दिव्य जीवन 1879 pages 1960 Edition
Marathi Translation
  Senapati Bapat

ABOUT

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics, expounding a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth.

THEME

philosophymetaphysics

दिव्य जीवन

Sri Aurobindo symbol
Sri Aurobindo

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.

Sri Aurobindo Birth Centenary Library (SABCL) The Life Divine Vols. 18,19 1070 pages 1970 Edition
English
 PDF    philosophymetaphysics
Sri Aurobindo symbol
Sri Aurobindo

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.

Marathi Translations of books by Sri Aurobindo दिव्य जीवन 1879 pages 1960 Edition
Marathi Translation
Translator:   Senapati Bapat  PDF    LINK

प्रकरण पांचवें

विश्वभ्रम

मन, स्वप्न, आणि आभास

 

तूं या अनित्य आणि दु:खमय लोकांत आला आहेस, म्हणून तू मजकडे ये.

- गीता ९-३३

 

हा आत्मा विज्ञानमय पुरुष आहे, हृदयांत आंतर तेजाच्या रूपानें असतो; अस्तित्वाच्या सर्व अवस्थांमध्यें समानत्वानें असणारा असा हा जाणीवयुक्त पुरुष आहे; दोनहि विश्वांत हा संचार करीत असतो. हा स्वप्न-पुरुष होऊन या विश्वाच्या आणि त्यांतील मृत्युवश आकारांच्या पलीकडे जातो.... या पुरुषाचीं स्थानें दोन आहेत, हें विश्व आणि परलोक; स्वप्नस्थान हें तिसरें स्थान या वरील दोन स्थानांना जोडणारें स्थान आहे; या संधिस्थानीं जेव्हां हा पुरुष असतो तेव्हां, त्याला हें विश्व आणि परलोक दोन्हीं स्थानें दिसतात; तो निजतो तेव्हां, जेथें सर्व कांहीं आहे त्या या विश्वाचें द्रव्य बरोबर घेतो आणि स्वत:च्या प्रकाशांत, स्वत:च्या तेजानें, असलेल्या रचना मोडण्याचें आणि नवीन रचना उभारण्याचें काम करतो; हा पुरुष निजला म्हणजे आपल्या तेजानें प्रकाशमय होतो; ... तेथें रस्ते नाहींत, रथ नाहींत; तेथें मोदाच्या, आनंदाच्या गोष्टी नाहींत; तेथें तलाव नाहींत, पुष्करिणी नाहींत, नद्या नाहींत -- पण या सर्व वस्तू तो आपल्या तेजानें निर्माण करतो; तो कर्ता आहे. लोकदृष्ट्या झोंपेचा आश्रय करतांना तो आपलें शरीर सोडून जातो, आणि स्वत: न झोंपतां शरीरादि जे झोंपतात त्यांना, पाहत असतो; आपल्या प्राणानें हें खालचें घरटें तो संभाळतो आणि या घरट्यांतून तो अमृत-पुरुष बाहेर पडतो; तो त्याच्या इच्छेला येईल तिकडे जातो; तो अमर हिरण्मय पुरुष एकाकी हंसासारखा विहार करतो...... असें म्हणतात कीं, जागृतींतला देश हाच

पान क्र. २१५

 

केवळ त्याचा देश असतो, कारण जागृत असतांना ज्या गोष्टी तो पाहतो, त्याच केवळ त्याला झोपेंत दिसतात; पण झोपेंत हा स्वयंज्योति असतो. 

- बृहदारण्यक ४-३, ; ९-१२,१४

 

मनरूपी देव स्वप्नामध्यें दृष्ट आणि अदृष्ट, अनुभूत आणि अननुभूत, असणारें आणि नसणारें सर्व पाहतो; सर्व होतो आणि सर्व पाहतो.

- प्रश्न उपनिषद ४-५

 

मानवाचा विचार, मनोमय मानवाचा अनुभव हा निरपवादपणें, अस्ति आणि नास्ति, आहे आणि नाहीं, या दोन टोंकामध्यें सारखा घोंटाळत असतो. त्याच्या मनाला कोणतेंहि विचाराचें किंवा अनुभवाचें सत्य, आहे आणि नाहीं या दोनहि प्रकारें प्रतीत होऊं शकते. व्यक्ति, विश्व, सर्व वस्तूच्या अंतर्यामीं असणारी किंवा सर्व वस्तूंच्या तळाशीं असणारी सद्‌वस्तु, व्यक्ति आणि विश्व याहून वेगळी, यांच्या पलीकडे असणारी सद्‌वस्तु या वस्तुसंबंधानें मनाला काय वाटतें किंवा दिसतें तें तपासल्यास, यांपैकीं केव्हां केवळ एक, केव्हां यापैकीं कोणत्याहि दोन, केव्हां सर्व ''आहेत'', एकाच वेळीं आहेत असा आपला अनुभव असल्याचा मन पुकारा करतें -- पण या वस्तूंपैकीं प्रत्येकीसंबंधानें मनानें ''नाहीं'',  ''नाहीं'' असाहि पुकारा केल्याचें आपण पाहतो : मनाला याप्रमाणें वागणें प्राप्त आहे, कारण विचारशील मन स्वभावतःच अज्ञानग्रस्त आहे,  ''शक्य'', ''अशक्य'' इतकाच विचार, व्यवहार, तें करूं शकतें; शक्यतेच्या पाठीमागें असणारें सत्य त्याला प्राप्त नसतें. एक किंवा अनेक शक्यता एकदम परीक्षून किंवा एकीमागून एक परीक्षून, त्यांच्याविषयीं एखादें निश्चित मत तें बनवू शकेल, एखादा ठाम विश्वास त्याचे ठिकाणीं जागा होईल, कांहीं पक्कें ज्ञान त्याला मिळवतां येईल; पण केवळ सापेक्ष गोष्टींच्या व संभवनीय गोष्टीच्या विश्वांत त्याचें राहणें असल्यानें, त्याला अंतिम निश्चितता, टिकाऊ अविवाद्य निर्धार, कोणत्याहि बाबतींत शक्य होत नाहीं. जें वास्तवांत आहे, त्याचा अनुभव त्याला आलेला आहे, तें देखील स्याद् वा न स्याद्, असेल कदाचित्, नसेलहि कदाचित्, अशा स्वरूपाचें त्याला भासूं शकतें; ''आहे'' पण नसणें शक्य होतें आणि पुढें नसणार असें लक्षण दिसतें -- या प्रकारची कहाणी, वास्तवांतील, अनुभवलेल्या गोष्टींविषयी मन स्वतःला सांगत राहतें. ही मनाची गोष्ट झाली. आमचें प्राणमय अस्तित्व याच प्रकारच्या अनिश्चिततेनें

पान क्र. २१६

 

भरलेलें आहे : अमुक ध्येयाच्या साधनेंत जीवन विसांवलें, असें कधीं होत नाहीं. खात्रीचें अंतिम समाधान कोणत्याच ध्येयापासून त्याला लाभत नाहीं; कोणतेंहि ध्येय कायमचें मोलाचें आहे, शाश्वत मूल्याचें आहे असें त्याला वाटत नाहीं. कांहीं वास्तव गोष्टी व घटना सत्य म्हणून घेऊन आमची प्रकृति आपलें कार्य सुरू करते : पुढें तिच्यावर कोठून तरी दडपण येऊन, या वास्तव गोष्टींच्या पलीकडे ती ढकलली जाते. अनिश्चित शक्यतांच्या मागें ती लागते, शेवटीं सत्य म्हणून जें जें तिनें गृहीत धरलें होतें, तें तें सर्व असत्य तर नाहीं ना ? अशी शंका तिच्या ठिकाणीं ठाम येऊन बसते. असें घडण्याचें कारण हेंच कीं, मूलभूत अज्ञान हा आमच्या प्रकृतीचा कार्यारंभ असतो, निश्चित सत्य तिच्या हातीं नसतें; सत्य म्हणून कांहीं गोष्टींचा आश्रय ती कांहीं काळ करते; पण या सर्व ''सत्य'' गोष्टी संशयास्पद सत्यें आहेत, अपूर्ण सत्यें आहेत, अंशसत्यें आहेत, असें लवकरच आमच्या प्रकृतीच्या अनुभवाला येतें.

प्रारंभीं मनुष्य जडाश्रित भौतिक स्थूल मनांत राहतो. जें वास्तवांत आहे, भौतिक स्वरूपाचें आहे, इन्द्रियग्राह्य विषयाच्या स्वरूपाचें आहे त्याचें ज्ञान या मनाला होतें; या भौतिक गोष्टी खऱ्या गोष्टी म्हणून तें गृहीत धरतें आणि या गोष्टी स्वयंसिद्ध सत्य, संशयातीत सत्य म्हणून तें मान्य करतें. जें वास्तव नाहीं, भौतिक नाहीं, इन्द्रियविषयक नाहीं तें असत्य आहे, अननुभूत आहे असें हें मन म्हणतें आणि तें वास्तव, इंद्रियग्राह्य होऊं शकलें, तरच त्याला पूर्ण सत्याची प्रतिष्ठा देण्यास हें मन तयार होतें. स्वतःचें अस्तित्व ही, इंद्रियगम्य गोष्टीइतकी वास्तव गोष्ट आहे, असें भौतिक मन मानतें; दृश्य इंद्रियग्राह्य अशा शरीरांत स्वतःची वसति असल्यानें आपलें अस्तित्व सत्य आहे असें तें मानतें; दृश्य शरीरांतील स्वतःचें अस्तित्व, हाच तें सत्य असल्याचा भक्कम पुरावा आहे अशी त्याची धारणा असते. स्वतःखेरीज दुसरे जे इंद्रियविषय न होणारे जीव आणि वस्तुप्रकार आहेत, त्यांचेंहि सत्यत्व, वरीलसारख्या पुराव्याच्या आधारानेंच भौतिक मन मानीत असतें; हे जीव व वस्तुप्रकार, बाह्य जाणिवेचे विषय झाले म्हणजे आमचें भौतिक मन त्यांना सत्यत्व बहाल करतें; अशाप्रकारें ते बाह्य जाणिवेचे विषय न झाले, तर निदान त्यांनीं बुद्धीला -- बाह्य-जाणिवेनें पुरविलेल्या पुराव्याच्या आधारानें विचार करणाऱ्या, खरें-खोटें ठरविणाऱ्या बुद्धीला -- तिच्या मार्गानें आपलें सत्यत्व पटवून दिलें पाहिजे,

पान क्र. २१७

 

म्हणजे भौतिक मन त्यांना सत्यत्व बहाल करण्यास तयार होतें.  (बाह्य जाणिवेनें पुढें केलेला पुरावा हाच एक खऱ्या ज्ञानाचा पक्का आधार, पाया होऊं शकतो, असें मानणारी बुद्धि या ठिकाणीं विवक्षित आहे : बुद्धीचे दुसरे प्रकारहि आहेत.) भौतिक शास्त्र हें असल्या भौतिक मनाचें, भौतिक बुद्धीचें महान् क्षेत्रावर पसरलेलें स्वरूप आहे. इंद्रियें चुका करतात, त्या चुका भौतिक शास्त्र दुरुस्त करतें; इंद्रियस्वरूप इंद्रियनिष्ठ मन फार मर्यादित आहे, त्याला भौतिक शास्त्र आपल्या शोधांनीं मदत करतें; आपल्या शारीर इंद्रियांनीं ज्या गोष्टी ग्रहण होऊं शकत नाहींत आणि म्हणून ज्यांचा पदार्थ-क्षेत्रांत समावेश केला जात नाहीं त्या गोष्टी (घटना आणि वस्तु) भौतिक शास्त्रानें शोधून काढलेल्या उपायांनीं किंवा यंत्रांनीं पदार्थक्षेत्रांत आणल्या जातात; इंद्रियांनीं केलेल्या चुका दुरुस्त करण्यालाहि वरील भौतिकशास्त्रनिर्मित उपायांचा व यंत्रांचा उपयोग होतो. कोणत्याहि गोष्टींचें सत्यत्व ठरविण्याची, भौतिक शास्त्राची व भौतिक मनाची कसोटी एकच आहे. बाह्य पदार्थत्व, भौतिक वास्तवत्व ही ती कसोटी होय. भौतिक बुद्धि आपल्या भौतिक पद्धतीनें ज्याचें सत्यत्व तपासून मान्य करील, तें सत्य; बाह्य वस्तुमय पुरावा ज्याचें सत्यत्व ठरविण्यास पुढें आणतां येईल, तें सत्य -- अशी भौतिक शास्त्राची सत्यत्व निर्णयपद्धति आहे.

भौतिक मनाप्रमाणें मनुष्याला प्राणाश्रित मन पण आहे. हे मन इच्छा, वासना, कामना यांचें साधन म्हणून काम करतें. हें मन केवळ वास्तव गोष्टींनीं समाधान पावत नाहीं. शक्यता, संभवनीय गोष्टी या मनाच्या व्यवहाराचा विषय, व्यवहाराचें क्षेत्र असतात; नवीन कांहींतरी मिळवावें अशी त्याला तीव्र इच्छा असते. वासनेच्या तृप्तीसाठीं अनुभवाचें क्षेत्र वाढविण्याच्या मागें हें मन असतें; चैन करावयास मिळावी, आपलें प्रस्थ खूप वाढविण्यास मिळावें, आपल्या सत्तेचें आणि फायद्याचें क्षेत्र खूप मोठें करतां यावें यासाठीं त्या मनाची धडपड नेहमीं चाललेली असते. वास्तवांतल्या गोष्टी हें मन चाहतें, भोगतें, स्वाधीन करून घेतें; पण त्याबरोबरच अननुभूत संभाव्य गोष्टींचा ध्यास तें घेत असतें, या संभाव्य इष्ट गोष्टी वास्तवांत आणण्यासाठीं उत्कट प्रयत्न करतें, त्या स्वाधीन करून घेऊन त्यांचा उपभोग घेण्यासाठीं तडफडत असतें. हें प्राणमय मन नसतें, तर भौतिक मन स्वत: पुरतें पशूंचें जीवन जगून समाधानांत राहिलें असतें, पशूचें प्राथमिक वस्तुगत जीवन आणि त्याच्या

पान क्र. २१८

 

मर्यादा, या भौतिक मनानें आपलें सर्व शक्य जीवन आणि शक्य मर्यादा म्हणून मान्य केल्या असत्या; भौतिक निसर्गाच्या नियमबद्ध व्यवस्था असलेल्या क्षेत्रांत फिरत राहून त्यांतच या भौतिक मनानें समाधान मानलें असतें; अधिक कशासाठीं तें तळमळलें नसतें. पण त्याच्या जोडीला प्राणमय मन, अशान्त प्राणिक वासनांचें मन आपल्या मागण्या घेऊन येतें आणि या वास्तवाच्या मर्यादित खोपटांत राहणाऱ्या भौतिक मनाच्या जड रूढ समाधानाचें असमाधान करून टाकतें. प्राणाश्रित मन हें वासना, कामना सारख्या वाढवीत असतें; असमाधान, अशान्ति सारखी उत्पन्न करीत असतें; त्याला जीवन जें कांहीं देतें, देऊं शकतें, त्यापेक्षां अधिक कांहींतरी मिळविण्यासाठीं तळमळ उत्पन्न करीत असतें -- आम्हांला ज्या गोष्टी शक्य आहेत, त्या शक्य गोष्टींपैकीं बऱ्याच गोष्टी या अशान्त प्राणिक मनाच्या धडपडीमुळें वास्तवांत उतरतात आणि आमचें भौतिक वास्तवाचें क्षेत्र खूप मोठें होतें; तथापि हें मन कांहीं केल्या समाधान पावत नाहीं, अधिकाधिक हवें अशी त्याची सारखी मागणी असते; अधिकासाठीं मागणी सारखी वाढत असते, नवीं नवीं क्षेत्रें जिंकून घ्यावीं, परिस्थितीच्या मर्यादा मागें टाकून पुढें, सारखें पुढें जात रहावें, स्वत:च्या स्वरूपाच्या मर्यादाहि उल्लंघून पार जावें -- अशा तळमळीनें प्राणमय, वासनांकित मन सारखें व्यापलेलें असतें. याप्रमाणें आमच्या जीवनांत खूप अशान्ति आणि अनिश्चितता प्राणिक वासनिक मन आणून सोडतें -- यानंतर विचारशील मन येतें आणि आमची अशांति आणि अनिश्चिति आणखी वाढवितें : हें विचारधर्मी मन, प्रत्येक गोष्टीची तपासणी करतें, प्रत्येक गोष्टीसंबंधानें शंका उपस्थित करतें, सिद्धान्त उभे करतें आणि सिद्धांत पाडून टाकतें, सत्य म्हणून कांहीं गोष्टी घेऊन त्यांचीं शास्त्रें, वाद, विद्या, पंथ बनवितें पण शेवटीं खात्रीचें म्हणून एकहि शास्त्र नाहीं असा निर्वाळा तें देतें; इन्द्रियांचा पुरावा मान्य करते, संशयित म्हणून अमान्यहि करतें; बुद्धि निर्णय देईल तें मान्य करून कांहीं वाटचाल करतें, पण हे निर्णय नापसंत करून दुसरे वेगळे किंवा विरोधी निर्णय तें घेत असतें आणि याप्रमाणें सारखी धरसोड अनंत काळपर्यंत नव्हे, अनिश्चित काळपर्यंत करीत राहतें. मनुष्याच्या विचाराचा, त्याच्या धडपडीचा इतिहास हा असा आहे; मर्यादा उभ्या करावयाच्या आणि मोडावयाच्या हें काम विचारधर्मी मन सारखें अखंडपणें करीत राहतें; पण मर्यादा सारखें मोडीत असलें, तरी त्याचा

पान क्र. २१९

 

मार्ग जुन्याच दिशेचा किंवा त्या दिशेला जवळ असलेल्या दिशेचाच असतो; हा मार्ग सरळ नसतो, वक्र रेषेचा असतो, चक्र गतीचा असतो; बंद चक्रांत मन फिरत नाहीं; त्याची गति-चक्रें एकाच वक्ररेषेचीं एकानंतर एक अशीं शेवट नसलेलीं एकाच किंवा जवळजवळ एकाच दिशेनें जाणारीं असतात. गतिचक्रें मोठीं होत जातात, पण त्यांची दिशा फारशी बदलत नाहीं. मानवी मन याप्रमाणें सारखें शोधांत असतें, सारखें क्रियामग्न असतें; जीवनाचे खरे हेतू, जीवनाचीं खरीं साध्यें अमुक, असें ठामपणें कधीं त्याचें ठरत नाहीं, स्वतःची निश्चित आणि ठाम वाटणारीं मतें, ठामपणें खरीं आहेत, असा त्याचा निश्चय कधीं होत नाहीं; अस्तित्वाची, जीवनाची अमुक एक कल्पना स्वतःची म्हणून पक्की बनविली आहे, अमुक एका जीवनाच्या कल्पनेचा पक्का पाया स्वतःच्या जीवनाच्या उभारणीला भक्कम बांधून ठेवला आहे, असें कांहीं विचारधर्मी मनाच्या हांतून केव्हांहि घडत नाहीं.

