दिव्य जीवन 1879 pages 1960 Edition
Marathi Translation
  Senapati Bapat

ABOUT

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics, expounding a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth.

THEME

philosophymetaphysics

दिव्य जीवन

Sri Aurobindo symbol
Sri Aurobindo

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.

Sri Aurobindo Birth Centenary Library (SABCL) The Life Divine Vols. 18,19 1070 pages 1970 Edition
English
 PDF    philosophymetaphysics
Sri Aurobindo symbol
Sri Aurobindo

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.

Marathi Translations of books by Sri Aurobindo दिव्य जीवन 1879 pages 1960 Edition
Marathi Translation
Translator:   Senapati Bapat  PDF    LINK

प्रकरण विसावें

 

मृत्यु, वासना आणि असामर्थ्य

 

आरंभीं, सर्व कांहीं भुकेनें म्हणजे मृत्युनें झांकलेलें होतें; त्यानें स्वत:करितां मन बनविलें, अशाकरितां कीं, त्याला आत्म्याची प्राप्ति व्हावी.

- बृहदारण्यकोपनिषद् १, २. १

 

मर्त्य मनुष्यानें ही शक्ति शोधून काढली आहे; वासनांचा तांडा या शक्तीचे ठिकाणीं आहे; सर्व वस्तूंना संरक्षक आधार देण्यासाठीं ही शक्ति आहे, या वासना आहेत; ही शक्ति सर्व खाद्याची चव घेते आणि आत्म्याकरितां वसतिस्थान बांधते.

- ऋग्वेद ७-६

 

मागील प्रकरणांत आम्हीं प्राणशक्तीचा जो विचार केला, तो विकासमय भौतिक अस्तित्वाच्या दृष्टीनें आणि जडामध्यें प्राणतत्त्व उदयास कसें येतें, काय काम करतें या प्रश्नाच्या दृष्टीनें केला. विकासमय पार्थिव अस्तित्व, ज्या गोष्टी व घटना आम्हांला उपलब्ध करून देतें, त्या घेऊन त्यांवरून आम्हीं प्राणशक्तीसंबंधानें काय अनुमानें काढतां येतील तीं काढलीं. पण हें उघड आहे कीं, प्राणशक्ति कोठेंहि उदयास येवो, कसेंहि काम करो, कोणत्याहि परिस्थितींत तिचें काम चालूं असो, तिच्या उदयाचें व कार्याचें सामान्य तत्त्व सर्वत्र तेंच, एकच असलें पाहिजे. प्राणशक्ति ही विश्वव्यापक शक्ति आहे व तिचें काम द्रव्यमय रूपें निर्माण करणें, तीं गतिमान् करणें, तीं राखणें, तीं बदलणें, तीं नष्ट करून पुन्हां बनविणें आणि हीं रूपें अस्तित्वांत असतां, त्यांच्यामध्यें जाणीवयुक्त प्रकट वा अप्रकट शक्तींची परस्पर देवाण-घेवाण घडविणें हें आहे; हें रूपनिर्माण आणि ही देवाण-घेवाण प्राणशक्तीचा मूलभूत धर्म आहे. ज्या भौतिक पार्थिव जगांत आम्ही राहतों, त्या जगांत प्राणाच्या (जीवनाच्या) पोटीं मन हें गुप्त व नेणीवयुक्त आहे; मनाच्या पोटीं उन्मन (अतिमानस) हें गुप्त व नेणीवयुक्त आहे आणि प्राण (जीवन) जडाच्या पोटीं गुप्तपणें काम करीत आहे. म्हणून येथें दर्शनीं आरंभ वा विकासाचा दर्शनीं

 

पान क्र. ३५१

 

पाया जडद्रव्य हा आहे. उपनिषदांच्या भाषेंत म्हणावयाचें तर, पृथ्वीतत्त्व आमचा पाया आहे. भौतिक विश्वाच्या रचनेचा आरंभ असलेल्या, शक्तीनें भरलेल्या, साकार अणूच्या पोटीं नेणीवयुक्त वासना, संकल्प व बुद्धि या शक्तींचें आकारहीन द्रव्य भरलेलें असतें. आपल्या भौतिक विश्वाच्या जडद्रव्यांतून प्राणशक्ति (जीवनशक्ति) दृश्यरूपानें व्यक्त होते; ही प्राणशक्ति प्राणयुक्त शरीराच्याद्वारां, स्वतःतून स्वतःच्या पोटीं गुप्त असलेलें मन उदयास आणते व मनाला त्याच्या कार्यांत गुप्तपणें काम करीत असलेलें अतिमानस उदयास आणावयाचें काम पुढें करावयाचें आहे. ही आपल्या विश्वाची गोष्ट झाली. पण आपल्या विश्वापेक्षां वेगळ्‌या तऱ्हेनें बनविलेल्या विश्वाची आपण कल्पना करूं शकतों. या वेगळ्‌या रीतीनें बनविलेल्या विश्वांत मन आरंभीं गुप्त आणि नंतर प्रकट, अशी स्थिति नसून तें आरंभापासूनच प्रकट आहे, स्वतःची स्वभावगत शक्ति उपयोगांत आणून जडद्रव्यांतून जाणिवेनें मूळ रूपें निर्माण करीत आहे अशी आपण कल्पना करूं शकतों. या विश्वाची व्यवहारपद्धति आपल्या विश्वाहून अगदीं वेगळीं असली, तरी मनाच्या शक्तीचें निर्मितिकार्य ज्या साधनाच्याद्वारां या विश्वांत होईल, तें साधन प्राणशक्तीच असणार, हें आपण लक्षांत ठेवलें पाहिजे. विश्वाची कार्यपद्धति उलटी झाली, तरी मनाच्या शक्तीचें निर्माणकार्य प्राणशक्तीच्या द्वारांच व्हावयाचें ही गोष्ट महत्त्वाची आहे.

मन आणि प्राण यांत हें एक साम्य आहे कीं, मन ज्याप्रमाणें स्वतंत्र शक्ति नसून तें अतिमानसाचें अंतिम कार्य आहे, त्याप्रमाणेंच प्राणहि स्वतंत्र शक्ति नसून, मूळ जाणीव-शक्तीचें अंतिम कार्य आहे. निर्माण करण्याचा धर्म असलेलें या शक्तीचें, सत्य-कल्पना हें विशेष प्रकारचें रूप आहे. शक्तिमय जाणीव हा मूळ अस्तित्वाचा, मूळ पुरुषाचा स्वभाव आहे आणि हा जाणीवयुक्त पुरुष, निर्मायक ज्ञानयुक्त संकल्प या स्वरूपानें व्यक्त झाला म्हणजे या व्यक्त स्वरूपाला सत्य-कल्पना, सत्य-संकल्प किंवा अतिमानस म्हणतात. अतिमानसिक ज्ञानविशिष्ट संकल्प म्हणजे मूळ पुरुषाची निर्मितिकार्यप्रवण जाणीवशक्ति होय. ही मूळ जाणीव-शक्ति अतिमानसिक ज्ञान-संकल्पद्वारां एका व्यवस्थेनें, सुसंवादपूर्ण रीतीनें एकीभूत अस्तित्वाचीं अनंत अविभक्त रूपें निर्माण करते. ह्या निर्मितीला विश्व हें नांव आपण देतों; विश्व म्हणजे अनेक रूपांचें सुसंवादी अविभक्त अस्तित्व. मन आणि प्राण या शक्ती

 

पान क्र. ३५२

 

