दिव्य जीवन 1879 pages 1960 Edition
Marathi Translation
  Senapati Bapat

ABOUT

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics, expounding a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth.

THEME

philosophymetaphysics

दिव्य जीवन

Sri Aurobindo symbol
Sri Aurobindo

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.

Sri Aurobindo Birth Centenary Library (SABCL) The Life Divine Vols. 18,19 1070 pages 1970 Edition
English
 PDF    philosophymetaphysics
Sri Aurobindo symbol
Sri Aurobindo

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.

Marathi Translations of books by Sri Aurobindo दिव्य जीवन 1879 pages 1960 Edition
Marathi Translation
Translator:   Senapati Bapat  PDF    LINK

प्रकरण आठवें

स्मृति, आत्म-जाणीव आणि अज्ञान

 

विश्वाचें कारण ''स्वभाव'' आहे असें कोणी म्हणतात, कोणी तें कारण ''काल'' आहे असें म्हणतात.

- श्वेताश्वतर उप० ६.१

 

ब्रह्माचीं दोन रूपें आहेत. एक कालातीत रूप आणि दुसरें काल. 

- मैत्री उप० ६.१५

 

प्रथम रात्र जन्मास आली, त्या रात्रीपासून अस्तित्वाचा प्रवाही सागर जन्मास आला, या सागरावर काल जन्मास आला; दृष्टि (जाणीव) असलेला प्रत्येक प्राणी, कालाच्या शासनाखालीं (दिलेला) आहे.

- ऋग्वेद १०-१९०-१,

 

नाम... आकाश यांहून स्मृति श्रेष्ठ आहे, स्मृति नसेल तर मनुष्यांना विचार करतां येणार नाहीं, आणि ज्ञान मिळवितां येणार नाही; ... स्मृतीची गति जेथवर आहे, तेथवर (स्मृति ब्रह्म आहे या भावनेनें स्मृतीची उपासना करणारा जो आहे) त्याची गति त्याच्या इच्छेनुसार होऊं शकते.

- छान्दोग्य उप० ७.१३

 

आमच्या ठिकाणीं जो पाहतो, स्पर्श करतो, ऐकतो, हुंगतो, चव घेतो, विचार करतो, जाणतो, क्रिया करतो तोच विज्ञानात्मा पुरुष होय.

- प्रश्न उप० ४.९

 

आमची सामान्य अवस्था पाहतां, आमची जाणीव अज्ञानाच्या अवस्थेंतून ज्ञानाच्या अवस्थेंत जाण्याचा प्रयत्न करीत आहे हें आम्हांस स्पष्ट दिसतें, म्हणून आमच्या दुहेरी जाणिवेची तपासणी करतांना अगोदर अज्ञानाची तपासणी करणें युक्त आहे. अज्ञान म्हणजे आत्म्याचें आणि वस्तुजाताचें मर्यादित ज्ञान; पूर्ण आत्मविषयक व वस्तुविषयक ज्ञान आणि पूर्ण नेणीव (अचेतनता) या दोन जाणीवदशा दोन बाजूंना

पान क्र. ३६४

 

(एक वर व एक खालीं) आणि मध्यें अज्ञान अशी अज्ञानाची मध्यस्थ दशा आहे. या अज्ञानाच्या कांहीं मूलभूत हालचाली प्रथम तपासावयाच्या आणि नंतर या अज्ञानाच्या (पृष्ठस्थ जाणिवेच्या) खाली जी श्रेष्ठतर जाणीव आहे, त्या जाणिवेशीं या अज्ञानाचें नातें काय आहे तें शोधून काढावयाचें असा तपासणीचा क्रम ठेवणें अवश्य आहे. अशी एक विचारसरणी आहे कीं, स्मरण जें कार्य करतें तें अत्यंत महत्त्वाचें आहे; मनुष्य म्हणजे त्याची स्मरणक्रिया, जेवढी ज्याच्यांत स्मरणक्रिया तेवढेंच त्याच्यांत मनुष्यत्व, आमचें व्यक्तित्व स्मृतीनें बनतें, आमच्या मानसिक अस्तित्वाचा पाया स्मृतीच्या मळलेल्या चुन्यानें (सीमेंटनें) भक्कम टिकाऊ बनतो; आमचे अनुभव एकत्र जोडण्याचें काम स्मृतीचें सीमेंट (दगडी चूर्ण, मळलेला चुना) करतें, तसेंच हे जोडलेले अनुभव एकाच व्यक्तीला जोडण्याचें कामहि स्मृतीच करते. स्मृतीचें हें अनेकविध महत्त्वाचें कार्य लक्षांत घेऊन मनुष्याची स्मृति म्हणजेच मनुष्य असें कोणी कोणी म्हणतात. या कल्पनेंत कालाच्या क्रमांतील जें आमचें अस्तित्व त्या अस्तित्वावर भर दिलेला आहे. तात्विक मूलभूत सत्य क्रमबद्ध क्रियेच्या-प्रक्रियेच्या अंकित असतें, अशी या कल्पनेंतील गृहीत गोष्ट आहे; आमचें सर्वच अस्तित्व प्रक्रियारूप आहे, कारण-कार्य रूप आहे, स्वयंनियंत्रित शक्तीच्या कार्यकारणमय विकासाच्या स्वरूपाचें आहे, कर्मरूप आहे असें कांहीं या कल्पनेंत मान्य केलेलें नाहीं, पण तात्विक किंवा मूलभूत सत्य हें प्रक्रियारूप, प्रक्रियांकित असतें ही गोष्ट या कल्पनेचा गाभा आहे; म्हणून ही वस्तुस्थिति स्पष्ट करणें अवश्य आहे कीं, प्रक्रिया किंवा क्रियाक्रम ही साधन-सामग्री आहे. वस्तुजाताचें खरें जें सत्य, त्याला उपयोगी पडणारें असें एक साधन म्हणजे विशिष्ट प्रक्रिया होय. वस्तूंच्या कांहीं विशिष्ट परिणामकारक संबंधाचा कांहीं विशिष्ट परिणाम घडवून आणण्यासाठीं रूढ झालेला उपयोग म्हणजे विशिष्ट प्रक्रिया. परिणाम भिन्न हवे असले, तर प्रक्रिया भिन्न उपयोगावी लागेल. एकाच परिणामासाठीं भिन्न भिन्न वस्तुसंबंध सारखेच उपयोगी पडूं शकतील. इत्यर्थ हा कीं, प्रक्रियेमध्यें वस्तुसत्य नसतें, तें प्रक्रियेच्या मागें असतें; प्रक्रियेचें स्वरूप निश्चित करणें, तिची नियंत्रणा करणें, ती घडवून आणणें हें काम प्रक्रियेच्या मागें राहून खरें वस्तुसत्य करीत असतें. वस्तुक्रिया (प्रक्रिया) वेगळी आणि वस्तुसत्य वेगळें; वस्तुसत्य हें वस्तुक्रियांकित (प्रक्रियांकित) किंवा वस्तुक्रियारूप नसतें;

पान क्र. ३६५

 

