Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics, expounding a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth.
Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.
प्रकरण एकविसावें
जीवनाची ऊर्ध्वगति
पवित्र शब्दाचा मार्ग मार्गस्थांना देवतांकडे घेऊन जावो, हा मार्ग मनाच्या व्यापाराच्या द्वारां मार्गस्थांना आपोदेवतांकडे घेऊन जावो.
- ऋग्वेद १०.३०.७
हे ज्वाले ! स्वर्गरूपी सागराकडे तूं जातेस, देवतांकडे तूं जातेस; भिन्न लोकांतल्या देवता एकत्र भेटतील असें तूं करतेस, सूर्याच्या वरतीं असलेल्या प्रकाशमय क्षेत्रांत असणाऱ्या आपोदेवता आणि येथें खालीं असणाऱ्या आपोदेवता या एकत्र भेटतील असें तूं करतेस.
- ऋग्वेद ३.२२.३
आनंदाचा स्वामी तिसरें स्थान हस्तगत करतो; विश्वमय आत्म्याच्या इच्छेनुसार हा स्वामी विश्वाचें रक्षण करतो, विश्वाचें शासन करतो; श्येन किंवा गरुड एखाद्या पात्रावर बसतो व तें वर उचलतो, त्याप्रमाणें हा स्वामी विश्वरूपी पात्रावर बसून तें वर उचलतो; तो प्रकाश शोधून काढतो, चवथें स्थान आविष्कृत करतो आणि तेथें असणाऱ्या सागराला (जलकल्लोळांनीं हेलावत असलेल्या सागराला) चिकटून राहतो.
- ऋग्वेद ९.९६.१८.१९
विष्णूनें तीन पावलें टाकलीं; मूळ मृत्तिकेवर त्याचें पहिलें पाऊल होतें; तेथून आरंभ करून, आपलें पाऊल मृत्तिकेंतून वर उचलून, त्यानें तीन पावलें टाकलीं; विष्णु सर्व विश्वाचा रक्षणकर्ता आहे, तो अजिंक्य आहे; तीन पावलांनीं व्यापलेल्या त्रिलोकरूप विश्वाचे कायदे, त्रिलोकींच्या पलीकडे राहून तो विश्वांत चालवितो, उचलून धरतो; विष्णूचे व्यवहार बारकाईनें तपासा; या व्यवहारांचे नियम त्यानें कोठून आविष्कृत केले आहेत तें पहा; तें ठिकाण त्याचें सर्वात उंच टाकलेलें पाऊल आहे -- द्रष्ट्या ऋषींना तें नित्य दिसतें, स्वर्गांत दिव्य चक्षु सर्वत्र व्यापून असावा, असें तें विष्णूचें उंचांत उंच पाऊल, उंचांत उंच स्थान द्रष्ट्या ऋषींना नित्य
पान क्र. ३७०
दिसतें; ज्यांना अंतर्ज्ञान लाभलेलें आहे, ज्यांना जागृति आलेली आहे, ते विष्णूच्या सर्वोच्च पावलाचें तें स्थान (आपल्या प्रकाशानें, तेजानें) प्रकाशमय तेजोमय करतात.
- ऋग्वेद १.२२.१७ ते २१
विभक्त मर्त्य मन आणि विभजन करणाऱ्या मनाची क्रियाशील अशी जी जीवनशक्ति किंवा प्राणशक्ति यांचें स्वरूप आपण पाहिलें. विभक्त मन हें मर्यादा, अज्ञान, जीवनांतील द्वंद्वें यांच्या उगमस्थानीं आहे; तें अतिमानसाची केवळ अंधकारमय (अज्ञानमय) छाया आहे; आमच्या विश्वाचें आरंभींचें रूप, अतिमानसिक जाणिवेचें, स्वयंप्रकाश दिव्य जाणिवेचें नांवहि जेथें नाहीं अशा प्रकारचें, दिसावयाला दिसतें, तें पूर्ण नेणिवेनें भरलेलें, जाणिवेच्या विरोधी असें दर्शनीं असतें; या प्राथमिक दर्शनीं नेणीवमय विश्वरूपाशीं प्राथमिक व्यवहार करतांना अतिमानस, हें मनाचा -- आपल्या छायेचा -- उपयोग करीत असतें. ही विभक्त विनाशी मनाची गोष्ट झाली. अशीच विभक्त जीवनशक्तीची गोष्ट आहे. आपल्या भौतिक विश्वांतून जीवनशक्ति, प्राणशक्ति वर येते; जडद्रव्यांत बंद असलेल्या, बुडालेल्या नेणीवमय विभजनपर मनाची क्रियाशील शक्ति, हे भौतिकांतून वर येणाऱ्या, आविष्कृत होणाऱ्या या जीवनशक्तीचें - जीवशक्तीचें स्वरूप असतें; ही जीवशक्ति मरण, क्षुधा, असामर्थ्य यांचें उगमस्थान आहे; ही शक्ति, दिव्य अतिमानसिक शक्तीची केवळ नेणीवमय छाया आहे -- अमरता, तृप्तिपूर्ण आनंद, सर्वसमर्थता हीं मूळ दिव्य अतिमानसिक शक्तीचीं लक्षणें आहेत. दिव्य अतिमानसिक जाणिवेचें, तिच्या शक्तीचें आणि मर्त्य विभक्त संसारी मानवी मनाचें व प्राणाचें (जीवनाचें) हें जें अन्योन्यविषयक नातें आहे, त्यावरून विश्वाची महान् प्रक्रिया, अर्थात् विश्वाचें भाग असे आम्ही, त्या आमच्या विकासाची प्रक्रिया ठरते. आमच्या विकासाचा आरंभ, मध्य आणि अंतिम टप्पा वरील नातें ठरवितें. जीवनाचा आरंभ, अर्थात् आमच्या विकासाचा आरंभ पाहतां, त्या आरंभींच्या जीवनाचीं लक्षणें पुढीलप्रमाणें असतात. तेथें विभागणी असते, एकतत्त्वाचें एकत्व मोडून अनेक विभक्त वस्तू झालेल्या असतात; या वस्तूंचे ठिकाणीं नेणीवव्याप्त इच्छाशक्ति असते, तिच्या मागें जड शक्तीचा चाबूक असतो; ती प्राथमिक इच्छाशक्ति जडशक्तीकडून हांकली जात असते, अर्थात् तिचें दर्शनी रूप 'इच्छा' हें रहातच नाहीं, 'भौतिक
पान क्र. ३७१
