Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics, expounding a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth.
Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.
प्रकरण आठवें
वेदान्ती ज्ञानाचे मार्ग
सर्व भूतांमध्यें असणारा हा गूढ आत्मा सामान्य दृष्टीला दिसत नाहीं; श्रेष्ठ, सूक्ष्म बुद्धीला, ज्यांना सूक्ष्मदृष्टि आहे अशा साधकांना श्रेष्ठ सूक्ष्म बुद्धीच्या साह्यानें तो दिसतो.
- कठोपनिषद् ३.१२
मानवी व्यक्तीच्या विकासाचा शेवट, त्या व्यक्तीचा जीवनप्रवाह सच्चिदानंदमय होणें हा आहे, असें मागील प्रकरणाच्या शेवटीं सांगितलें. तेव्हां, विश्वांत सच्चिदानंदाचें कार्य काय आहे, तें कसें चालतें, तें स्वत: आणि त्याचें प्रतीक जो 'अहम्' या दोघांचे संबंध आरंभी काय असतात, ते कोणत्या प्रक्रियेनें निर्माण होतात, त्या संबंधांतून शेवटीं व्यक्तीचें सच्चिदानंदत्व स्थापित होतें तें कोणत्या मार्गानें - इत्यादि प्रश्न आतां विचारांत घेणें अवश्य आहे. कारण हे जे व्यक्ति आणि सच्चिदानंद यांचे संबंध आणि या संबंधांची जी आरंभींची व पुढची वाटचालीची प्रक्रिया, ती प्रक्रिया व ते संबंध यांजवरच दिव्य मानवी जीवनाचें तत्त्वज्ञान आणि आचरण सर्वथा अवलंबून आहे.
दिव्य अस्तित्वाची व ईश्वराच्या अस्तित्वाची कल्पना आम्हांला येते, या अस्तित्वाचें ज्ञान आम्हांला होतें, तें इंद्रियांचा पुरावा आणि स्थूल भौतिक मनाच्या भिंती ओलांडून पलीकडे गेल्यावर होतें. इंद्रियांचा पुरावा आणि स्थूल जाणीव यांच्या क्षेत्रांत जोंपावेतों आम्ही आपणांस कोंडून घेतों, तोंपावेतों भौतिक विश्व आणि त्या विश्वांतील घटना यांच्या पलीकडे कशाचीहि कल्पना आम्हांला करतां येत नाहीं, कशाचेंहि ज्ञान आम्हांला होत नाही. परंतु आमच्यांत कांहीं शक्ती अशा आहेत कीं, आमच्या मनाला केवळ भौतिक वस्तूंच्या, भौतिक अनुभवांच्या आधारावर करतां येत नाहींत अशा कल्पना, त्या शक्तींच्या
पान क्र. ११६
सहाय्यानें आम्हांला करतां येतात. आम्हांला दिसणाऱ्या भौतिक विश्वांतील गोष्टींना तर्कशास्त्रीय अनुमानपद्धतीची जोड देऊन किंवा कल्पनाशक्तीच्या विविधता-निर्मितीच्या सामर्थ्याची जोड देऊन या कल्पना आम्हांला उभ्या करतां येतात हें खरें. पण मुख्य मुद्दा हा कीं, या उभ्या केलेल्या कल्पनांना दृश्य भौतिक गोष्टींचा प्रत्यक्ष आधार असत नाहीं. आमची शुद्ध तर्कबुद्धि ही आम्हांला दृश्यातीत गोष्टींची कल्पना करून देणारी, एक प्रथम श्रेणीची शक्ति आहे.
मानवी बुद्धि दोन प्रकारचें कार्य करते. एक मिश्र व पराधीन, दुसरें शुद्ध किंवा स्वाधीन. बुद्धि मिश्र कार्य करते, तेव्हां इंद्रियांच्या अनुभवाचें क्षेत्र, एवढेंच तिच्या कार्याचें क्षेत्र असतें; इंद्रियांच्या अनुभवाचा, त्या अनुभवाच्या क्षेत्राचा नियम, हाच शेवटला सत्याचा नियम, शेवटलें सत्य ती मानते. अशी बुद्धि दृश्याचाच फक्त अभ्यास व शोध करते; अर्थात् दृश्यांचे अन्योन्यसंबंध, त्यांच्या प्रक्रिया, त्यांचें उपयोग यांच्याच अध्ययनाच्या, निरीक्षण-परीक्षणाच्या पाठीमागें ती असते. बुद्धीच्या या क्रियेंतून वस्तूच्या मूळ तत्त्वाचें ज्ञान मिळणें शक्य नसतें; वस्तूचा दृश्य व्यापार मात्र तिला समजूं शकतो. अस्तित्वाची गभीरता व गहनता मापण्याचें साधन मिश्रक्रियेच्या बुद्धीजवळ नाहीं. त्या अस्तित्वांतून उदय पावलेल्या दुय्यम वस्तूंचें क्षेत्र तपासणें, एवढीच तिची शक्ति असते. सर्वथा स्वाधीन व शुद्ध कार्य करणारी बुद्धि ही इंद्रियांनीं दिलेले अनुभव मान्य करते; पण त्यांनीं आंखलेली मर्यादा अमान्य करते; त्या अनुभवांच्या निरीक्षणापासून ती आरंभ करते, पुढें त्या अनुभवांच्या मागें काय आहे हें ती पाहते, त्याचा शोध घेते, खऱ्या-खोट्याचा निर्णय करते, आपलें स्वतंत्र कार्य हें हक्काचें कार्य आहे असें ओळखून, त्या स्वतंत्र कार्याच्या साह्यानें सर्वसामान्य व बदलतां न येणारे असे सिद्धांत व कल्पना बसविते, बसविण्याचा प्रयत्न करते. या स्वतंत्र सिद्धांतांचा व कल्पनांचा संबंध वस्तूंच्या दृश्य रूपांशीं, व्यापारांशीं असत नाहीं, तर त्या दृश्य रूपांच्या, व्यापारांच्या मागें जें सत्य असतें त्याच्याशीं असतो. केव्हां केव्हां दृश्य वस्तु वा व्यापार पाहून, त्या दृश्याच्या पाठीमागें काय सत्य आहे तें स्वतंत्र बुद्धि एकदम ठरवून सांगतें. दृश्याच्या पाठीमागील वस्तूची, एकदम म्हणजे युक्तिवाद न करतां ठरविलेली कल्पना, ही इंद्रियांनीं दिलेल्या, दृश्याच्या अनुभवावर आधारलेली, त्या अनुभवाचा परिणाम आहे असें प्रथमदर्शनीं वाटण्याचा
पान क्र. ११७
संभव असतो, पण खरोखरी ती तशी नसते. ती बुद्धीच्या स्वतंत्र व शुद्ध कार्यानेंच जन्मलेली असते, ती स्वतंत्र बुद्धीचाच प्रत्यय, केवळ स्वतंत्र बुद्धीला प्रत्यक्ष होणारी गोष्ट असते. स्वतंत्र बुद्धीचें वरील कार्याहून वेगळें व तिचा स्वभावविशेष व्यक्त करणारें कार्य पुढीलप्रमाणें असतें : इंद्रियांनीं दिलेले अनुभव ती केवळ वरकरणी आपल्या कार्याकरतां घेते; या अनुभवांवर तिची भिस्त असत नाहीं; तिचा युक्तिवाद तिच्या स्वतंत्र प्रत्ययावर आधारलेला असतो; या अनुभवांना पार मागें टाकून त्या अनुभवांच्या अगदीं उलट विधान करणारा सिद्धांत तो निश्चित करतो. बुद्धीचें हें कार्य आवश्यक आहे आणि न्यायसंगत आहे. कारण आपल्या सामान्य अनुभवाचें क्षेत्र फार लहान असतें. या क्षेत्राच्या पलीकडे विश्वांतील अनेक सत्य घटना भरलेल्या आहेत; शिवाय हें जें लहानसें क्षेत्र सामान्य अनुभवाचें म्हणून असतें, त्या क्षेत्रांतहि या अनुभवांसाठीं जीं साधनें वापरण्यांत येतात तीं साधनें सदोष असतात; आणि म्हणून आपले हे सामान्य अनुभव बहुधा खोटीं 'वजनें-मापेंच' आपल्या पदरांत टाकतात. विश्वांतील वस्तूंच्या, घटनांच्या पोटीं जें सत्य आहे, त्याला आम्हांला भेटावयाचें, गांठावयाचें असेल, त्याच्या संबंधानें योग्य कल्पना हवी असेल, तर हा सामान्य खोट्याचा अनुभव -- खोट्याला खरें म्हणून पदरांत टाकणारा अनुभव -- मागें टाकलाच पाहिजे, स्वत:ला प्रमाणभूत मानावें ही त्याची आग्रहाची मागणी अमान्य केलीच पाहिजे. मनुष्यांत ज्या अत्यंत महत्त्वाच्या शक्ती विकास पावल्या आहेत, त्यांत, स्वतंत्र बुद्धीच्या उपयोगानें इंद्रियसंलग्न मनाकडून होणाऱ्या चुकांची दुरुस्ती करण्याची शक्ति विशेष महत्त्वाची आहे. पृथ्वीवरील प्राणिवर्गांत मनुष्य श्रेष्ठ ठरण्याचें मुख्य कारण ही बुद्धीची शक्ति होय.
