दिव्य जीवन 1879 pages 1960 Edition
Marathi Translation
  Senapati Bapat

ABOUT

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics, expounding a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth.

THEME

philosophymetaphysics

दिव्य जीवन

Sri Aurobindo symbol
Sri Aurobindo

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.

Sri Aurobindo Birth Centenary Library (SABCL) The Life Divine Vols. 18,19 1070 pages 1970 Edition
English
 PDF    philosophymetaphysics
Sri Aurobindo symbol
Sri Aurobindo

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.

Marathi Translations of books by Sri Aurobindo दिव्य जीवन 1879 pages 1960 Edition
Marathi Translation
Translator:   Senapati Bapat  PDF    LINK

प्रकरण पंधरावें

 

परात्पर सत्य-संविद्

 

एक, अतिमानसरूप व सुषुप्तीच्या स्थानीं बसलेला आत्मा, प्रज्ञानाचा आणि प्रज्ञेचा घनीभूत सांठा आहे, तो आनंदमय आहे, आनंदभोक्ता आहे....हाच सर्वेश्वर, हाच सर्वज्ञ, हाच अंतर्यामी, हाच सर्वांचा प्रभव किंवा उगम होय.

- मांडुक्य उपनिषद् ५, ६

 

अतिमानस किंवा सत्य-संविद्, सत्य-जाणीव हा दिव्य अस्तित्वाचा दिव्य मूळ आत्म्याचा, परात्पराचा स्वभाव आहे; ही सत्य-संविद् सर्व-समावेशक, सर्व-जनक, सर्व-परिपूरक आहे. दिव्य अस्तित्वाचें किंवा आत्म्याचें सर्वातीत, केवळ, निःसंबंध, निष्क्रिय व स्वयंसिद्ध स्वरूप अर्थात् अतिमानसयुक्त नाहीं; स्वतःच्या विश्वांचें निर्माण करणारें आणि त्यांचें स्वामित्व करणारें जें त्या दिव्य आत्म्याचें सक्रिय स्वरूप, त्या स्वरूपाचा किंवा त्या क्रियाशील स्वरूपांतील दिव्य आत्म्याचा स्वभाव, सत्य-संविद्, सत्य-जाणीव किंवा अतिमानस हा आहे. आम्ही ज्याला ईश्वर म्हणतों, त्या संबंधीचें हें सत्य आहे. तो सत्य-जाणिवेचा मूळ, दिव्य आत्मा आहे. हा ईश्वर आणि पाश्चात्यांनीं कल्पिलेला ईश्वर वेगळे आहेत; पाश्चात्यांचा ईश्वर एक मर्यादित शक्तीची व्यक्ति आहे. तो मोठा केलेला निसर्गाच्या बाहेर, वरतीं, उंच असलेला एक मनुष्य आहे; मनुष्याचा 'मी' आणि सृष्टि निर्माण करणारें विज्ञान किंवा अतिमानस यांच्या परस्परांतील एका विशिष्ट नात्याची, मनुष्याला बरीच जवळ असणारी, महामानवी प्रतिमा वा छाया पाश्चात्यांच्या ईश्वरांत दिसते. ईश्वराला जी वैयक्तिक बाजू आहे, ती आपल्याला दुर्लक्षितां येत नाहीं. अव्यक्तिता किंवा सर्वता ही जशी अस्तित्वाची एक बाजू आहे, तशी व्यक्तिता पण दुसरी बाजू आहे; ईश्वर सर्व अस्तित्व आहे, त्याप्रमाणें तो एकमेव

 

पान क्र. २४७

 

सद्‌वस्तु आहे; एक आत्मा आहे; तो एकच एक ज्ञानमय अस्तित्व आहे--तसेंच अस्तित्व असलेला तो एक आत्मा आहे. पण सध्यां आपल्याला ईश्वराच्या व्यक्तित्वाकडे बघावयाचें नाहीं; दिव्य जाणिवेचें मानसिक, अव्यक्तिक, व्यक्तित्वातीत, सार्वत्रिक सत्य खोलपर्यंत समजून घेण्याचा, त्याचें पूर्ण मोजमाप करण्याचा आपण सध्यां प्रयत्न करीत आहों. त्याच्या महत्त्वाला अनुरूप अशी विस्तृत, स्पष्ट कल्पना निश्चित करण्याच्या उद्योगांत आपण सध्यां आहोंत.

सत्य-संविद् विश्वांत सर्वत्र विद्यमान आहे, व्यवस्था करणारें आत्मज्ञान हें त्याचें स्वरूप सर्व ठिकाणीं असतें, मूळ एकतत्त्व हें या सत्य-संविदेच्या आश्रयानें, त्याच्या ठिकाणीं शक्यतेच्या रूपांत असणाऱ्या अनंत, सुसंगत व सुसंवादपूर्ण रचना व्यक्त करतें. हें आत्मविषयक, व्यवस्था लावणारें ज्ञान जर नसतें, तर एकतत्त्वापासून जी अभिव्यक्ति झाली असती, ती व्यवस्थाशून्य, कोठें तरी कशी तरी वाहवणारी अशी झाली असती; एकतत्त्वाच्या अभिव्यक्तीची शक्यता असीम अनन्त असल्यानेंच, व्यवस्थातत्त्वाच्या अभावीं असीम आकस्मिकतेचा, अनियंत्रित यदृच्छेचा अनागोंदी पसारा चोहोंकडे आम्हांस दिसला असता. रचनांची अनंत शक्यता आहे पण त्यामध्यें मार्गदर्शक सत्याचा नियम किंवा सुसंवादपूर्ण आत्म-दर्शनाधिष्ठित रचनेचा नियम मात्र उपलब्ध नाहीं, अशी जर स्थिति असती, तसेंच विकासाकरितां व वाढीकरितां विकासक्षेत्रांत टाकलेल्या वस्तूच्या बीजाच्या पोटीं विकासाची पूर्वयोजना विद्यमान् नसती, तर विश्व हें प्रचंड, आकारशून्य व अश्चिततापूर्ण गोंधळाचा देखावा झाला असता. परंतु निर्माण करणारें जें ज्ञानतत्त्व आहे, त्यानें निर्माण अथवा व्यक्त केलेलें सर्व कांही त्यानें दुसऱ्या कोठून आणलेलें नसून स्वत:तूनच बाहेर काढलेलें असतें; त्याच्या स्वत:च्या शक्ती, त्याचे स्वत:चे आकार हेच त्या ज्ञानतत्त्वानें व्यक्त केलेले असतात; अर्थात् जी जी शक्यता किवा बीज, या ज्ञानतत्त्वाला विकसित करावयाचें असतें, त्या बीजाला लागूं असणारा सत्याचा विकासनियम, त्याला स्वत:चे ठिकाणीं स्पष्ट दिसत असतो; त्याचप्रमाणें प्रत्येक बीजाचें दुसऱ्या बीजाशीं असणारें नातेंहि त्याला स्वभावत:च अवगत असतें आणि या सर्वांपासून कोणत्या सुसंगत रचना होऊं शकतात, तेंहि या निर्मायक ज्ञानतत्त्वाला स्पष्ट दिसत असतें. विश्वाची सुसंगत, संपूर्ण कल्पना व योजना त्याच्या समोर असते. त्या योजनेंत सर्वसामान्य रचनासौष्ठवाबरोबर वर सांगितलेली प्रत्येक

 

पान क्र. २४८

 

बीजाची विकासयोजना चितारलेली असते; विश्वाच्या निर्मितीला कारण असणारें ज्ञान, याप्रमाणें विश्वाचें पूर्ण सुसंवादी चित्र आपल्या स्वतःच्या ठिकाणीं आंखून काम करीत असल्यानें, या चित्राचे घटक हे पूर्वयोजनेनुसार एकमेकांवर क्रिया-प्रतिक्रिया करीत राहून, अखेर पूर्वनियोजित सुसंवादी रचनासंभार अटळपणें उभा करतात; सृष्टिनिर्मिति करणारें ज्ञान हेच सृष्टींतील कायद्याचा उगम आहे, तेंच हा कायदा कार्यान्वित करून नेहमीं तो चालवितें; हा कायदा अर्थात् लहरी स्वैरपणा नसतो; व्यक्त होणाऱ्या वस्तूचा जो स्वतःचा स्वभाव असतो, त्याचें प्रकट रूप म्हणजे हा कायदा. प्रत्येक वस्तु तिच्या आरंभींच्या स्वरूपांत सत्य-कल्पनारूप असते. या वस्तुगत सत्यकल्पनेच्या पोटीं जें अवश्य कार्यकारी सत्य असतें, त्या सत्यानेंच वस्तूचा स्वभाव ठरत असतो. या स्वभावाचें प्रकट रूप म्हणजे त्या वस्तूचा विकास-नियम--विकासाचा कायदा होय. तेव्हां, आरंभापासूनच विश्वनिर्मितीचा सर्व व्यापार पूर्वनियोजनाप्रमाणें चालतो. तो व्यापार मूळ जाणीवयुक्त अस्तित्वाचा विकास असल्यानें, त्याचा विकासक्रम त्या अस्तित्वाच्या आत्मज्ञानांत अंतर्भूत असतो; या आत्मज्ञानानुसार तो चालतो. प्रत्येक क्षणीं जें विकासकार्य घडतें, तेंहि स्वकृत कार्याच्या स्वरूपाचें असतें; पूर्वनियोजनानुसार तें चालतें. विश्वव्यापाराच्या पोटीं प्रत्येक क्षणीं जें विवक्षित, स्वाभाविक मूळ विकाससत्य असेल, त्याप्रमाणें जें विकासकार्य अवश्य घडावयास पाहिजे तेंच घडत असतें. दुसऱ्या क्षणीं त्या अंतर्गत मूळ सत्याच्या प्रेरणेनें, ज्या बिंदूकडे विकासकार्य जावयास पाहिजे, तिकडे तें जातें आणि शेवटीं विश्वबीजांत जें नियोजनपूर्वक सांठविलें होतें, तें नियोजनानुसार प्रकट होणार हें निश्चित आहे.