याप्रमाणें अशान्ति आणि अनिश्चिततेच्या यातना सारख्या चालूं असल्यानें एक क्षण असा येतो कीं, भौतिक मनाला पदार्थांसंबंधीं जें सत्यत्व पटलेलें असतें तें सत्यत्वहि डळमळीत होतें, आणि तें अज्ञेयवादी बनतें, त्याचे ज्ञानाचे, जीवनाचे जे आदर्श असतात, त्यांसंबंधांत त्याला संशय वाटूं लागतो; हें सर्व खरोखरीच ''सत्य'' आहे कां, असाहि संदेह तें करूं लागतें, हें सर्व सत्य असलें तरी तें निरुपयोगी, व्यर्थ नाहीं असें म्हणतां येईल कां, असाहि प्रश्न त्याच्यापुढें उभा राहतो; ही झाली भौतिक जडाश्रित मनाची गोष्ट. प्राणाश्रित मन हेंहि भौतिक मनाप्रमाणें त्याहूनहि अधिक संशयखोर बनतें; जीवनांत त्याला कांहीं हवें तें सगळें लाभत नाहीं, त्याची पदोपदीं निराशा होत असतें, सुखाच्या म्हणून ज्या गोष्टी तें जवळ करतें त्याहि त्याला पुरतें समाधान देत नाहींत, शेवटीं त्याला उबग येतो, तीव्र निराशा त्याला पछाडते, आणि जीवनांतील सर्व कांहीं व्यर्थ आहे, निष्फळ आहे, जीवाला उगीचच सतावणारें आणि म्हणून नाउमेद करणारें आहे, संताप आणणारें आहे असा सिद्धान्त करून तें, जीवन आणि अस्तित्व ''मिथ्या'' म्हणून टाकून द्यावयासहि तयार होतें; ज्याच्या पाठीमागें तें लागत होतें तें सर्व  ''माया'' आहे असा शेरा मारून त्याचा सर्वस्वी त्याग करण्यास तयार होतें; ही प्राणाश्रित वासनामय मनाची गोष्ट झाली. आतां विचारधर्मी मनाची कहाणी पहावयाची. ही कहाणी थोडक्यांत अशी कीं, त्यानें

पान क्र. २२०

 

'आहे आहे' म्हणून म्हटलेल्या सर्व गोष्टी त्याला 'नाहीं नाहीं' म्हणून नाकाराव्या लागतात; आणि शेवटीं तें या निर्णयाला येतें कीं, त्यानें खऱ्या वास्तव म्हणून घेतलेल्या सर्व रचना म्हणजे स्वतःची आंतरिक कामगिरी आहे, त्यांना खरी वास्तवता मुळींच नाहीं; त्यांच्या पोटीं सत्य वस्तु आहे असेंहि नाही. त्याचा निष्कर्ष असा होतो कीं, सत्य हें या अस्तित्वाच्या पलीकडे आहे, तें एकमेव अद्वितीय असें आहे, तें कुणी केलेलें, बनविलेलें असें नाहीं, असें असूं शकत नाहीं, तें सर्वातीत, सर्वनिरपेक्ष, सार्वकालिक, कालातीत असें आहे; जें जें म्हणून सापेक्ष आहे, परावलंबी आहे, कालाश्रित आहे, तें स्वप्न आहे, आभास आहे, वातांतील दर्शन आहे, महान् विश्वभ्रम आहे, अस्तित्वाचें खरें स्वरूप नसून दर्शनी अस्तित्वाचें फसवें चित्र आहे. अस्तित्वासंबंधानें, विश्वासंबंधानें याप्रमाणें अस्ति - तत्त्वाचा पराजय होऊन, नास्ति - तत्त्वाचा विजय होतो आणि हें नास्तिक्य सर्वच्या सर्व गोष्टींना व घटनांना निरपवादपणें, अनिवार्यपणें व्यापून टाकतें. विश्वाचें सत्यत्व नाकारणारे धर्म आणि दर्शनें या नास्तिक्यांतून निर्माण झालीं आहेत; या नास्तिक्यांतून जीवनविषयक आसक्ति ही जीवनविषयक विरक्ति बनून, या विश्वाखेरीज इतरत्र कोठें निर्दोष आणि नित्य जीवन लाभेल कां, या शोधांत ती गढून जाते किंवा अचल, अक्रिय, सद्‌वस्तूचे ठिकाणीं विलीन होण्याच्या इच्छेंत तिचें परिवर्तन होतें; अथवा मूळ असत्, शून्य हेंच मूळ सत्य आहे असें मान्य करून, त्या शून्यांत विलीन होण्याच्या आसक्तींत जीवनासक्तीचें परिवर्तन होतें. भारतांत बुद्ध आणि शंकर हे त्याच्या (भारताच्या) सर्वश्रेष्ठ विचारवंतांपैकीं दोघेजण, विश्वमिथ्यात्व प्रतिपादणाऱ्या तत्त्वज्ञानाचे प्रणेते आहेत : त्यांची मांडणी असामान्य महत्त्वाची आणि प्रभावाची आहे. बुद्ध आणि शंकर यांच्या दरम्यानच्या कालखंडांत व शंकरांनंतरहि अनेक बरेच महत्त्वाचे तत्त्वज्ञानविषयक पंथ निर्माण झाले; यांपैकीं कांहीं पंथांना पुष्कळ अनुयायी मिळाले; विचाराची बारकाई या पंथांत भरपूर आहे; प्रतिभाशाली आध्यात्मिक दृष्टीच्या विचारवंतांनीं हे पंथ निर्माण केले आहेत; बुद्ध आणि शंकर यांच्या सिद्धांतांची चिकित्सा व विरोध या पंथांतील विचारवंतांनीं बऱ्याच यशस्वीपणें केला आहे, तथापि बुद्ध आणि शंकर यांच्या प्रतिपादनांतील प्रभावीपणा त्यांना साधलेला नाहीं, त्यांच्या व्यक्तित्वांत बुद्ध आणि शंकर यांच्या व्यक्तित्वाइतकें अलौकिक सामर्थ्य अनुभवास येत नाहीं आणि प्रतिपादनांतील व व्यक्तित्वांतील

पान क्र. २२१

 

या उणेपणामुळें त्यांचा परिणाम बुद्ध आणि शंकर यांच्या इतका व्यापक आणि भक्कम असा सामान्य जनतेवर झाला नाहीं. भारताच्या तत्त्वचिंतक मनाची ऐतिहासिक प्रक्रिया पाहतां, बुद्धानें जें तत्त्वज्ञान प्रतिपादिलें तें शंकरानें घेतलें, पूर्ण केलें आणि या रीतीनें जनमनांत बुद्धाची जागा शंकरानें घेतली. बुद्ध आणि शंकर यांच्या आध्यात्मिक तत्त्वज्ञानांची, त्या तत्त्वज्ञानांतील सारभूत भागाची पकड भारतीय विचारावर, धर्मावर, सर्वसामान्य जनमनावर फार पक्की आणि अतिशय जोराची अशी आहे; बौद्ध आणि शांकर तत्त्वसाराची प्रचंड छाया सर्वत्र पसरलेली आढळते : कर्माची शृंखला, पुनर्जन्माचें चक्र आणि त्यांतून सुटका व माया -- या तीन महान् सूत्रमय उद्‌घोषांची छाप भारतीय जनमनावर, भारतीय धर्मावर व विचारावर सर्वत्र आढळते; म्हणून विश्वाचें अस्तित्व नाकारणारी जी विचारसरणी आहे, त्या विचारसरणीमागें जी कल्पना आहे किंवा जें सत्य आहे त्याकडे पुन: नजर टाकणें आवश्यक झालें आहे. विश्वमिथ्यात्व प्रतिपादणाऱ्या विचारसरणीचा संक्षेपानें कां होईना पण पुनर्विचार करणें योग्य आहे, निकडीचें आहे. या विचारसरणींत जें मुख्य सिद्धान्त व ज्या प्रमुख सूचना असतील त्यांचें मूल्यमापन करणें अवश्य आहे; या सिद्धांतांना, सूचनांना कोणत्या सत्याचा आधार आहे, आमच्या बुद्धीला किंवा अनुभवाला हे सिद्धान्त, या सूचना कितपत आवश्यक, अपरिहार्य वाटतात तें निदान संक्षेपानें तपासणें अवश्य आहे. सध्यां महान् विश्वभ्रमाची, मायेची जी कल्पना आहे, त्या कल्पनेचे अंगभूत किंवा निकटवर्ती जे प्रमुख विचार आहेत, त्यांजकडे नजर देणें आणि त्याबरोबर आमची जी विचारसरणी व दृष्टि आहे त्या दृष्टीला व विचारसरणीला धरून जे विचार आहेत, त्यांजकडेहि नजर देणें आणि या दोन्ही विचारपंथांना समोरासमोर ठेवून तारतम्यानें त्यांचें मूल्यमापन करणें, एवढी तपासणी पुरेशी होईल : मूळ सद्‌वस्तु आहे आणि ती एकमेवाद्वितीय आहे येथूनच दोन्ही विचारपंथ विचाराला आरंभ करतात; पण एक विचारसरणी 'सर्व माया आहे' या निर्णयाला येते, दुसरी 'सर्व सत्य आहे' या निर्णयाला येते; एकमेवाद्वितीय सद्‌वस्तु विश्वातीत आहे आणि त्या सद्‌वस्तूच्या आधारानें सर्वस्वी मिथ्या किंवा सत्य-मिथ्या असें विश्व उभें आहे असें प्रतिपादन एक विचारसरणी करते; तर दुसरी विचारसरणी, मूळ सद्‌वस्तु विश्वातीत आणि त्याबरोबर विश्वरूप, विश्वव्यापी आहे आणि तिच्या आधारानें हें जें विश्व

पान क्र. २२२

 

उभें आहे तें तिच्या इतकेंच सत्य आहे, असें प्रतिपादन करते. प्राणमय पुरुषाला, प्राणाश्रित वासनामय मनाला नको हें जीवन असा उबग येतो, परंतु हा उबग येतो एवढ्याच कारणासाठीं तो योग्य आहे, निर्णायक आहे आणि या उबगाखेरीज दुसरें कोणतेंहि कारण नसतां जीवन हें त्याज्य ठरविण्यासारखें आहे, असें मात्र म्हणतां येत नाहीं. प्राणाश्रित वासनामय मनाची, पुरुषाची निराशा त्याला जाचक होते आणि पुढें कसलीहि आशा न दिसल्यानें तो अगदीं निरुत्साही होतो, हें सर्वात बलिष्ठ असें कारण, त्या पुरुषाला जीवन नकोसें होण्याच्या मुळाशीं असतें. उलटपक्षीं, ध्येयवादी कल्पनामय पुरुष, सारखी आशा करीत असतो, त्याची श्रद्धा अतूट असते, ध्येयसिद्धीचा, कल्पनासिद्धीचा त्याचा संकल्प अभंग असतो. परंतु जशी एकाची निराशा, तशीच दुसऱ्याची आशा. निराशा निर्णायक नाहीं, आशाहि निर्णायक नाहीं, जीवनाची त्याज्यता एकाच्या निराशेनें सिद्ध होत नाहीं, जीवनाची ग्राह्यता दुसऱ्याच्या आशेनें सिद्ध होत नाहीं; तथापि वासनामय प्राणाश्रित मनाला जी निराशा ग्रासते, त्या निराशेला विचारधर्मी मन जो पाठिंबा देते त्या पाठिंब्याला, अगदींच अयोग्य, निराधार असें म्हणतां येत नाहीं -- विचारधर्मी मनाच्या निराशामय विचाराला थोड्याबहुत प्रमाणांत न्याय्य म्हणतां येतें : कारण या मनापुढें अनेक निराशजनक दृश्यें असतात : मानवी प्रयत्न, पृथ्वीवर मानव करीत असलेली खटपट त्याला भ्रममूलक अपयशी दिसते, मानवाचा राजकीय, सामाजिक आदर्शवाद, पूर्णतेसाठीं केला जाणारा मानवी प्रयत्न, मानवाचा मानवतावाद आणि सेवावाद, त्याचा कर्मवाद, कीर्ति - सत्ता - यशविषयक मानवी धडपड, धडपडीनें मिळविलेली कोणतीहि सिद्धि -- सर्व कांहीं भ्रामक, आभासमय, शेवटीं अपयशी आहे असें दृश्य विचारधर्मी मनाला दिसत असतें म्हणून तें स्वाभाविकपणें वासनामय प्राणाश्रित मनाच्या निराशावादाला जोराचा पाठिंबा देतें. मानवी राजकीय, सामाजिक प्रयत्न हे चक्रांत फेरे घेत राहतात, त्यांना कोणतेंच साध्य ठामपणें साधतां येत नाहीं; माणसाचा स्वभाव आणि जीवनमार्ग नेहमीं तसाच राहतो, नेहमीं अपूर्ण राहतो; कायदे, संस्था, शिक्षण, तत्त्वज्ञान, नीति, धर्मांतील शिकवणी या कशानेंहि, एकहि पूर्ण मानव तयार झालेला नाहीं; पूर्ण मानवजातीची गोष्ट अर्थात् दूरच राहिली आहे; कांहीं करा, कुत्र्याचें शेंपूट वांकडे तें वांकडेंच राहणार, अशी म्हण आहे ती मानवाच्या बाबतींत यथार्थ ठरली आहे.

पान क्र. २२३

 

परहितवाद, मानवतावाद, सेवा, ख्रिस्तोपदिष्ट प्रेम, बुद्धोपदिष्ट दया  -- कशानेंहि या जगांत कालच्यापेक्षां आज किंचितहि अधिक सुख आलेलें नाहीं; या सर्व दयादि भावना, कोठें कोठें थोडासा क्षणिक आराम देऊं शकतात, देतात, इतकेंच; जगांत दुःखाची मोठी आग भडकलेली आहे, त्या आगीवर थोडेसे पाण्याचे थेंब शिंपडावे तसें या दयादि भावनांचें कार्य आहे. कोणतेहि हेतू मनांत धरून त्यासाठीं मानवानें खटपट केली, तरी शेवटीं ते हेतू व्यर्थ ठरतात, ती खटपट अल्पकाळ उपयुक्त वाटते, पण शेवटीं ती निरुपयोगी व असमाधानकारक ठरते. मानवी कार्यें पहावीं, तर इतके श्रम व यशापयश वांट्यास येऊन शेवटीं त्यांतून कांहींहि निश्चित साध्य, सिद्ध होत नाहीं असें दिसतें; मानवाच्या जीवनांत कांहीं बदल घडतात, पण हे बदल जीवनाच्या बाह्य रूपांत घडतात आणि हे बदलहि एकामागें एक चक्रांत भ्रमन्ति करीत शेवटीं आपलें व्यर्थत्व सिद्ध करतात; कारण जीवनाचा सारभूत भाग, जीवनाची सर्वसामान्य घडण, सदाकदा सारखीच राहते, सारखीच राहिलेली आहे, राहत आलेली आहे. मानवी विश्वाच्या या वर्णनांत, या दर्शनांत अतिशयोक्ति असेल पण त्यांत परिणामकारकता आहे यांत संदेह नाहीं; मानवाच्या कित्येक शतकांचा अनुभव या दर्शनांत वर्णिल्यासारखाच आहे, आणि हें दर्शन व वर्णन फार अर्थपूर्ण आहे, महत्त्वपूर्ण आहे; मनावर याचा केव्हां केव्हां फार परिणाम होतो; त्यांतील प्रत्येक गोष्ट स्वयंसिद्ध गोष्टीच्या रुबाबानें मनाला हतबुद्ध करते, त्याजवर ताबा मिळविते, आणि पृथ्वीवरील अस्तित्वाचे जे मूलभूत नियम आहेत, जीं मूलभूत मूल्यें आहेत, तीं मूल्यें व ते नियम जर न बदलणारे असतील आणि जर पृथ्वीवरील अस्तित्व, जीवन सारखें चक्राकार लहान मोठे फेरे घालण्यांतच खर्च होणारें असेल (आणि असे तें आहे अशी कल्पना पुष्कळ काळापासून प्रभावी आहे) तर आतांच जी दृष्टि वर्णन केली ती यथार्थ आहे असें म्हणावें लागेल, तिच्यांतून सुटका होणें बहुधा शक्य होणार नाहीं. कारण अपूर्णता किंवा दोषमयता, अज्ञान, निराशा, दुःख आणि यातना या गोष्टी प्रस्तुत विश्व-व्यवस्थेच्या अंगभूत गोष्टींपैकीं प्रधान गोष्टी आहेत; ज्ञान, सुख, यश, पूर्णता किंवा निर्दोषता या वरच्या उलट असणाऱ्या गोष्टी, कोठें दिसल्या तर त्या नेहमीं फसव्या, तात्कालिक स्वरूपाच्या असतात असा अनुभव आहे; वरील याद्यांतील अन्योन्य

पान क्र. २२४

 

विरोधी गोष्टी विश्वजीवनांत अगदीं सर्वस्वीं मिसळलेल्या सांपडतात. ज्ञान-अज्ञान, यश-अपयश, सदोषता-निर्दोषता असें मिश्रण सर्व जीवनांत आढळून येतें; या अन्योन्यविरोधी गोष्टी एकमेकींपासून वेगळ्या काढतांच येत नाहींत; तेव्हां ही जीवनावस्था जर गतिमान् नसेल, अधिक उच्चतर अशा जीवनाकडे जर आजच्या जीवनाची गति नसेल, जर विश्वव्यवस्था याच स्वरूपाची नेहमीं राहणार असेल, तर असा सिद्धांत करणें अटळ होईल कीं, अचेतन शक्तीनें ही सर्व विश्वव्यवस्था निर्माण केली आहे आणि म्हणून जाणीव जी प्रकट झाली आहे ती कोणत्याहि उच्च स्थानाला गांठण्यास असमर्थ आहे; किंवा या सिद्धांताऐवजीं दुसरा असा सिद्धांत करावा लागेल कीं, हें विश्व एक ''दिव्य'' आहे आणि येथें जीवांना यश मिळावें हा, विश्व निर्माण करणाराचा हेतूच नाहीं; या विश्वाच्या पलीकडील लोकांत जीवाला या विश्वाच्या दिव्यांतून गेल्याबद्दल काय फळ मिळावयाचें तें मिळणार आहे -- हे दोनहि सिद्धांत टाकून तिसरा असाहि सिद्धांत निघूं शकतो कीं, हें विश्व हा एक महान् भ्रमाचा, आभासाचा डोलारा, मायेचा पसारा आहे, या पसाऱ्याच्या मागें पुढें कसलाहि हेतु नाहीं, कसलेंहि प्रयोजन नाहीं. विश्वव्यवस्था आहे तशीच कायमची राहणार असेल, तर या तीन सिद्धांतांपैकीं कोणता तरी एक सिद्धांत आम्हांला अटळपणें मान्य करावा लागेल.

