दिव्य जीवन 1879 pages 1960 Edition
Marathi Translation
  Senapati Bapat

ABOUT

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics, expounding a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth.

THEME

philosophymetaphysics

दिव्य जीवन

Sri Aurobindo symbol
Sri Aurobindo

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.

Sri Aurobindo Birth Centenary Library (SABCL) The Life Divine Vols. 18,19 1070 pages 1970 Edition
English
 PDF    philosophymetaphysics
Sri Aurobindo symbol
Sri Aurobindo

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.

Marathi Translations of books by Sri Aurobindo दिव्य जीवन 1879 pages 1960 Edition
Marathi Translation
Translator:   Senapati Bapat  PDF    LINK

प्रकरण एकोणिसावें

 

प्राणशक्तिमय जीवन

 

प्राणशक्ति हीच भूतांचें जीवन होय; प्राणालाच विश्वव्यापी जीवनतत्त्व म्हटलें आहे.

- तैत्तिरीय उपनिषद् २, ३.

 

आमचें मानवी जीवन बनविणाऱ्या तीन कनिष्ठ घटकांपैकीं मन हें सर्वश्रेष्ठ घटकतत्त्व आहे. या मनाचें उगमस्थान, दिव्य ईश्वरी अतिमानसिक क्षेत्र आहे आणि हें मन सत्यमय जाणिवेशीं निगडित आहे; दिव्यमन कसें असतें आणि सत्यमय जाणिवेशीं त्याचा संबंध काय आहे हें आपण पाहिलें आहे. ईश्वरी जाणिवेचें एक खास विशिष्ट कार्य म्हणजे मन होय; किंवा असे म्हणतां येईल कीं, ईश्वरी जाणिवेच्या निर्मितिकार्याचा अंतिम भाग म्हणजे मन होय. पुरुषाला, आत्म्याला या मनाच्या शक्तीनें आपल्या विविध रूपांचे आणि शक्तींचे अन्योन्य संबंध व्यवस्थितपणें वेगळे वेगळे ठेवतां येतात. या मनाकडून जे दर्शनी भेद निर्माण केले जातात, त्यांचा ईश्वरी लीलेला उपयोग असतो; मात्र वैयक्तिक आत्मा सत्यमय जाणिवेच्या संपर्काला मुकला म्हणजे हे दर्शनी भेद मौलिक व खरेखुरे भेद आहेत अशी त्याची प्रामाणिक भावना होते; आणि या मूळ विकृतीपासून पुढें अनेक विकृती निर्माण होतात; अविद्येच्या, अज्ञानाच्या बंधनांत पडलेल्या आत्म्याच्या जीवनांत, स्वभावतःच जीं द्वंद्वें, जे विसंवाद गोंधळ घालतात, ते सर्व वर सांगितलेल्या मूळ विकृतीचीं फळें होत. जोपर्यंत आपल्या जन्मदात्या अतिमानसाला मन चिकटून असतें, तोंपर्यंत तें विकृतींना आणि असत्यांना थारा देत नाहीं, तर सर्वव्यापी सत्याच्या विविध प्रकारच्या निर्मिति-कार्याला आपल्या विशिष्ट शक्तीचा आधार देत असतें.

विश्वाची निर्मितिकारकता मनाकडे आहे, त्याच्याकडे विश्वव्यापी कार्यकर्तेपण आहे असें वरील गोष्टीवरून दिसतें. पण आम्हांला मनासंबंधींची जी सामान्य कल्पना आहे, त्या कल्पनेनुसार मन हें अनुभूतीचें

 

पान क्र. ३२७

 

साधनरूप इन्द्रिय आहे; जडद्रव्यांत शक्ति जें कार्य करतें, त्या कार्यानें बनलेल्या गोष्टींचा अनुभव आम्हांला आणून देणें, हें आम्हीं सामान्यत: मनाचें कार्य समजतों; मन स्वत: कांहीं निर्माण करीत असेल तर दुय्यम गोष्टी-शक्तीनें जडद्रव्याचीं जीं रूपें बनविलेलीं असतात, त्या रूपांचा एकमेकांशीं संयोग करून 'नवी' गोष्ट बनविणें, असलें दुय्यम रचनेचें काम मन करूं शकतें व करतें असें आम्ही मानतों; यापेक्षां मन अधिक कांहीं स्वतंत्र निर्मिति करूं शकतें असें आम्ही मानीत नाहीं. पण मनासंबंधींची ही आमची कल्पना आतां खोटी ठरत आहे. आम्हांला मनासंबंधींचें जें नवीन ज्ञान प्राप्त होत आहे आणि नवें भौतिक विज्ञान जे शोध लावीत आहे, त्यावरून आम्हांला हें समजूं लागलें आहे कीं, जडद्रव्य म्हणून जें आहे आणि जडशक्ति म्हणून जी शक्ति जडद्रव्यावर कार्य करून, कांहीं रचना करतांना दिसत आहे, त्या जडद्रव्यांत आणि जडशक्तींत मन गुप्तपणें कार्य करीत आहे; त्या दोघांच्याहि पोटीं अप्रकट मन आहे आणि जी रचना जडशक्तीनें केलेली दिसते, ती त्याच्या पोटीं असलेल्या अप्रकट मनामुळेंच शक्य होते; आम्हांला हें अवगत आहे कीं, जडांत मनाचा आविष्कार होतो. प्रथम जडाचे ठिकाणी मन विविध जीवप्रकारांच्या रूपानें व्यक्त होतें, नंतर पूर्वी घडलेल्या जीवांच्या आश्रयानें अप्रकट मन मानसिक शक्तीचे अनेक प्रकार निर्माण करतें, वनस्पति-जीवनांत आणि प्राथमिक देहधारी प्राण्यांच्या जीवनांत नाडीसंघद्वारां जाणीव काम करूं लागते; ही नाडीमय जाणीव जडाच्या पोटीं असलेल्या अप्रकट मनानें घेतलेलें रूप होय. पुढें कमीअधिक विकसित अशा मनुष्येतर प्राण्यांत आणि स्वत: मनुष्यांत, सारखी विकास पावणारी मानसिक संघटना काम करते. ही मानसिक संघटना अप्रकट मनाचें पुढारलेलें व्यक्त रूप होय. हा जो अप्रकट मनाचा आविष्कार क्रमवारीनें जडांत होत असतो, तो अप्रकट मन स्वत: करीत असतें. जडद्रव्य किंवा जडशक्ति ही कांहीं मनाला वर ढकलीत नाहीं--जड तें जड. उलट जडशक्ति ही, मनाचें एक शक्तिरूप आहे असेंच आपल्याला आढळून येईल. जडद्रव्य हें जडशक्तीनें घेतलेलें द्रव्यरूप आहे. मुळांत जडद्रव्य ही वस्तु नाहीं; मुळांत जडशक्ति आहे असें भौतिक विज्ञानाचें अलीकडे सिद्ध झालेलें तत्त्व आहे. या तत्त्वाचें संशोधन होऊन, जडशक्ति म्हणून मुळांत नाहींच, मुळांत मन आहे आणि त्याचें एक रूप जडांत काम करणारी शक्ति हें आहे, असा सिद्धान्त सिद्ध होईल असें मानण्यास

 

पान क्र. ३२८

 

भरपूर जागा आहे. जडशक्ति किंवा भौतिक शक्ति म्हणून जी दिसते, ती वस्तुत: ईश्वरी इच्छेची अप्रकट क्रिया आहे; आमच्यामध्यें काम करणाऱ्या इच्छाशक्तीला ज्ञानाचा आधार असतो, पण तो अर्धवट ज्ञानाचा, पूर्ण ज्ञानाचा नव्हे; भौतिक शक्ति मात्र पूर्ण अज्ञानाच्या अंधारांत काम करतांना दिसते. या दोन शक्ती तत्त्वत: एक आहेत; जडवादी विचारसरणीला हे ऐक्य वा तादात्म्य पटलेलें आहे. खालून केलेल्या जड वस्तूंच्या संशोधनानें व सहज-प्रेरणेनें, जडवाद्यांना हें ऐक्य मान्य झालेलें आहे. हेंच तादात्म्य वरून शोध घेत घेत आध्यात्मिक ज्ञानानें फार पूर्वीं सिद्ध केलेलें आहे. तेव्हां आम्हांला असें म्हणतां येतें कीं, कार्यकारी निसर्गशक्ति किंवा प्रकृति आपल्यांतून व्यक्त करून, तिच्याद्वारां अप्रकट मनानें किंवा बुद्धीनें हें भौतिक विश्व निर्माण केलें आहे.

परंतु मन ही स्वतंत्र वस्तु नाहीं, सत्यमय जाणिवेचें किंवा अतिमानसाचें अन्तिम कार्य, अन्तिम व्यापार म्हणजेच मन होय हें आपल्याला ठाऊक आहे. तेव्हां मन असेल तेथें अतिमानस असलेंच पाहिजे हें आपणाला समजतें. विश्वाच्या अस्तित्वाची खरी निर्माणकर्ती वस्तु अतिमानस किंवा सत्यमय जाणीव होय. आपली जाणीव अंधारमय करून, मन हें जेव्हां अतिमानसापासून विभक्त होतें, तेव्हां देखील मन ज्या क्रिया करतें, त्या क्रियांच्या पोटीं अतिमानसाची विशाल कर्तबगारी उपस्थित असते. मन ज्या कांहीं रचना करतें, त्या रचनांचे अन्योन्यसंबंध व्यवस्थित ठेवावे, कोणत्याहि रचनेच्या पोटीं जें अटळ फळ असेल, तें फळ विकासक्रमानें योग्य वेळीं उदयास आणावें, विशिष्ट योग्य बीजापासून विशिष्ट योग्य वृक्ष अस्तित्वांत आणावा, हें सर्व काम मनाच्या क्रियांच्या पोटीं असलेली गुप्त अतिमानसिक कर्तबगारी करीत असते. जड भौतिक शक्ति ही अंधारमय, प्रेरणाहीन व बुद्धिहीन असतांहि, त्या शक्तीचे व्यापार, हें नियमांनीं बांधलेलें, व्यवस्थायुक्त, योग्य संबंधांनीं युक्त असलेलें असें विश्व परिणामत: अस्तित्वांत आणतात; अव्यवस्थित व अकारण आकस्मिक घटनांनीं भरलेलें असें गोंधळाचें विश्व अस्तित्वांत येऊं देत नाहींत, या घटनेलाहि मनाच्या पोटीं असलेलें अतिमानसच कारण होय. अर्थात् ही जी व्यवस्था व हे जे योग्य संबंध विश्वांत गुप्त अतिमानसिक क्रियेनें स्थापित होतात, ते आदर्श सर्वोत्तम प्रकारचें नसतात. मनाचा व अतिमानसाचा जिव्हाळ्याचा संबंध जर कायम टिकला असतां, मन आपल्या जाणिवेनें अतिमानसापासून विभक्त झालें नसते, तर असे आदर्श

 

पान क्र. ३२९

 

