दिव्य जीवन 1879 pages 1960 Edition
Marathi Translation
  Senapati Bapat

ABOUT

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics, expounding a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth.

THEME

philosophymetaphysics

दिव्य जीवन

Sri Aurobindo symbol
Sri Aurobindo

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.

Sri Aurobindo Birth Centenary Library (SABCL) The Life Divine Vols. 18,19 1070 pages 1970 Edition
English
 PDF    philosophymetaphysics
Sri Aurobindo symbol
Sri Aurobindo

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.

Marathi Translations of books by Sri Aurobindo दिव्य जीवन 1879 pages 1960 Edition
Marathi Translation
Translator:   Senapati Bapat  PDF    LINK

प्रकरण सहावें

 

विश्वांत मानवाचें स्थान

 

      मानवाचा आत्मा हा एक प्रवासी आहे, तो ब्रह्मचक्रांत फिरत आहे, हें ब्रह्मचक्र अफाट आहे, येथें सर्व जीवांचा मेळा आहे, सर्व अवस्थांचा संसार आहे; प्रवासाला धाडणाऱ्यापासून स्वत:ला वेगळा समजतो म्हणून मानवाचा आत्मा या ब्रह्मचक्रांत फिरत राहतो. ब्रह्मानें (प्रवासाला धाडणाऱ्यानें) त्या आत्म्याला अंगीकारलें म्हणजे अमृतत्वाचें ध्येय त्या आत्म्याला हस्तगत होतें.

- श्वेताश्वतर उपनिषद् १.

 

विश्वाला कांहींतरी अर्थ आहे, विश्वाला कांहींतरी ध्येय आहे, विश्व ही कांहीं निर्हेतुक आभासमय वस्तु नव्हे, किंवा कशीतरी घडलेली 'आकस्मिक' घटना नव्हे. मग या विश्वाचा अर्थ काय ? एका महान् परात्पर, सर्वातीत, प्रकाशमय सद्वस्तूचें क्रमश: आविष्करण, हा विश्वाचा आमच्या मतें अर्थ आहे. या आविष्करणासाठीं जशा या दृश्य विश्वांतील अनंत मर्यादित सापेक्ष वस्तू व घटना आहेत, तशाच आम्हाला न दिसणाऱ्या दुसऱ्या विश्वांतीलहि मर्यादित सापेक्ष वस्तू व घटना या सद्वस्तूच्या आविष्करणासाठींच आहेत. या आविष्कारासाठीं साधनसामग्री म्हणून, कच्चा मसाला म्हणून, पूर्व तयारी म्हणून, आवश्यक क्षेत्र म्हणून, या व दुसऱ्या अदृश्य विश्वांतील सर्व वस्तूंचा व घटनांचा वापर केला जातो. विश्वाचें अस्तित्व ही मनाची फसवी कल्पना नाहीं, हा सिद्धांत ज्या न्यायसंगत विचारसरणीनें आम्ही बसवितो, त्याच विचारसरणीनें हें निश्चितपणें ठरतें कीं, विश्वाच्या पोटीं लपलेली एक ज्ञानशक्ति आहे; या ज्ञानशक्तीला विश्वाचा आरंभ आणि अंतिम ध्येय ठाऊक आहे, आणि ही ज्ञानशक्ति मार्गदर्शक या नात्यानें, विश्वाची गति व प्रक्रिया निश्चित करीत असते. 'विश्व म्हणजे, एकमेकांपासून भिन्न

 

पान क्र. ८०

 

अशा असार साकार वस्तूंचा स्वयंभू आंधळा असहाय मेळावा होय, या वस्तू अनंत काल आपापल्या कक्षांतून फिरत असतात, व फिरतांना एकमेकींशीं कधीं चिकटतात, कधीं झगडतात; विश्व हें एका अज्ञानमय शक्तीनें स्वत: निर्मिलेलें व स्वत: गतिमान् केलेलें प्रचंड शक्तिचक्र आहे' - विश्वासंबंधींच्या अशा कल्पना न्यायसंगत विचारसरणि मान्य करूं शकत नाहीं. न्यायसंगत विचारसरणीनुसार, विश्वातीत विश्वनिरपेक्ष अशी एक सत्ता आहे; अर्थात् ती पूर्णपणें स्वायत्त आहे, स्वत:ची पूर्ण मालक आहे; ही सत्ता सर्व दृश्य अस्तित्वाच्या (विश्वाच्या) आंत लपलेली आहे, हें दृश्य विश्व सर्वस्वीं तिच्या ताब्यांत आहे; ही स्वायत सत्ता आकार धारण करून व्यक्त होते. मानवी व्यक्तीमध्यें ही सत्ता आपलें स्वरूप उघडें करून दाखवितें.

व्यक्तीमध्यें त्या विश्वातीत सत्तेचा उदय होणें, प्रकाशमय उत्थान होणें, याला आमचे प्राचीन आर्यपुरुष अरुणोदय म्हणत, उषेचें आगमन म्हणत व या उषेची ते पूजा करीत. विश्वव्यापक विष्णु देवतेचें उंचांत उंच ठेवलेलें पाऊल म्हणजे या उषेचें - व्यक्तीमध्यें उदय पावलेल्या प्रकाशमय सद्वस्तूचें - पूर्णता पावल्यानंतरचें स्वरूप होय. मनाच्या अति शुद्ध स्वर्गांत सर्वत्र नजर फेंकणारा दिव्यदर्शनसमर्थ नेत्र, असेंहि या अत्त्युच्च स्थानाच्या विष्णूचें वर्णन प्राचीन आर्य करीत. अत्युच्च स्थानीं विष्णु (सद्वस्तु) आहे, विष्णूचा नेत्रहि आहे, विष्णूचें पाऊलहि आहे. आम्हाला कोठें पोंचावयाचें आहे तें स्पष्ट करण्यासाठीं हें विष्णूचें उच्च स्थानचें पाऊल आहे. विष्णूचा नेत्र आम्हाकडे पहात राहून आम्हाला मार्ग दाखवीत, त्याचें पाऊल ज्या सर्वोच्च स्थानीं आहे, तेथें आम्हाला पोंचविणार आहे. वस्तुत: सर्व कांहीं व्यक्त करणारें वस्तुजातांतील सर्वव्यापी सत्यतत्त्व या नात्यानें विष्णुतत्त्व, सद्वस्तु, सर्वप्रथम सर्वोच्च स्थानीं अस्तित्वांत असतेंच. हें विष्णुतत्त्व विश्वावर नजर ठेवतें. मर्त्य मनुष्याला आपला वेध लावतें; प्रथम मनुष्याच्या मनाला, त्याच्या जाणिवेला हा वेध, हें आकर्षण, ठाऊकहि होत नाहीं; निसर्गाची, निसर्ग निर्मात्याची सर्वसामान्य वाटचाल चालू असते, त्या वाटचालींत निसर्ग जसजसा निसर्गनिर्मात्याकडे आकर्षिला जातो तसतसा निसर्गाबरोबर त्याच्या पोटांतील मानवहि अजाणतां आकर्षिला जातो. पण शेवटीं मानवाच्या जाणिवेला दिव्य विष्णूच्या, सद्वस्तूच्या आकर्षणाचा स्पर्श होतो, मानव हळूहळू क्रमाक्रमानें अधिकाधिक जागृत होऊन आपल्या आत्म्याचें क्षेत्र व उंची

 

पान क्र. ८१

 

वाढवून सद्वस्तूच्या दिव्य, उच्च स्थानाकडे नेणारा मार्ग जाणीवपूर्वक, विचारपूर्वक चढत राहतो. दिव्य जीवनाच्या उच्च पायरीवर चढून जाणें हाच खरा मानवाचा मानवोचित प्रवास होय; त्याच्या सर्व कार्यांत हें कार्य श्रेष्ठ आहे, ईश्वराला आवडणारा, स्वीकार्य होणारा असा यज्ञ, असा त्याग, मानवाकडून या कार्यांत, या प्रवासांत घडतो. हा दिव्य प्रवास, हेंच एक मानवाचें या विश्वांतील खरें काम आहे, त्याच्या मानवी जीवनाला या दिव्य प्रवासानेंच केवळ सार्थता येते. हा दिव्य प्रवास जर तो न करील तर त्याचें जीवन केवळ सरपटत जाणाऱ्या किड्याप्रमाणें होईल; अनंत क्षणजीवी किड्यांत हा एक मानवरूपी किडा ठरेल; स्थूल भौतिक विश्वांत अद्भुत, अतिप्रचंड वस्तूंच्या बरोबर पृथ्वी म्हणून जें एक चिखल-पाण्याचें क्षुद्र ठिकाण तयार झालें आहे, त्या ठिकाणीं सरपटत जाणाऱ्या किड्यांत मानवाची गणना करावी लागेल.