या तीन सिद्धांतांपैकीं दुसरा सिद्धांत, आमच्यापुढें मांडला जातो त्या स्वरूपांत, तत्त्वविचारी बुद्धीला विचारार्ह वाटण्यासारखा नाहीं -- हें विश्व आणि परलोक यांचा संबंध या सिद्धांतांत नीट समाधानकारक रीतीनें स्पष्ट केलेला नाहीं, त्या संबंधाची अनिवार्यता दाखविलेली नाहीं, विश्व 'दिव्य' आणि या 'दिव्यांत', विश्वजीवनांत येणारे अपयश, या गोष्टींचा संबंध अनिवार्य कसा, यांतील मूलभूत हेतु काय, अर्थ काय तें या सिद्धांतांत स्पष्ट नाहीं; निर्माणकर्त्या ईश्वराची लहर, हें एक स्पष्टीकरण देतां येईल; पण तें कांही खरें बुद्धीला पटण्यासारखें स्पष्टीकरण नव्हे. विश्वरूपी अज्ञानाच्या क्षेत्रांत उतरण्याचें साहस अमर आत्म्यांनीं स्वत:च्या पसंतीनें केलें आहे; हें साहस करण्यापूर्वीं अज्ञानाच्या क्षेत्राची इत्यंभूत माहिती, अज्ञानाच्या स्वरूपाची माहिती मिळविण्याची सवड त्यांना दिली होती, ही सवड त्यांजवर लादली होती; आणि या सवडीचा फायदा घेऊन अज्ञानाच्या स्वरूपाची माहिती मिळविल्यानंतर त्यांना अज्ञानक्षेत्रांत जाण्याचें रद्द करतां आलें असतें; तरी तसें न

पान क्र. २२५

 

करतां त्यांनीं या क्षेत्रांत उतरण्याचें साहस स्वखुशीनें केलें, असा भाग या दुसऱ्या सिद्धांतांत असता, तर बुद्धीनें विचार करण्यासारखा हा सिद्धान्त झाला असता. तथापि हें अज्ञानाचें विश्वक्षेत्र अतिशय मोठें आहे, अतिशय संकीर्ण आहे आणि त्यांत पुन: तें कायम टिकणारें शाश्वत स्वरूपाचें आहे; असें हें महान्, शाश्वत, अज्ञानयुक्त विश्व या अमर आत्म्यांचें केवळ तात्पुरतें निवासस्थान म्हणून निर्माण केलें, ही कल्पना बुद्धीला पटण्यासारखी नाहीं; अशा या महान् विश्वाच्या निर्मितीपाठीमागें, निर्मितीचा हेतु वरीलपेक्षां पुष्कळच उदात्त असला पाहिजे. अमर आत्मा येथें स्वखुशीनें येतो इतका भाग ठीक आहे, पण येथें केवळ ''दिव्य'' भोगण्याचें कर्म त्याजकडे आहे -- येथें त्याची प्रगति होत नाहीं इत्यादि भाग अश्रद्धेय आहे. हें विश्व अमर आत्म्याच्या प्रगतीसाठीं आहे असें मान्य करणें भाग आहे : येथें दिव्य सत्याची, दिव्य शक्यतेची अभिव्यक्ति होत आहे, या अभिव्यक्तीच्या विशिष्ट अवस्थेंत अज्ञान हा एक आवश्यक प्राथमिक घटक असतो, हें अज्ञान अनिवार्यपणें ज्ञानाच्या दिशेनें वाटचाल करीत असतें; अपूर्णता ही पूर्णतेच्या दिशेनें, निराशाजनक अपयश हें यशाच्या दिशेनें, दु:ख व यातना या अस्तित्वाच्या दिव्य आनंदाच्या दिशेनें वाटचाल करीत असतात; आणि याप्रमाणें अज्ञान ही एक मधली अवस्था लक्षांत घेऊन विश्वाची व्यवस्था आत्म्याच्या प्रगतिसाठीं आहे, हें ठरल्यावर निराशा, निरुत्साह, विश्व-भ्रमाची कल्पना, सर्व व्यर्थ असल्याची कल्पना, अकारण व अयोग्य आहेत हें मान्य करावें लागतें; अवघड विकासपंथांतील स्वाभाविक गोष्टी या अयोग्य भावनांच्या मुळाशीं असतात; या स्वाभाविक गोष्टी म्हणजे विकासक्रमांतील झगडा आणि परिश्रम, यश आणि अपयश, दु:ख आणि सुख, ज्ञान-अज्ञान-मिश्रण वगैरे होत : या गोष्टी अमर आत्म्याच्या आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या अनुभवासाठीं आहेत. आत्मा, मन, प्राण, शरीर सर्वांनाच, हा अनुभव स्वत:च्या वाढीसाठीं उपयोगी पडतो -- त्यांच्या ठिकाणीं पूर्ण प्रकाश उजळेपर्यंत त्याची वाढ होत राहते. अर्थात् अमर आत्मा, अचेतनांतून निघून प्राणादि साधनांच्या साह्यानें शेवटीं पूर्ण प्रकाशाचा धनी होत असतो. अशा स्थितींत अचेतनाचें विश्वकर्तृत्व, लहरी ईश्वराचें विश्वकर्तृत्व किंवा विश्व हा महान् भ्रम आहे, माया आहे हें म्हणणें, अमान्य करावें लागतें.

प्राणमय विचारमय मनाची निराशा वगैरे जो, विश्व ही माया

पान क्र. २२६

 

आहे, या कल्पनेचा आधार असतो तो पक्का नसतो हें आतांपर्यंतच्या विवेचनावरून ठरलें; पण या विश्वभ्रम-कल्पनेला श्रेष्ठ मनाचा आणि आत्म्याचा आधारहि दिला जातो. हा आधार दुसऱ्या आधाराहून अधिक पक्का, अवश्य भासतो व असतो. विश्व हें स्वभावतःच भ्रम आहे, माया आहे असा श्रेष्ठ मनाचा, आत्म्याचा दावा आहे; माया आणि भ्रम असें आपण विश्वाला कां म्हणतो याची चिकित्सा, विश्वाला माया आणि भ्रम म्हणणें चुकीचें आहे असें शेवटीं आम्हांला मान्य करावयास लावते असें आपण आतांपर्यंत पाहिलें; विश्वाला माया मानण्याची आतांपर्यंत सांगितलीं गेलेलीं कारणें टिकाऊ नाहींत असा आमच्या चिकित्सेनें निर्णय दिला; पण विश्वाला माया मानण्याचें आतां जें कारण सांगितलें जात आहे तें वेगळें आहे : सद्‌वस्तु, मूळवस्तु, सत्य एकच एक आहे आणि तें सत्य विश्वातीत सद्‌वस्तु होय; याप्रमाणें विश्व वेगळें आणि सत्य वेगळें, अशी भूमिका घेतली म्हणजे विश्वांत जरी दिव्य पूर्णता आली, आमचें विश्वांतील जीवन उच्च होऊन जरी तें देव-जीवन झालें, तरी हें पूर्ण देवजीवन विश्वमायेचा उज्ज्वल भाग म्हणतां येईल, त्याला सत्याची प्रतिष्ठा येणार नाहीं; कारण सत्य हें विश्वातीत वस्तु आहे, आणि त्याशिवाय जें कांहीं, तें मिथ्या, मायारूप, भ्रमरूप आहे, अशी भूमिका आपण घेतली आहे. ही भूमिका न घेतां असें म्हणतां येईल कीं, विश्व सत्य आहे पण हें सत्य विश्वातीत सत्याहून कमी दर्जाचें आहे आणि म्हणून ब्रह्म (विश्वातीत वस्तु) हें एकच खरें सत्य आहे हा साक्षात्कार आत्म्याला झाला म्हणजे विश्वाचें सत्यत्व आपोआप नाहींसें होतें. मग दिव्य तत्त्वाचें प्रकटीकरण, जडामध्यें आत्म्याचा विजय, आत्म्याची अस्तित्वावरची सत्ता, निसर्गांत दिव्य जीवन या सर्व गोष्टी असत्य वर्गांत पडतात, निदान ब्रह्म या एकच एक सत्यावर थोडा वेळ लादलेल्या, निर्भेळ सत्य नसलेल्या गोष्टी, या सदरांत त्या पडतात. या विवेचनांत, मनाची सत्याची कल्पना काय आहे, मनोमय पुरुषाचा सत्याचा अनुभव काय आहे -- ती कल्पना, तो अनुभव कितपत न्याय्य आहे, अनिवार्य आहे यावर सर्व अवलंबून राहतें; आध्यात्मिक अनुभव हा या 'ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या' कल्पनेचा आधार म्हणून दिला जात असेल, तर हा अनुभव निरपवादपणें अंतिम आहे काय ? हा एकच अनुभव आत्म्याला अनिवार्यपणें अंतिम असतो काय ? असे प्रश्न विचारतां येतात.

विश्वभ्रम या कल्पनेची आणखी एक मांडणी अशी आहे कीं, विश्व

पान क्र. २२७

 

हें आंतरिक असत्य अनुभवाच्या स्वरूपाचें आहे. या अनुभवांत आकार, घटना चित्ररूपानें प्रत्ययास येतात, वस्तुजाताची शाश्वत सुषुप्ति या चित्रमय अनुभवाला कारण होते; स्वप्नजाणिवेंत, विशुद्ध विशेषशून्य आत्मज्ञ अस्तित्वाच्या स्वप्नजाणिवेंत, थोडा वेळ विश्वरूप चित्रसंघ अनुभवास येतो, अनन्ताच्या स्वप्नदशेंत अनन्ताला विश्वाचें स्वप्न पडतें अशी एक विश्वभ्रमाची मांडणी आहे. मायावादी दर्शनांत (मायावादी दर्शनें अनेक आहेत, त्यांचा पाया एक परंतु तपशिलाच्या गोष्टी भिन्न भिन्न आहेत.) विश्वाला स्वप्नाची उपमा दिली जाते, पण विश्वमाया म्हणजे स्वप्न आहे असें म्हटलें जात नाहीं. आमचें वस्तुनिष्ठ भौतिक मन हें मान्य करूं शकत नाहीं, हें मान्य करणें त्याला फार जड जातें कीं, आम्ही, आमचें जीवन आणि जग या गोष्टी खरोखरी अस्तित्वांत नाहींत, आमच्या जाणिवेमुळें या खोट्या गोष्टी खऱ्या म्हणून वाटतात. हें समजावून सांगण्यासाठीं स्वप्न आणि आभास यांचें उदाहरण दिलें जातें; स्वप्नांतल्या गोष्टी स्वप्नांत आपण आहों तोंपर्यंत खऱ्या वाटतात, त्याप्रमाणें विश्वांत आम्ही असतों तोंपर्यंत विश्वाचा अनुभव आम्हांला खरा वाटतो; पण आम्ही विश्वापासून अलग होऊन त्याजकडे पाहिलें, म्हणजे त्याचें खोटेंपण आम्हांला पटतें. स्वप्नासारखें, स्वप्नांतील दृश्यासारखें हें विश्वाचें दृश्य आहे असें सांगण्यांत येत असतें म्हणून स्वप्नांतील दृश्याचा आणि विश्वदृश्याचा पाया एकच आहे कां, सारखा आहे कां, हें बारकाईनें पाहणें उपयुक्त होईल. विश्व हें मनाचें स्वप्न आहे, आत्म्याचें स्वप्न आहे, अनंताचें स्वप्न आहे -- असेंहि भिन्न प्रकारें, स्वप्न म्हणून विश्वाचें वर्णन कोठें कोठें करण्यांत येत असतें आणि या सर्व प्रकारच्या वर्णनाचा मानवी भावनेवर व विचारावर परिणाम होऊन, विश्व हें माया आहे, या मानवी कल्पनेला मानवी मनाचा ताबा घेण्यास फार मदत होते. ही स्वप्नाची कल्पना आम्हीं तपासावयास हवी : विश्व हें स्वप्न नव्हे असें ठरलें, तर ही स्वप्नाची कल्पना विश्वाला कां लावतां येत नाहीं तीं कारणें देऊन, तिला एकदम बाजूला करणें योग्य होईल. ही जर अंशत: कां होईना बरोबर असेल, तर ती काय आहे व ती कोठवर बरोबर आहे तें पाहिलें पाहिजे; तसेंच विश्व हा भ्रम आहे, परंतु तो स्वप्नभ्रम नव्हे असें ठरलें तर विश्वाच्या भ्रमाचें स्वरूप काय, स्वप्नभ्रमापासून तो कसा निराळा आहे हें आपल्याला स्पष्ट केलें पाहिजे.

पान क्र. २२८

 

स्वप्न मिथ्या कां वाटतें ? स्वप्न मिथ्या वाटतें याचें पहिलें कारण, आम्ही आमच्या जाणिवेच्या स्वाभाविक स्थितींत, जागृतीत आलों, म्हणजे आमच्या जाणिवेच्या स्वप्नदशेंत आम्हीं अनुभवलेलें दृश्य नाहीसें होतें आणि अर्थशून्यहि होतें. पण स्वप्नदृश्य मिथ्या म्हणण्यास हें कारण पुरेसें होऊं शकत नाहीं; जाणिवेच्या अनेक भिन्न अवस्था असूं शकतील आणि प्रत्येक अवस्थेंतील दृश्यें त्या अवस्थेपुरतीं सत्य असतील : एक अवस्था संपली, तिच्यांतील दृश्यें विसरलीं गेलीं किंवा स्मरणांत आणल्यावर दुसऱ्या अवस्थेंत तीं मिथ्या वाटूं लागली, तरी संपलेल्या अवस्थेंत तीं सत्य नव्हतीं असें म्हणतां येत नाहीं; नवी दुसरी जाणिवेची अवस्था मात्र सत्य आणि संपलेली पूर्वींची अवस्था असत्य, असेंहि म्हणतां येत नाहीं. पृथ्वीवरील दृश्यें दुसऱ्या जगांत किंवा दुसऱ्या जाणीवभूमिकेवर जाणाऱ्या जीवाला खोटीं भासली, तरी तीं येथें खोटी नसतात; हें जसें, तसें आध्यात्मिक शांतीच्या किंवा निर्वाणाच्या एखाद्या अवस्थेच्या प्रांतांत आम्ही गेलों, म्हणजे या जगाचें अस्तित्व आम्हांला मिथ्या भासतें म्हणून तें प्रथमपासून मिथ्याच होतें व आहे असें होत नाहीं. विश्वांत राहणाऱ्या जाणिवेला विश्व हें सत्य असतें; निर्वाणांत विलीन झालेल्या जाणिवेला शुद्ध निरुपाधिक अस्तित्व सत्य असतें -- एवढेंच काय तें वरच्या अनुभवांनीं सिद्ध होतें. तेव्हां स्वप्न हें मिथ्या असल्याचें ठरविण्याकरितां दिलेलें पहिलें कारण पुरेसें नाहीं. दुसरें कारण असें आहे कीं, स्वप्न थोडा वेळ टिकतें आणि त्याला शेंडा बुडखा नसतो -- त्याला कारणरूप पूर्वघटना, कार्यरूप उत्तरघटना नसतात; त्याच्या घटकांतहि सुसंगति नसते. आमच्या जागृत जाणिवेला समजेल असा कांहीं अर्थ त्याच्यांत सांपडत नाहीं. जागृतीतील आमचें जीवन सुसंगत असतें, झोंपेपूर्वींच्या जागृतींतील घटना, झोंपेनंतरच्या जागृतींतील घटनांशीं सुसंगतपणें जोडल्या जातात, त्याप्रमाणें प्रत्येक रात्रींची झोंप पूर्वींच्या रात्रींच्या झोंपेशीं स्वप्न-घटनांच्या सुसंगत क्रमानें जोडली गेली, तर आमच्या स्वप्नासंबंधानें आमचें मन आजच्याहून वेगळा विचार करील -- तीं त्याला वेगळ्या स्वरूपाचीं दिसतील. तेव्हां आमचें जागृतींतील जीवन आणि स्वप्न यांत सादृश्य नाहीं, त्यांचें स्वरूप वेगळें वेगळें, त्यांच्यांतील व्यवस्था वेगळी वेगळी, त्यांच्यांतील अनुभवांची सत्यता वेगळी वेगळी अशी स्थिति आहे. आमचें जीवन अल्पकाळ टिकणारें आहे आणि एकंदरींत त्यांतील घटनांत विशेष आंतरिक

पान क्र. २२९

 

सुसंगति आणि हेतुयुक्तता नसते अशी तक्रार करण्यांत येते; पण त्याच्यांतील हेतुयुक्ततेची अपूर्णता आमच्या बुद्धीच्या समजशक्तीच्या अपूर्णतेनें, मर्यादिततेनें उत्पन्न झाली असेल; आम्ही आमच्या अंतरंगांत जातों व तेथून आमच्या जीवनावर दृष्टि टाकतों तेव्हां आमच्या जीवनांत हेतुयुक्तता पूर्णतेनें आहे, जीवनाच्या सर्व घटना सुसंबद्धपणें जोडल्या गेल्या आहेत असें आपल्याला दिसतें; बाह्य जीवनामध्यें विसंगति दिसत नाहीं. त्यांतील घटना एकींतून दुसरी याप्रकारें पक्क्या कार्यकारणभावाला धरून निघते असें दिसतें; ही क्रमवारी आणि संगति जीवनांत नसतांना आमच्या मनानें ती निर्मिली आहे; अर्थात् ती एक भ्रमरूप गोष्ट आहे, वस्तुस्थिति नाहीं असें कल्पिलें, तरी स्वप्नाचा आणि जागृतीचा वेगळेपणा असिद्ध होत नाहीं. कारण स्वप्नांतील घटनांत, द्रष्ट्या आंतरिक जाणिवेनें निर्माण केली जाणारी संगति असत नाहीं; जी कांहीं घटनांची क्रमवारी तेथें भासते, ती जागृतींतल्या संबंधाची अस्पष्ट अयथार्थ नक्कल असते, तींत जाणीव असत नाहीं, निर्दोषता असत नाहीं, ती मोडकी तोडकी असते आणि पुष्कळदां तिचा अभावहि असतो. शिवाय जागृतींत जाणीव ही परिस्थितीवर थोडाबहुत ताबा ठेवते, तिचें नियंत्रण करते; स्वप्नांत हें नियंत्रण, हा ताबा शून्य असतो; तेथें मनुष्याच्या विकसित मनाची संघटनशक्ति आणि संकल्पशक्ति मुळींच प्रत्ययास येत नाहीं, तर निसर्गांत जसें नेणिवेचें यांत्रिक रचनाकार्य होत असतें, तसेंच तें स्वप्नांत होत असतें. अल्पकाळ टिकणें हा स्वप्नाचा मूलभूत विशेष आहे, एका स्वप्नाचा दुसऱ्या स्वप्नाशीं कांहीं संबंध असत नाहीं; जागृतींतील जीवन स्वप्नासारखें अल्पकालिक नसतें -- त्यांतील तपशील स्वप्नासारखा अल्पकालिक असतो, पण एकंदर जीवन अखंड सार्वकालिक असतें; विश्वाच्या अनुभवाची सुसंगतियुक्त समग्रता अल्पकालिक आहे असा पुरावा नाहीं. आमचीं शरीरें मरतात पण विश्वानुभव घेणारे आत्मे, एका जन्मानंतर दुसरा जन्म, असे जन्म युगानुयुगें घेत असतात; ग्रह आणि तारे प्रकाशवर्षाचीं अनेक युगें टिकून नाहींसे होत असतील पण विश्व व विश्वाचें अस्तित्व हें असें केव्हांहि नाहींसें होणारें नाहीं, जसें तें अखंड आहे, तसें तें अनंत आहे असें मानावयास जागा आहे; अनंत शक्तीनें तें निर्मिलें आहे, अनंतशक्ति तें निर्मितें आणि या शक्तीला किंवा तिच्या क्रियेला आरंभ व अन्त आहे असा कांहींएक पुरावा नाहीं. स्वप्न-जीवन आणि जागृत-जीवन यांच्यामध्यें याप्रमाणें फारच अंतर

पान क्र. २३०

 

असल्यानें, अतिशय वेगळेपण असल्यानें, विश्व (जागृत जीवन) स्वप्नाप्रमाणें आहे असें म्हणण्यास जागा नाहीं.

