Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics, expounding a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth.
Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.
खंड पहिला
सर्वगत ब्रह्म आणि ब्रह्मांड
प्रकरण पहिलें *
मानवी आकांक्षा
ही उषा पहा. ही एकटी नाहीं. हिच्यापुढें अनेक उषा वाटचाल करीत आहेत. एका निश्चित ध्येयाकडे जात आहेत. त्याच ध्येयाकडे त्यांच्यामागून ही उषा चालत आहे. हिच्यामागें अनंत उषांची रांग लागलेली आहे. या रांगेच्या अग्रभागीं ही आमच्या समोरची उषा आहे. ही उषा वाढत आहे. जीवांचें जग ही आमच्यासमोर उभें करीत आहे. मृत्युवश झालेल्या कोणाकोणाला ही जागें करून जीवन देत आहे. ......पूर्वीं प्रकाश देऊन गेलेल्या उषा आणि हिच्यानंतर निश्चितपणें प्रकाश देतील त्या अनंत उषा, या सर्वांशीं सुमेळ राखून सहकार करणारी ही आमची उषा आहे. तेव्हां हिचा, हिच्या प्रभावाचा व्याप केवढा थोर असेल बरें ! प्राचीन उषांकडे हिचा जीव ओढ घेतो, त्यांच्या प्रकाशांत आपला प्रकाश मिळवून त्यांना ही कृतार्थ करिते; तसेंच हिच्यानंतर येणाऱ्या उषांच्या दिशेनें आपला प्रकाश फेंकून त्यांच्याशींहि ही अद्भुत प्रेमाचें नातें जोडतें.
- कुत्स आंगिरस (ऋग्वेद) १. ११३. ८, १०.
विश्वामध्यें कार्य करीत असलेल्या या देवात्मशक्तीला जे श्रेष्ठ जन्म असतात, ते तीन आहेत. ते जन्म सत्य आहेत, ते स्पृहणीय आहेत. हा देवात्मा विश्वांत दूर दूरपर्यंत आणि अगदीं उघडपणें भ्रमण करितो. अनंताच्या पोटांत याचें भ्रमण चालते. त्याचा प्रकाश शुद्ध, तेजस्वी आणि अपूर्णाला पूर्ण करणारा आहे....मर्त्यामध्यें अमर्त्य असें कांहीं आहे. जें सत्य आहे, तें या अमर्त्यापाशीं आहे. हें अमर्त्य म्हणजे देवात्मा होय, देव होय. हा देव मर्त्यांच्या अंतरात कायम राहणारा
-------------------------
*हें प्रकरण महत्त्वाचें असल्यामुळें याचा अनुवाद जरा अधिक मोकळा व विस्तृत केला आहे.
पान क्र. १
आहे. याचें अंतरांतील स्वरूप दैवी कार्यशक्ति होय. आपणांत जीं दिव्य सामर्थ्यें उदयास येतात तीं या शक्तीच्या कार्यकुशलतेनें उदयास येतात. .....हे शक्तिदेवते ! उंच उडी घे, उच्चपदस्थ हो. सर्व पडदे फाड आणि आमच्या ठिकाणीं दैवी प्रकृतीचे गुण उदयास आण.
- वामदेव (ऋग्वेद) ४.१.७; ४.२.१; ४.४.५.
मानवी मनांत विचारशक्ति जागृत झाली, विचार खेळूं लागले, तेव्हां या मनाला सर्वथा व्यापून टाकणारी अशी जी एक आकांक्षा पूर्वकाळीं, सर्वप्रथम या मनांत उदयास आली, तीच या विचारी मनाची सर्वश्रेष्ठ आकांक्षा होय. ही मानवी मनाची मूलभूत अनिवार्य आकांक्षा आहे, असें उघड दिसतें; कारण हिला मनांतून कितीहि वेळां काढून लावली तरी, प्रत्येक वेळीं ती परत येऊन मनाची पकड घेते. संशयवादानें मनाला मधून मधून अतिदीर्घ काळपर्यंत व्यापून टाकलें तरी पुन: पुन: त्या संशयवादावर मात करून ही आकांक्षा मनाचा ताबा घेते. देवाचा व दैवी गुणांचा अंतप्रत्यय, पूर्णतेकडे ओढ, शुद्ध सत्याचा व निर्भेळ सुखाचा शोध, अप्रकट अमरतेचा प्रत्यय -- या गोष्टी, वर वर्णिलेल्या आकांक्षेचें स्वरूप व कार्य होत. ही आकांक्षा प्राचीन काळीं मानवी मनांत सतत तळपत होती, याचा पुरावा मानवी ज्ञानाच्या प्राचीन उषांच्या वर्णनांत सांपडतो. आजहि मानवता त्या आद्ययुगीन आकांक्षांना परत आपल्या अंतरांत स्थान देण्याच्या तयारींत असलेली दिसते; निसर्गाच्या बाह्यवस्तुजाताच्या यशस्वी विश्लेषणानें तिची तृप्ति न होतां, त्या विश्लेषणाचा वीट मात्र तिला आलेला आहे; व म्हणून ती आद्ययुगीन आकांक्षांकडे ओढ घेत आहे. देवदेव, ज्ञानविज्ञान, मुक्ति व अमरता या चतु:सूत्रींत अनुभवी ज्ञानसंपन्न चतुरता, आद्ययुगांत आपली आकांक्षा व्यक्त करीत होती, तीच चतु:सूत्री आजहि ज्ञानाची अंतिम चतु:सूत्री राहणार, असा रंग दिसत आहे.