दृश्य जगाच्या विरोधात्मक घटनांमधून जें सत्य, जी वस्तुजाताच्या अंतरांतील सद्वस्तु वर यावयाची आहे, व्यक्त व्हावयाची आहे ती सद्वस्तु कोणती ? ज्ञानी लोकांनीं असें सांगून टाकलें आहे कीं, ती सद्वस्तु म्हणजे अनंत, आनंदमय, आत्मज्ञानपूर्ण अस्तित्व किंवा सत्ता होय. ही सत्ता सर्वत्र, सर्व वस्तूंत, सर्वकाळीं, आणि कालापलीकडेहि एकाच स्वरूपांत सारखी असते. दृश्य वस्तूंच्या पोटीं, त्यांच्या पाठीमागें, ती जाणीवपूर्वक राहते. या दृश्य वस्तूंच्या अत्यंत जोरदार क्रियात्मक हालचाली, त्यांचे अति प्रचंड समूह या अदृश्य सत्तेचा पूर्ण आविष्कार करूं शकत नाहींत, त्या सत्तेला मर्यादित करूं शकत नाहींत. ही सत्ता स्वयंभू आहे, तिचा आविष्कार होवो न होवो, त्यावर कांहीं तिचें अस्तित्व अवलंबून नाहीं. तिचें अनेक आविष्कार तिचें प्रतिनिधित्व करतात, तिला लोकांच्या नजरेस आणतात. पण त्या आविष्कारांनीं ती सर्वच्या सर्व व्यक्त झाली असें कधींहि होत नाहीं, होऊं शकत नाहीं. हे आविष्कार तिच्याकडे बोट दाखवितात, दुरून तिची अंधुक कल्पना देतात, पण तिला आमच्या पुढें प्रत्यक्ष उभी करूं शकत नाहींत. त्या आविष्कारांना जे आकार, जीं रूपें लाभतात त्या रूपांच्या, त्या त्या आकारांच्या अंतरीं ती सत्ता, ती सद्वस्तु स्वत: स्वत:लाच केवळ प्रत्यक्ष होते. ती ज्ञानमय सत्ता स्थूल आकारांत, आपल्या स्वयंभू पूर्णत्वाचा क्रमश: पूर्ण विकास करण्यासाठीं स्थूल, साकार होते. विकासक्रमानें मानवाकार झालेली ज्ञानमय सत्ता आत्मविकासानें अंत:प्रकाश, आत्मसाक्षात्कार, आत्मानुभूति ही विकासाची

 

पान क्र. ८२

 

पायरी गांठते. मानवाच्या आकारांत ती अंतःप्रकाशादिकांच्या साह्यानेंच स्वत: स्वत:ला ओळखते. विश्वामध्यें ती आपलें स्वरूप जेव्हां धारण करते तेव्हां तिला स्वतःचें ज्ञान होतें. स्वरूपाच्या ज्ञानाच्या पूर्वीं स्वरूप घेणें हें श्रद्धेच्या बळावर शक्य होतें. विश्वामध्यें तिचें स्वरूप-धारण आणि स्वरूप-ज्ञान यांचा अन्योन्यसंबंध आहे. तिच्या स्वरूपांत सत्ता आणि ज्ञान एकत्र अविभाज्य आहेत व सत्ता आणि ज्ञान यांजबरोबर आनंदहि शाश्वतचा आहे. सच्चिदानंद हेंच या सत्तेचें स्वरूप. आकारांच्या, अवस्थांच्या आंत ही सत्ता सर्वस्वी स्वतंत्र, व स्वायत्त असते. ती आपल्या आकारांना व अवस्थांना आपला सच्चिदानंद स्वरूपाचा ज्ञानमय आनंद देऊं शकते, देते. मन-प्राण-शरीर यांत अनंत, आनंदमय, ज्ञानमय सत्तेनें याप्रमाणें साकार व्हावें, (या त्रयीचा आकार अर्थात् या सत्तेला आवश्यक नाहीं -- तिचें आकारनिरपेक्ष अस्तित्व स्वयंभू शाश्वत आहेच.) आणि वैयक्तिक अस्तित्वाचें अशा प्रकारें रूपांतर व अवस्थांतर व्हावें, अशी या स्वयंभू सत्तेची योजना आहे. वैयक्तिक अस्तित्वाचा हाच उपयोग आहे. व्यक्तता नसतांना ही अव्यक्त सत्ता नेहमींच स्वत:शीं एकरूप, सच्चिदानंदरूप असते. हें सच्चिदानंदत्व व्यक्ततेनंतर, व्यक्तीव्यक्तींच्या संबंधांत, व्यक्ति व समुदाय यांच्या संबंधांत व दुसऱ्या अनेक संबंधांतहि तिला दाखवतां येतें.

मानवी बुद्धीला शक्य असणाऱ्या सर्व ज्ञानाच्या पलीकडे ती मूळ सद्वस्तु आहे आणि ती स्वत:ला सच्चिदानंद म्हणून ओळखते, हा वेदांताचा सर्वश्रेष्ठ सिद्धांत आहे. दुसरे सर्व सिद्धांत याच्या पोटांत येतात, किंवा यावर अवलंबून असतात. मानवी बुद्धीला अज्ञेय असणाऱ्या सच्चिदानंदाचा मानवी आत्म्याला अनुभव घेतां येतो. आत्म्यापुढचीं सर्व दृश्यें असार-परित्याग पद्धतीनें तपासलीं - त्यांचीं आवरणें, त्यांचे आकार दूर केले - म्हणजे काय शिल्लक राहते? तीं दृश्यें नाहींशीं होतात व एक सच्चिदानंद ब्रह्म शिल्लक राहतें. हीच एक वस्तु, हाच एक अनुभव शिल्लक राहतो. दृश्यांच्या नाशवंत नामांत व रूपांत त्यांचें तत्त्वभूत असें अविनाशी सत्य काय आहे ? अशा प्रकारें सार-परिग्रह पद्धतीनें आत्म्यापुढील सर्व दृश्यांची तपासणी केली तरी सच्चिदानंद ब्रह्म ही एकच वस्तु, हा एकच अनुभव शेवटीं शिल्लक राहतो. आपलें ध्येय जीवनाची परिपूर्ति हें असो, किंवा जीवनातीत स्थिति हें असो; आपलें ध्येय आत्म्याची शुद्धता, शांति व मुक्ति हें असो, किंवा आत्म्याचें सामर्थ्य, आनंद, समग्रता

 

पान क्र. ८३

 

(पूर्णता) हें असो -- या ध्येयांच्या मागें लागणारी आमची मानवी जाणीव, वस्तुत: सदासर्वदा सच्चिदानंदाच्याच शोधांत असते; अज्ञात, सर्वव्यापी, जिच्यावांचून कोणाचेंच चालत नाहीं अशी सच्चिदानंद ब्रह्म ही वस्तु आहे; आणि ज्ञानांत व भावनांत किंवा संवेदनांत व कृतींत, सच्चिदानंदाचा शोध करून अनुभव घेण्याकडे आमच्या जाणिवेचें सर्व लक्ष लागलेलें असतें.