आतां असा प्रश्न उपस्थित होऊं शकतो कीं, आमचीं स्वप्नें सर्वथा असत्य, सर्वथा अर्थशून्य असतात हें म्हणणें बरोबर आहे काय ? या प्रश्नाचा निर्णय लावण्याकरितां थोडक्यांत संक्षेपानें कां होईना, पण झोंपेच्या स्वरूपाची आणि स्वप्नाच्या पोटांतील दृश्यांच्या स्वरूपाची तपासणी आम्हीं करावयास हवी; तीं कोठून कशीं येतात हें पहावयास हवें. आम्हांला जेव्हां झोप येते, तेव्हां जागृतीच्या अनुभवांच्या क्षेत्रांतून आमची जाणीव मागें सरते; ही मागें सरलेली जाणीव विसांवा घेते असें आम्ही मानतों; तिची हालचाल बंद होते, ती कार्यशून्य होते असें आम्ही मानतों; पण ही कल्पना उथळ आहे, बाह्यापुरतीच बरोबर आहे. जागृतींत ज्या क्रिया जाणीव करीत असते, त्या स्थगित होतात, मनाच्या वरचा थर किंवा वरचें पृष्ठभागीय मन विसांवा घेत असतें; आमच्या अस्तित्वाचा जो शारीर भाग, त्याच्याकडून होणारें जाणीवयुक्त कार्य, तेंहि स्थगित होत असतें. आंतरिक जाणीव कांहीं निष्क्रिय होऊन बसत नाहीं, नव्या आंतरक्रिया ही जाणीव करूं लागतें; या क्रियांपैकीं कांहीं भाग आम्ही आठवूं शकतों; ज्या क्रिया आमच्या पृष्ठभागीय मनाच्या खालीं, जवळच्या भागांत होतात, त्या तेवढ्या आम्ही आठवूं शकतों. झोंपेंत याप्रमाणें पृष्ठभागाजवळ खालीं अर्धचेतन, अवचेतन असें आमचें अंधकारप्रधान अंग असतें, तेथें आमचें स्वप्नीय अनुभव घेऊन सांठविले जातात; स्वप्नीय अनुभव या अवचेतन भागांतून प्रवासहि करतात. हें अवचेतन स्थान स्वत: स्वप्नरचनाहि करीत असतें; या अंगाच्या खालीं, पाठीमागें, प्रच्छन्न तलवर्ति खोल आणि सघन असें मन पसरलेलें असतें; आमचें गुप्त आन्तर् अस्तित्व आणि जाणीव, सर्वच्या सर्व समग्रतेनें या प्रच्छन्न मनांत असतें. बाह्य जाणीवेहून आणि अवचेतनेहून ही आंतर प्रच्छन्न जाणीव अगदीं वेगळी, वेगळ्या वर्गांतील असते. शुद्ध अचेतनता आणि बाह्य चेतनता यांच्यामध्यें असलेली, अवचेतन जाणीव ही सामान्यत: वर सांगितलेल्या तिच्या पृष्ठभागीय थरांत, स्वत: बनविलेल्या रचना स्वप्नरूपानें धाडते, आणि बाह्य मनाजवळ, निकट, खालीं जो अवचेतनेचा भाग असतो तेथें आम्हांला या रचना स्वप्नरूपानें दिसतात. या स्वप्नीय रचना दर्शनीं क्रमशून्य आणि विसंगत अशा असतात; स्वप्नांतील क्षणिक रचना पुष्कळशा

पान क्र. २३१

 

आमच्या जीवनाच्या प्रस्तुत परिस्थितीवर उभारलेल्या असतात, या परिस्थितीच्या गोष्टी कशातरी कोणत्यातरी घेऊन, त्यांच्यांतून रचना करण्यांत आलेल्या असतात असें दिसतें. त्यांत कांहीं कल्पित गोष्टीहि विविधतेसाठीं मिसळलेल्या दिसतात; दुसऱ्या कांहीं रचना, पूर्वीच्या घटनांवर आधारलेल्या असतात; पूर्वींच्या विशिष्ट घटना व विशिष्ट व्यक्ती घेऊन, तेथून कांहीं क्षणिक रचना उभारण्यास या दुसऱ्या रचना-प्रकारांत आरंभ केलेला असतो. अवचेतनांतून निघणारीं कांहीं स्वप्नें सकृद्दर्शनी निव्वळ कल्पनारचित गोष्टींचीं असतात; पण जी नवी मनोविश्लेषण पद्धति निघाली आहे आणि जी स्वप्नांकडे नव्या वैज्ञानिक दृष्टीनें पाहण्याचा प्रयत्न करीत आहे ती, या केवळ दर्शनीं कल्पनारचित भासणाऱ्या स्वप्नांचाहि अर्थ लावूं लागली आहे; या स्वप्नांत ज्या गोष्टी घडतात त्यांचा, जागृतींतील जाणिवेनें विचार करून उपयोग करावयाचा असतो : स्वप्नांत येणाऱ्या अनुभवांचें स्वरूप आणि त्यांचें महत्त्व मनोविश्लेषणामुळें सर्वच बदलतें; स्वप्नांतील अनुभवाच्यामागें कांहींतरी सत्य वास्तव गोष्टी असतात आणि या गोष्टी व्यवहारत: बऱ्याच महत्त्वाच्या असतात असें मनोविश्लेषण-पद्धतीनें सिद्ध केल्यासारखें दिसतें.

आमचीं सर्व स्वप्नें अवचेतन जाणीव तयार करते असें नाहीं. आमचें जें आंतर गूढ अस्तित्व आहे त्याची, अचेतनाच्या प्रांताला लागून असलेली अगदीं शेवटची भूमि म्हणजे, अवचेतन भूमि होय. अचेतन धडपड करीत करीत या अवचेतन जाणिवेचें, अर्धचेतनेचें रूप घेतें. आमची पृष्ठभागची भौतिक जाणीव जेव्हां जागृतीच्या पातळीवरून खालीं उतरते आणि अचेतनाकडे मार्गक्रमण करते, तेव्हां ती या मधल्या अर्धजागृत अवचेतन भूमींत आपलें बिऱ्हाड लावते. अचेतनाच्या घराची एक बाहेरची खोली, असेंहि अवचेतनाचें वर्णन करतां येईल. या खोलींतून अचेतनांतील रचना जागृत जाणिवेकडे किंवा तलवर्ती जाणिवेकडे येतात. आम्ही झोंपतों तेव्हां आमचा भौतिक पृष्ठभागीय भाग, त्याचें मूळ जें अचेतन त्या अचेतनाकडे जातो, जातांना तो मध्यें अवचेतनांत प्रवेश करतो; येथें त्याला त्याच्या जुन्या संवयींचे, जुन्या अनुभवांचे संस्कार भेटतात; पृष्ठभागीय मनाच्या जुन्या सर्व संवयी आणि पुन: पुन: घडणारे अनुभव हे अवचेतनावर संस्कार करतात आणि या संस्कारांच्या द्वारां या संवयी आणि अनुभव पुन्हां जागृत मनावर आक्रमण करतात. या आक्रमणामुळें, बाजूला पडलेल्या जुन्या संवयी

पान क्र. २३२

 

जागृत मनाला आपल्या रीतीनें पुन्हां वागायला लावतात; ज्या प्रेरणा कांहीं काल कार्यकारी राहून नंतर सुप्त झाल्या होत्या किंवा दडपून निष्क्रिय केल्या गेल्या होत्या, स्वभावांतील ज्या गोष्टी त्याज्य म्हणून दूर केल्या गेल्या होत्या त्या प्रेरणा, त्या स्वभाव-प्रक्रिया अवचेतनांतून तेथील संस्कारांच्या द्वारां पुन्हां वर येतात आणि पुन्हां जागृत मनाला आपल्या रीतीनें वागायला लावतात; दडपलेल्या व त्यागिलेल्या प्रेरणा -- परंतु ज्या सर्वस्वी नाहींशा केलेल्या नाहींत अशा प्रेरणा ओळखतां न येण्यासारख्या परिणामांचें रूप घेऊनहि वर येतात. स्वप्नजाणिवेमध्यें या परिणामांचें जें आगमन होतें, तें दर्शनीं अगदीं काल्पनिक घटनांच्या रूपानें होतें; दडपून पुरून टाकलेले संस्कार हा या घटनांचा पाया असतो. जागृत जाणिवेला त्यांचा अर्थ कळत नाहीं, कारण अवचेतनाच्या प्रांतांत यांचा अर्थ कसा लावण्यांत येतो, तें जागृत जाणिवेला ठाऊक नसतें. कांहीं वेळ हें चित्रदर्शन केल्यानंतर अवचेतनाची हालचाल कमी कमी होऊन तें अचेतनाचें रूप घेतें; याच अवस्थेला गाढ स्वप्नरहित झोंप असें नांव आपण देतों. ही अवस्था संपते व आम्ही तेथून स्वप्नाच्या क्षेत्रांत किंवा जागृतीच्या पृष्ठभागांत प्रवेश करतो.

स्वप्नरहित झोंप म्हणून ज्या अवस्थेला आम्ही नांव देतों त्या अवस्थेंत, अवचेतनाच्या अधिक खोल, सघन अशा स्तरांत आम्ही प्रवेश करीत असतो; ही अवस्था फार गुंतागुंतीची, फार अंधकारमय, फार जड आणि सुस्त अशी असल्यानें तिच्या घडामोडी पृष्ठभागावर येणें अवघड व अशक्य असतें; तेथें आम्ही स्वप्न पाहत असतों, पण अवचेतनाच्या स्वप्न नमूद करून ठेवणाऱ्या स्तरांत तें नमूद करणें वा तें समजणें हें त्याच्या अति अस्पष्टतेमुळें कांहीं जमत नाहीं. असेंहि घडतें कीं, या स्वप्नरहित म्हटल्या जाणाऱ्या झोंपेंत, शरीर खरें झोंपेंत असतें आणि आंत मनाचा हालचाल करणारा भाग आमच्या अस्तित्वाच्या खोल भागांत म्हणजे तलवर्ती मनाच्या, प्राणाच्या, सूक्ष्म भौतिकाच्या भागांत शिरतो आणि मग त्याचें वरील पृष्ठभागीय मनाशीं, प्राणाशीं, भौतिकाशीं असलेलें सर्व क्रियाशील संबंध तुटतात. आम्ही या खोल भागाच्या जवळच्या विभागांत असतो तोंवर, जेथें झोपेंतील जागृति काम करते तो अवचेतनाचा वरचा भाग आमच्या अनुभवांची कांहींशी नोंद करूं शकतो. तथापि ही नोंद तेथील विशिष्ट लिपींत होत असते, पुष्कळशी विसंगति या नोंदींत सांपडते आणि नेहमी, विसंगति अगदीं कमी असेल

पान क्र. २३३

 

तेव्हांहि, हे अनुभव जागृतींतील अनुभवांच्या चित्रांचें रूप किंवा विकृत रूप घेत असतात. आम्ही खूप खोल गेलों असलों तर नोंद होऊं शकत नाहीं किंवा झाली तरी आम्हांला स्वप्न-जागृतींत ती मिळूं शकत नाहीं आणि मग आम्ही या स्थितीला स्वप्नशून्य झोंप म्हणतों; तथापि आंतरिक स्वप्नजाणीव ही अक्रिय अवचेतन पृष्ठभागाच्या पडद्यामागें काम करीतच असते; आम्हांला आंतर जाणिवेनें आजच्यापेक्षां अधिक काम करतां येऊं लागलें म्हणजे अवचेतनाच्या खोल जड स्तरांत आम्ही प्रवेश करूं शकतों आणि मग, ही पडद्यामागें काम करणारी ''स्वप्नशून्य झोंपेंतील'' स्वप्नक्रिया आम्हांला प्रतीत होऊं शकते; ही स्वप्नक्रिया होत असतां आम्हीं ती पाहूं शकतों किंवा स्मरणशक्तीच्या द्वारां  ''स्वप्नशून्य झोंपेंतील'' ही स्वप्नक्रिया आम्ही आठवूं शकतों. झोंप आम्हांला आमच्या अस्तित्वाच्या इतर भूमींवर नेऊं शकते, भौतिकाच्या वर असलेल्या अतिभौतिक विश्वांत नेऊं शकते, आणि आम्ही आमच्या तलवर्ती अस्तित्वांत जाणिवेचा वापर करूं लागण्याइतके प्रगत झालों म्हणजे, या अतिभौतिक विश्वांतील व आमच्या अस्तित्वाच्या उच्च भूमीवरील अनुभव आम्हांला झोंपेंत स्वप्नरूपानें घेतां येतात. अवचेतनापेक्षां तलवर्ती चेतना ही स्वप्नरचना करण्यांत अधिक कुशल आहे.

तलवर्ती जाणीव स्वप्नजाणिवेच्या क्षेत्रांत स्वप्नें निर्माण करूं लागली म्हणजे, त्या जाणिवेची बुद्धि त्या स्वप्नांत केव्हां केव्हां काम करतांना आढळते; स्वप्न हें विचारांची व्यवस्थित पंक्ति बनतें, हे विचार पुष्कळ वेळां चमत्कारपूर्ण रीतीनें, पुष्कळ वेळां स्पष्टपणें चित्रित केले जातात; आमच्या मनांत घोळणारे न सुटलेले प्रश्न या स्वप्नांत सुटतात; सामान्यत: विसंगत रचनेचीं स्वप्नेंच अवचेतन भूमींत आम्हांला दिसतात -- पण तलवर्ती जाणिवेंतून वर आलेलीं स्वप्नें सत्यकथा कथन करणारीं असतात : तीं भावी गोष्टींची सूचना देतात, लक्षणें सांगतात, सावधपणा सुचवितात; प्रतीकरचनाहि या स्वप्नांत येतात; यांपैकीं कांहींचें स्वरूप हें मानसिक (बौद्धिक), कांहींचे प्राणिक (वासनिक) असतें; बौद्धिक स्वरूपाचीं प्रतीकें अर्थ स्पष्ट रीतीनें दाखवितात, कांटेकोरपणें त्यांचें चित्रण केलेलें असतें; वासनिक (प्राणिक) प्रतीकें संकीर्ण गोंधळाचीं, आमच्या जागृत मनाला न उमगणारीं अशीं असतात; तरी पण या गोंधळाच्या स्वप्नांचा अर्थ लावून देणारा धागा सांपडला, तर या स्वप्नांतहि वस्तुत: गोंधळ नसून एक विशिष्ट सुसंगति आहे आणि मह-

पान क्र. २३४

 

त्त्वाचा अर्थ आहे असें आपणांस आढळून येतें; आमच्या अस्तित्वाच्या सामान्य पातळीहून वेगळ्या अशा ज्या पातळ्या आहेत, तसेंच विश्वपुरुषाच्या अस्तित्वाची जी व्यापक पातळी आहे त्या पातळ्यांत, आमचा प्रवेश झोंपेंत होऊं शकतो (तलवर्ती जाणिवेचा उपयोग आम्हांला करतां येऊं लागला म्हणजे झोपेंमध्यें या पातळ्यांत आमचा प्रवेश होऊं शकतो हें वर आलेंच आहे) आणि तेथें आम्हाला विविध अनुभव येतात -- हे अनुभवहि स्वप्नांच्या द्वारां आमच्या समोर येऊं शकतात. प्रतीकस्वप्नांप्रमाणें या स्वप्नांचा आमच्या आंतील बाहेरील जीवनांशीं, दुसऱ्यांच्याहि जीवनाशीं केव्हां केव्हां दाट, दृढ संबंध असतो, आमच्या व इतरांच्या मानसिक, प्राणिक, बौद्धिक, वासनिक अस्तित्वाचे व जीवनाचे घटकभूत गुणदोष या स्वप्नामध्यें आमच्या नजरेस आणले जातात, या जीवनावर कोणत्या गोष्टींचा प्रभाव पडत आहे तें या स्वप्नांत आमच्या नजरेस येतें : आमच्या जागृत जाणिवेला यांपैकीं कोणतीच गोष्ट अल्पांशानेंहि विदित असत नाहीं. तलवर्ती जाणिवेनें रचलेल्या कांहीं स्वप्नांत असा संबंध असत नाहीं, तर आमच्या भौतिक अस्तित्वाहून अगदीं स्वतंत्र अशा सुसंघटित ज्ञानभूमीवर घडणाऱ्या गोष्टींचें चित्र त्यांत उभें केलेलें असतें. आमच्या झोंपेंतील सामान्य अनुभवाचा मोठा भाग अवचेतनांतून निर्माण झालेल्या स्वप्नांचा असतो. आमच्या स्मृतींत सामान्यत: हींच स्वप्नें राहतात; केव्हां केव्हां मात्र तलवर्ती जाणिवेनें उभीं केलेलीं स्वप्नें इतकीं प्रबल असतात कीं, तीं आमच्या जागृतींतील जाणिवेला आठवूं शकतात. आम्ही आमचें आंतर अस्तित्व विकसित केलें, आंतलें जीवन जगूं लागलों -- सामान्यत: माणसें आंतलें जीवन जगत नाहींत किंवा फार अल्प अंशानें जगतात -- सामान्य माणसांहून अधिक प्रमाणांत अधिक दृढतेनें आम्ही आन्तर जीवन जगूं लागलों, म्हणजे अवचेतन-रचित स्वप्नें कमी होऊन तलवर्ती-जाणीवरचित स्वप्नें अधिक संख्येनें आम्हांला पाहावयास मिळतात, आमचा स्वप्नसंसार मोठा होतो; अवचेतनी स्वप्नांचे अर्धवट काल्पनिकत्व ज्यांत मुळींच नाहीं अशीं, खऱ्या वास्तव गोष्टी, सार्थ घटना दाखवणारीं तलवर्तीजाणिव-रचित स्वप्नें मोठ्या संख्येनें आमच्या स्वप्नसंसारांत दाखल होतात.

झोंपेमध्यें सर्वस्वीं जाणीवपूर्वक व्यवहार करणेंहि शक्य आहे; आमचा स्वप्न-अनुभव आरंभापासून अखेरपर्यंत जाणिवेनें पाहणें, निदान या अनुभवाचें मोठें क्षेत्र जाणिवेनें पाहणें आम्हांला शक्य आहे : याप्रमाणें

पान क्र. २३५

 

जाणिवेच्या दृष्टीनें स्वप्नव्यवहार पाहिला, म्हणजे आम्ही एका जाणीव-भूमिकेंतून दुसऱ्या, दुसरींतून तिसऱ्या असे अनेक भूमिकांतून प्रवास करीत आहों असें आम्हांला दिसतें; या प्रवासानंतर स्वप्नशून्य प्रकाशमय शांतिपूर्ण विरामाचा लाभ आम्हांला होतो. जागृतींत खर्च झालेल्या शक्तीचा सांठा या विसांव्यानें पुन्हां भरून येतो; हा विसांवा संपतो आणि आम्ही पुन: जुन्या मार्गानें जागृतीच्या क्षेत्रांत येतो. आम्ही जेव्हां स्वप्नांत एका भूमिकेंतून दुसऱ्या भूमिकेंत जातो तेव्हां सामान्यत: जुन्या भूमिकेंतील अनुभव आम्ही मागें टाकतों, विसरून जातों; आम्ही परत जेव्हां जागृतीवर येतों तेव्हां जागृतीचा पृष्ठभाग ज्या स्वप्नीय अनुभवांना जवळचा असेल किंवा जें स्वप्नीय अनुभव अतिशय स्पष्ट असतील ते तेवढे स्मरणांत राहतात. तथापि जागृतीच्या पृष्ठभागाजवळ नसलेले, अस्पष्ट असलेले असेहि स्वप्नीय अनुभव कांहीं प्रमाणांत स्मरणांत ठेवणें शक्य आहे; तसेंच जें स्वप्न किंवा स्वप्नभूमि स्मरणांत असेल त्या स्वप्नाच्या किंवा स्वप्नभूमीच्या मागें जाणें, तेथून आणखी मागें जाणें आणि याप्रमाणें सर्व स्वप्नीय अनुभव जागृत जाणिवेच्या कक्षेंत आणणें ही गोष्ट स्मरणशक्तीचें संवर्धन करून साधतां येते. झोंपेतील जीवनाचें सुसंगत ज्ञान संपूर्णपणें मिळविणें शक्य आहे; अर्थात् ही गोष्ट सोपी नाहीं व असें मिळविलेलें ज्ञान टिकवून धरणेंहि सोपें नाहीं.