देखील मूळ जाणीव-शक्ति, ज्ञान-संकल्प यांचींच रूपें आहेत. त्यांचें कार्य मात्र वेगळें आहे; अविभक्त अस्तित्वाचें विभक्त अस्तित्व करणें हें त्यांचें कार्य आहे. विश्वघटक रूपांचा अविभक्तपणा बाजूला करून, प्रत्येक रूप म्हणजे स्वतंत्र व्यक्ति अशी व्यवस्था करणें, हें मन आणि प्राण यांचें कार्य होय. रूपांरूपांमध्यें मर्यादा निर्माण करणें, त्यांना अन्योन्यविरोधी रूपांचें स्वरूप देणें, त्यांच्यामध्यें शक्तीचा विनिमय चालविणें, रूपांची व्यक्तिता स्पष्टपणें संभाळणें, म्हणजेच प्रत्येक रूपांतील आत्मा आपलें मन, आपला प्राण (जीवन) इतर मनांहून, प्राणांहून निराळें बनवील, निराळें मानील अशी व्यवस्था करणें व राखणें--हें सर्व मनाचें व प्राणाचें कार्य आहे. व्यक्तीव्यक्तीचें मन आणि प्राण वस्तुत: निराळे असत नाहींत, आत्माहि व्यक्तीव्यक्तीमध्यें निरनिराळा असत नाहीं--आत्मा एक, मन एक, प्राण एक व मूळ एका सत्तत्त्वाचीं, सत्याचीं, सद्वस्तूचीं रूपें मात्र निराळीं निराळीं अशी वस्तुस्थिति आहे. सर्वसमावेशक, सर्वग्राहक अतिमानसाची शेवटली व्यक्तीकरणाची क्रिया म्हणजे मन होय. या क्रियेमध्यें अतिमानसिक जाणीव प्रत्येक रूपापुरती वेगळी होते आणि वेगळेपणाने व्यवहार करते; प्रत्येक रूपाचा स्वतंत्र दृष्टिकोन असतो, या स्वतंत्र दृष्टिकोनाचा उपयोग करून, त्या रूपांतील जाणीव विश्वांतील इतर रूपांशीं आपले संबंध निश्चित करते आणि या संबंधानुसार आपले वैयक्तिक व्यवहार करते; मन जशी अतिमानसाची शेवटली (व्यक्तीकरणाची) क्रिया, तसा प्राण (जीवन) ही जाणीवयुक्त सत्तेच्या शक्तीची शेवटली क्रिया होय; या क्रियेमध्यें, विश्वव्यापक अतिमानसाची सर्वेशत्व करणारी व सर्व-निर्मिति करणारी जी संकल्प-शक्ति, तिला आपलें साधन करून तिच्याद्वारां मूळ जाणीवयुक्त सत्तेची शक्ति, व्यक्तिरूपें अस्तित्वांत राखते, चेतनायुक्त करते, घडते, मोडते, पुन्हां घडते; व या रूपांत सशरीर झालेल्या आत्म्याच्या सर्व व्यवहारांचा पाया म्हणून काम करते. प्राणशक्ति ही ईश्वरी शक्ति आहे. विद्युत्‌यंत्रांत वीज निर्माण व्हावी त्याप्रमाणें, ही प्रत्येक रूपाचे ठिकाणीं स्वतःची सारखी निर्मिति करीत असते; कोणत्याहि रूपाच्या भोंवतालीं जीं रूपें असतात, त्या भोंवतालच्या रूपांवर त्या मध्यवर्ती रूपांतून शक्तीचा मारा ती करते, त्या रूपांना सारखे धक्के देत असते, त्याचप्रमाणें त्या भोंवतालच्या रूपांकडून, सर्व परिसरांतून, सभोंवारच्या विश्वांतून जे जीवनाचे धक्के त्या मध्यवर्ती रूपावर येऊन आदळतात व त्यांत प्रवेश करतात, त्या सर्व धक्क्यांचें ती त्या

 

पान क्र. ३५३

 

मध्यवर्ती रूपांतून स्वागत करते. प्रत्येक रूप एका दृष्टीनें मध्यवर्ती रूप, तर दुसऱ्या दृष्टीनें परिसरांतील रूप असतें. अर्थात् प्राणशक्तीच्या धक्क्यांचा अन्योन्यविनिमय हा सर्व रूपांत सर्व रूपांकडून सर्वत्र होत असतो.

याप्रमाणें प्राणशक्ति ही जाणिवेची एक शक्ति आहे आणि ती मन व जडद्रव्य यांच्यामध्यें असून, मनाची जडावर क्रिया होण्याचें साधन आहे हें स्पष्ट होतें; मनाचें एक शक्तिस्वरूपी अंग असेंहि प्राणाला म्हणतां येईल. एवढेंच कीं, कल्पना निर्माण करणें आणि त्यांच्याशीं विविध संबंध जोडणें हें कार्य, हें प्राणरूपी अंग करीत नाहीं, तर शक्तीचीं आंदोलनें निर्माण करतें, द्रव्याचीं रूपें बनवितें आणि या आदोलनांशीं व रूपांशीं विविध संबंध जोडतें. मनाचें व प्राणाचें हें नातें स्पष्ट केल्यावर हेंहि सांगितलें पाहिजे कीं, ज्याप्रमाणें मन ही स्वतंत्र वस्तु नाहीं, त्याप्रमाणें प्राण ही देखील स्वतंत्र वस्तु नाहीं. मनामागें सर्व अतिमानस उभें असतें आणि निर्मितीचें काम हें अतिमानस करीत असतें, मन हें केवळ या अतिमानसाचें व्यक्तीकरण-क्रियारूप असें शेवटलें कार्य आहे; प्राणामागें सर्व मूळ जाणीवयुक्त शक्ति असते, प्राणाच्या प्रत्येक क्रियेंत ही शक्ति काम करते, निर्माण केलेल्या वस्तूंत राहून काम करणारी ही शक्ति जाणीवयुक्त मूळशक्तीच होय. मन आणि जडद्रव्य किंवा जड शरीर यांच्यामध्यें जाणीव युक्त मूळ शक्तीची मध्यस्थ अंतिमक्रिया, एवढीच प्राणाची कामगिरी असते, हेंच त्याचें खरें स्वरूप असतें. मूळ जाणीवयुक्त शक्तीच्या या मध्यस्थ अंतिम प्राणक्रियेचें वर्णन वर आलेंच आहे. प्राणशक्ति याप्रमाणें स्वतंत्र नसून, परतंत्र असल्यानें, तिच्याविषयीं सांगितल्या जाणाऱ्या सर्व गोष्टींत तिचें हें पारतंत्र्य लक्षांत ठेवलें पाहिजे. प्राणशक्ति काय आहे, तिचा स्वभाव काय, तिची प्रक्रिया काय या गोष्टींचें खरें आणि पूर्ण ज्ञान होण्यास, त्या प्राणशक्तींत काम करणारी जी जाणीवयुक्त आदिशक्ति आहे, तिचें ज्ञान, तिचा अनुभव आपणांस येणें आवश्यक आहे. या आदिशक्तीची बाह्य-साधनरूप बाजू म्हणजे प्राणशक्ति असल्यानें, तिच्या यथार्थ ज्ञानासाठीं मूळ शक्तीचेंहि ज्ञान अवश्य आहे. आपण ईश्वराचीं वैयक्तिक आत्मरूपें आहोंत, त्याची वैयक्तिक, मानसिक आणि शारीरिक साधनें आहोंत. त्या ईश्वराची इच्छा आमच्या जीवनांत ज्ञानपूर्वक समजून घेऊन, व्यवहारांत त्या इच्छेनुसार कार्य करावयाचें, तर आपण प्राणशक्तीचें यथार्थ ज्ञान करून घेणें अवश्य आहे. या यथार्थ ज्ञानाच्या आश्रयानेंच मन आणि प्राण यांना,

 

पान क्र. ३५४

 

अज्ञाननिर्मित वक्रता व विकृति क्रमश: टाकीत, कमी करीत, विश्वांतील व आम्हांमधील सत्याचा क्रमश: अधिकाधिक सरळ मार्ग धरतां येईल, क्रमश: अधिकाधिक सरळ व्यवहार करतां येईल. अविद्येच्या प्रभावानें मन अतिमानसापासून विभक्त झालें. त्या अतिमानसाशीं जाणीवपूर्वक एक होणें हें ज्याप्रमाणें मनाचें साध्य आहे, त्याप्रमाणें प्राणशक्तीच्या पोटीं गुप्तपणें काम करणाऱ्या मूळ जाणीवयुक्त शक्तीची ओळख करून घेऊन तिच्याशीं एकरूप होणें, हें प्राणशक्तीचें साध्य आहे. ही आदिशक्ति ज्या हेतूंसाठी, ज्या कल्पनेनें प्राणशक्तीच्या पोटीं काम करते, ते हेतू, त्या कल्पना प्राणशक्तीला अज्ञात राहतात, त्या हेतूंच्या व कल्पनांच्या सिद्धीसाठीं प्राणशक्ति आंधळेपणानें, अज्ञानपूर्वक धडपडत असते; हें असें होण्याचें कारण, जीवन जगविण्याच्या कार्यांत प्राणशक्ति आपलें सर्वस्व खर्चिते आणि तिचें सर्व लक्ष जीवनकार्यांत लागल्यानें, तिच्या पोटीं काम करीत असलेल्या आदि-शक्तीचें आणि तिच्या हेतूंचें ज्ञान तिला होत नाहीं; आमचें मन जीवनाला आणि जडाला मनोयुक्त करण्यांत सर्वस्वीं गुंतल्यानें त्याला जशी आपल्या वरिष्ठाची--अतिमानसाची--ओळख रहात नाहीं, तसाच हा प्राणशक्तीचा व्यवहार आहे. प्राणशक्ति आपल्या अंधारांतून बाहेर आली, तिला मूळ जाणीव-शक्तीची ओळख झाली म्हणजे त्या शक्तीचे हेतू आणि कल्पना ती ज्ञानपूर्वक लक्षांत घेईल आणि त्यांच्या सिद्धीसाठीं डोळसपणें ती झटेल, तें तिला टाळताच येणार नाहीं--या खटपटींत ती आपली सर्व शक्ति खर्च करील आणि त्यांत तिला निरतिशय आनन्दच होईल. या खटपटींत तिला मुक्तीचा, कृतार्थतेचा व आत्मतृप्तीचा अनुभव येईल.

