्रत्येक देहाला भीति असते; प्रत्येकाला इतरांच्या संसर्गाची भीति असते -- संसर्ग संपर्क करणारी जाणीव आणि संपर्कविषय झालेली जाणीव यांचा मेळ बसला नाहीं, आपल्यावर कोणीतरी आपत्ति आणली आहे असा भास कोणत्याहि देहाला झाला किंवा प्रत्यय आला कीं त्याला दुःख होतें, त्रास होतो; केव्हां एकाला दुसऱ्याची ओढ लागते, केव्हां एकाला दुसऱ्याचा तिटकारा वाटतो व त्याच्यापासून दूर जावेंसें वाटतें; देहाला केव्हां आपलें संरक्षण करण्याचा प्रसंग येतो, केव्हां दुसऱ्यावर हल्ला करावा लागतो; नित्य असें घडतें कीं, जें सोसण्याची त्याची इच्छा नाहीं, तें त्याला सोसावें लागतें, जें असह्य आहे, तें सोसावे लागतें. देहाची ही जी अवस्था असते, तशीच अवस्था, भावनामय आणि संवेदनाशील मनाची असते. विभक्तता या मनाला त्रासवून सोडते. देहासारख्याच प्रतिक्रिया या मनामध्यें होतात -- देहाहून वेगळ्या मोलाच्या गोष्टी येथें
पान क्र. ४६२
असतात -- मानसिक दुःख आणि आनंद, प्रेम आणि द्वेष, जुलूम आणि वैताग येथें आळीपाळीनें मनाला सतावीत असतात. येथें वासना सगळ्यांच्या मुळाशीं असते -- वासनेसाठीं धडपड आणि खेंचाताणी चालते खेंचाताणींतून शक्तिविषयक अतिरेक किंवा उणेपणा अनुभवावा लागतो, असामर्थ्याचा, अक्षमतेचा अनुभव घ्यावा लागतो -- कांहीं गोष्टी सिद्ध होतात, कांहीं निराशा भोगवितात, कांहीं हस्तगत होऊन वीट आणतात. अशारीतीनें नित्यशः झगडा, त्रास, असमाधान हे भोग भावनाशील संवेदनामय मनाच्या वांट्याला येतात. एकंदरीनें स्थूलभूताच्या विभक्ततेचा कायदा शरीराहून किंवा प्राणाहून संवेदनामय, भावनामय मनाला अधिक जाचक होतो; आतां विचारशील मनाला होणारा तिचा जाच पहावयाचा. विभक्ततेमुळें दिव्य नियमाला बाध येतो -- दिव्य नियम असा कीं, जें अव्यापक असत्य आहे, त्यांतून क्रमश: व्यापक सत्य निघून, त्यांत अव्यापक सत्यानें विलीन व्हावें, लहान ज्योतीनें महान् ज्योतींत आत्मविसर्जन करावें; कनिष्ठ इच्छेनें श्रेष्ठ इच्छेला शरण जावें व आपलें कनिष्ठत्व ओळखून श्रेष्ठ इच्छेच्या तंत्रानें वागावें, क्षुद्र भोगांनीं माघार घेऊन, महान्, उदात्त भोगांना स्थान द्यावें, -- परंतु विभक्त मनांच्या विभक्त देह-प्राणांचा पसारा या दिव्य विकासनियमाचें कांहीं चालूं देत नाहीं -- विभक्ततेमुळें मनाचे ठिकाणीं द्वंद्वांचें राज्य चाललेलें असतें : सत्य आणि त्याचा पिच्छा पुरविणारा प्रमाद किंवा भ्रम, प्रकाश आणि अंधार, क्षमता आणि अक्षमता, ज्ञानविषयाचा यशस्वी पाठलाग आणि त्याचा आनंद एकीकडे तर पाठलागांत माघार घ्यावी लागते, प्राप्त ज्ञान अपुरें, अकार्यक्षम असतें म्हणून दुःख आणि संताप दुसरीकडे -- अशी मनाची कुतरओढ होत असते : प्राण आणि