संबंध निर्माण होऊं शकले असते. विभाग पाडण्यांत वाकबगार असलेल्या मनाच्या व्यापाराला अनुरूप अशीच, आज विश्वांतील व्यवस्था आहे; मनाच्या विभागणीच्या क्रियेनें वस्तूंचा व व्यक्तींचा अलगअलगपणा, विरोध, द्वंद्वमय पक्ष, एकाच सत्याचे, सद्‌वस्तूचे अन्योन्यविरोधी पक्ष उत्पन्न होतात; या सर्व मनोव्यापाराला अनुरूप अशी, अर्थात् सर्वश्रेष्ठ आदर्श व्यवस्थेहून निराळी, खालच्या दर्जाची व्यवस्था आज जगांत आहे. दिव्य ईश्वरी जाणीव स्वतःची द्वंद्वमय विभागणी करण्याचा निर्णय घेते; या निर्णयानंतर त्याला अनुरूप अशी सत्यमय कल्पना ती अस्तित्वांत आणते आणि या कल्पनेचा स्वाभाविक अटळ परिपाक म्हणून व्यवहारांत आपलें कनिष्ठ सत्य, विविध संबंधांची निर्मिति हें सत्य प्रस्थापित करतें; कारण विश्वांत सत्याचा किंवा सत्यनियमाचा असा स्वभाव आहे कीं, मूळ अस्तित्वांत जें अन्तर्भूत असतें, मूळ सद्‌वस्तूच्या स्वभावांत आणि सारभागांत जें न्यायतः अगोदरच असतें, दिव्य ईश्वरी ज्ञानाला वस्तूचा जो स्वभाव आणि स्वधर्म म्हणून स्पष्ट दिसतो त्यांत जें लपलेलें असतें, तें तत्त्व व्यक्त करावयाचें; त्या तत्त्वाचा त्याच्या धर्मानुसार आविष्कार व व्यवहार करावयाचा. अर्थात् या कार्यांत समग्र सत्यमय जाणीव ही विशिष्ट सत्यमय कल्पनेच्या पाठीमागें राहून तिचें व्यावहारिक रूपांतर नीटपणें होण्याच्या कामीं आपल्या सर्वश्रेष्ठ शासनाधिकाराचा उपयोग करीत असते. या सर्व ईश्वरी क्रियेचें सूत्रमय वर्णन एका उपनिषदांत (ईशोपनिषदांत) आलेलें आहे. थोडक्या साक्षात्कारी शब्दांत ज्ञानाचें विश्व आमच्या हातीं देणारीं जीं अनेक अद्‌भूत सूत्रें उपनिषदांत सांपडतात, त्यापैकींच पुढील सूत्र आहे : कविर्मनीषी परिभू: स्वयंभूर्याथातथ्यतोऽर्थान् व्यदधात् शाश्वतीभ्य: समाभ्य: ।। परमात्मा स्वयंभू आहे, द्रष्टा आहे, चिंतनशील आहे; चिंतनशील द्रष्टेपणानें तो सर्वत्र सर्व स्थलें आपल्या विभूतींनीं व्यापून आहे; त्यानें आपल्या विभूतिमय विस्तारांत सर्व वस्तू व्यवस्थेनें मांडलेल्या आहेत; ही व्यवस्था शाश्वत कालाची आहे, त्या त्या वस्तूचें जें सत्य-स्वरूप आहे, त्या सत्यस्वरूपानुसार त्यांची त्यांची व्यवस्था त्या परमात्म्यानें शाश्वतकालीन अशी लावलेली आहे. (ईशोपनिषद्, ८)

आजपर्यंत जेवढा विश्वविकास वास्तवांत घडून आलेला आहे, त्या वास्तव विकासाच्या दृष्टीनें आमचें विश्व मन-प्राण-शरीर या तीन भागांचें--त्रिभागात्मक--आहे. जडामध्यें जो प्राण अंतर्हित होता, तो विचार-

 

पान क्र. ३३०

 

प्रवण आणि मानसिक जाणीवयुक्त अशा जीवनांत आतां वावरत आहे. विकासक्रमाच्या नियमानुसार या जीवनाचें रूप त्यानें आतां घेतलेलें आहे आणि या मनांत अतिमानस अंतर्हित असतें; तेव्हां जें मनाच्या पोटीं आहे, तें अर्थात् प्राणाच्या व जडाच्याहि पोटीं आहेच हें आपण जाणतो. अतिमानस हेंच मन, प्राण, शरीर या तिघांचें उगमस्थान व शासक आहे हेंहि आपण जाणतों. शरीर-प्राण-मन यांत अंतर्हित, गुप्त असलेलें हें जें अतिमानस, तेंहि विकासक्रमाच्या नियमानुसार व्यक्त झालेंच पाहिजे हेंहि उघड आहे. तेव्हां आमचें आजचें वास्तव विश्व जरी त्रिभागात्मक आहे, तरी उद्यां, भविष्यकाळी, तें चतुर्भागात्मक व्हावयाचें आहे हें आपण लक्षांत ठेवलें पाहिजे. विश्वाच्या मुळाशीं बुद्धितत्त्व (Intelligence) असलें पाहिजे असें आम्ही म्हणतों याचें कारण, विश्वांत आम्हांला सर्वश्रेष्ठ असें जें तत्त्व प्रतीतीस येतें तें बुद्धितत्त्व होय. आमच्या सर्व कार्याचें आणि निर्मितीचें स्पष्टीकरण करणारें आणि नियंत्रण करणारें तत्त्व 'बुद्धि' हें आहे असें आम्हांस दिसतें. म्हणून आम्ही असें अनुमान करतों कीं, जर विश्वांत चेतना, जाणीव असेल, तर त्या जाणिवेचें स्वरूप बुद्धि, मानसिक जाणीव हें असलें पाहिजे. परंतु बुद्धीहून श्रेष्ठ असें तत्त्व (सत्य) मूळ सद्वस्तूंत आहे; या श्रेष्ठ तत्त्वाकडून (सत्याकडून) जें कार्य घडतें, तें आपल्या शक्तीनुसार बघणें, त्यावर मनन करणें आणि त्याचा व्यवहारांत उपयोग करणें हें बुद्धीचें काम आहे. तेव्हां बुद्धीच्या मागें राहून काम करणारी जी श्रेष्ठ सत्याची शक्ति आहे, ती त्या श्रेष्ठ सत्याला अनुरूप अशी, मानसिक जाणिवेहून वेगळी व तिजहून श्रेष्ठ प्रकारची जाणीव असली पाहिजे, हें उघड आहे. तेव्हां विश्वाच्या मुळासंबंधाची आमची कल्पना आम्हीं बदलली पाहिजे. अप्रकट मन किंवा बुद्धि विश्वरचना करीत नाहीं, तर ही रचना अतिमानसाकडून केली जाते, हें आपण आतां लक्षांत घेतलें पाहिजे. मनाच्या पोटीं अतिमानस गुप्त असतें, तें मनाला पुढें करतें; अतिमानसाच्या ज्ञानमय इच्छाशक्तीचें क्रियाशील असें त्याच्या लगतचें खास स्वरूप म्हणजे मन होय. हें मन दर्शनीं जडशक्तींत अप्रकट रूपानें असतें; ही दर्शनीं जडशक्ति म्हणजे अस्तित्वघटक द्रव्याच्या पोटीं असणारी गुप्त इच्छाशक्तीच होय; या गुप्त इच्छाशक्तीनें भरलेल्या जडशक्तीचा, कार्यकारी निसर्गशक्तीच्या किंवा प्रकृतीच्या रूपानें व नांवानें उपयोग करून, अप्रकट अतिमानसाकडून आपलें हें भौतिक विश्व याप्रमाणें निर्माण केलें जातें.

 

पान क्र. ३३१

 

विश्वविकासाच्या क्रमांत जडांत गुप्त असलेलें (अतिमानसगर्भ) मन, प्रथम शक्तीच्या एका विशिष्ट रूपानें--प्राणशक्तिमय जीवनाच्या रूपानें--व्यक्त होतें हें आपण पाहिलें. हें जीवन म्हणजे काय वस्तु आहे? अतिमानसाशीं या जीवनाचें (Life) नातें कोणतें आहे? सच्चिदानंद या त्रिमुखी मूळ सत्याचें निर्मितीचें कार्य हें, सत्यमय कल्पना, सत्यमय जाणीव यांच्याद्वारां चालत असतें--या सच्चिदानन्दाशीं आमच्या जीवनाचा संबंध कोणता आहे? सत्, चित्, आनंद या तीन तत्त्वांपैकीं कोणत्या तत्त्वांतून आमचें जीवन उदयास येतें? सत्याच्या किंवा भ्रमाच्या, दिव्य किंवा अदिव्य स्वभावधर्माचा परिपाक म्हणजे आमचें जीवन असेल, तर तो स्वभावधर्म, ती निकड कोणती असूं शकेल? प्राचीन काळापासून शतकानुशतकें एक आवाज कायम उठत आहे कीं, ''जीवन हें दोषमय आहे, आभासमय आहे, भ्रांतिमय आहे, वेडेपणानें भरलेलें आहे. शाश्वत आत्म्याची शांति आपणास हवी असेल, तर या जीवनांतून पळून जाणें हाच एक मार्ग आहे'' -- या आवाजांत, या उद्‌घोषांत कांहीं तथ्य आहे काय? तथ्य असेल तर हें असें कां केलें गेलें आहे? शाश्वत परमात्म्यानें आपणा- स्वतःवर म्हणा किंवा आपल्या मायेनें (सर्वांना मोह पाडणाऱ्या भयंकर मायेनें) उत्पन्न केलेल्या जीवांवर म्हणा, हें दोषमय, भ्रांतिमय वेडेपणाचें जीवन, कारण नसतां कां लादलें आहे? किंवा हा शतकानुशतकाचा उद्‌घोष खोटा तर नाहीं? विश्वांतील विविध जीवनाच्या रूपानें कोणतें तरी दिव्य ईश्वरी तत्त्व प्रकट झालेलें आहे अशी तर गोष्ट नाहीं? शाश्वत परमात्मा आनंदमय आहे, त्या सनातन पुरुषाच्या आनंदशक्तीला व्यक्त व्हावयाची इच्छा झाली आणि म्हणून त्या शक्तीनें काल-स्थल-अंकित क्षेत्रांत उडी घेतली असें तर नव्हे? विश्वांत अगण्य लोक आहेत आणि त्या अगण्य लोकांत अब्जावधि प्रकारचे जीव सारखे अस्तित्वांत येत आहेत, हा सारा प्रकार सनातन परमात्म्याची आनंदलीला तर नव्हे?