जडशक्तीची जडमूक उसळी' हें त्या 'इच्छेचें' स्वरूप असतें; या प्राथमिक 'जीवनाचें' आणखी एक लक्षण असें असतें कीं, कोणतेंहि रूप (वस्तुरूप) आणि त्याची परिस्थिति यांजमध्यें जीवनाच्या अबाधित नियमानुसार जो शक्तिविनिमय होत असतो, त्या विनिमयावर भौतिक यांत्रिक शक्तींची अधिसत्ता चालते आणि या स्वतांतील व परिसरांतील सत्ताधीश असणाऱ्या यांत्रिक शक्तींपुढें वस्तुरूपाला मान लववावी लागते, त्या नेतील तिकडे मुकाटयानें, प्रतिकार न करतां जावें लागतें; अर्थात् प्राथमिक जीवनाचें तिसरें लक्षण, असामर्थ्य, दुर्बळता हें असतें. जडविश्वाचें जें चित्र भौतिक शास्त्रज्ञ पाहतो, त्यांत नेणीव, ज्ञानशून्यता आणि महाशक्तीचें सामर्थ्यशील व प्रभावी परंतु जाणीवशून्य कार्य त्याला दिसतें; भौतिक शास्त्रज्ञाला पायाभूत अस्तित्वाच्या सर्व क्षेत्रभर, जाणीवशून्य महाशक्तीचा प्रभाव दिसतो. जडांत जी जाणीव उद्भवलेली दिसते, ती म्हणजे नेणीवच स्वतः जाणीव झालेली असते; जीवन हें नेणीवव्याप्त व यांत्रिक आहे असें त्याचें ठाम मत असतें. असो. जी जीवनशक्ति, जीवशक्ति किंवा प्राणशक्ति वस्तुरूपांत बंद असते, ती त्या रूपांतून बाहेर येते, व्यक्त होते आणि हळूहळू जाणीवयुक्त मनाच्या उदयाची ती भूमि बनते; व्यक्त झालेल्या जीवनशक्तीचीं लक्षणें, जडांतील अव्यक्त जीवनशक्तीच्या लक्षणांपेक्षां श्रेष्ठ व वेगळीं असतात. अव्यक्त जीवनशक्ति हा आमच्या विकासाचा आरंभ किंवा पहिला टप्पा आणि व्यक्त जीवनशक्ति हा दुसरा किंवा मधला टप्पा होय. या दुसऱ्या किंवा मधल्या टप्प्यांत जीव मरणाधीन दिसतो आणि आम्हांला असेंहि दिसतें कीं, जीव परस्परांना भक्षण करतात, त्यांना क्षुधा, जाणीवयुक्त वासना असतात; आपलें क्षेत्र मर्यादित आहे अशी भावना त्यांना असते, आपलें सामर्थ्यहि मर्यादित आहे असें त्यांना कळतें; ते आपली मत्ता वाढविण्यासाठीं, विस्तृत करण्यासाठीं, परिसरावर विजय मिळविण्यासाठीं आणि त्याला आपल्या सत्तेखालीं आणण्यासाठीं झगडत असतात. डार्विनच्या जीवनविषयक उपपत्तीची, विकासकल्पनेची इमारत ज्या पायावर उभारलेली आहे, त्या पायाच्या अंगभूत अशा गोष्टी म्हणजे व्यक्त जीवशक्तीचीं वर सांगितलेलीं लक्षणें होत. जीवन म्हणजे झगडा -- अंगीं झगडण्याची शक्ति कमीअधिक असेल, तिजवरून जीवाची जीवनांतील यशस्विता ठरते. जो टिकण्यास अधिक लायक असेल, तोच जीवनाच्या झगड्यांत टिकतो; जीवाजीवांच्या झगड्यांत तो जीव टिकतो, जो टिकण्यास सर्वांत
पान क्र. ३७२
अधिक लायक असतो -- असा डार्विनचा विकासविषयक सिद्धान्त आहे. हा सिद्धान्त डार्विननें व्यक्त जीवशक्तीच्या लक्षणांवरून निश्चित केला. मरण हें व्यक्त जीवशक्तीचें लक्षण घ्या. मरण या घटनेंत, मरण टाळून टिकून राहण्याकरितां जीव झगडत असतो; या घटनेंत मरणाच्या अक्रियात्मक पडद्याआड राहून जीवन आपलें क्रियात्मक अस्तित्व मरणरहित, अमर व्हावें म्हणून त्याला झगडवीत असतें. जीवशक्तीचें दुसरे लक्षण क्षुधा आणि वासना. या लक्षणाच्या क्रियेंतहि झगडा असतो. आपली क्षुधा तृप्त व्हावी, आपली जीवनस्थिति सुरक्षित व्हावी यासाठीं जीवाचा हा झगडा असतो; वासना ही एक प्रेरक शक्ति असते, या प्रेरकशक्तीच्या द्वारां, जीवन हें आपल्या क्रियात्मक अस्तित्वाला, अतृप्त क्षुधारूपी अ-क्रिय अवस्थेंतून बाहेर पडून, अस्तित्वाचा आनंद पुरेपूर मिळविण्यासाठीं झगडवीत असतें. मर्यादित सामर्थ्य हें लक्षण घ्या. येथें विस्तारासाठीं झगडा असतो; आपल्या स्वतःवर व आपल्या परिसरावर विजय मिळवावा व तें आपल्या आधीन करून घ्यावें, यासाठीं येथें झगडा खेळला जातो; कारण वासना आणि उणीव या गोष्टी जीवनाची पडती बाजू दाखवितात -- या पडत्या बाजूला पुढें करून, जीवन हें आपल्या चढत्या बाजूला या पडत्या बाजूच्याद्वारां प्रेरणा देतें आणि त्याला आपली कमतरता पूर्णपणें दूर करण्यासाठीं, जी पूर्णता त्याला सदैव मिळवितां येण्यासारखी असते ती त्यानें मिळवावयासाठीं, त्याला झटावयास, झगडावयास लावतें. 'जीवनासाठीं झगडा' हा केवळ प्राणरक्षणार्थ झगडा नसून, आपली मत्ता वाढविण्यासाठीं, आपली उणीव दूर करून पूर्णता मिळवण्यासाठींहि तो असतो; कारण आपल्या परिसरांतल्या गोष्टींवर कमीअधिक ताबा मिळवूनच जीवाला आपलें अस्तित्व टिकवितां येतें ही गोष्ट उघड आहे -- मग हा ताबा परिस्थितीशीं मिळतें घेऊन मिळवा किंवा परिस्थितीला मुरड घालून मिळवा; परिस्थितीला मान्यता देऊन व चुचकारून मिळवा किंवा तिच्यावर विजय संपादून आणि तिच्यांत बदल घडवून आणून मिळवा. परिस्थितीवरचा ताबा, जीवाला आपलें अस्तित्व टिकविण्यास साहाय्यक होतो, हें जसें खरें आहे तसेंच हेंहि खरें आहे कीं, जीवाची पूर्णता जसजशी वाढते, तसतशी त्याला पुष्कळ काळपावेतों अखंडत्वानें जीवन जगण्याची शक्ति येते, नित्य जीवनाचीहि शक्यता या पूर्णतेच्या विशिष्ट वाढीनें उत्पन्न होते. जीवनाच्या झगड्यांत सर्वांत अधिक लायक असेल, तो सर्वांत अधिक टिकेल, या
पान क्र. ३७३
डार्विनच्या सूत्रांत हा वरील अर्थ भरलेला आहे.