असंमिश्र, स्वतंत्र बुद्धीचा पूर्ण उपयोग केल्यानें आम्ही भौतिक ज्ञानाच्या पलीकडील अतिभौतिक ज्ञानाच्या, तत्त्वज्ञानाच्या प्रांतांत प्रवेश करतो; परंतु तत्त्वज्ञानाच्या ज्या तात्त्विक कल्पना असतात, त्या कल्पनांनीं आमच्या संपूर्ण प्रकृतीचें समाधान होत नाहीं. शुद्ध, स्वतंत्र बुद्धीचें समाधान या कल्पनांनीं होतें. कारण तिची प्रकृति अशा कल्पनांचीच बनलेली असते. परंतु आपला स्वभाव असा आहे कीं, आपण नेहमीं दोन डोळे वापरतो; एका डोळ्यानें तात्त्विक कल्पना आणि दुसऱ्या डोळ्यानें वास्तव घटना पाहतो. प्रत्येक वस्तूसंबंधानें या दोन गोष्टी पाहिल्याशिवाय आपलें समाधान होत नाहीं. केवळ तात्त्विक कल्पना ही आम्हांला पूर्णशी भासत
पान क्र. ११८
नाहीं, आमच्या प्रकृतीच्या एका अंगाच्या दृष्टीनें ती जणुं असत्य वाटते, मिथ्या वाटते; ही कल्पना अनुभव म्हणून प्रत्ययास आली म्हणजे ती पूर्णशी वाटते व आमचें समाधान होतें. परंतु या तत्त्वज्ञान-विषयक कल्पनांच्या बाबतींत इंद्रियाधिष्ठित अनुभव शक्य नसतो. या तत्त्वज्ञान-विषयक सत्यांचा स्वभावच असा आहे कीं, हीं सत्यें इंद्रियांना दिसत नाहींत, बुद्धीलाच दिसतात. मग यांचा अनुभव आम्हांला कसा यावयाचा ? अनुभवाची ऐंद्रिय शक्ति येथें कामाची नसल्यानें, अनुभव घेणारी दुसरी शक्ति आम्हांला असली तरच आमचें तात्त्विक कल्पनांसंबंधाचें ज्ञान आम्हांला पूर्ण वाटेल. आम्ही आतां अतिभौतिक प्रांतांतील गोष्टींचा विचार करीत आहों, तेव्हां या गोष्टींचा अनुभव घ्यावयास, मानसिक प्रत्ययशक्तीचा क्षेत्रविस्तार करणें आवश्यक आहे.
एका अर्थानें आपला सगळाच अनुभव मानसिक (Psychological) अनुभव असतो. कारण आपण इंद्रियांच्या द्वारां जें ग्रहण करतों, त्याला कांहीं अर्थ किंवा मूल्य येण्यासाठीं इंद्रियस्थ, इंद्रियसंलग्न म्हणून जें मन आहे त्या मनाच्या भाषेंत त्याला कांहीं नांव मिळावें लागतें. या मनाला सहावें इंद्रिय असें आपल्या तत्त्वज्ञानांत म्हणतात. पण असें म्हणतां येईल कीं, मन हेंच एक अनुभव घेण्याचें इंद्रिय असून दृष्टि, श्रवण, स्पर्श, घ्राण, रसना ही मनाचीं विशेष कार्य करणारीं रूपें आहेत. सामान्य अनुभवासाठीं हें इंद्रिय-मन (Sense mind) जरी डोळे, कान इत्यादि इंद्रियांचा उपयोग करतें, तरी तें या इंद्रियांच्या मर्यादा ओलांडून स्वतंत्रपणें आपल्या स्वतःच्या शक्तीनें प्रत्यक्ष अनुभव घेऊं शकतें. कल्पना करणाऱ्या बुद्धीचे जसे शुद्ध व मिश्र असे दोन क्रियाप्रकार आहेत, तसेच अनुभव घेणाऱ्या मनाचेहि दोन क्रियाप्रकार आहेत. बाहेरच्या जगाचा, विषयांचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करणें हा मिश्र प्रकार; स्वत:च्या विषयींचा अनुभव घेण्याचा प्रयत्न हा शुद्ध प्रकार. मिश्र क्रियेंत मन ज्ञानेंद्रियावर अवलंबून असतें, आणि तीं इंद्रियें पुरवतील त्या पुराव्यानुसार आपला अनुभव अमुक असें ठरविते. शुद्ध क्रियेंत तें स्वत: स्वतःचें ठिकाणीं काम करतें आणि एकप्रकारें त्या वस्तूंशीं एकरूप होऊन, वस्तूंचा अनुभव प्रत्यक्षपणें घेतें. आमच्या भावनांचा अनुभव आम्ही तादात्म्यानें घेतो; आम्ही क्रोधरूप होऊन क्रोधाचा अनुभव घेतो. आमच्या अस्तित्वाचा अनुभव आम्हांला तादात्म्यतेंतच घडतो; या ठिकाणी तादात्म्यानें घडणारें ज्ञान म्हणजेच अनुभव, ही गोष्ट स्पष्ट होते. वस्तुत: तादात्म्यानें घडणारें
पान क्र. ११९
ज्ञान हें सर्वच अनुभवाचें खरें, स्वाभाविक व आंतलें स्वरूप आहे. हें खरें स्वरूप आम्हांला स्पष्ट न होण्याचें कारण, जगामध्यें मी केवळ अनुभवणारा आणि बाकी सर्व माझ्या अनुभवाचा विषय, असा भेद करून, 'मी' खेरीज बाकी जगाला आम्हीं बहिष्कार घालून 'मी' च्या बाहेर ठेवलें आहे, आणि मग या बाहेर ठेवलेल्या जगाशीं पुन: एकरूप होण्यासाठीं कांहीं इंद्रियें, कांहीं प्रक्रिया आम्ही अगतिकपणें निर्मून बांधून राहिलों आहों. या बहिष्काराच्या स्थितींत जाणीवपूर्वक तादात्म्यानें प्रत्यक्ष ज्ञान आम्हांला होऊं शकत नाहीं. त्या ऐवजीं अप्रत्यक्ष ज्ञान आम्ही उपयोगांत आणतों. स्थूल भौतिक संसर्ग आणि मानसिक सहभावना -- सहानुभूति (Mental Sympathy) -- यांच्या द्वारा आम्हांला हें अप्रत्यक्ष ज्ञान घडल्यासारखें दिसतें. 'मी'नें ही ज्ञानाची कोंडी निर्माण केलेली आहे. शरीर आणि मन यांच्या मर्यादा घालून ज्ञानाची कोंडी करणें हें 'मी'चें प्राथमिक, पायाभूत कार्य आहे. हा वरील प्रकार 'मी'च्या एकंदर प्रवृत्तीचा एक नमुना आहे. प्रथम एक असत्य पाया म्हणून घ्यावयाचें आणि त्या अव्वल असत्याच्या आधारानें दुय्यम असत्यें निर्माण करून वस्तुजातांतील सत्य झांकून टाकावयाचें असा, 'मी'चा उद्योग चालतो. 'मी'च्या इतरांशी होणाऱ्या संबंधांतून निर्माण झालेलीं 'मी'ची ही दुय्यम असत्येंच आम्हांला व्यावहारिक सत्यें म्हणून कामाला येतात; कामाला आणावी लागतात.
