दिव्य जीवन 1879 pages 1960 Edition
Marathi Translation
  Senapati Bapat

ABOUT

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics, expounding a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth.

THEME

philosophymetaphysics

दिव्य जीवन

Sri Aurobindo symbol
Sri Aurobindo

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.

Sri Aurobindo Birth Centenary Library (SABCL) The Life Divine Vols. 18,19 1070 pages 1970 Edition
English
 PDF    philosophymetaphysics
Sri Aurobindo symbol
Sri Aurobindo

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.

Marathi Translations of books by Sri Aurobindo दिव्य जीवन 1879 pages 1960 Edition
Marathi Translation
Translator:   Senapati Bapat  PDF    LINK

प्रकरण अठरावें

 

मानस आणि अतिमानस

 

मन हें ब्रह्म आहे, असा शोध त्याला लागला.

- तैत्तिरीय उपनिषद् ३, ४

 

तें ब्रह्म अविभक्त असून भूतांमध्यें विभक्तपणें असल्यासारखें आहे.

- गीता १३, १६

 

अतिमानसिक जीवनाचें सार काय आहे तें पाहण्याचा, त्याची कल्पना बांधण्याचा प्रयत्न आपण येथवर केला. सच्चिदानंदाच्या अस्तित्वाच्या पोटांत हें दिव्य-जीवन दिव्य आत्म्याला निर्वेधपणें लाभतें, मानवी आत्म्याला हें दिव्य-जीवन आपल्या राहणींत व्यक्त करावयाचें आहे, सच्चिदानंदानें येथें जो मानसिक आणि शारीरिक जीवनाचा सांचा अंगीकारला आहे, त्या सच्चिदानंदाच्या ऐहिक जीवनरूपी देहांत मानवी आत्म्याला दिव्य आत्म्याचें दिव्य-जीवन जगावयाचें आहे; ही त्याची आकांक्षा आहे, पण आपण जें जीवन वास्तवांत जगत आहों, पाहत आहों त्याच्याशीं आपल्याला माहीत झालेलें अतिमानसिक जीवन कोणत्याहि प्रकारें संबंध राखतांना दिसत नाहीं; तें त्याच्याशीं जुळणारें दिसत नाहीं; मन आणि शरीर या दोन क्षेत्रांत आमच्या मामुली जीवनाचें गतागत चाललेलें असतें; या जीवनाचें दिव्य-जीवनाशीं कांहींच नातें दिसत नाहीं. दिव्य-जीवन हें अशरीर आत्म्याचें जीवन असावें असें दिसतें; जेथें स्थूल भौतिक शरीर आत्म्यानें धारण केलेलें नाहीं, जेथें स्थूल भौतिक रूपें नाहींतच अशा विश्वांत अशरीर आत्मे अस्तित्वाची, जाणिवेची, सक्रिय संबंधांची अन्योन्यांना आनन्द देण्याघेण्याची जी स्थिति मिळवूं शकतात व भोगूं शकतात ती स्थिति म्हणजे दिव्य-जीवन असावें असें दिसतें; या शरीरशून्य विश्वामध्यें आत्म्या-आत्म्यांत भेद निर्माण झाला आहे पण या भिन्न आत्म्यांना भिन्न शरीरें मिळालेलीं नाहींत; आनंदमय, क्रियाशील मर्यादांनीं न बांधलेलें

 

पान क्र. २९८

 

अनन्त व्यापकतेचे आत्मे या विश्वांत असतात; येथें रूपांत वा आकारांत कोंडलेले आत्मे नसतात--दिव्य-जीवन जेथें जगलें जातें, त्या विश्वाचें असें वर्णन करतां येईल. तेव्हां असा संशय घेणें वाजवी आहे कीं, शारीर आकारांत कोंडलेले मन, आकारांत बांधलेल्या शक्ती, यांच्या मर्यादांत चाललेलें जें जीवन आपल्या परिचयाचें आहे, त्या जीवनाहून वेगळें दिव्य-जीवन या मर्यादांच्या बंधनांत राहून जगणें कसें शक्य आहे?

परमश्रेष्ठ अनन्त सद्‌रूप जाणीवशक्ति व आत्मानंद हेंच जगाचें आदिकारण आहे, आमचें मन हें या सच्चिदानंदाचें विकृत रूप आहे-- अशा या सच्चिदानंदाची कल्पना कांहींशी स्पष्ट करण्याचा येथवर आम्हीं प्रयत्न केला आहे. या सर्वातीत सर्वरूप अस्तित्व-भोक्त्यानें आपल्या आनंदमय अस्तित्वाचें व्यक्तरूप असलेल्या सुव्यवस्थित व सुनियंत्रित विश्वाची, कल्पनेंत व वास्तवांत रचना करून, आपल्या जाणीवमय शक्तीच्या प्रभावानें त्याचें शासन चालविलें आहे--सच्चिदानंदाच्या जाणीवमय शक्तीनें हा सर्व कारभार आपल्या दिव्य मायेच्या द्वारां, अर्थात् सत्य-ज्ञान अथवा सत्य-कल्पना यांच्या द्वारां सुरू केला व चालविला आहे; या दिव्य मायेसंबंधानें आपण कांहीं कल्पना मिळविली आहे. परंतु अनंत परात्पर अस्तित्व, ज्ञानमय शक्ति, स्वानंद आणि दिव्य माया (सत्य-ज्ञान किंवा सत्य-कल्पना) या चार दिव्य व महान् गोष्टींचा, आपल्या परिचयाच्या मन-प्राण-शरीर या तीन गोष्टींशीं काय संबंध आहे त्याचा विचार आपण अद्यापि केलेला नाहीं. मन-प्राण-शरीर ही दर्शनी अदिव्य माया आहे; हिच्यामुळें आपण धडपड, तडफड करतो व नाना प्रकारच्या आपत्ती व दुःखें भोगतो; ही अदिव्य माया दिव्य मायेंतून कशी उद्‌भवली, दिव्य सत्यांतून हिचा विकास कसा झाला, या गोष्टीची चिकित्सा आपण अद्यापि केलेली नाहीं. ही चिकित्सा आपण करूं. मूळ चार दिव्य गोष्टींचा, विशेषत: दिव्य मायेचा, आमच्या परिचयाच्या तीन दर्शनी अदिव्य गोष्टींशीं ज्या धाग्यानीं किंवा रज्जूंनीं संबंध घडतो, ते धागे किंवा रज्जू आपण जेव्हां शोधून काढूं किंवा तयार करूं, तेव्हांच आमच्या या विश्वाचें स्पष्टीकरण आम्हांला मिळाल्यासारखें होईल. हें स्पष्टीकरण जोपर्यंत मिळत नाहीं, तोंपर्यंत हें आमचें अदिव्य अधोवर्ती जीवन, त्या उच्च दिव्य जीवनाशीं एकरूप होऊन जाईल कीं नाहीं, एकरूप होऊन जाणें शक्य आहे कीं नाहीं, असा संशय घेण्याला जागा राहील. ही गोष्ट आम्ही

 

पान क्र. २९९

 

जाणतों कीं, आमचें जग सच्चिदानंदांतून आलें आहे, सच्चिदानंदाच्या पोटांतच त्याचें अस्तित्व आहे, त्याचें जीवन आहे; भोक्ता आणि ज्ञाता, स्वामी आणि आत्मा म्हणून या विश्वाच्या पोटीं सच्चिदानंद परमात्मा राहतो अशी आमची साधार कल्पना आहे; त्याचा जो आनंद, जें ज्ञानमय सामर्थ्य, जें दिव्य अस्तित्व, त्यांतूनच आमची द्वंद्वमय संवेदना, आमचें द्वंद्वमय मन, आमची द्वंद्वमय शक्ति त्यांची छाया म्हणून निघाली असली पाहिजे, हें आम्हांला कळतें. परंतु आमच्या जीवनांतील ही छायारूप त्रयी आणि सच्चिदानंद परमात्मा यांच्यांत इतका विरोध आहे व तो परमात्मा इतका वर आणि आम्हीं इतकें खालीं आहों कीं, जोंपर्यंत आम्ही आमच्या अस्तित्वाच्या तीन प्रकारांत कोंडलें गेलों आहोंत, तोपर्यंत आम्हांला दिव्य-जीवन प्राप्त होणें अशक्य आहे असेंच दिसतें. खालच्या प्रतीचें असलेलें आमचें जीवन उदात्त करून, आम्ही दिव्य-जीवनाच्या दर्जाला नेलें पाहिजे, किंवा शरीर टाकून शुद्ध अस्तित्वाचा, प्राणमय जीवन टाकून ज्ञानमय शक्तीच्या शुद्ध अवस्थेचा, संवेदना आणि मन टाकून शुद्ध आनंद आणि शुद्ध ज्ञान यांचा अंगीकार आम्हीं केला पाहिजे. आध्यात्मिक सद्‌वस्तूचें सत्य, वास्तव दिव्य-जीवन अशाच त्यागानें व अंगीकारानें आम्हांला लाभूं शकेल. पण हा दुसरा पर्याय स्वीकारावयाचा म्हणजे याचा अर्थ, आत्म्याची शुद्ध स्थिति किंवा वस्तुजाताचें सत्य व्यक्त करणारें, दिव्य ईश्वरी अस्तित्व, आनंद व शक्ति जेथें आहे असें विश्व किंवा विश्वें यांचा स्वीकार करून, पार्थिव, मर्यादित, मानसिक जीवन सर्वस्वीं टाकून द्यावयाचें असा होतो. हा दुसरा पर्याय स्वीकारावा लागत असेल, तर मानवाची पूर्णता मानवरूपांत होऊं शकत नाहीं असें मान्य केलें पाहिजे; किंवा मानवाचा जो पृथ्वीवर विकास झाला आहे, त्याचा कळस म्हणजे मानवाची मनःशक्ति विलय पावत पावत एका सूक्ष्म बिंदूत सामावणें व या बिंदूंतून उडी घेऊन निराकार अस्तित्वांत मानवानें स्थान घेणें हा आहे किंवा सशरीर मनाच्या आवांक्याबाहेर असलेल्या जगांत, त्या सूक्ष्म मनोबिंदूंतून मानवानें उडी घेणें यांत त्याच्या पार्थिव विकासाचा कळस आहे, या दोन पक्षांपैकीं एक पक्ष आम्हांला मान्य करणें भाग आहे.

परंतु सूक्ष्म विचार केल्यास दुसरा पर्याय आवश्यक आहे असें दिसत नाहीं. पहिला पर्याय म्हणजे आमचें खालच्या दर्जाचें जीवन वरच्या दर्जाचें म्हणजेच दिव्य करणें हें शक्य दिसतें. जीं चार दिव्य तत्त्वें (सत्,

 

पान क्र. ३००

 

चित्, आनंद आणि दिव्य माया) सर्व गोष्टींचें मूळ आहेत, त्यांच्या क्रियेंतूनच आम्हीं अदिव्य माया समजत असलेली मन-प्राण-शरीर ही त्रयी निर्माण झालेली आहे; ही स्थूल, सूक्ष्म रूपांची दुनिया निर्माण करण्यासाठीं जी क्रिया आवश्यक होती, त्या क्रियेंतूनच अदिव्य म्हटली जाणारी मन-प्राण-शरीर ही त्रयी उदयास आली आहे यांत संशय नाहीं. कारण या त्रयीच्या पूर्वीं, दिव्य तत्त्वचतुष्टयाखेरीज दुसरें कांहींच नव्हतें. विश्वासाठीं रूपें म्हणून जीं निर्माण केलीं गेलीं, तीं कांहीं दिव्य सत्-चित्-आनंद किंवा दिव्य सत्य-कल्पना (दिव्य माया) यांच्या क्षेत्राच्या बाहेर निर्माण केलीं गेलीं नाहींत; तर सत्-चित्-आनंदाच्या क्षेत्रांत, तसेंच जें चौथें दिव्य तत्त्व सत्य-कल्पना किंवा दिव्य माया त्याच्या क्षेत्रांत आणि त्याच्या क्रियाशीलतेनें निर्माण केलीं गेलीं. अर्थात् अशी कल्पना करण्याचें कांहींच कारण नाहीं कीं, उच्च दिव्य जाणिवेचा सत्यमय व्यापार, रूपांच्या दुनियेंत (मन-प्राण-शरीरांच्या दुनियेंत) शक्य नाहीं; तसेंच रूपें आणि त्यांचे निकटचे आधार--मानसिक जाणीव, प्राणशक्ति, रूपद्रव्य--हे त्यांजकडून व्यक्त होणारें सर्व कांहीं विकृत स्वरूपांतच व्यक्त करतील किंवा रूपांना आणि त्यांच्या आधारांना कशाचीच अविकृत अभिव्यक्ति करतां येणार नाहीं अशीहि कल्पना करण्याचें कारण नाहीं. उलट असें शक्य दिसतें, नव्हे बरेंच संभवनीय दिसतें कीं, मन-प्राण-शरीर यांना शुद्ध रूपें आहेत आणि या शुद्ध रूपांचें मन-प्राण-शरीर-त्रय दिव्य ईश्वरी सत्याच्या पोटांत आहे; या सत्याच्या दिव्य जाणिवेच्या दुय्यम क्रिया ह्या शुद्ध मन-प्राण-शरीर यांच्याच क्रिया असतात; सर्वश्रेष्ठ दिव्य शक्ति आपलें कार्य करतांना जी साधनसामुग्री वापरते, त्या पूर्ण साधन-सामुग्रीचा एक भाग म्हणजे शुद्ध मन-प्राण-शरीर ही त्रयी असते. तेव्हां, आपलें मन-प्राण-शरीर दिव्य होण्याची शक्यता भरपूर आहे, असली पाहिजे; नवें विज्ञान पार्थिव विकासाचें एक चक्र आम्हांला परिचित करून देतें--या चक्रांत म्हणजेच एकाद्या लहानशा कालखंडांत मन-प्राण-शरीर यांचें जें रूप आणि कार्य अनुभवास आलें आहे, तेवढेंच त्यांना शक्य असून, दुसरें कसलेंच रूप आणि कार्य त्यांना शक्य नाहीं, असा आग्रह धरणें चुकीचें होईल; सजीव शरीरांत मन-प्राण-शरीर सध्यां ज्या क्रिया करतात व करूं शकतात, त्याच तेवढ्या त्यांना शक्य आहेत, असें म्हणणें चुकीचें होईल. त्यांची ज्या प्रकारची क्रियाशक्ति अनुभूत आहे, त्यापेक्षां वेगळी उच्च प्रकारची अननुभूत क्रियाशक्ति त्यांजमध्यें असूं

