दिव्य जीवन 1879 pages 1960 Edition
Marathi Translation
  Senapati Bapat

ABOUT

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics, expounding a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth.

THEME

philosophymetaphysics

दिव्य जीवन

Sri Aurobindo symbol
Sri Aurobindo

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.

Sri Aurobindo Birth Centenary Library (SABCL) The Life Divine Vols. 18,19 1070 pages 1970 Edition
English
 PDF    philosophymetaphysics
Sri Aurobindo symbol
Sri Aurobindo

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.

Marathi Translations of books by Sri Aurobindo दिव्य जीवन 1879 pages 1960 Edition
Marathi Translation
Translator:   Senapati Bapat  PDF    LINK

प्रकरण बाविसावें

 

जीवनाचा प्रश्न

 

प्राणाला सर्वायुष, सार्वत्रिक जीवन म्हणतात, प्राण हें सर्व भूतांचें जीवन म्हटलें जातें.

- तैत्तिरीय उपनिषद् २.३

 

ईश्वर सर्व भूतांच्या हृदयामध्यें वास करतो. तो सर्व भूतांना मायेच्या आश्रयानें यंत्रावर घातल्याप्रमाणें (यंत्रावर घालून) फिरावयास लावतो.

- भगवद्‌गीता १८.६१

 

सत्य-ज्ञान-अनंत ब्रह्म जो जाणतो, तो त्या सर्वज्ञ ब्रह्माच्या संगतींत सर्व विषय -- सर्व वासनांचे, इच्छांचे विषय -- उपभोगतो.

- तैत्तिरीय उपनिषद् २.१

 

जीवन हा मूळ सच्चिदानंदाच्या चित्‌शक्तीचा आविष्कार आहे. हा आविष्कार विशिष्ट विश्व-परिस्थितींत केलेला आहे; ही चित्‌शक्ति -- जाणीवयुक्त शक्ति स्वभावत: अनंत आहे, सर्वातीत सर्वनिरपेक्ष आहे, अनिर्बंध आहे; अद्वैतमय, एकतापूर्ण व आनंदपूर्ण आहे; तिची एकता आणि आनंद तिच्यापासून दूर करतां येत नाहीं. विश्व-परिस्थिति व विश्वप्रक्रिया आणि मूळ अनंत अस्तित्वाची शुद्धता व मूळ अविभाज्य शक्तीची स्वतंत्रता या दोहोंत अर्थात् कांहीं अंतर असतें; हें अंतर मुख्यत: अविद्याग्रस्त मन आपल्या विभागण्याच्या धर्मामुळें उत्पन्न करतें. अविभक्त, अविभाज्य शक्तीचें मनानें घडविलेलें हें विभागणी-कार्य, विभक्त जीवनद्वंद्वांच्या आभासांना, आभासिक विरोधांना व सच्चिदानंदाच्या स्वभावाला न जुळणाऱ्या, त्या स्वभावाच्या अगदीं उलट भासणाऱ्या गोष्टींना जन्म देतें. या गोष्टी मनाला कायम खऱ्या वाटतात; परंतु या गोष्टी, अनेक रूपधारी सत्याच्या वास्तविक स्वरूपाच्या विपर्यास करणाऱ्या, केवळ देखावारूप आहेत; ही वस्तुस्थिति

 

पान क्र. ३८७

 

मनापाठीमागें दडलेल्या दिव्य विश्वजाणिवेला दिसत असते. मनाच्या करणीनें विश्वाला अन्योन्यविरोधी सत्यांच्या झगड्याचें स्वरूप आलेलें आहे; या झगडणाऱ्या सत्यांपैकीं प्रत्येक सत्य आपली परिपूर्ति करून घेण्यासाठीं झटत असतें, प्रत्येकाला हा हक्कच असतो. अर्थात् या झगड्यामुळें विश्वाला नाना प्रश्नांच्या, नाना कूटांच्या पर्वतप्राय ढिगाऱ्याचें रूप येतें; हे सर्व प्रश्न, ही सर्व कूटें सोडविलींच पाहिजेत, अशी आमच्या पाठीमागें विश्वाची निकड लागते; या निकडीचें कारण हें कीं, विश्वाच्या दृश्य गोंधळाच्या पोटांत महान् सत्य लपलेलें आहे; महान् अद्वैत गुप्त आहे. विश्वांतील कूटें व प्रश्न सोडविण्याची निकड, हें अद्वैत सत्य लावीत असतें, कारण या कूटांच्या उलगड्यानें त्या सत्याला आपलें मूळ स्वरूप सर्व पडदे दूर करून, जसेंच्या तसें विश्वांत प्रकट करण्यास मदत होते.

विश्वांतील प्रश्न, कूटें सोडविण्याचें काम मनानें करावयाचें आहे हें तर खरेंच, पण मनाखेरीज जीवनाच्या इतर क्षेत्रांतहि विश्वाचा प्रत्येक प्रश्न सोडविला गेला पाहिजे; अस्तित्वाला जाणीव आणि कृति या दोन बाजू असतात; दोन्ही बाजूंनीं विश्वांतील प्रश्न सोडवावयाचा आहे. मूळ सत्तेच्या जाणिवेनें शक्तीच्या स्वरूपांत उतरून, विश्वआंदोलन आणि त्यांतील प्रश्न निर्माण केले आहेत; अर्थात् हें प्रश्न सोडविणें हें शक्तिरूप धारण करणाऱ्या जाणिवेचेंच काम आहे; विश्व-आंदोलनाच्या पोटीं जें सत्य आहे, जो अर्थ दडलेला आहे आणि जो अर्थ, जें सत्य आतां विकासाची वाटचाल करीत आहे, त्याची अटळ असलेली परिपूर्ति करून देणें, हें या जाणिवेचेंच कर्तव्य आहे. जाणिवयुक्त शक्तीनें अविद्यामय मनाच्या मध्यस्थीनें विश्वांत जें नानाप्रश्नमय, नानाकूटमय जीवन निर्माण केलें आहे, त्या जीवनानें विकासक्रमांत तीन रूपें धारण केलेलीं आहेत. पहिलें रूप जडाधिष्ठित भौतिक रूप. या रूपांत जाणीव व्यक्त स्वरूपांत दिसत नाहीं -- ती शक्तिरूपानें कृति करते व आकार धारण करते आणि या कृतींत व आकारांत ती गुप्त होते; कृति जाणिवेची निदर्शक असते, आकार जाणिवेचीं प्रतीकें असतात; परंतु खुद्द जाणीव ही कृतीच्या व आकारांच्या आड लपलेली असते. जीवनाचें, विकासाच्या क्रमवारींतील दुसरें रूप प्राणमयता, प्राणमय अस्तित्व. यांत जी जाणीव थोडीशी विकसित झालेली दिसते, तिचें अर्धवट दर्शन 'जिवंत राहण्याची शक्ति व वाढण्याची शक्ति' यांजमध्यें होतें आणि रूपाच्या हालचालींत, रूपाच्या मोडतोडींत अर्ध-विकसित जाणिवेचें अर्धवट दर्शन

 

पान क्र. ३८८

 

घडतें; पहिल्या जीवनावस्थेंत, जी सर्वच जाणीव कैदेंत बंद व गुप्त होती ती आतां बंदींतून अर्धवट सुटल्यासारखी भासते; ती सामर्थ्यानें स्पंदन करूं लागते; जीवाची वासना, वासना-तृप्ति किंवा अतृप्तीमुळें उबग येणें, या क्रियांत दुसऱ्या जीवनरूपांतील सामर्थ्य व्यक्त होतें; परंतु प्रकाशाचें स्पंदन या दुसऱ्या अवस्थेंत प्रथम प्रथम प्रतीत होत नाहीं, पुढें प्रतीत होतें. स्वतःच्या अस्तित्वाचें ज्ञान आणि परिस्थितीचें ज्ञान या रूपानें प्रकाशाचें स्पंदन पुढें प्रतीत होत असलें, तरी तें अल्प प्रमाणांतच प्रतीत होतें. जीवनाचें तिसरें रूप, तिसरी अवस्था मानसिक जीवन ही होय. येथें जाणीव ही पूर्णत: बंधनमुक्त झालेली असते. या मानसिक जाणिवेंत जीवनाची वास्तवता मानसिक संवेदनेच्या रूपानें प्रतीत होते, अनुरूप अनुभूतीच्या व कल्पनेच्या रूपानें प्रतीत होते आणि ही नवोदित जाणीव स्वत: नवी कल्पना या नात्यानें जीवनाची एक वास्तव गोष्ट बनूं पाहते, आंतरिक व्यवस्थेंत ती बदल करते; जीवाचें बाह्य जीवन आंतरिक नव्या व्यवस्थेनुसार बदलण्याचा प्रयत्न करते. भौतिक जीवनांत सच्चिदानंदाची जाणीव ही, आपल्या शक्तीनें केलेल्या कार्याच्या आणि घेतलेल्या आकाराच्या बंदिखान्यांत बंद होते. ती प्राणमय जीवनांत अर्धवटपणें व तिसऱ्या मानसिक जीवनांत पूर्णपणें बंधनमुक्त होते -- परंतु अद्यापि कार्य आणि आकार यांचें पूर्ण प्रभुत्व तिजकडे येत नाहीं; कारण ती वैयक्तिक जाणीव म्हणून बंधमुक्त झालेली असते आणि म्हणून त्या मूळ विश्वजनक जाणिवेच्या एकंदर कृतीपैकीं एक लहानसा अंशच फक्त, या वैयक्तिक जाणिवेचा विषय होऊं शकतो.