देह यांना होणारीं दुःखें, मन आपल्या स्वतःच्या दुःखाबरोबर आपलींच समजून अत्यंत दुःखी होतें -- मन, प्राण, देह या तिन्हीं ठिकाणीं दोष व अक्षमता पाहून प्राकृतिक जीवनाच्या या तीनहि विभागांत मन अस्वस्थ असतें : अज्ञान, जडता, विभक्तता हे तीन प्राकृतिक जीवनाचे दोष मनाला दुःखी करतात. या सगळ्याचा अर्थ, प्राकृतिक जीवनांत आनंदाची शून्यता -- सच्चिदानंदाच्या सत्, चित्, आनंद या तिन्ही मूळतत्त्वांचा अभाव. हा अभाव जर अटळ असेल, तर प्राकृतिक जीवन अर्थशून्य, वंध्य व निष्फल ठरेल. मूळ अस्तित्व आपल्या जाणिवेच्या शक्तीच्या खेळांत जी उडी घेते, ती निर्हेतुकपणे घेत नाहीं; आपली मूळ आनंदमय स्वस्थता, शांति, निष्कर्मता टाकून, मूळ
पान क्र. ४६३
अस्तित्व आपल्या जाणिवेचा आणि जाणिवयुक्त शक्तीचा जो खेळ उभा करतें, तो कांहीं निर्हेतुकपणे उभा करीत नाहीं -- तर या खेळांत विविध प्रकारचा आनंद भोगावा या हेतूनें उभा करतें; आणि जर या खेळानें त्याचा मूळ हेतु सिद्ध होत नसेल, खरें समाधान, खरी तृप्ति मिळत नसेल, तर हा शरीरधारण करणाऱ्या चैतन्याचा वातांतील एक भ्रम, महान् प्रमाद, निष्फल खटाटोप झाला, असें मान्य करून तो बंद करणें अगदीं योग्य होईल, अगदीं अनिवार्य होईल हें उघड आहे.
विश्वविषयक निराशावादाचा पाया वरील विश्वविषयक अनुभूतींत आहे. या भौतिक विश्वाच्या पार्थिव जीवनाच्या पलीकडे जीं दुसरी विश्वें आहेत, ज्या दुसऱ्या जीवनावस्था आहेत, त्यासंबंधानें हा निराशावाद आशावादी असतो -- पण पार्थिव जीवन व मनोमय जीवाची भौतिक विश्वांतील व्यवहारांत दृष्टोत्पत्तीस येणारी व अनुमानगम्य अशी नियति यांच्या संबंधांत निखालस निराशावादी असतो. या निराशावादाचें म्हणणें असें कीं -- ''भौतिक अस्तित्वाचा स्वभावधर्म विभक्तता व शरीरधारी मनाचें बीज आत्मबंधन, अज्ञान, अहंकार -- अशी वस्तुस्थिति असल्यानें पृथ्वीवर आत्म्याला समाधान लाभावें म्हणून खटपट करणें, विश्वाच्या खेळांत थोर फळाची आशा करणें, या खेळांत दिव्य हेतु आहे, या खेळाची अखेर दिव्य प्रकारें होणार आहे अशीं अनुमानें बांधणें हा भ्रम आहे, मूर्खपणा आहे : अस्तित्व, जाणीव यांचा दिव्य आत्मानंदाशीं आरंभीं जो योग होता, तो योग पुन्हां व्हावा असें वाटत असेल, तर या विश्वांत त्याची आशा करणें नको; दुसऱ्या आत्म्याच्या खास स्वर्गांत तो योग पुन्हां होणें शक्य आहे किंवा आत्म्याची खरी निष्कर्मता, खरी शांति हीच त्या वियोगाचा पुनर्योग घडवूं शकेल -- आत्म्याच्या या रूपात्मक प्रापंचिक धडपडींत तो योग पुन्हां येणें शक्य नाहीं. अनंताला स्वतःचा आत्मा दुरावला आहे; तेव्हां सांतांत मी स्वतःला पूर्णतया बसवूं शकेन, सांतांत माझें अनंतत्व मी व्यवहार्य