दिव्य जीवन 1879 pages 1960 Edition
Marathi Translation
  Senapati Bapat

ABOUT

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics, expounding a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth.

THEME

philosophymetaphysics

दिव्य जीवन

Sri Aurobindo symbol
Sri Aurobindo

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.

Sri Aurobindo Birth Centenary Library (SABCL) The Life Divine Vols. 18,19 1070 pages 1970 Edition
English
 PDF    philosophymetaphysics
Sri Aurobindo symbol
Sri Aurobindo

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.

Marathi Translations of books by Sri Aurobindo दिव्य जीवन 1879 pages 1960 Edition
Marathi Translation
Translator:   Senapati Bapat  PDF    LINK

प्रकरण नववें

 

शुद्ध सद्वस्तु

 

      एक अद्वितीय, अविभाज्य असें शुद्ध सत् अस्तित्व हेंच केवळ आरंभीं होतें.

- छांदोग्य उपनिषद् ६.२.१

 

      आम्ही सामान्यत: मर्यादित क्षणिक लाभाच्या गोष्टीकडे आमची अहंकेंद्रित दृष्टि सारखी लावून असतो. आमच्या दृष्टीचा हा अहंकेंद्रित व्यापार थांबवून आम्हीं जर जगाकडे तिऱ्हाईत जिज्ञासूपणानें बघितलें, केवळ सत्य काय आहे तें शोधण्याच्या बुद्धीनें बघितलें, तर आमच्या दृष्टीला प्रथम जी गोष्ट प्रतीत होते ती म्हणजे अनंत अस्तित्वाची, अनंत भ्रमन्तीची, अनंत क्रिया करणारी, अनंत अवकाशांत अनंत काल कार्य करीत अविश्रांतपणें वाटचाल करणारी, अखंड ओघाची अनंत सद्वस्तूची अनंत शक्ति. या शक्तिमय गतिशील सद्वस्तूची अनंतता पहावी तर आमचा मी, कोणताहि मी, कोणताहि थोरांत थोर असा 'मीं'चा मेळा तिच्या अनंत विस्तारांत अगदीं क्षुद्रसा भासतो. आमच्या अनेक युगांचा आमच्या नजरेला दिपविणारा पदार्थसंभार या अनंत सद्वस्तूच्या हिशोबानें एक क्षणाचा धूलिकण दिसतो, असंख्य कोटि जीव या सद्वस्तूच्या अगणित अगणनीय जीवराशींत अगदीं तुच्छ संख्येनें असल्याचें वाटतात. असें हें जगाचें भ्रमण अफाटपणें चाललेलें आहे. आम्हांला सहजप्रेरणेनें असें वाटतें कीं, हें भ्रमण आम्हांभोंवतीं चाललेलें आहें; आमचें वागणें, आमचे विचार, आमचें जीवन या भावनेनें चाललेलें असतें. आमचा मी हा जगाचा केंद्र आहे, जग हें या 'मी' साठींच आहे, आम्हांला मदत करण्यासाठीं, वेळीं त्रास देखील देण्यासाठींच हें जग भ्रमण करीत आहे, अशी आमची कल्पना होते. आमच्या 'मी'च्या वासना, भावना, कल्पना तसेंच ध्येयभूत गोष्टी या जशा आम्हांला जिव्हाळ्याच्या वाटतात, त्याप्रमाणें जगालाहि त्या जिव्हाळ्याच्या

 

पान क्र. १३५

 

वाटतात, त्यांची तृप्ति, परिपूर्ति करणें, त्यांचें समर्थन करणें हें जगाच्या नियत कार्यांतील एक कार्य आहे, असें आम्ही धरून चालतो; पण ही आमची भ्रांति असते. आम्हांला खरी दृष्टि आली म्हणजे असें दिसतें कीं, विश्व हें आमच्याकरितां अस्तित्वात नसून, स्वत:करितांच आहे. त्याला महान् ध्येयें आहेत, त्याला संकीर्ण सीमाहीन कल्पना आहेत, त्याला महान् वासना आहेत, महान् आनंद आहे व त्या वासनांची, आनंदाची, परिपूर्ति त्याला करावयाची आहे. आमचे क्षुद्र आदर्श पाहून व ते फार थोर आहेत अशी त्यांजबद्दलची आमची कल्पना पाहून, विशाल आदर्शाचे विश्व आम्हांला उपरोधिकपणें हंसतें व कनवाळुपणानें आम्हांला संभाळून घेतें. तरीपण आम्हीं दुसऱ्या टोंकाला जाऊन, आमची जगाला किंवा जगांत कांहींच किंमत नाहीं, अशी ठाम कल्पना करून घेणें हेंहि योग्य नाहीं. असें करणें हें अज्ञानाचेंच काम होईल, असें करण्यांत विश्वांतील कित्येक महान् गोष्टी आम्हीं दृष्टीआड केल्यासारखें होईल.

कारण विश्वाची अनंत भ्रमन्ती, मानवाला बिनमहत्वाचा समजते असें नाहीं. विश्वचक्राला त्याच्या भ्रमणकार्यांत मानवाचें महत्त्व आहे. भौतिक शास्त्रानें हें दाखवून दिलें आहे कीं, अखंड गतिशील विश्वशक्ति आपल्या लहानांत लहान व मोठ्यांत मोठ्या कार्यावर सारख्याच काळजीनें मेहनत घेते; बारीक सारीक तपशिलाच्या बाबतींत देखील खूप दक्षता दाखविणें, युक्तिप्रयुक्ति रचतांना खूप कुशलता कामास लावणें, खूप एकाग्रतेनें जीव लावून श्रम करणें, हें विश्वशक्तीचें तंत्र तिच्या सर्व लहानमोठ्या कार्यांत अगदीं सारखेंच प्रत्ययास येतें. श्रीमद्भगवद्गीतेंत 'समम् ब्रह्म' हें जें महान् वर्णनात्मक पद आहे, तें विश्वशक्तीचें वर्णन करणारें आहे. ती विश्वमाता समबुद्धि आणि निःपक्षपातीपणा या गुणांची खाण आहे. सूर्यमाला निर्माण करणें आणि चालविणें हें काम असो किंवा मुंग्यांचें वारूळ व त्यांतील जीवांची निर्मिति व जीवनाची संघटना हें काम असो, दोन्ही कामांत विश्वमाता सारखेंच शक्तिकौशल्य सारख्याच तीव्रतेनें खर्च करते. आम्ही एका कामाला मोठें म्हणतो, दुसऱ्याला क्षुद्र म्हणतो, यांत दोघांचा आकार आणि द्रव्यभार किंवा द्रव्यसंभार, द्रव्यसामग्री यांची तुलना आम्हांला भ्रान्त करण्यास कारणीभूत होते. यांत आकाराची, द्रव्यसामग्रीची फसवेगिरी आहे. उलटपक्षीं आम्ही द्रव्य सामग्रीच्या भाराकडे न पाहतां, असल्या दोन कामांतील गुणांची, गुणभारांची तुलना केली, तर सूर्यमालेपेक्षां त्या मालेच्या पोटांत राहणारी

 

पान क्र. १३६

 