पृथ्वीवर जें जीवन व्यक्त होत आहे, त्याचा अभ्यास केला असतां असें दिसतें कीं, जडद्रव्य हें पार्थिव जीवनाचा पाया आहे आणि हें जीवन तत्त्वत: एकच एक असलेल्या विश्वशक्तीचें रूप आहे; 'विश्वशक्तीचा धन आणि ऋण दोनहि प्रकारचा अन्योन्यपूरक वेगवान् प्रवाह' असें या जीवनाचें रूप आहे; विश्वशक्ति अविरतपणें काम करीत आहे आणि या कामाचें स्वरूप रूपें घडणें, त्यांच्यांत चेतनेचा प्रवाह सारखा चालूं ठेवून त्यांना चैतन्यमय करणें, रूपांसाठीं लागलेलें जडद्रव्य सारखें वर खालीं

 

पान क्र. ३३२

 

करून, जुनें निकामी झालेलें दूर करून, त्याच्या जागीं नवें कार्यक्षम द्रव्य घालून रूपें कायम ठेवणें, या प्रकारचें असतें; हें चैतन्यमय रूपरचनेचें आणि रूपद्रव्याची काढघाल करून रूपरक्षण करण्याचें, अविरत चाललेलें विश्वशक्तीचें कार्य म्हणजे पृथ्वीवरील जीवन होय. या जीवनकथेवरून हें लक्षांत येईल कीं, आम्ही मरण आणि जीवन यांत जो स्वाभाविक विरोध मानतों, ती आमच्या मनाची चूक आहे. असा विरोध वस्तुत: नसतांना दर्शनी गोष्टींनीं फसून, आमचें मन असे अनेक खोटे विरोध विश्वाच्या अविभाज्य एकतेंत सारखें उभें करीत असतें. हे विरोध अर्थात् आंतरिक सत्याच्या दृष्टीनें खोटे असतात; वरवरचा व्यवहार फक्त पाहिला तर मात्र हे विरोध 'विरोध' म्हणून मान्य करावे लागतात. असो. तेव्हां मरण ही एक जीवनाची अंगभूत प्रक्रिया आहे, जीवनरूप क्रियेचा मरण हा एक अंश आहे, स्वतंत्र रीतीनें मरणाला कांहीं अस्तित्व नाहीं, त्यांत सत्यता नाहीं. जीवनाची अविरत प्रक्रिया म्हणजे रूपघटक द्रव्य विघटित करून बाजूला टाकणें आणि त्या दूर केलेल्या द्रव्याच्या जागीं नवें द्रव्य संघटित करून घालणें व या रीतीनें विशिष्ट रूप रक्षण करणें किंवा तें रूप निकालांत काढून विघटित करून इतर द्रव्यांतून नवें रूप बनविणें-- या जीवन प्रक्रियेंत ''मरण'' म्हटली जाणारी विघटनप्रक्रिया अंतर्भूत आहे. सामान्यत: रूपाच्या जीवनावस्थेंत रूपद्रव्याचें जें विघटन (व संघटन) हळूं हळूं चालूं असतें, ते ''मरण'' प्रक्रियेंत जोरानें व त्वरेनें होतें एवढेंच. विविध अनुभवांसाठीं जीवनाला विविध रूपांची नितांत आवश्यकता असते--मरणरूपी शीघ्र द्रव्यविघटनाची क्रिया जीवनाच्या वरील आवश्यकतेला साहाय्यक म्हणून घडून येत असते. शारीरिक मृत्यूच्या क्रियेंतसुद्धां जीवन कांहीं मरत नाहीं; फक्त त्याच्या एका रूपाचें द्रव्य मोडतोड करून, त्याच्यासाठी निश्चित केलेल्या दुसऱ्या रूपांच्या बनावटीसाठीं वापरण्यांत येतें. बाह्य शारीर आकाराच्या आंत मानसिक शक्ति, आत्मिक शक्ति असते, तीहि जीवशक्तीप्रमाणेंच अमर असते व मोडतोडीनें शरीर निकामी झालें म्हणजे तीहि तें शरीर सोडून दुसरीं शरीरे धारण करण्यासाठीं वाटचाल करूं लागते आणि योग्य वेळीं दुसरीं शरीरें धारण करते. सर्व कांहीं नवीं नवीं रूपें धारण करतें, नाश म्हणून कशाचाहि होत नाहीं, निसर्गाचा हा नियम सर्व गोष्टींना सारखाच लागूं असणारा आहे

पृथ्वीवरील जीवनाच्या या कथेवरून असा निष्कर्ष निघतो कीं,

 

पान क्र. ३३३

 

जीवनशक्ति किंवा गतिमय शक्ति सर्वव्यापी अशी एकच आहे; तिचा भौतिक विभाग हा तिचा सर्वांत बाहेरचा गतिप्रकार आहे; भौतिक विश्वांत जीं कांहीं रूपें आहेत, तीं सर्व रूपें या एका सर्वव्यापी क्रियाशील जीवनशक्तीनें निर्माण केलीं आहेत. ही एकच एक जीवनशक्ति, अविनाशी आणि नित्य स्वरूपाची असल्यानें, विश्वाची मूर्ति सर्वच्या सर्व नष्ट झाली, तरी ती शक्ति नष्ट होणार नाहीं; ती कायम काम करीत राहील आणि जुन्या विश्वाच्या जागीं नवें विश्व निर्माण करील. जीवनशक्तीपेक्षां श्रेष्ठ असणाऱ्या शक्तीनें तिला अडविलें किंवा तिनें स्वतःच काम थांबविण्याचें ठरविलें तर गोष्ट निराळी--एरवीं निसर्गनियमाप्रमाणें तिनें विश्वाची उभारणी सारखी करीत राहणें हें अटळ आहे. तेव्हां विश्वांत रूपांची बांधणी, राखण आणि विनाश करणारी शक्ति म्हणजे जीवनशक्ति असें ठरतें; पृथ्वीचें रूप हें या जीवनशक्तीचें एक व्यक्तरूप आहे; पृथ्वीवर उगवणाऱ्या वनस्पती हें त्याच शक्तीचें रूप आहे; वनस्पतींतील जीवन-शक्ति किंवा एकमेकांची जीवनशक्ति भक्षून, पचवून आपलें अस्तित्व टिकविणारे प्राणी, या जीवनशक्तीचींच रूपें आहेत. जें कांहीं सर्व अस्तित्वांत आहे, तें सर्वव्यापी जीवन आहे; जडाचेंहि रूप धारण करणारें सर्वव्यापी जीवन एकच एक आहे. विविध निर्मितीच्या उद्देशानें प्रथम हें जीवन भौतिक जड प्रक्रियेंत जीवनाची प्रक्रिया गुप्ततेनें ठेवील, नंतर मनाच्या खालची संवेदना-शक्ति हें रूप तें धारण करील, नंतर मनानें युक्त अशी प्राणमयता, जीवता हें रूप धारण करील--असा कांहींहि क्रम जीवनशक्तीनें स्वीकारला, तरी 'निर्मितिशील जीवनतत्त्व' हें त्या शक्तीचें मूळ स्वरूप, या सर्व विकासक्रमांत कायम असेल.

असा एक पक्ष पुढें येण्याचा संभव आहे कीं, जीवन म्हणून आम्ही जें ओळखतों, तें हें व्यापक जीवन नव्हे; विश्वशक्तीचा जो विशिष्ट परिणाम आमच्या नेहमींच्या अनुभवांतला आहे आणि जो वनस्पति, मनुष्येतर प्राणी व मनुष्य यांत व्यक्त झाला आहे--परंतु धातु, दगड, वायु यांत जो व्यक्त नाहीं, जो प्राणिवर्गाच्या पेशींत कार्यकारी आहे, पण जो शुद्ध भौतिक अणुपरमाणूमध्यें काम करीत नाहीं--तो विश्वशक्तीचा विशिष्ट परिणाम, आम्ही जीवन या नांवानें ओळखतो. या पक्षाची आतां चिकित्सा करूं. या पक्षानुसार ज्या विश्वशक्तीच्या परिणामाला जीवन हें नांव दिलें जातें, तो परिणाम काय वस्तु आहे, त्याचें स्वरूप काय, त्याचे बरोबर घटक कोणते याचें परीक्षण करून, जड वस्तूचे ठिकाणीं त्याच विश्व-

 

पान क्र. ३३५

 

शक्तीचा जो परिणाम होतो, ज्याला आपण जीवन हें नांव देतो, तो परिणाम आणि हा पक्ष ज्या परिणामाला 'जीवन' हें नांव देत नाहीं तो परिणाम--या दोन परिणामांत काय अंतर आहे तें आपण पाहूं. विश्वशक्तीच्या व्यापाराचीं पृथ्वीवर तीन क्षेत्रें आहेत. प्राणिवर्ग (मनुष्यप्राणी सुद्धां), वनस्पतिवर्ग आणि ज्यांत जीवन नाहीं असें आम्हीं मानतो तो तिसरा केवळ जड भूतवर्ग; आमच्यांतील जीवन आणि वनस्पतींतील जीवन, वनस्पतिजीवन आणि धातुवर्गाचें अ-जीवन--धातुवर्ग ज्या जुन्या खनिजवर्गांत (जड भूतवर्गांत) मोडतो त्या खनिज वर्गाचें किंवा नव्या भौतिक विज्ञानानें शोधून काढलेल्या नव्या रसायन वर्गाचें अ-जीवन (जडत्व)-- यांत काय अंतर आहे त्याचा आतां विचार करूं.

सामान्यत: जीवन याचा अर्थ प्राणिवर्गाचें जीवन असा आम्ही करतों ! हें जीवन हलतें, चालतें, श्वासोच्छ्वास करतें, खातें, सुखदुःख भोगतें, शीतोष्णादि ओळखतें, इच्छा करतें; वनस्पतीसंबंधानें जेव्हां जीवन हा शब्द आम्ही उपयोगांत आणतों, तेव्हां तो पुष्कळ अंशीं अलंकारिक रीतीनें; वनस्पति-जीवन ही शुद्ध जड-भौतिक प्रक्रिया आहे; त्यांत जीव-प्रक्रिया जवळजवळ नाहींच असा समज अलीकडे अलीकडे देखील होता. जीवनाचा श्वासोच्छ्वासाशीं जोडलेला संबंध--जीवन म्हणजे श्वासोच्छ्वास हा समज--फार जुना आहे : प्रत्येक भाषेंत अशा प्रकारची समजूत व्यक्त झालेली दिसते; श्वासोच्छ्वास म्हणजे जीवन हें सूत्र खरें धरावयाचें असल्यास श्वासोच्छ्वासाचा अर्थ बदलावा लागेल. असो. हें उघड आहे कीं, स्वयंचलन, स्थलान्तर करणें, श्वासोच्छ्वास करणें, खाणें पिणें, या क्रिया म्हणजे खुद्द जीवन नव्हे, तर त्या जीवनाकडून घडणाऱ्या जीवन-साहाय्यक क्रिया-प्रक्रिया आहेत; आमची जीवनशक्ति म्हणजे सतत चालना देणारी शक्ति होय. या शक्तीच्या उत्पत्तीसाठीं किंवा कार्यप्रवृत्तीसाठीं साधनभूत गोष्टी म्हणून, तसेंच आमचें द्रव्यघटित अस्तित्व टिकविण्यास जी द्रव्याची मोडतोड आणि पुनर्रचना अवश्य असते ती करण्यासाठीं साधनसंभार म्हणून, खाणेंपिणें, श्वासोच्छ्वास वगैरे गोष्टींचें महत्त्व आहे. तथापि श्वासोच्छ्वास, खाणेंपिणें या गोष्टी उपलब्ध नसतांहि आमची जीवनशक्ति टिकूं शकते, इतर साधनांनीं टिकवितां येते, ही गोष्ट लक्षांत घेणें अवश्य आहे. श्वासोच्छ्वास, हदयाचे ठोके किंवा याचेपूर्वीं अवश्य समजल्या जाणाऱ्या दुसऱ्या कांहीं क्रिया कांहीं काळ थांबवूनहि मानवी जीवनशक्ति मनुष्याच्या शरीरांत टिकून

 

पान क्र. ३३५

 

राहते; आणि या शक्तीबरोबर त्याची जाणीवहि पूर्णपणें टिकून राहते, ही गोष्ट प्रयोगांनीं सिद्ध झालेली आहे. वनस्पतींच्या बाबतींत असा पुरावा पुढें आला आहे कीं, त्यांचा भौतिक जीवनक्रम आमच्या भौतिक जीवनक्रमासारखाच आहे, त्या जीवनाची संघटन-व्यवस्थाहि बाह्यतः वेगळी भासली, तरी आमच्यासारखीच आहे--मात्र आमच्याप्रमाणें वनस्पती ही प्रतिक्रिया जाणून करतात असें आम्हांला अद्यापि म्हणतां येत नाहीं.