 

पान क्र. ३०१

 

शकतें. ज्या दिव्य ईश्वरी सत्यापासून त्यांची उत्पत्ति झाली आहे, त्या आपल्या उगमाचा कांहींतरी कारणानें या त्रयीला विसर पडला आहे म्हणून त्यांच्या आजच्या अदिव्य क्रिया त्यांजकडून घडतात. ही जाणिवेची विभक्तता, ही सत्याची विस्मृति नाहींशी झाली--मानवतेंत जी दिव्य-शक्ति सुप्त आहे, तिच्या जागृतीनें, तिच्या विस्तारानें, आजची जाणिवेची विभक्तता, सत्य-विस्मृति दूर होणें शक्य आहे--ही गोष्ट वास्तवांत घडून आली आणि सत्यस्मृति व अविभक्त जाणीव परत आली, म्हणजे मन-प्राण-शरीराचें सध्यांचें क्रियास्वरूप बदलेल. विकासाचा उच्च टप्पा, प्रगतीचा उंचावरचा मार्ग मन-प्राण-शरीर चालून जातील आणि या विकासप्रक्रियेनें त्यांचें क्रियास्वरूप शुद्ध होऊन, सत्य-जाणिवेच्या (दिव्य मायेच्या) क्षेत्रांत ही त्रयी जसें काम करतें, तसें काम या पृथ्वीवरहि ती करूं लागेल.

मानवांतील ईश्वरी शक्तीच्या संवर्धनानें त्याची विभक्त जाणीव दूर होऊन, अविभक्त जाणिवेची प्रस्थापना त्याचें ठिकाणीं शक्य झाली, तर मानवी मनांत व शरीरांत दिव्य-जाणीव व्यक्त करून कायम ठेवतां येईल, इतकेंच नाहीं तर ही दिव्य-जाणीव, मन-प्राण-शरीर या तीनहि क्षेत्रांत आपला प्रभाव पाडून या तीनहि अंगांना नवें रूप देऊं शकेल. जें शाश्वत सत्य दिव्य-जाणिवेंत स्वभावत: सांठविलेलें असतें, त्या सत्याची प्रतिमा मन-प्राण-शरीर या त्रयीला अधिक पूर्णतेनें व्यक्त करण्याचें काम दिव्य-जाणीव करूं शकेल; दिव्य जाणिवेच्या प्रांतांत स्वभावतःच असलेलें स्वर्गीय राज्य, केवळ मानवाच्या आत्म्यांतच व्यक्त करून दिव्य-जाणीव राहणार नाहीं, तर त्याच्या मन-प्राण-शरीर रूपानें जें आत्म-अभिव्यक्तीचें द्रव्य तिला उपलब्ध असतें, तें द्रव्यदेखील स्वर्गीय दिव्यतेनें भरण्याचें काम दिव्य-जाणीव करूं शकेल; याप्रमाणें आत्मा आणि आत्मप्रकटनाचें साधनभूत द्रव्य, या दोन्हींचे द्वारां दिव्य-जाणीव या पृथ्वीवर स्वर्गीय राज्याचें अवतरण करूं शकेल. पृथ्वीवर कांहींजणांनीं, किंवा पुष्कळांनीं देखील म्हणतां येईल, आंतरिक विजय मिळविण्याचें व आत्म्याची विशुद्धता व दिव्यता सिद्ध करण्याचें कार्य केलेलें आहे; कोणीं हें कार्य पुष्कळच केलेलें आहे, कोणीं थोडेंफार केलेलें आहे; बाह्य विजय मिळविण्याचें कार्य, मन-प्राण-शरीर यांना दिव्यता आणण्याचें कार्य अद्यापि पार्थिव प्रकृतीच्या अप्रकट जाणिवेंतच बीजरूपानें दडून असलें; तरी तेंहि भविष्यकाळीं व्हावयाचें आहे; मानवी विकासाच्या कार्यांतील ईश्वराचा भावी

 

पान क्र. ३०२

 

मोठा विजय या बाह्य आत्म-साधनरूप मन-प्राण-शरीर या त्रयीच्या दिव्यतासंपन्नतेनें व्हावयाचा आहे, असें मानण्यास भरपूर जागा आहे. आमचें जें पार्थिव जीवन आहे, तें अपरिहार्यपणें सदासर्वदा अर्धवट सुखमय व अर्धवट दुःखमय धडपडींच्या चाकोरींत व्यतीत होत रहावें असें कांहीं नियतीचें ठरलेलें दिसत नाहीं; या जीवनांत ध्येयसिद्धि व्हावी, ईश्वराचें आनंदमय वैभव मानवी जीवनाच्या पूर्णतेच्याद्वारां या पृथ्वीवर प्रकट व्हावें, असा नियतीचा निश्चय असावा असें मानावयास हरकत दिसत नाहीं.

आमच्यापुढें आतां जो प्रश्न आहे, तो म्हणजे ज्या उच्च स्थानावरून मन-प्राण-शरीर ही त्रयी खालीं उतरली, त्या उच्च उगमस्थानीं या त्रयीचें मूळ स्वरूप काय होतें, हा आहे. कारण ईश्वराच्या आविष्कारांत जेव्हां समग्रता व पूर्णता येईल, तेव्हां वरील मूळ स्वरूपच मन-प्राण-शरीर धारण करतील, या पूर्ण आविष्कारांत मन-प्राण-शरीर या त्रयीचा आंतरात्मा सत्य-पूर्ण होईल, सत्यापासून अलग रहाणार नाहीं; आज अलगपणा आणि अज्ञान यांत जसें आम्ही वावरत आहों व मन-प्राण-शरीराचें ठिकाणीं सत्यापासून दूर आहों, तसें पूर्ण आविष्कारांत आम्ही असणार नाहीं. सत्यानें पूर्ण झालेली मन-प्राण-शरीर ही त्रयी म्हणजे मूळ स्वरूपांतील ही त्रयी होय. ही त्रयी तिच्या उच्च उगमस्थानीं पूर्णतासंपन्न आहे; पण आमच्या पार्थिव जीवनांत आम्ही त्या पूर्णतेच्या दिशेनें वाढत आहों, विकसित होत आहों; जड द्रव्याच्या, जड पार्थिव शरीराच्या बंधनांत आमचें मन पहिल्या वहिल्या नियंत्रित हालचाली करून, हळूंहळूं आपला विकास करीत आहे; चैतन्यानें जड आकारांत स्वतःला दडविले, त्या गोष्टीचे परिणाम अद्यापि आम्हांला अडवीत आहेत; पूर्ण प्रकाशानें आपल्या स्वतःच्या छायेंत बुडी घेतली व भौतिक निसर्गांत अंधकारमय द्रव्यगत चेतना निर्माण केली, त्या गोष्टीचे परिणाम अद्यापि आम्हांला आमच्या विकास-प्रवासांत अडथळा आणीत आहेत. अशा रीतीनें मन-प्राण-शरीराची मूळ पूर्णता मिळविण्याच्या मार्गावर आम्ही हळूंहळूं वाटचाल करीत आहोंत. ईश्वरी सत्य-कल्पनेच्या क्षेत्रांत आमची विकासाची परमसीमा, आमच्या भावी पूर्णतेची सर्वोच्च अवस्था अगोदरच वास्तवांत असली पाहिजे. त्या विद्यमान अवस्थेकडे जावयाचें व ती आत्मसात् करावयाची हेंच आमचें काम आहे. दिव्य ईश्वरी ज्ञानाच्या पोटांत अगोदरच जी गोष्ट अस्तित्वांत आहे, ती गोष्ट आमचें मन ध्येय म्हणून ठरवितें व मग तिच्या

 

पान क्र. ३०३

 

पाठीमागें तें लागतें, असा नियम आहे. आमच्या अस्तित्वाच्या परिस्थितींत जें शाश्वत सत्य अद्यापि आम्हीं साकार केलेलें नाहीं, त्याचे नांव ध्येय असें असतें. ध्येय म्हणजे अशी कांहीं गोष्ट नसते कीं, जी अस्तित्वांतच नाहीं, किंवा जी शाश्वत ईश्वरी आत्म्याला सुचलेली नाहीं पण आम्हांलाच फक्त--आम्हांसारख्या अपूर्ण जीवांना--सुचलेली आहे आणि जी आम्हीच फक्त अस्तित्वांत आणणार आहों.

याप्रमाणें ध्येयाच्या पाठीमागें लागणारें मन हें आमच्या मानवी जीवनाच्या शास्त्याचें काम करतें. अर्थात् मन कांहीं सर्वतंत्र, स्वतंत्र शासक नाहीं. त्याला बंधनें आहेत, त्याला विरोधक आहेत. तात्विक दृष्टीनें पाहतां, मन म्हणजे अशी जाणीव कीं, जी अविभाज्य अशा समग्र वस्तूचे भाग पाडते, त्यांना सीमाबद्ध करते, त्यांचे मोजमाप घेते आणि या भागांपैकीं प्रत्येक भाग स्वतंत्र व समग्र वस्तु आहे असें कल्पून त्यांचा संग्रह वा समावेश आपल्या पोटांत करून ठेवते. ज्या गोष्टी उघडपणें कोणत्या तरी वस्तूचे अंश असतात, तुकडे असतात, त्यांच्या संबंधांतहि मन आपल्या व्यवहाराचें हें स्वतंत्रतेचें काल्पनिक तत्त्व अंमलांत आणतें; ते तुकडे म्हणजे स्वतंत्र अलग अलग वस्तू आहेत, कोणत्याहि पूर्णाचे भाग नाहींत, असें कल्पून त्यांच्याशीं व्यवहार करतें. विशिष्ट वस्तू मूळ स्वरूपांत आपल्यासमोर नाहींत असें स्पष्ट माहीत असतां देखील, त्या मूळ स्वरूपांतच आपल्यासमोर आहेत अशी कल्पना मनाला करावी लागते; कारण त्याशिवाय त्या वस्तूंच्या संबंधांत त्याला आपली विशिष्ट क्रियासरणी अंमलांत आणतां येत नाहीं. असमग्राला समग्र समजून, अंशाला पूर्ण समजून व्यवहार करण्याचा मनाचा स्वभावधर्म त्याच्या सर्व क्रियांत व्यक्त होतो व सर्व क्रियांचा पाया असतो; त्याच्या कल्पना, त्याच्या अनुभूती, त्याच्या संवेदना, त्याच्या निर्मितिशील विचार-परंपरा--या सर्व गोष्टी त्याच्या स्वतंत्र वस्तुकल्पनेच्या पायावर आधारलेल्या असतात; मन आपली कल्पनाशक्ति, अनुभवशक्ति, संवेदनाशक्ति कामास लावून जेव्हां कांहीं वस्तू स्वतःसमोर उभ्या करतें, तेव्हां त्या वस्तु कोणत्यातरी सलग एकरूप पार्श्वभूमीचें, समग्र अखंड पदार्थाचे तुकडे आहेत असें समजत नाहीं, तर स्वतःला निर्मितिकरितां किंवा भोगाकरितां मिळालेले स्वतंत्र पदार्थ आहेत असें समजतें आणि या समजुतीप्रमाणें त्यांचा उपयोग करतें. एका अखंड पदार्थाचे तुकडे आपल्यासमोर आहेत, अशी जरी मनाला कल्पना झाली, तरी हे तुकडे कायमचेच पडलेले आहेत, त्यांचा व मूळ वस्तूचा कांहीं संबंध राहिलेला

 

पान क्र. ३०४

 