मुंगी मोठी आहे; आणि सर्वच्या सर्व जड निसर्ग एकदम घेतला, तरी तो मनुष्यापेक्षां लहान आहे असें आपणाला म्हणावे लागेल. पण त्यांतहि आपण फसतो. द्रव्यभार फसवितो त्याचप्रमाणें गुणभार देखील फसवितो. विश्वशक्ति किंवा ब्रह्मशक्ति दोन बाजूंनीं आपण बघतो; गुणभार व द्रव्यभार या त्या दोन बाजू आहेत. कोठें गुणभार अधिक दिसतो, कोठें द्रव्यभार अधिक दिसतो. पण शक्तिभार लहानांत लहान व मोठ्यांत मोठ्या दोन्हीं कामांत, अगदीं सारखा असतो, असें बारीक निरीक्षणानें आपल्या लक्षांत येतें. अस्तित्वांत असणाऱ्या सर्व वस्तू, ब्रह्मवस्तूचें अस्तित्व सारख्या सारख्या वांट्यानें भोगतात, कार्य करणाऱ्या सर्व वस्तू, ब्रह्मवस्तूची शक्ति सारख्या सारख्या वांट्यानें आपल्या कार्यांत योजतात, असें आपल्याला म्हणतां येईल, म्हणावेंसें वाटतें. पण यांतहि एक प्रकारचा द्रव्यभाराचाच फसवा प्रकार आहे. खरी गोष्ट अशी आहे कीं, ब्रह्माचे असे विभाग व वांटणी होऊं शकत नाहीं. लहान मोठा वांटा, सारखा सारखा वांटा ही भाषा ब्रह्माच्या बाबतींत अगदीं खोटी भाषा आहे. ब्रह्म अविभाज्य आहे. सर्व ठिकाणीं, सर्व वस्तूंत, सर्व कामांत तें सर्वच्या सर्व असतें. वस्तू व कामें विभक्त दिसतात, त्यामुळें तें विभागलें गेलें आहे असा देखावा दिसतो. बुद्धीनें बनविलेल्या कल्पना बाजूस ठेवून आपण बारकाईनें निरीक्षण केलें, अंतःस्फूर्त ज्ञान आणि तादात्म्यानें होणारें ज्ञान यांच्या साह्यानें आपण या असीम ब्रह्मशक्तीकडे पाहूं लागलों, तर असें दिसतें कीं, मनाला व मनाच्या ज्ञानशक्तीला जें दिसतें, त्याहून अगदीं वेगळें दर्शन ब्रह्माच्या ज्ञानशक्तीला होतें -- तें असें कीं, सूर्यमाला व वारूळ यांच्या उभारणींत एकाच वेळीं सर्वच्या सर्व अविभक्त ब्रह्मशक्ति सारख्याच तीव्रतेनें काम करते -- ती आपले भाग करून सारखे सारखे कोणाला वांटीत बसत नाहीं -- सगळें ब्रह्म आणि वांटे पाडलेलें ब्रह्म अशी कांहीं गोष्ट नाहीं, असू शकत नाहीं. कोणतीहि वस्तु घ्या, सर्वच्या सर्व अविभक्त अविभाज्य ब्रह्म ती वस्तु आहे. सर्वच्या सर्व ब्रह्म तिच्यासाठीं राबत आहे. महत्त्वानें व प्रकारानें गुण वेगळे वेगळे असतील, द्रव्य हें वजनानें, बलानें वेगळें वेगळें असेल, परंतु सर्वत्र सर्वकाळ आत्मा किंवा ब्रह्म सम, अगदीं सारखें असतें. आत्मशक्ति आणि ब्रह्मशक्ति, शाश्वत आदींचा आदि असणारी आणि अंत नसणारी अशी ब्रह्मशक्ति, सर्व ठिकाणीं अगदीं समतेनें आहे, अभेदानें आहे. जे भेद असतात, ते ब्रह्माच्या क्रियाशक्तीचा प्रकार, कार्यपद्धति व परिणाम यांच्या बाबतींत असतात. बलवान् मनुष्य

 

पान क्र. १३७

 

आणि दुर्बल मनुष्य घ्या. बलवान् बलसंपादक-शक्तीनें बलवान् होतो, दुर्बल मनुष्य दुर्बलता-संपादक-शक्तीनें दुर्बल होतो. पण या दोन शक्ती अगदीं सारख्या असतात. दुर्बलता-संपादक शक्ति बलसंपादक-शक्तीहून एक कणभरहि कमी असत नाहीं. मनांतील भाव दाखविणें किंवा दाबून ठेवणें, एखाद्या सिद्धान्ताला पाठिंबा देणें किंवा तो खोडून काढणें, आवाज काढणें किंवा शांतता राखणें, या क्रियांच्या सर्वच जोड्यांत शक्ति खर्च करावी लागते, व ती सर्वत्र सारखीच खर्च होत असते.

तेव्हां, आम्हांला पहिली गोष्ट ही करावयास हवी कीं, विश्वाच्या अस्तित्वाची महाशक्ति, विश्वरूप अनंत आंदोलन, यांचा आणि आमचा जो संबंध आम्ही मानीत आलों आहों, त्या संबंधांत आम्हीं दुरुस्ती केली पाहिजे. सध्यां आम्ही या संबंधींचा जो हिशोब ठेवीत आहों, तो हिशोब खोटा आहे. विश्वाला आमचें महत्त्व अतिशय आहे, त्याला कांहीं मर्यादाच नाहीं असें आम्ही मानतो. त्याबरोबर आम्ही असें मानतो कीं, विश्वाचें महत्त्व आम्हांला कांहींहि नाहीं, असलें तरी अगदींच थोडे आहे, दुर्लक्ष करण्यासारखें आहे. आम्हीच आम्हांला महत्वाचे आहोंत. आमच्या खेरीज आम्हांला कोणीहि, कांहींहि महत्त्वाचें नाहीं. ज्याला मूळ अज्ञान म्हणतात, तें 'मी'चें मूळ असतें. त्याची खूणच ही आहे कीं, स्वतःला सर्व कांहीं महत्त्व दिल्याशिवाय, स्वतःला विश्व किंवा विश्वाचें केंद्र कल्पिल्याशिवाय, त्याला विचारच करतां येत नाहीं. स्वतः खेरीज बाकी जें आहे, त्यांतील त्याच्या मनाला पटेल तेवढें आणि परिस्थितीचे तडाखे त्याला जें मान्य करावयास लावतील तेंच तें मान्य करतें. हें 'मी' रूप, मूळ अज्ञान, तत्त्वविचार करूं लागलें म्हणजे, 'विश्व जें आहे तें स्वतःच्या जाणिवेत आहे; जाणिवेच्या बाहेर स्वतंत्र अस्तित्व विश्वाला नाहीं; जाणिवेंतच त्याला अस्तित्व येतें व आलें आहे,' असे सिद्धांत तें करीत नाहीं कां ? स्वतःच्या जाणिवेची अवस्था, स्वतःच्या मनानें ठरविलेली मूल्यें हीच सत्याची कसोटी तें मानतें. त्याच्या कक्षेच्या वा क्षितिजाच्या बाहेर जें असेल, तें खोटें किवा अविद्यमान आहे, असें मानण्याकडे त्याचा कल असतो. जोपर्यंत आमच्यामध्यें ही मनाची आत्मसंतुष्टता आहे तोपर्यंत जीवनाची खरी किंमत आम्हांला कळत नाहीं, त्याच्यापासून योग्य तो लाभ पूर्णपणें आम्हांला घेता येत नाहीं. कारण मनाची ही आत्मसंतुष्टता खोट्या हिशोबाची पद्धति सुरू करून आम्हांला खोटे जीवन जगाययास लावते. पण या त्याच्या आत्मप्रौढीच्या

