दिव्य जीवन 1879 pages 1960 Edition
Marathi Translation
  Senapati Bapat

ABOUT

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics, expounding a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth.

THEME

philosophymetaphysics

दिव्य जीवन

Sri Aurobindo symbol
Sri Aurobindo

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.

Sri Aurobindo Birth Centenary Library (SABCL) The Life Divine Vols. 18,19 1070 pages 1970 Edition
English
 PDF    philosophymetaphysics
Sri Aurobindo symbol
Sri Aurobindo

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.

Marathi Translations of books by Sri Aurobindo दिव्य जीवन 1879 pages 1960 Edition
Marathi Translation
Translator:   Senapati Bapat  PDF    LINK

प्रकरण तेविसावें

 

मानवांतील दोन आत्मे

 

पुरुष, अंतरात्मा, मनुष्याच्या अंगुष्ठाच्या मापाचा आहे, त्याहून मोठा नाहीं.

- कठ उपनिषद् ४.१२

- श्वेताश्वतर उप० ६.१७

 

अस्तित्त्वाचा मधु खाणारा, जें आहे आणि जें होणार आहे त्याजवर सत्ता चालविणारा असा जो आत्मा, त्याला जो जाणतो; तो मग कोणत्याहि गोष्टीची घृणा करीत नाहीं.

- कठ उपनिषद् ४.५

 

जो सर्वत्र एकत्व पाहतो त्याला शोक किंवा मोह कोठून व कां होईल?

- ईश उप० श्लोक ७

 

ब्रह्माचा आनंद जो अनुभवतो त्याला कोठूनहि भय नसतें.

- तैत्तिरीय उप० २.९

 

जीवनाच्या ज्या चार अवस्था आहेत, त्यांत पहिली अवस्था नेणिवेची आहे, या अवस्थेंत जी मूक प्रेरणा किंवा उर्मि असते, ती जाणीवयुक्त नसते -- या अवस्थेंत भौतिक किंवा जड वस्तूच्या पोटीं इच्छा गुप्तपणें वास करीत असते; या गुप्त इच्छेची नेणीवव्याप्त शक्ति भौतिक जड वस्तूंत क्रिया करीत असते, हें या अवस्थेचें वैशिष्ट्य होय. ही शक्ति स्वतंत्र नसते, ती स्वतःवर किंवा स्वतःच्या क्रियांवर किंवा त्यांच्या परिणामांवर सत्ता चालवूं शकत नाहीं; ती सर्वथा क्रियाशील विश्वशक्तीची ताबेदार असते. या विश्वशक्तीच्या पोटींच, व्यक्तित्वाचें अंधुक आकारहीन बीज, या रूपानें तिचा (जड वस्तुगत नेणीवव्याप्त शक्तीचा) जन्म होत असतो; जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेचें मूळ, वासना हें आहे; कांहीं-

 

पान क्र. ४०८

 

तरी आपल्या मालकीचें करावें ही वासनेची स्फूर्ति असते, पण ही स्फूर्ति मर्यादित शक्तीची असते; जीवनाची तिसरी अवस्था फुलाच्या कळीसारखी व चौथी फुलासारखी असते; कळीच्या तिसऱ्या जीवनावस्थेंत प्रेम हें प्रमुख सूत्र असतें; प्रेम घेऊं इच्छितें, देऊंहि इच्छितें; सत्ता चालवूं इच्छितें, अंकितहि होऊं इच्छितें. चौथी फुलासारखी जी जीवनावस्था ती जीवनाची पूर्णावस्था होय : तींत जीवनविकासारंभींची भौतिक वस्तूंतील गुप्त इच्छा, पूर्णपणें शुद्ध स्वरूपांत प्रकट झालेली असते; वासना (जी दुसऱ्या अवस्थेंत धडपड करीत होती ती) येथें प्रकाशयुक्त आणि परितृप्त झालेली असते; त्याचप्रमाणें तिसऱ्या अवस्थेंत बुद्धिपुरस्सर हरएक प्रिय वस्तुचें आदान-प्रदान करणारें प्रेम, या अवस्थेंत उच्च प्रकारच्या गाढ परितुष्टीनें संतुष्ट झालेलें असतें; कारण येथें अतिमानसिक क्षेत्रांत, अस्तित्वाचा पायाच मुळीं आत्म्यांची दिव्य एकरूपता, एकता हा असल्यानें, प्रेमस्थितींत स्वामी आणि अंकित असे जे दोन वेगळे जीव असतात ते, या चौथ्या अवस्थेंत वेगळे राहत नाहींत तर एकजीव होतात, एकरूप होतात. या सगळ्या अवस्थांचा बारकाईनें विचार केल्यास असें दिसून येतें कीं, वैयक्तिक आणि विश्वात्मक दृष्टीनें वस्तुजातांतील आनंद भोगण्याची इच्छा आत्मा करतो आणि या इच्छेला विकासमार्गांत चढते-वाढते आकार व अवस्था प्राप्त होतात. जीवनाची उर्ध्वगति म्हणजे स्वभावत: विश्वांतील दिव्य आनंदाची उर्ध्वगामी चाल आहे -- जडांत हा आनंद मूक असतो, पुढें अनेक परिवर्तनांतून व विरोधी स्वरूपाच्या स्थितींतून तो मार्ग क्रमतो व शेवटीं मूळ चैतन्याचे ठिकाणीं तो पूर्णता पावतो, तेजोमय होऊन सर्वांगसमृद्ध होतो.

विश्वाची व्यवस्था पाहतां, हें असें होणेंच स्वाभाविक आहे, यावेगळी गोष्ट घडणें शक्यच नाहीं. कारण सच्चिदानंदाचें सच्चिदानंदत्व झांकणारें विश्व, हें त्याचेंच रूप आहे. सच्चिदानंदाच्या जाणिवेचा स्वभावधर्म दिव्य आनंद, सर्वव्यापी आत्मानंद हा आहे. अर्थात् त्याची शक्ति क्रियाशील होऊन वावरूं लागली, म्हणजे तिला दिव्य आनंद हेंच ध्येय असणार, दिव्य आनंदांतच तिची कृतार्थता असणार. जीवन हें सच्चिदानंदाच्या जाणीवशक्तीची क्रियाशीलता आहे आणि म्हणून या क्रियाशील शक्तीच्या सर्व हालचालींचें गुप्त प्रेरक ध्येय, सर्व वस्तुजातांत स्वभावत: भरलेला गुप्त आनंद, हेंच असलें पाहिजे. या शक्तीच्या व्यापाराचें कारण, हेतु व ध्येय या आनंदाखेरीज दुसरें कांहीं असूं शकत

 

पान क्र. ४०९

 

नाहीं. वैयक्तिक 'मी'च्या विभक्ततेमुळें हा आनंद मिळेनासा झाला आहे, तो पडद्याआड दडून बसला आहे. त्याच्या विरोधकानें (ताप-संताप, उद्वेग-विषाद यानें या आनंदाची जागा घेतली आहे -- अस्तित्व मरणानें झांकलें गेलें आहे, जाणिवेनें नेणिवेचें रूप घेतलें आहे, शक्तीचें दुबर्लतेंत रूपांतर झाल्यासारखें दिसत आहे, शक्तीनें दुर्बळतेचें सोंग घेतलें आहे, हें खरें आहे -- पण हेंहि तितकेंच खरें आहे कीं, जो विश्वव्यापक आनंद व्यक्तीच्या अस्तित्वांतील गुप्तपूर्ण आनंद आहे, जो सर्वातीत आणि सर्वव्यापी, सर्वांतर्यामी सच्चिदानंदाचा, सर्व वस्तुजाताला पोटांत घेणारा, सर्वांच्या पोटांत वसति करणारा, सर्वांना आधार देणारा असा मूळ आनंद आहे, तो विश्वव्यापी आनंद हस्तगत केल्याखेरीज कोणताहि जीव समाधान पावणार नाहीं, स्वस्थ बसणार नाहीं, विश्वव्यापी आनंदापेक्षां कांहीं कमी घेऊन आपले प्रयत्न कृतार्थ झाले असें समजणार नाहीं. तेव्हां जीवनाची मूळ प्रेरणा, मूळ प्रयोजन आनंदाचा शोध हें आहे. आनंद शोधून काढणें, आनंद मिळविणें, आनंद पूर्वक नेणें हा, जीवनाचा एकच समग्र हेतु आहे.

आमच्यामध्यें असलेलें आनंदाचें हें तत्त्व कोठें आहे? जाणीवयुक्त शक्ति ही, ज्याप्रमाणें जीवन या रूपाच्याद्वारां विश्वांत प्रकट होते व आपल्या इष्टसिद्धीसाठीं जीवनाचा उपयोग करते, त्याप्रमाणें अतिमानस हें मनाच्याद्वारां विश्वांत व्यक्त होतें व त्याचा आपल्या इष्टसिद्धीसाठीं उपयोग करतें. त्याप्रमाणें विश्वाच्या कार्यात आनंदतत्त्व आमच्या कोणत्या घटकाच्या द्वारां व्यक्त होऊन आपल्या इष्टसिद्धीसाठीं काम करतें? विश्वनिर्मिति करणारें जें दिव्यतत्त्व, जो दिव्यपुरुष आहे, त्याचीं चार अंगें आम्ही मानतो : अस्तित्व, जाणीवयुक्तशक्ति, आनंद आणि अतिमानस. भौतिक विश्वांत अतिमानस सर्वत्र उपस्थित असतें, मात्र तें पडद्याआड लपलेलें असतें; दृश्य वास्तव घटना व वस्तु हाच पडदा अतिमानसाला झांकतो; या पडद्याआड राहून अतिमानस तेथें काम करतें; आपलें काम परिणामकारक होण्यासाठीं, आपणच निर्माण केलेलें व आपलें अंकित असलेलें 'मन' तें उपयोगांत आणतें. ईश्वरी जाणीवयुक्त-शक्ति हीहि भौतिक विश्वांत सर्वत्र आहे आणि गुप्तपणें पडद्याआड बसलेली आहे; वास्तव दृश्य घटनांच्या व वस्तूंच्या मागून लपून काम करीत आहे; स्वत: निर्मिलेल्या 'जीवन' या दुय्यम तत्त्वाच्या द्वारां, ही जाणीवयुक्त शक्ति आपलें स्वरूप विश्वांत व्यक्त करते. जड भौतिक तत्त्वाचें आम्हीं

 

पान क्र. ४१०

 

अद्यापि परीक्षण व विश्लेषण केलेलें नाहीं, तथापि जें दिव्य सर्वात्मक अस्तित्व भौतिक विश्वांत सर्वत्र आहे, तेंहि पडद्याआड आहे; वास्तव घटनांमागें तें दडून आहे आणि तें व्यक्त होतें तें प्रथम 'द्रव्य,' अस्तित्वाचें रूप, जडवस्तु या आपल्या निर्मितीच्या गौण स्वरूपाच्या द्वारां व्यक्त होतें -- असें आपल्याला दिसतें (याप्रमाणें आमचा देह-प्राण-मन हीं अंगें विश्व-रचनाकार दिव्य-पुरुषाच्या अस्तित्व, जाणीवयुक्त-शक्ति आणि अतिमानस या अंगांचीं उपांगें आहेत, साधनें आहेत -- असें झालें.) आतां दिव्य पुरुषाचें चौथें अंग दिव्य-आनंद हेंहि इतर तीन अंगांप्रमाणें विश्वांत सर्वत्र भरलेलें असलें पाहिजे, गुप्त असलें पाहिजे व वस्तुजाताचा आणि घटनांचा दृश्य पडदा त्याला झांकीत असला पाहिजे. अर्थात् विश्वाच्या कार्यक्रमांत, तें शेवटीं शोधून काढलें जाणार आहे आणि हस्तगत केलें जाणार आहे.