वस्तुक्रिया ही वस्तुसत्यांकित असते. वस्तुसत्य हें क्रियेंत (विशिष्ट परिणाम घडवून आणण्याच्या क्रियेंत) नसून या क्रियेच्या पाठीमागें जी इच्छा, जी शक्ति असते, त्या इच्छेंत, त्या शक्तींत असतें. किंवा असें म्हणणें अधिक सत्य आहे कीं, जाणीवयुक्त आत्मा हें खरें वस्तुसत्य आहे, कारण जाणिवेचें एक रूप, क्रियाशील रूप म्हणजे इच्छा किंवा संकल्प आणि आत्म्याचें क्रियाशील रूप किंवा गुण म्हणजे शक्ति होय. स्मृति ही विशिष्ट प्रक्रिया, आमच्या जाणिवेची एक क्रियापद्धति आहे; ती एक उपयुक्त साधन-सामग्री आहे. आमच्या अस्तित्वाचा गाभा, आमचें सगळें अस्तित्व, व्यक्तित्व म्हणजे स्मृति असें होऊं शकत नाहीं; प्रकाशाची एक क्रिया किरणोत्सर्ग ही असते, तशी जाणिवेची एक क्रिया स्मृति ही आहे. स्मृति म्हणजे मनुष्य नव्हे. आत्मा म्हणजे मनुष्य -- अथवा आम्ही आमच्या बाह्य सामान्य अस्तित्वाचाच विचार करावयाचें म्हटलें तर मन म्हणजे मनुष्य होय. मनाच्या ठिकाणीं अनेक शक्ती आहेत, अनेक प्रक्रिया आहेत, त्यांपैकीं एक ही स्मृति होय, आणि मन हें आत्मा, विश्व आणि निसर्ग यांच्याशीं घडणाऱ्या आमच्या व्यवहारांतील सांप्रतची मुख्य अशी मूळ आत्माच्या जाणिवेची क्रिया होय.

अज्ञानाच्या स्वरूपाची छाननी करतांना प्रथम या स्मृतीच्या तपासणीपासून सुरुवात करणें उपयुक्त होईल. आमच्या जाणीवयुक्त अस्तित्वाच्या कांहीं महत्त्वाच्या बाजूंवर स्मृतीच्या तपासणीनें प्रकाश पडू शकेल. स्मृतीची शक्ति किंवा प्रक्रिया दोन प्रकारें मन उपयोगांत आणीत असतें. आत्म्याची (आपली स्वतःची) स्मृति आणि अनुभवाची स्मृति हे ते दोन प्रकार होत. आमचें जाणीवयुक्त अस्तित्व (आत्मा) ही जी सत्यवस्तु आहे, तिच्या संबंधांत मन आपल्या स्मृतीचा उपयोग करते आणि या अस्तित्वाचा (आत्म्याचा) कालाशीं संबंध जोडतें. मनाचा हा मूलभूत, प्रथम व्यापार होय. मन आत्मरूपानें म्हणतें : ''मी आतां आहे. पूर्वीं होतों म्हणून पुढेंहि असेन; वर्तमान, भूत, भविष्य हे कालाचे जे नित्य अस्थिर पोटभाग, त्या सर्व भागांत मी तोच तो आहे'' आत्मा  (जाणीवयुक्त अस्तित्व) नित्य आहे असें मनाला वाटतें, पटतें पण त्याला तसें ज्ञान होऊं शकत नाहीं, त्याला ही गोष्ट सिद्ध करतां येत नाहीं, पण त्याला जें वाटतें तें कालाच्या भाषेत तें ''मी आतां आहे वगैरे''

अशा प्रकारें मांडण्याचा, स्वतःसाठीं मांडण्याचा प्रयत्न करतें. स्मृतीचा उपयोग करून आपलें भूतकालीन अस्तित्व मनाला समजतें, वर्तमान

पान क्र. ३६६

 

क्षणांतील त्याचें अस्तित्व त्याला प्रत्यक्ष आत्म-जाणिवेनें कळतें; स्वत:च्या अस्तित्वाचा केवळ भूतकालीन भाग स्मृतीच्या योगें मनाला ज्ञात होतो; प्रत्यक्ष आत्मज्ञानानें केवळ वर्तमान क्षणांतील आपलें अस्तित्व मनाला ज्ञात होतें, पण स्वत:च्या भविष्यकालांतील अस्तित्वाची कल्पना जी मनाला येते, ती केवळ अनुमानानें येऊं शकते; वर्तमान क्षणांतील अस्तित्वाची प्रत्यक्ष आत्म-जाणिवेनें होणारी जाणीव, पुढील क्षणीं अनुमानानें गृहीत धरून, अस्तित्वाची प्रत्यक्ष जाणीव अखंडपणें बराच काळ टिकून असल्याची ग्वाही स्मृति देत असते; त्या ग्वाहीचा अनुमानाला पाठिंबा घेऊन, 'आपण भविष्यकाळांत टिकणार,' अशी कल्पना मन करीत असतें. आपला भूतकाल आणि भविष्यकाल किती दूर न्यावयाचा हें मनाला निश्चित करतां येत नाहीं. स्मृतीच्या बळावर मन आपला भूतकाळ स्मृति म्हणेल तेथवर, मागें नेतें, स्मृतीची मर्यादा आली म्हणजे दुसऱ्यांचा पुरावा घेऊन, सभोंवतालच्या घटना, जीवनाच्या घटना लक्षांत घेऊन मन असें अनुमान करतें कीं, त्याला आठवत नाहीं अशा भूतकाळांत आत्मा (जाणीवयुक्त अस्तित्व) अस्तित्वांत होता; तें स्वत: अस्तित्वांत होतें. बालमन, विचार करण्यास असमर्थ असें मन स्मृतींतून नाहींसें होतें, पण असें मन असतां 'आपण अस्तित्वांत होतो' असें, दुसऱ्यांच्या व जीवन घटनांच्या पुराव्यानें प्रौढ मन म्हणूं शकतें; पण शारीर जन्म होण्यापूर्वीं, प्रस्तुत देहधारणापूर्वीं आपलें अस्तित्व, आत्म्याचें अस्तित्व होतें कीं नाहीं हें मर्त्य मन, स्मृतीच्या क्रमांत खिंड पडल्यानें, मुळींच सांगूं शकत नाहीं. भविष्यकाळाची गोष्ट अगदींच वेगळी; त्या संबंधानें मनाला मुळींच ज्ञान नसते, पुढल्या क्षणी स्वत:चें व आत्म्याचें अस्तित्व टिकून राहील, असें तें केवळ प्रबळ संभवाच्या आधारावर म्हणूं शकतें; पण या पुढल्याहि क्षणीं कांहीं तरी अनपेक्षित घडून त्याचें संभाव्य अस्तित्व संपुष्टांत येऊं शकतें; त्याचा, आत्म्याचा, जाणीवयुक्त अस्तित्वाचा भौतिक समाप्तीबरोबर, देहाच्या अंताबरोबर कायमचा अंत होतो किंवा कसें या संबंधानें मनाला कांहींहि ज्ञान असणें, मिळणें शक्य नाहीं, तरीपण आत्मा टिकून राहतो, देहाबरोबर आत्म्याचा व स्वत:चाहि अंत होत नाहीं ही भावना मनाला असते, आणि ही भावना आत्मा नित्य टिकणारा आहे, आपण नित्य आहों अशा निश्चयाचें रूप सहज घेते, घेऊं शकतें.

