Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics, expounding a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth.
Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.
प्रकरण चौथें
सर्वव्यापी सत्तत्व
तो परमात्मा असत्-ब्रह्म आहे असें ज्ञान ज्याला झालें तो केवल 'असत्' - अस्तित्व नसलेला - असा होतो. ब्रह्म आहे असें ज्ञान ज्याला झालें तो सत्य अस्तित्व, सत्य आत्मा, अस्तित्वांतील सत्य म्हणून ओळखला जातो.
- तैत्तिरीयोपनिषद् २.६
विशुद्ध आत्मा आणि विश्वमृत्तिका, विश्वाचें जड द्रव्य, या दोघांचेंहि हक्काचें मागणें आम्हीं मान्य केलें आहे; आम्हांमध्यें विशुद्ध आत्मा, त्याचें स्वभावगत पूर्ण अनंत स्वातंत्र्य व्यक्त करूं मागत आहे आणि जड विश्वद्रव्य या व्यक्ततेचा, आविष्काराचा सांचा होऊं मागत आहे, पाया होऊं मागत आहे. शुद्ध चैतन्य (आत्मा) आणि शुद्ध जड (विश्वद्रव्य) या दोन वस्तू दोन टोंकांच्या व सर्वथा अन्योन्य विरोधी भासतात आणि या दोन वस्तूंनीं दोन बाजूंनीं केलेल्या मागण्या आम्ही मान्य करीत असल्यामुळें आम्हाला असें एक सत्य गांठावयास हवें कीं, जें या दोन्ही वस्तूंचा समन्वय पूर्णपणें साधील, आमच्या जीवनामध्यें या दोन्ही वस्तूंना योग्य भाग पुरवील आणि आमच्या विचारामध्यें दोन्ही वस्तूंचे योग्य समर्थन करील. दोहोंपैकीं कोणाचाहि कोणताहि हक्क या सत्यानें बुडवितां कामा नये. दोहोंतहि परम सत्य वास करीत आहे ही गोष्ट या आमच्या समन्वयी सत्यानें नाकारतां कामा नये. चैतन्यवाद किंवा जडवाद आपापल्या परीनें चुकत असेल, अतिरेक करून कोणाला अन्यायानें बहिष्कृत करीत असेल, परंतु या चुका व हे अतिरेक त्या परमात्म्याच्या आश्रयानेंच होत असतात; त्या परमात्म्यांतूनच त्यांना सारखें बळ मिळत जातें, ही गोष्ट विसरून चालणार नाहीं. एखादा अतिरेकी सिद्धांत मांडला गेला आणि त्या सिद्धांतानें मानवी मनाला प्रबळ मोहिनी घातली कीं आपण निश्चितपणें असें समजावे कीं, तो अतिरेकी सिद्धांत सर्वथा चूक, सर्वथा
पान क्र. ४८
भ्रम किंवा आभास नसून त्या सिद्धांतांत कांहींतरी महान् श्रेष्ठ वस्तु किंवा शक्ति झांकलेली आहे आणि त्या वस्तूपुढें नतमस्तक होऊन तिचे ठिकाणीं निष्ठा ठेवणें हें आपलें कर्तव्य आहे. हें कर्तव्य आपण न केलें तर, त्या वस्तूला नकार दिला किंवा बहिष्कार घातला तर, या अपराधाचें शासन त्या वस्तूकडून आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाहीं; नकाराचा किंवा बहिष्काराचा बदला ती वस्तु घेईलच. जड आणि चैतन्य या दोन टोंकांच्या वस्तूंमध्यें दिसणारा विरोध मिटविण्यासाठीं कांहीं केवळ तडजोडीची व्यवस्था केली तर त्या व्यवस्थेनें विरोधाचा प्रश्न पूर्णपणें मिटत नाहीं, तडजोड ही समाधानकारक अंतिम व्यवस्था होऊं शकत नाहीं. तडजोड म्हणजे करार; दोन विरोधी शक्तींमध्यें झालेला, विरोधी हितसंबंधांचें एकमेकींनीं कमी अधिक संरक्षण करण्याचा व्यवहारी करारनामा. या करारनाम्यानें त्या दोन शक्तींचा खरा समेट, खरा मेळ घडून येत नाहीं. खरा मेळ व्हावयाचा तर दोन्ही शक्तींनीं एकमेकींचें अंतरंग सहानुभूतीनें समजावून घ्यावयास हवें, एकमेकींनीं एकमेकीस स्वत:मध्यें शक्य तेवढें सामावून घ्यावयास हवें, आणि या रीतीनें कमी अधिक प्रमाणांत दोघींची हृदयाची एकता, जिव्हाळ्याची एकता निर्माण व्हावयास हवी. तेव्हां जड आणि चैतन्य यांना आपण शक्य तितकें अधिकांत अधिक एकत्र आणूं शकलों, त्यांचा अधिकांत अधिक संयोग साधूं शकलों तरच त्या दोघांना खऱ्या समेटानें जोडणारें, दोघांचा खरा समन्वय साधणारें सत्य आम्हाला लाभेल आणि त्यायोगें व्यक्तीचें आंतरिक जीवन आणि बाह्य जीवन व्यवहारतः अन्योन्य सुसंवादी होण्यासाठीं लागणारा भरभक्कम पाया, सुदृढतम आधार आपणांस मिळेल.