प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊन टिकलेलीं मानव वंशाचीं ध्येयें, या चतु:सूत्रींत व्यक्त झालीं आहेत. मानवाचा सर्वसामान्य अनुभव या ध्येयांना विरोध करणारा आहे. या ध्येयांत ज्या अनुभवांचा सत्यत्वानें उल्लेख आहे ते अनुभव मानवाला अपवादभूत असून, उच्च आणि खोल भूमिकेवरचे आहेत. त्यांचा समग्रतेनें सुव्यवस्थितपणें लाभ व्हावयाचा तर व्यक्तीला क्रांतिकारी प्रयत्न करावा लागतो किंवा मानवी समाजाचा
पान क्र. २
क्रमविकास एका विशिष्ट टप्प्यापर्यंत प्रगत व्हावा लागतो. चतुरतेची चिरंतन चतु:सूत्री आम्हापुढें कोणत्या गोष्टी ठेवीत आहे ? संक्षेपानें सांगावयाचें तर, पार्थिव निसर्गाचा क्रमविकास होत आहे आणि या क्रमविकासाचे अंतिम ध्येय पार्थिवांत, जडांत देवदेवाचें प्रकटीकरण हें आहे, असें ही चतु:सूत्री सांगत आहे. या संक्षेपाचा अधिक विस्तार करावयाचा तर चतु:सूत्री आम्हांपुढें पुढील कार्यक्रम ठेवीत आहे -
आमच्या जाणिवेंत पशुता आणि अहंता भरलेली आहे; अशा जाणिवेचा विकास करून आम्हाला देव जाणावयाचा आहे, त्याला आपलासा करावयाचा आहे व अंतीं मानवाचा, आमचा, देव व्हावयाचा आहे.
देहाशीं बांधलेलें आमचें मन अर्धवट अंधुक प्रकाशाचें स्थान आहे, त्याचें परिवर्तन करून त्याचें ठिकाणी उन्मनाचा, अतिमानसाचा, विज्ञानाचा पूर्ण प्रकाश आम्हीं आणावयाचा आहे.
आमचीं वासनापूर्तीचीं सुखें क्षणिक, त्यांना देहाच्या आणि भावनांच्या दुःखांचा सदा वेढा पडलेला; या सुखदुःखाच्या खेंचाखेंचींत जबर ताण आमच्या वांट्याला येतो; ही अशांतीची व परवश क्षणिक सुखाची परिस्थिति बदलून तिच्या ठिकाणीं शाश्वत शांतीची व स्वयंभू सुखाची उभारणी आम्हाला करावयाची आहे.
आमचें जग यांत्रिक अनिवार्य निसर्गनियत घटनांचा संघ असल्यासारखें दिसते; त्या जगांत अमर्याद आत्म-स्वातंत्र्य स्थापावयाचें आहे.
आमच्या शरीरांत सारखा बदल होत असतो व तें मृत्यूला वश होतें; अशा शरीरांत मृत्यूला वश न होणारें जीवतत्त्व, आत्मतत्त्व आहे, त्याचा शोध लावून तें आम्हाला आमचें स्वरूप म्हणून अनुभवावयाचें आहे.