नाहीं, तें स्वतंत्र वस्तूप्रमाणेंच आहेत अशी मनाची समजूत असते. मनाची दृष्टि अशी असल्यानें, त्याची क्रिया असो वा भोग असो--त्यांचा विषय नेहमींच समग्र वस्तू हा असतो. या समग्र वस्तू ह्या, त्यांजपेक्षां मोठ्या अशा समग्र वस्तूचे अंश असतात, तसेंच भोग्य किंवा क्रिया-विषय असलेल्या दुय्यम समग्र वस्तूंचे तुकडे पाडून, मन त्या तुकड्यांना कांहीं उद्दिष्टांच्या दृष्टीनें समग्र वस्तूंच्याप्रमाणें लेखतें. तेव्हां, वस्तूच्या दुप्पट तिप्पट अशा गुणाकाराच्या क्रियेनें पटी करणें किंवा वस्तूंचे भाग पाडणें, त्यांची बेरीज करणें किंवा त्या दुसऱ्या कांहींतून वजा करणें या गणिती क्रिया हें मन करीत असतें; या क्रियांच्या पलीकडे त्याची धांव जात नाहीं. ही आपली नेहमींची चाकोरी सोडून खऱ्या समग्र वस्तूची कल्पना करण्याच्या भानगडींत मन पडलें, कीं भलत्याच अपरिचित वातावरणांत आल्यासारखें त्याला होतें; काय करावें तें त्याला उमगत नाहीं, आपल्या ओळखीच्या भक्कम पायाच्या जमिनीवरून स्पर्शातीत, इंद्रियातीत वस्तूच्या महासागरांत पडल्यासारखें त्याला होतें; अनन्ताच्या महान् दऱ्यांत लोटून दिल्याप्रमाणें तें किंकर्तव्यमूढ होतें, समोर असलेल्या वस्तूचा अनुभव, कल्पना किंवा संवेदना या भांबावलेल्या मनाला मुळींच होत नाहीं; निर्मितीसाठीं किंवा भोगासाठीं त्याच्या समोरच्या वस्तूचा त्याला मुळींच उपयोग करतां येत नाहीं. अनंताची कल्पना वगैरे मनानें केली, अनन्ताची प्राप्ति करून घेऊन, अनन्ताचा उपभोग मनानें घेतला असें जेव्हां आम्हांला वाटतें, तेव्हां खरोखरी अनन्ताशीं मनाची गांठ झालेली नसते; तसें केवळ दर्शनीं दिसतें इतकेंच. अनन्ताच्या विशिष्ट प्रतिमेची मनाला अनुभूति मिळते व ती खुद्द अनन्ताची अनुभूति आहे असा भास त्याला होतो अशी वस्तुस्थिति असते. अरूप, निराकार, महान् तत्त्वाचा अनुभव मनाला अंधुकपणें येऊं शकतो, पण वास्तव दिक्कालरहित अनन्ताचा अनुभव त्याला येऊं शकत नाहीं. अशा वास्तव अनन्ताचा विचार मन करूं लागलें, कीं त्याचा मर्यादा घालण्याचा, तुकडे पाडण्याचा जो अंगभूत स्वभाव तो आपलें काम करूं लागतो आणि मनापुढें खरें अनन्त उभें राहण्याऐवजीं, त्याच्या लहानमोठ्या प्रतिमा उभ्या राहतात. शब्द आणि आकार यांच्याशींच तें व्यवहार करतांना आढळतें. तेव्हां अनन्त हें, मनाच्या आवाक्यांत येणारी वस्तु नव्हे, अनंतानें आपल्याला पोटांत घ्यावें, अनन्तानें आपल्याला जवळ करावें, अशी भावना मनानें करावी हवी तर; कारण अनन्त हें मनावर आपली पांखर घालूं शकतें, त्याला

 

पान क्र. ३०५

 

जवळ घेऊं शकतें. मनाच्या मर्यादेच्या पलीकडे असलेल्या अस्तित्वाच्या स्तरांतून अनन्ताची सत्य वस्तूची तेजस्वी छाया खालीं येऊं शकते आणि या छायेंत मनाला बालकाप्रमाणें असहाय्य अनन्यगतिक होऊन, आनंदमय आराम करतां येतो. अनन्ताची प्राप्ति व्हावयाची, तर त्याकरितां मनाच्या वरतीं असलेल्या अतिमानसिक भूमिकांवर चढून गेलें पाहिजे. अनन्ताचें ज्ञान व्हावयास हवें असेल, तर मनानें नम्र झालें पाहिजे, सत्यज्ञानमय सद्‌वस्तूकडून जे आदेश व निर्देश खालीं येतात, त्यांना अविचल नम्रतेनें स्वीकारून तदनुसार मनानें वागलें पाहिजे.

याप्रमाणें मनाचें मौलिक सामर्थ्य आणि मौलिक मर्यादा काय आहेत तें आपण पाहिलें; मनासंबंधींचें सत्य हें असें आहे, त्याचा स्वभाव आणि स्वधर्म या सत्यावरून ठरतो. वरिष्ठ मायेच्या पूर्ण साधनसामुग्रींत मनाचें स्थान काय आहे, तें ईश्वरी आदेशानें वरीलप्रमाणें ठरविलें आहे. स्वयंभू सद्‌वस्तूची शाश्वत आत्म-कल्पना मनाला जन्म देते व त्याची जी कामगिरी ठरविते ती वरीलप्रमाणें आहे. थोडक्यांत, अनन्ताचें रूपांतर सान्ताच्या रूपांत करणें, अनन्ताला आपल्या मानदंडानें मोजून मापून, मर्यादा घालून, त्याचे अंश अंश करून सोडणें ही मनाची ईश्वरनियोजित कामगिरी आहे; आपल्या जाणिवेंत ही कामगिरी मन करतें आणि ती करतांना, अनन्ताची वास्तव संवेदना पार नाहींशी करून टाकतें. महान अज्ञान (Great Ignorance) म्हणून जो भाग विश्वरचनेंत असतो, त्याचें मूळ याप्रमाणें मनांत आहे. विभागणीचें, वांटणीचें काम मूलत: मनाचें असल्यानें, अशा मनापासूनच अज्ञानक्षेत्राला सुरुवात होते--विश्वाचें मूळ मन आहे, ईश्वरी माया सर्व मनच आहे असाहि कांहींजणांचा अभिप्राय आहे; पण तो चुकीचा समज आहे. वस्तुत: ईश्वरी माया ही, विद्या आणि अविद्या, ज्ञान आणि अज्ञान अशा दोन प्रकारची आहे. जें सान्त आहे, तें मूळ अनन्ताचें दर्शनीं रूप आहे, यापलीकडे कांहीं नाहीं; अनन्ताच्या क्रियाशीलतेंतून सान्ताची उत्पत्ति आहे, अनन्ताच्या कल्पनेचा, सान्त हा खेळ आहे, अशी वस्तुस्थिति आहे; अनन्ताशिवाय सान्त हें अस्तित्वांत येऊं शकत नाहीं, अस्तित्वांत राहूं शकत नाहीं; सान्त अनन्ताच्या पोटांतच राहतें, अनन्त हें सर्वत्र सान्ताची अपरिहार्य पार्श्वभू असतें; सान्त हें अनन्ताला मिळालेला आकार आहे, सान्त हें अनन्ताच्या शक्तीच्या व्यापारानें उदयास येतें, अशी एकंदर वस्तुस्थिति असल्यानें एक अशी मूळ जाणीव अवश्य असली पाहिजे कीं, जिच्या पोटांत सान्त आणि अनन्त दोन्ही

 

पान क्र. ३०६

 

वस्तू एकाच वेळीं असतात, दोन्ही वस्तूंचें दर्शन जिला एकाच वेळीं घडतें, या दोन वस्तूंचे जे संबंध आहेत, ते सर्व जिला अगदीं आतून पूर्णतया कळतात, अवगत होतात, अवगत असतात. या जाणिवेंत अज्ञानाला वाव नसतो; कारण तेथें अनन्ताचें ज्ञान असतें आणि अनंतापासून सान्त वेगळें काढून त्याला स्वतंत्र सत्याचा दर्जा दिलेला नसतो; तथापि येथें मर्यादा घालण्याची क्रिया गौण म्हणून कां होईना सुरू झालेली असते--विश्वाचें अस्तित्व या क्रियेशिवाय शक्य होत नाहीं--या मर्यादीकरणाच्या क्रियेनें, नित्य विभागणी करणारी आणि नित्य विभागलेले भाग एकत्र जोडणारी मनाची जाणीव, मूळ निराकार वस्तूच्या पोटीं साकार अस्तित्व धारण करते; त्याचप्रमाणें त्याच प्रधान मूळ क्रियेनें प्राणाचा-जीवनाचा-- वेगळ्या वेगळ्या दिशांनीं जाण्याचा आणि पुन्हां एका दिशेनें मार्गक्रमण करण्याचा व्यापार अस्तित्वांत येतो; तसेंच अनन्त विभाग झालेलें आणि अनन्त प्रकारें एकत्र येऊन, स्वयंसंघातरूप होणारें जड-द्रव्य त्याच गौण क्रियेनें अस्तित्वांत येतें. ही जी गौणक्रिया नित्याचा द्रष्टा आणि नित्याचा विचारकर्ता अनुसरतो, तिला ईश्वरी मन (Divine Mind) म्हणतां येईल--हा नित्य द्रष्टा पूर्णतया स्वयंप्रकाश आहे, स्वतःचें आणि सर्वांचें पूर्ण ज्ञान त्याला आहे, तो जें काय करतो, त्याचें पूर्ण ज्ञान त्याला असतें. सान्ताला जन्मास घालण्याची क्रिया तो करतो; पण ती करतांना त्या सान्तांतहि त्याला अनन्ताची पूर्ण जाणीव असते. ईश्वरी किंवा दिव्य मनाचें स्वरूप आपण पाहिलें. अतिमानस किंवा सत्य-कल्पना हें ईश्वराचें एकमेव क्रियासाधन आहे, त्या अतिमानसाचीच एक गौण-क्रिया दिव्य-मन ही असली पाहिजे, दिव्यमनरूपी क्रिया ही स्वतंत्र अतिमानसिक क्रिया नव्हे हें उघड आहे. सत्य-जाणिवेची (सत्य-कल्पनेची) जी बाह्य विषयग्राहक क्रिया वर वर्णिलेली आहे, ती क्रिया म्हणजेच दिव्य मनाची क्रिया होय.

कवि आपल्या जाणिवेंतून कांहीं वस्तू निर्माण करतो, त्या तो स्वत:समोर धरतो; स्वत: त्या वस्तूंचा तो निर्माता असतो, त्याच्या निर्मितिशक्तीतून त्या वस्तू त्याने निर्माण केलेल्या असतात, त्या वस्तू स्वत:पासून व स्वतःच्या निर्माणसामर्थ्याहून निराळ्‌या आहेत अशा भावनेनें त्यांना तो स्वतःसमोर धरून त्यांजकडे पाहतो, त्यांचें निरीक्षण-परीक्षण करतो; तथापि ह्या सर्व वेळीं त्या वस्तू त्याच्याहून (निर्मात्याहून) वेगळ्‌या नसतात, वेगळ्‌या केल्या जाऊं शकत नाहींत; त्याच्या अस्तित्वाचा,

 

पान क्र. ३०७

 

जीवनाचा, साकारतेचा 'खेळ' यापेक्षां त्या वस्तूंना खरेखुरें अस्तित्व नसतें--ही कवीची आणि त्याच्या कल्पनांची जशी गोष्ट, तशीच प्रज्ञानाची, अतिमानसाच्या गौण बाह्यग्राहक क्रियेची गोष्ट आहे. सर्वरूप हें एक अविभाज्य आहे, त्याच्या क्रियाशील रूपनिर्मायक अवस्थेंत त्याजकडून घडणारी क्रिया, प्रज्ञान त्या सर्वरूप एकासमोर ठेवतें. अर्थात् ही क्रिया निर्मितिशील ज्ञानाची क्रिया असते आणि सर्वरूप एक हा त्या क्रियेचा मूळ आरंभक आणि ज्ञाता असतो; त्या क्रियेचा मालक तो असतो, साक्षी तो असतो, त्याचीच त्याच्या एका विशिष्ट अवस्थेंत घडलेली ती क्रिया असते. सर्वरूप एकाची जाणीव क्रियाशील होऊन क्रिया करते व ती मूलत: ज्ञानशील असल्यानें स्वतःकडून घडलेली व घडणारी क्रिया ती अवलोकन करते; स्वतःच स्वतःला विषय करून बाह्य-ग्रहणाचें नाटक करणें म्हणजेच प्रज्ञान-कार्य. हें कार्य म्हणजे स्वतःच्या कल्पना स्वतःसमोर ठेवून, त्या स्वतंत्र म्हणून बघण्याच्या कवीच्या कार्याप्रमाणें आहे हें उघड आहे. याप्रमाणें प्रज्ञान हें मूळ विभागणी करतें; ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान ही त्रिपुटी ज्यांत आहे, अशा ज्ञानप्रकाराची उभारणी प्रज्ञान करतें; या विभागणींतून इतर सर्व विभाग-प्रकार उदयास येतात; मूळ एकरूप जाणिवेंत पुरुष आणि प्रकृति यांची उभारणी करणें ही मूळ विभागणी होय. पुरुष म्हणजे ज्ञाता आत्मा; हा आत्मा जाणतो, पाहतो, आपल्या दृष्टीनें सृष्टि-निर्मिति करून तिची व्यवस्था करतो; प्रकृति म्हणजे शक्तिरूप आत्मा, निसर्गरूप आत्मा; हा आत्मा पुरुषाच्या ज्ञानाहून वेगळा असत नाहीं; पुरुषाचें ज्ञान, त्याची दृष्टि, त्याची सृष्टि आणि त्याची सर्वनियामक शक्ति म्हणजे निसर्ग-आत्मा किंवा शक्ति-आत्मा किंवा प्रकृति होय. पुरुष आणि प्रकृति या कांहीं दोन वस्तू नाहींत. त्या एकच वस्तु किंवा एकच 'महाभूत' आहेत. मूळ एकच एक महाभूत असतें. नंतर तें आपल्या दृष्टीच्या प्रभावानें आपले अनन्त आकार उत्पन्न करते, तो स्वत: ज्ञाता व हे सर्व आकार त्याचे ज्ञान विषय; तो स्वत: निर्माणकर्ता व हे सर्व आकार त्याच्या क्रिया-शक्तीचा प्रभाव; ज्ञान तोच, ज्ञाता तोच, निर्माता तोच, निर्माणशक्तिहि तोच, ज्ञान-विषय व शक्ति-कार्यहि तोच. ज्ञात्यापुढें ज्ञान हें ज्ञान-विषय ठेवतें -- निर्मात्यापुढें क्रियाशक्ति ही शक्तिकार्य ठेवते. ही सर्व प्रज्ञानाची अतिमानसाच्या पोटांतील क्रिया होय. प्रज्ञानाची शेवटली क्रिया अशी आहे :-- पुरुष आपल्या अस्तित्वाच्या जाणीवपूर्वक केलेल्या विस्ताराला व्यापून असतो; तो

 

पान क्र. ३०८

 

या विस्ताराच्या प्रत्येक बिंदूचे ठिकाणीं विभक्तपणें असतो आणि त्याच वेळीं समग्र विस्तारांत समग्रतेनेंहि असतो; हा असा पुरुष, प्रत्येक रूपांत राहून, समग्र वस्तु जणुं स्वतःपासून, स्वतःच्या विशिष्ट साकार रूपापासून वेगळी आहे, अशा रीतीनें तिजकडे बघतो व तिजशीं व्यवहार करतो; आपल्या प्रत्येक रूपांतून तो याप्रमाणें समग्र वस्तूशीं विभक्तपणाच्या नात्यानें व्यवहार करतो; त्याचप्रमाणें त्याचीं जीं आत्मरूपें असतात, त्या विविध आत्मरूपांशीं कोणत्याहि एका आत्मरूपांतून व्यवहार करतांना, त्या विशिष्ट आत्मरूपांतील इच्छा आणि ज्ञान ज्या प्रकारचें असेल, त्याला अनुसरून, तो इतर सर्व संबंधित आत्मरूपांशीं विभक्तपणानें व्यवहार करतो. हा विभक्ततेचा व्यवहार ही प्रज्ञानाची शेवटची प्रक्रिया आहे.