विश्वचैतन्य (Cosmic Consciousness) हें चैतन्य आणि जड यांच्या संयोगाचें स्थान आहे हें आपण पाहिलें आहे. या ठिकाणीं चैतन्य आणि जड परस्परांना सत्यत्वानें सत्यवस्तु म्हणून ओळखतात. या दोन तत्त्वामध्यें मध्यस्थीचें काम प्राण आणि मन हीं दोन तत्त्वें करतात. पण ही व्यवस्था विश्वचैतन्यांत असते. सर्व साधारण मनाच्या अहंकारी अवस्थेंत चैतन्य असतांना, मन आणि प्राण वेगळ्या तऱ्हेनें वागतात. शुद्ध चैतन्य आणि जड यांना विभक्त करण्याचें, दोहोंमध्यें नसतें भांडण लावण्याचें काम त्यांजकडून होत असतें. मनाचीं अहंयुक्त सामान्य अवस्था संपून त्याला विश्वव्यापी जाणीव, अर्थात विश्वचैतन्याची अवस्था प्राप्त झाली म्हणजे त्याला नवा प्रकाश मिळतो, नवें ज्ञान मिळतें; एकता आणि
पान क्र. ४९
अनेकता दोन्ही गोष्टी सत्य आहेत, एकाच वेळीं सत्य आहेत, ही गोष्ट त्याला स्पष्ट दिसते. मग तें, या दोन सत्य वस्तूंच्या मध्यें असणारीं अन्योन्य व्यवहाराचीं सूत्रें आत्मसात् करतें; स्वत:मध्यें त्याला पूर्वीं अनुभवास येणारे सर्व विसंवाद या नव्या प्रकाशांत, त्यांचें कारण लक्षांत येऊन दूर होतात, त्यांचें ठिकाणीं दिव्य मेळ अनुभवास येतो, पूर्वींच्या विसंवादी गोष्टी सुसंवादी होतात; यामुळें त्याला संतोष वाटतो आणि ईश्वर व प्राणाधिष्ठित संसारी जीवन यांच्या पूर्ण अविभक्ततेची सिद्धि हें मानवाच्या विकासाचें अंतिम ध्येय आहे ही गोष्ट त्याला कळल्यानें आणि पटल्यानें, तें या सिद्धीचें साधन होण्यास स्वखुषीनें मान्यता देतें. विश्वचैतन्याच्या अवस्थेंतील प्रकाश मनाला उपलब्ध झाला म्हणजे त्याची विचारशक्ति सूक्ष्मदर्शी होते, प्राणाला उपलब्ध झाला म्हणजे इंद्रियें सूक्ष्मस्पर्शी होतात. या सूक्ष्म मनाला व प्राणाला जड द्रव्य हें, साकार होऊन सुविस्तृत संसार करूं पाहणाऱ्या चैतन्याच्या आकाराचें ठिकाणीं, शरीराचें ठिकाणीं आहे, असा साक्षात्कार होतो; आणि जड द्रव्याचें सारतत्त्व, सत्व, आत्मा आहे असे त्यांना स्पष्ट ज्ञान होतें; आणि या मध्यस्थ मन-प्राणरूपी दूतांच्या द्वारां एकमेकांची पुरी ओळख पटल्यानें आत्मचैतन्य जडाला आणि जड आत्मचैतन्याला दिव्य सत्यवस्तु म्हणून आणि स्वत:शीं तत्त्वत: एकरूप म्हणून मान्यता देतें. विश्वचैतन्याच्या प्रकाशांत हेंहि स्पष्ट होतें कीं, मन आणि प्राण हीं परात्पर चैतन्य-पुरुषाचीं साकार प्रतीकें व साधनें असून यांच्याद्वारां तो पुरुष संसार-विस्तार करून जड आकाराच्या घरांत, देहांत आत्मा म्हणून प्रवेश करतो, आणि या घरांत राहत असतां यांच्याच द्वारां दुसऱ्या अनंत जड देहांत असणाऱ्या आपल्या जाणीवकेंद्रांना, आत्म्यांना आपलीं ओळख पटवितो. परात्पर चैतन्यपुरुष विश्वाच्या प्रतीकांत आपलें जें सत्य व्यक्त करीत आहे, तें मनानें स्वतःमध्यें निर्मळ आरशाप्रमाणें प्रतिबिंबित करावें, यांतच त्याची कृतार्थता आहे आणि प्राणाची कृतार्थता यांत आहे कीं, त्यानें आपल्या शक्ती जाणीवपूर्वक त्या दिव्य परम पुरुषाच्या हवालीं कराव्या, अशाकरितां कीं, त्याला, त्या परम पुरुषाला आपलें पूर्ण अंतरंग पूर्णपणें व्यक्त करण्यासाठीं विश्वसंसारांत नित्य नवे आकार, नित्य नवे क्रियाप्रकार उभे करतां यावे.
मनाची आणि प्राणाची कृतार्थतेची जी कल्पना आतांच सांगितली तिजवरून, मनुष्याला विश्वांत दिव्य जीवन जगणें शक्य आहे, असें दिसून
पान क्र. ५०
येतें. भौतिक शास्त्र, विश्वाच्या आणि पृथ्वीच्या क्रमविकासाविषयीं प्रतिपादन करीत असतें. मनुष्याला दिव्य जीवन शक्य असेल तर वरील क्रमविकासाचें तें एक बुद्धिगम्य ध्येय मानतां येईल, त्या क्रमविकासाला कांहीं जिवंत अर्थ आहे असें स्पष्ट होईल आणि दिव्य मानवी जीवन, व त्याची शक्यता यामुळें विकाससिद्धांतवादी भौतिक शास्त्राचा खटाटोप समर्थनीय ठरेल. त्याचप्रमाणें, दिव्य जीवनाच्या प्रयत्नानें, मनुष्याचा सामान्य आत्मा पार बदलून त्याचें ईश्वरी स्वरूप प्रकट होईल; अर्थात् सर्व महान् धर्मपंथाचें महान् ध्येय सिद्ध होऊन त्या धर्मांचेंहि भौतिकशास्त्राबरोबर समर्थन होईल.
कर्त्या ब्रह्माची ही गोष्ट झाली. पण ज्या अकर्त्या ब्रह्माची ओढ संन्याशाला असतें, विशुद्ध, स्वयंभू, स्वानंदी, असें ज्या अकर्त्या शांत ब्रह्माचें वर्णन केलें जातें व ज्याचा साक्षात्कार हा संन्याशाच्या संन्यासी पंथाचें कायमचें थोर समर्थन म्हणून आपण मान्य केला आहे त्या अकर्त्या ब्रह्माचें कर्त्या ब्रह्माशीं अनिवार्य विरोधाचें नातें आहे कीं काय? नाहीं. असें नातें मुळींच नाहीं. उलटपक्षीं दोहोंमध्यें सुसंवादाचें नातें आहे, हेंच प्रकाशमय सत्य आहे. एका ब्रह्मानें विश्वाची- 'भ्रमरूप विश्वाची' -उभारणी करावी, दुसऱ्या ब्रह्मानें त्याचें अस्तित्व नाकारावें, अशीं कांहीं खरी स्थिति नाहीं. कर्ते ब्रह्म आणि शांत अकर्ते ब्रह्म या वेगवेगळ्या वस्तू नसून एकाच अभेद्य ब्रह्माचीं हीं दोन रूपें, एक विधायक व दुसरें अ-विधायक, पण एकाचें दुसऱ्यावांचून चालत नाहीं अशीं हीं दोन रूपें आहेत. अ-विधायक शांत ब्रह्मांतूनच तो शब्द नित्य निघत असतो, जो शब्द विधात्याचें विधायक काम करून विश्वांची निर्मिति करीत असतो, आणि ही निर्मिति करणारा शब्द म्हणजे दुसरें तिसरें कांहीं नसून शांत ब्रह्माच्या पोटीं जें स्वत: लपून बसलेलें असतें, त्याचें स्वयमाविष्करण होय. अनंत अगण्य विश्वमाला निर्माण करणारी आणि त्या विश्वमालांमध्यें अखंडपणें नित्य क्रियाशील असणारी ब्रह्माची पूर्ण स्वतंत्र सर्वसमर्थता ही त्याच्या पूर्ण, सर्वसहिष्णु नित्य, साक्षीभूत अकर्तेपणामुळेंच संभवते. कारण ब्रह्माची क्रियाशीलता म्हणजे काय ? ब्रह्म मुळांत स्वयंभू ज्ञानशक्तिमय अस्तित्व आहे. तें आहे तसेंच नित्यशांत, अक्षर, अव्यय एकरस राहून आपल्या अनंतप्रसवा प्रवृत्तिशील प्रकृतीला कार्यप्रवृत्त होण्यास संमति देते. तिच्या प्रवृत्तींतून ज्या घटना घडणार त्यांना लागणारी विविध प्रकारची शक्ति, तसेंच त्या घटनांची अमर्याद
पान क्र. ५१
विविधता व्यक्त होण्यास आणि या विविध घटनांमध्यें सुमेळ, सुसंवाद घडून येण्यास लागणारें असीम सामर्थ्य, तें ब्रह्म आपल्या अनंत शक्तिभांडारांतून प्रकृतीला आत्मीयतेनें पुरवते - हीच ब्रह्माची क्रियाशीलता होय.