आमचें मन अविद्याग्रस्त होऊन, अविभाज्य अद्वैताचे विभाग पाडण्याचा व्यवहार करतें आणि आमची प्राणशक्ति या अविद्याग्रस्त मनाला सेवकाच्या नात्यानें मदत करते; म्हणूनच प्राणशक्ति अंधारांत चांचपडते व स्वत: विभागमय होते. याचा परिणाम म्हणून मरण, मर्यादा, दुबळेपणा, दुःख व अज्ञानमय करणी या दोषांचा भोग तिला घडतो. जीवाचें मर्यादाबद्ध मन हें या दोषांचें कारण व उगमस्थान असतें. वैयक्तिक आत्मा (जीव) स्वतःला कोंडून घेतो, स्वतःच्या अमर्याद अस्तित्वाला मर्यादा घालून घेतो हें या विकृतीचें मूळ कारण आहे. या मर्यादा जीवाच्या आत्म-विषयक अज्ञानांतून, आत्मविस्मृतींतून उत्पन्न होतात. जीवाचें लक्ष आपल्या विभक्ततेवर मर्यादेबाहेर खिळल्यानें ही आत्मविस्मृति उत्पन्न होते.

 

पान क्र. ३५५

 

मी स्वतंत्र, स्वयंभू, दुसऱ्या व्यक्तींहून सर्वस्वीं अलग अशी व्यक्ति आहे, या कल्पनेचा जप जीव सारखा करीत राहिल्यानें तो बद्ध होतो, तो मर्यादांत कोंडला जातो. विश्वाचें कार्य त्याला खऱ्या स्वरूपांत दिसत नाहींसें होतें, त्याची विभक्त वैयक्तिक जाणीव -- ज्ञान, इच्छा, शक्ति, सुख, मर्यादित अस्तित्व -- या सर्व गोष्टी त्याची दृष्टि संकुचित करतात आणि विश्वकार्याकडे तो या संकुचित दृष्टीनें बघतो. या संकुचित दृष्टीचा त्याच्या जीवनावर परिणाम होऊन तें संकुचित व विकृत होतें. वस्तुत: हा जीव एकमेवाद्वितीय आदिसत्तेचें एक जाणीवयुक्त रूप आहे -- सर्व जाणीव, सर्व ज्ञान, सर्व इच्छा, सर्व शक्ति, सर्व सुख, सर्व अस्तित्व त्याच्या जाणिवेशीं, ज्ञानाशीं, इच्छेशीं, शक्तीशीं, सुखाशीं, अस्तित्वाशीं अविभक्त एकरूप आहे. पण अविद्येच्या प्रभावानें ही वस्तुस्थिति त्याच्या नजरेआड होते आणि वर वर्णन केल्याप्रमाणें तो संकुचित दृष्टीचा होतो. याप्रमाणें संकुचित मनाच्या बंधनांत पडलेला जीव, त्याच्यांत असलेल्या विश्व-व्यापक जीवनाला स्वतःच्या मर्यादांत कोंडतो, जीवाच्या वैयक्तिक कृतींत व्यापक जीवन कोंडलें जातें, विश्वव्यापक जीवनाचें विश्वव्यापकत्व जाऊन, तें विभक्त वैयक्तिक अपुऱ्या सामर्थ्याचें जीवन बनतें, त्याजवर त्याच्या सभोंवारच्या सर्व विश्वगत जीवनाचे आघात होतात, या असमर्थ मर्यादित जीवाला त्या आघातांचें इष्ट संपर्क म्हणून स्वागत करतां येत नाहीं; ते त्याला नकोसे वाटतात, पण भोगावे लागतात. हा जीव प्राथमिक स्थितीमध्यें अगदींच दुबळें, अगदीं मर्यादित असें वैयक्तिक जीवन जगत असतो आणि त्याच्या सभोंवार विश्वांत सारखा रूपगत शक्तीशक्तींचा (एकाच शक्तीच्या रूपकृत विविध प्रकारांचा) एकमेकींवर आघात, एकमेकींशीं व्यवहार चाललेला असतो -- या शक्ति-व्यापारांत दुबळा वैयक्तिक जीव असहायपणें तडाखे भोगीत असतो, राक्षसी शक्तिलीलेला मान लववीत असतो, त्याच्यावरील आघातांना केवळ यांत्रिक प्रतिक्रियेनें असहायपणें कांहींतरी उत्तर देत असतो -- हे बाह्य आघात करणाऱ्या शक्ती या दुबळ्या जीवाला तडाखे देतात, त्याला भक्षून टाकतात, त्याचा आपल्या सुखासाठीं उपयोग करतात, त्याला विविध कामाला लावतात, त्याला हांकीत हांकीत आपल्या उद्दिष्टाकडे नेतात. परंतु हळूहळू या दुबळ्या जीवांत जाणीव जागी होऊन वाढत जाते, त्याच्या मूळ सत्तेच्या प्रकाशाला दडविणारी जडाची विकासपूर्व अज्ञानमय झोंप दूर सारून तो प्रकाश प्रकट होतो आणि मग या वैयक्तिक अस्तित्वाच्या

 

पान क्र. ३५६

 

जीवाला, आपल्यांतील शक्तीची अंधुक जाणीव होते, तो प्रथम नाडीगत शक्तीच्याद्वारां आणि पुढें मनोगत शक्तीच्या द्वारां विश्वलीला आपल्या कह्यांत आणण्याचा, तिचा उपयोग करण्याचा आणि तिच्या द्वारां आपली करमणूक करून घेण्याचा प्रयत्न करूं लागतो. ही जी स्वतःमधील शक्तीची जाणीव जीवांत उत्पन्न होते, ती जाणीव म्हणजे त्याची आत्मविषयक क्रमवार जागृति असते; आत्मशक्तिविषयक जाणिवेला वाढत्या आत्मजागृतीचें स्वरूप येत जातें. कारण विश्वांतील प्राणक्रिया किंवा जीवनक्रिया ही शक्तिक्रिया असते, ही शक्ति जड नसून जाणिवेची असते, ही जाणीव-शक्ति वस्तुत: संकल्पाच्या किंवा इच्छेच्या स्वरूपाची असते आणि ही इच्छा किंवा हा संकल्प दुसऱ्या कोणाचा व्यवहार नसून, विश्वेशत्व करणाऱ्या आदिपुरुषाच्या जाणिवेचा, ज्ञानाचा, व्यवहार असतो. व्यक्तींतील जीवन हळूहळू अधिकाधिक जागृत होतें, आपल्यांतील खोल भागांत त्याला सच्चिदानंदाच्या संकल्पाचा अनुभव येतो, हा संकल्प आपणापासून विभक्त नाहीं, तर आपणहि सच्चिदानंदाच्या संकल्पांतच आहों, त्याची संकल्पशक्ति आणि आपण भिन्न नाहीं अशी जाणीव त्याला होते, ती संकल्पशक्ति विश्वाची स्वामिनी आहे, तेव्हां आपणहि व्यक्तिश: आपल्या विश्वाचें स्वामी व्हावयास हवें अशी आकांक्षा त्याचे ठिकाणीं जागृत होते. वैयक्तिक जीवनांत असें स्फुरण सारखें वाढत्या प्रमाणांत होत असतें कीं, आपली शक्ति जी गुप्त आहे ती आपल्या हस्तगत व्हावी आणि आपल्या विश्वाचें ज्ञान आपल्याला व्हावें, तसेंच आपल्या विश्वावर आपली पूर्ण सत्ता चालावी. विश्वगत अस्तित्वांत ईश्वराचा स्वरूपाविष्कार वाढत्या प्रमाणावर होत असतां, त्या आविष्काराचें एक महत्त्वाचें चिन्ह व प्रमाण हें वर सांगितलेलें, वाढतें स्फुरण असतें.