मानसिक आणि इंद्रियमूलक ज्ञान सध्यां कोणत्या प्रकारें आपल्याला मिळतें, त्याचा स्वभाव काय हें आपण पाहिलें. त्यावरून आपणांस हें कळेल कीं, आज आपल्या ज्ञानप्राप्तीला ज्या मर्यादा आहेत, त्या मर्यादा अनिवार्य आहेत असें मुळींच नाहीं. या मर्यादा विकासक्रमांत उत्पन्न झाल्या आहेत. या विकासक्रमांत मनाला अशी संवय झाली आहे कीं, भौतिक जगाशीं संबंध आणावयाचा, तर विशिष्ट शारीर क्रिया-प्रतिक्रिया यांचें सामान्यतः साह्य घेत जावें. परंतु असें असलें, तरी जगाचा अनुभव घेण्यासंबंधींचा आपला जो सामान्य नियम आहे, तो निसर्गाचा अटळ नियम नसून तो केवळ आम्हांवर सत्ता चालविणाऱ्या, पण आम्हांस दूर करतां येण्यासारख्या संवयींचा आम्हांवरील नियमित जुलूम आहे, हें आम्हीं विसरतां कामां नये. बाह्य जगाचें ज्ञान व्हावें असें जेव्हां आम्हांला वाटतें, तेव्हां तें ज्ञान आम्ही अप्रत्यक्षपणें ज्ञानेंद्रियांचे द्वारां मिळवितो, तसेंच तें आम्हांस मिळवावें लागतें; आणि यामुळें वस्तूंविषयीं व मनुष्यांविषयीं ज्ञानेंद्रियें कळवितील तितकेंच
पान क्र. १२०
सत्य आम्हांला कळूं शकतें. स्थूल भौतिक इंद्रियांच्या जुलमामधून स्वत:ची सुटका करून घेण्याची मनाची तयारी असेल, किंवा त्याची समजूत घालून तशी त्याची तयारी करतां येण्यासारखी असेल, तर स्थूल इंद्रियांच्या साह्याशिवाय इंद्रियांच्या विषयांचे ज्ञान प्रत्यक्षपणें मनाला करून घेतां येईल, नव्हे हा त्याचा स्वाभाविक धर्म आहे. संमोहनविद्येच्या प्रयोगानें घडलेलें संमोहन (Hypnosis) आणि त्यासारखे दुसरे मानसिक अवस्थाविशेष हे मनाच्या या स्वभावधर्माचा प्रत्यय आणून देतात. आमच्या जागृत अवस्थेंतील जाणिवेच्या व्यवहाराला बंधन असतें, मर्यादा असते; एकंदर जीवनाच्या विकासांत मन आणि जड-शरीर यांचें जें नातें उत्पन्न झालेलें आहे, त्या नात्याच्या मर्यादा जागृत मनाला पाळाव्या लागतात; त्या नात्यानेंच जागृत मनाची अनुभवशक्ति निर्मिलेली आहे व नियमित केलेली आहे. म्हणून जागृत मनाला जगांतील वस्तूंचे व घटनांचे प्रत्यक्ष ज्ञान करून घेणें सामान्यत: असंभव असतें. जागृत मनाची जागृति दूर करून त्याला सुप्त अवस्थेंत नेतां आलें, तर खरें मन -- जागृत मनाच्या तळाशीं असलेलें मन (Subliminal mind) -- काम करण्यास मोकळें होतें व त्याला जगाचें प्रत्यक्ष ज्ञान करून घेतां येतें. जागृत अवस्थेंत काम करीत असतां देखील, मनाला जगाचें ज्ञान प्रत्यक्षपणें घेतां येणें ही गोष्ट अवघड आहे, पण अशक्य मात्र नाहीं. कांहीं विशिष्ट मार्गांनीं ज्यांनीं मनावर बरेच प्रयोग केले आहेत त्यांना ही गोष्ट ठाऊक आहे. सामान्यत: मात्र, जागृत मन सुप्तावस्थेंत नेले म्हणजे 'खरें मन' आपला नैसर्गिक विशेष दाखवितें; त्याचा विशेष हाच कीं, तेंच एकमेव अनुभव घेणारें परिपूर्ण शक्तीचें इंद्रिय आहे आणि इंद्रियांचे जे विषय आहेत त्यांच्या बाबतींत आपली मिश्र आणि परतंत्र क्रिया उपयोगांत न आणतां, शुद्ध आणि स्वतंत्र क्रिया तें उपयोगांत आणूं शकतें, व आणतें आणि इंद्रियांच्या विषयाचें ज्ञान इंद्रियांच्या उपयोगावांचून प्रत्यक्षपणें करून घेतें.
इंद्रियसंलग्न मन (Sense mind) जी शुद्ध, स्वतंत्र क्रिया करतें, त्या क्रियेचा उपयोग करून आपल्याला उपलब्ध असलेल्या पांच इंद्रियांवेगळें इंद्रिय किंवा इंद्रियें तें निर्माण करूं शकते. उदाहरणार्थ, आपण हातांत धरलेल्या कोणत्याहि पदार्थाचें वजन कोणतेंहि स्थूल साधन उपयोगांत न आणतां अगदीं बरोबर ओळखण्याची शक्ति असलेलें इंद्रिय आपल्याला आपल्या अंतरांत अस्तित्वांत आणतां येतें. शुद्ध स्वतंत्र बुद्धि ज्याप्रमाणें कार्यारंभापुरतां इंद्रियांचा अनुभव स्वीकारते, त्याप्रमाणें या
पान क्र. १२१
वजन ओळखण्याच्या कार्यांत स्पर्श आणि दाब अनुभवणारें इंद्रिय केवळ कार्यारंभापुरतें उपयोगांत आणलें जातें. वजनाचा हिशोब स्पर्शेंद्रिय कांहीं मनाला सांगू शकत नाहीं; मन आपल्या स्वतंत्र क्रियेनेंच हा हिशोब बरोबर करतें, स्पशेंद्रियाचा उपयोग केवळ वस्तूशीं संबंध येण्यापुरता तें करतें. शुद्ध स्वतंत्र बुद्धि आणि शुद्ध स्वतंत्र मन या दोघांचें या बाबतींत साम्य हें आहे कीं, इंद्रियांचा अनुभव आरंभासाठीं घेऊन पुढें बुद्धि आपला सिद्धांत आणि मन (इंद्रियसंलग्न मन) आपला अनुभव, इंद्रियांच्या अनुभवापासून अगदीं वेगळाच नव्हे तर, त्या अनुभवाच्या अगदीं उलट स्वरूपाचा असा निश्चित करतें. ही ज्ञानाची व अनुभवाची शक्ति, सामान्य शक्तीच्या पुष्कळ पुढें आहे; आणि ही पुढारलेली, वाढलेली शक्ति वस्तूंच्या केवळ बाह्य अंगालाच स्पर्श करीत नसून वस्तूच्या पोटांतील गोष्टीहि जाणूं शकते. उदाहरणार्थ, दुसऱ्यांच्या मनांत काय विचार, काय भावना आहेत त्या जाणणें, आत्मसात् करणें हें देखील स्वतंत्र मनाला शक्य असतें. मनुष्य काय बोलतो, काय हावभाव करतो, काय कृति करतो, चेहेऱ्यावर काय भाव दाखवितो इकडे न पाहतां, या गोष्टींची बिलकुल दखल न घेतां, नव्हे या गोष्टी अंशत: भावदर्शन घडवीत असतील किंवा मिथ्या भावदर्शन घडवीत असतील तरीहि, स्वतंत्र मन समोरच्या मनुष्याच्या मनांतील खऱ्या हालचाली जाणूं शकतें. या कार्यांत आरंभाला इंद्रियांच्या द्वारां बाह्य वस्तूंचा, मनुष्याचा संपर्क होण्याची मात्र आवश्यकता असते. मनाची ज्ञानशक्ति या पलीकडेहि वाढू शकते. ज्याप्रमाणें स्थूल इंद्रियांचा आरंभीं उपयोग करून समोरील वस्तूंचें बाह्य अंग व अंतरंग मन पाहूं शकतें, त्याप्रमाणें मनुष्यांतील सूक्ष्म इंद्रियें, व सूक्ष्म इंद्रियशक्ति यांचा स्वतंत्रपणेंहि तें उपयोग करूं शकतें. इंद्रियशक्तींची स्थूल व सूक्ष्म किंवा शारीर व मानस अशी दोन प्रकारची कामगिरी असते. बाह्य जगांतील जीवनाकरितां स्थूल इंद्रियशक्तीचा आम्ही उपयोग करतो. आमची जी बाह्य भौतिक परिस्थिति आहे, तिचें ज्ञान आम्हांला बाह्य इंद्रियांनीं होतें. परंतु वस्तूंना जसें बाह्य अंग आहे, तसें अंतरंगहि आहे. या अंतरंगाचें ज्ञान सूक्ष्म इंद्रियांनी आम्हांला करून घेतां येतें. भौतिक स्थूल मनाला या पुढारलेल्या इंद्रियशक्ती अविश्वसनीय वाटतात, या शक्तींच्या कार्याबद्दल त्याला शंका वाटते; कारण आमच्या नेहमींच्या संवयीची जी अनुभवाची व जीवनाची पद्धति आहे, तिच्या दृष्टीनें या शक्ती असामान्य, अपवादात्मक आहेत. या शक्ती कामाला लावावयास कठीण जातें,
पान क्र. १२२
त्यांची व्यवस्था लावणें त्यापेक्षां कठीण आहे व म्हणून अनुभवाचें एक व्यवस्थित, निश्चित, उपयुक्त साधन या शक्ती होऊं शकत नाहींत. असें असलें तरी त्या आहेत हें मान्य करावें लागतें, कारण आमची जी सामान्य कार्यकारी वरवरची जाणीव आहे, ती लहानशा क्षेत्रांत कामास येते -- हें क्षेत्र वाढविण्याचा जो स्वयंस्फूर्त अव्यवस्थित लहरी प्रयत्न किंवा सशास्त्र नियमबद्ध व्यवस्थित शिस्तीचा खटाटोप करण्यांत येतो, त्या प्रयत्नाचा परिणाम म्हणून वर उल्लेखिलेल्या विस्तृत कार्यकारी मानसिक अनुभवशक्ती निश्चितपणें अस्तित्वांत येतात.