मनुष्य पूर्ण व्हावयाचा तर त्यानेंहि ब्रह्माची परम शांति आणि अनासक्ति आपल्या हृदयांत सुप्रतिष्ठित करावयास हवी आणि आपल्या अविश्रांत स्वयंस्फूर्त श्रमांना या शांतीचा आणि अनासक्तीचा आधार द्यावयास हवा. त्याचप्रमाणें ब्रह्माची दिव्य सहिष्णुता आणि त्याचा दिव्य संतोष मनुष्याच्या अनासक्त परिश्रमांत व्यक्त व्हावयास हवा. या प्रकारची पूर्णता ज्यांनीं मिळविली आहे, ज्यांच्या हृदयांत ब्रह्माची (ब्रह्मासारखी) शांति सुप्रतिष्ठित झाली आहे, त्यांना या शांतीतून विश्वांत काम करणाऱ्या शक्तींचा कधींहि न संपणारा पुरवठा, जिवंत झऱ्यांतून पाणी मिळावें त्याप्रमाणें, सारखा मिळत आहे असें दिसेल. तेव्हां शांत ब्रह्म, शांत आत्मा स्वभावत: विश्वगत विश्वविषयक उद्योगांत पडत नाहीं, तो सर्वकर्मसंन्यास, सर्व कर्मापासून अलिप्तता स्वभावतःच पसंत करतो, हें प्रतिपादन सत्याला धरून नाहीं. क्रियामय विश्वसंसार आणि निष्क्रिय शांति या दोन अवस्था अन्योन्य विसंवादी, अन्योन्य विरोधी आहेत, हें जें आपल्या मनाला भासतें, तें चूक आहे आणि मनाच्या मर्यादा ही चूक त्याजकडून घडवितात. अमुक जाणिवेंत एक गोष्ट आहे तर तिच्या विरुद्ध स्वरूपाची भासणारी दुसरी गोष्ट त्या जाणिवेंत नसली पाहिजे, नाहीं, अशा प्रकारच्या 'आहे-नाहीं'मय अन्योन्यविरोधी अनुभवांची व सिद्धांतांची सवय मर्यादाबद्ध मनाला झाल्यानें त्याला अशी कल्पनाच येऊं शकत नाहीं कीं, अशी एक सर्वसमावेशक, व्यापक व समर्थ जाणीव असूं शकते, जिच्यांत त्याला स्वत:ला विरोधी भासणाऱ्या गोष्टी, एकाच वेळीं एकत्र असतात. तेव्हां ही वस्तुस्थिति आहे कीं, शांत ब्रह्म, शांत आत्मा विश्वसंसार टाकीत नाहीं, तर त्याला आधार होऊन त्याचा योगक्षेम चालवितो; किंवा असेंहि म्हणतां येईल कीं, प्रवृत्ति आणि निवृत्ति या दोन्ही वृत्तींना शांत आत्मा, सारखाच निःपक्षपाती आधार देतो, आणि आत्म्यानें सर्व प्रकारचे कार्य करीत रहावें आणि त्याबरोबर शांत आणि मुक्त, अनासक्त असावें, या समन्वयाचा तो पक्षपाती आहे, या समन्वयाला तो मोकळेपणें मान्यता देतो.
(शुद्ध शांत अस्तित्व आणि साक्षेपी संसारी अस्तित्व हीं अविरोधी आहेत, सत् ब्रह्म निष्क्रिय असून सक्रिय आहे व म्हणून आत्मा शांत आणि
पान क्र. ५२
साक्षेपी एकाच वेळीं असूं शकतों, ही गोष्ट आपण पाहिली.) आतां असत् ब्रह्म व त्यांत विलीन होणें अर्थात् निर्वाण, ''अस्तित्वांतून कायमची निवृत्ति,'' या गोष्टींची चर्चा राहिली. ''आरंभी हें सर्व असत्'' होतें, या ''असत्'' मधून ''सत्'' उदयास आलें, असें प्राचीन शास्त्रग्रंथांत (तैत्तिरीय उपनिषद् २-७) म्हटलें आहे. अर्थात् शेवटीं असत् मध्यें सत् बुडून जावयास हवें, असा सिद्धांत निघतो. अनंत, अभिन्न, एकमेव सत् (अस्तित्व) अनेक, अनंत, भिन्न वस्तूंच्या द्वारां व्यक्त होतें, भेदाच्या सर्व शक्यतांना अस्तित्वांत येण्यास मान्यता देतें असें सिद्ध झालें असलें, तरी निदान असत् ब्रह्म म्हणून जी सर्वप्रथम अवस्था, जी एकमेव नित्यसत्यता आहे ती तरी सत्य विश्वाच्या शक्यतेला नकार देते कीं नाहीं? असा नकार असत् देत असेल तर, कांहीं बौद्धपंथ विश्वाचें आद्यंत आणि वर्तमान स्वरूप म्हणून ज्या शून्याचा पुरस्कार करतात, तें शून्यच खरें मानावें लागेल व संन्यासपंथाला विश्वाचें कोडे उलगडलें आहे असें म्हणावें लागेल आणि जशी व्यक्तीमधील अहंवृत्ति ही खोट्या बाह्य जाणिवेनें निर्मिलेली एक कल्पना मूर्ति आहे, तशीं आत्मा ही देखील तिनेंच तशीच निर्मिलेली दुसरी कल्पनामूर्ति आहे, असें मानावें लागेल.