विश्वातीत, अज्ञेय असें सच्चिदानंद हें, विश्व आणि व्यक्ति या दोन दृश्यांत उतरतें. हीं दोन दृश्यें सारभूत आहेत. या दोन वस्तूंच्यामध्यें अनेक समष्टी, समुदाय आहेत. पण ते सर्व या दोहोंच्या अन्योन्यावर होणाऱ्या क्रिया-प्रतिक्रियांतून निर्माण होतात. त्या अज्ञेयाकडे जावयाचें तर विश्व व व्यक्ति या दोहोंच्या द्वारांच जावयास पाहिजे. सर्वोत्तम सद्वस्तूचें हें खालीं येणें, स्वभावत: तिचें स्वत:ला लपविणें आहे. हें अवतरण किंवा लपणें क्रमाक्रमानें घडतें. एकाखालीं एक, अशा अनेक भूमी किंवा भूमिका, पायऱ्या किंवा पातळी या अवतरणाच्या क्रमांत तयार होतात. अवतरणाच्या क्रमांत ही सर्वोच्च सद्वस्तु लपण्याच्या उद्देशानें एकावर एक अशीं अनेक आवरणें घेत असते. ती अगदीं खालीं स्थूलाच्या भूमिकेवर, स्थूलाच्या आवरणांत एकदां येऊन पोंचली म्हणजे तिचा उलट क्रम - वर चढण्याचा, आवरण दूर सारून आत्मदर्शन देण्या-घेण्याचा क्रम - सुरूं होतो. अर्थात् ब्रह्माच्या अवतरणामध्यें ज्या क्रमवार अवतरण-भूमिका असतात त्याच उलटक्रमानें मनुष्याच्या क्रमवार आरोहण-भूमिका होतात. तें अज्ञात ब्रह्म जें जें आवरण क्रमानें घेत घेत लपतछपत खालीं येतें, तें प्रत्येक आवरण ब्रह्मभक्ताला, ब्रह्मशोधकाला क्रमश: उलट क्रमवारीनें ब्रह्मसाक्षात्काराचें साधन बनतें. जड, भौतिक, स्थूल निसर्ग ही सर्वांत खालची भूमिका, सर्वांत बाहेरचें आवरण. हा स्थूल, भौतिक निसर्ग म्हणजे जणुं झोंपलेलें ब्रह्मशरीर असतें. या झोंपेंत निसर्गाच्या हालचाली अगदीं तालबद्ध सुसंगत चाललेल्या असतात. निसर्गाच्या शक्तीच्या या सुव्यवस्थित हालचाली ज्या आत्म्याच्या किंवा तत्त्वाच्या योजनेमुळें होतात, त्या आत्म्याची किंवा तत्त्वाची जाणीव निसर्गाला नसते. निसर्गाला जणुं भौतिक समाधि, महासमाधि लागलेली असते. या समाधींत निसर्ग मौन धारण करीत असतो. ही ब्रह्माची सर्वांत खालच्या भूमिकेवरील अवस्था झाली. या अवस्थेंतून निसर्ग किंवा विश्व - किंवा विश्वरूप ब्रह्म म्हणा - धडपड करीत वरच्या प्राणमय जडाच्या अवस्थेंत चढून जातें. या अवस्थेंत

 

पान क्र. ८४

 

जड भौतिक अवस्थेंतील स्थिर एकमुखी तालबद्धता असत नाहीं. कमी अधिक अस्थिर, अव्यवस्थित परंतु विविध प्रकारची व द्रुतगतीची तालबद्धता, निसर्गाच्या जीवमान वर्गांत आढळून येते. या जीवाच्या, प्राणमय जडाच्या, तालबद्ध गतीला लागूनच, गतिमान् आत्मजाणिवेची हद्द असतें. विश्वरूप ब्रह्म, जडता अनुभवून, जीवता-प्राणमयता-अनुभवण्यासाठीं धडपडत वर चढतें त्याप्रमाणें प्राणमयता, जीवता अनुभवून वरतीं मनाच्या क्षेत्रांत तें चढतें. या मनाच्या क्षेत्रांत मनोमय जीव, स्वत:ला व विश्वाला ओळखूं लागतो. एवढी जागृति विश्वाच्या सर्वोच्च घटकांत आली, इतरांपासून वेगळेपणें स्वत:ला ओळखणारें व्यक्तित्व त्याच्या सर्वोच्च घटकांत आलें म्हणजे, त्याला (विश्वाला) आपल्या सर्वश्रेष्ठ कार्यासाठीं (विश्वातीताची प्राप्ति करून घेण्याच्या कार्यासाठीं) अवश्य असणारें आत्मोद्धाराचें साधन मिळाल्यासारखें होतें. परंतु विश्वाचें इष्ट कार्य, मन कांहीं शेवटपर्यंत करूं शकत नाहीं, पूर्ण करूं शकत नाहीं. विश्वानें आरंभिलेलें विकासकार्य केवळ कांहीं मर्यादेपर्यंत तें पुढें नेतें. मन हा एक श्रमिक आहे. त्याला तीव्र बुद्धि लाभलेली आहे, पण ही बुद्धि मर्यादित शक्तीची असून त्या क्षेत्रांतच फक्त ती काम करूं शकते. प्राणमय जीवनानें जो कमीअधिक अव्यवस्थित माल मनापुढें मांडलेला असतो तो घेऊन त्यांत, त्याच्या मर्यादित शक्तीनुसार कांहीं सुधारणा करणें, इष्ट कार्यासाठीं तो योग्य करून घेणें, त्याच्यांत विविधता येईल असें करणें, त्याचें वर्गीकरण करणें - हे इतके संस्कार, प्राणमय जीवनानें दिलेल्या मालमसाल्यावर करून, हा मसाला मन त्या कारागिराच्या हातीं देतें, जो कारागीर आमचें जीवन दिव्यतामय करण्याच्या कामांत सर्वश्रेष्ठ कर्तबगारीचा कलावंत आहे. हा कलावंत अतिमानसांत राहतो. अतिमानस म्हणजे अतिमानव. [अतिमानस (विज्ञान) ज्याला लाभलें तो अतिमानव] तेव्हां आमचें विश्व मनापर्यंत चढून आलें आहे, तें आणखी वर चढावयाचें आहे; मनापेक्षां श्रेष्ठ अशा जाणिवेच्या शक्तीनें, अतिमानसिक शक्तीनें युक्त व्हावयाचें आहे. ही श्रेष्ठ शक्ति किंवा तत्त्व, ही श्रेष्ठ अवस्था व क्रियासामर्थ्य विश्वाला लाभलें म्हणजे विश्व आणि व्यक्ति या दोघांना त्या विश्वातीताची, विश्वातीत परतत्त्वाची ओळख होते व प्राप्ति होते. हें परतत्वच वस्तुत: विश्व आणि व्यक्ति या रूपांनीं व्यक्त झालें आहे. ही अतिमानसिक किमया पूर्ण झाली कीं विश्व आणि व्यक्ति यांना एकमेकांचा संबंध स्पष्ट होतो, एक-

 

पान क्र. ८५

 

मेकांचें कार्य एकमेकांना पूरक आहे हें स्पष्ट होतें, आणि म्हणून या दोनहि परतत्त्वाच्या प्रतिमा अन्योन्यसंबंधांतील विसंवाद दूर करून पूर्ण सलोख्यानें वागतात, ऐक्यभावानें बांधल्या जातात.

प्राण आणि मन यांच्या व्यवहारांत जी अव्यवस्था असते ती अतिमानसिक दृष्टि लाभल्यानें दूर होते, कारण या दृष्टीला भौतिक व्यवस्थेपेक्षां अधिक पूर्ण अशा व्यवस्थेचें रहस्य दिसतें. प्राण आणि मन यांच्या खालच्या पातळीवर जें भौतिक द्रव्य असतें, त्यांत पूर्ण शांत अवस्था आणि अमर्याद शक्तीची प्रचंड क्रिया यांचा समतोल असतो. परंतु या गोष्टी त्या द्रव्याच्या स्वतःच्या नसतात, त्या स्वत:च्या आहेत हा अनुभव त्याला नसतो. त्याची शांतता त्याची नसते, ती शांतता म्हणजे जाणिवेवरील एक निस्तेज पडदा, ज्ञानशून्य जडतेचा पडदा असतो; ती एक जाणिवेच्या झोंपेची, संवेदनाहीन अवस्था असते; किंवा असें म्हणतां येईल कीं, जींत जाणीव आंत कोंडून टाकलेली, प्रतिबंधक औषधानें रुद्ध केलेली आहे, अशी ती जड भौतिक द्रव्याची वरची शांतता असते. हें जडद्रव्य एका शक्तीमुळें गतिमान् होतें; ही शक्ति त्या द्रव्याचा खरा आत्मा म्हणून असते, परंतु त्या द्रव्याला त्याच्या जड भौतिक स्थितींत या आत्म्याची जाणीव नसते; त्या आत्म्याच्या अनुभवांत त्याला भाग घेतां येत नाहीं; त्याच्या पोटीं काम करणाऱ्या तालबद्ध शक्तीच्या आनंदाचा, त्याच्या आत्म्याच्या आनंदाचा लाभ घेण्याइतकी जागृति त्याच्यांत असत नाहीं.