परंतु मानवी जाणिवेच्या आजच्या रचनेंत जी तिची शक्ति प्रकट झालेली आहे, त्या शक्तीपलीकडे अधिक शक्ति जाणिवेंत नसून आजची शक्ति हीच जाणिवेच्या व्यापाची शेवटली मर्यादा आहे, असें सामान्य जडवादी बुद्धीचें आग्रही मत आहे. आज अनुभवाला येणारी जाणिवेचीं कार्यें, वरील ध्येयभूत कार्यक्रमांतील कार्यांशीं सर्वथा विरोधी असल्यानें, तो ध्येयभूत कार्यक्रम अशक्य कोटीतला आहे, असा जडवादी बुद्धिवाद्यांचा शेवटला बुद्धिवाद आहे. हा बुद्धिवाद त्यांच्या जडवादी मताला साजेसा आहे; परंतु तो वस्तुतः खोल अनुभवाच्या कसोटीस उतरणारा नाही. जगांतील घटनांचा खोल विचारपूर्वक अनुभव घेतला तर 'प्रत्यक्ष विरोध' (म्हणजेच घडलेल्या घटनांस विरोधी अशा घटना घडवून आणणें) हा निसर्गाच्या
पान क्र. ३
गहन कार्यपद्धतीचा एक भाग आहे असें दिसून येईल. ''योजलेल्या घटनेचा, अमुक एका घडलेल्या घटनेला सर्वथा विरोध आहे ना? तर मग योजलेली घटना घडावी, यांस माझी पूर्ण संमति आहे,'' असेंच जणुं योजलेल्या विरोधी घटनेवर निसर्ग शिक्कामोर्तब करीत असतो.
कारण, जीवनाचे सर्व प्रश्न तत्त्वत: संवाद-विसंवादाचे प्रश्न असतात. दोन गोष्टींमध्यें विसंवाद, विरोध आहे, तो मिटलेला नाहीं, असें नजरेस येतांच, तोच विरोध मिटण्यासारखा आहे, त्या दोन गोष्टींत मुळांत मेळ आहे, ऐक्य आहे, अशी आंतून अंतर्मन ग्वाही देते; जीवनाचे एकूण एक प्रश्न अशाच स्वरूपाचे असतात; मानवांत अधिक पशुतेकडे झुकणारा असा जो एक केवळ व्यवहारी भाग आहे त्याला, अनुभवास आलेला विसंवाद मिटविण्याची तितकी आवश्यकता वाटत नाहीं; विसंवादानें त्याचें ठिकाणीं विशेष असंतोष उत्पन्न होत नाहीं. परंतु पूर्णपणें जागृत झालेलें मन, विसंवाद अनुभवून संतुष्ट राहणें अशक्य असतें. व्यवहारी मनाला देखील, विसंवादाची अडचण मुळींच भासत नाहीं असें नाहीं. परंतु अशा अडचणींतून मार्ग काढण्याची व्यवहारी मनाची तऱ्हा, पूर्ण जागृत मनाहून वेगळी असते. एकतर, तें अडचणीला बगल देऊन जीवन चालवितें अथवा अडचणीवर मूलगामी उपाय न योजतां कांहीं अर्धवट कामचलाऊ, अज्ञानसुलभ तडजोड काढून, काम भागवून नेतें. निसर्ग हा स्वभावत: त्याच्या सर्व प्रांतांत सुमेळ, सुसंवाद घडवून आणण्याच्या खटपटींत असतो. मन आपले अनुभव एकत्रित करतांना कांहीं सुव्यवस्थेचें, मेळाचें तत्त्व उपयोगांत आणते, तशीच गोष्ट जडाच्या व प्राणाच्या प्रांतांतहि निसर्ग घडवीत असतो. रचनेसाठीं पुढें केलेला माल जितका अधिक अस्ताव्यस्त स्थितींत दिसत असेल, त्या मालांतील वस्तु एकमेकींशी जितक्या अधिक जुळत्या नव्हेत तर जितक्या अधिक कट्टर व अनिवार्य अन्योन्यविरोधी दिसत असतील, तितकी रचना सुव्यवस्थित करण्याची निसर्गाची स्फूर्ति अधिक जोरदार होते, आणि त्या स्फूर्तीमुळें अधिक सूक्ष्म आणि सामर्थ्यवान् सुव्यवस्था निर्माण होते. सोपी कामगिरी असतांना तशी कुशल रचना निर्माण होणें सामान्यत: शक्य नसतें. विरोधी गोष्टींचा मेळ घालून सुव्यवस्थित रचना निसर्गानें केली आहे, अशा एक दोन बाबी पहा. प्राण हा स्वयं गतिमान्, क्रियाशील आणि शरीर मात्र स्वयं गतिशून्य, निष्क्रिय, जड, भौतिक तत्वांचें. जडतत्त्व, हालविल्याशिवाय हालायचें नाहीं आणि सारखी हालचाल करीत राहणें हा तर प्राणाचा धर्म;