      मनामध्यें ही नित्यत्वाची निश्चिति कोठून येते ? अनन्त भूतकाल मनानें अनुभवलेला असतो, पण तो विसरलेला असतो; या विसरलेल्या

पान क्र. ३६७

भूतकाळाचा आकारशून्य संस्कार त्याचे पोटीं राहतो; या संस्काराचें प्रतिबंब स्वत:च्या नित्यत्व-निश्चितीच्या रूपानें प्रस्तुत देहांतील मनात उमटतें असें म्हणतां येईल. असेंहि असूं शकेल कीं, आमच्या अस्तित्वाच्या प्रस्तुत पातळीच्या वरच्या, किंवा तिच्या खालीं खोल असलेल्या विशिष्ट पातळीवर आमच्या नित्य अस्तित्वाचें ज्ञान आम्हांला असतें, हें ज्ञान प्रस्तुत मनाला त्या पातळीवरून कांहीं कारणानें प्राप्त होतें आणि या आत्म-ज्ञानाची छाया म्हणून त्याला स्वत:च्या व आत्म्याच्या अमरत्वाची, नित्यत्वाची निश्चिति वाटते. तिसरी शक्यता आत्म्याचें अमरत्व हा भ्रम असूं शकेल. आमचें मरण आमच्या भविष्यदर्शी जाणिवेनें आम्हांला निश्चितीनें जाणतां येत नाहीं, आपलें मरण ही आपल्या बुद्धीची एक कल्पना असते, ठळक असें त्याचें चित्र आम्ही मनांत उभें करूं शकतों, पण, आम्ही केवळ वर्तमान क्षणींचें जीवन अनुभवूं शकत असल्यानें आमच्या भावी मरणाचा अनुभव आम्हांला येऊं शकत नाहीं -- तथापि मरण वा देहाची इतिश्री ही व्हावयाचीच असते, आणि प्रस्तुत देहांत आम्ही कांहीं एका अनिश्चित मुदतीनंतर असूं शकूं ही आमची (आमच्या मनाची) कल्पना भ्रमरूप असते, -- तशी आत्म्याच्या (जाणीवयुक्त अस्तित्वाच्या) नित्यतेची, अमरत्वाची त्याची कल्पनाहि भ्रमरूप असूं शकेल. चौथी शक्यता : विश्व हें नित्य आहे, किंवा विश्वातीत असें कांहीं तत्त्व नित्य आहे -- अर्थात् आम्हांहून इतर कांहींतरी जाणीवयुक्त किंवा जाणीवशून्य असें नित्य टिकणारें आहे ही जाणीव आम्हांला, आमच्या मनाला होते आणि तें मन ही नित्यता स्वत:कडे, स्वत:च्या आत्म्याकडे अकारण ओढून घेते -- आणि वस्तुत: हा आमचा आत्मा, हें आमचें जाणीवयुक्त अस्तित्व, त्या खऱ्या नित्यवस्तूचें अनित्य असें रूप आहे, अनित्य असा विकार आहे.

      आमचें पृष्ठवर्ती मन हे प्रश्न स्वत:च्या बळावर सोडवूं शकत नाहीं. या प्रश्नांवर तें अनंत विचार उभे करूं शकतें. कमी अधिक युक्तिसंगत अशीं मतेंहि तें या प्रश्नासंबंधानें बनवूं शकतें. पण आत्म्याचें अमरत्व काय, किंवा मर्त्यत्व काय दोन्ही बाबतींत आम्ही केवळ श्रद्धेला शरण जातों; दोन्ही केवळ विश्वासाच्या बाबी आहेत. जडवादी हें सिद्ध करूं शकत नाहीं कीं, आमची जाणीव देह मरतांक्षणीं नाहींशी होते; अद्यापि असाहि खात्री करणारा पुरावा नाहीं कीं, आमचें शरीर पडल्यानंतर आमच्यांतील जाणीवयुक्त कांहींतरी अस्तित्वांत राहतें -- एवढेंच जडवादी म्हणूं शकेल. पण उलट पक्षीं, शरीर पडल्यानंतर असें कांहीं

पान क्र. ३६८

 

तरी अस्तित्वांत राहत नाहीं असाहि पुरावा नाहीं, आणि असूं शकत नाहीं. शरीर पडल्यानंतर मनुष्य-व्यक्ति अस्तित्वांत असते ही गोष्ट शंकेखोराला पुढें पटवून दिली जाईल, हें शक्य आहे; पण त्यावरून एवढेंच सिद्ध होईल कीं, शरीराहून आंतील जाणीवयुक्त व्यक्ति अधिक टिकणारी आहे; ती नित्य टिकणारी आहे, असें कांहीं त्यावरून सिद्ध होणार नाहीं.

      मनाची नित्यताविषयक जी कल्पना आहे तिची तपासणी केल्यास असें दिसतें कीं, काल नित्य आहे व नित्यकालांत अस्तित्वाच्या क्षणांचा क्रम अखंड असतो, अशी ती कल्पना आहे. जाणीवयुक्त अस्तित्व (आत्मा) एक क्षण, दुसरा क्षण, तिसरा क्षण असें अखंडपणें, क्षणांनीं बनणाऱ्या नित्यकालांत टिकणारें आहे -- अशी ती कल्पना मांडतां येते. यांत आत्म्याची नित्यता सांगितली नसून, काळाची नित्यता सांगितली आहे. नित्यकालाच्या घटकभूत क्रमशील क्षणाक्षणांत आत्मा अखंडपणें असतो असें तें आत्म्यासंबंधींचें विधान आहे. आतां मनाची तपासणी केल्यास असा मानसिक पुरावा मुळींच सांपडत नाहीं कीं, ज्यावरून ''नित्य-काल'' अशी वस्तु अस्तित्वांत आहे असें म्हणतां येईल, आत्मा  (जाणीवयुक्त अस्तित्व) एखाद्या अखंडित अस्तित्वक्रमाकडे ज्या रीतीनें बघतो ती रीति म्हणजे काल, असें या संबंधींच्या मानसिक पुराव्यावरून म्हणतां येतें. अखंड प्रवाहाप्रमाणें असणाऱ्या अस्तित्वाच्या नित्यतेकडे बघण्याची आत्म्याची रीति म्हणजे (नित्य) काल असेंहि म्हणतां येईल. अनुभवाची क्रमिकता, क्रमवारी आणि समकालीनता (एककालिकता) या आपल्या कल्पनांनीं आत्मा हा अस्तित्वाचा अखंड प्रवाह मापीत, मोजीत असतो : अस्तित्वाचा अखंड प्रवाह, क्रमिक किंवा अक्रमिक (एककालिक) अनुभव म्हणूनच आत्म्याच्या प्रतीतीस येऊं शकतो. तेव्हां अखंड प्रवाही नित्य अस्तित्वाकडे बघण्याची आत्म्याची रीति म्हणजे नित्यकाळ असें म्हणतां येईल. मन जो पुरावा देऊं शकतें त्यावरून, ''नित्य-काल'' अशी स्वतंत्र वस्तु अस्तित्वांत आहे असें म्हणतां येत नाहीं, तर नित्य अस्तित्वाकडे बघण्याची आत्म्याची रीति म्हणजे नित्यकाल असा निष्कर्ष निघतो. नित्य अस्तित्व म्हणून कांही असेल आणि हें अस्तित्व जाणीवयुक्त अस्तित्व अर्थात् सचेतन पुरुषाच्या स्वरूपाचें असेल, तर हें अस्तित्व, हा पुरुष, हा आत्मा कालातीत असला पाहिजे, काल त्याच्या पोटांत असला पाहिजे; वेदांन्तांत नित्य आत्मा म्हटला आहे तो हाच.

पान क्र. ३६९

 

हा आत्मा आपल्या स्वत:च्या प्रकट केलेल्या स्वरूपाकडे बघतांना जी वैचारिक दृष्टि वापरतो ती दृष्टि म्हणजे काल होय अशी कल्पना आपल्याला करतां येते. या नित्य आत्म्याचें कालातीत असें जें स्वत:संबंधीचें ज्ञान, तें मनाच्या पलीकडे असतें. तें ज्ञान अतिमानसिक असतें; आमच्या मानसिक जाणिवेच्या पलीकडे तें आहे; आमच्या जागत्या मनाची कालांकित हालचाल शांत केली किंवा ती हालचाल मागें टाकून आम्ही पुढें गेलों, खोल असलेल्या नीरवतेंत, नि:शब्द अवस्थेंत प्रवेश मिळविला, किंवा या अवस्थेंतून पुढें जाऊन नित्यतेची जाणीव आत्मसात केली -- तरच तें अतिमानसिक ज्ञान, आत्म्याचें कालातीत आत्मज्ञान आम्हांला मिळूं शकतें.