करीन हा अभिमान अनंतानें सोडावा, सांताचा खेळ सुरू केला ही माझी चूक झाली, हा खेळ सुरू करण्यांत माझें पाऊल भलतीकडे पडलें अशी कबुली देऊन अनंतानें हा खेळ बंद करावा -- असें त्यानें केलें तरच त्याला आपलें दुरावलेलें अनंतत्व परत लाभेल -- भौतिक विश्वांत मानसिक जाणिवेचा उदय झाला म्हणून येथें दिव्य साफल्याची आशा करणें युक्त होणार नाहीं. कारण, विभक्तता हें तत्त्वच मनाचा मूळ धर्म आहे; स्थूल भौतिकद्रव्य
पान क्र. ४६४
हा केवळ मनानें उभा केलेला आभास आहे -- आणि या आभासांत वावरत असतां मनानें आपला स्वभावधर्म जो विभक्तता आणि अज्ञान, तो बरोबर स्वाभाविकपणेंच ठेवला आहे. अर्थात् या आभासमय भौतिक विश्वांत मनाला स्वतःच्या पलीकडे कांहीं लाभणें शक्य नाहीं : त्यानें विभक्त अस्तित्व निर्माण केलें आहे आणि या अस्तित्वांत विभक्तता, जडता, अज्ञान या त्रयीचा खेळ चालला आहे -- मनाला या त्रयीमध्येंच इकडून तिकडे, तिकडून इकडे हिडतां येईल, यापलीकडे आत्मतत्त्वाची एकता, एकरसता व आत्मिक जीवनाचें सत्य मनाला या भौतिक विश्वांत प्राप्त होणें शक्य नाहीं.''
भौतिक अस्तित्व हें स्वयंभू नाहीं; हें मूळ रूप नाहीं, एकरूपास सर्वश: विभागून टाकणारी प्राणशक्ति हें रूप निर्माण करते; एकरूप सर्वस्वीं विभागून टाकणारें मन, ज्या कल्पना प्राणशक्तीपुढें ठेवते, त्या कल्पनांना मनाला हवें तें रूप देणें हें प्राणशक्तीचें कार्य असतें. याप्रमाणें मनानें कल्पिलेलें व प्राणानें बनविलेलें रूप म्हणजे भौतिक अस्तित्व होय. प्राणाच्या साह्यानें विभागलेलें मनच, भौतिक अस्तित्व बनलें आहे -- अर्थात् या अस्तित्वांत स्थूल भूतांत असलेलें विभागणीचें तत्त्व विभागलेल्या मनानें आणलें आहे -- मूळ एकरूप अस्तित्व अज्ञान-जडता-विभक्ततायुक्त भौतिक रूपांच्या पसा-यांत परिवर्तित करणें, हें काम विभागणाऱ्या मनानें केलें आणि स्वतःच निर्माण केलेल्या या रूपांच्या अंधारकोठडींत त्यानें स्वतःला बंद करून घेतलें, स्वतःच बनविलेल्या या रूपांच्या साखळदंडांनी त्यानें स्वतःला बांधून घेतलें, अशी वस्तुस्थिति आहे. विभागणारे मन हेंच सृष्टिनिर्मितीचें प्रमुख आद्य तत्त्व असेल, तर विभागणारें मन हीच विश्वांत शक्य अशी अंतिम सिद्धि असणार हें उघड आहे. अर्थात् प्राण (जीवन) आणि स्थूल भौतिक द्रव्य यांशीं झगडा करीत रहावयाचें, शेवटीं या झगड्यांत अपयश घ्यावयाचें, त्यांना कांहीं अंशीं, कांहीं काळ काबूंत आणावयाचें -- पुन्हां त्यांजकडून हार खावयाची अशी चक्रगतीनें सतत झटापट -- अंतीं अयशस्वी झटापट -- करीत रहावयाची, ही मनाची वा मनोमय जीवाची कामगिरी, हीच विश्वांतील जीवनाची अंतिम सर्वोच्च कहाणी होऊं शकेल. परंतु भौतिक घन-द्रव्याच्या पोटीं जर आत्मा, चैतन्य, अमर अनंत चैतन्य दडलेलें असेल आणि तेथें आपल्या अतिमानसिक सर्वोच्च निर्मितिसामर्थ्यानें निर्माणकार्य करीत असेल, तर विश्वांतील जीवनाची अंतिम कथा वेगळी होणार हें निश्चित. अनेक-