पान क्र. ४
म्हणजे दोन निखालस विधर्मी, विरोधी वस्तूंची सुंदर सुसंवादी रचना निसर्गानें निर्माण केली आहे. खनिजांतील रचनेपेक्षां वनस्पतींतील रचना, वनस्पतींतील रचनेपेक्षां प्राणिवर्गांतील रचना अधिक गुंतागुंतीची; व तिजपेक्षां आम्हां मानवांतील रचना अधिकच गुंतागुंतीची. गुंतागुंत जितकी अधिक तितकी रचनेची कार्यक्षमता अधिक, अशी निसर्गाची कार्यप्रणाली आहे. प्राण आणि शरीर यांची आमच्यांतील परस्पर सहकारिता, खनिज, वनस्पति व प्राणिवर्ग यांच्यातील सहकारितेपेक्षां श्रेष्ठ दर्जाची असली तरी, ती आहे त्याहून अधिक चांगली होऊं शकते; आमच्या मनाला आधारभूत असलेलें आमचें पशुसदृश प्राणि-शरीर आज अंशत: सुसंघटित आहे, तें समग्र सुसंघटित होऊन त्यांतील जड घटक देखील मृत्यूला दाद देणार नाहींत असें झालें म्हणजे निसर्गानें या बाबतींत 'अन्योन्य विरोधकांचा प्रश्न' पूर्णतया सोडविलासें होईल. ही झाली एक बाब. 'अन्योन्य विरोधकांचा प्रश्न' असलेली दुसरी बाबहि पाहाण्यासारखी आहे. मनाला स्वत:ची जाणीव आहे. मनाच्या इच्छेला स्वत:ची जाणीव आहे; पण शरीराला, प्राणाला तशी जाणीव नाहीं, त्यांच्यांत 'इच्छा' म्हणून जी कांहीं दिसते, ती यांत्रिक, जाणीवहीन इच्छा असतें. असें जाणीवयुक्त मन, जाणीवहीन प्राण व शरीर यांच्याशीं जोडून, निसर्गानें मानवांच्या व मानवेतरांच्या जीवनांत आश्चर्यकारक घटना, घडविल्या आहेत. या आश्चर्यांहून अधिक मोठी आश्चर्यें घडविण्याच्या खटपटींत निसर्ग आहे. आज आमच्या जाणिवेंत पशुता खेळत आहे; व आम्ही, म्हणजे आमची जाणीव, सत्य आणि प्रकाश यांच्या शोधांत आहे. ज्याच्या शोधांत आमची जाणीव आहे, त्या सत्याचें प्रत्यक्ष आणि समग्र ज्ञान तिला लाभलें आणि या लाभामुळें ती आपल्या कार्यक्षेत्रांत सर्वशक्तिमान् झाली, म्हणजे मन-प्राण-शरीर-संघटनाच्या बाबतींत निसर्गानें शेवटलें आश्चर्य घडविलें असें होईल. याप्रमाणें 'अन्योन्य विरोधकांचा प्रश्न' असलेली दुसरी बाब निसर्गानें कशी हाताळली आहे तें आपण पाहिलें. तेव्हां मानवांत जी उंच जाण्याची स्फूर्ति आहे, उच्च उच्चतर स्तरावरील अन्योन्य-विरोधी वस्तूंचा विरोध मोडून त्यांतून उच्चतम पातळीवर सुसंवादी जीवन निर्माण करण्याची मानवांत जी उमेद आहे ती बुद्धीला धरून आहे, हें आपणांस मान्य होण्यास हरकत नसावी. निसर्गाची जी मूलभूत कार्यपद्धति, त्याच्या सार्वत्रिक धडपडीचें जें धोरण आमच्या अनुभवास आलें आहे, त्या धोरणांत व त्या कार्यपद्धतींत निसर्गाचा जो नियम व जो
पान क्र. ५
यत्न आमच्या प्रत्ययास येत आहे, त्या नियमाची व यत्नाची तर्कशुद्ध अखेर, तर्कशुद्ध पूर्णता, एकच असूं शकते आणि ती म्हणजे वर सांगितलेली मानवामध्यें जागृत झालेली उंच उंच जाण्याची स्फूर्ति होय.