      या सर्व विवेचनाचें सार हें आहे कीं, मन स्वभावत:च अज्ञानरूप आहे; अज्ञान म्हणजे परिपूर्ण नेणीव नव्हे; अज्ञान म्हणजे अस्तित्वाचें मर्यादित व सोपाधिक ज्ञान; वर्तमानाचें प्रत्यक्षज्ञान, भूतकालाचें स्मृतिज्ञान, भविष्याचें आनुमानिक ज्ञान असें या ''अज्ञान'' रूप ज्ञानाचें स्वरूप आहे. अर्थात् स्वत:चें आणि स्वत:च्या अनुभवांचें मनाला होणारें ज्ञान वा दर्शन हें कालांकित, क्रमांकित असतें; मनाचें बघणें आणि जाणणें काल आणि क्रम या उपाधींच्या अंकित असें असतें -- मग हें बघणें-जाणणें, दर्शन-ज्ञान आत्मविषयक असो वा अनुभवविषयक असो. खरें अस्तित्व कालांकित नित्यतेचें असेल, तर मनाला या खऱ्या अस्तित्वाचें ज्ञान नसतें असें म्हणावें लागतें; कारण त्याचें स्वत:चें भूतकालीन अस्तित्व देखील स्मृतीच्या संग्रहांत असेल तेवढेंच त्याला ज्ञात असतें; स्मृतीच्या सांठ्यांतून गळून गेलेलें त्याचें अस्तित्व त्याला नसल्यासारखेंच असतें, तें विस्मृतीच्या अंधारांत पडून असतें; त्याचें भविष्यकालीन अस्तित्व त्याच्या पकडीच्या बाहेर असतें; गाढ अज्ञानाची भिंत त्याला तें अस्तित्व दिसू देत नाही; त्याचें वर्तमान अस्तित्व मात्र त्याला स्पष्टपणें ज्ञात असतें -- पण हें अस्तित्व क्षणाक्षणास बदलणारें असतें; नांवें, रूपें, घटना या एकामागून एक असहायतेनें येत जात असतात; त्याचें नियंत्रण ज्यावर चालत नाहीं, त्याला जें नीट उमगतहि नाहीं असें महान् विश्वव्यापी आंदोलन, वस्तूंचें व घटनांचें आवागमन, त्याच्यासमोर चालूं असतें -- या अनाकलनीय गतिमान् विश्व-संसाराचें दृश्य, स्पृश्य त्याच्या अस्तित्वांत सारखा बदल करीत असतें. खरें अस्तित्व कालांकित नित्यतेचें नसून, कालातीत नित्यतेचें असेल, तर मनाला या अस्तित्वाचें ज्ञान हें दुसऱ्या अस्तित्वाच्या

पान क्र. ३७०

 

ज्ञानापेक्षां पुष्कळच कमी असतें हें उघड आहे; कारण, कालातीत अस्तित्व, कालस्थलांकित असें जें आपल्या स्वरूपाचें आविष्करण करतें, त्या आविष्करणाचा या क्षणीं थोडा, त्या क्षणीं थोडा असा तुटक तुटक अनुभव घेऊन, कालातीताचें काय थोडेंसें ज्ञान मन मिळवूं शकेल, तेवढेंच त्याचें तत्संबंधीं ज्ञान असूं शकतें.

      तेव्हां मन हें आमचें सर्व अस्तित्व असेल, किंवा आमचें दर्शनी मन हें आमच्या अस्तित्वाच्या स्वरूपाचें निदर्शक असेल, तर आम्ही अज्ञानरूप असूं -- कालाच्या क्षेत्रांत इकडून तिकडे उड्या मारणारें आणि मधून मधून ज्ञानाचे लहान लहान तुकडे मिळविणारें असें अज्ञान हेंच आमचें स्वरूप असेल -- यापेक्षां अधिक आमचें अस्तित्व असणार नाहीं. पण मनाच्या पलीकडे तत्त्वरूपानें कालातीत असणारी अशी आत्मज्ञानाची शक्ति असेल आणि काल तिच्या नजरेखालीं असेल, भूत वर्तमान भविष्य हें तिला एकदम सर्वसंबंधांसहित दिसत असेल, तिच्या कालातीत स्वरूपाची एक स्वनिर्मित उपाधि हें कालाचें स्वरूप असेल, तर ज्ञान आणि अज्ञान (वेदान्तांतील विद्या आणि अविद्या) या दोन जाणिवेच्या शक्ती आमच्या अस्तित्वाचे ठिकाणीं असतील; या दोन शक्ती भिन्न आणि एकमेकांपासून वेगळ्या असतील, त्यांचा उगम वेगळा वेगळा, त्यांचे कार्यहि वेगळें वेगळें, दोन्ही शक्ती स्वतंत्र, स्वयंभू आणि त्यांच्यामध्यें कायमचें द्वैत असें असेल किंवा या दोन शक्ती वेगळ्या वेगळ्या नसतील, त्या जर वेगळ्या नसल्या, त्यांच्यामध्यें अन्योन्यसंबंध असला, तर तो असा असेल : ज्ञान हें जें जाणिवेचें स्वरूप तें आपला कालातीत आत्मा जाणत असेल आणि स्वतःच्या अंतरंगांत त्याला काळ हा स्वतःची एक दृष्टि म्हणून दिसत असेल आणि अज्ञान हें जें जाणिवेचें दुसरें स्वरूप, तें पहिल्या स्वरूपाची ज्ञानाची पृष्ठवर्ती एकांगी क्रिया असेल -- हें अज्ञान कालाच्या पोटीं स्वतःचें अस्तित्व बघत असेल; आपलें अस्तित्व कालांकित व कालाच्छादित आहे ही अर्थातच अज्ञानाची स्वतःची कल्पना असणार; या कल्पनेचा पडदा या अज्ञानाला त्याच्या मूल स्वरूपापासून, ज्ञानापासून दूर ठेवील; हा पडदा अज्ञान दूर करील तेव्हां तें आपलें मूळ स्वरूप जें नित्य कालातीत आत्मज्ञान तें प्राप्त करून घेईल.

      मूळ पुरुषाचें अतिमानसिक ज्ञान हें काल, स्थल, कारणभाव व त्यांचीं कार्यें जाणण्यास असमर्थ होण्याइतकें अलिप्तपणानें अस्तित्वांत असेल, अशी कल्पना करणें निर्बुद्धणाचें वाटतें. कारण असें त्याचें असणें

पान क्र. ३७१

 