 

पान क्र. १३८

 

गोष्टींत एका अर्थानें कांहीं तथ्य आहे -- एका सत्यावर त्याची प्रौढी वस्तुत: आधारलेली आहे. पण हें सत्य, तेव्हांच व्यवहारांत दृग्गोचर होतें, जेव्हां आमच्या मनाला आपलें अज्ञान लक्षांत येतें आणि आमचा मी खऱ्या विश्वपुरुषाचा अंकित होतो आणि आपलें वेगळें स्वत्व त्या विश्वपुरुषांत विलीन करतो. ज्याला आम्ही 'मी' म्हणतो, किंवा ज्या परिणामांना व रूपांना आम्ही 'मी' म्हणतो, तो 'मी' म्हणजे या विश्वरूपीं अनंत आंदोलनाचा एक लहानसा हिस्सा आहे हें आम्हीं ओळखलें पाहिजे. जें अनंत विश्व आम्हांला जाणावयाचें आहे, तें आम्हीं स्वत: जाणीवपूर्वक व्हावयाचें आहे, त्याची प्रामाणिकपणें आम्हांला परिपूर्ति करावयाची आहे, अर्थात् त्याचें जें इष्ट आहे तें साधावयाचें आहे हें आम्हीं ओळखलें पाहिजे. हें आम्हीं, आमच्या 'मी'नें ओळखलें म्हणजे खरें जीवन जगावयास आरंभ होतो. हें खरें किंवा दिव्य जीवन पूर्ण होण्यास दुसरी एक जाणीव आम्हांला व्हावयास हवी. ती जाणीव ही कीं, आम्हांला जसा 'मी' आहे, तसा आम्हांला खरा 'आत्मा'हि आहे; आणि हा खरा आत्मा अनंत आंदोलनाशीं किंवा विश्वाशीं, विश्वपुरुषाशीं एकरूप आहे, आमच्या 'मी'प्रमाणें त्याचा दुय्यम नाहीं - त्याचा सेवक नाहीं. आपला स्वभाव, विचार, भावना व कृती यांच्या द्वारां ही खऱ्या आत्म्याची जाणीव आणि तिचें आविष्करण आपल्या ठिकाणीं रूढ झालें म्हणजे, खरें किंवा दिव्य जीवन आपल्याला पूर्णपणें जगतां आलें असें होतें.

पण आपला जीवनाचा हिशोब पुरा होण्यासाठीं आणखी कांहीं ज्ञान आपल्याला आवश्यक आहे. हें जें अनंत, सर्वशक्तिमान् क्रियासामर्थ्य -- हें जें विश्व -- सारखें क्रियामग्न आहे, तें वस्तुत: काय आहे, याचें ज्ञान करून घेणें आवश्यक आहे. पण येथेंच नव्या अडचणी उत्पन्न होतात. शुद्ध स्वयं-तंत्र बुद्धि सांगते कीं, जसे आम्हीं विश्वरूप आंदोलनाचे अंशरूप आहोंत, त्या आंदोलनाचे अंकित आहोंत, त्याप्रमाणें गतिशील विश्व हें त्याहून वेगळ्या एका वस्तूचा एक अंश, एक अंकित अंश किंवा पैलू, या स्वरूपाचें आहे. ही वस्तु एक महान् अस्तित्व आहे, कालातीत स्थलातीत गतिशून्य सदा-स्थिर ''स्थाणू'' अशी वस्तु आहे; तिच्यांत बदल होत नाहीं, तिच्यांतील द्रव्य जसेच्या तसें राहणारें, कधींहि न संपणारें असें आहे, तिच्यांतील द्रव्य मुळींच खर्च होत नाहीं, ती कांहींहि क्रिया करीत नाहीं, मात्र सर्व क्रिया तिच्या पोटांत होतात; ती वस्तु क्रियाशक्ति नाहीं, केवळ शुद्ध गतिशून्य अस्तित्व, हें त्या वस्तूचें स्वरूप आहे. वेदान्तहि

 

पान क्र. १३९

 

असेंच विधान करीत असल्यासारखें दिसतें. पण ज्यांना केवळ विश्वशक्तीच दिसते, ते असें म्हणूं शकतात कीं, स्थिर वस्तु, शुद्ध अस्तित्व या शक्तीच्या मुळाशीं आहे हें म्हणणें सत्य नाहीं; अशी कांहीं वस्तु मुळींच अस्तित्वांत नाहीं. शाश्वत स्थिरता, अक्षर शुद्ध अस्तित्व या ज्या कल्पना आमच्या भांडारांत आहेत, त्या बुद्धीनें कल्पिलेल्या अवास्तव कल्पना आहेत, स्थिरतेसंबंधींच्या खोट्या कल्पनेवर या कल्पना आधारलेल्या आहेत; वस्तुत: स्थिर असें कांहींहि नाहीं; सर्व कांहीं अस्थिर, चंचल, गतियुक्त आहे, गतिमान् विश्वाशीं व्यवहार करायला कांहीं एक स्थिर बिंदु हवा म्हणून आमच्या मनाने स्थिरतेची कृत्रिम कल्पना उभी केली आहे. केवळ गतिमान् विश्वाकडेच पाहिलें, तर हा सिद्धान्त खरा असल्याचें दाखवितां येतें. गतिमान् विश्वांत स्थिर कांहींच नाहीं. जें कांहीं स्थिर दिसतें, तें खरोखरी स्थिर नसून तो हालचाल करणाऱ्या वस्तूंचा एक संच असतो. शक्ति सारखें कार्य करीत असते आणि क्रियामग्न शक्तीचें स्वरूप आम्हांला, आमच्या जाणिवेला अगदीं स्थिर असल्यासारखें दिसतें -- पृथ्वी फिरत असतां स्थिर भासते, आपण ज्या आगगाडींत बसलों असूं, ती गाडी धांवत असतां, आजूबाजूचा भाग धांवत आहे व आपली गाडी एका जागीं उभी आहे असें भासते. त्याप्रमाणें विश्वांतील सर्व वस्तूंची गोष्ट आहे. पण विश्वाच्या पोटांतील वस्तूंसंबंधानें जी गोष्ट खरी आहे, ती एकंदर विश्वासंबंधानेंहि खरी आहे. त्याला गतिहीन स्थिर वस्तूचा आधार नाहीं -- असें मानतां येत नाहीं. सदा गतिमान् विश्वाचें 'मूळ', सदा स्थिर असें शुद्ध अस्तित्व आहे असा निर्णय शुद्ध व स्वतंत्र बुद्धीनें दिला आहे. 'क्रियाशील शक्ति हेंच अस्तित्व' ही गोष्ट तिला मान्य नाहीं; शुद्ध अस्तित्व, शुद्ध सद्वस्तु, शक्तीचें उगमस्थान आहे असाहि शुद्ध बुद्धीचा सिद्धान्त आहे.