नुकतेच जे शोध* लावले गेले आहेत, त्यांत एका सुविख्यात भारतीय विज्ञानकोविदानें या गोष्टीकडे विशेष लक्ष वेधलें आहे कीं, जीवनाची अचूक निशाणी म्हणजे प्रयोग-विषयाची बाह्य प्रेरणेला आंतून होणारी प्रतिक्रिया ही होय. या वैज्ञानिकानें वनस्पति-जीवनावर विशेष प्रकाश टाकला आहे; परंतु ही गोष्ट लक्षांत ठेवणें अवश्य आहे कीं, धातू हेहि वनस्पतींप्रमाणें प्रतिक्रिया दाखवितात हें या वैज्ञानिकानें सिद्ध केलें आहे. वनस्पती आणि धातू स्वतःमधील जीवनाची भावात्मक अवस्था व अभावात्मक अवस्था (अर्थात् मरण) या दोन्ही अवस्था, विशिष्ट प्रेरणांना विशिष्ट प्रतिक्रिया दाखवून आमच्या नजरेस आणतात. वनस्पतींत जीवन आहे या संबंधींचा पुरावा भरपूर आहे. धातूंच्या संबंधांत

-------------------------

*नुकत्याच झालेल्या वैज्ञानिक संशोधनांतील विचार या ठिकाणीं घेतले आहेत. जडांत जीवनाची प्रक्रिया व स्वभावधर्म या संबंधानें आम्हीं मांडलेल्या विचारांना अप्रत्यक्षपणें पुष्टिदायक म्हणून ते आम्हीं घेतले आहेत. आधुनिक विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांचे प्रांत व चिकित्सापद्धती वेगळ्‌या आहेत. हीं शास्त्रें एकमेकांवर आपले सिद्धांत लादूं शकत नाहींत. तथापि आम्हीं जर हें मान्य केलें कीं, सत्ता (अस्तित्व) आणि निसर्ग यांची अवस्था कोणतीहि असो, त्या सर्व अवस्थांत त्या दोहोंमध्यें असणारें सामान्य सत्य व्यक्त करणारी समान गोष्टींची माला सर्व अवस्थांतून दृग्गोचर होते--आणि हें मान्य करणें युक्तीला, तर्काला धरून आहे--तर असें अनुमान करणें योग्य आहे कीं, विश्वांत जी आदिशक्ति काम करीत आहे, तिची प्रक्रिया आणि स्वभावधर्म यांजवर भौतिक विश्वाचीं सत्यें कांहीं प्रकाश टाकूं शकतील; हा प्रकाश अर्थातच सर्वांगपूर्ण असूं शकणार नाहीं--कारण भौतिक विज्ञान त्याच्या चिकित्सा-क्षेत्रांत अपरिहार्यपणें मर्यादाबद्ध व अपूर्ण असतें, आदिशक्तीच्या अप्रकट क्रियांचा पत्ता त्याला लागूं शकत नाहीं.

 

पान क्र. ३३६

 

तितका भरपूर पुरावा नाहीं; -- तथापि जेवढा पुरावा आहे तेवढा निःसंशय असल्यानें, धातु हे जीवनशक्तियुक्त आहेत असें ठरतें. धातूंमध्यें जीवन आहे; तसेंच तें धातूंच्या जातीचे दुसरे पार्थिव पदार्थ आणि स्वत: पृथ्वी यांतहि गुप्त किंवा प्राथमिक स्वरूपांत असलें पाहिजे, असें अनुमान करणें शास्त्रशुद्ध आहे. पृथ्वी व तिजवरील पदार्थ यांचें जीवनविषयक संशोधन आम्हीं बरेंच लांबवर नेलें, तर आम्हांला असें आढळून येईल कीं, पृथ्वी आणि तिजवर तयार होणारे धातू, त्याचप्रमाणें धातू आणि वनस्पती, तसेंच पृथ्वीचे घटक-अणू व मूलतत्त्वें आणि पृथ्वी यांजमध्यें जीवन हें सारखें, खंड न पडतां, भरलेलें आहे. अणु, पृथ्वी, धातु, वनस्पति अशा पायऱ्यांची जी अस्तित्वाची शिडी आहे, त्या शिडीच्या सर्व पायऱ्यांत जीवन अखंडपणें आहे, वरच्या वरच्या पायरींतील जीवन खालच्या पायरींत गुप्त असतें व विकासक्रमानें आधीं खालच्या व मग वरच्या पायरीवर व्यक्त होत असतें, एवढेंच. जीवन सर्वत्र आहे. तें गुप्त किंवा व्यक्त, संघटित किंवा प्राथमिक स्वरूपाचें, अंतर्हित किंवा विकसित, अशा कोणत्याहि स्वरूपांत असेल, पण तें सर्वत्र आहे, सर्वव्यापक आहे, अविनाशी आहे; केवळ त्याचीं रूपें भिन्न भिन्न असतील, त्याचें संघटन भिन्न ठिकाणीं भिन्न असेल येवढेंच.

प्रेरणा-प्रतिक्रियेच्या सिद्धान्तानुसार जीवन सार्वत्रिक आहे असें ठरतें. पण विशिष्ट भौतिक प्रेरणेला विशिष्ट भौतिक प्रतिक्रिया ही जी जीवनाची खूण आहे, ती श्वासोच्छ्वास, स्थलांतरक्रिया या आमच्या जीवनक्रियांप्रमाणेंच अंतर्गत जीवनशक्तीची बाह्य निशाणी आहे, हें आपण ध्यानांत ठेवलें पाहिजे. प्रयोग करणारी व्यक्ति प्रयोगविषयावर (उदाहरणार्थ, विशिष्ट वनस्पतीवर) असामान्य प्रेरकाचा, उत्तेजकाचा, प्रयोग करते आणि याला उत्तर म्हणून प्रयोग-विषयांतून स्पष्ट प्रतिक्रिया झालेल्या आपल्या नजरेस येतात. या स्पष्ट प्रतिक्रिया प्रयोगविषयांतील जीवनशक्तीचा निःसंदेह पुरावा म्हणून आपण मांडतों व समजतों. पण वनस्पति जेव्हां प्रयोगविषय नसते, तेव्हांहि ती अस्तित्वांत असतेच; आणि तिच्या अस्तित्वाच्या सर्व काळांत तिच्यावर परिसरातून सारखा प्रेरकांचा, उत्तेजकांचा, मारा चालूं असतो आणि या माऱ्याला उत्तरादाखल तिजकडून सारखी अविरत प्रतिक्रिया होत असते; याचा अर्थ त्या वनस्पतीचें ठिकाणीं सारखी टिकणारी शक्ति असते आणि या शक्तींत त्या वनस्पतीच्या परिसरांतून होणाऱ्या परिसरीय शक्तीच्या माऱ्याला योग्य उत्तर

 

पान क्र. ३३७

 

देण्याचें सामर्थ्य असतें. वनस्पतीवर उत्तेजकाचा मारा करणें याचा अर्थ गतिमान् शक्ति आघातार्थ तिच्यावर घालणें आणि वनस्पतीकडून प्रतिक्रिया होणें याचा अर्थ त्या आघाताला वनस्पतींतील गतिमान्, संवेदनशील व क्रियाशील शक्तीकडून उत्तर मिळणें असा होतो. प्रयोगविषय केलेल्या वनस्पतींत बाहेरच्या प्रेरणेचें कंपनयुक्त स्वागत होतें व त्या प्रेरणेला वनस्पतीकडून योग्य उत्तर मिळतें; तसेंच त्या वनस्पतींत वाढण्याची आणि अस्तित्वांत टिकून राहण्याची इच्छा व्यक्त होते. त्या वनस्पतीच्या रूपांत गुप्तपणें जाणीवयुक्त-शक्ति राहत आहे, त्या शक्तीचें मनाच्या उदयापूर्वींचें भौतिक संघटन, प्राणनिष्ठ (जीवननिष्ठ) संघटन झालेलें आहे हेंच या सर्व गोष्टी दर्शवितात. वनस्पतिविषयक व इतर प्रयोगांवरून एकंदर वस्तुस्थिति पाहिली, तर ती अशी दिसते कीं, विश्वांत जी गतिमान् क्रियाशील शक्ति सारखी वावरत आहे, ती शक्ति नानाविध सूक्ष्म व स्थूल भौतिक पदार्थांचीं रूपें घेते; प्रत्येक भौतिक पदार्थांत, वनस्पतींत, प्राण्यांत, धातूंत ही सारखी गतिमान् असलेली विश्वशक्ति सांठविली जाते व ही सांठविलेली शक्ति सारखी क्रियाशील राहते; विश्वांत मोकळेपणें वावरणारी शक्ति आणि प्रत्येक पदार्थात भरलेली तीच शक्ति यांच्या विशिष्ट अन्योन्य-संपर्कानें, अन्योन्य विनिमयानें, 'जीवन' म्हटली जाणारी प्रक्रिया तयार होते. क्रियाशील जीवनशक्तीचें कार्य म्हणजे, मोकळ्‌या व पदार्थगत विश्वशक्तीच्या प्रकारांचा अन्योन्यसंपर्क व अन्योन्यव्यवहार किंवा जीवनप्रक्रिया. भौतिक, प्राणिक किंवा जीवनिक आणि मानसिक क्रियाशील शक्ति अशीं विश्वशक्तीचीं भिन्न भिन्न क्रियाशील रूपें आहेत. अ-क्रिय किंवा स-क्रिय एकच एक विश्वशक्ति, विश्वांतील सर्व घडामोडींचें मूळ आहे.