विभक्ततेच्या मूलभूत गोष्टी याप्रमाणें अस्तित्वांत येतात. एकच एक परमतत्त्व अनन्त असतें, त्या अनन्ततेचा काल आणि स्थल दृष्टीनें कल्पनाकाशांत जो विस्तार होतो, ती पहिली क्रिया; नंतर ह्या जाणीवपूर्वक आत्मविस्ताराच्या कार्यानें घडलेल्या विस्तारांत सर्वत्र असणारें एकतत्त्वाचें सार्वकालिक अस्तित्व रूपांतरित होऊन, जाणीवयुक्त आत्म्याची अनेकता निर्माण होते; सांख्यांचे अनेक पुरुष बनतात; नंतर तिसरी पायरी म्हणजे अनेक आत्मरूपांचें एकात्मत्व जाऊन, प्रत्येक आत्म्याला वेगळा देह, वेगळें घर, अशी विभक्त संसाराची स्थिति निर्माण होते. एकतत्त्वाचाच विस्तार झालेला असतो परंतु ही वस्तुस्थिति मागें पडून, प्रत्येक आत्मा वेगळ्या घरांत राहत आहे अशी अनुभूति निर्माण होते, ही विभक्त संसाराची तिसरी पायरी होय. जितके पुरुष व आत्मे, तितकीं घरें व देह असा प्रकार होण्याचें कारण, प्रकृति व तिनें निर्माण केलेलें विश्व एक असून, या एकाच प्रकृतीचा, या एकाच विश्वाचा भोग सर्वांना घ्यावयाचा असतो--हे आत्मेहि एकाच परम आत्म्याचीं विविध रूपें असतात व त्यांचे एकमेकांशीं विविध संबंध असतात. प्रत्येक पुरुषाची प्रकृति व जग जर स्वतंत्र असतें, तर पुरुषागणिक घर असा प्रकार व्हावयाचें कारण नव्हतें. पुरुषागणिक प्रकृति नसल्यानें पुरुषागणिक घर व एक भोग्य प्रकृति अशी व्यवस्था अस्तित्वांत येते. प्रत्येक रूपांतील पुरुष त्या रूपाशीं एकरूप होतो. त्याचा व्यवहार या एकरूपतेनें आंखला जातो; आपण याच देहांत आहोंत, इतर देहांत जे इतर आत्मे आहेत, ते मूळ अस्तित्वाच्या दृष्टीनें माझ्याशीं एकरूप असले, तरी संबंधांच्या

 

पान क्र. ३०९

 

दृष्टीनें व विस्ताराच्या दृष्टीनें मजहून वेगळे आहेत, त्यांच्या हालचाली माझ्या परिमाणांच्या दृष्टीनें व दिशांच्या दृष्टीनें भिन्न आहेत, एकच वस्तुतत्त्व, शक्ति, जाणीव व आनन्द यांचा जो उपयोग आणि उपभोग प्रत्येकाकडून कोणत्याहि विशिष्ट काळीं व विशिष्ट स्थळीं व्यवहारांत होत आहे, त्यासंबंधींचा माझा आणि इतर प्रत्येकाचा दृष्टिकोन भिन्न भिन्न आहे--या गोष्टी त्याला त्याच्या जाणिवेंत स्पष्टपणें जाणवतात. एकच पुरुष सर्व रूपांत असला, तरी प्रत्येक रूपांत त्या रूपांशीं एकरूप होऊन वागणें आणि इतर रूपांतहि स्वतःच तो असला, तरी तीं रूपें विशिष्ट रूपांतील स्वतःच्या आत्म्याहून भिन्न आत्मे धारण करणारीं आहेत, अस्तित्वाखेरीज इतर गोष्टींत सर्वजण भिन्न भिन्न आहेत, ही जाणीव प्रतिरूपीं पुरुषाला प्रतीत होते, ही गोष्ट विभक्त संसाराचा उगम समजण्याच्या दृष्टीनें महत्त्वाची आहे. ईश्वरी किंवा दिव्य अस्तित्व पूर्णतया स्वतःविषयीं जागरूक असतें, स्वतःचें ज्ञान त्याला पूर्ण आणि अप्रतिहत असतें, म्हणून प्रज्ञानाची मर्यादीकरणाची क्रिया, विशिष्ट रूपगत आत्म्याची त्या रूपाशीं एकरूप होऊन वागण्याची क्रिया, ईश्वरी किंवा दिव्य अस्तित्वाला, जीवनाला बंधनकारक होऊं शकत नाही. कोणताहि रूपगत आत्मा त्या रूपाचा गुलाम होत नाहीं, त्या रूपापलीकडे इतर रूपांतहि मीच आहे ही गोष्ट तो विसरत नाहीं; म्हणून त्याचें वागणें सर्वात्मभूत आत्म्याचें वागणें असतें--आमची, अदिव्य आत्म्याची गोष्ट वेगळी आहे. आम्ही आमच्या देहाशीं एकरूप झालों आहों; या एकरूपतेचें आम्ही गुलाम होऊन बसलों आहों. आमच्या अहंप्रज्ञ 'मी' ची मर्यादा ओलांडून वागणें आम्हांला जमत नाहीं; काल आणि स्थल यांच्या बंधनांत आम्हाला वागावें लागतें; कालाच्या ओघांत आमची जाणीव विशिष्ट क्षणीं जी विशिष्ट हालचाल करील, तिजवर स्थलदृष्ट्या आमचें विशिष्ट कार्यक्षेत्र अवलंबून असतें; जाणिवेच्या या विशिष्ट हालचालीला दूर सारून, आम्हांला स्वतंत्रपणें कांहीं करतां येत नाहीं; जाणिवेच्या विशिष्ट काळाच्या विशिष्ट हालचालीचे आम्ही गुलाम असतों. आमच्या अस्तित्वाची व जीवनाची ही कथा दिव्य आत्म्याच्या अस्तित्वाला आणि जीवनाला लागूं नाहीं, हें आतांच सांगितलें आहे. तथापि क्षणाक्षणाला आत्मा आपल्या देहाशीं स्वैरपणें एकरूप होत असतो; हें एकरूप होणें क्षणाक्षणाला अस्तित्वांत येतें व अस्तित्वांतून जातें; याचें कारण प्रज्ञान आपलें विघटनेचें व विभागणीचें कार्य करीत असतां; तें आपलें संघटनेचें,

 

पान क्र. ३१०

 

मूळ एकतेचें ज्ञान कायमपणें जिवंत राखण्याचेंहि काम करीत असतें हें आहे. दिव्य आत्म्याचें हें अंगभूत एकत्व-ज्ञान कांहीं कारणानें शिथिल झालें, अकार्यक्षम केलें गेलें, कीं दिव्य आत्मा आपली दिव्यता टाकून विभक्ततेच्या साखळींत--कालाच्या अनुक्रमाच्या आणि स्थलाच्या विभागांच्या भक्कम साखळींत अर्थात् विभक्त जाणिवांच्या आणि विभक्त देहांच्या साखळींत--आपल्यासाठीं कोठलें तरी स्थान कायमचें म्हणून घेऊन बसेल; आमची जाणीव अशीच कालस्थलबद्ध होऊन बसली आहे. अर्थात् हें बंधन आत्मविकासाच्या दृष्टीनें केव्हांतरी दूर होणारें असल्यानें याला 'दर्शनीं बंधन' म्हणतां येतें. तथापि व्यवहारांत विशिष्ट विकास-टप्पा गांठण्यापूर्वीं आमची स्थिति कैद्याची स्थिति असते हें विसरतां येत नाहीं.

तेव्हां, प्रज्ञानाच्या अंतिम प्रक्रियेनें रूपगत साकार आत्म्यांचें (दर्शनी) विभक्तीकरण झालेलें असतें; एका रूपाचें दुसऱ्या कोणत्याहि रूपाशीं नातें हें, जणुं कांहीं तीं रूपें वेगळे वेगळे आत्मे आहेत अशा प्रकारचें झालेलें असतें; एका आत्म्याची इच्छा आणि दुसऱ्या कोणत्याहि आत्म्याची इच्छा यांचें नातें, जणुं कांहीं या इच्छा स्वतंत्र वेगळ्‌या वेगळ्‌या शक्ती आहेत अशा प्रकारचें झालेलें असतें; एका आत्म्याचें ज्ञान आणि दुसऱ्या कोणत्याहि आत्म्याचें ज्ञान यांचें नातें, जणुं कांहीं तीं ज्ञानें अगदीं विभक्त ज्ञानें आहेत अशा प्रकारचें झालेलें असतें. ''जणुं कांहीं'' हा शब्द महत्त्वाचा आहे; दिव्य आत्मा विभक्तपणाच्या देखाव्यानें फसत नाहीं असा त्या शब्दाचा अभिप्राय आहे; मूळ एकतामय निराकार अस्तित्वाचें, 'सर्व' हें साकार रूप आहे हें दिव्य आत्मा जाणतो आणि सत्य-अस्तित्वांतील आपल्या स्थानाला घट्ट धरून राहतो; आपलें एकत्व तो गमावीत नाहीं; आपल्या अनंत ज्ञानाची एक गौण अंगभूत क्रिया या दृष्टीनें तो मनाकडे पाहतो व त्याचा उपयोग करतो; अनंताची स्वतःला कायम असलेली जाणीव बाजूला न ठेवतां, वस्तूंचें विभक्तीकरण व त्यांचें लक्षण करण्याची गौण क्रिया करणारें एक साधन या नात्यानें तो मन वापरतो; मूळ वस्तूची जी मौलिक समग्रता त्याच्या जाणिवेंत स्पष्टपणें ठाम बसलेली असते, तिला प्राधान्य ठेवून, त्या समग्र वस्तूचे विभाग पाडून, त्यांच्या मर्यादा निश्चित करण्याचें काम करणारें साधन म्हणून दिव्य आत्मा मनाला उपयोगांत आणतो. मौलिक समग्रता वेगळी आणि बेरजेनें म्हणजेच एक एक वस्तु जमवून ढीग केल्यानें निर्माण होणारी 'समग्रता' वेगळी; ही दुसऱ्या प्रकारची समग्रता, किंवा दर्शनी अनेकता-अधिष्ठित

 

पान क्र. ३११

 

समग्रता घडविणें, घडणें हा साकारतेच्या व्यवहारांतील मनाचा एक व्यापार आहे; दिव्य आत्म्याच्या व्यवहारांत ही दुसऱ्या प्रकारची समग्रता उदयास आलेली नसते. अतिमानसिक क्षेत्रांत दिव्य आत्मा खऱ्या विभक्तपणाला पोंचत नाहीं. तो मर्यादा असलेल्या देहाशीं एकरूप होऊन वागला, तरी या मर्यादा ओलांडूनहि वागत असतो. त्याचे ठिकाणीं मर्यादा घालण्याची शक्ति असते पण या शक्तीच्या आहारीं तो जात नाहीं, तर तिला तो आपल्या सोईप्रमाणें राबवितो; एकमेकांपासून स्पष्टपणें अलग अलग म्हणून ओळखतां येणारे आकार आणि शक्ति यांचा खेळ खेळतां यावा या उद्देशानें मर्यादीकरण-शक्तीचा उपयोग करून, तो विभक्त वाटणाऱ्या रूपांचा आणि शक्तींचा संसार उभा करतो.