ही वैयक्तिक जाणिवेची आंशिक दृष्टि, ही मानवी जीवनांतील खरी अडचण आहे. मानव हा मनोमय जीवन जगणारा प्राणी आहे. त्याची मानसिक जाणीव मानसिक शक्तीचें काम करते; विश्वशक्तीचें ज्ञान, या मानसिक जाणिवेला थोडेंफार असतें, विश्वजीवनाचें ज्ञानहि या जाणिवेला थोडेंफार असतें -- व्यक्तिदृष्टीनें, तोहि विश्वशक्तीचा व विश्वजीवनाचा एक हिस्सा असतो. परंतु या विश्वजीवनाचें खरें पूर्ण ज्ञान (तो स्वत: विश्व-जीवन जगणारा आहे हें ज्ञान) त्याला नसल्यानें, त्याच्या स्वतःच्या सगळ्या वैयक्तिक जीवनाचें, सगळ्या वैयक्तिक अस्तित्वाचें पूर्ण ज्ञानहि त्याला नसल्यानें, सार्वत्रिक जीवन किंवा त्याचें स्वतःचें व्यक्तिजीवन प्रभुत्वानें, परिणामकारक रीतीनें शासित करण्याची शक्ति

 

पान क्र. ३८९

 

त्याला नसते. जड भौतिकाची ओळख करून घेण्यासाठीं तो धडपड करतो; हेतु हा कीं, जड भौतिक परिस्थितीवर त्याला सत्ता चालवितां यावी; प्राणमय जीवनाचें ज्ञान मिळविण्याचा यत्न तो करीत असतो तोहि त्यावर प्रभुत्व गाजविण्यासाठींच; मनाचें ज्ञान मिळविण्याचाहि याच दृष्टीनें तो यत्न करतो. मनाची हालचाल मोठी विस्तृत असते, पण ती पुष्कळशी अज्ञात अशी असते. मनुष्येतर प्राणी प्रकाशाची एक बारीकशी ज्योति बाळगून असतो. त्याला 'मी कोणीतरी आहे' एवढें आत्मज्ञान असतें; मनुष्य हा मनुष्येतर प्राण्यासारखें आत्मज्ञान बाळगून असतोच, पण त्याचें आत्मविषयक व अनात्मविषयक ज्ञान सारखें वाढत असतें -- ज्ञानाची ज्वाला त्याचें ठिकाणीं असते व ती सारखी मोठी मोठी होत असते. अशा वाढत्या ज्ञानज्वालेचा प्रभु असणारा मानव, मनाची महान् परंतु अज्ञात हालचाल, पूर्णतया जाणून घेण्याचा यत्न करीत असतो; हेतु हा कीं, त्या मनावर त्याला सत्ता चालवितां यावी. तेव्हां माणसाच्या खटपटीचें थोडक्यांत वर्णन करावयाचें, तर तो स्वतःवर प्रभुत्व गाजविण्याकरतां स्वतःसंबंधींचें ज्ञान व विश्वावर प्रभुत्व गाजविण्याकरतां विश्वासंबंधींचें ज्ञान मिळविण्यासाठीं खटपट करीत असतो, असें म्हणतां येईल. ही जी खटपट मानवाकडून घडते तिचें मूळ, त्याच्या अंतरंगांतील मूळ अनादि सत्तेचें अस्तित्व हें आहे. या सत्तेकडून त्याला प्रेरणा मिळते कीं, त्यानें स्वतःवर व विश्वावर प्रभुत्व गाजवावें व त्यासाठीं स्वतःचें व विश्वाचें ज्ञान करून घ्यावें -- त्याचे ठिकाणीं मूळ अनादि सत्ता आहे, त्याप्रमाणें तो मूळ चित् (जाणीव) आहे व या मूळ जाणिवेची निकड अनादि सत्तेच्या निकडीसारखीच आहे; मूळ जाणीवशक्तीच त्याचें जीवन बनलेली आहे आणि या शक्तीची सक्ती त्याजवर अनादि सत्तेच्या आणि अनादि जाणिवेच्या सक्तीसारखीच आहे -- शेवटीं हें लक्षांत ठेवावयाचें कीं, सच्चिदानंदच त्याच्या त्या वैयक्तिक रूपानें विश्वांत अवतरला आहे -- या विश्वांत सच्चिदानंद आपलें आविष्करण करतो -- मात्र त्याचा दर्शनी व्यवहार स्वतःच्या स्वभावाच्या उलट असतो, नव्हे तसा तो भासतो : जो सच्चिदानंद मानवाचें रूप धारण करतो, त्याची गुप्त इच्छा, मानवानें स्वतःवर व विश्वावर प्रभुत्व गाजवावें अशीच असल्यानें, ज्ञानसाधनेच्या द्वारां मानव तसा प्रयत्न करीत असतो. मानवांत ही जी प्रेरणा अंतरंगांतून उठते तिची परिपूर्ति कोणत्या परिस्थितींत होणें शक्य आहे, हा प्रश्न मानवासमोर आहे -- तीं परिस्थिति निर्माण करणें हा मानवाचा

 

पान क्र. ३९०

 

ध्यास राहणार व ती निर्माण करण्यासाठीं तो धडपडणार; त्याच्या जीवनाच्या प्रकृतीचा आणि त्याच्यामध्यें वास करणाऱ्या ईश्वराचा निकडीचा आदेशच त्याला तसा आहे; हा आदेश तो डावलूं शकत नाहीं -- मानवाच्या समोर असलेला हा प्रश्न सुटून त्याची अंतःप्रेरणा संतुष्ट होईपर्यंत मानवजात धडपड करीत राहणार, तिला विसांवा घेतां येणार नाहीं. मानवामध्यें ईश्वर जी प्रेरणा देत आहे, ती पूर्ण करून त्यानें आपली पूर्णता प्राप्त करून घेतली पाहिजे; आणि हें त्याला करतां येत नसेल, तर त्यानें हें करूं शकणारा असा एक नवा आणि स्वतःपेक्षां महान् असा पुरुष, असा आत्मा आपल्यांतून उदयास आणून, आपली असमर्थता व्यक्त केली पाहिजे. आजचा मानव हा स्वत: तरी ईश्वरी, दिव्य-मानव व्हावयास पाहिजे किंवा आपल्यांतून नवा ''अति मानव'' निर्माण करून आपली आजची विकासश्रेणींतील सर्वश्रेष्ठ जागा त्या ''अतिमानवाला'' त्यानें दिली पाहिजे.

हा निष्कर्ष वस्तुनिष्ठ तर्कशास्त्राला अपरिहार्यपणें काढावा लागतो. मानवाची आजची मानसिक जाणीव, ही कांहीं पूर्णतया प्रकाशमय जाणीव नव्हे; जडाच्या अंधारांतून ती बाहेर निघाली असली, तरी ती पूर्णतया बाहेर निघालेली नाहीं; जडाच्या अंधारांतून ही जाणीव पूर्णपणें बाहेर यावयाचें जें महान् कार्य आहे, त्या कार्यांतील एक प्रगत आणि प्रगामी असें स्थान व स्वरूप सध्यांच्या मानवी मानसिक जाणिवेचें आहे, एवढेंच फारतर म्हणतां येईल; अशी वस्तुस्थिति असल्यानें, विश्वाची विकासनिष्ठ निर्मिति त्याच्या सध्यांच्या मानसिक जाणिवेपाशीं थांबू शकत नाहीं; ती जाणीव तिच्या आजच्या स्थानाच्या व स्वरूपाच्या पुढें, पलीकडे, वरतीं गेली पाहिजे किंवा मानवाची विकासशक्ति संपली असेल, त्याच्यांत आपली जाणीव अधिक पुढें नेण्याची शक्ति नसेल, तर मानवाला बाजूला टाकूनहि विश्वाची ही विकासाधिष्ठित निर्मिति पुढें प्रगत झाली पाहिजे, तिसरा पर्याय शक्य नाहीं. जाणिवेच्या विकासक्रमांत जडतत्त्व बाजूला पडून वनस्पति पुढें आल्या, वनस्पति बाजूला पडून मनुष्येतर प्राणी आले -- त्याप्रमाणें, मनुष्येतर प्राण्यानंतर जाणिवेचा विकासाश्रय झालेला जो मनुष्य, तो बाजूला पडून जाणिवेला नवीन विकासाश्रय ''अति मानव'' प्राप्त होण्याचा संभव असेल. असो. आतां नवीन विकासाश्रयाचा विचार बाजूला ठेवून, मानवच स्वत: दिव्य-मानव व्हावयाचा तर काय होणें अवश्य आहे तें पाहूं. मानवी मनांतील कल्पना ही त्याच्या

 

पान क्र. ३९१

 