एखादें रूप मरणाधीन झाल्याचें दिसलें, तरी ही सर्वव्यापक विश्वशक्ति अ-क्रिय रूपानें त्या रूपांत उपस्थित असते; तिचीं व्यक्त जीवनकार्यें स्थगित झालेलीं असतील, कायमचीं बंद होणार असतील, तरीपण ही शक्ति तेथें अ-क्रिय स्वरूपांत असतेंच. मरणाधीन झालेलें जीवरूप कांहीं मर्यादेच्या आंत पुन्हां जीवनांत आणतां येतें; जीवनाचीं संवयीचीं कार्यें, प्रेरणेला प्रतिक्रिया देणें, देहांत क्रियाशील शक्तीचा प्रवाह सारखा चालत राहणें -- हीं व इतर स्थगित झालेलीं कार्यें उत्तेजकाच्या माऱ्यानें कांहीं मर्यादेपर्यंत पुन्हां सुरू करतां येतात; याचा अर्थ दर्शनीं मरणानंतरहि शरीरांत जीवनशक्ति उपस्थित होती; फक्त या शक्तीच्या नेहमींच्या

 

पान क्र. ३३८

 

क्रिया बंद झाल्या होत्या इतकेंच. 'जीवन म्हणून जी स्वतंत्र वस्तु आहे, ती मरणानें शरीराच्या सर्वस्वीं बाहेर जाते आणि शरीरावर कोणीं उत्तेजकाचा मारा केला असतां, तो मारा या वस्तूला समजतो (समजतो कसा? हा प्रश्न आहे) आणि मग ही 'जीवन' नांवाची शरीराबाहेर गेलेली वस्तु शरीरांत परत येते,' अशी कोणी कल्पना करतात; पण ही कल्पना बुद्धीला न पटणारी आहे. मूर्च्छारोगांत जीवनशक्तीच्या बाह्य खुणा, बाह्य शारीरक्रिया बंद होतात; पण मन जागृत आणि स्वत्वपूर्ण असतें, फक्त त्याला शारीर हालचाली (बाह्य आघातानुरूप) शरीराकडून करवितां येत नाहींत. अशा स्थितींत मनुष्य असतां, तो शरीरदृष्ट्या मरण पावला आहे आणि मनानें जिवंत आहे, अर्थात् जीवन शरीर सोडून गेलें आहे आणि मन अद्यापि शरीरांत आहे असें म्हणणें सयुक्तिक नाहीं, वस्तुस्थितीस धरून नाहीं; मन क्रियाशील आहे, परंतु त्याला शारीर क्रिया घडवितां येत नाहींत, त्या तात्पुरत्या स्थगित झाल्या आहेत, असें म्हणणेंच वस्तुस्थितीस धरून होईल.

समाधीच्या कांहीं प्रकारांतहि शारीर क्रिया आणि मनाच्या बाह्य क्रिया स्थगित होतात व या क्रिया कांहीं बाबतींत बाहेरच्या प्रेरणेनें आणि सामान्यत: बाहेरची प्रेरणा नसतां, आंतूनच स्वयंप्रेरणेनें पुन्हां चालूं होतात असा अनुभव आहे. अशा बाबतींत असें घडतें कीं, वरवर व्यक्त कार्य करणारी मानसिक शक्ति अन्तर्मनांत ओढून घेतली जाते, त्याचप्रमाणें व्यक्त कार्य करणारी जीवनशक्ति क्रियाहीन जीवनशक्तींत ओढून घेतली जाते; आणि हा समाधिस्थ मनुष्य नेणिवेच्या अस्तित्वक्षेत्रांत पडून राहतो किंवा तो केवळ बाह्य जीवनाला नेणिवेच्या क्षेत्रांत ठेवून, आपलें आंतर-जीवन अतिमानसाच्या क्षेत्रांत वर नेतो व तेथील व्यवहारांत पडतो. तें कसेंहि असो. सध्यां लक्षांत घ्यावयाचा मुद्दा हा कीं, शरीरांत गतिमान् जीवनशक्ति राखण्याचें कार्य जी महान् शक्ति करते, ती कोणतीहि असो, ती समाधिस्थ मनुष्यांत आपलीं बाह्य कार्यें स्थगित करते, पण शरीररूपी संघटित द्रव्यरचनेंत उपस्थित असते--कांहीं अंशीं अक्रिय स्थितींत उपस्थित असते आणि बाह्य प्रेरणेनें किंवा स्वयंप्रेरणेनें ती पुन्हां काम करूं लागते. परंतु स्थगित क्रिया शरीराच्या सामान्य स्थितींत पुन्हां सुरूं करतां आल्या, तरी जर शरीर निकामी करण्यासारखी जखम वगैरे शरीराला झाली किंवा शारीरद्रव्याची अखेरची मोडतोड सुरू झाली, तर स्थगित क्रिया पुन्हां सुरू करतां येत नाहींत. मोडतोडीच्या प्रक्रियेनें असें होतें कीं,

 

पान क्र. ३३९

 

जीवनप्रक्रिया निर्माण करणारी व कायम ठेवणारी जी अंतर्गत महान् शक्ति, परिसरांतून येणाऱ्या शक्तीच्या आघाताला प्रत्युत्तर देऊन, आंतल्या आणि बाहेरच्या शक्तींचें अन्योन्य संमीलन करून जीवनप्रक्रिया निर्माण करीत होती व कायम ठेवीत होती ती आतां उत्तर देण्याच्या स्थितींत राहत नाहीं, बाह्य प्रेरणा ती अगदीं जडवत् अंगावर घेते. या घटनेचें कारण असें असतें कीं, शरीरद्रव्याचें संघटन मोडून, द्रव्य मोकळें करण्यांत शरीरांतील ही जीवनशक्ति खर्च होत असते. व्यक्त जीवनप्रक्रिया यामुळें बंद होते. शरीरद्रव्य मोकळें करण्याचा हेतु असा असतो कीं, त्या द्रव्यानें आपल्या मूळ अणु-परमाणु-स्वरूपांत शरीरांतून निघून जाऊन, दुसरीं शरीरें बनविण्यांत भाग घ्यावा. विश्वशक्तीच्या पोटीं असलेली विश्वात्म्याची जी इच्छाशक्ति शरीर-द्रव्य एकत्र करून, शरीर बनवून, तें रक्षण करीत होती, ती आतां शरीर संघटनाचें काम रद्द करून, शरीरद्रव्याचें विघटन करावयास लागते; यामुळें शरीराचें मरण अटळपणें ओढवतें. विश्वात्म्याच्या इच्छेनें शरीरद्रव्याचें अंतिम विघटन निश्चित होईपर्यंत शरीराला मरण येऊं शकत नाहीं.

तेव्हां, एका विश्वव्यापक शक्तीच्या क्रियाशील व्यवहाराला जीवन म्हणतात; या शक्तीच्या पोटीं मानसिक जाणीव आणि नाडीमय जीवनशक्ति कोणत्या तरी स्वरूपांत किंवा निदान मूलतत्त्वाच्या रूपानें नेहमीं उपस्थित असतात आणि म्हणून स्वभावत: नित्योपस्थित असलेल्या त्या गोष्टी आमच्या विश्वांत, जडद्रव्याच्या बनलेल्या रूपांत विकासक्रमानें व्यक्त व संघटित होतात. विश्वशक्तीनें निर्माण केलेल्या नानाविध रूपांच्यामध्यें एकमेकांकडून एकमेकांना उत्तेजक प्रेरणा देण्याचें व या प्रेरणांना उत्तर म्हणून योग्य प्रतिक्रिया त्यांजकडून घडविण्याचें कार्य हें विश्वशक्तीच्या जीवनलीलेचें स्वरूप असतें. आपण निर्मिलेल्या सर्व रूपांत, ही विश्वशक्ति आपलें कंपनात्मक आंदोलन सारखें अविरत चालूं ठेवीत असते; सर्वत्र वावरणाऱ्या विश्वशक्तींतील क्रियात्मकशक्ति आणि प्राणशक्ति प्रत्येक रूपाकडून सारखी स्वतःचे ठिकाणीं घेतली जात असते आणि स्वतःतून बाहेर फेंकली जात असते; दिल्या व घेतल्या जाणाऱ्या क्रियाशक्तीवर सर्व रूपांचें पोषण होत असतें; शक्तीचें सांठवण असलेलीं रूपें भक्षून किंवा मोकळ्या शक्तीला स्वतःचे ठिकाणीं प्रत्यक्षतः पचवून, विश्वांतील रूपें आपला निर्वाह करतात व पुष्ट होतात. ज्यांत जीवनशक्तीचें संघटन आमच्यांतील नाडीमय संघटनासारखें असतें, किंवा

 

पान क्र. ३४०

 

निदान जीवनाच्या बाह्य संकीर्ण क्रिया आम्हांला स्पष्ट दिसतील असें जीवनसंघटन जेथें असतें, तेथें आम्हांला जीवनक्रिया सहज व लवकर ओळखतां येते. वनस्पतींत जीवन आहे असें आम्ही मान्य करतो, तें याचसाठीं कीं, वनस्पतीच्या जीवनक्रिया आम्हांला स्पष्ट दिसतात. धातु, पृथ्वी, रासायनिक अणु यांत जीवन आहे असें आम्ही मोठ्या प्रयासानें मान्य करतों किंवा मान्य करीत नाहीं तें याचसाठीं कीं, त्यांतील व्यक्त जीवनक्रिया सूक्ष्म असल्यानें आम्हांला फार कष्टानें जाणतां येतात, कांहीं क्रिया तर कांहीं केलें तरी अवगतच होत नाहींत.