शुद्ध बुद्धीनें सांगितल्याप्रमाणें शुद्ध अस्तित्व, शुद्ध सद्वस्तु जर विश्वशक्तीचा उगम असेल तर त्या शक्तीप्रमाणें तें अस्तित्वहि अनंत असलें पाहिजे, हें समजणें अवघड नाहीं. शुद्ध अस्तित्वाच्या बाबतींत खरा शेवट, खरा अंत संभवनीय आहे असें बुद्धि, अनुभव, अंतर्ज्ञान, किंवा कल्पनाशक्ति यांपैकीं कोणीहि सांगत नाहीं. शेवट वा आरंभ मानला कीं त्या मानलेल्या शेवटापलीकडे, त्या मानलेल्या आरंभापलीकडे कशाचें तरी अस्तित्व आपण गृहीत धरतो. केवळ निःसंबंध शुद्ध अस्तित्वाचा शुद्ध अंत किंवा आदि या शब्दप्रयोगांत दोन अन्योन्यविरुद्ध कल्पना एकत्र

 

पान क्र. १४०

 

केल्या जातात; कारण आदि किंवा अन्त, हा निःसंबंध, शुद्ध असूंच शकत नाहीं. या दोन्ही गोष्टी सापेक्ष आहेत. तेव्हां शुद्ध अस्तित्वाचा शुद्ध आरंभ किंवा शुद्ध शेवट हा शब्दप्रयोग विरोधमय असल्यानें अर्थशून्य आहे, वस्तुस्थितीच्याहि विरुद्ध आहे; वस्तुजाताचें अंतरंग, सारतत्त्व हें या कल्पनेला सर्वथा विरोध करणारें आहे; या सारतत्त्वाच्या बाबतींत आदि-अन्ताची कल्पना करणें हें सत्याचा अधिक्षेप करणें आहे, ती कल्पना केवळ मिथ्या आहे. सांताचा पसारा अनन्त अस्तित्वावांचून निराधार होतो. स्वयंभू अनन्त सद्वस्तु, सान्त दृश्याचा पसारा उभा राहण्यासाठीं अगदीं अवश्य आहे, अपरिहार्य आहे.

ज्या अनंत अस्तित्वाचा आधार सान्त पसाऱ्याला अनिवार्य असल्याचें आतां आपण पाहिलें, तें अनन्त अस्तित्व, काळदृष्टीनें व अवकाशदृष्टीनें अनंत, असें आपण समजावयाचें आहे. कालाचा अनंत प्रवाह, अवकाशाचा किंवा आकाशाचा अनंत विस्तार, शुद्ध सद्वस्तूनें व्यापलेला आहे असें दर्शन, शुद्ध बुद्धीला घडल्यानंतरहि तिचें संशोधन पुढें चालूं राहतें. काल व अवकाश या वस्तू काय आहेत याचा शोध ती करीत राहते. हा शोध ती आपल्या कठोर निःपक्षपाती स्वभावानुसार बारकाईनें करीत असतां, तिला असें दिसते कीं, काल व अवकाश (किंवा स्थल) या जाणिवेच्या बाहेरच्या वस्तू नसून, तिच्या विषयग्रहणाच्या कार्यांत तिला आवश्यक असणाऱ्या तिच्याच दोन अवस्था, दोन बाजू आहेत; दोन मूलभूत कल्पना आहेत. शुद्ध अस्तित्वावर बुद्धीनें आपली नजर स्थिरावली कीं काल व स्थल या वस्तु वस्तुदृष्ट्या नाहींशा होतात. शुद्ध अस्तित्वाचा विस्तार या संशोधनांत दिसला, तर तो विस्तार स्थलविस्तार म्हणून दिसत नाहीं, मन:कल्पित मनोविस्तार म्हणून प्रत्ययास येतो; शुद्ध अस्तित्वाची चिरंतनता या संशोधनांत दिसली, तर ती चिरंतनता कालाची दिसत नसून, मनाची व मनःकल्पित म्हणून प्रत्ययास येते. तेव्हां हें उघड आहे कीं, शुद्ध अस्तित्वाच्या बाबतींत अनंत स्थलविस्तार व अनंत कालविस्तार या गोष्टी, या कल्पना केवळ प्रतीकरूप आहेत. या प्रतीकद्वारां, जी वस्तु व्यक्त होते, ती बुद्धीच्या शब्दांत सांगतां येण्यासारखी नसते. तिचें ज्ञान करून घेण्याचा यत्न या प्रतीकद्वारां मन करीत असतें. भूत-वर्तमान-भविष्य सर्व घटना सामावून घेणारा, सदैव नवा असणारा एकच एक क्षण, ही अनंत कालप्रवाहाची बुद्धीला होणारी प्रतीति, तसेंच भूत-वर्तमान-भविष्य सर्व वस्तू सामावून घेणारा, सर्व वस्तू व्यापून राहणारा,

 

पान क्र. १४१

 

कोणतेंहि माप -- लांबी रुंदी उंची -- नसलेला एकच एक बिंदु, ही अनंत स्थलविस्ताराची बुद्धीला होणारी प्रतीति -- या दोन प्रतीती, असामान्य आहेत. त्यांच्या वर्णनांत अन्योन्यविरोधी शब्द एकत्र बसवावे लागतात; याचाच अर्थ मन आणि वाणी यांच्या स्वाभाविक मर्यादांतील हे प्रत्यय वा अनुभव नाहींत. शुद्ध सद्वस्तूची अनुभूति, शुद्ध बुद्धीला होते; पण जेव्हां त्या अनुभूतीचा ती शब्दांनीं उच्चार करूं पाहते, तेव्हां वाणीचे, मनाचे रूढ शब्दसंकेत अपुरे पडतात. विरुद्ध अर्थाचे शब्द एकत्र ठेवून वर्ण्य वस्तूचें वर्णन करावे लागते; आणि ती सद्वस्तु आहे, एकच एक आहे व अवर्ण्य, अनिर्वाच्य आहे, एवढाच निष्कर्ष या खटाटोपापासून निघतो.

शुद्ध बुद्धीच्या शुद्ध अस्तित्वासंबंधींच्या या संशोधनांत काल आणि स्थल (अवकाश व आकाश) नाहींसे होतात असें वर सांगितलें. पण असेहि कशावरून नसेल कीं, शुद्ध अस्तित्व ही खरी वस्तु नसून बुद्धीची कृत्रिम निर्मिति आहे ? केवळ शब्दजालानें उभी केलेली 'नसती' वस्तु आहे आणि अशा खोट्या, काल्पनिक, 'नसलेल्या', वस्तूला आम्ही आपल्या कल्पनाशक्तीच्या आग्रहास्तव, अस्तित्वांत असलेली खरी मूळ वस्तु म्हणून प्रतिष्ठा देऊं इच्छितों ? --आणि या आमच्या खटाटोपाचें फळ म्हणून काल आणि स्थळ यांना आम्ही निकालांत काढतों ? या शक्यतेचा विचार आम्हीं करावयास हवा. त्यासाठीं शुद्ध अस्तित्व या वस्तूकडे आम्हीं शुद्ध बुद्धीच्या साह्यानें बारकाईनें ध्यान द्यावयास हवें. असें ध्यान दिलें असतां ही गोष्ट लक्षांत येते कीं, जें कांहीं दृश्य आहे त्याच्या पाठीमागें कांहींतरी अनंत अनिर्वाच्य वस्तु आहे. कोणतेंहि दृश्य, कोणताहि दृश्यसंभार स्वयंभू आहे असें आपणाला म्हणतां येत नाहीं. सगळें दृश्य विचारानें एकत्रित करून शक्ति -- पायाभूत विश्वव्यापक अविभाज्य अशी क्रियामग्न क्रियाशक्ति एकच एक सदैव चंचल क्रियाशक्ति -- हें सर्व दृश्याचें स्वरूप आहे अशी कल्पना केली, तरी एवढेंच होतें कीं, आम्हांला एक अनिर्वाच्य असें दृश्य, दृश्यवस्तु लाभते. पण हें दृश्य चलायमान, चंचल, अस्थिर असल्यानें, अचंचल, स्थिर अशी कांहीं वस्तु त्याच्या मुळांत असावी असें तें सुचवितें; क्रिया करणारी सद्वस्तु क्रियेचें मूळ आहे असें प्रत्येक क्रिया सुचविते; शक्ति क्रियामग्न दिसलीं कीं ती शक्ति क्रिया थांबवून स्थिर होणारीहि असली पाहिजे, ही कल्पना अपरिहार्यपणें उभी राहते. केवळ निःसंबंध, स्वयंभू क्रियाविहीन शक्ति म्हणजेच स्वयंभू अस्तित्व होय. शुद्ध बुद्धीपुढें शेवटी मूळ सत्य म्हणून दोन पर्याय उभे राहतात. अनिर्वाच्य