परंतु डार्विनच्या सिद्धान्तांतील हा सर्व अर्थ भौतिक शास्त्रज्ञांच्या लक्षांत आला नाहीं. जड द्रव्यांतील अस्तित्वाला आणि त्यांतील सुप्त, यांत्रिक जाणिवेला लागूं असणारें, नेणिवेच्या परावलंबित्वाचें यंत्रतत्त्व त्यांनीं जडांतून उदयास येणाऱ्या जीवनालाहि लावलें -- जीवन हें जडतत्त्वाहून वेगळें तत्त्व असून, जडाच्या यांत्रिक अस्तित्वाचें कार्य आपल्या सत्तेनें चालविणें, आपल्या सोईनें चालविणें हें या नव्या तत्त्वाचें जन्मसिद्ध कार्य आहे, सहजधर्म आहे ही गोष्ट ज्याप्रमाणें वैज्ञानिकांच्या लक्षांत आली नाहीं, त्याप्रमाणेंच डार्विनच्या सूत्राची व्याप्तीहि त्यांनीं मर्यादेबाहेर नेली; जीवन आक्रमक आहे, व्यक्तिजीवन स्वयंपरायण आहे हें त्या सूत्रांतील तत्त्व त्यांतील आत्मरक्षणाचें, आत्मसत्ता स्थापनेचें, आक्रमकपणाचें वा सहजप्रेरणेचें तत्त्व त्यांनीं मर्यादेबाहेर लागूं केलें. वस्तुत: जडाचें यांत्रिक जीवन आणि जडाधिष्ठित अ-यांत्रिक जीवन, या दोन जीवनावस्थांच्या पोटीं एका तिसऱ्या तत्त्वाचा, तिसऱ्या अवस्थेचा श्रीगणेशा, बीजभाव असतो; या बीजभावाचा हळूहळू विस्तार होतो; शुद्ध जडांतून आणि प्राणयुक्त जडांतून वर येऊन मन जसजसें त्याचा स्वतःचा सहजधर्म अनुसरावयास लागतें, तसतशी जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेची प्रगति हळूहळू होत जाते. प्राणांतून विकसित होणारें मन आपल्या स्वतःच्या खास कायद्यानें चालू लागले म्हणजे तिसरी जीवनावस्था प्रगत होते आणि दुसऱ्या अवस्थेंतील गोष्टींत पुष्कळच बदल होतो -- जेव्हां मनाचा विकास होऊन तें अतिमानसाचा, आत्म्याचा टप्पा गांठतें, तेव्हां हा बदल आणखी कितीतरी वाढतो. जीवनाची टिकून राहण्याची, शाश्वत टिकून राहण्याची सहजभावना व धडपड एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला या धडपडीला विरोध करणारा मरणाचा कायदा -- अशी वस्तुस्थिति असल्यानें व्यक्ती ज्या जातीच्या असतात, ती जात टिकून रहावी यासाठीं, व्यक्तींकडून वैयक्तिक जीवन उपयोगांत आणलें जातें; असें करणें व्यक्तीला भाग पडतें; पण व्यक्तीला ही गोष्ट दुसऱ्या व्यक्तींच्या सहकार्याशिवाय करतां येत नाहीं. प्रेमतत्त्वाच्या उदयाला ज्या अनेक गोष्टी कारण होतात, त्यांत वरील सहकार्य ही एक गोष्ट आहे. सहकाराचें, परस्पर साहाय्याचें, दुसऱ्यांच्या इच्छेला मान देण्याचें तत्त्व, पत्नीची, अपत्याची, मित्राची, मदतगाराची, आपल्या संघाची इच्छा शिरोधार्य करण्याचें तत्त्व, मिळून मिसळून वागण्याचा अभ्यास, इतरांशीं बुद्धि-
पान क्र. ३७४
पुरस्सर मेळ करण्याचा अभ्यास, इष्ट गोष्टींची परस्परांनीं परस्परांत मनःपूर्वक देवघेव करण्याचा अभ्यास -- या गोष्टी प्रेमतत्त्वाच्या बीजाचे ठिकाणीं आहेत; यांतूनच अखेर प्रेमतत्त्व उदयास येतें. प्रारंभीं या प्रेमतत्त्वाचें स्वरूप विस्तृत स्वार्थ अथवा स्वार्थाचा विस्तार असें असतें. विकासाच्या वरच्या पायऱ्यांवरहि विस्तृत स्वार्थ या स्वरूपांतच प्रेमाचें राज्य चालतें -- आजहि असें राज्य चालूं आहे. तथापि मनाचा अधिकाधिक विकास होईल, त्याचें खरें स्वरूप त्याला कळूं लागेल व जीवनाचा प्रेमाचा, परस्पर सहकाराचा अनुभव त्याला येईल; त्याप्रमाणेंच त्याला हीहि गोष्ट पटेल कीं, निसर्गांत व्यक्ति किंवा व्यष्टि म्हणून जी आहे, ती समष्टीहून खालच्या दर्जाची सत्ता आहे आणि समष्टीच्या, विश्वसमष्टीच्या साह्यानेंच व्यष्टीचें जीवन चालणें शक्य होतें; ही गोष्ट एकदां मनुष्याला, मनयुक्त जीवाला कळली (आणि ही गोष्ट त्याला अपरिहार्यपणें कळणारच) कीं त्याची पुढली जीवनकथा, नियत, निश्चित झाली असें समजावें; कारण विश्वसमष्टीचें व व्यष्टीचें नातें लक्षांत आलें कीं, मनाला हें स्पष्ट होतें कीं, त्याजहून श्रेष्ठ असें कांहीं आहे; आणि त्या क्षणापासून त्या श्रेष्ठ वस्तूच्या दिशेनें, आत्म्याच्या दिशेनें, अतिमानसाच्या दिशेनें मनुष्याचा विकास अटळपणें होऊं लागतो -- मग हा विकास कितीहि सावकाशपणें होवो, कितीहि अजाणतां होवो.
तेव्हां जीवनाचा असा स्वभावच दिसतो कीं, त्याचा विकास होत होत तें पहिल्या अवस्थेंतून दुसरींत व दुसरींतून तिसरींत अपरिहार्यपणें जावयाचें असतें. त्याच्या आत्मव्यक्तीकरणाच्या गोष्टी, पहिल्या व दुसऱ्या अवस्थेहून तिसऱ्या अवस्थेंत भिन्न असतात; या अवस्थेचा, जीवनाच्या या उन्नतावस्थेचा विचार केला, तर या अवस्थेंतील त्याचीं कार्यें पहिल्या अवस्थांतील कार्यांच्या अगदीं उलट असतात; त्या कार्यांची परिणति, रूपांतर, परिपूर्णता या तिसऱ्या अवस्थेंतील कार्यांच्या रूपानें होते असें म्हणावें लागतें. अतिशय विभागलेलें जडद्रव्य व त्याचे बनविलेले अतिशय कठीण आकार, यापासून जीवनाचा आरंभ होतो; अणु हा कठिणपणाचा आणि बारीक विभागणीचा नमुना आहे; अणु हा सर्व जड आकारांचा पाया आहे. अणु हा दुसऱ्या अणूंशीं संयोग पावतो, तेव्हांहि तो दुसऱ्या अणूंशीं एकरूप होत नाहीं -- अलग राहून ''एक होतो''; त्याच्या विनाशासाठीं, विघटनेसाठीं कशीहि शक्ति खर्च केली, तरी त्याचा विनाश वा विघटन होत नाहीं -- दुसऱ्यांशीं मिसळून एकरूप होण्याचें जें
पान क्र. ३७५
तत्त्व निसर्गामध्यें आहे, त्याला विरोध करून अहम्, विभक्त मी, आपलें अस्तित्व टिकवीत असतो -- त्या मीचा केवळ भौतिक नमुना म्हणजे अणु होय. परंतु निसर्गामध्यें विभागणी किंवा भेद या प्रभावी तत्त्वाप्रमाणेंच एकता हेंहि एक तितकेंच प्रभावी तत्त्व आहे. एकता हें प्रमुख तत्त्व असून, अनेकता किंवा विभागणी हें त्या प्रमुख तत्त्वाच्या अंकित असणारें गौणतत्त्व आहे; म्हणून विभक्त असणारा प्रत्येक आकार एकतेच्या तत्त्वाला कोणत्या तरी प्रकारें प्रमुख म्हणून मान देऊन आपलें गौणत्व मान्य करीत असतो व असें त्याला करावेंच लागते : आपलें गौणत्व किंवा अंकितत्व तो यांत्रिक आवश्यकतेच्या रूपानें मान्य करील, त्याच्यावर झालेल्या सक्तीमुळें मान्य करील, त्याची समजूत घातली गेल्यामुळें राजीखुशीनें मान्य करील -- अशा कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारें विभक्त आकार, एकतेचें प्रभुत्व व आपलें अंकितत्व मान्य करीत असतो. सामान्यत: विघटनद्वारां दुसऱ्यांत सर्वस्वीं मिळून एक होण्याच्या क्रियेला विरोध करण्याची शक्ति निसर्ग स्वतःच्या कांहीं हेतूसाठीं अणूला देतो; त्याचा हेतु प्रमुखतः असा असतो कीं, त्याला जे संयुक्त पदार्थ तयार करावयाचे असतात, ते तयार करण्यासाठीं घट्ट असा पायाघटक मिळावा, म्हणूनच अणूला तो कठीणपणा देतो. निसर्गाला विविध आकार तयार करावयाचे असतात, त्या आकारांसाठी ठाम स्वरूपाचें बीज असावें म्हणून अणूला तो कठीणपणा देतो; विघटनाच्याद्वारां दुसऱ्यांत मिळून जाऊन, एकरूप होण्याची क्रिया अणूला निसर्ग करावयास लावीत नाहीं -- तथापि दुसऱ्याशीं एकता करण्याची दुसरी क्रिया, संघटनाची क्रिया मात्र निसर्ग त्यास करावयास लावतो. अणु हा निसर्गांत पहिला संघटित आकार, पहिला संघात आहे -- आणि संघटनात्मक एकता ज्यांत आहे असे आकार निर्माण करण्याचा प्रथम संघात, मूळ पायाघटक अणु हा आहे.