विश्वाचा विकास, विश्वाची प्रगति ही त्याच्या स्वतःच्या अस्तित्वाच्या विकसित मूळ सत्याला धरून चाललेली असते हें आपण पाहिलें. ही अशी प्रगति होण्यासाठीं कालाचा अनुक्रम अवश्य आहे, स्थलाशीं संबंध अवश्य आहे; स्थलांतील संबंधित वस्तूवस्तूंमध्यें नियमबद्ध क्रिया-प्रतिक्रिया अवश्य आहे; कालानुक्रमानें या स्थलांतील वस्तुसंबंधाला कार्यकारणसंबंध असें स्वरूप येतें. काल आणि स्थल (अवकाश, आकाश) या वस्तू सत्य द्रव्यसृष्टींतील नसून, कल्पना-सृष्टींतील आहेत असें तत्त्वज्ञानी म्हणतात; परंतु खरी गोष्ट अशी आहे कीं, केवळ काल आणि स्थल नव्हे, तर सर्वच वस्तू मूळ ज्ञानमय आत्म्यानें (जाणीवयुक्त

 

पान क्र. २४९

 

अस्तित्वानें) आपल्या जाणिवेला दिलेले आकार आहेत; किंवा असें म्हणा, आपल्या जाणिवेच्या क्षेत्रांत आपण स्वत: घेतलेले आकार आहेत. तेव्हां, तत्त्वज्ञानी लोकांनीं काल, स्थल आणि इतर वस्तू यांमध्यें मानलेला भेद तितकासा महत्त्वाचा नाहीं. मूळ ज्ञानमय आत्म्याची स्वतःकडे पाहण्याची एक दृष्टि, काल आणि स्थल यांनीं व्यक्त होते; मूळ आत्मा आपलें एकत्व सांभाळून एकत्वाच्या पोटीं खूप विस्तार पावला, त्यानें महान् आत्मविस्तार केला. हा आत्मविस्तार आंत व बाहेर अशा स्वरूपाचा आहे; कालदृष्टि, ही अंतर्गत आत्मविस्ताराकडे पाहण्याची दृष्टि आहे; स्थलदृष्टि, ही बाह्य आत्मविस्ताराकडे पाहण्याची दृष्टि आहे; मूळ ज्ञानमय आत्माच काल आहे, तोच स्थल आहे; विषयदृष्टीनें तो स्थलरूप आहे, विषय-ज्ञानी, 'विषयी' या दृष्टीनें तों कालरूप आहे; विषय तोच झाला आहे, 'विषयी' तोच झाला आहे. सर्व अनुभव अनुभवण्याचे, काल आणि स्थल हे दोन सांचे आहेत. मनाच्या दृष्टीनें मोजणें, मापणें या त्याच्या क्रियेंतून हे सांचे निर्माण झाले आहेत. मनाचा स्वाभाविक व्यापार पृथक्करणाचा, विभाग करण्याचा. या व्यापाराला मोजमापाची अनिवार्य आवश्यकता आहे; मनाच्या दृष्टीनें काल हा आत्म्याचा हलता-फिरता विस्तार आहे; भूत, वर्तमान, भविष्य या अनुक्रमानें, या कालविभागणीनें हा हलता विस्तार मापला जातो; या क्रियेच्या व्यवहारांत मन एका विशिष्ट कालबिंदूंत उभें राहून, कालदृष्ट्या आपल्यामागें, आपल्यापुढें नजर टाकतें; स्थल हा स्थायी विस्तार आहे; येथें द्रव्य विभागतां येतें, द्रव्याची ही विभजनक्षमता स्थायी विस्ताराचें मोजमाप करावयास उपयुक्त ठरते; स्थायी विस्ताराचें विभाजन करतांना, मन एका स्थलबिंदूंत उभें राहून, आपल्या सभोंवर पसरलेल्या द्रव्याचा अंदाज घेतें व त्याचें मोजमाप करतें.

व्यवहारांत वस्तुस्थिति अशी आहे कीं, घटना ही कालाचें मोजमाप करण्याचें साधन म्हणून मन वापरतें आणि द्रव्याच्या साधनानें तें स्थलाचें मोजमाप करतें. परंतु घटना आणि द्रव्याची मांडणी यांचा उपयोग न करतां, काल व स्थल यांचा समावेश असलेली ज्ञानयुक्त शक्तीची शुद्ध क्रिया, शुद्ध मनाला जाणतां व अनुभवतां येणें शक्य आहे. काल आणि स्थल विश्वव्यापक जाणीवशक्तीच्या दोन बाजू आहेत; कापडाचे उभे-आडवे धागे असावे, त्याप्रमाणें जाणिवेच्या या दोन अंगांचे अन्योन्यसंबंधीं गुंतागुंतीचे क्रिया-प्रतिक्रियारूप व्यापार, जाणिवेचें स्वतःवर होणारें कार्य

 

पान क्र. २५०

 

घडवून आणतात. काल आणि स्थल यांचें हें स्वरूप शुद्ध मनाच्या लक्षांत येऊं शकतें. व्यवहारी मन हें घटनांच्या साधनानें काल मोजतें, द्रव्यानें स्थल मोजतें. शुद्ध मनाच्या आणि व्यवहारी मनाच्या पलीकडे जी श्रेष्ठ जाणीव आहे, तिला मनाला अनुभवाला येणारें भूत, वर्तमान, भविष्य एकाच दृष्टिक्षेपांत समोर दिसतें; ही जाणीव कालाच्या या तीन विभागांत विभागलेली किंवा सामावलेली नसून, हें तीन विभाग त्या जाणिवेच्या पोटीं सामावलेले आहेत. कालाच्या विवक्षित क्षणीं बसून, तिला कालदर्शनासाठीं इकडे तिकडे नजर टाकावी लागत नाहीं; अशा श्रेष्ठ जाणिवेला काल हा शाश्वत वर्तमानरूप असतो. त्याचप्रमाणें या जाणिवेला सर्व स्थानबिंदू सर्व प्रदेश तिच्या पोटीं असल्यानें, स्थलाच्या एखाद्या बिंदूवर उभें राहून, स्थलदर्शनासाठीं मागें पुढें पहावें लागत नाहीं आणि म्हणून तिला कालाप्रमाणेंच स्थलहि आपल्या आंतला विस्तार, अविभाज्य, अविभक्त असा अंतर्गत विस्तार वाटणें स्वाभाविक आहे. आपल्या जीवनांत असे क्षण येतात कीं, जेव्हां विश्वांतील विविध व्यापारांना, आपल्या जाणीवयुक्त आत्मगत अविभाज्य एकतेच्या पोटीं सामावून घेणारी व्यापक ज्ञानदृष्टि आपल्याला येते. काल आणि स्थल यांच्या अंतर्गत असणाऱ्या वस्तू, त्या ज्ञानदृष्टीला कालस्थलातीत, तात्विक सत्यस्वरूपांत दिसणार--त्या कशा दिसत असतील याचा विचार सध्यां अप्रस्तुत आहे. आपल्या मनाला या गोष्टीची कल्पना करणें देखील अशक्य आहे. आमच्या मनाला किंवा इंद्रियांना विश्वाचें जें ज्ञान होतें त्याहून निराळ्या प्रकारचें ज्ञान या एकतामय व अविभाज्य ज्ञानदृष्टीला होणें शक्य आहे, ही गोष्ट देखील आमचें मन मान्य करूं शकत नाहीं.