व्यक्त जीवन-प्रक्रियांमधील हें अंतर, मौलिक अंतर मानण्याचें कांहीं तर्कशुद्ध कारण आहे काय? आमच्यामधील जीवन आणि वनस्पतिजीवन यांमधील अंतर तपासूं : आम्ही स्थलान्तर करूं शकतों, वनस्पतीमध्यें ही शक्ति नाहीं; पण स्थलांतर करण्याची शक्ति ही कांहीं जीवनशक्तीची सारभूत क्रिया नाही; आम्हांला जाणीवयुक्त संवेदना आहे, वनस्पतींत ती दिसत नाहीं; पण आमच्या नाडीसंघाचेद्वारां  ज्या प्रतिक्रिया होतात, त्या प्रतिक्रियांबरोबर नेहमींच जाणीवयुक्त मानसिक संवेदना असते असें नाहीं. सर्व नाडीगत प्रतिक्रियांबरोबर जाणीवयुक्त संवेदनांची मानसिक प्रतिक्रिया असते असेंहि नाहीं. आतां एवढें खरें कीं, आमच्या नाडीगत प्रतिक्रिया बहुधा मानसिक संवेदनायुक्त असतात; शरीर, नाडी-संघ आणि मन या तिघांनाहि त्यांचें महत्त्व असतें. वनस्पतींमध्यें नाडीगत संवेदनांचीं चिन्हें दिसतात; आम्हांला सुखदुःख, जागृति-सुषुप्ति, आनंद, सुस्ती व थकवा होण्यास वा वाटण्यास ज्या नाडीगत संवेदना कारण होतात, अशा प्रकारच्या संवेदना वनस्पतींमध्यें दिसतात; वनस्पतींचें शरीर या नाडीगत संवेदनांनीं आंतून क्षोभयुक्त होतें; परंतु आमच्यासारख्या मानसिक जाणीवयुक्त संवेदना मात्र वनस्पतींत आढळत नाहींत; परंतु नाडीगत काय किंवा मनोगत काय संवेदना ती संवेदना--आणि जीवनशक्तिगत, नाडीसंघावलंबी संवेदना ही मानसिक जाणीवयुक्त संवेदनेप्रमाणें चैतन्याची खूण आहे, चेतनेचें (जाणिवेचें) एक रूप आहे. कोणी पानांना बोट लावूं लागलें, तर लाजाळूचें लहान झाड पानें मिटून घेतें हें आपण पाहिलें आहे; अशीं लाजाळू झाडें दुसरीहि आहेत; पानें मिटून घेण्याच्या त्यांच्या क्रियेवरून हें दिसतें कीं, त्यांना नको असलेली कांहींतरी आपत्ति आल्याचें त्यांच्या नाडीसंघाच्या द्वारां त्यांना कळतें; अशा झाडांत मानसिक जाणिवेच्या खालीं असलेल्या पातळीवरची (अधोमानसिक अवचेतन)

 

पान क्र. ३४१

 

संवेदना असते असा याचा अर्थ. आमच्यांत देखील अशा अधोमानसिक क्रिया चालतात. मनुष्यांत चालणाऱ्या अधोमानसिक क्रिया, अनुभूति आणि संवेदना नाडीसंघांत घडल्यानंतर आणि नाडीसंघावरील त्यांचा परिणाम नाहींसा झाल्यानंतर पुष्कळ काळानें त्या मनाच्या पातळीवर आणतां येतात. असा पुरावा सारखा वाढत्या प्रमाणावर मिळत आहे कीं, आमच्या जागृत जाणिवेपेक्षां पुष्कळच अधिक व्यापक अर्ध-जागृत जाणीव आमच्यामध्यें आहे; आमच्या जागृत मनापेक्षां आमचें अर्धजागृत मन, अंतर्मन फार मोठें आहे. वनस्पतींत वरचें जागृत मन नाहीं; त्यांतील अधोमानसिक संवेदना कळण्यासाठीं जें पृष्ठवर्ती मन अवश्य आहे, तें मन त्यांच्यांत नाहीं. पण म्हणून, मनुष्य आणि वनस्पति यांत ज्या संवेदनात्मक घटना तत्त्वत: एकरूप आहेत, त्यांच्या एकरूपतेंत कांहीं कमतरता मानण्याचें कारण नाहीं. घटना ज्याअर्थी एकरूप, त्याअर्थीं त्या घटना घडविणारी गोष्टहि एकच असली पाहिजे. अर्थात् वनस्पतींत मनुष्यासारखेंच अर्धजागृत मन, अंतर्मन असलें पाहिजे, असें मानावयास हरकत नसावी; आणि धातूंचा विचार करतां, अर्धजागृत इन्द्रियरूप मनाची प्राथमिक जीवनप्रक्रिया धातूंमध्यें आहे, मात्र त्यांच्यांत वनस्पतींप्रमाणें किंवा आमच्याप्रमाणें नाडीप्रतिक्रिया दाखविणारे शारीर-कंपन आढळत नाहीं, असेंहि मानतां येण्याइतका पुरावा मिळतो; शारीर क्षोभ नसला, तरी धातूचे ठिकाणीं जीवन-प्रक्रिया आढळत असल्यानें, तेथें जीवन आहे असें मानण्यास हरकत नसावी; वनस्पतींत स्थलांतर करण्याची शक्ति नाहीं, म्हणून तेथें जीवन नाहीं असें आम्ही मानीत नाहीं; तशीच गोष्ट धातूच्या बाबतींत समजावी. शारीर स्थलांतर, शारीर क्षोभ या गोष्टी जीवनाचीं चिन्हें असल्या, तरी त्याच केवळ जीवनदर्शक चिन्हें नाहींत. बाह्य उत्तेजक प्रेरणेला आंतून उत्तरादाखल प्रतिक्रिया होणें, हें जीवनचिन्ह धातु, वनस्पति व मनुष्य या सर्वांत सारखें आढळतें, म्हणून जीवन सर्वत्र आहे असें मानणें तर्कशुद्ध आहे.

शरीरांत जाणिवेनें घडणारी क्रिया नेणिवेच्या (Subconscient) प्रांतांत जाते आणि नेणिवेनें घडणारी क्रिया जाणिवेच्या प्रांतांत येते या घटनेचा अर्थ काय? दुसऱ्या कार्यभागांकडे दुर्लक्ष करून, जाणीवशक्ति, तिचा एखादा कार्यभाग करण्यांत एकाग्रतेनें जेव्हां गुंतविली जाते, तेव्हां हा दुसरा कार्यभाग नेणिवेच्या प्रांतांत उतरतो, अशी वस्तुस्थिति आहे. ज्याला आपण मन, प्रज्ञान (त्रिपुटीयुक्त ज्ञान) म्हणतो, तें ज्ञान, तें मन

 

पान क्र. ३४२

 

एकाग्रतेच्या कांहीं प्रयोगांत जाणिवेनें काम करण्याचें जवळ जवळ किंवा पूर्णपणें बंद करतें, तरी शरीराचें, नाडीसंघाचें व इंद्रियमनाचें कार्य चालूं राहतें; त्या कार्याची दखल जाणीव घेत नसली तरी तें सारखें आणि निर्दोषपणें चालू राहतें; याचा अर्थ तें नेणिवेच्या प्रांतांत उतरतें, अंतर्मनानें चालविलें जातें आणि पृष्ठवर्ती मन केवळ एकाच क्रियेच्या किंवा क्रियासंघाच्या बाबतींत जाणिवेनें क्रियाशील असतें. मी लिहीत असतांना लेखनाची शारीर क्रिया बहुधा किंवा सर्वांशीं अंतर्मन करीत असतें; न जाणतां कांहीं नाडीगत हालचाली शरीर करीत असतें; मन जागृत असतें, तें केवळ त्या विचाराच्या बाबतींत, जो त्याला व्यापून असतो, जो त्याच्यापुढें मननाकरितां ठेवलेला असतो. मनुष्य सर्वच्या सर्व अंतर्मनांत बुडी मारून बसला, तरी मनाची क्रिया दाखविणाऱ्या शरीराच्या सवयींच्या नित्याच्या हालचाली होत राहतात; याला उदाहरण म्हणून झोपेंत होणाऱ्या हालचालींचें देतां येईल. तसेंच असेंहि शक्य आहे कीं, मनुष्य मनाच्या खालीं न जातां, मनाच्या वर उन्मनाच्या, अतिमानसाच्या क्षेत्रांत चढून बसल्यावर शरीरांत जें पृष्ठांतर्वर्ती विशाल प्रच्छन्न मन आहे, तें काम करीत राहूं शकेल; --समाधींत वा योगनिद्रेच्या कांहीं प्रकारांत असें घडतेंहि. या सर्व गोष्टींचा इत्यर्थ हा आहे कीं, वनस्पतींतील संवेदना आणि आमच्यांतील संवेदना यांत फार थोडें अंतर आहे; विश्वांत काम करणारी जी जाणीवयुक्त शक्ति जडद्रव्याचे ठिकाणीं बाह्यतः झोंपेंत असते, तिची झोंप वनस्पतींतहि पुरती दूर झालेली नसते; ही जाणीवयुक्त विश्वशक्ति अतिमानसिक ज्ञानाच्या पायरीवर विश्वकार्य करण्यांत इतकी एकाग्रतेनें गुंतलेली असते कीं, जडामध्यें आणि अंशत: वनस्पतीमध्यें तिची जी कार्यकारी शक्ति काम करीत असते ती तिच्या उगमस्थानापासून म्हणजेच त्या विश्वशक्तीपासून अगदीं अलग होऊन जाते. अर्थात् ही अलग झालेली कार्यशक्ति जाणीवयुक्त असत नाहीं; तिला जाणीवयुक्त प्रेरणा मिळते, ती अंतर्मनांतून म्हणजेच बाह्यदृष्टीनें नेणिवेच्या प्रांतांतून मिळते. अंतर्मनांत जाणिवेनें काम करणारी ही कार्यशक्ति वनस्पतींत बाह्यदृष्ट्या नेणिवेंत असली, तरी मनुष्याचे ठिकाणीं ती बाह्यतः देखील जाणीवयुक्त होते. विश्वशक्तीची अतिमानसिक एकाग्रता, अंतर्मनांतील एकाग्रता कमी होऊन, ती मनुष्यांत बाह्य मनाचें रूप घेते आणि हें बाह्यमन, त्याचा आत्मा जो ज्ञानमय पुरुष, त्याचें थोडेसें ज्ञान अप्रत्यक्षपणें मिळवूं लागतें. जाणीवयुक्त विश्वशक्ति आमच्या ठिकाणीं, मानसिक

 

पान क्र. ३४३

 

जाणिवेचेद्वारां जीं कार्यें करते, तींच कार्यें अधोमानसिक जाणिवेच्याद्वारां ती वनस्पतींमध्यें करते; मानसिक जाणिवेच्या दृष्टीनें आणि कार्यपद्धतीच्या दृष्टीनें वनस्पतींमधील कार्य आणि मनुष्यांमधील कार्य यांत फरक असेल, असतोहि परंतु कार्यदृष्टीनें पाहतां दोन्हीं ठिकाणीं सारखींच आणि तींच कार्यें घडत असतात.