जीवनाच्या विकासाच्या पहिल्या अवस्थेचें स्वरूप येथवर आपण पाहिलें. जीवनाला विकासक्रमानें जेव्हां दुसरी अवस्था येते -- या दुसऱ्या अवस्थेला प्राणमयता, जीवता, प्राण म्हणून आपण ओळखतों -- तेव्हां भौतिक अवस्थेच्या उलट प्रकार आपणास पहावयास मिळतो; प्राणमय मीचा भौतिक आधार या दुसऱ्या अवस्थेंत विघटनाच्या क्रियेनें मोडून टाकला जातो -- ही विघटनाची क्रिया प्राणमय मीच्या भौतिक देहावर लादली जाते; या भौतिक देहाचे घटक विघटनानें अलग अलग केले जातात -- एका जीवाचे भौतिक घटक दुसऱ्या जीवांच्या देहांच्या बनावटीसाठीं
पान क्र. ३७६
वापरलें जातात; हा निसर्गाचा कायदा किती व्यापक आहे याची ओळख अद्यापि आम्हांला पूर्णतेनें झालेली नाहीं. जोंपावेतों मानसिक जीवन, आत्मिक जीवन यासंबंधींचें आमचें शास्त्र भौतिक जीवनाच्या आणि जडाच्या अस्तित्वाच्या शास्त्राइतकें विश्वसनीय बनलेलें नाहीं, तोंपावेतों वरील नैसर्गिक नियमाची व्याप्ति किती आहे हें आम्हांला पूर्णपणें कळणारहि नाही. तथापि आम्हांला ढोबळपणें असें म्हणतां येतें कीं, जसे आमच्या भौतिक देहाचे घटक, आमच्या जिवंतपणीं आणि आम्ही मेल्यावर, दुसऱ्यांच्या जीवनांत प्रवेश करतात, तसेच आमच्या सूक्ष्म प्राणमय देहाचे, आमच्या जीवनशक्तीचे घटक व आमच्या विविध शक्तींचे, झगड्यांचे, तीव्र संवेदनांचे व इच्छांचे घटक, दुसऱ्यांच्या जीवनांत, आमच्या जिवंतपणीं व आमच्या मरणानंतर प्रवेश करीत असतात. प्राचीन गुप्तविद्या असें सांगते कीं, भौतिक देहाप्रमाणें आम्हांला प्राणमय देह असतो आणि हा प्राणमय देह आमच्या भौतिक देहाच्या मरणानंतर विनाश पावतो आणि त्याच्या घटकांतून दुसरीं प्राणमय शरीरे बनविलीं जातात; ती विद्या असेंहि सांगते कीं, आम्ही जिवंत असतो तेव्हां आमच्या जीवनशक्ती अखंडपणें दुसऱ्या जीवांच्या जीवनशक्तींशीं मिसळत असतात. असाच नियम आमच्या मानसिक जीवनाच्या संबंधांतहि आहे. दुसरे जे विचारवन्त प्राणी आहेत, त्यांचें मानसिक जीवन आणि आमचें मानसिक जीवन हें, आमच्या आणि त्यांच्या जिवंतपणीं व मृत्यूनंतर एकमेकांत मिसळत असतें. मनाचे मनावर सारखे आघात होत असतात; मनाचें विघटन होणें, मनाच्या घटकांचें विखरून जाणें व त्या घटकांतून नव्या मनाची बांधणी होणें या क्रिया सारख्या चालूं असतात; मनामनाचे घटक एकमेकांत प्रविष्ट होणें एकमेकांशी मिळून एकरूप होणें, याहि क्रिया अखंडपणें चालूं असतात. जीवनाची प्रक्रिया, जीवनाचा अबाधित नियम असाच आहे कीं, जीवा-जीवांचे घटक एकमेकांत प्रविष्ट व्हावे, मिसळावे, एकमेकांशीं एकरूप व्हावे.
जीवनांत दोन विरुद्ध तत्त्वें काम करीत असतात, असें वरील हकीकतीवरून लक्षांत आलेंच असेल. एक तत्त्व हें कीं, स्वतःच्या इच्छेनें किंवा नैसर्गिक आवश्यकतेच्या दडपणानें, विभक्त मी, आपलें वेगळेंपण संभाळून आपलें वैशिष्ट्य टिकवून राहूं पहात असतो; दुसरें तत्त्व हें कीं, या विशिष्टत्व टिकवूं पहाणाऱ्यां 'मी' ला, दुसऱ्या 'मीं' शी एकरूप होऊन जाण्याची सक्ती निसर्ग करीत असतो. भौतिक विश्वांत, पहिल्या विशिष्टत्व टिकविण्याच्या प्रेरणेवर, तत्त्वावर निसर्ग जोर देतो; कारण टिकाऊ
पान क्र. ३७७
असे आकार त्या विश्वांत त्याला बनवावयाचे असतात. विकासक्रमांतील पहिलें आणि सर्वांत अतिशय कठीण असें निसर्गाचें कर्तव्य म्हणजे, विभक्त व्यष्टीचें विभक्तपणें जीवन घडविणें व टिकविणें आणि त्यासाठीं टिकाऊ असा आकार, देह तयार करणें हें असतें; विश्वांत शक्ति सारखी गतिमान् आहे, सारखी बदलत आहे आणि अनंत सत्ता ही सर्वव्यापी एकतेनें नांदत आहे; अशा परिस्थितींत विभक्तपणा आणि विभक्ततेचा टिकाऊपणा निर्माण करणें हें अतिशय अवघड कार्य आहे, यांत तिळमात्र संशय नाहीं. तेव्हां निसर्ग आपलें प्राथमिक कर्तव्य करण्यासाठीं अणुजीवनांत व्यष्टीचें टिकाऊ रूप बनवितो; व्यष्टिरूप अणु हा पुढील सर्व रचनांचा पाया असतो; हे अणु दुसऱ्या अणूंशीं जोडले जाऊन या संयुक्त अणुघटित देहांचें कमीअधिक दीर्घकालीन अस्तित्व, निसर्गयोजनेनुसार प्राणमय आणि मनोमय व्यष्टीच्या अस्तित्वाचा पाया म्हणून उपयोगिलें जातें. निसर्गाचें हें कार्य ठीकपणें पार पडलें, त्याच्या पुढील योजनेच्या दृष्टीनें बरीचशी टिकाऊ स्थूल देहरचना, बरीचशी टिकाऊ प्राणमय आणि मनोमय व्यष्टि तयार झाली म्हणजे, आपली पुढील योजना निसर्ग अंमलांत आणतो, आतांपर्यंत व्यष्टिदेह टिकाऊ करण्याकडे त्यानें लक्ष पुरविलें होतें तें आतां तो उलट्या दिशेला वळवितो; व्यष्टिदेह विघटित करून विनष्ट करावयाचा आणि समष्टि जीवनाला विनष्ट देहाच्या घटकांचा उपयोग होईल असें करावयाचें, इकडे आतां निसर्ग आपलें लक्ष पुरवितो. ही निसर्गाची प्रक्रिया विकासक्रमांतील कांहीं अखेरची प्रक्रिया नव्हे. देह टिकाऊ बनविणें व देह नष्ट करणें हीं वरील दोन तत्त्वें, व्यष्टित्व बनविणें आणि नंतर व्यष्टित्व समष्टींत विलीन करणें हीं दोन तत्त्वें, जीं परस्परविरोधक मार्गानें काम करतात, तो त्यांचा अन्योन्यविरोध नाहींसा होऊन त्यांजमध्यें सुसंवादित्व निर्माण करणें ही निसर्गाची पुढील प्रक्रिया आहे. हें सुसंवादित्व कसें घडून येतें? व्यष्टीची जाणीव व्यष्टि म्हणून कायम राहिली आणि ती नष्ट न होतां, तिच्या घटकांचा आधार तिला कायम राहून ती दुसऱ्या व्यष्टींशीं जाणीवपूर्वक एकरूप होऊं शकली, म्हणजे व्यष्टित्व व समष्टित्व यांचें सुसंवादित्व स्थापित होतें; आणि हीच निसर्गाची विकासक्रमांतील तिसरी उच्च प्रक्रिया आहे.