अतिमानस आपल्या व्यापक समावेशक रूपांत, कालाचे अनुक्रम व स्थलाचे विभाग अंतर्भूत करून घेतें आणि त्यांच्यांत एकता, अविभक्तता आणतें. कारण अतिमानसाला एका दृष्टिक्षेपांत सर्व स्थल-काल आणि त्यांचा व्यापार दिसतो; त्याची जाणीव सर्व कांहीं सामावून घेणारी आहे, ही गोष्ट समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. विचाराचे थोडे कष्ट केल्यानें ही गोष्ट आम्हांला समजू शकेल. आतां प्रथम 'कालाचा अनुक्रम' ही बाब नाहींच अशी कल्पना करूं. बदल, प्रगति ही क्रमयुक्त काल-कल्पनेचा परिणाम असल्यानें, क्रमयुक्त काल नसेल तर बदल नाहीं, प्रगति नाहीं; त्यामुळें विश्वांत पूर्ण सुसंगतता शाश्वत काल व्यक्त होत

 

पान क्र. २५१

 

राहील; अनेक सुसंगत घटना जणुं एकाच शाश्वत क्षणांत, एकाच वेळीं आपल्याला दिसतील; कांहीं भूतकालीन व कांहीं भावी असा प्रकार दिसणार नाहीं. पण मनाला क्रमयुक्त काल असल्यामुळें, अतिमानसाला घडणारें दर्शन आणि मनाला घडणारें दर्शन यांत अंतर आहे. आम्हांला विश्वाची सुसंगत घटना एका दृष्टिक्षेपांत दिसत नाहीं, विकासशील घटना दिसते, सुसंगतीचा एक घटक आतां, एक नंतर, याप्रमाणें सारखा क्रम नित्य चाललेला प्रत्ययास येतो, एका घटकांतून दुसरा घटक निघतांना दिसतो, नंतरच्या घटकांत पूर्वींचा घटक गुप्त होऊन बसतो. ही कालाची गोष्ट झाली. आतां, विभागतां येण्याजोगें स्थल, ही गोष्ट नसती व विश्वाचें आत्म-अभिव्यक्तीचें कार्य चाललें असतें, तर आकारांआकारांत असलेले संबंध बदलणें, शक्तीशक्तींचा अन्योन्यांवर आघात प्रत्याघात होणें या गोष्टी घडल्या नसत्या; सर्व कांहीं एकाच वेळीं एकाच रूपांत अस्तित्वांत असलेलें प्रत्ययास आलें असतें-कांहीं क्रिया घडून अस्तित्वांत येणें, हा प्रकार दिसला नसता. स्थलाभावीं मूळ आत्मजाणीव आपल्या अंतरांत सर्व वस्तू सामावून राहिली असती. एकादा विश्वकवि हा विश्वस्वप्नदर्शी असावा आणि त्याच्या अंतरांत सर्व विश्व असावें, तसें सर्व विश्व आमच्या आंतरात्म्यांत सामावलेलें प्रत्ययास आलें असतें. बाह्य आत्म-विस्तार आणि त्या विस्तारांत वस्तूवस्तूंत आत्म-जाणीव विभागून राहिलेली, अशी परिस्थिति घडली नसती--कारण स्थल-कल्पनेच्या पोटीं हा प्रपंच शक्य असतो, एरव्हीं शक्य असत नाहीं. विश्व-वस्त्राचा ताणा-बाणा जो स्थल आणि काल, त्याचा अभाव कल्पिल्यानें विश्व कसें दिसलें असतें तें सांगितलें. आतां, काल सत्य आहे, पण स्थल नाहीं अशी कल्पना करून काय होतें तें पाहूं. काल आहे अर्थात् कालक्रम आहे; या कालक्रमाच्या आधारानें विश्वविकास व्हावयाचा, तर त्यांत स्थलाचा गोंधळ नसल्यानें, या सरळ असंकीर्ण विकासाची एक पायरी दुसऱ्या पायरींतून सहजपणें आंतरात्म्यांत उदयास येत जाईल. वाद्याचे ध्वनितरंग एकांतूनएक, एकसारख्या अविरत क्रमानें निघत रहावे किंवा कवीच्या मनांत एकामागून एक प्रतिमा व्यक्त होत रहाव्या, त्याप्रमाणें विश्वघटना सुसंगतपणें, क्रमवार व्यक्त होत रहातील. परंतु काल आणि स्थल दोन्हीहि सत्य असल्यामुळें, आम्हांला जो विश्वविकास प्रत्ययास येतो, त्यांत कालक्रम हा आकार आणि शक्ति यांच्या स्वरूपांत सुसंगत घटना निर्माण करतो आणि हे आकार व या शक्ती सर्वसमावेशक,

 

पान क्र. २५२

 

स्थलात्मक आत्मविस्ताराच्या क्षेत्रांत कांहीं विशिष्ट संबंधांनीं एकमेकींशीं बांधलेल्या असतात; म्हणजे अस्तित्वाच्या बाह्य क्षेत्राचें जें दर्शन घडतें, त्यांत वस्तूंच्या आणि घटनांच्या प्रतिमा आणि शक्ती अविरतपणें एकीपाठीमागून दुसरी अशा सारख्या उदय पावतांना आम्हांला दिसतात.

काल आणि स्थल यांच्या या विश्वरूप क्षेत्रांत, भिन्न भिन्न शक्यता, वस्तुबीजें व घटनाबीजें यांना आकार देण्यांत येतो; त्यांना स्थान देण्यांत येतें आणि त्यांचें अन्योन्यसंबंध ठरविण्यांत येतात. अर्थात् प्रत्येक वस्तुबीज आपल्या प्रकट आणि अप्रकट शक्तींसह दुसऱ्या वस्तुबीजांशीं जणुं सामना करीत असतें; याचा परिणाम असा होतो कीं, कालक्रमानें ज्या वस्तू एकामागून एक उदयास येतात, त्या मनाच्या दृष्टीनें स्वाभाविक स्वयंस्फूर्त क्रमवारीनें उदयास येत नसून, एकमेकींशीं झगडून पुढें होतात. खरें पाहतां, व वस्तूंच्या पोटीं त्यांच्या विकासाचा जो ज्ञानमय नियम असतो, तदनुसार स्वयंस्फूर्तरीतीनें वस्तूंचा विकास होत असतो. बाह्यतः जो झगडा आणि संघर्ष दिसतो, ती स्वाभाविक अंतर्विकासाची वरवरची गौण बाजू असते. एक आणि समग्र असें जें मूळतत्त्व आहे, त्याच्यांत स्वभावत: पूर्ण सुसंगति, सुमेळ असणार. या सुसंगत पूर्णतत्त्वाचा अंतर्यामींचा, अंतःस्वभावस्थ नियम, हाहि सुसंगतिपूर्ण असणार; त्या एकतत्त्वाचे जे भाग होतात, जीं रूपें होतात, त्यांच्या बाह्य प्रक्रियाविषयक नियमांवर या एकतत्त्वाच्या सुसंवादी अंतर्नियमाची यंत्रणा असते. हे भाग, हे आकार आम्हांला एकमेकांशी झगडतांना दिसतात; पण हा फक्त बाह्य देखावाच असतो. अतिमानस दृष्टीला, एकतत्त्वगत सर्वशासक सुसंवादाचे श्रेष्ठ आणि गूढ सत्य नेहमीं स्पष्ट दिसतें. मनाला जी गोष्ट दर्शनीं विसंवादपूर्ण वाटते, ती त्याला तशी वाटण्याचें कारण, प्रत्येक वस्तु स्वतंत्र, दुसऱ्या सर्व वस्तूंपासून अलग आहे, अशा कल्पनेनें मन त्या गोष्टीचा विचार करतें हें होय. वस्तुत: अतिमानसाच्या दृष्टीनें, विश्वरचना ही एक सुसंगत विकासशील रचना आहे. विश्वरचनेंत प्रत्येक क्षणीं सुसंगतपणा वसत असतो. मनाला दर्शनीं विसंगत, विसंवादी दिसणारी गोष्ट, ही या नित्य विश्वरचना-सुसंवादाचें एक आवश्यक अंग असते. अतिमानस हें विश्वाकडे अविभक्त दृष्टीनें पाहतें--एकच अनेक झालें आहे, होत आहे, अनेक एकाचेंच व्यक्तीकरण आहे हीं गोष्ट अतिमानसाला स्पष्ट दिसते; एका दृष्टिक्षेपांत भूत, भविष्य वर्तमान विश्व पाहण्याची शक्ति अतिमानसांत असल्यानें, त्याच्या दृष्टीला

 

पान क्र. २५३

 

मनाप्रमाणें विसंवादाचा अनुभव या विश्वपसाऱ्यांत येत नाहीं. मनाला फक्त विवक्षित काल आणि विवक्षित स्थल दिसतें; या कालांत, स्थलांत, 'घडून येण्याचा अधिक संभव असलेल्या' अनेक गोष्टी एकमेकींत मिसळलेल्या, एकमेकांत गोंधळ करीत असलेल्या त्याला दिसतात; म्हणजेच त्याला विसंवाद, विरोध व झगडा दिसतो. अतिमानसाची गोष्ट निराळी आहे; अतिमानस ही दिव्य ईश्वरी जाणीव आहे. तिला काल आणि स्थल यांचा अखिल विस्तार-पट दिसतो; मनाला दिसणाऱ्या सर्व संभवनीय गोष्टी आणि त्याला न दिसणाऱ्याहि कितीतरी अधिक संभवनीय गोष्टी तिला दिसतात; कोठेंहि चूक, चांचपडणें किंवा गोंधळ तिला दिसत नाहीं; याचें कारण, प्रत्येक संभवनीय गोष्टीची विकासशक्ति काय आहे, तिची मूलभूत निकड कोणती आहे, तिची इतर संभवनीय गोष्टींशीं योग्य नातीं कोणतीं आहेत, हें तिला दिसतें आणि प्रत्येक संभवनीय गोष्ट क्रमाक्रमानें विकसित होत, शेवटीं तिचें स्वरूप काय होणार आहे, या क्रमविकासाचे काल, स्थल, परिस्थिति या दृष्टीनें टप्पे कोणते आणि शेवटीं जें तिचें स्वरूप व्हावयाचें तें केव्हां, कोठें व कोणत्या परिस्थितींत वास्तवांत येणार आहे, हें सर्व अतिमानस दिव्य जाणिवेला स्पष्ट दिसत असतें. सर्व गोष्टी स्थिरपणे पाहणें व एका दृष्टिक्षेपांत समग्रतेनें पाहणें हें मनाला शक्य नाहीं; परंतु अशी स्थिर व्यापक समग्र दृष्टि हा, मनापलीकडे असलेल्या अतिमानसिक जाणिवेचा मात्र आंतरिक प्राकृतिक स्वभावच आहे.