 

पान क्र. १४२

 

शुद्ध अस्तित्व, आणि अनिर्वाच्य क्रियामग्न शक्ति या पर्यायांपैकीं दुसरा पर्याय खरा धरला, अर्थात् स्थिर असा कांहींहि अस्तित्वाचा पाया नसून, केवळ शक्ति मात्र आहे असें धरले, तर शक्ति ही क्रियेचा, नित्य गतीचा परिणाम म्हणून गृहीत धरणें प्राप्त होईल आणि नित्य गति हें मूळ समजावें लागेल. या पक्षांत अस्तित्व मूळ नाहीं. असत्, बुद्धपंथीयांचें निर्वाण हें मूळ सत्य, आणि कर्म किंवा गतिचक्र शाश्वत असून अस्तित्व हा त्याचा धर्म आहे, अशी मांडणी करावी लागेल. पण या मांडणींत शुद्ध बुद्धीचें समाधान होऊं शकत नाहीं. शुद्ध बुद्धीची अनुभूति वेगळी आहे, शुद्ध बुद्धीला जें मूलभूत दर्शन घडतें, त्याच्या विरुद्ध दुसरा पर्याय असल्यानें, तो ती 'मूळ सत्य' म्हणून मान्य करूं शकत नाहीं. शुद्ध बुद्धीला तिच्या सूक्ष्म संशोधनाअंतीं अनिर्वाच्य शुद्ध अस्तित्वाचेंच मूलभूत दर्शन घडतें आणि म्हणून अनिर्वाच्य क्रियामग्न शक्ति हें 'मूळ अस्तित्व' आहे असा निर्णय ती देऊं शकत नाहीं. असा निर्णय मान्य करणें म्हणजे दोन्ही बाजूला आधार नसलेल्या, आकाशांत जणुं लोंबकळणाऱ्या शिडीच्या अगदीं शेवटच्या पायरीवर एकदम जाऊन उभें राहण्यासारखें आहे. अशा रीतीनें अस्तित्व ही बुद्धीची कृत्रिम निर्मिति नव्हे किंवा शब्दजालानें उभी केलेली 'नसती' वस्तु नव्हे. अस्तित्व ही खरी वस्तु आहे, एकच एक अशी मूळ वस्तु आहे.

हें मूळ अस्तित्व अनिर्वाच्य, अनंत, काल-स्थलविहीन आणि स्वभावत: शुद्ध, केवळ, स्वयंपूर्ण, स्वयंभू आहे. कसल्याहि मापानें किंवा मापांनीं तें मोजतां येत नाहीं. कसलाहि गुण किंवा गुण-समूह त्याच्या रचनेंत नाहीं. रूप किंवा आकार यांचा समुदाय हें त्याचें स्वरूप नाहीं, कोणत्याहि रूपाचें किंवा आकाराचें मूळ आकार-बीजहि तें नाहीं. सर्व रूपें किंवा आकार, सर्व राशि, मापें, किंवा सर्व गुण नाहींसे झाले, तरी तें मूळ अस्तित्व, मूळ सद्वस्तु कांहीं नाहींशी होणार नाहीं; ती राहीलच. अशा तऱ्हेचें रूप- गुण-मानहीन अस्तित्व, आमच्या शुद्ध बुद्धीला कल्पितां येतें; एवढेंच नव्हें, तर जें सर्व दिसत आहे त्याच्या मुळाशीं असेंच अस्तित्व आमच्या बुद्धीला मानावें लागतें. हें अस्तित्व रूपादिहीन आहे याचा अर्थ, अर्थातच या रूपादिकांपेक्षां तें फार मोठें आहे; त्यांच्या पलीकडे आहे, त्याच्यांत रूप-गुण-मान विलीन झाले कीं त्यांचें रूपत्व, गुणत्व, मानत्व नाहींसें होतें -- त्यांतून चंचलाचा, गतिशील आंदोलनाचा कारभार सुरू झाला म्हणजे हीं विलीन रूपें, गुण आणि मापें पुनरपि उदयास येतात. हीं रूपें वगैरे

 

पान क्र. १४३

 

विलीन होतात याचा अर्थ, अनेक रूपांचें एक मूळ रूप, अनेक गुणांचा एक मूळ गुण, अनेक राशींचा एक मूळ राशि होऊन, मूळ अस्तित्वांत, सद्वस्तूंत राहतो असा नव्हे. कसलेंहि मूळरूपादि नांव देण्यासारखें त्या सद्वस्तूंत कांहीं राहत नाहीं. याप्रमाणें विश्वाचें गतिचक्र चालूं असतां ज्या गोष्टी या गतिशीलतेच्या कारणभूत अथवा अभिव्यक्तिरूप असतात, त्या सर्व, विश्वमूळ अस्तित्वांत विलीन होतात आणि या विलीन स्थितींत, त्यांना गतिमानतेंत असलेलें नांव देता येत नाहीं -- अशी त्यांची व्यवस्था होते. म्हणूनच या मूळ शुद्ध अस्तित्वाला, स्वयंपूर्ण सर्वसंबंधातीत निरपेक्ष एकरस कैवल्य म्हणतात. या कैवल्याचें ज्ञान विचारशक्तीला होत नाहीं. तथापि या कैवल्याशीं आम्ही एकरूप होऊं शकतो. ही एकरूपता, सर्वश्रेष्ठ एकरूपता होय. ज्ञान ज्या शब्दांत सांगितलें जातें असा कोणताहि शब्द या अज्ञेयाचें, या अज्ञेय केवलाचें यथार्थ वर्णन करूं शकत नाहीं. गतिशील विश्वसंसार, हा या केवलतेच्या उलट स्वभावाचा असतो. सर्व संबंधांचें हा क्षेत्र असतो. जें नि:संबंध स्वयंपूर्ण कैवल्य, गतिमय संसारांतील सर्व वस्तू आपल्यांत समाविष्ट करून असतें, तें प्रत्येक वस्तूंतहि अंतर्भूत असतें -- तेंच या सर्व वस्तू असतें. तें पूर्ण आणि या वस्तू अपूर्ण. पूर्णच अपूर्ण रूपांनीं व्यक्त होतें. निसर्गाच्या घटना आणि मूळ आकाशतत्त्व यांचा संबंध पूर्ण-अपूर्णाच्या संबंधासारखा आहे. नैसर्गिक घटनांत, वस्तूंत आकाशतत्त्व असतें, आकाशतत्त्वाच्याच त्या घटना व वस्तू बनलेल्या असतात, त्या आकाशतत्त्वांत त्या सर्व समाविष्ट असतात -- आणि आकाशतत्त्व नैसर्गिक घटनांहून, वस्तूंहून अगदीं वेगळें असतें. इतकें वेगळें कीं, या वस्तू त्या आकाशतत्त्वांत विलीन झाल्या कीं त्यांचें निसर्गांतील स्वरूप पार नाहींसें होतें. पूर्ण अस्तित्व व अपूर्ण गतिशील विश्वसंसारगत वस्तू यांचा संबंध स्पष्ट करण्यासाठीं वेदान्त हा आकाशतत्त्व आणि निसर्गवस्तू यांचा दाखला देत असतो. पूर्ण आणि अपूर्ण एक आहेत, अभिन्न आहेत आणि भिन्नहि आहेत. त्यांचा भेदांत अभेद कसा आहे हें दाखविण्यास, आकाश आणि निसर्गांतील वस्तुजात यांचा हा दृष्टान्त पुष्कळच समर्पक आहे.