ही उच्च प्रक्रिया होण्यासाठीं मन पूर्णपणें विकसित होणें अवश्य आहे; कारण, केवळ प्राणमयता जेथें आहे, जेथें जाणीवयुक्त मन नाहीं, तेथें वर निर्दिष्ट केलेलें, स्थिर व चिरकालीन सुसंवादित्व निर्माण होऊं शकत
पान क्र. ३७८
नाहीं; तेथें अस्थिर व तात्कालिक सुसंवादित्व निर्माण होऊं शकतें; नंतर शरीर नष्ट होतें, व्यष्टि विस्कळित होऊन नाहींशी होते आणि तिचे घटक समष्टीच्या जीवनांत प्रविष्ट होतात. भौतिक प्राणमय जीवनाचा स्वभावच असा आहे कीं, ज्या अणूंच्या पायावर हें जीवन उभारलें जातें, त्या अणूंमध्यें असलेली टिकाऊपणाची सहजशक्ति, दीर्घकाळ व्यष्टित्वानें अस्तित्वांत राहण्याची शक्ति, या स्थूल भौतिक प्राणमय जीवनांत असत नाहीं. गुप्त आत्म्याला अभिव्यक्त करणारा किंवा करावयास लागलेला अन्त:पुरुष, हदयस्थ पुरुष (भावपुरुष) मनोमय पुरुषांत उदयास येऊन त्याला आधार देत असला म्हणजे मात्र, त्या मनोमय पुरुषाला, प्राणमय भौतिक पुरुषाला शक्य नसणारी गोष्ट शक्य होते; हा मनोमय पुरुष चिरकाल टिकूं शकतो; गत अनुभव भावी अनुभवाशीं तो जोडूं शकतो; त्याचा अनुभव अखंड प्रवाहाप्रमाणें अखंडत्वानें नांदूं शकतो; त्याचा बाह्य आकार वा देह नष्ट झाला व त्यायोगें देहगत स्मृति नष्ट होऊन त्याच्या अनुभवांत, भौतिक अस्तित्वांत खंड पडला, तरी त्याच्या मानसिक अस्तित्वांत व अनुभवांत खंड पडत नाहीं, खंड पडण्याचें कारण असत नाहीं; आणि हें अखंड मानसिक अस्तित्व, त्याच्या जुन्या देहाच्या मरणानें व त्याच्या नव्या देहाच्या जन्मानें, जुन्या देहगत स्मृतीचा घडलेला लोप भरून काढूं शकतें; मनाचा विशिष्ट पायरीपर्यंत विकास झाला कीं, नव्या देहांत आलेलें अखंड मन, एक प्रकारचा मानसिक पूल बांधून जुन्या देहांतील अनुभव नव्या देहांतील अनुभवांशीं जोडू शकतें. आज शरीरधारी मनाची वाढ बेताचीच आहे, अपूर्ण आहे; तरी मनोमय पुरुषाला ही जाणीव ढोबळपणें असते कीं, प्रस्तुत शारीर जीवनाच्या पूर्वीं व नंतर मनोमयाचें जीवन अखंड चालूं असतें; अशाप्रकारें वैयक्तिक जीवन, शारीर जीवनाच्या पूर्वीं व नंतरहि खंड न पडतां चालूं असतें; त्याला असेंहि कळतें कीं, अनेक वैयक्तिक जीवनें त्याच्या जीवनाला कारण झालेलीं आहेत, त्या जीवनांचा विशिष्ट विकास म्हणजे त्याचें जीवन आहे, थोड्याफार फरकानें त्याचें पुनर्जनन म्हणजे त्याचें जीवन होय; तसेंच त्याला हेंहि समजतें कीं, तो अनेक भावी वैयक्तिक जीवनें स्वत:मधून निर्माण करीत आहे. शिवाय त्याला हीहि जाणीव असते कीं, समष्टिजीवन त्याच्या पूर्वीं व नंतरहि चालूं असलेलें असें आहे; आणि या समष्टिजीवनांत त्याचें स्वतःचें जीवन एका अखंड धाग्याप्रमाणें अनुस्यूत आहे. आनुवंशिकता म्हणून जो भौतिक विज्ञानाचा
पान क्र. ३७९
सिद्धांत आहे, त्यांत हीच जीवनाच्या अखंडपणाची गोष्ट विज्ञानानें मान्य केलेली आहे. आनुवंशिकतेमध्यें जीवनाची अखंडता भौतिक विज्ञानाला प्रतीत होते -- मनोमय पुरुषामागें जो विकासशील आत्मा असतो त्याला, मरण न पावणारी टिकाऊ व्यक्ति अनुभवास येऊन ही अखंडता प्रतीत होते. ही आत्मजाणीव व्यक्त करणारा मनोमय पुरुष हाच, अमर व्यक्तिजीवन आणि अमर समष्टिजीवन यांच्या मीलनाचें स्थान आहे -- या पुरुषामध्यें या दोन जीवनांचें ऐक्य, या दोन जीवनांची सुसंवादी एकत्र राहणी शक्य होते.