अचेतनाच्या शक्तीचें कार्य म्हणून जसें आमचें पृष्ठभागीय भौतिक अस्तित्व निर्माण झालें आहे, तशी गोष्ट आमच्या तलवर्ती अस्तित्वाची नाहीं; मूळ उच्च स्थानावरून जाणीव आवरणें घेत खालीं उतरते व पूर्ण आवृत होऊन अचेतन झाल्यानंतर अचेतनांतून विकासक्रमानें ती वर येत असते : खालीं उतरणारी व वर चढणारी अशा या दोन जाणिवांची भेटीची जागा म्हणजे तलवर्ती अस्तित्व होय. या अस्तित्वांत आंतरमन, आंतरप्राण, आंतर सूक्ष्म भौतिक अस्तित्व असतें -- हें आंतर अस्तित्व बाह्य अस्तित्वाहून, बाह्य प्रकृतीहून फार मोठें, विशाल असतें; आमच्या पृष्ठभागीय अस्तित्वांत, जीवनांत जें कांहीं आहे, जें कांहीं घडतें तें मूळ या तलवर्ती गुप्त अस्तित्वांतून बहुतांशीं निघालेलें आहे, असतें -- याला अपवाद तीन गोष्टी (१) प्राथमिक अचेतन विश्वशक्तींतून ज्याची घडण होते तें, (२) आमच्या पृष्ठभागीय जाणिवेचें जें स्वाभाविक विकासजन्य कार्य आहे तें (३) बाह्य विश्वप्रकृतीच्या आघातांची प्रतिक्रिया म्हणून पृष्ठभागीय जाणिवेचें जें कार्य घडतें तें; या तीन

पान क्र. २३६

 

गोष्टींच्या बाबतींतहि तलवर्ती जाणिवेचा हात थोडा फार असतो, तिचा अप्रत्यक्ष प्रभाव तर या तीनहि गोष्टींवर खूपच होत असतो. आमच्या या तलवर्ती अस्तित्वांत जी जाणीव असते ती विश्वाशीं, विश्वजाणिवेशीं, विश्वशक्तीशीं प्रत्यक्ष संबंध राखूं शकते, आमचें पृष्ठवर्ती अस्तित्व, विश्वाशीं, विश्वशक्तीशीं इन्द्रियें आणि इंद्रियरूप मन यांच्या द्वारां अप्रत्यक्ष संबंध ठेवीत असतें; त्याला त्या शक्तीशीं प्रत्यक्ष संबंध ठेवतां येत नाहीं. या तलवर्ती अस्तित्वांत, आन्तर इंद्रियें असतात, स्पर्श, दृष्टि, श्रुति, हीं तलवर्ती अस्तित्वाचीं सर्व इन्द्रियें स्वतंत्र असतात; पण हीं सूक्ष्म इन्द्रियें बाह्य इंद्रियांप्रमाणें अप्रत्यक्ष माहिती देणारीं यंत्रें नसून, वस्तुजाताचें प्रत्यक्ष ज्ञान आंतरपुरुषाला घडविणारीं ज्ञानवाहकें असतात. ज्ञानाकरितां तलवर्ती पुरुषाला सूक्ष्म इंद्रियांवरहि अवलंबून रहावें लागत नाहीं; वस्तूंचें ज्ञान त्याला प्रत्यक्षतः होतें, त्याच्या सूक्ष्म इंद्रियांकडून केवळ या ज्ञानाला विशिष्ट आकार, रूप दिलें जातें; जागृत मनाच्या बाह्य इन्द्रियांच्या द्वारां, जागृत मनामध्यें वस्तूंचें आकार येतात. मग हें जागृत मन हे आकार नोंदून ठेवतें, किंवा त्यांच्या आधारावर तर्कशास्त्रानें आपल्या प्रत्यक्ष अनुभवाची रचना करतें. तलवर्ती पुरुषाच्या बाबतींत त्याचीं सूक्ष्म इंद्रियें ज्ञानाला आकार देतात; पृष्ठवर्ती पुरुषाच्या बाबतींत वस्तूंचें आकार प्रत्यक्ष असतात; स्थूल इन्द्रियद्वारां प्रत्यक्ष होतात, या प्रत्यक्ष आकारांवरून तर्कानें अप्रत्यक्षरीत्या वस्तूंचें ज्ञान जमविलें जातें. विश्वजाणिवेमध्यें मानसिक, प्राणिक, सूक्ष्म भौतिक भूमी असतात, तेथें तलवर्ती पुरुषाला हक्कानें प्रवेश मिळतो. केवळ भौतिक भूमीला आणि भौतिक विश्वाला चिकटून राहण्याची आपत्ति त्याजवर नसते. मूळ जाणीव खालीं अचेतनांत गुप्त होण्यासाठीं उतरत येते, तेव्हां उतरतां उतरतां अनेक विश्वांची रचना करीत करीत ती उतरत असते; या विश्वाशीं संबंध ठेवण्याचीं साधनें तलवर्ती पुरुषाला उपलब्ध असतात. अचेतनांत गुप्त झालेली मूळ जाणीव (अतिचेतन जाणीव) पुन: वर चढून मूळ स्थानाला जावी म्हणून तिच्या चढण्याच्या कार्यासाठीं, ती उतरत असतां बनविलेल्या विश्वाशीं सुसंवादी समानरूप अशीं जीं विश्वें निर्माण करण्यांत येतात, किंवा निर्माण होतात त्या विश्वांशींहि संबंध ठेवण्याचीं साधनें तलवर्ती पुरुषाला उपलब्ध असतात. बाह्य विषयापासून आणि व्यवहारापासून स्वत:ला आवरून परावृत्त करून झोंप घेणें, आंतरिक वस्तूवर एकाग्र होणें किंवा समाधिद्वारां आंतरिक

पान क्र. २३७

 

चैतन्यांत बुडी घेणें या तीन मार्गांनीं आमचें मन आणि प्राणमय अस्तित्व आतांच वणिलेल्या विशाल तलवर्ती अस्तित्वांत प्रवेश करीत असतें.

जागृत जाणिवेला तलवर्ती अस्तित्वाशीं असलेलें तिचें नातें, तिचा संबंध लक्षांत येत नाहीं; या तलवर्ती अस्तित्वांतून जागृत पुरुषाकडे अनेक गोष्टी येतात पण या गोष्टींचें मूळ, जागृत पुरुषाला, जाणिवेला समजत नाहीं -- आंतरप्रकाशमय ज्ञान, स्फूर्ति, कल्पना, इच्छाविषयक सूचना, इंद्रियगत अनुभवविषयक सूचना, क्रियाविषयक प्रेरणा या गोष्टी आमच्या अमर्यादित पृष्ठवर्ती अस्तित्वाच्या पाठीमागून पुढें किंवा खालून वर येत असतात. समाधि ज्याप्रमाणें तलवर्ती अस्तित्वाचा दरवाजा आम्हांला उघडून देते, त्याप्रमाणें झोंपहि तो दरवाजा उघडून देते; कारण दोन्ही अवस्थांत आम्ही आमची मर्यादित जागृत व्यक्तिता सोडून, तिच्या पाठीमागें, व्यक्तितेच्या पडद्यापाठीमागें जात असतो, आणि या पडद्यापाठीमागें तलवर्ती अस्तित्वाचें क्षेत्र असतें. झोंपेंतील अनुभवाची जी नोंद आमचेकडे येते ती स्वप्नद्वारां येत असते; स्वप्नीय चित्रांच्या द्वारां झोंपेंतले अनुभव आम्हांला कळतात; समाधींतील अनुभव आंतरिक जागृतीच्या द्वारां आम्हांला मिळतात; समाधीच्या अवस्थेचें सर्वांत सुलभ स्वरूप म्हणजे आंतरिक जागृति होय : तलवर्ती जाणीव आणि जागृत जाणीव यांचा संबंध, प्रसंगत: किंवा नित्याचा, जाणीवपूर्वक घडूं लागला म्हणजे अतिप्राकृतिक, असामान्य अशी स्वच्छ दृष्टि आणि दुसरें प्रकाशमय व्यावहारिक मार्ग तलवर्ती जाणिवेला प्राप्त होतात, आणि या मार्गांनीं, जागृत जाणिवेला काय ज्ञान वगैरे द्यावयाचें तें ती देऊं शकते. पडद्याआड असलेला पुरुष, अन्तर्वर्ती पुरुष तलवर्ती अवचेतन अस्तित्वाला स्वत:च्या क्षेत्राला जोडून घेतो : हा अवचेतनयुक्त तलवर्ती पुरुष आंतरिक वस्तूंचें आणि अतिभौतिक वस्तूंचें ज्ञान प्रत्यक्ष (स्वत:च्या दृष्टीनें) मिळवितो; पृष्ठवर्ती अवचेतनांत या ज्ञानाची नक्कल स्वप्नद्वारां केली जाते. उपनिषदांत तलवर्ती पुरुषाला स्वप्न-पुरुष हें नांव दिलेलें आहे. कारण सामान्यत: तलवर्ती पुरुषाचे अनुभव आम्हांला स्वप्नांच्या, आभासांच्या, एकाग्र अन्तर्दशीं अवस्थांच्या द्वारां प्रत्ययास येतात; उपनिषदांनीं अतिचेतन पुरुषाला सुषुप्त-पुरुष हें नांव दिलेलें आहे; कारण सामान्यत: सर्व मानसिक आणि ऐंद्रिय अनुभव आम्हीं अतिचेतन अवस्थेंत प्रवेश करतांच आम्हांला नाहींतसे होतात. अतिचेतनाचा स्पर्श मनाला गाढ समाधींत बुडवितो, आणि या समाधींत मनाला आलेला अनुभव किंवा

पान क्र. २३८

 

त्या अनुभवाची नक्कल, त्याचें चित्र (स्वप्न) सामान्यत: आमच्या जागृत जाणिवेला लाभत नाहीं. अतिचेतन अवस्थेंतील अनुभव, अतिचेतनाचे घडलेले संपर्क, तेथून आलेल्या सूचना, संदेश, आमच्या पृष्ठवर्ती जागृत जाणिवेला ज्ञात होऊं शकतात; पण आमच्या मनाचा विकास असामान्य प्रमाणांत झाला असेल, आम्हीं त्याचा याच हेतूनें खास विकास केला असेल तरच हें घडतें. म्हणजे मनाच्या असामान्य अवस्थेंतच हें घडूं शकतें. नेहमींच्या संकुचित व बंदिस्त मनाला योग्य योगसाधनेनें एखादी चीर पाडली जाते, एकादें भोंक पाडलें जातें तेव्हां त्या चिरेंतून किंवा भोंकांतून अतिचेतनाचे व्यवहार, संदेश, संपर्क आमच्या सामान्य पृष्ठवर्ती जागृत जाणिवेला ज्ञात होऊं शकतात. स्वप्नस्थिति, सुषुप्तस्थिति हीं नांवें, जाणिवेची तलवर्ती स्थिति आणि तिची अतिचेतन स्थिति यांना अलंकारिक रीतीनें दिलीं जातात; या दोन जाणीव-भूमींत  (तलवर्ती आणि अतिचेतन या भूमींत) सत्याचा प्रत्यय येतो. भौतिक वस्तूंचा संपर्क असलेल्या आमच्या जागृत जाणिवेच्या क्षेत्राइतकींच तीं अगदीं वास्तवाचीं क्षेत्रें आहेत असें, त्यांना अलंकारिक नांवें (स्वप्नस्थिति, सुषुप्ति) देणारे उपनिषत्कार मानीत. जागृतींत विषयग्राहक जाणिवेचे व्यवहार म्हणजे स्थूल भौतिक वस्तूंची नोंद घेणें, स्थूल भौतिक विश्वाच्या संपर्कांची नोंद घेणें या प्रकारचे असतात. अतिमानसिक वस्तू अतिचेतन जाणिवेचा विषय असतात आणि सूक्ष्म भौतिक, प्राणिक, मानसिक वस्तू तलवर्ती जाणिवेचा विषय असतात. हीं सर्व वस्तुक्षेत्रें वास्तव सत्यवस्तूंचीं क्षेत्रें आहेत. तथापि वास्तवाचीं हीं सर्व क्षेत्रें, जाणिवेच्या या तीनहि अवस्था, पृष्ठवर्ती, बहिःप्रज्ञ, बहिश्चेतन किंवा जागृत अवस्था, तलवर्ती, अन्तःप्रज्ञ, अन्तश्चेतन किंवा स्वप्नीय अवस्था, ऊर्ध्ववर्ती अतिचेतन प्राज्ञ किंवा सुषुप्त अवस्था व या तीनहि अवस्थांतील अनुभव, आभासमय जाणिवेच्या रचना या वर्गांत, घालतां येतील; स्वप्न आणि सुषुप्ति यांच्याप्रमाणें जागृति ही देखील आभासमय आहे असें म्हणतां येईल; आत्म्याची चौथी (तुरीय) अवस्था, अनिर्वाच्य असें अद्वैत आहे आणि तेंच एकमेव अद्वितीय सत्य आहे, वास्तव वस्तु आहे, हा पक्ष घेतला म्हणजे, वरील तीनहि अवस्था आभासमय ठरतात; तथापि एका सत्याच्या तीन सत्य परंतु भिन्न भिन्न अवस्था असेंहि या तीन अवस्थांना म्हणतां येईल. आत्म्याचा आणि विश्वाचा अनुभव तीन भिन्न श्रेणींचा असतो. प्रत्येक श्रेणीचा अनुभव जाणिवेच्या एका अवस्थेंत

पान क्र. २३९

 

साकार होतो; याप्रमाणें जागृत, स्वप्न व सुषुप्त या जाणिवेच्या तीन अवस्थांत तीन भिन्न श्रेणींचा आत्मानुभव आणि विश्वानुभव साकार होत असतो.

स्वप्न-अनुभवाचें हें वर दिलेलें वर्णन जर खरें असेल, तर स्वप्नांना मिथ्या वस्तूंचीं मिथ्याचित्रें असें म्हणतां येणार नाहीं; आमच्या अर्ध-नेणिवेवर हीं मिथ्या चित्रें थोडा वेळ सत्य म्हणून लादलीं जातात असेंहि स्वप्नांचें वर्णन करतां येणार नाहीं. 'विश्व हा आभास आहे' या विश्वविषयक उपपत्तीला आधार म्हणून, 'विश्वाभास हा स्वप्नांतील आभासासारखा आहे' असें म्हटलें जातें; पण स्वप्नाची कहाणी ही वस्तुत: केवळ आभासाची कहाणी नसल्यानें विश्वाला स्वप्नाचा दाखला देणेंहि चुकीचें ठरतें. तथापि अशी मांडणी करतां येईल कीं, स्वप्नें स्वत: कांहीं सत्य वस्तू नसतात; सत्य वस्तूंचीं चित्रें, सत्य वस्तूंच्या प्रतीकांचा समुदाय हें स्वप्नांचें स्वरूप असतें. या स्वप्नाप्रमाणें आमचा जागृतींतील विश्वअनुभव हा स्वत: सत्यरूप नसून, सत्याचें चित्र, अनुकरण, नक्कल असतो. या अनुभवांत प्रतीक-प्रतिमांचा संग्रह असतो, किंवा अनेक संग्रह वा संग्रहांची माला असते. म्हणजे विश्व हें स्वप्नासारखें आहे असें या दृष्टीनें म्हणतां येतें, पण हें म्हणणें टिकत नाहीं. इतकें मात्र खरें कीं, आम्हांला जें भौतिक जग आरंभाला दिसतें तें, आमच्या इन्द्रियांवर जी प्रतिमांची माला लादली जाते, छापली जाते त्या प्रतिमांच्या द्वारां दिसतें; तसेंच असें म्हणतां येतें कीं, एका दृष्टीनें, एका अर्थीं आमचे अनुभव आणि आमचे व्यवहार हे देखील प्रतीकरूप आहेत -- एकच जें सत्य आहे तें आमच्या जीवनांनीं, प्रतीकांनीं व्यक्त करण्याचा (सध्यां अंशतःच आणि अपूर्णतेनेंच तें आम्हांला व्यक्त करतां येत आहे) आम्ही प्रयत्न करीत असतो. एवढेंच जर असतें, तर अनंताच्या जाणिवेमध्यें स्वतःचा आणि वस्तूंचा स्वप्नीय अनुभव म्हणजे आमचें जीवन, असें म्हणतां आलें असतें. पण आत्मानुभवांत यापेक्षां अधिक गोष्टी आहेत; वस्तूंच्या इंद्रियगत प्रतिमा हा वस्तूंच्या अस्तित्वाचा प्राथमिक पुरावा असतो, जाणिवेंतील सहज स्वयंचलित अंतर्ज्ञान या प्रतिमांना पूर्णता आणतें, व्यवस्थायुक्त करतें, क्रमबद्ध करतें; तसेंच जाणिवेंतील हें सहजज्ञान वरील उद्योग करून प्रतिमा आणि जिची प्रतिमा ती वस्तु, यांचा संबंध तात्काल जोडतें आणि वस्तूचा स्पष्ट अनुभव घेतें; अर्थात् आपण सत्याचें केवळ इंद्रियगत चित्र पहात आहों असा आपला अनुभव नसतो, तर

पान क्र. २४०

 

इंद्रियगत प्रतिमेच्या द्वारां आपण सत्य वस्तु पहात आहों असा आपला एकंदर अनुभव असतो. येथेंच आपला अनुभव थांबत नाहीं; आमची बुद्धि काम करते; ज्या इंद्रियांना वस्तु भासतात, इंद्रियांवर आपली प्रतिमा (चित्र) उठवितात, त्यांचा क्रियाविषयक नियम ती शोधून काढते, वस्तूंचें इन्द्रियगत चित्र बारकाईनें तपासते आणि त्यांत कांहीं चुका असल्या, तर त्या दुरुस्त करते. तेव्हां आम्हांला असा सिद्धान्त करतां येतो कीं, वस्तू इंद्रियांवर ज्या प्रतिमा उठवितात, त्यांच्यावर आमच्या सहजज्ञानाचा आणि बुद्धीचा प्रयोग करून, आम्ही सत्य-विश्वाचा अनुभव घेतों. सहजज्ञानानें प्रतिमाद्वारां वस्तूचा स्पर्श आम्ही अनुभवतों आणि या प्रतिमांत, स्पर्शांत कांहीं प्रमाद असेल, तर बुद्धीनें तो दूर करून वस्तूचें खरें स्वरूप अनुभवतों.  आणखी एक गोष्ट : आम्हांला विश्वाचा अनुभव प्रत्यक्ष येत नाहीं, प्रतीकांच्या, प्रतिमांच्या द्वारां येतो हें खरें असलें आणि आमची प्रतिमा, प्रतीकें विश्ववस्तूंचें कांटेकोरपणें बरोबर असें चित्र नसून, थोडेसें असें तसेंच असतें हें जरी खरें असलें, तरी प्रतीक हें कसल्यातरी सत्याचें, सत्यवस्तूचें प्रतीक असतें हें कांहीं खोटें होत नाहीं. हीं प्रतीकें कांहीं आभासाचीं चित्रें असत नाहींत. झाड, दगड, प्राणी आम्हीं पाहिला असें आम्ही म्हणतों व मानतों तेव्हां या वस्तू कांहीं नसत्या वस्तू, आभासमय वस्तू असत नाहींत, इतकें अगदीं खरें आहे. इंद्रियगत प्रतिमा मूळ झाडासारख्या, प्राण्यासारख्या अगदीं तंतोतंत नसतील, दुसरीं आमच्याहून वेगळीं इंद्रियें त्या वस्तूंच्या वेगळ्या प्रतिमा घेऊन वेगळें दर्शन घडवितील हें आम्ही मान्य करूं, पण झाडाची वगैरे प्रतिमा इंद्रियावर छापली आहे त्या अर्थीं, ती खऱ्या झाडाची वगैरे प्रतिमा आहे आणि मूळ झाडाशीं वगैरे थोडीफार तरी जुळती आहे हें कांहीं आम्ही अमान्य करूं शकत नाहीं. मायावादांत एकच एक वस्तु सत्य आहे, अनिर्वचनीय, अलक्षण, केवल, निर्गुण, सन्मात्र ब्रह्म ही एकच सत्य वस्तु आहे; या सत्य वस्तूंत, तिच्या पोटांत कांहींच नाहीं; ती एकदम निर्गुण आहे. प्रतीकांना कांहीं मूळ आधार लागतो सत्यवस्तूंचा. ब्रह्मांत कांहीं निश्चित वस्तू असत्या, त्याचीं कांहीं अंगभूत अव्यक्त सत्यें असतीं आणि तीं व्यक्त करावयाचीं असतीं, तर आमच्या जाणिवेनें त्यांना कांहीं नामांच्या, रूपांच्या द्वारां व्यक्त केलें असतें. हीं नामरूपें त्या सत्यांचीं अगदीं यथार्थ किंवा थोडीफार चुकीचीं प्रतीकें झालीं असतीं, पण ब्रह्मांत कांहींच व्यक्त

पान क्र. २४१

 

करण्यासारखें नसल्यानें प्रतीकांचा प्रश्नच येत नाहीं. म्हणून विश्व हें स्वप्नासारखें आहे, असें स्वप्नसादृश्य सत्यत्वानें विश्वाचे ठिकाणीं मुळींच कल्पितां येत नाहीं. आम्हांला विश्वांत जे अनुभव येतात त्यासंबंधानें आमच्या मनाची एक विशिष्ट वृत्ति स्वप्नाचें रूपक चांगल्या तऱ्हेनें विशद करूं शकते आणि असा स्वप्नरूपकाचा वापर केव्हांहि करण्यास हरकत नाहीं. पण तत्त्वज्ञानदृष्टीनें विश्वाची तपासणी करतांना, अस्तित्वाच्या सत्यतेची, मूलभूत अर्थाची, प्रयोजनाची आणि त्याच्या (अस्तित्वाच्या) मूळ उगमाची तात्विक चिकित्सा करतांना, स्वप्नासारखें विश्व आहे या कल्पनेला कांहींहि किंमत देतां येत नाहीं.