तथापि या अपूर्ण वस्तू मूळच्या पूर्ण वस्तूंत परत जातात अशी भाषा आम्ही जेव्हां वापरतो, तेव्हां ती आमच्या कालनिष्ठ जाणिवेची भाषा आहे हें आम्ही विसरतां कामा नये. ही भाषा वापरतांना या जाणिवेचे भ्रम आम्हीं आमच्यापासून दूर ठेवले पाहिजेत. अक्षर अशा मूळ वस्तूं-

 

पान क्र. १४४

 

तून गतिमय संसार उदय पावतो, तो अमुक क्षणीं उदय पावतो अशी स्थिति नाहीं; तो नित्यनिरंतर उदय पावत असतो. ही कल्पना मनानें करणें अवघड असल्यानें मूळ स्थिर पूर्णापासून गतिमय संसाराचा आविष्कार सांगतांना, आपण मनाच्या कल्पनांना व अनुभवांना सोईची अशी कालनिष्ठ नित्यतेची भाषा वापरतो. या भाषेंत एका क्षणापासून दुसरा क्षण, त्यामागून तिसरा अशी कधीं न संपणारी क्रमवार कालगति म्हणजे नित्यता आणि या नित्यतेंत पुन: पुन: आरंभ आहे, मध्य आहे, अंत आहे, असें आम्ही म्हणतो व मानतो.

मूळ शुद्ध अस्तित्वासंबंधानें आमची शुद्ध बुद्धि काय सांगते तें आपण येथवर पाहिलें. पण शुद्ध बुद्धीच्या कल्पनांवर आम्हीं सर्व भार टाकावा कां ? या कल्पना कितीहि तर्कशुद्ध असल्या, तरी केवळ तर्कशुद्धतेमुळें त्या आम्हीं मान्य केल्याच पाहिजेत असें होत नाहीं. जी गोष्ट आम्हांला 'आहे' म्हणून अनुभवाला येते, त्या अनुभवसिद्ध गोष्टीलाच बुद्धीच्या कल्पनांहून अधिक ग्राह्य मानणें अवश्य आहे -- त्या अनुभवसिद्ध गोष्टींच्या आधारानेंच अस्तित्वासंबंधानें आमचा निर्णय आम्हीं घ्यावयास हवा. हा निर्णय बुद्धीच्या कल्पनांवर विसंबून ठेवणें न्यायसंगत नाहीं. जें अस्तित्व आमच्या नजरेसमोर आहे त्या अस्तित्वाकडे, अगदीं शुद्ध स्वतंत्र अंतःप्रज्ञेनें, अंतर्दृष्टीनें पाहिलें, तर आकाश किंवा अवकाश आणि काल या दोनहि ठिकाणीं सर्वत्र हालचाल दिसते, दुसरें कांहीं दिसत नाहीं. स्थल किंवा स्थलाधिष्ठित भ्रमण आमच्या बाहेर व कालाधिष्ठित भ्रमण आमच्या आंत सारखें चालूं असतें. स्थलांत दृश्य हिंडत असतें, कालांत द्रष्टा हिंडत असतो. कमीअधिक विस्तार, कमीअधिक चिरंतनता या सत्य गोष्टी आहेत; स्थल, काल या सत्य वस्तु आहेत. स्थलविस्तार ही बाह्य गोष्ट नसून मानसिक घटना आहे, एकच एक आणि अविभाज्य असें शुद्ध अस्तित्व मनाला ग्रहण करणें अवघड असल्यानें, विस्तारलक्षण स्थलाची कल्पना करून, त्यांत अनंत विस्ताराचे अस्तित्व आहे अशी मांडणी मन आपल्या समजुतीसाठीं करते, असें आपण म्हणूं शकतो. म्हणजे बाह्य स्थलाच्या पाठीमागें जाऊन त्याची बाह्य सत्यता काढून घेतां येते. पण कालासंबंधानें असें त्याच्या पाठीमागें जातां येत नाहीं. आमच्या आंत कल्पनांचा, विचारांचा क्रम असतो. हा क्रम म्हणजे कालक्रम. आमच्या विचारशक्तीचें, जाणिवेचें शरीरच जणुं कालाचें बनलेलें आहे, क्रमवार गतीचें बनलेलें आहे. आम्ही व आमचें जग, सारखी न थांबता भूतकालांतून

 

पान क्र. १४५

 

भविष्यांत वाटचाल करीत आहों. आमची आणि आमच्या जगाची वाढ होते, प्रगति होते म्हणजे काय होते ? आम्ही आणि आमचें जग ही एकसारखी अविरत चालणारी हालचाल आहे. भूतकालांतील, जुन्या एकामागून एक घडलेल्या गोष्टी वर्तमान क्षणांत आपण समाविष्ट करतो -- आणि भविष्य कालांतील एकामागून एक घडणाऱ्या गोष्टींचा आरंभ या वर्तमान क्षणांतून होतो, असें आम्ही समजतो; भूतकालीन क्रमवार घटनांचा वर्तमान क्षणांत समावेश करणें व वर्तमान क्षणाला भविष्यकालीन क्रमवार घटनांचा आरंभ समजणें, हाच आमच्या व आमच्या जगाच्या प्रगतीचा अर्थ आहे. या गतींत आम्हांला वर्तमान काल स्पष्टपणें प्रतीत होत नाहीं. कारण भूतकाल आणि भविष्यकाल यांच्या संधिस्थानीं 'वर्तमान' क्षणभर असतो, नसतो. तेव्हां कालाचा क्रम, भ्रमणक्रम *अविभाज्य अनंत असल्याचा आम्हांस प्रत्यय येतो. त्या कालाच्या प्रवाहाबरोबरच, आमच्या अविभाज्य जाणिवेचा सदा पुढें धांवणारा भ्रमन्तीचा कार्यक्रमहि आमच्या प्रत्ययास येतो. अर्थात् कालाच्या पोटांत शाश्वतपणें क्रमबद्ध हालचाल होणें, कालाच्या पोटांत बदलावर बदल होत राहणें, संक्षेपत: कालप्रवाह, किंवा घटनाप्रवाह, हेंच एक अंतिम सत्य आहे; घटना (घडणें, होणें) हेंच एक अंतिम अस्तित्व, सद्वस्तु आहे;