जीवनाची ही जी तिसरी अवस्था असते तिच्यांत, व्यक्तींनीं एकमेकांशीं मिळून सहकारानें वागणें हें प्रमुख शासकतत्त्व असतें; या मिळण्यामिसळण्यामागें प्रेम हें गुप्त तत्त्व असतें; हें प्रेम पुढें विकासक्रमानें प्रकट व्हावयाचें असतें. सहयोगाची उच्चतम अवस्था, प्रेमपूर्ण सहयोग हीच पुढें उदयास यावयाची असते. प्रेम हीच जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेंतील अन्योन्यसंबंधांत प्रमुख प्रभावी शक्ति असते. प्रेम तत्त्वाच्या व्यवहारांत ज्या दोन गोष्टींची सारखीच आवश्यकता असते, त्या दोन गोष्टींपैकीं पहिली गोष्ट, व्यष्टीचें जाणीवपूर्वक व्यष्टित्वरक्षण ही आहे व दुसरी गोष्ट, व्यष्टीनें जाणीवपूर्वक दुसऱ्या व्यष्टींशीं सर्व प्रकारचा विनिमय करण्याची, दुसऱ्यांसाठीं आत्मदान करण्याची, दुसऱ्यांशीं मिळून एक होण्याची आवश्यकता मान्य करून, तशी मनापासून इच्छा करणें ही आहे. या दोन गोष्टींपैकीं कोणतीहि एक जेथें नसेल किंवा नाहींशी केली जाईल, तेथें प्रेम तत्त्वाचा व्यवहार थांबेल -- तेथें प्रेम तत्त्वाचा व्यवहार चालूं आहे असें म्हणतां येणार नाहीं -- तेथें असलेल्या व्यवहाराला मग कोणतेंहि स्वरूप असो, किंवा कांहींहि नांव द्यावें लागो. मनोमय पुरुषांत अशी एक भावना, अशी एक कल्पना उदयास येऊं शकते, कीं, पूर्ण आत्मबलिदान करून, पूर्ण आत्मविनाश करून घेऊन (अर्थात् आत्मविनाश हा भ्रम असतो) आपली प्रेमभावना पुरतेपणीं व्यक्त करावी; पण ही कल्पना, ही भावना जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेशीं जुळणारी नाहीं -- या तिसऱ्या अवस्थेच्या पलीकडे जीवनाचा विकास झाला आहे, याची ती निदर्शक आहे. जीवनाची जी तिसरी अवस्था असते, तिच्या व्यवहारांत आपण क्रमाक्रमानें, दुसऱ्या अवस्थेंतील कार्यक्रम -- अन्योन्यभक्षणानें जीवन जगणें, जीवनाच्या झगड्यांत भक्षणाचें सामर्थ्य दाखवून टिकण्याची पात्रता सिद्ध करणें -- हळूहळू टाकून देण्याचें काम करीत असतो; या तिसऱ्या अवस्थेंत एकमेकांना साह्य करून जीवनकलहांत टिकाव धरण्याचें काम
पान क्र. ३८०
चालूं असतें -- कलह कमी कमी व साह्य अधिकाधिक, अशी या तिसऱ्या अवस्थेंत आमची व्यवहारनीति असते; त्याचप्रमाणें एकमेकांशीं जुळतें घेऊन, एकमेकांमध्यें वस्तूंचा व विचारांचा विनिमय करून, एकमेकांच्या जीवनांत मिळून मिसळून जाऊन आम्ही या तिसऱ्या अवस्थेंत आमच्या जीवनाला, आमच्या आत्म्याला पूर्णता आणण्याच्या मागें असतो. जीवन हें पुरुषाचें, आत्म्याचें स्वत्वस्थापनेचें, 'मी' च्या इच्छेचा प्रभाव पाडण्याचें स्थान आहे, 'मी' च्या विकासाचें व जीवनकलहांत टिकण्याची पात्रता त्यानें मिळवण्याचें तें क्षेत्र आहे; जीवन म्हणजे स्वत्वस्थापना, 'मी' चा विकास व 'मी' चा टिकाव असें म्हणतां येईल; तथापि जीवनांत व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तींच्या अस्तित्वाची व सहकाराची गरज असते, जीवनांत मी हा दुसऱ्या 'मीं' ना जवळ करून आपणां स्वतांत मिळवून घेण्याचा प्रयत्न करीत असतो आणि त्या दुसऱ्या 'मीं' च्या जीवनांत त्या दुसऱ्यांनीं आपल्याला मिळवून घ्यावें अशीहि भावना त्याला असते. जीवनविकासाच्या तिसऱ्या अवस्थेंत टिकाव धरून राहणाऱ्या व टिकण्याला अधिकांत अधिक पात्र अशा, व्यष्टी व समष्टी या पुढील गुणधर्मांनीं युक्त असतील : सहयोगाचा व प्रेमाचा कायदा या व्यक्तींनीं व समाजांनीं (गटांनीं) अधिकांत अधिक विकसित करून व्यवहारांत आणलेला असेल; एकमेकाला मदत करणें, दयाबुद्धि, स्नेहभावना, साथीभावना, एकता या गुणांचा विकास अधिकाधिक करून ते गुण या व्यक्तींनीं व गटांनीं व्यवहारांत आणलेले असतील; टिकून राहणें आणि एकमेकांना आत्मदानानें साह्य करणें या दोन क्रियांचा सुंदर समन्वय त्यांनीं अधिकांत अधिक साधलेला असेल; परस्परांच्या वस्तूंच्या व विचारांच्या विनिमयानें व्यक्ति आणि गट एकमेकाला समृद्ध करीत असतील; व्यक्ति गटाला, गट व्यक्तीला, व्यक्ति व्यक्तीला व गट गटाला वस्तु-विचार-विनिमयानें समृद्ध करीत असतील. हा जो तिसऱ्या जीवनावस्थेंतील विकास, त्याच्या मुळाशीं मनाचें*
-------------------------
* येथें जें मन विवक्षित आहे, तें जीवनांत प्रत्यक्ष काम करतें; प्राणमय अस्तित्वांत, हृदयाच्या द्वारां तें प्रत्यक्ष काम करीत असतें. सापेक्षतत्त्वरूप प्रेम (केवळ निरपेक्ष प्रेम वेगळें) हें प्राणमय जीवनांतील तत्त्व आहे, मनाचें तत्त्व नाहीं; तें स्वयंतंत्र आणि चिरंतन व्हावयाचें, तर मात्र, मनानें त्याचा स्वीकार करून त्याला आपला प्रकाश पुरवावा लागतो. शारीर आणि प्राणमय जीवन, यांतील जें ''प्रेम'' म्हणून असतें, तें क्षुधारूप असतें, त्याला चिरंतनता नसते, त्याला चिरंतनता असूं शकत नाहीं.
पान क्र. ३८१
वाढतें प्रभुत्व असतें; हें मन क्रमाक्रमानें आपला विशिष्ट कायदा भौतिक अस्तित्वावर अधिकाधिक लादीत असतें. मन हें प्राणाहून अधिक सूक्ष्म आहे. विशिष्ट व्यक्तीच्या प्राणमय जीवनाला, स्वतःचें अस्तित्व टिकविण्यासाठीं दुसऱ्याच्या जीवनाचें भक्षण करणें प्राप्त असतें; मनाची गोष्ट तशी नाहीं; दुसऱ्याच्या जीवनांतील आपल्या उपयोगाच्या वस्तू भक्षण न करतां, मनाला त्या आत्मसात् करतां येतात, आपल्या मत्तेंत जमा करतां येतात आणि आपलें स्वत्व त्यायोगें परिपुष्ट करून वाढवितां येतें; तें जसें दुसऱ्यांना देत जातें, तसें त्याला दुसऱ्यांकडून मिळतहि जातें; अधिक देण्यानें त्याला अधिक मिळतें व त्याची अधिक वाढ होते; इतरांत जसें तें अधिक मिसळून जाईल तसें इतरांनाहि तें आपल्या स्वतांत अधिक मिळवून घेईल आणि या रीतीनें आपल्या अस्तित्वाचा व जीवनाचा व्याप वाढवील, अशी स्थिति असते. दुसऱ्याला फार देत सुटलें तर व्यक्तीचें भौतिक जीवन थकून जाऊन संपुष्टांत येईल; तसेंच त्यानें दुसऱ्याला भक्षण करण्याच्या प्रवृत्तींत अतिरेक केला तर, तें स्वतःचा नाश करून घेईल. जडाच्या कायद्याच्या कक्षेंत ज्या प्रमाणांत मन असतें, त्या प्रमाणांत वरील मर्यादा त्यालाहि लागूं पडतात; परंतु त्याचा विशिष्ट कायदा ज्या प्रमाणांत तें आपल्या व्यवहाराला लावूं शकतें, त्या प्रमाणांत वरील मर्यादा तें मागें टाकूं शकतें आणि या भौतिक मर्यादा ज्या प्रमाणांत तें मागें टाकूं शकेल, त्या प्रमाणांत त्याचें दुसऱ्यांना देणें आणि त्यानें दुसऱ्याकडून घेणें या क्रिया एकरूप होतात. मन जसजसें उंच उंच जातें, तसें तसें विविधतेंत, भेदाच्या दर्शनीं व्यवहारांत एकता कार्यकारी असल्याची जाणीव त्याला स्पष्टपणें होते; व तें स्वत: या 'भेदांत अभेदाच्या' कायद्याला आपल्या व्यवहारांत कार्यान्वित करतें; सच्चिदानंदाच्या प्रकटावस्थेंत भेदांत अभेद हाच दिव्य कायदा काम करतो.