जीवन ही शक्तिक्रिया आहे आणि वैयक्तिक जीवनाची वाढ म्हणजे वैयक्तिक शक्तीची वाढ हें जरी खरें असले, तरी जीवन व जीवनशक्ति ही विभक्त, वैयक्तिक आहे; स्वतःच्या विश्वाचें स्वामित्व करण्याची जीवनाची आकांक्षा विफल होण्यास ही गोष्टच कारण होते, विश्वाचें स्वामित्व म्हणजे विश्वशक्तीचें स्वामित्व. हें विश्वशक्तीचें स्वामित्व विश्वचालक विश्वेशाच्या इच्छाशक्तीकडेच असूं शकतें; जी जाणीव विभक्त आणि व्यक्तिगत स्वरूपाची झाली आहे आणि म्हणून जिची इच्छाशक्ति व इतर शक्ती वैयक्तिक, विभक्त व मर्यादित आहेत, तिला विश्वशक्तीचें स्वामित्व प्राप्त होणें अशक्य आहे; विश्वेशाच्या विश्वसंचालक

 

पान क्र. ३५७

 

इच्छेशीं व्यक्ति एकरूप होऊं शकली, तर मात्र ती विश्वशक्तीशीं एकरूप होऊन विश्वाचें स्वामित्व करूं शकेल. हें होत नाहीं तोंपावेतों व्यक्तिरूपांत असलेलें व्यक्ति-जीवन अपरिहार्यपणें आपल्या मर्यादितपणाचीं, आपल्या कैदेचीं तीन चिन्हें आपल्या अंगावर नेहमीं वागवीत राहील -- मरण, वासना, असामर्थ्य.

वैयक्तिक जीवनाच्या ज्या आवश्यक पार्श्वभूत परिसरात्मक गोष्टी आहेत, त्यामुळें आणि विश्वांत कार्य करणाऱ्या विश्वशक्तीशीं वैयक्तिक जीवनाचे जे आवश्यक संबंध आहेत, त्यामुळें या जीवनाला मृत्यु ही अवस्था अपरिहार्य अशी झाली आहे. वैयक्तिक जीवन हा आदिशक्तीचा एक विशिष्ट व्यवहार आहे, या विशिष्ट व्यवहाराचा उद्देश, अनन्त रूपांतील एक रूप बनविणें, राखणें, चेतनायुक्त करणें व त्या रूपाची उपयुक्तता संपली कीं त्याचा नाश करणें हा आहे : विश्वाचा एकंदर खेळ सुव्यवस्थित खेळला जावा, यासाठीं आदिशक्ति हीं सर्व अनंत रूपें आपापल्या स्थळीं, काळीं, क्षेत्रीं अस्तित्वांत आणीत असते. कोणत्याहि शरीरांत, रूपांत जी जीवनशक्ति खेळते, तिला बाहेरून येणाऱ्या विश्वांतील विविध शक्तींचा मारा झेलावयाचा असतो, या बाह्य शक्ती आत्मसात् करून, त्यांवर आपली क्षुधा तिला भागवावयाची असते, तसेंच या बाह्य रूपांतील बाह्य शक्ती ह्याहि आपलें अन्न सारखें शोधीत असतात. त्यांच्या भक्ष्यस्थानीं या विशिष्ट रूपांतील शक्तीला सारखें पडावयाचें असतें. उपनिषदांत असें सांगितलें आहे कीं, सर्व भौतिक द्रव्य हें अन्न आहे; भौतिक विश्वाचें हें एक महत्त्वाचें सूत्र आहे कीं, अन्न म्हणून कोणाला तरी खाणारा हा स्वतःहि कोणाचें तरी अन्न होतो व खाल्ला जातो. (जीवो जीवस्य जीवनम्) तेव्हां, कोणत्याहि शरीरांत जें जीवन संघटितपणें काम करतें, त्याला बाह्य परिसरांतील जीवनाचे आघात होऊन विघटित होण्याचा, मोडतोड होऊन नष्ट होण्याचा सारखा धोका असतो; अर्थात् हें विघटन किंवा नष्ट होणें ही नव्या रचनेची, नव्या देहाच्या बांधणीची पूर्वतयारी असते; मरणाची प्रक्रिया ही पुनर्जीवनाची आवश्यक पूर्वक्रिया असते. बाह्य जीवनाचे आघात ही एक विशिष्ट शरीरांतील जीवनावरची शक्य आपत्ति झाली -- दुसऱ्याहि विघटनकारी किंवा विनाशकारी आपत्ती संभवतात. या विशिष्ट शरीरांतील जीवनाला प्राणरक्षणापुरती भक्षणशक्ति नसण्याचा संभव आहे, किंवा ती प्राणरक्षणापुरती असतांहि तिला पुरतें अन्न न मिळण्याचा संभव आहे,

 

पान क्र. ३५८

 

किंवा तिची भक्षणशक्ति आणि बाह्य जीवांना आपल्या भांडारांतून पुरेसें भक्ष्य पुरविण्याची तिची शक्ति, या दोन शक्तींचा तोल वा अन्योन्यप्रमाण नीट न राहण्याचा, बिघडण्याचा संभव आहे; या संभवनीय गोष्टींपैकीं एखादी गोष्ट घडल्यास, त्या विशिष्ट शरीरांतील जीवन स्वतःचें संरक्षण करण्यास असमर्थ होतें, तें दुसऱ्याकडून भक्षिलें जातें; कायम राहून, आपल्यांतील कमी पडलेली गोष्ट मिळवून, पुन्हां समर्थ होण्याची शक्ति त्यांत न राहिल्यानें तें हळूहळू क्षीण होतें आणि विघटित होऊन नष्ट होतें--अर्थात् मरणाच्या प्रक्रियेंतून त्याला जावें लागतें--या प्रक्रियेंतून गेल्यावर त्याला नवें रूप, नवें शरीर प्राप्त होतें हें वर आलेंच आहे.

वैयक्तिक जीवन मृत्युवश होण्याची कांहीं कारणें येथवर सांगितलीं. हा प्रसंग येण्याचीं आणखीहि कारणें आहेत. उपनिषदांच्या भाषेंत, प्राणशक्ति ही शरीराचें अन्न आहे आणि शरीर हें प्राणशक्तीचें (जीवनशक्तीचें) अन्न आहे. याचा अर्थ, आमच्यांत जी प्राणशक्ति असते, ती आमचें शरीर घडण्यासाठी आणि तें सारखें संभाळून नवें नवें करण्यासाठीं लागणारा माल पुरविते आणि त्याबरोबर स्वत: घडविलेल्या, संभाळलेल्या शरीराच्या द्रव्याचा सारखा उपयोग करून निकाल लावीत असते. या दोन क्रियांमधील तोल किंवा प्रमाण असावें तसें नसलें, किंवा बिघडलें किंवा शरीरांतील प्राणशक्तीच्या भिन्न भिन्न प्रवाहांचा सुसंघटित व्यवहार, अव्यवस्थित होऊं लागला कीं रोग येतो, शक्तिक्षय सुरू होतो आणि शरीरद्रव्य विघटित होऊन, शरीर मरणाच्या पंथाला लागतें. परिस्थितीवर बुद्धिपुरस्सर मात करण्याची जीवनाची धडपड, बुद्धीचा विकासयत्न व विकास या गोष्टी देखील जीवनाचें संरक्षण अधिक अवघड करणाऱ्या आहेत. कारण वरील गोष्टींमुळें शरीरांतील जीवनशक्तीचा खर्च एरवींपेक्षां पुष्कळच अधिक होतो, शरीराकडे जीवनशक्तीकरितां सारखी वाढती मागणी होऊं लागते, शक्तीचा मूळ पुरवठा पुरवूं शकणार नाहीं इतकी ही मागणी मोठी होत जाते; पुरवठा आणि मागणी यांचें मूळ प्रमाण बिघडून जातें -- नवें शरीरानुकूल प्रमाण बसण्यापूर्वीं कित्येक व्याधी शरीरांत उत्पन्न होतात, त्यायोगें शरीराची व्यवस्था बिघडते आणि जीवनाचा आयुर्दाय एरवींपेक्षां कमी होण्याचा संभव उत्पन्न होतो; शिवाय परिस्थितीवर मात करण्याची कोणत्याहि शरीरांतील जीवनाची धडपड, ही परिसरांतील शक्तीमध्यें विरोधी प्रतिक्रिया

 

पान क्र. ३५९

 

निर्माण करते -- या शक्तींनाहि आपापलें साध्य साधावयाचें असतें आणि म्हणून त्यांच्यावर मात करूं इच्छिणाऱ्या जीवनशक्तीचा खटाटोप त्यांना असह्य होऊन, त्या तिजवर उलटतात आणि बंड करून तिच्यावर हल्ला करतात. परिसरावर मात करूं पाहणारी व्यक्तिगत जीवनशक्ति आणि व्यक्तिबाह्य परिसरगत शक्ती यांचा समतोल याप्रमाणें बिघडतो, दोहोंमधील झगडा तीव्रतर होऊन या झगड्‌यांत व्यक्तिगत शक्ति शेवटीं अपुरी पडून पराजित होते व विघटनाच्या तडाख्यांत सांपडून मरणाच्या मार्गाला लागते-- व्यक्तिगत जीवनशक्ति अमर्याद असेल, तरच परिणाम टळेल, पण ती तर सामान्यत: अमर्याद असूं शकत नाहीं. मात्र व्यक्तिगत जीवनशक्तीनें परिसरगत शक्तींशीं बिघडलेलें नातें पुन्हां एखाद्या नव्या व्यवस्थेनें सुधारून घेतलें, दोघींमध्यें नवें सुसंवादित्व निर्माण केलें, तर मात्र ती झगड्‌यांतून सहीसलामत पार पडूं शकते.