आमच्यामधील मूळ दिव्य आनंदाचें प्रातिनिधिक उपांग जें आहे, त्याला विशेष अर्थानें ''आत्मा'' हें नांव आम्ही केव्हां केव्हां देतो. हा आत्मा हें एक आंतरिक तत्त्व आहे; यांत या तिघांच्या सारभूत भागांना त्यांचा त्यांचा विशिष्ट आनंद प्राथमिक स्वरूपांत व उच्च स्वरूपांत मिळवून देण्याची गुरुकिल्ली आहे. प्रकाश, प्रेम, सुख, सौंदर्य व शुद्ध निर्मल जीवन या गोष्टी शरीर-प्राण-मनाला प्राथमिक स्वरूपांत उपलब्ध करून देणें व त्यांतील विशिष्ट आनंद या त्रयीला चढत्या वाढत्या स्वरूपांत प्राप्त होईल असें करणें, ही गोष्ट 'आत्मा' या आंतरिक तत्त्वाच्या स्वाधीनची आहे. आमच्यामध्यें वस्तुत: एकच आत्मा नसून दोन आत्मे आहेत; दुसरीहि विश्वतत्त्वें आमच्यामध्यें दोन दोन आहेत. मनें दोन आहेत, प्राण दोन आहेत, शरीरें दोन आहेत. दोन मनांपैकीं एक मन वरचें, मीचें, विकासक्रमांत व्यक्त झालेल्या व्यक्तीचें जागृत मन होय. जडांतून आम्ही वर आलों आणि येतांना आम्हीं हें वरचें जागृत मन निर्माण केलें. याखेरीज आम्हांला दुसरें प्रच्छन्न (Subliminal mind) गुप्त मन आहे; आमचा जो वास्तवांत मानसिक व्यवहार चालतो, त्याचीं जी कडक बंधनें असतात -- त्या व्यवहाराच्या, त्या बंधनांच्या पलीकडे अनिर्बंध विशाल महान् सामर्थ्य असलेलें असें आमचें दुसरें मन आहे. हें आमचें खरें मानसिक अस्तित्व आहे; वरची मानसिक व्यक्ति हें आम्ही आपलें खरें स्वरूप समजतो, पण ती चूक आहे; आमचें खरें मानसिक जीवन या वरच्या स्वरूपाच्या मागें लपलेलें आहे. आमच्या

 

पान क्र. ४११

 

प्राणमय जीवनाची तीच गोष्ट आहे. एक बाह्य व स्थूल 'प्रकट जीवन', दुसरें आंतर व सूक्ष्म, 'अप्रकट जीवन'. बाह्य जीवन म्हणजे शरीरांत कोंडलेलें जीवन; जडामधून विकसित होत आलेलें हें बाह्य जीवन, त्या गत विकासाच्या बंधनांनीं बांधलेलें आहे. हें जीवन शरीराबरोबर जन्मतें, त्याच्याबरोबर जगतें व मरतेंहि त्याच्याच बरोबर. दुसरे आंतर, गुप्त व प्रच्छन्न, 'अप्रकट जीवन' हें शारीर जन्म व शारीर मरण या दोन मर्यादांच्या मध्यें कोंडलेलें नसतें; हें आपलें खरें प्राणिक अस्तित्व असतें. आपण अज्ञानानें ज्याला आपलें खरें जीवन मानतो, तें जीवनानें घेतलेलें एक तात्पुरतें रूप असतें. मनें दोन, प्राण दोन, त्याप्रमाणेंच शरीरेंहि दोन आहेत. आमचें स्थूल शरीर ज्या जडतत्त्वाचें बनलें आहे, तें जडतत्त्वहि, स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन स्वरूपांत असतें; स्थूल जडाचें शरीर जसें आम्हांला आहे, तसें सूक्ष्म जडाचें शरीरहि आम्हांला आहे; या सूक्ष्म भौतिक तत्त्वापासून जसें आमचें सूक्ष्म भौतिक शरीर बनतें, तसें प्राण व मन यांसाठींहि त्याचे सूक्ष्म कोश बनतात; हें सूक्ष्म भौतिक द्रव्य आमच्या स्थूल भौतिक शरीराचा खरा आधार आहे -- आम्ही आमच्या स्थूल शरीराला, आमच्या चैतन्याचें एकमेव शरीर मानतो ही आमची चूक आहे; प्रकट व अप्रकट मन-प्राण-शरीर याप्रमाणें प्रकट आणि अप्रकट आत्मचैतन्यहि आमच्यामध्यें आहे. बाह्य, स्थूल, प्रकट असा आमचा आत्मा म्हणजे वासनामय आत्मा होय. आमची जीवनाची भूक किंवा भुका, त्याच्या भावना, त्याची सौंदर्यविषयक वृत्ति, सत्ता, ज्ञान, सुख यांसाठीं मनाची होणारी तळमळ या सर्व गोष्टी वासनामय आत्म्याचे विकार होत. या बाह्यसंलग्न आत्म्याच्या पाठीमागें, आंतर प्रच्छन्न चैतन्य-पुरुष असतो. शुद्ध प्रकाशमय सामर्थ्य, प्रेम, सात्विक आनंद व निर्मळ अतिशुद्ध सत्तातत्त्व हे त्याचें विशेष असतात; हाच आपला खरा आत्मा. बाह्य वासनात्मक चैतन्याला आपण आपला खरा आत्मा समजतों हें आपलें अज्ञान होय. हें विशाल शुद्ध चैतन्यतत्त्व, जेव्हां मनुष्याच्या बाह्य आचार-विचारांत प्रतिबिंबित होतें, तेव्हा आपण त्या माणसाला आत्मा आहे (हृदय आहे) असें म्हणतो; त्याच्या बाह्य विचारसृष्टींत हें शुद्ध चैतन्यतत्त्व दिसलें नाहीं, म्हणजे त्याला आत्मा नाहीं हृदय नाहीं) असें आपण म्हणतो.

आमच्या जीवनाचीं बाह्यरूपें हीं आमच्या क्षुद्र अहंभावाच्या जीवनाचीं असतात. आंतर जीवन आमच्या खऱ्या विशाल व्यक्तित्वाचें असतें. आंतर

 

पान क्र. ४१२

 

जीवनाचे व्यवहार आमच्या गुप्त अप्रकट अस्तित्वाचे व्यवहार असतात; या व्यवहारांत आमचें व्यक्तित्व आमच्या विश्वरूपाशीं संलग्न झालेलें असतें, नित्य दोघांचा संबंध येतो, व्यवहारविनिमय होतो -- आमचें अप्रकट मन, विश्वमनाला असलेलें विश्वज्ञान आत्मसात् करूं शकतें; त्याचप्रमाणें अप्रकट प्राणमय जीवन हें विश्वजीवनाच्या विश्वशक्तीशीं जोडलेलें असतें. आमचें उपरिस्थ बाह्य शरीर, प्राण, मन हे भाग विश्वात्मक शरीर-प्राण-मनापासून जाड भिंतीनीं वेगळे ठेवलेले असतात. या जाड भिंतींतून निसर्गाला (विश्वात्मक व्यवहाराला) आमच्यांत प्रवेश करावयाचा म्हणजे फार कष्ट पडतात, प्रवेश नीट होऊं शकत नाहीं; अर्धवट चतुर, अर्धवट अकुशल भौतिक साधनांनीं निसर्ग (विश्व व्यवहार) आमच्यामध्यें प्रवेश करण्यासाठीं धडपडत असतो : -- आंतर, अध:स्थ व अप्रकट शरीर-प्राण-मनाची गोष्ट अगदींच वेगळी असते; येथें जाड भिंती नसतात; अगदीं विरळ पडदे असतात -- हे विरळ पडदे विश्वव्यवहाराचा आमच्यांत प्रवेश घडावयास मदत करतात व त्या विश्वव्यवहारापासून आम्हांला दूरहि ठेवूं शकतात. जशी ही आंतर शरीर-प्राण-मनाची व विश्वशरीर, विश्वप्राण, विश्वमन यांची संलग्नता आम्हांला आंतरिक मार्गानें व्यापक करते, त्याप्रमाणेंच आमचा अंतस्थ, अप्रकट आत्मा हा विश्वात्म्याशीं जोडलेला असल्यानें त्या विश्वात्म्याच्या दिव्य सार्वत्रिक आनंदाचा भागीदार होऊं शकतो; विश्वात्म्याला आपल्या विश्वव्यापी अस्तित्वाचा आनंद असतो. अनंत जीवात्मे, अनंत प्रकारें विविध क्षेत्रांत जीवन जगत असतात; त्या जीवात्म्यांचा आनंद हाहि विश्वात्म्याचा आनंद असतो -- कारण हें अनंत जीवात्मे त्याचेच 'भाग,' त्याचेच प्रतिनिधी असतात; तसेंच शरीर-प्राण-मन यांचे जे व्यवहार चाललेले असतात, ते या जीवात्म्यांच्या करमणुकीसाठीं व विकासासाठीं चाललेले असल्यानें, त्या व्यवहारांतहि विश्वात्म्याला आनंद लाभतो. हा विश्वात्म्याचा विश्वानंद, उपरिस्थ बाह्य वासनात्मक आत्म्याला लाभत नाहीं -- कारण त्याच्यामध्यें आणि विश्वात्म्यामध्यें अहंभावाच्या जाड भिंती असतात. या भिंतींतून विश्वात्म्याचा विश्वानंद कांहीं द्वारांनीं प्रवेश करूं शकतो व करतोहि; परंतु दिव्य विश्वानंदाचे स्पर्श या द्वारांतून आमच्या बाह्य आत्म्याला झाले, तरी त्यांचें स्वरूप, हें 'मूळचे स्वरूप' राहत नाहीं -- ते एकतर महानाचे लहान होतात, केव्हां केव्हां विकृत होतात, केव्हां उलट रूपांचे मुखवटे देखील घालून येतात किंवा दुःखरूप होऊनदि येतात.