स्वप्नाची उपमा विश्वाला देण्याऐवजीं मनोभ्रमाची, इंद्रियभ्रमाची, आभासाची उपमा विश्वाला दिली, तरी त्यायोगें मायावादावर कांहीं विशेष प्रकाश पडतो किंवा तो नीट समजण्यास मदत होते असें दिसत नाहीं. भ्रमाचे, आभासाचे, दोन प्रकार असतात; मानसिक, वैचारिक, काल्पनिक भ्रम आणि दृष्टिभ्रम अथवा कसला तरी इंद्रियभ्रम. जेथें ज्या वस्तू नाहींत, तेथें त्या त्या वस्तूंच्या प्रतिमा आम्हांला दिसल्या म्हणजे त्याला आम्ही दृष्टिभ्रम म्हणतो, येथें नेत्र या इन्द्रियाची चूक असते; प्रतिमेची चुकीची रचना इंद्रिय (नेत्रेंद्रियादि इंद्रियें) करीत असतें, तेथें इंद्रियभ्रम घडतो. जेथें घटना आमच्या अंतरांत घडते आणि आम्ही ती अंतरांतील घटना आंतरिक न समजतां बाहेरची मानतों, तेथें रचना करण्यांत मनाची चूक होत असते, म्हणून अशा भ्रमाला मनोभ्रम म्हणतात; मनांतील कल्पनेला, मानसिक प्रतिमेला जेथें आपण बाहेरच्या विश्वांत चुकीनें स्थान देतों तेथें मनोभ्रम घडतो. मृगजल हें इंद्रियभ्रमाचें उदाहरण आहे. जातां जातां हें नमूद केलें पाहिजे कीं, ज्या गोष्टींना आम्ही भ्रम म्हणून म्हणतों त्यांपैकीं पुष्कळ गोष्टी वस्तुत: भ्रम नसतात, तर प्रतीक-प्रतिमा असतात; या प्रतिमा तलवर्ती अस्तित्वांतून वर येतात. तलवर्ती जाणीव किंवा तलवर्ती इंद्रियगण पृष्ठभागावर येतो, आणि ही जाणीव व इंद्रियें अतिभौतिक सत्याशीं आमचा संपर्क घडवितात. याप्रमाणें आलेले अतिभौतिकांचे अनुभव आम्ही चुकून ''भ्रम'' या वर्गांत घालतों : आमचें मानसिक संकुचितपण मोडून आम्ही विश्व-जाणिवेमध्यें प्रवेश करतों, महान् सत्याचा अनुभव घेतों, तेव्हां हा अनुभव सत्याचा अनुभव नसून भ्रम आहे असें म्हटलें जातें. वस्तुत: हा अतिभौतिक सत्याचा अनुभव तलवर्ती

पान क्र. २४२

 

जाणिवेनें वर येऊन दिलेला असतो. असो. सामान्य भ्रम घ्या, मनोभ्रम किंवा दृष्टिभ्रम घ्या, तत्त्वज्ञानांत ज्याला 'अध्यास' म्हणतात, त्या अध्यासाचें तो उदाहरण असतो : सत्यवस्तूवर असत्याचा, असत्य वस्तूच्या प्रतिमेचा आरोप असतो; मृगजलाच्या, गंधर्वनगराच्या भ्रमांत, शुष्क रखरखीत अरण्यांतील हवेवर खोट्या जलाच्या प्रतिमेचा, खोट्या नगराच्या प्रतिमेचा आरोप असतो, रज्जुसर्प भ्रमांत खऱ्या समोरच्या रज्जूवर, समोर नसलेल्या सर्पाचा, सर्पाच्या खोट्या प्रतिमेचा, आरोप असतो. विश्व हा एक प्रकारचा भ्रम आहे, ब्रह्मावर म्हणजेच, सर्वकाल अस्तित्वांत असणाऱ्या एकच एक शुद्ध सत्यावर, अस्तित्वांत नसणाऱ्या खोट्या विश्वप्रतिमेचा आरोप केला जातो असें म्हणतां येईल. पण हें लक्षांत ठेवलें पाहिजे कीं, प्रत्येक भ्रम-अनुभवांत जी खोटी प्रतिमा असते ती अगदीं अस्तित्वांत नसणाऱ्या गोष्टीची नसते. ती प्रतिमा खऱ्या अस्तित्वांत असलेल्या गोष्टीची असते; एवढेंच कीं, ज्या ठिकाणावर ती लादली जाते त्या ठिकाणीं ती नसते. मनाच्या किंवा इंद्रियांच्या चुकीनें ती त्या ठिकाणीं लादली जाते, आरोपिली जाते. दृष्टिभ्रमांतील नगर किंवा जल, मनोभ्रमांतील सर्प आम्हांला फसवितात याचें कारण, नगर कोठेंतरी अस्तित्वांत असतें, जल कोठेंतरी असतें, सर्प कोठेंतरी असतो. तेव्हां विश्वभ्रम हा रज्जुसर्प भ्रमासारखा, गंधर्वनगराच्या किंवा मृगजलाच्या भ्रमासारखा भ्रम आहे असें निर्दोषपणें प्रतिपादितां येत नाहीं. ब्रह्मावर लादलेली आमची विश्वाची प्रतिमा, कोठेंतरी अस्तित्वांत असलेल्या खऱ्या विश्वाची खोटी प्रतिमा असती, तर आमचें प्रतिपादन निर्दोष होऊं शकलें असतें. मायावादांतील विश्व हें कोठेंच सत्यत्वानें अस्तित्वांत नसतें म्हणून मायावादांतील विश्वाला इंद्रियभ्रम, मनोभ्रम यांसारखा भ्रम म्हणतां येत नाहीं.

या भ्रमाच्या उपमेंत दोन अगदीं वेगळ्या प्रकारचे भ्रम एकत्र केले आहेत, चुकून त्यांच्यामध्यें सारखेपणा कल्पिला आहे. जे मनोभ्रम, इंद्रियभ्रम असतात, त्यांत खऱ्या अस्तित्वांत असलेल्या, असूं शकणाऱ्या, सत्य अस्तित्वाच्या क्षेत्रांत असणाऱ्या किंवा अशा क्षेत्राशीं संबंध असलेल्या वस्तू, आहेत त्याहून वेगळ्या प्रकारच्या दाखविल्या जातात; असतील त्या ठिकाणाहून वेगळ्या ठिकाणीं दाखविल्या जातात; अशक्य अशा वस्तुसमुदायांत गोंवल्या जातात किंवा त्यांच्याहून खोट्या गोष्टी निघाल्या आहेत, त्यांना 'न आलेलें' स्वरूप 'आलेलें' आहे असें दाखविलें जातें;

पान क्र. २४३

 

मनोभ्रम, मानसिक प्रमाद हे अज्ञानाचे परिणाम असतात. मनापुढें जो पुरावा असतो तो अज्ञानामुळें अयोग्य रीतीनें मिसळला जातो, जें ज्ञान मनाला मिळालेलें असतें किंवा मिळण्यासारखें असतें त्यावर अज्ञानामुळें भलतीच खोटी इमारत उभारली जाते; विश्वभ्रम या प्रकारचा नाहीं. येथें भ्रमाला सत्याचा, वास्तवाचा पाया मुळीं नाहींच; वास्तवाचा पाया नसलेला, मूलभूत व सर्वांचें मूळ झालेला असा हा भ्रम आहे. एकच एक असलेल्या सद्‌वस्तूवर, जिच्यांत कसलीहि घटना, कसलाहि आकार, कसलेंहि नांव केव्हांहि नव्हतें आणि केव्हांहि नसणार त्या सद्‌वस्तूवर शुद्ध कल्पित नांवें, आकार, घटना लादणारा, असा हा मायावादांतला विश्वभ्रम आहे. विश्वभ्रमाला मनोभ्रमाची उपमा यथार्थतेनें द्यावयाची, तर आम्हीं नामरूप संबंधरहित ब्रह्म व नामरूप संबंधयुक्त विश्व या दोन सारख्याच दर्जाच्या सत्य वस्तू आहेत असें मानलें पाहिजे आणि या दोन वस्तूंपैकीं एकीचा आरोप दुसरीवर केला जात आहे असें मानलें पाहिजे -- सर्पावर रज्जूचा किंवा रज्जूवर सर्पाचा आरोप केला जावा त्याप्रमाणें हें घडत आहे असें मानलें पाहिजे : सगुणाच्या क्रिया, कारभार, व्यवहार शांतिपूर्ण निश्चल निर्गुणावर आरोपित केले जातात, असें मानलें पाहिजे. पण सगुण आणि निर्गुण दोन्ही सत्य असतील, तर एकाच सत्य वस्तूची निर्गुण व सगुण हीं दोन भिन्न रूपें असलीं पाहिजेत, किंवा एका अस्तित्वाचीं ऋण व धन दोन सारख्या दर्जाचीं टोंकें असावींत तशीं एका अस्तित्वाचीं सारख्या दर्जाचीं हीं दोन अंगें असलीं पाहिजेत. या दोन सत्य अंगांसंबंधांत मनाचा जर घोंटाळा झाला आणि त्याजकडून चुकीनें एकाला दुसऱ्याचें नांव दिलें गेलें, एकाच्या ठिकाणीं दुसऱ्याची कल्पना केली गेली, तर या चुकींतून सर्वांचें मूळ असणारा विश्वभ्रम उत्पन्न होऊं शकत नाहीं -- 'दोन सत्य वस्तूंचें अयथार्थ ज्ञान' असें या मनाच्या चुकीला म्हणतां येईल किंवा मनाच्या अज्ञानामुळें दोन सत्यांत अ-यथार्थ संबंध कल्पिला गेला आहे असें म्हणतां येईल, एवढेंच.

मायेचा व्यवहार आम्हांला नीट समजावा म्हणून स्वप्न आणि इंद्रियभ्रम, मनोभ्रम यांखेरीज दुसऱ्याहि उपमा या व्यवहाराला देण्यांत येतात : या सर्व उपमांत, विश्वभ्रमाला त्या गैरलागू आढळून येतात, हा मोठा दोष निघाल्यानें त्यांची किंमत, त्यांचा प्रभाव शून्य होतो. शुक्ति आणि रजत हा दाखला रज्जु आणि सर्प या दाखल्यासारखा मनाच्या

पान क्र. २४४

 

एका चुकीचा प्रभाव आहे : समोर असलेली सत्य वस्तु आणि समोर नसलेली सत्य वस्तु यांच्यांतील सादृश्य हें या चुकीस कारण होत असतें. एकमेव अक्षर सद्‌वस्तूवर, अनेक पदार्थमय क्षर असद् वस्तु ज्या मायावादांत आरोपिली जाते त्या वादाला हा शुक्ति-रजताचा दाखला अर्थातच गैरलागूं होतो. एक दृष्टिभ्रम असा असतो कीं, त्यांत वास्तवांत एक पदार्थ असून दृष्टीला त्याचे दोन होतात, अनेक होतात. एक चंद्राचे दोन चंद्र दिसतात, हा एक दृष्टिभ्रमाचा दाखला आहे. या दृष्टिभ्रमांत एका पदार्थाचे, त्याच्या रूपाचे दोन किंवा अधिक पदार्थ होतात : पैकीं एक सत्य पदार्थ असतो आणि दुसरा किंवा दुसरे आभासरूप, भ्रमरूप असतात. ब्रह्म आणि विश्व यांच्या जोडीला हा दाखला उपयोगी पडत नाहीं, कारण मायेच्या व्यवहारांत वर दिलेल्या दृष्टिभ्रमाहून पुष्कळच अधिक संकीर्णता असते; एका अक्षर अविभाज्य सद्वस्तूवर, अनेक वस्तूंचा आरोप भ्रमानें करण्यांत येतो इतकें खरें; एकच ब्रह्म अनेकता धारण करीत आहेसें भ्रमानें दिसतें हें खरें; पण मूळ सत्यवस्तूंत जे आकार आणि व्यवहार मुळींच नाहींत ते नानाप्रकारचे आकार आणि व्यवहार या भ्रमरूप अनेकतेंत असतात. भ्रमरूप मानलेल्या निसर्गामध्यें असे अनंत आकार, व्यवहार असतात, इतकेंच नव्हे, तर त्यांच्यांत एक व्यवस्था असते, संघटना असते. स्वप्नें, दृष्टिभ्रमाचे देखावे, कलाकार किंवा कवि यांच्या कल्पना अशी संघटित नानात्वाची खोटी इमारत उभी करूं शकतात; अस्तित्वांत असलेल्या खऱ्या संघटित नानात्वाची नक्कल स्वप्नांत वगैरे आम्हांस प्रतीत होते; निदान अशा नकलेपासून स्वप्नांतील वगैरे देखाव्यास सुरुवात होते आणि या देखाव्यांत कितीहि विविधता व कितीहि नवनिर्मिति प्रत्ययास आली, तरी या विविधतेंत आणि नवनिर्मितींत थोडेंतरी नकलेचें, अनुकरणाचें अंग अवश्यमेव असते. पण मायावादांत जो मायेचा व्यवहार सांगितला जातो तो यापासून अगदीं भिन्न आहे. मायेच्या व्यवहारांत नक्कल बिलकुल नसते, कोठेंहि अस्तित्वांत नसलेले खोटे आकार व व्यापार ही माया स्वतःच्या मूलभूत सर्वस्वीं स्वतंत्र क्रियेनें उभे करते. मूळ सद्‌वस्तूंत कांही तिला आढळतें आणि त्या गोष्टीचें माया अनुकरण करते, तिचें प्रतिबिंब उभें करते, ती बदलून वेगळी दाखविते, तिचा विकास करून आपली खोटी इमारत उभी करते -- असें मुळींच घडत नाहीं. मूळ सद्‌वस्तु एकमेव आणि एकरस असल्यानें, तेथें मायेला नक्कल करतां

पान क्र. २४५

 

यावी असें कांहींहि असत नाहीं. मन जो भ्रम निर्माण करते त्या अनुकरणप्रधान भ्रमाच्या व्यवहारानें मायेच्या अफाट मौलिक गूढतम व्यवहारावर मुळींच प्रकाश पडत नाहीं. मायेनें जो हा महान् अतिभव्य विश्वभ्रम उभा केला आहे, त्याला तुलना नाही, त्याच्याशीं तुलना करण्यासारखें दुसरें कांहींहि अस्तित्वांत नाहीं, तो एकटा एक आमच्या समोर उभा आहे. मनाच्या कोणत्याच व्यापारानें ज्यावर प्रकाश पडत नाहीं असा हा तथाकथित विश्वभ्रम - भ्रम म्हणून मानलेला विश्वाचा पसारा - भ्रम नसून सत्य वस्तूंचा आणि व्यापारांचा पसारा तर नसेल, असा संशय स्वभावतःच विचारी मनाला येतो. आम्हांला विश्वांत निसर्गाचा जो व्यवहार दिसतो, त्या मूलभूत व्यवहारानें मूळ एका सद्वस्तूला सर्वत्र विविध रूपें दिलीं जातात असा अनुभव आहे; आणि ही विविधता भ्रम म्हणून भासत नाहीं, तर एका मूळ सत्य वस्तूपासून हे विविध, सत्य आकार निर्माण केले गेले आहेत असेंच दिसतें. एकच एक सद्‌वस्तु हें मूळ सत्य आहे आणि तें सत्य स्वत:ला प्रकट करीत आहे. जे सत्य असे अनंत आकार आणि ज्या सत्य अशा अनंत शक्ती त्या मूळ सत्याच्या अंगभूत आहेत, त्या तें मूळ सत्य व्यक्त करीत आहे, हेंच दृश्य आम्हांला सर्वत्र दिसतें. या प्रकटीकरणाच्या, अभिव्यक्तीच्या व्यवहारांत गूढता आहे हें निर्विवाद; नव्हे, हा व्यवहार ऐंद्रजालिक जादूच्या व्यवहारासाररवा आहे असेंहि म्हणतां येईल. पण ही जादुगिरी भ्रमोत्पादक जादुगिरी आहे असें म्हणण्यास, असें मानण्यास निसर्गांत कोठेंहि आधार सांपडत नाहीं; उलट मूळ सद्‌वस्तु, ब्रह्म सर्वसमर्थ आहे, त्याचे ठिकाणीं त्याची जी अंगभूत जाणीव आणि शक्ति आहे त्या शक्तीचें आणि जाणिवेचें हें सर्व काम आहे; ते मूळ सत्य, ब्रह्म, आपल्या नित्यज्ञानाच्या, आत्मज्ञानाच्या बळावर ही विश्वरूपी, निसर्गरूपी आत्मनिर्मिति करीत आहे असें मानण्यास निसर्गांत, विश्वांत भरपूर आधार सांपडतो; निदान असें न मानण्यास कांहींच पुरावा आमच्या समोर नाहीं, असें निर्धास्तपणें म्हणतां येतें.