याप्रमाणें दिव्य आत्म्याचें मन, असहाय्यपणें मर्यादाबद्ध नसून, स्वतंत्रपणें मर्यादा घालणारें व काढणारें असतें; हें मन त्याच्याकडून घडणाऱ्या व्यवहाराचें स्वामित्व करतें, त्या व्यवहाराची वास्तव स्थिति तें जाणतें--याच्या उलट परतंत्र जीवाचे मन असहाय्यपणें मर्यादित असलेलें, स्वतःच्या व्यवहाराचें दास व त्या व्यवहारानें फसणारें असें असतें; दिव्य आत्म्याचें मन दिव्य तर अ-दिव्य सामान्य जीवाचें मन अ-दिव्य असतें. हें अ-दिव्य मन दिव्य मनांतून तयार होण्यासाठीं मूळ जाणीवशक्तीची कांहीं विशिष्ट, नवी प्रक्रिया अवश्य असते. ही नवी प्रक्रिया, हा नवा घटक म्हणजे अविद्या होय. अविद्या म्हणजे मूळ जाणिवेची आत्म-विस्मृतीची शक्ति, स्वतःला आत्म-ज्ञानच्युत करण्याची शक्ति, आत्म-नेणीवशक्ति; या शक्तीमुळें अतिमानसिक क्रिया आणि मनाची क्रिया यांच्यामध्यें भक्कम पडदा उत्पन्न होऊन, त्या दोन क्रिया एकमेकींपासून अलग होतात; या भक्कम पडद्याच्या आड राहून, अतिमानस हें मनाची क्रिया आपल्या शासनाखालीं ठेवतें; मनाची क्रिया मूलतः अतिमानसानेंच घडवून आणलेली असते व तिचें अनुशासन तें करीत राहतें; पण आत्म-विस्मृति-शक्तीच्या कार्यानंतर हें अनुशासन तें पडद्याआडून करतें एवढेंच. याप्रमाणें मन अतिमानसापासून वेगळें पडलें म्हणजे त्याला फक्त विशिष्ट गोष्टी दिसतात, सर्वव्यापक तत्त्व दिसत नाहीं; तें कल्पना करूं शकतें फक्त विशिष्ट गोष्टींची; या गोष्टी सर्वव्यापक तत्त्वाच्या पोटीं असूं शकतील अशी अंधुक कल्पना त्याला येऊं शकते, परंतु त्याची याविषयीं खात्री नसते. सर्वव्यापक तत्त्व आणि विशिष्ट गोष्टी दोन्ही अनंत एकतत्त्वाच्या साकारतेच्या लीलेचा भाग आहेत, हें दिव्य मनाला होणारें

 

पान क्र. ३१२

 

ज्ञान तर त्याला मुळींच होऊं शकत नाहीं. याप्रमाणें अविद्येच्या प्रक्रियेनें मर्यादित मन अस्तित्वांत येतें. हें मन प्रत्येक साकार वस्तूला मूळ वस्तु मानतें; ही वस्तु कोठल्या तरी समग्र वस्तूचा स्वतंत्र भाग म्हणून तें कल्पितें; ही समग्र वस्तु तिजपेक्षां मोठ्या वस्तूंत स्वतंत्रपणें असल्याचें दृश्य त्याला दिसतें; याप्रमाणें हें मर्यादित मन मोठाले वस्तुसंघ करूं शकतें, परंतु खऱ्या अनंतत्वाची कल्पना मात्र त्याच्या आवांक्याच्या बाहेर असते; ती त्याला कल्पितां देखील येत नाहीं. मूळ अनंतत्वांतून तें निघालेलें असलें, तरी त्या अनंतापासून तें कायमचें दुरावलेलें असतें. अनन्ताची एक क्रिया म्हणून मनाचा जन्म झाला असल्यानें, वस्तूचे अनंत विभाग पाडण्याची व वस्तू अनंतपणें एकाला एक जोडून अमर्यादपणें संघ करण्याची शक्ति त्या मनाला आलेली असते. हें मन अस्तित्वाचे, एकच एक अस्तिरूप पदार्थाचे, आपल्या विभाजन शक्तीनें अनेक समग्र पदार्थ घडवितें; या नव्या पदार्थांचे लहान लहान पदार्थ करतें, शेवटीं अणु, परमाणु कल्पितें आणि हा परमाणुहि तोडून शेवटीं शून्य बनविण्याच्याहि मार्गांत मन असतें; परंतु शून्य कांहीं त्याला यशस्वीपणें कल्पितां येत नाहीं, कारण मनाच्या विभागणीच्या व्यवहारामागें अतिमानसाचें खरें तारक ज्ञान असतें; प्रत्येक समग्र पदार्थ, प्रत्येक अणु परमाणु सर्व शक्तीचें, सर्वज्ञतेचें, सर्व अस्तित्वाचें केंद्रस्थान आहे, अणु परमाणूंचीं लहान मोठ्या पदार्थांचीं रूपें, हीं सर्वव्यापी शक्तीनें, ज्ञानानें व अस्मितेनें स्वतःच्या लीलेसाठीं घेतलेलीं रूपें आहेत, ही गोष्ट अतिमानस कधीं विसरत नाहीं. या रूपांचें विभजन, विभागलेल्यांचें पुन: विभजन असें होत होत, मनाच्या दृष्टीनें असीम शून्यत्व जेथें प्राप्त झाल्यासारखें दिसतें, तेथें अतिमानसाला शून्य दिसत नसून, ज्या ज्ञानयुक्त पूर्णानें आत्मसंकोच करून विशिष्ट रूप धारण केलें होतें, त्या पूर्णानें परत आपली मूळ अनंत अस्तित्वाची अवस्था स्वीकारली आहे असें त्याला दिसतें. अनंत विभजनानें किंवा अनंत विस्तारानें या पूर्णाची जाणीव ही एकाच स्थानाला किंवा एकाच अवस्थेला पोंचते. ती अवस्था म्हणजे तिचें मूळ स्वरूप--अर्थात अनंत एकता आणि शाश्वत सत्ता, अस्तित्वाची नित्यता. मूळ जाणीव, तिच्या साकार रूपांच्या विस्ताराची वाढ सारखी करीत राहिल्यानें किंवा त्यांचे तुकडे व तुकड्यांचे तुकडे अशी सारखी त्या साकार रूपांची सूक्ष्मता वाढवीत गेल्यानें, दोनहि मार्गांनीं (अनंत वाढीनें किंवा अनंत विभागणीनें) शेवटीं तिचें स्वाभाविक 'रूप' आपल्याला भेटतें.

 

पान क्र. ३१३

 

हें मूळ तत्त्व शाश्वत आहे, एक आहे, अनंत आहे व ज्ञानमय आहे. मनाची विभजनाची क्रिया चालूं असतां, मनाला या अतिमानसिक ज्ञानाचा जर विसर पडला नाहीं, अतिमानसिक एकत्व-अनुभूतीच्या पोटांत मनाची ही विभजन-क्रिया दुय्यम म्हणून चालू असली, म्हणजे विभजन-क्रियेचें खरें तत्त्व मनालाहि उमगतें. तें तत्त्व असें कीं, मनाची विभजन-क्रिया ही खरे तुकडे पाडीत नाहीं, तर मूळ पूर्णाचीं अनेक, अनंत रूपें बनविते; या रूपांत पूर्ण ज्ञानमय रूपें परस्परांशीं अनेक रीतींनीं संबंधित केलीं जातात; स्थलकालनिष्ठ रूपलीला शक्य व्हावी यासाठीं हा दर्शनीं विभजनाचा व्यापार मनाकरवीं केला जातो. मनानें पदार्थाचे तुकडे करून, अगदीं सूक्ष्मतम परमाणु गांठला किंवा पदार्थ वाढवीत वाढवीत, सगळीं विश्वें व विश्वमाला ज्याच्यांत राहतील असा महत्तम पदार्थ मनानें बनविला, तरी दोनहि क्रियांनीं मूळ वस्तु मनाच्या आवाक्यांत येत नाहीं. हे सर्व पदार्थ सूक्ष्मतम व महत्तम अशा एका मूळ शक्तीचीं रूपें आहेत, ही मूळ ज्ञानमय शक्तीच फक्त खरी सत्य आहे आणि तिचे बनलेले सर्व पदार्थ हे शाश्वत शक्तिमय जाणिवेचीं व्यक्त आत्मरूपें या एकाच दृष्टीनें फक्त सत्य आहेत.

आतां असा प्रश्न आहे कीं, आत्म्याच्या व्यापकतेला मर्यादा घालणारी ही अविद्या मुळांत येते कोठून? अतिमानस क्षेत्रांत वावरणारें दिव्य मन दिव्यता टाकून खालीं येतें कसें? या अधःपतनाचा परिणाम म्हणून येणारी विभागणी सत्य आहे, ही कल्पना कशी निर्माण होते? अतिमानसिक व्यापाराची विकृति होऊन अ-दिव्य मन, अविद्या अस्तित्वांत येते; पण कोणत्या व्यापाराची विकृति होते हा प्रश्न आहे. या प्रश्नाचें उत्तर असें आहे कीं, अतिमानसिक क्षेत्रांत जो दिव्य वैयक्तिक आत्मा असतो, त्याच्या व्यापाराच्या विकृतीनें अविद्या अस्तित्वांत येते. हा दिव्य वैयक्तिक आत्मा आपली स्वाभाविक व्यापक दृष्टि सोडतो आणि आपल्या वैयक्तिक दृष्टिकोनांतून सर्व गोष्टी पाहूं लागतो; अन्य सर्व दृष्टिकोन आपल्या कक्षेबाहेर ठेवतो म्हणून अविद्या मूळ धरते. इतर सर्व स्थानें वगळून, एका विशिष्ट स्थानीं आत्म्यानें आपल्या जाणिवेचें केंद्रीकरण करणें, काळाचें आणि स्थळाचें एक विशिष्ट कार्य हें आत्म्याच्या एकंदर जीवनलीलेचा केवळ एक भाग असतांना, तें कार्य म्हणजेच आपलें सर्व जीवन आहे अशी समजूत करून घेऊन, त्याच्याशीं आपलें पूर्ण तादात्म्य करून बसणें, ही जी दिव्य वैयक्तिक आत्म्याची चूक, तीच अविद्येचें मूळ आहे.

 

पान क्र. ३१४

 

कालाच्या एका विशिष्ट क्षणाचें कार्य, स्थळाच्या एका विशिष्ट बिंदूचें कार्य व या बिंदूंत या क्षणीं जें एक विशिष्ट रूप आत्म्याला असतें, तें विशिष्ट रूप -- या गोष्टी वैयक्तिक आत्मा आपल्या म्हणून मानतो आणि ही त्याची बुद्धि बरोबर असते; पण तो ही गोष्ट दृष्टिआड करतो कीं, दुसरे वाटणारे आत्मे तो स्वतःच झाला आहे, दुसऱ्यांचीं वाटणारीं कार्यें त्याचीं स्वत:चीच आहेत. अस्तित्वाच्या आणि जाणिवेच्या दुसऱ्याच्या म्हणून वाटणाऱ्या अवस्था सर्व त्याच्याच आहेत; आत्म्याला झालेली ही विस्मृति हीच अविद्येचें मूळ आहे. अमुक क्षण, अमुक क्षेत्र, अमुक रूप, अमुक व्यापार, यांजवर वैयक्तिक अविद्या-बद्ध आत्मा आपलें सर्व लक्ष केंद्रित करतो; अर्थात् दुसरे सर्व क्षण इत्यादि तो आपल्या कक्षेंतून घालवून बसतो; आणि मग हे घालविलेले क्षण वगैरे पुन्हां मिळविण्यासाठीं त्याला क्रमवारीनें येणारे क्षण, स्थलबिंदू, कालगत आणि स्थलगत रूपें, तसेंच कालगत आणि स्थलगत हालचाली एकत्र जोडून घ्याव्या लागतात. वस्तुत: काल अविभाज्य आहे, शक्ति आणि द्रव्य अविभाज्य आहेत; परंतु अविद्याबद्ध आत्मा हें अविभाज्यतेचें सत्य घालवून बसतो. मन वस्तुत: एक आहे, त्याचे अनेक दृष्टिकोन आहेत, हे अनेक दृष्टिकोन म्हणजेच अनेक मनें होत; प्राणशक्ति एक आहे, ती अनेक क्रियास्त्रोत उदयास आणते, हे अनेक क्रियास्त्रोत म्हणजेच अनेक प्राणमय वस्तू किंवा जीव; शक्ति आणि जाणीवयुक्त द्रव्य एक आहे, अनेक शक्ती आणि जाणीवयुक्त दर्शनी स्थितिशील वस्तू या द्रव्यांतून निर्माण होतात, त्या वस्तू म्हणजेच शरीरे आणि रूपें होत; दर्शनीं स्थितिशील दिसणारीं हीं रूपें आणि शरीरें वस्तुत: स्थितिशील नसतात, सारखीं गतिमान आणि परिवर्तनी असतात; कोणतेंहि रूप वा शरीर बदलतहि असतें आणि एक प्रकारें क्षणक्षणाला आपली पूर्वस्थिति कायम राखण्याचा प्रयत्नहि करीत असतें; येथवर सांगितलेली मनाची, प्राणाची व शरीराची (रुपाची) एकता (द्रव्यदृष्ट्या एकता) अविद्याबद्ध आत्मा विसरून जातो आणि अनेक मनें, अनेक प्राण (जीव) व अनेक शरीरें सत्य आहेत ही कल्पना धरून बसतो. अविद्याबद्ध आत्म्याचा किंवा मनाचा हा धर्म आहे कीं, तें मन प्रत्येक गोष्ट निश्चित ठाम आकारांत वा रूपांत बसविण्याचा प्रयत्न करतें, दर्शनी अपरिवर्तनी आत्मबाह्य घटकांची प्रत्येक गोष्ट बनलेली आहे असें कल्पिण्याचा प्रयत्न करतें; या कल्पनेच्या आश्रयावांचून या मनाला आपलें नियत-कार्य करतांच येत

 