 

पान क्र. ४१३

 

वासनात्मक आत्मा जे व्यवहार करतो, त्यांत खऱ्या आत्म्याचें स्वरूप व्यक्त होत नाहीं; वासनात्मा हें अंतःकरणाचें विकृत रूप आहे, विश्वाचा स्पर्श या आत्म्याला झाला तर तो मूळ स्वरूपांत न होतां, विकृत किंवा उलट रूपांत होतो. विश्वांत व्यथा म्हणा, व्याधि म्हणा ही आहे कीं, व्यक्तीला आपला खरा आत्मा सांपडत नाहीं; आणि या व्याधीचे मूळ कारण असें आहे कीं, व्यक्ति जेव्हां बाह्य वस्तूंना आलिंगन देते, त्या वस्तू प्रेमानें जवळ करते, तेव्हां त्यांत विश्वाचा खरा आत्मा तिला लाभत नाहीं. अस्तित्वाचें, शक्तीचें, जाणिवेचें, आनंदाचें (सच्चिदानंदाचें) सारभूत सत्त्व बाह्य वस्तूमध्यें शोधून काढण्याचा प्रयत्न जीवात्मा करतो; परंतु तेथें त्यांपैकीं कांहींहि त्याच्या हातास न लागतां, त्या तत्त्वांच्या विरूद्ध गोष्टी, विरुद्ध स्पर्श आणि संस्कार, यांची गर्दी त्याजवर होते. त्याला हवें तें सारभूत सत्त्व जर बाह्य वस्तूंत त्याला लाभेल, तर एकच एक विश्वव्यापी सत्ता, सामर्थ्य, जाणीवयुक्त अस्तित्व आणि आनंदहि त्याला तेथें लाभेल; तें सारभूत सत्व, विश्वाला व्यापून असणारें ज्ञानमय सामर्थ्य आणि मूळ सद्‌वस्तु किंवा सत्य या नावांनीं एकच सत्य दाखविलें जातें; या सत्याची एकता आणि सुसंगति, सुसंवाद हाताशीं आल्यावर, बाह्य वस्तूंच्या द्वारां जी विकृत, विरोधी स्पर्शांची व संस्कारांची गर्दी जीवात्म्याच्या भोंवतीं होते, त्या गर्दीचा विरोध, विकृतपणा मूळ सत्याच्या सुसंवादाच्या व अद्वैताच्या अनुभवांत समूळ विलीन होतो. उपरिनिर्दिष्ट सारभूत सत्वाच्या लाभांत, व्यक्तीला आपल्या खऱ्या आत्म्याचाहि (true soul) लाभ होतो, आणि त्याच्या द्वारां परमात्म्याचा (Soul) लाभ होतो -- कारण व्यक्तीचा खरा आत्मा, त्याच्या परमात्म्याचा प्रतिनिधि असतो आणि व्यक्तीचा परमात्मा आणि विश्वाचा आत्मा हे एक आहेत. विचारमय मनांत, भावनामय हृदयांत व बाह्य स्पर्शांना प्रतिक्रियारूप उत्तर देणाऱ्या इंद्रियांत अहंजनित अज्ञान असतें, म्हणून विश्वात्म्याचें किंवा स्वतःच्या महान् आत्म्याचें दर्शन व्यक्तीला घडत नाहीं. या क्षुद्र अज्ञानमय अहंभावामुळें, व्यक्ति मोकळ्या विशाल हृदयानें, निर्भयपणें विश्वाला आलिंगन देत नाहीं -- तर विश्वाचा स्पर्श हा सुख किंवा दुःख देणारा असेल, समाधान देणारा किंवा भय उत्पन्न करणारा असेल, तृप्ति देणारा किंवा घृणा उत्पन्न करणारा असेल, त्याप्रमाणें व्यक्ति अज्ञानपूर्ण वासनामय अहंभावाच्या आहारीं जाऊन, विश्वाच्या अशा संपर्कांना प्रतिक्रिया

 

पान क्र. ४१४

 

म्हणून कधीं हांव सुटल्याप्रमाणें संपर्क करणाऱ्या वस्तूंकडे धांवते, कधीं उलट त्यांजपासून पळून आंखडता पाय घेते; कधीं फार सावधगिरीनें त्यांजकडे पाऊल टाकते, कधीं त्यांजकडे वेगानें उसळी घेते; कधीं कपाळाला आंठ्या घालून, नाराज होऊन, धाक घेऊन, रागावून त्या वस्तूंपासून मागें सरते. वासनामय आत्मा विश्व-जीवनाच्या संपर्कांना नीट ओळखत नाहीं -- त्यांच्याबद्दल भलता समज करून घेतो व त्यांना योग्य रीतीनें जवळ करीत नाहीं, म्हणून वस्तुजातांत जो शाश्वत दिव्य आनंद, दिव्य रस भरलेला आहे, त्याचें त्याला तीन प्रकारें विकृत दर्शन घडतें; तीन प्रकारचा विकृत अनुभव त्याला येतो. कांहीं संपर्क क्षणिक सुख देणारे, कांहीं क्षणिक दुःख देणारे व कांहीं तर कांहींच परिणाम न करणारे असे त्याच्या अनुभवास येतात.

अस्तित्वाचा आनंद आणि विश्व या दोहोंमध्यें जे अनेक प्रकारचे संबंध येतात, त्यांचा विचार करतां असें दिसून येतें कीं, सुख, दुःख व औदासीन्य या वृत्तींची आमची अनुभूति ही, अनुभवणाऱ्या जाणिवेच्या आंतरिक स्थितीवर अवलंबून असल्यानें, या वृत्तींना मोजावयास कायमचें वा नेहमीं कार्यक्षम असणारें माप नाहीं. सुख असो वा दुःख असो तें खूप वाढवितां येतें, खूप कमी करतां येतें किंवा पूर्णतया नाहींसेंहि करतां येतें; सुखाचें दुःख, दु:खाचे सुख असेंहि परिवर्तन होऊं शकतें; याचें कारण असें आहे कीं, या वृत्तींचें मूळ गुप्त-सत्य-स्वरूप एक कायमची वस्तु असून ही वस्तु संवेदना आणि भावना यांच्या क्षेत्रांत व्यक्त होतांना अथवा व्यक्त केली जातांना तिचीं रूपें भिन्न होतात, इतकेंच. उदासीन वृत्ति उत्पन्न होण्याचीं अनेक कारणें असूं शकतात. मनाच्या, संवेदनांच्या भावनांच्या व तीव्र आकांक्षांच्या गर्दीत वासनात्मा सांपडल्यामुळें, त्याचें वस्तुजातांतील रसाकडे (शाश्वत आनंदाकडे) लक्ष जात नाहीं, किंवा हा रस घेण्याची व त्याला अनुरूप प्रतिक्रिया करण्याची पात्रता वासनात्म्याच्या ठिकाणीं नसते; कांहीं बाह्य प्रतिक्रिया करावयाची नाहीं, असा वासनात्म्याचा निर्धार असेल किंवा आपली इच्छाशक्ति वापरून सुखदु:ख भावना दाबून टाकून, वस्तुजातांतील रसासंबंधानें केवळ अस्वीकारवृत्ति धरावयाची असा वासनात्म्याचा हेतु व उद्योग असेल -- यांपैकीं एक किंवा अनेक कारणें उदासीन वृत्तीच्या पोटीं असूं शकतात. बाह्यतः वासनात्म्याच्या निर्धारानें म्हणा, अपात्रतेनें म्हणा, कांहीं विशिष्ट प्रतिक्रिया दिसली नाहीं, तरी आंत अप्रकट आत्मा वस्तुजातांतील रस

 

पान क्र. ४१५

 

घेत असतो ही गोष्ट आपण लक्षांत ठेवली पाहिजे.