मायेनें उभारलेल्या तथाकथित विश्वभ्रमाची आमच्या मनोभ्रमाशीं मुळींच तुलना करतां येत नाहीं वगैरे प्रतिपादन येथपर्यंत झाल्यानंतर, मूळ मन ही काय वस्तु आहे, त्याचें स्वरूप, स्वधर्म काय आहे याचा विचार करणें अपरिहार्य आहे. विशिष्ट स्वरूपाच्या भ्रमांचें जनकत्व मनाकडे असतें हें आपण पाहिलें. आतां त्याच्या प्रकृतीचा आणि मूळ

पान क्र. २४६

 

अस्तित्वाशीं त्याच्या असलेल्या नात्याचा विचार करूं. मूळ भ्रम, मूळ स्वयंभू भ्रम, मायाकृत भ्रम अर्थात् अनिर्वचनीय भ्रम हा मनाचा जनक आहे कीं काय ? अशा भ्रमाचें व्यवहारसाधक साधन मन आहे कीं काय ? कीं तें स्वत:च आद्य विपरीत निर्मितिकारक शक्ति किंवा जाणीव आहे ? किंवा त्याचें, त्याच्या अज्ञानाचें स्वरूप, मूळ अस्तित्वाच्या सत्यांचें अयथार्थ ग्रहण हें आहे काय ? मूळ सत्यमय जाणिवेचें, खऱ्या विश्व-निर्मात्या सत्यज्ञानाचें तें विकृत रूप, विमार्गस्थ रूप आहे काय हे प्रश्न आमच्यापुढें आहेत. प्रथम ही गोष्ट स्पष्ट आहे कीं, आमचें मन हें कांहीं जाणिवेची आद्य मूलभूत निर्मिति-शक्ति नव्हे; तें आणि त्या सारख्या स्वरूपाचें कोणतेंहि मन, दुय्यम दर्जाचें साधनरूप निर्मितिकार आहे : तें मध्यवर्ती (अतिचेतन आणि अचेतन यांच्यामध्यें) निर्मितिकार आहे आणि याच प्रकारचें तें असणार, असें तें असणें अपरिहार्य आहे आणि असें असल्यानें, आद्य निर्मितिकार भ्रम, सर्वकल्पक, सर्वकर्ती माया जो व्यवहार करते तो व्यवहार आणि त्या भ्रमाचें, मायेचें स्वरूप स्पष्ट करण्याला, मनाच्या चुकांपासून घेतलेले दाखले सहजच पुरे पडत नाहींत; मनाच्या त्या चुका मध्यवर्ती अज्ञानामुळें घडतात, मध्यवर्ती अज्ञानाच्या प्रांतांत मन असतें -- वर अतिचेतन जाणीव व खालीं अचेतन  (शुद्ध नेणीव) यांच्यामध्यें मनाचा, मध्यवर्ती अज्ञानाचा, प्रांत आहे. मनाला अतिचेतनापासून एक प्रकारची शक्ति प्राप्त होते, अचेतनापासून त्या शक्तीच्या विरुद्ध अशी शक्ति मिळते. एका बाजूला गुप्त तलवर्ती आंतरिक अस्तित्व आणि दुसऱ्या बाजूला बाह्यवर्ती विश्वदृश्य यांच्या मधोमध मन आहे. तलवर्ती आंतरिक अस्तित्वाची कल्पना मनाला नसते; पण तेथून त्याजकडे असामान्य सूचना, स्फूर्ति, कल्पना, ज्ञानप्रवण करणाऱ्या, कृतिप्रवण करणाऱ्या प्रेरणा, आंतर सत्यांच्या प्रतिमा, आंतर शक्यतांच्या या रचना सारख्या येत असतात; वस्तुसृष्टींत साकार झालेल्या गोष्टी आणि तज्जनित भावी शक्य गोष्टींच्या सूचना त्याला बाहेरच्या दृश्य विश्वपसाऱ्यातून प्राप्त होतात. आंतून बाहेरून प्राप्त होणाऱ्या गोष्टी त्याला सत्य-गोष्टी असतात. तात्विक सत्य, शक्य सत्य आणि वास्तवांत उतरलेले सत्य अशीं तीन प्रकारचीं सत्यें किंवा सत्य गोष्टी त्याला प्राप्त होतात; मन भौतिक विश्वांतील वास्तव गोष्टींपासून आपल्या व्यवहाराला आरंभ करतें. तें या गोष्टीवर अंतरीं विचार करतें आणि या आंतरिक आत्मनिष्ठ क्रियेनें त्या गोष्टींच्या पोटीं ज्या

पान क्र. २४७

 

वास्तवांत न आलेल्या शक्यता असतात, त्या शक्यता तें प्रकट करतें; त्या गोष्टींच्या पोटीं ज्या शक्यता असतात, त्या शक्यतांच्या कांहीं सूचना त्या गोष्टींपासून मनाला मिळतात, त्या सूचित शक्यताहि मन प्रकट करतें; तसेंच तार्किक विचारसरणीनें समोरच्या वास्तव गोष्टींपासून आरंभ करून एका गोष्टींतून दुसरी, दुसरींतून तिसरी अशा कित्येक शक्य गोष्टी मनाला आकलन करतां येतात, या शक्यताहि तें हुडकून काढतें आणि जगासमोर मांडतें. या ज्या शक्यता मन हुडकून काढतें त्यांपैकीं कांहीं शक्यता घेऊन त्या तें आंतरक्रियेचा विषय करतें, त्या शक्यतांना आपल्या कल्पनेनें कांहीं आकार देतें. आंतर व्यापारानें त्यांच्या कांहीं रचना रचतें आणि या रचनांशीं, आकारांशी तें आंतल्याआंत खेळतें; हुडकून काढलेल्या शक्यतांपैकीं दुसऱ्या शक्यता, वास्तवांत आणण्यासाठीं निवडून त्यांना वास्तवांत आणण्याचा तें खटाटोप करतें. बाह्य विश्वांतून मनाला सूचना मिळतात त्याप्रमाणें आंतून आणि स्वत:च्या वरच्या पातळीवरूनहि अदृश्य स्थानांतून त्याला अन्त:सूचना मिळतात; बाह्य वास्तवाच्या निरीक्षणानें त्याला कांहीं सत्यें सुचतात त्याप्रमाणें आंतर स्थानांतूनहि त्याला सत्यांचा प्रत्यय येतो आणि या अंतरस्थ सत्यांचाहि तें दोन प्रकारें उपयोग करतें; त्यांना कांहीं स्वकल्पित आकार देऊन किंवा असतील तशीं घेऊन तें आंतल्या आंत त्यांच्याशीं खेळतें, किंवा त्यांपैकीं कांहीं वास्तवांत आणण्यासाठीं निवडून त्यांना वास्तवांत आणण्याचा खटाटोप तें करीत बसतें.

वास्तव गोष्टी पाहणें आणि उपयोगांत आणणें; माहीत नाहींत, वास्तवांत आलेलीं नाहींत अशीं सत्यें, तत्त्वें कल्पनेनें पाहणें आणि हस्तगत करणें; तसेंच तत्त्व किंवा सत्य आणि त्याची वास्तव साकारता यांच्यामध्यें असलेल्या शक्यतांचा व्यवहार करणें; इतक्या गोष्टी मन करीत असतें. पण अनंत जाणिवेला जी सर्वज्ञता असते, ती अर्थातच मनाच्या वांट्याला आलेली नसते; त्याचें ज्ञान मर्यादित असतें आणि हें त्याचें मर्यादित ज्ञान कल्पनेनें आणि शोधानें त्याला व्यापक करावें लागतें -- मर्यादित ज्ञानांत कल्पनाशक्तीची आणि शोधकशक्तीची, कल्पनांची आणि शोधांची भर घालून त्याला आपला व्यवहार शक्य तेवढा व्यापक आणि बिनचूक करावयाचा असतो. अनंत जाणीव, तिला जें ज्ञान असतें तें, व्यक्त करते, प्रकट करते. मनाला अज्ञात शोधून काढावयाचे असतें; अनंतांतील शक्यता मन ग्रहण करतें -- पण त्या शक्यता आपल्याच

पान क्र. २४८

 

अमर्याद कल्पनाशक्तीच्या रचना आहेत, निर्मिती आहेत, क्लृप्ती आहेत असें तें मानतें; कांहीं एक सत्य किंवा तत्त्व गुप्त असतें आणि त्या सत्याला विविध आकार अनंत देऊं शकतें, त्यांतून विविध परिणाम अनंत घडवूं शकतें; अनंताच्या इच्छेनें हे जे विविध आकार आणि परिणाम विशिष्ट सत्यांतून उदयास येऊं शकतात, त्यांना अनन्तांतील शक्यता म्हणतात : ही गोष्ट मनाला विदित नसते, तें आपल्या कल्पनाशक्तीचेंच कौतुक करीत असतें; अनंत शक्ति-जाणीव-युक्त अनंत शक्ति -- ज्या सर्वसमर्थतेची स्वामिनी आहे, ती सर्वसमर्थता मनाला उपलब्ध नाहीं; मनाकडून अमुक करून घ्यावयाचें असें विश्वशक्ति ठरविते, आणि असें जें ठरविलें गेलें असेल तेवढेंच मनाला करतां येतें; त्याच गोष्टी मनाला वास्तवांत आणतां येतात, ज्या त्याजकडून घेण्याला अनंत विश्वशक्ति मान्यता देते; अतिचेतन आणि तलवर्ती गुप्त दिव्य शक्तीकडून मन हें साधन म्हणून वापरण्यांत येत असतें : निसर्गांत अमुक गोष्ट प्रकट व्हावी असें ही शक्ति ठरविते आणि असें तिनें ठरविलें, म्हणजे मनाला ती गोष्ट वास्तवांत आणण्यास मुभा मिळते आणि त्याच्यांत तेवढें सामर्थ्य असल्यास ती गोष्ट त्याजकडून वास्तवांत येते. याप्रमाणें विश्वशक्ति, अतिचेतन दिव्य शक्ति आणि तलवर्ती दिव्य शक्ति यांच्या लहरींवर, मनाकडून काय घडावें, तें अवलंबून असतें. मनाचें ज्ञान मर्यादित आणि प्रमादशील असतें; त्यालाच अज्ञान हें नांव आहे. हें अज्ञान किंवा अज्ञानग्रस्त मन वास्तव गोष्टींशीं व्यवहार करतांना, पाहण्यांत (निरीक्षणांत) चूक, उपयोगांत चूक, निर्मितींत चूक -- अशा सर्वत्र चुका करण्यास पात्र असतें; शक्यतांशीं व्यवहार करतांना त्यांच्या ग्रहणांत चूक, त्यांच्या एकत्रीकरणांत चूक, त्यांच्या उपयोगांत चूक, त्यांच्या जागा ठरविण्यांत चूक -- अशा सर्वत्र चुका करण्यास पात्र असतें; त्याला जीं सत्यें, तत्त्वें वरून बहाल केलीं जातात, ज्या तत्त्वांचें, सत्यांचें ज्ञान त्याला उच्च पातळीवरून दिलें जातें तीं सत्यें, तीं तत्त्वें वापरतांना त्यांचें रूप विकृत करणें, त्यांचें अयथार्थ दर्शन घडविणें, त्यांच्यांतील सुसंवाद घालवून त्यांच्यामध्यें विसंवाद उत्पन्न करणें -- अशा चुका करण्यास मन पात्र असतें. वास्तवांत असलेल्या गोष्टींशीं ज्या अगदीं जुळत नाहींत, ज्या वास्तवांत येण्याची मुळींच शक्यता नाहीं, ज्यांना त्यांच्या मागील सत्याचा, तत्त्वाचा बिलकुल पाठिंबा नाहीं अशा रचना मन स्वत:च्या लहरीनें करूं शकतें व करतें;

पान क्र. २४९

 

पण एक गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे कीं, मनाच्या या रचना वास्तव गोष्टींशीं, शक्यतांशीं आणि तत्त्वांशीं अगदीच संबंध ठेवीत नाहींत असें नाहीं : वास्तव गोष्टींचा अन्याय्य अयोग्य विस्तार, शक्यतांचा (विश्वशक्तीला) असंमत उपयोग, सत्यांचा किंवा तत्त्वांचा अन्याय्य वापर मनाच्या या लहरी रचनांत नजरेस येतो ! याप्रमाणें मन निर्मिति करतें पण तें स्वतंत्र मूळ आद्य निर्मितिकार नाहीं; तें सर्वज्ञ नाहीं, सर्वसमर्थ नाहीं, दुय्यम निर्मितिकार आहे; आणि या दुय्यम निर्मितींतहि तें नेहमीं कार्यक्षमता दाखवितें असेंहि नाहीं. उलट पक्षीं, माया, भ्रम निर्माण करणारी मायाशक्ति ही आद्य निर्मितिकार आहे, असलीच पाहिजे; कारण अगदीं शून्यांतून ती आपल्यासमोर असणारा आणि नसणारा सर्व वस्तूंचा पसारा निर्माण करते; अगदीं शून्यांतून माया आपली निर्मिति करते असें मानावयाचें नसेल, तर आम्हांला असें मानावें लागेल कीं, मूळ सत्य, सद्‌वस्तु, ब्रह्म जें आहे त्याच्या अंगभूत द्रव्याचा उपयोग करून माया विश्वनिर्मिति करते -- पण असें मानल्यास त्याबरोबर, ती जें निर्मिते तें कोणत्यातरी प्रकारें सत्य असलेंच पाहिजे असेंहि म्हणणें भाग आहे; असो. शून्यांतून सर्व पसारा निर्माण करणाऱ्या मायेला, जें तिला निर्माण करावयाची इच्छा आहे त्या संबंधाचें पूर्ण ज्ञान असतें, तिला लहर लागेल तें निर्माण करण्याची पूर्ण शक्ति असते; केवळ स्वत: निर्माण केलेल्या भ्रमांवरच कां होईना, पण मायेला सर्व प्रकारची सत्ता असते, आणि त्याविषयींचें संपूर्ण ज्ञान असतें; त्या भ्रमामध्यें ती सुसंगति निर्माण करते, त्यांची सांखळी जोडते; या कार्यांत तिला जादुगाराची अद्‌भुत शक्ति, अद्‌भुत सार्वभौम सत्ता असून, अद्‌भुत यशस्विता तिच्या पदरीं पडते; स्वत: निर्माण केलेल्या रचना, क्लृप्ती विश्वांतील जीवांच्या बुद्धीला सत्यें किंवा तत्त्वें, शक्यता आणि वास्तव गोष्टी वाटाव्या अशी व्यवस्था करण्यांत ती पूर्ण यशस्वी होते.

आमच्या मनाला आत्मविश्वासानें आणि उत्तम तऱ्हेनें तेव्हांच काम करतां येतें, जेव्हां त्याला कांहींतरी द्रव्य, कांहींतरी पदार्थ कामासाठीं दिला जातो, जेव्हां त्याला कोणत्यातरी वस्तूवर काम करावयाचें असतें, निदान असल्या क्रियांना आरंभ करण्यासाठीं त्यांना आधार म्हणून, त्याच्या क्रियांचा पाया म्हणून जेव्हां एखादी वस्तु मिळते, तेव्हां तें आत्मविश्वासानें उत्तम काम करूं शकतें; त्याला ज्ञात झालेली विश्वांतील एखादी शक्ति जेव्हां त्याला त्याच्या व्यवहारांत वापरावयास मिळते, तेव्हाहि तें

पान क्र. २५०

 

आत्मविश्वासानें उत्कृष्ट काम करतें. वास्तव गोष्टीशीं त्याचा व्यवहार असला म्हणजे त्याला प्रत्येक पाऊल नि:संदेहपणें टाकतां येतें; वास्तव गोष्टी ज्या बाह्य पदार्थांच्या रूपांत आहेत, त्यांच्याशीं व्यवहार करावयाचा, त्या घेऊनच पुढें नवनिर्मितीचा प्रयत्न करावयाचा, हा जो मनाचा व्यवहारनियम तो, भौतिक शास्त्राला जें महान् यश मिळालेलें आहे त्या यशाच्या मुळाशीं आहे. पण या निर्मितींत भ्रमांची निर्मिति नसते, शून्यांतून कांहीं गोष्टी अस्तित्वांत आणून त्या गोष्टींना दर्शनी वास्तवता द्यावयाची, ही जी विश्वभ्रमाची कामगिरी, विश्वमायेची जादुगिरी, ती भौतिक शास्त्राच्या नवनिर्मितींत (मनाच्या कोणत्याहि निर्मितींत) दिसून येत नाही. मन निर्मिति करतें ती शून्यांतून करीत नाहीं. कोणत्यातरी पदार्थांतूनच करतें, द्रव्यांतूनच करतें; त्या पदार्थांत, त्या द्रव्यांत जें निर्माण करण्याची शक्ति असेल तेंच केवळ मन त्यांतून निर्माण करतें, निर्माण करूं शकतें. निसर्गशक्तीशीं मन व्यवहार करीत असेल, तर त्या शक्तीकडून जें कार्य निसर्गनियमानुसार घडणें शक्य असेल, तेंच कार्य मन त्या शक्तीकरवीं घडवून आणतें, घडवून आणूं शकतें. मनाला कांहीं नवनिर्मिति करावयाची किंवा कांहीं शोध लावावयाचा तर निसर्गाच्या अंगभूत सत्यांत, त्याच्या शक्यतेंत जें अंतर्भूत असेल तेंच मन शोधून काढील, शोधून काढूं शकेल. मन नवनिर्मिति म्हणून तेंच केवळ निर्माण करील, निर्माण करूं शकेल. मनाला आंतून आणि वरून निर्मितिविषयक अन्त:प्रेरणा, अन्त:सूचना येत असतात. या सूचनांत खरें सत्य किंवा खरी शक्यता अन्तर्भूत असेल -- मनाची काल्पनिक सत्यता किंवा शक्यता उपयोगी पडत नाहीं -- तरच त्या मनाकडून साकार होऊं शकतात. जें खरें नाहीं, जें शक्यतेच्या वर्गांतील नाहीं, असें कांहीं जर मनानें योजलें तर तें निसर्गांत अस्तित्वांत येऊं शकत नाहीं, तें निर्माण केलें जाऊं शकत नाहीं. मायेची गोष्ट वेगळी आहे. ब्रह्म हें सत्य मायेला आधाराला असतें हें खरें आहे, -- पण या सत्याशीं, या आधाराशीं कसलाहि संबंध नसलेली, ब्रह्मांत जी सत्य नाहीं, जी शक्य नाहीं असली इमारत माया उभी करते. ब्रह्मरूप सत्याच्या अंगभूत, घटकभूत द्रव्यांतून आपली इमारत माया उभी करते असें म्हटलें, तर या द्रव्यांतून ती असल्या गोष्टी निर्माण करते कीं, ज्या मूळ सत्याला निर्माण करणें शक्य नसतें, मूळ सत्याशीं ज्या अगदीं विरोधी असतात.

पान क्र. २५१

 

उदाहरणार्थ, माया आकाराचा पसारा उभा करते आणि मूळ सत्य ब्रह्म हें निराकार समजलें जातें; माया विविध विशेष निर्माण करते, आणि ब्रह्म सर्वथा निर्विशेष समजलें जाते, सर्वथा विशेषसंभवहीन समजलें जातें.

मनाच्या संबंधांत त्याच्या कल्पनाशक्तीची गोष्ट थोडी मायेसारखी आहे : या कल्पनाशक्तीच्या बळानें मन निर्मिति करून ही निर्मिति सत्यवस्तूंची आहे अशी स्वतःची निश्चिति करूं शकतें; ही थोडी मायेसारखी मनाची स्थिति दिसते. अज्ञानाचें व्यवहारसाधन हें आमच्या मनाच्या कल्पनाशक्तीचें स्थान आहे. मनाची ज्ञानशक्ति मर्यादित, क्रियाशक्ति मर्यादित, अशा अज्ञानप्रधान मनाला कल्पनाशक्तीचा आश्रय करणें भाग असतें. ज्ञानाची, ज्ञानशक्तीची, क्रियासामर्थ्याची उणीव भरून काढणें हाच मनाच्या कल्पनाशक्तीचा हेतु असतो. दिसणाऱ्या उघड गोष्टींतून कल्पनासामर्थ्यानें मन अदृश्य, गुप्त गोष्टी शोधून काढतें; शक्य काय, अशक्य काय, त्याच्या रचना मन कल्पनेनेंच करतें; बाह्य अनुभवाशीं न जुळणाऱ्या आभासमय ''वास्तव'' गोष्टी, तें कल्पनेनें उभ्या करतें; वस्तुजातांतील सत्य, जें कल्पनेनें अजमावलें आहे किंवा कल्पनेनें रचलें आहे, त्या रचलेल्या किंवा अजमावलेल्या सत्याच्या प्रतिमा, बाह्य अनुभवाशीं न जुळणाऱ्या प्रतिमा, मन आपल्या कल्पनासामर्थ्यानें रेखाटतें. मनाच्या व्यापाराचें दृश्य चित्र निदान या प्रकारचें असतें : वस्तुत: जें घडत असतें तें निराळेंच असतें : मूळ अस्तित्वांत अनंत शक्यता असतात, त्या शक्यता तेथून वर आणणें हें काम वर सांगितलेल्या कल्पनेच्या व्यापारानें मन करीत असतें; अनंताच्या अज्ञात शक्यता, शक्ती हस्तगत करण्याचें, शोधून काढण्याचें काम, कल्पनेच्या वरील व्यापाराच्या द्वारां मन करीत असतें; हें काम मनाला ज्ञानाच्या आधारानें करतां येत नाहीं; कारण समर्थ ज्ञान त्याला उपलब्ध नसतें : अशा ज्ञानाच्या अभावीं, मन सत्याच्या प्रायोगिक रचना करतें, शक्यतेच्या प्रायोगिक रचना करतें, आणि वास्तवांत न आलेल्या वास्तवाच्याहि प्रायोगिक रचना करतें. सत्याचें ज्ञान अन्त:सूचनेनें मिळण्याची मनाची पात्रता मर्यादित असल्यानें मन सत्याची कल्पना करतें, सत्यासंबंधांत उपपत्ति रचतें, सत्य हें असेल कां, तें असेल कां असा युक्तिवाद करतें; खऱ्या शक्यता जाणून घेण्याची आणि व्यवहारांत आणण्याची मनाची शक्ति मर्यादित असल्यानें तें कल्पनेनें अशा शक्यता उभ्या करतें कीं ज्या वास्तवांत आणण्याची