वैयक्तिक जीवनाला मरण कां येतें या संबंधानें वर कांहीं गोष्टी सांगितल्या. आतां या संबंधांत सर्वांत महत्त्वाची गोष्ट सांगावयाची आहे. शरीर धारण करण्यांत जीवनाचा जो हेतु असतो, शरीरधारी जीवनाचा जो स्वभावगुण असतो, तो हेतु व तो स्वभाव काय आहे हें पाहिलें असतां, वैयक्तिक जीवनाला मरणाची मूलभूत आवश्यकता कशी आहे तें आपणाला पटतें. सांताच्या आश्रयानें अनंत अनुभव गोळा करण्याचा हा हेतु, हा स्वभाव आहे. सांत आकाराचा देह असाच घडला जातो कीं, त्याच्या द्वारां मर्यादित अनुभव मिळणार -- तेव्हां अनंत अनुभव गोळा करावयाचा व तो सांत देहाच्या आश्रयानेंच करावयाचा, असें ठरल्यावर देह पुन्हां पुन्हां नष्ट करणें व नवा घेणें ही आवश्यकता अपरिहार्य होते. स्वभावत: अनन्त असलेल्या आत्म्यानें स्वतःला मर्यादा घालून घेतली; विशिष्ट क्षण, विशिष्ट क्षेत्र हेंच आपलें अनुभवस्थान म्हणून एकाग्रतेनें ठरवून टाकले, म्हणजे त्याला आपलें स्वाभाविक अननत्व कसें परत सांपडावयाचें? तें सांपडावयाचा मार्ग एकच आणि तो म्हणजे क्रमवारीचें तत्त्व. (Principle of succession) एक क्षण अनुभव घेतला, नंतर दुसरा क्षण उपयोगांत आणून अनुभव घेतला,-- याप्रमाणें क्रमवारीनें क्षणांचा उपयोग करून कालविशिष्ट अनुभव एकत्र करून ''माझा भूतकाल'' या सदराखालीं आत्मा ते सर्व अनुभव सांठवतो. हा जो काल, त्या कालांत, या क्षणांत एक क्षेत्र, दुसऱ्यात दुसरें क्षेत्र-- अशा क्रमवारीनें अनेक क्षेत्रांतून आत्मा प्रवास करतो, अनुभवापाठीमागून

 

पान क्र. ३६०

 

अनुभव, जीवनापाठीमागून जीवन आत्मा संपादतो; ज्ञान, सामर्थ्य, सुखभोग यांचा संग्रह अशाच क्रमवारीनें तो करीत असतो; हें सर्व धन आपल्या अधोमानसिक किंवा अतिमानसिक स्मृतिगृहांत तो सांठवितो -- कालक्रमांत 'भूतकालीन मिळकतीचा संग्रह' असें नांव, तो या स्मृतिमंदिरांत सांठविलेल्या अनुभवाला देतो. या अनुभवसंग्रहाच्या दृष्टीनें एकच देह, रूप, आकार ठेवून आत्म्याचें चालत नाहीं, देह बदलणें आवश्यक होतें-- आणि देहांत बंद होऊन धडपडणाऱ्या आत्म्याला, देह बदलणें याचाच अर्थ, असलेला देह निकालांत काढणें असा होतो--भौतिक विश्वांत विश्वजीवनाचा जो सर्व-नियंत्रक नियम चालूं आहे, त्या नियमानुसार देहबदल म्हणजे एक देह नष्ट करून, दुसरा नवा तयार करून घेणें असाच व्यवहार शक्य असतो; देहाला लागणाऱ्या द्रव्याचा पुरवठा आणि त्या द्रव्याची मागणी, या संबंधाचा विश्वजीवनाचा कायदा; देहादेहांत, जीवनाजीवनांत एकमेकांवर सारखा आपल्या शक्तीचा आघात करीत राहणें हें त्या विश्वजीवनाचें जीवनतत्त्व; एकमेकांना भक्ष्य करून आपापलें जीवन चालविण्याचा व्यवहार जेथें चालतो, अशा विश्वांत देहधारी जीवनाला जगण्याची धडपड करावयाची असते ही वस्तुस्थिति -- या तीन गोष्टींमुळें अनन्त अनुभव गोळा करण्यासाठीं, आत्म्याला आपला कोणताहि देह बदलावयाचा असेल, तर असलेला देह नष्ट करून दुसरा नवा तयार करून घेणें हा एकच मार्ग मोकळा असतो. वैयक्तिक जीवनाच्या संबंधांत मुत्युविषयक अटळ नियमाचें स्वरूप हें असें आहे.

मृत्यु अवश्य कां आहे, मृत्यु समर्थनीय कां आहे तें वर स्पष्ट केलें आहे; मृत्यु हा जीवनाचा अभाव करीत नाहीं, जीवनाच्या प्रक्रियेचा एक भाग हें त्याचें खरें स्वरूप आहे. आत्मा अमर आहे, अनन्त आहे -- पण सांत समर्याद जीवनयुक्त द्रव्य, सांत समर्याद मन (जीवमान शरीरांत कोंडलेलें मन) यांना, एकाला (जीवमान द्रव्याला) अमरता हवी, दुसऱ्याला (समर्याद मनाला) अनन्त अनुभव हवा, तर या गोष्टी मिळण्याचा मृत्युशिवाय दुसरा मार्ग नाही -- जीवमान् द्रव्य नवीं नवीं रूपें (देह) धारण करूनच अमरता संपादूं शकतें -- समर्याद मन नवे नवे अनुभव अनन्त कालपर्यंत घेऊनच अनन्तता संपादूं शकतें -- आणि नवे नवे अनुभव अथवा अनुभवांत सारखा बदल करीत राहणें, नवे नवे देह घेणें, देहांत सारखा बदल करीत राहणें, याचा अर्थ मृत्युसंस्थेचा उपयोग करणें हा होतो. जन्म आणि मृत्यु या दोन टोंकांच्या मध्यें,

 

पान क्र. ३६१

 

जुनें घटकद्रव्य टाकून, नवें घेऊन आपलें शरीर सारखें बदलत असतें -- त्याचा आकार सारखा तोच दिसत असला, तरी त्याचें घटकद्रव्य सारखें बदलून त्याचें जीवन चाललेलें असतें; पण द्रव्यबदलाच्या द्वारां एकाच देहांत हा जो अदृष्ट असा बदल होत राहतो, तेवढ्यानें आत्म्याचा देहधारणाचा हेतु पुरा होत नाहीं. सांताच्या आश्रयानें अनन्त अनुभव घेणें हा हेतु पुरा होण्यासाठीं मन एकाच देहांत कायम न ठेवतां, वेगवेगळ्या देहांत ठेवणें अवश्य आहे; नव्या नव्या देहांत, नव्या नव्या काल-स्थल-परिसराच्या परिस्थितींत मन जेव्हां जात राहील, तेव्हांच त्याच्याद्वारां आत्म्याला विविध अनुभव मिळूं शकेल. आत्म्याचें शारीर-जीवन म्हणजे विशिष्ट काल-स्थल-मर्यादित जीवन. या जीवनाच्या आश्रयानें अनन्त अनुभव मिळविणें हें विविध देहांच्या द्वारां विविध अनुभव घेऊनच साध्य होऊं शकतें. अर्थात् पुन्हां पुन्हां मृत्युवशता पत्करूनच ही गोष्ट होण्यासारखी आहे. तेव्हां मृत्यु ही गोष्ट फायद्याची आहे, अवश्यहि आहे. मृत्यूचें भय वाटतें, तो नकोसा वाटतो याचें कारण तो आमच्यावर लादला जातो, तो आमच्या मनाच्या इच्छेविरूद्ध येतो; दुसऱ्या कोणाचें तरी आक्रमण आपल्यावर होऊन, आपण या आक्रमणांत झगडून झगडून दुःख भोगतो व शेवटीं पराजित होतो; ही आमच्या मनाची भावनाच आमच्या भीतीचें व मृत्युद्वेषाचें कारण आहे. आम्ही देहपातानंतर व्यक्तिजीवन संभाळून असतों, देहीला मरण नाहीं, देहालाच केवळ मरण आहे असा आमचा दृढविश्वास असला, तरी आम्हांला (आमच्या देहाला) कोणी दुसरा खाऊन टाकतो, आमच्या देहाची मोडतोड करून जबरदस्तीनें आम्हांला देह सोडावयाला लावतो, ही गोष्ट आम्हांला असह्य होते; मृत्यूच्या दुःखाचें बीज या गोष्टींत, या कल्पनेंतच आहे.