पान क्र. ३१५

 

नाहीं; न बदलणारें असें वस्तुत: कांहींच नाहीं; बदल आणि पुनर्रचना हा सार्वत्रिक नियम आहे. ठाम रूप-तन्मात्र म्हणून कांहीं नाहीं, न बदलणारा बाह्य घटक कोठेंहि नाहीं. न बदलणारें ठाम कांहीं असेल, तर शाश्वत सत्य-कल्पना ही न बदलणारी आहे आणि सारख्या बदलणाऱ्या वस्तूप्रवाहांत रूपांची व संबंधांची कांहीं नियमबद्ध निश्चितता व शाश्वती, शाश्वत सत्य-कल्पनेच्या प्रभावानेंच केवळ शक्य होते; सत्य कल्पनेच्या या प्रभावासारखा प्रभाव, मन आपल्या परीनें आपल्या कार्यांत दाखवूं पाहतें व जें शाश्वत नाहीं तें शाश्वत आहे अशी वृथा कल्पना करून ती पक्की धरून बसतें. जीं सत्यें अविद्येमुळें मन घालवून बसतें, तीं सत्यें त्याला पुन्हां आत्मसात् करावयाचीं असतात, तीं त्याला शोधून काढून आपलीं करावयाचीं असतात; मनाच्या जाणिवेच्या गुप्त भागांत हीं सत्यें नेहमींच उपस्थित असतात, मनाच्या आत्मजीवनाच्या गुप्त प्रकाशांत हीं सत्यें तळपत असतात; पण हा गुप्त प्रकाश मनाला अंधारासारखा झालेला असतो याचें कारण, मनानें संकुचित होऊन अज्ञान निर्माण करून तें पांघरलेलें असतें; त्याचा धर्म अविभाज्याची विभागणी करून, त्या विभागणीचा आत्मलीलेसाठीं धनीपणानें उपयोग करण्याचा असतो; पण तें स्वतःच विभागणीला बळी पडून स्वतःचे तुकडे तुकडे करून घेतें. एका मनाचीं अनेक मनें करून बसतें व स्वत: जीं कार्यें केलेलीं असतात आणि जीं रूपें निर्माण केलेलीं असतात, त्या कार्यांत व रूपांत स्वत: परतंत्रपणें अडकून बसतें.

अज्ञान किंवा अविद्या ही मनुष्याच्या संबंधांत गाढतर होण्याचें कारण मनुष्य हा देहालाच 'स्व' किंवा आत्मा मानतो हें होय. मन हें शरीरावलंबी आहे, शरीराच्या कार्यावर मनाचें कार्य अवलंबून आहे, शरीर अगोदर व मन नंतर असा आपला समज होतो, याचें कारण मन शरीराच्या भानगडींत गुरफटलेलें असतें, त्याचें लक्ष शरीराकडेच सर्वथा किंवा प्रधानतः लागलेलें असतें, स्थूल क्रियांकडे तें लक्ष लावून बघत असतें. या स्थूल जड जगतांत मन जी जाणीवयुक्त वरवरची कृति करण्यांत गुंतलेलें असतें, त्या कृतीसाठीं शरीराच्या क्रियांचा त्याला उपयोग होतो म्हणून त्या क्रियांकडे तें सारखे लक्ष लावून असतें. मनाची शरीरांत राहून जी वाढ झाली, त्या वाढीच्या कार्यक्रमांत मेंदू आणि नाडीसंघ यांचा मनानें विकसित केलेला व्यापार मन नेहमीं उपयोगांत आणीत असतें; मेंदू व नाड्या यांची ही स्थूल यांत्रिक संघटना मनाला जी कांहीं सामग्री

 

पान क्र. ३१६

 

पुरविते, तिचें निरीक्षण परीक्षण करून तिचा उपयोग करण्यांत मन इतकें गढून गेलेलें असतें कीं मागें वळून शरीरावर अवलंबून नसणारें आपलें शुद्ध व स्वतंत्र कार्य करण्याकडे त्याचें लक्षच जात नाहीं. हें स्वतंत्र शुद्ध मानसिक कार्य, बहुतांशी मनाच्या सामान्य जागृत जाणिवेच्या खालीं असलेल्या अप्रकट जाणिवेंत होत असतें. तथापि स्थूल शारीरिक कार्याच्या निरीक्षणांत व उपयोगांत गढलेलें राहण्याची स्थिति विकासक्रमाच्या आवश्यकतेप्रमाणें एका विशिष्ट टप्प्यांत मनाला प्राप्त झालेली असते, ही गोष्ट आपण लक्ष्यांत ठेवली पाहिजे. पुढें विकासक्रमांत ही आवश्यकता दूर होऊन शारीर-कार्यावलंबित्व टाकून मन हें प्राण-कार्यावलंबी होतें. प्राणावलंबी मन, हा प्राणमय पुरुष असा अनुभव घेऊं शकतो कीं तो स्वत: कायम राहून त्याला एका शरीराच्या पतनानंतर दुसरें शरीर त्याच्या पतनानंतर तिसरें शरीर अशीं एकामागून एक शरीरें प्राप्त होत असतात. हा प्राणमय पुरुष किंवा हें प्राणमय मन, प्रत्येक शरीराबरोबर वेगळें निर्माण केलें जातें व त्या शरीराच्या पतनाबरोबर नाहींसें होतें, अशी वस्तुस्थिति नाहीं ही गोष्ट प्राणमय मनाला कळतें. प्रत्येक शरीराबरोबर निर्माण होऊन, जें त्याबरोबर नाहींसें होतें, तें शारीरमन होय; जडावर मनाचा जो भौतिक ठसा उमटविण्यांत येतो, तो शरीराच्या आंत मन राहूं लागल्यानंतर उमटवण्यांत येतो व हा ठसा, हें शारीर मन, शरीराच्या नाशाबरोबर नष्ट होतें. सर्वच्यासर्व मन कांहीं शरीरांत बनविलें जात नाहीं किंवा शरीराच्या नाशाबरोबर नष्ट होत नाहीं. शारीर-मन हें आमचें वरच्या दृष्य पातळीवरील मन आहे; आमच्या मनाचा पृष्ठभाग आहे. स्थूल भौतिक अनुभवासाठीं एकंदर मन आपला जो भाग पुढें करतें, तो भाग म्हणजे शारीर-मन होय. आमच्या पार्थिव शरीरांत देखील शारीर-मनाच्या पाठीमागें अर्धनेणिवेच्या प्रांतांत आमचें मन काम करीत असतें; जागृत जाणिवेच्या खालील भागांत काम करणाऱ्या या मनाला हें ठाऊक असतें कीं, आपण शरीराहून अधिक व्यापक आहों आणि शारीर-मनाला जें केवळ जडनिष्ठ कार्य करावें लागतें, त्यापेक्षां जडावर कमी अवलंबून असणारें अधिक कार्य आपल्याला करतां येतें. आमच्या पृष्ठभागीय मनाकडून जें विशेष व्यापक, खोल आणि जोरदार गतिशील कार्य घडतें, तें खरोखरी या अंतर्मनाचें, अर्धनेणिवेच्या मनाचें प्रत्यक्ष कार्य असतें. हें अन्तर्मन आपल्याला कळूं लागलें किंवा त्याचा आपल्यावर होणारा प्रभाव आपणाला कळूं

 

पान क्र. ३१७

 

लागला म्हणजे त्यालाच आपण आंतर-पुरुष किंवा प्राणमय पुरुष म्हणतो; आत्म्यासंबंधाची पहिली कल्पना म्हणजे हा प्राणमय-पुरुष होय.

या प्राणमय मनाकडून शारीर-मनाचे प्रमाद होत नाहींत. तथापि मनाची सर्वच क्रिया बिनचूक करणें ही गोष्ट या प्राणमय मनाकडूनहि घडत नाहीं. मूळ अविद्येचें कार्य त्याजवरहि स्वामित्व गाजवीत असतें; वैयक्तिक झालेला आत्मा आपल्या एकट्याच्या दृष्टिकोनांतून सर्व गोष्टी पाहतो व त्यांचें खरेंखोटेंपण, बरेंवाईटपण ठरवितो; हा वैयक्तिक दृष्टिकोन प्राणमय मनाचे ठिकाणीं असतो व त्याजकडून तो चुका घडवितो; वैयक्तिक झालेल्या आत्म्याला आणि या प्राणमय मनाला जें वस्तुजातांतील सत्य उमगतें तें आंतून व पूर्णतया उमगत नाहीं; बाहेरून त्याच्यासमोर वस्तू येतात आणि या समोर आलेल्या वस्तूंचें सत्य अंशत: त्याच्या प्रत्ययास येतें इतकेंच; या प्राणमय मनाची जाणीव काल-स्थल-विशिष्ट अशी स्वतंत्र जाणीव असते; त्याचा जुना आणि नवा अनुभव, जीं रूपें घेतो आणि जें परिणाम घडवितो ते या स्वतंत्र जाणिवेच्या द्वारां त्याच्या नजरेसमोर येतात आणि मग वस्तुजातांतील कांहीं सत्य त्याला कळतें इतकेंच; या अपूर्ण सत्यामुळें त्याच्या हांतून प्रमाद घडत राहतात. या प्राणमय मनाचें, पुरुषाचें सर्वच प्राणमय पुरुष वस्तुत: आत्मरूप असतात; परंतु तो ज्या शरीरांत राहतो, त्या शरीरांहून भिन्न शरीरांत राहणाऱ्या त्याच्या आत्म्यांचें ज्ञान त्याला प्रत्यक्ष मुळींच होत नाहीं; हे दुसरे आत्मे विचार, भाषा, कृति, कृतीचीं फळें यांच्याद्वारां आपलें जें अस्तित्व बाहेरून व्यक्त करतात तें फक्त, या प्राणमय मनाला किंवा पुरुषाला ज्ञात होतें; तसेंच शारीर पुरुषाला प्रत्यक्ष भासत नाहींत असे प्राणमय संबंध आणि प्राणमय आघात, दुसऱ्या आत्म्यांकडून एका विशिष्ट शरीरांतील आत्म्यावर किंवा प्राणमय पुरुषावर घडतात आणि या सूक्ष्म सूचक खुणांनीं इतर आत्म्यांची जाणीव विशिष्ट शरीरधारी प्राणमय मनाला किंवा आत्म्याला होत असते; अर्थात् या जाणिवेंत पूर्ण सत्य असत नाहीं व म्हणून प्राणमय मनाकडून किंवा पुरुषाकडून प्रमाद घडतात. ज्याप्रमाणें इतर आत्म्यांसंबंधीं पूर्णज्ञान प्राणमय मनाला होत नाहीं, त्याप्रमाणें स्वतःसंबंधींचें त्याचें ज्ञान देखील अपुरें असतें; कारण जी कालगत हालचाल त्याच्याकडून घडते, ती त्याला स्वतःसंबंधींचें जेवढें ज्ञान करून देतें तेवढेंच त्याचें स्वतःसंबंधींचें ज्ञान; अनेक देह क्रमवारीनें धारण करून, प्राणमय मन किंवा पुरुष आपल्या शारीर शक्तींचा विविध रीतींनीं विनियोग करतो.

 

पान क्र. ३१८

 

या क्रमवार देहधारणाच्या क्रियेनें होईल तेवढेंच त्याचें स्वतःसंबंधींचें ज्ञान; अर्थात् हें ज्ञान अपुरें असतें. प्राणमय मन किंवा पुरुष स्वत:संबंधींहि अज्ञानांत असतो असें म्हणतां येतें. यंत्रवत् कार्य करणारें शारीर-मन, 'शरीर सत्य आहे' या भ्रमानें कार्य करणारें असतें; त्याप्रमाणें नेणिवेच्या प्रांतांतील कृतिशील असलेलें मन किंवा प्राणमय मन, 'प्राण हेंच सत्य आहे' या भ्रमानें कार्य करणारें असतें. प्राणमय मन प्राणांत केंद्रित झालेलें व त्या प्राणानें मर्यादित झालेलें असतें; प्राणमय मन आपलें जीवन प्राणाशीं एकरूप करून असतें; त्याच्याशीं त्याचें तादात्म्य झालेलें असतें. मन आणि अतिमानस यांचा जेथें वियोग होतो, जेथें मन अतिमानसापासून वेगळें होऊन स्वतंत्रपणें कार्य करूं लागतें, तें दोघांच्या शेवटल्या मीलनाचें स्थान मात्र, प्राणमय-मन नव्हे. गतिशील प्राणमय मनाच्या पाठीमागें विचारमय शुद्ध मन आहे. हें मन प्राणाशीं तादात्म्य करण्याचें टाळूं शकतें, प्राण आणि शरीर या दोनहि वस्तू स्वतःपासून निराळ्‌या आहेत हें ज्ञान या विचारमय मनाला असतें. या दोन वस्तू आत्मसात् करून, आपलीं शक्तिकार्यें हें मन प्रत्यक्षांत आणतें. आपल्या विचारांत आणि इच्छाक्षेत्रांत जी शक्ति त्याला प्रतीत होते, त्या शक्तीचें कार्य खालच्या पातळीवर व्यक्त करण्यासाठीं, प्राण आणि शरीर यांचा आश्रय मी करीत आहे ही जाणीव या विचारमय मनाला स्पष्ट असते. शक्तीची कृतिशीलता, गतिमानता ही प्राण व शरीर यांच्याखेरीज व्यक्त होऊं शकत नाहीं. विचारमय शुद्ध मनाच्या क्षेत्रांत विचार आणि इच्छा यांचाच संभार असतो. या विचारांना आणि इच्छांना अनुरूप अशी शक्तिक्रिया करण्यासाठीं, या शुद्ध मनाला प्राण आणि शरीर यांचा आश्रय घ्यावा लागतो. आमच्यामध्यें शुद्ध विचारक म्हणून जो असतो, तो म्हणजे हें विचारमय मन. खरी स्वाभाविक मानसिक शक्ति म्हणजे हें विचारमय मन. या मनाला जें विश्व दिसतें, तें प्राणमय किंवा शरीरमय दिसत नाहीं, तर मनोमय दिसतें. विकासक्रमांत शारीरमन व प्राणमय मन यांचा अनुभव घेऊन, या शुद्ध विचारमय मनापर्यंत-- मनोमय पुरुषापर्यंत आपण जेव्हां पोंचतो-- (परत येऊन पोंचलों असें म्हणणें योग्य, कारण अगोदर मूळ चैतन्य हें जडाकडे जातांना या मनोमय पुरुषाच्या अवस्थेंतून खालीं प्राणमय व शारीर पुरुषाच्या अवस्थेंत उतरलें होतें व नंतर जडाशीं एकरूप झालें होतें.) तेव्हां या पुरुषाला आपण शुद्ध चैतन्य मानूं लागतों; जसें पूर्वीं गतिशील