जीवनांतील घटना, वास्तव घटना होऊं पहात असते, ही गोष्ट जीवनाच्या तिसऱ्या विकासावस्थेचें वर्णन करतांना सांगितली आहे. मानवाचा दिव्य-मानव व्हावयाचा, तर ही क्रिया सारखी प्रगत होत राहिली पाहिजे -- शेवटीं, अस्तित्वाचें सर्व सत्य मानसिक जाणिवेंत -- मनाच्या कल्पनेंत -- उतरलें पाहिजे; लपण्याच्या हेतूनें आपण होऊन पांघरलेलीं सर्व पांघरुणें त्यानें दूर फेंकून मोकळें, प्रकट झालें पाहिजें; मन क्रमश: सत्यमय झालें पाहिजे, सत्याचे एक अंग म्हणून जाणिवेचा प्रकाश मनाचे ठिकाणीं पूर्णपणें उतरला पाहिजे; सत्याचें दुसरें अंग शक्ति, हीहि मानवांत कृतार्थ झाली पाहिजे. कारण मूळ अस्तित्व, मूळ सत्ता, मूळ सत्य हें, प्रकाश आणि शक्ति यांच्या द्वारांच व्यक्त होत असतें. सत्ता ही मुळांतच, जाणीव (किंवा प्रकाश) आणि शक्ति या द्विमुखी स्वरूपाची आहे; आणि हे दोन सत्ता-घटक आपल्या परिपूर्तिबरोबर अस्तित्वाचा समाधानपूर्ण आनंद हा तिसरा घटक आपल्याबरोबर वागवीत असतात. सत्, चित् व आनंद ही मूळ सत्याची अविभक्त आणि अविभाज्य अशीं तीन अंगें आहेत. तेव्हां निष्कर्ष हा निघतो कीं, मानव हा दिव्य-मानव होण्यासाठीं, मनाची प्रगति होऊन, सर्व सत्य -- सच्चिदानंद -- मानवांत अवतरलें पाहिजे. आपण मानव, विकासी जीवन जगणारे आहोंत; तेव्हां हें वर सांगितलेलें जें सर्वोच्च अटळ स्थान आपल्याला लाभावयाचें आहे, तें आपला विकास होऊन, मनाच्या पलीकडे असलेला आपला आत्मा आपल्याला लाभल्यानेंच लाभणार आहे. आपल्या मानवतेच्या बीजांत हा आत्मा होता -- आपलें जीवन, ज्या जाणीवयुक्त मूळ शक्तींतून निर्माण झालें, त्या जीवनाच्या पोटीं हा आत्मा होता; या आत्म्याचा लाभ झाला कीं त्याबरोबरच, मूळ जाणीवशक्तीनें तिच्या जीवननिर्मितीच्या व्यापारांत गुप्त करून ठेवलेल्या शक्ती प्रकट व कार्यकारी होतील. याप्रमाणें आमच्या मानवी जीवनाच्या पोटीं, जी महान् शक्ति गुप्त करून ठेवली गेली आहे ती सच्चिदानंद-शक्ति होय. आत्मलाभानें ही शक्ति प्रकट होणार आणि त्याचा परिणाम म्हणून, वैयक्तिक जीवन आणि विश्वजीवन यांचा सुंदर मेळ आणि ऐक्य होणार; सच्चिदानंदाचा मानवांतील आविष्कार हेंच स्वरूप धारण करूं शकतो. या आविष्कारानें एक सार्वत्रिक सर्वसामान्य जाणीव, एक सर्वसामान्य शक्तिकार्य, सर्वसामान्य आनंद मानवजातींत अवतरेल. सर्वातीत सद्वस्तूच (सच्चिदानंद) या विश्वांतील वस्तुजाताच्या रूपानें साकार झाली आहे, विकसित होत राहिली आहे; या विकास-

 

पान क्र. ३९२

 

क्रमाचा अंतिम टप्पा म्हणून व्यक्तिजीवन आणि विश्वजीवन यांचा मानवांत सुंदर समन्वय साधून ती आपलें सर्वस्व -- गुप्त ठेवलेलें सर्वस्व -- विश्वाला अर्पण करणार असें दिसत आहे.

जीवनाचा असा नियम आहे कीं, त्याची घटकभूत जाणीव जशा प्रकारची, जशा स्वरूपाची असेल तशा प्रकारचें, तशा स्वरूपाचें, तें जीवन असावयाचें. कारण जशी जाणीव, तशी तिची शक्ति असावयाची. (आणि जीवन हें शक्तीचें एक रूप आहे.) सर्वच जीवनाचा स्वभावधर्म त्याच्या घटकभूत जाणिवेच्या मौलिक अवस्थेवर अवलंबून असतो. जेथें जाणीव अनंत आहे, एकच एक आहे, कृती आणि आकार तिजकरवीं घडत आहेत, आकार धारण करून त्या आकारांच्या अंतरांत ती बसत आहे, कृती योजून त्या ती पार पाडीत आहे -- तथापि इतकें करूनहि कृतींच्या, आकारांच्या अतीत, अलिप्तपणें ती नांदत आहे, अशी जाणीव जेथें आहे, (सच्चिदानंदाची जाणीव अशी आहे) तेथें तिची शक्ति पण अनंत-क्षेत्रव्यापी, तिच्या सर्व कृतींत एकरूप व तिचें सामर्थ्य आणि आत्मज्ञान यासंबंधांत ती सर्वातीत अलिप्तपणा गाजविणारी असते. जेथें जाणीव भौतिक निसर्गाची असेल, अर्थात् जेथें ती आकारांत व कार्यांत बुडून गेलेली, आत्मविस्मृति झालेली असेल, तिच्या स्वतःच्या शक्तीच्या ओघांत, दर्शनी अजाणतां परवश होऊन काम करणारी असेल (मात्र हि गोष्ट विसरतां कामा नये कीं, जाणीव आणि शक्ति यांचे जें शाश्वतचें नातें आहे, त्याप्रमाणे जो शक्तीचा ओघ जाणिवेकडून आपल्या लहरीप्रमाणें काम करवून घेतांना दिसतो तो ओघ ती जाणीव स्वतःच ठरवीत असते) तेथें शक्तीहि या आत्मविस्तृत जाणिवेसारखीच असणार : या शक्तींचें कार्य महाभयंकर असणार, तें जडाचें, नेणीवमय राक्षसी कार्य असणार; या कार्य करणाऱ्या जडाला, आपल्या पोटांत काय आहे याची कल्पनाहि नसणार; त्याचें कार्य यांत्रिक रीतीनें, अपरिहार्यपणें पण आकस्मिकपणें, केवळ योगायोगानें पण अटळ योगायोगानें यशस्वी झालेलें दिसणार. (आणि वस्तुस्थिति पाहतां, या जडाच्या पोटीं गुप्त असणाऱ्या दिव्य ज्ञानमय पुरुषाची संकल्पशक्ति, जडासाठीं जो सत्याचा आणि न्यायाचा कायदा निश्चित करते, त्या कायद्याला अनुसरून जड निसर्ग बिनचूक काम करीत असतो,) जेथें जाणीव स्वतःच विभागलेली आहे, (मनामध्यें जाणीव विभागलेली असते) जेथें तिची अनेक केन्द्रें आहेत, जेथें प्रत्येक केंद्र मर्यादित जाणिवेचें आहे, प्रत्येक केंद्र

 

पान क्र. ३९३

 

दुसऱ्या केंद्राहून अगदीं अलग, त्या केंद्रांशीं आपलें नातें कांहींच न ओळखणारें, त्या केन्द्रांत काय चाललें आहे तें मुळींच न जाणणारें, परंतु आपलें इष्ट सिद्धीस नेण्यासाठीं, स्वतःपुरतें कृतार्थ होण्यासाठीं धडपडत आहे, त्यानें तसें धडपडावें अशी जेथें जाणीव व्यवस्था करीत असते; वस्तु काय किंवा शक्ति काय, त्यांचा एकमेकांना दर्शनी विरोध व एकमेकांपासून दर्शनी विभक्तपणा जाणिवेला जेथें खरा वाटतो आणि त्यांची वास्तविक एकता जेथें जाणिवेला प्रतीत होत नाही, -- अशी जाणीव जेथें आहे तेथें शक्तीहि तदनुरूप असेल -- आम्ही जगतो तें जीवन व आमच्या भोंवतालचें जीवन म्हणजे या अशा विभक्त जाणिवेला अनुरूप असलेल्या शक्तींचें कार्य आहे; येथें वैयक्तिक जीवनें एकमेकांत गुंतलेलीं आहेत आणि एकमेकांशीं झगडत आहेत; कोणत्याहि एका व्यक्तिजीवनाला, इतरांशीं त्याचें काय नातें आहे तें माहीत नाहीं; पण प्रत्येक जीवन स्वत: कृतार्थ होण्यासाठीं धडपडत आहे; येथें अनेक शक्ती एकमेकींपासून वेगळ्या आहेत, विभक्त आहेत, अन्योन्यविरोधीहि आहेत आणि या शक्तींचा कसा तरी जुलूमानें मेळ घालण्याचा प्रयत्न करण्यांत येत आहे -- मनांतील विचारांकडे पाहिलें तर तेथेंहि विभक्त, विरोधी विचारांचा एकमेकांत गुंता होत आहे, एकमेकांवर आघात होत आहे, एकमेकांशीं कुस्ती होत आहे -- कांहीं विचारांचे कांहीं थोडा काळ टिकणारें असें एकीकरण होत आहे -- येथील शक्तींना काय, विचारांना काय, एकमेकांना एकमेकांच्या असलेल्या आवश्यकतेची, गरजेची प्रतीति होत नाहीं; त्या सर्वांच्या पाठीमागें जी एकच एक सद्वस्तु आहे, त्या सद्वस्तूचे, सर्व विचार व सर्व शक्ती हे घटकभूत आहेत; प्रत्येक विचाराला, प्रत्येक शक्तीला या सद्वस्तूच्या आविष्कारांत विशिष्ट स्थान आहे, त्यांच्या द्वारां ही सद्वस्तु आपलें स्वरूप व्यक्त करीत आहे; पण त्यांचे परस्पर विसंवाद व विरोध या सद्वस्तूच्या ठिकाणीं, या सद्वस्तूच्या अनुभूतीनें सर्वथा विलीन होतील हें ज्ञान येथील शक्तींना आणि विचारांना उपलब्ध नाहीं -- ही आमच्या जीवनाची गोष्ट झाली. जेथें जाणीव ही, एक आणि अनेक, एक सद्वस्तु आणि तिचे विविध आविष्कार या दोन्ही गोष्टी नीट जाणत आहे, जेथें एकतेचें शासन विविधतेवर जाणीवपूर्वक चालतें, जेथें विविधता ही एकतेच्या पोटांत जाणीवपूर्वक आपलें जीवन जगते, जेथें जाणिवेला समष्टीचा आणि व्यष्टीचा दोहोंचाहि वेगळा वेगळा कायदा, वेगळा वेगळा न्याय, वेगळें वेगळें सत्य एकाच वेळीं अवगत आहे आणि जेथें व्यष्टि

 

पान क्र. ३९४

 