प्राण आणि मन यांच्यांत एवढी जागृति आलेली असते कीं, त्यांना 'आपला आत्मा' म्हणून कांहीं असावें असें वाटतें, त्याचा शोध घ्यावा असें वाटतें, त्याची तृप्ति व्हावी असें वाटतें; या गरजा त्यांना भासूं लागतात आणि म्हणून त्यांची धडपड सुरू होते. मनाच्या अज्ञानाची ज्ञानासाठीं व प्राणाच्या वासनेची भोगासाठीं धडपड सुरू होते. कितीहि धडपड केली तरी प्राणाची वासना, मनाची जिज्ञासा अतृप्तच राहते. तरीपण ही धडपड, आत्मज्ञान व आत्मतृप्ति प्राप्त होण्याची शक्यता निर्माण करते. आत्मतृप्तीचें, आत्मपरिपूर्तीचें क्षेत्र, प्राण आणि मन यांच्या क्षेत्राच्या पलीकडे आहे. प्राण आणि मन आपल्या प्रकृतींतून आपला उद्धार करून जेव्हां एक प्रकारची अतिप्राकृतिक अवस्था प्राप्त करून घेतात तेव्हां त्यांना आत्मज्ञानाचा व आत्मतृप्तीचा लाभ घडतो. जड भौतिक निसर्गांत दिसणारी, पूर्ण शांतता आणि प्रचंड क्रिया यांची समतोलता ही ज्याचें स्थूल प्रतिबिंब आहे ती खरी दिव्य समतोलता (स्थितप्रज्ञता), प्राण व मन

 

पान क्र. ८६

 

यांच्या पलीकडे आमच्या जाणिवेच्या अनुभवास येते. या अतिमानसिक क्षेत्रांत जीं शांतता असते ती जडता किंवा जाणिवेची रुद्ध अवस्था नसते, तर अमर्याद शक्तिसंपन्न असीम आत्मजाणिवेची केंद्रित अवस्था असते; तसेंच या क्षेत्रांतील अमर्याद शक्तीची प्रचंड क्रिया, ही अनिर्वचनीय आनंदाच्या अखंड लहरींनीं संपन्न असते; कारण या क्षेत्रांत शक्तीची हालचाल होते ती तडफडणाऱ्या वासनेची किंवा धडपडणाऱ्या अज्ञानाची हालचाल नसते, तर तिची प्रत्येक हालचाल अखंड असीम आत्मशांति आणि आत्मसामर्थ्य यांचा आविष्कार म्हणून होत असते. प्राण आणि मन यांनीं अतिमानसिक क्षेत्रांत पदार्पण केलें म्हणजे मनाच्या अज्ञानाला तो ज्ञानाचा प्रकाश प्राप्त होतो, ज्या प्रकाशाची अंधुक एकदेशी छाया तें स्वत:च्या क्षेत्रांत असतें; त्याचप्रमाणें या क्षेत्रांत प्राणाच्या वासना पूर्णतया शांत होऊन लयास जातात, कारण येथें जी इष्टसंपन्नता व कृतार्थता त्यांना लाभते, तिच्यासाठींच वस्तुत: त्यांच्या पूर्वींच्या क्षेत्रांत असतां त्यांची धडपड चाललेली असते; अगदीं अतिपाशवी भौतिक भोगाची इच्छा जेव्हां या वासना करीत होत्या तेव्हां देखील, वस्तुत: या अतिमानसिक क्षेत्रांतील ''भोगासाठीं'' त्या आतुर होत्या; त्यांना डोळे नव्हते, त्यांचें स्थान खालीं अंधारांत होतें, त्या पतित स्थितींत काळ कंठीत होत्या म्हणून केवळ त्यांच्या आकांक्षा त्या वेळेला पतित, क्षुद्र, अधम असें बाह्य स्वरूप धारण करून होत्या. त्या आकांक्षांचें हृदय अतिमानसिक क्षेत्रांतील 'भोगांचीच' इच्छा करीत होतें म्हणून त्या क्षेत्रांतील उत्तम विशुद्ध भोग भोगून त्या पूर्णपणें तृप्त व शांत होतात.

विश्व आणि व्यक्ति या दोघांनाहि विश्वातीत परतत्त्वाकडे, ब्रह्माकडे चढण्याच्या कार्यांत एकमेकांची जरूर असते. नेहमींच विश्व आणि व्यक्ति एकमेकांकरितां जगत असतात आणि एकमेकांना लाभदायक होतात. विश्व हें अनंत काल व आकाश किंवा अवकाश यांत पसरलेलें सर्वरूप ब्रह्म, व व्यक्ति हें काल आणि आकाश किंवा अवकाश यांच्या मर्यादांत केंद्रित झालेलें तेंच सर्वरूप ब्रह्म होय. सर्वरूप ब्रह्माची एकरूप सर्वता, बाह्यतः अनंत विस्ताराच्या द्वारां व्यक्त करण्याचा प्रयत्न विश्व करीत असतें; परंतु हा प्रयत्न पूर्णतया यशस्वी होत नाहीं, कारण बाह्य विस्ताराच्या संसारांत एकच एक सद्वस्तु किंवा अस्तित्व हें अनेक अस्तित्वांच्या किंवा वस्तूंच्या बेरजेचें स्वरूप धारण करतें - अर्थात् ही बेरीज कांहीं ''मूळ एक'' किंवा ''अंतिमएक'' होऊं शकत नाहीं. आरंभ-शून्य

 

पान क्र. ८७

 

व अखेर-शून्य असा आवर्त दशांश, (recurring decimal) हेंच एक रूप बेरजेच्या अस्तित्वाला येऊं शकतें. विश्व हें अशा अडचणीत खऱ्या एकतेच्या ध्यासानें आपल्यामध्यें, सर्वरूप ब्रह्म जींत आत्मजाणिवेसह केंद्रित झालें आहे अशी व्यक्ति, निर्माण करतें. या व्यक्तीच्या द्वारां विश्वाला विश्वातीतापर्यंत पोंचण्याची आकांक्षा धरतां येते. प्रकृतीनें अगदीं खालच्या पातळीवरून परत फिरून पुरुषाकडे त्याच्या दर्शनासाठीं जाण्याचें ठिकाण म्हणजे आत्मजाणीवपूर्ण व्यक्ति हें आहे. व्यक्तीच्या द्वारां विश्व आपला आत्मा शोधून काढण्याच्या मार्गास लागतें; ब्रह्म पूर्णपणें निसर्गाचें रूप घेऊन ''कृतार्थ'' झाल्यावर, तो निसर्ग क्रमश: ब्रह्म होण्याच्या मार्गाला लागतो.