 

पान क्र. ३१९

 

प्राणमय मनाला आपण आत्मा समजलों, तसेंच मनोमय पुरुषाला आपण आत्मा समजूं लागतो; तथापि हा आत्मा नव्हे. मनाचा मूळचा प्रमाद या शुद्ध विचारशील मनालाहि चुका करण्यास भाग पाडतो. शुद्ध मन हें, शारीर आणि प्राणमय मनाहून श्रेष्ठ दर्जाचें असतें. दुसरे आत्मे आपल्या शुद्ध स्वत्वाचीं दुसरीं रूपें आहेत, तें ज्या शरीरांत आहे त्या शरीरांत त्याचें एक रूप व इतर शरीरांत त्याचीं दुसरीं रूपें आहेत हें या श्रेष्ठ मनाला कळतें व या ज्ञानानुसार तें सर्वांशीं वागतें; या दुसऱ्या आत्म्यांचा अनुभव या श्रेष्ठ मनाला केवळ मानसिक संपर्कानें व संवादानें करून घेतां येतो. केवळ प्राण आणि शरीर यांच्याद्वारां मिळणाऱ्या सूचनांनीं इतर आत्म्यांची ओळख करून घ्यावी अशी स्थिति या श्रेष्ठ मनाची नसते; एकता हें तत्त्व या मनाला स्पष्टपणें उमगतें व या एकतेचें मानसिक प्रतीक तें बनवितें; याची कृति आणि इच्छा व्यापक असते, स्वतःच्या जीवनांत आणि मनांत ज्याप्रमाणें हें मन कांहीं निर्मिति करून, तिचा उपभोग स्वामित्वानें घेतें, त्याप्रमाणें इतर आत्म्यांच्या मनांत व जीवनांत आपल्या कृतीनें व इच्छेनें तें कांहीं निर्मिति प्रत्यक्षपणें करून, तिचा स्वामित्वानें उपभोग घेऊं शकतें. सर्वसाधारण भौतिक जीवनांत आपल्याला दुसऱ्यांच्या मनांत व जीवनांत कांहीं नवें निर्माण करावयाचें, तर तें प्रत्यक्षपणें निर्माण करतां येत नाहीं--शरीराच्या व प्राणमय मनाच्या द्वारां आपल्याला अप्रत्यक्षपणें नवनिर्मितीचें काम करावें लागतें हें सर्वांस विदित आहे. जी गोष्ट निर्मितीची तीच उपभोगाची. हा उपभोगहि अप्रत्यक्षपणें घेणें आम्हांला शक्य असतें. श्रेष्ठ मनाप्रमाणें प्रत्यक्षपणें सर्वांच्या जीवनांतील व मनांतील भोगांचा उपभोग आम्हांला घेतां येत नाहीं. असो. याप्रमाणें श्रेष्ठ शुद्ध विचारमय मनाला पुष्कळशा गोष्टी व्यापकपणें करतां येत असल्या, तरी मनाची मूलभूत भ्रांति येथेंहि असते. श्रेष्ठ मन हेंहि, आपल्या सर्वांहून अलग व स्वतंत्र असलेल्या आत्म्याला विश्वाचा निरीक्षक, परीक्षक व केंद्र मानतें आणि या स्वतंत्र आत्म्याच्या द्वारां आपल्या सर्वोच्च परमात्म्याला व वस्तुतत्त्वाला गांठण्याचा प्रयत्न करतें; दुसरे आत्मे याला 'दुसरे' असतात. एवढेंच कीं ते याच्या अंवतींभोंवतीं आपुलकीनें गोळा झालेले आहेत, असें हें श्रेष्ठ मन मानतें; याला मुक्त होण्याची इच्छा झाली म्हणजे प्राण आणि मन यांजपासून हें परावृत्त होतें आणि मूळ सत्यरूप एकतत्त्वांत विलीन होतें. अविद्येचा पडदा अद्यापि त्याजवर असल्यानें, हें असें श्रेष्ठ मनाचें वर्तन

 

पान क्र. ३२०

 

होतें. मन आणि अतिमानस यांच्या क्रिया अविद्येचा पडदा मध्यें आल्यानें वेगळ्‌या वेगळ्‌या होतात. अतिमानसिक क्षेत्रांत मुक्तपणें वावरणारें सत्य या पडद्यामुळें मनाच्या क्षेत्रांत उतरत नाहीं; या सत्याची छाया मात्र या पडद्यांतून मनांत उतरूं शकते.

अतिमानस आणि मानस यांना एकमेकांपासून विभक्त करणारा अविद्येचा पडदा फाडून टाकला, अनेकधा विभागलेलें मन अविद्येचा पडदा फाटून गेल्यानें निःसत्त्व झालें आणि अतिमानसाच्या क्रियांचा तें शांतपणें विनयशीलपणें मार्गदर्शक व आत्मोद्धारक म्हणून स्वीकार करूं लागलें म्हणजे वस्तुजातांतील मूळ सत्य या मनाला पुन: पूर्णपणें प्रतीत होऊं शकतें. अविद्येचा पडदा फाटला म्हणजे विचारमय मन प्रकाशानें भरलें जातें आणि दिव्य सत्यमय उन्मनाचें (सत्यकल्पनेचें) काम तें आज्ञाधारकपणें यंत्रवत् करूं लागतें. या ठिकाणीं विश्वाचें खरें स्वरूप आपल्याला स्पष्ट दिसतें; प्रत्येक प्रकारें आम्ही दुसऱ्यांत असल्याचें, दुसरें असल्याचें किंवा दुसरे आपण असल्याचें ज्ञान तितकेंच स्पष्टपणें होतें; आणि सर्वजण विश्वव्यापी एकतत्त्वच बनलें आहे, एकतत्त्वानें स्वतःला स्वयंप्ररणेनें अनेक रूपांनीं व्यक्त केलें आहे, एकतत्त्व स्वयंप्रेरणेनें सर्व बनलें आहे असा स्वच्छ प्रकाश आम्हांला प्राप्त होतो. वैयक्तिक दृष्टिकोन स्वतंत्रपणें व अलगपणें आतांपर्यंत काम करीत होता, लवचिकपणा किंचितहि त्यांत नव्हता; अशी स्थिति या नव्या ठिकाणीं राहत नाही. सर्व मर्यादा, बंधनें, भ्रम, प्रमाद यांचें मूळ म्हणजे हा बिनलवचिक वैयक्तिक दृष्टिकोनच असतो. अविद्येचा पडदा फाटल्यावर तो समूळ नाहींसा होतो. अविद्याबद्ध मन जें सत्य म्हणून समजत होतें, तें सत्य नव्हतें असें मात्र नव्हे; तें सत्यच होतें पण वक्रतेनें दूषित झालेलें, भ्रमाने भरलेलें व मिथ्या कल्पनेनें भारलेलें असें तें सत्य होतें हें आपण आतां उमजतों. आतांहि आपल्याला विभाग दिसतात; व्यक्ती, अणु, परमाणु यांची दृष्टि आतांहि आपल्याला प्रतीत होते; पण हें सर्व वस्तुत: काय आहे, आपण वस्तुत: काय आहों, हें ज्ञान आपल्याला या ठिकाणीं स्पष्ट असतें. दिव्य-मन आणि सत्यमय जाणीव किंवा अतिमानस यांचा अन्योन्यसंबंध येथें आपल्याला स्पष्ट दिसतो. दिव्यमन हें वस्तुत: सत्यमय जाणिवेचें एक गौण कार्य आहे, व्यवहाराचें एक गौण साधन आहे हें आपल्याला दिसतें. जोंपावेतों अतिमानसिक स्वामित्व-जाणिवेला, सर्वसमावेशक सर्वेशत्व-जाणिवेला अवमानून मन आपलें वेगळें आत्मत्व कल्पून,

 

पान क्र. ३२१

 

वेगळें घर करून वागत नाहीं, एक साधन म्हणून सर्वेशत्व-जाणिवेचें काम निमूटपणें करतें, आपल्या खासगी लाभासाठीं कांहीं गोष्ट आपल्या मालकीची समजत नाहीं, तोंपावेतों तें त्याचें नियत कर्तव्य सोज्ज्वळपणें करूं शकतें व करीत असतें. विश्वांत सत्य एक व रूपें अनेक अशी वस्तुस्थिति आहे. मन आपलें कर्तव्य जेव्हां योग्य रीतीनें करतें, तेव्हां हीं अनेक रूपें एकमेकांपासून वेगळीं ठेवण्याचें काम तें करतें, मात्र हें वेगळेपण त्यांच्या त्यांच्या मर्यादित व्यापारानुसार केवळ तांत्रिक वा वरवरचें असें कल्पिलेलें असतें. आत्म्याची एकच एक सर्वव्यापी स्पष्ट व निर्दोष अशी जाणीव, त्या तांत्रिक वेगळेपणाच्या मागें त्याचें व्यवहाराचें नियंत्रण व शासन करीत असते. हें दिव्य-मन सत्याच्या आश्रयानेंच नेहमीं काम करतें, सत्याला केव्हांहि दृष्टीआड करीत नाहीं; स्वत: वस्तुसत्य आत्मसात् करून, त्या सत्याची वांटणी सर्वोच्च सर्वव्यापी आत्मदृष्टीच्या व आत्म-संकल्पाच्या बिनचूक प्रतीतीनुसार व्यक्तीव्यक्तींत व रूपारूपांत करणें हें दिव्य-मनाचें काम असतें. क्रियाशील जाणीव, आनंद, शक्ति व द्रव्य यांचें व्यक्तीव्यक्तींत वांटप हें दिव्य-मन करतें आणि या वांटपाची सर्वसमर्थता, सत्यता व आनंदमयता, व्यक्तींच्या पाठीमागें असलेल्या अनिवार्य सर्वव्यापी आत्म्यामुळेंच शक्य आहे ही जाणीव दिव्य-मन नेहमीं ठेवतें. एकतत्त्वाचीं अनेक रूपें वरकरणीं विभक्त ठेवण्याचें, या रूपांचे अन्योन्यसंबंध निश्चित करण्याचें व या संबंधांना कमी अधिक स्थायी रूप देऊन हीं अलग झालेलीं सर्व रूपें पुन: एक होऊन एकमेकांत मिळतील असें करण्याचें काम दिव्य-मनाचें असतें. शाश्वत एकता आणि शाश्वत अन्योन्यसंमीलन हें सत्य नित्य पुढें ठेवून, त्याच्या पोटांत व्यक्ती अलग होऊन पुन: अन्योन्य-संपर्काचा आनंद भोगतील अशी व्यवस्था करण्याचें काम दिव्य-मनाचें असतें. मूळ सत्य एकचएक आत्मा हें आहे. या आत्म्यानें आपली मूळ एकता नित्य संभाळून, वरकरणी व्यक्ति होऊन, इतर व्यक्तींशीं नानाविध व्यवहार करण्याचा खेळ खेळावा अशी व्यवस्था करणें हें दिव्य-मनाचें काम आहे. विश्व हें वस्तुत: अशा खेळाचें क्षेत्र आहे; असा खेळ म्हणजेच विश्व होय. त्रिपुटीयुक्त (त्रिपुटी = ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान) सत्यमय जाणिवेचें अंतिम कार्य म्हणजे दिव्य-मन आणि या दिव्य-मनामुळेंच वर सांगितलेला एकतत्त्वाचा अनेकतामय व्यवहार शक्य होतो. अविद्या, अज्ञान म्हणून जें ओळखलें जातें, तें कांहीं नवी गोष्ट बनवीत नाहीं; किंवा सर्वस्वीं मिथ्या अशी गोष्टहि बनवीत नाहीं. तें केवळ

 

पान क्र. ३२२

 

यथातथ्यता टाकून अयथार्थतेनें आपणापुढें सत्य ठेवीत असतें. परम सत्य, एकचएक आत्मा विश्वरूपानें व्यक्त झाला आहे आणि हा विश्वरूपाचा खेळ सर्वथा सुसंवादित्वानें चाललेला आहे. हेंच परम सत्य, सर्व ज्ञानाचें मूळ आहे, या मुळांतूनच दिव्य-मनाचें ज्ञान येतें; दिव्य-मन त्याच्या ज्ञानाच्या उगमापासून--मूळ आत्म्यापासून--जाणिवेनें, कल्पनेनें विभक्त होणें म्हणजेच अविद्या, अज्ञान होय; मी वेगळा, आत्मा वेगळा अशी जाणीव म्हणजे अज्ञान वा अविद्या. विश्वाच्या सुसंवादमय खेळांत अविद्याग्रस्त किंवा अदिव्य मन विसंवाद आणि विरोध यांचा देखावा पाहतें, हे विसंवाद आणि विरोध तात्पुरते नसून कायम स्वरूपाचे आहेत, असा समज करून घेतें, पण हा त्याचा समज खोटा असतो, त्याला दिसणारा केवळ वरवरचा देखावाच असतो. वस्तुत: विश्वरूपानें झालेला परम सत्याचा आविष्कार सुसंवादमय आहे, यांतील कोणतेच दर्शनी विसंवाद कायम स्वरूपाचे नसून, व्यापक व अंतिम दृष्टीनें ते विश्वखेळाच्या सुसंवादित्वांत भर घालणारे आहेत. त्यांत जे विसंवाद, विरोध व जो कडक एकांगीपणा दिसतो, तोहि अज्ञानामुळे दिसतो. वस्तुत: या खेळांत लवचिक नियमांनीं काम चालत असतें. खोटाच कडकपणा, खोटाच विसंवाद व विरोध खरा म्हणून जें भासवितें तेंच अज्ञान. दिव्य-मन अतिमानसिक सत्यमय जाणिवेपासून सत्यज्ञान मिळवितें; तें या ज्ञानाच्या उगमापासून दूर होऊन वेगळें झालें, स्वतःला वेगळें व स्वतंत्र समजू लागलें म्हणजे अज्ञानाचा प्रभाव सुरू झाला, दिव्य मनाचें अदिव्य मन झालें असें समजावें.