-------------------------

*अविभाज्य म्हणजे एकंदर भ्रमन्तीच्या दृष्टीनें अविभाज्य. अखंड कालाचा, जाणिवेचा प्रत्येक क्षण त्याच्या पूर्वींच्या व नंतरच्या क्षणाहून वेगळा समजतां येईल, शक्तीचें अनुक्रमानें घडणारें प्रत्येक कार्य नवीन म्हणून मानतां येईल -- तथापि असें असतांहि क्षणाक्षणामध्यें, कार्याकार्यामध्यें खंड पडतो असें मानण्याचें कारण नाहीं. क्षणामागून क्षण, कार्यामागून कार्य अखंडपणें अविभाज्य, अविभक्त रीतीनें चालूं असतें असेंच दिसून येतें. कालप्रवाह, जाणिवेचा प्रवाह किंवा ज्ञानप्रवाह या अखंडपणाशिवाय सिद्ध होत नाहीं. मनुष्य चालतो, धांवतो, उड्या मारतो, तेव्हां त्यांचीं पावलें वेगळीं वेगळीं पडतात, तथापि त्या सर्व पावलांना घेऊन त्याचें चालणें, थांबणे, उड्या मारणें या क्रिया अखंड करणारे असें कांहीं त्या क्रियांत अंतर्भूत असतें. हीच गोष्ट कालाच्या जाणिवेच्या क्षणांची, शक्तीच्या क्रमवार कार्यांची आहे. त्या सर्व क्षणांना, कार्यांना एकत्र जोडणारा अखंड धागा असतो -- व या धाग्यामुळेंच कालप्रवाह, ज्ञानप्रवाह अखंड असलेला आमच्या अनुभवास येतो.

 

पान क्र. १४६

 

शुद्ध अस्तित्व म्हणून कांहीं नाहीं, असें अस्तित्वाकडे पाहणारी शुद्ध अंतर्दृष्टि आम्हांला सांगते, अर्थात् शुद्ध बुद्धीचा निर्णय व शुद्ध अंतर्दृष्टीचा अनुभव यांत विसंगति दिसते.

पण ही विसंगति आभासात्मक आहे. खरोखरीच जर अंतर्दृष्टि आणि बुद्धि यांचा या बाबतींत एकमेकींना विरुद्ध असा निर्णय असेल, तर बुद्धीचा निर्णय आम्हांला मान्य करतां येणार नाहीं. परंतु गोष्ट अशी आहे कीं, अंतर्दृष्टीपुढें, अंतर्दृष्टीला घडणाऱ्या दर्शनापुढें, जेव्हां आम्हीं बुद्धीच्या निर्णयाविरुद्ध आमची बाजू मांडतो, तेव्हां अंतर्दृष्टीला घडणारें अर्धें दर्शन आम्ही पूर्ण दर्शन समजून चालतों. अंतर्दृष्टि जोपर्यंत घटनाप्रवाहावर खिळलेली आहे, तोपर्यंत तिला जें दिसते तें बुद्धीच्या निर्णयाला प्रतिकूल असलें तरी तें खरें असतें. आमचा जीवनप्रवाह नदीच्या प्रवाहासारखा असतो. बौद्ध तत्त्वज्ञानांत या प्रवाहाला ज्वालेचा दृष्टांत देतात. आम्ही काय होत आहों, यावरच अंतर्दृष्टि लक्ष देत आहे, तोंपावेतों आम्हीं अखंड हालचाल आहोंत, या गतीचें पाऊल सारखें पुढें पुढें पडत आहे, आमच्या जाणिवेंत सारखा बदल होत आहे, कालाच्या शाश्वत प्रवाहांत आमचा हा जीवन-प्रवाह सारखा चालू आहे, हेंच दर्शन आमच्या अंतर्दृष्टिला घडतें व घडणार आणि तें तेवढ्यापुरतें खरेंहि आहे. पण अंतर्दृष्टि एवढेंच पाहते व पाहूं शकते असें नव्हे. तिला या दर्शनाहून श्रेष्ठ असें दर्शनहि घडतें. आमचा पृष्ठभागावरचा आत्मा सोडून आम्हीं त्याच्या पाठीमागें अंतर्दृष्टीनें पाहूं शकतो आणि असें आंतरात्म्यांत पाहिलें म्हणजे आमच्या अंतर्दृष्टीला सर्वश्रेष्ठ दर्शन घडतें, सर्वश्रेष्ठ अनुभव येतो. आम्हांला तेथें असें स्पष्ट दिसतें कीं, आम्ही जें कांहीं होत असतो, आम्हांत जे कांहीं बदल होत असतात, आम्हांत क्रमवारीनें ज्या घटना घडत असतात -- हें सर्व होणें, फेरबदल घडून येणें, म्हणजेच क्रमवार घटनानिष्पत्ति ही एक आमच्या अस्तित्वाची प्रवृत्ति आहे. या प्रवृत्तिखेरीज आमच्यांत आणखी कांहीं आहे, तें या घटनाक्रमाच्या पलीकडे आहे, तें या घटनाक्रमांत बिलकुल सांपडत नाहीं. हें जें घटनातीत शुद्ध अचल नित्य अस्तित्व (सद्वस्तु) आहे, तें अंतर्दृष्टीला स्पष्ट दिसतें, या अस्तित्वाच्या क्षणिक, सारख्या घडत राहणाऱ्या घटनांच्या पडद्यामागें त्या अस्तित्वाचा आम्हांला ओझरता आंतरिक अनुभव येतो इतकेंच नव्हे, तर आम्ही बाह्य घटनाचक्रांतून निवृत्त होऊन या शुद्ध सद्वस्तूंत प्रवेश करूं शकतो, व तेथें जीवन जगूं शकतो, सगळें जीवन त्या ठिकाणीं राहून आम्हीं

 

पान क्र. १४७

 

जगूं शकतो; या आमच्या सद्वस्तूंमध्यें राहण्यानें आमच्या बाह्य जीवनांत आमूलाग्र बदल होऊन जातो. आमच्या वृत्तींतहि असाच बदल होतो. जगाच्या फिरत्या घटनांवर आमच्या कार्यप्रवृत्तीनें जो परिणाम होतो त्यांतहि, आमच्या सद्वस्तूंतील वसतीमुळें, सर्वांगीण बदल होतो; आणि ही जी सुस्थिर, अचल सद्वस्तु आमच्या निवासाचें ठिकाण होतें, ती सद्वस्तु, या नित्य चलायमान् विश्वसंसाराच्या पाठीमागें आहे, असें शुद्ध बुद्धि आपल्या शुद्ध स्वतंत्र तर्कपद्धतीनें स्थापित करते. तेव्हां अंत:स्फूर्त ज्ञान (अंतर्ज्ञान, अंतर्दृष्टि) आणि शुद्ध बुद्धीचा निर्णय यांच्यामध्यें अंतिम मूळ अस्तित्वाच्या विषयीं कांहीं विसंगति, विरोध नाहीं हें स्पष्ट आहे. जी विसंगति, व विरोध दिसतो तो अर्धवट अंतर्ज्ञानाला पूर्ण अंतर्ज्ञान समजल्यानें दिसतो. शुद्ध बुद्धीच्या तर्कपद्धतीचा उपयोग न करतांहि, हें शुद्ध अस्तित्व काय आहे याची अगोदर स्पष्ट जाणीव, स्पष्ट ज्ञान न मिळतांहि, त्या अस्तित्वाचा लाभ घेतां येतो हेंहि लक्षांत ठेवण्यासारखें आहे. तेव्हां निष्कर्ष हा कीं, हें सुस्थिर, निश्चल, अस्तित्व हें शुद्ध, नित्य, अनंत, अलक्षण असें आहे. कालाच्या क्रमवारीचा त्याला उपसर्ग पोंचत नाहीं; सर्व आकार किंवा रूप, राशी, गुण यांच्या पलीकडे तें आहे -- तें एकमेव स्वयंपूर्ण, स्वयंभू आत्मतत्त्व होय.