वर चढून विश्वातीत ब्रह्माची गांठ घेण्यासाठीं, विश्वाला व्यक्तीची आवश्यकता असते, त्याप्रमाणें व्यक्तीलाहि त्या कार्यासाठीं, विश्वाची आवश्यकता असते. व्यक्तीला आत्मज्ञानप्राप्ति, आत्माविष्कार करण्याची प्रेरणा व साधनसामग्री विश्वाकडून मिळते. व्यक्तीचें अधिष्ठान, उदयस्थान विश्व आहे; तिची साधनसंपत्ति, तिचें कार्यक्षेत्र, तिला जें दिव्य कर्म करावयाचें असतें त्या कर्माचा कच्चा मसाला, सर्व कांहीं विश्वांत आहे, विश्वच पुरवतें. व्यक्तींत विश्वगत ब्रह्मजीवन केंद्रित होऊन राहतें; अर्थात् या केंद्रीभूत ब्रह्माला मर्यादित जागेंत मर्यादित शक्तीनें व्यवहार करावा लागतो. मूळ ब्रह्म एक, अद्वितीय, अंतर्भेदशून्य, एकरस, एकतत्त्व असल्यानें त्याला मर्यादा, सीमा, बंधन कसलेंहि नसतें; पण तशी कांहीं 'व्यक्ति-ब्रह्माची' अवस्था नसते. म्हणून स्वतांत समाविष्ट असलेली 'मूळ-ब्रह्माची' सर्वता व्यक्तीनें व्यक्त करावयाची तर तिला अनिवार्यपणें जाणिवेची विश्वव्यापकता व अ-व्यक्तिता धारण करणें भाग असतें. व्यक्तीनें आपली जाणीव कितीहि विश्वव्यापक केलीं, आपली सामान्य व्यक्तिता कितीहि सूक्ष्म, शून्यवत् करून टाकली, तरी तिला विश्वामध्यें ईश्वरी कार्य करण्यासाठीं एक प्रकारचें गूढ व्यवहार साधन - सामान्य व्यक्तित्वांतील व्यक्तित्व - संभाळून ठेवावें लागतें. व्यक्तीची सामान्य व्यक्तिभावना ही या असामान्य विश्वावेगळ्या गूढ ''व्यक्तित्वाचें'' तमोमय अहंकारी प्रतीक असते. हें गूढ व्यक्तित्व जर व्यक्तीनें संभाळून ठेवलें नाहीं तर तिनें आपलें ध्येय साधलें नाहीं असें होईल, तिला घातलेला प्रश्न तिनें सोडून दिला, सोडवला नाहीं असें होईल; ज्या ईश्वरी कार्याकरितां तिनें जन्म अंगीकारला तें ईश्वरी कार्य तिजकडून होणार नाहीं.

 

पान क्र. ८८

 

क्रियामय, अतिव्यापक जीवन म्हणून व्यक्तीपुढें विश्व उभें राहतें. या महा-जीवनाचें महान् गतिचक्र कसें चालतें त्याचें पूर्ण रहस्य व्यक्तीनें हस्तगत करावयाचें असतें. विश्व म्हणून एकमेकांशीं संघर्ष करणारे, कार्यप्रवृत्त शक्तींचे अनंत परिणाम, व्यक्तीसमोर मोठा गोंधळाचा जमाव करून असतात, त्याचप्रमाणें भविष्य घडविणाऱ्या, कार्यरूप न घेतलेल्या प्रचंड कार्यकारी शक्तींचें, भोंवऱ्यासारखें भोंवळ आणणारें भ्रमण व्यक्तीच्या समोर चाललेलें असतें. या गोंधळांतून व्यक्तीला कांहीं श्रेष्ठ प्रकारची व्यवस्था, अननुभूत सुसंवादित्व निर्माण करावयाचें असतें. मानवाचें सुसंवाद निर्माण करण्याचें हें व्यवस्थाकार्य ''मानवाची प्रगति'' या शब्दांनीं दाखविलें जातें. भौतिक निसर्गानें एक प्रकारची सुव्यवस्था व सुसंवादित्व आपल्या व्यवहारांत निर्माण करून ठेवलेलेंच आहे. मानवी व्यक्तीनें थोड्याशा भिन्न स्वरूपांत भौतिक निसर्गानें केलेलेंच कार्य करावयाचें आहे, असा मानवी प्रगतीचा अर्थ नाहीं. त्याचप्रमाणे मनाच्या पातळीवर तेथील श्रेष्ठ साधनांचा उपयोग करून पाशवी जीवन जगणें हेंहि मानवी जीवनाचें ध्येय नाहीं. तसें असतें तर, ज्या समाजव्यवस्थेंत बराचसा सुखभोग आणि बरेंचसे भावनिक व बौद्धिक समाधान मानवाला मिळण्याची खात्री आहे अशा समाजव्यवस्थेनें मानव संतुष्ट झाला असता व त्याची प्रगति थांबली असती. आवश्यक वस्तू बऱ्याशा प्रमाणांत पशूला लाभल्या कीं तो तृप्त व संतुष्ट असतो. देवकोटींतले जीव झगझगाटाच्या वैभवांत असतात व त्या वैभवांत ते संतुष्ट असतात. पशूंना व देवांना ज्या श्रेयाची, श्रेष्ठ आत्महिताची कल्पना येत नाहीं त्या श्रेयाचा लाभ करून घेतल्याशिवाय कोणत्याहि स्थितींत मानव मात्र कायम विसांवा घेत बसत नाहीं. जीवमान प्राण्यांत मानव सर्वांत श्रेष्ठ आहे. कारण तो सर्वांत अधिक असंतुष्ट आहे. त्याला मर्यादांचें बंधन व दडपण सर्वांपेक्षां अधिक टोंचतें, बोंचतें, असह्य होतें. दिव्य हव्यासानें झपाटल्याप्रमाणें वेड लागल्याप्रमाणें दूरच्या ध्येयामागें लागणारा असा, मानव हा बहुधा एकच जीववर्ग आहे. अशा दिव्य वेडाची पात्रता इतर जीवांत, देवांत कोठेंहि नाहीं.

अशारीतीनें जीवनाचा, विश्वजीवनाचा जो आत्मा आहे, त्या विश्वात्म्याच्या इष्टसाधक सुप्तशक्ती मानवी व्यक्तींत सांठविल्या आहेत, केंद्रित झाल्या आहेत. सर्व जीवांत मानवी व्यक्ति हेंच प्रामुख्यानें विश्वात्म्याच्या इष्टसाधक सुप्तशक्तींचे केंद्रस्थान आहे. विश्वात्म्याला

 

पान क्र. ८९

 

इष्ट असें ईश्वराचें अवतरण स्वतांत घडवून आणण्यास लागणारी पात्रता 'मानव-पुत्र' पूर्णपणें मिळवूं शकतो. मानवाला मनु, मनन करणारा, मनोमय पुरुष, मनोमय आत्मा असें प्राचीन ऋषीनीं म्हटलें आहे. मानव हा केवळ उच्च प्रकारचा सस्तन प्राणी नव्हे, तो मननशील आत्मा आहे. जड द्रव्यानें बनलेल्या पशुदेहांत वास्तव्य करणारा मननशील आत्मा म्हणजे मानव होय. मानव हा ''नाम'' किंवा अज्ञेय तत्त्व आहे, त्यानें कांहीं कार्यासाठीं आकार किंवा देह स्वीकारला आहे. मानव या आपल्या देहाचा उपयोग एक माध्यम म्हणून करतो, आत्म्याला द्रव्याशीं व्यवहार करण्याचें मधलें साधन म्हणून करतो. जड द्रव्याच्या आश्रयानें, या द्रव्याच्या अंतरंगांतून जें पशुजीवन वर आलें आहे, तें पशुजीवन मानवाच्या जीवनाची एक खालची पायरी, पातळी किंवा भूमिका आहे. याच्या वरची भूमिका, मनाची किंवा मानसिक जीवनाची. या भूमिकेवर मानव पक्कें ठाण मांडून बसला आहे. विचार करणें, भावना करणें, इच्छा करणें जाणीवपूर्वक बुद्धिपुरःसर हालचाल करणें, हीं मानसिक जीवनाचीं किंवा मनाचीं अंगें आहेत. भौतिक जड द्रव्य व त्यांत व्यक्त होणाऱ्या प्राणशक्ती यांचा ताबा मिळविण्याचा मन प्रयत्न करीत असतें; त्याचप्रमाणे या द्रव्याला व या शक्तींना, क्रमवार प्रगमनशील रूपांतराचा आपला जीवननियम लावण्याचा प्रयत्नहि मन करीत असतें. मनाची किंवा मानसिक जीवनाची भूमिका ही मानवी जीवनाची शेवटली भूमिका नव्हे, तर ती मधली भूमिका आहे. या भूमिकेच्या वर मानवी जीवनाची शेवटची तिसरी भूमिका आहे. मानवी मन या सर्वोच्च भूमिकेच्या शोधांत असतें. ही सर्वोत्तम भूमिका लाभली म्हणजे मानवाला आपल्या देहाच्या व मनाच्या जीवनांत ही भूमिका व्यक्त करावयाची असते. आज मानवाचा आत्मा ज्या कांहीं गुणांनीं संपन्न आहे, त्यापेक्षां स्वभावत: श्रेष्ठ अशा गुणांनीं व शक्तींनीं संपन्न असें कांहीं तत्त्व, या सर्वोच्च भूमिकेवर आहे. या तत्त्वाला मानवी देहाच्या व मनाच्या व्यवहारांत कार्यान्वित करणें हा मानवाच्या दिव्य जीवनाचा पाया होय.