जडाच्या भूमींत प्राणाचा व मनाचा विकास होतो असें आपण बोलतों. परंतु 'विकास' या शब्दानें केवळ काय होतें तें सूचित केलें जातें, जें काय होतें तें कां होतें, हें त्या शब्दानें सांगितलें जात नाहीं. जडवस्तूंतून प्राण उदयास यावा, प्राणमय जडाच्या आकृतींत मनाचा संचार व्हावा, या गोष्टींना बुद्धीला पटण्यासारखें असें एकच कारण दिसतें आणि तें वेदांतांत सांगितलेलें आहे. जडाच्या पोटांत प्राण आणि प्राणाच्या पोटांत मन भरलेलें असतें; जडाच्या पडद्याआड प्राण असतो, प्राणाच्या पडद्याआड जाणीव, मनाची जाणीव किंवा मन असतें, असें वेदांतांत सांगितलेलें आहे. अर्थात् जडाच्या पोटांत जें प्राणाचें बीज असतें त्याला योग्य परिस्थितींत जडाच्या भूमींतून अंकुररूपानें वर येतां येतें व पुढें त्याची क्रमानें वाढ होतें, हें सर्व समजण्यासारखें आहे. हीच गोष्ट प्राणमय जड भूमींतील (किंवा जडमय प्राणभूमींतील म्हणा) मनाच्या बीजाची असते. याच रीतीनें विचार केल्यास असें म्हणावयास हरकत नाहीं कीं, मन किंवा मनाची जाणीव ही देखील या जाणिवेपेक्षां श्रेष्ठ अशा जाणिवेची भूमि असूं शकेल आणि ती जाणीव मनाच्या किंवा मनोमय जाणिवेच्या भूमींतून वर येऊन विकास पावूं शकेल. ही शक्यता मान्य केली कीं, ईश्वर, पूर्णज्ञान, शाश्वत आनंद, मुक्ति, अमरता या गोष्टी प्राप्त करून घेण्याची मानवाचें मनांतील अनावर आकांक्षा विकासविषयक तर्कशास्त्राच्या दृष्टीनें योग्यच आहे असें म्हणावें लागतें. निसर्गानें जडाच्या कांहीं रचनांत प्राण व प्राणविषयक ओढ पेरली आहे, प्राणाच्या कांहीं रचनांत मन व मनोविषयक ओढ पेरली आहे. त्याप्रमाणें मनाच्या कांहीं रचनांत त्यानें -- ''मनाहून मोठें कांहींतरी'' -- (उन्मन, अधिमन, अतिमन कांहीं म्हणा) -- आणि तद्विषयक ओढ पेरली आहे; ही सर्व पेरणी सारखीच स्वाभाविक, सारखीच सत्य, सारखीच न्याय्य, सारखीच अनिवार्य आहे. आजच्या मनाहून श्रेष्ठ असें कांहींतरी विकासक्रमानें उदयास आणण्याच्या खटपटींत निसर्ग आहे; ही विचारसरणि अगदीं निर्दोष दिसते. जडाच्या आणि प्राणाच्या भिन्न रचनांत नवतत्त्वाच्या (अनुक्रमें प्राणाच्या व मनाच्या) विकासाची ओढ भिन्न प्रमाणांत, कोठें कमी स्पष्ट, कोठें अधिक स्पष्ट दिसते; तिच्या कार्यकारी इच्छेचें सामर्थ्य चोहोंकडे सारखें
पान क्र. ६
असत नाहीं -- त्याचा सारखा चढता क्रम अनुभवास येतो; त्याप्रमाणें मनापलीकडील नवतत्त्वाच्या बाबतींतहि, विकासाचा पायरीपायरीचा चढतावाढता क्रम आहे, आणि या क्रमानें हें मनापलीकडील नवतत्त्व अवश्य ते अवयव, आणि अवश्य त्या शक्ती पूर्णपणें विकसित करणार हें निश्चित आहे; कारण तसें करण्यास तें निसर्गनियमानें बांधलेलें आहे. मनाचा विकासक्रम अवलोकन केल्यास, आरंभीं धातूंत व वनस्पतींत प्राणतत्त्वाच्या विशेष नाजूक प्रतिक्रियांच्या रूपानें व मानवामध्यें पूर्णपणें सावयव होऊन तें व्यक्त होतें; तीच गोष्ट मानवामध्यें व्यक्त होऊं घातलेल्या मनापलीकडील नवतत्त्वाची आहे; त्याच्याहि विकासाचा चढतावाढता क्रम आहे. मानवी जीवनापेक्षां उच्चतर, दैवी, दिव्य जीवनाच्या, त्याच्या तयारीच्या म्हणा, अनेक पायऱ्या एकावर एक अशा मानवांत व्यक्त होत आहेत. मानवेतर प्राण्याची सजीव प्रयोगशाळा करून निसर्गानें मानव बनविण्याची योजना यशस्वी केली असें म्हटलें जातें. त्याप्रमाणें मानव हा स्वत: सजीव आणि विचारयुक्त अशी निसर्गाची प्रयोगशाळा असून, त्या मानवामध्यें त्याच्या जाणीवयुक्त सहकारानें, निसर्ग, अतिमानव किंवा देव बनविण्याची आपली योजना यशस्वी करूं इच्छित आहे असें म्हटल्यास वावगें होणार नाहीं. त्यापेक्षां निसर्ग, मानवामध्यें