आणि समष्टि जाणीवपूर्वक एकमेकींशीं तादात्म्य पावून सुसंवादी जीवन जगतात, जेथें जाणिवेचा स्वभावधर्म असा आहे कीं, -- 'एकच एक सद्वस्तु मीच सर्व विविध वस्तु बनलें आहें हें जाणते व विविध वस्तू आम्ही सर्व एकतेचा आविष्कार आहोंत हें जाणतात' -- जेथें जाणीव अशी द्विमुखी एकानेक समावेशक आहे, तेथें शक्तीहि तदनुरूप असेल -- जीवनहि तदनुरूप असेल : या जाणिवेनें घडलेल्या जीवनांत एकतेचा कायदा बुद्धिपुरःसर पाळला जाईल आणि त्याबरोबर विविधतेंतील प्रत्येक गोष्ट तिला लागूं असणाऱ्या विशिष्ट नियमानुसार, तिला नेमून दिलेल्या विशिष्ट व्यापाराच्या अनुरोधानें हें जीवन चालवील व शेवटास नेईल; या जीवनांत सर्व व्यक्ती एकाच वेळीं स्वतःच्यासाठीं आणि इतरांसाठीं, एकमेकांसाठीं जीवन जगतील; अशी स्पष्ट अनुभूति त्यांना असेल कीं, त्यांच्या रूपानें एकच एक ज्ञानमय सत्ता सर्व आत्म्यांत वसत आहे, एकच एक जाणीवशक्ति सर्व मनांत काम करीत आहे, एकच एक शक्तिजन्य आनंद सर्व जीवांत खेळत आहे, एकच एक आनंदमय सद्वस्तु सर्व हृदयांत व शरीरांत आपलें इष्ट पूर्णतया सिद्धीस नेत आहे -- सर्व आत्म्यांतील ज्ञानमय सत्ता, सर्व मनांतील जाणीवशक्ति, सर्व जीवांतील शक्तिजन्य आनंद, सर्व हृदयांतील व शरीरांतील आनंदमय सद्वस्तु मी आहे अशी अनुभूति प्रत्येक व्यक्तीला या अनेकाकार एकतामय जीवनांत असेल आणि या अनुभूतीनुसार सर्व व्यक्ती एकाच वेळीं स्वतःसाठीं व एकमेकांसाठीं, स्वतःच्या व सर्वांच्या हिताचें असें सुंदर समन्वयी जीवन जगतील.

जाणिवेच्या व तदनुरूप शक्तीच्या चार अवस्थांचें वर्णन येथवर केलें. पहिली अवस्था ही पुढील क्रमवार अवस्थांचा पाया व मूळ आहे. सच्चिदानंद सद्वस्तूच्या अस्तित्वांत, जाणीव आणि शक्ति अभिन्न असतात, तेथें शक्ति ही कार्यकारी जाणीव असते; ही जाणीव आपलें नियत कार्य करीत असतां आपलें जाणिवेचें रूप विसरत नाहीं, तसेंच जाणीव ही प्रकाशमय शक्ति असते; ती शक्ति कधीं स्वतःला विसरत नाहीं, आपला आनंद कधीं दृष्टीआड करीत नाहीं, स्वतःची आणि स्वतःच्या आनंदाची जाणीव तिला नित्य असते -- तसेंच 'पूर्ण प्रकाशाची आणि पूर्ण आत्मशासनाची, आत्मसत्तेची शक्ति', हें आपलें स्वरूपहि ही शक्ति केव्हांहि विसरत नाहीं. सच्चिदानंदाच्या सत्तेमध्यें जाणीव आणि शक्ति यांचें नित्य अभिन्नतेचें नातें असतें हें आतांच सांगितलें. सत्तेच्या अस्तित्वाच्या या मूळ अवस्थेवर बाकीच्या अवस्था आधारलेल्या आहेत. सत्तेची, अस्तित्वाची दुसरी

 

पान क्र. ३९५

 

अवस्था म्हणजे भौतिक निसर्गाची अवस्था; या अवस्थेंत सच्चिदानंद, 'मी सच्चिदानंद नाहीं' असा जणुं पुकारा करतो; कारण जाणीव आणि शक्ति यांची येथें फारकत झालेली दिसते; येथें जाणीवशून्यता, जडता, जडशक्ति अचूकपणें काम करीत आहे, सर्व घटनांवर प्रभुत्व गाजवीत आहे, असा अद्‌भुत देखावा दृष्टीस पडतो; वस्तुत: हा देखावा म्हणजे एक पडदा आहे, जाणिवेनें घेतलेला बुरखा आहे; परंतु आधुनिक विज्ञान या जडतेला विश्वचालक ईश्वराचा खरा मुखवटा मानतें. यानंतर, शक्ति आणि जाणीव यांचें तिसऱ्या अवस्थेंतील नातें पाहिलें, तर तेथें अस्तित्वानें, मूळ सत्तेनें मन आणि प्राण यांचें स्वरूप घेतलें आहे असें दिसतें; जडतेच्या क्षेत्रांत सच्चिदानंदाचें मूळ स्वरूप, शून्य किंवा दर्शनीं शून्यवत् झालें होतें, त्यांतून आतां प्राणमय जीवन आणि मानसिक जीवन वर आलेलें असतें, अर्थात् जाणीव ही शक्तीला थोडीबहुत साथ देऊं लागते; पण येथें भौतिक जडता जाणिवेला गोंधळांत टाकते. जाणीव ही झगडत राहते; जडतेपुढें मान वाकवावी व झगडा सोडून द्यावा ही गोष्ट जाणिवेला शक्य नसते, उलट आपण झगडा जिंकूं अशी अस्पष्ट कल्पना किंवा असें स्पष्ट ज्ञान जाणिवेला नसतें -- प्राणमय जीवनांत आणि मनोमय जीवनांत जाणिवेसमोर जे हजारों प्रश्न उभे राहतात, ते सोडविण्यासाठीं ती झगडत राहते. हे प्रश्न तिजपुढें उभे राहण्याचें कारण म्हणजे, मनुष्य हा जाणीवयुक्त व अर्धवट सामर्थ्य असलेला जीव, सर्वसमर्थ असें जें भौतिक दुनियेचें जडतत्त्व त्यांतून उदय पावलेला असतो, या उदयानें जाणिवेला गोंधळांत टाकलेलें असतें आणि या गोंधळाच्या स्थितींत ती सारखी झगडत राहते. अस्तित्वाच्या मूळ सत्तेच्या या तीन अवस्थांनंतर चौथी अवस्था अतिमानसिक क्षेत्रांतील अस्तित्व ही होय. येथें सत्ता कृतार्थ होते; सर्वशून्यतेंतून, सर्वजडतेंतून अल्पांशानें जाणिवेचें उत्थान होऊन, त्यामुळें जो संकीर्ण प्रश्नसमूह उत्पन्न होतो, तो येथें शेवटीं समूळ सोडविला जातो -- हा जो प्रश्नांचा उलगडा होतो, तो जाणिवेचें पूर्ण उत्थान होऊन होत असतो. सच्चिदानंदाचें जें अस्तित्व, दर्शनी विनष्ट करणाऱ्या महान् जडतेच्या पडद्याआड लपलेलें असतें, जें जडतेंतून पूर्णतया वर यावयाचें सामर्थ्य बाळगून असतें, जें विकासक्रमानें हळूहळू वास्तवांत गोचर व्हावयाचें असतें, तें सच्चिदानंदाचें अस्तित्व पूर्णपणें दृग्गोचर होऊनच, जडतेंतून अर्धवट वर आलेल्या जाणिवेमुळें उत्पन्न झालेला प्रश्नसंभार पूर्णतया उकलला जातो, सोडविला जातो. सच्चिदानंदाचें पूर्ण गोचरत्व,

 

पान क्र. ३९६

 

मनुष्याचे ठिकाणीं त्याचें पूर्णतया आविष्करण, हेंच खऱ्या मनुष्याचें खरें जीवन होय. आजची आंशिक अकृतार्थ मानवता व मानव जीवन हें या खऱ्या मानवतेच्या रोखानें प्रगत होत आहे, सरळ पावलें टाकीत आहे. या दिशेचें व गतीचें पूर्णज्ञान व पूर्ण मार्गदर्शनशक्ति, आमच्यांतील तथाकथित नेणिवेला, जाणिवेखालील अ-जाणिवेला, अचेतनाला आहे; आमच्यांतील जो जाणिवेचा भाग आहे, त्याला आमच्या या विकासक्रमाचें व विकासाच्या अंतिम अवस्थेचें केव्हां केव्हां अर्धवट अंधुक पूर्वदर्शन घडतें, केव्हां केव्हां अर्धवट साक्षात्कार होतो; त्या आदर्शस्थितीचें ओझरतें आल्हाददायक दर्शन केव्हां केव्हां घडतें, आकस्मिक अद्‌भुत अनुभव व अंतःप्रेरणा ह्या केव्हां केव्हां त्या खऱ्या मानवतेचें, विजेच्या झगमगाटाप्रमाणें क्षणिक दर्शन तिला घडवून जातात -- हीं तुटक व त्रोटक दर्शनें, साक्षात्कार, प्रेरणा व आंतरिक अनुभव अर्थात् सामान्यांच्या वांट्यास येत नाहींत, तर आमच्यांतील कवि, द्रष्टे, क्रांतदर्शी, अतींद्रिय ज्ञाननिष्ठ, साक्षात्कारनिष्ठ तत्त्वज्ञ, आणि महान् बुद्धीचे व महान् हृदयाचे उदारात्मे यांच्या वांट्यास ते येतात.