म्हणजे अज्ञानाची दुसरी आवृत्तीच म्हणावी लागेल. सर्वनिरपेक्ष, सर्वातीत, कालातीत, केवल पुरुष आंधळा आणि इकडे कालांकित कालांतर्वर्ती पुरुषहि आंधळा : जाणीवयुक्त अस्तित्वाचीं हीं दोन ध्रुव टोकें मानावीं लागतील. जाणीवयुक्त अस्तित्व अर्थात् आत्मा, आपलें एकंदर स्वरूप जाणूं शकत नाहीं; एक तर त्याला स्वतःचें अस्तित्व (स्वत्व) मात्र दिसतें, स्वतःचीं कार्यें दिसत नाहींत; किंवा त्याला स्वतःचीं कार्यें मात्र दिसतात, स्वतःचें अस्तित्व (स्वत्व) दिसत नाही, अशी आपत्ति मूळ पुरुषाच्या ''अलिप्तपणाच्या'' कल्पनेनें उत्पन्न होते. कालांकित पुरुष कालातीत पुरुषाला जाणत नाहीं म्हणून अज्ञानी, आणि कालातीत पुरुष कालांकिताला जाणत नाहीं म्हणून अज्ञानी, अशी ही आपत्ति उभी करणारी विचारसरणी निर्बुद्धपणाची वाटते. तेव्हां, ही विचारसरणी टाकून प्राचीन वेदान्ताचा विशाल दृष्टिकोन आम्हीं घ्यावा हें योग्य आहे : दोन पुरुष एका ठिकाणी बांधलेले असें आमचें स्वरूप आहे, ही कल्पना आम्हीं टाकून दिली पाहिजे. एकच पुरुष, जाणीवयुक्त अस्तित्व, आम्ही आहोंत. आमची जाणीव मात्र दोन अवस्थांतून जाणारी (असणारी) आहे. एक अवस्था आमच्या मनाच्या ठिकाणची, अल्पज्ञ; आणि दुसरी अवस्था अतिमानसिक; एका अवस्थेंत ज्ञान कालाच्या पोटीं राहणारें असतें, कालगत उपाधींत काम करतें, आणि याकरितां आपलें स्वत:संबंधींचें ज्ञान मागें ठेवतें; दुसऱ्या अवस्थेंत ज्ञान कालातीत असतें, सर्वसमर्थपणें आणि पूर्ण ज्ञानाच्या आधारावर स्वतःकरितां स्वत: योजलेली कालस्थिति (कालगत उपाधि) निर्माण करतें; एका अवस्थेंतील जाणीव, तिचा कालगत अनुभव वाढेल त्या प्रमाणांतच स्वतःचें स्वत्व ओळखते; दुसऱ्या अवस्थेंतील जाणीव, आपलें कालातीत स्वत्व जाणते आणि ज्ञानपुरःसर आपलें स्वत्व व्यक्त करते : कालगत अनुभव हें तिचें व्यक्त स्वरूप होय.

      ब्रह्म विद्या आहे, ब्रह्म अविद्याहि आहे : विद्या (ब्रह्म) आणि अविद्या  (ब्रह्म) एकाच वेळीं जाणणें हा अमरत्वाचा मार्ग आहे, असें जें उपनिषदांत म्हटलें आहे त्याचा अर्थ आतां आपणांस स्पष्ट होतो. कालातीत स्थलातीत, निरुपाधिक आत्म्याच्या जाणिवेची स्वाभाविक शक्ति म्हणजे ज्ञान किंवा विद्या. विद्या हेंच खरें पूर्ण ज्ञान होय : तें नित्य सर्वातीत असून, केवळ स्वतःचें स्वत्व जाणतें असें नाहीं, तर विश्वांतील नित्य, क्रमिक, कालांकित घटना स्वतःच्या ठिकाणीं धारण करतें, त्या व्यक्त

पान क्र. ३७२

 

करतें, त्यांचा आरंभ करून देतें, त्यांचें स्वरूप निश्चित करतें आणि त्या सर्वप्रकारें ओळखतें. अज्ञान किंवा अविद्या अस्तित्वाच्या एकतेचें ज्ञान मागें टाकतें; काळाच्या एका क्षणांत, नंतर दुसऱ्या क्षणांत, नंतर तिसऱ्या, चवथ्या असें क्रमवारीनें, कालाच्या क्रमबद्ध क्षणाक्षणांत अस्तित्व राहत जातें अशी अविद्येची जाणीव असते; क्षणवर्ती अस्तित्वामुळें अविद्येचें ज्ञान तुकड्यातुकड्यांचें असतें, स्थलाच्या तुकड्यातुकड्यांत आणि अनेक संबंधांत अस्तित्वाचें राहणें होत असल्यामुळें, आत्मा विभक्त, विभागयुक्त आहे (अनेक आत्मे आहेत) अशी अविद्येची आत्मविषयक कल्पना असते; एकच अस्तित्व ज्या अनेक क्रिया करतें, त्या क्रियांच्या अनेकतेंत अविद्या स्वतःला कोंडून घेऊन कैदी बनते. एकतेचें ज्ञान मागें टाकल्याने अविद्येला स्वतःच्या स्वत्वाचें खरें पूर्ण ज्ञान असत नाहीं, असूं शकत नाहीं आणि विश्वाचेंहि खरें पूर्ण ज्ञान असूं शकत नाहीं; सर्वातीत एकतत्त्वाचें तसेंच विश्वतत्त्वाचें खरें पूर्ण ज्ञान अविद्येला असूं शकत नाहीं. आत्मा अविद्येच्या अंकित असतां, एका क्षणांतून दुसऱ्या क्षणांत, एका स्थलांतून दुसऱ्या स्थलांत, एका संबंधांतून दुसऱ्या संबंधांत असा वाट चालत असतो, त्याचें ज्ञान त्रुटित असल्यानें तो चुका करीत, चांचपडत अडखळत वाट चालत असतो. (अविद्यायाम् अन्तरे वर्तमाना... जंघन्यमाना: परियन्ति मूढा: अन्धेनैव नीयमाना यथान्धा: -- मुण्डक उप० १-२-८. अविद्येच्या क्षेत्रांत ते वसति करतात आणि वावरतात, म्हणून ते अडखळत, ठेंचाळत एकाच बिन्दूभोंवतीं फेऱ्या घालीत राहतात; ते भ्रमांत भ्रमण करीत राहतात; आंधळ्या वाटाड्यामागें आंधळ्यांनीं जावें त्याप्रमाणें ते अविद्येच्या क्षेत्रांत मार्ग क्रमीत असतात.) अविद्या म्हणजे ज्ञानाचा कांहीं पूर्ण अभाव नव्हे, सत्याचें दर्शन आणि अनुभव अविद्येंत असतो, पण हें दर्शन, हा अनुभव अंशत: खरा, अंशत: खोटा असा असतो; वस्तुजाताचें तत्त्व दुलक्षिणारें, नकारात्मक पसाऱ्याचा इथला एक भाग, तिथला एक भाग उडत उडत पाहणारें असें जें ज्ञान, तें असेंच कांहीं खरें व कांहीं खोटें असणार. ही अविद्येची गोष्ट झाली. केवळ विशेषशून्य एकरस एकतत्त्वाची जाणीव व त्या एकतत्त्वाच्या (ब्रह्माच्या) व्यक्त स्वरूपाचें अज्ञान अशी ज्ञान-अज्ञानाची जोड जिच्यांत आहे, ती विद्या अविद्येप्रमाणें अंधतमच आहे असें उपनिषदांत (ईशावास्य उप०) वर्णन आहे. वस्तुत: विद्या किंवा अविद्या दोन्हींहिं तम किवा अंधकार या कल्पनेने यथार्थ वर्णितां येणार नाहींत. वस्तुत: विद्या हा डोळे दिपविणारा

पान क्र. ३७३

 

केंन्द्रित प्रकाश आहे. डोळे दिपले म्हणजे नीट दिसत नाहीं, म्हणून या प्रकाशाला तमाची उपमा देतां येईल. वस्तूंचे आकार असतील तसे न दाखवितां, अविद्या त्यांना फसवीं रूपें देते, अंधुक विखुरलेला, मध्यें मध्यें तुटलेला प्रकाश असावा, दाट धुकें नव्हे, पण अर्धवट धुकें, दृष्टीला थोडासा वाव देणारें धुकें असावें तशी अविद्या आहे. तेव्हां अविद्या असो, विद्या असो, ईश्वरी दिव्य जाणीव ही विद्येंत बंद झालेली नाहीं; अविद्येंत बंद झालेली नाहीं : परिवर्तनीय अनेक वस्तू (अविद्येचा विषय) आणि अपरिवर्तनीय एकतत्त्व (विद्येचा विषय) दोन्ही गोष्टी ईश्वरी दिव्य जाणिवेंत एकत्र विद्यमान असतात. ही जाणीव म्हणजे एकसंघ शाश्वत ज्ञान, आत्मज्ञान; सर्व वस्तूंना विविध संबंधांनी जोडणारें, सर्व वस्तूंना एकत्रतेनें जखडणारें असें शाश्वत एकसंध एकरस आत्मज्ञान म्हणजे ईश्वरी दिव्य जाणीव होय. या जाणिवेंत एकमेव अक्षर वस्तु आणि अनेक क्षर वस्तू एकत्र विद्यमान असतात.