देवदेव व्यक्तरूपांत आणण्याच्या खटपटींत आहे, असें देखील म्हणतां येईल. कारण, निसर्गाच्या पोटांत जें अगोदरच अव्यक्त रूपांत आहे, जें त्याच्या अंतरांत झोंपलेलें किंवा गुप्तपणें क्रियाशील आहे, त्याचें निसर्गानें क्रमश: व्यक्तीकरण करणें म्हणजे विकास होय. तसेंच निसर्ग स्वत: गुप्तरूपानें जो कांहीं आहे, तेंच त्यानें उघडपणे होणें, आपल्या खऱ्या स्वरूपावरील आवरण फाडून त्या रूपाचा खुला आविष्कार करणें, हाहि विकासाचाच प्रकार होय -- हेंहि तितकेंच खरें आहे. तेव्हां विकासाच्या अमुक पायरीपलीकडे निसर्गानें पाऊल टाकूं नये, असें आम्ही मानव निसर्गाला सांगूं शकत नाहीं. विकासावस्थेच्या पुढें पाऊल टाकण्याचा हेतु, निसर्ग कोणा मनुष्याच्या द्वारां दर्शवील अथवा कोणा व्यक्तीच्या द्वारां तसा प्रयत्न करील तर, एक पक्षीं बुद्धिवादी, 'रोग रोग' म्हणून किंवा 'आभास आभास' असा ओरडा करून निसर्गाच्या नव्या हेतूची व यत्नाची थट्टा करतो, किंवा दुसऱ्या पक्षीं, धर्मपंथी 'हा बेताल भ्रष्टाकार, हें घमेंडखोर पाखंड' अशीं नांवें ठेवून त्याची निर्भर्त्सना करतो असें करणें आपल्याला योग्य नाहीं; आपल्याला तसा अधिकार पोंचत
पान क्र. ७
नाहीं. कारण, जडांत चिन्मय आत्मा लपलेला आहे; दिसायला जो निसर्ग म्हणून दिसतो तो दडलेला ईश्वर आहे, निसर्गाचा मुखवटा घातलेला ईश्वर आहे. या गोष्टी जर सत्य आहेत तर, मानवानें पृथ्वीवर जीवन जगतांना आपल्या अंतरांत दिव्य आत्मतत्त्वाचें प्रकटीकरण करणें, आपल्या आंत व बाहेरहि सर्वत्र ईश्वराचा अनुभव घेणें, हें आपलें जीवितकार्य ठरविलें तर त्यांत वावगें काय आहे ? खरें पाहतां, असें त्यानें ठरविलें म्हणजे अत्यंत उच्च असूनहि अत्यंत स्वाभाविक व योग्य असा शक्य कोटीतला ध्येयवाद त्यानें आपल्या जीवनाचें लक्ष्य केलें आहे, असें म्हणतां येईल.
तेव्हां एकंदर निष्कर्ष असा कीं, मनुष्याची विचारनिष्ठ चिकित्सक बुद्धि आणि त्याची स्वाभाविक, सर्व परिस्थितींत टिकणारी सहज भावना किंवा अंतःस्फूर्ति या दोन्हीं निरीक्षक परीक्षकांचा निवाडा कित्येक मानवी विकासविषयक बाबतींत अगदीं सारखा मिळतो. मानवाच्या रचनेंत उच्च-नीच घटक असून खालच्या दर्जाच्या घटकाचे ठिकाणीं उच्चतर सत्य आत्मसात् करण्याची, अनुभवण्याची व जीवनांत व्यक्त करण्याची शक्ति आहे, ही गोष्ट दोन्ही परीक्षकांना मान्य आहे. मानवाच्या सामान्य प्राणिशरीरांत दिव्य जीवन, अनुस्यूत आहे, अप्रकटपणें आहे व तें प्रकट होऊं शकतें, ही गोष्ट नेहमींच अंतर्विरोधानें भरलेली आणि म्हणून अशक्य वाटणारी असली तरी, ती शाश्वत सत्याच्या वर्गांतील आहे, ही गोष्टहि दोन्ही परीक्षकांना मान्य आहे. मानवाचें शरीर मर्त्य आहे, पण या नष्ट होणाऱ्या निवासस्थानांत अनश्वर, अमर सत्याकांक्षा व सत्य वास करीत आहेत व त्यांची केव्हां ना केव्हां प्रकट होण्याची निश्चिति आहे; मानवी मनें मर्यादित, मानवी अहंकारी जीव परस्परांपासून विभक्त, असें दिसत असतां या मनांत, या जीवांत एकच विश्वव्यापी जाणीव, प्रज्ञा, चैतन्य, चेतना त्यांना आपले प्रतिनिधी बनवून त्यांच्या द्वारां काम करीत आहे, हें सत्य आहे व तें योग्य समयीं योग्य मनांत व जीवांत संपूर्णतया प्रकट होणार आहे; काल, स्थल, विश्व या मानवाच्या अनुभवास येणाऱ्या वस्तू स्वयंभू, स्वतंत्र नाहींत; त्यांना कालातीत, स्थलातीत, विश्वातीत-सर्वातीत अशा अनिर्वचनीय एकमेव स्वतंत्र स्वयंभू चैतन्यमय पुरुषोत्तमाचा आधार आहे. या पुरुषोत्तमाशिवाय त्या अस्तित्वांत येऊं शकत नाहींत व टिकूं शकत नाहींत, हें सत्य असून तें मानवाला विकासमार्गानें नियतसमयीं निश्चितपणें प्रत्ययाला येणार आहे.