आम्हांला ज्या वास्तव गोष्टी आतां उपलब्ध झाल्या आहेत, त्यांवरून माणसाच्या प्रस्तुत मानसिक आणि प्राणिक अवस्थेमध्यें, त्याची जाणीव आणि त्याची शक्ति यांचें परस्पर नातें व एकंदर सामर्थ्य अपूर्ण असल्यानें ज्या अडचणी उत्पन्न होतात, त्या मुख्यत: तीन आहेत असें दिसतें. पहिली अडचण अशी कीं, मनुष्याला त्याच्या स्वतःच्या अस्तित्वाचा फार थोडा भाग अवगत असतो; वरवरचें मन, वरवरचें जीवन व वरवरचें भौतिक अस्तित्व एवढेंच काय तें त्याला अवगत असते आणि यांतीलहि सर्व गोष्टी त्याला माहीत नसतात; या वरच्या थराखालीं, त्याच्या अस्तित्वाचा फार मोठा भाग गुप्त असतो आणि त्याजवर त्याची सत्ता चालत नाहीं; उलट हा गुप्त भाग त्याला, त्याच्या वरच्या भागाला जाणतो व त्यावर हुकुम चालवितो : हा मोठा भाग म्हणजे त्याची प्रच्छन्न व अर्धजागृत जाणीव, त्याच्या प्रच्छन्न प्राणिक आणि अर्धजागृत वासनाप्रेरणा आणि त्याची अर्धजागृत भौतिक सत्ता. हा सर्व गुप्त भाग त्याचे ठिकाणीं, त्याला न कळत सारखा आंतून उठाव करून, त्याच्या जागृत  भागावर सत्ता चालवीत असतो. अस्तित्व, जाणीव आणि शक्ति या वस्तुत: अभिन्न, एकरूप असल्यानें, आमच्या अस्तित्वाच्या जेवढ्या भागाशीं आम्ही आत्म-जाणीवेनें एकरूप असूं किंवा होऊं, तेवढ्याच भागावर आम्हांला

 

पान क्र. ३९७

 

कांहीं खरी सत्ता चालवितां येते, आमची शक्ति कांहीं खरें प्रभुत्व गाजवूं शकते; अस्तित्वाचा जो भाग आमच्या आत्म-जाणिवेच्या कक्षेंत येत नाहीं, त्यावर सत्ता चालविणारी जाणीव म्हणजे प्रच्छन्न किंवा अर्धजागृत जाणीव होय; आमच्या वरवरच्या मन-प्राण-शरीराच्या खालीं गुप्तपणें, अज्ञातपणें ही काम करीत असते. गुप्त आणि प्रकट जाणीव या कांहीं दोन स्वतंत्र वस्तू किंवा क्रिया नाहींत, एकाच वस्तूचे किंवा क्रियेचे दोन भाग आहेत. म्हणून आमच्यांतील मोठा आणि अधिक सामर्थ्यशाली भाग त्यामानानें लहान असलेल्या व अल्प शक्तीच्या भागावर सत्ता चालवून, त्याचें कार्य निश्चित करतो हें स्वाभाविक आहे; अर्थात् आमच्यांतील अर्धजागृत आणि प्रच्छन्न अस्तित्व आमच्या जागृत अस्तित्वावर सत्ता चालविते; आम्ही ज्याला आत्मशासन म्हणतो, आत्मदिग्दर्शन म्हणतो, त्या आमच्या अवस्थांत देखील ज्या आमच्या नेणीवव्याप्त (अर्धजागृत आणि प्रच्छन्न) अस्तित्वाचीं आम्हीं यंत्रे आहोंत, साधनें आहोंत त्याच्या तंत्रांनें चालणारे आहोंत असें स्पष्ट दिसतें.

प्राचीन ज्ञानी लोकांनीं असें म्हटलें आहे कीं, 'स्वत:च्या स्वतंत्र इच्छेनुसार मी काम करीत आहे' अशी कल्पना मनुष्य करतो पण तो खरोखरी प्रकृतीनें कामाला लावलेला असतो, प्रकृतीनें त्याचीं सर्व कर्में ठरविलेलीं असतात. ज्ञानी देखील आपल्या प्रकृतीनुसार वागण्याला बांधलेले असतात, ते आपल्या इच्छेविरुद्ध देखील प्रकृतिधर्मानुसार वागतात; या पूर्वकालीन ज्ञानी लोकांच्या म्हणण्याचा अर्थ, मनुष्याच्या जागृत प्रकट अस्तित्वावर अ-जागृत, अप्रकट अस्तित्वाची सत्ता चालते असाच आहे. प्रकृति ही आमच्यांतील सद्वस्तूच्या जाणिवेची निर्मितिशक्ति आहे आणि ही सद्वस्तु, सच्चिदानंद आपल्या जड प्रकृतिरूपी उलट गुणाच्या क्रियेनें किंवा वस्तूनें झांकला गेला आहे व जणुं नाहींसा झाला आहे; म्हणून प्राचीन ज्ञानी लोक प्रकृतीला माया (भ्रम पाडणारी ईश्वराची शक्ति) म्हणत आणि 'सर्वांच्या हृदयांत बसून तो, सर्वजीव हे, मायेनें यंत्रावर घातल्यासारखे संसारांत भ्रमवीत आहे, फिरवीत आहे' असें विधान करीत. यावरून हें स्पष्ट आहे कीं, मनाच्या पलीकडे जाऊन मनुष्य जेव्हां आत्मजाणिवेमध्यें ईश्वराशीं एकरूप होईल, तेव्हांच तो आपल्या सर्व आस्तित्वाचा खरा धनी होईल. अर्थात् ही धनी होण्याची गोष्ट नेणिवेच्या प्रांतांत शक्य नाहीं, अर्धनेणिवेच्या प्रांतांत शक्य नाहीं; मागें पाऊल टाकून नेणिवेच्या प्रांतांत बुडी घेण्यानें मनुष्याला कांहीं लाभ नाहीं -- तेव्हां

 

पान क्र. ३९८

 

आंत खोल जावयाचें, तर जेथें ईश्वर बसलेला आहे तिकडेच जाणें युक्त आहे. आमच्या मनाच्या क्षेत्राहून उंच पातळीवर जें जाणिवेचें क्षेत्र आहे, त्या अतिमानसिक क्षेत्रांत पाऊल टाकणें युक्त आहे; तेथें गेलें तरच ईश्वराशीं एकरूपता सिद्ध होऊं शकेल आणि मनुष्य आपल्या सर्व अस्तित्वाचा खरा धनी होऊं शकेल. कारण अर्धनेणिवेच्या प्रांतांत उच्च दिव्य माया जें कार्य करते, त्याचा कायदा आणि त्यांतील सत्यता या गोष्टींची पूर्ण ओळख त्या अतिमानसिक क्षेत्रांत असते. अगदीं तळाला सच्चिदानंदाच्या बिलकुल उलट, पूर्ण नेणिवेचें, जडाचें क्षेत्र असतें; या क्षेत्रांतील नेणिवेला आणि जडतेला विकाससिद्धान्तानुसार क्रमश: जाणीव आणि चेतना यांचें रूप येत असतें -- हें परिवर्तन घडविण्याचें काम प्रत्यक्षतः कनिष्ठ मायेचें असतें. श्रेष्ठ माया किंवा परा प्रकृति जें इच्छितें व योजितें, तें घडवून आणणें हें काम कनिष्ठ मायेचें किंवा अपरा प्रकृतीचें असतें. दिव्य ईश्वरी ज्ञानामध्यें दोन शक्ती असतात, आभास निर्माण करण्याची शक्ति आणि सत्य ज्ञानाची शक्ति. आभासशक्ति विश्वांत देखावे निर्माण करते, परंतु या शक्तीवर सत्यशक्तीचें नियंत्रण असतें. देखाव्याच्या मागें काय सत्य आहे, तें या दिव्य ज्ञानाच्या सत्य-दर्शनशक्तीला ठाऊक असते. विश्वांतील देखावे ज्या सत्याच्या सिद्धीकडे, प्रकट आविष्काराकडे वाटचाल करीत असतात, तें सत्य, विकासशील जीवानें, मानवानें, प्राप्त करून घ्यावें यासाठीं दिव्य ज्ञानाची सत्यशक्ति तें तयार ठेवीत असते. आज येथें मानव जो पूर्ण नाहीं, अपूर्ण आहे आणि बराचसा आभासपूर्ण आहे, तो अतिमानसिक क्षेत्रांत पूर्ण आणि सत्यमय होईल. येथील अपूर्ण मानवाला तेथें पूर्ण मानव भेटेल. हा पूर्ण मानव आपलें पूर्ण अस्तित्व जाणण्याची शक्ति बाळगून असतो, कारण तो स्वयंभू सच्चिदानंदाशीं पूर्णतया एकरूप असतो; हा स्वयंभू आदिपुरूष आपल्या स्वतःच्या विश्वगत विकासक्रमाचा आणि विकासयात्रेचा सर्वज्ञ असा अधिपति आणि अधिसंचालक असतो.

मानवाची दुसरी अडचण ही कीं, विश्वसमष्टीपासून तो मन-प्राण-शरीरानें विभक्त असतो, विश्वरूपापासून त्याचें मन, प्राण व शरीर त्याच्या जाणिवेनुसार विभक्त असतें; अर्थात् त्याला ज्याप्रमाणें स्वतःच्या अस्तित्वासंबंधीं पूर्ण ज्ञान नसतें, त्याप्रमाणें त्याला इतर सहचारी जीवांसंबंधानेंहि ज्ञान नसतें; स्वतःचें ज्ञान करून घेणें त्याला इतकें अवघड नसतें, पण इतर जीवांचें ज्ञान करून घेणें त्याला फार अवघड असतें,

 

पान क्र. ३९९

 