परंतु असा शून्यवाद मानण्याचा प्रसंग येत नाहीं. असत्, अनास्तित्व हा केवळ शब्द आहे. आपलें मर्यादाबद्ध मन शाब्दिक भेदावर फार भिस्त ठेवतें. शब्दभेद पूर्णतया सत्य, अंतिम वस्तुभेद दाखवितात असा त्याचा समज होतो; आम्हाला अतिमानसक्षेत्रांत जें अनुभव येतात तें अनुभव आमचे मर्यादाबद्ध मन आपल्या संवयीच्या भेदनिष्ठ पद्धतीनें पाहते आणि त्यासंबंधानें अवास्तव भेदात्मक विरोधात्मक शब्दांत सिद्धांत बांधतें. सत् आणि असत् यांचा अनुभव हा अतिमानसिक अनुभव आहे. मनाला 'सत् च्या उलट तें असत्' असा अर्थ प्रतीत होतो, पण हा अर्थ खोटा आहे. असत् नें जी वस्तु दाखविली जाते तिचें परीक्षण केलें असतां असें कळून येतें कीं, खरोखरीचा अस्तित्वाचा सर्वस्वीं अभाव अशक्य आहे, ती एक मनाची कल्पना आहे, ज्याप्रमाणें सत् म्हणजे अस्तित्व, केवळ शांत विश्वहीन अनंत अस्तित्व अथवा आत्मा ही एक मनाची कल्पना आहे. सत् च्या पोटीं विश्व येतें ही जशी वस्तुस्थिति आहे त्याप्रमाणें या विश्वांत आपण असतां, जें वास्तव अस्तित्व आपल्या अनुभवाला येतें, किंवा ज्याची आपण कल्पना करूं शकतो त्या अनुभवांतील किंवा कल्पनेंतील जें सूक्ष्मांत सूक्ष्म, शुद्धांत शुद्ध वास्तव अस्तित्व असेल, त्याच्या पलीकडील
पान क्र. ५३
कांहींतरी अस्तित्व असा असत् चा अर्थ आहे. अमुक अशी स्पष्ट कल्पना देखील ज्याच्या संबंधानें आपण बांधूं शकत नाहीं तें असत्, अनास्तित्व; ही जी अनास्तित्वाची, अभावाची अवास्तव कल्पना आम्ही उभी करतो ती एवढ्याकरितां कीं, आम्हाला जे माहीत आहे किंवा होऊं शकतें, आम्ही जे कांहीं जाणीवपूर्वक आहोंत किंवा असतों, त्या सर्व गोष्टींच्या पलीकडील कांहीं गोष्ट आम्हाला सुचवावयाची आहे हें स्पष्ट व्हावें. सर्व ज्ञात, ज्ञेय गोष्टींना 'नाहीं नाहीं,' 'नेति नेति' म्हणून वगळण्याची पद्धति वरील अनस्तित्वाच्या कल्पनेच्या बाबतींत आम्हीं वापरली आहे. ही 'नेति नेति' पद्धति, अज्ञेय अननुभूत असें कांहीं व्यक्त करण्यासाठीं उपयोगात आणावी लागते. कांहीं दर्शनात ज्या शून्याचें मंडन सांपडतें, त्या शून्याचा बारकाईनें विचार केला तर आम्हाला दिसून येतें कीं, हें शून्य वस्तुत: ''सर्व,'' ''अनिर्वचनीय अनंत'' आहे. मनाला तें शून्य भासतें, याचें कारण मनाला सीमाबद्ध रचनाच फक्त समजतात. तेव्हां शून्य हें शून्य नसून त्याच्या उलट, एकच एक खरी सद्वस्तु आहे.*
सत्, असत् यांच्या संबंधानें विचार करण्यासारखी आणखी एक गोष्ट आहे. ''असत् पासून
सत् जन्मास आलें'' अशीं भाषा आपण वापरतो याचा अर्थ, ज्या वस्तू कालातीत कालनिरपेक्ष आहेत त्यांच्याविषयीं कालाची भाषा आपण वापरतों. 'असत्' नित्य शाश्वत स्वयंभू असतां त्याच्या इतिहासांत असा महान् दिवस येतो कीं, सत् (तसेंच शाश्वत् स्वयंभू) त्यापासून जन्म
-------------------------
*छांदोग्य उपनिषदांत म्हटलें आहे कीं, असत् पासून सत् चा जन्म होऊं शकत नाहीं. सत् चा जन्म सत् पासूनच होऊं शकतो. अर्थात् हें तैत्तिरीयांतील विधानाच्या बरोबर उलट विधान आहे. तथापि, असत् याचा अर्थ अभाव-सर्वाचा सर्वथा अभाव-असा न घेतां आपल्या अनुभवाच्या, आपल्या कल्पनेच्या पलीकडे असलेलें कांहींतरी 'क्ष' असा आपण घेऊं शकतो आणि हा अर्थ घेतला म्हणजे छांदोग्याच्या विधानांत जी अशक्यता प्रतिपादिली आहे ती प्रतिपादिण्याचा प्रसंग येत नाहीं. कारण हें 'क्ष' म्हणजे अद्वैताचें 'केवल ब्रह्म' असूं शकेल, त्याला बौद्धांचें 'शून्यहि' म्हणतां येईल, आणि हें 'क्ष' किंवा असत्, सत् चें जन्मस्थान होऊं शकेल; मग हें सत् तें स्वतःतून सृजनक्रियेनें किंवा आविष्करण क्रियेनें उभें करो, अथवा हें सत् कल्पनात्मक किंवा रूपात्मक मायेचा त्या असत् च्या आधारानें त्या आधारावर झालेला भ्रमोत्पादक व्यापार असो.
पान क्र. ५४
घेते ! आणि दुसरा असाच महान् भव्य दिवस येणार कीं, ज्या दिवशीं सर्व, मिथ्याभूत सर्व सत् (शाश्वत सत्) त्या शाश्वत शून्यांत विलीन होणार ! ही सर्व भाषा अर्थशून्य आहे. तेव्हां दोन्ही वस्तु आहेत असें म्हणावयाचें तर एकाच वेळीं दोन्ही आहेत असा अर्थ घेतला पाहिजे. या दोन वस्तु एकमेकींत मिसळत नाहींत पण एकमेकीला आधार देतात, एकमेकीला मान्यता देतात. कालाच्या भाषेंत बोलावयाचें तर दोन्ही शाश्वतकालीन आहेत; आणि यापैकीं एक शाश्वत सत् खरोखर नाहींच, आणि दुसरें शाश्वत असत् मात्र आहे, एकटें एक आहे, हें विधान शाश्वत सत् नें कसें मान्य करावें ! सर्वच्या सर्व अनुभव ''नाहीं'' या सदरांत घातला तर, सर्व अनुभवाचें समाधानकारक स्पष्टीकरण करणारें सत्य आम्हाला कसें सांपडणार?
तेव्हां सत् असत् यांसंबंधानें खोल विचार करतां पुढील निर्णय निघतो. शुद्ध सत् हें अज्ञेय परात्पराचें एक नांव आहे. असत् हें त्याचेंच दुसरें नांव आहे. विश्वाच्या सर्वच्या सर्व अस्तित्वाचा स्वयंभू पाया, आधार, अधिष्ठान या नात्यानें सत् हें नांव त्या परात्परानें घेतलें आहे. विश्वाच्या अस्तित्वाचा, विश्वाच्या कसल्याहि अस्तित्वाचा आधार म्हणा, बंधन म्हणा त्या परात्पराला नाहीं; तें तत्त्व सर्वथैव स्वतंत्र आहे. या दृष्टीनें त्याला असत् हें नांव दिलें जातें. वास्तव अस्तित्व व्यक्त करणारें कोणतेंहि भावात्मक नांव - जें विश्वांत व्यवहार करणाऱ्या जाणिवेला सुचूं शकेल तें - त्या परात्पराला देतां येत नाहीं, असा असत् या नांवाचा अर्थ आहे. विश्वांतील जाणिवेचा विषय होणारें अस्तित्व कितीहि तात्त्विक, कितीहि भेदातीत केवल स्वरूपाचें असो - तें अस्तित्व जेथें नाहीं तें, असा असत् या नावांतील भाव आहे. त्या अज्ञेय परात्पराला ''विश्वगत अस्तित्वापासून सर्वथैव स्वतंत्र'' म्हटलें आहे; त्यांत हा एवढा अर्थ भरलेला आहे. मात्र हें लक्षांत ठेवावें कीं, असत् या नांवानें असें सुचविलें जात नाहीं कीं, विश्वगत स्थूल, सूक्ष्म तात्त्विक केवल अस्तित्व, त्या परात्पराचें खरें आविष्करण नाहीं; तें नांव एवढेंच स्पष्ट करतें कीं, कोणतेंहि आविष्करण किंवा समुच्चयानें सर्व आविष्करण, त्या परात्पराला मर्यादित करीत नाहीं. तेव्हां हा निर्णय लागला कीं, असत् हें सत् ला तशीच अनुमति, मोकळीक देतें, जशी शांत सत् आपल्या प्रवृत्तिशील प्रकृतीला अनुमति, मोकळीक देतें. विरोधात्मक भासणारीं विधानें खरोखरी एकमेकांचीं पूरक विधानें असतात. सत् आणि असत् हीं पदें अशींच एकमेकांना
पान क्र. ५५
काट देणारीं नसून, एकमेकांचीं पूरक पदें आहेत. जो मानवात्मा जागृत झाला आहे त्याला एकाच वस्तूला एकाच वेळीं दिलेलीं (सत् आणि असत्) हीं दोन नांवें उपयोगी पडतात. आपला विज्ञानमय अंतरात्मा आणि त्याचे पलीकडे असणारें अज्ञेय तत्त्व, या दोन भिन्न गोष्टी नसून एकच सद्वस्तु - एकाच सद्वस्तूच्या दोन अवस्था - आहेत हा साक्षात्कार त्याला एकदम घडविण्यास हीं दोन नांवें कारणीभूत होतात. बुद्धानें निर्वाण प्राप्त करून घेऊन त्यानंतर विश्वांत अत्यंत प्रभावी कार्य केलें, याचें कारण त्याला वर सांगितलेला एकाच क्षणीं घडलेला दुहेरी साक्षात्कार होय. बुद्ध हा अंतर्यामी अत्यंत शांत त्रयस्थ वृत्तीचा असे, पण त्याच्या कार्यांत जगाला अत्यंत प्रभावी व्यक्तित्वाचा साक्षात्कार झाला. जगांत प्रभावी वैयक्तिक जीवन जगलेला व तितकेंच प्रभावी जागतिक कार्य करून गेलेला दुसरा महापुरुष विरळा.