परंतु केवळ 'बुद्धि ग्राह्य' अशीं जीं 'अतीन्द्रिय' सत्यें आहेत, त्यांचा मानसिक अनुभव या वरील पुढारलेल्या शक्तीनींहि आम्हांला मिळत नाहीं; आणि तें तर आमचें उद्दिष्ट आहे. या पुढारलेल्या शक्ती आम्हांला आमचें ऐंद्रिय अनुभवाचें क्षेत्र मोठें करून देतात, आणि इंद्रियग्राह्य वस्तूंचा व घटनांचा अनुभव घेण्याची, त्यांचें निरीक्षण करण्याची सामान्य साधनांपेक्षां अधिक परिणामकारक साधनें आमच्या तैनातीस देतात; एवढेंच त्या आमच्याकरितां करूं शकतात. पण सत्य किंवा वस्तूंचें सत्यस्वरूप नेहमींच इंद्रियांच्या कक्षेच्या पलीकडे असतें. तथापि, विश्वाच्या घटनेचा असा एक अंगभूत नियम आहे कीं, बुद्धीला ग्राह्य होण्यासारखीं सत्यें ज्या ठिकाणीं आहेत, त्याच बुद्धिसंपन्न शरीरसंस्थेंत तीं बुद्धीनें शोधून काढलेलीं सत्यें अनुभवावयाचें कांहींतरी साधन असलेंच पाहिजे. आमच्या मनयुक्त शरीराच्या ठिकाणीं असलेल्या, अनुभव घेण्याच्या अनेक शक्ती आपण पाहिल्या. आतां बुद्धीच्या सत्यांचा अनुभव देणारी जी एक शक्ति त्याचे ठिकाणीं आहे, तिचा आपण विचार करूं. आपल्या अस्तित्वाचें ज्ञान आपल्याला कसें होतें ? मन अस्तित्वाशीं एकरूप होतें, तादात्म्य पावतें आणि मग 'मी आहे' असें ज्ञान होतें. एकरूपता किंवा तादात्म्य हें जें ज्ञानाचें साधन आहे, त्याचा विकास किंवा विस्तार करून बुद्धिसंस्थापित सत्यांचा अनुभव आपल्याला घेतां येईल. आपल्या आंत काय काय आहे त्यांचें ज्ञान आपल्याला होतें, याचें कारण 'आपण आहोंत' ही अनुभूति आपल्या मनासमोर कमी अधिक स्पष्टपणें जागृत असते, उपस्थित असतें हें आहे. या गोष्टी सामान्य सूत्रानें सांगावयाच्या, तर असें म्हणतां येईल कीं, पात्राच्या ज्ञानांत, पात्रगत वस्तूचें ज्ञान अंतर्भूत असतें. तेव्हां आपल्या स्वत: संबंधींच्या जाणिवेची जी शक्ति आपल्या मनाला उपलब्ध आहे, ती वाढवून आमच्या
पान क्र. १२३
बाहेर आमच्या पलीकडे असलेल्या, उपनिषदांत वर्णिलेल्या आत्म्याच्या, ब्रह्माच्या अनुभवाचें साधन जर तिला आम्ही नित्य करूं शकलों, तर ब्रह्माच्या पोटीं जी विश्वांतील सत्यें आहेत, त्यांचा अनुभव आम्हांला येईल. त्यांचें केवळ बुद्धिगत ज्ञान आम्हांपाशीं आहे, असें न होतां त्यांच्या अनुभूतीचा आम्हांला लाभ होऊन त्या सत्यांचे दुहेरी धनि आम्ही होऊं. या अनुभवाच्या शक्यतेच्या पायावरच भारतांतील वेदान्त उभारलेला आहे. ब्रह्माच्या ज्ञानाच्या द्वारां विश्वाचें ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न भारतीय वेदान्तानें केला आहे.
परंतु मनाचा अनुभव आणि बुद्धीचा सिद्धांत कितीहि श्रेष्ठ श्रेणीचा असला, तरी सर्वोच्च स्वयंभू तादात्म्य किंवा एकात्मता, एकरसता, एकता त्या अनुभवांत किंवा सिद्धांतांत अंतर्भूत होत नाहीं, या सर्वोच्च एकरसतेचें प्रतिबिंबच केवळ त्या मानसिक तादात्म्यांत असतें किंवा दिसतें इतकेंच, असा वेदांताचा सिद्धांत आहे. सर्वोच्च एकरसतेसाठीं आम्हांला मनाच्या आणि बुद्धीच्या पलीकडे जावें लागतें. जागृतींत काम करणाऱ्या आमच्या जाणिवेंत जी बुद्धि क्रियाशील असते ती बुद्धि मध्यस्थासारखी आहे. आम्ही आमच्या उर्ध्वगति-विकासक्रमाला ज्या 'अर्धजागृत अर्धमनस्क सर्वांतून' (Subconscient All) सुरुवात केली आहे आणि या विकासाची गति ज्या 'अतिमानसिक सर्वाकडे' (Superconscient All) आम्हांला घेऊन जात आहे, त्या दोन सर्वात्मक वस्तूंमध्यें मध्यस्थाचें काम आमची जागृत अवस्थेंतील बुद्धि करीत आहे. एकाच सर्वात्मक महावस्तूच्या दोन अवस्था, दोन साकार मूर्ती 'अर्धमनस्क सर्व' आणि 'अतिमानसिक सर्व' या वस्तू आहेत. 'अर्धमनस्क सर्वांत' प्राणमयता-जीवता (Life) ही प्रधान गोष्ट आहे, 'अतिमानसिक सर्वाची' प्रधान गोष्ट प्रकाश किंवा ज्ञान (Light) ही आहे. 'अर्धमनस्क सर्वांत' ज्ञान किंवा जाणीव क्रियेच्या आंत सुप्त किंवा गुप्त असते. ती क्रियेचा पडदा वापरते. क्रिया हें 'जीवते'चें सार-तत्त्व आहे; 'अतिमानसिक सर्वांत' क्रिया प्रकाशाच्या पोटांत सुप्त किंवा गुप्त किंवा पडद्याआड होते. ती प्रकाशांत किंवा ज्ञानांत लपून जाते. तेथूनच ती निघालेली असते, व तेथेंच ती विकासक्रमानें परत जाते. त्या क्रियेंत कांहीं ज्ञान गुप्त वा सुप्त असत नाहीं. ती क्रियाच परमोच्च जाणिवेंत गुप्त होते, अंतर्हित होते. 'अर्धमनस्क आणि अतिमनस्क सर्व किंवा विश्व', या दोहोंना 'अंत:स्फूर्त ज्ञान (Intuitional Knowledge) कार्यकारी म्हणून सारखेच
पान क्र. १२४
उपलब्ध असतें. अंतःस्फूर्त ज्ञानाचा पाया ज्ञानपुरस्सर तादात्म्य किंवा एकात्मता -- ज्ञेय आणि ज्ञाता यांजमधील ज्ञानपुरस्सर संपूर्ण कार्यक्षम प्रभावी एकात्मता -- हा असतो; ज्ञेयाचें अस्तित्व व ज्ञात्याचें अस्तित्व एकरूप, अभिन्न असतें अशी ही अवस्था असते. या अवस्थेंत ज्ञाता ज्ञानानें ज्ञेयाशीं एकरूप झालेला असतो. 'अर्धमनस्क विश्वात', क्रियेच्या द्वारां कार्यक्षमतेच्या द्वारां, अंतःस्फूर्त ज्ञान व्यक्त होतें, आणि ज्ञान किंवा ज्ञान-पुरस्सर एकात्मता पूर्णतया किंवा कमी अधिक प्रमाणांत क्रियेच्या पोटांत लपलेली असते. उलट पक्षीं, 'अतिमानसिक विश्वांत', प्रकाश किंवा ज्ञान हें प्रधान तत्त्व आणि प्रधान व्यवहारनियम असल्यानें अंत:स्फूर्त ज्ञान आपल्या नैसर्गिक, खऱ्या स्वरूपांत प्रकट होतें; अर्थात् 'ज्ञानपुरस्सर तादात्म्यानें उदय पावलेलें ज्ञान', या स्वरूपांत तें प्रकट होतें. येथें फलद्रूप क्रिया, ही या ज्ञानाचा स्वाभाविक सहचर म्हणून किंवा स्वाभाविक परिणाम म्हणून आपल्या अनुभवास येते; अर्धमनस्क विश्वांत प्रधान वस्तु म्हणून क्रिया जो मुखवटा वापरीत असते, तो मुखवटा 'अतिमानसिक विश्वांत' तिला वापरता येत नाहीं. येथें प्रधान वस्तु ज्ञान हीच असते. या दोन अवस्थांच्या मध्यें मन आणि बुद्धि (mind and reason) मधल्या कारभाऱ्यांचें काम करतात. व्यक्तीनें क्रियेच्या कोंडवाड्यांतून ज्ञानाला मुक्त करावे आणि त्या ज्ञानाचा अग्रेसरत्वाचा, पहिल्या मानाचा जो हक्क आहे, तो त्याला परत वापरतां येईल अशी त्याची तयारी करावी, यासाठीं मन आणि बुद्धि हे मधले कारभारी, व्यक्तीला यशस्वितेनें मदत करतात. मनाचे ठिकाणीं जी आत्म-जाणीव, 'मी आहे' ही जाणीव असते, ती कोणत्याहि वस्तूला किंवा व्यक्तीला, स्वत:च्या आत्म्याला आणि दुसऱ्या आत्म्याला, वस्तूच्या किंवा व्यक्तीच्या अंतरांतील गोष्टींना जाणून घेण्यासाठीं उपयोगांत आणली जाते व या सर्व बाबतींत तादात्म्यानें ज्ञान मिळवितां येतें. पण हें मनाचें तादात्म्य सर्वोच्च स्वयंभू तादात्म्य नसून, प्रतिबिंबरूप असतें असें वर सांगितलें आहे. हें मनाचें तादात्म्य आपला दर्जा ज्ञानानें वाढवीत वाढवीत, प्रकाशमय स्वयंभू तादात्म्य झालें, म्हणजे बुद्धि देखील आपला दर्जा वाढवून स्वयंप्रकाशी अंतःस्फूर्त ज्ञानाचें रूप घेते. आमच्या ज्ञानाची ही सर्वश्रेष्ठ अवस्था आहे. येथें मन विकास पावून अतिमन, अतिमानस (विज्ञान) होऊन पूर्णतेला पोहोंचलेलें असतें.