अतिमानस स्वतःचे जे आकार आपल्या जाणीवशक्तीच्या द्वारां घडवितें, ते सर्व त्याच्या पोटीं सामावलेले असतात; ते सर्व स्वतःच्या पोटीं त्याला स्पष्ट दिसतात; शिवाय अतिमानसिक जाणीव या सर्व आकारांनाहि आंतून व्यापून असते; या विविध आकारांच्या पोटीं ती, आत्मप्रकाशक ज्योतीच्या स्वरूपांत, त्या आकारांना मार्गदर्शक म्हणून राहते. विश्वाच्या प्रत्येक आकारांत, प्रत्येक शक्तींत अतिमानस गुप्तपणें राहतें; आकार, शक्ति व विशिष्ट क्रिया हें सर्व अतिमानस स्वयंस्फूर्तपणें आणि सार्वभौमपणें ठरवितें; ज्या परिवर्तनाच्या व भिन्नतेच्या गोष्टी तें ठरवितें आणि आपल्या छंदानुसार घडवितें, त्या सर्वांना मर्यादा घालण्याचें काम पण तेंच करतें; तें जी शक्ति उपयोगांत आणतें, ती एके ठिकाणीं आणणें, विखरून पसरविणें किंवा कमी-अधिक करणें हीं कामेंहि तेंच करतें आणि हें सर्व तें त्या प्राथमिक आद्य नियमानुसार

 

पान क्र. २५४

 

करीत असतें. आकाराच्या जन्मक्षणीं, शक्तीच्या कार्यारंभक्षणीं तो नियम त्याच्या आत्मज्ञानानें ठरवून दिलेला असतो. (वेदामध्यें एका ठिकाणीं म्हटलें आहे : देवता आद्य नियमानुसार वागतात; हे नियम मूळतत्त्वाचे आणि म्हणून सर्वशासक असतात; वस्तूंच्या सत्य अंतस्तत्त्वानें निश्चित केलेला जो नियम, तोच आद्य नियम होय.) अतिमानस सर्व भूतांच्या हदयीं त्यांचा ईश्वर म्हणून वास करतें; यंत्रारूढ करून वस्तूंना फिरवावें त्याप्रमाणें मायाशक्तीनें तें सर्व भूतांना हिंडवीत असतें. (गीता १८-६१;) सर्व भूतांच्या पोटीं तें असतें आणि सर्वांना तें व्यापून असतें. दिव्य द्रष्टा (कवि) तेंच आहे; त्यानें सर्व वस्तू विविध रीतीनें विश्वांत स्थापिल्या आहेत व त्यांना विविध वर्तन-नियम त्यानें घालून दिले आहेत; प्रत्येक वस्तूला तिचें तत्त्व पाहून योग्य तें स्थान त्यानें दिलें आहे व योग्य तो नियम तिला लावून दिला आहे; ही व्यवस्था त्यानें शाश्वतची केली आहे. (ईश-उपनिषद् ८ वा श्लोक)

तेव्हां निसर्गातील प्रत्येक वस्तु, मग ती सजीव असो वा जड असो, मानसिक आत्मजाणिवेनें युक्त असो वा नसो, तिचें अस्तित्व, जीवन व तिचे व्यापार, त्या वस्तूच्या अन्तरंगांत वसत असलेल्या सर्व-दर्शी ज्ञानानें व सर्वसमर्थ शक्तीनें नियंत्रित केलेले असतात; आमच्या मनाला या ज्ञानाचें व शक्तीचें दर्शन घडत नसल्यानें, त्यांना आम्ही अधोमानसिक ज्ञान व शक्ति म्हणतों, नेणीवव्याप्त ज्ञान व शक्ति म्हणतों--पण हें ज्ञान व सामर्थ्य स्वतःला नेणीवव्याप्त असत नाहीं किंवा तें अधो-मानसिकहि असत नाहीं; तें मनाहून श्रेष्ठ, सर्वव्यापी, सखोल, आत्मजाणीवयुक्त असें ज्ञान व सामर्थ्य असतें. अशी वस्तुस्थिति असल्यामुळेंच प्रत्येक वस्तु, तिचें ठिकाणीं बुद्धि दिसत नसतांहि बुद्धीनें करावें तसें काम करीत असते; वनस्पति, मनुष्येतर प्राणी व मनुष्य सर्वजण त्यांच्या अंतरांत असलेल्या दिव्य अतिमानसाच्या सत्यात्मक कल्पनेच्या आदेशानुसार वागतात; वनस्पति व मनुष्येतर प्राणी, त्यांच्या कमी-अधिक अधोमानसिक जाणिवेच्या मध्यस्थीनें वरील आदेश घेतात व पाळतात; मनुष्य अर्धवट अशा (मानसिक) जाणिवेच्या मध्यस्थीनें वरील आदेश घेतो व पाळतो. सर्व वस्तूंच्या अंतरीं राहून, त्यांजवर सत्ता चालवणारें ज्ञान किंवा प्रज्ञा हें मानसिकज्ञान नसतें, मानसिकप्रज्ञा नसते; अस्तित्व आणि ज्ञान अविभाज्यपणें ज्या मूळ सद्‌रूपांत एकत्र असतात, त्या अस्तित्वाचें, त्या सद्रूपाचें स्वतःला पूर्णतया जाणणारें सत्य-थोडक्यांत, सत्याची

 

पान क्र. २५५

 

आत्म-जाणीव-सत्यजाणीव ही सर्व वस्तूंच्या अन्तरीं राहून, त्यांजवर सत्ता चालवीत असते; या सत्य-जाणिवेला, सत्य-प्रज्ञेला विचार करून निर्णय घ्यावे लागत नाहींत; आत्मपरिपूर्ति करणाऱ्या एकच एक मूळ अस्तित्वाचा, सद्‌रूपाचा व अचूक आत्मज्ञान आणि आत्मसामर्थ्य यांचा सांठा तिला उपलब्ध असल्यानें, त्या अचूक ज्ञान-सामर्थ्याचा वापर करून, ती वस्तुव्यवस्था करीत असते. मानसिक प्रज्ञा ही विचार केल्याशिवाय काम करूं शकत नाहीं; कारण मूळ सत्य-प्रज्ञेचें केवळ प्रतिबिंब मानसिक प्रज्ञेच्या रूपानें व्यक्त होतें; तिला खरें ज्ञान असत नाहीं-ज्ञानाचा शोध करणें हें तिचें कार्य असतें; ती कालाच्या आश्रयानें प्रथम एक पाऊल नंतर दुसरें पाऊल, अशीं पावलें टाकीत तिच्याहून श्रेष्ठ अशा ज्ञानाचें- प्रज्ञेचें कार्य समजून घेत असते; त्या श्रेष्ठ ज्ञानाच्या गुप्त आदेशानुसार वागत असते; हें श्रेष्ठ ज्ञान शाश्वत काल एकतामय आणि समग्र असतें; काल या ज्ञानाच्या पकडींत असतो, पोटांत असतो; भूत-वर्तमान- भविष्य सर्व कांहीं एका दृष्टिक्षेपांत या श्रेष्ठ ज्ञानाला जाणतां येतें, अनुभवतां येतें.

दिव्य अतिमानसाचें पहिलें क्रियातत्त्व हें कीं, तें विश्वव्यापक ज्ञान आहे; सर्वसमावेशक, सर्वव्यापक, सर्वांच्या अन्तर्यामीं रहाणारें, विश्वैकदर्शी, विश्वमय ज्ञान आहे. सर्व वस्तू अस्तित्वदृष्टीनें अतिमानसांत समाविष्ट आहेत; त्याचा क्रियारहित, काल-स्थलरहित आन्तरात्मा हा स्वतःच्या ज्ञानांत, आत्मविषयक ज्ञानांत सर्व वस्तूंचा आत्मस्थ म्हणून संग्रह करून असतो; आणि म्हणून त्याचें क्रियाशील ज्ञानहि सर्वसमावेशक असतें. कालांत व स्थलांत स्वतःला आकार देण्याचें, अर्थात् स्वतःमधील वस्तूंना आकार देण्याचें काम तो आपल्या स्वतःच्या नियंत्रणाखालीं चालवितो; हे कालस्थलबद्ध आकार, ज्ञानविषय किंवा पदार्थ बनून अतिमानसिक आत्मा त्यांचा ज्ञाता बनतो. ज्या ज्ञानाच्या स्वतःवरील क्रियेनें ज्ञाता आणि ज्ञेय ही जोडी निर्माण केली, तें ज्ञान, ती ज्ञानक्रिया या जोडीला जोडणारा दुवा बनते.