पान क्र. ४६५
तेच्या पसाऱ्यांत एकतत्त्वाचा 'सच्चिदानंदाचा' विकासरूप खेळ, विशिष्ट प्रकारें व्हावा या उद्देशानें या खेळाचा आरंभ मनाच्या विभागणीनें, भौतिक स्थूल द्रव्याच्या म्हणजे सर्वात निकृष्ट तत्त्वाच्या अधिराज्यानें करण्याचें अनंत चैतन्यानें ठरविलें आहे, असा सिद्धांत आपल्याला करतां येतो; अर्थात् स्थूल द्रव्याच्या पोटीं चैतन्य काम करीत असेल, मन असलेला जीवच केवळ, विश्वांतील रूपांत झांकलेला, लपलेला नसून, अनंत सत्ता-ज्ञान-इच्छावान् पुरुष (सच्चिदानंद) जर या रूपांत दडलेला असेल आणि या स्थूल भौतिक रूपांतून प्रथम प्राण किंवा जीवन म्हणून व नंतर मन म्हणून तो प्रकट होत असेल, (यापुढें कोणत्या प्रकारें तो प्रकट होणार आहे तें आम्हांला अज्ञात आहे असें समजूं) तर बाह्यतः नेणिवेनें पूर्ण व्याप्त अशा स्थलांतून जी जाणीव वर येते, तिचें अंतिम विकासाचें स्वरूप मनाहून वेगळें आणि पूर्णतर असलेंच पाहिजे, त्याचें स्वरूप अतिमानसिक आत्मपुरुष हेंच असलें पाहिजे -- तो पुरुष आपल्या मानसिक, प्राणिक आणि शारीरिक व्यापारांवर विभक्त आणि विभाजक मनाच्यापेक्षां आपला श्रेष्ठतर व्यवहारनियम चालूं करणारा असला पाहिजे -- निदान असें त्या स्थूल जडांतून वर आलेल्या विकासशील जाणिवेचें अंतिम स्वरूप होणें अशक्य नाहीं -- उलट, विश्वांतील अस्तित्वाचें अटळ स्वाभाविक अंतिम स्वरूप, अतिमानसिक अध्यात्मपुरुष हेंच असणें सयुक्तिक व स्वाभाविक आहे, असें म्हणतां येतें.
हा जो आतिमानसिक अध्यात्मपुरुष विकासशील जाणिवेचें अंतिम स्वरूप म्हणून देहांत, प्राणांत व मनांत जागृत होणार, तो, मनाचें जें विभक्तपण, जडता, अज्ञान, या तीन दोऱ्यांची कठीण गांठ जमवून, आमचें जीवन दुःखमय करीत होतें तें, कठीण विभक्तपण दूर करून, त्यांची गांठ सोडवून मनाला मोकळें करील आणि सर्वव्यापक अतिमानसाचें एक गौण उपयुक्त कार्य या नात्यानें, मनाचें जें व्यक्तिरूप, त्याचा उपयोग करील; त्याचप्रमाणें प्राणाचें (जीवनाचें) जें विभक्तपण गांठ जमवून दुःख देत होतें, त्या गांठीच्या विभक्ततेंतून प्राणमय जीवन मोकळें करून, मूळ जाणीवशक्तीचें एक गौण उपयुक्त कार्य म्हणून हा अतिमानसिक पुरुष वेगळें वैयक्तिक जीवन वापरील. मूळ एक एकरस जाणीवशक्तीची सत्ता, तिचा आनंद हाहि एक, एकरस असतो -- सत्तेचा आणि आनंदाचा हा एकरस स्वभाव कायम ठेवून, त्या एकतेच्या पोटांत विविध सत्ताप्रकार, विविध आनंदप्रकार निर्माण करण्याचें काम, मूळ