अगदीं जुन्या वेदान्ताचे सिद्धान्त मानवी जाणिवेच्या ज्या रचनेवर आधारलेले आहेत, ती रचना वरील प्रकारची आहे. या रचनेचा पायावर
पान क्र. १२५
प्राचीन ऋषींनीं उभ्या केलेल्या सिद्धांतांची चर्चा करून, त्यांचें युक्तिसंगतत्व स्थापित करण्याचा उद्देश मजपुढें नाहीं. तथापि त्यांच्या मुख्य सिद्धान्तांपैकीं कांहीं सिद्धांतांचें संक्षिप्त समालोचन मला करावयास हवें. आपण सध्यां दिव्य जीवनाचा प्रश्न आपल्यासमोर ठेवला आहे, त्या प्रश्नाशीं या वेदांती सिद्धांतांचा जेवढा संबंध येतो, तेवढ्यापुरतेच हे सिद्धान्त मी तपासणार आहे. जी दिव्य जीवनाची इमारत नव्यानें पुन: उभी करावयाची आहे, तिच्या पहिल्या पायाच्या ठिकाणीं आम्हांला या सिद्धांतांत मांडलेल्या कल्पना उत्तम प्रकारें उपयोगी पडतील. आतां ही गोष्ट खरी आहे कीं, सर्वत्र ज्ञानाचे बाबतींत जें करावें लागतें, तें या बाबतींतहि करावें लागेल. अर्थात् जुन्या सिद्धान्ताची जुनी भाषा बदलून त्या ठिकाणीं आजच्या मानसिक अवस्थेला जुळणारी नवी भाषा वापरावी लागेल; तसेंच जो नवा प्रकाश उपलब्ध झालेला आहे, त्या प्रकाशांत जुना प्रकाश अंतर्भूत करून आपलें काम करावें लागेल. केवळ कालच्या उषःकालीं उपलब्ध असलेल्या ज्ञानावर विसंबून काम करणें चुकीचें, प्रतिगामीपणाचें असतें. तथापि जुनें ज्ञान धि:कारणें हेंहि चुकीचें असतें. जुनें ज्ञान किंवा त्यापैकीं जेवढें आज हस्तगत करतां येईल तेवढें ज्ञान, आमचें आरंभीचें भांडवल म्हणून आम्हीं उपयोगांत आणणें, जुन्या ज्ञानाचा आमच्या वांट्याला आलेला खजिना जेवढा हातीं येईल तेवढा, प्रारंभीच्या भांडवलासारखा वापरणें, हेंच आमच्या हिताचें होईल. हें भांडवल आम्हीं कामास लावलें, तर नित्य नव्या होणाऱ्या, बदलणाऱ्या, व नित्य जुन्या कायम स्वरूपाच्या राहणाऱ्या अनंताशीं आम्ही जो व्यवहार करणार, त्या व्यवहारांत आम्हांला अधिकांत अधिक लाभ निश्चितपणें होईल.
वेदांतानें विश्वाचें जें विश्लेषण केलें, त्यांत जी शेवटली गोष्ट त्याला आढळली, ती सद्ब्रह्म ही होय. सद्ब्रह्म म्हणजे शुद्ध, अलक्षण, अनंत, असीम अस्तित्व. विश्वांतील ज्या आकारांनी आणि गतींनीं दृश्य सत्याचा पसारा बनलेला आहे, त्यांच्या पाठीमागें, त्यांच्या पलीकडे, त्यांच्या पोटांत जी मूळ पायाभूत आदिम सत्य-वस्तु वेदान्ती अनुभवाला उपलब्ध झाली, ती म्हणजे हें वर उल्लेखिलेलें सद्ब्रह्म होय. हें उघड आहे कीं, सद्ब्रह्म या वस्तूची कल्पना विश्वाच्या मुळाशी ठेवणें, ही गोष्ट कांहीं आमची सर्वसाधारण जाणीव करूं शकत नाहीं. आमचा सर्वसाधारण अनुभव, आमची सर्वसाधारण जाणीव ज्या गोष्टी जाणते, किंवा जाणूं शकते, त्यांच्या पलीकडील, सर्वथा त्यांच्या
पान क्र. १२६
कक्षेबाहेरील अशी सद्ब्रह्म ही वस्तु किंवा कल्पना आहे. आमचीं ज्ञानेंद्रियें, आमचें मनाचें इंद्रिय कसल्याहि शुद्ध असीम अस्तित्वाविषयीं कांहीं देखील जाणत नाहीं. रूप आणि गति या विषयींचा इंद्रियांचा अनुभव आम्हांस कांहीं सांगूं शकतो, सांगतोहि. रूपांना अस्तित्व आहे पण हें अस्तित्व शुद्ध अस्तित्व नव्हे, नेहमींच तें मिश्र असतें; संयुक्त, सांघिक, संबंधमय असतें. आम्ही आमच्या अंतरांत शिरलों, तर विशिष्ट निश्चित रूप आम्ही दूर करूं शकतो परंतु गति कांहीं आम्ही दूर करूं शकत नाहीं; बदलण्याची क्रिया कांहीं आम्ही दूर करूं शकत नाहीं. अवकाशांत जडद्रव्यानें गतियुक्त राहणें व कालाच्या ओघांत रूपांतरावर रूपांतर होत राहणें, अर्थात् रूपांतराचें चक्र फिरत राहणें, या दोन अनिवार्य गतींवर आमच्या अस्तित्वाचा पाया रचलेला दिसतो. वाटल्यास आम्ही असें म्हणूं शकतों कीं, ही दोन प्रकारची गति हेंच अस्तित्व आहे आणि 'शुद्ध अस्तित्व' ही कल्पना, शोधून सांपडण्यासारख्या सत्याची कल्पना नाहीं. एवढेंच कीं, आमच्या स्वत:च्या जाणिवेची - आत्मभानाची (Self-consciousness) जी घटना आहे, तिच्यांत किंवा तिच्या पाठीमागें केव्हांहि न हलणारें, न बदलणारें, जन्ममृत्यूच्या पलीकडे असलेलें, क्रिया, रूप, रूपांतर (बदल) यांच्या कक्षेबाहेरचें असें कांहींतरी तत्त्व आम्हांला क्षणभर केव्हां केव्हां ओझरतें दिसतें, व तें 'कांहींतरी' वस्तुत: आम्हीच आहोंत अशी अंधुक अनुभूति किंवा कल्पना आम्हांला होते. हा एक आत्मभानाचा दरवाजा आमच्या अंतरंगात असून, तो केव्हां केव्हां एकदम उघडतो आणि त्याच्या पलीकडे असलेल्या तेजस्वी सत्याचें दर्शन आम्हांला घडवितो; तो एकदम बंद होण्यापूर्वीं त्या तेजस्वी सत्याचा एखादा प्रकाशमय किरण, स्वयंप्रकाश-किरण आम्हांला स्पर्श करूं शकेल इतका वेळ उघडाहि राहतो. हा किरण आम्हांला स्वच्छ सत्यज्ञान देतो; स्वयंप्रकाश सत्यज्ञान आंतून मिळेल अशी जणुं अगत्याची सूचना देतो. आमची श्रद्धा बलवान् असेल, तर आम्ही हें क्षणभर लाभलेलें सत्याचें ज्ञान, अंतर्ज्ञान, आमच्या पकडींत घट्ट धरून ठेवूं शकतो आणि या अंतर्ज्ञानाच्या (Intuition) किरणाच्या आधारावर, या अंत:स्फूर्त ज्ञानानुसार जीवन जगण्याचा उपक्रम करून, सामान्य इंद्रियनिष्ठ मानसज्ञानाचें आमच्या जीवनांतील प्राबल्य कमी करण्याच्या मागें लागूं शकतो.