      स्मृति ही भेदनिष्ठ जाणिवेची, मनाची कुबडी आहे. या कुबडीच्या आधारानें मन अडखळत आपला मार्ग क्रमीत असतें; कालाचा प्रवाह जोरानें वाहत असतो, आणि या प्रवाहांत थांबण्याचा, विसांवा घेण्याचा, कांहींहि अवकाश मनाला मिळत नाहीं -- तें या प्रवाहांत असहायपणें स्मृतीच्या (कुबडीच्या) आधाराने अडखळत अडखळत चालत असतें, कालाच्या प्रवाहानें ओढलें जात असतें. स्वतःचें (आत्म्याचें) प्रत्यक्ष पूर्ण नित्यज्ञान आणि वस्तुजाताचें प्रत्यक्ष पूर्ण ज्ञान मनाला होत नाहीं -- या ज्ञानाऐवजीं त्याला स्मृति मिळालेली असते -- मनाच्या दरबारांत दरिद्री स्मृति ही प्रत्यक्ष पूर्ण ज्ञानाचें स्थान घेत असते. स्वतःच्या वर्तमान अस्तित्वाच्या क्षणीं मात्र स्वतःचें प्रत्यक्ष ज्ञान मनाला असतें, होतें; तसेंच वर्तमान क्षणीं आणि निकट स्थलीं इंद्रियें ज्या वस्तूंचें ग्रहण करतात, त्या वस्तू मनापुढें ज्ञानविषय म्हणून येतात आणि या वस्तूंचें अर्धवट प्रत्यक्ष ज्ञान मनाला होतें. त्याच्या ज्ञानांत याप्रमाणें मोठी उणीव राहते, ती उणीव भरून काढण्यासाठीं, स्मृति, कल्पना, विचार, अनेक प्रकारचीं काल्पनिक प्रतीकें यांचा मन उपयोग करतें. त्याला इंद्रियें हीं साधनें वर्तमान क्षणींच्या आणि निकट जागींच्या वस्तूंच्या देखाव्याचें अर्धवट अप्रत्यक्ष ग्रहण करण्यास उपयोगी पडतात, आणि स्मृति, कल्पना, विचार या साधनांनीं वर्तमान क्षणाच्या बाहेरचे, निकट जागेच्या बाहेरचे देखावे मन स्वतःसमोर चित्ररूपानें अधिक अप्रत्यक्षपणें उभें करतें. अगदीं

पान क्र. ३७४

 

खरेंखुरें प्रत्यक्ष ज्ञान जें मनाला होतें, तें वर्तमान क्षणींच्या स्वतःच्या अस्तित्वाचें. येथें साधनाची आवश्यकता नसते. वर्तमान क्षणींचा प्रत्यक्ष आत्म-प्रत्यय जो मनाला होतो, त्या प्रत्ययाच्या द्वारां नित्य सद्‌वस्तूच्या अस्तित्वाचा अनुभव मनाला येऊं शकतो, मनाच्या पाठीमागें ही सद्‌वस्तु कायम उपस्थित असते आणि तिचें प्रत्यक्ष दर्शन आपल्या स्वतःच्या दर्शकाबरोबर घडूं शकतें. या सद्‌वस्तूखेरीज बाकी सर्व वस्तू अनित्य रूपसत्तेच्या वर्गांत घालण्यास मन प्रवृत्त होतें; एवढेंच नव्हे तर या वस्तू भ्रमरूप आहेंत, अज्ञानकार्य आहेत, दृष्टिप्रमादजन्य आहेत असाहि निष्कर्ष मन काढूं शकतें, काढतें; सद्‌वस्तूप्रमाणें प्रत्यक्ष ज्ञानानें यांचें सत्यत्व मनाला प्रतीत होत नाहीं म्हणून मन याप्रकारें आपला निर्णय देतें. हा मायावादी निर्णय बुद्धाच्या पंथांतील तत्त्वज्ञ मूळ सद्‌वस्तूलाहि लावतात; मूळ सद्‌वस्तु नाहीं, तो एक भ्रम आहे; मनाची कल्पना आहे, अस्तित्वाची खोटी संवेदना आहे, खोटी कल्पना आहे असें ते मानतात; मनाची ही कहाणी हेंच सांगते कीं, मनाला स्वतःला स्वत:संबंधानें असें वाटत असतें कीं, मी एक विचित्र जादुगार आहे; तें स्वत: आणि त्याचीं कार्यें एकाच वेळी अस्तित्वांत आहेत असें म्हणतां येतें, अस्तित्वांत नाहींत असेंहि म्हणतां येतें, तें (आणि त्याचीं कार्यें) नित्य टिकणारी सत्य वस्तु आहे असेंहि म्हणतां येतें किंवा त्याचें (आणि त्याच्या कार्यांचें) अस्तित्त्व एक क्षणिक भ्रम आहे असेंहि म्हणतां येतें; आपल्या अस्तित्वाचें, आपल्या कार्यांचें स्पष्टीकरण मन देतें किंवा देत नाहीं, पण एक गोष्ट तें निश्चितपणें ठरवितें कीं, स्वतःचा आणि स्वतःच्या कृतींचा पसारा सर्व मोडून, खलास करून टाकावयाचा आणि कालातीत नित्य ब्रह्माच्या किंवा शून्याच्या नित्य शांतींत स्वत:ला विलीन करून त्या शांतीचा भोग घ्यावयाचा -- व्यर्थ, अर्थशून्य असा स्वतःचा आणि वस्तुप्रदर्शनाचा देखावा सोडून अलग होऊन, ब्रह्मनिर्वाणाचा किंवा शून्य निर्वाणाचा आश्रय घ्यावयाचा.

      पण आंतील आणि बाहेरील, वर्तमान आणि भूत हे जे आत्म-जाणिवेचे भेद आहेत, ते मुळांत नसून मनाच्या क्षणिक कार्याचा, मर्यादाबद्ध कार्याचा एक भाग आहेत; मनाच्या पाठीमागें सुस्थिर अशी जाणीव आहे, या जाणिवेची बाह्य पृष्ठवर्ती क्रिया मन हें आहे; या सुस्थिर जाणिवेंत वर्तमानकालीन जाणीव आणि भूत वा भविष्यकालीन जाणीव असें वैचारिक बंधनकारक विभक्तपण नाही. ही सुस्थिर जाणीव आपलें

पान क्र. ३७५

 