पान क्र. ८
मानवी शरीर व अतिमानवी दिव्य जीवन यांच्या अवश्य भावी साहचर्याला ज्याप्रमाणें मानवी चिकित्सक बुद्धि व त्याची अचिकित्सक अंत:स्फूर्ति या दोघांची पूर्ण मान्यता आहे, त्याप्रमाणें वर सांगितलेल्या दुसऱ्या सर्व जोड्यांच्या भावी अटळ साहचर्याला त्यांची मान्यता आहे. सामान्य तर्कशास्त्राच्या विचारसरणीनें जे प्रश्न कित्येक वेळां असाध्य म्हणून ठरविले आहेत ते प्रश्न कायमचे बाजूला ठेवून मनुष्यांनीं पृथ्वीवरील आपल्या भौतिक जीवनाचे तांतडीचे व्यवहारांतले प्रश्न घेऊन, त्या प्रश्नांवर आपल्या मानसिक शक्तींना कामास लावावें व यापलीकडे त्यांनीं कोणत्याहि उठाठेवींत पडूं नये, असे बौद्धिक प्रचाराचे प्रयत्न मधून मधून होत असतात. परंतु ही 'असाध्य' प्रश्नांची टाळाटाळी नेहमींच प्रभावी होत नाहीं. 'असाध्य' प्रश्नांना बगल देण्याच्या कांहीं खटपटीनंतर, मानवतेला पूर्वींहून अधिक जोराची शोध करण्याची स्फूर्ति येते; किंवा पूर्वींहून अधिक आदळआपट करणारी व प्रश्नाचें ताबडतोब उत्तर मागणारी असह्य भूक लागते. या भुकेनें अंत:साक्षात्कारवादाला तेज चढतें आणि नवे धर्मपंथ उदयास येतात. जुने पंथ संशयवादाच्या आघातानें नष्ट किंवा अर्थशून्य झालेले असतात आणि संशयवाद स्वत: मानवी मनाला समाधान देत नाहीं; संशयवादाकडून त्याचें संशोधनाचें काम हवे तसें आणि तितकें होत नाहीं म्हणून मानवी मनाला तो समाधान देऊ शकत नाहीं; आणि म्हणूनच अंत:साक्षात्कारवादाच्या आश्रयानें, मानवी मनाची भूक भागविण्यासाठीं जुन्या पंथांच्या जागीं नवनवें पंथ उदयास येतात. एखादें सत्य त्याच्या बाह्य क्रियांत स्पष्टपणें प्रत्ययास येत नाहीं, प्रकाशविमुख प्रतिगामी निर्बुद्ध लोकभ्रम किंवा खुळा भोळा भाव या प्रतीकांनीच बहुधा तें प्रत्ययास येतें; म्हणून त्याचें सत्यत्वच नाकारणें किंवा तें दडपून टाकण्याचा प्रयत्न करणें हें देखील एक प्रकारचें निर्बुद्ध प्रकाशविमुख प्रतिगामित्वच आहे. एखादें विश्वव्यवस्थाविषयक अनिवार्य नैसर्गिक सत्य तत्काल स्पष्ट परिणाम करणारें नसतें व म्हणून साहजिकच तें सिद्ध करावयास अतिशय अवघड असतें. त्या सत्याचे परिणाम घडत राहतात, परंतु त्यांची व्यवस्था लावण्याचें काम त्या सत्याकडून झटपट न होतां सावकाशीनें, मंद गतीनें होत असतें, व म्हणून त्याची सत्यता पटणें व पटविणें अवघड होतें. तथापि त्याच्या सिद्धतेचा अवघडपणा बघून त्याला टाळण्याचा, त्याचें अस्तित्व नाकारण्याचा यत्न करणें हें, निसर्गमातेच्या मनांतील महाप्रभावी संकल्पाविरुद्ध बंड करण्यासारखें आहे. हें बंड
पान क्र. ९