आम्हीं बारकाईनें आमच्या अंतरंगाची तपासणी केली, तर असें दिसून येतें कीं, आमचा पहिला गुरु अंतर्ज्ञान (Intuition) आहे. आमच्या
पान क्र. १२७
मनाच्या क्रिया चालूं असतात, तेव्हां या क्रियांच्या पाठीमागें अंतर्ज्ञान दडलेलें असतें. अज्ञात सत्याच्या अंतर्गृहांतून त्या सत्याचे जे तेजस्वी संदेश हें अंतर्ज्ञान आणून देते, त्या संदेशापासून मनुष्याला होणाऱ्या उच्च श्रेणीच्या ज्ञानप्राप्तीस आरंभ होतो. हा संदेशांचा संपर्क मनुष्याच्या मनाला झाल्यानंतरच बुद्धि या सोनेरी पिकांतलें आपल्याला काय मिळेल हें पहाण्याकरतां त्याच्या सान्निध्यांत येते. आम्ही आज काय आहोंत, आम्ही काय असल्यासारखे दिसतो, या संबंधींचें ज्ञान आम्हांला आहे. हें जें कांहीं आम्ही आहोंत किंवा असल्यासारखे दिसतो, त्याच्या पाठीमागें, पलीकडे असलेल्या थोर सत्याची अस्पष्ट कल्पना आम्हांला अंतर्ज्ञान करून देतें. आमची खालच्या पातळीवर काम करणारी बुद्धि आणि आमचा सामान्य अनुभव ह्यांनीं, ही अंतर्ज्ञानानें दिलेली कल्पना खोटी आहे, असें अट्टाहासानें सांगतलें, तरी ती कल्पना आमची पाठ सोडीत नाहीं; आम्हांला अस्पष्ट असणारी ती कल्पना आम्हीं स्पष्ट करून घ्यावी म्हणून अंतर्ज्ञान आम्हांला आंतून पुन: पुन: प्रेरणा देतें आणि या प्रेरणेनुसार आम्ही आमच्या मनाच्या समजुतीसाठीं ईश्वर, अमर जीवन, स्वर्ग, या आणि अशासारख्या भावात्मक स्पष्ट कल्पनांच्या द्वारां तें सत्य व्यक्त करतों. अंतर्ज्ञान हें निसर्गाइतकेंच बलवान् आहे. निसर्गाच्या आत्म्यांतून त्याचा उदय होतो; आमची बुद्धि किंवा आमचा अनुभव यांनी त्याच्या विरुद्ध कितीहि सांगितलें, तरी अंतर्ज्ञान त्याची पर्वा करीत नाहीं. वस्तुत: काय आहे, काय सत्य आहे, त्याचें पूर्ण ज्ञान अंतर्ज्ञानाला असतें. कारण तें स्वत: त्या सत्याचा अविभाज्य भाग असतें, त्या सत्यापासूनच तें आलेलें असतें. अर्थात् जें मूळ सत्य नसून केवळ त्याची एक दुय्यम रचना आहे, एक दुय्यम दृश्य आहे अशा मनाची, बुद्धीची त्या सत्यासंबंधींची वाटेल ती कल्पना असली, तरी त्या कल्पनेला मान तुकवून अंतर्ज्ञान आपली सत्याची दृष्टि सोडीत नाहीं. बाह्य अस्तित्वासंबंधीं नव्हे, तर अस्तित्वांत असणाऱ्या महान् सत्य-वस्तूसंबंधानें अंतर्ज्ञान आम्हांला कांहीं सांगतें. आमच्या आत्मभानाच्या प्रसंगीं केव्हां केव्हां जो श्रेष्ठ दरवाजा उघडतो व आम्हांला श्रेष्ठ प्रकाशाचा किरण वा कण क्षणभर कां होईना दाखवितो, तो त्या महान् सत्यवस्तूचाच किरण वा कण असतो. मूळ सत्याचें तें अविभाज्य अंगच असतें. या अंतर्ज्ञानाच्या संदेशाला प्राचीन वेदान्तानें आत्मसात् केलें आणि तीन महावाक्यांत त्यांनीं हा संदेश सूत्रबद्ध केला : ''सोऽहमस्मि'' (मी तो पुरुष आहे - ईशावास्य), ''तत् त्वमसि श्वेतकेतो''
पान क्र. १२८
(हे श्वेतकेतू, तें सत्य, तो आत्मा तूंच आहेस - छांदोग्य), ''सर्वं हि एतद् ब्रह्म'' ''अयमात्मा ब्रह्म'' (हें सर्वच ब्रह्म आहे, हा आत्मा ब्रह्म आहे - मांडूक्य).
परंतु आमच्या स्वभावाला ज्या व्यवस्थित स्पष्ट स्वरूपांत सत्याची मांडणी हवी असते, तशा स्वरूपांत अंतर्ज्ञान आम्हांला सत्य पुरवीत नाहीं, पुरवूं शकत नाहीं. कारण तें आम्हांमध्यें पडद्याआडून कार्य करतें, आमच्या अस्तित्वाचा जो भाग प्रकाशहीन, अस्पष्ट रचनेचा आहे, त्याठिकाणींच प्रधानत्वानें अंतर्ज्ञान काम करीत असतें. पडद्याच्या दुसऱ्या बाजूला उजेड आहे, पण तो आमच्या जागृतीचा उजेड, थोड्या क्षेत्रांतच आहे व थोड्या तेजाचा आहे, आणि या ठिकाणीं अंतर्ज्ञानाला जीं साधनें आपलें काम करण्यासाठीं मिळतात, तीं साधनें त्या ज्ञानाचें सांगणें नीट व पुरतें समजण्याच्या योग्यतेचीं नाहींत. अंतर्ज्ञानाकडून आम्हांला प्रत्यक्ष ज्ञान पुरतेपणीं मिळावयास, त्यानें पडद्याआडून काम करणें सोडून, आमच्या अंतरांतून वर येऊन, वरच्या पृष्ठभागाच्या अस्तित्वांत आपली संघटना करावयास हवी आणि आमच्या अस्तित्वाच्या या वरच्या थरांत अग्रभागीं राहून नेतेपण करावयास हवें. सध्यां या थरांत बुद्धीची संघटना आहे आणि ती आम्हांला आमच्या अनुभवांची, विचारांची, कृतींची व्यवस्था लावण्यास मदत करते. अगदीं प्राचीन उपनिषदांतील वेदान्ती विचार अंतःस्फूर्त ज्ञानाच्या युगांतील आहेत. हें अंतर्ज्ञानाचें युग कांहीं कालानें संपलें व त्याच्यानंतर बुद्धिनिष्ठ ज्ञानाचें युग आलें. अंतर्ज्ञानावर, अंत:श्रवणावर आधारलेली श्रुति मागें पडून अतिभौतिक आध्यात्मिक तत्त्वज्ञानाला प्राधान्य आलें. नंतर तेंहि आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचें युग संपून प्रायोगिक भौतिक शास्त्राचें युग आलें. अंतःस्फूर्त ज्ञान, अंतर्दृष्टीनें दिसलेला विचार, हा अतिमानस क्षेत्रांतून आलेला दूत असतो. अर्थात् आमची सर्वश्रेष्ठ ज्ञानशक्ति ही अंतर्दृष्टीचीच शक्ति आहे. तथापि तिचें युग संपून शुद्ध बुद्धीनें तिची जागा घेतली; ही बुद्धि एक प्रकारें अंतर्ज्ञानाच्या अनुपस्थितींत त्याचें काम करणारी दुय्यम दर्जाची कारभारी आहे; तिचें स्थान आपल्या अस्तित्वाच्या सर्वोच्च पातळीवर नसून, मधल्या पातळीवर आहे. या दुय्यम कारभाऱ्याचें युगहि मागें पडून कांहीं काळ मिश्र बुद्धीचे दिवस आले. ही मिश्रबुद्धि आमच्या नेहमींच्या परिचयाच्या मैदानांत (फार उंच ठिकाणीं नव्हे) किंवा थोड्याशा उंचीवर काम करते; भौतिक स्थूल मन, स्थूल इंद्रियें आणि त्यांना मदत करणारीं जीं
पान क्र. १२९
यंत्रें-तंत्रें आम्हांला आमच्या शोधक शक्तीनें सांपडतात, बनवितां येतात, त्या यंत्रतंत्रांच्या अनुभवाच्या क्षेत्रापलीकडे आमची मिश्रबुद्धि काम करूं शकत नाहीं. प्रथम दर्शनीं असें वाटतें कीं, ही गति 'अधोगति' आहे, उंच ठिकाण सुटून खालीं खालीं घसरणें आहे. परंतु वस्तुत: ही गति अधोगति नसून चक्रगति आहे; प्रगमनाची चक्रगति आहे, प्रगतीचें चक्र आहे. अंतर्ज्ञान, शुद्धबुद्धि, मिश्रबुद्धि या ज्ञानशक्ती आमच्या ज्ञानाच्या क्षेत्रांत सर्वाधिकार किंवा मुख्याधिकार चालवीत असल्या, तरी जेव्हां प्रत्येक कनिष्ठ शक्ति तिच्या वरच्या श्रेष्ठ शक्तीच्या जागीं येते, तेव्हां त्या श्रेष्ठ शक्तीनें मिळविलेलें ज्ञान जेवढें आत्मसात् करितां येईल तेवढें करून, तें ज्ञान आपल्या विशिष्ट पद्धतीनें सिद्ध करण्याचा यत्न करीत असते. स्वभावत:च हें तिला करावें लागतें. तिजवर पडलेल्या या कार्यभारानें शेवटीं श्रेष्ठ शक्तींशीं सलोख्यानें वागण्याची तिची विनम्र बुद्धि व क्षेत्र वाढतें. या प्रकारें एकीमागून एक ज्ञानशक्ति कार्यकारी झाली नाहीं, आणि एका शक्तीला स्वभावत: लाभणारें ज्ञान दुसऱ्या कनिष्ठ शक्तीने आत्मसात् करण्याचा प्रयत्न केला नाहीं, तर आमच्या प्रकृतीच्या एका अंगाला आम्हांवर पूर्ण स्वामित्व करूं देणें आम्हांला अटळ होईल. आमच्या प्रकृतीचीं दुसरीं अंगें अविकसित राहतील, दडपलेलीं राहतील, दुसऱ्या श्रेष्ठ शक्तीच्या अयोग्य, अन्याय्य हुकमतींत राहतील; तीं आपापल्या क्षेत्रापुरतीच कार्यकारी राहिल्यानें विकास-दृष्टीनें मागासलेलीं रहातील. पण ह्या ज्ञानशक्ती एकीमागून एक क्रमवारीनें प्रधानत्वानें कार्यकारी झाल्यानें आणि प्रत्येकीला स्वतंत्र विकासयत्न करण्याची सवड मिळाल्यानें त्या सर्व शक्तींमध्यें समतोल अवस्था उत्पन्न होते, आमच्या ज्ञानांगांमध्यें अधिक पूर्ण मेळ राहण्यास मदत होते.