पान क्र. २५२

 

त्याला आशा आहे, निदान इच्छा आहे; भौतिक विश्वाकडून त्याला होणाऱ्या विरोधामुळें वास्तवांत आणण्याची त्याची शक्ति फार मर्यादित होत असल्यानें स्वत:च्या अंतरंगीं तें शक्यता वास्तवांत आणल्याचें चित्र कल्पनेनें उभें करतें; आणि या रीतीनें निर्मिति करण्याची स्वत:ची इच्छा तृप्त करून स्वत:पुढें स्वत:ची निर्मिति उभी करण्याचा आनंद भोगतें. तथापि हें ध्यानांत ठेवलें पाहिजे कीं, मन जरी कल्पनेच्या बळावर आपल्या इमारती उभ्या करीत असलें, आणि या इमारती बऱ्याचशा अ-वास्तव असल्या तरी कल्पनेच्या बळावर सत्याचें चित्र त्याला थोडेंबहुत तरी लाभतेंच लाभतें; तसेंच त्या बळावर कांहीं शक्यताहि त्याला सांपडतात, ज्या पुढें वास्तवांत येतात; आणि विश्वांत ज्या वास्तव घटना घडतात, त्या घटनांवर मन आपल्या कल्पनेच्या बळावर परिणामकारक प्रभाव गाजवूं शकतें. मानवी मनांत सारख्या टिकून राहणाऱ्या बऱ्याचशा कल्पना, वायुयानानें प्रवास करण्याची कल्पना वास्तवांत आली त्याप्रमाणें शेवटीं यशस्वीपणें पूर्ण होतात. व्यक्ति विचार-रचना करते; या रचनांत जोर असला, त्या रचना करणाऱ्या मनांत हवा तितका जोर असला, तर त्या रचना वास्तवांत येऊं शकतात. व्यक्तीच्या कल्पना स्वत:च्या वास्तवविषयक शक्यता उत्पन्न करतात, समाजमनांत या वैयक्तिक कल्पना स्थान मिळवूं शकल्या, तर खासच त्या वास्तवांत उतरण्याची शक्यता वाढते; समाजमनाचा पाठिंबा कोणत्याहि कल्पनेला सारखा मिळत राहिला, तर शेवटीं विश्वपुरुषाच्या इच्छेचें, संकल्पाचें पाठबळ, संमति देखील त्या कल्पनेला मिळते आणि मग ती हमखास वास्तवांत येते. वस्तुस्थिति अशी आहे कीं, जेवढ्या म्हणून कल्पना केल्या जातात, केल्या जाऊं शकतात, तेवढ्या सर्व कल्पना संभाव्य गोष्टीच चित्रित करीत असतात; या कल्पनांपैकीं कांहीं कल्पना कोणत्या तरी रूपांत केव्हांतरी वास्तवांत येतात -- हें वास्तवरूप मूळ कल्पिलेल्या रूपांपेक्षां पुष्कळ भिन्न असूं शकतें; कल्पनांपैकीं बऱ्याचशा - वास्तवांत जितक्या येतात त्यापेक्षां अधिक - वंध्य ठरतात याचें कारण, ईश्वरकृत प्रस्तुत निर्मितियोजनेंत त्यांचा समावेश नसतो, किंवा व्यक्तीच्या बळानें यशस्वी व्हावयाच्या ठरलेल्या कल्पनांत त्यांचा समावेश नसतो अथवा समावेशक विश्वसत्तेच्या स्वरूपाशीं, स्वभावाशीं, भवितव्याशीं, तिच्या सामूहिक तत्त्वाशीं, वर्गीय तत्त्वाशीं त्यांचा मेळ नसतो, विरोध असतो.

पान क्र. २५३

 

मन ज्या कल्पना कल्पितें त्या कल्पना, आतांच दाखविल्याप्रमाणें मूलत: शुद्ध भ्रमरूप, शुद्ध आभासरूप केव्हांच नसतात; मनाला जे वास्तवाचे अनुभव आलेले असतात, त्यांच्या आधारावर तें कल्पना उभारीत असतें; निदान त्या अनुभवांपासून कल्पनाशक्ति कल्पना रचण्याला आरंभ करते; वास्तवगोष्टींत कमीअधिक करून कल्पनाशक्ति आपल्या विविध कल्पना उभ्या करते; अनंताच्या पोटीं ज्या भावी शक्यता असतात, ज्या भूतकालीन ''वंध्य'' शक्यता असतात, त्या शक्यता मनाची कल्पनाशक्ति चित्रित करीत असते; अनन्तांतील कांहीं सत्यें, जीं व्यक्त झालीं नाहींत, तीं व्यक्त झालीं असतीं तर अमुक घडूं शकलें असतें, आज ज्या शक्यता क्रमवार लावल्या आहेत त्या क्रमवार शक्यतांचा क्रम बदलेल तर अमुक घडूं शकेल, ज्या संभाव्य गोष्टी शक्य गोष्टींच्या वर्गांत आज पडलेल्या आहेत त्यांहून वेगळ्या कांहीं गोष्टी शक्यतेच्या वर्गांत घातल्या गेल्या तर अमुक घडूं शकेल -- इत्यादि प्रकारें अनंतांतील भावी आणि भूत संभाव्य घटनांचें चित्र मनाची कल्पनाशक्ति चितारीत असते. कल्पनाशक्तीच्या द्वारां आमच्या भौतिक प्रांताहून वेगळ्या, अतिभौतिक प्रांतांतील आकार आणि शक्ती आमच्या मानसिक अस्तित्वाशीं संबंध ठेवतात. कल्पना अगदीं अतिशयोक्त अतिरेकी असल्या, आभासांचा, भ्रमांचा पसारा त्यांनीं उभा केला, तरी या पसाऱ्यासाठीं वास्तवांतील घटनांचा, निदान शक्य गोष्टींचा त्या आधार घेत असतात. सागरी नारीच्या (मर्मेडच्या1) कल्पनेंत दोन वास्तव गोष्टी एकत्र केल्या आहेत, हें एकत्रीकरण पृथ्वीवरील सामान्य शक्यतांच्या पलीकडील आहे. देवदूत (एंजल्2) ग्रिंफिन्3 किमेरा4 यांना आमची कल्पना निर्मिते ती याच तत्त्वावर. केव्हां केव्हां अतिरेकी कल्पनेंत, स्मृतीच्या

-------------------------

1 मर्मेड् : सागरी नारी. डोकें व शरीर कमरेपर्यंत सुंदर स्त्रीचें, पुढें माशाची शेपटी.

2 एंजल : देवदूत. सुंदर ठेवण, तरुण, लांब झगा, पंख.

3 ग्रिंफिन् : एक पशु. शरीर, पाय सिंहाचे; वांकडी चोंच आणि पंख गरुडाचे, घारीचे.

4 किमेरा : अग्नी ओकणारा राक्षस, डोकें सिंहाचें, शेपटी सर्पाची, शरीर बोकडाचें.

पान क्र. २५४

 

सांठ्यांतील जुन्या वास्तव गोष्टी घेतलेल्या असतात; उदाहरणार्थ ड्रॅगन.  (ड्रॅगन -- पंख असलेला सर्प) केव्हां केव्हां अतिशयोक्त कल्पनेंत अशी घटना किंवा वस्तु कल्पिलेली असते कीं, जी कोणत्यातरी भौतिकेतर पातळीवर, अस्तित्वाच्या इतर अवस्थांत खरी आहे, किंवा खरी असूं शकेल. वेडा मनुष्य कल्पनेनें आभास उभे करतो त्यांत देखील वास्तव गोष्टीच असतात पण त्यांचें मिश्रण निर्बुद्धपणाचें असतें इतकेंच. उदाहरणार्थ एक वेडा स्वत:, इंग्लंड आणि राजपद यांचें कल्पनेंत मिश्रण करतो आणि कल्पनेनें, प्लॅटाजेनेट, टयूडर यांच्या सिंहासनावर बसतो. मनाकडून जी चूक घडते त्या चुकीची बारकाईनें तपासणी केली असतां सामान्यत: आम्हांला असें आढळून येतें कीं, मनाला आलेला अनुभव, त्याला प्राप्त झालेलें ज्ञान हेंच त्या चुकीच्या मुळाशीं असतें; या अनुभवाचे अंश, या ज्ञानाचे अंश मन घेतें आणि तें भलत्या रीतीनें एकत्र करतें, भलत्या स्थानीं ठेवतें, त्यांचा भलता उपयोग करतें, त्यांचा भलता अर्थ करतें, त्यांचा भलता व्यवहार करतें -- इत्यादि. भलत्या गोष्टी अयोग्य, अनुचित गोष्टी ज्ञानाचे अनुभवाचे अंश, म्हणजे मनाची चूक, चुका असें यावरून स्पष्ट होतें. मनाहून अधिक सत्यमय जाणिवेसाठीं अंत:स्फूर्तीची, अन्त:सूचनेची शक्ति जें काम करीत असते, तें काम मनाची कल्पनाशक्ति मनासाठीं करीत असते. सत्यमय जाणिवेला अन्त:सूचना संभाव्य गोष्टी सुचविते, मनाला त्या कल्पनाशक्ति सुचविते. मन जसजसें सत्यदर्शी जाणिवेच्या उच्चतर स्थानाकडे प्रगति करीत जातें, चढत जातें तसतशी त्याची कल्पनाशक्ति सत्यदर्शी-कल्पना होत जाते. मनानें जें ज्ञान अगोदर मिळविलें असेल व व्यवस्थितपणें साकार केलें असेल (तें ज्ञान मनाच्या कार्याला पुरेसें असो, अपुरें असो) त्यांत ही सत्यदर्शी-कल्पना उच्चतर सत्याचा रंग आणि प्रकाश ओतते; वरच्या भूमिकांवरचा प्रकाश या सत्यदर्शी-कल्पनाशक्तींत वाढ करून तिचें रूपांतर करीत असतो; अशी रूपान्तरित सत्यदर्शी-कल्पनाशक्ति स्वरूपांतर करीत करीत स्वतःच अन्त:सूचनाशक्ति, अन्त:स्फुरणशक्ति बनते. याप्रमाणें मन उन्नत झालें म्हणजे तें आभास, भ्रम, प्रमाद इत्यादि उभे करीत नाहीं. प्रमादकार, भ्रमकार या भूमिका टाकून तें अप्रमादी सत्यरचनानिष्ठ बनतें. असो. मनाच्या प्रगतीची, ऊर्ध्वगतीची गोष्ट सोडून देऊं, आणि मनाची प्रस्तुत अवस्था प्रस्तुतच्या मनाकडून कसल्या प्रकारची निर्मिति घडविते त्याचा पुन्हां थोडा विचार करूं. मन वस्तूंची निर्मिति

पान क्र. २५५

 

करतें पण तें सार्वभौम, सर्वसमर्थ निर्मातें नाहीं; नसत्या अस्तित्वांत, मुळींच नसलेल्या वस्तूंची निर्मिति सार्वभौमत्वानें तें करीत नाहीं; शून्यांत तें वस्तू निर्माण करीत नाहीं; अशी सार्वभौम सर्वसमर्थता त्याचे ठिकाणीं नाहीं. मन हें अज्ञान आहे, जिज्ञासू आहे, ज्ञानासाठीं प्रयत्न करणारें अज्ञान आहे; त्याचे जे आभास असतात त्यांना देखील वास्तवाचा कांहीं आधार असतो; मनाच्या ज्ञानाच्या मर्यादितपणामुळें, त्याच्या अर्धवट ज्ञानामुळें, अज्ञानामुळें हे आभास निर्माण होतात. विश्वाच्या अज्ञानाचें मन हें उपकरण आहे, विश्वाच्या भ्रमाचें तें उपकरण नाहीं. विश्वभ्रमाच्या उपकरणासारखें त्याचें वागणें नाहीं. शून्यांतून निर्मिति ही गोष्ट वेगळी आणि वास्तवांतून वास्तवाच्या आश्रयानें कमीअधिक चुकीची निर्मिति ही गोष्ट वेगळी. शून्यांतून निर्मिति करणाऱ्या मायेचें, खऱ्या विश्वभ्रमाचें मन हें उपकरण नाहीं, साधन नाहीं. विश्वांत अज्ञान-विभाग आहे, ज्ञान-विभाग आहे; पैकीं अज्ञान-विभागांत मन हें काम करतें. विश्वगत अज्ञानाचें, अज्ञान-विभागाचें मन हें उपकरण आहे, साधन आहे. मन हें अज्ञानांतून ज्ञानाकडे प्रवास करीत असतें, तें सत्यें किंवा तत्त्वें, शक्यता आणि वास्तवता यांच्या शोधांत असतें. या गोष्टींचा शोध तें लावते, तसेंच या गोष्टी तें स्वत: निर्माण करतें किंवा करूं इच्छितें; तें आद्य जाणीव आणि आद्य शक्ति यांजपासून अस्तित्वांत आलेलें आहे; त्यांनीं त्याला अस्तित्वांत आणलें आहे. अर्थात् ही आद्य जाणीव आणि आद्य शक्तीच तत्त्वें (सत्यें), शक्यता, वास्तवता यांची निर्माती असली पाहिजे असा तर्क करण्यास हरकत नाहीं. या आद्य जाणिवेची आणि शक्तीची कारागिरी, मनाप्रमाणें मर्यादित क्षेत्रांत चालत नसून, सर्व विश्व व्यापणारी आहे. या कारागिरींत चूक होण्याचा संभव नाहीं; कारण येथें अज्ञानाचा सर्वथा अभाव आहे; ही जाणीव आणि शक्ति सार्वभौम सर्वसमर्थ साधन, सर्वसमर्थ परमात्म्याची आत्मशक्ति आहे. परात्पर, सर्वज्ञ, सर्वसमर्थ पुरुषाची - शाश्वत ज्ञान आणि विज्ञान ज्याचें स्वरूप आहे त्या परमात्म्याची - आत्मशक्ति म्हणजेच आद्य जाणीव आणि आदिशक्ति होय.

आतांपर्यंत केलेल्या स्वप्न, आभास व मन यांच्या विषयींच्या विवेचनानंतर आमच्या समोर जें भेदमय विश्व आहे त्याच्या स्वरूपासंबंधानें आणि उत्पत्तिसंबंधानें ज्या दोन उपपत्ती शक्य आहेत त्यांचा थोडक्यांत परामर्ष घेऊं. मायावादानुसार अशी कल्पना करतां येईल कीं, माया

पान क्र. २५६

 

नांवाची अशी एक आद्य जाणीव आणि शक्ति आहे कीं, जी आभासमय, मिथ्या वस्तु निर्माण करते; मानवी सृष्टींत आणि पशु सृष्टींत, मानवी आणि पाशवी जाणिवेंत या मूळ मायेनें, शक्तिमय जाणिवेनें मन हें आपलें साधन म्हणून ठेवलेलें आहे; आमच्या समोर जी भेदमय सृष्टि दिसत आहे ती मिथ्या आहे, मायेची कल्पित रचना आहे; भेदशून्य, विशेष-शून्य, अनिर्वचनीय, सर्वनिरपेक्ष अशी कांहीं सद्‌वस्तु, ब्रह्म हीच एक सत्य वस्तु आहे. ही एक उपपत्ति. दुसरी अशी कीं, भेदमय विश्व हें मिथ्या नसून सत्य आहे, आणि हें सत्य-विश्व, आद्य, सर्वश्रेष्ठ, विश्वव्यापी सत्य-जाणिवेनें निर्माण केलें आहे; या विश्वामध्यें तिचें साधन मन, हें अपूर्ण जाणिवेच्या रूपानें काम करतें : तें अज्ञानमय आहे, त्याला थोडें कळतें, थोडें कळत नाहीं, तें अंशत: जाणतें, अंशत: नेणतें आहे : अर्थात् या कारणानें तें चुकी करण्यास पात्र आहे, त्याला जें ज्ञात आहे त्याचें स्वरूप विपरीत करून दाखविणें, त्याच्यावर जी रचना करावयाची ती चुकीची, भलत्याच प्रकारची करणें, अज्ञाताकडे चांचपडत चांचपडत, अडखळत, अनिश्चित प्रकारें प्रवास करणें, वस्तुनिर्मिति, वस्तुरचना अर्धवट आणि अर्धवटपणें करणें, सत्य आणि असत्य, ज्ञान आणि अज्ञान यांच्याविषयीं नेहमीं दोलायमान अवस्थेंत राहणें, कधीं इकडे कधीं तिकडे झुकणें -- अर्धवट जाणतें, अर्धवट नेणतें मन या गोष्टी स्वभावत:च करीत असतें. हें मन, हें अज्ञान, त्याच्यांत कोठेंहि दोष असले, तरी ते त्याला असलेल्या ज्ञानावरच आपल्या रचना आधारतें आणि अधिक ज्ञानाच्या दिशेनें प्रवास करीत असतें; हें रचना करण्याचें काम आणि अधिक ज्ञानाकडे प्रगति करण्याचें काम तें अडखळत ठेंचा खात करीत असतें ही गोष्ट वेगळी; शिवाय आपल्या मर्यादा, आपला आकुंचितपणा तें टाकून देऊं शकतें, त्याच्यांत ही शक्ति स्वभावत: आहे, अंगभूत आहे; या शक्तीच्या आधारें तें आपलें ज्ञान-अज्ञान मिश्रणाचें आकुंचित स्वरूप टाकून, मोकळें होऊन, सत्य जाणिवेचें स्वरूप, आद्यज्ञानाच्या शक्तीचें विशाल व मर्यादाशून्य स्वरूप स्वत: धारण करूं शकतें. आम्हीं जी या विषयाची तपासणी केली आहे, त्या तपासणींत दुसऱ्या उपपत्तीची सयुक्तिकता आमच्या नजरेस आलेली आहे. या तपासणींत हा सिद्धांत सयुक्तिक म्हणून ठरत आहे कीं, आमच्या जाणिवेचें स्वरूप असें नाहीं कीं तिच्यापुढें असलेल्या प्रश्नाचें उत्तर विश्व हा भ्रम आहे, माया-कार्य आहे या उपपत्तीनें देणें समर्थनीय होईल. प्रश्न आमच्या समोर आहे हें

पान क्र. २५७

 

निःसंशय -- पण तो प्रश्न असा आहे कीं, ज्ञान आणि अज्ञान यांचें मिश्रण जें आमच्या आत्मविषयक आणि वस्तुविषयक जाणिवेंत असतें तें मिश्रण हा दोष आहे, अपूर्णता आहे, ज्ञानाची अपूर्णता आहे; ही अपूर्णता आली कोठून, कां आणि कशी ? या प्रश्नाचें उत्तर देण्यासाठीं आद्य भ्रमोत्पादक मायाशक्तीची कल्पना करण्याचें कारण नाहीं. अशा कल्पनेची आवश्यकता नाहीं. शाश्वत अशा ब्रह्माचे ठिकाणीं माया ही नेहमींच उपस्थित असते, गूढपणें उपस्थित असते अशी एक कल्पना आहे; ती अशी नेहमींच ब्रह्माला चिकटलेली नसून, मध्येंच उपस्थित होते अशी दुसरी कल्पना आहे : पण ब्रह्माची जाणीव ही अतिचेतन जाणीव आहे; ती नित्य, शुद्ध, सर्वनिरपेक्ष आहे आणि या सर्वथा निराकार व निर्गुण वस्तूवर माया ही मिथ्या, भ्रमरूप, वास्तवताशून्य आकाराचें विश्व लादते; आपल्या लहरीनें, ब्रह्माच्या इच्छेविरुद्ध उभें करते, अशी मायावादाची उपपत्ति आहे. आमच्यापुढील प्रश्नाला हेंच उत्तर दिलें पाहिजे अशी कांहीं या प्रश्नाची अगतिक स्थिति नाहीं, ही गोष्ट आमच्या या विषयाच्या चिकित्सेंत आमच्या नजरेस स्पष्टपणें आलेली आहे.

पान क्र. २५८

 









Let us co-create the website.

Share your feedback. Help us improve. Or ask a question.

Image Description
Connect for updates