पण एकमेकाला खाऊन टाकणें ही तर जडाधिष्ठित जीवनाची एक अटळ प्रक्रिया आहे, हा एक त्या जीवनाचा आद्य नियम आहे. उपनिषदांत म्हटलें आहे कीं, क्षुधा (वासना) ही मुत्यु होय; आणि जीवन म्हणजे क्षुधा (वासना) होय. भौतिक विश्व हें मृत्युरूप क्षुधेनें (अशनाया मृत्यु:) निर्माण केलेलें आहे. भौतिक द्रव्य हा आधार घेऊनच भौतिक जीवन अस्तित्वांत येतें व राहतें; हें भौतिक द्रव्य मूळ सद्‌वस्तूचें बनलेलें आहे -- ती सद्‌वस्तु विभागली जाऊन, तिचे अनन्त अणू बनले आणि हे अणू अनन्त रीतींनीं एकमेक मिळून अणुसंघ करूं

 

पान क्र. ३६२

 

लागले. अनन्त सद्‌वस्तु अनन्त विभागरूप झाल्यावर, त्या विभागांच्या अनन्त संघांच्या द्वारांच ती आपलें मूळ अनंतत्व अनुभवूं शकतें; अनन्त विघटन आणि अनन्त संघटन या दोन प्रेरणा सद्‌वस्तूचे ठिकाणीं सारख्या कार्यान्वित झाल्यानेंच, विश्वांचें भौतिक अस्तित्व अस्तित्वांत येतें व अस्तित्वांत राहतें. सद्‌वस्तूच्या विभजनक्रियेनें बनलेला जीवनयुक्त व्यक्तिरूप अणु, स्वतःला टिकविण्यासाठीं व वाढविण्यासाठीं सारखी धडपड करीत असतो : ही धडपड म्हणजेच वासना (क्षुधा) होय. एकच एक सद्वस्तूच्या अस्तित्वाचे तुकडे झाले, व्यक्तीचें रूप तिला प्राप्त झालें, तरी आपण अनन्त सद्‌वस्तु आहोंत, सर्व कांहीं आपल्या आत्म्याच्या पोटांत आहे, सर्व कांहीं आपल्या मालकीचें आहे, ही गुप्त नेणीवव्याप्त जाणीव या व्यक्तीच्या अंतरंगांत असते आणि त्यामुळें प्रत्येक व्यक्तींत ही एक अनिवार्य, मूलभूत, अटळ सहजप्रेरणा असते कीं, आपण अधिकाधिक व्यापक अनुभव घेऊन, अधिकाधिक व्यापकपणें विश्वांतील गोष्टी आपल्या करून, आपल्यांत सामावून घेऊन, पचवून, त्यांचा भोग घेऊन, आपली शारीर, प्राणिक, नैतिक, मानसिक (बौद्धिक) वाढ करून घ्यावी. अनन्त मूळ सद्‌वस्तूची सर्वसमावेशक सर्वसत्ताक अनन्तता व्यक्तींत गुप्त, नेणीवव्याप्त अशी असते, ती अनंततेची जाणीव पुन्हां प्रकटपणें व्हावी ही जी सहजभावना व्यक्तींत उदय पावते, ती विश्वचालक ईश्वरानें दिलेली स्फूर्ति असते; प्रत्येक व्यक्तिरूप जीवांत, देह धारण करून वसति केलेल्या महान् आत्म्याची ती तीव्र इच्छा असते -- आणि ही इच्छा पुरविण्यासाठीं व्यक्तिदृष्ट्या आपल्या जीवनशक्तीची सारखी वाढ व्हावी, विस्तार व्हावा यासाठीं व्यक्ति खटपट करीत असते. ही गोष्ट अपरिहार्य आहे, न्याय्य आहे, आत्म्याच्या हिताची आहे. ही जीवनविषयक, प्राणविषयक वाढ आणि विस्तार, भौतिक विश्वांत करून घ्यावयाचा, तर व्यक्तीनें परिसरांतील गोष्टींना आपलें भक्ष्य करणें, इतरांना आपल्या शरीरांत विलीन करून घेणें किंवा इतरांच्या जवळच्या वस्तूंना आपल्या शरीराचें खाद्य करणें ही गोष्ट अपरिहार्य असते; वासना किंवा क्षुधा, मग तिचें स्वरूप कोणतेंहि असो, ती या प्राण-संवर्धन-मार्गाच्या नितान्त आवश्यकतेमुळें, अपरिहार्यतेमुळें सर्वत्र समर्थनीय ठरते. परंतु जो भक्षण करील, तो भक्ष्यहि होईल ही भौतिक विश्वांत अटळ गोष्ट आहे. कारण भौतिक विश्वांतील प्राणव्यवहारांत, जीवनव्यवहारांत सर्वत्र, व्यक्ति व परिस्थिति या दोहोंमध्यें आघातांची देवघेव, क्रिया व

 

पान क्र. ३६३

 

प्रतिक्रिया व्हावयाची आणि व्यक्ति मर्यादित सामर्थ्याची असल्यानें, या लढ्यांत शेवटीं थकून परिस्थितीचा बळी होऊन निकालांत निघावयाची हा सार्वत्रिक नियम आहे.

व्यक्तींत जाणीवयुक्त मनाचा उदय होऊन, त्याची वाढ झाली म्हणजे नेणीवव्याप्त जीवनांत प्राणाची क्षुधा म्हणून असलेली प्रेरणा, श्रेष्ठतर रूपें धारण करते. केवळ शारीर-प्राणांत भक्ष्य-भक्षणाची जी प्राथमिक क्षुधा म्हणून असते, ती मनोयुक्त (शारीर) प्राणांत (जीवनांत) विविध भोगलोलुप वासनेचें रूप धारण करते, बुद्धियुक्त-विचारयुक्त, प्राणांत (जीवनांत) कार्यप्रवण कार्योत्सुक इच्छाशक्तीचें, संकल्पशक्तीचें रूप धारण करते. अशी ही इच्छेची (वासनेची, संकल्पाची) वाटचाल, प्रगति या पुढेंहि चालूं राहणार, राहिली पाहिजे आणि राहणें योग्य आहे. या वाटचालीनें व्यक्ति हळूहळू वाढून इतकी समर्थ होईल कीं, ती आपल्या घटकभूत शरीर-प्राण-मन यांचें पूर्ण नियंत्रण करूं शकेल आणि अनन्ताशीं तिची एकता वाढत जाऊन, ती आपल्या विश्वाची स्वामिनी होईल. ईश्वरी जीवनतत्त्व, इच्छा या तेजोमय तत्त्वाचा आश्रय करून, विश्वांत आपली सत्ता अबाधित चालविण्याचा हेतु सफल करीत असतें -- ही तळपती इच्छा विझवून टाकण्याचा प्रयत्न करणें -- निष्कर्मता हें ध्येय पुजून त्याच्या नादानें, निर्वासनता स्वांतरांत प्रस्थापित करण्यासाठीं तळपती इच्छा विझवून टाकण्याचा प्रयत्न करणें -- हें ईश्वरी जीवनतत्त्वाचा निषेध करणें आहे, तें अमान्य करणें आहे; या निषेधाचा वा अमान्यतेचा अर्थ, आत्म्याचें अस्तित्व पुसून टाकण्याची इच्छा करणें असा आहे -- आणि ही गोष्ट उघड उघड अज्ञान आहे; -- कारण व्यक्तीला व्यक्तित्व नाहींसें करावयाचें असेल, तर तिनें अनन्तत्व धारण केलें पाहिजे, दुसरा मार्ग नाहीं; व्यक्तिरूपानें असलेलें आत्म्याचें अस्तित्व पुसून टाकावयाचें, तर तिनें पुन्हां आपलें आद्य अनंतत्व मिळविले पाहिजे, दुसरा मार्ग नाहीं. आत्मा अस्तित्वांतून नाहींसा होऊं शकत नाहीं; तो नाहींसा होऊं शकतो ही कल्पना म्हणजे केवळ अज्ञान आहे. जेव्हां आमची इच्छा अनन्ताच्या इच्छेंत अस्त पावेल, तेव्हांच ती योग्य रीतीनें अस्त पावली असें होईल -- ती आपलीं दुसरीं सर्व रूपें टाकून 'अनन्ताची इच्छा' हें एकच रूप धारण करील. हें रूप घेण्यानें, ती आपली सर्वोत्तम पूर्णता प्राप्त करून घेईल -- या पूर्णतेचा आनंद तिला लाभेल --मूळ अनन्ततत्त्व सर्व स्वामित्वाचा जो आनंद भोगीत असतें, तो आनंद या

 

पान क्र. ३६४

 