मानसिक प्रयोग व निरीक्षण यांच्या आधारें आपण असें म्हणूं शकतों कीं, अप्रकट मन हें, वस्तुजातांकडून होणारे सर्व आघात घेतें आणि ध्यानांत ठेवतें -- मग प्रकट मन त्यांजकडे खुशाल दुर्लक्ष करो, त्याचा हिशेब अप्रकट मन करीत नाहीं. ही जशी अप्रकट मनाची गोष्ट, तशीच अप्रकट आत्म्याची गोष्ट आहे. अनुभवांतील रस घेण्यास हा आंतरात्मा, खरा आत्मा कधींहि विसरत नाहीं -- बाह्य आत्मा कसाहि वागो, नावडता म्हणून रसाला तो दूर ठेवो किंवा त्याकडे दुर्लक्ष करून उदासीनता दाखवो. जोपर्यंत आम्ही आमचें बाह्य जीवन ओलांडून त्याच्या पलीकडे जात नाहीं, तोंपावेतों आम्हाला आमच्या आत्म्याचें ज्ञान होणें अशक्य आहे; बाह्यजीवन हें, कांहीं निवडक बाह्य अनुभवांचें बनलेलें असतें. आपले सर्व अनुभव कांहीं बाह्य जीवनांत अंतर्भूत होत नाहींत. बाह्य जीवन हें, अपुरा आवाज काढणाऱ्या वाद्याप्रमाणें आहे; बाह्य जीवन हें ग्रंथांतील तुकड्या तुकड्याचें, अनधिकारी माणसानें घाई घाईनें केलेल्या भाषांतरासारखे आहे -- केवळ बाह्य जीवनानें हा जीवनग्रंथ फारच अल्प प्रमाणांत व्यक्त केला जातो व तोहि व्हावा तसा व्यक्त होत नाहीं -- आमचें जीवन फार विशाल आहे -- आम्हीं या बाह्य जीवनाच्या पलीकडे आंत गेलें पाहिजे, अप्रकट जीवनाच्या खालच्या, अर्धनेणिवेच्या प्रांतांत व वरच्या अतिमानसिक प्रांतांत फेरफटका केला पाहिजे. त्यांचें आपल्या बाह्य जीवनाशीं काय नातें आहे तें पाहिलें पाहिजे -- असें आपण करूं, तरच आम्हांला खरें आत्मज्ञान होऊं शकेल. आमचें अस्तित्व हें अधोमानसिक, मानसिक, अतिमानसिक या तीन क्षेत्रांत आपला व्यवहार करतें. आमचें पूर्ण अस्तित्व म्हणजे या तीनहि क्षेत्रांतलें अस्तित्व होय. वास्तवांत कांहींहि भेद वा विविधता असो, अतिमानसिक पुरुष हा विश्वाच्या आत्म्याशीं एकरूप आहे. त्या भेदाची सत्ता अतिमानसिक पुरुषावर चालत नाहीं; वस्तुजातांतील सत्य, अतिमानसिक पुरुषाला पूर्णपणें कळतें; तें त्याच्या स्वाधीन असतें व वस्तुजातांतील शाश्वत आनंदहि तो पूर्णतया भोगतो. विशाल मानसिक जाणीव, हें अप्रकट मनाचें स्वरूप आहे. अतिमानसिक जाणिवेप्रमाणें अप्रकट विशाल मनाची जाणीव नाहीं -- परंतु विश्वविषयक अनुभवानें ती त्या विश्वात्म्याशीं जोडलेली असते. अप्रकट, आंतर-आत्मा वस्तुजातांतील रस जाणिवेनें अनुभवीत असतो; सर्व बाह्य-स्पर्श त्याला

 

पान क्र. ४१६

 

सारखेच आनंद देणारे असतात; बाह्य आत्मा, वासनात्मा जीं मूल्यें बाह्यस्पर्शाच्या बाबतींत ठरवितो -- जें सुख, दुःख वा औदासिन्य अनुभवतो तें सर्व आंतर-आत्माहि अनुभवतो; पण फरक असा कीं, हें सुख-दुःख-औदासीन्य आंतर-आत्मा त्याच्या शाश्वत आनंदाचे प्रकार म्हणून अनुभवतो -- सुखांत, दुःखांत व उदासीनतेंत आनंदाचा सारखाच ठेवा त्याला लाभतो. अर्थात् आपल्या खऱ्या आत्म्याला (आंतर आत्म्याला) सर्व अनुभव आनंदच देतात. या अनुभवांतून तो बळ मिळवितो, करमणूक मिळवितो, ज्ञान मिळवितो; या अनुभवांनीं तो आपली वाढ करून घेतो; आपल्या आनंदाचा व समृद्धीचा सांठा, या अनुभवांनीं तो मोठा करीत असतो. या खऱ्या आत्म्याच्या प्रभावामुळें वासनात्मक मनाला (आत्म्याला) आपल्या मर्जीविरुद्ध दुःख भोगावे लागतें; दुःखांत सुख पहावें लागतें, दुःख ओढवून घ्यावे लागतें; सुख दूर लोटावें लागतें, आपलीं स्वाभाविक मूल्यें कमी-अधिक बदलावीं लागतात; उलट सुलट देखील करावीं लागतात; उदासीनता पत्करून सर्व मूल्यें सारखीं मानावीं लागतात, किंवा सर्व मूल्यें एका आनंदाचीं विविध रूपें आहेत, जीवनाची विविधता सुख-दुःखादि अनुभवांच्या द्वारां प्रत्ययास येते, असें स्वतःला समजावून सांगून, विविधतेचा समान आनंद भोगावयास शिकावें लागतें. आमचा खरा अप्रकट आत्मा हें सर्व यासाठीं करतो कीं, विश्वात्मा त्याला सर्व प्रकारच्या अनुभवांच्या द्वारां आपली वाढ करून घेण्याची प्रेरणा देतो; आपण जर केवळ वासनात्म्याचें ऐकून जीवन जगूं लागलों, तर आपल्यांत कांहीं बदल होणें, कांहीं प्रगति होणें अशक्य आहे. वनस्पति किंवा दगडधोंडा यांच्याप्रमाणें आपण स्थितिशील राहूं किंवा जीवनाच्या ठरीव चाकोरींत फिरत राहूं; दगड धोंड्‌यांत व वनस्पतींत, आमच्याप्रमाणें, जीवन हें वरच्या बाह्य पातळींत जाणीवयुक्त नाहीं, म्हणून गुप्त वस्तुगत आत्मा (विश्वात्मा) त्यांचें जीवन त्यांच्या ठाम ठरलेल्या जन्मजात अरुंद चाकोरींतून बाहेर काढून प्रगत करूं शकत नाहीं -- आम्हांत जो वासनात्मा आहे, जाणीवयुक्त आत्मा आहे, त्याचा, गुप्त वस्तुगत आत्म्याला (विश्वात्म्याला) साधनासारखा उपयोग होतो; आणि या साधनाच्या द्वारां तो आमच्या खऱ्या आंतरात्म्याची वाढ घडवून आणतो -- वासनात्मा जें काय करील तें प्रमाण, असें ठरवून तेवढ्यांत संतुष्ट रहावयाचें म्हटलें, तर तो आपल्या ठरलेल्या चाकोरींत नित्य फिरत राहील व आमची वाढ बिलकुल होणार नाहीं.

 

पान क्र. ४१७

 

प्राचीन तत्त्वज्ञान्यांच्या मतें सुख आणि दुःख ह्या वेगळ्या वृत्ती नाहींत. जेथें सुख, तेथें दुःख ठेवलेलेंच आहे. ज्याप्रमाणें सत्य आणि असत्य, सामर्थ्य आणि असामर्थ्य, जन्म आणि मरण या जोड्‌या अविभाज्य आहेत, त्याप्रमाणें सुखदुःखाची जोडी अविभाज्य आहे. म्हणून या तत्त्वज्ञान्यांचें म्हणणें असें कीं, या सुख-दुःखापासून मुक्त व्हावयाचें, तर पूर्ण उदासीनतेचा, विश्वात्म्याच्या क्षोभक संपर्कांना कांहींच उत्तर न देण्याचा, पूर्ण वैराग्याचा अभ्यास हा एकच उपाय आहे. परंतु मानसिक ज्ञान सूक्ष्म प्रांतांत शिरलें असल्यानें, आम्हांला हें ठाऊक झालें आहे कीं, जीवनाच्या बाह्य गोष्टींवर वरील मत आधारलेलें असल्यानें, त्यांत या विश्वसंपर्कांना उत्तर देण्याच्या प्रश्नाचा सर्वांगीण विचार सामावलेला नाहीं. आमचा खरा आंतरआत्मा बाह्य स्थानीं येऊन कार्य करूं शकतो आणि असें आमच्या आंतर, खऱ्या आत्म्याचें बाह्य जीवनाशीं नातें जोडलें म्हणजे जेथें अहंभावामुळें सुख आणि दुःख अशी द्वन्द्वात्मक प्रतिक्रिया उत्पन्न होते, तेथें एकच, सारखी सर्वस्पर्शी, व्यष्टि-समष्टि व्यापक, वैयक्तिक-अवैयक्तिक आनंदात्मक प्रतिक्रिया उत्पन्न होऊं शकते. निसर्गप्रेमी हा निसर्गांतील सर्व वस्तूंत व घटनांत सर्वदा सर्वत्र आनंदाचा भोग घेतो, त्याला कोठें घृणा वाटत नाहीं, भीति वाटत नाहीं, आवड-नावड त्रास देत नाहीं; सामान्यांना जें क्षुद्र, हलके, अर्थशून्य, भकास, जंगली भयंकर, किळसवाणें असें वाटेल, तें निसर्गप्रेमी माणसाला सुंदर दिसतें; याचें कारण, निसर्गप्रेमी आपला अहंभावनिष्ठ बाह्य वासनात्मक आत्मा बाजूला ठेवून, त्याच्या जागीं आपला विश्वात्मनिष्ठ आंतर, अप्रकट खरा आत्मा पुढें करतो हें होय. कलावंत, कवि हेहि निसर्गभक्तासारखेच आपला आंतरात्मा पुढें करून, वासनात्मा बाजूला ठेवतात -- म्हणून सौंदर्यभावना, सौंदर्याची मानसिक मूर्ति, सौंदर्याची शारीर रूपरेखा, वस्तूची व जीवाची आंतरिक अर्थपूर्णता, आंतरिक समर्थता या गोष्टी त्यांना विश्वाच्या व्यवहारांत अनुभवास येतात आणि त्यांच्यामुळें विश्वांतील रसाचे, नित्य आनंदाचे ते कायमचे वांटेकरी होतात -- कलावंत व कवि यांना नित्य आनंद देणाऱ्या गोष्टींपैकीं कांहींकडे, त्या सुख देणाऱ्या म्हणून सामान्य माणसें आकर्षिलीं जातात, तर कांहींपासून त्या असुख देणाऱ्या म्हणून तीं पळ काढतात. ज्ञानाचा भोक्ता जिज्ञासु, ज्याला सर्वत्र आपला प्रेमविषय दिसतो तसा देशाचा प्रेमी भक्त, आध्यात्मिक जीवनाचा माणूस, बुद्धिप्रधान माणूस, संवेदनावादी व सौंदर्यवादी -- हे सर्व आपापल्या परीनें

 

पान क्र. ४१८

 