स्वत:संबंधीं ज्ञान करून घेण्याला तो जितका असमर्थ असतो, त्यापेक्षां दुसऱ्यासंबंधींचें ज्ञान करून घेण्याला तो पुष्कळच अधिक असमर्थ असतो. अनुमानें, उपपत्ति, निरीक्षणें, थोडीबहुत सहानुभूति यांच्या आश्रयानें त्यांच्या संबंधानें, मानव कांहीं मानसिक ढोबळ कल्पना बांधतो; पण या ढोबळ कल्पना म्हणजे ज्ञान नव्हे. कोणासंबंधींहि खरें ज्ञान हे जाणीवपूर्वक तादात्म्यानें, एकरूप होण्यानेंच होऊं शकतें. स्वतःला जाणणारें अस्तित्व, अस्तित्वव्यापक ज्ञान, आत्मज्ञान हेंच खरें ज्ञान होय. आपण आपल्या अस्तित्वाचा जेवढा भाग जागृत जाणिवेनें जाणतों, तेवढ्या भागापुरतेंच आपण आपणाला जाणतो असें म्हणतां येतें; आपल्या अस्तित्वाचा बाकीचा भाग आपल्यापासून लपलेला, आपल्याला अज्ञात असतो; हीच गोष्ट आपल्या इतर गोष्टींच्या ज्ञानासंबंधीं समजावी. आपण आपल्या जाणिवेनें ज्या गोष्टीशीं आणि जितक्या प्रमाणांत एकरूप होऊं, तितक्याच प्रमाणांत त्या गोष्टीचें खरें ज्ञान आपल्याला होतें. ज्ञानाचीं साधनें अप्रत्यक्ष आणि अपूर्ण असतील, तर त्यांनीं मिळविलेलें ज्ञान अपुरें आणि अप्रत्यक्षच असणार. या अपुऱ्या ज्ञानाच्या आधारावर आपल्याला आपले कांहीं मर्यादित व्यावहारिक हेतू सिद्ध करतां येतील, कांहीं जरूरीच्या गोष्टी मिळवितां येतील, कांहीं सोयी करून घेतां येतील. आपल्याला ज्ञात झालेल्या वस्तूशीं किंवा जीवाशीं आपलें संबंध थोडे बहुत तात्पुरते सुसंवादमय करून घेतां येतील. अर्थात् हें सर्व कार्य ओबडधोबड रीतीचेंच होईल व फारसें टिकाऊहि होणार नाहीं. आमच्या मानसिक दृष्टिकोनानुसार आमचें कार्य आम्हांला जरूरीपुरतें निर्दोष म्हणतां येईल, हें खरें आहे; तथापि कोणत्याहि वस्तूशीं किंवा जीवाशीं खरें पूर्ण निर्दोष नातें जोडावयाचें, तर तें त्या वस्तूशीं किंवा जीवाशीं जाणीवपूर्वक एकरूप झाल्यानेंच आपण जोडूं शकतो, हें निर्विवाद आहे. तेव्हां आमच्या सहचर जीवांचें पूर्ण ज्ञान आम्हांला व्हावें, यासाठीं आम्हांला त्यांच्याशीं जाणीवपूर्वक एकरूप व्हावयास हवें; प्रेमानें त्यांच्याशीं सहानुभूति उत्पन्न होते, मानसिक ज्ञानानें त्यांच्यासंबंधानें कांहीं गोष्टी कळतात, पण हें जें सहानुभूतीनें, तर्कानें वगैरे ज्ञान होतें, तें त्यांच्या वरवरच्या अस्तित्वाचेंच होऊं शकतें; अर्थात् तें स्वभावतःच अपूर्ण आणि सदोष असतें आणि म्हणून हें ज्ञान खोटें आणि निष्फल ठरण्याचा पुष्कळच संभव असतो; दुसऱ्यांच्या अंतरंगांमध्यें व आमच्या अंतरंगामध्यें अर्धनेणिवेचा आणि प्रच्छन्न जाणिवेचा जो प्रांत आहे, तेथून

 

पान क्र. ४००

 

आम्हांला व त्यांना अज्ञात आणि आमच्या व त्यांच्या प्रभुत्वाला न जुमानणाऱ्या अशा गोष्टी एकदम वर उसळून येऊन, आमच्या अपुरत्या ज्ञानावर आम्हीं उभ्या केलेल्या रचना त्या पाडून टाकतील, परिणामशून्य करून टाकतील असाच संभव फार; तेव्हां असलें उथळ अपुरतें ज्ञान बाजूस सारून, आम्हांला इतर जीवांशीं पूर्ण जाणिवेनें एकरूप व्हावयास हवें -- या एकरूपतेनेंच आम्हांला त्यांचें खरें पूर्ण ज्ञान होईल व आमचे त्यांचे संबंध खरे निर्दोष होतील; पण हें जाणीवपूर्वक एकरूपत्व प्रस्थापित व्हावयास आम्हांला त्या ठिकाणीं पोहोंचलें पाहिजे, ज्या ठिकाणीं आम्ही त्यांच्याशीं एकरूप असतो -- अर्थात् विश्वसमष्टींत आम्हीं प्रवेश करावयास हवा. विश्वसमष्टींत सर्व जीवांची व आमची एकरूपता स्वभावतःच असते. अतिमानसिक क्षेत्रांत या विश्वसमष्टीची पूर्णता जाणीवयुक्त अशी असते. हें क्षेत्र आमच्या मानसिक जाणिवेच्या पलीकडे, वरतीं आहे; येथें आमच्या सामान्य अस्तित्वांत विश्वसमष्टीचा मोठा हिस्सा नेणीवव्याप्त असतो आणि म्हणून मन-प्राण-शरीराच्या सामान्य अवस्थेंत या समष्टीची प्राप्ति आम्हांला होत नाहीं. आमची जाणीवयुक्त कनिष्ठ अपरा प्रकृति, आपल्या सर्व क्रियांच्या बाबतींत 'मी'शीं बांधलेली असते, विभक्त व्यक्तित्वाच्या स्तंभाशीं जखडलेली असते, या प्रकृतीच्या पलीकडे असलेलें, फक्त अतिमानसाचें क्षेत्र असें आहे कीं, तेथें विविधता आणि एकता अविभक्त असतात, विविधतेच्या जाणिवेबरोबर एकतेची, अभिन्नतेची जाणीव तितकीच स्पष्ट आणि प्रखर असते.

मनुष्याची तिसरी अडचण ही कीं, त्याच्या विकासशील अस्तित्वांत, शक्ति आणि जाणीव यांची कमीअधिक फारकत झालेली असते व त्यांचा एकमेकांना विरोध होत असतो. विकासक्रमानेंच ही विभक्तता व विरोध निर्माण केला आहे -- अगोदर जड भौतिक देह, नंतर प्राण, नंतर मन अशी क्रमानें रचना करून व प्रत्येक रचनेचा वेगळा कायदा निश्चित करून, विकासक्रमानें या तीन रचनांत विभक्तता व विरोध निर्माण करून ठेवला आहे. प्राणशक्ति, जीवनशक्ति शरीराशीं झगडत असते, आपल्या वासना तृप्त करण्यासाठीं, आपल्या लहरी पुरविण्यासाठीं शरीरावर ती सक्ती करीत असते; शरीराची शक्ति मर्यादित असूनहि, अमर दिव्य शरीरालाच जें शक्य, तें मर्त्य शरीरापासून ही प्राणशक्ति, अपेक्षीत असते; उलटपक्षीं जुलुमाखालीं तडफडणारें शरीर दुःखी कष्टी होतें

 

पान क्र. ४०१

 

आणि प्राणशक्तीच्या भलत्याच मागण्या पाहून बंड करून उठतें, शरीरानें प्राणशक्तीविरुद्ध कायमचें निःशब्द असें बंड पुकारलेलें असतें. मन हें, शरीर आणि प्राण या दोहोशीं झगडत असतें; तें केव्हां केव्हां प्राणशक्तीला शरीराविरुद्ध मदत करतें, केव्हां केव्हां शरीरसंरक्षणार्थ प्राण-शक्तीच्या वासनांना तें दाबून टाकूं पाहते -- प्राणशक्तीच्या वासना, आवेग व मर्यादेबाहेर धडपडणाऱ्या ऊर्मी शरीराला भलतीच इजा पोंचवितील असें पाहून, मन त्यांना आळा घालूं पाहतें; केव्हां केव्हां आपल्या कांहीं इच्छा पुरविण्यासाठीं प्राणशक्तीस वेठीला धरण्याचा उद्योगहि मन करतें; कर्म करण्याची मनाची स्वतःची हौस पुरी व्हावी, त्याचे बौद्धिक हेतू, भावनात्मक हेतू, कलात्मक हेतू पुरे व्हावे, यासाठीं प्राणशक्तीवर ताबा चालवून मन तिला कामाला लावते -- आणि या जुलुमामुळें प्राणशक्ति पुष्कळ वेळां मनाविरुद्ध बंड करून उठते -- मन हें कांहीं सर्वज्ञ नव्हे, अर्धवट ज्ञान, अर्धवट शहाणपण, पुष्कळसें अज्ञान आणि मूर्खपण अशी तर मनाची अवस्था आणि असें हें मन प्राणावर अरेरावीचा जुलुम करूं पाहतें, तेव्हां साहजिकच प्राण बंड करून उठतो. मन-प्राण-शरीर यांची आपसांतील यादवी कांहीं मनाला थांबवितां येत नाहीं; या यादवीवर समाधानकारक उपाय कांहीं मनाला सांपडत नाहीं -- कारण मनानें हा प्रश्न सुटण्यासारखा नाहीं; मर्त्य शरीर आणि नश्वर प्राण यांच्या आश्रयानें अमर आत्म्याची आकांक्षा कशी पुरवावयाची, असा प्रश्न मनापुढें आहे आणि अर्थातच मनाला हा प्रश्न सुटणें अशक्य आहे. मन अनेक तडजोडी करून अमर आत्म्याला संतोष देण्याचा प्रयत्न करतें, केव्हां केव्हां प्रश्न सुटायला अशक्य आहे असें पाहून त्याचा नाद सोडून देतें -- जडवाद्याचा सिद्धान्त मान्य करून, आमचें दृश्य जीवन सर्वस्वीं नष्ट होऊन जाणारें आहे आणि दृश्य जीवनाखेरीज दुसरें जीवन नाहीं असा पक्ष घेऊन, त्याला न सुटणाऱ्या प्रश्नाचा नाद मन सोडून देतें; केव्हां केव्हां संन्यासवादी आणि धर्मवादी यांची विचारसरणी मान्य करून, पार्थिव जीवन गहर्य आहे, त्याज्य आहे असें मन म्हणतें आणि या पार्थिव जीवनांतून माघार घेऊन, या जीवनाहून अधिक सोईच्या व अधिक सुखाच्या जीवनाकडे तें धांव घेतें. पण मनाच्या पुढें असलेला प्रश्न सोडविण्याचा हा खरा मार्ग नव्हे; मनाच्या पलीकडे जें तत्त्व आहे, तें शोधून काढून तें आत्मसात् करणें हा खरा मार्ग आहे; या तत्त्वाचा कायदाच अमरत्व हा आहे; हें अमर तत्त्व आत्मसात् करून, आपलें मर्त्य जीवन अमर्त्य करणें, आपल्या जीवनाच्या

 

पान क्र. ४०२

 

मृत्युवशतेवर विजय मिळविणें हा खरा मार्ग आहे. अमर आत्म्याची अमर आकांक्षा अमर जीवनाच्या आश्रयानेंच पुरी होणार आहे; व हें अमर जीवन मनाच्या वरतीं अतिमानसाच्या क्षेत्रांत शक्य आहे, स्वाभाविक आहे.