कालगत रूप ओळखते, वर्तमान भूत भविष्य हे कालाचे भाग व त्यांत खंडित भासणारें आपलें अस्तित्व ओळखते, पण त्याबरोबर स्वत:च्या अखंडपणाची ओळखहि तिला असते; ही अखंड जाणीव कालांकित आत्म्याचे (जाणिवेचे) चलनप्रधान परिवर्तनशील सर्व अनुभव आपल्या पोटांत सामावून घेते; अक्षर, अपरिवर्तनशील, कालातीत आत्मा हा या कालांकित आत्मगत अनुभवांचा आधार असतो -- सुस्थिर आत्मा (आत्मजाणीव) अस्थिर अनुभवांचा पाया असतो. मनाच्या क्रिया आणि मन यांजकडे पाठ फिरवून आम्हीं आंत गेलों, किंवा मनाची हालचाल शांत झाली म्हणजे आम्हांला या सर्वसमावेशक क्रियासंग्राहक सुस्थिर जाणिवेची भेट होते, तिचें ज्ञान होतें, तिची ओळख पटते. पण अगोदर, मन शांत झाल्यावर किंवा मन टाकून आम्ही आंत गेल्यावर आम्हांला निश्चल जाणिवेची प्रतीति येते. निश्चल आणि चंचल अशा दोन जाणिवा नाहींत. एकच जाणीव निश्चल आणि चंचल अशी आहे. पण मन शांत झाल्यावर अगोदर जाणिवेच्या निश्चल अवस्थेची प्रतीति आम्हांला होते आणि या अवस्थेवर आम्हीं आपलें लक्ष केन्द्रित केलें, तर ही निश्चल जाणीव, हा निश्चल आत्मा केवळ कालातीतच नाहीं, तर क्रियातीत, क्रियाशून्य आहे -- विचार, कल्पना, स्मृति, इच्छा, इत्यादि आंदोलन त्याचे ठिकाणीं नाही, तो स्वयंपूर्ण आहे, स्वत:चे ठिकाणीं मग्न आहे, विश्वासंबंधीं कसलीहि क्रिया तेथें नाहीं असा अनुभव आम्हांला येतो. या अनुभवामुळें हा निश्चल आत्माच काय तो सत्य आहे आणि बाकी रूपसंभार हा खोट्या प्रतीकांचा पसारा आहे, या पसाऱ्यांत सत्यत्व नाहीं, केवळ स्वप्नाप्रमाणें हा पसारा खोटा आहे असें आम्हांला वाटतें. पण याप्रमाणें निश्चल आत्म्यांत मग्न असणें ही एक आमच्या जाणिवेची क्रिया आहे -- चंचल विचार, स्मृति, संकल्प यांत आत्मा पांगविणें ही जशी एक आमच्या जाणिवेची क्रिया, तशीच आत्मकेन्द्रित निश्चल अवस्था हीहि एक जाणिवेची क्रिया असते. खरा आत्मा हा असा नित्य पुरुष आहे कीं, कालगत चंचलता आणि कालाधार निश्चलता दोन्हीहि अवस्था त्याला घेतां येतात, एकाच वेळीं तो या दोन अवस्थांत असूं शकतो. या दोन अवस्था आमच्या समोर आहेत हाच, खऱ्या आत्म्याची खरी स्थिति द्विरूप असल्याचा पुरावा आहे. एक अवस्था नसते देखावे उत्पन्न करते व एक स्वरूपस्थ असते असें मानलें तरी दोन समकालिक रूपांचा, अवस्थांचा असा एकमेव नित्य पुरुष हाच

पान क्र. ३७६

 

खरा आत्मा आहे हें मान्य करावें लागतें -- हा खरा आत्मा, परमात्मा, परब्रह्म, परपुरुष या नांवांनीं गीतेंत वर्णिलेला आहे. निश्चल पुरुष हा सर्व अस्तित्वाचा, विश्वाचा आत्मा आणि चंचल पुरुष हा या अस्तित्वाचा, विश्वाचा महेश्वर आणि दोन्ही पुरुष ज्याचे अंगभूत तो परपुरुष, परब्रह्म, परमात्मा अशी गीतेची मांडणी आहे.

      कालाच्या ओघांत मनाची जी आत्म-जाणीव आम्ही अनुभवतो, (आणि मनाची ही कालांकित आत्म-जाणीव आमच्यापुढील आद्य दृश्य आहे) त्या आत्मजाणिवेच्या संबंधांत मन आणि स्मृति यांच्या स्वरूपाचा आणि कार्याचा आम्हीं जो विचार केला, त्या विचारानें आम्हांला गीतेच्या परब्रह्मापर्यंत पोंचविलें आहे. मनाला आत्मजाणीव असते तशी इतर-विषयक जाणीवहि असते. मनाचा इतर-विषयक अनुभव तो त्याच्या आत्मविषयक अनुभवाबरोबर लक्षांत घेऊन जर आम्ही मन आणि स्मृति यांची तपासणी केली, तर वरीलसारखाच त्या तपासणीचा शेवट होतो -- पण अज्ञानाच्या स्वरूपावर या तपासणीनें अधिक प्रकाश पडतो; या तपासणीचें फळ म्हणून पुष्कळ अधिक गोष्टी आम्हांला कळतात; असो. आतांपर्यंत जें आम्हांला कळलें, दिसलें तें थोडक्यांत मांडूं; एक नित्य पुरुष आहे, मनाचें अस्थिर कार्य या पुरुषाच्या प्रेरणेनें चालतें, सुस्थिर आत्मजाणिवेच्या पायावर मनाचें कार्य उभें असतें, नित्य पुरुषाकडून उभें केलें जातें; या निश्चल आत्मजाणिवेचा कालाशीं संबंध नसतो, कालाच्या क्रियेचा या निश्चल आत्मजाणिवेवर कांहीं परिणाम होत नाहीं; मनाच्या ज्ञानाहून नित्य पुरुषाचें ज्ञान अर्थात् खूपच श्रेष्ठ असतें; या श्रेष्ठ ज्ञानानें तो कालगत सर्व हालचाली आपल्या कर्तृत्वानें चालवितो; असें करीत असतांच मनाच्या व्यापारानें तो कालाच्या पोटांत वस्ती करतो. म्हणजे काल त्या नित्य पुरुषाच्या पोटांत आहे आणि तरीहि कालाच्या पोटांत नित्यपुरुष आहे. कालाच्या पोटांतील नित्यपुरुषाची कहाणी अशी आहे : क्षणिक आणि अनिश्चित वस्तू असें त्याचें स्वरूप असतें, आणि क्षणिक आणि अनिश्चित अशा वस्तू तो आपल्या स्वाधीन करून घेऊं पाहत असतो, पण या वस्तू त्याच्या हातीं कांहीं टिकत नाहींत. पृष्ठवर्ती बाह्य मानसिक पुरुष असें त्याचें कालोदरांतील सोंग असतें; हा मनोमय पुरुष क्षणाक्षणाचा प्रवासी असतो, त्याला त्याचा स्वत:चा मूळ आत्मा, नित्य पुरुष, दिसत नाहीं; कालचक्रांतील अनुभव मात्र त्याला दिसतात आणि त्या अनुभवांशीं त्याचें जें

पान क्र. ३७७

 