आम्हांमध्यें इच्छाशक्ति (संकल्पशक्ति) आणि वासनाशक्ति आहे, तिचें मूळ अणूंतील आकर्षणशक्तींत आणि उत्सारणशक्तींत आहे, अशी कल्पना करणें आतां शक्य झालें आहे. आकर्षण आणि उत्सारण (विकर्षण, अपसारण) या गोष्टी आमच्यामधील आवड आणि नावड, अनुराग आणि द्वेष यांसारख्या आहेत. अर्थात् अणूमध्यें या गोष्टी नेणिवेच्या प्रांतांतील आहेत. आमच्यांतील आकर्षण (अनुराग) व विकर्षण (द्वेष) जाणिवेनें युक्त असतें. अणुमध्यें तें अर्धनेणीव किंवा पूर्ण नेणीव यांनीं युक्त असतें हाच काय तो फरक. निसर्गामध्यें वासना (भोगाची इच्छा) व संकल्पशक्ति (कर्तृत्वाची इच्छा) सर्वत्र आहे; त्याचप्रमाणें बुद्धि आणि संवेदनाशक्ति सर्वत्र आहे; वासना, संकल्प, संवेदना व बुद्धि या सर्व शक्ती एकमेकींना धरून सर्वत्र आहेत--संवेदना आणि बुद्धि यांतूनच संकल्प आणि वासना यांचा उदय, आविष्कार होतो; आतां हें खरें कीं, संवेदना व बुद्धि निसर्गांत नेणिवेच्या किंवा अर्धनेणिवेच्या प्रांतांतून काम करतात आणि त्यांच्यापासून जन्म घेणारी संकल्पशक्ति व वासनाशक्ति याहि निसर्गांत त्याच नेणिवेच्या व अर्धनेणिवेच्या प्रांतांतून काम करतात. जडद्रव्याच्या प्रत्येक अणूंत, अर्थात् या अणूंच्या संयोगानें बनणाऱ्या प्रत्येक पदार्थांत या शक्ती असतात; अणूंत या शक्ती आल्या कोठून? अणु-परमाणूंची रचना करणारी, अणु-परमाणूंची घटकभूत असणारी जी महान् आदिम विश्वशक्ति, तिच्या ठिकाणीं या सर्व शक्ती अंतर्हित आहेत हें या प्रश्नाचें उत्तर होय. ही जी विश्वशक्ति, ती मूलत: वेदांतवर्णित चित्शक्ति (चित्तपस्) जाणीवयुक्त आदिपुरुषाची स्वभावगत जाणीवयुक्त शक्ति होय; ही शक्ति वनस्पतीचे ठिकाणीं अधोमानसिक संवेदनांनीं युक्त अशा नाडीगत शक्तीचें स्वरूप घेते; प्राथमिक प्राणिवर्गामध्यें वासनामय संवेदना व वासनामय संकल्प यांचें रूप व विकासमार्गावर पुढें गेलेल्या प्राण्यांत आत्म-जाणीवयुक्त संवेदना आणि आत्म-जाणीवयुक्त कार्यशक्ति यांचें रूप ती घेते, तर मनुष्यामध्यें, मानसिक संकल्पशक्ति आणि मानसिक ज्ञानविज्ञान यांचें सर्वश्रेष्ठ स्वरूप ती घेते. जाणीवयुक्त

 

पान क्र. ३४४

 

विश्वशक्तीची जडामधील नेणीव आणि मनुष्यांमधील व मनुष्येतर प्राण्यांमधील जाणीव या दोन टोंकांना जोडणारी शिडी किंवा मध्यस्थ-शक्ति म्हणजे जीवनशक्ति होय. जडामध्यें ही जीवनशक्ति गुप्त असते, ती आपल्या स्वतःच्या कर्तृत्वानें अधोमानसिक क्रियाशील जीवनाचें अर्धगुप्त स्वरूप घेते; शेवटी तिजमधून या अर्धगुप्त स्वरूपांतून मनाचा आविष्कार होतो आणि या आविष्कारानें तिच्यांतील क्रियाशीलता पूर्णतया कामीं येते व तिचें कर्तृत्व कृतार्थ होतें.

विकासक्रमाच्या दृष्टीनें शक्तींच्या क्रमवार आविष्काराचा विचार केला, तरी वरील सिद्धांत तर्कशुद्ध ठरतो; जड प्राणहीन द्रव्य तळाशीं, मनोयुक्त प्राणिवर्ग वर आणि मध्यें प्राणयुक्त मनोहीन वनस्पतिवर्ग-- अर्थात् प्राणशक्ति किंवा जीवनशक्ति ही जडवर्ग आणि प्राणिवर्ग यांना जोडणारी मध्यस्थ शक्ति आहे, ही गोष्ट विकाससिद्धांतानुसार देखील तर्कशुद्ध रीतीनें सिद्ध होते. वनस्पतींतील जीवन प्राणि-जीवनाहून वेगळ्‌या रीतीनें संघटित केलेलें असलें, तरी तें एकाच शक्तीचें स्वरूप आहे ही गोष्ट उघड आहे; वनस्पतिवर्गाला प्राणि-वर्गाप्रमाणें जन्म, वाढ, मरण आहे; बीजद्वारां संतानोत्पत्ति होते, शक्तिक्षयानें, रोगानें, तीव्र आघातानें मरण येतें; बाहेरून पोषकतत्त्वें आपल्या पिंडांत ग्रहण करून व पचवून त्यांचें पोषण होत असतें; प्रकाश व उष्णता यांजवर वनस्पती अवलंबून असतात; त्यांच्यापैकीं कोणाला संतानोत्पादन शक्ति नसते, कोणाला ती पुष्कळ असते; त्यांना निद्रा आणि जागृति, शक्तिउद्रेक आणि शक्तिमांद्य या अवस्था असतात; त्यांना बालपण, वयांत येणें, वृद्धावस्था यांतून जावें लागतें; जीवनशक्तीचीं सत्त्वें वनस्पतींत असल्यानें, प्राणिवर्ग त्यांना आपलें स्वाभाविक अन्न करतो व त्यांतून जीवनसत्त्वें आत्मसात् करून आपलें पोषण करतो; वनस्पतींत प्राथमिक स्वरूपांतली कां होईना, पण नाडीसंघटना आहे; बाह्य प्रेरणेला त्यांजकडून योग्य प्रतिक्रिया घडते; त्यांच्यांत अधोमानसिक किंवा शुद्ध प्राणनिष्ठ अशा प्राथमिक संवेदना आहेत; प्राणि-जीवन व वनस्पति-जीवन यांजमधील हीं सर्व साम्यें पाहिलीं, म्हणजे त्यांच्यांत कार्य करणारी प्राणशक्ति किंवा जीवनशक्ति एकच आहे ही गोष्ट सहज पटते. अर्थात् प्राणहीन जडवर्ग आणि मनोयुक्त प्राणिवर्ग या दोहोंच्या मध्यें वनस्पति-वर्गाच्या जीवनाचें विकासक्रमांतील स्थान आहे ही गोष्ट उघड आहे. विकाससिद्धांतानुसार प्राण किंवा जीवन ही शक्ति जडांतून उदयास आली असून, तिच्यांतून

 

पान क्र. ३४५

 

विकासक्रमानें मनाचा उदय होणें हा तिचा परिपाक आहे, ही गोष्ट आम्हीं मान्य केल्यास, जडांत ही जीवनशक्ति सुप्तगुप्त स्थितींत आहे, जडाच्या अधोमानसिक अर्धनेणिवेंत अथवा पूर्ण नेणिवेंत ही जीवनशक्ति अप्रकट अशी उपस्थित असते, असें मान्य करण्यावाचून गत्यंतर नाहीं. कारण जडांत ही जीवनशक्ति नसेल, तर ती जडाचे ठिकाणीं कोठून व्यक्त होते? जडांतून प्राणशक्ति जर वर येते, तर ती जडांत पूर्वीं लपून असली पाहिजे. विकास याचा अर्थ पडदा दूर करून प्रकट होणें; पडदा घेऊन अप्रकट होणें हीच या क्रियेची पूर्वकालीन पूरक क्रिया असली पाहिजे. ही विकासाची कल्पना दूर सारली, तर जीवन-शक्ति ही, जड निसर्गांत नसलेली, जादूनें पैदा केली गेली, वगैरे कल्पना कराव्या लागतील. शून्यांतून जीवन-शक्ति पैदा केली गेली व ती जडावर लादली, ही कल्पना केवळ निराधार म्हणून त्याज्य आहे; भौतिक क्रिया जडाचे ठिकाणीं कांहींतरी कशातरी घडून जीवनशक्ति उदयास आली, त्या क्रियांमध्यें जीवनशक्तीशीं साम्य असणारी कोणतीहि गोष्ट नव्हती, ही दुसरी कल्पना पहिलीसारखीच बिनबुडाची म्हणून त्याज्य ठरते; तिसरी कल्पना, भौतिक विश्वाच्या वर अतिभौतिक विश्व असेल व तेथून जीवनशक्ति उतरून भौतिक विश्वांत आली असेल--ही कल्पना पहिल्या दोन कल्पनांहून सरस आहे, विचारार्ह आहे; या कल्पनेप्रमाणें वस्तुस्थिति असणें शक्य आहे; गुप्तलोकविद्या असें सांगते कीं, भौतिक विश्वापेक्षां श्रेष्ठ असणाऱ्या जीवनविश्वांतून येथील भौतिकावर दडपण येऊन, त्याचा परिपाक म्हणून येथें भौतिकांत, जडांत जीवनशक्तीचा-प्राणशक्तीचा-उदय होण्यास मदत झाली. गुप्तविद्येचें हें विधान खरें धरून चाललें, तरी जडांतून जीवनाचा उदय झाला, जड हेंच जीवनाचें उगमस्थान आहे, जीवनाची प्राथमिक आवश्यक हालचाल जडांतच सुरू झाली हें विधान कांहीं त्यावरून खोटें ठरत नाहीं. जडाच्या पातळीच्या वर जीवनाची पातळी अथवा विश्व आहे, एवढ्यावरून कांहीं, जडांतून जीवन वर येऊं शकत नाहीं; आदिपुरुष आपल्या अनेक शक्तींच्यामधून खालीं उतरत उतरत नेणिवेच्या प्रांतांत शेवटीं उतरला; या उतरण्याच्या क्रियेंत त्याला मध्यें जीवनाच्या पातळीवर येऊन खालीं उतरावे लागलें; याप्रमाणें उतरून आपल्या सर्व शक्तींसह तो जडांत अप्रकट होऊन बसला; अशी सर्व वस्तुस्थिति असली, तरच पुढें विकासकार्य सुरूं होऊन जीवनशक्तीनें जडांतून वर येणें शक्य होतें आणि जीवनशक्तीनंतर मानसिक शक्ति आणि त्यानंतर

 

पान क्र. ३४६

 

आणखी श्रेष्ठ शक्ति विकासमार्गानें वर येणें क्रमप्राप्त होतें. भौतिक जडवस्तूमध्यें जीवनशक्ति गुप्त असल्याचें अगदीं प्राथमिक स्वरूपाचें चिन्ह आढळून येत असेल किंवा असलें कोणतेंहि चिन्ह आढळून येत नसेल (गुप्त जीवनशक्ति पूर्ण झोंपेंत असल्यास चिन्ह मिळावयाचें नाहीं हें उघड आहे) -- हा चिन्हांचा प्रश्न मुळींच महत्त्वाचा नाहीं -- निदान विशेष महत्त्वाचा नाहीं. जडशक्ति (जडांत काम करणारी शक्ति) ही वस्तुघटक द्रव्य एकत्र करते, त्या एकत्रित द्रव्याला कसलें तरी रूप देते, त्या रूपांतील द्रव्याचें पुढें विघटन करते, * ही गोष्ट आमच्या परिचयाची आहे. जन्म, वाढ, मरण या घटनांच्याद्वारां जीवनशक्ति व्यक्त होते; अर्थात् जडशक्ति आणि जीवनशक्ति या दोन शक्ती एकाच मूळ शक्तीचे दोन पायऱ्यावरचे दोन प्रकार आहेत, हें उघड आहे; झोंपेंत काम करणाऱ्या अधोमानसिक जाणिवेकडून बुद्धीचें काम होत असतें आणि मनुष्याच्या मानसिक शक्तीकडून बुद्धीचें काम स्वाभाविकपणें होतें; यावरून जी शक्ति अधोमानसिक जाणिवेचें रूप घेते, तीच पुढें मानसिक जाणिवेचें रूप घेते, ही गोष्ट सहज कळूं शकते. जी शक्ति प्रथम जडशक्तीचें व नंतर जीवनशक्तीचें रूप घेते तीच त्यानंतर मानसिक जाणिवेचें रूप घेते. (जीवनशक्ति आणि अधोमानसिक जाणीवशक्ति एकच होत.) जडशक्तीचें स्वाभाविक स्वरूप आपण पाहिलें; त्यावरून, तींत जीवनशक्ति आणि मानसिकशक्ति गुप्त आहे, या शक्तींच्या विशिष्ट क्रिया व संघटित अवस्था मात्र जडशक्तीच्या कार्यात दिसत नाहींत--हें आपण तर्कशुद्ध रीतीनें म्हणूं शकतों.