पूर्णता पावलेल्या आमच्या इच्छेला भोगावयास सांपडून, या आनंदाच्या भोगांत तिला असीम समाधान लाभेल. पण हें घडून येण्यापूर्वीं आमची इच्छा ही स्वरूपतः पुष्कळच प्रगत व्हावी लागेल. आज आम्ही अन्योन्य अन्योन्यांचें भक्षण करण्याच्या मागें असतों; अन्योन्य-भक्षक क्षुधेचें हें रूप टाकून, आमच्या इच्छेनें अन्योन्य दातृत्वाचें रूप घेतलें पाहिजे; एकमेकांनीं एकमेकांना देण्याघेण्यांत घडणारा त्याग, तिला अधिकाधिक आनंदमय वाटत गेला पाहिजे. व्यक्ति ही भोंवतालच्या व्यक्तींना आत्मदानानें संतुष्ट करते, तर त्या दुसऱ्या व्यक्ती आत्मदानानें या व्यक्तीला समाधान देतात; कनिष्ठ जीव आत्मदान करून श्रेष्ठाची सेवा करतो, श्रेष्ठ त्याचप्रकारें कनिष्ठाची सेवा करतो; दोघेहि आपापली पूर्णता या अन्योन्य सेवेनें प्राप्त करून घेतात; मानव आपली मानवता ईश्वराच्या चरणीं अर्पण करतो आणि ईश्वर आपली ईश्वरता मानवाला अर्पण करतो; व्यक्तींत वास करणारा सर्वात्मा, विश्वांत वास करणाऱ्या सर्वात्म्याला सर्वस्व दान करतो आणि या सर्वस्व-दानाचा ईश्वरी दिव्य मोबदला म्हणून व्यक्तीला विश्वात्म्याच्या सर्वात्मतेची नित्य निरतिशय आनंदाची अनुभूति प्राप्त होते. या रीतीनें आमच्या व्यवहारांत आरंभीं सर्वगामी असलेला क्षुधेचा (अन्योन्य-भक्षणाचा) कायदा बाजूला पडून, त्याचे ठिकाणीं क्रमश: प्रेमाचा (अन्योन्य सेवेचा) कायदा सर्वगामी होतो; भेदाचा कायदा बाजूला पडून, त्याची जागा अभेदाचा, ऐक्याचा कायदा घेतो; मरणाचा कायदा बाजूला होऊन, आपली जागा तो अमरत्वाच्या कायद्याला बहाल करतो. विश्वांत जो वासनेचा कायदा काम करीत आहे, त्याची आवश्यकता काय, त्याचें समर्थन काय, त्याची परमोच्च अवस्था, कृतार्थता व परिपूर्णता कशांत आहे या गोष्टींची यथार्थ कल्पना वरील विवेचनावरून जिज्ञासूंना येऊं शकेल.

जीवन हें मरणाचा मुखवटा धारण करतें याचें कारण, मर्यादांत कोंडलेला आत्मा आपली अमरता व्यवहारांत आणण्याची धडपड करीत असतो हें आहे. मरण हा ज्याप्रमाणें जीवनाचा मुखवटा आहे, त्याप्रमाणें वासना हा त्या वैयक्तिक जीवनाच्या शक्तीचा मुखवटा आहे. मूळ अनन्त सत्तेची शक्ति, वैयक्तिक जीवनाबरोबर व्यक्तींत जेव्हां कोंडली जाते, तेव्हां वासना ही उदयास येते; वासना ही, वैयक्तिक जीवनशक्तींत उदयास येणारी सहजप्रेरणा आहे, सान्ताच्या चौकटींत क्रमश:, आपला मूळ अनन्त सच्चिदानन्दाचा आनंद आत्मसात् करण्याचा तिचा उद्देश

 

पान क्र. ३६५

 

असतो; काल-स्थलबद्धता हें व्यक्तिजीवनाचें स्वरूप असल्यामुळें स्थलदृष्ट्या क्रमवारीनें क्षणामागून क्षणांत व्यवहार करून, व्यक्तिरूप आत्मा सान्ताच्या चौकटींत आपलें मूळ अनन्त सुख प्राप्त करून घेण्याच्या खटपटींत असतो. ही खटपट हेंच वासनेचें रूप आहे -- आणि ही खटपट त्याला वैयक्तिक जीवनशक्तीच्या दुबळेपणामुळें, असामर्थ्यामुळें करावी लागते हेंहि उघड आहे. सच्चिदानन्दमूलक जीवन अमर आहे, जीवनशक्ति अनन्त (आणि म्हणून आनन्दमय) आहे. पण जीवनाला व जीवनशक्तीला वैयक्तिक स्वरूप प्राप्त झालें म्हणजे आपली मूळ अमरता व अनंतता (आनन्दमय अनन्तता) अनुक्रमें मरणाचा व वासनेचा मुखवटा चढवून आणि रूपापाठीमागून रूपें धारण करून, अमरता सिद्ध करणें आणि शारीर, प्राणिक, नैतिक, बौद्धिक, प्रेममय, ऐक्यमय, अशी एकापेक्षां एक वरिष्ठ रूपें वासनेला देऊन व सारखा वाढता आनंद प्राप्त करून घेऊन, आपली आनन्दमय अनन्तता सिद्ध करणें हें मूळ जीवनाला व जीवनशक्तीला प्राप्त होतें. मूळ अनन्तशक्ति सान्ताच्या चौकटींत बसून कार्य करूं लागली म्हणजे तिला 'जीवन' असें आपण म्हणतों. तिजकडून सान्तांत जें प्रकट वैयक्तिक कार्य घडतें, त्या कार्यांत तिचें मूळ सर्वसमर्थत्व हें अपरिहार्यपणें मर्यादित सामर्थ्याचें आणि अर्थात् त्याजबरोबर असामर्थ्याचें (मर्यादित) रूप धारण करतें; तथापि व्यक्तीच्या प्रत्येक व्यवहारामागें -- तो व्यवहार कितीहि दुबळेपणाचा, निरर्थक, थबकत, ठेंचाळत चालणारा दिसला, तरी त्याच्या पाठीमागें अनन्त सर्वसमर्थ अशी अतिमानसिक किंवा अधोमानासिक शक्ति गुप्त रूपानें उभी असते; अनन्त शक्तीच्या अशा उपस्थितीशिवाय विश्वांतील अगदीं क्षुद्रांत क्षुद्र हालचालहि होऊं शकत नाहीं; विश्वांतील एकूण एक सर्व व्यवहार प्रत्यक्षपणें वा अप्रत्यक्षपणें या शक्तीकडूनच होतात; सर्वसमर्थ सर्वज्ञता अतिमानस या रूपानें विश्वांत काम करीत आहे आणि या सर्वज्ञ मूळ सत्तेच्या हुकुमानें विश्वांत घडणारें प्रत्येक कार्य व आंदोलन तिच्या अनन्त शक्तीच्या एकंदर व्यवहाराच्या पोटांतच होत असतें; मात्र व्यक्तिरूप धारण करणाऱ्या जीवनशक्तीला अशीच जाणीव असते कीं, मी मर्यादित आहे, मी पुष्कळशी असमर्थ आहे; तिच्या भोंवतालीं तिच्या सारख्याच व्यक्तिरूप जीवनशक्तींचा तांडा असतो; या तांड्याला तोंड देणें तिला भाग पडतें; शिवाय अनन्त जीवन हेंहि तिच्यावर नियंत्रण करीत असून, केव्हां केव्हां तिचें कार्य विफल करतें; कारण केव्हां केव्हां अनन्त जीवनाची

 

पान क्र. ३६६

 

सर्वदर्शी, सर्वहितकारी, सर्वस्पर्शी इच्छा आणि कल एक असतो, तर मर्यादित व्यक्तिरूप जीवनाची इच्छा आणि कल दुसराच असतो. व्यक्तिरूप विभक्त जीवनशक्तीला तिचें एक विशिष्ट लक्षण म्हणून हें जें असामर्थ्य चिकटलेलें आहे, त्याची समर्थनीयता व अपरिहार्यता वरील विवेचनावरून लक्षांत येईल. व्यक्तिरूप जीवनशक्तींत मर्यादितता आणि म्हणूनच असमर्थता अपरिहार्य असली, तरी मूळ अनन्तशक्तीच्या गुप्त प्रेरणेनें आपली मत्ता व सत्ता वाढविण्याची भावना तिच्यांत असते; सर्वकांहीं आपल्या मत्तेंत जमा व्हावें, आपल्या सत्तेखालीं यावें, ही स्फूर्ति तिच्या मर्यादित शक्तीमुळें कांहीं मर्यादित होत नाहीं व तशी ती मर्यादित होऊं नये अशीच मूळशक्तीची योजना असते. सत्ता चालविण्याची शक्ति मर्यादित व स्फूर्ति मात्र अमर्यादित : या द्वंद्वांतूनच वासनेचा उदय होतो. कारण स्फूर्ति आणि शक्ति यांच्यांत जर अंतर नसतें, जो विषय हवासा वाटला, तो सहज ताब्यांत घेण्याइतकी शक्ति जर व्यक्तिरूप जीवनांत असती, तर वासना उत्पन्न होण्याचें कारणच नव्हतें; या काल्पनिक (जशी स्फूर्ति तशी शक्ति या) परिस्थितींत, वासनाविशिष्ट विषयाकरितां तळमळणारी वासना व्यक्तीचे ठिकाणीं व्यक्त न होतां, शांत, आत्मश्रद्धायुक्त असा निश्चयी संकल्प (ईश्वरी सत्य संकल्पासारखा संकल्प) व्यक्तींत उदय पावला असता आणि त्यानें आपला विषय सहज आपल्या ताब्यांत घेतला असता.