आपल्या बाह्य आत्म्याच्या जागीं आंतरआत्म्याकडून काम घेतात आणि त्यांना त्यांचें इष्ट ज्ञान वा सौंदर्य किंवा सुख अथवा ईश्वर समग्रतेनें पाहिजे असल्यास असें करावेंच लागतें. आंतरआत्म्याच्या अवैयक्तिकतेचें, अनहंकाराचें दिव्य-तत्त्व कांहीं व्यवहारांत वापरणें अतिशय कठिण असतें. पुष्कळांना कांहीं कांहीं व्यवहारांत ही गोष्ट अशक्य वाटते, पुष्कळांना ती भयंकर वाटते, घृणित वाटते -- हे व्यवहार म्हणजे, ज्या ठिकाणीं आमचा क्षुद्र 'मी' आम्हांला आंवरण्यासारखा नसतो, जेथें भावनेच्या किंवा शरीराच्या सुखाचा किंवा दुःखाचा प्रश्न असतो, सामान्य जीवनाच्या सुखाचा व दुःखाचा प्रश्न असतो, जेथें वासनात्मा अतिशय दुबळा आणि भित्रा असल्यानें सामान्य शारीर किंवा भावनिक सुख टाकणें व दुःख पत्करणें त्याच्या जिवावर येतें, असें व्यवहार होत. विज्ञान, कला, सामान्य अपूर्ण आध्यात्मिक जीवन यासंबंधींच्या व्यवहारांत अवैयक्तिकतेचें, तटस्थतेचें, तिऱ्हाईतपणाचें, अनहंकाराचें तत्त्व स्वीकारतांना 'मी'ला, वासनात्म्याला फार कठीण जात नाहीं -- कारण त्याला ज्या गोष्टी अगदीं निकडीच्या वाटतात, बाह्य-जीवन ज्या गोष्टींवाचून अडून बसतें किंवा अगदीं फिक्कें वाटतें त्या गोष्टींना, या विज्ञानादि प्रांतांतील अवैयक्तिकतेच्या तत्त्वाचा उपसर्ग पोहोंचत नाहीं. विज्ञान, कला, विशिष्ट आध्यात्मिक जीवन हे व्यवहार उच्च पातळीवरचे, स्वतंत्र वातावरणांतले व्यवहार होत -- या व्यवहारांत विशिष्ट जाणिवेच्या व क्रियाशीलतेच्या प्रांताचा संबंध असतो आणि अशा प्रांतांत त्याला अनुरुप व आवश्यक अशी मर्यादित समवृत्ति व तिऱ्हाईतपणाची तत्त्ववृत्ति लागत असते -- या व्यवहारांत आमच्या सामान्य जीवनाचा जो अहंभावनिष्ठ स्वार्थी पाया असतो त्याला धक्का लागत नाहीं. हे उच्च व्यवहार सोडून, जे सामान्य, खालच्या पातळीवरचे व्यवहार असतात, त्यांत तिऱ्हाईतपणाची, निःस्वार्थी तत्त्वदृष्टि वापरावयाची, तर आमच्या जीवनाचा सर्व पायाच बदलावा लागेल -- आणि ही गोष्ट वासनात्मा करूं शकत नाहीं; हें करणें त्याला अशक्य वाटतें.

अज्ञानमय मन-प्राण-शरीरापलीकडे, यांच्या जाड पडद्यानें झांकलेला असा आमच्यांतला गुप्त, खरा आत्मा हृदयाच्या खोल मंदिरांत तेजानें तळपत असतो. ही ईश्वरापासून निघणारी एक ज्वाला असते, ज्योति असते; हा आत्मा नेहमीं आमच्या हृदयाच्या हृदयांत प्रकाश देत असतो, आमचा बाहेरचा प्राकृतिक भाग, आत्मविषयक गाढ नेणिवेनें व्यापलेला

 

पान क्र. ४१९

 

असला, तरी या नित्यप्रकाशमय दिव्य ज्योतिरूप खऱ्या आत्म्याला त्या नेणिवेची बाधा होत नाहीं -- ही आत्मज्योति या नेणिवेनें विझत नाहीं -- ही ज्योति, अज्ञानाच्या क्षेत्रांत तेजोमय रहिवासी असते आणि अज्ञानाला ज्ञानाचें औत्सुक्य उत्पन्न होईपर्यंत सारखी वाढत राहते -- ही आत्मज्योति आमच्या सर्व अंतर्बाह्य कृतींची साक्षी, नियंत्रक, गुप्त मार्गदर्शक, सॉक्रेटिसानें डीमन् नांव दिलेला अंतःपुरुष, साक्षात्कारी पुरुषांना ज्ञात असलेला अंतःप्रकाश व अंतःशब्द होय. आमच्यामध्यें नित्य राहणारें असें हें तत्त्व आहे -- मरणाचा स्पर्श या आंतरात्म्याला होत नाहीं, तो जन्मोजन्मीं आमच्यामध्यें नित्य वसत असतां, मलाचा किंवा क्षयाचाहि त्याला डाग लागत नाहीं -- हा अनश्वर असा दिव्य ज्योतिर्मय ईश्वरअंश आहे. हा विश्वरूप विश्वातीत आत्मा नसला, तरी त्याचा तो प्रतिनिधि आहे; निसर्गांतील रूपांत कार्य करणारा असा त्याचा प्रतिनिधि, वैयक्तिक आत्मा, चैत्य पुरुष असें त्याचें स्थान आहे : मन-प्राण-शरीर यांना त्याचा आधार असतो; मनोमय, प्राणमय व सूक्ष्म भौतिक पुरुषांच्या पाठीमागें असणारा हा चैत्य पुरुष, त्यांच्यावर नजर ठेवीत असतो आणि त्यांच्या अनुभवानें आणि विकासानें आपलें हित करून घेत असतो. मनोमयादि तीन पुरुष या चैत्य पुरुषाचीं अंगेंच असतात. हीं अंगें देखील पडद्याआड असतात. हे अप्रकट मनोमयादि पुरुष, 'तात्पुरते पुरुष' (Temporary Personalities) असतात -- आमचें बाह्य व्यक्तित्व या तात्पुरत्या पुरुषांचें बनलेलें असतें -- या पुरुषांचें बाह्य संयुक्त कार्य आणि अस्तित्व याला आम्ही सामान्यत: आमचा ''आत्मा'' म्हणतों. चैत्यपुरुषदेखील असेच 'तात्पुरते पुरुष' पुढें करीत असतो; या पुरुषांत जन्माजन्मांत बदल होतो, त्याची वाढ होते, त्याचा विकास होतो -- हा प्रवासी चैत्य पुरुष, जन्म आणि मरण, मरण आणि जन्म असे मार्गावरचे टप्पे गांठतो व मागें टाकतो आणि आपला प्रवास सारखा करीत राहतो. निसर्ग त्याला जें मन आदि साधन पुरवितो, तें त्याच्या विविध प्रकारच्या व बदलणाऱ्या वस्त्राप्रमाणे असतें -- या चैत्य पुरुषाचें कार्य प्रथम प्रथम अप्रत्यक्ष असतें, पडद्याआडून चालतें, एकांगीं असतें; मनाच्या, प्राणाच्या व शरीराच्या द्वारां हें त्याचें कार्य होत असतें; मन आदि निसर्गाचे भाग आपल्या स्वरूपाच्या आविष्काराचीं साधनें म्हणून चैत्य पुरुषाला विकसित करावयाचीं असतात; -- या साधनांचा विकास नीट होईपर्यंत चैत्य पुरुष हा बंदींत पडल्यासारखा असतो; अज्ञानाच्या क्षेत्रांत राहून,

 

पान क्र. ४२०

 

मनुष्याला त्या अज्ञानांतून दिव्य जाणिवेच्या प्रकाशाकडे नेण्याचें काम त्याजकडे असतें; अज्ञानक्षेत्रांत जो जो अनुभव त्याला येतो, त्या त्या अनुभवाचें, एकंदर सर्व अनुभवांचें सत्व घेऊन, त्या सत्वानें तो निसर्गाचे ठिकाणीं आपल्या आत्मकेन्द्राचें पोषण करतो; अनुभवांचा बाकीचा भाग, मन-प्राण-शरीर या आपल्या साधनाची वाढ करण्यासाठीं तो वापरतो; ईश्वरी तत्त्वाचें व कार्याचें प्रकाशमय साधन हें स्वरूप, या खटपटीनें चैत्य पुरुष मन, प्राण, शरीर या त्रयीला आणून देतो. हा चैत्य पुरुष, गुप्त आंतरात्मा, हा आमच्यांतील मूळ सद्सद्विवेकाचें खरें तत्त्व आहे -- शिष्ट संप्रदायांचें बनलेलें, सामाजिक रूढ नीतिकल्पनांचें बनविलेलें, बरें वाईट सांगणारें असें एक आंतरिक तत्त्व 'सद्सद्विवेक तत्त्व' म्हणून नीतिशास्त्री जें पुढें करतात, तें मूळ तत्त्व नव्हे -- मूळ सद्सद्विवेक तत्त्व म्हणजे चैत्य पुरुषच होय. सर्वदा सत्य, शिव, सुंदर यांच्या दिशेनेंच चैत्य पुरुषाचा सद्सद्विवेक आम्हांला नेत असतो; प्रेम आणि मेळ यांजकडेच तो आम्हांला नेत असतो; आमच्यांत जी कांहीं दिव्यता येणें शक्य आहे, ती कशी, कोणत्या मार्गानें येईल याचीच तो नेहमीं चिंता वाहतो व त्या शक्य दिव्यतेच्या मार्गानें आम्हांला घेऊन जातो -- आमच्या स्वभावांत या सर्व दिव्य गोष्टी सजल्या, आमच्या स्वभावाचे ठिकाणीं आमची निकडीची गरज हें स्वरूप या दिव्य गोष्टींना प्राप्त झालें, म्हणजेच चैत्य पुरुषाची कामगिरी पूर्ण होते; ही कामगिरी पूर्णतेला पोहोंचेपर्यंत, त्याची आमच्या ठिकाणीं दिव्यता आणण्याची खटपट सारखी चालूं राहते. चैत्य पुरुष गुप्त राहून, आपला 'प्रतिनिधि पुरुष' बाह्य व्यवहारासाठीं पुढें करीत असतो, असें वर सांगितले -- हा आमच्या खऱ्या आत्म्याचा बाह्य प्रतिनिधि बलवान् असूं शकतो वा दुर्बल असूं शकतो. बलवान् असेल, तर आत्मज्ञान, ईश्वरज्ञान इकडे आमची वृत्ति नेतो; परम सत्य, परम मंगल, परम सुंदर, परम प्रेम, परम सुख या दिव्य, उच्च आणि विशाल स्थानांकडे तो आम्हांला वळवितो; अध्यात्मसुलभ सहानुभूति, विश्वात्मा, एकता यांचा सुखमय स्पर्श तो आम्हांला प्राप्त करून देतो -- आणि आमच्यांत संत, ऋषि किंवा द्रष्टे निर्माण होतात -- गुप्त चैत्य पुरुषाचे 'बाह्य प्रतिनिधि' बलवान झाले असल्यास तेच संत, ऋषि किंवा द्रष्टे होतात. कारण आमच्या बाह्य व्यवहारांतील प्राथमिक विकासावस्थेंतील मिरासदार जो वासनात्मा, त्याला हतबल करण्यास त्यांचें अध्यात्मबल