अतिमानसिक जाणिवेच्या क्षेत्रांत ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान (क्रिया) या मूलत: एकरूप असतात, वेगळ्या वेगळ्या वस्तू असत नाहींत हें वरील विवेचनावरून उघड आहे. या तीन वस्तू वेगळ्या वेगळ्या आहेत असें आपलें मन मानतें; कारण त्याला असा भेद केल्यावांचून आपलें कार्य करतांच येत नाहीं; असा भेद न मानल्यास मन गतिशून्य होऊन बसेल.

 

पान क्र. २५६

 

मी स्वतःकडे जेव्हां मनानें पाहतों, तेव्हां देखील मला माझ्यामध्यें असा त्रिधा भेद कल्पावा लागतो. मी आहे म्हणणारा, मी पाहतों म्हणणारा असा ज्ञाता; या ज्ञात्याचा ज्ञानविषय किंवा ज्ञेय, माझ्यामध्यें जें मी पहात असेन तें, म्हणजे मीच (ज्ञाताच) परंतु 'मी नव्हे' म्हणून बाजूला काढलेला मी, किंवा त्यापैकीं कांहीं अंश; ज्ञान म्हणजे ज्ञाता आणि ज्ञेय यांना जोडणारी क्रिया; या क्रियेनें 'ज्ञाता मी' आणि 'ज्ञेय मी' यांना 'ज्ञानक्रिया मी' हा एकत्र आणून जोडतो. ही जी विभागणीची क्रिया चालते, ती कृत्रिम आहे. व्यवहाराला सोईची म्हणून ती करण्यांत येते; वस्तूंच्या संबंधाचें पायाभूत सत्य या कृत्रिम भेदांत नाहीं, हें उघड आहे. वस्तुत: 'मी ज्ञाता' म्हणजे जाणण्याची क्रिया करणारी जाणीव. ज्ञान (क्रिया) ही सुद्धां ती जाणीवच होय. म्हणजे मीच क्रिया करणारा आहे, ज्ञेयहि मीच आहे. त्या एकाच जाणिवेनें घेतलेला आकार किंवा फेरी--या स्वरूपांतील मी आहे; या तीन दिसणाऱ्या वस्तू, वस्तुत: एकच अविभाज्य अशी वस्तु किंवा क्रिया आहेत; दिसतांना त्या विभागल्या सारख्या दिसतात एवढेंच; तीन रूपें जरी दिसलीं, तरी जाणीव ही वस्तु आणि क्रिया, तिहींमध्यें वांटून दिलेली नाहीं--दिसावयास मात्र, एक वस्तु व क्रिया तीन ठिकाणीं वाटून दिली आहे आणि म्हणून तीन वस्तू किंवा क्रिया वेगळ्या आहेत असें दिसते. हें खऱ्या एकतेचें ज्ञान मनाला विचारानें आत्मसात् करतां येतें, त्याची भावना तशी होऊं शकते. परंतु बुद्धिपुरस्सर व्यवहार करतांना, त्या व्यवहाराचा पाया म्हणून हें ज्ञान मन सहजासहजीं वापरूं शकत नाहीं. स्वतःसंबंधानें मन काय करतें, काय करूं शकत नाहीं हें सांगितलें. आतां, 'मी' असें ज्या जाणिवेच्या रूपाला नांव दिलें जातें, त्या 'मी' च्या बाहेरचे असणारे पदार्थ पाहिले तर, ते पदार्थ व 'मी' स्वत: एकच आहोंत ही एकता समजणें व्यवहारिक मनाला अधिकच दुर्लभ वाटतें, जवळ जवळ अशक्य कोटींतील वाटतें. अशी एकतेची भावना होणें देखील असामान्य खटपटीनें साधूं शकतें; परंतु ही भावना टिकविणें, तिला आपल्या क्रियाशील जीवनाची कायमची प्रेरणा म्हणून स्वीकारणें, ही गोष्ट तर मनाला केवळ अशक्यच आहे; मनाच्या क्षेत्रांत जीं कामें स्वाभाविकपणें मोडतात, त्या कामांहून हें अगदीं निराळें, परकें, नवें व मनाला न पेलणारें असेंच काम आहे. मनाला फार तर एवढें करतां येईल कीं, 'मी' ची आणि 'मी-बाह्य' जीवनांची अथवा वस्तूंची एकता नीट समजून घेऊन, तें ज्ञान जवळ

 

पान क्र. २५७

 

सांभाळून ठेवणें आणि आपल्या स्वाभाविक क्रिया करतांना किंवा केल्यावर त्यांतील झालेल्या किंवा होऊं शकतील अशा चुका दुरुस्त करणें, स्वाभाविकपणें योजिलेलें कार्य हें वरील एकतेचें सत्य लक्षांत घेऊन शक्य तेवढें बदलून करणें--अर्थात् वस्तू व जीव, वेगळे वेगळे आणि स्वतंत्र आहेत, या व्यावहारिक सिद्धान्ताला धरूनच मन आपलें हें कार्य करीत राहील; कार्यांत थोडासा बदल किंवा त्यांतील चुकीची दुरुस्ती करावयास एकतेची भावना उपयोगांत आणील. आमच्या बुद्धीला हें ठाऊक आहे कीं, पृथ्वी सूर्याभोंवतीं फिरते. पण सूर्य पृथ्वीभोंवतीं फिरतो हें जें डोळ्यांना दिसतें, ती चूक या बुद्धीच्या सत्याचा उपयोग करून आपण दुरुस्त करतो, त्याप्रमाणेंच वरील गोष्ट समजावयाची. डोळ्यांना जें दिसतें, त्यांत फरक होत नाहीं, स्थूल इन्द्रिय-व्यवहाराला सोईची अशी जी रचना निसर्गानें केली आहे, ती कांहीं आम्हांला रद्द करतां येत नाहीं; ती तत्त्वत: गैरसोईची व कृत्रिम आहे, पण ती व्यवहारतः निसर्गाला सोईची आहे. त्याप्रमाणेंच विभागणीवर अवलंबून असलेली मनाची क्रिया निसर्गाला सोईची आहे. ती न बदलतां, 'मी' 'इतर' तत्त्वत: एक आहोंत, ही सत्य गोष्ट समजून घेऊन, मनाकडून घडणाऱ्या व्यवहारांत चूक दुरुस्तीसाठीं, थोड्याशा बदलासाठीं आपण तिचा उपयोग करतो.

अतिमानसाची गोष्ट वेगळी आहे. हें अतिमानस एकतेचें सत्य कधीं विसरत नाहीं; एकता हें मूलभूत सत्य आहे, हें नेहमीं दृष्टीसमोर ठेवून, अतिमानस आपला व्यवहार करतें; अतिमानसाला एकता हें स्वाभाविक सत्य आहे; पण मनाला तें तसें नाहीं; त्याच्या दृष्टीचा नैसर्गिक भाग हें सत्य नाहीं--त्याला तें समजून घेऊन प्रयत्नानें लक्षांत ठेवावें लागतें. विश्व आणि त्यांतील सर्व वस्तू मीच आहे असा प्रत्यय अतिमानसाला येतो; अविभाज्य अशी एकच ज्ञानक्रिया ही, हा प्रत्यय त्याला आणून देते; ही क्रिया त्याच्या जीवनाचा प्राण आहे, त्याच्या गतिमान् अस्तित्वाची गतिमानताच या क्रियेंत आहे. अतिमानसाची सर्व-समावेशक दिव्य जाणीव जेव्हां तिच्या इच्छाशक्तीच्या स्वरूपांत विश्वजीवनाचा विकास करते, तेव्हां नियंत्रण किंवा मार्गदर्शन करून ती हें कार्य घडवून आणीत नाहीं, तर आपल्या सर्वसमर्थ क्रियाशक्तीनें तें स्वतःच्या पोटांत पूर्ण करतें; याचें कारण, तिची ज्ञानक्रिया व तिची इच्छाक्रिया (शक्तिक्रिया) या दोन विभक्त गोष्टी नसून, एकच क्रिया असते; आणि या दोन्हीं क्रिया (किंवा एक क्रिया) अस्तित्वाच्या क्रियेशीं

 

पान क्र. २५८

 

एकरूप असतात; अस्तित्व, ज्ञान व शक्ति या तीन गोष्टी अतिमानसांत सर्वथैव एकरूप असतात. विश्वशक्ति व विश्वजाणीव एक असतात; कारण विश्वशक्ति हें विश्व-जाणिवेचें क्रियारूप आहे. याप्रमाणें ईश्वरी ज्ञान आणि ईश्वरी इच्छाशक्ति एक असतात; कारण ईश्वरी अस्तित्वाची मूलभूत क्रिया या ज्ञानानें आणि इच्छाशक्तीनें व्यक्त होत असते.