मानव हा मनाच्या भूमिकेवर आल्यावर त्याला स्वत:च्या आत्म्यासंबंधानें कांहीं कल्पना येते. ही कल्पना आत्म्याचें खरें स्वरूप दाखविते असें तो मानतो. आत्मविषयक अधिक खोल ज्ञान झाल्यानंतर ही त्याची प्राथमिक कल्पना त्याला समर्पक वाटेनाशी होते. त्याला भासमान होणाऱ्या नव्या आत्म्याला म्हणायचें काय, कोणतें सूत्र त्याचें यथार्थ वाचक होईल, याचा तो विचार

 


पान क्र. ९०

 

करतो; त्याचप्रमाणें या नव्या आत्म्याचें खोल ज्ञान झाल्यावर व्यक्त स्वरूप पाहण्याचाहि तो प्रयत्न करतो. याप्रमाणें आत्मवर्णनाच्या व आत्मदर्शनाच्या प्रयत्नांत तो असतां त्याला असें आढळून येतें कीं, हा नवा आत्मा, त्याचें अस्तित्व, दोन बाजूंनीं - त्याच्या वरच्या बाजूनें व त्याच्या खालच्या बाजूनें- शून्यानें मर्यादित झालेलें आहे; शून्यानें म्हणजे, या नव्या आत्म्याच्या शून्य भावानें, अभावानें. या आत्म्याच्या अभावाच्या ठिकाणीं दुसरें कांहीं अज्ञेय किंवा ज्ञेय असूं शकेल. मानवाची प्रगति सध्यां जेथवर झाली आहे, ज्या मनोमय आत्म्यापर्यंत तो सध्यां पोंचला आहे, त्याच्या पलीकडे आत्मज्ञानमय अनंत अस्तित्वाचा आत्मा आहे. या आत्म्याचें सामर्थ्य, त्याचा प्रकाश, त्याचा आनंद, मनोमय आत्म्याच्या मानवाला प्रतीत होतो, त्याच्यावर या अनंत आत्म्याचा प्रभाव पडतो. आपला या आत्म्यासंबंधींचा विचार वा अनुभव, मनाला सुलभ अशा शब्दांत मांडण्याचा तो प्रयत्न करतो. हा आत्मा अनंत, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान्, अमर, मुक्त, प्रेमरूप व आनंदरूप परमेश्वर आहे असें या आत्म्याचें तो वर्णन करतो. परंतु त्याला असें दिसतें कीं, हा आत्मसूर्य जेथें प्रकाशतो त्या क्षेत्राला दोन बाजूंनीं रात्रीनें मर्यादित केलेलें आहे; या सूर्याच्या वरतीं खालच्याहून व्यापक व गाढ अंधकार आहे; या आनंदरूप उपरिनिर्दिष्ट आत्म्याची, म्हणजे परमेश्वराची, पूर्ण ओळख करून घेण्याचा साधकानें प्रयत्न केला म्हणजे या आत्म्याचें स्वरूप बदलत बदलत अशा कोटीला जातें कीं, तो स्वरूपतः समूळ नाहींसा होतो. दुसरें असें कांहीं अज्ञेय तत्त्व त्याच्या जागीं येतें कीं, मनानें निर्मिलेलें कोणतेच वर्णनात्मक शब्द त्याला लागूं पडत नाहींत - मनाच्या कोणत्याहि एका शब्दानें किंवा सर्व शब्दांनीं मिळून या अज्ञेय तत्त्वाचें वर्णन होऊं शकत नाहीं. तेव्हां हा आत्मा, हा परमेश्वर बाजूला टाकून परमेश्वर नाहीं असें म्हणून त्याच्या पलीकडे असलेल्या अज्ञेय तत्त्वाला तो मानूं लागतो. निदान त्याच्या मनाला असें दिसतें कीं, परमेश्वर आपला स्वभाव टाकून दुसरेंच कांहीं तत्त्व बनतो; 'परमेश्वर' या कल्पनेला किंवा वर्णनाला योग्य असें त्याचें स्वरूप रहात नाहीं. ही वर पाहणाऱ्या मनाची गोष्ट झाली. येथेंहि विश्वामध्यें, त्याच्या स्वत:मध्यें, त्याच्या आजूबाजूला सर्वत्र, या नव्या आत्म्याच्या म्हणजे, परमेश्वराच्या विरुद्ध असलेल्या गोष्टी त्याला दिसतात - परमेश्वर दिसत नाहीं. येथें मरण नेहमीं त्याच्या मागें लागलेलें असतें, त्याचें अस्तित्व आणि अनुभव मर्यादांनीं जखडलेलीं असतात; प्रमाद, ज्ञानशून्यता, दुर्बलता,

 

पान क्र. ९१

 

जडता, दुःख, व्याधि, दुष्टपणा यांचा नेहमीं त्याला जांच होतो, या गोष्टी त्याच्या धडपडीला अयशस्वी करतात. या कारणामुळें परमेश्वर नाहीं, असें त्याला वाटणें अटळ होतें. निदान त्याला असें दिसतें कीं, परमेश्वर स्वतःच स्वत:ला नष्टवत् करतो, आपलें खरें शाश्वत रूप टाकून कोणत्या तरी रूपाच्या किंवा घटनेच्या आंत दडतो.

ईश्वराच्या वरतीं, पलीकडे, जें अज्ञेय तत्त्व ईश्वराला स्वतांत विलीन करून घेतें, ईश्वर नाहीं असें करून टाकतें, तें तत्त्व अकल्पनीय म्हणून गूढ व मनाला न कळण्यासारखें असतें. परंतु येथें जें कांहीं ईश्वराला खऱ्या अस्तित्वांतून नाहींसें करतें तें कळण्यासारखें असतें, कळतें, निश्चित स्वरूपाचें असतें; तरीपण त्यालाहि गूढत्वाच्या वर्गांत घालणें भाग असतें. कारण ईश्वर नाहीं म्हणावयास लावणाऱ्या वस्तू किंवा घटना खरोखरी आहेत काय, कां आहेत, अस्तित्वांत आल्या कशा, हें प्रश्न त्याला येथें सुटत नाहींत. या वस्तूंच्या, घटनांच्या प्रक्रिया त्याला दिसतात, या प्रक्रियांचा त्याजवर परिणाम होतो, त्याला त्यांचा अनुभव येतो; परंतु त्यांचें रहस्य, त्यांचें सत्य, त्यांच्यांतील तत्त्व काय आहे तें त्याला शोधूनहि सांपडत नाहीं.

कदाचित् या वस्तू व घटना अनाकलनीयच आहेत, ज्याप्रमाणें ईश्वराच्या वरतीं, पलीकडे, त्याला नष्टवत् करणारें अनाकलनीय असें कांहीं आहे तसें, या वस्तूंचें व घटनांचें सत्य-स्वरूप खरोखरीच अनाकलनीय आहे असें कबूल करणें कदाचित् योग्य होईल. किंवा असाहि पक्ष घेतां येईल कीं, या वस्तूंत व घटनांत सत्य असें तत्त्व मुळीं नाहींच, त्या भ्रमरूप आहेत, 'असत्' आहेत. ईश्वराच्या पलीकडील, त्याला नष्टवत् करणारें तत्त्व, शून्य आहे असें केव्हां केव्हां म्हटलें जातें, तसें हें ईश्वराच्या खालीं असणारें तत्त्वहि वस्तुत: शून्य, अभावरूप, असूं शकेल; तें तसें आहे असें म्हणणारे निघतील, आहेतहि तथापि ज्याप्रमाणें ईश्वराच्याहून वरच्या पातळीवरील असत् - म्हणजे शून्य - ही अडचणींतून बाहेर पडण्याची पळवाट आम्हीं धरीत नाहीं, त्याप्रमाणें ईश्वराच्याहून खालच्या पातळीवरील, त्याला नष्टवत् करणारें असत् - म्हणजे शून्य - आहे ही गोष्ट आम्ही मानीत नाहीं. हें येथील 'असत्', पूर्णतया सत्यताशून्य आहे असें म्हणणें किंवा अनर्थकारक भ्रम हेंच त्याचें खरें रूप आहे असें कल्पून त्याच्या पासून पळून जाण्यासाठीं मार्ग शोधणें, या गोष्टींचा अर्थ असा होतो कीं, आमच्यापुढे असलेला प्रश्न आम्ही टाळतों, आमचें कर्तव्य आम्ही

 

पान क्र. ९२

 

टाळतों. ईश्वर नष्टवत् करणाऱ्या व सच्चिदानंदन-स्वरूपाच्या विरुद्ध असलेल्या वस्तूंना व घटनांना जीवन हें असत्य मानीत नाहीं, सत्य मानतें. या वस्तूंचें व घटनांचें अस्तित्व नित्य नसतें, परिमित कालाचें असतें एवढेंच. या वस्तू व घटना आणि साधुत्व, ज्ञान, आनंद, सुख, जीवित, मरणोत्तर अस्तित्व, सामर्थ्य, सत्ता, संवर्धन - या तद्विरोधी वस्तू व घटना विश्वात्म्याच्या व्यवहाराची, नियोजित कार्याची, आवश्यक साधनसामग्रीच आहेत.