 

पान क्र. ४२१

 

समर्थ असतें. चैत्य पुरुषाचा बाह्य प्रतिनिधि बलवान झालेला नसेल, अर्धविकसित असेल, प्राथमिक अवस्थेंत असेल, तर वरच्या दर्जाच्या (कमी अधिक दिव्यतेच्या) अवस्था आणि क्रिया आमच्यांत नसतील किंवा सामर्थ्यानें कमी असतील. मन जोरदार आणि तेजस्वी असेल; हृदयांतील भावना, जीवनस्पर्शी भावना कठीण, जोमदार प्रभावी असतील; प्राणशक्ति प्रभुत्व गाजवणारी आणि यशस्वी असेल -- शारीर जीवन श्रीमंत, भाग्यवान्, दर्शनी विजयी आणि प्रभुत्वशील असेल -- हें सर्व प्रकारचें बळ पुरेपूर असून आत्मबळ (चैत्य-प्रतिनिधीचें बळ) कमी पडेल, तर वरच्या दर्जाच्या (कमीअधिक दिव्यतेच्या) अवस्था व क्रिया आमच्यांत असणार नाहींत किंवा सामर्थ्यहीन असतील. अशी स्थिति ही वासनात्म्याच्या अधिराज्याची द्योतक आहे. या स्थितींत वासनात्म्यानें विपर्यस्त केलेल्या आंतरात्म्याच्या सूचना व आकांक्षा, वासनात्म्याच्या स्वतःच्या कल्पना आणि ध्येयें, त्याच्या इच्छा आणि तळमळी यांना आपण खरी आत्मसंपत्ति, खरें आध्यात्मिक अनुभव-धन असें चुकीनें मानीत असतो. गुप्त आत्मा, गुप्त अंत:पुरुष आपला प्रतिनिधि पुढें करतो व त्याच्या द्वारां वासनात्मा करीत असलेल्या अहंनिष्ठ व्यवहारांत बदल करण्याचा प्रयत्न करतो हें आपण वर पाहिलें. हा अंतःपुरुष, आमचा खरा आत्मा, पूर्णतया पुढें होईल आणि वासनात्म्याला बाजूला ठेवून व्यवहार करील, पडद्याआड राहून थोडा हा, थोडा तो, असा तुटक व्यवहार करण्याऐवजीं, पडदा दूर करून उघडपणें आणि समग्रतेनें व्यवहाराचें शासन करील, बाह्य मन-प्राण-शरीर या निसर्गविभागाचें उघडपणें व समग्रतेनें शासन करील, तर जें सत्य आहे, मंगल आहे, सुंदर आहे, त्याच्या प्रतिमूर्तींचें रूप, त्याच्या आत्मिक प्रतिमांचें रूप, मन-प्राण-शरीर यांना येऊं शकेल आणि आध्यात्मिक जीवनाच्या पायरीवर चढून जाणें हा जो आमच्या जीवनाचा खरा हेतु व सर्वोत्तम विजय आहे, त्या हेतूसाठीं, त्या विजयासाठीं आमचा सर्वच्या सर्व स्वभाव शेवटीं क्रियाशील होईल -- अर्थात् आमचा वासनात्मा खऱ्या आत्म्यांत सर्वथा विलीन होईल.

वरील वर्णनावरून असें भासण्याचा संभव आहे कीं, आमचा खरा आत्मा, चैत्य पुरुष, बाह्य व्यवहारासाठीं आघाडीवर आणला, जीवनाचें नेतृत्व आणि नियंत्रण त्याजकडे सोपविलें म्हणजे आमच्या प्राकृतिक अस्तित्वाची पूर्णता, आम्हांला हवी तेवढी होऊं शकेल; आणि त्याबरोबर आत्म्याच्या राज्याचे दरवाजेहि आम्ही खुले करूं शकूं. असाहि आणखी

 

पान क्र. ४२२

 

युक्तिवाद करतां येईल कीं, आम्हांला दिव्य अवस्था, दिव्य पूर्णता प्राप्त होण्यासाठीं कदाचित् उच्च सत्य-जाणिवेचें किंवा अतिमानसिक तत्त्वाचें मध्यस्थपण जरूरहि पडणार नाहीं -- चैत्य पुरुष हें सर्व दिव्य-पूर्णत्व आम्हांला मिळवून देण्याचें काम करूं शकेल. पण हा युक्तिवाद चुकीचा आहे. आमच्या अस्तित्वाचें एकंदर समूळ रूपांतर होण्यासाठीं, मानसिक (Psychic) रूपांतर हें एक आवश्यक पूर्वकार्य असलें, तरी त्यानेंच सर्व कांहीं भागेल व श्रेष्ठांत श्रेष्ठ, मोठ्यांत मोठा आध्यात्मिक बदल आमच्यांत होण्यास, चैत्य पुरुषाच्या मानसिक परिवर्तनाच्या कार्याखेरीज अन्य कशाचीहि आवश्यकता राहणार नाहीं, ही गोष्ट खरी नाहीं. एक गोष्ट ही कीं, चैत्य पुरुष हा वैयक्तिक आत्मा आहे. अर्थात् आमच्या वैयक्तिक अस्तित्वाचीं जीं गुप्त दिव्य क्षेत्रें आहेत, त्यांचे दरवाजे उघडून तेथील प्रकाश, सामर्थ्य, अनुभूती तो मिळवूं शकेल व आपल्या कार्यांत प्रतिबिंबित करूं शकेल; पण विश्वात्मता आणि विश्वातीतता या ज्या आमच्या आत्म्याच्या अवैयक्तिक बाजू आहेत, त्या आम्हांला आत्मसात् होण्यासाठीं चैत्य पुरुषाच्या कार्याइतकीच, उच्च पातळीवरून महान् आत्म्यानें आमच्यांत आध्यात्मिक परिवर्तन घडवून आणण्याची आवश्यकता आहे : चैत्य पुरुषावर सर्व भिस्त ठेवली, तर आत्म्याची विश्वात्मता किंवा विश्वरूपता आणि विश्वातीतता किंवा कैवल्य या धर्मांचा सर्वागीण सक्रिय अनुभव आम्हांला कधींच न होण्याचा संभव आहे. चैत्य पुरुष प्रगति करीत, सत्य-शिव-सुंदर या गुणांचे एक आत्मरूप तयार करून, तेथें थांबून त्यांच्या पूजेंत मग्न राहील; किंवा अधिक दोन पावलें टाकून, विश्वात्म्याचा निष्क्रिय दास होईल -- अर्थात् विश्वरूप अस्तित्व, जाणीव, सामर्थ्य, आनंद त्याच्यांत आरशाप्रमाणें प्रतिबिंबित होतील. परंतु या गोष्टींचा मालक, पूर्ण वांटेकरी तो होणार नाहीं; ज्ञान, भावना, ऐंद्रिय अनुभूती या बाबतींत विश्वात्म्याच्या जाणिवेशीं चैत्य पुरुषाचा निकट आणि सुखद संयोग घडला, तरी तो केवळ दान घेणारा निष्क्रिय पुरुष राहील; विश्वांत प्रभुत्व गाजविणें, विश्वांत कृती करून कृतार्थ होणें, ही गोष्ट त्याच्या आवांक्यांत येणार नाहीं; किंवा असेंहि होऊं शकेल कीं, विश्वाच्या मागें जो स्थितिशील आत्मा आहे, त्याच्याशीं चैत्य पुरुष एकता पावेल, विश्वव्यापारापासून आंतून अलग, अलिप्त राहील आपली व्यक्तिता आपल्या उगमस्थानीं (विश्वात्म्यांत) विलीन करील आणि त्या जन्मस्थानाला परत येऊन, तेथें स्थायिक होईल आणि मग त्याला त्याच्या जीवनाचें जें

 

पान क्र. ४२३

 