वस्तू व घटना, वेगळ्या वेगळ्या व स्वतंत्र आहेत अशा कल्पनेनें आमची पृथक्करण-अधिष्ठित मनाची जाणीव काम करते. ही कल्पना चूक आहे, ही चूक मनाच्या स्वभावांत आहे; ही प्राथमिक चूक आपण समजलों नाहीं व दूर ठेवली नाहीं, तर विश्वाचें खरें स्वरूप आपल्याला कळणार नाहीं. तें कळण्यासाठीं जें एक सत्य आम्हीं नेहमीं निर्धारानें आमच्यासमोर ठेवलें पाहिजे, तें अतिमानसिक सत्य होय. अतिमानस सर्वसमावेशक आहे--ही सर्वसमावेशकता विभागतां येत नाहीं--तें अविभाज्य आहे; आणि त्याची अविभाज्य एकता यत्किंचितहि कमी न होतां, त्यांत सर्व अनेकता, विश्वपसारा, सामावलेला आहे. हें अतिमानसिक सत्य नेहमीं समोर राहील, तरच विश्वाचा, विश्वरचनेचा उकल आम्हांस होणें शक्य आहे. बीजांत वृक्ष असतो, तो बीजांतून वर येतो व वृक्षांतून बीज येतें; आपण ज्याला वृक्ष म्हणतों, तें एक विश्वांतील रूप आहे; जें ज्ञानरूप एकतत्त्व विश्वांत अभिव्यक्त झालें आहे, त्या एकतत्त्वाच्या अभिव्यक्तीचें एक रूप म्हणजे वृक्ष आहे. या रूपाच्या शाश्वततेमध्यें एक सार्वभौम निश्चित नियम आहे, निश्चित व न बदलणारी प्रक्रिया आहे; तो नियम हाच कीं, वृक्षांतून बीज, बीजांतून वृक्ष. विवक्षित वृक्षाचा जन्म, जीवन आणि संतानोत्पादन या घटनेकडे पाहतांना, ही घटना स्वतंत्र आहे असें कल्पून मन तिचा अभ्यास करतें; तिचें वर्गीकरण व कार्यकारण दृष्टीनें तिचें स्पष्टीकरण करतें. वृक्षाचें अस्तित्व बीजामुळें व बीजाचें अस्तित्व वृक्षामुळें शक्य होतें--असा निसर्गनियम आहे, असा उद्‌घोष मन करतें. पण या उद्‌घोषानें स्पष्टीकरण मुळींच होत नाहीं. एक गूढ घटना कशी घडते ती प्रक्रिया, पृथक्करण पद्धतीनें शोधून टिपून ठेवणें एवढेंच खरोखरी मन या बाबतींत करतें. वृक्षाचा, वृक्षाच्या रूपाचा म्हणजेच वृक्षदेहाचा आत्मा ही गुप्त अशी जाणीवयुक्त शक्ति आहे, ही शक्ति हेंच वृक्षाचें खरें अस्तित्व आहे, बाकी सर्व या शक्तीची नियमबद्ध क्रिया आहे, अभिव्यक्ति आहे असें जरी मनाला कळलें, तरी वृक्ष, वृक्षाकार ही स्वतंत्र वस्तु आहे, तिचा निसर्गनियम स्वतंत्र आहे, तिची

 

पान क्र. २५९

 

विकास-प्रक्रिया स्वतंत्र आहे, असेंच त्याच्या स्वभावानुसार मन मानणार; असेंच मानण्याकडे त्याची प्रवृत्ति असणार. मनुष्येतर प्राणी आणि मनुष्य यांत म्हणजेच ज्यांच्यामध्यें मनाची जाणीव आली आहे त्या जीवांत, आपल्या विभक्ततेच्या प्रवृत्तीमुळें मन स्वतःलाहि स्वतंत्र वस्तु, जाणीवयुक्त ज्ञाता समजतें आणि इतर वस्तूंना आपले ज्ञेय पदार्थ म्हणजेच आपल्याहून वेगळे व स्वतंत्र असे पदार्थ समजतें. जीवनाला उपयुक्त व आवश्यक अशी ही मनाच्या कल्पनेची व्यवस्था आहे; जीवनाचा सर्व व्यवहार त्याच्या प्राथमिक अवस्थेंत या कल्पनेवर आधारलेला असतो. कल्पना केवळ कल्पनाच नसून मूळ शाश्वत सत्य आहे, अशी समजूत मन करून घेतें--व त्यामुळेंच अहंकाराच्या विभक्तपणाच्या सर्व चुका निर्माण होतात.

अतिमानसाची दृष्टि आणि सृष्टि वेगळी आहे. तेथें विभक्ततेचें नांव नाहीं. वृक्ष आणि त्याची प्रक्रिया ही जर स्वतंत्र वस्तु म्हणून असती, तर अतिमानसाच्या निर्मितिक्रियेंत ती अस्तित्वांतच आली नसती. ती आहे आणि विशिष्ट प्रकारची आहे याला कारण, वृक्षाचें विश्वाच्या अस्तित्वाशीं, विश्वशक्तीशीं आणि विश्वांत वृक्षाखेरीज दुसरे जे विश्वशक्तीनें घेतलेले आकार आहेत, त्या सर्वांशीं असलेलें जवळकीचें नातें हें एकतेचें आहे. जे जे आकार विश्वांत आहेत, त्यांचें विशिष्ट स्वरूप आणि विशिष्ट विकास, हाहि त्या नात्यावर अवलंबून असतो; या नात्याचा तो परिणाम असतो. विश्वांतील नानाविध आकारांचें अस्तित्व आणि विकास सर्वस्वीं विश्वाच्या अस्तित्वाची शक्ति घडवीत असते. वस्तूंच्या प्रकृतीचा जो भिन्न कायदा, तो सर्व निसर्गाच्या सार्वत्रिक कायद्याचें प्रसंगनिष्ठ विशिष्टीकरणरूप असतो; विश्वाचा जो सर्वसाधारण विकास ठरलेला असतो, त्यांत कोणत्याहि वस्तूचें जें स्थान असेल, त्याप्रमाणें त्या वस्तूचा विशिष्ट विकास ठरला जातो; वृक्षबीजाचें स्पष्टीकरण वृक्षांत सांपडत नाहीं, वृक्षाचें स्पष्टीकरण बीजांत सांपडत नाहीं; तर विश्व (विश्वविकास) हें दोघांचेंहि स्पष्टीकरण आहे आणि ईश्वर (ईश्वराची ज्ञानयुक्त इच्छाशक्ति) हें विश्वाचें स्पष्टीकरण आहे. अतिमानस एकाच वेळीं वृक्षबीज, वृक्ष आणि इतर सर्व पदार्थ यांना व्यापून असतें आणि यांच्या अंतरीं त्या त्या पदार्थाचा ''आत्मा'' म्हणून राहतें; हें त्याचें श्रेष्ठ आत्मज्ञान अविभाज्य आहे, एकतामय आहे आणि त्याला हें सदासर्वदा समोर असतें. या ज्ञानाच्या आश्रयानें

 

पान क्र. २६०

 

तें काम करतें; आपला जीवन-व्यवहार करतें; अतिमानसाच्या ज्ञानाची अविभाज्यता आणि एकता कठोरपणें अपरिवर्तनीय नाहीं; ती आपल्या पोटांत अनेकतेला वाव देणारी अशी लवचिक आणि व्यवहारी आहे. अतिमानसाच्या सर्वसमावेशक ज्ञानदेहांत स्वतंत्र असें अस्तित्वकेन्द्र कोठेंहि नाहीं. आमच्यांत आहे त्याप्रमाणें कोठेंहि वैयक्तिक अलग असा अहम् नाहीं; सर्व अस्तित्व त्याच्या आत्मजाणिवेच्या दृष्टीनें सर्वत्र सारखें विस्तारलेलें आहे; तें जसें एकतेमध्यें 'एक' आहे, तसें अनेकतेच्या विस्तारांतहि 'एकच' आहे; कोणत्याहि परिस्थितींत सर्वत्र सर्वदा एकच आहे. अतिमानसाच्या क्षेत्रांत एकाच अस्तित्वाला 'सर्व' आणि 'एक' अशीं दोन रूपें आहेत; येथें व्यक्तिरूप आत्मा केव्हांहि हें विसरत नाहीं, विसरूं शकत नाहीं कीं, तो सर्व आत्म्यांशीं, सर्व भूतांशीं एकरूप आहे आणि सर्वभूतप्रभव जें एकमेव आत्मतत्त्व, त्याच्याशींहि एकरूप आहे. कारण ही एकरूपता, एकात्मता अतिमानसिक जाणिवेंत स्वभावतःच भरलेली असते; मूळ एकता व सार्वत्रिक एकता हा तिच्या स्वयंभूपणाचा, स्वयंसिद्ध अस्तित्वाचा, सहजज्ञानाचा एक अविभाज्य भाग असतो.