पान क्र. ४६६
जाणीवशक्तीचें गौण कार्य जें व्यक्तिगत जीवन, त्याच्या द्वारां होत असतें आणि जाणिवेच्या, अस्तित्वाच्या व आनंदाच्या मूळ एकतेला, ती एकता कायम ठेवून विविधतेची जोड दिली, म्हणजेच वस्तुत: जाणीव, अस्तित्व व आनंद यांची कृतार्थता होते, खरी परिपूर्ति होते. अनंताचा मूळ एकरस आनंद वेगळा आणि त्याचा सांतांतील विविध आनंद वेगळा; या विविध आनंदासाठीं, व्यक्तिगत मन व व्यक्तिगत जीवन या वस्तू सच्चिदानंदानें अतिमानसाच्या साह्यानें त्याचें एक गौण कार्य म्हणून वस्तुत: अस्तित्वांत आणल्या. व्यक्तिगत शरीर हेंहि त्याच हेतूनें अस्तित्वांत आणलेलें असल्यानें, विकासक्रमांत अतिमानसिक पुरुष स्थूलांत प्रकट झाल्यावर ज्याप्रमाणें मनाला, प्राणमय जीवनाला ग्रंथिबद्धतेंतून सोडवून विविध जीवनाच्या सोईसाठीं तो वापरतो, त्याप्रमाणें शारीर जीवनाचा त्याचा सध्यांचा कडक नियम -- मरण, वेगळेपणा, अन्योन्यभक्षण -- या ग्रंथिरूप कडक नियमाच्या कचाट्यांतून सोडवून, मूळ जाणीवयुक्त एकरूप दिव्यसत्तेची उपयुक्त गौण मूर्ति -- अनंताला सातांत आनंद मिळविण्यास उपयोगी अशी मूर्ति म्हणून शरीर व शारीर जीवनहि तो उपयोगांत आणील असा संभव आहे : अनंत चैतन्यानें जो स्थूल आकार धारण केला आहे, त्या आकारांत वस्तीला राहून, त्यानें आपली या आकारावरची मालकी सार्वभौमपणें गाजवावी, निराकार असतांना त्याचें जें स्वातंत्र्य होतें तें स्वातंत्र्य त्यानें साकार स्वरूपांतहि उपभोगावें, स्थूलाचे झगे बदलीत असतां, आपण अमर आहों ही जाणीव त्यानें कायम राखावी, भौतिक विश्वाला आपला मूळचा एकतेचा, प्रेमाचा व सौंदर्याचा कायदा लावून, आपला मूळ आत्मानंद, स्थूल भौतिक शरीरांतहि त्यानें उपभोगावा -- हें सर्व शक्य आहे, संभवनीय आहे. एकांतिक विभक्ततेचा दोष काढून, मनाचें रूपांतर अतिमानसांत करावयाची क्रिया मनुष्यांत होणार असेल, तर असाहि संभव आहे कीं, दिव्य मन व दिव्य प्राण यांजबरोबर दिव्य शरीरहि तो विकासक्रमांत मिळवूं शकेल. मनुष्याच्या विकासासंबंधाची, शक्याशक्यतेची आपली कल्पना आज बरीच संकुचित असल्यानें, दिव्य शरीरादि भाषा आपल्याला अतिरेकी वाटण्याचा संभव आहे -- तेव्हां आपण असें म्हणूं कीं, मनुष्य आपलें खरें अस्तित्व आणि या अस्तित्वाचा (स्वरूपाचा) स्वाभाविक प्रकाश (ज्ञान), आनंद व सामर्थ्य यांचा विकास करीत करीत मनाचा, प्राणाचा व शरीराचा दिव्य उपयोग करूं लागेल -- आणि असें झालें म्हणजे मूळ चैतन्यानें
पान क्र. ४६७
खालीं उतरून रूपांत, दृष्य आकारांत जी वसति केली, तें त्याचें उतरणें व साकार होणें मानवी दृष्टीनें व अतिमानवी दिव्य दृष्टीनेंहि सफळ झालें, योग्य झालें असें निःशंकपणें म्हणतां येईल.