अंततः यशस्वी होऊं शकणार नाहीं. असें बंड करण्यापेक्षां त्या दुर्गम सत्याला मान्यता देणें हें विचारशील चांगुलपणाला अधिक शोभून दिसेल. अंध पण स्वभावसिद्ध प्रेरणा, प्रकाशहीन अस्पष्ट अंतःस्फूर्ति, अनिर्बंध स्वैर आकांक्षा यांच्या प्रांतांत जोपर्यंत तें दुर्गम सत्य वावरत राहील, तोपर्यंत तें दुर्गमच राहील; व तें अमान्य करून बंड करण्याचा आम्हाला मोह होईल. याकरितां त्या प्रांतांतून त्या सत्याला वर उचलून घेऊन, डोळस, स्पष्ट, नियमबद्ध विचाराचा प्रकाश जेथें आहे, जाणीवपूर्वक आपला मार्ग आपण ठरविणारी विचारपूर्ण इच्छाशक्ति जेथें आहे, त्या प्रांतांत आणून त्याचें सत्यत्व पारखणें बरें. प्रकाशहीन अंतःस्फूर्तीचा प्रांत विचार-विवेकाच्या प्रांताच्या खालीं आहे, त्याप्रमाणें प्रकाशमय अंतःस्फूर्तीचा प्रांत विचार-विवेकाच्या प्रांताच्या वर आहे. निसर्गाची श्रेष्ठ सत्यें आपला स्वतःचा साक्षात्कार स्वतः घडवितांना प्रकाशमय अंतःस्फूर्तीच्या द्वारां मानवाला अंतरंगांत प्रतीत होत असतात. विचाराच्या प्रकाशाहून हा साक्षात्काराचा प्रकाश अर्थातच श्रेष्ठ असतो. मानवामध्यें या श्रेष्ठ प्रकाशाच्या कार्याचा कोठें अभाव आहे, कोठें या कार्याला अडविणारे अनेक मनोभाव आहेत, कोठें हें कार्य घडत आहे खरें, पण एकसारखें घडत नसून थांबून थांबून अंतरा अंतरानें घडत आहे, बुरख्याच्या आडून मधून मधून कोणी नजर बाहेर फेंकावी त्याप्रमाणें हा प्रकाश कोठें कोठें आपलें कार्य करीत आहे. भौतिक आकाशांत उत्तर ध्रुवाकडे मधून मधून बहुरंगी सुंदर प्रकाशप्रदर्शनें आपल्याला पहावयास मिळतात, त्याप्रमाणें या प्रकाशाचें प्रदर्शन कोठें कोठें प्रत्ययास येतें. असा हा श्रेष्ठ प्रकाश आम्ही आपला नित्य सहचर करूं अशी आशा आम्ही निर्भयपणें व निःसंकोचपणें बाळगावी. कारण, अंतर्बाह्य निसर्गाचें सूक्ष्म निरीक्षण करतां, आमच्या जाणिवेची आजच्या नंतरची लगतची उच्चतर अवस्था वर वर्णिलेल्या श्रेष्ठ अंतःस्फूर्तीच्या प्रकाशाची असण्याचा फार संभव दिसतो. आजची आमची जाणीव अर्थात् आमचें मन प्राणाच्या पडद्यांतून प्रकट झालें आहे, त्याप्रमाणें आमच्या मनाच्या पडद्यांतून त्यापेक्षां श्रेष्ठ अशी जाणीव प्रकट होणार आहे. या श्रेष्ठ जाणिवेच्या तेजोमय प्रकाशांतून आमच्या वाढत्या आत्मविस्ताराचा मार्ग असून, मानवतेचें अंतिम विश्रामस्थान म्हणून जी कोणती जाणिवेची श्रेष्ठतम अवस्था असेल तेथें, या मार्गानें आम्ही पोंचण्याची बरीच शक्यता आहे.
पान क्र. १०
Home
Sri Aurobindo
Books
SABCL
Marathi
Share your feedback. Help us improve. Or ask a question.