विकासक्रमानें निर्मिलेल्या शरीर, प्राण व मन यांच्या विभक्तपणाबद्दल व विरोधाबद्दल वर सांगितलें. या विभक्ततेखेरीज, तिजपेक्षांहि मूलभूत अशी विभक्तता म्हणजे, प्रकृतीची शक्ति आणि जाणीवयुक्त अस्तित्व (पुरुष) यांजमधील विभक्तता होय. या विभक्ततेमुळें व तन्मूलक विरोधामुळें, स्वत:समोरील प्रश्न सोडविण्याच्या बाबतींतील, वर सांगितलेली मनाची असमर्थता उत्पन्न होते. मनाची असमर्थता मूलत: याच कारणामुळें उत्पन्न झाली आहे -- मानसिक, प्राणिक व शारीर या पुरुषांमध्यें वर सांगितल्याप्रमाणें विभक्तता आणि विरोध असून, शिवाय प्रत्येक पुरुष अंतर्गत विरोधानें भरलेला आहे. शरीराची शक्ति शारीर-पुरुषाच्या शक्तीपेक्षां कमी असते, प्राणिक शक्ति प्राणमय-पुरुषापेक्षां कमी असते आणि मानसिक शक्ति मनोमय-पुरुषाच्या शक्तीपेक्षां कमी असते; शारीर-पुरुष म्हणजे सहजभावना-पुरुष, प्राणमय पुरुष म्हणजे वासना-पुरुष, मनोमय पुरुष म्हणजे बुद्धिमय आणि भावनामय पुरुष. पुरुष किंवा आत्मा हा आंतरिक जाणिवेच्या रूपाचा असून, त्याला आपली इच्छा पूर्णतेनें पूर्ण करावीशी वाटते; ज्या आकाराच्या आश्रयानें तो असतो, त्या आकारांत अंतर्भूत असलेल्या शक्तीच्या आवांक्याबाहेर त्याची आकांक्षा असते. आंतरिक पुरुष आपल्या इच्छापूर्तीसाठीं या आकारांतर्गत शक्तीला सारखे धक्के देत असल्यानें, त्या पुरुषाच्या मागण्या पुरविणें तिला जड जातें. एवढेंच नव्हे, तर तिला आपलें सामर्थ्य क्रमाक्रमानें वाढविणेंहि अवघड होऊन बसतें. वर सांगितलेल्या तीन आंतरिक पुरुषांच्या मागण्या पुरविण्याच्या व्यवहारांत प्राकृतिक शक्ति मेटाकुटीस येते; ती सहजभावनेविरुद्ध सहजभावना, वासनेविरुद्ध वासना, हार्दिक भावनेविरुद्ध हार्दिकभावना, कल्पनेविरुद्ध कल्पना उभी करते आणि यापैकीं एखादीला संतुष्ट करावें, एखादीला अतृप्त ठेवून बाजूस सारावें, पुनर्विचार करून अतृप्ताची तृप्ति करावी, कांहींतरी तडजोड करावी, एक गोष्ट देतां आली नाहीं, तर तिच्या ऐवजीं भरपाईदाखल दुसरी एखादी गोष्ट द्यावी, पहिली तडजोड बिघडली, तर दुसरी तडजोड करून पहावी, असा अखंड व न झेपणारा व्यवहार प्राकृतिक शक्ति करीत राहते. पण सर्व गोष्टींचा सुंदर समन्वय

 

पान क्र. ४०३

 

साधणारें एकतेचें तत्त्व तिला सांपडत नाहीं. तसेंच तें, मनाला उपलब्ध असणाऱ्या जाणीवयुक्त शक्तीलाहि लाभत नाहीं -- कारण या शक्तीचें ज्ञान पुरें पडणारें नसतें, इच्छाशक्ति मर्यादित असते; -- आणि त्यांत पुन्हां हें मर्यादित ज्ञान व ही मर्यादित इच्छाशक्ति हीं तत्त्वें, एकमेकांशीं जुळतीं किंवा जुळवून घेणारीं नसतात; उलट त्यांचें वैमनस्यहि पुन्हां पुन्हां प्रकट होत असतें. इत्यर्थ हा कीं, मनाच्या वर, अतिमानसांत गेल्याशिवाय एकतेचें तत्त्व हाताला लागत नाहीं; एकतेचें तत्त्व तेथें आहे; सर्व भेदांना जाणीवपूर्वक एकसूत्रांत बांधणाऱ्या एकतत्त्वाची प्राप्ति तेथेंच होणार आहे; तेथें इच्छाशक्ति आणि ज्ञान या गोष्टी सारख्याच व्यापाच्या व दर्जाच्या आणि पूर्ण मेळानें वागण्याच्या अशा उपलब्ध होतील; त्या ठिकाणीं, जाणीव आणि शक्ति यांचा खालच्या पातळ्यांवरचा विरोध सर्वस्वीं नाहींसा होऊन, त्यांच्यामध्यें दिव्य समानता आणि सख्य, असलेलें किंवा उदयास आलेलें अनुभवास येईल.

मनुष्य ज्या प्रमाणांत आत्मजाणीवसंपन्न आणि खरोखरी विचारशील प्राणी होतो, त्या प्रमाणांत त्याला आपल्यांत व आपल्या घटकांत असणाऱ्या विसंवादाची, वैषम्याची, विरोधाची तीव्र जाणीव होऊं लागते; आपलें मन, प्राण, शरीर यांच्यामध्यें परस्पर मेळ उत्पन्न करण्यासाठीं तो झटतो; आपलें ज्ञान, संकल्पशक्ति आणि भावना यांचा मेळ व्हावा म्हणून तो प्रयत्न करतो; आपल्या सर्व घटकांत सुंदर सुसंवाद व्हावा व रहावा म्हणून खटपट करतो. या खटपटी करून कांहीं थोडी समाधानकारक व थोडी शांति देणारी तडजोड साधली, कीं बहुधा सामान्य मनुष्य अधिक भानगडींत पडत नाहीं. परंतु अशी तडजोड कांहीं मनुष्याच्या हृदयांतील ईश्वरी भूक पुरतेपणीं शांत करूं शकत नाहीं -- विकासमार्गावर थोडा विसांवा घेण्यापुरतीच ही तडजोड उपयोगी पडूं शकते; मनुष्याच्या हृदयांतील ईश्वर, तेव्हांच अंतिम समाधान पावेल, जेव्हां आमच्यांतील सर्व सुप्त शक्तींचा सर्वांगीण पूर्ण विकास होऊन, सर्वांमध्यें पूर्ण मेळ नांदूं लागेल. आमच्यापुढें, मानवापुढें जो प्रश्न आहे, त्याचें पूर्ण समाधान अशानेंच होणार आहे; यापेक्षां कांहींहि कमी असेल किंवा मनुष्य मध्येंच थांबेल तर त्यायोगें समोरील प्रश्न बाजूला सारल्यासारखें होईल -- प्रश्न सोडविल्यासारखें होणार नाहीं. थोडा वेळ विसांवा घेण्यासाठीं, पूर्णतेहून कांहीं कमी घेऊन मनुष्याला थांबतां येईल, परंतु मनुष्य सारखा वाढत असतां व चढत असतां त्याला कायमचें कोठेंहि मध्येंच थांबतां येणार

 

पान क्र. ४०४

 

नाहीं. वर निर्दिष्ट केलेली पूर्ण मेळाची अवस्था येण्यासाठीं, ज्या अगदीं आवश्यक गोष्टी हव्यात त्या म्हणजे : १) पूर्णतेस पोंचलेलें मन २) पूर्णतेस पोंचलेली प्राणशक्ति आणि ३) पूर्णतेस पोंचलेलें भौतिक अस्तित्व, या तीन होत. परंतु आम्हांला उपलब्ध असलेल्या अपूर्ण मनांत, प्राणांत व शरीरांत हें पूर्णतेचें तत्त्व आणि सामर्थ्य सांपडणें अशक्य आहे. मन हें विभक्तता आणि मर्यादितता यांनीं जन्मास घातलेलें आणि त्यांनीं व्यापलेलें आहे. विभागणाऱ्या व मर्यादा घालणाऱ्या मनाची, प्राण ही शक्ति असून, शरीर हें अशा मनाची भौतिक चौकट आहे -- अर्थात् अशा मनाकडून, प्राणाकडून व शरीराकडून पूर्णतेची अपेक्षा करतां येत नाहीं. मनाखालीं अर्धजागृत जाणिवेचा प्रांत आहे, तेथें पूर्णतेचें तत्त्व आणि सामर्थ्य आहे; पण तें कनिष्ठ मायेच्या पडद्याखालीं झाकलेलें आहे; आमच्या भवितव्याचें नि:शब्द स्वप्न म्हणून, सिद्ध न झालेलें आमचें साध्य म्हणून तें केव्हां केव्हां मनांत उपस्थित होतें, इतकेंच; मनाच्या वरचा जो अतिमानसिक प्रांत आहे, तेथें पूर्णतेचें तत्त्व आणि सामर्थ्य सिद्ध स्थितींत आहे, प्रकट अवस्थेंत आहे आणि आमची जणुं कांहीं वाटच पहात आहे; 'आमचें आत्मविषयक अज्ञान' एवढाच एक पडदा, त्याच्यामध्यें आणि आमच्यामध्यें आहे; तेव्हां आमच्या अस्तित्वाच्या घटकांमध्यें पूर्णता येण्यासाठीं जें समन्वयी सामर्थ्य आणि जें समन्वयी ज्ञान आम्हास हवें आहे, तें आम्ही आहों तेथे आम्हांला मिळणार नाहीं. मनाच्या खालीं जाऊनहि मिळणार नाहीं; तर आमच्या मनाच्या वरतीं प्रवास करूनच आम्हीं तें मिळवावयास हवें.