अतिमानसिक अतिमहान् क्षेत्रांत एकता समतेनें विस्तारलेली असते, मूळ एक अस्तित्व येथें विभागलें जात नाहीं, वांटून दिलें जात नाहीं, त्याचा विस्तार त्यानें स्वत: समतेनें सारखेपणानें केलेला असतो; या सर्व विस्तारांत तें एकत्वानें सर्व व्यापून असतें, अनेक आकारांच्या अन्तरांत आत्मा म्हणून अविभक्तपणें तें राहतें, सर्वत्र एकाच वेळीं, एक आणि सम असें असणारें तें अस्तित्व वा ब्रह्म, कोठेंहि अधिकपणा, कमीपणा धारण करीत नाहीं. कारण काल आणि स्थल यांत ब्रह्म जें पसरलेलें आहे, तें त्याचें पसरणें आणि त्याचें सर्वाला व्यापून राहणें व सर्वांतरीं आत्मत्वानें राहणें--ही ब्रह्माची व्याप्ति त्याच्या सर्वनिरपेक्ष मूळ, केवळ, एकतेशीं व अविभाज्यतेशींहि निकटतेनें बांधलेली आहे. ब्रह्माचें मूळ स्वरूप केवल, एक व अविभाज्य असें असतें; या स्वरूपांतूनच त्याचें व्यापक स्वरूप उदय पावतें--अर्थात् त्या दोन स्वरूपांचा आन्तरिक नित्य-संबंध कधींहि तुटत नाहीं, बदलत नाहीं; अविभाज्य स्वरूपाच्या मूळ ब्रह्मांत कोठेंहि मध्यबिंदु, परीघ अशी व्यवस्था नसते; मूळ ब्रह्म अविभाज्य स्वरूपांत कालस्थलरहित एकत्वसंपन्न असतें. जेव्हां ब्रह्म स्वत:चा विस्तार करतें, तेव्हां विस्ताररहित ब्रह्माची ही अतिकेन्द्रित एकता अनिवार्यपणें सर्वत्र सारखेपणानें व्यापून राहते; सर्व वस्तू आपल्यांत

 

पान क्र. २६१

 

अविभाज्यपणें सामावून घेते, सर्वत्र अविभक्तपणें अन्तर्यामित्व धारण करते; सर्वत्र अशी एकता नांदविते कीं, अनेकतेचा कसलाहि प्रयोग त्या एकतेंत दोष उत्पन्न करीत नाहीं, तिच्यांत कमीपणा आणीत नाहीं, तिला दूर करण्याचें नांव घेत नाहीं. ''ब्रह्म सर्व वस्तूंत आहे, सर्व वस्तू ब्रह्मांत आहेत, सर्व वस्तु ब्रह्म आहे'' हें त्रिपदी सूत्र सर्वसमावेशक अतिमानसाच्या स्वरूपवैशिष्ट्याचें दर्शक आहे; ब्रह्माच्या आत्म-आविष्काराची त्रिविध एकता या सूत्रांत सांगितली आहे; हे तीन आविष्कार मिळून एकच सत्य आहे असें हें सूत्र सुचवितें; हे तीन आविष्कार अविभक्तपणें आपले स्वतःचे आहेत हें नित्य ओळखून, या पायाभूत ज्ञानावर अतिमानस आपला विश्व-रचनेचा खेळ उभा करतें.

अतिमानसाचें विश्व म्हणजे आपलें मनाचें विश्व नव्हे. तर मग मन-प्राण-जडद्रव्य या तीन स्वतंत्र वस्तू असलेलें हें विश्व आलें कोठून? अतिमानसिक जाणीव आणि मानसिक जाणीव या वेगळ्या जाणीवा आहेत. मानसिक जाणीव ही अर्थात् कनिष्ठ जाणीव आहे; या जाणीवेंत मन-प्राण-जड अशा तीन वस्तू अंतर्भूत आहेत. असें मन आलें कोठून? मनाची त्रिविध संघटना (आमचें मानसिक विश्व) कशी घडून आली? या प्रश्नांचा आतां विचार करावयाचा आहे. जें जें कांहीं अस्तित्त्वांत आहे, किंवा येतें, तें सर्व सर्वसमर्थ अतिमानसाच्या क्रियेचा परिणाम असतें; मूळ ज्या तीन अविभक्त वस्तू--अस्तित्व, जाणीव शक्ति आणि आनंद--या वस्तूंवर अतिमानसाची क्रिया घडून सर्व कांहीं अस्तित्वांत येतें. ही वस्तुस्थिति असल्यानें, अतिमानसांत, अतिमानसाच्या सृजनसमर्थ सत्य-जाणिवेंत अशी कांहीं शक्ति असली पाहिजे, कीं त्या शक्तीच्या मूळ तीन वस्तूंवरील विशिष्ट क्रियेनें त्या तीन वस्तूंतूनच आमच्या परिचयाच्या मन, प्राण व जडद्रव्य या तीन वस्तू उदयास येतील. अतिमानसाच्या सत्य-जाणिवेंत ही जी शक्ति आहे, ती म्हणजे स्वनिर्मित वस्तू स्वत:पासून दूर धरण्याची, त्या वस्तूसमोर बैठक घेण्याची आणि तिला स्पर्श करून, तिचें होईल तें ज्ञान करून घेण्याची त्या जाणिवेची शक्ति होय. या व्यवस्थेंत ज्ञान हें एका बिंदूत आत्मकेन्द्रित होऊन, आपण निर्मिलेल्या वस्तूंपासून दूर उभें राहून, त्या वस्तूंचें निरीक्षण करतें. सर्वसमावेशक समग्रदर्शी अतिमानस किंवा सत्यजाणीव स्वनिर्मित सर्व वस्तूंत जशी समतेनें राहते, तशी गोष्ट या तिच्या गौणशक्तीची नसते--ही सर्वत्र समतेनें रहात नाहीं; विशिष्ट बिंदूंत अधिक केन्द्रित होते; स्वनिर्मित

 

पान क्र. २६२

 

वस्तूंत विषमतेनें राहणें, हें या शक्तीचें वैशिष्ट्य आहे. स्वतःमध्यें भाग पाडण्याची क्रिया, जाणिवेच्या या विषम वांटणीमुळें सुरू होते--अतिमानसिक जाणिवेची, स्वनिर्मित वस्तूमध्यें तिच्या दुय्यम शक्तीच्या क्रियेनें घडणारी ही विषम वांटणी दृश्य विश्वांतील आत्म-विभाजन घडवून आणण्यासहि मूळ कारण होते.

ज्ञानग्रहणकर्ता म्हणून ज्ञानामध्यें स्वतःला केन्द्रित करणारा तो ज्ञाता; त्याची ज्ञानशक्ति त्याजपासून निघून, त्याच्या प्रत्येक आकारांत प्रवेश करते, तेथें काम करते; नंतर परत त्याच्यामध्यें जाते, पुन्हां त्याच्यापासून निघून जुना कार्यक्रम चालविते. असें सारखें पुन: पुन: चाललेलें असतें अशी प्रतीति या ज्ञात्याला होते. ही जी स्वतःमधील समतेचें राज्य घालवून, ज्ञाता, ज्ञेय, व ज्ञानक्रिया असा विषम व्यवहार घडवून आणणारी क्रिया, तिच्यापासून सर्व व्यावहारिक भेद निघतात; या भेदांवर विश्वांतील सापेक्ष-दर्शन, सापेक्ष-व्यवहार आधारलेले आहेत. ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय हे सर्व एकमेकांपासून वेगळे वेगळे आहेत, अशा व्यावहारिक मूळ भेदांतून ईश्वर, त्याची शक्ति आणि त्या शक्तीचीं अपत्यें आणि इतर कार्यें या वेगळ्या वेगळ्या वस्तू आहेत, असा एक भेद प्रस्थापित होतो; भोक्ता वेगळा, भोग वेगळा व भोग्य वेगळें अशी त्रिपुटी त्यांतूनच निघते; परमात्मा, माया व परमात्म्याच्या नामरूपात्मक विभूती, ही त्रिपुटीहि तेथूनच निघते. दृश्य विश्वांतील आत्मविभाजन हें असें त्रिपुटीयुक्त होत असतें. दृश्य विश्वांतील आत्मविभाजनाचा हा आरंभ होय.