-------------------------

* जन्म, वाढ, मरण या गोष्टी बाह्यदृष्ट्या द्रव्याचें एकत्रीकरण, त्याला कसलें तरी रूप देणें व शेवटीं त्या रूपाचें विघटन करून द्रव्य पुन्हां मोकळें करणें या क्रियांप्रमाणेंच आहेत. अर्थात् जन्म, वाढ, मरण यांची आंतरिक प्रक्रिया आणि महत्त्व द्रव्याच्या एकत्रीकरणादि भौतिक क्रियांहून वेगळें आहे आणि श्रेष्ठ आहे. आत्म्याची शरीरधारणाची क्रियाहि गुप्तविद्येच्या दृष्टीनें, बाह्यतः वरीलप्रमाणेंच असते. जन्मासाठींच आत्मा केंद्रस्थानीं बसून आपल्या भावी मानसिक, प्राणिक आणि स्थूल शरीराचीं घटक-द्रव्यें एकत्र करून आपणाजवळ ओढून घेतो; जीवनांत हीं शरीरें वाढवितो आणि हीं सोडतांना संघटित केलेलें द्रव्य विघटित करून मोकळें करतो -- आपल्या आंतरिक शक्ती मात्र आपल्या केंद्रांत ओढून घेतो-- पुन्हां जन्म घेतांना वरील क्रिया त्याला पुन्हां करावी लागते.

 

पान क्र. ३४७

 

तेव्हां अणूपासून मनुष्यापर्यंत जीवनशक्ति किंवा प्राणशक्ति तत्त्वत: एकच आहे; अणूमध्यें तिचें स्वरूप अधोमानसिक सत्ता-द्रव्य आणि संचलन हें असतें व प्राण्यामध्यें मानसिक जाणीवयुक्त अस्तित्व आणि हालचाल असें तिचें स्वरूप होतें; प्राणिवर्ग आणि जडवर्ग यांच्यामधील वनस्पतिवर्गांत विकासाची मधली पायरी सांपडते. मूळ जाणीवयुक्त शक्ति विश्वव्यापी आहे व ती विश्वव्यापी क्रिया करीत असून जीवनशक्ति किंवा प्राणशक्ति म्हणजे वस्तुत: या मूळ जाणीवयुक्त शक्तीचा विश्वव्यापी व्यवहार होय; ही प्राणशक्ति जडावर व जडांत काम करीत असतां अधोमानसिक स्वरूपाची असते; रूपें किंवा शरीरें निर्माण करणें, राखणें पुष्ट करणें, पुन: निर्माण करणें हें प्राणशक्तीचें विश्वव्यापी कार्य असतें; हीं जीं शरीरें निर्माण केलीं जातात, त्यांत नाडीशक्तीच्या व्यापारानें अर्थात् उत्तेजक शक्तीच्या अन्योन्ययोगी प्रवाहांच्याद्वारां जाणीवयुक्त वेदना जागृत करण्याची धडपड करणें हेंहि प्राणशक्तीचें सर्वव्यापी कार्य असतें. या जागृतीच्या कार्याच्या तीन पायऱ्या आहेत; पहिल्या तळाच्या पायरीमध्यें द्रव्य-आंदोलन हें जडाच्या झोंपेंत होत असतें; तें पूर्णतया अधोमानसिक असतें, पूर्णपणें यांत्रिक दिसतें--परतंत्र दिसतें; दुसऱ्या किंवा मधल्या पायरींत पूर्वींचें यांत्रिक आंदोलन 'मानसिक जाणिवेच्या सीमेवर असलेलें' असें अधोमानसिक प्रतिक्रियेचें स्वरूप घेतें; तिसऱ्या सर्वोच्च पायरींत जीवनशक्ति किंवा प्राणशक्ति जाणीवयुक्त मनाचें एक विशिष्ट रूप घेते; अर्थात् मनानें अनुभवण्यासारख्या संवेदनेचें रूप घेते--इंद्रियस्वरूपाचें मन आणि बुद्धि यांच्या विकासाला ही संवेदना पायासारखी साहाय्यक होते. वर जी मधली पायरी सांगितली, ती एका बाजूला जडद्रव्य व दुसऱ्या बाजूला मन यांच्यापासून स्वरूपतः भिन्न अशा प्राणशक्तीची किंवा जीवनशक्तीची पायरी, असें आम्ही सामान्यत: मानीत असतो. परंतु ही भिन्नतेची कल्पना चुकीची आहे; एकच शक्ति तीन पायऱ्यांनीं विकसित होत जाते आणि या विकासक्रमांत जीवनशक्ति ही मध्यें असते; तळचें जडद्रव्य ती स्वतःपासून बनविते, जडद्रव्याची ती घटकभूत असते. अर्थात् ती स्वत: जडद्रव्य बनते आणि तिच्या पोटीं मन ही तिसरी श्रेष्ठ वस्तु गुप्त असते. मूळ जाणीवयुक्त शक्तीची क्रिया हेंच प्राणशक्तीचें स्वरूप असतें हें वर आलेंच आहे. वस्तु बनणें किंवा बनविणें, वस्तुद्रव्य बनणें किंवा बनविणें ही क्रिया अथवा मनाची क्रिया, वस्तु आणि वस्तूचा आकार यांना ज्ञानविषय करणारी

 

पान क्र. ३४८

 

मनाची क्रिया हेंच कांहीं केवळ, प्राणशक्तीचें किंवा मूळ जाणीवयुक्त शक्तीचें कार्य नव्हे; तर मुख्यत: मूळ ज्ञानमय पुरुषानें गतियुक्त होणें, क्रियाशील होणें हें त्या शक्तीच्या क्रियेचें खरें स्वरूप आहे; ही क्रियाशीलता व गतिमानता वस्तुद्रव्य बनण्यास कारण होते व त्या द्रव्याचा ती आधार असते; जाणीवयुक्त मानसिक विषयग्रहणाला मध्यगामी कारण व आधार हीच क्रियाशीलता व गतिमानता असते. जाणीवयुक्त पुरुषाचें वा सत्तेचें मध्यस्थ रीतीनें क्रियाशील होणें, हें जें प्राणशक्तीचें वा जीवनशक्तीचें स्वरूप, त्या स्वरूपाचें कार्य, जडशक्तींत संवेदनातुल्य क्रियाप्रतिक्रिया निर्माण करण्याचें असतें; मूळ सत्तेच्या निर्मितिशील शक्तीचा एक प्रकार हा स्वतःच्या घटकद्रव्याच्या स्वरूपांत कार्यमग्न झाल्यानें, तो अधोमानसिक किंवा पूर्ण नेणिवेच्या पद्धतीनें जडाचे ठिकाणीं कार्य करीत असतो. अस्तित्वांतील वस्तूंचें विषयरूपानें ग्रहण करणारी जाणीव अथवा मन यालाहि प्राणशक्ति मोकळें करून कामाला लावते व त्याला आपला आधार देते; या मनाला ही प्राणशक्ति गतिशील कार्यक्षम साधनसंभार पुरविते; या साधनांच्या आश्रयानें मन स्वतःच्या रूपांवर क्रिया करूं शकतें आणि त्याबरोबर जीवरूपांवर व जडरूपांवर देखील क्रिया करूं शकतें; तसेंच प्राणशक्ति मध्यस्थ होऊन मन आणि जडवस्तु यांना एकत्र आणते आणि त्या दोहोंमध्यें अन्योन्यांचा व्यवहार होण्यास मदत करते; प्राणशक्तीनें पुरविलेलें या अन्योन्य व्यवहाराचें साधन म्हणजे नाडीशक्तीच्या नित्य गतिशील प्रवाहधारा होत. या प्रवाहधारा जड वस्तुरूपांतील शक्ति-संवेदनारूपानें मनाकडे वाहून नेऊन, तिच्यायोगें मनावर त्याला बदलविणारे संस्कार करतात; आणि मनाची शक्ति, इच्छा वा संकल्प या रूपानें परत वस्तूंकडे वाहून नेऊन जड वस्तूंत बदल घडवून आणतात. नाडीशक्ति ही हें मध्यस्थाचें काम करणारी असल्यानें, प्राण-शक्ति किंवा जीवनशक्ति हें नांव आम्ही बहुधा या नाडी-शक्तीलाच देतो. परंतु प्राणशक्ति ही प्राणिवर्गाचे ठिकाणींच फक्त नाडीशक्ति हें रूप घेते; परंतु सर्वांचे तळाशीं असलेला अणु धरून, सर्व रूपांत प्राणशक्ति उपस्थित असते व या सर्व रूपांत मौलिक स्वरूप व कार्य सारखेंच असतें, ती सर्वत्र मूळ जाणीवयुक्त शक्तीची एक क्रिया असते. ही प्राणशक्ति स्वत: जीं रूपें धारण करते, त्या रूपांतील द्रव्य राखणें व त्यांत बदल करणें, रूपांचें अस्तित्व सांभाळणें व त्यांत बदल करणें हें अर्थात् तिचेंच कार्य असतें; संवेदनाशक्ति आणि मानसिक शक्ति गुप्तपणें या

 

पान क्र. ३४९

 

प्राणशक्तीबरोबर काम करीत असतात; मात्र प्रथम या दोन शक्ती, रूपांचे ठिकाणीं अप्रकट असतात, नंतर उदयोन्मुख होतात व शेवटीं पडदा दूर सारून बाहेर प्रकट होतात. प्राणशक्ति वा जीवनशक्ति सर्वव्यापी आहे; तिनें ही सर्व भौतिक सृष्टि व्यक्त स्वरूपांत आणली आहे; ती प्राणशक्ति सृष्टीच्या अंतर्यामीं सर्वत्र राहत असून या शक्तीचा एकंदर महत्त्वाचा व्यवहार व कार्यभाग वर सांगितलेल्या प्रकारचा आहे.

 

पान क्र. ३५०









Let us co-create the website.

Share your feedback. Help us improve. Or ask a question.

Image Description
Connect for updates