अशी पुष्कळ शक्यता आहे कीं, वर सांगितलेल्या अन्योन्यविरोधी गोष्टी भ्रमाचा परिणाम नसून, व्यक्तीनें कल्पिलेल्या चुकीच्या संबंधांचा परिणाम असतील किंवा या संबंधांमुळें त्यांच्याबरोबर अनिवार्यपणें येणाऱ्या त्याच्या सहचारी गोष्टी असतील. या संबंधाला चुकीचा संबंध म्हणावयाचें तें अशाकरितां कीं, विश्वांत व्यक्तीचें जें स्थान आहे त्या संबंधीची खोटी कल्पना करून त्या खोट्या कल्पनेवर व्यक्तीनें हा संबंध आधारलेला असतो. व्यक्तीनें विश्वांतील आपल्या स्थानासंबंधीं खोटी कल्पना केली म्हणजे त्याबरोबर ईश्वर व निसर्ग यांजकडे, तसेंच स्वत: व परिस्थिति यांजकडे पाहण्याची व्यक्तीची दृष्टि व वृत्ति अवास्तव होते, वस्तुस्थितीला धरून असत नाहीं; आणि हा चुकीचा संबंध सर्व अनर्थाला कारण होतो. व्यक्ति ज्या विश्वांत राहते त्या विश्वाशीं, आणि स्वत:च्या ध्येयरूप अंतिम स्वरूपाशीं व स्वभावाशीं, विसंगत, विसंवादी असें तिचें वर्तन आणि वृत्ति, तिनें कल्पिलेल्या या चुकीच्या संबंधामुळें होत असल्यानें, म्हणजेच ती असावी तशी नसून वेगळीच बनली असल्यानें, तिला वस्तुजातांतील महान् गूढ सत्याचीं अन्योन्यविरोधी व्यक्त रूपें करतील तो जांचकांच सहन करणें भाग पडतें. अर्थात् हा जांचकांच मानव पतित झाल्याचें प्रायश्चित्त म्हणून केला जात नाहीं, तर मानवाची प्रगति व्हावी म्हणून केला जातो. हा जांचकांच मानवी प्रगतीला केवळ उपकारक नव्हे तर आवश्यक असतो; मानवाला जें कार्य करावयाचें आहे, व पूर्णतेनें पार पाडावयाचें आहे त्या कार्याच्या प्राथमिक अंगाप्रमाणें ह्या जांच करणाऱ्या गोष्टी आहेत, त्या कार्याच्या जणुं पहिल्या पायऱ्याच आहेत; मानवाला जो मुकुट मिळावयाचा आहे, मिळविण्याची त्याला आशा आहे, त्यासाठीं द्यावी लागणारी किंमत म्हणजे वरील गोष्टींचा जांच सहन करणें होय. निसर्ग जडद्रव्याच्या रूपांतून वर चढून, पूर्ण जाणिवेंतील आपलें स्थान प्राप्त करूं इच्छितो, त्या निसर्गाला वर चढावयास

 

पान क्र. ९३

 

व जाणिवेंत शिरावयास जो अरुंद रस्ता मिळतो, तो या गोष्टींच्या अन्योन्य विरोधाचा रस्ता होय. या गोष्टी म्हणजे निसर्गाचा मौलवान् वस्तूंचा सांठा आहे; आणि हा सांठा व्यक्तीच्या उद्धारासाठीं देऊन टाकूनच निसर्ग स्वत: बंदींतून मोकळा होऊं शकतो.

या खोट्या संबंधातून व त्यांच्या साह्यानेंच निसर्गाला व मानवाला खरे संबंध शोधून काढावयाचे असतात. अविद्येच्या आश्रयानें आम्हाला मुत्यु तरून पलीकडे जावयाचें असतें. (अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययाऽमृतमश्नुते - ईशावास्योपनिषद् ) निसर्गांतील शक्तींच्या संबंधानें वेदहि गूढ भाषेंत असें सांगतात कीं, दुष्ट स्त्रियांप्रमाणें, या शक्ती दुष्टपणाची प्रेरणा घेऊन काम करतात, योग्य मार्गापासून दूर जातात, आपल्या स्वामीला उपद्रव देतात, स्वत: खोट्या आणि दुःखी असतात - पण आपल्या करणीनें शेवटीं ''हें बृहत् महान् सत्य'', आनंदरूप असणारें सत्य प्रस्थापित करतात. तेव्हां, मानवानें नैतिक शस्त्रक्रिया करून आपल्या अंतरंगांतून निसर्गांतील दुष्टपणा कापून काढून दूर केला किंवा जीवनाला रामराम ठोकला, तें अमंगल आहे म्हणून त्यापासून पळ काढला म्हणजे त्यानें स्वर्ग मिळविला असें होत नाहीं; तर मरणावर मात करून त्यानें आजच्या जीवनापेक्षां अधिक पूर्ण जीवन हस्तगत केलें पाहिजे; मानवी मर्यादेच्या आंत लहान लहान गोष्टी करण्यांत चूर न होतां त्या गोष्टींना ईश्वरी व्यापकतेचें व उदात्ततेचें रूप त्यानें द्यावयास हवें; आज ज्या दुःखाला आम्ही त्रासतो त्या दुःखाचें परिवर्तन आनंदांत करण्याची किमया त्यानें केली पाहिजे; जें अमंगल आहे त्याचें मांगल्यांत रूपांतर होईल अशी व्यवस्था त्यानें करावयास हवी; आज प्रमाद आणि असत्य म्हणून ज्या गोष्टी त्रास देतात त्या गोष्टींच्या पोटीं दडलेलें सत्य प्रकट करून त्या प्रमादाच्या व असत्याच्या जागीं या सत्याची स्थापना त्यानें केली पाहिजे - हें सर्व त्यानें यशस्वी रीतीनें घडवून आणलें तरच त्याचा जीवनयज्ञ सिद्धीस गेला असें होईल; त्याचा जीवनप्रवास योग्य रीतीनें शेवटास गेला असें म्हणतां येईल; तरच, त्याच्यामधील आणि त्याच्या बाहेरील स्वर्ग आणि पृथ्वी आपणहून सम पातळीवर येऊन परात्पर ब्रह्माचा आनंद भोगीत एकमेकांच्या हातांत हात घालून पूर्ण ऐक्यभावानें नांदतील.

पण अन्योन्यविरोधी गोष्टी आपापलें रूप टाकून सुसंवादी गोष्टींचें रूप घेतील कशा ? आमच्या मृत्युवश, पार्थिव जीवनाच्या शिशांतून अमर दिव्यजीवनरूपीं सोनें निर्माण करणारी किमया कोठें आहे? प्रश्न

 

पान क्र. ९४

 

ठीक आहेत. परंतु या गोष्टी तत्त्वत: विरोधी नसतील तर ? या गोष्टी एका सद्वस्तूंचीं व्यक्त रूपें असून त्यांचा गाभा एकाच सद्वस्तूचा असेल तर ? अशी वस्तुस्थिति असेल तर मात्र, आमच्या अदिव्य गोष्टींचें दिव्य गोष्टींत रूपांतर होणें संभवनीय आहे असें म्हणतां येईल.