नियत कार्य -- ईश्वरापासून दूर गेलेला निसर्ग परत ईश्वरत्वाच्या साक्षात्कारानें भरून दिव्यत्वानें युक्त करणें हें जें नियत कार्य -- तें करण्याची इच्छा राहणार नाहीं व तें कार्य करण्याचें सामर्थ्यहि त्याला असणार नाहीं. चैत्य पुरुष जो निसर्गांत आला, तो विश्वात्म्यापासून, ईश्वरापासून आला आणि निसर्गांतून तो परत निःशब्द शांत विश्वात्म्यांत, विश्वात्म्याकडे जाऊं शकतो; त्याचा मार्ग निस्तब्धता, मौन आणि परमोच्च आत्मस्थैर्य हा आहे. चैत्य पुरुष हा ईश्वराचा शाश्वत अंश आहे. (गीता १५-७) अनंताच्या नियमानुसार हा शाश्वत अंश, ईश्वररूप दिव्य पूर्णतत्त्वापासून विभक्त असूं शकत नाहीं, राहूं शकत नाहीं; वस्तुत: हा अंश स्वतःच पूर्ण असतो -- फक्त त्याचें बाह्य स्वरूप, त्याची बाह्य विभक्त आत्मानुभूति एवढा भाग पूर्ण ईश्वरत्वापासून वंचित असतो; वस्तुत: पूर्ण (ईश्वर) असलेला हा अंशरूप जीवात्मा (चैत्य पुरुष) जागृत होऊन, आपलें मूळ सत्यस्वरूप ओळखून, त्या स्वरूपांत बुडी घेऊं शकतो; असें झालें म्हणजे त्याचें वैयक्तिक अस्तित्व नष्ट झाल्यासारखें होतें; निदान ईश्वरांत तें विलीन होतें. चैत्य पुरुष हा अज्ञानमय निसर्गाच्या महान् क्षेत्रांत एक लहानसा चैतन्य-केंद्र असल्यासारखा असतो; उपनिषदांत याला 'अंगुष्ठ प्रमाण' म्हटलें आहे; असें हें अंगुष्ठ-प्रमाण लहानसें चैतन्य-केंद्र, आत्मशक्तीच्या वाढत्या सात्मीकरणानें मोठें मोठें होत जाऊन, सगळ्या विश्वाला व्यापूं शकतें, आपलें मन आणि हृदय विशाल करून, त्यांच्या द्वारां सर्व विश्वाशीं पूर्ण आंतरिक तन्मयता, एकात्मता पावूं शकतें. किंवा असेंहि होऊं शकेल कीं, ईश्वर आपला शाश्वतचा सोबती आहे, सखा आहे या अनुभूतीनें हा चैत्य पुरुष, जीवात्मा तृप्त होऊन, या सख्याच्या सान्निध्यांत नित्य राहण्याचें पसंत करील, कधींहि खंड न पावणारी अशी प्रेमाची एकरूपता आणि तन्मयता ईश्वरापाशीं भोगील -- अमर प्रियकर आणि प्रेयसी असें, ईश्वराचें आणि त्याचें शाश्वत प्रेमाचें नातें होईल : अत्यंत सुखमय आणि अत्यंत सुंदर असा हाच एक आध्यात्मिक अनुभव आहे; बाकीचे सर्व अनुभव याच्या खालीं बसण्याच्या योग्यतेचे आहेत. आध्यात्मिक स्व-स्वरूपलाभाच्या या सर्व सिद्धी निःसंशय महान् आहेत, भव्य, दिव्य आहेत; तरीपण या सिद्धी स्व-स्वरूपलाभाची अखेर, किंवा शिखरसिद्धी आहेत असेंच कांहीं म्हणतां येत नाहीं; आत्मतत्वाचा स्व-स्वरूपलाभ यापुढेंहि जाऊं शकतो.

वर ज्या स्वरूपसिद्धी वर्णिल्या, त्या आत्मनिष्ठ मनाच्या सिद्धी आहेत;

 

पान क्र. ४२४

 

आत्मनिष्ठतेनें मन, स्वतःच्या सामान्य व्यवहारापलीकडे पाऊल टाकूं शकतें, व टाकतें -- पण तें आपली पातळी न बदलतां आत्म्याचे दिव्य व्यवहार करीत असतें. मनाची आजची जी अवस्था आहे त्या अवस्थेपलीकडे अनेक उच्च पायऱ्या आहेत -- यांतील श्रेष्ठ उच्चतम पायरीवर मन चढून गेलें, तरी भेदनिष्ठतेनें कार्य करणें हा जो त्याचा स्वभावधर्म, तो तें बदलूं शकत नाहीं; तें करतें काय, तर शाश्वत ब्रह्माचीं अंगें एक एक स्वतंत्रपणें घेऊन, त्याला सर्व, समग्र ब्रह्माचा मान देतें -- कोणत्याहि एका ब्रह्म-अंगांत त्याला आपली जेवढी पूर्ण स्थिति दिसते, तेवढी पूर्णता प्राप्त करून तें संतुष्ट होतें. हें भेदनिष्ठ मन सद्‌वस्तूचीं अंगें एकमेकांविरुद्ध उभीं करतें; याप्रमाणें अनेक द्वंद्वें तयार करतें : ब्रह्माची शांति, विरुद्ध ब्रह्माची क्रियाशीलता क्रियाशील सगुण सत्ताधीश ब्रह्म, विरुद्ध क्रियाशून्य निर्गुण सत्तातीत ब्रह्म; अस्तित्व (ब्रह्म), विरुद्ध दिव्य पुरुष, ईश्वर -- अशीं द्वंद्वें उभीं करून, कोणत्याहि द्वंद्वांतील एकाला दूर ठेवून, दुसऱ्यांत तें बुडी घेतें आणि हें दुसरें द्वंद्व म्हणजेच एकच एक सत्य आहे, एकच एक शाश्वत सद्‌वस्तु आहे असें आपलें स्वतःचें समाधान करतें. ईश्वर हाच एक सत्य आहे किंवा ब्रह्मतत्त्व हेंच एक सत्य आहे, यांपैकीं कोणताहि पक्ष समग्र सत्य म्हणून मन घेऊं शकतें; शाश्वत प्रेमतत्त्व हेंच एक सत्य आहे आणि प्रेम करणारा ईश्वर हें केवळ या प्रेमतत्त्वाचें व्यक्त होण्याचें साधन आहे, असा पक्ष मन घेऊं शकतें -- उलट प्रेम करणारा ईश्वर हा एकच नित्य सत्य वस्तु आहे आणि प्रेम हें केवळ या ईश्वराचें आत्माविष्करण आहे, असाहि पक्ष तें घेऊं शकतें; शुद्ध तत्त्वमय अस्तित्व (ब्रह्म) हें एकच एक सत्य आणि अनेक जीव म्हणजे त्या तत्त्वाच्या व्यक्तिनिष्ठ नानाविध शक्ती, असा पक्ष तें घेईल किंवा एकच एक अनंत पुरुष हें मूळ सत्य आणि तात्त्विक वा व्यक्तिशून्य अस्तित्व हें त्या पुरुषाची एक भावावस्था आहे, असाहि पक्ष तें घेईल. मन आध्यात्मिक सिद्धीच्या मागें लागलें म्हणजे त्याचा श्रेष्ठ हेतु साधण्यासाठीं, तें वर सांगितलेल्या भिन्न मार्गांपैकीं कोणत्याहि मार्गानें जाईल -- अध्यात्मपरायण मनाचा व्यवहार हा असा असतो; मना पलीकडे अतिमानस - अतिमानसिक सत्य-जाणिवेचें उच्च स्थान असतें : या सत्यज्ञानमय अतिमानसाची अनुभूति मनाच्या अनुभूतीहून वेगळी व श्रेष्ठ प्रकारची असते : या श्रेष्ठ अनुभूतींत मनाच्या भूमिकेवरील द्वंद्वें नाहींशीं होतात व एकांगी अनुभव दूर सारले जातात : अतिमानसाच्या भूमीवर

 

पान क्र. ४२५

 

आत्म्याला शाश्वत सद्‌वस्तूचा सर्वांगीण, समग्र, सर्वोत्तम साक्षात्कार घडतो आणि त्या समृद्ध समग्रतेनें संपन्न झालेला आत्मा, मनाच्या भूमिकेवर मिळणारे एकांगी अनुभव दूर सारतो. आमच्यापुढें आम्हीं जें ध्येय ठेवलें आहे, तें हें असें आहे : येथें जें जीवन आम्ही जगत आहों त्याची पूर्णता साधावयाची हें आमचें ध्येय आहे -- ही पूर्णता साधावयास दोन गोष्टी आम्हांस कराव्या लागतील : १) अतिमानसिक सत्य-जाणिवेचा मनाच्या वर असलेला प्रांत चढून आपलासा करणें, २) आमचा जो मन-प्राण-शरीर स्वभाव आहे, त्या स्वभावांत, त्या प्रकृतींत त्या अतिमानसिक भूमीवरील सत्य-जाणिवेचा अवतार घडविणें. चैत्य पुरुषाच्या प्रभावानें आध्यात्मिक भूमिकेवर चढण्याचा विक्रम मन करतें -- हा विक्रम झाल्यावर त्याला पूर्णता आणण्यासाठीं, अतिमानसाच्या प्रभावानें समग्रतेचा पाठ मन घेतें -- तें वर वर चढत जातें आणि शेवटीं चढून जावयाचें जें आध्यात्मिक शिखर, तें गांठून आपल्या आध्यात्मिक विक्रमास पूर्णता आणतें.

अध्यात्माचें शिखर अतिमानसिक भूमीवर आहे. येथें खालचे सर्व विसंवाद आपलें स्वरूप बदलून सुसंवाद होतात. कारण येथें सत्य-दर्शन आहे व सत्य-ज्ञान आहे. व्यक्त झालेलें मूळ अस्तित्व, सद्रूप, हें मनाच्या भूमीवर अनेक द्वंद्वांत विभागलेलें असें आपणांस आढळतें; या द्वंद्वांची द्वंद्वता, विरोध, नाहींसा करणारी किमया अतिमानसाच्या सत्य-जाणिवेंत आहे. अध्यात्मसंपन्न झालेल्याचें देहधारी जीवन, अंतरांत आत्म्याची पूर्ण अवस्था आणि बाहेर अपूर्ण दोषमय क्रियाशीलता यांनीं संमिश्र असें बनलेलें दिसतें. अज्ञानाच्या क्षेत्रांत जोपर्यंत आम्ही असतों, तोंपर्यंत अध्यात्म आणि व्यवहार यांचा हा विरोध आम्हांला अटळ असतो. हा विरोध अतिमानसिक शक्तियुक्त सत्य-ज्ञानाच्या आश्रयानें नाहींसा करतां येतो; त्यायोगें अंतरांतील आत्मस्थिति आणि आमची विश्वांतील कृति या दोहोंमध्यें पूर्ण सुसंगति निर्माण करतां येते -- अज्ञानाच्या भूमिकेवर, अहंकारतत्त्व केंद्र करून, त्याच्या भोंवतीं निसर्ग सर्व मानसिक आंदोलन चालवीत असतो; गुप्त आध्यात्मिक पुरुष हा अज्ञानाच्या भूमिकेवर गुप्तच असतो, व्यवहाराचें केंद्र असत नाहीं. आम्ही जगांत वागत असतो, तेथें अनेक गुंतागुंतीचे संपर्क, अन्योन्यविरोध, द्वंद्वें, विसंवाद आमचा जीवनमार्ग व्यापून असतात -- या व्यापांत आम्हांला जे अनुभव येतात, आमचे व इतरांचे जे संबंध उत्पन्न होतात, त्या

 

पान क्र. ४२६

 