तेव्हां, मनाची मूलभूत चूक ही कीं, तें आत्मज्ञानच्युत होतें, आत्मस्वरूपासंबंधाचें सत्यज्ञान तें घालवून बसतें; या च्युतीमुळें, या अध:पतनामुळें वैयक्तिक आत्मा आपलें व्यक्तित्व एक स्वतंत्र वस्तु आहे असें मानूं लागतो, एकमेव अद्वितीय सत्याचें अनन्तरूपांतील एक रूप आपण आहों याची विस्मृति त्याला होते; विश्वव्यापक, विश्वरूप एकमेव सत्याच्या अनेक, अनंत केंद्रांपैकीं एक केंद्र आपण आहों, या गोष्टीचा विसर त्याला पडतो आणि स्वतःला स्वतंत्र केंद्र समजून, आपल्याभोंवतीं स्वतंत्र विश्व उभें करण्याची चूक तो करतो. वैयक्तिक आत्म्याची मूलभूत चूक वर सांगितली-- या चुकीचा परिणाम म्हणून त्याचे ठिकाणीं नाना प्रकारचें विशिष्ट अज्ञान उत्पन्न होतें; तसेंच नाना प्रकारच्या विशिष्ट मर्यादा व बंधनें त्याला अडवितात आणि त्याचें जीवन संकुचित करतात. नदीच्या

 

पान क्र. ३२३

 

अखंड प्रवाहाप्रमाणें वस्तुजात हें प्रवाही आहे. या प्रवाही विश्वाचा कांहीं अंश वैयक्तिक आत्म्यावरून व आत्म्यांतून वाहत चोहोंकडे पसरतो, वैयक्तिक आत्मा हा अंशच फक्त बघतो; वैयक्तिक आत्मा या अंशदर्शित्वामुळें आपल्या अस्तित्वाला मर्यादा घालतो; त्याचें अस्तित्व मर्यादित झालें कीं त्याची जाणीव, अर्थात् त्याचें ज्ञान, जाणीवयुक्त शक्ति व इच्छाशक्ति अर्थात् सामर्थ्य, आणि आत्मानन्द अर्थात् जीवनानन्दहि मर्यादित होतो. वैयक्तिक आत्म्याला वस्तूंचें जें ज्ञान होतें तें, त्याच्या व्यक्तित्वावर वस्तूंचा जो ठसा उमटेल, त्याच्या व्यक्तित्वाला वस्तूंचा जो देखावा दिसेल त्यावरूनच केवळ होतें; अर्थात् या देखाव्यांत अंतर्भूत न होणाऱ्या अशा गोष्टींचें ज्ञान त्याला होत नाहीं; त्यांच्यासंबंधानें तो अज्ञानांत राहतो आणि म्हणून जें ज्ञान आपल्याला झालें असें तो मानतो, तेंहि बिनचूक असूं शकत नाहीं; सर्व अस्तित्व अन्योन्यावलंबी असल्यानें सर्वाचें ज्ञान, निदान सारभूत भागाचें ज्ञान असल्याशिवाय कोणत्याहि भागाचें यथार्थ ज्ञान होऊं शकत नाहीं. मानवी ज्ञानांत या कारणानें चुकीचा भाग सर्वत्र असतो. ही मानवी ज्ञानाची गोष्ट झाली. आमची इच्छाशक्ति सर्वेशाच्या इच्छाशक्तीचा एक अंशरूप असते; अर्थात् ही आमची आंशिक इच्छा ईश्वराची तदितर इच्छा जाणत नसल्यानें, कार्यप्रवणतेनें कामास लागली तरी कामांत निश्चितपणें चुका करते, तिचें कार्य प्रमादशील होणें अनिवार्य असतें आणि कमी अधिक असमर्थता आणि दुर्बळता तिच्या वांट्यांस अटळपणें येते; तसेंच त्याचा आत्मानन्द आणि वस्तुनिष्ठ आनंद हा सर्वेशाचा सर्वानन्द जाणत नाहीं, तो जाणून घेण्याची शक्ति त्याला नसते व भावनाहि त्याला नसते; त्याची इच्छाशक्ति दुर्बळ, त्याची ज्ञानशक्ति दुर्बळ अर्थात् जें विश्व तो स्वतःचें म्हणून मानतो, तें त्याला आपल्या तंत्रानें चालविणें अशक्य होतें--अर्थात् वस्तुनिष्ठ वस्तुशासनाचा आनंद त्याला हवा तसा प्राप्त होत नाहीं. एकंदरींत सर्वानन्दाच्या प्रतीतीच्या अभावीं, त्याचा आत्मानंद हिणकस आणि वस्तुविजयाच्या अभावीं वस्तुनिष्ठ आनंदहि हिणकस, अशी त्याची स्थिति होते; आत्मजयाचा आणि वस्तुजयाचा आनन्द मिळविण्याची अपात्रता त्याचे ठिकाणीं स्वतंत्र व्यक्तित्वामुळें आल्यानें, त्याला दुःखभोग अनिवार्य होतो. याप्रमाणें अविद्या, आत्मविषयक अज्ञान हेंच आमच्या जीवनाच्या एकंदर विकृतीचें एकमेव मूळ आहे, आत्मविषयक अज्ञानानें अहंभावाचें रूप घेतलेलें आहे, या अहंभावानें आत्म्याला मर्यादांचें बंधन

 

पान क्र. ३२४

 

घातलेलें आहे; हें बंधन व हा अहंभाव सर्व जीवनविकृतीचा भक्कम आधार होऊन बसला आहे.

तथापि एक गोष्ट ध्यानांत ठेवणें अवश्य आहे ती ही कीं, अज्ञान आणि विकृति ही कांहीं निर्भेळ असत्याचा खेळ नव्हे, तर वस्तुजातांतील सत्य आणि ऋत यांचा कमीअधिक विपर्यास मात्र आहे. मन हें स्वभावत: विभाग पाडतें, यांत कांहीं दोष नाहीं; पण स्वत: पाडलेल्या विभागांच्या पोटीं तें स्वतःला बंद करून घेतें आणि या बंदीखान्यांतून विश्वाकडे बघतें; म्हणून सर्व सत्यविपर्यास होतो. त्यानें जर स्वतःकडे आणि स्वत: पाडलेल्या सत्य वस्तूच्या विभागांकडे, तीं सत्याच्या-सच्चिदानन्दाच्या लीलेचीं साधनें वा लीलेसाठीं घडलेलीं दर्शनी रूपें आहेत, या दृष्टीनें पाहिलें, तर सत्यविपर्यास होण्याचें आणि त्याचा परिणाम म्हणून जीवन विकृत होण्याचें कांहीं कारण राहणार नाहीं. ज्या सत्याला विसरून दिव्य-मन पतित होऊन, सामान्य मानवी मन झालें, त्या सत्याचा आश्रय त्यानें जर परत केला, तर सत्यमय जाणिवेचें अंतिम त्रिपुटीयुक्त कार्य हें स्वरूप त्याला परत प्राप्त होऊन, या दिव्य अवस्थेंत प्राप्त होणाऱ्या सामर्थ्यानें व प्रकाशानें जे संबंध हें दिव्य-मन निर्माण करील, ते सर्व संबंध सत्यमय असतील; विकृतिमय असणार नाहींत. वैदिक ऋषि वस्तूंचें आणि घटनांचें ऋजु (सरळ गोष्टी) व वक्र (वांकड्या, वळणावळणाच्या गोष्टी) असें वर्गीकरण करतात. या उद्‌बोधक वर्गीकरणानुसार बोलावयाचें, तर सत्याचा परत आश्रय करणाऱ्या मनाकडून घडून येणारे वस्तुसंबंध ऋजू, सरळ असतील; वक्र, वळणावळणाचे असणार नाहींत; दुसऱ्या शब्दांत म्हणावयाचें, तर हें सत्याश्रयी मन दिव्य, ईश्वरी जीवनाचीं सत्यें पुन: प्रस्थापित करील; मन सत्याश्रयी झाल्यानें, वैयक्तिक आत्मा हा व्यक्तित्वाला त्याचें योग्य (ईश्वरी लीलेचें साधन म्हणून) स्थान देऊन, ईश्वरी अस्तित्वाशीं एकरूप होईल आणि त्या अस्तित्वाशीं निगडित असलेली आत्मतंत्र दिव्य-जाणीव, इच्छा व आनन्द आत्मसात् करून, आपल्या सर्व क्रिया, आपल्या स्वतःच्या अनन्त क्षेत्रांत पूर्ण सुसंवादित्वानें करीत राहील. सध्यां आमची वाटचाल सरळ मार्गानें होत नाहीं. मन आणि प्राण यांची वाटचाल म्हणजेच आजची आमची वाटचाल. यांची आजची हालचाल वाकड्‌यातिकड्‌या वळणावळणांनीं चाललेली आहे. आमचा आत्मा स्वतःचें खरें स्वरूप विसरून बसला असून, तें स्वरूप पुन: प्राप्त करून घेण्यासाठीं

 

पान क्र. ३२५

 

धडपड करीत आहे; या धडपडींत त्याला वेडेवांकडे अंगविक्षेप करावे लागत आहेत; आमचा आत्मा, आमचा प्राण व आमचें मन स्वतःचें म्हणजेच आत्म्याचें मूळ स्वरूप पुन: मिळावें यासाठीं वांकडीतिकडी धडपड करीत आहेत. या धडपडीचा हेतु थोड्‌या विस्तारानें सांगावयाचा, तर आमच्या भ्रमांचा अन्त होऊन सत्याचा पुन्हां उदय होण्यासाठीं ही धडपड आहे; आज आम्ही ज्याला सत्य किंवा भ्रम, न्याय किंवा अन्याय मानतों, तें सर्वच मूळ सत्याला मर्यादित करीत आहे किंवा विपर्यस्त करीत आहे; म्हणून हें सर्व भ्रांतीचें, प्रमादाचें भांडार नाहींसें करून, खऱ्या सत्याची पुन्हां प्रस्थापना करण्यासाठीं आमच्या आत्म्याची, मनाची व प्राणाची वेडीवाकडी धडपड चाललेली आहे; आज आम्ही जिला सामर्थ्य समजतों व जिला दुर्बलता समजतों, त्या दोन्ही गोष्टी मूळ शक्तीच्या खटाटोपाचा भाग आहेत आणि आमची आजची सर्व प्रकारची अक्षमता दूर होऊन, आमच्यांत खरी क्षमता येण्यासाठीं हा खटाटोप चालला आहे. आज आम्ही जिला सुख समजतों व जिला दुःख समजतों त्या दोन्ही गोष्टी संवेदनाशक्तीच्या तडफडीचा भाग आहेत आणि आजचें आमचें सर्व प्रकारचें दुःख दूर होऊन, त्याची जागा निरामय आनंदानें घ्यावी यासाठीं ही अंग मोडून तडफड चालली आहे; आज आम्ही ज्या गोष्टीला जीवन म्हणतो व ज्या गोष्टीला मरण म्हणतो, त्या दोन्ही गोष्टी मूळ अस्तित्वाच्या नित्याच्या खटपटीचा भाग आहेत आणि आम्हांपासून मरण दूर जाऊन, त्याची जागा अमरत्वानें घ्यावी, आमच्या अस्तित्वानें, जीवनानें परत आपल्या अमरत्वाची प्राप्ति करून घ्यावी यासाठीं ही खटपट चाललेली आहे; अर्थात् आमच्या अविद्याग्रस्त आत्म्याला स्वतःच्या खऱ्या स्वरूपाचा पुनर्लाभ होणें म्हणजे पूर्णसत्य, सर्वसमर्थता, नित्यानन्द व अमरता यांचा पुनर्लाभ होणें आहे; व या पुनर्लाभासाठीं आमचा आत्मा, मन व प्राण यांची सारखी धडपड सुरू आहे.

 

पान क्र. ३२६

 









Let us co-create the website.

Share your feedback. Help us improve. Or ask a question.

Image Description
Connect for updates