यानंतर दुसरी गोष्ट घडते ती अशी : ज्ञानकेन्द्रित ज्ञानमय आत्मा किंवा पुरुष, त्याच्यापासून निघणारी जी शक्ति किंवा प्रकृति तिचें निरीक्षण आणि नियंत्रण करीत असतो--हा पुरुष त्याच्या प्रत्येक रूपांत, आकारांत आपली बैठक घालतो; जणुं त्याच्या ज्ञानशक्तीबरोबर तिनें घडविलेल्या वस्तूंत तो जातो आणि त्या वस्तूंत, त्या आपल्या रूपांत आत्मविभाजनक्रिया करतो; या क्रियेंतूनच ज्ञेय, ज्ञान या संवगडयांसह ज्ञातारूपी जाणीव निर्माण होते हें वर आलेंच आहे. प्रत्येक देहांत, आकारांत, रूपांत हा आत्मा किंवा पुरुष आपल्या प्रकृतीसह राहतो आणि दुसऱ्या देहांत असणाऱ्या स्वतःलाच त्या आपल्या विशिष्ट कृत्रिम व्यावहारिक ज्ञानकेन्द्रांतून बघत असतो. सर्व ठिकाणीं तोच एकच आत्मा, तोच एकच दिव्य पुरुष असतो; मूळ, अतिमानसिक, सर्वसमावेशक

 

पान क्र. २६३

 

समग्रदर्शी, एकतासंपन्न व समताप्रधान जाणिवेचें, केन्द्राची अनेकता हें एक व्यवहारदृष्टीचें कार्य आहे. भेदाचा खेळ उभा करणें हा या कार्याचा, या अनेक ज्ञानकेन्द्रांमागील अतिमानसिक हेतु आहे; मूळ अभेदाच्या पायावर व्यवहारापुरता भेदाचा खेळ उभारावा, त्या भेदांत अभेदाचा साक्षात्कार सर्वांनीं करून घ्यावा, भेदांतूनच निर्माण होऊं शकणारे अन्योन्यसंबंध निर्माण व्हावे, अन्योन्यांचें ज्ञान अन्योन्यांनीं करून घ्यावें, अन्योन्यशक्ती अन्योन्यांवर कार्यान्वित केल्या जाव्या, अन्योन्यांचा आनंद अन्योन्यांनीं भोगावा, या अशा अन्योन्य व्यवहारानें सर्वांचें ऐक्य सर्वांच्या अनुभवास यावें--ऐक्य हेंच मूळ असून, अन्योन्यता ही विशिष्ट वर सांगितलेल्या हेतूंसाठीं निर्माण केलेली दुय्यम गोष्ट आहे ही प्रतीति सर्वांना व्हावी--अनेक केन्द्रें करण्यांत अतिमानसाचा, सत्य-ज्ञानमय विभूतीच्या रूपानें क्रियाशील झालेल्या सच्चिदानंद ब्रह्माचा हा हेतु आहे.

सर्वव्यापक अतिमानस हें या वरील दशेला प्राप्त झाल्यानें, वस्तूच्या एकत्व-सत्यापासून आरंभिक त्रिपुटीदशेपेक्षां तें दूर झालेलें आहे. त्याचप्रमाणें विश्वाच्या अस्तित्वाला आवश्यक जी मूलभूत एकता, तिचें एकत्व ज्या अविभाज्य जाणिवेवर अनिवार्यपणें अवलंबून असतें, त्या जाणिवेपासूनहि वरील अतिमानसाची दुसरी दशा पहिल्या दशेपेक्षां अधिक दूर गेलेली आहे. अतिमानस जर आणखी थोडें दूर जाईल, तर तें अविद्या हें रूप घेईल; तें खरोखरीची 'अविद्या' होईल हें आपल्या लक्षांत येण्यासारखें आहे. अविद्या म्हणजे 'महान् अज्ञान,' अनेकता हेंच मूलभूत सत्य आहे असें तें मानतें; आणि खऱ्या एकतेला परत यावयासाठीं त्याला अहम् ची खोटी एकता खरी धरून प्रवासाला आरंभ करावा लागतो. तसेंच हेंहि आपल्या लक्षांत येऊं शकतें कीं, व्यक्तिकेन्द्र हा निर्णायक दृष्टिबिंदू म्हणून स्वीकारला, व्यक्तिकेन्द्र हाच ज्ञाता म्हणून पत्करला म्हणजे मानसिक संवेदना, मानसिक प्रज्ञा, मानसिक कृतिप्रवण इच्छाशक्ति या सर्व गोष्टींचे परिणाम घडून आल्याशिवाय राहणार नाहींत. तथापि आत्मा जोपर्यंत अतिमानसक्षेत्रांत कार्य करीत असतो, तोपर्यंत अविद्या त्याला बाधा करीत नाहीं; अविद्येचें क्षेत्र अतिमानसाच्या क्षेत्रांत अंतर्भूत होत नाहीं. त्या क्षेत्रांत ज्ञानाचे आणि क्रियेचे व्यवहार सत्य-जाणिवेवर आधारलेले असतात, त्यांचा पाया एकता हाच असतो.

कारण या अतिमानसिक क्षेत्रांत आत्मा (परमात्मा) ही गोष्ट विसरत नाहीं कीं, सर्वांमध्यें तो एकटा स्वतःच भरून राहिला आहे, सर्व त्याच्याच

 

पान क्र. २६४

 

विभूती आहेत आणि या सर्व विभूती त्याच्या पोटांतच वावरतात. ईश्वर (ईश्वररूप परमात्मा) हा त्याची शक्ति म्हणजे क्रियाशील स्वयम् आहे आणि प्रत्येक भूत अथवा विभूति आत्मदृष्टीनें आणि रूपदृष्टीनें तो स्वयम् आहे, ही गोष्ट विसरत नाहीं; भोक्ता (भोक्तारूप परमात्मा) अनेकतेच्या भूमींत भोग घेतो; तें भोग स्वत: स्वतःलाच भोग्य करून घेत असतो, ही गोष्ट तो विसरत नाहीं. सर्वसमावेशक समग्रदर्शी अतिमानसांत जो केवळ एकच खरा बदल झालेला असतो, तो हा कीं, जाणीव विषमतेनें वांटलेली असते, केन्द्राकेन्द्रांत विषमतेनें सांठविलेली असते आणि शक्ति अनेकतेच्या घटकांत सर्वत्र विभागलेली असते. जाणिवेमध्यें स्थानास्थानांत व्यवहारापुरता भेद मानला जातो, परंतु मूलत: जाणिवा सर्वत्र खरोखरीच वेगळ्या वेगळ्या आहेत असें मात्र अतिमानसिक परमात्मा मानीत नाहीं; त्याच्या स्वतःच्या स्वतःविषयींच्या ज्ञानांत खरें विभजन अतिमानसिक क्षेत्रांत होत नाहीं. सत्य-जाणीव, सत्य-ज्ञान हें अनेकतेंत अनेक त्रिपुटीयुक्त झाल्यानें, (प्रत्येक जीव त्रिपुटी असतो) अशा अवस्थेला आलेलें असतें कीं, त्यांतून आपली मनाची जाणीव निघूं शकते; तथापि अतिमानसाची ही अवस्था म्हणजे मनाची अवस्था नव्हे, मनाची जाणीव नव्हे. अतिमानसाच्या या अवस्थेचा अभ्यास आम्हीं करावयास हवा, कारण या अवस्थेंतून मनाचा उदय व्हावयाचा असतो; उंच आणि महान् विस्ताराचें जें सत्य-ज्ञान, तेथून त्याला पारखें होऊन, खऱ्या विभागणीच्या आणि अज्ञानाच्या क्षेत्रांत जी उडी घेतली जाते, ती या अवस्थेंतून घेतली जाते; येथें उगमापाशीं मन कसें असतें त्याचा अभ्यास आम्हीं करावयास हवा. सत्यज्ञानाच्या या अवस्थेला 'प्रज्ञान' म्हणतात. या अवस्थेंत शुद्ध, निर्भेळ, सर्वसमावेशकत्व, समग्रदर्शित्व टाकून (किंवा बाजूला ठेवून म्हणा) सर्वत्र त्रिपुटीयुक्त होऊन, ज्ञाता ज्ञेय व ज्ञान या पद्धतीनें अतिमानसानें अंशदर्शित्व स्वीकारलेलें असतें. याप्रमाणें अंशदर्शी झालेल्या अतिमानसाला 'प्रज्ञान' व मूळ समग्रदर्शी अतिमानसाला 'विज्ञान' हीं नांवें योग्य आहेत. विज्ञानालाच परात्पर-सत्य-संविद् हें नांव आहे; कारण प्रज्ञान हें अज्ञानाहून श्रेष्ठ म्हणजे पर; आणि विज्ञान हें प्रज्ञानाहून श्रेष्ठ म्हणजे परात्पर. या प्रकरणांत विज्ञानाचें स्वरूप विस्तारानें सांगितलें आहे व प्रज्ञानचर्चेला आरंभ केला आहे. प्रज्ञान हें आमच्या मानसिक जाणिवेला जवळ असल्यानें, त्याची नीट कल्पना करून घेणें अवघड नाहीं; विज्ञान हें मानसिक जाणिवेला दूर असल्यानें,

 

पान क्र. २६५

 

त्याची नीट कल्पना देण्यासाठीं आमच्या बुद्धीची भाषा पुरी पडत नाहीं; तथापि या भाषेचा उपयोग करून, विज्ञानाची कल्पना आणून देण्याचा प्रयत्न आम्हीं केला आहे. प्रज्ञानाची जी ज्ञानक्रिया असते, ती आमच्या मनाच्या ज्ञानक्रियेला जवळ असल्यानें, आमची ज्ञान-प्रक्रिया प्रज्ञानाच्या ज्ञान-प्रक्रियेची छायाच असल्यानें, प्रज्ञानाचें विवेचन आपल्याला विज्ञानाच्या विवेचनापेक्षां समजावयास सोपें जाईल. प्रज्ञान आणि मन यांच्या क्षेत्रांना विभागणारी तटबंटी पार करून जावयास अगदींच सोपी आहे असें नाहीं. तथापि विज्ञान आणि मन यांच्यामधील तटबंदीपेक्षां ही कमी कठीण आहे, कमी अवघड आहे.

 

पान क्र. २६६

 









Let us co-create the website.

Share your feedback. Help us improve. Or ask a question.

Image Description
Connect for updates