ब्रह्मविषयक सत् असत् इत्यादि शब्दांचा जो ऊहापोह आतांपर्यंत केला आहे त्यावर विचार केला, तर हें लक्षांत येईल कीं, आपण जे शब्द वापरतों त्या शब्दांत स्वत:च्या योग्यतेबद्दल, खरेपणाबद्दल कितीहि अतिरेकी अहंभाव दिसला तरी त्यांत दुबळेपणाच पुष्कळ असतो, त्यांचा अहंभाव पुष्कळच मिथ्या असतो. त्याचप्रमाणें या शब्दांनीं कांहीं वस्तुभेद व्यक्त होत असला तरी तो वस्तुभेद पुष्कळसा भ्रामक व गोंधळ उत्पन्न करणाराच ठरतो. आम्ही विशिष्ट शब्दांच्या आहारीं जाऊन ब्रह्मावर ज्या मर्यादा घालीत असतों, त्याचें कारण वैयक्तिक मन, आपल्या अतिसंकुचित अनुभवाच्या आधारावर, अज्ञेय ब्रह्माच्या एखाद्या बाजूला आपल्या सर्व शक्तीनें उचलून धरतें आणि त्याच्या दुसऱ्या बाजू तुच्छ आहेत किंवा त्याला दुसऱ्या बाजू मुळीं नाहींतच असा आग्रह धरतें. त्या परात्पर केवल ब्रह्माविषयीं जें निश्चित किंवा अनुमानिक ज्ञान आपल्याला होतें त्याचा आपल्या विशिष्ट मर्यादित परिसराच्या भाषेंत अति कांटेकोरपणें अर्थ लावण्याकडे आपली प्रवृत्ति असते. याप्रमाणें, एकमेव अद्वितीय ब्रह्म एकच आहे, दुसरे म्हणून कांहीं नाहीं, त्यांत एकरसता आहे, त्याच्या पोटांत अनेकतेला वाव नाहीं, असें प्रतिपादन आम्हीं करतो तेव्हां, यांत आमचे वैयक्तिक एकांगी अनुभव आणि या अनुभवांवर आधारलेलीं आमचीं मतें, अहंभावानें आम्ही इतरांच्या तसल्याच एकांगी अनुभवापेक्षां आणि मतांपेक्षां वेगळी आहेत आणि निर्णायक आहेत, असें आवेशानें प्रतिपादीत असतो. अशी घाई करून मर्यादित अनुभवांवर भिस्त
पान क्र. ५६
ठेवून अहंतेनें सावेश एकांगी प्रतिपादन करण्यापेक्षां आपलें ज्ञान वाढावें, अनुभव वाढावा, बुद्धि वाढावी व सूक्ष्म व्हावी, यासाठीं वेळ देणें आणि अधिक ज्ञान व अनुभव मिळवून बुद्धि व्यापक व सूक्ष्म करणें अधिक शहाणपणाचें होईल. ब्रह्मासारख्या वस्तूचें मानवाच्या भाषेला यथार्थ वर्णन करतां येणें अशक्य आहे हें जाणून व आपल्याला पूर्णता मिळवावयाची तर या अवर्ण्य वस्तूंविषयी कांहीं भाषा करणें अवश्यच आहे, हें ओळखून आम्हीं प्रतिपादनाची भाषा शक्य तितकी व्यापक, लवचिक, सर्वसंग्रही ठेवावी आणि या व्यापक पायावर व्यापक व सर्वस्पर्शी सुसंवादाची उभारणी करावी, ही गोष्ट वर सांगितल्याप्रमाणें घाईघाईनें केलेल्या एकांगी प्रतिपादनापेक्षां अधिक समंजसपणाची होईल.
व्यक्तीच्या जाणिवेला खूप उंच चढतां येतें हें आम्ही वर मान्य केलें आहे. या जाणिवेला अशी अवस्था प्राप्त करून घेतां येतें कीं, जींत मर्यादित, सापेक्ष अस्तित्व समूळ विरून गेल्यासारखें भासतें, मुळींहि अनुभवास येत नाहीं; इतकेंच नव्हे तर शुद्ध अस्तित्व, ज्याला विशुद्ध आत्मा म्हणून आम्ही ओळखतो तो देखील असमाधानकारक कल्पना म्हणून विरून जातो. विशुद्ध आत्म्यालाच शांत आत्मा, ''सत्'' म्हणतात. या शांत आत्म्याच्या पलीकडे आणखी शांत अस्तित्व आहे, त्या शांत अस्तित्वाच्या - असत् च्या - अनुभवाची अवस्था वैयक्तिक जाणिवेला प्राप्त करून घेतां येते, ही गोष्ट आम्ही मान्य केली आहे. तथापि हा ''असत्'' चा अनुभव म्हणजे आमचा अंतिम सर्वच्या सर्व अनुभव किंवा हे शांत शांत ब्रह्म म्हणजे एकच एक सत्य वस्तु, बाकी सर्व वस्तु असत्य, या प्रतिपादनाला आम्ही मान्यता देतो असा याचा अर्थ नाहीं. कारण वस्तुस्थिति निराळी आहे. निर्वाण किंवा ''असत्'' मध्यें, शांत शांत ब्रह्मामध्यें आत्मा विलीन करणें, या क्रियेनें आत्म्याला अंतरींच्या अंतरीं निरतिशय शांति व स्वतंत्रता अनुभवास येते, हें जसें खरें आहे तसें हेंहि खरें आहे कीं, त्या आत्म्याला बाह्य संसारांत प्रभावी, परिणामकारक कार्य निर्हेतुकतेनें व निस्पृहतेनें करावयास ही अंतरींची गाढ शांति उपकारक होते. हा स्थूल, भौतिक जन्म दुख:मय - क्लेशमय आहे, त्यांतून कायमची सुटका करून घ्यावी अशी बुद्धाची निर्वाणाची शिकवण आहे असें जें मानण्यांत येतें, तें बरोबर नाहीं; इतकें क्षुद्र ध्येय त्याच्या शिकवणीनें आमच्या समोर ठेवलेलें नाहीं असें आम्ही मानतों. त्याच्या शिकवणीचें सार आम्हाला असें दिसतें कीं, आत्म्यानें प्राकृतिक अहंच्या पाशांतून स्वतःस मोकळें करावें; या अहं-