जसें स्वतःच्या अस्तित्वाच्या घटकांच्या बाबतींत, एकतेचें तत्त्व शोधून त्यांचा मेळ घालावा असें मनुष्याला वाटतें, तसेंच त्याचीं जगाशीं जीं नातीं आहेत, त्यांच्या बाबतींतहि त्याला वाटत असतें. या नात्यांत विसंवाद, अज्ञान यांचें साम्राज्य असतें, या साम्राज्याचा मनुष्याला वीट येतो; जसा जसा मनुष्याचा अधिकाधिक विकास होत जातो, तसा तसा अज्ञानाच्या आणि विसंवादाच्या जुलुमाचा त्याला अधिकाधिक वीट येऊं लागतो आणि मेळ, शांति, सुख व एकता यांचें तत्त्व हुडकून काढण्यासाठीं तो अधिकाधिक झटूं लागतो; हें शांतीचें, मेळाचें तत्त्व, मनाच्या वरतीं असलेल्या अतिमानसाच्या प्रांतांतच त्याला मिळू शकतें. मनुष्याचा आयुष्यक्रम व त्याचें जीवन त्याच्या सहचर जीवांच्या, सहचर भूतांच्या जीवनाशीं व आयुष्यक्रमाशीं एकरूप व्हावें आणि मानवी व्यक्तीला आपला

 

पान क्र. ४०५

 

विश्वव्यापी आत्मा परत मिळावा, हें आध्यात्मिक आणि व्यावहारिक दृष्टीनें मनुष्याच्या विकासाचें उद्दिष्ट आहे. आज आपली आणि इतरांचीं मनें, इच्छा, भावना, व प्राणिक शक्ति, अनेक तऱ्हेचा खोटेपणा, पाप, प्रमाद व विकृत व्यवहार करीत असतात; या सर्व अनिष्टांना थारा न देणारा, त्यांच्या प्रांताच्या वरील प्रांतांत स्वभावत: असणारा, प्रकाश आणि सत्याचा कायदा शिरोधार्य करून, आम्ही आपलें मन आणि इतर घटक समूळ बदलून टाकूं -- त्यांच्यांत क्रमश: विकास घडवून बदलून टाकूं -- तेव्हांच वर सांगितलेलें आमच्या विकासाचें उद्दिष्ट सिद्ध होणार आहे : आज आमचें मन दुसऱ्या मनांसंबंधानें अज्ञानांत आहे आणि त्यांजविषयीं भलते गैरसमज करून घेत आहे -- त्यांचीहि मनें अशींच आमच्या मनांसंबंधानें अज्ञानानें आणि अपसमजानें भरलेलीं आहेत; ही सर्व परिस्थिति पालटावयास हवी. आमच्या मनाला जशी आपली स्वतःची माहिती असते, तशी त्याला इतरांच्या मनाची माहिती असली पाहिजे; इतरांच्या मनाविषयीं अज्ञान आणि अपसमज ज्यांत नाहींत असें मन आणि त्यांच्यासंबंधानें खरें पूर्ण ज्ञान आहे असें मन, क्रमश: आम्हीं आमचे ठिकाणीं बनविलें पाहिजे; इतरांच्या इच्छांशीं एकरूप होणारी, इतरांच्या इच्छा स्वतःच्याच इच्छा आहेत असें जिला वाटते अशी इच्छा, आमच्या ठिकाणीं आम्हीं विकसित केली पाहिजे; आमचें भावनात्मक हदय, स्वतःच्या भावनांबरोबर तितक्याच आपुलकीनें इतरांच्याहि भावना साठवणारें, असें आम्हीं बनविलें पाहिजे; प्राणिक शक्ति आमचे ठिकाणीं अशी असली पाहिजे कीं, तिनें इतरांच्या प्राणिक शक्ती स्वतःच्याच आहेत असें जाणीवपूर्वक समजून, त्यांची इष्ट परिपूर्ति स्वतःच्या शक्तीच्या प्रमाणें करावयास झटलें पाहिजे; आमचें शरीरहि, आम्हांला जगापासून दूर ठेवणारें व आम्हांला तुरुंगाप्रमाणें असणारें न राहील, अशा तऱ्हेचें आम्ही बनविलें पाहिजे -- वर उल्लेखिलेला प्रकाशाचा आणि सत्याचा कायदा शिरोधार्य करून, या सर्व गोष्टी आम्हीं घडवून आणल्या पाहिजेत; असें केल्यानेंच वर सांगितल्याप्रमाणें आमचा विश्वात्मा आम्हांला पुनरपि लाभेल, आमचें मानवी जीवन, आध्यात्मिक व व्यावहारिक दृष्टीनें आमच्या सहचर भूतांच्या जीवनांशीं एकरूप होईल. मनाच्या खालच्या क्षेत्रांत, अर्धजागृत जाणिवेच्या क्षेत्रांत विश्वात्मा कार्य करीत आहे आणि मनाच्या वरतीं असलेल्या अतिमानसाच्या क्षेत्रांतहि विश्वात्मा कार्य करीत आहे; पण दोन्हीकडील परिस्थिति पाहतां, विश्वात्मा आमचा करण्यासाठीं खालीं

 

पान क्र. ४०६

 

प्रवास करण्याचें मनांत न आणतां, आम्हीं वरतीं प्रवास करण्याचें ठरविलें पाहिजे, असा निष्कर्ष निघतो. कारण ज्या मूळ प्रेरणेनें आमचा विकासशील आत्मा, आमच्या आजच्या मानवतेपर्यंत विकासमार्गानें विकास करीत आणला आहे, ती प्रेरणा आम्हांला आमच्या अस्तित्वाच्या विरळांत विरळ, सर्वश्रेष्ठ आकाशरूपी भागाकडे नेणारी आहे; तेथें असलेल्या ईश्वरी तत्त्वाकडे, शाश्वत प्रकाशाच्या सागरांत वसत असलेल्या दिव्य प्रकृतीकडे, देवदेवाकडे ती नेणारी आहे. (ऋग्वेद ३.२२.३) तमावर तमाचें पांघरूण असलेल्या सर्व तमोमय अशा दुसऱ्या सागरांत -- नेणीवेच्या सागरांत -- लपून असलेल्या दिव्य प्रकृतीकडे, देवदेवाकडे ती मूळची विकासप्रेरणा आत्म्याला नेत नाहीं. (ऋग्वेद १०.१२९.३)

तेव्हां मानवता, मानवजात बाजूला पडून, वर उल्लेखिलेली सिद्धि निर्माणोत्सुक, निर्माणकष्टप्रिय प्रकृतिमातेच्या दुसऱ्या नव्या भूतसृष्टीसाठीं राखून ठेवली जावयाची नसेल, तर आजच्या मानवानें उत्साहानें ध्येयनिष्ठ बनून, वर उल्लेखिलेली सिद्धि जेथें प्राप्त होणार आहे त्या उच्च स्थानावर जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे -- असा प्रयत्न तो निश्चितपणें करीलच. या चढण्याच्या प्रयत्नांत, मानवाला प्रेमांतून, मानसिक प्रकाशांतून व सत्तेच्या आणि आत्मदानाच्या प्राणिक प्रेरणेतून जावें लागणार आहे; पण प्रेमादिकांच्या क्षेत्रांत त्याचा विकास संपत नाहीं -- त्याची इष्टसिद्धि होत नाहीं; त्या सिद्धीसाठीं प्रेमादिकांच्या पलीकडे, अतिमानसिक अद्वैताच्या क्षेत्रांत त्यानें पाऊल टाकून स्थायिक झालें पाहिजे -- हें क्षेत्र प्रेमादिकांची परिपूर्ति करणारें आहे आणि त्यांच्या पलीकडची सिद्धि देणारें आहे. मानवतेच्या कल्याणासाठीं, मुक्तीसाठीं अतिमानसिक सिद्धि व अतिमानसिक क्षेत्रांतील महान् अनुभूति हा मानवी जीवनाचा पाया असणें अवश्य आहे. अतिमानसिक क्षेत्रांत, एकच एक सच्चिदानंदाशीं जाणीवपूर्वक एकरूपता आणि सर्व भूतांशीं जाणीवपूर्वक एकरूपता प्रत्येक व्यक्तीच्या अस्तित्वाच्या सर्व घटकांत अनुभवास येते -- या अतिमानसिक अनुभूतीवर मानवी जीवन आधारलेलें असण्यांत मानवतेचें अंतिम कल्याण आहे, अंतिम मुक्ति आहे. विकासमार्गानें दैवी प्रकृतीकडे, देवदेवाकडे जीवन चढून जात आहे; या चढण्याच्या कार्यक्रमांत चौथी जीवनावस्था म्हणून जी पूर्वीं आम्हीं वर्णिली ती अवस्था म्हणजे वरील अतिमानसिक अद्वैतानुभूतीवर आधारलेले जीवन ही होय.

 

पान क्र. ४०७

 









Let us co-create the website.

Share your feedback. Help us improve. Or ask a question.

Image Description
Connect for updates