उपनिषदें कांहीं काल भारतांत सर्वाधिकारी राहिलीं. नंतर दर्शनांचा (भाष्यांतील तत्त्वज्ञानाचा) भारतांत उदय झाला, अर्थात् श्रेष्ठ ज्ञानशक्तीनंतर तिच्याहून कनिष्ठ ज्ञानशक्तीला ज्ञानक्षेत्रांत मुख्य अधिकार प्राप्त झाला. याप्रमाणें ज्ञानांगांत समतोलता व सुसंवाद सुप्रतिष्ठित, होण्यास साहाय्यक होणारें वर उल्लेखिलेलें क्रमवार सत्ता-संक्रमण भारतांत घडलेलें आहे. वेद आणि वेदांत ज्या ऋषींनीं आम्हांला दिला, ते ऋषि अंत:स्फूर्त ज्ञान आणि आध्यात्मिक अनुभव यांजवरच सर्वथा विश्वासून असत. उपनिषदांत मोठाले वाद व चर्चा असें जें केव्हां केव्हां अभ्यासक सांगतात, तें त्यांचें सांगणें चुकीचें आहे. वादाचा-संभाषणाचा प्रसंग कांहीं
पान क्र. १३०
उपनिषदांत दिसून येतो -- पण हा देखावाच असतो, खरोखरीचा वाद-विवाद नसतो. त्यांत सामान्य वादासारखी चर्चा नसते, एक पक्ष व त्यास विरोधी दुसरा पक्ष, असा कांहीं भाग नसतो व तर्कशास्त्रीय अनुमानपद्धतीहि तेथें नसते. त्या वादाचा देखावा असलेल्या संवादांत, संवाद करणारे सभ्य विचारक तत्त्वज्ञ, परस्परांच्या अंतर्दर्शनांचा, अंतरनुभवांचा पाढा वाचीत; त्यांची तुलना करीत; त्या तुलनेंत कमी प्रकाशमय दर्शन वा अनुभव, अधिक प्रकाशमय दर्शनाला वा अनुभवाला मान्यता व मान देत असे. दोन दर्शनांत वा अनुभवांत एक संकुचित वा कमी व्यापक, दुसरा अधिक व्यापक वा कमी संकुचित, एक सदोष वा अपूर्ण, दुसरा निर्दोष किंवा कमी सदोष वा अधिक पूर्ण, एक कमी सारस्पर्शी दुसरा अधिक सारस्पर्शी, असें तुलनेंत आढळून आलें म्हणजे अर्थात् दुसऱ्या दर्शनाला किंवा अनुभवाला पहिला अनुभव किंवा दर्शन मान देऊन दूर होत असे. या वेदवेदांतांतील संवादांत एक विचारक दुसऱ्याला, ''तुम्हांला काय अनुभव आहे ?'' असा प्रश्न विचारी; ''तुमचें मत काय आहे ? तुमच्या युक्तिवादानें तुम्ही कोणत्या निर्णयाला आलां आहांत ?'' असे प्रश्न विचारले जात नसत. वेदांतमान्य सत्याला किंवा सत्यांना आधार म्हणून तर्कशास्त्रीय युक्तिवाद केला आहे असें एकहि स्थळ उपनिषदांत नाहीं. वेद-वेदांतकालीन ऋषींचे असें ठाम मत दिसतें कीं, तर्कशास्त्रीय युक्तिवाद, अंत:स्फूर्त ज्ञानासंबंधानें न्यायाधीशपण करण्यास समर्थ असूं शकत नाहीं; अंतर्ज्ञान कमी किंवा अधिक निर्दोष किंवा पूर्ण असूं शकतें - अधिक पूर्ण अंतर्ज्ञानानें कमी पूर्ण अंतर्ज्ञानांतींल चूक दाखवावी, दुरुस्त करावी पण तर्कशास्त्राला या बाबतींत कसलाच अधिकार असूं शकत नाहीं.
तथापि अंतर्ज्ञानानें दाखविलेल्या सत्यासंबंधीं देखील मानवाची बुद्धि स्वतःचें समाधान करणारी बौद्धिक तर्कपद्धति उपयोगांत आणूं शकते व आणते आणि अशी सत्यासत्यनिर्णयपद्धति वापरून सत्य-असत्याची पारख करण्याचा अधिकार तिला नि:संशय आहे. भारतांतील अंतर्ज्ञानाचें युग संपून बुद्धीचें व बुद्धीनें अनुमान बांधण्याचें युग आलें, तेव्हां बुद्धीचा वर सांगितलेला अधिकार लक्षांत घेऊन भारतीय दर्शनकारांनीं, ते ज्या सत्याचा शोध करीत होते त्या सत्यासंबंधानें, अंतर्ज्ञान आणि बुद्धि या दोघांनाहि यथोचित मान व मान्यता देणारी द्विमुखी मनोवृत्ति धारण केली; कारण प्राचीनांनीं त्यांच्या हवालीं केलेल्या वारशाविषयीं, ज्ञान-धनाविषयीं त्यांना
पान क्र. १३१
परिपूर्ण आदर होता व बुद्धीलाहि ते योग्य मान देत होते. श्रुति ही अधिकारानें बुद्धीच्या वरची आहे, बुद्धिप्रामाण्याहून श्रुतिप्रामाण्य श्रेष्ठ आहे असें ते मानीत. प्राचीनकाळी अंतर्ज्ञानानें प्राप्त झालेलीं सत्यें श्रुतींत आहेत, किंवा श्रुतिग्रंथ हे अपौरुषेय, ईश्वरोपदिष्ट आहेत असें ते मानीत. तथापि श्रुतींत आढळणाऱ्या गोष्टीसंबंधानें ते बुद्धीलाहि आवाहन करीत. बुद्धि आपल्या तर्कपद्धतीनें जे सिद्धांत स्थापन करी, त्यांतील श्रुतिमान्य सिद्धांत तेवढे प्रमाण मानावयाचे, असा त्यांचा रिवाज असे; कारण सर्वश्रेष्ठ अधिकार श्रुतीचा, असा त्यांचा विश्वास होता. तेव्हां त्यांचें कांहीं सिद्धांत असे असत कीं, जे श्रुति आणि बुद्धि या दोहोंनाहि मान्य असत. तत्त्वज्ञानाकडून (metaphysics) एक पातक नेहमीं घडत असतें तें हें कीं, तें ढगावर बसून लढत असतें, बिनबुडाचा वाद घालण्याकडे त्याचा कल असतो; शब्द हे शब्द आहेत हे विसरून, जणुं कांहीं ते वास्तव आहेत, संशयरहित घटना आहेत असें धरून तें चालतें; शब्द म्हणजे वास्तव नसून केवळ प्रतीकरूप आहेत हें लक्षांत घेऊन, त्यांची काळजीपूर्वक तपासणी करणें आणि ज्या वास्तव गोष्टी आणि घटना ते दाखवतात असें समजलें जातें, त्या वास्तव आहेत कां, व असल्या तर कशा स्वरूपाच्या आहेत, हें नेहमीं तपासून पाहणें अवश्य आहे; अंतर्ज्ञाननिष्ठ श्रुतीला स्वतःप्रमाण मानून, श्रुतींतील सिद्धांतांना पोषक असा युक्तिवाद करण्याचें तर्कनिष्ठ बुद्धीला उत्तेजन देणाऱ्या भारतीय तत्त्वज्ञानानें, तत्त्वज्ञानाकडून (metaphysics) बिनबुडाचा वाद घालण्यानें घडणारें पातक बऱ्याच प्रमाणांत टाळलें. भारतीय तत्त्वज्ञ प्रथम प्रथम आपलीं अनुमानें बांधतांना, त्या अनुभवांचा मध्यवर्ति सारभूत भाग, श्रेष्ठतम व खोलांत खोल अनुभवाशीं जुळता ठेवण्याची काळजी घेत. बुद्धि आणि अंतर्ज्ञान-अंतःस्फूर्ति -- हीं दोन महान् प्रमाणस्थानें त्यांना मान्य असल्यामुळें, या दोन्हींकडून ज्या सिद्धांतांना मान्यता मिळे ते सिद्धांत, 'निश्चित सिद्धांत' समजून ते आपली शोधक बुद्धि चालवीत असत. परंतु तत्त्वज्ञांचा हा क्रम कांहीं काळानें बदलला; अंतर्ज्ञानाला आपणाहून श्रेष्ठ समजण्याचें व त्याचा दुय्यम कारभारी म्हणून काम करण्याचें तत्त्वत: मान्य असलेलें एका काळचें व्रत या बुद्धीनें सोडून दिलें आणि आपण स्वत:प्रमाण आहों, आपल्यापेक्षां श्रेष्ठ प्रमाण-स्थान नाहीं, अशा भावनेनें तिचा कार्यक्रम चालूं झाला. अर्थात् याचा परिणाम म्हणून भारतांत अनेक अन्योन्यविरोधी दर्शनें - तत्त्वज्ञानें उदयास आलीं. प्रत्येक दर्शन आपला