पान क्र. ५७
करितां, आत्मा जी कर्मांची शृंखला निर्माण करतो ती त्यानें निर्माण करूं नये; बदलणाऱ्या, रूपांतर पावणाऱ्या देह, मन इत्यादि नश्वर वस्तूंशीं तादात्म्य पावून, एकरूप होऊन वागणें त्यानें (आत्म्यानें) सोडून द्यावें; अंतरींच्या शांत शांत ब्रह्माशीं एकरूप व्हावें, तेथील आत्यंतिक निश्चलपूर्ण व्यक्तिशून्यता व पूर्ण शांति आपलीशी करावी आणि या भक्कम पायावर उभे राहून बाह्य संसारांत निरपेक्ष प्रेम, निरुपाधिक सत्य, निर्दोष साधुभाव या सनातन सत्प्रेरणांनीं आदेशिलेलीं कार्यें, आपलें सर्व सामर्थ्य ओतून करावीं. बुद्धाच्या शिकवणीसबंधींची आमची कल्पना खरी असो किंवा नसो, ही गोष्ट निश्चित आहे कीं, पूर्णतासंपन्न मनुष्य क्रियाशीलता आणि शांति, ''सत्,'' आपल्या ठिकाणीं एकत्र नांदवतो, त्याप्रमाणें पूर्ण जागृत जाणिवेचा आत्मा ''असत्'' चे निरतिशय स्वातंत्र्य मिळवूनहि ''सत्'' आणि विश्व यांजवरची आपली पक्कड सोडत नाहीं. ब्रह्म विश्वांत आहे, विश्वाच्या अनेकतेपलीकडे त्याचा पाया म्हणून आहे, आणि त्या पायापलीकडे विश्वनिरपेक्ष विश्वाधारनिरपेक्ष असेंहि त्याचें स्वरूप आहे. (अनुक्रमें सर्वगत ब्रह्म, सद्ब्रह्म, असद्ब्रह्म अशीं या तीन स्वरूपांचीं नावें आहेत). हा ब्रह्माचा, ब्रह्मजीवनाचा सनातन चमत्कार पूर्ण जागृत जाणिवेच्या आत्म्याच्या जीवनामध्येंहि नित्यशः प्रतिबिंबित होईल. अशा आत्म्याचें वैयक्तिक मन, सामान्य जाणिवेच्या अवस्थेंत, सर्व लक्ष लावून ''असत्'' चें ध्यान करूं लागलें म्हणजे त्याला पूर्ण जागृत मनाच्या उलट अनुभव येतो. त्या ध्यानानें ती व्यक्ति आत्मविस्मृतींत बुडून जाते, आणि विश्वकार्यांतून निवृत्त होते; पण हें विश्वकार्य शाश्वत ब्रह्माच्या जाणिवेंत सदैव चालूच असतें, ती व्यक्ति निवृत्त झाली असतांहि चालूंच असतें.
याप्रमाणें विश्वचैतन्यांत शुद्ध चैतन्य आणि जडतत्त्व यांचा समन्वय आपण साधला. नंतर विश्वातीत चैतन्यांत ''सर्व आहे'' आणि ''सर्व नाहीं'' या विधानांचा समन्वय कसा होतो हें आपण पाहिलें. तें अज्ञेय विश्वातीत ब्रह्मचैतन्य अमुक अवस्थेंत आहे, अमुक क्रिया करीत आहे, अशा अर्थाची ब्रह्मविषयक सर्व भावात्मक विधानें असतात, आणि ब्रह्माविषयींच्या त्याच गोष्टीसंबंधाच्या अभावात्मक विधानांचा अर्थ असा असतो कीं, त्या अमुक अवस्थेंत असतांना, ती अमुक क्रिया करतांना ब्रह्म पूर्णपणें स्वतंत्र व अलिप्त आहे; ती अमुक अवस्था, ती अमुक क्रिया, ब्रह्माला आवश्यक आहे असेहि मुळींच नाहीं. थोडक्यांत, तें ब्रह्म ''सर्व आहे'' आणि ''सर्व नाहीं'' हें आपण समजून घेतलें. तें आम्हाला सर्वथा
पान क्र. ५८
अज्ञेय, परात्पर, आश्चर्यमय, अवर्णनीय असें तत्त्व असून आमच्या जाणिवेला अविश्रांतपणें सारखे धक्के देत राहतें. आमच्या जाणिवेसमोर तें ब्रह्म एकामागून एक अनंत रूपें घेतें आणि टाकतें. त्याची ओळख करून घेण्यासाठीं आमची जाणीव सारखी धडपडत राहते. ब्रह्म तिला ही धडपड करावयास लावतें. अर्थात् एखाद्या लहरी जादुगाराची किंवा मत्सरी हीन देवतेची भूमिका कांहीं ब्रह्म घेत नाहीं. एक मिथ्या गोष्ट आम्हापुढें उभी करावी, ती नाहींशी करून तिजपेक्षां अधिक मिथ्या असणारी गोष्ट तिच्या जागीं आम्हासमोर ठेवावी, आणि असें करीत करीत सर्व कांहीं मिथ्या आहे, असें आम्हाला पटवून, आम्हाला संसाराचा वीट आणावा, हा कांहीं ब्रह्माचा उद्योग चाललेला नाहीं. हळू हळू अधिकाधिक ज्ञान देण्याचा कार्यक्रम ज्ञानी आंखतो त्याप्रमाणें ब्रह्मानें आमच्यासाठीं कार्यक्रम आंखलेला आहे. आम्हाला तें आपलीं सत्य रूपें, एकाहून एक अधिक सत्य अशीं रूपें क्रमानें दाखवीत जातें व अखेरीस आम्हाला आकलन होणें अशक्य नाहीं अशी सर्वांत मोठी व सर्वांत गंभीर मूर्ति, सत्याची मूर्ति, आपल्या स्वत:ची मूर्ति तें आम्हाला दाखवितें. ब्रह्म हें सर्वत्र सर्वदा वावरणारें सत्य आहे, सद्वस्तु आहे, तें सतत होणाऱ्या आभासाचें सर्वव्यापी अधिष्ठान किंवा सर्वगामी कारण नव्हे.