व्यक्तिरूप झालेली शक्ति ही, अविद्याग्रस्त मनाची नसून, अविद्यामुक्त मनाची असेल, तर तळमळणाऱ्या वासनेनें व्यक्तीच्या मनांत ठाण देणें आवश्यक व अपरिहार्य होणार नाहीं. कारण अविद्यामुक्त मन अतिमानसाला जाणतेपणें चिकटून असणार, त्यापासून विभक्त असणार नाहीं आणि असें अविभक्त दिव्य ज्ञानसंपन्न मन, आपल्या प्रत्येक नियोजित कार्यांतील मूळ अतिमानसिक हेतु जाणील, त्याचें क्षेत्र आणि त्याचा अटळ परिणाम यांचें ज्ञान त्याला असेल आणि म्हणून भलतीच तळमळ किंवा धडपड तें करणार नाहीं; जो तात्कालिक हेतु त्याच्यापुढें असेल, त्याच्या पूर्ततेला अवश्य तेवढीच स्वयंमर्यादित व कार्यक्षम शक्ति तें कामीं लावील. हेतु तात्कालिक नसून कालांतरानें पुरा करावयाचा असेल आणि अशा दूरच्या हेतूसाठीं कांहीं चळवळ हातीं घेतली असेल, तरीदेखील अतिमानसिक ज्ञानाशीं फारकत न झालेलें मन मर्यादितपणाच्या भावनेनें किंवा वासनेच्या तळमळीनें हैराण होणार नाहीं; कारण त्याची चळवळ तात्पुरती

 

पान क्र. ३६७

 

अयशस्वी झाली, तरी ही अयशस्विता सर्वज्ञ सर्वसमर्थ आदिशक्तीचेंच सहेतुक कार्य असतें, हें त्याला ठाऊक असेल. जेव्हां ईश्वरी सर्वज्ञ सर्वसमर्थशक्ति कोणतेंहि विश्वकार्य योजितें, तेव्हां त्याचा आरंभ कोणत्या वेळीं, कोणत्या परिस्थितींत करावयाचा, तें कोणत्या चढउतारांतून प्रगति-परागतींतून जावयाचें, त्याचें तात्कालिक परिणाम आणि अंतिम परिणाम काय असावयाचें हें सर्व ती ठरवून ठेवते -- अर्थात् मध्यें कांहीं ''अयशस्विता'' (परागति) नजरेस आली, तरी ती सहेतुक असते हें उघड आहे. ज्ञानसंपन्न अविद्यामुक्त मन, दिव्य अतिमानसाशीं संलग्न असल्यानें हें सर्व ज्ञान, ही सर्व सर्वनियामक शक्ति त्यालाहि असते आणि म्हणून वर सांगितल्याप्रमाणें अयशस्वितेनेंहि त्याला मर्यादितपणाच्या भावनेचा किंवा वासनेच्या तळमळीचा उपसर्ग किंवा स्पर्श होत नाहीं. परंतु आमचें अविद्याबद्ध मन, त्याच्या अतिमानसिक ज्ञानापासून विभक्त झालें आहे आणि आमची वैयक्तिक जीवनशक्ति ही अशा ज्ञानहीन विभजनासक्त मनाची शक्ति आहे; म्हणून या वैयक्तिक जीवनशक्तीचे जीवनाच्या इतर प्रान्ताशीं जे संबंध येतात, त्या संबंधांत तिचें सामर्थ्य मर्यादित असणें अवश्य आहे आणि अपरिहार्य आहे; शक्ति ज्ञानशून्य आणि ती व्यवहारांत मात्र सर्वसमर्थ -- मग त्या व्यवहाराचें क्षेत्र अगदीं मर्यादित कां असेना -- ही गोष्ट अकल्पनीय आहे. कारण त्या क्षेत्रांत ती शक्ति, सर्वज्ञ सर्वसमर्थ ईश्वरी शक्तीच्या विरुद्ध आपलें ठाण मांडील आणि निश्चित ठरलेली ईश्वरी योजना घोंटाळ्यांत आणील, अनिश्चित करून टाकील असा संभव उत्पन्न होतो आणि ही गोष्ट विश्वाच्या व्यवस्थेंत शक्य होऊं देतां येत नाहीं. यासाठीं ज्या शक्ती मर्यादित आहेत, त्यांनीं आपापलें सामर्थ्य, सहज किंवा जाणीवयुक्त वासनेच्या प्रेरणेनें झगडून वाढवावें हा जीवनाचा महान् कायदा आहे. वासनेसंबंधानें पूर्वीं जें सांगितलें, तें वासनाप्रेरित झगड्यालाहि लागूं आहे; झगडा हा आरंभीं पक्ष-प्रतिपक्षांमध्यें एकमेकांना नुकसान पोंचविण्याच्या हेतूनें, आपापला स्वार्थ साधण्याच्या हेतूनें होत असतो; तो पुढें या क्षुद्र पातळीवर न होतां, उच्च पातळीवरून, एकमेकाला लाभदायक होईल अशा हेतूनें व्हावयास हवा; व तसा तो विकासक्रमानें होऊंहि लागतो. दोन मल्ल स्नेही, कुस्ती खेळून एकमेकांची शक्ति अजमावतात व वाढवितात, त्याप्रमाणें संसारांत विकासक्रमांत विशेष प्रगत झालेल्या दोन जीवनशक्ती -- एक लढ्यांत हरणारी व एक जिंकणारी अशा दोन शक्ती -- लढ्यानें

 

पान क्र. ३६८

 

सारख्याच संवर्धित होतात, त्यांना लढ्यापासून सारखाच लाभ होत असतो; लढणाऱ्या शक्तींत एक खालच्या पातळीवर व दुसरी वरच्या पातळीवर असेल, तर दोन्ही शक्तींचा सारखाच फायदा लढ्यानें होत असतो; खालची हरणारी शक्ति आपल्या हीन प्रेरणेचें हीनत्व ओळखते व तिच्या त्यागाला तयार होते, वरची विजयी शक्ति आपल्या उच्च प्रेरणेचें यशस्वित्व अनुभवून, तिला चिकटून राहते, ती संवर्धित करते व तिचें दान इतरांना करते; याप्रमाणें झगड्यानें दोन्ही झगडणाऱ्या शक्तींचा फायदाच होतो. विकासाचा शेवट असा असतो कीं, झगडा हा झगड्याचें स्वरूप टाकून प्रेममय, प्रेमप्रेरित संमीलनाचें, सुखमय संसर्गाचें, संगतीचें, सहवासाचें, समालिंगनाचें रूप घेतो व दिव्य भावनांचा विनिमय परस्परांत होऊं लागतो; तथापि ज्या झगड्यामध्यें एकमेकांना हार देण्याच्या दृष्टीनें, एकमेक एकमेकांना त्वेशानें पेंच घालतात, पकडींत धरतात, असा झगडा हा विकासाच्या आरंभींच्या टप्प्यांत आवश्यक असतो व लाभप्रदहि असतो. मरण, वासना आणि (असामर्थ्यमूलक) झगडा हीं तीन विभक्त जीवनाचीं लक्षणें आहेत. हे तीन ईश्वरी जीवनतत्त्वाचे मुखवटे (त्याचें सत्यस्वरूप झांकणारे व ते अन्यथा भासवणारे मुखवटे) आहेत; हें जीवनतत्त्व व्यक्तिरूपांत, आपल्या मूळ विश्वव्यापक स्वरूपाच्या गुप्त प्रेरणेनुसार जी प्राथमिक धडपड करतें, त्या धडपडींत तें हे तीन मुखवटे धारण करतें -- आणि ही त्याची धडपड शेवटीं यशस्वी होते; शेवटीं तें व्यक्तिरूप झालेलें ईश्वरी जीवनतत्त्व, विश्वव्यापक जीवनाशीं एकरूप होतें.

 

पान क्र. ३६९

 









Let us co-create the website.

Share your feedback. Help us improve. Or ask a question.

Image Description
Connect for updates