शेवटीं पृथ्वीवर मानवाच्या विकासाचा पल्ला येथवर न पोंचण्याला कांहीं कारण दिसत नाहीं -- मात्र एक गोष्ट आहे : भौतिक जडद्रव्य व त्या द्रव्याचे नियम या विषयींचा आमचा आजचा सिद्धांत विशिष्ट प्रकारचा आहे; आमची संवेदना आणि द्रव्य यांचा अन्योन्यसंबंध, ज्ञाता दिव्य-आत्मा आणि ज्ञेय दिव्य-आत्मा यांचा अन्योन्यसंबंध, केवळ याच विशिष्ट सिद्धांतानें व्यक्त होतो हें जर खरें असेल, तर मात्र या पृथ्वीवर मानवाला मन-प्राण-शरीराचा दिव्य उपयोग करतां येणार नाहीं. तसेंच, संवेदनाद्रव्य व ज्ञेय-ज्ञाता यांजमध्यें आमच्या आजच्या जड-भौतिक-विषयक सिद्धांतानें व्यक्त होणाऱ्या संबंधाहून अन्य संबंध शक्य असतील, पण ते संबंध इतर उच्च लोकांतील असून, या पृथ्वीवर मात्र जर शक्य नसतील, तरीहि मानवाला या पृथ्वीवर दिव्यता प्राप्त होण्याचा संभव नाहीं. दिव्य जीवनाचा 'ओनामा' देखील आम्हांला पृथ्वीहून उच्चतर लोकांत शिकावा लागेल; येथें कसलेंच दिव्य जीवन शक्य नाहीं, दिव्य जीवन सर्वतोपरि स्वर्गांतच शक्य आहे असा जो धर्मांचा दावा आहे, तो मग खरा ठरेल आणि आम्हांला जीवनाच्या दिव्यतेसाठीं स्वर्ग पहावा लागेल. धर्मात असेंहि सांगितलेलें आढळतें कीं, पृथ्वीवर देवाचें राज्य येणार आहे, पृथ्वीवर पूर्णतेचें राज्य येणार आहे -- हें धर्मातील विधान भ्रमात्मक आहे असेंहि मग म्हणावें लागेल. पृथ्वीवर आंतरिक साधना करावयाची, या साधनेंत सिद्धि मिळवावयाची; मन, प्राण व आत्मा या आंतरिक तत्त्वांना, त्यांच्या आंतरिक बंधनांतून मुक्त करावयाचें आणि ही तयारी झाल्यावर, जडतत्त्व अजिंक्य व अविजयी दशेंत ठेवून, पृथ्वी ही असंस्कार्य, अनियंत्रणीय, असंस्कारित, अनियंत्रित दशेंत ठेवून मग दिव्य जीवनासाठीं दिव्य शरीरद्रव्य आम्हांला लाभावें म्हणून इतर लोकांकडे प्रयाण करावयाचें -- असें आम्हांला करावें लागेल; पण आमच्या विकासकार्याला मर्यादा घालणारा जडविषयक सिद्धांत आम्हीं मान्य केलाच पाहिजे असें कांहीं सबळ कारण आम्हांला दिसत नाहीं : जडतत्त्वाच्या, जडद्रव्याच्या अवस्था अनेक आहेत, त्यापैकीं त्याची एकच अवस्था आम्हांला नडणारी अशी आहे; इतर अवस्था त्याला नाहींत असें नाहीं; शिवाय द्रव्याचे अनेक प्रकार आहेत, जडद्रव्य हा एकच प्रकार नाहीं;
पान क्र. ४६८
द्रव्यांची एक चढती दिव्य श्रेणी आहे; जडद्रव्य ही सर्वांत खालची पायरी आहे; या पायरीच्या वरतीं, द्रव्याच्या अनेक पायऱ्या आहेत यांत संशय नाहीं आणि आमचा अन्नमय पुरुष, शारीर जडपुरुष हा जर आपल्या स्वतःच्या नियमाहून श्रेष्ठ नियमाची सत्ता मानील, तर स्वतःचें रूपांतर घडवून आणूं शकेल -- हा श्रेष्ठ नियम त्यानें मान्य करणें अशक्य नाहीं; कारण हा नियम कांहीं परका नव्हे किंवा परक्याचाहि नव्हे. त्याच्या स्वतःच्या गूढ गुप्त अप्रकट अंगांत हा श्रेष्ठ नियम गुप्तपणें त्याचाच म्हणून असतो आणि त्यांत प्रकट होण्याची प्रवृत्ति व भवितव्यताहि असते.
पान क्र. ४६९
Home
Sri Aurobindo
Books
SABCL
Marathi
Share your feedback. Help us improve. Or ask a question.