विश्वव्यापारांत आणि मनोव्यापारांत सुसंवाद, सुमेळ नांदावा यासाठीं ब्रह्मासंबंधाची वर सांगितल्याप्रमाणें फोड करून सुसंवादाला अवश्य असा भावात्मक आधार व पाया निर्माण केला गेला आहे. अशा भावात्मक आधारावांचून, पायावांचून आम्हाला इष्ट असलेला सुसंवाद लाभणें शक्य नाहीं हा आधार आम्ही मान्य केला म्हणजे अज्ञेय ब्रह्मासंबंधानें आमच्या मनानें जे सिद्धांत बसविले आहेत त्यांपैकीं प्रत्येक सिद्धांत मनाला, अग्राह्य अशा सत्यासंबंधानें कांहीं सांगत आहे, हें लक्षांत वागवून आम्हीं त्या सिद्धांतांची व्यवस्था लावली पाहिजे; या सिद्धांताचा अर्थ लावतांना शक्यतों त्यांचा अन्योन्यसंबंध नेहमीं लक्षांत ठेवला पाहिजे, शक्यतों त्यांचा जीवनावर होणारा संभाव्य परिणाम लक्षांत घेतला पाहिजे, केवळ एकेकटा सिद्धांत घेऊन त्याचा स्वतंत्रपणें, लागेल तो अर्थ लावतां कामा नये. कोणताहि सिद्धांत दुसऱ्या कोणत्याहि सिद्धांताला खोटें ठरवील, बहिष्कृत करील किंवा अगदींच गौण स्थान देईल, असा कोणत्याहि सिद्धांताचा अर्थ लावता कामा नये. खरें अद्वैत तें, जें सर्व वस्तू एक ब्रह्मच आहे (झालें आहे) हें मान्य करतें; त्या ब्रह्माचे दोन सारखे तुकडे करून
पान क्र. ५९
त्याच्या अस्तित्वांत बरोबर मध्यभागीं एक विभागणारी रेषा काढून, एका वस्तूंतून दोन अन्योन्य विसंवादी वस्तू निर्माण करूं पाहणें हें खऱ्या अद्वैताचें काम नव्हे : या दोन विसंवादी वस्तू शाश्वत सत्य व शाश्वत भ्रम, ब्रह्म आणि अब्रह्म, आत्मा आणि अनात्मा, खरा आत्मा आणि खोटी पण शाश्वत माया, अशा नांवानें ओळखल्या जातात. या वस्तू खरे अद्वैत ओळखीत नाहींत. ब्रह्म एकच जर आहे, आत्मा एकच जर आहे, तर सर्व जें कांहीं आहे तें आत्मा आहे, ब्रह्म आहे हें ओघानेंच येतें, आणि आत्मा म्हणा, ईश्वर म्हणा, ब्रह्म म्हणा, जर असहाय अवस्था, मर्यादित शक्ति किंवा सीमाबद्ध व्यक्ति अशापैकीं कांहीं नसून स्वत:ची पूर्ण जाणीव असलेलें सर्व (सर्वात्मक एक) आहे, तर त्या अव्यक्तानें हें व्यक्त विश्वाचें जें रूप धारण केलें आहे, तें धारण करण्यांत त्याचा कांहींतरी अंतरींचा चांगला हेतु असला पाहिजे, असें मानावें लागतें. हा हेतु काय असावा याचा बरोबर शोध लागण्यासाठीं, आम्हाला ही गोष्ट तात्पुरती तरी गृहीत धरून चालावयास हवी कीं, जें जें व्यक्त झालेलें आहे त्यांत सर्वत्र कांहींतरी गुप्त सामर्थ्य, कांहींतरी गूढ समंजसपणा, कांहींतरी खरे अस्तित्व, ब्रह्माचें अस्तित्व नांदत आहे. जगांत उघड दिसणारा जो बेबनाव, उघड दिसणारें जें अमंगल आहे, तें त्या त्या क्षेत्रांत आहे हें मान्य करूनहि आम्हाला हें तत्त्वत: मान्य करतां येणार नाहीं कीं, आम्हाला आमच्यातील बेबनाव व अमंगलता नेहमींच सतावीत राहतील, आमच्यावर त्यांची सत्ता नेहमींच अबाधित राहील. मानवाच्या मनांत अगदीं खोल अशी सहजभावना आहे कीं, विश्वाची उभारणी ही शाश्वत भ्रमाची, शाश्वत विडंबनाची उभारणी नव्हे; सर्वसृष्टिसमर्थ, अजिंक्य अशा अमंगलानें ही उभारणी केलेली नाहीं, तर या उभारणीच्या मुळाशीं पूर्ण प्रज्ञा आहे, गूढ व अंतत: विजयी होणारें मंगल आहे; आणि ही विश्वाची उभारणी करून त्यांत भ्रमंती करणारा महान् साहसी आत्मा, आपले महान् साहस चुकीचें झालें असे म्हणून निराश होऊन त्यापासून निवृत्त होणारा नाहीं, तर येथील सर्व आभासमय अमंगलावर, बेबनावावर शेवटीं विजय मिळवून कृतार्थ होणारा आहे - या भावनेनें प्रेरित होऊन विश्वव्यवस्थेमागें असलेली पूर्णप्रज्ञा पाहून नेहमीं मंगलाचा अंतिम विजय साधण्याचा यत्न करणें हेंच खरें शहाणपण आहे.
विश्वाचें मूळ कारण एकमेव सत्ता, एकच एक आत्मा आहे असें मान्य केल्यानंतर आम्हां मानवांना ही कल्पनाच करतां येत नाहीं कीं, या अद्वितीय आत्म्याला दुसऱ्या कोणाकडून, दुसऱ्या कशाकडून, ''बाहेरून''
पान क्र. ६०
कसलीहि सक्ती होत असेल; कारण या आत्म्याला ''बाहेर'' असें कांहीं नाहींच, कोणी नाहींच. या आत्म्याच्या बाहेर कांहीं नाहीं, हें मान्य करून कोणी असें म्हणेल कीं त्याचा जो एक अंश त्याच्या सगळ्या अस्तित्वाचा विरोधी आहे, त्या अंशाचें हा आत्मा नाखुषीनें ऐकतो; याचें सगळें अस्तित्व त्या अंशाला बहिष्कारीत असतें. परंतु तो अंश हा बहिष्कार पचवून सगळ्या अस्तित्वावर कुरघोडी करण्याइतका समर्थ असतो. पण ही अंशाची कल्पना, वेगळ्या शब्दांत वरचीच ''बाहेरून'' सक्ती होत असल्याची कल्पना आहे. ''सर्व'' आणि त्यावर सक्ती करणारें ''सर्वाच्या बाहेरचें कांहीं तरी'', असा हा अर्थशून्य विरोध आहे. विश्वाच्या अस्तित्वाचें कारण, आत्म्यावर झालेली किंवा होणारी ''बाहेरच्या'' किंवा ''आंतल्या'' कोणाची तरी, कशाची तरी सक्ती, ही कल्पना अर्थशून्य म्हणून टाकून दिल्यानंतर, आणखी एका कल्पनेचा विचार करणें प्राप्त आहे. आत्मा अगदीं तटस्थ आहे, कोणत्याहि गोष्टी घडोत, त्या घडूं देण्याची त्याची वृत्ति आहे, घडणाऱ्या व घडूं शकणाऱ्या घटना सारख्याच तटस्थ दृष्टीनें तो बघत असतो. आत्मा असा तटस्थ आहे म्हणूनच केवळ विश्व अस्तित्वांत येतें, अस्तित्वांत राहतें, अशी ही दुसरी कल्पना आहे. पण येथें असा प्रश्न उत्पन्न होतो कीं, विश्व अस्तित्वांत येण्यास व अस्तित्वांत राहण्यास कोणाची तरी इच्छाशक्ति मूळ कारण म्हणून व आधार म्हणून आवश्यक आहे. मग ही इच्छाशक्ति कोणाची ? ''सर्व'' म्हणून जें एक तत्त्व, सर्वात्मक एकतत्त्व, आत्मा आहे त्यावांचून दुसऱ्या कोणाची ही इच्छाशक्ति असूं शकेल ? कोणाचीहि असूं शकणार नाहीं. तेव्हां आत्मा तटस्थ असो, नसो; त्याच्या इच्छेनें विश्व होतें आणि राहतें, ही गोष्ट मानल्यावांचून गत्यंतर नाहीं. हा आत्मा, ब्रह्म, अविभाज्य आहे. विभक्त भासणाऱ्या सर्व वस्तूंत तें ब्रह्म अविभक्तपणें राहतें. कोणाच्याहि इच्छेनें या विश्वांत कांहींहि घडो, त्या घटनेच्या मुळाशीं अंतिम इच्छा ब्रह्माचीच असते. आमच्या मर्यादित, सीमासापेक्ष, अंशदर्शी जाणिवेला या विश्वांत अमंगल, अज्ञान, असुख अशा घटना प्रतीत होतात आणि या गोष्टींनीं घाबरून व हतबुद्ध होऊन, या उद्वेगजनक गोष्टी निर्माण करणारें तत्त्व ब्रह्माहून वेगळें कांहींतरी आहे अशी कल्पना, ही जाणीव करते, व 'माया', 'मार', 'सैतान', 'स्वयंभू अमंगल तत्त्व' अशीं नांवे त्या तत्त्वाला देते; आमच्या मर्यादित जाणिवेकडून हा सर्व खटाटोप ब्रह्माला या जबाबदारींतून मोकळें करण्यासाठीं होत असतो. वस्तुत: ब्रह्म हेंच एक विश्वाचा आत्मा
पान क्र. ६१
आहे. ज्यांनीं विश्व बनते त्या सर्व वस्तू व घटना ब्रह्माची स्वयंकृत प्रतीकें आहेत; ब्रह्माचे ते विकार आहेत. (घट हा मातीचा विकार असतो त्याप्रमाणें) मात्र हे स्वयंनिर्मित विकार आहेत.