पान क्र. १३२
आधार श्रुति आहे असें तत्त्वत: मान्य करी आणि श्रुतींतील वचनें घेऊन आपल्या विरोधकांवर त्यांचा शस्त्रांसारखा उपयोग करी. एकमेकांवर शस्त्रासारखीं वापरण्याजोगीं वचनें श्रुतींत सापडतात; याचें एक कारण असें आहे कीं, ज्या श्रेष्ठ अंतर्ज्ञानावर श्रुति आधारलेली आहे, तें अंतर्ज्ञान वस्तूंच्या मेळाव्याकडे बुद्धीच्या विश्लेषणात्मक बारीक दृष्टीनें न पाहतां समग्रतेच्या विशाल दृष्टीनें पाहतें. अविभाज्य महान् वस्तु हा अंतर्ज्ञानाचा मुख्य विषय असतो; या अविभाज्य वस्तूच्या निरनिराळ्या बाजू या दृष्टीनें, तिच्यांतील तपशिलांचा विचार तें करतें. अंतर्ज्ञानाचा ओढा नित्य आंतरिक समन्वयाकडे असतो, ज्ञानाच्या एकतेकडे असतो. बुद्धीची गोष्ट त्याच्या उलट आहे; विश्लेषण, विभाजन हा बुद्धीचा मार्ग; या मार्गानें मिळविलेल्या वस्तूंच्या तुकड्यांना एकत्र करून बुद्धि आपली ''समग्र'' वस्तु तयार करते. या कृत्रिम 'समग्र' वस्तूंत विरोधी गोष्टी, अपवादात्मक गोष्टी, तर्कशास्त्राला न खपणारे विसंवाद, एकत्र भरले जातात; आणि बुद्धीच्या हें नजरेस आलें, कीं ती स्वभावत: त्यांतील कांहीं गोष्टी योग्य म्हणून पसंत करून, त्यांच्याशीं विसंवादी अशा बाकीच्या गोष्टी बाजूला सारते आणि निर्दोष अशी तर्कशास्त्रसंमत व्यवस्था किंवा रचना उभी करते. असें असल्यानें आरंभीं अंतर्ज्ञानाचें राज्य असतां ज्ञानाची जी एकता होती व जी बुद्धीचें राज्य अंशत: सुरू झाल्यानंतरहि कांहीं काळ टिकली, ती एकता बुद्धीचें संपूर्ण साम्राज्य सुरू झाल्यावर नाहींशी झाली. अनेक युक्ती, अनेक अर्थ लावण्याच्या पद्धती, अनेक भिन्न मूल्यावर आधारलेले मूल्य-मापनप्रकार तार्किक तत्त्वज्ञांची कुशाग्रता वेळोवेळीं शोधून काढीत असे आणि या शोधांचा फायदा घेऊन त्यांना गैरसोयीच्या असणाऱ्या श्रुतिवचनांचा विरोध दूर करण्यांत तत्त्वज्ञ यशस्वी होऊं शकत, त्या वचनांना व्यवहारतः हरताळ लावूं शकत आणि त्यांचें स्वतःचें जें अनुमानरचित तत्त्वज्ञान असेल, त्याचा मोकळेपणें ते प्रचार करूं शकत.
याप्रमाणें जीं निरनिराळी दर्शनें या बुद्धीच्या पराक्रमानें तयार झालीं, त्यांत प्राचीन वेदांतांतील प्रमुख सिद्धांत, एका दर्शनांत कांहीं अंशीं, दुसऱ्यांत तसेच कांहीं अंशीं असे सर्व दर्शनांत थोड्या थोड्या अंशानें मान्यता पावून राहिले; आणि हे विखुरलेले सिद्धांत एकत्र करण्याचा व प्राचीन अंतर्ज्ञानाची एकता व सर्वसमावेशकता जींत प्रतिबिंबित झाली आहे अशी तत्त्वज्ञानाची इमारत या एकत्रीकरणानें उभी करण्याचा प्रयत्नहि मधून मधून केला गेला. त्याचप्रमाणें हीं दर्शनें वेगवेगळ्या विचारपद्धती वापरीत होतीं,
पान क्र. १३३
तरी सर्व दर्शनांत, त्यांतील सिद्धांताच्या पाठीमागें, मूळ पायाभूत असणारा वेदांती सिद्धांत टिकून राहिला. पुरुष, आत्मा, सद्ब्रह्म, शुद्ध अस्तित्व असणारी वस्तु (सद्वस्तु) या प्रकारें उपनिषदांनीं विश्वाचें मूळ वर्णिलें आहे. सर्व दार्शनिकांनीं या सिद्धांताला मान्यता दिली. कोठें कोठें बुद्धिनिष्ठ तत्त्वज्ञांनीं पुरुषाऐवजीं विशिष्ट विचार, भावना, मानसिक अवस्था हें विश्वाचें मूळ म्हणून कल्पिलें आहे. तथापि ज्याप्रमाणें वेदांताचा पुरुष, आत्मा हा अनिर्वाच्य, वाणीनें वर्णन करतां न येण्यासारखा, असा वर्णिलेला असतो, त्याप्रमाणें विश्वाचें मूळ म्हणून सांगितला जाणारा विचार, कल्पना वा मनोवस्था ही अनिर्वाच्य म्हणून प्राय: वर्णिली जाते. आमच्या अंतर्ज्ञानाला व बुद्धीला गोचर असें अद्वितीय एक कांहींतरी आहे, आणि आमच्या समोर विश्वहि आहे. विश्व म्हणजे सारखी गति, भ्रमन्ती आणि घडणें, रूप घेणें; सारखे फिरत राहणारें रूप-रूपांतर-चक्र, घटना-विघटना-चक्र. आतां या विश्वाचें आणि त्या एकाचें नातें काय आहे ? काय असावें ? काय असेल ? आमच्यांत मी आहे, अहम् आहे; आमच्या समोर जी रूप-रूपांतर-भ्रमंती चालली आहे, तिचें, हा 'मी' हें अपत्य असो वा तिचा जनक असो, तो वेदांतानें घोषिलेल्या खऱ्या आत्म्याकडे, ईश्वराकडे या ब्रह्माकडे परत जाणार आहे काय ? परत जाऊं शकतो काय ? हे प्रश्न भारतीयांच्या मनांत सदैव जागृत होते व आहेत; आणि भारतांतील बुद्धिनिष्ठ तत्त्वज्ञ व व्यवहारनिष्ठ साधक या दोन्ही वर्गांचें अंतःकरण वरील प्रश्नांनीं सदैव व्यापलेलें आहे.
पान क्र. १३४
Home
Sri Aurobindo
Books
SABCL
Marathi
Share your feedback. Help us improve. Or ask a question.