जीवनाच्या मूळ प्राथमिक अवस्थेंत जी नेणीवव्याप्त इच्छाशक्ति जडशक्तीच्या अंकित राहून काम करीत असते, ती जीवनाच्या दुसऱ्या विकासावस्थेंत क्षुधा आणि जाणीवयुक्त वासना यांचें रूप घेते -- या दोन प्रेरणाच मनाच्या मुळाशीं आहेत; या दोन प्रेरणांच्या बीजांतून मन उदय पावतें. जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेंत वासनेचा कायदा अगदीं नाहींसा होत नाहीं, तर त्याचें रूपांतर होतें व या रूपांतरानें त्याची परिपूर्ति होते. तिसऱ्या अवस्थेंत सहयोगाचें तत्त्व आणि प्रेमाचें तत्त्व व्यवहार चालवूं लागतात आणि या तत्त्वांच्या प्रभावानें वासनेच्या कायद्याचें रूपांतर होऊन त्याचें
पान क्र. ३८२
इष्ट साध्य होतें. प्रेम ही एक वासना आहे, हिचा स्वभाव दुसऱ्यांना आत्मार्पण करण्याचा आहे आणि या आत्मार्पणाच्या बदल्यांत दुसऱ्यांकडून आत्मार्पणाची अपेक्षा प्रेमाला असते. अन्योन्यांनीं अन्योन्यांना घ्यावें द्यावें अशी प्रेमाची स्फूर्ति असते. भौतिक जीवन दुसऱ्याला कांहींहि देऊं इच्छित नाहीं, दुसऱ्याकडून घ्यावयाची मात्र त्याला हांव असते. मात्र हें खरें कीं, भौतिक जीवनाला आपल्या इच्छेविरुद्ध आपल्या मत्तेचा हिस्सा इतरांना द्यावा लागतो; कारण, जें जीवन कांहीं देत नाहीं, निव्वळ घेत सुटतें, तें निष्फल होतें, सुकून जातें आणि नष्ट होतें; या जगांत किंवा कोणत्याहि जगांत, कांहीं न देणारे व निव्वळ घेण्यापाठींमागें लागलेलें जीवन शक्य दिसत नाहीं -- एवढेंच कीं, देण्याचें काम हें भौतिक जीवन खुषीनें करीत नाहीं, निसर्गाची गुप्त प्रेरणा त्याला द्यावयास लावते; या प्रेरणेला जाणीवपूर्वक तें मानीत नाहीं. प्रेम जेव्हां कार्यान्वित होतें, तेव्हां त्याचें आत्मदान, प्रारंभीं भौतिक जीवनाप्रमाणें यांत्रिकतेनेंच चालतें; अणूंतील नेणीवव्याप्त इच्छा यांत्रिकतेनें अणूंकडून आत्मदान करविते. त्याप्रमाणेंच आरंभीं आरंभीं प्रेमाची गोष्ट असते; यांत्रिक आत्मदानानंतर, वासनेचा भुकेचा कायदा प्रेम पाळतें, दुसऱ्यांकडून त्यांना नाराज करूनहि कांहीं घेण्यांत, कांहीं वसूल करण्यांत, तें आनंद मानतें; देण्यांत, दुसऱ्यांना आत्मार्पण करण्यांत तितका आनंद मानीत नाहीं; दुसऱ्यांना देणें ही गोष्ट, आपली इच्छा पुरवून घेण्याची अटळ किंमत आहे, या भावनेनें तें देत असतें; देण्यांत त्याची ही भावना प्रमुख असते. अर्थात् प्रेमाचा विशिष्ट असा खास कायदा हा नसतो; समता, देण्याघेण्यांत समान आनंद हा त्याचा खास कायदा आहे. देण्यांतला आनंद हा घेण्याच्या आनंदापेक्षां हळूहळू अधिक होत जातों; पण हें घडूं लागलें म्हणजे, आपल्या खास कायद्याला मागें सारून, आपल्या विशिष्ट स्वरूपाला सोडून, प्रेम वरच्या प्रांतांत प्रवेश करीत असतें; अंतरंगांतील भावात्म्याची ज्योत त्याला तसें करावयास लावीत असते; नितान्त एकता अनुभवणें, हें आत्म्याचें अंतिम ध्येय असतें; सामान्य आत्म्याला जो अनात्मा दुसरा म्हणून प्रतीत होतो, तो आपला मोठा आणि स्वतःहून अधिक प्रिय आत्मा आहे ही, एकतेकडे वाटचाल करीत असलेल्या अंतरात्म्याची-भावात्म्याची भावना असते; आणि या आत्म्याच्या दडपणामुळें, प्रेम आपलें वैशिष्ट्य बाजूला ठेवून, देण्यांतला आनंद हा घेण्यांतल्या आनंदाहून अधिक मानूं लागतें. प्रेमाचा कायदा, त्याच्या मूळ जीवनतत्त्वाच्या दृष्टीनें पाहिला तर असा
पान क्र. ३८३
असतो कीं, दुसऱ्यांच्या जीवनांत आणि दुसऱ्यांच्या द्वारां स्वतःची, स्वत:च्या जीवनाची अनुभूति घ्यावयाची आणि दुसऱ्यांच्या जीवनांत त्यांच्या द्वारां स्वतःच्या जीवनाची, स्वतःची परिपूर्ति करून घ्यावयाची; दुसऱ्यांना श्रीमंत करून श्रीमंत व्हावयाचें, दुसऱ्यांच्या सत्तेखालीं स्वतःला देऊन दुसऱ्यांना आपल्या सत्तेखालीं आणावयाचें -- कोणीहि प्रेममय जीव स्वत: स्वतःवर तेव्हांच पूर्ण सत्ता गाजवूं शकतो, जेव्हां तो स्वतःला दुसऱ्याच्या सत्तेखालीं पूर्णतया देऊन टाकतो. पूर्ण प्रेमविषयाधीनता हीच त्याची पूर्ण स्वाधीनता असते.