आपण ही गोष्ट पाहिली आहे कीं, असत् म्हणून जी अवस्था आहे ती, शुद्ध अभावात्मक नसून अस्तित्वाची एक अकल्पनीय अवस्था असणें शक्य आहे; शब्दांनीं न सांगतां येण्यासारखा निरतिशय आनंद ''असत्'' च्या कल्पनेनें व्यक्त होत असेल, हेंहि शक्य आहे. निदान बौद्धमतांतील निर्वाणाचा प्रयत्न हा, या सर्वोच्च असत् अवस्थेची प्राप्ति करून घेण्याचा व त्या अवस्थेंत कायम विसांवा घेण्याचा एक महान् तेजस्वी प्रयत्न होता हें आपणांस ठाऊक आहे; आणि हेंहि आपण जाणतो कीं, जे मुक्त मुक्तीनंतर पृथ्वीवर राहतात त्यांच्या अंतर्यामांत नांदणारी निर्वाण-अवस्था किंवा असत्-अवस्था अवर्णनीय शांति व आनंद या स्वरूपाची असते. तिचा व्यावहारिक परिणाम सर्वदुःखविनाश हा असतो; कारण सर्व दुःखाचें मूळ जी अहंवृत्ति, अहंवेदना तिचा समूळ नाश निर्वाण घडवून आणतें. निर्वाणाचें हें विनाशक कार्य जसें उघड दिसतें, तसें त्याचें विधायक कार्यहि दिसतें; तें म्हणजे निर्वाणमय अंतरंगांत अनिर्वचनीय आनंद राहतो, अनिर्वचनीय शांति राहते; या शांतींत, या आनंदात, 'मी आहे' ही अस्तित्वाची कल्पना देखील विलीन होते, नाहींशी होते. निर्वाणाच्या एकरस सर्वशून्यमय शांतीहून, आमच्या मनाला कल्पितां येणारी शांति, फार निकृष्ट दर्जाची असल्यानें तिला शांति हें नांव देणें, कोणतेंहि नांव तिला देणें समर्थनीय वाटत नाहीं. सच्चिदानंद हें नांव निर्वाण स्थितीला देता येईल; परंतु आम्ही कल्पना करतों तें सत्, चित् व आनंद तेथें नसून, तेथील सत्-चित्-आनंद कल्पनेच्या आवांक्यापलीकडील आहेत हें आपण लक्षांत ठेवलें पाहिजे. सर्व शब्द तेथें गैरलागू होतात, आपल्या जाणिवेला येणारा सर्वोच्च अनुभव, निर्वाणाच्या अनुभवाच्या फार अलीकडचा आहे.

सच्चिदानंदाच्या अस्तित्वाला एका दृष्टीनें काट देणारी, तिच्याहून श्रेष्ठ अशी सत्-चित्-आनंदाची ही जी असत् अवस्था, तिची गोष्ट झाली. या श्रेष्ठ असत् प्रमाणें सच्चिदानंदाला काट देणारें एक कनिष्ठ असत् आहे. हें कनिष्ठ असत् देखील सच्चिदानंदच आहे; विरोधी वाटलें तरी, तें सच्चिदानंदाहून वेगळें कांहींहि नाहीं; कारण एकच एक सद्वस्तु,

 

पान क्र. ९५

 

ब्रह्म, सर्व कांहीं झालें आहे. हें कनिष्ठ असत्, सच्चिदानंद असल्याची कल्पना बुद्धीला करतां येते, अंतदृष्टीला हें असत् सच्चिदानंद असल्याचें दिसूं शकते, इंद्रियांना देखील हें असत्, सच्चिदानंदाप्रमाणें संवेदना देऊं शकतें, आमच्या जाणिवेला असत् चा असाच सच्चिदानंद-अनुभव नेहमीं होऊं शकेल; पण कांहीं महान् मूलभूत प्रमाद घडलेला आहे, माया किंवा अविद्या किंवा मूलभूत अज्ञान यांनीं आमच्या जाणिवेवर मात करून आमची दृष्टि दूषित केलेली आहे; म्हणून सच्चिदानंदाचा अनुभव आम्हाला 'सच्चिदानंद' या स्वरूपांत न येतां, त्याच्या उलट स्वरूपांत येतो. सच्चिदानंदाचें विपरीत रूपानें दर्शन होणें, हें अज्ञानाचें कार्य असेल तर या आपत्तींतून सुटका होणें शक्य आहे. तर्ककठोर मनाला पटेल असें तत्त्वज्ञानात्मक प्रतिपादन करून, असत् म्हणजे सच्चिदानंदच, हें कदाचित् सिद्ध करतां येणार नाहीं; तथापि दिव्य जीवन केवळ आपल्या कल्पनेंत न ठेवतां आपल्याला व्यवहारांत आणावयाचें आहे; त्यासाठीं असत् म्हणजे सच्चिदानंदच असा आवश्यक तेवढा अनुभव आपल्याला मिळवतां येईल. सच्चिदानंदाच्या प्रांतांत दृष्टि टाकणें म्हणजे अज्ञेयाच्या अनिर्वचनीयाच्या प्रांतांत दृष्टि टाकणें आहे. आमच्या दृष्टीला खूप ताण देऊनहि, तर्ककठोर मनाला समाधानकारक होईल अशा तात्त्विक प्रतिपादनाला पुरेसा पुरावा मिळणें अवघड आहे असें आम्हीं वर सूचित केलेंच आहे. अशा प्रतिपादनाच्या भरीस आम्हीं पडणार नाहीं.

आतां, दिव्य जीवन जगूं लागण्यासाठीं जो अनुभव आम्हाला पायाभूत, आधारभूत म्हणून हवा आहे, तो अनुभव मिळण्यासाठीं आम्हाला काय करावयास हवें तें पाहूं. आमचें मन वस्तुजाताचा पृष्ठभाग पाहतें; हा पृष्ठभाग पहाण्याला सोपा असतो, तो स्वच्छ समग्र दिसतो. आमच्या मनाला या पृष्ठभागावरच लक्ष लावण्याची संवय झाली आहे. या पृष्ठभागाच्या खालीं जाण्याचे धाडस आम्ही करावयास हवें. या पृष्ठभागाखालीं आम्ही उतरलों म्हणजे, अति अफाट व अंधुक प्रकाशाचा प्रांत आमच्यासमोर येतो; त्या प्रांतांत आम्ही बारीक नजर लावली पाहिजे; जाणिवेच्या पृष्ठभागाखालीं खोल खोल, अगदीं तळ सांपडणार नाहीं अशा खोल जागा आहेत, तेथें प्रवेश करावयाचें धाडस आम्हीं करावयास हवे. जाणिवेच्या या खोल भागांत अस्तित्वाच्या अनेक अवस्था आहेत. या अवस्था आज आमच्या नसल्या तरी या अवस्थांशीं तादात्म्य पावण्याचें धाडस आम्हीं केलें पाहिजे. जाणिवेच्या खोल प्रांतांत हा जो

 

पान क्र. ९६

 

शोध आम्ही चालविणार, त्या शोधाला चांगली मदत होईल असा, आमच्या मानवी भाषेचा आवांका नाहीं. तथापि अल्पशी मदत आमची भाषा आम्हाला करूं शकेल. कांहीं प्रतीके, कांहीं उपमा आम्हाला ही भाषा पुरवील. आम्ही आमच्या शोधाच्या प्रवासांतून कांहीं उपयुक्त अनुभव घेऊन परत येऊं. हें अनुभव आमच्या मनासमोर मांडण्यास आमच्या भाषेनें पुरविलेलीं प्रतीकें व उपमा आम्हाला उपयोगी पडतील. हे अनुभव सत्याची थोडीबहुत कल्पना देण्यापुरतेच असणार. तरीपण, या अनुभवांनीं आमच्या आत्म्याच्या प्रकाशांत, ज्ञानांत, भर पडेल आणि या विश्वाची जी अवर्णनीय योजना सर्व घटनांच्या मुळाशीं आहे, त्या योजनेचें, त्या आराखड्याचें, थोडेंबहुत स्पष्ट असें प्रतिबिंब आमच्या मनावर पाडण्याचें कार्य हें आमचे अनुभव अवश्य करतील.

 

पान क्र. ९७

 









Let us co-create the website.

Share your feedback. Help us improve. Or ask a question.

Image Description
Connect for updates