सर्वांना व्यवस्थितपणें एकत्र बांधावयास कांहींतरी सूत्र अवश्य असतें -- व हें सूत्र अज्ञानभूमिकेवर अहंकाराच्या रूपानें, निसर्ग आम्हांला उपलब्ध करून देतो. हें अहंकार-केंद्र आमचा संरक्षक असतें -- अनंताचे, विश्वाचे जे आघात आमच्यावर सारखे होत असतात, त्यांच्यापासून आमचें संरक्षण, अज्ञानावस्थेंत हा अहंकारच करीत असतो. अध्यात्मांत आम्ही शिरलों कीं हा अहंकार, हें अहंतत्त्व दूर करावें लागतें -- अर्थात् आमचा संरक्षक नाहींसा होतो आणि आमचें व्यक्तित्व हें महान् व्यक्तित्वशून्य चैतन्यतत्त्वांत विलीन होतें; या विलीनीकरणाचा परिणाम प्रथम असा होतो कीं, आमच्या कृतीमध्यें व्यवस्था आणणारें कांहींच सूत्र आमच्याजवळ रहात नाहीं. आम्ही सूत्रहीन होण्याचा परिणाम म्हणजे आमच्या एका अस्तित्वाचीं जणुं दोन विभक्त अस्तित्वें होतात; एक आंतरिक आध्यात्मिक अस्तित्व आणि दुसरें बाह्य प्राकृतिक अस्तित्व. आंतरिक अस्तित्व ईश्वरी साक्षात्कारयुक्त असतें व तें पूर्ण आंतरिक स्वातंत्र्याचा आनंद उपभोगीत असतें आणि बाह्य प्राकृतिक अस्तित्व निसर्गाचें जुनें कार्य करीत राहतें; जुनी निसर्गप्रेरणा बाह्य अस्तित्वांत यांत्रिकतेनें काम करीत असते. मर्यादित असलेलें व्यक्तित्व पूर्णतया चैतन्यांत विरून गेलें आहे, जुनी अहंकेंद्रित व्यवस्था कोलमडून पडली आहे -- अशा स्थितींत आंत आत्मप्रकाशानें सर्व तेजोमय असलें, तरी बाह्य प्राकृतिक व्यवहार गोंधळाचा होणें शक्य आहे. बाह्य व्यवहारांत जड, क्रियाशून्य परिस्थिति किंवा कोणतीहि शक्ति नेईल तिकडे जडवत् जाणारे, स्वत: क्रियाविमुख, स्वयंगतिशून्य जीवन आणि आंत प्रकाशपूर्ण जाणिवेनें युक्त -- अशी एक आमची अवस्था होऊं शकते; बाह्य व्यवहार बालकाप्रमाणें आणि आंत भरपूर आत्मज्ञान अशी दुसरी अवस्था; बाह्य व्यवहारांत विचारांत मेळ नाहीं; विचारांत, भावनांत कोठेंहि संगीत नाहीं -- सर्वत्र भ्रमिष्टासारखें वागणें आणि आंत पूर्ण शांति आणि गंभीरपणा अशी तिसरी अवस्था; बाह्य व्यवहारांत पिसाळलेपणाचा, विकृत मेंदूचा खेळ आणि आंत निर्मल, विशुद्ध, समतोल अशी आत्मस्थिति अशी चौथी अवस्था; -- अहंकेंद्रित व्यवस्था नाहींशी झालेली आणि व्यक्तित्व चैतन्यांत विरलेलें अशा स्थितींत आमच्या अशा चार अवस्था (जड, बाल, उन्मत्त, पिशाच्च) होऊं शकतात; विज्ञानाची भूमिका (अतिमानसिक भूमिका) प्राप्त झाली नसल्यास, या चार अवस्थांखेरीज आणखी कांहीं अवस्था शक्य आहेत. कारण जोंपर्यंत विज्ञान

 

पान क्र. ४२७

 

प्राप्त झालें नाहीं, तोंपर्यंत अज्ञानाचेंच कमीअधिक अधिराज्य असतें. अशी एक पांचवी अवस्था असूं शकते कीं, बाह्य व्यवहारांत व्यवस्था ठेवण्यापुरतें वरवरचे अहंकारतत्त्व आंत शिल्लक असतें, या अहंकाराकडे अंतरात्मा पसंतीच्या दृष्टीनें बघत नाहीं आणि अहंकारी व्यवहार अर्थात् आत्मनिष्ठ, आत्म-इष्ट व्यवहार असत नाहीं; त्यांत आत्मा आणि प्रकृति यांचा विसंवाद स्पष्ट असतो. मनाचें कांहीं क्रियाशील अंग आमचा बाह्य व्यवहार चालवीत असेल व म्हणून त्याच्यामध्यें कांहीं व्यवस्था असेल; तथापि असें असलें, तरी आंत जो आत्मसाक्षात्कार झालेला असतो, त्या साक्षात्काराचें आविष्करण या बाह्य व्यवहारांत होऊंच शकत नाहीं -- कारण मनाचें दिव्यत्व व भेदातीतत्व यांत नेहमींच फार अंतर राहणार -- अंतर्ज्ञानाचा, अंतःप्रकाशाचा लाभ मनाला मिळून त्यायोगें बाह्य व्यवहार उजळला, तरी या सर्वोत्तम बाह्य व्यवस्थेंत देखील मनाच्या ज्या स्वभावगत उणीवा आहेत त्या प्रतिबिंबित होणार. प्राणाच्या आणि शरीराच्या स्वाभाविक उणीवाहि प्रतिबिंबित होणार -- अंतःप्रकाश हा जणुं राजा आणि मन, प्राण, शरीर हे त्याचे अकार्यक्षम दुबळे प्रधान : अर्थात् बाह्य व्यवहार सदोषच असणार. अंतःप्रकाश हा खऱ्या ज्ञानाचा प्रकाश खरा, परंतु त्याचें कार्य करणारे, मन, प्राण व शरीर हे कारभारी अज्ञानावर पोसलेले -- तेव्हां या अज्ञानपुष्ट कारभाऱ्यांकडून खऱ्या ज्ञानाला अनुरूप असा व्यवहार होणें हें अशक्य. असो. इत्यर्थ हा कीं, अतिमानसिक सत्य-ज्ञान, सत्य-संकल्प, त्या दोहोंची पूर्ण एकता या गोष्टी, मन, प्राण व शरीर या कारभाऱ्यांत, त्यांच्या अंतरंगांत भरल्या पाहिजेत, त्यांचें अज्ञान नष्ट झालें पाहिजे, तेव्हांच आमच्यांत आंत व बाहेर सुसंवादी व्यवहार शक्य होईल. आत्म्याची स्वभावगत सुसंगति, सुसंवादिता आमच्या आंतर आणि बाह्य जीवनांत प्रस्थापित होण्यास, अतिमानसानें खालीं उतरून, वर चढूं लागलेल्या मन-प्राण-शरीर यांना हात देऊन, विज्ञान-संपन्न करणें अवश्य आहे.

मनाचा उगम अतिमानस, किंवा त्याच्यापलीकडील सच्चिदानंदाची जाणीव चित् हा आहे; जीवनाचा, प्राणशक्तीचा उगम सच्चिदानंदाची जाणीवयुक्त शक्ति हा आहे -- म्हणून मन आणि प्राणशक्ति यांना पूर्णता आणावयासाठीं, त्यांच्या उगमाच्या दिशेनें त्यांना न्यावें लागतें; हीच गोष्ट आमचा खरा आत्मा, चैत्य पुरुष (जीवात्मा) याची आहे; सर्वश्रेष्ठ सत्य, जें सच्चिदानंदतत्त्व, त्यांतील 'आनंद' ह्या तत्त्वापासून आमच्या

 

पान क्र. ४२८

 

खऱ्या आत्म्याची निर्मिति झाली असल्यानें, त्याला त्या आनंद-तत्त्वाच्या दिशेनें नेलें पाहिजे; म्हणजे त्याची संभाव्य पूर्णता त्याला प्राप्त होईल. मन आणि प्राणशक्ति यांना पूर्णता आणण्यासाठीं ज्याप्रमाणें अतिमानसाची मध्यस्थी लागते, त्याप्रमाणें चैत्य पुरुषाला पूर्णता आणण्यासाठींहि अतिमानसाची मध्यस्थी लागते; एकच एक अनंत सद्वस्तु (अस्तित्व) खालचा अर्ध गोल आणि वरचा अर्धगोल अशा दोन भागांत विभागल्यासारखी आहे. सत् चित् आनंद हा वरचा अर्धगोल; आत्मा मन प्राण शरीर हा खालचा अर्धगोल. या दोन अर्धगोलांना जोडणारे जें तत्त्व, तें अतिमानस होय. या अतिमानसाच्या सामर्थ्यानें मनाला काय, प्राणशक्तीला काय किंवा चैत्य पुरुषाला काय, पूर्णता प्राप्त करून देण्याचें काम पूर्णतेनें व समग्रतेनें करतां येतें; कारण अतिमानसाच्या द्वारां मन, प्राणशक्ति व चैत्यपुरुष यांना मूळ दिव्य सत्याच्या त्या त्या जनकभूत अंशाशीं, अंगाशीं पूर्णपणें संलग्न करतां येतें, पूर्णपणें तद्रूप करतां येतें. अतिमानसांत तो प्रकाश असतो, अतिमानसांत तें ज्ञानयुक्त सामर्थ्य असतें, त्या प्रकाशाच्या व सामर्थ्याच्या साह्यानें, चैत्य पुरुषाला मूळ परम आनंदांत सर्वत्र प्रवेश मिळतो; आपल्या जन्मदात्या सच्चिदानंदाच्या आनंदाशीं या प्रकाशाच्या आणि सामर्थ्याच्या साह्यानें चैत्यपुरुष, निकटपणें जोडला जातो; त्याच्याशीं तो एकरूप होतो. याप्रमाणें चैत्य पुरुष पूर्ण झाला म्हणजे अध्यात्म आणि व्यवहार यांजमधील विरोध सर्वथा नाहींसा होतो -- मन प्राण शरीर यांना संसारांत जी भीति, जी घृणा वाटत असते, ती सर्व दूर करून सुख आणि दुःख या द्वंद्वाला तो नाहींसें करतो आणि विश्वांतील जीवनांत जे नानाविध संपर्क ओघानेंच होतात, ते सर्व दिव्य आनंदानें भरून टाकतो.

 

पान क्र. ४२९

 









Let us co-create the website.

Share your feedback. Help us improve. Or ask a question.

Image Description
Connect for updates