विश्व हें स्वप्न आहे, आभास आहे, भ्रम आहे, प्रमाद आहे असें म्हणण्यांत येतें. विश्व हें स्वप्न म्हटलें तर तें सर्वच्या सर्व स्वप्न आत्म्यानें, ब्रह्मानें आपल्या इच्छाशक्तीनें निर्मिलें आहे, त्याच्या आधारानें तें चाललें आहे आणि शाश्वत चालणार आहे; तें सत्याच्या, सद्रूपाच्या पोटांत चाललेलें आहे. ब्रह्म एकच एक असल्यानें विश्वाचा पायाहि तेंच आणि त्याला सामावून घेणारें ''आकाशहि'' तेंच. भांडें सोन्याचें हें मान्य केल्यावर, सोनें तेवढें खरें आणि भांडें खोटें आभासात्मक, मृगजलासारखें, ही कल्पना कशी करावी ! तेव्हां स्वप्न, आभास हे शब्द म्हणजे, आमच्या मर्यादित जाणिवेला संवयीच्या झालेल्या शाब्दिक कोट्या आहेत; या शब्दांत कांहीं थोर सत्यहि व्यक्त झालेलें आहे. तथापि तें विकृत, अवास्तव स्वरूपांत व्यक्त झालेलें आहे. आपण पाहिलें आहे कीं, असत् हें खरोखरी अस्तित्वाचा अभाव नसून त्या अभावावेगळा कांहीं भाव, भावात्मक वस्तु आहे; त्याप्रमाणें विश्वस्वप्नाची गोष्ट आहे. विश्वस्वप्न हें मनानें निर्माण केलेला आभास नव्हे, भ्रम नव्हे. विश्व ज्या घटनांचें बनतें, त्या घटना आभासात्मक नाहींत, त्या घटना, सत्याचीं सत्य-द्रव्यघटित रूपें आहेत.
सत्य, सद्वस्तु ब्रह्म सर्वव्यापी आहे ही आपली पायाभूत अनुभवाधिष्ठित कल्पना आहे. असत् एका टोंकाला, विश्व दुसऱ्या टोंकाला, या ब्रह्माच्या दोन अवस्था आहेत, नाण्याच्या जणुं दोन बाजू आहेत. असत् किंवा विश्व दोन्ही वस्तू अभावात्मक, आभासात्मक नाहींत, ब्रह्माच्या, सत्याच्या त्या दोन सत्य अवस्था आहेत. विश्वांत ब्रह्माचा जो सर्वांत श्रेष्ठ अनुभव येतो, त्यांत ब्रह्म हें केवळ, पूर्ण जाणीवयुक्त अस्तित्वच नव्हे, तर सर्वोत्तम बोधशक्ति आणि क्रियाशक्ति, तसेंच स्वयंभू आनंद पण आहे अशी प्रतीति येते. विश्वाच्या पलीकडे ब्रह्माचें जें असत् रूप आहे तें अज्ञेय असें विश्वावेगळें अस्तित्व असून तेंहि सर्वोच्च सर्वशब्दातीत आनंदानें भरलेलें आहे. अशी वस्तुस्थिति असल्यानें, आम्ही असें तर्कशुद्ध अनुमान काढू शकतो कीं, विश्वांत जीं सुख-दुःख, मंगल-अमंगल, ज्ञान-अज्ञान आदि द्वंद्वें दिसतात, तीं आमच्या मर्यादित इंद्रियांच्या व मर्यादित मनाच्या संवेदनांनीं व कल्पनांनीं प्रतीत होतात; आमची बोधशक्ति,
पान क्र. ६२
आमची अनुभवशक्ति सध्यांच्या मर्यादा ओलांडून पूर्णपणें बंधनांच्या बाहेर पडली म्हणजे हीं द्वंद्वें आम्हाला दिसणार नाहींत, तर त्यांच्या जागीं पूर्ण ज्ञान, पूर्ण सुख आदि ब्रह्माचे अनुभवच आमच्या वांट्यास येतील. आज आम्ही द्वंद्वांच्या माऱ्यांत, त्यांच्या दडपणाखाली आहोंत, पण आजच्या द्वद्वांचें मुक्त स्थितींत होणारें स्वरूपांतर आमच्या अनुभवास येईल, ही आजची आमची कल्पना श्रद्धेच्या जोरावरच आम्हीं टिकवूं शकतों. ही श्रद्धा अयुक्त आहे असें आमची सूक्ष्मतम उच्चतम बुद्धि, आमचा अतिशांत आणि अतिव्यापक विचार सांगत नाहीं; उलट या श्रद्धेला त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. पूर्णतेच्या दिशेनें चाललेला प्रवास करतांना भक्कम आधार असावा म्हणून ही सुविवेक-संमत श्रद्धा मानवतेला दिलेली आहे. मानवता विकासक्रमानें अशा अवस्थेला येणारच आहे कीं, जेव्हां ही श्रद्धा ज्ञानाचें आणि पूर्ण स्वानुभूतीचें रूप घेईल, आणि पूर्ण प्रज्ञा (ब्रह्म) जें विश्वकार्य चालवीत आहे, तें उत्कृष्ट रीतीनें चालवीत आहे असा निर्णय मानवता स्वयंस्फूर्तीनें देईल.
पान क्र. ६३
Home
Sri Aurobindo
Books
SABCL
Marathi
Share your feedback. Help us improve. Or ask a question.