नातें असतें, होतें तें तो जाणतो; कालचक्रांत ज्या गोष्टी भविष्यकाळीं घडावयाच्या असतात, त्या या मनोमय पुरुषाला अज्ञात राहतात, या गोष्टी अज्ञान आणि अभाव यांच्या वस्तुशून्य भांडारांत जणु भरलेल्या असतात -- पण वस्तुत: हें भविष्य-भांडार पूर्णतया वास्तव गोष्टींनीं भरलेलें असतें -- मात्र मनोमय पुरुषाला हें भांडार अनुभूत होणें शक्य नसतें; या मनोमय पुरुषाला वर्तमान क्षणांतील अनुभव, स्वतःच्या आणि वस्तूंच्या अस्तित्वाचा अनुभव प्रत्यक्षपणें घेतां येतो; स्वतःच्या अस्तित्वाचा पूर्ण प्रत्यक्ष आणि वस्तूंचा अर्धवट प्रत्यक्ष अनुभव त्याला मिळतो; हा अनुभव, हें ज्ञान तो भूतकालांत जमा करतो, हा भूतकाल भविष्यासारखा अज्ञान आणि अभाव यांचें भांडार बनतो; मात्र भविष्यांत अनुमानाशिवाय प्रकाश मुळींच नसतो, भूतकालांत स्मृतीचा प्रकाश अर्धवट काम करीत असतो, त्यांत जमा केला गेलेला वर्तमानकाळ स्मृति अंशत: जिवंत ठेवते -- याप्रमाणें कालाच्या पोटांत वस्ती करणारा नित्य पुरुष स्वत: क्षणजीवि अनिश्चित वस्तूंचें रूप घेतो आणि क्षणिक अनिश्चित वस्तूंचा संग्रह करूं पाहतो -- पण या वस्तू त्याच्या संग्रहांत कांहीं टिकत नाहींत. पण हें कालोदरांतील रूप नित्य पुरुषानें घेतलेलें सोंग असतें; वस्तुत: त्याचें नित्यपुरुषत्व कांहीं तो गमावीत नाहीं, तो नित्याचा स्थिर आणि आत्मतंत्र असतो, त्याची जाणीव अतिमानसिक असते, तो ज्या वस्तुजाताचा ताबा घेऊं पाहत असतो, तो वस्तुसंभारहि क्षणिक नसून, त्याच्या सारखाच नित्याचा स्थिर असतो, कारण हा वस्तुसंभार तो स्वतःच बनतो. कालाच्या पोटांत क्रमवारीनें घडणाऱ्या घटना हें स्वरूप तो घेतो आणि मनाच्या द्वारां या क्रमशील घटनांचा तो अनुभव घेत असतो - त्याच्या अतिमानसिक जाणिवेला जें एका दृष्टिक्षेपांत दिसतें, तें मानसिक दृष्टीनें तो क्रमबद्ध स्वरूपांत पाहत असतो, पण तो पाहत असतो स्वतःलाच.

      जाणीवयुक्त अस्तित्वाला अनुभव आणि कार्य या मूल्यांचें रूप देऊन हीं मूल्यें सांठवून ठेवणारी पेढी म्हणजे काल होय. पृष्ठवर्ती मनोमय पुरुष या पेढींतून भूत (आणि भविष्य) घटना घेऊन त्यांचें वर्तमान घटनांत रूपान्तर करण्याचें कार्य सारखें करीत असतो; हा पुरुष त्यानें मिळविलेलें घटनांचें धन भूतकाल नांवाच्या सांठवणीच्या पेटींत घालतो -- त्याला हें ज्ञान नसतें कीं भूतकालीन सर्वकांहीं आमचे ठिकाणीं सर्वकाल उपस्थित असतें, सांठ्यांतून त्याला जरूर असेल तेवढें

पान क्र. ३७८

 

नाणें आणि ज्ञान या रूपांत तो स्वतःच्या उपयोगांत आणतो आणि मानसिक, प्राणिक, शारीरिक क्रियांच्या रूपानें वर्तमानाच्या व्यवहारांत आपल्या जवळचें हें ज्ञान आणि अनुभवाचें नाणें तो व्यापारी दृष्टीनें उपयोगास लावतो; या वर्तमानाच्या व्यवहारांत घातलेल्या धनांतून भविष्यकालचें धन निर्माण होतें असें त्याच्या दृष्टीला दिसतें. ज्याला आम्ही अज्ञान म्हणतो, तें नित्यपुरुषाच्या आत्मज्ञानाचा विशिष्ट उपयोग होय. नित्यपुरुषाचें आत्मज्ञान कालांकित अनुभवाला उपयुक्त व्हावें, कालांकित क्रियेला साधनभूत व्हावें अशा तऱ्हेनें त्या आत्मज्ञानाची जी योजना केली जाते ती अज्ञान होय. या आत्मज्ञानांतून ज्या ज्ञानाचा आम्ही मानसिक अनुभवासाठीं अद्यापि उपयोग केला नाहीं, किंवा ज्याचा असा उपयोग करणे आम्हीं थांबविलें आहे तें ज्ञान म्हणजे आम्हांला (मनोमय पुरुषाला) अज्ञात असें ज्ञान होय -- या अज्ञात ज्ञानांतून (अज्ञातांतून) कालांकित अनुभव, कालांकित क्रिया निघतात -- या बाह्य अज्ञानाच्या पाठीमागें नित्यपुरुषाला सर्व कांहीं ज्ञात असतें, सर्व कांहीं उपयोगासाठी तयार असतें : नित्यपुरुष काल, स्थल, कारणभाव यांच्या निर्बंधांच्या क्षेत्रांत जें कांहीं करावयाचें ठरवील, त्या ठरावानुसार अज्ञानाच्या पडद्यामागील सर्व ज्ञान उपयोगी पडावयाला तयार असतें. आपण असें म्हणूं शकतों कीं, आमचें पृष्ठवर्ती अस्तित्व -- आमचा मनोमय पुरुष हा आमचा खोल खोल असलेला नित्यपुरुषच आहे -- तोच मनोमय पुरुषाच्या रूपानें बाहेर, वरतीं, पृष्ठभागावर कालाच्या क्षेत्रांत साहसी जीवन जगण्याच्या उद्देशानें आला आहे, अनंत शक्यता हें धन घेऊन तो सट्टेबाजी करीत आहे; त्यानें स्वतःला मर्यादा घातली आहे, एका क्षणांतून दुसऱ्या क्षणांत, दुसऱ्यांतून तिसऱ्यात, असें क्षणनिष्ठ (क्षणांतून क्षणांत वाटचाल करणारें) जीवन त्यानें पसंत केलें आहे; साहसाचा आनंद पूर्णपणें भोगतां यावा, क्षणोक्षणीं नवें कांहीं पाहून, भोगून, करून साहसी जीवनाची गंमत पूर्णपणें अनुभवावी हा त्यांतील उद्देश आहे. अर्थात् या साहसासाठीं नित्यपुरुषाला आपलें आत्मज्ञान, आपलें पूर्ण आत्मत्व मागें ठेवावें लागतें, विसरून जावें लागतें. मनोमय पुरुष झाल्यानें त्याला आपलें सर्व कांहीं नष्ट झाल्याचा भास होतो आणि हें सर्व पुन्हां परत मिळविल्याचा साहसी आनंद या मनोमय बनलेल्या नित्यपुरुषाला लाभतो. नित्यपुरुषच मनोमय पुरुष होत असल्यानें, आपलें सर्व स्वत्व आणि सर्वस्व घालविण्याचें व परत मिळविण्याचें नाटक

पान क्र. ३७९

 

तो करीत असतो, असें म्हणणें प्राप्त आहे. या नाटकांत नित्यपुरुषाला नित्य आकांक्षा, शोध, धडपड यांत अनुस्यूत असणारा नित्य बदलणारा आनंद आणि खेद, सुखभोग आणि दुःखभोग अनुभवावयास मिळतो. न बदलणारा नित्य आनंद त्याच्या कालातीत स्वरूपांत असतो; त्याच्या कालव्याप्त स्वरूपांत सुखदुःखांचीं विविध रूपें घेणारा, नित्य बदलणारा आनंद त्याला अनुभवतां येतो घालविलेलें स्वत्व व सर्वस्व परत मिळविण्याच्या कालांकित कार्यक्रमांत नित्यपुरुषाला, विविध सुखदुःखांतून  (आकांक्षेच्या, शोधाच्या, धडपडीच्या सुखदुःखांतून) जावें लागतें; या सुखदुःखांतून मार्ग क्रमून नित्यपुरुष शेवटीं आपलें सर्व स्वत्व व सर्वस्व परत मिळवितो; या कार्यक्रमांत साहसाचें सुख आहे आणि त्याचसाठी नित्यपुरुष पृष्ठवर्ती मनोमय पुरुषाचें रूप घेतो असें आपण म्हणूं शकतों.

पान क्र. ३८०

 









Let us co-create the website.

Share your feedback. Help us improve. Or ask a question.

Image Description
Connect for updates