जीवनाच्या पहिल्या अवस्थेंत, अणु-अवस्थेंत, अणु हा जड, गतिशून्य असतो; स्वतःला स्वतःच्या आधीन ठेवण्याचें त्याला सामर्थ्य नसतें; भौतिक व्यक्ति, अणु-व्यक्ति इतरांच्या अंकित असते -- या व्यक्तीला यांत्रिक जडशक्ती हवें तसें वागवितात. जीवनाची दुसरी अवस्था जाणीवयुक्त असते; मर्यादेची जाणीव, दुसऱ्यांना (अनात्म्याला) आपलें अंकित करण्यासाठीं धडपड, स्वतःला नियंत्रित करण्यासाठीं धडपड हीं दुसऱ्या जीवनावस्थेचीं लक्षणें होत. तिसरी जीवनावस्था उदयास आली, कीं मूळ ज्या गोष्टी पूर्वींच्या अवस्थांत एका स्वरूपाच्या होत्या, त्या या अवस्थेंत रूपांतर पावतात; पूर्वींच्या अवस्थांत त्या गोष्टींत जी अपूर्णता व विसंगति भासते, ती या अवस्थेंत नाहींशी होते -- येथें पूर्णता व सुसंवाद येतो. दुसऱ्याशीं सहकार व प्रेम हीं तत्त्वें येथें काम करूं लागतात आणि त्यामुळें दुसरा अनात्मा हा आपला मोठा आत्मा आहे अशी जाणीव येते व अनात्म्याची गरज ती आपली गरज, त्याचा कायदा तो आपला श्रेष्ठ कायदा, अशी भावना होऊन, त्या कायद्याप्रमाणें स्वखुषीनें वागण्याची स्फूर्ति होते; ही स्फूर्ति समष्टि-जीवनाला उपकारक होते -- या जीवनाची वाढती प्रेरणा व्यक्तींना आत्मसात् करण्याची असते -- अनात्म्याची जी गरज ती आपलीच, असें समजण्याची व्यक्तींच्या ठिकाणची स्फूर्ति या प्रेरणेला मदत करते आणि ही स्फूर्ति त्या प्रेरणेची परिपूर्ति करते; दुसऱ्यांचें जीवन तें आपलेंच जीवन, असें या तिसऱ्या अवस्थेंत व्यक्ति मानूं लागली असल्यानें, अनात्मा आपला करण्याची दुसऱ्या अवस्थेंतील तिची इच्छा आतां सहजच पुरी होते. याप्रमाणें दुसऱ्या अवस्थेंत असलेला, व्यष्टि व समष्टि यांचा विरोध तिसऱ्या अवस्थेंत नाहींसा होण्याच्या मार्गाला लागतो. आत्मा, अनात्मा, (व्यक्ति आणि विश्व) यांजमध्यें अन्योन्यांनीं अन्योन्यांसाठीं आत्मदान करण्याची जी प्रवृत्ति प्रेम-
पान क्र. ३८४
तत्त्वांत असते, ती व्यक्त व्हावयाची, पूर्ण व्हावयाची, सुरक्षित रहावयाची, तर हें अन्योन्य-विनिमयाचें नातें व्यक्तीव्यक्तीमध्यें, गटागटांमध्यें प्रस्थापित होणें अवश्य असतें. स्वत्वस्थापना आणि विश्वस्वातंत्र्य यांचा मेळ घालण्याचा अवघड प्रयत्न करून, मनुष्य आपली स्वाधीनता निर्माण करतो; सहयोग, प्रेम, बंधुभाव, साथीभाव या भावनांच्या प्रेरणेनें तो स्वत: दुसऱ्याकरितां त्याग करतो; सुसंवादी समतोल, न्याय, अन्योन्यभाव व समानता या ध्येयांनीं भारला जाऊन, व्यष्टि आणि समष्टि या विरोधी वस्तूंमध्यें तो समतोल निर्माण करूं पाहतो -- या सर्व गोष्टी म्हणजे निसर्गाचा मूळ प्रश्न, वा जीवनाचा प्रश्न सोडविण्याच्या मार्गांतील खटपटी असून अशा या खटपटींनीं तो प्रश्न सुटावयाचा हेंहि अटळपणें पूर्वींच ठरल्यासारखें आहे -- जडांत जें जीवन उदयास येतें त्याचा पाया, त्याची मूळ अवस्था, व्यष्टि आणि समष्टि यांच्या जीवन-संघर्षांनीं भरलेली असते; त्या विरोधी गोष्टींमधील विरोध नाहींसा करून, त्यांचा सुसंवादी समन्वय घडवून आणण्याकडे मनुष्याच्या सर्व खटपटींचा रोख असतो. प्राण तत्त्वाच्या पलीकडील श्रेष्ठ मनाच्या तत्त्वाचा आश्रय करून, वरील विरोध दूर करण्याचा मनुष्याकडून प्रयत्न करण्यांत येतो. कारण जी सुसंवादिता, जो समन्वय साधावयाचा असतो, त्याचा मार्ग या उच्च तत्त्वाला, श्रेष्ठ मनाला सांपडूं शकतो, याच्या खालच्या तत्त्वांना सांपडूं शकत नाहीं; तथापि हें मात्र खरें की, जी सुसंवादिता व जो समन्वय हवा असतो, तो पूर्णतया मनाला साधत नाहीं; मनाच्या पलीकडे जी एक शक्ति आहे, त्या शक्तीच्या क्षेत्रांतच पूर्ण सुसंवाद सिद्ध होतो.
ज्या वास्तव गोष्टी लक्षांत घेऊन, आमच्या विचारणेला आम्हीं आरंभ केला आहे, त्या गोष्टी जर बरोबर असतील, आम्ही म्हणतो तशा असतील, तर मन स्वतःची हद्द ओलांडून, स्वतःचें विशिष्ट स्वरूप मागें टाकून पुढें जाईल, तेव्हांच विकासमार्गाचा शेवट, आमचें ध्येय, साध्य होईल, सिद्ध होईल; कारण मनाच्या पलीकडे जी शक्ति आहे, जें तत्त्व आहे त्या तत्त्वाची, त्या शक्तीची एक कनिष्ठ कृति म्हणजे हें मन आहे; त्या शक्तीचें साधन हें मन आहे. प्रथम त्या शक्तीनें खालीं उतरून रूप धारण करावें आणि व्यक्तित्व स्वीकारावें, यासाठीं मन हें मधलें साधन आहे, माध्यम आहे. खालून वर असा जीवनाचा विकास (जडापासून आरंभ होऊन) चालला असतां, त्या रूपामध्यें जी वस्तु, जें सत्य साकार झालें, त्या अभिव्यक्तीद्वारां ज्या सत्याचें, ज्या वस्तूचें आविष्करण झालें, त्या
पान क्र. ३८५
सत्याच्या, त्या वस्तूच्या, त्या तत्त्वाच्या, त्या शक्तीच्या मूळ स्वरूपांत पुन्हां चढून स्थायी होण्याकरितां, तेंच मन माध्यमाचें, मधल्या साधनाचें काम करतें. अशी वस्तुस्थिति असल्यानें, जीवनाच्या प्रश्नाचें पूर्ण उत्तर हें सहयोग, विनिमय, प्रेमाचा जुळवून घेण्याचा व्यवहार, मनाचा कायदा, हृदयाचा कायदा यांच्या आश्रयानें मिळण्याचा संभव नाहीं; तर जीवनाच्या चौथ्या अवस्थेंत तें उत्तर सांपडणार आहे. या अवस्थेंत अनेकांची शाश्वत एकता (अद्वैत) आत्म्याच्या मूळ चैतन्याच्या द्वारां अनुभवास येते; या अवस्थेंत जीवनाच्या सर्व कृतींचा पाया, आत्मा एक आहे, आत्मा पूर्ण स्वतंत्र आहे या तत्त्वाचा व त्याच्या जाणीवपूर्वक अनुभवाचा असतो; देहांची विभक्तता, प्राणांच्या नाना वासना आणि क्षुधातृषा, मनाचे गट आणि क्षुद्र अपूर्ण मेळ, किंवा या सर्वांचें साहचर्य आणि सहकार्य या गोष्टी, उपरिनिर्दिष्ट चवथ्या जीवनावस्थेंत, जीवनाच्या कोणत्याहि कृतीचा पाया असत नाहींत आणि म्हणून केवळ या अवस्थेंतच, जीवनाच्या मूलभूत प्रश्नाचें पूर्ण समाधानकारक उत्तर सांपडतें.
पान क्र. ३८६
Home
Sri Aurobindo
Books
SABCL
Marathi
Share your feedback. Help us improve. Or ask a question.