तेव्हां शुद्ध सद्वस्तु ही केवळ कल्पना नाहीं, ती अस्तित्वांत असलेली खरी वस्तु आहे; ती मूळ पायाभूत सत्य आहे हें उघड झालें. पण या मूळ सत्याबरोबर हेंहि ध्यानांत ठेवावयास हवें कीं, क्रियामग्न शक्ति, सारखें गतिशील विश्व, घटनाप्रवाह हेंहि सत्यच आहे. सर्वश्रेष्ठ अंतर्ज्ञान आणि तदनुरूप अनुभव हा, सारखे फिरणारें घटनाचक्र दाखविणाऱ्या अनुभवास व अंतर्ज्ञानास ओलांडून पुढें जातो, त्यांतील उणीव दाखवतो, त्यांना क्षणभर स्थगित करतो, पण त्यांना नाहींसें करीत नाहीं; सत्याच्या प्रांतांत त्यांना स्थान नाहीं असें सांगत नाहीं. अंतर्ज्ञान सत्यदर्शी आहे, आंतरनुभव सत्यस्पर्शी आहे. सत्य द्विविध असल्यानें अंतर्ज्ञान, आंतरनुभव द्विविध आहे इतकेंच. शुद्ध सद्वस्तु व विश्ववस्तु आणि सुस्थिर अस्तित्व व सारखी बदलती घटना, हीं दोन्हीं मूलभूत सत्यें आहेत. यापैकीं एक नाहीं असें म्हणणें सोपें आहे. दोन्हीहि जाणिवेंतील सत्य गोष्टी आहेत, हें सत्य मान्य करून त्या दोहोंचे नातें काय तें शोधून काढणें यांत जीवनसाफल्य साधणारी खरी सूज्ञता आहे.

 

पान क्र. १४८

 

स्वयंपूर्ण, स्वयंभू, मूळ सद्वस्तूच्या स्वरूपग्रहणासाठीं मनानें कल्पिलेल्या दोन समकालीन अवस्था म्हणजे सुस्थिरता आणि चंचलता, एकता आणि अनेकता या आहेत. वस्तुत: या अवस्थांत सद्वस्तु सामावत नाहीं; एकता आणि अनेकता, सुस्थिरता आणि चंचलता यांच्या ती पलीकडे आहे. चंचल अनेकताच्या रूपानें ती सद्वस्तु सुस्थिर एकता ही नित्य अवस्था घेऊन, स्वत:भोंवतीं अकल्पनीय रीतीनें, आत्मसंतोषानें अनंत फेऱ्या घालीत आहे. विश्वाचें अस्तित्व हें शिवाचें तांडव आहे. आत्मानंदातिशयांत शिवानें चालविलेलें नृत्य आहे, या नृत्यामुळें आमच्या नजरेसमोर शिवाचा देह अनंतरूपें घेतो -- वस्तुत: शुद्ध प्रकाशमय शिव आपल्या मूळ स्थानीं, आपल्या मूळ स्वरूपांत नित्यकाळ असतो, होता, असणार -- त्याचें नृत्य हें केवळ नृत्याच्या आनंदासाठींच चाललेलें आहे.

तें स्वयंपूर्ण केवल सद्वस्तुतत्त्व, खऱ्या स्वरूपानें कसें आहे याचें वर्णन करणें, याचा विचार करणें आम्हांला शक्य नाहीं -- तेथें सुस्थिरता आणि चंचलता, एकता आणि अनेकता एकसमयावच्छेदेंकरून आहेत. या पलीकडे त्या केवलाविषयीं आम्हांला कांहीं कल्पनाहि करतां येत नाहीं, मग भाषा करणें दूरच राहिलें. शिवाय एक गोष्ट ही आहे कीं, आमचा हेतु त्या केवलाचें वर्णन करण्याचा नाहीं. आहे त्या स्थितींत आम्हीं हेंच करणें योग्य आहे कीं, जीं दोन सत्यें, शिवतत्त्व आणि कालीतत्त्व (शक्तितत्त्व) आमच्या अनुभवाला येतात, तीं तशींच आम्हीं मान्य करावीं; स्थलकालातीत, निश्चल, अद्वितीय, शुद्ध अस्तित्व, ज्याला मेय वा अमेय दोन्ही शब्द लागूं शकत नाहींत, त्या केवल शिवतत्त्वाशीं, स्थलकालाच्या अनंत विस्तारांत जी अमेय अशी विश्वभ्रमन्ती चालली आहे, तिचा (काली तत्त्वाचा) संबंध काय आहे, हें शोधून काढण्याचा आम्ही यत्न करावा. शुद्ध बुद्धि, अंतर्ज्ञान आणि आंतरनुभव यांचें शुद्ध अस्तित्वाविषयीं, 'सत्' विषयीं काय म्हणणें आहे तें आम्हीं पाहिलें. आतां शक्तीविषयीं -- गतिमय विश्वपसाऱ्याविषयीं -- त्यांचें काय म्हणणें आहे हें आम्हांला पहावयाचें आहे.

या संबंधांत पहिली विचारणा करावयाची ती ही कीं, जी शक्ति आमच्यासमोर दिसत आहे, ती ज्ञानशून्य शक्ति आहे, केवळ जडाच्या हालचालीनें निष्पन्न झालेली शक्ति आहे, आणि या शक्तींतून जी जाणीव भौतिक सृष्टींत वर येतांना दिसते, ती जाणीव या शक्तीचा एक निव्वळ गतिमूलक परिणाम आहे, का उलटपक्षीं ती जाणीवच या शक्तीचा गूढ व

 

पान क्र. १४९

 

खरोखरींचा स्वभाव आहे ? वेदान्ताच्या भाषेंत बोलावयाचें तर, ही शक्ति केवळ प्रकृति अथवा क्रिया-प्रक्रिया-स्वरूप हालचाल आहे, कीं ती चित् ची म्हणजे सृजनशील आत्मजाणिवेची शक्ति अथवा क्रियासमर्थता आहे ? प्रकृति ही स्वतंत्र जडशक्ति आहे कीं चित् ची शक्ति आहे ? प्रकृतीचें वा विश्वशक्तीचें मूळ स्वरूप काय आहे ? हा मूलग्राही तात्त्विक प्रश्न आहे; व यावर इतर सर्व तात्त्विक व्यावहारिक गोष्टी अवलंबून आहेत.

 

पान क्र. १५०

 









Let us co-create the website.

Share your feedback. Help us improve. Or ask a question.

Image Description
Connect for updates